बाणकोट :
हे रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर-पूर्व टोक. येथील खाडी पार केली, की पलीकडे
रायगड जिल्हा चालू होतो. बाणकोटचा उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या शतकात
ग्रीक प्रवासी प्लिनी याने मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे;
मात्र त्यानंतर याचा उल्लेख १६व्या शतकापर्यंत कोठेही आढळत नाही. १५४८च्या
सुमारास हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात
कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिंमतगड असे नाव
दिले.
बाणकोट
हे जुने बंदर आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाणकोट किल्ल्याची निर्मिती
करण्यात आली. लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी
अजूनही चांगल्या स्थितीत असून, समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार
नजरेत भरते. प्रवेशद्वारासमोर खाडीच्या पलीकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो.
किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या
देवड्या, पाण्याचे हौद, भुयार आणि विविध भागांना जोडणारे जिने पाहायला
मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. खालच्या
बाजूस बांधलेले ‘आर्थर सीट’ हे स्मारक आर्थर मॅलेट याची पत्नी व मुलीचे
आहे.
१७९१मध्ये पुण्याचा रेसिडेंट चार्ल्स मॅलेट याचा मुलगा आर्थर मॅलेट
महाबळेश्वरला जाण्यासाठी मुंबईहून बोटीने बाणकोटकडे निघाला. बाणकोट येथील
खाडीत त्याची पत्नी सोफिया आणि ३२ दिवसांची मुलगी एलेन या दोघी १३ खलाशांसह
बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा
बांधण्यात आला आहे. यास ‘आर्थर सीट’ म्हणून ओळखले जाते. तो महाबळेश्वर
येथे गेल्यावर सावित्री नदीच्या उगमस्थानावर बसून बाणकोटच्या दिशेने
पत्नीची आठवण जागवत असे.
महाबळेश्वरच्या
प्रसिद्ध ‘आर्थर सीट’ पॉइंटचे नाव यावरूनच देण्यात आले आहे.
पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला ‘हिंमतगड’ असे नाव
देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास
‘व्हिक्टोरिया’ असे नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५मध्ये किल्ला ताब्यात
घेतल्यावर परिसरातील नऊ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटिशांच्या
काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त
झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले; मात्र दळणवळणाच्या
गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली.
वेळासपासून जवळच बाणकोट गाव आहे. गावाजवळूनच वाहणारी सावित्री नदी अरबी
समुद्राला मिळते. नदीचं गोडं पाणी आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळं नदीचं
रूपांतर खाडीत झालं आहे. बाणकोट गावाजवळच एका टेकडीवर बाणकोटचा चौकोनी
किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास पहिल्या शतकापर्यंत जातो. त्या काळात
त्याचं नाव मनगोर किंवा मंदारगिरी असं होतं. त्या काळात बाणकोटची खाडी
परदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध होती. देश-विदेशातील व्यापाऱ्यांची गलबतं
बाणकोटच्या खाडीत मालाची चढ-उतार करत असत. मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर
या किल्ल्याचं नाव हिंमतगड असं ठेवण्यात आलं. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची
उंची सुमारे ३०० फूट आहे. हा किल्ला १५४८ मध्ये विजयपूरच्या (विजापूर)
आदिलशहाच्या ताब्यात गेला. सन १५४८ ते १६९९ पर्यंत तो पोर्तुगीजांच्या,
१६९९ ते १७१३ पर्यंत जंजिऱ्याच्या सिद्दींच्या, १७१३ ते १७५५ पर्यंत
मराठ्यांच्या ताब्यात आणि सन १७५५ ते १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो
ब्रिटिशांच्या ताब्यात होता.
कोकणात मुबलक आढळणाऱ्या जांभा दगडातच या किल्ल्याची तटबंदी आणि आतील
बांधकाम करण्यात आलं होतं. किल्ल्याच्या चहूबाजूनं खंदक आहेत. किल्ल्याला
दोन दरवाजे आहेत. उत्तरेकडचा दरवाजा बाणकोटच्या खाडीच्या दिशेनं आणि
पश्चिम दरवाजा एका पठाराच्या दिशेनं आहे. उत्तरेच्या प्रमुख दरवाजावर
पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. थोड्या अंतरावर नगारखाना आहे. पश्चिम
दरवाजातून बालेकिल्ल्यापर्यंत जाता येतं. बालेकिल्ल्याजवळच एक भुयार आहे.
हा बालेकिल्ला जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधला होता. बाणकोटमधलं रामेश्वर
मंदिर मोरोबादादा फडणवीस यांनी, तर काळभैरवाचं मंदिर नाना फडणवीसांनी
बांधलं आहे.
बाणकोट , मंडणगड परिसराचा नकाशा
आंबडवे :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव. त्यांच्या वडिलोपार्जित
घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. मंडणगडपासून हे गाव १८ किलोमीटर
अंतरावर आहे. हा परिसर रम्य असून, स्मारक परिसरात व वास्तूमध्ये
बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
मंडणगड : मंडणगड
गावातील एसटी स्थानकापासून किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. हा
रत्नागिरीतील सर्वांत प्राचीन किल्ला आहे. किल्ल्यावर वरपर्यंत वाहन
जाण्यासाठी उत्तम डांबरी सडक आहे. राजा भोज याच्या कारकिर्दीत या
किल्ल्याची उभारणी (१२व्या शतकात) झाली असावी. किल्ल्यावरील वास्तूंची पडझड
झाली आहे.
आजही त्याचे काही अवशेष गडावर दिसून येतात. किल्ल्यावर दोन
सुंदर तलाव असून, त्यांच्या भोवती कुलपाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दगड
आहेत. तिथे असलेली कबर ही शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सेनानी दर्यावर्दी
दौलतखान यांची असावी असे म्हणतात. आठ एकर क्षेत्रावर या किल्ल्याचा विस्तार
आहे. मंडणगडला वरंधा घाटातून थेट जाता येते पुणे-शिरवळ-वरंधा-शिवथर मार्गे
मुंबई-गोवा महामार्ग चौकातच ओलांडून जाता येते.
१६६१
साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदाराच्या ताब्यात होता.
विशाळगडाच्या लढाईत जसवंतराव आदिलशहाकडून लढत होता. उंबरखिंडीत
कारतलबखानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला
होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवी आपली जहागिरी व
मंडणगड सोडून शृंगारपूरला पळून गेला. महाराजांना हा किल्ला न लढताच मिळाला.
काही काळ हा किल्ला सिद्दी व नंतर आंग्र्यांकडे होता. १८१८ साली
इंग्रजांनी तो जिंकला.
मंडणगड, पालगड, खेड परिसराचा नकाशा
No comments:
Post a Comment