Tuesday, August 25, 2020

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा –भाग ९ (गाला ते पुणे!)

दिनांक ६ जुलै २०११ (गाला ते धारचुला)
९ जूनला मी घर सोडल. तेव्हापासून दिल्लीतील मेडीकल, भारतातील प्रवास, दोन्ही परिक्रमा, परतीचा भारतातील प्रवास आणि शेवटचा म्हणजे दिल्ली ते घर हा प्रवास असे महत्त्वाचे टप्पे डोळ्यासमोर दिसत होते. आज चालण्याचा शेवटचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा संपणार होता.
आमच्या ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आजचा मुक्काम ‘सिरखा’ ह्या कॅम्पला होता. पण नारंग सरांनी बरीच खटपट करून आजच धारचुलाला जायच नक्की केल होत. आमच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ही कल्पना आजिबात आवडली नव्हती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जाताना जे अंतर आम्ही आठवड्यात पार केले होते, तेच अंतर आता आम्ही चार दिवसात पार करणार होतो. खेचरांचा तेवढा वेग नसतो, अशी कुरकुर चालू होती. यात्रींना मात्र एक दिवस लवकर पोचता येईल तर बरच, अस वाटत होत.
आमचे मदतनीस पोर्टर एका निवांत क्षणी
9-gd-porters.jpg
सध्या मात्र २० किलोमीटर चालण्याकडे लक्ष देण भाग होत. आता पायाला आलेले फोड चांगले अक्राळविक्राळ झाले होते. चालताना नेमका तिथे दगड टोचला की मरणाच्या वेदना होत होत्या. पण मला साधारणपणे प्रत्येक ट्रेकला हा त्रास होतोच. त्यामुळे त्याबद्दलची मानसिक तयारी चांगली होती.
कॅम्पवर चहा-पाणी उरकून आम्ही निघालो. थोड अंतर चालत नाही, तर सर्वात पुढे चालणाऱ्या यात्रींच्या अगदी डोळ्यासमोर डोंगराचा काही भाग मोठा आवाज करत धाडकन कोसळला. सगळे जण हादरलेच. आपण घरी असताना ‘दरड कोसळली’ अश्या बातम्या ऐकत असतो. पण प्रत्यक्ष पहिल्याशिवाय त्यातली भयानकता समजत नाही.
आमच्या डोळ्यादेखत कोसळलेली दरड
9-gd-land1.jpg9-gd-land2.jpg
त्या ढिगाऱ्याच्या बाजूने हळूहळू आम्ही पुढे निघालो. आता अगदी अरुंद असा खडकाळ रस्ता उतरायचा होता. आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे तो रस्ता निसरडा झाला होता. एक-एक पाउल मोजून-मापून टाकत तोल सांभाळून चालणे म्हणजे एक दिव्यच होते.
डाव्या बाजूला शुभ्रदुधाळ सिमखोला नदीचा प्रचंड खळखळाट करणारा प्रवाह दिसत होता. आम्ही ह्या रस्त्यावरून गेलो तेव्हा ह्या नदीला जवळपास काहीच पाणी नव्हते. आम्ही प्रवाहातल्या खडकांवरूनच नदी आरामात पार केली होती. मध्यंतरीच्या काळात झालेल्या पावसाने ती दुथडी भरून वाहत होती.
अरुंद आणि भीतीदायक अश्या पुलावरून नदी पार करायची कसरत बूट ओले न होऊ देता तोल सावरत करायची होती! अवघडच होते! पाठोपाठ येणारा यात्रींचा जथ्था इथे येऊन अडकला. त्या गडबडीत सुरेशने मला पटकन पुढे काढले आणि यशस्वीरित्या तो डगमगता पूल पार करून आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.
सिमखोला नदीवरचा भयप्रद पूल
9-gd-bridge1.jpg9-gd-bridge2.jpg9-gd-bridge3.jpg
आता रुंगलिंग टॉपची चढण चढायची होती. माझ्या आठवणीप्रमाणे ही शेवटची मोठी चढाई होती. नंतरचा रस्ता तसा साधा-सरळ होता. अर्थात मला दमून थांबायला २०-२५ फुटांची चढणही पुष्कळ होते!! मनाने कितीही ठरवल की आता थांबायचं नाही, चालतच रहायच, तरी छातीचा भाता झाला, की पाय आपोआपच थांबतात.
कुठल्यातरी दुष्ट माणसाने कुठलीतरी भयानक जादू करून ती चढाई आम्ही आलो, त्यापेक्षा दुप्पट करून ठेवली होती. भरीत भर म्हणून पावसाची भुरभूर चालू होती. आता मात्र मी खरोखर दमले होते. पाय, गुढघे, मांड्या सगळ ठणकत होत. पाठीवर ओझ नसल तरी चालताना वाट लागत होती. पण घोड्यावर बसायचं नाही, हा निश्चय शेवटच्या दिवशी मोडायला जीवावर येत होत. त्यामुळे तशीच जिद्दीने चालत राहिले. फार कठीण रस्ता आला, की सुरेश न सांगता हात धरायचा. अस जवळपास जगाच्या अंतापर्यंत चालल्यावर एकदाचा तो रुंगलिंग टॉप आला.
चढ संपल्यावरचा विसावा
9-gd-rtop1.jpg9-gd-rtop2.jpg
पाच मिनिटे तिथे बसून राहिले. मी चढत असताना कितीतरी चालणारे किंवा घोड्यावरचे यात्री पुढे गेले होते.
9-gd-yatree.jpg
त्यांना गाठण्यासाठी वेग वाढवणे माझ्या शक्तीबाहेरच काम होत. जवळच पाणी पिऊन जरा हुशारी आल्यावर मी पुन्हा चालायला तयार झाले. आता प्राण कंठाशी येईपर्यंत चढल्यावर अर्थातच प्रचंड उतार होता. ट्रेकिंगमधला हा फार त्रासदायक भाग असतो. धाप लागेपर्यंत चढा आणि गुडघे दुखेपर्यंत उतरा. संपूर्ण परीक्षेत हे दोनच आणि तेही अनिवार्य प्रश्न असतात!!
9-gd-scene1.jpg
आताचा उतार जोरदारच होता. सुरेशने माझा हात घट्ट पकडला, आणि आम्ही उतरायला लागलो. वाट अरुंद असल्याने तो बिचारा चिखलात पाय बरबटून घेत होता, आणि मी त्यातल्या त्यात बऱ्या रस्त्याने चालत होते. भराभर आम्ही खालच्या उंचीवर येत होतो. उतरता उतरता आमची नाश्त्याची जागा आली. जन्मसावित्री छोले आणि पुरी ह्याचा समाचार घेऊन पंधरा मिनिटातच पुढे निघालो. (मला आता ‘वरण भात, मेथीची भाजी, वैशालीची इडली-सांबार आणि कॉफी, भेळ-पाणीपुरी अश्या असंख्य पदार्थांची जोरदार स्वप्न पडत होती.)
आता माझ्या चालण्याच्या शक्तीचा अंत होऊन त्यावर काही किलोमीटर झाले होते. छोटासा चढसुद्धा प्रचंड वाटत होता. सिरखा कॅम्प काही अजून दृष्टीपथात येत नव्हता. सुरेशला मी सगळ्यात जास्त वेळा ‘ अभी कितना चलना है?’ हा माझा अतिशय आवडता आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आजच विचारला असेल. तो शांतपणे ‘ अब थोडाही बच गया| आरामसे चलो|’ अशी समजूत घालत राहायचा! पहिल्या दिवशी अगदी ताठपणे तरातरा चालणारे बहुतेक यात्री एव्हाना ढेपाळले होते.
धुक्यात हरवलेला सिरखा कॅम्प
9-gd-camp.jpg
असच कसबस चालताना अचानक समोर कॅम्प दिसला! माझा विश्वासच बसेना. पाऊस नव्हता पण हवेत धुकं होत. त्या हवेत तो कॅम्प मला आणखीनच स्वप्नवत वाटला. जेवण तयार होत. सर्वांनी त्या गार हवेत गरमगरम जेवणावर ताव मारला. येताना आम्ही नारायण आश्रमापासून चालायला सुरवात केली होती. त्या रस्त्यावर दरड कोसळल्याने तो रस्ता बंद होता. ‘सोसा’ नावाच्या दुसऱ्या गावापासून जीपची सोय होऊ शकते, असा निरोप नारंग सरांना आला होता. पण त्याही रस्त्यावर काही अडचण आहे, अशी बातमी ‘पोर्टर टाइम्स’ मध्ये आली होती.
यात्रींचे स्वागत करताना गावकरी
9-gd-swagat.jpg
शेवटी जाऊन बघू, नाहीच जमल, तर परत सिरखा कॅम्पला येऊन मुक्काम करू, असा सगळ्या बॅचने निर्णय घेतला. सगळे पुन्हा चालायला लागले. हवा चांगल्यापैकी सुधारली होती. माझा पोनीवाला रमेश सिरखा गावातला होता. मी तशीही घोड्यावर बसणार नव्हते, मग त्याची वरात ‘सोसा’ पर्यंत कशाला, अश्या विचाराने मी त्याला तिथेच त्याचे पैसे, काही कपडे आणि त्याच्या मुलांसाठी खाऊ देऊन निरोप दिला. यात्रेतले एक-एक बंध आता संपत चालले, ह्या विचाराने डोळ्यात पाणी येत होत. ‘दिदी ठीकसे घर जाना, अगले टाइम बेटेको लेके आना’ असा आपुलकीचा निरोप घेऊन आणि त्याचा चहाचा प्रेमळ आग्रह कसाबसा नाकारून मी पुढे निघाले.
9-gd-sosa3.jpg9-gd-sosa1.JPG
तासभर चालल्यावर सोसा गाव दिसायला लागल. ‘क्युबीस्ट’ पद्धतीच चित्र असाव, अस ते गाव दिसत होत. आमच्यातल्या बऱ्याच जणांना परत त्या कृत्रिम, धावपळीच्या जगात न जाता इथेच ह्या खेड्यात शांत-निरामय आयुष्य जगाव, असा मोह होत होता.
एका जागेवरून आमचा जीप पॉइंट दिसायला लागला.
9-gd-sosa4.jpg
चालण्याचा शेवट अगदी दृष्टीपथात आला. खरच का मी इतका प्रवास केला? माझा माझ्यावर विश्वास बसेना. शारीरिक ताकद खरतर केव्हाच संपली होती. मनाच्या ताकदीवर केवढातरी प्रवास झाला.
पहाडी लोक
9-gd-face1.jpg9-gd-face2.jpg9-gd-face3.jpg9-gd-face4.jpg
उतारावरून भराभर उतरत लगेचच आम्ही सोसा गावात पोचलो. सगळे अगदी उत्साहात होते. काही यात्री जीपमध्ये बसून आधीच रवाना झाले होते. नारंग सर जश्या जीप येतील, तसे यात्री पुढे पाठवत होते.
चालणे संपले!!
9-gd-sosa2.JPG
आता माझ्याबरोबर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया’ अश्या सोबत्याचा, सुरेशचा निरोप घेण्याची वेळ आली. त्यालाही पैसे, कपडे, खाऊ दिला. माझी यात्रा नीटपणे होण्यात त्याचा फार मोठा वाटा होता.
हिमालयातील ‘वडाप’
9-gd-vadap.jpg
थोड्याच वेळात आमची जीप आली. वडाप पद्धतीने कोंबून दहाजण एका जीपमध्ये बसलो. आमचे पोर्टर टपावर स्वार झाले. जीपमध्ये बसल्यावर मी लगेच माझे चालायचे बूट ओरबाडून काढले आणि साध्या चपला घातल्या! पायांना इतक बर वाटल की बास!
9-gd-scene2.jpg
घाटातला वळणा-वळणांचा प्रवास होता. आता ही दृश्य मी डोळे भरून पाहत होते, एकीकडे डोळे भरुनही येत होते. रस्त्यात एक दरड कोसळली होती. तेवढा भाग चालत जाऊन पुढे दुसऱ्या जीपमध्ये बसायचं होत. आता पोर्टरना वर बसता येणार नव्हत. तेवढ्यात सुरेशने माझी सॅक टपावर चढवून दिली. ‘ठीक है दिदी, ओम् नमः शिवाय’ अस म्हणून निरोप घेतला.
‘अंकल’ मत कहो’ म्हणणारे अशोकजी, यात्रेतली शेवटची पावले चालताना
9-gd-land3.JPGदरड कोसळून बंद झालेला रस्ता
9-gd-land4.JPG
धारचूलाच्या यात्री निवासमध्ये पोचलो, तर आधी पोचलेले यात्री अंघोळ वगैरे करून तयार! बरेच लोक ओळखायलाच येईनात. बहुधा अति ऑक्सिजनचा मारा झाल्याने सगळ्यांचे मेंदू गडबडले होते. सगळीकडून हास्याचे फवारे उडत होते. मोबाईल ह्या सोयीचा खूप दिवसांचा विरह झाला होता. आता मोबाईल सुरू झाले म्हटल्यावर मी दणादण फोन करून गप्पा मारून घेतल्या. इथे जमा केलेल सामान मिळाल. त्यातले स्वच्छ कपडे घातले. अशी शहराकडे जायची तयारी करू लागले.
रात्री जेवताना नारंग सरांनी सगळ्यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. रूढअर्थाने आमची यात्रा आता संपली होती. पुढचे दोन दिवस बसचा प्रवास. दिल्लीत पोचल्यावर लगेचच फाटाफूट होणार. काहीश्या जड मनानेच सगळे आपापल्या खोलीत गेले.
दिनांक ७ जुलै २०११ (धारचुला ते जागेश्वर)
आज आमचा परतीचा बसचा प्रवास सुरू होणार होता. कालच्या रस्त्यात कोसळलेल्या दरडींमुळे आमच मोठ सामान अजून पोचायचं होत. ते आज रात्री मिळेल अशी बातमी होती. धारचूलामधील एक पूल ओलांडला की आपण नेपाळमध्ये जाऊ शकतो. दिवसा कोणीही ये-जा करू शकतात. नेपाळमध्ये भारतापेक्षा कपडे स्वस्त असतात अशी माहिती सगळे सांगत होते. ‘सामान पण आल नाहीये, तर अजून एक दिवस इथेच थांबूया, खरेदीही करता येईल,’ अशी कुरकुर आमच्यातल्या खरेदीप्रेमींनी करून बघितली. पण नारंग सरांनी काही दाद दिली नाही.
आज २७५ किलोमीटरचा भलामोठा बसचा प्रवास करायचा होता. त्यामुळे सकाळी भराभर आवरून आम्ही बसमध्ये बसलो. इतके दिवस चालून पायांची वाट लागली होती. त्या छोट्या बसमध्ये पाय नक्की कसे ठेवावेत हे समजत नव्हत. कसेही ठेवले तरी पाच मिनिटात रग लागायची.
धारचुला पासून जरा बाहेर पडतोय, तोवर दरड कोसळून रस्ता बंद झालेला होता! आम्ही लोक खाली उतरून बाजूला बसून राहिलो. तासाभराने तिथले सां.बा.खात्याचे लोक उगवले. मग मात्र त्यांनी अक्षरशः वीस मिनिटात रस्ता मोकळा केला. थोड्याच वेळात आम्ही आय.टी.बी.पी.च्या ‘मीरथी’ ह्या कॅम्पला पोचलो. जाताना होता, तसाच थाट आत्ताही होता. आम्ही काही युद्ध जिंकून आलो असल्यासारखे ते आमच कौतुक करत होते. अल्पोपहार आटोपल्यावर जाताना आमच्या ग्रुपचा जो फोटो काढला होता, त्याची प्रत प्रत्येकाला भेट दिली.
मीरथीतले लष्करी स्वागत
9-dj-mirthi1.jpgयात्रींचा स्वागत समारंभ
9-gd-mirthi2.jpg9-gd-mirthi3.jpg
हा सगळा रस्ता छान झाडीतून जाणारा आणि निसर्गरम्य होता. उद्या दुपारपर्यंत आम्ही काठगोदामला आणि रात्री दिल्लीत पोचलो असतो. आता अगदी थोडाच वेळ ह्या सुरेख दृश्यांची सोबत होती. आमचा प्रवास ‘पाताळ भुवनेश्वर’ कडे चालू होता.
9-gd-scene.JPG9-gd-scene1.JPG
पाताळ भुवनेश्वर ह्या त्या भागातला एक विलक्षण प्रकार आहे. चुनखडीच्या (lime stone) खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे निरनिराळे आकृतीबंध तयार झाले आहेत. आत-बाहेर करायला एका भुयारातून घसरत जाव लागत. आत मात्र चालता येत. गणपती, श्रीशंकर आणि इतर ३३ कोटी देवांचे स्थान इथे आहे, अस म्हणतात. वनवासाच्या काळात पांडवांचे वास्तव्य ह्या गुहांमध्ये झाले होते, अशी श्रद्धा आहे.त्या गुहा वेगळ्याच आणि म्हणून लक्षात राहण्यासारख्या होत्या.
पाताळ भुवनेश्वर गुहा
9-gd-cave1.JPG‘बम् भोले’
9-gd-cave2.JPG
महाराष्ट्रात नाही, पण तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रातून कैलास यात्रेला बरच महत्त्व असत. त्यातल्याच एका वर्तमानपत्रात नंदिनीचा एक नदी पार करताना फोटो आला होता! मज्जा! बसमधला काही वेळ त्यावर चर्चा करण्यात छान गेला.
मग मात्र वेळ जाता जाईना. एक तर सगळा रस्ता वळणावळणांचा. त्यामुळे पु.लं.च्या ‘म्हैस’ सारखी, बसला एका अर्थानी लागणारी ‘वळण’ प्रवाश्यांना दुसऱ्या अर्थी लागत होती! प्रत्येकाला आपला पुढचा नंबर लागतोय की काय ही भीती वाटत होती. दुसऱ्याशी बोलायची पण भीती वाटत होती. संध्याकाळ होऊन काळोख झाल्यावर तर बाहेर बघणही अशक्य झाल. कधी एकदा ते जागेश्वर येईल अस झाल होत. भांडा-भांडी व्हायला अगदी आदर्श परिस्थिती होती. पण सगळे त्या प्रवासाने इतके गळून गेले होते, की भांडायलासुद्धा ताकद शिल्लक नव्हती.
अधून मधून डुलक्या घेताना ‘आपण घरी पोचलोय, आपल्या सवयीच्या बेडवर झोपलोय’ अशी स्वप्न पडत होती. यात्रेची मजा संपली, हिमालयाची संगत थोडाच वेळ राहिली, अश्या वेळेला घरची आठवण चरचरून येत होती. हॅरी पॉटरसारखी काही जादू येत असती, तर मी त्याच क्षणी घरी गेले असते.
बराच वेळ तो थकवणारा प्रवास करून आम्ही जागेश्वरला पोचलो. नको वाटत होत, तरी चार घास पोटात ढकलून लगेच सगळे गाढ झोपून गेले.
दिनांक ८ जुलै २०११ (जागेश्वर ते दिल्ली)
जागेश्वर इथे एक देवळांचे संकुल आहे. तिथले स्थानिक लोक ते बारा ज्योतिर्लिंगातले पहिले ज्योतिर्लिंग आहे, असे मानतात. ९व्या ते १३व्या शतकात बांधलेली सुरेख दगडी बांधणीची १२४ देवळे तिथे आहेत. दांडेश्वर, चंडिका, कुबेर, मृत्युंजय अशी निरनिराळी मंदिरे तिथे आहेत. आम्ही आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना अश्या जागी स्केचिंगला जायचो, त्याची आठवण आली. अजून आमचा बराच पल्ला बाकी असल्याने भल्या पहाटे तयार होऊन तिथे दर्शन घेऊन आलो.
जागेश्वर मंदीर संकुल
9-jd-js2.JPG9-jd-js3.JPG9-jd-js4.JPG9-jd-js5.JPG9-jd-js6.JPG
पुन्हा एकदा आमचा बसप्रवास सुरू झाला. चालून पायांना त्रास झाला नव्हता, इतका त्रास कालपासूनच्या बसच्या प्रवासाने झाला होता. कधी एकदा हा प्रवास संपेल, अस झाल होत.
दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही काठगोदामला पोचलो. हे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल गाव. आता पर्वतांची साथ सोडून शहरी भागाकडे जायचं होत. काठगोदामच्या यात्रा समितीने आमच जोरदार स्वागत करून आम्हाला उत्तम जेवण दिल. नंतरच्या कार्यक्रमात यात्रा पूर्ण केलेल्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र दिली. कार्यक्रम आटोपल्यावर आरामदायी अश्या वोल्वो बसमध्ये बसून आमचा बस प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. कितीतरी दिवसांनी पायांना खूप जागा मिळाली. त्या भव्य लेगस्पेसच ‘काय कराव?’ हेच कळेना. बसमध्ये चक्क पाय हलवता येत होते! इतक बर वाटत होत!
आता आम्ही महामार्गावर पोचलो होतो. हिमालयाची शिखरे मागे पडली होती. गाड्यांचे कर्णकर्कश आवाज, गर्दी, अडकलेली वाहतूक, धूळ-धूर, निरनिराळ्या नेत्यांचे ह्सरे चेहरे दाखवणारी होर्डिंग्ज आपण शहराकडे चाललोय ह्याची जाणीव देत होती. माझं परतीच विमानाच तिकीट १० तारखेच होत. आता एक दिवस दिल्लीत लवकर पोचणार होतो. ठरल्याप्रमाणे १० तारखेला जाव की जास्त पैसे भरून उद्याच म्हणजे ९ तारखेच काढावं हा विचार दोन दिवस करत होते.
काठगोदामनंतर केव्हातरी मला अजून एक दिवस दिल्लीत राहण्याचा विचार नकोनको झाला. पुन्हा तो गुजराथ समाज, ती मळकी अंथरूण-पांघरूण, ती गजबज सगळच. शनिवारी रात्री घरी पोचले, तर रविवारचा दिवस नवरा, मुलगा सगळ्यांबरोबर घालवता येईल, ह्या विचाराचा विजय झाला. शेवटी बरेच जास्तीचे पैसे घालून उद्याच तिकीट काढल. अजून चोवीस तासात आपण घरी पोचणार ह्या कल्पनेने छान गार वाटत होत.
तीनेक तास प्रवास झाल्यावर गाझियाबाद आल. आता आमच्या बॅचची वजाबाकी सुरू झाली. गाझियाबाद आणि परिसरातली मंडळी सगळ्यांचा निरोप घेऊन उतरली. असे यात्री उतरवत उतरवत दिल्लीतल्या गुजराथ समाजला पोचायला जवळजवळ रात्रीचे बारा वाजले.
तिथे पोचलो तर अजून एक आश्चर्य आमची वाट बघत होत. यात्रा समितीचे तसच यात्रा सुखकर व्हावी म्हणून झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे लोक, दिल्लीतल्या यात्रींचे नातेवाईक सगळे एवढ्या रात्रीचे जातीने ह्जर होते. हर्षभरित नजरेने आमचे स्वागत करत होते. आम्हाला पुष्पहार घालून, मिठाई खायला घालत होते. सगळ्यांचे नातेवाईक आम्ही जणू सगळेच त्यांचे नातेवाईक आहोत अश्या आपुलकीने आम्हाला मदत करत होते.
हे सगळ पाहून सगळ्यांना मजा करायची हुक्की आली. मग काय, यात्री, त्यांचे नातेवाईक सगळ्यांनी नाच-गाणी करून आपल्या उत्साहाला वाट करून दिली. हसून-खिदळून झाल्यावर दिल्लीतले यात्री त्यांच्या घरी निघाले. बहुतेकांच्या डोळ्यात पाणी होत. पुन्हा भेटण्याची, संपर्क ठेवण्याची आश्वासन एकमेकांना देत जड पायाने ते लोक गाड्यांमध्ये जाऊन बसले. नारंग सरांच्या पत्नी त्यांना घ्यायला आल्या होत्या. आमच्या बरोबर मित्रासारखे खेळीमेळीने वागणाऱ्या सरांमुळे आमचे हे दिवस आनंदात गेले. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानले.
दिल्लीतली धमाल!
9-jd-d2.jpg9-jd-d3.jpg9-jd-d5.jpg
उरलेले यात्री पुम्हा एकदा डोर्मिटरीत गेलो. बरीच रात्र झाली होती. पण कोणालाच झोपायची इच्छा होईना. सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते, हसत होते. महिन्याभराची उजळणी होत होती. आठव्या बॅचचे यात्री शेजारच्या डोर्मिटरीत झोपले होते. आमच्या उत्साहाला कसाबसा आवर घालून तिथल्या व्यवस्थापकांनी आम्हाला झोपायला लावल.
दिनांक ९ जुलै २०११ (दिल्ली ते पुणे)
काही झाल तरी आज लवकर उठायच नाही, अस मी अगदी पक्क ठरवल होत. पण..... आमच्यापासून गेले चार दिवस दुरावलेले आमच सामान पहाटे पाच वाजता येऊन पोचल. ते बाहेर रस्त्यावरच आहे, अस कळल्यावर घाई-घाईने जावच लागल. पुन्हा एकदा सगळे सामानात डोक खुपसून बसले. कोणाकडे जास्तीचे कपडे नाहीत, कोणी मोबाईल तर कोणी चार्जर मोठ्या सामानात ठेवला होता. त्यामुळे सगळ्या यात्रींमध्ये उत्साहाची लाट आली.
पहाटेच ह्या सगळ्या गोंधळात झोपमोड झाली. राजस्थान, पंजाब अश्या शेजारच्या राज्यातून आलेले यात्री सामान हातात पडताच घरी रवाना होत होते. इतका विलक्षण अनुभव ज्यांच्या साथीने घेतला, त्यांचा निरोप घेताना जड जात होत. बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी येत होत. भारताच्या निरनिराळ्या राज्यातून आलेल्या ह्या मंडळींची पुन्हा कधी भेट होईल की नाही, हे सुद्धा सांगता येत नाही. रोजच्या जगण्याची धडपड काही चुकत नाही. पण आठवणींच्या सुंदर कप्प्यात हे सगळे जण कायमचे विराजमान असणार, हे नक्की!
अंघोळ उरकून सामान पुण्याला नेण्याच्या बेताने भरून टाकल. आठव्या बॅचचे यात्री तिथे आलेले होते. ते आमच्याकडे आदराने बघत होते. त्याचं शंकासमाधान करण्याची जबाबदारी आमच्यातल्या काही उत्साही यात्रींनी आपणहोऊन घेतली होती.
पुढच्या बॅचच्या यात्रींचे प्रबोधन
9-jd-d1.jpg
ह्या सगळ्या गडबडीत दुपारपर्यंतचा वेळ कसा गेला, ते कळलही नाही. मी आणि पुण्यातले अजून दोन यात्री एकाच विमानाने येणार होतो. सकाळपासूनच लेकाचे सारखे फोन येत होते. ‘आता काय करते आहेस?, कधी निघणार आहेस? मी आणि बाबा तुला घ्यायला येतोय, बाहेर थांब’ ह्या आणि अश्या सूचनांचा मारा चालू होता. नवरा कामानिमित्ताने फिरत असतो. पण मी लेकाला इतके दिवस सोडून कधी कुठे गेले नव्हते. आता कधी एकदा त्याला भेटते अस झाल होत.
सगळ्यांचा निरोप घेतला. पत्ते-फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. फोटो सारखे चालूच होते. सगळ्यांचे ऋणानुबंध एवढे घट्ट झाले होते, की सामान उचलून निघताना मन आणि डोळे भरून आले. आनंद असो नाहीतर दुःख, भावना पराकोटीची वा परमोच्च असली की तिचे मूर्त स्वरूप किती सारखे असते? दोघांना आधार असतो फक्त अश्रूंचा....
टॅक्सी, विमानतळ आणि विमान हे टप्पे भराभर संपले. बघता बघता मी पुण्यात पोचले सुद्धा!! बाहेर आले तर नवरा आणि लेक उभेच होते. मुलांचे चेहरे पाहून डोळे निवतात, अस ऐकल होत. त्याचा प्रत्यय आला. घरी पोचल्यावर एवढी खडतर यात्रा संपवून नीटपणे आल्याबद्दल कृतज्ञतेने देवाला, आई-वडिलांना नमस्कार केला. आई-बाबा, नवरा-मुलगा सगळ्याचे चेहरे आनंदाने फुलले होते.
हे असे संपूर्ण आनंदाचे, समाधानी क्षण चिमटीत पकडून ठेवता आले, तर पुढच सगळ आयुष्य म्हणजे कैलास यात्रेसारखी आनंददायी यात्रा होईल, नाही?

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...