Tuesday, August 25, 2020

चला व्हिएतनामला ०१ : पूर्वपीठिका आणि “हा नोई” त पदार्पण

दक्षिणपूर्व आशियाचे भारताशी फार प्राचीन काळापासून सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी संबंद्ध राहिले आहेत. त्यामुळे तेथील देशांना भेट देण्याची इच्छा मला फार पूर्वीपासूनच होती. पण त्या देशांच्या यादीत अगोदर व्हिएतनामचे नाव नव्हते. व्हिएतनाम हा देश त्याच्या १९५४ ते १९७५ च्या दरम्यान झालेल्या अमेरिकेबरोबरील युद्धाने सर्व जगाच्या नजरेत आला आणि माझ्याही वाचनात आला होता. अमेरिकेसारख्या सर्वात मोठ्या जागतिक सामरिक सत्तेला केवळ टक्कर देणाराच नाही तर पराभूत अवस्थेत माघारी पाठवणारा एक विकसनशील पण अभिमानी देश अशी जगभर त्याची ख्याती आहे. पण तो आहे कम्युनिस्ट देश! त्या वेळेपर्यंत मी कोणत्याही कम्युनिस्ट देशाला भेट दिलेली नव्हती आणि त्यांच्याबद्दलच्या कल्पना काही प्रमाणात वाचन आणि बरेचसे इंग्रजी सिनेमावरूनच बेतलेल्या होत्या. अर्थातच तेथे जाणे माझ्या यादीत नव्हते. पण झाले असे. आमच्या संस्थेतील एका जर्मन सहकार्‍याची सहधर्मचारिणी थायलंडची नागरिक आहे. त्यानेही घर थाटायला जर्मनीऐवजी थायलंडला प्राथमिकता दिली आहे. एका सुट्टीत त्याने थायलंडच्या शेजारीच असलेल्या व्हिएतनामची सफर केली. परत आल्यावर त्याने तेथील निसर्गसौंदर्याची इतकी स्तुती केली की तो देश माझ्या सहलीच्या सूचीत अलगदपणे घुसला!
आता दक्षिणपूर्व आशियात जायचे ठरल्यावर व्हिएतनामला जाणे अटळ होते. तो देश आशियाच्या दक्षिणपूर्व टोकाला असल्याने प्रथम तेथेच सुरुवात करून इतर देश पाहत भारतात परतायचा बेत योग्य असे ठरले. अर्थात आम्हाला बघायचे असलेले देश भारतातील सहल कंपन्याच्या खिजगणतीत नसल्याने योग्य कंपनीची निवड करणे वाटले त्यापेक्षाही कर्मकठीण झाले. बहुतेक सगळ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या आम्ही कळवलेल्या देशांकडे दुर्लक्ष करून त्यांची प्रकाशित पत्रके पाठवली तर काहींनी सरळ पूर्ण दुर्लक्ष केले. शेवटी जरा बरा प्रतिसाद दिलेल्या दोन कंपन्यांपैकी एकीची निवड करून तिला आमचा ठरवलेला प्रवासाचा मार्ग आणि स्थळे देऊन सहलीचे आयोजन करायला सांगितले. भारतीय कंपन्यांना गिर्‍हाईकांच्या मताप्रमाणे सहल (कस्टमाईझ्ड ट्रीप) आयोजीत करण्याचा पुरेसा अनुभव नसल्याचे परत एकदा सिद्ध झाले. बरेचसे आयोजन आम्हीच करून परत त्यांच्या आवडीच्या विमान कंपनीची तिकिटे गळ्यात बांधली गेली... जी आमच्या जालावरच्या संशोधनातून सापडलेल्या पर्यायापेक्षा जास्त महाग होती आणि शिवाय मार्गही उलट सुलट आणि गैरसोयीचा वाटला ते वेगळेच. पण चर्चा करायला गेल्यावर "आम्ही तिकिटे खरेदी केली आहेत आणि ती नॉन-रिफंडेबल आहेत" असा धक्काही दिला गेला. शिवाय डॉलरच्या विनिमयाचा दर बदलला असे सांगून अजून पैशांची मागणी केली गेली. आमची सहल खाजगी (म्हणजे कंपनीचा माणूस आमच्या बरोबर असणार नाही असे) असूनसुद्धा दर ठिकाणच्या करारबद्ध स्थानिक सहल कंपन्यांचे पत्ते आणि फोन नंबर द्यायला टाळाटाळ केली गेली. "प्रॉब्लेम येणार नाही. आलाच तर मला भारतात फोन करा. माझा मोबाईल नंबर घेऊन जा." असले सल्ले मिळाल्यावर मात्र सहनशीलता संपून जरा चढ्या आवाजात बोलल्यावर मोठ्या मुश्किलीने "केवळ तुम्हाला ही फार गुप्त माहिती देत आहे" अश्या आविर्भावात ती माहिती मिळाली. एकंदरीत अनुभवावरून भारतीय कंपनीतर्फे परदेशातली खाजगी सहल परत कधीच आयोजित करायची नाही असे म्हणून कानाला खडा लावला तो आजपर्यंत तसाच आहे. असो.
तर प्रवासाचा मार्ग ठरला तो असा...
मी दम्मामहून मुंबईस येणार - येथे आमचे युवराज (या वेळेस नशिबाने त्याला कामातून फुरसत मिळाली आणि आमचा आनंद व्दिगुणित झाला !) आम्हाला येऊन मिळणार व तेथून क्वाला लंपूर मार्गे हा नोई ही व्हिएतनामची राजधानी गाठायची (दोन दिवस वस्ती) - हा लाँग सामुद्रधुनी (एक दिवस वस्ती) - हो ची मिन्ह शहर + माय थो + मेकाँगचे खोरे (तीन दिवस वस्ती) असे फिरत सातव्या दिवशी पहाटे व्हिएतनामची रजा घ्यायची.

माझा प्रवास दम्मामपासून नीट सुरू झाला आणि साडेतीन तासांत मुंबईला वेळेवर पोहोचलो. मुंबईत ठरल्याप्रमाणे बरोबर भेट झाली आणि पाच तासांच्या विमानप्रवासानंतर स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी साडेसातला क्वाला लंपूरला उतरलो. क्वाला लंपूर विमानतळ छान आहे. सगळ्या आधुनिक सोयीने सुसज्ज आहे...

विमानतळाचे दोन भाग धावपट्टीने विभागलेले आहेत आणि इकडून तिकडे वाहतूक करायला एक खास रेल्वे आहे तिच्यावरून दर पाच दहा मिनिटाला गाड्या धावत असतात. पुढचे हा नोईला नेणारे विमान सुटायला दोन अडीच तास होते त्यामुळे पोटोबा आटपून घेतला. सगळ्या मलेशियन पदार्थांची नावे जरा धोकादायक वाटल्याने बटाट्याचा लालभडक झणझणीत रस्सा आणि ब्रेड असा एकुलता एक शाकाहारी मेन्यू होता तो घेतला. चव पाहता त्यांत भाजलेल्या खाड्यांची (एक प्रकारचा वाळवलेला छोट्या आकाराचा मासा. कोंकणात त्याचे कालवण किंवा भाजून चटणी केली जाते. मस्त लागते. ) पूड टाकली असावी दाट संशय आला! पोट भरल्याने तरतरी आली आणि उरलेला वेळ जरा विमानतळाचा फेरफटका मारण्यात घालवला. मलेशियन भाषेतील पाट्या वाचण्यात वेळ मजेत गेला. मलेशियन भाषेची लिपी रोमन आणि सोबत इंग्रजी शब्द असल्याने अर्थ कळत होता त्यामुळे मजा वाटली...

पावणे दहाला क्वाला लंपूरहून निघून विमान स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी बाराच्या सुमाराला "हा नोई" या व्हिएतनामच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या "नोई बाई" नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. व्हिएतनामचा व्हिसा आंतरजालावरून अगोदरच काढला होता. पण विमानतळावर परत एकदा अर्ज भरावयाला लावला. मात्र त्यानंतर मात्र फार काही त्रास न देता सुखरूप सगळे सोपस्कार आटपून बाहेर आलो. कम्युनिस्ट देशाची पहिलीच भेट असल्याने पासपोर्टवर शिक्का मारणारा खराखुरा कम्युनिस्ट अधिकारी कसा असतो ते मी निरखून पाहिले पण इंग्रजी सिनेमात दाखवतात तसे त्याने काही माझ्याकडे निरखून तर सोडाच पण फारसे पाहिलेली नाही. शिवाय काही भेदक प्रश्नही न विचारल्याने घोर निराशा झाली!
असो. आम्ही बाहेर आलो तर आमचा मार्गदर्शक आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. आतापर्यंत माझा तीन विमानांचा, ८,००० किमी चा आणि विमानतळावरचा वेळ धरून चोवीस एक तासांचा प्रवास झाला होता. केव्हा एकदा हॉटेलवर पोहोचयतोय आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले होते. गाडीत बसल्या बसल्या मार्गदर्शकाने पहिला थांबा व्हिएतनाम वंशशास्त्र संग्रहालय (Museum of Ethnology) असा सांगितला. आमच्या कंपनीने दिलेल्या मार्गसूचीत तर प्रथम हॉटेल आणि मग हा नोईत फेरी असे लिहिले होते. पण मार्गदर्शक म्हणाला की ते चूक आहे. आता जर हॉटेलवर जाण्यात वेळ घालवला तर हा नोई दर्शनाला बराचशी काट मारावी लागेल. तेव्हा आमच्या सहल कंपनीने दिलेल्या पहिल्या धक्क्याबद्दल तिचा मनातल्या मनात उद्धार करत गरम शॉवरची ऊर्मी दाबून टाकून करत सफर सुरू केली.
=====================================================================
व्हिएतनाम
व्हिएतनाम म्हणजे दक्षिण चीन समुद्राला लागून असलेली आशियाच्या दक्षिणपूर्व भूभागाची एक चिंचोळी पट्टी. ३३१,२१० चौ किमी भूभाग असलेल्या या देशाच्या समुद्रकिनार्‍याची लांबी ३,४४४ किमी आहे. या देशाची लोकखंख्या नऊ कोटी आहे. सुरुवातीचा बराच काळ पारतंत्र्यात असलेला हा देश इ स ९३८ मध्ये बाक डाँग नदीवरील युद्धात (Battle of Bạch Đằng River) चीनचा निर्णायक पराभव करून स्वतंत्र झाला. नंतर त्यावर अनेक व्हिएतनामी सम्राटांनी आता या देशाच्या ताब्यात आहे त्यापेक्षा अधिक प्रदेश काबीज करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. त्यानंतर युरोपियन सत्तांचा त्या भागांत शिरकाव होवून तो फ्रेंच वसाहतीत सामील झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या (इ स १९४० च्या) जवळपास काही काळ तेथे जपानी साम्राज्यही पसरले होते.
व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात १८५४ साली त्यांनी फ्रेंचांना उत्तर व्हिएतनाममधून बाहेर काढले आणि त्या देशाची उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. मात्र पुढेही हे युद्ध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिले आणि प्रथम फ्रेंच व नंतर १९७५ मध्ये अमेरिकेला दक्षिणेतून काढता पाय घ्यायला लावून उत्तरेतल्या कम्युनिस्टांनी सर्व देश एकसंध केला.
१९७८ मध्ये शेजारी कंबोडियाने व्हिएतनामच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामने चिनी पाठिंबा असलेल्या कंबोडियाच्या ख्मेर रूज या जुलुमी राजवटीवर हल्ला करून तिचा पाडाव केला आणि कंबोडियाच्या पूर्वीच्या राजाला सत्तेवर आणले. असे वरवर दिसत असले तरी व्हिएतनामला सोविएत युनियनचा पाठिंबा होता आणि ख्मेर रुजला चीनचा; त्यामुळे हे युद्ध सोव्हिएत युनियन व चीन मधले छुपे युद्ध मानले जाते. व्हिएतनामवर दबाव टाकण्यासाठी चीनने व्हिएत-चीन सरहद्दीवर युद्ध छेडले आणि व्हिएतनामचा काही भागही व्यापला. मात्र चिवट व्हिएतनामने तेथे प्रतिकार तर केलाच पण कंबोडियावरची आपली पकडही कमी केली नाही. यासाठी त्यांना सोव्हिएत युनियनचा उघड पाठिंबा आणि सैन्य मदतही मिळाली. शेवटी चीनने आपले सैन्य व्हिएतनामच्या व्यापलेल्या भूमीतून मागे घेतले. मात्र व्हिएतनामी सैन्य कंबोडियात पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत पुढची दोन वर्षे तेथेच तळ ठोकून होते.
असा हा गरीब पण स्वाभिमानी आणि लढवैय्या देश. १९८६ पर्यंत हा देश अत्यंत मागासलेला, अमेरिकेशी घेतलेल्या पंग्यामुळे जागतिक राजकारणात वाळीत पडलेला आणि कम्युनिस्ट राजसत्तेच्या लोहपकडीत बंद राहिला. मात्र १९८६ मध्ये तेथील राजवटीने उदार राजकीय आणि आर्थिक धोरण राबवायला सुरुवात केली. इ स २००० पर्यंत त्या देशाचे जगातल्या बर्‍याच देशांशी राजनैतिक संबंद्ध प्रस्थापित झालेले होते आणि २०११ पर्यंत आर्थिक प्रगतीत जगातल्या पहिल्या ११ देशांत त्याचे नाव नोंदवले गेले होते. २०१३ च्या अंदाजांप्रमाणे तेथिल दर माणशी वार्षिक उत्पन्न २,००० अमेरिकन डॉलर होईल आणि खरेदी क्षमतेच्या दराने (परचेजिंग पॉवर पॅरिटी) ते ४,००० डॉलर होईल.
डॉ सुहास म्हात्रे

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...