Tuesday, August 25, 2020

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा (भाग-४ मुक्काम तिबेट)

लिपूलेख खिंडीचा खडतर प्रवास संपवून आम्ही चीनच्या हद्दीत आलो होतो. आता वेध लागले होते ते कैलास-मानसच्या दर्शनाचे आणि परीक्रमांचे.
चीन लष्कराचे काही अधिकारी, हिंदी बोलू शकणारे दोन गाईड व त्यांचे मदतनीस आम्हाला घ्यायला आणि पहिल्या बॅचला सोडायला आले होते. त्यांच्याकडे हातात धरण्यासारखे ध्वनिवर्धक होते. ह्या लहानश्या गोष्टीमुळे त्यांना सगळ्यांना सूचना देणे फार सोपे होत होते.
lipu-1_0.jpg
खिंडीच्या ह्या बाजूलाही सर्वदूर बर्फ पसरले होते. निळेभोर आकाश, शुभ्र धवल बर्फ आणि लाल, निळे, काळे कपडे घालून त्यावरून धडपडत चालणारे पन्नास यात्री. नजरेत साठवून ठेवावं असच दृश्य होत ते! सगळा प्रदेश निष्पर्ण, पण चित्ताकर्षक होता. आजूबाजूला असलेले विस्तीर्ण, तांबूस राखाडी रंगाचे डोंगर लक्ष वेधून घेत होते. काठगोदामला हिमालयातील प्रवास सुरू झाल्यापासून, हिमालयाची वेगवेगळी रूपे दृष्टीस पडत होती. तिबेटमधील लालसर किरमिजी राखाडी रंगाचे उंचच उंच डोंगर हे अजून एक आकर्षक आणि अपरिचित रूप आज दिसत होते.
लीपूलेखचे रौद्र सौंदर्य
lipu-2_0.jpg
दहा मिनिटे चालल्यावर चाळीस-पन्नास फूट खोल दरी येते. ती बघून सगळ्यांच्या उरात धडकी भरली. आधीच कालचे जागरण, लीपूलेखपर्यंतचा सगळ्यात खडतर दमछाक करणारा प्रवास आणि प्रचंड थंडीमुळे सगळे अर्धमेले झाले होते. त्यात ती दरी बघून आणखीनच बेजार झाले. गुढघ्यापर्यंत पाय बर्फात रुतत होते. ज्येष्ठ यात्रींची हालत वाईट झाली होती. त्यांचा सारखा तोल जात होता, पडायची भीती वाटत होती, हातातल्या काठीचा आधार पुरत नव्हता. गेले काही दिवस ज्यांच्या भरवश्यावर यात्रा नीट झाली ते पोर्टर-पोनीवाले मागे राहिले होते. आमच्यातले तरूण-तंदुरुस्त यात्री सगळ्यांना जमेल ती सगळी मदत करत होते.
lipu-3.jpg
आमचे गाईड व त्यांचे मदतनीस ह्याच भागातले होते. त्यांना बर्फात चालायची सवय होती. त्यांना परिस्थिती लक्षात आल्याबरोबर त्यांनी महिला, जेष्ठ नागरिकांचे हात धरून त्यांना अगदी नीटपणे उतरवायला सुरवात केली. व्यावसायिक सफाईने यात्रींशी गप्पा मारून ते त्यांच्या मनावरचा ताण कमी करत होते.
lipu-4.jpg
मी दोन वर्षांमागे हिमालयात ‘सार पास’ च्या ट्रेकला गेले होते. तिथे बऱ्याच वेळा अशी बर्फाची घसरगुंडी करायला लागते. सुरक्षित उतार दिसल्यावर आम्ही बरेच जण घसरत घसरत आलो. मस्त मज्जा आली. बर्फाचे गोळेही एकमेकांना मारून झाले! दुरुनच यात्रीन्साठी असलेल्या जीपगाड्या दिसल्यावर आजची पायपीट संपल्याच जाणवल. ह्या चार चाकांवर चालणाऱ्या यंत्राशी बऱ्याच दिवसांनी भेट होत होती! आपण पाय न हलवतासुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, हा चमत्कारच वाटत होता!
lipu-6_0.jpg
लगेचच आम्ही आमच्या बसपाशी पोचलो. आमच मोठ सामान टपावर चढवून त्यावर ताडपत्री आवळली गेली. सगळे जागा पकडून बसले आणि ‘जेकारे वीर बजरंगी, हर हर महादेवा,’ बोलो ‘ओम नमः शिवाय,’ ह्या गजरात बसप्रवास सुरू झाला.
माझ्याकडे असलेल्या श्री.मोहन बने ह्याच्या पुस्तकाप्रमाणे आणि विदेश मंत्रालयाच्या माहितीपुस्तकाप्रमाणे हा रस्ता अतिशय खराब, हाड आणि हाड खिळखिळ करणारा होता. मी आणि नंदिनी ह्या अपेक्षेने सीटच्या समोरची दांडी घट्ट पकडून बसलो. पण काय आश्चर्य! तसल काही झालच नाही! हाडांचाच काय, हातात धरलेला खुळखुळासुद्द्धा वाजणार नाही, इतका छान गुळगुळीत रस्ता होता.
डोंगरदऱ्यांतून थोडा वेळ प्रवास केल्यावर सपाट प्रदेश आला. दूरवर छोटी छोटी कुरणे, शेती आणि घरे-माणसे दिसायला लागली. घरे जुनाट मातीने माखलेली, बसकी पण बंदिस्त वाटत होती. खिडक्यांना वेगळ्याच प्रकारे सुशोभित केले होते.
lipu-5_0.jpgतिबेटमध्ये स्वागत!
थोड्या वेळात चीन सरकारचे कस्टम ऑफिस आले. तिथे आमचे सगळे सामान क्ष-किरण यंत्रातून तपासले गेले. एखाद-दुसऱ्या यात्रीचे सामान बाहेर काढून तपासले गेले. तिथेच सर्व यात्रींची अंगातल्या तापासाठी तपासणी झाली. ती जरा मजेदार होती. प्रत्येकाला एका ठिकाणी उभ करत होते. आमच्या पायात बूट, दोन दोन मोज्यांचे जोड होते. एवढ्या आवरणातून ताप कसा मोजला असेल देव जाणे!
हे सगळे सोपस्कार उरकेपर्यंत एक एकदम ‘ब्रेकिंग न्यूज’ आली. प्रत्येक बॅचचा चीनचा ‘ग्रुप व्हिसा’ दिल्लीत होतो. त्याची मूळ प्रत एल.ओ.सरांकडे आणि प्रती प्रत्येक यात्रींकडे असतात. आमच्या एल.ओ.सरांकडे ही प्रतच नव्हती!! ते सगळ्यांना त्यांच्या कडची प्रत बघायला सांगत होते. त्यांना वाटत होत की चुकून मूळ प्रत कोणाला दिली गेली आहे की काय? मी आणि नंदिनी फार म्हणजे फार हुषार! आम्ही आमच्या प्रती दिल्लीत जमा केलेल्या सामानात ठेवून दिल्या होत्या. आता काय होणार आम्हाला काळजी वाटायला लागली. नंदिनी तर म्हणाली, ‘ बहुतेक आपली यात्रेच्या इतिहासातली पहिली बॅच होणार, जी बॅच तीबेटमध्ये आली. बारा दिवस तकलाकोटला राहिली आणि परत गेली. व्हिसा नसल्याने परिक्रमा नाहीच!!’
कस्टमनंतर परत बसमध्ये बसून तासभर प्रवास केल्यावर कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून आम्ही तकलाकोटला पोचलो. तकलाकोट हे पश्चिम तिबेटमधील पहिले मोठे शहरवजा गाव आहे. कदाचीत भारताच्या सीमेवरचे पहिले मोठे गाव असल्यामूळे असेल पण तिथे सरकारी कचेऱ्या, हॉस्पिटल्स, बँका, पोस्ट ऑफिसच्या मोठ्या आणि आधुनिक इमारती दिसत होत्या. रस्ते अगदी प्रशस्त होते.
tkot-3.jpgtkot-4.jpgतकलाकोटचे सुंदर रस्ते
आमच्या राहण्याच्या जागी बस पोचल्यावर बसमध्ये परत एकदा शिवशंकराचा जोरदार जयजयकार झाला. नबीढांगला अपरात्री सुरू झालेला प्रवास तकलाकोटच्या हॉटेलमध्ये संपला होता. प्रत्येक खोलीत दोन यात्री अशी व्यवस्था होती. मला आणि नंदिनीला एक खोली मिळाली. ती खोली अगदी सुसज्ज होती. टॉयलेट, पलंग सगळ काही होत. आम्ही दोघींनी आमच सगळ सामान पसरून लवकरच त्या खोलीला धर्मशाळेची कळा आणली! कालपासूनच्या प्रवासाचा शीण आता जाणवत होता. बर्फात, पाण्यात भिजलेले दमट कपडे नको झाले होते. गरम गरम पाण्याने मस्त अंघोळी करून आम्ही ताणून झोपलो.
संध्याकाळी बाहेर चक्कर मारायला म्हणून निघालो तर दारात पोलिसांनी अडवल. ‘व्हिसाचा प्रश्न सुटल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही,’ अस जरा जोरातच बजावल. सुदैवाने आतच फोनची सोय होती. तिथेच गुपचूप थोड्या डॉलरचे युआनमध्ये धर्मांतर करून घेतले आणि घरी पोचल्याचा फोन केला.
दिनांक २१ जून २०११ (तकलाकोट मुक्काम)
चीनच्या आणि भारताच्या वेळेत अडीच तासांचा फरक आहे. दुसऱ्या दिवशी उठताना सगळे ‘माउंटन लॅग’ मुळे (मग, आम्हाला जेट लॅग कसा येणार ना?) पहाटेपासून उठून बसले होते. चहाप्रेमी लोक सारखे किचनकडे खेपा मारत होते, पण तिथे शुकशुकाट होता. मी कट्टर कॉफीपंथीय! अश्या अडनेड्या जागी कॉफीची सोय होणार नाही, हे गृहीत धरलेल असत. चहावाल्यांची पंचाईत बघून मला गंमत वाटत होती.
बऱ्याच वेळानी सर्वांना चहा-नाश्ता मिळाला. तेव्हाच आम्ही फिरायला बाहेर जाऊ शकतो, अस सांगितल्यामुळे सगळ्यांना हुश्य झाल. हा व्हिसा फक्त परिक्रमा मार्गापूरता मर्यादित असतो त्यामुळे अर्थातच तकलाकोटच्या बाहेर जायला परवानगी नव्हती. आम्ही १०-१२ जण उत्साहाने बाहेर पडलो.
tkot-5.jpgतकलाकोटच्या सौर्य चुली: सतत चहा उकळतोय
तकलाकोटच्या रुंद, प्रशस्त रस्त्यांवरून रमतगमत चालताना मजा येत होती. भाजी बाजार, निरनिराळी दुकान सगळ फिरलो. एका दुकानावर सलमान खानला चिकटवला होता. मानसचे पवित्र तीर्थ आणण्यासाठी बऱ्याच जणांनी प्लास्टिक कॅन घेतले.
tkot-7.jpg
रस्त्यावर पूलची टेबल्स ठेवलेली होती. तिथले तिबेटी तरूण कामाचा वेळ दारू पीत, पूल खेळत वाया घालवीत होते. इथे सगळीकडे पाण्याच्या बाटलीपेक्षा बीअरची बाटली स्वस्त. तिबेटची संस्कृती नष्ट करण्याचे हे पद्धतशीर प्रयत्न आहेत की काय, अस वाटत होत. मानसिकदृष्ट्या उध्वस्त, बेकारीमुळे वैफल्यग्रस्त लोकांच्या मनावर ताबा मिळवणे सोप असणार. तिथे पोस्ट, बँका सगळीकडे चीनी व्यक्तीच कामाला होत्या. त्यांचे कपडे, गणवेश आधुनिक, रुबाबदार होते. तिबेटी लोक मात्र कश्यातरी कपड्यात होते. तिबेटी किंवा चीनी लोकांशी बोलताना ‘दलाई लामा’ ह्या विषयी तिथे चकार शब्द काढू नका, अशी तंबी आम्हाला भारतात दिलेली होती.
तकलाकोटची तरुणाई
tkot-12.jpgतकलाकोटचा छोटा नागरिक
tkot-6.jpg
बराच वेळ फिरून, फोटो काढून, भरपूर खिद्ळून आम्ही जेवायच्या वेळेला परत आलो. बघतो तर काय, सगळ्या यात्रींनी आज स्वैपाकघर ताब्यात घेतल होत. भारतात कुमाऊ निगम आणि आय.टी.बी.पी. वाल्यांनी आमचे फारच खातिरदारी केली होती. चीनमध्ये इतके लाड कोण करणार? तकलाकोटला निदान ते जेवण-खाण पुरवतात. पुढे परिक्रमेत यात्रींना आपली सोय करावी लागते. तिथे यात्रींना कांदा-लसूण नसलेलं जेवण देतात. इथे आमच्यासाठी जरी शाकाहारी बेत असला, तरी एरवी किचन चिन्यांच्या ताब्यात होत, तेव्हा ते काय काय शिजवत असतील कोण जाणे?
आमच चीनी जेवण
tkot-11.jpgtkot-2.jpg
जेवण देत होते तेसुद्धा भात, सूप, न्युडल्स अस. ज्यांनी कधीच चायनीज जेवणाची चव घेतली नव्हती, त्या लोकांची फारच पंचाईत होत होती. किचनमधली स्वच्छता अशीतशीच होती. आमच्यातल्या कट्टर शाकाहारी लोकांना काही ते सहन होईना. त्यांनी चक्क भाजी, भात, पोळ्या करायचा बेत केला होता.
सार्वजनिक स्वैपाक
tkot-8.jpgtkot-9.jpg
‘काय मेला हा बायकांचा जन्म! कुठेही जा, पोळपाट-लाटण काही सुटत नाही!’ अस म्हणून मी पोळ्यांना भिडले. सगळे मिळून काम करत होतो, त्यामुळे मजा आली.
tkot-10.jpgtkot-1.jpg
जेवण झाल्यावर चीन सरकारचे ७५० डॉलर्सचे देणे दिले. परिक्रमांसाठी पोर्टर, पोनीवाला आणि वरखर्चाला लागणारे यूआन घेण्याचे काम केले.
पुढच्या कॅम्पवर पूर्ण बॅचची राहण्याची सोय होऊ शकत नाही. मग मोठ्या बॅचेसना दोन ग्रूपमध्ये विभागतात. आता सगळ्या बॅचची छान एकी झाली होती. ताटातूट नको होती. नारंग सरांच्या मध्यस्तीने आणि ५० जणांचीच बॅच असल्याने, सगळ्या ग्रुपने एकत्र परिक्रमा करायच्या ठरल्या. त्या आनंदात झोपलो.
दिनांक २२ जून २०११ (तकलाकोट ते दारचेन)
सकाळी सगळे लवकर उठून नाश्ता आटोपून वेळेवर बसमध्ये जाऊन बसले. आयुष्यात कधीतरीच येणाऱ्या अनुभवाला आपण सामोरे जाणार आहोत, ही उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. १९ वर्षांच्या आयुष् पासून ७०च्या तलेरा अंकलपर्यंत सगळ्यानाच हुरहूर लागली होती. कैलासची परिक्रमा कशी होईल? पुढचा प्रवास झेपेल का? डोल्मापासची १९,५०० फुटांची चढण आपण पार करू शकू ना? विरळ हवेचा त्रास होऊन काही वाईट परिस्थिती उद्भवली तर? असे असंख्य विचार मनात येत होते.
बसच्या काचेतून सगळे बाहेर बघत होते. तिथले ते काहीसे उजाड पण अत्यंत सुंदर दृश्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून घेत होते. तेवढ्यात बाहेर गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा, खूप उंचच उंच शुभ्रधवल पर्वत सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकताना दिसला. तो गुर्लामांधाता पर्वत असल्याचे आमचा गाईड टेम्पाने सांगितले. तिबेटी राजा मांधाता ह्याने मानससरोवराचा शोध लावून तिथे शंकराची तपश्चर्या केली, म्हणून त्या पर्वताला गुर्लामांधाता पर्वत म्हणतात, असे कळले. हा पर्वत २५००० फूट उंच आहे.
drchn-1.jpgगुर्लामांधाता पर्वत
हे अवर्णनीय दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही, तोच दूर क्षितिजापर्यंत पसरलेला निळ्याशार पाण्याचा प्रचंड जलाशय दिसू लागला. आम्हाला वाटल की हेच ‘मानस सरोवर’, पण हा होता राक्षसताल!
राक्षसताल
rksh tal-1.jpgrksh tal-2.jpg
बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या नीलमण्यासारखा चमकणारा राक्षसताल अप्रतीम सुंदर दिसत होता. हा प्रचंड तलाव रावणाच्या हृदयापासून झाला अस म्हणतात. ह्याचे पाणी मानससरोवरापेक्षा थंड आहे. म्हणून ह्याला ‘रावणहृदय’ आणि ‘अनुतप्त’ अशीही नाव आहेत. राक्षसतालचे पाणी विषारी आहे, असा समज आहे. त्यामुळे इथले पाणी पीत नाहीत किंवा इथे स्नानाची प्रथा नाही. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे हे पाणी मानसिक रोगांवर उपयोगी असते. तसे असेल तर, भारत सरकारने हे पाणी पाईपने सरळ मनोरुग्णालयाला पोचवायला हरकत नाही!!
राक्षसतालच्या काठावर आणि इतर अनेक ठिकाणी दगडांवर दगड ठेवून घर बांधलेली दिसतात. इथे अस घर बांधल तर आपल घर होत अस समजतात. मी आणि नंदिनी दोघी वास्तूविशारद. त्यामुळे आम्ही आमच्यासाठीच नाही, तर आमच्या क्लाएंटसाठीही घर बांधली.
rksh tal-3.jpgराक्षसतालच्या सौंदर्याने स्तब्ध झालेले यात्री
rksh tal-4.jpgप्रार्थना ध्वज
rksh tal-5.jpg
राक्षसतालच्या काठाशी त्या नितांत सुंदर पाण्याकडे बघत शांत बसून राहावेसे वाटत होते. पण आमचे गाईड घाई करायला लागल्यावर बसमध्ये बसलो. कैलास पर्वताचे दर्शन अजून झाले अव्हते. अनुभवी यात्रींनी आम्हाला कैलासची दिशा दाखवली. सगळे नजर ताणून तिकडे बघत होते. पण अजून ढगांचा पडदा होता. आमच्या सुदैवाने हळूहळू तो पडदा हालला! काही वेळातच कैलास पर्वताचे सुरेख दर्शन होऊ लागले! माझा तर डोळ्यांवर विश्वास बसेना. ह्याच कैलास पर्वताचे कितीतरी फोटो, व्हिडिओ मी बघितले होते. ह्पापल्यासारखी यात्रेवरची जी माहिती, पुस्तक मिळतील ती वाचली होती. तो कैलास पर्वत मी खरच बघत होते?
महाकैलासाचे प्रथम दर्शन
kailas-1_0.jpgkailas-3_0.jpg
सर्व यात्रींनी मनापासून हात जोडले. पहिल्याच दिवशी उत्तम दर्शन झाल्यामुळे आता परीक्रमाही नीट होईल अशी उभारी वाटू लागली.
राक्षसताल आणि कैलास पर्वताच्या दर्शनाची धुंदी उतरण्याआधीच आम्ही मानस सरोवराजवळ पोचलो. बरेचसे यात्री लगेचच स्नानाला पाण्यात उतरले. तिथे कपडे बदलण्याची काहीच सोय नव्हती. पुढे परिक्रमेत तीन-चार दिवस मानसच्या काठाशी रहायचं होतच. तेव्हा करू अंघोळ, असा विचार करून मी आणि नंदिनी काठाकाठाने फिरू लागलो. नितांत सुंदर सरोवर आणि निरव शांतता. आम्ही एकमेकांशीही बोलत नव्हतो.
मानस सरोवराचे प्रथम दर्शन
manas-2.jpgmanas-3.jpg
मानस सरोवर समुद्रसपाटीपासून १५००० फूट उंचीवर आहे. हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे गोड्या पाण्याचे मानससरोवर हिंदूंचे तसेच तिबेटी लोकांचे पवित्र तीर्थस्थान आहे. ह्यात अंघोळ केल्याने गेल्या १०० जन्मांची पापे नष्ट होतात व माणूस जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमधून मुक्त होतो, असे समजले जाते.
manas-1.jpg
हे सगळ खर असल, तरी चीनी लोकांसाठी मात्र हे फक्त एक सहलीचे ठिकाण असावे, ह्याचा पुरावा काठावर पडलेल्या बीअरच्या बाटल्यांच्या खचावरून मिळत होता.
manas-4.jpg
सर्वांची स्नान-पूजा आटोपल्यावर आम्ही सगळे दारचेनच्या रस्त्याला लागलो आणि थोड्या वेळात तिथे पोचलोही. तकलाकोटचा कॅम्प तर छान होता. दारचेनचा तेवढा छान नाही, पण फार वाईटही नव्हता.
एकेका खोलीत तीन-चार यात्रींची सोय सगळ्यांनी समजुतीने करून घेतली. राहण्याची जागा नवीन बांधलेली दिसत होती. प्लास्टरचा ओला वास येत होता. नेपाळमार्गे किंवा भारतातून, कुठूनही यात्रेसाठी आलात, तरी दारचेनपासूनचा पुढचा रस्ता एकच असतो. त्यामुळे यात्रींच्या नव्या हंगामाआधी बांधकाम भराभर संपवलेल दिसत होत. कुठल्याही प्रकारच नुकसान झाल्यास भरून द्याव लागेल, अशी सज्जड तंबी मिळाली होती. एका यात्रींनी त्यांची खिडकी ‘युवान’ मध्ये फोडल्यामुळे, चीनमध्ये काचांचा व कामगारांचा खर्च किती आहे, हे सगळ्यांना नीट आणि सुस्पष्ट कळल! बाकी कोणी नंतर खिडक्यांना हात लावायचीही हिंमत केली नाही.
बाहेर फोन करायला गेलो, तर काय! बाहेर तिबेटी तुळशीबाग भरली होती. बऱ्याच तिबेटी बायका आपल्या पारंपारिक वेषात आल्या होत्या. सगळ्यांजवळ मण्यांच्या माळा, चाकू आणि इतर तिबेटी वस्तू होत्या. भाषेचा मोठा प्रश्न होता. पण सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर होते. त्यावर ती आक्का लिहायची ‘१००’, लोक लगेच ‘३०’ पुन्हा आक्का ‘९५’! शेवटी सौदा ५० युआनवर तुटायचा!
दारचेनचा तिबेटी बाजार
darchen-3.jpgतिबेटी लेकरे
darchen-4.jpgdarchen-5.jpgविक्रीकौशल्य
darchen-6.jpg
darchen-7.jpg
ह्या कॅम्प पासून जेवणाची व्यवस्था यात्रींना आपली आपण करावी लागते. त्या साठी लागणारा कोरडा शिधा , दिल्लीतल्या काही स्वयंसेवी संस्था नाममात्र किमतीला देतात. भाजी वगैरे तकलाकोटला खरेदी केली होती. दोन नेपाळी स्वैपाकी आणि दोन मदतनीस बरोबर घेतले होते.
दिल्लीत यात्रींच्या वेगवेगळ्या समित्या करतात. त्यात किचन कमिटी, लगेज कमिटी, हिशेब कमिटी असे प्रकार होते. लगेज कमिटीवाला रोहन सामानाचे नग मोजून द्यायचा व घ्यायचा. सगळ्यांकडून काही रक्कम सामायिक खर्चासाठी घेतली होती. त्यात भाज्या फळांची खरेदी, स्वैपाकी इत्यादींचे पगार, व्यवस्थेतील लोकांची बक्षिसी व्हायची. ते हिशेब ठेवायचं काम, हिशेब कमिटीकडे होत. किचन कमिटीवाले, स्वैपाकाला लागणारा शिधा काढून देणे ह्या कामात असतात. (मी, नंदिनी ‘उनाड कमिटीत’ होतो. एकट्या आलेल्या बायकांना कुठलही काम सांगण, पब्लिकला आवडत नव्हत! उत्तम! आम्ही उनाडक्या करायला मोकळ्या!)
पहिल्याच दिवसापासून आमच्या स्वैपाक्याने आपले रंग दाखवायला सुरवात केली. पुढे तकलाकोटला परत येईपर्यंत त्याने कधी हळद जास्त, कधी तिखट जास्त. रोज वेगळी चव! आजची कल्पना तो उद्याला वापरत नसे. एकूण सगळ्या अवधीतल्या त्याच्या स्वैपाकाची बेरीज केली तर स्वैपाक उत्तम होता. पण रोजचा स्वैपाक ‘कभी जादा, कभी कम’ ह्या तत्वावर असायचा.
आमच्या खोल्यांना पडदे नव्हते. आता अमावास्या जवळ येत होती. रात्री खिडकीतून बाहेर बघितल की अक्षरशः आभाळात चांदण्याचा सडा पडल्यासारखा वाटत होता. इतकी स्वच्छ हवा, निरभ्र आकाश आणि सुरेख चांदण! हात लांबवला तरी चांदण्या हाताला येतील अस वाटत होत. आम्ही कितीतरी उशिरापर्यंत भान हरपून ते दृश्य पाहात होतो! पुण्याहून निघाल्यापासून आत्तापर्यंतचे वाटणारा एकटेपणा, मुलाला सोडून आल्याची बोच सगळ सगळ ह्या चांदण्याचा शांत प्रकाशात पार विरघळून गेल!!

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...