Tuesday, August 25, 2020

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग ८ (लीपुलेख खिंड ते गाला)

दिनांक ३ जुलै २०११ (लीपूलेख खिंड ते गुंजी)
लीपुलेखची शेवटची चढण
8-1-28.JPG
लीपूलेखची शेवटची चढण कशीबशी चढून मी भारताच्या सीमेत पाय टाकला. सुरेशभाई लगेच धावत पुढे आला. माझ्या पाठीवरची सॅक घेतली, हात धरून जिथे मी नीट उभी राहू शकेन, अश्या जागी थांबवल. सगळे जवान, अधिकारी, पोर्टर,पोनीवाले हसऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. माझा पोनीवाला येऊन ‘ कैसे हो दिदी, परिक्रमा ठीक रही?’ अशी चौकशी करून गेला.
आपल्या यात्रींची वाट पाहताना पोर्टर-पोनीवाले
8-1-27_0.JPG
पाचव्या बॅचचे यात्री तिबेटमध्ये जाण्यासाठी उभे होते. आम्ही ज्याप्रमाणे पहिल्या बॅचच्या यात्रींकडे कौतुकाने बघितल होत, तसेच हे यात्री आमच्याकडे बघत होते. ‘काही त्रास झाला का, हवा कशी होती’, अश्या चौकश्या करत होते. थोड्या थोड्या वेळाने ‘ओम् नमः शिवाय’ ‘बोलो शंकर भगवान की जय’ ‘ जेकारा वीर बजरंगी, हर हर महादेव’ अश्या घोषणा दिल्या जात होत्या. माझ्या परिचयातले पुण्याचे श्री. व सौ. रायकर ह्या बॅचमध्ये होते, त्यांनी माझं कौतुक म्हणून हातात चॉकलेट दिल. त्या आपुलकीने आणि परिचयाचे चेहरे बघून मला अगदी भरून आल. तीन आठवड्यानंतर घरच कोणीतरी भेटल्यासारख वाटल.
लीपुलेखची गर्दी
8-1-25.JPGयात्री एकमेकांशी ओळख करताना
8-1-26.JPGकाही ‘पिण्याच्या’ गोष्टींची देवाण-घेवाण
8-1-29.JPG
आमच्या आणि पाचव्या बॅचच्या लगेज कमिटीचे लोक सामान मोजून देण्यात गर्क होते. इथेही आसमंतात बर्फाच साम्राज्य होतच. पाचव्या बॅचला धारचूलापासून पुढे नबीढांगपर्यंत पाउस लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या बॅचच्या लोकांनी एकमेकांना ‘कित्ती बै आपण नशीबवान नै’ अस पटवून दिल!
हा सगळा दंगा आवरल्यावर आणि आमची पारपत्रे आमच्या ताब्यात दिल्यावर नारंग सरांनी आम्हाला पुढे निघायला सांगितले. आमची यात्रा जशी सुखरूप पार पडली तशीच ह्या तिबेटमध्ये जाणाऱ्या यात्रींचीही पार पडो, अशी मनापासून प्रार्थना करून आम्ही मार्गक्रमण सुरू केले.
8-1-30.JPG
माझ्या पाठीवर होती ती सॅक तशी जड नव्हती. पण विरळ हवा आणि उभ्या चढणीवर गळ्यातल्या माळेच, हातातल्या घड्याळाचेसुद्धा ओझ वाटत, तिथे सॅकची काय कथा! ती सॅक सुरेशच्या पाठीवर गेल्यामुळे शरीरावरच आणि ‘आता आपण आपल्या देशात आलो’, ह्या विचाराने मनावरच ओझ कमी झाल होत.
8-1-18.jpg
हवेत थंडी होती, पण पाऊस नव्हता. वारा खूप जोरात वाहत होता. त्या वाऱ्याने माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होत. माझा पोनीवाला सुरेश जवळ येऊन म्हणाला,’ दिदी, अब तो अपने मुलुख मै आ गये, अब क्यूं रो रहे हो?’ मी त्याला म्हटल,’नही भाई, हवा जो जोरसे चल रही है’ तिबेटचे पोनीवाले यात्री खाली पडले, त्यांना दुखापत झाली , तरी पर्वा करत नव्हते, त्यांच्या त्या कोरड्या अनुभवानंतर हा आपुलकीचा अनुभव मनाला फार सुखकारक वाटत होता. ‘थंडी-वाऱ्यासाठी टोपी घाला, कान झाका.’ असा सल्ला सगळे देत होते. थोड खाली उतरल्यावर आय.टी.बी.पी.च्या जवानांनी शेकोटी पेटवून वयस्कर यात्रेकरूंमध्ये थोडी धग निर्माण केली.
२१ जूनच्या रात्री दोन-अडीचला सुमारास आम्ही नबीढांगवरून लीपूकडे रात्रीच्या अंधारात ती जीवघेणी ७ कि.मी. अंतराची जवळजवळ तीन हजार फूट आणखी उंचीवर नेणारी चढण चढावयास सुरवात केली होती. दगडगोट्यांच्या, छोट्या-मोठ्या ओहोळातून ठेचा खात, धापा टाकत, अडखळत, पोर्टरचा हात पकडून चालत होतो. हात-पाय थंडीने आखडलेले, डोळ्यावरच्या झोपेने काही सुचत नाही, अशी विचित्र अवस्था होती. किती चालायच आहे, किती उंचीवर आलोय, काही कल्पना येत नव्हती. साधे गवताचे पातेही नसलेली ती ‘नो मॅन्स लॅण्ड’ कशीतरी पार केली होती.
आता खाली नबीढांगकडे उतरताना त्याची कल्पना येत होती. तीव्र उतार असलेली ती काहीशी निसरडी पायवाट सगळे भराभर उतरत होते. जाताना अधेमधे मी घोड्यावर बसले होते. आता मात्र उताराचाच रस्ता होता. परतीच्या प्रवासात आजिबात घोड्यावर बसायचं नाही, असा निश्चय केला होता. नाहीतर माझा माझ्या चालण्याच्या शक्तीवरचा विश्वास उडाला असता.
आज आम्हाला कालापानी कॅम्पपर्यंत जायचं होत. तिथे यात्रींच्या स्वागतासाठी ‘बडा खाना’ असतो. ती १७ किलोमीटरची वाटचाल आहे. दुसऱ्या दिवशी मात्र २७ किलोमीटर चालून बुधीपर्यंत जायचं होत. नारंग सरांना त्याऐवजी आजच गुंजीला गेलो तर चांगल होईल अस वाटत होत. तकलाकोटपासून त्यांचे तसे प्रयत्न चालू होते. गुंजीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तलेरा अंकलना तिथे उपचार मिळू शकले असते.
आय.टी.बी.पी.ची सुरक्षा
8-1-6.jpg
तासभर चालल्यानंतर वाटेत एका ठिकाणी तीन-चार जवान वाटेत उभे राहून ‘ओम् नमः शिवाय’ चा गजर करत येणाऱ्या यात्रींना पाणी देत होते. लगेच गरमगरम चहाचा ग्लास हातात देत होते. त्यांचे औपचारिक आभार मानले तर त्यांचा त्या अगत्याचा अपमान होईल, अस वाटत. म्हणून त्यांच्या ‘ओम् नमः शिवाय’ ला जोरात ‘ओम् नमः शिवाय’ म्हणून आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात नारंग सर आलेच. त्यांनी आजच गुंजीपर्यंत जायचं नक्की झाल्याच सांगितल. अजून बराच रस्ता बाकी होता. त्या काळजीने आणि ओम् पर्वताचे दर्शन घेण्याच्या ओढीने मी अजून पटापट पाय उचलायला लागले.
माझ्यासोबत अक्षरशः सावलीसारखा चालणारा सुरेश, नबीढांग कॅम्प जवळ आल्यावर पुढे पळत गेला. ओम् पर्वताचे दर्शन होतय हे बघून पुन्हा मागे येऊन ‘ आरामसे चलो दिदी, बढिया दर्शन हो जायेगा’ अशी बातमी हसतहसत दिली. नबीढांगचा कॅम्प हळूहळू दृष्टीपथात आला.
नबीढांग कॅम्प जवळचे अपघातग्रस्त हेलीकॉप्टर
8-1-15.jpg
कॅम्पच्या अगदी समोर ‘ओम् पर्वत’ दिसत होता. सगळ्या यात्रींचे भान तिकडे बघताना हरपले होते. डोंगरामध्ये अगदी स्पष्ट अशी ओमची आकृती दिसत होती. स्पष्ट म्हणजे वरच्या चंद्रबिंदीसकट!
निसर्गाचा चमत्कार: ओम् पर्वत
8-1-16.jpg
असा हा चमत्कार निसर्गात कसा घडला ह्याच आजदेखील आश्चर्य वाटत. कॅम्पवरचे लोक आम्हाला जेऊन घ्यायचा आग्रह करत होते. तकलाकोटला केलेल्या जुजबी नाश्त्यानंतर पोटात काहीच गेल नव्हत. साध्या आणि रुचकर जेवणाच्या वासाने भूक जागी झाली. पंधरा दिवसांच्या अंतराने चवीचे जेवण मिळत होते.
8-1-31.JPG
ताटे हातात घेऊन सगळे समोर ओम् पर्वताकडे बघत जेवले. नबीढांगपासून कालापानी ९ किलोमीटर आणि तिथून गुंजी ९ किलोमीटर आहे. ते सगळ अंतर आजच पार करायचं होत. त्यामुळे एकदा डोळे भरून निसर्गाच्या त्या आविष्काराकडे बघून घेतल, आणि पुढे निघालो.
8-1-14.jpg
आजचा बहुतेक सगळा रस्ता उताराचा होता. फारशी चढण नव्हती. त्यामुळे चालताना दम लागला नाही, तरी पाय भरून येत होते. जाताना ह्याच रस्त्यावर आपल्याला किती प्रश्न पडले होते, किती काळजी वाटत होती हे आठवून मनातल्या मनात हसायला येत होत.
8-1-21.jpg
यात्रेच्या महितीपुस्तकात चालायच्या बुटांचे दोन जोड आणायला सांगितले होते. बूट आपल्या पावलाच्या मापापेक्षा एक माप मोठे आणावे, म्हणजे मोज्यांचे दोन जोड घातले, तरी त्रास होत नाही, अस त्यांनी सांगितल होत. मी जे माझे नेहमीच्या वापराचे बूट जाताना घातले होते, ते जाताना नबीढांगपर्यंत फाटून गेले होते. दुसरे मोठ्या मापाचे बूट आता पायात होते. उतरताना पावलांवर चांगलेच प्रेशर येत होते. बूट मोठ्या मापाचे असल्याने पाउल आतल्या आत सरकत होते. आजच्या पहिल्याच दिवशी उजव्या अंगठ्याच नख काळनिळ झाल होत. पायांना फोड यायला सुरवात झाली होती. तशीच दाटून चालत होते.
8-1-22.jpg
असच चालल्यावर कालापानी कॅम्प दिसायला लागला. कॅम्पवर कालीनदीचे दर्शन घेऊन पुढे निघायच अस ठरल होत. सुरेशभाई मला विचारून चहा-पाण्यासाठी कॅम्पच्या आधीच्या टपरीवर थांबला. कॅम्पवर थंडगार सरबताने सगळ्यांचे स्वागत होत होते. आम्ही तिथे मुक्काम करणार नसल्याने तिथले लोक आमच्यावर जरा नाराज झाले.
त्या कॅम्पमध्ये एका बंकरमध्ये इमिग्रेशनचे सोपस्कार करायचे असतात, हे मी विसरून गेले होते. माझे पारपत्र तर सुरेशजवळच्या सॅकमध्येच होते! मी सुरेशची वाट बघत त्या बंकरच्या बाहेर बसून राहिले. प्रत्येकाला तीच स्टोरी सांगत होते. येणाऱ्या सगळ्या पोर्टरना सुरेशला पाठवायला सांगत होते, तेवढ्यात स्वतः नारंग सर बाहेर आले. मला पाहून म्हणाले,’ऐसे क्यूं बैठी हो?’ मी पुन्हा माझी ष्टोरी ऐकवली. त्यांनी,’ अरे, मेरा भी यही हाल है| सुनो भाई, मॅडमका फॉर्म भरवा लो, स्टांप पोर्टर लगवायेगा|’ अस म्हणत माझी सुटका केली! आमचे सर म्हणजे एक नंबर होते. कोणत्याही प्रकारचा गोंधळ केला, तरी कंपनी द्यायला सर हजर असायचे. तिथली लिखापढी पूर्ण करून मी आणि सर पुढे सटकलो.
कालापानी कॅम्पवरचे स्वागत
8-1-8.JPG8-1-33.JPG8-1-9.JPG
काली नदीच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर पुढे आमच्यासाठी चहा-बिस्किटे, खीर असा सरंजाम मांडला होता. सगळे त्याच्यावर तुटून पडले! आमचा अल्पोपहार होईपर्यंत सुरेश पारपत्रावर शिक्का घेऊन आला. त्या सॅकमध्ये ज्या पिशवीत पारपत्र होते, त्यातच माझे जास्तीचे डॉलर्स होते. पण हे पोर्टर इतके प्रामाणिक असतात, की त्याने त्या नोटांना हातही लावला नव्हता.
कालापानी ते गुंजीचा रस्ता जीपसारख्या वाहनासाठी बनवला आहे. त्या रस्त्याच्या बाजूने काली नदी वाहताना दिसत होती. आता ही नदी आम्हाला मालपा पार करेपर्यंत सोबत करणार होती. वाहनाचा रस्ता असल्याने फारसे चढ-उतार नव्हते. रुंद रस्त्यावरून गप्पा मारत चालता येत होत.
पूल पार करताना यात्री
8-1-7.jpg8-1-20.jpg8-1-19.jpg
पण सकाळी तकलाकोटपासून सुरू केलेला प्रवास चांगलाच जाणवत होता. कधी एकदा कॅम्पवर पोचतोय अस झाल होत. शेवटी मी गप्पा मारणारा ग्रूप मागे टाकून पुढे सटकले.
गुंजीकडे जाणारा रस्ता
8-1-23.jpg
आता अगदी एक पाउल मोजून चालत होते. प्रत्येक वळणानंतर ‘आता आलाच कॅम्प’ अस वाटत होत. सुरेशला विचारल की तो ‘ अभी तो दूर है| तीन किमी चलना है|’ अस सांगून माझा थकवा द्विगुणीत करत होता. अस पाय ओढत चालताना तिरंगा फडकताना दिसला! झाल! मला वाटल आला कॅम्प. पण....., तो कॅम्प सीमा सुरक्षा दल (border security force) चा होता. आणखी एक तास चालल्यावर आमचा आय.टी.बी.पी.चा कॅम्प आला.
लांबून दिसणारा गुंजी कॅम्प
8-1-10.JPG
दिवसभरात जवळपास २८ किमी चालून पायाचे तुकडे पडले होते. कॅम्पवर जाऊन लगेच आडवी झाले. तिथल्या माणसाने जागेवरच कॉफी आणली. खूप दिवसांनी कॉफी पिऊन अंतरात्मा तृप्त झाला.
जरा वेळ आराम केल्यावर मग माणसात आले. घरी फोन करून सगळ्यांशी पोटभर गप्पा मारल्या. चालवत नव्हत, तरी तिथल्या देवळातल्या भजनाचा मोह आवरला नाही. तशीच खुरडत खुरडत भजनाला जाऊन बसले. तिथल्या त्या शक्तीचा, जोशाच्या वातावरणात सगळा थकवा, वेदना विसरायला झाल्या.
गुंजीतले मंदीर
8-1-5.jpgगुंजी कॅम्पवरचे उत्कट भजन
8-1-2.jpg8-1-3.jpg8-1-4.jpg
कॅम्पवर जेवतानाच डोळे झोपेने मिटत होते. तिथल्या लोकांच्या प्रेमळ आग्रहापोटी चार घास जास्तीचे खाऊन पाच मिनिटाच्या आत सगळे झोपून गेले.
दिनांक ४ जुलै २०११ (गुंजी ते बुधी)
आमच्या ठरलेल्या कार्यक्रमातले, कालापानी ते गुंजी हे नऊ किलोमीटरचे अंतर आम्ही कालच चालून संपवल होत. काल चालताना अवस्था वाईट झाली होती. पण आजची चाल त्यामुळे सुखकर वाटत होती. आज गर्ब्यांग, छीयालेखच पुष्पपठार असा नयनरम्य रस्ता होता. पूर्ण यात्रेच्या मार्गातला हा सगळ्यात सुंदर भाग आहे.
8-2-5.jpg
गुंजीच्या कॅम्पजवळ भुसभुशीत मातीचे डोंगर आहेत. ते अगदी जपून, पोर्टरचा हात पकडून सगळे उतरत होते. मग कालीनदीचा पूल पार केल्यावर बुधीचा रस्ता सुरू झाला. आता आम्ही १२००० फुटांच्या खाली जात होतो. विरळ हवेमुळे होणारे त्रास होण्याची भीती संपली होती. मोठी झाडे, हिरवळ डोळ्यांना सुखवत होती. निसर्गातला बदल जाणवत होता. लहान झुडपे, रखरखीत डोंगर मागे पडले होते. सगळीकडे हिरवाई होती.
भुरळ पाडणारे निसर्गसौंदर्य
8-2-8.JPG
सगळ्यांना आता घराची आस लागली होती. परतीच्या प्रवासातला एखादा दिवस कमी करता येईल का, असे सरांचे जोरात प्रयत्न चालू होते. ते जमल असत, तर आम्ही ९ जुलैच्या ऐवजी ८ जुलैला दिल्लीत पोचलो असतो. त्या त्या कॅम्पवर राहण्याची, शेवटच्या दोन दिवसांच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था होऊ शकली, तरच हे शक्य होत.
आता रोज चालताना किती दिवस आणि किती किलोमीटरची चाल राहिली, हा हिशेब चालू असायचा. हे आणि असे विचार करत आणि सभोवतालचे सृष्टीसौंदर्य डोळ्यात, मनात साठवत मी माझ्या थकलेल्या शरीराला, फोड आलेल्या पायांवर दामटवत होते.
8-2-11.jpg
ज्या रस्ताने गेलो, त्याच रस्ताने परतताना वेगळीच मजा येत होती. फक्त येताना जे उतार भराभर, एका दमात पार केले होते, ते आता कण्हत-कुथत चढावे लागायचे. आपण नसताना काहीतरी जादू होऊन त्या डोंगरांची उंची वाढली की काय, अशी शंका बऱ्याच वेळा येत होती.
8-2-12.jpg
आजच्या रस्त्यावर सुरेख हिरवी पठारे, लांबवर दिसणारी नदी अस दृश्य असल्याने चालण्याचे श्रम काहीसे कमी होत होते.
वदनीकवळ घेता!
8-2-9.JPG8-2-7.JPG
काही वेळ चालल्यावर एका लहान झोपडीवजा हॉटेलात नाश्त्याची सोय होती. जाताना आम्हाला आवर्जून प्रत्येक जेवणात हिरवी पालेभाजी खाऊ घालायचे. आता मात्र रोज छोले-राजम्याशी गाठ होती. पण आज आमच नशीब जोरावर होत! त्याच्याकडे समोसे विकायला होते. ते कुस्करून त्यावर गरमागरम छोले, पुदिन्याची चटणी, शेव.... असा अप्रतीम बेत जमला. सुरवातीच्या यात्रीनीच समोसे संपवून टाकले. उरलेल्या लोकांना फक्त वर्णनच ऐकावं लागल!!
8-2-18.jpg
जेवून पुढे निघाल्यावर एक मोठा चढ स्वागताला उभा होता. भरल्या पोटी तो दुप्पट मोठा वाटत होता.
बरेच भिडू घोड्यावर स्वार झाले. पण मी निश्चयाने एक एक पाउल टाकत चढत राहिले. चांगली तासाभराची दमछाक झाल्यावर शिखर गाठल. आता गर्ब्याल गाव जवळ दिसत होत.
आय.टी.बी.पी.चौकी
8-2-4.jpg
त्याआधी पुन्हा एकदा आमची पारपत्रे तपासली. अश्या प्रत्येक चौकीवर सगळ्या यात्रींची चहा-पाणी देऊन आस्थेने विचारपूस होते. ‘कुठून आले, परिक्रमा कशी झाली, हवा चांगली होती का?’ अशी प्रश्नोत्तरे होतात.
गर्ब्यांग गाव
8-2-22.JPG8-2-2.jpg8-2-28.JPG8-2-6.jpg
गर्ब्याल गावात थोड थांबून, तिथली ती सुंदर नक्षीकामाची घरे, निरागस पहाडी लोक सगळ एकदा डोळ्यात साठवून घेतल. हे सगळ पाहताना माझ्या मनात काहीतरी तुटायच.
निरागस चेहरे
8-2-17.jpg8-2-19.jpgगर्ब्यांगमधल्या देखण्या आज्या
8-2-3.jpg
अजून काही दिवसांनी ही सगळी गंमत संपणार, ही जाणीव मनाला कुरतडायची. असो.
8-2-20.jpg8-2-21.JPG
जरा वेळाने आम्ही छीयालेखच्या पुष्पपठारावर आलो. जातानापेक्षा आत्ता बऱ्याच प्रकारची फुल उमललेली दिसत होती. निरनिराळ्या रंगांची नुसती उधळण झाली होती. ते बघून डोळे अगदी तृप्त झाले.
ये शहर है फुलोंका!
8-2-13.jpg8-2-25.JPG8-2-27.JPG8-1-11.jpg8-1-12.jpg8-1-13.jpg
एका चौकीवर शेवटची पारपत्रांची तपासणी झाली. हसऱ्या-उत्साही जवानांचा निरोप घेऊन पुढे निघलो.
छीयालेख टोकावरून दरीत दिसणारा बुद्धी कॅम्प
8-2-10_0.JPG
पठारानंतर खडकाळ आणि लांबलचक उतरण होती. आजही पावसाने कृपा केली होती. नाहीतर ह्या खडकांवरून उतरताना किती दंडवत घातले असते, कोणास ठाऊक. नंदिनी चढण्यात पटाईत, कितीही उंच चढ असला, तरी न थांबता चढायची. उतरताना मात्र आमच्या ह्या ‘घाटाची राणीची’ वाट लागली.
8-2-29.JPG
माझ्यासारख्या वजनी लोकांना उतरताना गुरुत्वाकर्षणाचा जोरदार फायदा मिळतो! सुपरफास्ट वेगाने खाली! संपूर्ण यात्रेत पहिल्यांदाच तिच्याबरोबरच कॅम्पवर पोचले.
संध्याकाळी चहा पिताना न ठरवताच सगळे बाहेर जमले. गाण्याची मस्त मैफील जमली. सगळ्या हौशी कलाकरांनी आपापले घसे साफ करून घेतले.
दिनांक ५ जुलै २०११ (बुधी ते गाला)
यात्रेला निघाल्यापासून आम्हाला फारसा पाऊस लागला नव्हता. आज मात्र टी सगळी कसर भरून निघणार, अस लक्षण दिसत होत. रात्रीपासूनच मुसळधार पाऊस चालू होता. ‘यात्रेला आलो, पण पावसाचा अनुभव आला नाही,’ अस कोणाला वाटायला नको, ह्या बेताने पाऊस कोसळत होता. आजचा रस्ताही कठीण होता. काली नदीच्या काठाने जाणारा तो निसरडा रस्ता, त्या ४४४४ पायऱ्या आठवून अंगावर काटा येत होता.
8-3-8.jpg8-3-9.jpg
पडत्या पावसातच सुरेशच्या सोबतीने चालायला सुरवात केली. ‘आज पाउस फार आहे. हवा सुधारेल, अशी शक्यता वाटत नाही. अश्या हवेत दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे आज कॅमेरा आत ठेवून द्या. आज फोटो नाही,’ अशी तंबी त्याने मला कॅम्पवरच दिली होती. इथे ‘सुरेशवाक्यं प्रमाणम्’ मानून, मी आजिबात फोटो काढले नाहीत. ( इथले फोटो माझ्या सहयात्रींचे आहेत) काही यात्रींच्या मते, आदल्या दिवशी कॅम्पवर सगळ्यांनी जी नाच-गाणी केली, त्याची शिक्षा म्हणून पाऊस पडत होता. हे लॉजिक अगदीच अशक्य होत! आपल्याला गैरसोयीच्या वेळेला पाउस पडला की,’ भगवान नाराज हो गये’ आणि सोयीच्या वेळेला झाला की,’भोलेबाबाकी कृपा!’ अरेच्या!
बिकट वाट वहिवाट
8-3-10.jpg
सगळे यात्री रेनकोट घालून पावसापासून वाचायचा प्रयत्न करत वाटचाल करत होते. आम्ही ह्याच भागातून काही दिवसांपूर्वी गेलो होतो, तेव्हाच्या आणि आत्ताच्या निसर्गात फरक पडलेला दिसत होता. मध्यंतरीच्या काळात पाऊस भरपूर झाला होता.
हिमालयातली खास पूल उभारणी
8-3-7.jpg
चालताना एका बाजूला रोरांवत वाहणारी काली नदी, कालीच्या त्या अंगाला असणाऱ्या नेपाळमधून अक्षरशः थव्याने कोसळणारे दुधाळ धबधबे, उंचचउंच आकाशाच्या पोटात शिरू पाहणारे हिरवेगार डोंगर, अनेक रंगांची बरसात करीत जाणारी विविधरंगी फुले हे पाहताना भान हरपत होत.
यात्रेची सहावी बॅच आज आम्हाला भेटली. त्याचं शंकासमाधान करत आणि त्यांच्या सुखरूप यात्रेसाठी शुभेच्छा देत आम्ही चालत होतो. दोन बॅचेसमुळे आजच्या बिकट रस्त्यावर वाढीव वर्दळ होती.
जड झाले ओझे
8-3-20.jpg8-2-15.jpg
आम्ही पन्नास यात्री, आमचे पोर्टर, पोनी-पोनीवाले, सामान वाहणारी खेचरे, असा लवाजमा. उलट्या दिशेने येणाऱ्या बॅचचीही तीच कथा. शिवाय गावकरी, इतर जाणारे-येणारे. त्यामुळे चालताना फार काळजी घ्यावी लागत होती. ‘सावधान, रास्ता खतरनाक है’ अशी लाल अक्षरे जागोजागी दिसत होती.
पहाडातले मंदीर
8-1-1.jpg
मालपा गावाच्या आधी रस्त्यात अनेक लहान-मोठे धबधबे लागतात. त्याचबरोबर लखनपूर, बिंद्राकोटी, छाता फॉल असे उरात धडकी भरवणारे महाप्रचंड धबधबे लागतात. ह्यांना मराठीतल्या ‘धबधबा’ ह्या शब्दापेक्षा ‘प्रपात’ हा संस्कृत शब्द जास्त शोभून दिसला असता.
काली नदीकडे आवेगाने वाहणारे धबधबे
8-3-13.jpg8-3-14.jpg
छाता फॉल म्हणजे एका विस्तीर्ण हिरव्यागार डोंगरातून अनेक ठिकाणी अंगाला हुडहुडी भरवणारे थंड पाणी कोसळत असते. जोरदार वारा असतोच. त्यामुळे छत्री उघडली तर तोल जाऊन कालीच्या उदरात चीरनिद्रा ठरलेली. म्हणून शक्यतो भिंतीला चिकटून, धबधब्यातूनच चालावे लागते. हे संकट कमी म्हणून चव वाढवायला पुढून-मागून घोडे येत होते. सुरेश जर क्षणोक्षणी मदतीला नसता, तर काय झाल असत, ह्याचा मी विचारही करू शकत नाही.
छाता फॉल
8-3-15.jpg
ह्या टप्प्यात यात्री विरुद्ध पोनीवाले अशी भांडणे सुरू झाली. दगडी रस्त्यांवरून घोड्यांचे नाला मारलेले पाय घसरतात. त्यात आज पावसाने जोर धरला होता. घोड्यांनी नदीच्या कडेने चालायच आणि पायी जाणाऱ्यांनी डोंगराच्या कडेने, अस ठरलेलं असत. घोड्यावरचे यात्री थोडे जरी हलले आणि घोडा नदीत पडला तर काय? ह्या भीतीने अवघड वाटेवर ते यात्रींना उतरायला सांगतात. पण काही यात्री आपण घोडा तेवढ्या दिवसांसाठी विकतच घेतला आहे, अश्या थाटात बोलत होते. काही अपवाद असतीलही, पण साधारणपणे हे सगळे स्थानिक लोक प्रामाणिक, कष्टाळू असतात. ते कळवळून यात्रींना समजावत होते,’ साब, मुझे भी बच्चे पालने है| घोडा गिर गया, तो मेरा तो राशनपानी बंद हो जायेगा|’
हे सगळ चालू असताना मालपा गाव आणि आमची दुपारच्या जेवणाची जागा आली. जाडजूड रेनकोट घालूनही मी संपूर्ण भिजले होते. पाण्यातून चालून बूट-मोजे ओलेगच्च झाले होते. जेवणाच्या जागी शेकोटी पेटली होती. त्या धुराच्या वासाने सुद्धा उब वाटत होती. आता पुढे ४४४४ पायऱ्यांची अत्यंत अवघड चढण चढायची होती. त्या भीतीने जेवण थोडक्यात आटपून मी पुढे चालू लागले.
8-3-1.jpg
मी यात्रेच्या आधी ह्या पायऱ्यांचे वर्णन ऐकले होते. पण ते ‘उतरताना काय वाट लागली’ ह्या प्रकारातल वर्णन होत. मला कळल होत की परतीला वेगळा रस्ता असतो. पण दुर्दैवाने तस काही नव्हत! त्या भयानक पायऱ्या आता चढायच्या होत्या.
पायऱ्याच पायऱ्या
8-3-2.jpg8-3-3.jpg8-3-4.jpg
ज्या ज्या आठवतील त्या देवांची नावे घेऊन मी त्या पायऱ्या चढायला सुरवात केली. ‘कुछ नही दिदी, हौसला रखो| बोलते रहो ‘ओम् नमः शिवाय’| असा धीर सुरेश आणि त्याचे सहकारी देत होते. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून चढत असताना ना पावसाची रिमझीम जाणवत होती, ना आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य लक्ष विचलीत करत होते. मन आणि शरीराला संपूर्ण एकाग्र करणे, पायरी नीट चढण्यासाठी आवश्यक होत. हेच खर वर्तमानात जगण, नाही का? अर्थात चालताना हे असले कुठलेही विचार सुचत नव्हते. बरेच यात्री घोड्यावर स्वार होऊन पुढे जात होते. आता काली नदी खोल दरीत चिमुकली दिसत होती.
अचानक नेपाळच्या बाजूला मोठा आवाज होऊन दरड कोसळायला लागली. मी स्तिमित होऊन तो प्रकार बघतच राहिले. किती वेगाने आणि केवढे मोठमोठे दगड, माती, झाड सगळ कालीच्या उदरात अदृश्य होत होत.
8-3-5.jpg8-3-6.jpg
मध्ये एक विश्रांतीसाठी बांधलेली जागा आली. पण आता थांबायला नको वाटत होत. तशीच रेटून चालत होते. कितीही दूर असला, तरी शेवट दिसला की दाखवायला सुरेशला सांगून ठेवल होत. पण रस्ता वळणा-वळणांचा, डोंगरांच्या कडेने जात असल्याने शेवट नजरेत येत नव्हता. अस दोन तास चालल्यावर (मला ती तेवढी वर्ष वाटली होती!!!) ‘अभी दो टर्नके बाद सिडीया खतम्’ हे शुभवर्तमान मिळाल! हा! मी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. आता अजून ट्रेक करायला हरकत नाही!!
8-3-21.jpgपायऱ्या चढल्यावर विसावलेले यात्री
8-3-16.jpg
कुमाऊ निगमने पायऱ्या संपल्यावर लगेचच चहाची सोय केली होती. आता उंचावर आल्यावर पाऊस ओसरला होता. समोरच्या दरीत लहान लहान वस्त्या दिसत होत्या. शांतपणे बसून मी गरमगरम कॉफीचा आस्वाद घेतला. शरीराचा एक आणि एक स्नायू ठणकत होता. कॉफी पोटात गेल्यावर तरतरी आली. दिवसभर माझ्या चालीने चालून सुरेश कंटाळला असावा. पुढचा रस्ता सोपा-सरळ दिसत होता. तो एका हॉटेलात जेवायला थांबला.
आता फार तर तासभर चालायच होत. मी एकटीच चालत होते. चालताना अचानक माझ्या लक्षात आल, की ह्या स्वप्नवत प्रवासाचा शेवट आता फारच जवळ आला आहे. नारंग सरांच्या प्रयत्नांना यश आल, तर आम्ही अजून दोन दिवसात दिल्लीत असू. तसा आजचा कॅम्प शेवटचाच. उद्या धारचूलाच्या हॉटेलमध्ये मुक्काम असेल. मग कुठले हे डोंगर आणि दऱ्या, कुठे हा शांत-साधा दिनक्रम! पुन्हा त्या गर्दी, प्रदुषण, घाई-गडबडीच्या, धावणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायला लागणार.
फार दम लागला नाही, तरी मी पाच-पाच मिनिटानंतर थांबत होते. एखाद्या दगडावर बसून आसपासची शांतता पिऊन घेत होते.
रौद्रसुंदर निसर्ग
8-3-18.jpg8-3-19.jpg
सगळ वातावरण नुकताच पाऊस झाल्याने टवटवीत होत, उन्हात दरीतल्या वस्त्या चमकत होत्या. सगळ दृश्य गंभीर स्तब्ध होत. घरी जायचा दिवस जवळ येत होता त्याचा आनंद तर होता, पण हे सौंदर्य परत कधी बघायला मिळेल कोण जाणे?
दरीतली घरे
8-3-22.jpg8-3-23.jpg
थोड्याच वेळात कॅम्प दिसायला लागला. कॅम्पवर जाऊन पहिल्यांदा कोरडे कपडे घातले. ओल्या बूट-मोज्यांमध्ये पाय पांढरे पडून, सुरकुतले होते. त्यांना थोडा मसाज केला. काही जणांनी सगळे कपडे प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवायची काळजी न घेतल्यामुळे त्यांच सगळ सामान भिजून गेल होत.
गाला कॅम्प की कपडा बाजार?
8-3-11.JPGकपडे सुकवतनाची डुलकी
8-3-12.JPG
मग काय, उन्हात कपडे वाळवायची एकच धांदल उडाली. नंदिनी, मी आणि असे इतर रिकामटेकडे लोक मजा पाहत होतो. नारंग सरही आमच्यात मजा करत होते. त्यांनी मागणी केल्यामुळे परतपरत चहा-कॉफी चालू होती.
त्या दिवशी चतुर्थी होती. तो ‘चवथीचा चंद्र’ आणि चांदण्याने टिपूर भारलेल आकाश कितीही वेळ पाहिलं, तरी मन भरत नव्हत. फार उशीर झाला, अशी तंबी मिळाल्यावर जड मनाने आडवे झालो.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...