Tuesday, August 25, 2020

भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी भाग २ (हेदवी ते दापोली)

तवसाळ :
 हेदवीपासून १२ किलोमीटर अंतरावर जयगडच्या बाजूला दक्षिणेस हे समुद्रकिनारी असलेले एक सुंदर ठिकाण आहे. शास्त्री नदीच्या मुखावर हे ठिकाण आहे. समोरच जयगड या जलदुर्गाचे दर्शन होते. तवसाळ हा छोटा आणि कमी गर्दीचा किनारा आहे. येथून शास्त्री नदीत (जयगड खाडी) नौकानयनाची सोय उपलब्ध आहे.
 
 तवसाळ किनारा आणि पैलतीरावर दिसणारा जयगड परिसर आणि जिंदाल प्रकल्प
तसेच पर्यटकांसाठी मासे पकडण्याची सोय करण्यात आली आहे. या खाडीतून सूर्यास्ताचे सौंदर्य अनुभवता येते. फेरीबोटीतून वाहनासह जयगडला जाता येते. जयगडहून गणपतीपुळेमार्गे रत्नागिरीला जाण्यासाठी मार्ग आहे.
 तवसाळ किनार्‍याचे अप्रतिम दृष्य

 तवसाळ किनार्‍याच्या मागे विजयगड हा जयगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. आज त्याचे फार अवशेष दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला हा बुरुज दिसतो.
तवसाळ किनारा पाहून गुहागरच्या दिशेने निघालो कि पुढचा सुंदर समुद्र किनारा आहे, नरवण
नरवण बीच
रोहिला : 
हेदवीपासून सात किलोमीटर अंतरावर सुंदर वाळूची पुळण आणि त्यापलीकडे सुरूबन आहे. उजवीकडे नारळाची झाडे दाटीवाटीने उभी आहेत.
  पुढे नितांत सुंदर रोहिला गावाचा परिसर दिसतो
मोडकाघर फाटा : 
येथून वेळणेश्वर व हेदवी, तसेच तवसाळ येथे जाता येते. येथे बोट क्लब आहे.

हेदवी : 

अप्रतिम निसर्गाच्या सान्निध्यात असलेले येथील दशभुजा गणपती मंदिर महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे आवडते ठिकाण झाले आहे. निसर्गाच्या कोंदणात वसलेले हे टुमदार मंदिर पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे. मंदिराचे बांधकाम साधारण १७६० ते ७५ या कालावधीत केळकरस्वामींनी केले व त्यासाठी पेशव्यांनी मदत केली होती, असे सांगितले जाते. मंदिर टेकडीवर असून, पाहावे तिकडे गर्द झाडी आहे. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा-फुलांच्या बागा यांमुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व इथल्या परिसराच्या प्रेमात पडतोच. देवदर्शनाइतकेच निसर्गाचेही पर्यटकांना प्रेम असतेच. डोंगराच्या पायथ्याशी, एका बाजूला अगदी शांत परिसरात असलेलं हे मंदिर नुसतं पाहूनही मन प्रसन्न होतं. मंदिर परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आल्यानं हा परिसर आणखी सुंदर झाला आहे.
दशभुजा गणेश
हेदवीचं गणपतीचं देऊळ अतिशय प्रसिद्ध आहे.
हे पेशवेकालीन मंदिर गुहागर शहरापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे.
 
मंदिरातील मूर्ती ‘श्री दशभुजा लक्ष्मीगणेश’ या नावानं ओळखली जाते.
मंदिरातील मूर्ती ही पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. गणेशाची मूळ मूर्ती काश्मिरात घडवली गेली असे सांगण्यात येते.  मूर्तीला दहा हात असून, उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमल, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून, सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती इतरत्र दिसून येत नाहीत.या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून, अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता, ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते.
 याशिवाय हेदवीला स्वामी समर्थांचा मठ देखील आहे.
हेदवीची बामणघळ : 
हेदवीचा समुद्रकिनारा खूप छोटा आहे; पण आकर्षक आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे बामणघळ व समुद्राच्या पाण्याचा मारा. 
हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला जाणारे लोक अधिक जाणकार असतील, तर त्यांची पावलं आपोआप गणपती मंदिराच्या अलीकडे असलेल्या बामणघळीकडे वळतात. बामणघळ हा निसर्गाचा अनोखा चमत्कार आहे. हेदवीपासून तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो.
या रस्त्याने गेल्यास समुद्रकिनारा लागतो. किनाऱ्याच्या उजव्या बाजूचा परिसर काळ्या कातळाने आणि डोंगराने वेढलेला आहे. या संपूर्ण परिसरात समुद्राच्या उसळत्या लाटांची कातळाशी पकडापकडी सुरू असते.
 
किनाऱ्यावरच थोड्या अंतरावर उमा-महेशाचं एक सुंदर मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. 
मंदिरापासून थोडं आणखी पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर कातळामध्ये समुद्रापर्यंत पडलेली एक उभी मोठी चीर दिसते.
हीच ती प्रसिद्ध बामणघळ. किनाऱ्यावरून सुरू होणाऱ्या कातळापासून काही फूट आतपर्यंत ही घळ पडलेली आहे. एखादी अरुंद दरी असावी, एवढी, म्हणजे सुमारे दहा ते पंधरा फूट एवढी तिची उंची आहे. समुद्राच्या लाटांचं वेगानं येणारं पाणी या ठिकाणी वर्षानुवर्षं घुसून ही घळ तयार झाली आहे. 
लाटांचं पाणी एवढ्या वेगाने आत घुसतं, की कातळात तयार झालेले वेगवेगळे आकार पार करत ते घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत शिरतं आणि तिथून वेगानं वर उसळतं. भरतीची वेळ असेल आणि लाटांचा जोर जास्त असेल, तर एवढ्या खोल असलेल्या घळीतूनही हे पाणी वेगानं वर आकाशाच्या दिशेने फेकलं जातं आणि कातळाच्या पृष्ठभागापासून काही फूट वर उडतं. घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत किंवा बाजूलाही आपल्याला उभं राहता येत असल्यामुळे, कधीकधी आपल्यालाही या तुषारसिंचनाचा आनंद घेता येतो; मात्र ही घळ जेवढी सुंदर, तेवढीच धोकादायक आहे. अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनाही इथे घडल्या आहेत.
 
 सतत समुद्राचं पाणी उडून पडत असल्यामुळे कातळ निसरडे असण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हा धोका जास्तच असतो. घळ अतिशय अरुंद आणि खोल असल्यामुळे हा चमत्कार पाहताना पूर्ण काळजी घेऊन आणि सुरक्षित अंतरावरूनच पाहणं योग्य.  भरतीची वेळ पाहून येथे जावे. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेली मंदिरंही पाहण्यासारखी आहेत.
हेदवीचे सुरुची कॉर्नर- अभय भाटकर
फोन नं: ०२३५९- २४३२०९,२४३६१६
वेळणेश्वर :
कोकणातील सुंदर सागरकिनाऱ्यांपैकी वेळणेश्वरचा किनारा प्रसिद्ध आहे. लांबवर असणारा सुरक्षित किनारा म्हणून हा ओळखला जातो. कोळ्यांची वस्ती मोठी असल्याने काठावर नांगरलेल्या होड्या समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात असतात, हे दृश्य खूप छान दिसते. उंच डोंगरातील घाटातून खाली येताना सागराचे विलोभनीय दर्शन होते.
 पूर्वी किनाऱ्यावर वाळूत पावलांचे ठसे अजिबात नसायचे. आता पर्यटक खूप येतात. 
किनाऱ्याची नैसर्गिक शोभा मात्र तशीच आहे. अद्यापही संपूर्ण किनारा जणू नारळाच्या उंच झाडांनी सजविला आहे असे वाटते. 
 
वेळणेश्वर दीपमाळवेळणेश्वर दीपमाळ
वेळणेश्वर किनारा
समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे, त्याला ‘मेरुमंडल’ म्हणतात. हे मंदिर साधारण सन ११०० ते १२००मधील आहे. आदिलशहाच्या पदरी काम करणारे येथील गोखले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हणतात. मंदिर प्रांगण खूपच मोठे आहे. त्यात ३० फूट उंचीची देखणी दीपमाळ आहे. घुमटाकार तीन शिखरे आहेत. गाभाऱ्यात तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून, त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात. शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालिमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या, तर विठ्ठल-रखुमाईची पाषाणमूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. कोकणातील लोक श्रद्धाळू आहेत. स्थानिक लोक या काळभैरवाला कौल लावताना पाहायची संधी मिळाल्यास जरूर घ्यावी.
वेळणेश्वरचे एमटीडीसी मान्यताप्राप्त ठि़काण-
प.पू. गगनगिरी कृपा विश्रामगृह-९४२०९०६६९३, हॉटेल-०२३५९-२४३६६४ , निवास- २४३२५४
एमटीडीसीचा पर्यटक निवास-  ०२३५९-२४३२८२
कोंडकारूळ गरम पाण्याचा झरा : बोऱ्याबंदरजवळच एका टेकडीवर खडकातून सतत गरम पाणी पाझरत असते.
बुधल :
 ज्याला इंग्रजीमध्ये लँडस्केप म्हणतात, अशी भरपूर ठिकाणे कोकणामध्ये आहेत. अशांपैकी एक म्हणजे वेळणेश्वरच्या उत्तरेला असलेले बुधल हे छोटेखानी गाव. हे या वर्णनात चपखल बसते. गावाच्या कडेला असलेल्या काळ्या खडकांवर समुद्राच्या लाटांचे सतत थैमान चालू असते. याकडे बघता बघता वेळ कसा जातो समजत नाही. अर्धवर्तुळाकार पुळण, रूपेरी वाळूचा छोटा किनारा हे थोडा वेळ तरी अनुभवावे.
बुधल समुद्रकिनाराबुधल समुद्रकिनारा
 पालशेत गुंफा :
गुहागरपासून हेदवीकडे जाताना पालशेत लागतं. इथेही बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. भरपूर वनराई, मंदिरं, डोंगर, नद्या, समुद्रकिनारा असं सारं असूनही इथे पर्यटकांची गर्दी नसते. आणि म्हणूनच इथला निसर्ग स्वत:चं वैभव व्यवस्थित टिकवून आहे कदाचित. गावातून हेदवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारुती मंदिर आहे. या मंदिराशेजारी सती वृंदावन व सतीशिळा आहे. वृंदावनावरच्या शिळांवर पावले कोरलेली आहेत. समोर नंदीसदृश शिळा दिसते. पालशेत गावातील विचारे घराण्यातील सती गेलेल्या साध्वीचे हे वृंदावन असून त्यांच्या वंशजांनी वृंदावनाचा जीर्णोद्धार केला आहे. सतीशिळा मात्र वृंदावनापासून १५-२० फूट लांब एका खासगी जागेत आहे. या शिळेवर काटकोनात दुमडलेला हाताचा पंजा दिसतो. त्याखालील चिन्हे जमिनीत असल्याने दिसत नाहीत. या शिळेला देवत्त्व दिले गेले असून गावकरी सतीशिळेबद्दल अनभिज्ञ आहेत. कोकणात अशी अनभिज्ञता अनेक ठिकाणी आढळते.
    इथूनच लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाणारा फाटा फुटतो. या मंदिराला लागूनच २००१मध्ये प्रथमच डेक्कन कॉलेजमधील पुरावास्तू संशोधक अशोक मराठे यांनी बंदर  शोधून काढली. आहे. हे बंदर जांभा दगडाचे असून किल्ल्याच्या बुरुजाप्रमाणे गोल बांधकाम आहे. ते गाळाने भरले असून पडझडही होत आहे. आताचा समुद्रकिनारा आणि बंदर या प्राचीन बंदरापासून २-३ किलोमीटर लांब आहे.
    या प्राचीन बंदराच्या पुढे गावाचा काळे वठार नावाचा भाग लागतो. इथे एक प्राथमिक शाळा आहे. या शाळेत रस्त्यापासून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. या पायऱ्यांच्या कडेला एका बांबूच्या बेटाशी एक अत्यंत रेखीव विष्णूमूर्ती काळाचे आघात सोसत, ऊनापावसात उभी आहे. मूर्तीचा चेहरा व चारपैकी दोन हात भग्न आहेत. इथे थोडी अंधश्रद्धा असल्याने मूर्तीसमोर नारळ ठेवले जातात. या मूर्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही पावले त्वरित उचलणे गरजेचे आहे.
  याच गावात सुसरोंडी भागात पुराश्मयुगीन दगडी गुहा व हात कुऱ्हाड, तोड कुऱ्हाड, फरशी, तासव्या अशी दगडी हत्यारे सापडली आहेत. ही गुहा कोकणातील मानवी वस्तीची प्राचीन खूण आहे. सुमारे ९० हजार वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवी वस्ती असल्याचा पहिला पुरावा येथे मिळाला. स्थानिक या गुहेला वाघबिळ म्हणतात. ट्रेंर्किंगची आवड व पुरावास्तू अभ्यासाची आवड असणाऱ्यांनी येथे जरूर भेट द्यावी.
हेदवीकडे जाताना ‘काकस्पर्श’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेला पालशेतमधील नेनेवाडा पाहणाऱ्या पर्यटकांनी ही ठिकाणंसुद्धा आवर्जून पाहायला हरकत नाहीत.

गुहागर

गुहागर हेसुद्धा महामार्गापासून लांब, स्वतःची वेगळी ओळख राखून असलेलं एक टुमदार शहर आहे. हेदवी-वेळणेश्वरची सफर केल्यानंतर गुहागर परिसरातल्या निसर्गाचाही आस्वाद घ्यायलाच हवा. शहरात एसटी स्टँडच्या जवळच, मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. या गावातल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध आहे. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून, समोरील भव्य सभामंडपात तेवढंच भव्य आकाराचं नंदीचं शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांत गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची सुंदर मंदिरं आहेत.
   गुहा म्हणजे बुद्धी, तिचे आगर म्हणून गुहागर. काहींच्या मते, गुह म्हणजे कार्तिकस्वामी व त्याच्या नावावरून गुहागर. काहींच्या मते येथे मोठ्या प्रमाणावर गो (गाय) गृहे (गोठे) होते, म्हणून गुहागर. अशी नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पाच किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण, नारळी-पोफळीच्या झाडांची हिरवी किनार असलेला येथील किनारा आबालवृद्धांचे आकर्षण ठरला आहे. येथील श्री व्याडेश्वर अनेक कुटुंबांचा कुलस्वामी आहे. गावात रस्त्याच्या दुतर्फा तीन-चार फुटांची चिऱ्याची भिंत असलेली संरक्षक भिंत व त्यामागे टुमदार घर व मागे वाडी अशी बहुतेक घरांची रचना आहे. गुहागर शहरात निवास-न्याहारी योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी घरगुती निवासव्यवस्था उपलब्ध आहे. समुद्रकिनारी अनेक रिसॉर्टदेखील आहेत. 
   गुहागरमध्ये वेगवेगळ्या भागांना ‘पाट’ अशी ओळख आहे. वरचा पाट, खालचा पाट अशी नावं ऐकताना उत्सुकता वाढते. व्याडेश्वर मंदिरापासून जवळच पोफळींच्या बनातून समुद्रकिनाऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे. गुहागरचा समुद्रकिनाराही विस्तीर्ण आणि प्रसन्न आहे. जुनी संस्कृती, टुमदार कौलारू घरं, माडापोफळींच्या बागा, छोटे वळणावळणाचे रस्ते, अशी कोकणाची ओळख राखून असलेलं हे शहर नुसतं फिरण्यासाठीही छान आहे. राहण्यासाठी अनेक घरगुती व्यवस्था आहेतच, शिवाय समुद्रकिनाऱ्याजवळही अनेक रिसॉर्टस् आहेत. मासे आणि शाकाहारी आहारही उत्तम मिळतो.
    गुहागर हे या परिसरातील पर्यटनाचे केंद्रस्थान आहे. आसपास भरपूर काही बघण्यासारखे आहे. येथे किमान दोन दिवस तरी मुक्काम हवा. सकाळी उठावे कोकणी थाटाचा दडपे पोहे, तांदूळपिठाचे घावन, आटवल भात (मेतकुटासह) असा नाश्ता करावा व बाहेर पडावे, आसपास फिरावे दुपारी जेवण करून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा बाहेर पडावे. फिरतफिरत संध्याकाळी किनाऱ्यावर यावे. वाळूत रेघोट्या ओढत सूर्यास्त पाहावा, शहाळ्याचे पाणी प्यावे, परत संध्याकाळी आवडीप्रमाणे बिरड्याची उसळ, कुळथाचे पिठले, केळफुलाची भाजी, हंगामाप्रमाणे कच्च्या फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ, मोदक, किंवा मत्स्याहारींनी सुरमई, पापलेट, बांगडा असे अनेक प्रकारचे मासे यांवर ताव मारावा, सोलकढी प्यावी, काजू खाऊन मुखशुद्धी करावी. आणखी काय हवे?
  खूप महत्त्वाचे : समुद्रावर जाताना पर्यटकांनी भरती-ओहोटीचे वेळापत्रक कसे ठरवतात, याचे कोष्टक माहिती करून घ्यावे. ज्या दिवशी तुम्ही कोठल्याही समुद्रकिनाऱ्यावर असाल, त्या दिवशीच्या तिथीची पाऊणपट करावी. थोडक्यात चतुर्थी असेल, तर पाऊणपट म्हणजे तीन. त्यात एक आकडा मिळवल्यावर चार बेरीज होते. म्हणजेच चार ही भरतीची वेळ असेल व १२ तासांनी पहाटे चार वाजता ओहोटी होईल. साधारण रोज १५ मिनिटांचा फरक पडत जातो. ओहोटीच्या वेळी पाणी मागे ओढले जाते. त्या वेळी धोका जास्त असू शकतो. हे लक्षात घ्यावे.
 
 व्याडेश्वर मंदिरातील नंदीचे शिल्प
देव व्याडेश्वर : गुहागर एसटी स्टँडजवळच मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात असलेल्या वाड्या व त्यांचा हा देव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याडमुनींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या स्थानाला ‘व्याडेश्वर’ संबोधले जाते. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून, समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदीचे शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांत गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे.
 
लक्ष्मीनारायण, गुहागर
लक्ष्मीनारायण मंदिर : गुहागरमधील खालचा पाट भागात हॉटेल कौटिल्यजवळ २५० वर्षांपूर्वीचे पेशव्यांचे सरदार हरिपंततात्या फाडले यांनी बांधलेला मंदिरसमूह आहे. येथे यापूर्वीही मंदिर असावे, असे संदर्भ मिळतात. संपूर्ण दगडी तटबंदी असलेल्या मंदिरात श्री विष्णू-लक्ष्मीची बाजूला असलेला गरुड व मागे पितळेच्या प्रभावळीसह संगमरवराची सुंदर मूर्ती आहे. मंदिर परिसर स्वच्छ व शांत आहे.
 
 
श्री दुर्गादेवीचे मंदिर : 
गुहागर शहरातील वरचापाट भागात श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मार्गावर मुख्य रस्त्यालगत देवीच्या नावाने खांब उभारला आहे. मंदिर प्रांगणात पंचायतन असून, त्यामध्ये श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण, श्री कृष्णेश्वर व समोरचा पिंपळ हे श्री भगवान सूर्यनारायणाचे मंदिर आहे. दर वर्षी येथे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. श्री दुर्गादेवीच्या कमानीजवळ कै. शिवरामशास्त्री शारंगभट खरे व मंदिराची रचना करणारे कै. पद्माकरभट दातार यांची समाधी आहे. समाधीच्या पुढच्या बाजूस कै. कृष्णाभट खरे यांनी बांधलेले कृष्णेश्वराचे मंदिर आहे. कृष्णेश्वराच्या मंदिरासमोर देवीचे तळे असून, त्यात एक लाकडी मल्लखांबासारखा सागवानी लाकडाचा खांब आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला असला, तरी जुन्या लाकडी कोरीवकामाचा वापर केला आहे. अतिशय सुंदर अशी श्री दुर्गादेवीची अष्टभुजा, संगमरवरी मूर्ती संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर उभी आहे. देवीच्या हातामध्ये चक्र, अंकुश, सर्प, त्रिशूळ, शंख, घंटा, परशू असून, महिषासुराची शेंडी धरलेली दाखविली आहे.
दुर्गादेवी मंदिर, गुहागरदुर्गादेवी मंदिर, गुहागर
कार्तिकस्वामी मंदिर : वरचा पाट भागात कार्तिकस्वामी मंदिर आहे. येथे एक फूट सहा इंच उंचीची मूर्ती आहे. पूर्वी येथे फक्त शिळा होती. १९९५मध्ये जीर्णोद्धाराच्या वेळी संगमरवराची मूर्ती बसविण्यात आली.
 व्याडेश्वर मंदिर
उफराटा गणपती
उफराटा (उरफाटा) गणपती : सुमारे ३०० वर्षापूर्वी कोळी लोकांना समुद्रात ही मूर्ती सापडली. तिची स्थापना करताना ती पूर्वाभिमुख होती. स्थानिक कथेप्रमाणे असे सांगितले जाते, की एकदा समुद्र खूपच खवळला होता व त्याचे पाणी गुहागरमध्ये शिरेल अशी भीती वाटू लागली. सर्व लोकांनी श्री गजाननाचा धावा सुरू केला. अखेर भक्तांच्या हाकेला बाप्पा धावून आला. त्याने आपले मुख पूर्वेकडून सागराच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेला केले. त्याबरोबर सागर शांत झाला. दिशा बदलल्याने याचे नाव उरफाटा गणपती पडले.
 गुहागर शहरात रहाण्याची व्यवस्था :-
1 'कर्मयोग’,
श्री. रविंद्र भास्कर भिडे,
कांजळीवाडी, गिमवी गाव,
तालुका- गुहागर जि.- सातारा
Tel. 952359 244578 / 244652
मुंबई संपर्क 25325390
रुम्स-4      उपलब्ध बेड- 8       टेरीफ- Rs.500/- ते Rs.600/-        जादा व्यक्तिसाठी-  Rs.100/-
२) रविंद्र दामले होम स्टे - (02359)240042, 9420475602
३) श्री. जोग होम स्टे -  (02359) 240875
४) अतिथी निवास ( श्री योगेश खरे)- 9273650764, 9423802208
५) सागर लॉज - (02359) 240347, 9420152272 (मुख्य बाजारपेठेत आहे)
६) हॉटेल वैनतेय -( व्याडेश्वर मंदिराजवळ ) (02359) 240515, 9420722905
७ ) अश्विनी डोंगरे
गुहागर मधे आम्ही एक पर्यटक निवास चालवत आहोत. हे एक पूर्ण घर आहे, जे आम्ही पर्यटकाना देतो. घरात आधूनिक सोयी आहेत ( टी.व्ही. नाही- बरेच लोक त्यामुळे जास्त खूष होतात ) एक जोडपे देखभालीसाठी तिथे असते. १५-२० लोकांचा ग्रुप सहज राहु शकेल ( काही वेळा जास्ती लोकही तिथे राहिले आहेत). घराच्या पुढे-मागे अंगण, मागे नारळी-पोफळीची बाग आणि बागेतुन पायवाटेने समुद्र किनारा अशी सुबक रचना आहे. जेवणाची सोय घरात नाही, पण जवळपास भरपूर पर्याय आहेत..
८) वेळावण बीच हाउसः- ९४२११३७०१४. श्री खरे ( काका. )
कार मेकॅनिक - श्री. नरेश केसकर :-  9673353517
मळण
 आनंदीबाईंचे माहेर : राघोबादादांच्या पत्नी व महत्त्वाकांक्षी आनंदीबाई यांचे माहेर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनाव ओक असे होते. आजही या कुटुंबाची येथे घरे आहेत.
आनंदीबाईंच्या माहेरच्या वाड्याचा चौथरा आणि त्या काळचे तळे पाहता येते. शृंगारतळीहून मळणला जाण्यासाठी मार्ग आहे.
 पेवे : येथे झोलाई देवी मंदिर, तसेच जमलशाहबाबा दर्गा ही दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. 
गोपाळगड : 
वाशिष्ठी नदीच्या मुखावर अंजनवेलजवळ सागरी दुर्ग या प्रकारात मोडणारा गोपाळगड शतकानुशतके उभा आहे. हा किल्ला नक्की कधी व कोणी बांधला याबद्दल माहिती उपलब्ध नाही. प्राचीन काळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरापासून (दाल्भेश्वर) चिपळूणपर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला बांधण्यात आला. सन १६६०मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला, त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण केले. मराठी अमदानीत हे परगण्याचे ठिकाण होते. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला असून, चौथ्या बाजूला खंदक आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे. दगड व चुन्याचा २० फूट उंचीचा, आठ फूट रुंदीचा दगडी बांधकामातील तट चांगल्या स्थितीत आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेसात एकर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद असून, सहा तोफांचे हल्लीच एकत्रित जतन केलेले पाहायला मिळते. किल्ल्यावर धान्यकोठारे, कातळात खोदलेल्या विहिरी दिसून येतात. येथून सावित्रीचे नयनमनोहर दृश्य दिसते.
डौलाने फडकणारा भगवा ध्वज
गोपाळगडाचा भक्कम बुरुज
 आतील अवशेष
खाडीपर्यंत उतरत गेलेली तटबंदी
दाभोळची खाडी आणि गोपाळगडाचे हवाई दॄष्य
गोपाळगड
 एन्रॉन प्रकल्पाचे दृष्य
 अंजनवेल : येथील एन्रॉन प्रकल्प खूपच गाजला. अंजनवेल येथील ताठरखानबाबा यांचा ३०० वर्षांपूर्वीचा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. जवळील धोपावे येथून दापोलीसाठी फेरीबोट आहे. आपल्याबरोबर गाडी नेण्याची व्यवस्था येथे आहे. 

दाभोळ - 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ होय. "दालभ्य" ऋषींच्या वसतीस्थानाने पावित्र्य झालेले हे गाव. दापोली तालुक्यातील आणखी एक महत्वाचे बंदर. दाभोळला ऐतिहासिक महत्व असून, पूर्वापार व्यापार उदिमासाठी ते प्रसिध्द आहे.सध्या एनरॉन प्रकपामुळे गाजत असलेले हे दाभोळ बंदर प्राचीन असून त्याचा उल्लेख १५/१६व्या शतकात रशियन वर्णनात सापडतो.
 इजिप्तवर राज्य करणाऱ्या मॅसिडोनियन वंशातील टॉलेमी राजांच्या सर्वांत जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. यावरून दाभोळचा पौर्वात्य लोकांशी संबंध असावा, असे दिसून येते. आदिलशाहीत या बंदराचे महत्त्व अधिक वाढले. मक्केचे द्वार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. एके काळी दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात असत. अरबस्तानातून अरबी घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग होता. आजही पंढरपूर-कराड-चिपळूण-गुहागर रस्त्याचे नाव विजापूर-गुहागर असेच आहे.
जेकब पीटर यांनी १६९०मध्ये काढलेले दाभोळ बंदराचे चित्र
हे गाव अनेक वेळा परदेशी लोकांच्या लढायांमध्ये उद्ध्वस्त झाले; पण त्याच्या स्थानमहत्त्वामुळे सतत विकसितही झाले. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अशा अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट देऊन तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत. या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी आदींची सतत आक्रमणे होत राहिली; मात्र तेराव्या शतकाच्या मध्यापासून सुमारे ३०० वर्षे आदिलशाहीचे वर्चस्व राहिले. ते शिवाजी महाराजांनी संपविले. दाभोळला हामजाबाद, तसेच मैमुनाबाद म्हणूनही ओळखले जायचे. येथे तलम वस्त्रांचा व्यापार चालत असे. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्त्रे विणत असत. दाभोळचा साळीवाडा १९व्या शतकापर्यंत गजबजलेला होता. येथील भंडारी समाज शिवशाहीतील आरमारामध्ये होता. येथील मुसलमान शासकांनी स्थानिक लोकांनाही कारभारात सामावून घेतले होते. त्यामुळे हिंदूंची मंदिरे शाबूत राहिली. गावात व आसपासच्या भागात अनेक थडगी व कबरी दिसून येतात.
 दाभोळ खाडीतील फेरी सर्व्हीस
     एका बाजुला वाशिष्टी नदीमुळे तयार झालेली समुद्रीकिनार आणि इतिहासाची साक्ष देणारा गोपाळगड, बाजुला दाभोळ बंदर तर दुसर्‍या बाजुला असणार्‍या टेकडीवर असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत मंदिर.  या ठिकाणी दिपगृह, दाभोळचा धक्का, दाभोळची चणकाई आदी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत.
दाभोळची एक नविन ओळख झाली आहे. भारतातली पहिली प्रायव्हेट ऑइल रिग येथे बांधली जातेय. तसेच थोड्याच दिवसात वॉर शिप्स (भारतातल्या तसेच विदेशातल्या)च्या बांधणीची देखील येथे सुरू  झालेली आहे. (भारती शिप यार्ड).   
स्वयंभू श्री चंडिका देवी (दाभोळ)
 
दापोली शहरापासुन साधारण एक तासाच्या (२८ किमी) अंतरावर एका टेकडीवर वसले आहे श्री स्वयंभू चंडिका देवीचे स्थान.
टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एकसंघ दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेल्या श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे आपण येतो.
 चंडिका देवीची गुहा
 गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून वाकून जावे लागते. आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली नंदादिपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोज्वळ शेंदुरचर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती. अशी ही प्रसन्न मूर्ती पाहताक्षणी आपले भान हरपते. 
(मंदिरात देवीचा फोटो काढण्यास परवानगी नसल्याने हा फोटो नेटवरून साभार)मूळ मूर्तीची प्रतिकृती
श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला चार हात असून तीच्या उजव्या हातात तलवार आहे. 
श्री चंडीकेचे मुख नैऋत्य दिशेला असून ती पूर्णपणे शाकाहारी आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो.
 बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाहि. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते.
मंदिर परीसर
नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. दसर्‍याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे स्वरूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावणारी जागृत देवी आहे. उत्सवाच्या काळात विविध भागातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात. चंडिकेवर जेंव्हा मुघलांचे राज्य आले तेंव्हा शिवरायांनी येथे स्वारी केल्याची नोंद आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव सध्या एनरॉन प्रकल्पामुळे गाजत आहे. तरीसुद्धा आपली एक परंपरा व खास कोकणी ठसा अजुनही या गावात जाणवतो.
 दाभोळ बंदर हे सतत नौकांनी गजबजलेले असते. या बंदराच्या पलिकडे असलेल्या अंजनवेल, वेलदुर परिसरापर्यंत लाँचसेवा उपलब्ध आहे. येथील समुद्रकिनाराही सुरुंच्या झाडामुळे अधिकच आकर्षक वाटतो. खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमिरूद्दिन बालापीर,
 कोकणामध्ये दाभोळ बंदरात आदिलशाहीच्या काळापासूनची प्रचंड शाही मशीद आहे. तिचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद असा उल्लेख केला जातो. ही मशीद विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते.अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त, सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत.

तेथेच हौद व कारंज्याची मांडणी केलेली आहे. मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी आहेत. चारही कोपऱ्यांवर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत. मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेधक नक्षीकाम आहे. छज्जाच्या मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा भव्य घुमट आहे. घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा होता असे सांगितले जाते. या मशिदीच्या निर्मितीच्या कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. त्यातील एक कथा अशी की, इ. स. १६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. पण हवामान ठीक नसल्याने ती जाऊ शकली नाही. मौलवीने सोबत आणलेले धन धार्मिक कार्यासाठी वापरावे, असा तिला सल्ला दिला. त्यानुसार तिने कामीलखान या शिल्पकाराकडून ही मशीद बांधून घेतली. त्यासाठी त्या वेळेस त्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे. दाभोळ बंदरात अरबी घोडय़ांची आवक केली जात होती. मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होता. सध्या बंदरात मोठय़ा होडय़ांमधून चारचाकी, तीनचाकी वाहने पलीकडच्या किनाऱ्यावर सोडली जातात. येथे माशांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते.
पन्हाळेकाजी लेणी
दापोलीतून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर थोरली-धाकटी कोटजाई नदी आहे. या नदीजवळ ‘पन्हाळेकाजी’ हे गाव आहे. नदीला उत्तराभिमुख असलेल्या डोंगरांत हा प्राचीन लेणी समूह आहे. डोंगरकपारीत वसलेले हे गाव, बाजूला फणसांनी लगडलेली झाडे, नदीवरचा छोटासा पूल, नदीतील स्वच्छ आणि नितळ पाणी पाहत-पाहत आपण लेणींच्या दिशेने प्रवास करतो. या निसर्गरम्य अशा पन्हाळेकाजी गावाला महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथील लेण्यांमध्ये २८ शैलगृहे आणि २९ वे बागवाडी आदी ठिकाणे आहेत. या लेणींमधून फिरताना अनेक भिक्षू गृहे, स्तूप, सभामंडपे, अनेक छोटय़ा-छोटय़ा मूर्ती पाहायला मिळतात. या लेणींमध्ये बैठक व्यवस्था, पावळ्यातील पाणी जाण्यासाठी खोदलेली चर, भिंतीमध्ये तयार केलेल्या देवळ्या, छताच्या बाजूला अत्यंत अवघड असलेल्या ठिकाणी कोरलेली महाभारतातील विशिष्ट दृश्ये, रामायणातील प्रसंग, वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती, सभामंडपे, शिल्पे आहेत. या ठिकाणी श्री गणेश, सरस्वती यांसारख्या देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.येथे गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्ध स्तूप, नाथपंथीय शिल्पपट पाहायला मिळतात. हीनयान, वज्रयान, नाथ संप्रदाय यांच्या निवासाच्या आणि शिलाहार साम्राज्याच्या अनेक खुणा येथे पाहायला मिळतात.
चिपळूणकडूनही बोटीतून येथे येता येते. समोरच खाडीपलीकडे बिवली, मालदोली ही पर्यटनस्थळे आहेत. 
पन्हाळेदुर्ग (प्रणालक दुर्ग) : गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्याच्या पायथ्याशी पन्हाळेकाझीची लेणी आहेत. हा किल्ला दाभोळ बंदरातून गोवळकोटकडे जाणाऱ्या जलमार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधला होता.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...