Tuesday, August 25, 2020

भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी भाग ३ ( दापोली ते वेळास )

कोकणातला रत्नागिरी जिल्ह्य़ातला दापोली हा तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती या सगळ्यांचा अनोखा संगम. रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून थोडं वेगळं काही अनुभवायचं असेल तर दापोलीसारखा पर्याय नाही.
 प्रचंड नैसर्गिक श्रीमंती लाभलेल्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या ‘दापोली’सारखा तालुका महाराष्ट्राच्या नकाशात क्वचितच सापडेल. दापोली म्हटलं की आंबे, समुद्रकिनारे आणि मासे इतकंच आपल्याला माहिती आहे. यापलीकडे दापोलीमध्ये दाभोळ बंदर, मुघलकालीन मशीद, चंडिकादेवीचं मंदिर, पन्हाळेकाजीच्या लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, धर्मतत्त्वज्ञ पांडुरंग वामन काणे या तीन भारतरत्नांची गावे, रँग्लर रघुनाथ परांजपे यांचे बालपण गेलेले ठिकाण, सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, गोवा किल्ला, कोकण कृषी विद्यापीठ, लालबुंद जांभा दगडाचा परिसर, ब्रिटिशकालीन चर्च अशा अनेक गोष्टी आहेत. दापोली, आंजर्ले, केळशी, हर्णै ही सर्व नावे काव्यात्मक वाटतात. दापोली हे हॉटेल्स, रिसॉर्टस् व होम-स्टे यांनी गजबजले आहे. सर्व प्रकारचे जेवण येथे मिळते. १८१८ मध्ये ब्रिटिश राजवट आल्यावर जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इस्ट इंडिया कंपनीच्या शासन काळात कॅम्प दापोली वसवण्यात आली. संपूर्ण कोकण भागात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातील इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण होते. दाभोळ किंवा बाणकोट बंदरात आल्यावर दापोली हे मुक्कामाचे ठिकाण झाले होते. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणाच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे व पर्यटनाचे केंद्र झाली. समुद्रसपाटीपासून ७०० ते ८०० फूट उंचीवर दापोली हे टुमदार गाव वसलं आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर, निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक वारंवार इथे येत असतात. थंड हवेमुळे याला `कोकणाचे महाबळेश्वर’ असेही म्हणतात.
   उंचच उंच सुपारीची आणि नारळाची झाडे, वाटेत काजूच्या बागा, झाडाच्या खोडांना बुंध्यापर्यंत लगडलेले फणस, आंब्यांच्या बागा, लालबुंद माती, मंडईत बसलेले मच्छीविक्रेते, कृषी विद्यापीठ हे सगळं पाहणं म्हणजे मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. त्याचबरोबर फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा झेलत उभा सुवर्णदुर्ग हा आजही छत्रपती शिवराय तसंच आंग्रे कुटुंबीयांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. गोवा किल्ला, कनकदुर्ग हेदेखील पर्यटकाला इतिहासात घेऊन जातात. दापोलीचे हर्णे बंदर आणि त्या ठिकाणी होणारा माशांचा लिलाव पाहण्यासारखा आहे. केवळ आंबा, समुद्र आणि मासे यापुरतंच मर्यादित न ठेवता दापोलीतल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर इथे एकदा नक्की भेट द्या.
कसे जाल दापोलीला?
जवळचे रेल्वे स्टेशन खेड - २८ किलोमीटर जवळचा विमानतळ पुणे - १८२ किलोमीटर. मुंबई विमानतळ - २२७ किलोमीटर. पुण्याहून ताम्हिणी घाटातून आंबेत, मंडणगडमार्गे किंवा वरंध घाटातून शिवथर, मंडणगडमार्गे जाता येते. सातारा-महाबळेश्वरकडून येण्यासाठी नव्याने होणारा रघुवीर घाट, तसेच कुंभार्ली घाटामार्गे जाता येते.
मुंबईवरुन दापोलीला जाण्याचे मार्गः-
 पहिला मार्ग - मुंबई - पनवेल - पेण - वडखळ नाका - नागोठणे - कोलाड - माणगाव - लोणेरे फाटा
(लोणेरे फाट्यावरुन दापोलीला जायचा रस्ता आहे)
दुसरा मार्ग - मुंबई - पनवेल - पेण - वडखळ नाका - नागोठणे - कोलाड - माणगाव - वीर
(वीर स्टेशन पासुन अंदाजे ३-४ किमी अंतरावर दापोलीला जायचा रस्ता आहे (वीर फाटा ते दापोली अंदाजे ६७-७२किमी). आंबेत-मंडणगड मार्गे दापोली)
तिसरा मार्ग - मुंबई - पनवेल - पेण - वडखळ नाका - नागोठणे - कोलाड - माणगाव - वीर - महाड - पोलादपुर - खेड
(खेडपासुन साधारण २७ किमी अंतरावर दापोली)
दापोली गावात, तसेच आसपासच्या सागरकिनारी चांगली हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जावे.
कृषी विद्यापीठ

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची इमारत
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची वाकवली गावातील मोठी आमराई खेडमार्गे येताना आपले स्वागत करते. दापोलीत असलेला कृषी विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. विद्यापीठाची सर्व प्रक्षेत्रे फिरायची असल्यास फक्त विद्यापीठातच एक दिवस पुरत नाही.
भग्नावस्थेतील चर्च
दापोलीच्या कॅॅम्प परिसरातील चर्च ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देते. १८१८-१८५७ या कालावधीत येथे असलेला इंग्रज अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हे चर्च बांधले गेले. चर्चची ही इमारत गॉथिक शैलीत होती. दगडी चिऱ्यांनी बांधलेली ही इमारत अतिशय देखणी होती. चर्चच्या उंच मनोऱ्यावर एक सहा फुटांची मोठी घंटा होती. ती चोरीला गेली, असे सांगितले जाते. चर्चच्या खिडक्या दोन्ही बाजूने लांब आणि वरच्या दिशेने निमुळत्या होत जातात. १८१८ पासून ब्रिटिश राजवटीत सैन्य दलातले सर्व, म्हणजे जवळजवळ दोन हजार कोकणवासी इथं पेन्शन करिता वर्षांतून चार वेळा जमायचे. त्या काळात या चर्चच्या आवारात एसपीजी मिशनची ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराची व्याख्याने चालायची. चर्चसमोरील आवार आणि इमारत अजूनही स्कॉटिश मिशनच्या हक्काची आहे असे सांगितले जाते. अशाच रचनेचे चर्च पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर किल्ल्याजवळ आहे.
दापोलीला रहाण्याची सोयः-
१) आर्यवर्त बंगला योजना, दापोली -  35+ स्वतंत्र बंगले (२- ६ बेडरूम, बहुतेक नॉन एसी) आणि जोडप्या / कुटुंबासाठी लक्झरियस एसी स्वीट्स (त्यात स्प्लिट एसी, रेफ्रिजरेटर, एलसीडी टीव्ही, फोल्डिंग सोफा-कम-बेड अतिरिक्त आहे बाल्कनी). एका लहान टेकडीवर 16 एकर मालमत्ता. खूप चांगले राखले आहे. भाडे सुमारे रु. 750 प्रत्येक व्यक्तीस सर्व जेवण आणि मुक्काम (नॉन एसी) यांचा समावेश आहे. जोडप्या, कुटुंबे आणि गटांसाठी उत्तम. खूप किफायतशीर आणि सुग्रास भोजन उपलब्ध (व्हेज बफे ज्यामध्ये स्थानिक कोंकणी चविष्ट पदार्थ आणि अगदी सर्व वयोगटातील खाण्यापिण्याच्या आवश्यकतेनुसार पंजाबी, चिनी, मॉर्डन फूडचा समावेश आहे. नॉन-वेज फूड देखील उपलब्ध आहे. तथापि, आपल्याला कमीतकमी 3 ते 4- तास आधी ऑर्डर देणे आवश्यक आहे. श्री. ययाति बापट यांचा संपर्क- "आर्यवर्त", ब्रम्हानवाडी, जळगाव, दापोली, जि.रत्नागिरी. संपर्क क्रमांक- 02358-283088, 282313, 9226174801
२) हॉटेल जयंत पद्मजा, दापोली-दाभोळ रोड , श्री. विनायक घैसास, शुध्द शाकाहारी जेवण, ए.सी./ नॉन ए.सी. रुम्स, डॉर्मिटरी, गार्डन रेस्टॉरंट ,(02358) - 282212 
३) हॉटेल वृंदावन, दापोली-आसुद रोड, ( सी फुड्साठी प्रसिध्द ), संपर्क क्रमांकः-  (02358) - 282220
४) हॉटेल न्यु पथिक, लॉजिंग आणि बोर्डींग, दापोली. संपर्क क्रमांकः-  (02358) - 282946
५) सुराली गार्ड्न, दापोली- संपर्क क्रमांकः-(02358) 267567
६) अरण्य सहवास, दापोली-दाभोळ रोड. संपर्क क्रमांकः-  (02358)-282375, 9270673625 
७) श्री जयराम फाटक , शुध्द शाकाहारी जेवण आणि रहाणे  :9850518081   
 
जालगावचे जंगल
दापोली शहराजवळच हे गाव असून श्री गणपतीचे ४०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांचा तळ होता. मंदिरासमोरील तलाव त्यांच्या घोड्यांना पाणी पाजण्यासाठी बांधला होता, असे सांगितले जाते. 
खरं तर संपूर्ण दापोलीच विविध प्रकारच्या झाडांनी, फळांनी, फुलांनी, पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी नटलेलं आहे, मात्र जालगाव जंगलात जायचं कारण म्हणजे येथे असणारे निजसुरे दाम्पत्य. जिल्पा निजसुरे आणि प्रशांत निजसुरे यांनी आपलं सुखवस्तू आयुष्य सोडून निसर्ग समजून घेण्यासाठी एक तप खर्ची घातलं आहे. मुंबईतून फॉरेस्ट्री विषयात एमएस्सी झालेल्या जिल्पा निजसुरे यांनी जंगलातील पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. त्याशिवाय फुलपाखरे, छोटे कीटक, विविध झाडं आणि त्यांचा जीवन प्रवास त्या सांगतात तेव्हा ऐकणारा भान हरपतो. कारण, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या आजूबाजूला निदर्शनास येणाऱ्या फुलपाखरांचा, पक्ष्यांचा आणि वनस्पतीचा एवढय़ा बारकाईने आपण कधीच विचार केलेला नसतो. निसर्गाच्या संवर्धनाबद्दल आपण वैयक्तिक पातळीवर काय करायला हवे, आपली छोटी-छोटी सकारात्मक कृतीसुद्धा निसर्गाची काळजी घेण्यासाठी पुरेशी असते. फक्त आपला दृष्टिकोन बदलायला हवा, हे त्यांनी सांगितलं.
चिखलगावचे लक्ष्मी-केशव मंदिर : हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव. येथे त्यांचे घर होते. मूळ घराच्या जोत्यावर त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या गावाच्या बाहेरच्या बाजूस केशव रूपातील विष्णूचे मंदिर आहे. येथील मूर्तीही आकर्षक आहे. प्रसिद्ध कवी कै. द. वि. केसकर (घरात हसरे तारे) यांची कन्या रेणू दांडेकर व त्यांचे पती राजा दांडेकर यांनी या गावात मोठे शैक्षणिक संकुल उभारले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना अनेक प्रकारचे शिक्षण येथे मिळत आहे.
शिर्दे-भोमेश्वर मंदिर : येथे विष्णूची अप्रतिम मूर्ती आहे. भग्नावस्थेत असली, तरी तिचे सौंदर्य जाणवते. कोकणात विष्णूच्या अनेक प्रतिमा पाहायला मिळतात. दापोलीच्या आसपासच्या आठ-१० ठिकाणी तरी अशा सुंदर मूर्ती आहेत. प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य अनोखे आहे. साधारण शिलाहार राजवटीत या मंदिरांची व मूर्तींची स्थापना झाली असावी असे वाटते. मंदिराच्या मागे उघड्यावरच एका सुंदर दगडी मूर्तीचे भग्नावशेष दिसतात. या मूर्तीचे हात, पाय आणि शिर तुटलेल्या अवस्थेत असले, तरी त्यावरील कोरीव काम व कलाकुसर अचंबित करणारी आहे. गावातील ओढ्याच्या काठी अलीकडेच जीर्णोद्धार केलेले भोमेश्वर मंदिर आहे. या मंदिरात असलेले ४ फूट उंचीचे वारूळ बघण्यासारखे आहे. या वारुळालाच देव मानले जाते. त्याशेजारी महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली आहे.
विष्णूमूर्ती, सडवे
सडवे येथील विष्णू मंदिर : दापोलीच्या अगदी जवळ असूनही हे मंदिर फारसे परिचित नाही. दापोलीच्या एक-दोन दिवसांच्या मुक्कामात संध्याकाळी सागरकिनारा, सकाळपासून दुपारपर्यंत अंतर्भागात असलेली पुरातन मंदिरे पाहावीत. या मंदिरातून ८०० ते ९०० वर्षांपूर्वीच्या मूर्ती बघितल्यावर त्या काळचे वैभव आपणास आजमावता येते. खरे कोकणी जीवनही अनुभवता येते. असेच एक ठिकाण म्हणजे सडवे व तेथील विष्णू मंदिर. येथे पुरातन कोकणी शैलीतील बांधकाम असलेल्या मंदिरात काळ्या पाषाणातील सुंदर अशी श्री केशवाची मूर्ती असून, देवाच्या उजव्या पायाजवळ गरुड आणि इतर देवतांची शिल्पे आहेत. येथे एक शिलालेख आहे. देवनागरी लिपीतील आणि संस्कृत भाषेतील हा लेख असून, त्याचा अर्थ असा -  श्री विष्णूची मूर्ती सुवर्णकार कामदेवाने केली आणि तिची स्थापना सोमवारी, रोहिणी नक्षत्रावर केली. तज्ज्ञ संशोधकांच्या मते, या काळात उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत याचा प्रधान देवूगीनायक इथे अंमलदार होता. पादपीठावर असा काल दर्शविणारा शिलालेख अन्यत्र कोठेही नाही. अशीच एक मूर्ती दापोली-खेड रस्त्यावर टाळसुरे येथे असून ती भग्नावस्थेत आहे. टाळसुरे येथे अनेक पुरातन मूर्ती असून, एक दहातोंडी मूर्तीही आहे.
थापत्यशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे.
केशवराज मंदिरकेशवराज मंदिर
आसूदचा केशवराज : दापोली-हर्णै रस्त्यावर सात किलोमीटरवर हे ठिकाण आहे. रस्त्यापासून साधारण १५ मिनिटे चालत जावे लागते. तेथे पोहोचल्यावर सर्व श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटते. अत्यंत साध्याशा मंदिरातील केशवराजाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. हे मंदिर साधारण एक हजार वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराच्या वाटेवर नारळाची, आंब्या-फणसाची दाट झाडी आहे. ते पाहून मन मोहून जाते व त्यामुळे चालण्याचा त्रास वाटत नाही. दाट झाडीमुळे सूर्यप्रकाशसुद्धा सहज जमिनीवर पडत नाही. वाटेत नदीवरचा साकव (पूल) ओलांडून दुसऱ्या डोंगरावर जावे लागते. १५-२० मिनिटांची चढण चढून गेल्यावर केशवराज मंदिर लागते. 
गोमुखातून सतत पाणी वाहत असते. 
गर्द झाडीत लपलेले केशवराज मंदिर दगडात बांधले आहे. मंदिराच्या आवारात गोमुख आहे. या गोमुखातून १२ महिने थंडगार व स्वच्छ पाणी वाहत असते. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपती, तर खालच्या बाजूस ‘शरभा’ची मूर्ती आहे. डाव्या बाजूला मारुती व उजव्या बाजूला गरूड आहे. केशवराजाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म अशी चारही आयुधे आहेत. कार्तिकातल्या पहिल्या एकादशीपासून पाच दिवस येथे उत्सव असतो.
 
पाटाचे पाणी 
आसूद आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर चालविलेली पाटाच्या पाण्याची वाटप पद्धत. डोंगरउतारावर सुपारी बागा, मध्येच एखादा नारळ आणि बागेतून जाणारी चिऱ्यांची वाट. या वाटेच्या शेजारील पाटातून वाहणारे स्वच्छ पाणी सुपारीच्या बागेत सोडलेले दिसते. पाट पद्धतीने पाणीवाटपाच्यायापद्धतीला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. डोंगरमाथ्यापासून ते अगदी ३०० मीटर तळाला असलेल्या सुपारी बागेच्या शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या पाटातून हे पाणी नैसर्गिक उतार, साधनसामग्रीचा वापर आणि गावकऱ्यांच्या कल्पकतेने बांधापर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे शासनाचे कोणतेही अनुदान किंवा पाठबळ या पाणीवाटप व्यवस्थेला नाही. केवळ आहे तो गावकऱ्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि नियोजन. 
    दापोली आणि आंजर्ले परिसर आणि तिथल्या काही ठिकाणांचा फेरफटका मारल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की हा भाग अगदी तस्साच आहे...श्री. ना. पेंडशांच्या कादंबऱ्यांमध्ये भेटलेला. तीच माडा-पोफळांची बनं, तोच आल्हाददायक समुद्रकिनारा, तेच साकव, तोच गारवा आणि तीच शांतता. पेंडशांच्या कल्पनेतली ‘गारंबी’ ती अशीच कुठलीतरी. आता पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे काही ठिकाणचा बजबजाट वाढला आहे, एवढंच. दापोलीला जायचं, तर कर्दे, मुरुड हे प्रसिद्ध किनारे आहेतच; पण अगदीच निवांत आणि शांत ठिकाण हवं असेल, तर लाडघरला पर्याय नाही. इथलं जवळचं परशुरामाचं मंदिर, हर्णैमधला संध्याकाळचा समुद्रकिनाऱ्यावरचा मासळीचा बाजार, आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती ही ठिकाणं तर छान आहेतच; पण अगदी वेगळा आणि प्रसन्न अनुभव घ्यायचा असेल, तर आसूदबागला भेट द्यावी. आसूदबाग हे एकदम आडवाटेवरचं, शांत आणि निवांत ठिकाण आहे.
 जंगलातली ही चढण दमछाक करणारी असली, तरी आल्हाददायक वातावरणामुळे प्रवास मजेचा होतो. 
जंगलातली ही चढण दमछाक करणारी असली, तरी आल्हाददायक वातावरणामुळे प्रवास मजेचा होतो.
दापोलीहून आंजर्ल्याच्या रस्त्याला लागलं, की चार-पाच किलोमीटवर उतारावरच आसूदबागेची पाटी दिसते. बरोबर गाडी असेल, तर उताराच्या शेवटी एक वळण घेऊन थोडं आतपर्यंत जाता येतं. नसेल, तर मुख्य रस्त्यावरच उतरून आणखी छोटीशी उतरंड पार करून गेलं, की आपण आसूदबागेच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे दाबकेवाडीत पोहोचतो. इथलं पोफळींचं बन आणि पाटातून वाहणारं झुळझुळ पाणी सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतं आणि मन प्रसन्न करतं. छान सारवलेली अंगणं, कोकणी पद्धतीची कौलारू घरं, अंगणात घातलेली वाळवणं आणि या सगळ्या वातावरणात भरून राहिलेला गारवा. आसूदबाग म्हणजे आनंदाचा झुळझुळता झरा आहे. रस्त्यावरून आपण या पोफळींच्या प्रदेशात आत शिरतो, तेव्हा टुमदार घरांच्या अंगणांमध्ये वेगवेगळ्या कोकणी मेव्यांचे स्टॉल थाटलेले दिसतात. इथे चिंचा, आवळे, आंबा, फणस, करवंद, जांभळं, यांची सरबतं, साटं, आटवलेला रस, लोणची, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडया अशा असंख्य प्रकारांची रेलचेल असते. उन्हाळ्यात गेलं, तर आंब्या-फणसांचा मनमुराद आस्वादही घेता येतो. कोकम किंवा आवळा, जांभूळ, करवंदाच्या सरबताचा आस्वाद घेऊन पुढच्या वाटेने रवाना व्हायचं. ही वाट अशीच पोफळीच्या गारव्याच्या सोबतीने जाणारी. अतिशय शांत आणि निवांत. पक्ष्यांची किलबिल ऐकत, बाजूनेच वाहणाऱ्या नदीचा खळखळाट कानांत साठवत पुढे निघायचं. मध्येच भारद्वाजचा आवाज, कोकिळेचं कूजन, खंड्याचा किलबिलाट, सुतारपक्ष्याची टकटक, असा वेगवेगळ्या ध्वनींचा संगीतसोहळा अनुभवता येतो. 
आणखी पुढे गेल्यावर दगडांच्या पायऱ्यांचा एक मस्त उतार दिसतो. तो उतरून थोडं पुढे गेलं, की समोरच या जंगलातला गारवा टिकवणारी छोटीशी नदी लागते.
 
तिच्यावरचा जुना साकव आता पडलाय, त्यामुळे तिथे एक लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. थोडा वेळ नदीत मस्ती करायची आणि पूल ओलांडून नदीपार व्हायचं. इथून पुढे जंगलातली एक मोठी चढण सुरू होते. बऱ्यापैकी दमछाक करणारी असली, तरी चांगल्या पायऱ्या, भरपूर सावली यामुळे हा प्रवासही मजेचा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत गेलो, तर वाटेत कैऱ्या, करवंदांचा कोकणी मेवाही चाखता येतो.
झऱ्याच्या उगमापासून दगडी पाट काढून त्याला खाली देवळापर्यंत आणण्याची केलेली व्यवस्था लक्ष वेधून घेणारी आहे.
झऱ्याच्या उगमापासून दगडी पाट काढून त्याला खाली देवळापर्यंत आणण्याची केलेली व्यवस्था लक्ष वेधून घेणारी आहे.
थोडंसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला केशवराजचं डोंगराच्या कुशीतलं मंदिर दिसू लागतं. मंदिरापर्यंतचा हा प्रवास मजेचा असल्यामुळे, फारसा त्रास होत नाहीच. तरीही झालाच, तर मंदिराच्या दारात गार पाण्याचा एक बारमाही झरा आपला सगळा थकवा पळवून लावण्यासाठी सज्ज असतो. गोमुखातून येणारं हे थंडगार पाणी मनाला आणि शरीराला तृप्त करतं.
केशवराज म्हणजे विष्णूचं हे मंदिरसुद्धा अगदी आखीवरेखीव आहे. या भागात फारशी वर्दळ नसल्यामुळे आणि चारही बाजूला जंगल असल्यामुळे देवळात काही क्षण बसलं, तरी मनाला अतिशय प्रसन्न वाटतं.
 
नुसतं डोळे मिटून बसण्यानंही सगळा ताण, सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. केशवराज मंदिराच्या दारात येणारा हा झरा डोंगराच्या थोड्या वरून उगम पावतो. थोडा जास्त उत्साह असेल, तर आणखी थोडा डोंगर चढून जाऊन झऱ्याचा हा खाली येण्यापर्यंतचा प्रवासही पाहता येतो. झऱ्याच्या उगमापासून दगडी पाट काढून त्याला खाली देवळापर्यंत आणण्याची केलेली व्यवस्था लक्ष वेधून घेणारी आहे.
आसूदचा श्री व्याघ्रेश्वर : केशवराज मंदिरापासून पश्चिमेला अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर व्याघ्रेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या सभागृहात लाकडी खांब असून, त्यांच्यावर पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत.

गाभाऱ्यात असलेले शिवलिंग स्वयंभू आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, काळभैरव आणि झोलाईदेवी इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. व्याघ्रेश्वर मंदिर नदीच्या काठावर असून, नदीला सुंदर घाट बांधण्यात आला आहे.

आता या देवळाचा जीर्णोद्धार केला असून, अत्यंत सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे. मूळ मंदिर तसेच ठेवले आहे. जुनी शिल्पे अद्यापही पाहण्यास मिळतात. येथे रशियातून लोक ध्यानधारणेसाठी येतात.  हा परिसर अत्यंत सुंदर असून, शेजारी ग्रामदेवतेचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. येथे मंदिरापर्यंत गाडी जाते.
 
पाडळे किनाऱ्याकडे जाणारा रस्ता..
आसूदबागला जाण्यासाठी : दापोलीला जाण्यासाठी मुंबई-पुण्याहून खोपोलीमार्गे, पुण्याहून ताम्हिणी, भोरमार्गे रस्ता आहे. दापोली शहरातून मुरुड-हर्णै रस्त्याला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दाबकेवाडीला जाण्याचा फाटा आहे. दाबकेवाडीपर्यंत गाडी जाते. तिथून केशवराजची पायवाट सुरू होते. पायवाटेवरून देवळापर्यंत जाण्याचा रस्ता सुमारे ३० ते ४० मिनिटांचा आहे.
वणंद : वणंद हे दापोली गावाला लागूनच आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे माहेर येथे असल्यामुळे या ठिकाणास महत्त्व प्राप्त झाले आहे. बाबासाहेबांच्या कार्यात रमाबाईंचा मोठा हातभार होता.
गव्हे - रोपवाटिकेचे गाव : दापोलीजवळील हे गाव नर्सरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक रोपवाटिका आहेत. येथे आंबे, नारळ यांच्याबरोबर अनेक फळझाडांची रोपे मिळतात. शोभेची झाडे, निरनिराळ्या वेली, टबमधील कमळे, औषधी वनस्पती, कुंडीत येणारी बकुळफुले असे नानाविध प्रकार येथे पाहायला मिळतात आणि त्यांची रोपे विकत घेता येतात.
केशवसुतांचे वळणे : केशवसुतांचा जन्म मालगुंड येथे झाला असला, तरी त्यांचे गाव वळणे. दापोली-दाभोळ रस्त्यावर थोडे आतल्या बाजूला हे गाव आहे. त्यांचे राहते घर आता मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. त्यांचे बालपण येथेच गेले. येथे केवड्याचे बनही आहे.
 केशवसुतांच्या घराचे अवशेष
तामसतीर्थ :
लाडघर तामसतीर्थ हे दापोली शहरापासून 7 कि.मी. अंतरावर आहे. या क्षेत्राला पर्यटनाचा दर्जा प्राप्‍त झाला आहे. या क्षेत्राच्या बाजूला वडाचे झाड असून, समुद्रकाठालाच गोड्या पाण्याची विहीर आहे. हे देखिल एक आश्‍चर्य मानले जात आहे. 
 लाडघर या तामसतीर्थाला महत्त्वाचे स्थान आहे.  लाडघर समुद्र किनार्‍याचा काही भाग उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तांबूस रंगाचा दिसतो. म्हणून या क्षेत्राला तामसतीर्थही म्हणतात. तिथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तामसतीर्थ. तामस म्हणजे माती. बीचची रेती लाल असल्यानं पाण्याचं  लाल रंगात ‘रिफ्लेक्शन’ दिसतं. ते वेगळंच भासतं. लक्षात राहतं. काठचे शैवालखडकही नजरेत भरतात.
तामसतीर्थ
समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला डोंगरावर असलेलं दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकात साने गुरुजी यांनी लाडघरच्या या तामसतीर्थाचं खूपच सकस, समर्थ अन् समर्पक भाषेत विस्तृत वर्णन केलं आहे. अगदी एक प्रकरण या लाडघरनं भरलं आहे.
दापोली तालुक्यामध्ये अनेक किनारे हे पर्यटन क्षेत्र आहेत. मात्र, लाडघरचा समुद्रकिनारा आणि त्याचा काही भाग तांबूस असल्यामुळे दूरवरून येणार्‍या पर्यटकांची लाडघर समुद्र किनार्‍याला अधिक पसंती आहे.
   या ठिकाणी दापोली तालुक्यासह जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक धार्मिक विधी आणि अस्थी विसर्जनासाठी लाडघर समुद्र किनारी येतात. एखाद्या व्यक्‍तीला अग्‍नी दिल्यानंतर अंत्य विधीसाठी आलेले लोक या समुद्र किनार्‍याच्या पाण्यामध्ये जावून समुद्राचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात.
तिथलं सौंदर्य आहेच तसं! तिथं प्रशस्त बीच आहे. घोड्यावरुन, उंटावरुन सफर, सी- रायडिंग, पॅराग्लायडिंग, मोटर बोट, बडी हॉटेलं, धुंद पर्यटक वगैरे . तिथं अगदी सारंकाही आहे.
  लाडघरच्या किनाऱ्यावरील चमचमती वाळू हे खास वैशिष्ट्य आहे. लालसर रंगाच्या छटा सायंकाळच्या वेळी समुद्राच्या पाण्यात पाहायला मिळतात. त्यामुळे त्याला तामसतीर्थ नाव पडले असावे. येथे पॅरासेलिंग, डॉल्फिन राइडच्या सुविधा आहेत.
लाडघरमध्ये कोकणातील ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणार ग्रामीण म्युझियम उभारण्यात येत आहे. स्थानिक कलाकार आणि विद्यार्थ्यांनी साकारलेले कलाग्राम, आर्ट फेस्टिव्हलही पर्यटकांना पाहता येईल.
 लाडघर येथील मंदिर
हे मंदिर अतिशय म्हणजे अतिशय प्राचीन आहे हे तुम्हाला पाहताक्षणीच कळून चुकेल. या मंदिराचं जोतं चांगलं पुरुषभर उंच, विस्तीर्ण आणि संपूर्ण भक्कम अशा काळ्या दगडाचं आहे. वरील कळसापर्यंतची उभारणीहि अतिशय सुबकतेची आहे. तेथील ग्रामस्थ हे मंदिर पांडवकालीन आहे असं सांगतात. पूर्वी ह्या देवळाच्या जागी मोकळी जमीन होती. तिथे पुष्कळ गवत वाढलेलं असायचं. तेव्हा एक गुराखी आपल्या गायी बैलांना चरण्यासाठी घेऊन येत असे. तिथे एक गाय आपली वाट वाकडी करून गुराख्याच्या गायींबरोबर येत असे. अनेक दिवस ह्या गायीचा दिनक्रम पाहून एक दिवस गुराखी गायीच्या मागोमाग आला. गुराख्याने पहिले कि हि गाय दररोज येऊन रानात असलेल्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करते आणि समोर लाडघरच्या समुद्रात असलेल्या पाषाणामागे निघून जाते. मग हि गोष्ट त्याने तिथे असलेल्या गाईच्या मालकास सांगितली आणि म्हंटल ‘तुमची गाय रोज वाट वाकडी करून माझ्या गाईंबरोबर चरायला येते म्हणून तुम्ही मला ह्याबद्दलचा मोबदला द्यायला हवा’. ह्यावर त्या व्यक्तीने शेरभर लाह्या गुराख्याच्या घोंगडीत ओतल्या. गुराख्याला हा मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही म्हणून घरी परतताना घोंगडीतल्या त्या लाह्या समुद्रकिनारी झटकल्या आणि घरी पोचल्यावर पाहतो तर काय घोंगडीला चिटकून राहिलेल्या लाह्यांच्या मोहरा झालेल्या. त्यानंतर गाईच वाट वाकड करून येणंही बंद झालं. अशा प्रकारची हि दंतकथा येथे सांगितली जाते. शिवाय ज्या लहान मुलांना वेळा लागतात (वेळा म्हणजे हातपाय बारीक होऊन तिरपे होणे, पोट वाढणे, शरीर एक्दम बारीक होत जाणे) अशी लहान मुलं या मंदिरातील तीर्थ घेतल्याने एकदम निरोगी आणि व्यवस्थित होतात अस सांगितलं जात. वेळा घालवतो म्हणून वेळेश्वर असही म्हणण्यात येत. १८८५ पासून या मंदिराला पेशव्यांची सनद येते. हि सनद अगदी निरंकार चालणारी आहे, तिची मामलेदार कचेरीत तशी नोंद आहे. अजूनही बरेच ऐतिहासिक धागे ह्या मंदिराची जोडलेले आहेत. त्यामुळे खरं पाहायच झालं तर हि अशी मंदीर आपलं प्राचीन वैभव आहे. आणि हे वैभव व्यवस्थित जतन झाल पाहिजे, कायम टिकलं पाहिजे.
Read more at: https://talukadapoli.com/places/veleshwar-temple-ladghar-dapoli/?fbclid=IwAR0gV0IM_x8tNGajp4yLRs-QIJY-XWrWPXVAHWCXPbHFoYUoP8j8a5ljnuM
 वेळेश्वर मंदिर, लाडघर
लाडघरच्या तामस्तीर्थाजवळ असलेलं एक शिवालय म्हणजे ‘वेळेश्वर मंदिर’. खरंतर हे मंदिर बाजूच्या करजगावच्या हद्दीत येत पण लाडघर समुद्रकिनारा अगदी बाजूलाच असल्याने “लाडघरचे वेळेश्वर मंदिर” अशी ओळख जास्त वाचायला व ऐकायला मिळते.
हे मंदिर अतिशय म्हणजे अतिशय प्राचीन आहे हे तुम्हाला पाहताक्षणीच कळून चुकेल. या मंदिराचं जोतं चांगलं पुरुषभर उंच, विस्तीर्ण आणि संपूर्ण भक्कम अशा काळ्या दगडाचं आहे. वरील कळसापर्यंतची उभारणीहि अतिशय सुबकतेची आहे. तेथील ग्रामस्थ हे मंदिर पांडवकालीन आहे असं सांगतात.
 पूर्वी ह्या देवळाच्या जागी मोकळी जमीन होती. तिथे पुष्कळ गवत वाढलेलं असायचं. तेव्हा एक गुराखी आपल्या गायी बैलांना चरण्यासाठी घेऊन येत असे. तिथे एक गाय आपली वाट वाकडी करून गुराख्याच्या गायींबरोबर येत असे. अनेक दिवस ह्या गायीचा दिनक्रम पाहून एक दिवस गुराखी गायीच्या मागोमाग आला. गुराख्याने पहिले कि हि गाय दररोज येऊन रानात असलेल्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करते आणि समोर लाडघरच्या समुद्रात असलेल्या पाषाणामागे निघून जाते. मग हि गोष्ट त्याने तिथे असलेल्या गाईच्या मालकास सांगितली आणि म्हंटल ‘तुमची गाय रोज वाट वाकडी करून माझ्या गाईंबरोबर चरायला येते म्हणून तुम्ही मला ह्याबद्दलचा मोबदला द्यायला हवा’. ह्यावर त्या व्यक्तीने शेरभर लाह्या गुराख्याच्या घोंगडीत ओतल्या. गुराख्याला हा मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही म्हणून घरी परतताना घोंगडीतल्या त्या लाह्या समुद्रकिनारी झटकल्या आणि घरी पोचल्यावर पाहतो तर काय घोंगडीला चिटकून राहिलेल्या लाह्यांच्या मोहरा झालेल्या. त्यानंतर गाईच वाट वाकड करून येणंही बंद झालं. अशा प्रकारची हि दंतकथा येथे सांगितली जाते. शिवाय ज्या लहान मुलांना वेळा लागतात (वेळा म्हणजे हातपाय बारीक होऊन तिरपे होणे, पोट वाढणे, शरीर एक्दम बारीक होत जाणे) अशी लहान मुलं या मंदिरातील तीर्थ घेतल्याने एकदम निरोगी आणि व्यवस्थित होतात अस सांगितलं जात. वेळा घालवतो म्हणून वेळेश्वर असही म्हणण्यात येत.
१८८५ पासून या मंदिराला पेशव्यांची सनद येते. हि सनद अगदी निरंकार चालणारी आहे, तिची मामलेदार कचेरीत तशी नोंद आहे. अजूनही बरेच ऐतिहासिक धागे ह्या मंदिराची जोडलेले आहेत. त्यामुळे खरं पाहायच झालं तर हि अशी मंदीर आपलं प्राचीन वैभव आहे. आणि हे वैभव व्यवस्थित जतन झाल पाहिजे, कायम टिकलं पाहिजे.
लाडघर येथे रहाण्याची सोयः-
१) गाज, श्री. यशोधन बाळ- (02358) - 288287
२) सागर सावली-  02358-288047, 282271 ,मुंबई संपर्क क्रमांकः- 022-28723249,24378801
3) पर्ल बीच रिसॉर्ट, लाडघर  (http://pearsbeach.in)
Tel : 91-9923096423 / 9271156924 / 91-09821141579
४) आदेश बाळ, लाडघर, ८३७८९२७४५०
५) फर्न सामली रिसॉर्ट- २२३९१७८०७७
६) हॉटेल अमरनाथ- ९४२२६७२२२०
बुरोंडी : येथे एका टेकडीवर श्री परशुरामाची २१ फूट उंचीची प्रतिमा ४० फूट व्यासाच्या गोलार्धावर उभारण्यात आली आहे. येथून तामसतीर्थाचा सुंदर सागरकिनारा दिसतो. कोळथरे, तामसतीर्थ, लाडघर व बुरोंडी ही ठिकाणे एकमेकाला लागूनच आहेत.
श्री परशुराम मूर्ती, बुरोंडी
कोळथरे : कोळथरे हे क्रिकेटपटू अजित आगरकरचे गाव. भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग संस्थेच्या प्रेरणेतून कोळथरे गावात २००५पासून कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ, वनविभाग, निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने कासव संवर्धन प्रकल्प चालवला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षित घरट्यातून कासवाची पिल्ले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्याचा जलार्पण सोहळा येथे पाहता येतो. कोळथरे गावात ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो. पर्यटकांना हेरिटेज वॉक करण्याची संधी मिळते. बैलगाडीतून गावाची सफर, शेती आणि मसाल्याच्या बागेची माहिती पर्यटकांना मिळते. दुपारच्या वेळी गावातच केळीच्या पानावर कोकणी शाकाहारी पदार्थांचा आस्वादही घेता येईल. कोळथरे येथे आयुर्वेदिक औषधांचा ६० वर्षांपूर्वीचा कारखाना आहे. जवळच्या डोंगरात समुद्राच्या काठावर घलई नावाचे एक विवर तयार झाले आहे. वाघबीळ नावाची एक नैसर्गिक गुंफाही येथे आहे. कोळथरे गावात अनेक छोटी मंदिरे असल्याने त्याला मंदिराचे गाव असेही म्हणतात.
कोळथरे येथे रहाण्याची सोय :-
१) सिध्दी रिसॉर्ट, कोळथरे, ६ रुम्स उपलब्ध आहेत, शाकाहारी, मासाहारी जेवणाची सोय. संपर्क : 02358 - 285230, 9421141720
कर्दे : दापोलीजवळच चार किलोमीटरवर लांबवर पसरलेली मऊसूत वाळूची पुळण असलेला हा सागर किनारा आहे. लाटांबरोबर किनाऱ्यावर येणारे सुंदर शंखशिंपले हे येथील वैशिष्ट्य. स्थलांतरित पक्षी थंडीच्या मोसमात या किनाऱ्यावर येतात. पर्यटक येथे डॉल्फिन्स राइडचा अनुभव घेऊ शकतात. समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कर्देचा किनारा हा उत्तम व सुरक्षित आहे.
माडा, पोफळीच्या बनात अश्या हॅमॉकवर पडून समुद्राची गाज एकणे म्हणजे स्वर्गसुख ( सागर सावली रिसॉर्ट )
सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा होम-स्टेपासून ते स्विमिंग पूल, लाउंज अशा आधुनिक सुविधांनी युक्त अशा अनेक हॉटेल्सची सुविधा कर्देच्या समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे.
कर्दे किनारा
कर्दे येथे रहाण्याची सोयः-
१) सुराली सागर  (AC / Non AC rooms), कर्दे बीच. Contact : 92713 02428
२) व्हिसलिंग पाम, कर्दे बीच ,9422031320, (02358)-234659, 9422382527
३) सी फेस बीच रिसॉर्ट, कर्दे बीच, (02358) 234832
४) हॉटेल किनारा, कर्दे बीच, ( सीफुड साठी उत्तम ) (02358) 234633
५) स्वप्ना सागर निवास , (02358)-234777, 681295, 9271659020, 9765432107
६) कल्पतरु निवास, : (02358)-693367, 9420152519 
7) सुमित्रा निवास, अजित नागवेकर ७३५०१३३११७, ९६३७६४६२०२
मुरुड गाव
समुद्रकिनारा ही या गावाची शान आहे. कारण, हळुवारपणे आपल्या पायाला स्पर्श करणाऱ्या समुद्राच्या लाटा, ऐन उन्हातही शीतल वारा आणि किनाऱ्यावर उपलब्ध असणारी घोडागाडी, आजूबाजूला झुलणारी सुपारीची झाडे..
 
या गावची दुसरी शान म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. समाजसुधारक, स्त्री-शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षणसंस्था काढणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे गाव.  ते ज्या शाळेत शिकले ती शाळा आणि तिच्यासमोरील समोरील ग्रंथालय हे विशेष आकर्षण आहे.त्यांचा जन्म आजोळी, खेडजवळील शेरवली गावी झाला. गावात त्यांचे छोटे स्मारक आहे. कर्दे बीचवर जाताना हे गाव लागते. येथेही सागरकिनारा आहे.
या गावात आणखी एक विशेष गोष्ट आजही पाहायला मिळते. ती म्हणजे ‘पाखाडी’. यामध्ये खालची पाखाडी आणि वरची पाखाडी असे दोन प्रकार पडतात. पाखाडी हा आजच्या काळात अजब वाटावा असा प्रकार आहे. पूर्वी गावात सवर्णासाठी वेगळा आणि निम्न मानल्या जाणाऱ्या एका मोठय़ा वर्गासाठी वेगळा रस्ता बांधला गेला होता. त्यामुळे एकाच रस्त्यावर दोन वेगवेगळ्या वाटा इथे पाहायला मिळतात. याची रचना निम्न स्तरातील व्यक्तींची सावली सवर्णावर पडणार नाही, अशा पद्धतीने केलेली दिसून येते. आता हा जातीभेद इतिहासजमा झाला असला तरी जुन्या समाजरचनेच्या या खुणा अस्तित्वात आहेत.
मुरुड बीच
 डॉल्फीनचे दर्शन
यामाहा इंजिनच्या एका लहान डिंगी (फिशर बोट्स) मध्ये डॉल्फिन पाहण्यासाठी आपल्याला समुद्रात खोलवर नेणारे असंख्य स्थानिक टूर ऑपरेटर आहेत. सकाळी 7:00 वाजेच्या सुमारास आपल्या एका समुद्रकिनार्‍यावर (कर्दे / मुरुड) असणे आवश्यक आहे. गर्दीनुसार सकाळी- ७.०० ते  सकाळी १०:०० पर्यंत होड्या चालविल्या जातात. प्रति व्यक्ती शुल्क रू. 100/- अर्थात पीक सीजनप्र्माणे बदलू शकतात. येथे पॅरा-सेलिंगही केले जाते, पण अर्थातच गोव्याच्या बीचवर असते तसे नव्हे. ५०० मीटर अंतराची, १०० फूट उंच अशी हि राईड साधारण  रु. 300/- पडते.
डॉल्फिन स्पॉटिंगसाठी यापैकी एका नंबरवर कॉल करा आणि आपली जागा बुक करा (पावसाळ्यात राईड नसते तसेच समुद्र अशांत असेल तरीही या राईड रद्द करतात)
१) मासुम आयनारकर-9421900417, 9270672449
२) मुन्वर- 9421900424 / 9270970969
३) मझहर -9420051006 / 9270970978
दुर्गादेवीचे मंदिर
चौदाव्या-पंधराव्या शतकात सौराष्ट्राहून  येऊन एका सिद्धपुरुषाने सर्व जमातींना स्थान देऊन वसाहत निर्माण केली. तेव्हा सुरुवातीला देवीचे देऊळ अगदी साधे होते. कालांतराने ग्रामस्थांनी देऊळ नवीन करायचे ठरवले. त्यानुसार शंकरभट दीक्षित, विश्वनाथ जोशी, आपाभट दातार, केशवभट कर्वे व नारो हरी बाळ असे मुरुडचे कर्ते लोक कामाला लागले. १७६३ मध्ये हे दुर्गादेवीचे मंदिर उभे राहिले.
 
या मंदिराची इमारत काळ्या दगडांच्या मजबूत चौथऱ्यावर उभी आहे. पायऱ्या चढून वर गेलं की तिन्ही बाजूंनी मोकळा सभामंडप आहे. मधोमध सुवर्ण नक्षी असलेली फरशी बसवण्यात आलेली आहे. सभा मंडपात सुंदर वेलबुट्टी काढलेले आकर्षक खांब आहेत. देवीची मूर्ती तेज:पुंज आहे. सभा मंडपाच्या बाहेर पोर्तुगीज देवळात असते तशी मोठी घंटा टांगलेली आहे. काळ्या दगडाच्या चौथऱ्यावर बांधलेलं तुळशी वृंदावन आणि शेजारी मोठी काळ्या दगडाची दीपमाळ आहे.
मुरुड येथे रहाण्याची सोयः-
१) लोटस बीच रिसॉर्ट, मुरुड बीचजवळ ( पुर्वाश्रमीचे कामत बीच रिसॉर्ट)
२) सिल्व्हर सँड बीच रिसॉर्ट-
३) ड्रीमलँड बीच रिसॉर्ट :-  (02358)-234730
४) बालाजी बीच रिसॉर्टः
५) गारंबी रिसॉर्टः- (02358) 233288
६) सगरिका रिसॉर्ट ( वझे बन्धु )  :-(02358) 234737
७) सानिया सी रिसॉर्ट, खालची पाखाडी, मुरुड:- (02358) 234552
पाळंदे किनारा : हर्णै बंदराच्या अलीकडेच हा छोटा किनारा आहे. खेळांची गरज नसेल आणि फक्त समुद्रकिनाऱ्यावर पहुडल्या पहुडल्या समुद्राची गाज ऐकायची असेल, तर हर्णै रस्त्यावरचाच निवांत पाळंदे गावातला किनाराही उत्तम.
 पाळंदे येथे रहाण्याची सोय
1) सी प्रिन्सेस, पाळंदे बीच
2) श्री. नंदकुमार बोरकर -(०२३५८) ६९३०९६
 
हर्णै किनारा
हर्णै : हर्णै बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. हर्णै नाव घेतले की ‘गारंबीचा बापू’ आठवतो. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीमध्ये हर्णैचा बऱ्याचदा उल्लेख आला आहे.
 
 हर्णेचा मासळी बाजार
हे कोळ्यांचे बंदर असून, मासळी बाजारासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील दोन महिने सोडले तर हे कायम गजबजलेले असते. हर्णैच्या पुढे आहे सागरी सुवर्णदुर्ग. या जलदुर्गामुळे हर्णै बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे.
कनकदुर्ग
 हर्णे बंदर
सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णैच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड.
सुवर्णदुर्ग
 सुवर्णदुर्ग
सुवर्णदुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे. महाद्वाराजवळील पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूंनी तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळामुळे हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात.
पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत; पण कुठेही मंदिर नाही. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे येथील देऊळ कान्होजीने केव्हा तरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती. इ. स. १६६०मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे. 
हर्णे येथे रहाण्याची सोयः-
श्री गणेश साई - हर्णे (http://www.shriganeshsai.com)
M: 091 - 9270407147 / 8605514386 / 9763689555
Tel: 02358 - 243172
  हर्णेवरुन आंजर्ल्याला जायला दोन पर्याय आहेत.
१) हर्णे - पाजपांढरी हा समुद्र किनार्‍याने जाणार्‍या रस्त्याने जोग नदीवरचा पुल ओलांडून आंजर्ले गाव गाठायचे.
२) हर्णे गावातून एक रस्ता वरच्या पठारावरुन एक घाट उतरुन जोग नदीच्या पुलावर येतो. पर्यटकांनी तर हा रस्ता आवर्जून अनुभवावा. कारण हर्णेचे चारही किल्ले एकाच वेळी पहाता येतात, शिवाय एके ठिकाणी व्ह्यु गॅलरी केली आहे, तिथुन समोर समुद्रातील सुवर्णदुर्ग तर थेट खाली पाजपांढरी गाव दिसते. शिवाय घाट उतरताना समोर आंजर्ल्याच्या किनार्‍याचे विहंगम दृष्य दिसते.
कड्यावरच्या गणपतीचे मंदिर
कड्यावरचा गणपती
हर्णे -आंजर्ले बायपास रोडवर व्ह्यु गॅलरी
कशी चांदीची मासोली झाली, माझ्या जाळ्यात होउन आली
 पाजपांढरी गाव
जोग नदीची खाडी आणि आंजर्ल्याचा किनारा
 आंजर्ल्याचा कड्यावरील गणपती : डोंगरमाथ्यावर असलेले हे गणपती मंदिर भाविक आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. आंजर्ल्यावरून केळशीच्या बाजूस किंवा मंदिरापासून लांबवर दिसणारा समुद्रकिनारा पाहणे सुखावह असते.
पूर्वी हर्णैच्या पुढे तरीत बसून पलीकडे जाऊन गणपतीला खूप पायऱ्या चढून जावे लागे. आता जोग नदीवर मुर्डीमार्गे पूल झाला आहे. त्यामुळे मंदिरापर्यंत गाडी जाते. ५५ बाय ४० फूट आकाराच्या असलेल्या या पूर्वाभिमुख मंदिरासमोर सुंदर तळे आहे. आजूबाजूचा परिसर नव्यानेच फरशी बसवून सुशोभित केला आहे. श्रीगजाननाचे प्रथम पाऊल जेथे पडले, तेथपर्यंत सुंदर पदपथ केला आहे. आंजर्ले गावाचा समुद्रकिनारा अत्यंत शांत व सखल आहे. येथे त्या मानाने गर्दी कमी असते.
 आंजर्ले बीचः-
 आंजर्ल्याच्या किनार्‍याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या किनार्‍यावर न चुकता अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या. अंड्यातून बाहेर पडलेल्या चिमुकल्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी इथे दरवर्षी अनेक पर्यटक त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसह आवर्जून हजेरी लावतात. एखाद्या माहितीपटात अंड्यातून बाहेर पडलेली अंगठ्याएवढी चिमुकली कासवांची पिल्लं घाईघाईने पाण्याकडे धावतानाचा प्रसंग जरी आपण पाहिला असला तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा हा अनुभव खूप वेगळा, जिवंत व कायम लक्षात राहणारा असतो.
 आंजर्ले येथे रहाण्याची सोयः
सिध्दीविनायक टुरिस्ट सेंटर, दुर्गादेवी मंदिराजवळ, श्री. मिलींद नित्सुरे, शुध्द शाकाहारी जेवण उपलब्ध, सी फेसिंग जुन्या कोकणी घरात रहाण्याची व्यवस्था, संपर्क : 02358 - 234391, 684113
 
 आंजर्ले -केळशी परिसराचा नकाशा
सावणे किनारा : आंजर्ल्याच्या पुढे सावणे किनारा आहे. हादेखील फारशी गर्दी नसलेला सागरकिनारा आहे. 
पाडले गावपाडले गाव
 
पाडले किनारा : डावीकडील बाजूस समुद्रकिनारा व उजवीकडील बाजूस डोंगररांगा असे सुंदर नैसर्गिक वरदान लाभलेले हे शांत व रम्य ठिकाण सावणे किनाऱ्याच्या पुढे आहे. येथेही फार गर्दी नसते. अधूनमधून दिसणारे खडक, त्यावर आपटणाऱ्या लाटांचे नृत्य हे पाहून मन हरखून जाते. याच खडकामध्ये मानवी पायाचा भव्य असा आकार/ठसा दिसून येतो. यालाच भीमाचा पाय असे म्हटले जाते. कोकणचे खरे सुंदर ग्रामीण रूप येथे पाहायला मिळते. कौलारू घरे व त्यासमोरील अंगणामध्ये असलेल्या फुलांच्या छोट्याशा बागा व घराच्या मागील बाजूस नारळ, सुपारी व आंब्याच्या बागा दिसून येतात. गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विविध खेळप्रकारांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावाला फार पूर्वीपासून भजन-कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे. या गावांनी अनेक संगीतकार, गायक मंडळी संगीत क्षेत्राला दिली आहेत. गावामध्ये भजनाचे अनेक कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू असतात. तसेच गावामध्ये १०० वर्षांपूर्वीचे दत्त मंदिर, गणपती मंदिर आहे. दत्ताचे मंदिर हे गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. 
आडे बीचः-
आडे किनार्‍याकडे जाणारा रस्ता हा एक नारळ व सुपारीच्या बागांमधून जातो. समुद्रकिनारा स्वच्छ आणि  अस्पर्श आहे.
  या किनार्‍यालगत केवड्याचे बन आणि विस्तीर्ण जंगल आहे. या परिसराच्या सहलीमध्ये हा नयनरम्य बीच चुकवू नका. इथून सूर्यास्त पाहणे किंवा केवड्याच्या बनात फक्त आडवे पडून रहाणे हा एक अनुभव आहे. स्वतःला रिचार्ज करण्यासाठी एक आदर्श टॉनिक!
पुरातन श्री भार्गवराम (परशुराम) मंदिर आडे आणि केळशी यांच्यामध्ये पाच मंदिरांच्या मध्ये आहे. दगडी पायर्‍यांची सुमारे 5-10 मिनिटांची छोटी चढाई या मंदिरापाशी घेउन येते. हे मंदिर पेशवेकालीन आहे. हि सर्व मंदिर पुर्वाभिमुख आहेत! श्री भार्गवरामाच्या मुख्य मंदिरासह, या संकुलात भगवान शिव मंदिर, रेणुका देवी, हनुमान, गणेश, वेताळ आणि शनि यांची मंदिरे आहेत. भगवान परशुराम मंदिर असलेल्या कोकणातील दोन ठिकाणांपैकी आडे हे एक स्थान आहे, तर दुसरे ठिकाण चिपळूण आहे. आंजर्ल्यावरुन समुद्राच्या कडेकडेने जाणारा हा रस्ता कोकण सफारीत मस्ट आहे.
केळशीचा किनारा
केळशी : 
केळशी गाव नारळी-पोफळीच्या बागांमध्ये दडले आहे. याकूबबाबाच्या दर्ग्यापासून या गावाचे विहंगम दर्शन होते. फक्त आणि फक्त नारळी पोफळी दिसतात. घरे दिसतच नाहीत. या झाडीतच वाड्या आणि त्यातील घरे लपली आहेत. यातच होम-स्टे उपलब्ध करून स्थानिकांनी उपजीविकेचे नवीन साधन शोधले आहे. गावातील मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे.
 
 रेल्वे फलाटासारख्या दिसणाऱ्या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या भागाला बिदी असे म्हणतात. या पाखाड्या इथे पडणाऱ्या धो-धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून जांभ्या दगडापासून (चिरे) केल्या आहेत.
पावसाळ्यात बिदीवर असणाऱ्या घरातील अंगणापासून ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधलेले दिसतात. गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना आहे. 
 
 वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या व्हेनिस सारखा दिसू लागतो. असं असलं तरी बोटी वगैरे चालवण्याचा विचारही नको, कारण पाऊस एकदा बदा बदा कोसळू लागला की घराबाहेरचं काहीही दिसत नाही. त्यामुळे हे अतिरेकी हवामान सहन करण्याची ताकद आणि तयारी असेल तरच पावसाळ्यात येण्याचे धाडस करा. नाहीतर घरात पत्ते कुटत बसण्याची वेळ यायची . केळशी 'पर्यावरण जपणारे गाव' अशी आपली प्रतिमा बनवू पाहत आहे.
केळशी बीच व वाळूची टेकडी:-
     कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड. केळशीला तीन किलोमीटर लांबीचा मऊशार वाळूचा भव्य किनारा आहे. केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिकरीत्या तयार झालेली एक वाळूची टेकडीही आहे. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. त्यानंतर डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्वसमावेशक संशोधन पुढे आणले. ही टेकडी त्सुनामीमुळे झाली असावी, असे म्हणतात. भारजा नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कार्बन-१४ पद्धतीने कालमापन केले असता, तो कोळसा ११८० वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून आले.
केळशीचा किनारा
    रामाचे देऊळ उजवीकडे टाकून साठे आळीतून सरळ उत्तरेकडे पुढे गेलं की आपण एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो.
एक नैसर्गिकरित्या तयार झालेली वाळूची टेकडी आपल्याला पहायला मिळते. शासन दरबारी असलेल्या पुरातत्व विभागाच्या दस्तैवजांनुसार ही वाळूची टेकडी साधारणपणे वास्को-दि-गामाच्या
भारत भेटीच्या आसपास पंधराव्या शतकात एका सुनामीमुळे तयार झाली आहे. या टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्‍या बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या खेळात क्वचित मोठेही सहभागी होताना दिसतात. टेकडीवर बसून दिसणार्‍या सूर्यास्ताची शोभा काही औरच, असा या ठिकाणाला भेटदिलेल्या पर्यटकांचा अनुभव. सर्वप्रथम १९९० साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील अभ्यासक प्राध्यापक
डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ह्या टेकडीबद्दल काही शास्त्रीय निरिक्षणे नोंदवली होती. तसेच डॉ. अशोक मराठे या पुरातत्व शास्त्रज्ञाने डेक्कन महाविद्यालयतील काही सहकार्‍यांसह या वाळूच्या टेकडी संबंधात संशोधन केले. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या:
    किनार्‍यावरील इतर टेकड्यांपेक्षा ही टेकडी वेगळी आहे. केळशी परिसरात जास्तीत जास्त ८ मीटर हून अधिक उंचीची टेकडी आढळत नसताना ही टेकडी मात्र तब्बल २८ मीटर उंच आहे. इथे सापडलेली खापरे, माशांची हाडे यांचा काळ तेराव्या शतकाचा असल्याचे संशोधनाअंती समजले. या टेकडीत काळे-पांढरे वाळूचे थर स्पष्टपणे आढळून येतात. काही ठिकाणी राखेचे थर, कोळसायुक्त वाळू, सागरी माशांची हाडे, खापरे व मडक्यांचे तुकडे, शंख-शिंपले आणि क्वचित नाणीही आढळतात. टेकडीच्या माथ्याकडील भागत गाडल्या गेलेल्या दोन मानवी कवट्यांच्या जवळ चांगल्या अवस्थेत असलेली तांब्याची सहा नाणी आढळली होती. त्यांच्यावर "अल् सुलतान अहमदशहा बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी ८३७" असा मजकूर दिसतो. याचाच अर्थ ही नाणी बहामनी सुलतान अहमदशहा पहिला याने हिजरी सन ८३७ म्हणजे इ.स. १४३३ मध्ये वापरात आणली हे उघड होतं. टेकडीच्या पायथ्याशी सध्या ज्या भागापर्यंत भरतीचे पाणी येते, तेथे एक जांभ्या दगडाच्या चिर्‍यांनी बांधकाम केलेली शिलाहारकालीन जुनी पक्की विहीर आहे.
       पुढे सागरी महामार्गाच्या निर्मितीसाठी आपल्या अचाट सार्वजनि़क बांधकाम विभागाने जे.सी.बी.
यंत्राच्या सहाय्याने टेकडीच्या मध्यापासून काही भाग खणून काढला. परंतु पुरातत्वीय संशोधन पूर्ण झालेले नसल्याने आणि हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा कायमचा जतन व्हावा ह्यासाठी ह्या वाळूच्या टेकडीचा विनाश थांबावा हा अर्ज न्यायालयात ग्राह्य धरला जाऊन सागरी महामार्गाच्या कामावर न्यायालयाने बंदी आणली.
याकूब बाबांचा दर्गा : याकूब बाबा हे सूफी संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी येथे वास्तव्यास होते. याकूब बाबा हे सिंध प्रांताकडून बाणकोटमार्गे केळशीला आले, असे सांगितले जाते. याकूब बाबांची समाधी अत्यंत साधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्यावर श्रद्धा होती. महाराजांच्या कार्याला त्यांनी आशीर्वाद दिल्याचे सांगितले जाते. महाराजांनी त्यांच्या दर्ग्याचे बांधकाम सुरू केले व ते छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केले. 
केळशीचे महालक्ष्मी मंदिर
याकूब बाबांचा दर्गा
महालक्ष्मी मंदिर : पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. केळशीचे महालक्ष्मी मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की लागू घराण्यातील एका गृहस्थांच्या स्वप्नात देवी आली व तिने आपण नक्की कुठे आहोत ते सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी खणले असता देवी सापडली व त्यावर देऊळ बांधण्यात आले. असेही म्हटले जाते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस इथे फेडता येतो. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे. दर वर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिर परिसर स्वछ ठेवण्यात येतो. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांचे माहेर चिपळूणला व सासरचे घर केळशीला आहे.
 केळशीचे महालक्ष्मी मंदिर
राम मंदीरः-
   महालक्ष्मी मंदिराशिवाय गावात आणखी एक प्रमुख मंदिर म्हणजे राम मंदिर. रामनवमीचा उत्सव आणि महालक्ष्मीचा उत्सव हे दोन जवळ जवळ जोडूनच येतात. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल तर मुक्काम ठोकून हे दोन्ही उत्सव पहावेत.
राहण्याची सोयः
केळशीमध्ये मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
पुढील सर्व ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार निषिद्ध आहे.
१) श्री. गिरीश बिवलकर (विष्णू): ०२३५८-२८७३१२.
इथे मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते. कुटुंब असल्यास प्राधान्य.
श्री. बिवलकर हे देवीचे पु़जारी आहेत.
२) त्यांचे शेजारी श्री. वसंत गोखले (फक्त राहणे): ०२३५८-२८७२६९; ९४२००४०९६९.
३) श्री. वर्तक संचालित 'पुण्याई' हॉटेल: संपर्क श्री. वर्तक ०२३५८-२८७२१७.
इथेही मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
४) श्री. बगाराम महाजन, श्रीराम मंदिराजवळ यांचेकडे फक्त भोजनाची सोय होऊ शकते.
५) कोकणातही आपल्या शहरातल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा असल्यास श्री. यनगुल यांच्या मालकीचे व श्री. विजय जोशी यांचे व्यवस्थापन असलेले एन्-गुलमोहर. संपर्क ०२३५८-२८७३७१.
 केळशी वेळास परिसर
वेळास : पेशवाईतील धुरंधर राजकारणी नाना फडणवीस यांचे हे मूळ गाव. नानांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांच्याबरोबर सातारा येथे आले. नाना फडणवीसांचा जन्म सातारा येथील. येथे त्यांचे घर किंवा काही नाही.
 
त्यांचा एक छोटा पुतळा येथे बसविण्यात आला आहे
 
गावातच एक पुरातन श्री भैरी रामेश्‍वराचं मंदिर आहे. या मंदिराला जगभरातील पर्यटक भेट देत असतात. मंदिरात आल्यानंतर मनाला अपार शांती मिळते, असं अनेक भाविकांचं मत आहे. नाना फडणवीसांचं मूळ घर आणि लक्ष्मीचं मंदिर ही आणखी दोन ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.
 वेळास आता कासव महोत्सवामुळे प्रसिद्ध झाले आहे. चिपळूणच्या भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग मंडळाच्या उपक्रमातून कासवाच्या पिलांना संरक्षण दिले जाते. ‘घरात हसरे तारे’ ही कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी द. वि. केसकर यांची सासुरवाडी वेळास येथे आहे. 
भाऊ काटदरेभाऊ काटदरे
वेळासचं प्रमुख आकर्षण म्हणजे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येणारी ऑलिव्ह रिडली टर्टल्स. या जातीच्या कासवांच्या माद्या दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या सुमारास किनाऱ्यावरील वाळूत अंडी घालण्यासाठी येतात. अंडी घातल्यानंतर ती वाळूखाली झाकून ती मागे न पाहता पुढच्या वर्षापर्यंत समुद्रात निघून जाते. अंड्यातून पिलं बाहेर पडल्यानंतर स्वतःच पाण्याच्या ओढीनं समुद्रापर्यंत जातात. ही वाट त्यांच्यासाठी मोठी खडतर असते. त्यांची शिकार करणारे पक्षी आणि कोल्ह्यांसारखे प्राणी याच काळाची वाट पाहात असतात. विशेष म्हणजे या कासवांचे नर अंड्यातून बाहेर आल्यानंतर कधीच किनाऱ्यावर येत नाहीत.
 
 सह्याद्री निसर्गमित्र संघटनेने सर्वात प्रथम या घटनेची नोंद घेतली. त्यांच्या निरीक्षणानुसार या किनाऱ्यांवर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अनेक माद्या अंडी घालण्यासाठी येत असून कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणाची तेव्हा नितांत गरज होती. त्यांच्या आंदोलनात स्थानिक गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि कासावांच्या अंड्यांचे काळजीपूर्वक संरक्षण करण्याच्या कामास सुरुवात झाली. वेळास गावामध्ये प्रथम सुरू झालेल्या या कासव संवर्धन प्रकल्पामुळे अन्यथा दुर्लक्षित असलेला वेळासचा समुद्रकिनारा जगाच्या नकाशावर आला.
अनेक वर्षांपासून डिसेंबर ते मे या कालावधीत ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या प्रजनन हंगामात अंडी घालण्यासाठी रत्नागिरीतील विविध किनारी येतात. या अंड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर गावकऱ्यांनी प्रत्येक वर्षी या किनाऱ्यांवर कासव महोत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. या कासव महोत्सवांमुळे वेळास, आंजर्ले, गावखडी येथे आता निसर्ग पर्यटन सुरु झाले आहे आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी आणि कासव संवर्धनाच्या मोहिमेकरिता उत्पन्नाचा एक चांगला स्रोत निर्माण झाला आहे.
सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि गावकऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या १५ वर्षांत रत्नागिरीतील वाळूच्या विविध किनाऱ्यांवर जन्माला आलेल्या कासवांच्या ५०,००० हून अधिक पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडून त्यांच्या संवर्धनाचे एक अनोखे उदाहरण या गावांनी निर्माण केले आहे. कासव संवर्धनाचे हे अद्वितिय कार्य बघण्यासाठी रत्नागिरीला भेट दिलीच पाहिजे.
कासव संवर्धन केंद्रे - वेळास, केळशी, अंजर्ले, मुरुड, दाभोळ, गुहागर, गावखडी
 
हळूहळू कासवांनी आपला मोर्चा दुस-या किना-यांकडे वळवला. वेळासपासून ४० किमी अंतरावर असलेल्या आंजर्ले येथेही मोठया प्रमाणावर कासवे येऊ लागली. दापोलीपाठोपाठ गुहागर, राजापुरातील किना-यांवरही या जातीची कासवे प्रजननासाठी येऊ लागली आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थही सज्ज झाले आहेत.
दरम्यान, आता राज्य सरकारनेही हे किनारे संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला असून; सरकारच्या बायोडायव्हर्सिटी बोर्डाने वेळास आणि आंजर्ले हे किनारे जैवविविधता वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींकडूनही प्रतिसाद अपेक्षित असून; याला वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही किना-यांकडे आपसूकच जाणार आहे. त्यामुळेच येथे येणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या कासवांना संरक्षण मिळेल, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय येथील निसर्गाचेही संरक्षण आणि संवर्धन होणार आहे.
वेळासचे वातखळगे :-
   पावसामुळे होणारी किंवा उन्हामुळे होणारी झीज आपण अनेक ठिकाणी बघु शकतो, पण वार्‍यामुळे होणारी झीज सहसा दिसत नाही. हा निसर्ग चमत्कार बघायचा असेल तर वेळासला जरुर भेट द्या. यासाठी बाणकोटकडून येणार्‍या रस्त्याने आपण वेळासजवळ आलो कि वार्‍यामुळे समुद्राची वाळू वार्‍यामुळे दगडावर सतत आपटून दगड झीजतात आणि दगडावर खड्डे पडतात. हे खड्डे एखाद्या आईस्क्रीमला चमच्याने तोडावे तसे दिसतात. वेळास गावाजवळ आपल्याला एका पुलापाशी हे वात खळगे बघायला मिळतात.
  तसेच वेळास - बाणकोट रस्त्याच्या कडेला असलेल्या कड्यावर देखील असे वातखळगे दिसतात.
कसे जाल? पुण्याहून तीन मार्गांनी वेळासला जाता येतं. पहिला मार्ग पुणे-मुंबई रस्त्यानं खोपोली-पेण-वडखळ मार्गे, ताम्हिणी घाटमार्गे आणि भोर-वरंध घाट मार्गे जाता येतं. ताम्हिणी मार्गे अंतर सुमारे १९४ किलोमीटर. मुंबईहून २२५, दापोलीहून सुमारे ४५ आणि श्रीवर्धनहून २१ किलोमीटर आहे. वेळास आणि बाणकोट या दोन्ही गावांत अनेक रिसॉर्ट आणि होम स्टे आहेत.
वेळास येथील रहाण्याची सोयः-
१) मोहन उपाध्ये :-91895622778, 918983767388
२) अजित दापर्डीकर -9272378752
३) मंदार पालशेतकर- (02350)220674
४) प्रकाश जोशी - 7588914476
जेवण
सुर्यकांत जाधव :- 917218053041

No comments:

Post a Comment

न्यू यॉर्क

  न्यू यॉर्क  न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरचे एक शहर. जगप्रसिद्ध शहरांच्या यादीत नाव असलेल्या या शहराच्या नावाभोवती एक वेगळेच ...