Tuesday, August 25, 2020

भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी भाग ४ (बाणकोट ते चिपळूण)

बाणकोट : हे रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर-पूर्व टोक. येथील खाडी पार केली, की पलीकडे रायगड जिल्हा चालू होतो. बाणकोटचा उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या शतकात ग्रीक प्रवासी प्लिनी याने मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे; मात्र त्यानंतर याचा उल्लेख १६व्या शतकापर्यंत कोठेही आढळत नाही. १५४८च्या सुमारास हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून त्यास हिंमतगड असे नाव दिले.
 बाणकोट हे जुने बंदर आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाणकोट किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून, समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वारासमोर खाडीच्या पलीकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या, पाण्याचे हौद, भुयार आणि विविध भागांना जोडणारे जिने पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. खालच्या बाजूस बांधलेले ‘आर्थर सीट’ हे स्मारक आर्थर मॅलेट याची पत्नी व मुलीचे आहे.
 
१७९१मध्ये पुण्याचा रेसिडेंट चार्ल्स मॅलेट याचा मुलगा आर्थर मॅलेट महाबळेश्वरला जाण्यासाठी मुंबईहून बोटीने बाणकोटकडे निघाला. बाणकोट येथील खाडीत त्याची पत्नी सोफिया आणि ३२ दिवसांची मुलगी एलेन या दोघी १३ खलाशांसह बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. यास ‘आर्थर सीट’ म्हणून ओळखले जाते. तो महाबळेश्वर येथे गेल्यावर सावित्री नदीच्या उगमस्थानावर बसून बाणकोटच्या दिशेने पत्नीची आठवण जागवत असे. 
आंजर्ल्याचा किनारा
महाबळेश्वरच्या प्रसिद्ध ‘आर्थर सीट’ पॉइंटचे नाव यावरूनच देण्यात आले आहे. पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला ‘हिंमतगड’ असे नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास ‘व्हिक्टोरिया’ असे नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील नऊ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटिशांच्या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले; मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली.
     वेळासपासून जवळच बाणकोट गाव आहे. गावाजवळूनच वाहणारी सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते. नदीचं गोडं पाणी आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळं नदीचं रूपांतर खाडीत झालं आहे. बाणकोट गावाजवळच एका टेकडीवर बाणकोटचा चौकोनी किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास पहिल्या शतकापर्यंत जातो. त्या काळात त्याचं नाव मनगोर किंवा मंदारगिरी असं होतं. त्या काळात बाणकोटची खाडी परदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध होती. देश-विदेशातील व्यापाऱ्यांची गलबतं बाणकोटच्या खाडीत मालाची चढ-उतार करत असत. मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर या किल्ल्याचं नाव हिंमतगड असं ठेवण्यात आलं. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची सुमारे ३०० फूट आहे. हा किल्ला १५४८ मध्ये विजयपूरच्या (विजापूर) आदिलशहाच्या ताब्यात गेला. सन १५४८ ते १६९९ पर्यंत तो पोर्तुगीजांच्या, १६९९ ते १७१३ पर्यंत जंजिऱ्याच्या सिद्दींच्या, १७१३ ते १७५५ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात आणि सन १७५५ ते १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता.
कोकणात मुबलक आढळणाऱ्या जांभा दगडातच या किल्ल्याची तटबंदी आणि आतील बांधकाम करण्यात आलं होतं. किल्ल्याच्या चहूबाजूनं खंदक आहेत. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. उत्तरेकडचा दरवाजा बाणकोटच्या खाडीच्या दिशेनं आणि पश्‍चिम दरवाजा एका पठाराच्या दिशेनं आहे. उत्तरेच्या प्रमुख दरवाजावर पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. थोड्या अंतरावर नगारखाना आहे. पश्‍चिम दरवाजातून बालेकिल्ल्यापर्यंत जाता येतं. बालेकिल्ल्याजवळच एक भुयार आहे. हा बालेकिल्ला जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधला होता. बाणकोटमधलं रामेश्‍वर मंदिर मोरोबादादा फडणवीस यांनी, तर काळभैरवाचं मंदिर नाना फडणवीसांनी बांधलं आहे.
 बाणकोट , मंडणगड परिसराचा नकाशा
आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव. त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. मंडणगडपासून हे गाव १८ किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर रम्य असून, स्मारक परिसरात व वास्तूमध्ये बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.
मंडणगड : मंडणगड गावातील एसटी स्थानकापासून किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. हा रत्नागिरीतील सर्वांत प्राचीन किल्ला आहे. किल्ल्यावर वरपर्यंत वाहन जाण्यासाठी उत्तम डांबरी सडक आहे. राजा भोज याच्या कारकिर्दीत या किल्ल्याची उभारणी (१२व्या शतकात) झाली असावी. किल्ल्यावरील वास्तूंची पडझड झाली आहे. 
 
आजही त्याचे काही अवशेष गडावर दिसून येतात. किल्ल्यावर दोन सुंदर तलाव असून, त्यांच्या भोवती कुलपाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दगड आहेत. तिथे असलेली कबर ही शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सेनानी दर्यावर्दी दौलतखान यांची असावी असे म्हणतात. आठ एकर क्षेत्रावर या किल्ल्याचा विस्तार आहे. मंडणगडला वरंधा घाटातून थेट जाता येते पुणे-शिरवळ-वरंधा-शिवथर मार्गे मुंबई-गोवा महामार्ग चौकातच ओलांडून जाता येते. 
मंडणगडमंडणगड
१६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदाराच्या ताब्यात होता. विशाळगडाच्या लढाईत जसवंतराव आदिलशहाकडून लढत होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवी आपली जहागिरी व मंडणगड सोडून शृंगारपूरला पळून गेला. महाराजांना हा किल्ला न लढताच मिळाला. काही काळ हा किल्ला सिद्दी व नंतर आंग्र्यांकडे होता. १८१८ साली इंग्रजांनी तो जिंकला. 
 मंडणगड, पालगड, खेड परिसराचा नकाशा
श्री केशरनाथशेडवईचे श्री केशरनाथ मंदिर : कोकणात दिवेआगरपासून सिंधुदुर्गापर्यंत विष्णूच्या अनेक मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. अशीच एक मूर्ती श्री केशरनाथ नावाने मंडणगड तालुक्यात शेडवई येथे आहे. हे ठिकाण पर्यटकांपासून दुर्लक्षित आहे. शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी कोकणात अशी भरपूर ठिकाणे आहेत. शेडवईला साडेतीन फूट उंचीची श्री केशरनाथाची अप्रतिम अशी सालंकृत (विष्णुरूप) मूर्ती दिसते. या मूर्तीचा रंग थोडासा हिरवी झाक असलेला आहे. मूर्तिशास्त्रानुसार या मूर्तीच्या हातात पद्म-शंख-चक्र-गदा अशी आयुधे असल्यामुळे ती केशवाची मूर्ती समजली जाते. मूर्तीच्या डाव्या बाजूला लक्ष्मी आहे, तर उजवीकडे गरुडशिल्प दिसते. शेडवई मंदिर परिसर अत्यंत रम्य आहे. भरपूर झाडी, बाजूलाच असलेला बारमाही वाहणारा ओढा, नीरव शांतता आणि इथे आढळणारे विविध जातींचे पक्षी यामुळे वनविहार होतो. 
 
श्री केशरनाथ
पालगड : साने गुरुजी यांचे हे गाव. पालगड हे दापोली तालुक्यातील एक छोटेसे टुमदार गाव आहे. गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पालगड किल्ला आहे. साने गुरुजी यांचा जन्म पालगड येथे झाला. त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळतो. आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. पालगड गावात इ. स. १८९६ साली बांधलेले गणपती मंदिर आहे. हे गाव दापोली तालुक्यात असले, तरी खेडला जवळ आहे.
 
 पालगड’ हे ‘परमपूज्य साने गुरुजी’ यांचे गाव. या गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून साधारण १२००-१५०० मीटर उंचावर असलेला एक छोटेखानी किल्ला आहे. तो म्हणजे ‘पालगड किल्ला.’
ह्या किल्ल्याची प्रथम पायाभरणी कोणाच्या काळात झाली, याबद्दल निश्चित असा ऐतिहासिक पुरावा नाही. पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्याशी जोडलेला होता, अशी शाश्वत माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारताना हर्णे येथील सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी केली, तेव्हा किल्ल्याच्या बांधणीसाठी व रसद पुरवण्यासाठी पालगड आणि मंडणगड किल्ल्याचा उपयोग केला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. (हर्णे ते पालगड अंतर सरळ रस्त्याने जाता सुमारे ४०- ४५ कि.मी. तर आडमार्गे जाता ३०- ३५ कि.मी. आहे.) मंडणगड किल्ल्याचे गडकरी ‘दळवी’ (पालवणीचे) हे किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने ‘बेलोसे व पवार’ कुटुंबात करून त्यांच्याशी सोयरीक जोडली आणि किल्ल्याची व्यवस्था ‘बेलोसे व पवार’ यांजवळ दिली. किल्ल्याचा वापर रसद, शस्त्रसाठा आणि दारूगोळा साठविण्यासाठी होत असावा. कारण किल्ला अतिशय लहान म्हणजे एक ते दीड एकरमध्ये आहे. किल्ल्यावर लढाईच्या फारश्या खाणाखुणा नाहीत. किल्ल्यावर पाच तोफा आढळल्या, त्यातील २ किल्ल्यावर आणि २ किल्ले माचीत आहेत. (माची म्हणजे किल्ल्याभोवतालची जमीन, शत्रूला थोपविण्याची जागा. माची सर झाल्यास शत्रूला किल्ला आरामात ताब्यात घेता येतो.) पालगड किल्ल्याला चार माची आहेत: जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची. या किल्ल्याच्या चारही बाजूला मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील किल्ले माची फक्त खेडच्या बाजूस आहे. इतर तीन दापोलीच्या दिशेने. किल्ल्याकडे जाणारा सोयीचा मार्ग किल्ले माची व राणे माचीतून आहे. किल्ल्यावरील एक तोफ श्री. क्षेत्र परशुराम, चिपळूण येथे आहे, असे सांगण्यात येते. किल्ल्याच्या पायथ्याला जुनी बाजारपेठ आहे. त्यात बारा बलुतेदारांची वस्ती आहे. किल्ल्याखाली हिरवी गर्द देवराई आहे. या देवराईत पालगडची देवी ‘श्री. झोलाई’ हिचे मंदिर आहे.
मंदिराकडून जी किल्ल्याकडे पायवाट जाते, ती अतिशय उंच, निमुळती आणि दोहो बाजूस जंगल व खोल दरी अशाप्रकारची आहे. वर किल्ल्यावर जाण्यासाठी दोनशेच्या आसपास पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोर दोन बुरुज दिसतात. बुरुजाच्या मधून केवळ दोन माणसे प्रवेश करू शकतील एवढा निमुळता दरवाजा आहे. साधारण ८ फूट उंच व ३ फूट रुंद असा दरवाजा दगडी बांधकामात आहे. किल्ल्याला हे एकच प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार उत्तर दिशेस आहे. किल्ल्याची तटबंदी नैसर्गिक डोंगरकडा कापून तयार झाली आहे. नैसर्गिक कड्याच्या वर सुमारे १०-१५ मीटर उंचीची भिंत उभारून तटबंदी तयार केली आहे. ही तटबंदी आज बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे. त्यात किल्ल्याची भिंत काही ठिकाणी निसर्गत: डोंगरकडा सरळसोट कापून तयार केलेली असल्यामुळे त्यावर तटबंदी भिंत उभारण्याची गरज भासली नसावी. किल्ल्याच्या आतील सर्वच इमारती आज कोसळलेल्या आहेत. त्यांच्या पायाचा भागच जुन्या खुणा म्हणून शिल्लक आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस दगड खोदून बांधलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्यावर एकही विहीर नाही. एक भूयारी वाट आहे. ती सध्या भुजलेली असून मंडणगड किल्ल्याकडे जाते, असे म्हटले जाते. नैसर्गिक तटबंदीमुळे किल्ला अतिशय मजबूत आणि सुरक्षित असल्याचे आढळून येते. सरळसोट कापलेला डोंगरकडा शत्रूला चढून वर येण्यास अगदीच अशक्य असल्याचे दिसते. किल्ल्याच्या सुरक्षिततेचा विचार किल्ला बांधतानाच केलेला दिसतो. दोन डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य किल्ला दुरून दिसत नाही. (खेड व दापोली दोन्ही बाजूने) किल्ल्याच्या एका बाजूला टकमक टोकासारखा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला आयताकार डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगराचा आकार पालीसारखा म्हणून किल्ल्याला ‘पालगड’ हे नाव देण्यात आले. (पूर्वी पालील किंवा पालगडात जाताना ‘पालनात जातो’ असे म्हटले जायचे.) एक आख्यायिका अशी की, किल्ल्याचे बांधकाम प्रथम मधल्या डोंगरावर न होता आयताकार डोंगरावर होणार होते, ज्याला रामगड म्हणतात. पण डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि त्यावेळच्या समजुतीनुसार आपण शत्रूपासून भविष्यात कच खाऊ या भावनेला अनुसरून किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली. हा किल्ला खेडचा रसाळगड व मंडणगड किल्ला या दोहोंमधील थांबा किंवा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना व टेहळणीसाठी बांधण्यात आला असावा, असे वाटते. किल्ल्याचा मध्ययुगीन ते ब्रिटीश कालखंडापर्यंतचा पूर्ण इतिहास आढळत नाही. अतिशय त्रोटक असे काही उल्लेख आढळतात. त्यात पहिला बाजीराव आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाली होती, असा एक उल्लेख सापडतो.
संदर्भ
  • रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले – श्री. रघुनाथ रामकृष्णाजी बोरकर
  • गणेश मुंगशे – शिक्षक जि.प.शाळा, पालगड
खेड : हे मुंबई-गोवा महामार्गावरील एक प्रमुख ठिकाण असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलेला हा तालुका आहे. येथील जगबुडी नदीमध्ये गोड्या पाण्यातील मगरींचे अस्तित्व आहे. खेड येथील लेणी प्राचीन असून, बौद्धकालीन शिल्पांशी साम्य असलेली ही लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. लेण्यांचे काम अर्धवट असून, त्यामधे दोन स्तंभ, एक अर्धस्तंभ आणि एक चैत्य आहे. लेण्यांमध्ये तीन कक्ष असून, खूप पूर्वी ही लेणी वाटसरूंसाठी विश्रांतीस्थान म्हणून वापरत असत. रसाळगड, महिपतगड, सुमारगड, पालगड, महिमंडणगड असे अनेक डोंगरी किल्ले जवळपास आहेत. 
कसे जाल खेडला?
खेडला रेल्वे स्टेशन आहे. जवळचा विमानतळ - पुणे १८२ किलोमीटर. मुंबई - २२७ किलोमीटर. खेड हे मुंबई-गोवा महामार्गावरच आहे. भरणा नाक्यावरून खेडला जाण्यासाठी फाटा फुटतो. वरंधा घाट, कुंभार्ली घाट या मार्गांनीही जाता येते. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स येथे आहेत. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जाता येते.
खेडची लेणी
 
  इ. स. २०० ते इ. स. ३०० म्हणजे साधारण १७०० वर्षांपूर्वी या परिसरात बौद्ध वस्ती असल्याच्या खुणा खेडजवळ लेणी सापडल्यामुळे दिसून येतात. मंडणगड परिसरातील मंदिरात असलेल्या मूर्ती शैव व वैष्णव मंदिरातील मूर्ती ८०० वर्षांपूर्वीच्या आहेत. शिलाहार राजवटीनंतर आदिलशाही, त्यानंतर जंजिऱ्याचा सिद्दी, नंतर मराठे, नंतर इंग्रज अशा राजवटी या भागाने पाहिल्या. हा परिसर जणू सह्याद्रीच्या कुशीतच विसावल्यासारखा आहे. बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन होते. लाल माती आणि सदाहरित वृक्षांनी हा प्रदेश खुलून दिसतो. खेड हे जणू दापोलीचे प्रवेशद्वाराच आहे. मुंबई-गोवा महामार्ग येथून जातो. त्यामुळे दळणवळणाची कमतरता नाही. वनसंपदेचे जवळून दर्शन घ्यायचे असेल, तर खेडच्या आसपास असलेल्या सह्याद्री परिसराला भेट द्यायलाच हवी.
सुसेरी : हे खेडजवळ असलेले गाव फारसे परिचित नाही; पण येथे २०० वर्षांपूर्वीचा साठे यांचा एक चौसोपी वाडा आहे. साठे वाईचे होते. यांच्या पूर्वजांनी पेशव्यांकडे दस्त भरून त्या गावाची खोती मिळविली. तेथे त्यांनी भव्य वाडा बांधला. नदीच्या बाजूने वाड्यापर्यंत रस्ता आहे. वाड्याला मोठी दिंडी आहे. वाड्याजवळ पूर्वी पागाही होती. तसेच मोठी विहीरही असून, विहिरीच्या पाण्यापर्यंत जाता येईल, असे भुयारही आहे. वाडा आता पडक्या अवस्थेत आहे. साठे यांचे दोन वाडे होते. त्यातील एक वाडा त्यांनी कालांतराने मोडक यांना विकला. तो वाडा आता अस्तित्वात नाही. हा वाडाही फार दिवस तग धरेल असे वाटत नाही. येथे डागडुगजी करून छान पर्यटनस्थळ होऊ शकेल. नवीन फ्लॅट संस्कृतीत वाढणाऱ्या पिढीला गतवैभवाची ओळख त्यातून होऊ शकेल. 
सवाई माधवराव यांच्या पत्नीचे हे माहेर. या घराण्याचा इतिहासही रोचक आहे. या कुटुंबातील भास्करराव साठे हे पानिपतच्या मोहिमेसाठी विश्वासरावांच्या फौजेसोबत १७६१ साली उत्तरेत गेले. पानिपतच्या पराभवानंतर सैन्याची पांगापांग झाली. साठे जीव मुठीत घेऊन जम्मूजवळच्या रामगड येथे पोहोचले. तिथे महाराज रणजितसिंह यांना भेटले. त्यांच्या आदेशानुसार तेथील शिवमंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक म्हणून राहिले. त्यांच्या पुढच्या पिढ्या मात्र लष्करात रमल्या. महादेवभटांचे नातू सोनूसिंग हे ब्रिटिश फौजेत लेह लडाख सीमेवर लेफ्टनंट होते. त्यांच्या पुढच्या पिढ्या काश्मीरच्या राजाकडे लष्करात तैनात होत्या. त्यांच्यापैकी कर्नल साठे हे पुण्यात असतात. ते उत्सवाच्या निमित्ताने येथे येतात. 
उन्हवरे : या ठिकाणी दाभोळहून, तसेच दापोली-खेड रस्त्यावरूनही जाता येते. हे ठिकाण निसर्गरम्य आहेच; पण ते प्रसिद्ध आहे ते गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यामुळे. या झऱ्याच्या प्रवाहात योग्य रीतीने बांधकाम करून त्याचे पाणी व्यवस्थित पाटाद्वारे तीन कुंडांत खेळविले आहे.
 झऱ्यातून आलेले अतिशय आधण असलेले पाणी अंगावर घेणे शक्य नसते. म्हणून त्याची तीव्रता कमी करून स्नान करता येईल, अशा स्वरूपातील पाणी शेवटच्या कुंडात सोडले आहे. येथे स्नानगृहेदेळी बांधण्यात आली आहेत. 
जगबुडी नदी : दर वर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो. खेड परिसरातील या नदीत मगरींचे वास्तव्य आहे. ही नदी वाशिष्ठी नदीला जाऊन मिळते. 
जगबुडीला मिळणारी नारिंगी नदीही खेडजवळून वाहते.

 खेड परिसराचा नकाशा
रघुवीर घाट : सातारा व महाबळेश्वर या ठिकाणांना खेड-दापोलीशी जोडणारा रघुवीर घाट म्हणजे निसर्गप्रेमींसाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे. पावसाळी पर्यटनाची ओढ असलेल्या पर्यटकांना वेड लावणारा हा घाट काही दिवसांनी गजबजून जाणार आहे. सध्या खेड-उचाट-आकल्पे असा रस्ता वाहतुकीसाठी चालू असून, एसटी व खासगी वाहतूक चालू आहे. घाटाची रुंदी अधिक असणे गरजेचे वाटते. तसेच संरक्षक कठडे मजबूत हवेत. अर्थात अजूनही कामे चालू आहेत. महाबळेश्वरला जोडणारा पूलही पूर्ण झाला आहे. त्यामुळे पोलादपूरऐवजी या घाटातून खेड-दापोलीला जाणे सुलभ होणार आहे.
रघुवीर घाटरघुवीर घाट
कोयनेच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये खेड तालुक्यातील वडगाव, कांदोशी आणि बिरमणी या गावांचा बफर झोनमध्ये समावेश झाला असून, जंगलात श्वापदांचा वावर मुक्तपणे पाहायला मिळतो. रघुवीर घाटाचे काम साधारण १९९०च्या सुमारास चालू झाले. अनेक अडचणींवर मात करून घाटाचे काम चालूच आहे. छोट्या गाड्यांतून हौशी लोक या घाटातून प्रवास करीत आहेत. खोल दरी आणि नागमोडी वळणांच्या या घाटातून प्रवास करताना काळजाचा ठोका चुकतो.
         या घाटातील रस्ता प्रचंड पावसामुळे सतत नादुरुस्त होत असतो. या परिसरातच खेडच्या जगबुडी नदीचा उगम आहे. त्यामुळे येथे पडणाऱ्या पावसाची कल्पना वाचकांना येईलच. या घाटावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. बिजघर येथील ३७५ वर्षांपूर्वीचे पुरातन शंकर-पार्वती-काळकाई-मानाई स्वयंभू देवस्थान, बिजघरचे साईबाबा मंदिर, खोपी येथील श्रीराम मंदिर, पायथ्याच्या बाजूकडे दिसणारे शिरगाव पिंपळवाडी धरणातील पाणी, माथ्यावर घनदाट जंगल, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय, मधुमकरंदगड, फेसाळत येणारे धबधबे असे सगळे चित्र आहे. ऐन पावसाळ्यात येथे मिळणारा ढगातून जाण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. 
               लाल खेकडे हे येथील विशेष आकर्षण आहे. १२ किलोमीटर लांबीच्या या घाटातील प्रवास लक्षात राहील असाच आहे. कोयना जलाशयामुळे संपर्क तुटलेले चकदेव-शिंदी भागातील ग्रामस्थ पूर्वी खेडला येण्यासाठी शिड्यांचा वापर करून खाली येत असत. 
खोपी येथील राम मंदिरखोपी येथील राम मंदिर
खोपी : या गावाच्या पुढेच रघुवीर घाट चालू होतो. या गावात सुंदर राम मंदिर आहे. जवळच्या शिरगावजवळ एक छोटे धरण असून, त्यामुळे या भागाचे सौंदर्य अधिक वाढले आहे. रघुवीर घाटातून याचे विहंगम दृश्य दिसते.
रसाळगड
रसाळगड : हा गड पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. जुना दरवाजा पूर्णपणे उतरवून आता तिथे नवीन दरवाजा बांधला आहे. या उत्तराभिमुख दरवाज्यातून पायऱ्या चढून जाताना वाटेत हनुमानाची मूर्ती दिसते. शौर्याचे प्रतीक असलेला खंजीर या मूर्तीच्या कमरेला असून, मूर्तीच्या ओठावर मिशीदेखील आहे. गडावरील झोलाई मंदिराच्या मागे तटावर ब्रिटिश बनावटीच्या दोन तोफा आहेत. झोलाई मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिरात झोलाई देवी, शिव-पार्वती, भैरव, नवचंडी अशा अनेक मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. मंदिरासमोर भव्य दीपमाळ असून, तेथून पुढे गेल्यावर पूर्व टोकाकडे वैशिष्ट्यपूर्ण असे पाण्याचे टाके आहे. टाक्याजवळ एक तोफ असून टाक्याच्या खांबावर श्री गणेशाची प्रतिमा आणि उत्तम कोरीव काम केलेले आढळते. या खांबांच्या कोरीव कामावरून हे टाके किल्ला बांधायच्या आधीपासून अस्तित्वात असावे असे म्हणतात. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत रसाळगड दुरुस्त केला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. गडावर मोठी लढाई किंवा एखादी ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद नाही. 
 रसाळगड
रसाळगडावरील हनुमानाची मूर्तीरसाळगडावरील हनुमानाची मूर्ती
       पावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हे एक उत्तम ठिकाण आहे. गर्द धुक्याने वेढलेला गड अधिकच सुंदर दिसतो. किल्ला पाच एकरावर पसरलेला आहे. गडाच्या माथ्यावरून पूर्वेकडे सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग, पश्चिमेकडे पालगड, दक्षिणेकडे जगबुडी नदीचे खोरे, मधुमकरंदगड असा परिसर नजरेत भरतो. इथूनच पुढे सुमारगड, महिपतगड अशी सफरही करता येते. 
 रसाळगडावरच्या तोफा
सुमारगड : रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्यभागी असणारा हा किल्ला फक्त ट्रेकर्ससाठीच आहे. आजूबाजूला फक्त जंगलच आहे. मानवी वस्ती आसपास कोठेही नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी व गुहा आहे. गडावर राहण्याची, जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय बारमाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी महिपतगडामार्गे अडीच तास लागतात. 
महिपतगड : ३०९० फूट उंचीवरील हा किल्लाही फक्त ट्रेकर्सनाच जाण्यासारखा आहे. खेड तालुक्याच्या पूर्व बाजूस १८ किलोमीटरवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. यातील उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वांत उंच आणि विस्ताराने मोठा असलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे. तुटलेल्या कड्यामुळे नैसर्गिक तटबंदी झाली आहे. पारेश्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या किल्ल्यातील पठार जंगलाने वेढलेले आहे. 
लोटे : येथे औद्योगिक वसाहत असून, रासायनिक उद्योग आहेत. ‘नोसिल’सारखा कीटकनाशकांचा बहुराष्ट्रीय उद्योगही येथे आहे. ही वसाहत चिपळूणजवळ आहे. 
श्री क्षेत्र परशुराम : सात चिरंजीवांपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरान्त भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे हे प्राचीन मंदिर आहे. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामी’ यांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी,मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे
चिपळूणहून मुंबईकडे जाताना घाटाच्या माथ्यावर श्री परशुरामाचे देवस्थान आहे. महामार्गापासून उजवीकडे देवस्थानाला जाण्यासाठी रस्ता आहे. आदिलशाहीत जीर्णोद्धार केलेले हे मंदिर आहे. खाली उतरतानाच्या जांभ्या दगडांच्या पायऱ्या (पाखाडी) जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत.  जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये आदिलशाही वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचा घुमट या पद्धतीचा आहे.
श्री परशुराम शयनकक्षश्री परशुराम शयनकक्ष
उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या एका बेगमेने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते. ती अशी - एकदा या बेगमेच्या नौका समुद्रात बुडाल्या होत्या. या बेगमेला सागराचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला, की तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिच्या नौका खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागल्या. त्यानंतर परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.
 या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय.या मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे.
श्री परशुराम मंदिराच्या मागील बाजूस परशुरामाची माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो.
  श्रीदेवी रेणुकामाता मंदिर व मंदिराबाहेरचा बाणगंगा तलाव
    रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू,पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ,शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. ५०० ते ९०० असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ,सतींच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन), दुर्मीळ,महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे.'करंजी'च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात,नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो. हा नारळ शिमगोत्सवादरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात.
सवतसडा धबधबासवतसडा धबधबा : चिपळूणपासून पाच किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूसच हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पाऊलवाट आहे. चिपळूण आणि सवतसडा रस्त्यावर पेढे या गावात बघण्यासारखे एक दत्त मंदिरही आहे.
 घाटात  एका ठिकाणी पूर्वेकडे बघितलं तर डोंगराचा आकार अर्धचंद्राकार बनलाय तिथं पावसाळ्यात मोठा धबधबा पडत असतो.त्या धबधब्यामुळेच तो डोंगरकडा अर्धचंद्राकार बनलाय तर पश्चिमेकडे बघितल्यास डोंगराच्या खाली वशिष्ठीनदी समुद्राला मिळताना दिसते. धबधब्याचं नाव सवतसाड्याचा धबधबा का पडलंय ते याची एक रोचक कथा आहे.
    फार फार वर्षापूर्वी चिपळूणच्या कोण्या एका माणसाला दोन बायका होत्या.दिवस निघाला की तो माणुस शेतात कामाला जायचा तर या दोघींना गुरांसाठी गवत चारा कापायला डोंगरात जावं लागे.अशाच एक दिवस दोघीही या धबधब्याजवळ गवत कापायला आल्या होत्या.गवत कापता कापता जेवणाची वेळ झाली तर डोंगरावर धबधब्या काठाशेजारी बसून त्यांनी शिदोरी खाल्ली व पाणी प्यायल्या.थोडावेळ विसावा घ्यावा म्हणून त्या दोघीही कड्याच्या काठावर बसल्या होत्या.बसल्याबसल्या एकीने दुसरीला तिच्या केसांमधील उवा शोधुन मारायला सांगितल्या.ती बाई दुसऱ्या बाईकडे पाठ व धबधब्याच्या काठावरून पश्चिमेला तोंड करून बसली होती.मागची  तिची सवत तिचे केस विंचरत होती. थोड्या वेळानी समोर बसलेल्या स्त्रीच्या मनात विचार आला की आपण असे डोंगराच्या काठावर बसलोय,मागे आपली सवत बसलीये.न जाणो तिने आपल्याला धक्का देऊन लोटून दिलं तर आपण मरून जाऊ व ही बया नवऱ्यासोबत एकटीच संसार करेल. असं होऊ नये म्हणून काय करावं बरं? तिच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागलं.अचानक तिला एक कल्पना सुचली की आपल्या सवतीने आपल्याला लोटलं तर आपण खाली पडू नये म्हणून आपल्या साडीचा पदर तिच्या साडीला बांधावा.कल्पना सुचल्याबरोबर तिने मागे बसलेल्या सवतीच्या नकळत तिच्या साडीच्या पदराला स्वतःच्या पदराची गाठ बांधून टाकली. इकडे मागे बसलेल्या सवतीच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं की ही बाई कड्याच्या काठावर बसली आहे.हिला खाली लोटून दिलं तर मग मी आणि माझा नवरा दोघे सुखानी जगू शकूत.पण तिला तिच्या पदराला सवतीचा पदर बांधलेला आहे हे माहितीच नव्हतं.आणि तिने मनाचा निर्धार करून समोर बसलेल्या सवतीला अचानक धक्का देऊन खाली लोटलं.समोर बसलेली सवत बेसावधपणे कड्यावरून खाली कोसळली  परंतु साडीचा पदर मागच्या बाईच्या पदराला बांधून असल्यामुळे मागच्या सवतीला पण कड्यावरून खाली घेऊनच पडली व त्या दोघींचाही तिथं मृत्यू झाला.त्यामुळे या धबधब्याचं नाव ‘सवतसाड्याचा धबधबा’ पडलं. 
सवतसडा धबधबा
मोरवणे : चिपळूणच्या पश्चिमेस खेर्डीच्या पुढे डाव्या बाजूस मोरवणे या निसर्गरम्य गावात एक वैशिष्ट्यपूर्ण मारुती मंदिर आहे. या मंदिरात ४०० वर्षांपूर्वीची प्रताप मारुतीची, तळहातावर सहज मावेल एवढी अंदाजे तीन इंच रुंद, चार इंच लांब आणि एक इंच जाडीची, छोटीशी, काळ्या, मृदू पाषाणातील लहान मूर्ती आहे. श्री रामदास सांप्रदायिक असलेल्या एका स्वामींनी ही मूर्ती सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...