Thursday, February 4, 2021

कोल्हापुर जिल्ह्याची भटकंती

  पंचगंगेच्या काठी वसलेला कोल्हापुर जिल्हा!
साडेतिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईचा कोल्हापुर जिल्हा!
ज्या मातीत घडुन गेलेल्या इतिहासाच्या पाउलखुणा आजही पहायला मिळतात तो कोल्हापुर जिल्हा!
शाहु महाराजांचा कोल्हापुर जिल्हा! छत्रपती शाहु महाराजांच्या काळात (1874- 1922) या जिल्हयाचा मोठया प्रमाणात कायापालट झाला.
कोल्हापुर त्याच्या रांगडेपणामुळे, खवय्येगिरीने, कुस्तीमुळे, पेहेरावावरून, परंपरांमुळे, ऐतिहासिक वास्तुंमुळे प्रसिध्द आहे.
आपुलकीच्या भाषेमुळे, प्रेमळ माणसांमुळे सुध्दा कोल्हापुर ओळखले जाते.Kolhapur District Information In Marathi
एका आख्यायिकेनुसार कोल्हासुर नावाच्या राक्षसामुळे येथील लोक फार त्रस्त झाले होते, त्याच्या अराजकतेला कंटाळुन देवतांनी देवीला विनंती केली त्यामुळे देवी महालक्ष्मीने त्या कोल्हासुरा सोबत युध्द केले. हे युध्द नऊ दिवस चालले त्यानंतर अश्विन शुध्द पंचमीला देवी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला त्यावेळी त्याने देवीला विनंती केली की या नगरीचे नाव कोल्हापुर आणि करवीर अशी आहेत ती यानंतरही न बदलता अशीच राहु दयावी. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि आजही हे शहर कोल्हापुर आणि करविर या नावाने ओळखले जाते.
हे शहर इतिहासात घडुन गेलेल्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे.
पन्हाळगडाला वेढा देउन सिध्दी जोहरने याच ठिकाणी शिवाजीराजांना कोंडीत पकडले शिवा काशीद आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलिदानाला या शहराने पाहिले आहे मोगलांच्या तावडीतुन सुटल्यानंतर संभाजी राजे आणि शिवाजी महाराजांची भेट येथेच झाली.
प्रकृती, इतिहास, संस्कृति आणि आध्यात्माची योग्य सांगड असलेला हा जिल्हा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्ति ला काही ना काही तरी देतोच!

  कोल्हापूर जिल्हा : महाराष्ट्राचा अगदी दक्षिणेकडील जिल्हा. क्षेत्रफळ ८,१३५ चौ. किमी. लोकसंख्या २०,४८,०४९ (१९७१). १५ ४३’ उ. ते १७ १०’ उ. आणि ७३ ४०’ पू. ते ७४ ४२’ पू. यांदरम्यानच्या या जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी सु. १६० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सरासरी सु. ६० किमी. आहे. याच्या पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस सांगली आणि पूर्व व दक्षिण बाजूंस कर्नाटक राज्यातील बेळगाव हे जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या २·६% क्षेत्रफळ व ४·०६% लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचे बारा तालुके आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ हे तालुके उत्तरेस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल मध्यभागी आणि आजरा, गडहिंग्लज व चंदगड हे तालुके दक्षिणेस आहेत. पूर्वीचे ⇨ कोल्हापूर संस्थान   विलीन झाले, तेव्हा त्याचा रायबाग विभाग हल्लीच्या कर्नाटक राज्यात व बेळगाव जिल्ह्याचा चंदगड तालुका या जिल्ह्यात समाविष्ट करून आणि इतर किरकोळ प्रादेशिक बदल करून कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यात आला.


गगनबावडा तालुक्यातील तळकोकणात मोडणारी ३९ गावे सोडली, तर हा सर्व जिल्हा दख्खन पठाराच्या पश्चिम भागात सु. ३९० ते ५५० मी. उंचीवर आहे. जास्तीत जास्त उंची ९०० मी. पर्यंत आहे. सह्याद्रीची मुख्य रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेलेली असून तिचा एक प्रमुख फाटा उत्तर भागात पूर्वेस गेलेला आहे. इतर फाटे लहान असून नैर्ऋत्य-ईशान्य गेलेले आहेत. जिल्ह्याचा पूर्वभाग त्या मानाने सखल व सपाट आहे. या जिल्ह्यातून कोकणात उतरण्याच्या अनेक वाटा आहेत त्यांपैकी आंबा, फोंडा व आंबोली हे घाट प्रमुख आहेत. जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.

कृष्णा आणि तिच्या उपनद्या वारणा, पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या येथील प्रमुख नद्या होत. घटप्रभेला मिळणारी मलप्रभा व ताम्रपर्णी याही या जिल्ह्यातून वाहतात. कृष्णा ईशान्य सरहद्दीवरून ६० किमी. वाहते. वारणा उत्तर सरहद्दीवरून वाहते. कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती या चार नद्या व सरस्वती ही पाचवी गुप्त नदी मिळून झालेली पंचगंगा नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. तिचे खोरे संपूर्णपणे या जिल्ह्यात आहे. बाकीच्या नद्यांच्या खोऱ्यांचा फक्त काही भागच या जिल्ह्यात आहे.


चतुःसीमा

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे.

 त्याच्या पश्चिम-नैर्ऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा,

 पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा

 उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा

 तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे.

 जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.

 भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात

 मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहेया भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.

 जिल्ह्यात पंचगंगावारणादुधगंगावेदगंगाभोगावती,हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात पंचगंगा नदी कासारीकुंभीतुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहेकृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते.

कोल्हापुर जिल्हयातील तालुके –  Kolhapur District Taluka List

कोल्हापुर जिल्हयात एकुण 12 तालुके आहेत

  1. करवीर
  2. आजरा
  3. कागल
  4. गगनबावडा
  5. गडहिंग्लज
  6. चंदगड
  7. पन्हाळा
  8. भुदरगड
  9. राधानगरी
  10. शाहुवाडी
  11. शिरोळ
  12. हातकणंगले

 कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर -मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.

कोल्हापुर परिवहन विभागाचे संपर्क क्रमांक

१)      डिव्हीजनल कंट्रोलर, कोल्हापुर-  (0231) 2654474    Email_id -dcstklp@gmail.com

अ.क्र.                                               हुद्दा                                   टेलिफोन नंबर            

1 डिव्हीज्ञनल ट्रॅफीक ऑफिसर कोल्हापुर विभाग                             ( 023१) 2650971

2 डिव्हीज्ञनल अकाउंट ऑफिसर कोल्हापुर विभाग                            ( 023१) 2650974

3  डिव्हीज्ञनल पर्सनल ऑफिसर कोल्हापुर विभाग                             ( 023१) 2650975

4 लेबर ऑफिसर , कोल्हापुर विभाग                                                ( 023१) 2650972

1 डेपो मॅनेजर , कोल्हापुर बस स्थानक                                                           (023१) 2651447

2 डेपो मॅनेजर, संभाजी नगर बसस्थानक                                                         ( 023१) 2651431

3 डेपो मॅनेजर , इचलकरंजी                                                                          ( 023१) 2432496

4 डेपो मॅनेजर ,गडहिंग्लज                                                                           ( 02327) 222306

5 डेपो मॅनेजर, गारगोटी                                                                               ( 02324 ) 220035

6 डेपो मॅनेजर, मलकापुर                                                                             ( 02329) 224153

7 डेपो मॅनेजर, चंदगड                                                                                 ( 02320) 224132

8 डेपो मॅनेजर, कुरुंदवाड                                                                             ( 02322 ) 244203

9 डेपो मॅनेजर, कागल                                                                                ( 02325)244076

10 डेपो मॅनेजर, राधानागरी                                                                         ( 02321) 234038

11 डेपो मॅनेजर, गगनबावडा-                                                                      ( 02326) 222017

12 डेपो मॅनेजर, आजरा                                                                             ( 02323) 246396 

कोल्हापूर शहर हे एक प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. कोल्हापूरजवळील उत्खननात ब्रह्मगिरी येथे दुसऱ्या शतकापूर्वीचे अवशेष मिळाले आहेत. सु. दहाव्या-बाराव्या शतकांत कोल्हापूर शिलाहारांची राजधानी होती व कोल्हापूर जिल्ह्याचा प्रदेश जैनांचा बालेकिल्ला समजला जाई. आजचे महालक्ष्मीचे मंदिर आणि खिद्रापूर येथील जैन मंदिर हे त्यांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. जैनांच्या ऱ्हासकालात हे हिंदू धर्माचे केंद्र व एक शक्तिपीठ बनले शंकराचार्यांचा कडाप्पाचा मठ हा जुन्यापैकी एक समजला जातो. संस्थानी राजवटीत कोल्हापूरला वेगळेच महत्त्व चढले हाेते, त्याचे आधुनिक स्वरूपही विलोभनीय आहे. देवालये , तलाव, राजवाडे, चित्रपटगृहे, शैक्षणिक व इतर संस्था, नाट्यगृहे, कुस्तीचा आखाडा, पुतळे इत्यादींमुळे ते आकर्षक झाले आहे. पन्हाळा किल्ला जवळच आहे तेथे काही जुन्या इमारती व नवीन तबक उद्यान प्रेक्षणीय आहे. तेथे प्रवाशांसाठी राहण्याची सोयही केलेली आहे. विशाळगड किल्ल्यावर महादेवाचे देऊळ आहे. रांगणा व गगनगड हे अवघड किल्ले धाडसी प्रवाशांस आव्हान देतात व चढून गेल्यावर अपूर्व समाधान देतात. पंचगंगेवरील प्रयाग, सांगवड्याचे नृसिंहमंदिर, वाडीचा नरसोबा व त्याजवळील रम्य नदीघाट, डोंगरावरील जोतिबाचे देवालय, कुंभोजचे जैन तीर्थक्षेत्र व तेथील बाहुबलीचा अतिभव्य पुतळा ही भाविकांस आवाहन करतात. कोकणात जाणाऱ्या घाटातील वनश्री निसर्गरम्य आहे.

ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेली कोल्हापूर नगरी करवीर नगरी किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातील कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी हे पूर्णपीठ. अनेक कलांच्या विकासामुळे कोल्हापूरला ’कलापूर’ ही म्हटले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानला राजर्षी शाहूंसारखा ‘रयतेचा राजा’ लाभला. समाजसुधारणा, शिक्षण, उद्योग, शेती, पाणी नियोजन, कला-क्रीडा आणि लोकशाही या सर्वच क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व अशी पायाभरणी राजर्षी शाहू महाराजांनी करून ठेवली आहे. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.




  कोल्हापूरचा प्राचीन ईतीहास

प्राचीन काल -
हा काल श्री महालक्ष्मीच्या स्थापनेपूर्वीचा म्हणजे इसवीसनाच्या सुमारे ९व्या शतकापर्यंतचा मानला जातो. या काळात नदीकाठावरील टेकडीवर ब्रह्मपुरी हे वसाहतीचे केंद्र होते.

भगवान श्रीकृष्ण आणि कोल्हापूर
आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मथुरे जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात आला कधी आणि त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध काय? तर या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे .कालयवन अर्थात जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती. कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला कालयवन आला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये ओढले आणि त्यांचा पाठलाग करत सध्याच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरले मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल .भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली आणि तो जळून भस्म झाला. करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचा चा उद्धार केला तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे आजही जाखले गावात गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्य तल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले. इथे आल्यानंतर आज जयंती आणि गमतीचा संगम असलेल्या म्हणजे हुतात्मा पार्क च्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले इथे जणू प्रती द्वारका तयार झाली या द्वारकेला पाहून ,या द्वारकाधीशाला आणि भगवान शंकरांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले अशा ठिकाणी करवीर यात्रा करताना एके वेळी माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाल लीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं पण तुझी जन्मदाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळ रूप धारण करून मातेला अगदी पूतना वध आतापासून ते गोवर्धन पर्वताच्या उद्धारा पर्यंत सर्व बाळलीला करून दाखवल्या जिथं भगवंतांनी यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव. जिथं पर्वत उचलला ती जागा गिरगाव याच परिसरात असलेले वसुदेव ग्राम अर्थात वाशी इथे वसुदेव आणि तप केले अशा रीतीने या करवीर क्षेत्राला व्रजभूमी चा महात्म्य प्राप्त करून देणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुखाने पंचगंगा महात्म्य सांगितले याशिवाय सर्व पापांचा परिवारासाठी शक्ती चतुष्क म्हणजे एकवीरा पद्मावती प्रत्यंगिरा आणि अनुगामिनी अशा चार देवतांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली आहे .भगवंताची ही बाळलीला या क्षेत्री झाली याचा संदर्भ कोणी खोटा म्हणेल तर याला जोडून दुसरा संदर्भ देतो तो म्हणजे माशेल गावच्या देवकी कृष्णाचा. कथेनुसार भगवान श्रीकृष्ण कालयवनाचा वध करण्यासाठी दक्षिणेत आल्यावर माता देवकी आणि संपूर्ण परिवार ओढीनं दक्षिणेला आले. सावळ्या परब्रम्हाला बघून देवकीचा उर वात्सल्याने भरून आला. तिने जगदीश्वर श्रीकृष्णाला बाळ रूप कल्पून उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं तिथल्या तिथल्या पुराणातल्या उल्लेखानुसार हा प्रसंग करवीर घडला म्हणून आजही गोव्यातील माशेल गावी एकमेव अशी देवकीने कडेवर घेतलेल्या बाळकृष्णाची एकमेव मूर्ती आहे एकूणच या जगात व्यापक श्रीकृष्णाचे करवीराशी अर्थात कोल्हापूर बरोबर देखील अनोखे नाते आहे.
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
 कोल्हापूर आणि नारदमुनीवर्य
भारतीय पुराणकथातील चेष्टेचं, कलह करवणारं किंवा वेळ आलीच तर घाबरून पळ काढणारं एक विदुषकी पात्र अशी एक चुकीची व्यक्तिरेखा म्हणून नारदांची प्रतिमा उभी केली गेलीय आणि टि व्ही मालिकांनी याला खत पाणीच घातल .
वास्तविक देवर्षी नारद हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र विख्यात गायक आणि हरिभक्त. त्यांनी लिहिलेली भक्तीसुत्र म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा राजमार्गच . अखंड ईशस्मरण हे यांचं वैशिष्ट्य.नारद ही अशी विभूती आहे जी मनोवेगान सर्वत्र संचार करते. त्यांना देव मानव दैत्य तिघेही आदराने नमन करतात. नारद मुनी प्रत्येकाला त्याच्या हिताचा सल्ला देतात. आपण अनेक व्रते क्षेत्र माहात्म्यं पाहीली तर लक्षात येईल की नारदांनी वेळप्रसंगी लोकहितार्थ प्रश्न विचारून ती व्रते क्षेत्र माहात्म्ये प्रकाशित केली आहेत.
नारद हे पहिले वार्ताहर पण या वार्ता पोहचवण्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही सृष्टी चक्राचा समतोल साधण्या करता घटनाक्रमाला गती आणण्याच काम नारद करतात. साध उदाहरण घ्या सोडा किंवा मोहन न घालता देखिल भजी होतात पण जर मोहन किंवा सोडा घातला तर त्यांची खुसखुशीत होण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होते हेच नारदांच अस्तित्व . विधिलिखित घटना जलद घडून येण्यासाठी देवर्षींची भूमिका महत्वाचीच. भक्तांचा आवाज देवा पर्यंत पोहोचवणारे माध्यम म्हणजे नारद मुनी. यामुळे त्यांना शाप ही मिळाले त्यातील एक म्हणजे दक्ष प्रजापतीने दिलेला चंचल पणाचा शाप त्यामुळे नारद कुठेही स्थीर राहू शकत नाहीत अपवाद फक्त कोल्हापूराचा . उद्यम नगर भागात हुतात्मा पार्क बाग आहे तिथे द्वारकाधिश श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे जे प्रति द्वारका म्हणवले जाते त्याच्या समोर आज फक्त नारदांच्या पादुका आहेत.तिथली नारदांची मूर्ती आता टाऊन हाॅल मध्ये आहे एकदा नारद कृष्ण दर्शनाला करवीरात आले आणि शिव हरीला , देवीला एकत्र पाहून आणि या क्षेत्राच्या प्रभावाने शाप मुक्त होऊन कोल्हापूरातच राहीले त्या आदि वार्ताहर किर्तनकुल शिरोमणी देवर्षीना अभिवादन !
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः

एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे.प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी १०८ शक्तीपीठांची सूची तयार केली आहे कि जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे.यामध्ये करवीर क्षेत्राची श्री महालक्ष्मी (जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे) चे विशेष महत्त्व आहे.श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते.यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. ही ती जागा आहे कि जिथे विष्णू ची पत्नी श्री महालक्ष्मी ला मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करते.

श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू दोघेही नेहमी करवीर क्षेत्रामध्ये राहतात असे म्हंटले जाते आणि ते दोघेही हे करवीर निवास महाप्रकाश्याच्या वेळेस पण सोडणार नाहीत.करवीर क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रुपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे.भगवान विष्णू स्वतः या क्षेत्राला वैकुंठ आणि क्षीरसागर या दोन स्थानांपेक्षाही अधिक पसंत करतात.कारण इथे त्यांची पत्नी लक्ष्मी चे निवासस्थान आहे.म्हणूनच या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते कि श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.

महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल कि हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच ६०० ते ७०० काळातील असावे.मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रात्नापासून बनवली आहे ही जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते.महालक्ष्मी ची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे.कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे.यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]

   एखाद्य़ा शहराच्या इतिहासाचे साद-पडसाद तेथील लोकजीवनावर व विविध संस्थांवर प्रकर्षाने जाणवतात. कोल्हापूर शहराच्या आजच्या वैभवशाली विस्ताराचे बीज त्याच्या इतिहासात शोधता येते. प्रांगैतिहासिक व इतिहासकाळात भारतीय जनजीवनात जी विविध स्वरूपाची स्थित्यंतरे घडून आली ती करवीरच्या परिसरातही प्रकटतात.इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स. ९ व्या शतकापर्यत ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परीसरात समृध्द व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२5 ते 55० पर्यत वाकाटक,कदंब,शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.550 ते ७53 या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती.

इ.स.६३४ मध्ये या घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापूरास ‘दक्षिण काशी' व ‘महातीर्थ' संबोधितात. इ.स.७53 ते ८5० या कालखंडात दक्षिणेस राष्ट्रकूटाची सत्ता प्रस्थापित झाली. तेव्हा कोल्हापूरसुध्दा त्यांच्या सत्ताक्षेत्रात आले. पुढे इ.स. १२१० पर्यत शिलाहारांनी येथे राज्य चालविले. अशा प्रकारे ऐतिहासिक काळात शिलाहारांचे एक प्रमुख सत्ताकेंद्र या नात्याने कोल्हापूर शहराने मोलाची कामिगरी बजावली आहे. या घराण्यातील राजा गंदरादिव्य याच्या काळातील शिलालेखात या नगरीचा उल्लेख ‘महातीर्थ' असा आढळतो. त्याने महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पू्र्ण केले. या सम्राटाची बहिण चंद्रिकादेवी हिचा विवाह चालुक्य नरेश दुसरा विक्रमादित्य याच्याशी झाला व परिणामी कोल्हापूरचे वैभव वाढीस लागले.

ब्रह्यपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, रावणेश्वर ही प्राचीन काळातील कोल्हापूरची नैसर्गिक केंद्रस्थाने होती. म्हणजे कोल्हापूर शहराचा हा परिसर प्राचीन काळातील ओळखला जातो. उपरिक्त सर्व केंद्रांचे स्वरूप छोटया खेड्यासारखे होते. इ.स.च्या ९ व्या शतकात महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे ही सर्व ग्रामस्थाने एका प्रबळ सांस्कृतिक व आर्थिक केंद्रबिंदूत बांधली गेली. शिलालेख, वाड्मयीन साधने वास्तुकला या प्रमुख निकषांच्या आधारे महालक्ष्मी देवालायाचा कालखंड हा ९ व्या शतकाच्या (राष्ट्रकूटांचे युग) मागे नेता येत नाही, असे पुरातत्वज्ञ मानतात.

कोल्हापूर या स्थल नामाचा भौगोलिक व सांस्कृतिक बंध तपासणे हेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.दक्षिण काशी म्हणून करवीर पीठाचा उल्लेख वाड्मयात आढळतो. महालक्ष्मीने आपल्या शुभदायक करांनी या नगरीला प्रलयकाळाच्या संकटातून सुरक्षित उचलेले म्हणून त्यांस‘ करवीर ’असे सार्थपणे संबोधिले जाते. असे व्युत्पत्ती मेजर ग्रॅहॅम यांनी सूचित केलेली आहे, तर महालक्ष्मी देवीने आपल्या हाताने उचलून धरले ते ‘करवीरनगर’ असा उल्लेख ‘करवीर महात्म्या’ त आढलते. हरि पुराणातही ‘करवीर’ असेच नामभिधान आढळते.

नृसिंहाची करवीरातली इतर मंदिरे.-
1 महालक्ष्मी मंदिराच्या महाद्वाराच्या डाव्या बाजूला उत्तराभिमुख अशी विदारण ( दैत्य वध करणारी) ७-८ इंच ऊंचीची मूर्ती
2 महालक्ष्मी मंदिरातच राम मंदिराच्या मागे दशावतार ओवरीत विदारण नृसिंह ( देव स्तंभ फोडून आलेला अतिशय सुंदर कोरलाय)
3काशीविश्वेश्वराच्या दारात स्तंभावर योगनृसिंह ( ध्यानस्थ रूप)
हे तिन्ही महालक्ष्मी मंदिरात
4 कसबा गेट जवळ महाद्वार रस्त्यावर पूर्वाभिमुख साधं घर वजा मंदिर विदारण नृसिंह .
5कपिलतीर्थ कपिलेश्वर मंदिराशेजारी तांदळा स्वरूप स्वयंभू मूर्ती
6 लिमये पुस्तकालय समोर न्यू महाद्वार रोड खडी (उभी) दंड धारी उत्तराभिमुख मूर्ती
7 कमलजा नृसिंह शिवाजी पेठेत विठाई हाॅटेल शेजारी बलभीम ( अपना) बॅकेजवळ छोट्या गाभा-यात पश्चिमाभिमुख प्राचीन मूर्ती
8 रंकाळा स्टॅन्ड ते गुजरी रस्ता जोशी यांचे घराजवळ लक्ष्मीनृसिंह मूर्ती
9 जुना बुधवार पेठेत डांगे गल्लीत
10 कोळेकर तिकटी तांदळा स्वरूपी मूर्ती
11 मिरजकर तिकटी येथे नूतन मराठी शाळेजवळ प्राचिन शिखर विहीन मंदिरात सौम्य मूर्ती
या सर्वात महत्वाच क्षेत्र म्हणजे पद्मावती जवळचा नृसिंह
जयप्रभा स्टुडियो जवळच पद्मावती मंदिर!
तुम्ही म्हणाल मंदिर तर पद्मावतीचं मग नृसिंहाचा काय संबंध?
पण करवीर माहात्म्य उघडा आपोआप हा संबंध सापडेल.
प्रल्हादाची निष्ठा खरी करायला भक्तवत्सल नारायण कोरड्या खांबातून प्रगटले.जी जागा लक्ष्मीला नाही ती जागा म्हणजे दोन्ही मांडीवर आडवं घेऊन करूणाघन नरहरीनं हिरण्यकश्यपूला असलेल्या वरदानाचा मान राखत त्याचा वध केला.भक्ताचा अवमान पाहून खवळलेल्या नरशार्दूलाला पाहून लक्ष्मी ती मागे फिरली पण बाळ प्रल्हादानं देवाला शांत केलं. ही गोष्ट आपण सगळेच जाणतो. पण हा प्रल्हाद मोठा झाला. जस वय वाढलं तसा मनात एक सल वाढला आपल्या पित्याच्या मृत्यूच कारण आपणच आहोत. नारदांच्या सल्ल्यानं या पापातून मुक्त होण्यासाठी प्रल्हाद महाराज करवीरात आले. पद्माळा तीर्थाच्या तीरावर तप करायला लागला.तप पूर्ण झालं भगवती जगदंबा महालक्ष्मी स्वतः प्रगट होऊन म्हणाली वत्सा प्रल्हादा वर माग ! प्रल्हाद म्हणाला माते माझ आराध्य रूप तू नाहीस भगवान नृसिंह आहेत. देवी म्हणाली बाळा हे क्षेत्र माझं मी सर्वस्याद्य शक्ती! इथं सर्व देवता माझ्यातच समाविष्ट आहेत. तू निष्पाप आहेस जे झालं त्यात तुझा दोष नाही. तू एक निमित्तमात्र! तुझ्या सारख्या हरीभक्ताला कर्मलेप लागत नाही. तरीही लोकांना शिक्षण म्हणून गंडकी नदीचे बारा गाडे शालीग्राम या पद्मालय तीर्थात टाक ! आणि तुझ्या मनातली शंका काढायला मी तुझ इष्ट नृसिंह रूप दाखवते. त्याक्षणी जगदंबा स्वतः नरसिंह रूपात प्रगटली. या घटनेची स्मृती म्हणून तिथे नृसिंहाचा तांदळा आणि प्रल्हादेश्वर शिवलिंग आजही पहायला मिळते.
या खेरीज आणि कुठले मंदिर राहीले तर देव नृसिंह लक्ष्मी क्षमा करोत
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्नसशक्तिकः
 
 वैशिष्ट्यपूर्ण शिवस्थाने
कोल्हापूर हे जरी जगदंबेच प्रिय क्षेत्र असले तरी ही भगवान शिवांची तपस्थली देखील आहे त्याहून ही या क्षेत्री एक नियम आहे प्रत्येक देवतेने या क्षेत्री तप करावे एक शिवलिंग स्थापन करावे त्यामुळे या करवीरात शिवक्षेत्रांची मांदीयाळी च आहे त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण शिव स्थाने अशी-
श्री मातृलिंग
करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या दुस-या मजल्यावर असलेले हे लिंग म्हणजे साक्षात महालक्ष्मीचेच लिंगरूप म्हणून याला मातृलिंग म्हणजे मातेचे लिंगरूप म्हणतात.विशेष म्हणजे याला पूर्ण प्रदक्षिणा करतात.
श्री काशी विश्वेश्वर
काशी पेक्षा करवीर श्रेष्ठ आहे हे जाणून भगवान ईविश्वेश्वर काशी सोडून परिवारासह करवीरात आले.श्री महालक्ष्मीच्या आज्ञेवरून त्यांनी तिच्या उजव्या हाताला म्हणजे घाटी दरवाजा जवळ राहून भक्तांना मोक्ष देण्याची जबाबदारी सांभाळतात.
श्री कपिलेश्वर
कोल्हापूरचे ग्रामदैवत असे भगवान कपिलेश्वर ही विष्णूच्या 24अवतारापैकी एक असलेल्या महर्षी कपिलांनी स्थापन केले आहे. जवळ कपिलमुनींची माता व शिष्या अशा देवहुती मातेचही स्थान आहे. याच मंदिरात पूर्वी कोल्हापूर ची धर्म सभा बसत असे. कपिलतिर्थ मुजवल्यावर तेथे मंडई झाली आजही ती कपिलतीर्थ मंडई म्हणूनच प्रसिद्ध आहे.
गायत्रेश्वर
विद्यापीठ हायस्कूल च्या समोर असणारे हे लिंग म्हणजे वेदमाता गायत्री ची तपस्थली आणि तिचे लिंगरूप.
महर्गलेश्वर
इंदूमती हायस्कूल च्या आवारात कोप-याय असणारे हे शिवालय म्हणजे महालक्ष्मीचा प्रधान अशा बालशिवाचे देवालय.
इंद्रेश्वर
महाद्वार रस्ता दासराम बुक डेपो जवळ इंद्राने वृत्र हत्येचे पाप जाण्या करता तप केले
चंद्रेश्वर
शिवाजी पेठेत चंद्रेश्वर गल्लीत चंद्राने गुरूपत्नी अपहाराचे पातक जाण्यासाठी तप केले.
सूर्येश्वर
शिवाजी पेठेत महाकाली जवळ सूर्याचे तपस्थल
ब्रम्हेश्वर
निवृत्ती चौक शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्या जवळ देवीचा कथा वाचक.
बुधेश्वर बृहस्पतिश्वर शुक्रेश्वर
महालक्ष्मी मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या जवळ खत्री स्वीटस शेजारी या तिघांची लिंग रूपे.
सर्वेश्वर
पंचगंगा स्मशानभूमी जवळ करवीरातील सर्व देवांचे दर्शनाचे फळ देतो.
त्रिसंध्येश्वर
हत्तीमहाल रस्त्यावर
संध्यालोपाचा दोष दूर करून त्रिकाल संध्या वंदन केल्याचे पुण्य देतो.
ऋणमुक्तेश्वर
गंगावेश मंड़ई जवळ; सर्व ऋणातून मुक्त करतो
तारकेश्वर
श्री छत्रपतींच्या समाधी मंदिर परिसरात पंचगंगातीरावर ; रक्षण कर्ता
रावणेश्वर
मूळ रामेश्वर नाव शाहू स्टेडीयम जवळ प्रभू राम स्थापित.
शूलेश्वर
कोष्टी गल्लीत करवीरासुर मारून शंकरांनी त्रिशूल रोवला ती जागा शृंग ऋषींचे तपस्थान म्हणून शिंगोशी.
करवीरेश्वर
डाकवे गल्लीत करवीरासूराचा वध झालेले क्षेत्र
अग्नीश्वर
सिद्धाळा बागेजवळ अग्नीचे लिंगरूप
लिंगेश्वर
हुतात्मा पार्क मध्ये करवीरातील सर्व लिंगाच्या दर्शनाचे पुण्य देणारे स्थान .
नगरा बाहेर
पूर्व आळते रामलिंग
दक्षिण चक्रेश्वरवाडी चक्रेश्वर
पश्र्चिम कळे कल्लेश्वर
उत्तर मल्लिकार्जुन येडेनिपाणी
औरवाड अमरेश्वर
खिद्रापूर कोपेश्वर
यडूर वीरभद्र
संकेश्वर सिद्ध सांख्येश
बाजार भोगाव भोगेश्वर
वाटेगाव वाटेश्वर
बहे रामेश्वर
हरीपूर संगमेश्वर
याशिवाय अशी अनेक स्थाने आहेत सर्वांचा उल्लेख करणे निव्वळ अशक्य आहे. तरी ही सेवा गोड मानून घ्यावी ही विनंती
याशिवाय
करवीरची 12 ज्योतिर्लिंगे
श्रीलक्ष्मीविजय ग्रंथात कोल्हापूरातली बारा ज्योतिर्लिंगे दिली आहेत ती अशी
1) महाकाल - घाटीदरवाजा जवळ माऊली लाॅज मध्ये तळघरात
2) ॐ कार अमलेश्वर - गरूडमंडपासमोर दिपमाळेत
3) सोमनाथ- दिपमाळेत सिद्धिविनायका समोर
4) नागनाथ- दिपमाळेत दत्तासमोर
5) काशीविश्वेश्वर -घाटीदरवाजा जवळ मंदिर
6) घृष्णेश्वर- पूर्व दरवाजा समोर खत्री स्वीट शेजारी बुधेश्वर
7) त्र्यंबकेश्वर- याच मंदिरासमोर बृहस्पतीश्वर
8) केदारनाथ वैद्यनाथ- मंदीरामागे शुक्रेश्वर
9) मल्लिकार्जून- राधेश्याम मंगल कार्यालयाच्या तळघरात
10) भीमाशंकर कपिलेश्वर
11) रामेश्वर रावणेश्वर महादेव
12) वैद्यनाथ - विद्यापीठ हायस्कूल राजाज्ञ वाड्या समोर दगडी चौखांबीत या प्रमाणे ही परीक्रमा करता येते
 
  कोल्हापूरच्या दोन रक्षक देवतांपैकी महत्वाच्या अशा श्री कात्यायनी आणि श्री वेताळ देवाचा
कात्यायनी म्हणजे करवीरची दक्षिण द्वार देवता. बालिंगे गावची ग्रामदेवता! ( बालिंगा गाव पूर्वी कळंबा तलावाच्या काठावर होते पण कळंब्याचे पाणी कोल्हापूर शहराच्या पिण्यासाठी वापरायचे ठरल्यावर हे गाव संपूर्ण पणे रंकाळ्याच्या पुढे पुनर्वसित करण्यात आले. आजही बालिंगे गाव कात्यायनीलाच ग्राम देवता मानते) कोल्हासूराचा दक्षिण द्वाररक्षक असणा-या रक्तबीजाचा वध करण्यासाठी श्रीमहालक्ष्मीने भैरवाला पाठवले पण आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवा असूर प्रकट करणारा रक्तबीज भैरवाला आवरेना तेंव्हा त्यानं कात्यायनीला साद घातली. ती पाताळमार्गाने अमृताचा ओघ घेऊन भूमीवर आली ते कुंड आजही तिच्या समोर आहे. हाच जयंतीचा उगम . महाकालीच्या सहाय्याने रक्तबीजाला मारून कात्यायनी इथे उत्तराभिमुख विराजमान आहे. कात्यायनी दर्शनाने व रामकुंडाच्या स्नानाने भगवान परशूराम मातृहत्या व गोत्र वधाच्या पापातून मुक्त झाले. केवळ एक रक्षक देवता एवढीच कात्यायनीची ओळख नाही. कोल्हासूराला दिलेल्या वराप्रमाणे शंभर वर्षासाठी महालक्ष्मी हे क्षेत्र सोडून गेली असता तीनेच भक्तांचा सांभाळ केला. कात्यायनी कृपेनेच गोपिकांना श्रीकृष्ण मिळाले म्हणून आजही विवाह लवकर व्हावा आणि मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कात्यायनी च दर्शन घेऊन साकडं घातल जातं. सोन्याच्या आरतीत दिवे उजळून महालक्ष्मीची आरती करण्याचा अधिकार चौसष्ट योगिनींसह कात्यायनीचाच आहे. आजही कोल्हापूर च्या दक्षिणेला १० कि.मी. वर गारगोटी रस्त्यावर शांत डोंगरात कात्यायनीचे मंदिर आहे. जिथे देवी तांदळा ( स्वयंभू पाषाण ) रूपात विराजमान आहे. दर अमावस्येला इथे महाप्रसाद असतो. तर के.एम.टीची बससेवा थेट मंदिरापर्यंत जाते.
वेताळ -
साक्षात शिवाचा तमोगुण अंश म्हणजे वेताळ तो भूतगणांचा अधिपती. श्री देवांना औरस संतती होणार नाही असा पार्वतीचा शाप आहे. पण भैरवाला पार्वतीचा पुत्र व्हायचे होते म्हणून शिव पार्वतीने *करवीरात*तारा आणि चंद्रशेखर नावाने अवतार घेतला. त्यांच्या उदरी कालभैरव आणि वेतालभैरवाचा जन्म झाला हाच वेताळ करवीरात शहराच्या पश्चिमेला राहून शहराचे रक्षण करतो . शिवाजी पेठेतील वेताळ माळावर वेताळाचे स्वयंभू मूर्ती स्थान आहे. त्याला करवीर माहात्म्यात अग्निजिव्ह असे नाव आहे. हाच वेताळ मूर्ती रूपात करवीर निवासिनीच्या दाराच रक्षण करायला पितळी उंब-याच्या डावी कडे उभा आहे . त्यालाच आपण विजय म्हणून ओळखतो. करवीर माहात्म्यात काल वेतालकौ महाबली असा या मूर्तींचा उल्लेख आहे. वेताळ हा भूत गणांचा अधिपती सर्व तामसी तत्वांवर त्याचा अधिकार चालतो .कोकण आणि गोवा भागात वेतोबा नावाने त्याची चालुक्य काळापासून पूजा होते. अनेक गावांचा वेतोबा ग्रामदैवत आहे. चार फूटांहून उंच हातात खड्ग आणि पानपात्र घेतलेला वेतोबा पाहीला की आपोआपच आदरयुक्त भिती वाटते. अनेक ठिकाणी त्याला मोठे कातडी चपला अर्पण केल्या जातात. त्या घालून वेताळ गावाभोवती गस्त घालतो असे म्हणतात.
 पंचगंगा नदी:-
    गंगा दशहरा करवीरची जिवनदायिनी असलेल्या माता पंचगंगेचा प्रकट दिन. सृष्टीनिर्मितीच सामर्थ्य मिळावं म्हणून ब्रम्हदेवानं महायज्ञ केला त्याच्या पूर्णाहुती पूर्वी यज्ञाच्या अवभृत स्नान करणं आवश्यक असतं त्याकरता इथ पवित्र नदी नव्हती म्हणून वसिष्ठ विश्वामित्र गर्ग गालव या पाच महर्षीनी आपआपल्या इष्ट देवतांच आवाहन केल त्या देवताच जलरूप धारण करून धावत आल्या. विष्णूस्वरूपिणी भद्रा अर्थात कासारी,शिव रूपीणी शिवा अर्थात तुळशी ब्रम्हरूपीणी कुंभी , पातालगंगा भोगावती आणि ज्ञानमयी सरस्वती या पाचही प्रवाहांच एकत्र रूप म्हणजे पंचगंगा! मूळ हा प्रवाह अशेष पापहारिणी पाताळगंगा भोगावतीचा तिला महे इथं शिवा म्हणजे तुळशी भेटते. याच प्रवासात बहीरेश्वर इथं कुंभी सामिल होते ही कुंभी एकटीच येत नाही तिच्या प्रवाहात गगनबावडा तालुक्यातील सरस्वती पण सहभागी असते ( ती थेट भोगावती ला मिळत नाही म्हणून ती गुप्त मानतात) श्री क्षेत्र प्रयाग जवळ कासारी नावाने भद्रा अर्थात करवीर कालिंदी ( यमुना) भेटते आणि साकार होते ती पंचगंगा! कोल्हापूर इचलकरंजी मार्गाने ती श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पोहोचते आणि श्रीगुरूंच्या साक्षीनं त्रिगुणात्मक कृष्णेला ही शक्ती स्वरुपिणी पंचगंगा भेटते आणि आपलं स्वरूप आवरतं घेते.
कोल्हापूर चं दक्षिण काशी का याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताना आणि एक कारण सापडलं. हिमालयाच्या कुशीतून निघालेली गंगा सागराकडे जाताना पित्याच्या विरहानं जिथे पुन्हा माहेराकडे ( गंगा उत्तरेहून दक्षिणेला वाहते) म्हणजे उत्तरेला वळते ते क्षेत्र म्हणजे काशी ! आता आपला करवीर चा नकाशा समोर धरा आणि गंमत पहा हिमाली प्रमाणेच ही सह्य कन्या जिथं पुन्हा एकदा दक्षिणेला वळते तिथे करवीर वसलं आहे. म्हणजे वाराणसी आणि कोल्हापूर जणू एकमेकांच प्रतिबिंब च आहेत.
अशी ही कायिक वाचिक मानसिक अशा दहा पापांचा नाश करणारी नारायणी आम्हाला तीचं पावित्र्य शुद्धता आणि जैवविविधता जपण्याची बुद्धी देवो हीच जगदंबा चरणी प्रार्थना!

मध्ययुग
श्री महालक्ष्मी देवालयाच्या स्थापनेपासून रेसिडन्सीची स्थापना होईपर्यंतच्या म्हणजे इंग्रजी राजवटीच्या सुरूवातीच्या कालापर्यंतच्या दुसऱ्या कालखंडाला शहराच्या इतिहासातील मध्ययुग असे म्हटले जाते. या कालात श्री महालक्ष्मी देवालय हेच धार्मिक व राजकीय असे मुख्य केंद्र होते.

अर्वाचीन काल -
कोल्हापूर इ.स.१८४४-४८ साली रेसिडेंसी स्थापन झाल्यापासून शहराच्या आधुनिक युगाला सुरूवात होते. हा काल स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचाच धरून स्वातंत्र्योत्तर काल त्यापासून वेगळा धरण्यास हरकत नाही.
मानव हा आपल्या वसाहती पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी म्हणजेच नदी वा तलावांकाठी वसवीत आला आहे. कोल्हापूर शहराची प्रथम वसाहत पंचगंगा (अर्वाचीन कालातील नाव) नदीच्या काठावर एका टेकडीवर वसविली गेली. ही टेकडी म्हणजेच ब्रह्मपुरी होय. या जागेची निवड पाण्याची सोय, शेती त्याचबरोबर शत्रूच्या चालीची टेहाळणी करता यावी या तिन्ही उद्देशाने केलेेली होती. पुराच्या पाण्यापासून संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ही वसाहत टेकडीवर वसविताना त्यांनी विचारात घेतलेला दिसतो. ब्रह्मपुरी हे नाव सुरूवातीपासून नव्हते. आर्यांच्या आगमनानंतर हे नाव मिळाले असावे. या विभागात प्राचीनकाळी मुख्यत: ब्राह्मण वस्ती जास्त असल्यामुळे याला ब्रह्मपुरी असे नाव पडले असावे. या नावाविषयी अशी एक दंतकथा आहे की हे गाव कसे वसविले गेले याची माहिती नसल्यामुळे स्वत: ब्रह्मदेवाने ते निर्माण केले अशी आख्यायिका प्रसृत होऊन त्याला ब्रह्मपुरी हे नाव रूढ झालेे.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी ही एक राजधानी अगर मोठे शहर होते. इ.स.१०६ ते १३० च्या दरम्यान हे शहर नदीच्या काठावर विटांच्या सुंदर घरांनी परिपूर्ण होते. त्या काळात दक्षिणेला सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी वा शातवाहनांचे राज्य होते. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या शहराचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोमहून आणलेल्या वस्तू, नाणी, व ब्रंाझ धातूची भांडी इत्यादीचे अनुकरण मातीमध्ये केलेल्याचे आढळते. हे शहर बहुधा श्री यज्ञ शातकर्णी याच्या कारकीर्दीत आगीने उध्वस्त झाले असावे. बह्मपुरीच्या ऐश्वर्याला इसवीसनाच्या दुसऱ्या शतकानंतर ओहोटी लागली आणि दुदैवाने ब्रम्हपुरीचे गेलेले ऐश्वर्य पुन्हा परत आलेच नाही. कारण ब्रम्हपुरीच्या नाशानंतर काही कालांतराने श्री महालक्ष्मीचे देवालय स्थापन झाले आणि कोल्हापूर शहराची वाढ श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र बनून त्याच्या सभोवताली झाली.
कालानुक्रमे विचार करता ब्रम्हपुरीनंतर उत्तरेश्वराच्या विचार केला जातो. ब्रम्हपुरी ही अधिक सोयीची जागा वसाहतीने व्यापल्यानंतर कमी सोयीच्या ठिकाणी म्हणजे नदीपासून थोड्या अंतरावर ब्रम्हपुरीपेक्षा कमी उंचीच्या टेकडीवर वसाहत झाली. हीच उत्तरेश्वराची वसाहत. ब्रम्हपुरी प्रमाणेच इथेही उत्खननात जुने अवशेष सापडतात. परंतु सध्या तिथे लोकवस्ती खूपच दाट झाल्यामुळे उत्खनन अशक्य झाले. उत्तरेश्वर या नावासंबंधी काही माहिती उपलब्ध नाही. ज्या देवालयाला हल्ली उत्तरेश्वर म्हणून दाखविले जाते ते शंकराचे देवालय आहे. त्यामधील शंकराची पिंड सुमारे चार माणसांच्या कवेत मावेल इतकी मोठी आहे. हे देवालय केव्हा बांधले गेले य संबंधी देखील काही माहिती उपलब्ध नाही. उत्तरेश्वराच्या दक्षिणेला श्री महालक्ष्मीचे देवालय वगैरे भागात लोकवस्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तरेकडील देव यावरून उत्तरेश्वर हे नाव रूढ केले असावे.
ब्रम्हपुरी व उत्तरेश्वर या प्रमाणेच खोल खंडोबा ही देखील एक टेकडीच आहे. ब्रम्हपुरीपेक्षाही तिची उंची थोडी अधिक आहे. येथील वसाहत वरील दोन्ही वसाहतीनंतर झाली असावी कारण येथे सोयी कमी असून हे ठिकाण नदीपासून दूर आहे. खोल खंडोबा हे एक जुने देऊळ आहे. त्याचा आकार बाहेरून मशिदीसारखा दिसतो, कारण त्यावर मुसलमानी पद्धतीचर घुमट आहे. शिवाय हा देव बसविलेली जागा जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. म्हणूनच याला खोल खंडोबा असे म्हणतात. या देवालयाचा आकार मशिदीसारखा का असावा या संबंधी विचार करता दोन अंदाज बांधता येतील. एक म्हणजे मुसलमानंाच्या स्वाऱ्या झाल्यास त्यांच्या हिंदू देवांच्या मूर्तिभंजक प्रवृत्तीपासून संरक्षण म्हणून देवालयाचा बाहेरचा आकार मशिदीसारखा केल्याल्यास ते तिकडे फिरकणार नाहीत. परंतु असे आढळून येते की या भागात इतरही अनेक देवालये असून त्यांचा बाह्य आकार मशिदीसारखा नाही फक्त एकच देवालय तसे बांधण्याचे काहीच प्रयोजन नाही. म्हणून हा अंदाज तितकासा योग्य वाटत नाही. दुसरा अंदाज असा की या देवालयाचे बांधकाम कुणीतरी मुसलमान कारागीराने केले असावे, आणि हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्यामुळे याला कुणीही विरोध दर्शविला नसावा आणि हा अंदाज पटण्यास काही हरकत नाही. कारण याच्या पुष्ट्यर्थ आणखी दोन उदाहरणे पहावयास मिळतात. ती म्हणजे बाबूजमाल या मशिदीच्या चौकटीवर श्री गणेशाचे चित्र व पन्हाळगडावरील एका द्वाराच्या चौकटीवर कोरलेल्या गणेशाच्या डोक्यावरील मुसलमानी पद्धतीची टोपी. यावरून कोल्हापूरात हिंदू मुसलमान ऐक्य फार पूर्वीपासून आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
खोल खंडोबा हे नाव देण्याचे कारण प्राचीन वस्ती नाश झाल्यामुळे आजूबाजूची घरे पडून उंचवटे निर्माण झाले आणि एकेकाळी जमिनीवर असलेला देव जमिनीच्या पातळीखाली गेला व लोकांनी त्याला न हलविता तसेच देऊळ बांधले आणि आजूबाजूची जमीन न उकरता उंचवटयावर पुन्हा वस्ती केली. या ठिकाणी देखील जुने अवशेष सापडतात पण उत्तरेश्वराप्रमाणेच इथेही सध्या दाट लोकवस्ती झाल्याने उत्खनन करणे अशक्य झाले आहे. जुन्या कागदपत्रात या भागाला केसापूर असे संबोधिलेले आढळते. परंतू हे नाव रूढ झालेले दिसत नाही.
ब्रम्हपुरीची वाढ होऊन ती नाश झाली तरी उत्तरेश्वर व खोल खंडोबा यांची वाढ मंदगतीने सुरू होती. त्यांची फार मोठी वाढ झाली नाही व नाशही झाला नाही. वरील तीनही नैसर्गिक केंद्रे स्थापन झाली व त्यांनतर रंकाळा, पद्माळा व रावणेश्वर ही तळयाजवळील केंद्रे निर्माण झाली. रंकाळा केंद्र हे यापैकी सर्वांत जुने असावे. या ठिकाणी संध्यामठ ही सुंदर इमारत व नंदीचे देवालय प्राचीन काळी बांधले गेले. हा नंदी प्रतीवर्षी एक गहू पुढे सरकतो व तो सरकत सरकत रंकाळयात पडल्यावर प्रलय होणार अशी एक दंतकथा आहे. या देवालयातील नंदी सुमारे ५.५ फूट उंचीचा आहे. वरील दंतकथेची वस्तुस्थिती अशी की, आठव्या किंवा नवव्या शतकात जो मोठा भूकंप झाला व ज्यामुळे रंकाळा तलाव निर्माण झाला त्याचवेळी या देवालयातील नंदी(ज्याला पाय नाहीत असा) धरणीकंपामुळे पुढे सरकला असावा. ही गोष्ट लवकर लक्षात न आल्यामुळे कालांतराने वर लिहिलेली दंतकथा प्रसृत झाली असावी. या मंदिराचा अलिकडेच म्हणजे सन १९६९ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मुख्य नंदीचे देवालय पुन्हा बांधले असून देवळासमोर असलेल्या पुरातन शिवपिंडीवर मंडप बांधण्यात आला आहे.
पूर्वी प्रत्येक गावात एक महारवाडा असे. या महारवाड्यावर गावाचे स्वतंत्र आस्तित्व दिसून येत असे रंकाळा केंद्र हे ब्रम्हपुरीशी संबंध नसलेले एक स्वतंंत्र गाव होते. हे इथे असलेल्या महारवाड्यावरून सिद्ध होते. हा महारवाडा अद्यापी फिरंगाईजवळ आहे. कोल्हापूर शहर वाढल्यावर या भागाला नवा बुधवार हे नाव देण्यात आले होते. म्हणून हा नवा बुधवार व खोल खंडोबा हा जुना बुधवार म्हणून काही काळ ओळखला जात होता. सध्या रंकाळा म्हणजेच नवा बुधवार भागाला शिवाजी पेठ नावाने ओळखले जाते.

पद्माळा केंद्र
हे एक समकालीन खेडे होते. जुन्या कागदपत्रात याचा उल्लेख नवे जिजापूर असा आढळतो. या खेडयाला स्वतंत्र महारवाडा नव्हता. फिरंगाईच्याच महारवाड्याचा या वस्तीला उपयोग होत असावा. येथे जुने अवशेष सापडत नाहीत.
 असा महारवाडा हलविला गेला आणि जवळील महार तळे बुजविले जाऊन सध्या तेथे राजाराम कॉलेज (सायन्स विभाग), राजाराम (अयोध्या) टॉकिज, आईसाहेब महाराज यांचा पुतळा, शाहू टॉकीज, सध्याची स्टेट बँक इमारत अशा इमारती उठल्या आहेत. या भागाला रविवार पेठ असे नाव आहे. तत्पूर्वी त्याचे नाव हिरापूर असे होते. पद्माळयाप्रमाणे येथेही जुने अवशेष सापडत नाहीत. पद्माळा व रावणेश्वर हे दोन तलाव होते. ते बुजवून अनुक्रमे सध्या गंाधी मैदान (किंवा वरूणतीर्थ वेस मैदान) व श्री शाहू स्टेडियममध्ये रूपांतर करण्यात आले.

ज्याप्रमाणे नदीकाठाच्या तीन केंद्रांचा एक विभाग मानणे शक्य आहे त्याचप्रमाणे तळयाकाठच्या या तीनही केंद्रांचा स्वतंत्र विभाग मानला जातो. इसवीसनाच्या ९व्या शतकाच्या सुमारास ही सहाही केंद्रे लहान खेड्यांच्या स्वरूपात स्वतंत्रपणे अस्तित्वात होती.











 आजचे कोल्हापूर हे पूर्वीच्या सहा खेड्यांनी बनलेले असून त्यातील एका खेड्याचे नाव रावणेश्वर. करवीर महत्म्यात देखील याच काराणाने याला राक्षसालय असे नाव मिळाले असावे. या खेड्याची ग्रामदेवता मुक्ताबिका तर भेरव आणि कालभैरव हे क्षेञपाल असून रावणेश्वर हा गावचा महादेव होता. या तळ्यातीलच अनेक भाग सीता, मारुती व प्रीजाटा यांच्या नावाने ओळखले जात. शहर सुधारणेच्या काळात हे तळे मुजवून तेथे खेळाचे मैदान झाले. पण देव रामेश्वर माञ रावणेश्वर या नावान तसाच राहिला. आरंभी साध्या लोखंडी छञी खाली असणार्या देवालयाचा जिणौधार १९९४ साली झाला. आणि त्या ठिकाणी शिवलिंगाच्या आकारचे नवे मंदिर बाधण्यात आले. सन २०१३ मध्ये याला शिखर चढवण्याचे नियोजन करण्यात आले. व कर्नाटकातील कसबी कारागीरांच्या हातून एक एक शिल्पकुती साकरली गेली आहे.

जगा आगळी काशी म्हणवणार्या अशा या करवीर क्षेञाला सर्व प्रकारची समुध्दी लाभलेली असून ती फक्त भौतिक आणि सांस्कुतिक नव्हे तर अध्यात्मिक आणि थोर विभूतींच्या आशीर्वादाची व पदस्पर्शाची पण आहे. करवीर क्षेञाचे वर्णन करताना महात्म्यात म्हटलय की.
" करवीर जलंशंभु पशाणस्तु जनार्दना
सिकुता मुनया सर्वेतरवा:सर्वदेवता "
म्हणजेच करवीर क्षेञात जलरुपाने शंकर , पाषाणरुपाने विष्णू तर वाळुच्या कणरुपात साधुमुनी आणि वुक्ष रुपात सर्व देवता निवास करतात. अशा या करवीर क्षेञी अनेक थोर विभूतीना श्री. जगदेम्बेच दर्शन घेतल आणि या क्षेञी आपली आठवण म्हणुन लिंगे किंवा तीर्थ स्थापना केली. श्री. विष्णूच्या दहा अवतरापैकी मत्सय , कूर्म , वराह , आणि वामन हे चार अवतार वगळता इतर सर्व अवतार या करवीर क्षेञी येऊन गेल्याची कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते.पदमाळ्याच्या काठावर श्री. नरसिंह , कात्यायनी जवळ परशुराम आणि गोकुळ शिरगाव क्षेञी श्रीकुष्ण अशा या अवतार परंपरेत मर्यादा पुरुषोत्यम श्री. रामचंद्रानी आपल्या पदस्पर्शांनी पावण केलेले क्षेञ म्हणजे श्री. रावणेश्वर मंदिर होय.
भगवान विष्णूच्या याच लिला प्रसंगला जोडून करवीर महात्म्यात असा उल्लेख येतो कि प्रभू रामचंद्र वनवसात असताना. लक्ष्मण व सीता मातेसह या करवीर क्षेञी आले व दशरथ राजाला पिंडदान करण्याची वेळ आली असता अन्य काही साधन न मिळाल्याने सीता मातेने वाळुची पिंड तयार करुन ते जवळच वाहणार्या जयंती नदीत प्रवाहीत केले. माता सीतेचा श्रध्दाभाव आणि करवीर क्षेञाच्या अगाध प्रभावामुळे दशरथ राजा तुप्त होऊन मोक्षास गेला. वास्तविक पाहता पिंडदानाचा अधिकाल पुञाचा आणि शास्ञ विधानाप्रमाने तो पिंड हा सातूच्या पिठाचा किंवा भाताचा हवा असे असताना एका स्ञीच्या हातुन वाळुच्या पिंडदानाने सासर्याला मोक्ष मिळणे. ही गोष्ट करवीर महात्म्य स्पष्ट करणारी आहे.करवीर क्षेञाचे हे महात्म्य जाणून प्रभू रामचंद्रानी इथल्या एका तीर्थाच्या काठावर स्वत:च्या नावे लक्ष्मणाने आपल्या नावे अशी दोन लिंग स्थापन केली. सध्या रावणेश्वर मंदिराच्या गाभार्यात जे लिंग आहे. ते रामेश्वर लिंग. तर मंदिराच्या आवारात जे बाहेर लिंग आहे ते लक्ष्मणेश्वर लिंग होय. तर इथल्या तीर्थाला ( तळ्याला ) सीता तीर्थ म्हणून ओळखले जाते. काळाच्या ओघात इथे असणार्या तळ्याला रावणेश्वर तळ्याकाठी असणार्या रामेश्वरालाच लोक रावणेश्वर म्हणू लागले.
मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी प्रवेशव्दारवरती आपणास श्री शिवशंकराची ध्यानस्थ मुर्ती पहावयास मिळते.
नांदी व मोर यांच्या शिल्पांनी अलंकुत अशा प्रवेशव्दारातून आत येतानच मंदिराच्या संरक्षक भिंतीवरती आपणास बारा जोतिलिंगाची उठाव शिल्पे पहावयास मिळतात.
श्रीं चे दर्शन घेऊन गाभार्यातून बाहेर पडताच वर मोठया आकारात राज्याची शक्ती परंपरा समुध्दी करणार्या महालक्ष्मी , तुळजाभवानी , रेणुकामाता व सप्तशुंगी या साडेतीन शक्तीपीठ देवतांच्या प्रतिमा त्यांच्या स्तुती मंञासहित आहेत.
या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे शिवनिर्माल्य कोठेही ओलांडले जात नाही माञ श्री लिंगाजवळ चंडेश गणाची स्थापना केल्याने निर्माल्य दोष नाहिसा झालेला असुन त्यामुळे मंदिरात पुर्ण प्रदक्षिणा घालता येते.
या मंदिराचे सर्वांत आधिक लक्ष वेधणारे वेशिष्टय म्हणजे याचे शिखर , या शिखराच्या पुर्वेस भगवान महादेव गौरी , गणपती , स्कंद ( कार्तिक ) यांच्या समवेत सहपरिवार कुटूंब वात्सल्यरुपात आहेत.
उत्तरेस पंचानन म्हणजेच पाच मुखे असणारी महादेवाची मुर्ती असून सघोजात , अघोर , ईशान , वामदेव व तत्पुरुष अशी जगालाज्ञान देणारी जल , अग्नी , वायु , पुथ्वी व आकाश या तत्वांची प्रतिनिधित्व करणारी ही मुखे असून महादेवाच्या या रुपालाच सदाशिव असे म्हणतात. पश्चिम दिशेला भगवान महादेव नटेश्वर रुपात आपले दर्शन देतात. सुजन , पालन व संहार या तिन्ही स्थितीवरील स्वत:चे नियंञण यात दिसते. या सर्वासोबत सगळ्यात महत्वाचे शिल्प दक्षिणेस आहे.आणि ते म्हणजे शिवआराधना करणारा रावण. या आणि अशा अनेक शिल्पवैभवानी समुध्द असणारे असे हे श्री. रावणेश्वर मंदिर हरी आणि हर या दोन्ही देवतांच्या भक्तांना प्रिय होईल यात शंकाच नाही. 
 मध्ययुगीन कोल्हापूर

ब्रम्हपुरी शहराचा दुसऱ्या शतकात नाश झाल्यावर या भागाचे महत्व कमी झाले इ.स. ५०० पर्यंतच्या शिलालेखात कोल्हापूरचा स्वतंत्र उल्लेख आढळत नाही. इसवी सन २०० ते ८०० पर्यंतच्या काळात कोल्हापूरला राजकीय किंवा धार्मिक महत्त्व नव्हते. म्हणून या सहा शतकांना कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते. श्री महालक्ष्मीच्या देवालयाने या रात्रीचा शेवट केला इसवी सन ९ व्या शतकाच्या दरम्यान या देवालयाची पूर्तता झाली चालुक्य राजवंशातील राजा कर्णदेव यांनी इसवी सन ६३४ मध्ये श्री महालक्ष्मीचे देवालय बांधले. परंतु या देवालयाचे बांधकाम बरेच दिवस चालू होते. हे देवालय एकाचवेळी व एकाच राजाने न बांधता वेळोवेळी अनेकांनी त्यांची वाढ केली किवा त्यात सुधारणा केली. देवालयाच्या पूर्णतेनंतरच कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र संपून उत्कर्षास सुरूवात झाली.
श्री महालक्ष्मीच्या देवालयाबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे की हे देवालय एका रात्रीत बांधले गेले. खोल विचार करता हे अर्धसत्य असल्याचे आपणास पटते. या दंतकथेतील सत्य इतकेच की ती रात्र नेहमीची १२ तासाची नसून सुमारे २०० वर्षापेक्षा जास्त काळाची आहे. ही रात्र म्हणजेच करवीरच्या इतिहासाची रात्र होय. इ.स.२०० ते ८०० वर्षाचा काल हा कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते हे वर उधृत केले आहे. आणि याच ऐतिहासिक रात्रीच्या शेेवटच्या दोन शतकात हे महालक्ष्मीचे देऊळ बांधले गेले आहे. तेव्हा आपण हेे लक्षात घेतले पाहिजे की एखादी दंतकथा जेव्हा तयार होते ती कोणत्या ना कोणत्या तरी अल्पशा का होईना सत्यावर आधारीत असते. एक लहान बिंदू मध्याभोवती हवे तेवढे मोठे वर्तुळ निर्माण करता येते, तसेच अल्पशा सत्यांशावर अतिशयोक्तीपूर्ण दंतकथा निर्माण हेात असते.
श्री महालक्ष्मी देवालयाशी संबधित एक वैशिष्ट्य वा वैचित्र्य दिसून येते. सर्वसाधारणपणे उंचवट्याच्या जागा किंवा टेकड्यावर देवालये बांधली जातात. परंतु या देवालयाच्या बाबतीत पाहिले असता, हे देवालय अगदी सखल भागात बांधले आहे. या देवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही दिशेने आले तरी खाली उतरावे आगते. सध्या देवळाभोवती दाट वस्ती असल्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीची स्पष्ट कल्पना येत नाही. ही जागा सखल, दलदलीची व जवळूनच ओढा वाहणारी होती. अशा जागेत देऊळ का बांधले गेले हे जरी सांगता येत नसले तरी एवढे मात्र सत्य की अशा घाणेरड्या व दलदलीच्या जागेवर देऊळ बांधल्यामुळे तिचे नंदनवन झाले. मेजर ग्रॅहमने कोल्हापूरला करवीर असे का म्हणतात याचे कारण सांगितले आहे. महालक्ष्मीने आपल्या कराने हा प्रदेश प्रलय काळाच्या पाण्यामधून वर उचलला (वीर) म्हणून त्याला करवीर असे म्हणतात. करवीर महात्मामध्येही अशाच अर्थाचा उल्लेख आहे. याचा भौगोलिक अर्थ एवढाच की, हा भाग प्रथम सखल व दलदलीचा होता, आणि या देवालयामुळे तो वर उचलला जाऊन स्वच्छ व सुंदर झाला. (याच सारखे अगदी अलिकडे म्हणजे दहा वर्षातील छोटेसे उदाहरण म्हणजे जयंतीच्या नाल्याजवळील गणेश मंदिरासमोरील जागाही अशीच घाणेरडी होती. परंतु तेथे महादेवाचे देवालय उभारल्यावर तीच जागा स्वच्छ, पवित्र व प्रसन्न वाटू लागली.)
श्री महालक्ष्मी देवालय स्थापन झाल्यांनतर प्रथमच करवीर हा शब्द वापरलेला आढळतो. तत्पूर्वी या शहराचा उल्लेख करताना कोल्हापूर, कोल्लपूर, कोलगिरी, कोल्लादिगिरी पट्टण इत्यादी नावे वापरलेली दिसून येतात. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी व त्यानंतर अनेक शतकांपर्यंत या शहराचे जुने व सार्वसंमत असे नाव म्हणजे कोल्लापूर म्हणजे दरीतील गाव. कोल्लादिगिरीपट्टण याचा अर्थ थोडासा विस्तारित पण तसाच आहे. कोल्ला म्हणले सखल भाग, गिरी म्हणजे डोंगर वा पर्वत, ददिगिरी(द-दि+गिरी) म्हणजे पर्वताने व डोंगराने वेढलेले शहर वा गांव. भौगोलिक दृष्टीने हे नाव सार्थ आहे. पंडित वा पुजारी वर्गाने कोल्लापूर याचा अर्थ अडाणी लोकांना पटवून सांगण्याकरिता अक्कल हुषारी वापरून, घाणेरड्या जागेचा महालक्ष्मी देवालयामुळे नाश झाला असे सांगण्याऐवजी कोला नावाच्या राक्षसाचा (घाणेरड्या जागेचे रूपक) महालक्ष्मीने वध केला, अशी दंतकथा निर्माण केली. अडाण्यांना पटवून सांगण्याचा हा एक प्रामाणिक उपाय किंवा प्रयत्न आहे. कालांतराने शब्दाचा मूळ अर्थ विसरला गेल्यामुळे शहाण्या सुशिक्षित लोकांना ती दंतकथा वाटू लागली इतकेच आणि आजही कोणी शब्दाचा मूळ अर्थ व कथेचा उद्देश लक्षात घेत नसल्यामुळे तिला दंतकथाच मानले. एकोणिसाव्या शतकापर्यंम्त कोल्लापूर अगर कोलापूर असेच शब्द वापरले जात होते. कोला या शब्दावरून व्युत्पती रूढ झाल्यावर त्या शब्दाचा उच्चार कोल्हा असा झाला असावा. किंवा कोल्लापूर या शब्दाचे कानडी वळण टाकून त्याला शुद्ध मराठी स्वरूप देताना या ह कराचा प्रवेश झाला असण्याची शक्यता अधिक आहे.

धार्मिक कंेद्र
श्री महालक्ष्मी देवालयानंतर कोल्हापूरचे साध्या गावामधून प्रथम तीर्थामध्ये व नंतर महातीर्थामध्ये रूपांतर झाले आणि पंडित पुजाऱ्यांनी तर धार्मिक दृष्ट्या फारच महत्त्व मिळवून दिले.

राजकीय केंद्र
अल्पावधीतच कोल्हापूर हे केवळ धार्मिक क्षत्रे न राहता, राजकीय केंद्रही बनले. राष्ट्न्कूटानंतर इ.स. १२ व्या शतकात कोल्हापूर व परिसरात वंशाच्या राजांचे राज्य होते. त्यानंतर या भागात देवगिरीच्या यादवांचे राज्य स्थापन झाले व त्यंाच्या एका प्रांताची राजधानी कोल्हापूर ही होती. याचा अर्थ कोल्हापूरला ११ व्या शतकानंतर पुन्हा राजधानीचे स्वरूप आले. परंतु यावेळी ही राजधानी ब्रम्हपुरीवर न होता महालक्ष्मीच्या देवालयाजवळ ठेवली गेली. इ.सन. १३०६ ते १३०७ मध्ये देवगिरीच्या यादवांचा मुसलमानांनी पाडाव केला. तेव्हापासून ते इ.स. १६५९ साली थोरल्या शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकेपर्यंत या भागात मुसलमानांचा अंमल होता. त्यांनी श्री महालक्ष्मी देवालय हेच केंद्र समजून आपली वसाहत केली. त्यांचा राजवाडा हल्लीच्या जुन्या राजवाड्याच्या जवळच कुठेतरी असावा. त्यांनी तीन मोठ्या मशिदी देवालयाच्या जवळच व सभोवती बांधल्या. आश्यर्य म्हणजे एकाही मुसलमान राजाने महालक्ष्मी देवालयाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला नाही. (खुद्द औरंगजेबही कोल्हापूरला येऊन गेला होता) याचे कारण म्हणजे इथल्या हिंदूंना त्यांनी सहिष्णूतेची वागणूक दिली असावी. १७ व्या शतकात छ. शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची स्थापना केली व कोल्हापूरास छत्रपतींचे राज्य सुरू झाले. त्यानंतर ताराबाईने करवीर राज्यांची स्थापना केल्यामुळे कोल्हापूराचे महत्व त्याला प्राप्त झाले. इ.स. १० व्या व ११ व्या शतकापासून चालत आलेल्या या परंपरेला अनुसरून छत्रपतींनीसुद्धा श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र मानून कुलस्वामिनी भवानीचे देवालय व राजवाडा श्री महालक्ष्मीचे देवालयाशेजारीच बांधला.

श्री महालक्ष्मी देवालयाचा परिसर
महालक्ष्मीचे देवालय हे धार्मिक केंद्र बनल्यावर पुजारी वर्ग, भक्तगणांच्या व्यवस्थेसाठी जरूर असणारे व्यापार, उद्योगधंदा, नोकरी वगैरे करणारी माणसे हळूहळू वाढू लागली. काही भक्तगण तिथेच कायम वास्तव्य करून राहिले. अशारितीने वस्ती वाढत असतानाच मुसलमानांनी देखील आपल्या वसाहती तिथे केल्या. त्यांनी त्या भोवताली मातीचा कोट बांधला व खंदक खणून किल्ल्याचे स्वरूप आणले. पुढे-पुढे मराठा अमलदारामध्ये इथे राजधानी आल्यावर वसाहतीत मोठीच वाढ झाली. राजवाडा झाल्यामुळे तर इतर सर्व जहागिरदार व मानकरी मंडळींनी देखील आपापले वाडे इथेच बांधले. मग इतर इनामदार आले. सर्वांची इच्छा ही की आपण किल्ल्यातच राहावे. यामुळे किल्ला भागात गर्दी झाली. पुढे राजधानीच्या संरक्षणासाठी मातीचा तट पाडून दगडी तट बांधला गेला.

श्री महालक्ष्मी देवालयाचा पूर्वीच्या सहा नैसर्गिक केंद्रावर झालेला परिणाम:
श्री महालक्ष्मीचे देवालय हे ब्रम्हपूरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, व रावणेश्वर या सहाही केंद्राच्या मध्यभागी स्थापिले गेले आणि देवालयाभोवती वसाहती होऊन त्यांना धार्मिक व राजकीय महत्व प्राप्त झाल्यामुळे ही सहाही केंद्राकडून मध्यवर्ती केंद्राकडे वसाहत वाढू लागली. सर्व सहा नैसर्गिक केंद्र व महालक्ष्मी देवालयाची वसाहत पूर्णपणे एक होण्यास जवळ जवळ एक हजार वर्षाचा कालावधी लागला. मध्यवर्ती केंद्रात अनेक कारणांमुळे जागा न मिळाल्यामुळे इतर सहाही केंद्राची वस्ती वाढू लागली व काही काळाने शहर व उपनगरे अशी स्थिती निर्माण झाली. पुढे उपनगरे विस्तृत पावून ती शहरात मिसळून गेली. त्यामधून १९ व्या शतकातील मोठ्या कोल्हापूर शहराचा जन्म झाला.
ही सर्व जागा एकत्र जोडली जाऊनही नवीन वसाहतीची गरज भासू लागली. त्यातूनच काही नवीन वसाहती निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यामध्ये शनिवार पेठ व सोमवार पेठ या दोन पेठांचा उल्लेख केला जातो. कुंभार व लोणारी यांचेकरिता किल्ल्याबाहेर खंदकापलिकडे (सध्याची पापाची तिकटीजवळ) सखल भागातील जागा देण्यात आली. शहरानजीक उत्तम शेती असलेली जमीन व तलावांनी व्यापलेली जागा सोडून इतर सर्व जागेवर वसाहतींची स्थापना झाली व जुन्या वसाहतीमध्ये वाढ झाली.

इ.स. १८६२ मधील कोल्हापूर.
१८६२ मधील कोल्हापूरचा नकाशा उपलब्ध आहे. या नकाशावरून त्यावेळीच्या कोल्हापूरची स्पष्ट कल्पना येते. शहरात मुख्यत: दोन उल्लेखनीय गोष्टी त्या काळात आढळतात. त्या म्हणजे कोल्हापूरानजीक असलेल्या अनेक सुंदर बागा व तलाव. याखेरीज नकाशात कल्पना न येणाऱ्या गोष्टी म्हणजे आरोग्य व स्वच्छता. तत्कालीन दोन इंग्रजी अधिकाऱ्यांच्या लिखाणावरून या बाबतीत त्यावेळच्या कोल्हापूरची स्थिती अत्यंत निरााशाजनक होती, असे दिसून येते. शहराची रचना वाकडी तिकडी, रस्ते अरूंद व चिंचोळे, स्वच्छता व आरोग्य अनियमित, गैरसोईच्या इमारती, घाण व दुर्गंधी इत्यादी गोष्टी शहरात आढळून येतात. अशा प्रकारे मध्ययुगातील कोल्हापूर शहराचे अवलोकन केल्यानंतर अर्चाचीन काळातील या शहराची स्थिती, वाढ विकास इत्यादींचे निरीक्षण पुढे केले आहे.
अर्वाचीन काळातील कोल्हापूर शहर
अर्वाचीन काळातील कोल्हापूराची सुरूवात इ.स. १८४४-४८ पासून झाली. इ.स. १८४४ मध्ये ब्रिटीश सरकारने कोल्हापूर शहराच्या संस्थानचा कारभार आपल्या हाती घेतला आणि तो पाहण्याकरिता मेजर ग्रॅहम यांची नेमणूक केली. इ.स. १८४५-८ च्या दरम्यान रेसिडेंसीच्या इमारती बांधल्या गेल्या. कोल्हापूरला ब्रिटीश सरकारचा जो प्रतिनिधी असे त्याला सुरूवातीस पोलिटिकल सुपरिटेंडेंट असे नाव देण्यात आले व शेवटी रेसिडेंट असे नामाधिकरण करण्यात आले. अशा रीतीने कोल्हापूर शहराच्या इतिहासात एक नवीन राजकीय केंद्र निर्माण झाले. रेसिडेंसीकरिता निवडलेल्या जागेवर ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अंमल होता. या जागेत कलेक्टर, जिल्हा न्यायाधिश व पोलिस अधिकारी यांचे बंगले, पोलिस हेड पॅटर, रेसिडेंसी क्लब, जिल्हा इंजिनियर यांची कचेरी इत्यादी इमारती व त्यालगतच्या ताराबाई पार्क पर्यंतचा सर्व भाग यांचा समावेश होता. प्रथमत: कोल्हापूरला लष्कर होते आणि त्यामुळे त्यावेळची रेसिडेंसी हद्द फारच मोठी होती. नंतर लष्कर हालविल्यावर हद्द थोडी कमी करण्यात आली. रेसिडेंन्सी स्थापनेनंतर अंदाजे शंभर वर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ साली ह्या सर्व हद्दीवर पुन्हा संस्थानांचा अधिकार निर्माण झाला.


रेसिडेंसीमुळे १८४४ नंतर कोल्हापूरचे राजकीय केंद्र महालक्ष्मी देवालयापासून दूर असे एक स्वतंत्र केंद्र निर्माण झाले. तत्पूर्वी असलेली धार्मिक व राजकीय युती रेसिडेंसीमुळे मोडली गेली. इ.स. १८७७-८४ च्या काळात रेसिडेंसीजवळच नवा राजवाडा बांधला गेला व महाराज तेथे राहू लागले. तेव्हापासून तर ते संपूर्णतया राजकीय के्रंद्र व देवालय हे फक्त धार्मिक केंद्र अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा महाराजांना वाटले की राजवाडा देवालयाशेजारीच असावा. १८७७ साली नवा राजवाडा बांधण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लोकांना वाटले की छत्रपतींचा वाडा रेसिडेंसीच्या वाड्याजवळ असावा.
रेसिडेंसीच्या परिणाम म्हणून सभोवताली विशिष्ट प्रकारची वसाहत निर्माण झाली. इतर सरकारी कचेऱ्या अधिकाऱ्यांचे बंगले, मिशनऱ्यांच्या संस्था, श्रीमंत व्यापारी व जमीनदार, पेन्शनर अधिकारी इत्यदींच्या या वसाहतीत समावेश होत असे. त्याचबरोबर नव्या राजवाड्यात महाराज रहायला आल्याबरोबर इतर जहागिरदार, उमराव मंडळीही आली. एक चर्चही उभारले गेले. पुढे ताराबाईर् पार्क स्थापन झाले आणि लवकरच रेसिडेंसीच्या सभोवती एक सुंदर उपनगर स्थापन झाले.
रेसिडेंसीचा आणखी एक परिणाम म्हणजे कोल्हापूर हे दळणवळणाचे मोठे केंद्र बनले. पुणे व बेंगलोर ही मुख्य लष्करी ठिकाणे जोडताना इतर लहान लष्करी केंद्राबरोबरच कोल्हापूरवरून हा रस्ता केला गेला. या प्रमाणे समुद्राकडे जाण्यासाठी आंबा घाट फोडून कोल्हापूर रत्नागिरी हा रस्ता केला गेला. या रेसिडेंसीचा संबंध असलेली सांगली व मिरज ही शहरे जोडणारा रस्ताही झाला. कोल्हापूर हे प्रत्येक पेठेला व जहागिरीला जोडलेले असल्यामुळे पन्हाळा, बावडा, राधानगरी, गारगोटी, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा इत्यादी गावांशी रस्त्याने जोडले गेले. अनेक पूल बांधण्यात आले. चिकोडी रोड-फोंडा रस्त्यामुळे कोल्हापूर हे सावंतवाडी, विजयदुर्ग व मालवण या भागास जोडले गेले. शेवटी १८९१-९२ ला मिरजेहून कोल्हापूर रेल्वे लाईन टाकण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर हे एक मोठे दळणवळाचे केंद्र बनले. आंबा फोंडा घाट फोडल्यामुळे कोल्हापूरला जवळ-जवळ कोकणाचे दार म्हणण्याइतपत महत्व आले.

इ.स. १८४४ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी अधिकार सूत्रे धारण केली त्यावेळी त्यंाच्या लक्षात आले की स्टेशनजवळ एक व्यापारी पेठ करता येणे शक्य आहेे, म्हणून त्यांनी इ.स. १८९५ मध्ये शाहूपुरी वसाहत स्थापन करण्याची आज्ञा केली. १९२० पर्यत त्या वेळचे संस्थानचे इंजिनियर रावसाहेब विचारे व नगरपालिकेचे सुपरिटेंडेंट श्री भास्करराव जाधव यांनी ती आज्ञा पार पाडली. कोल्हापूरच्या आसपास ऊसाची लागवड करून गूळ तयार करण्याची पद्धत फार पूर्वीपासून होती

शाहू महाराज

कोल्हापूर देशाच्या सर्वात जुन्या नागरी संस्कृतींपैकी एक आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास 17 व्या शतकापासून प्रसिद्ध आहे. पंचगंगा नदीच्या काठावर वसल्यामुळे, कोल्हापुरास दक्षिण काशी असे म्हणतात. कोल्हापूर शहराने विविध राजवटी पहिल्या आहेत आणि मराठ्यांच्या उदयापासून हे स्थान अजून ऐतिहासिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८९४ मध्ये छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे राज्यकर्ते झाले आणि ५० वर्षांच्या जुन्या प्रशासकीय सेवेचा शेवट केला. १८९४ ते १९२२ पर्यंतच्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सुधारणांचा एक नवीन युग घडवला ज्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील महान शासकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. १८९४ ते १९२२ पर्यंत राजर्षींच्या केवळ 28 वर्षांच्या सर्वांत उत्कंठित आणि प्रगतशील राजवटीमुळे कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराज हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक वैशिष्ट्यपूर्ण युगचिन्ह आणि एक महत्त्वपूर्ण राज्यकर्ते बनले कारण त्यांनी वेदोक्त आंदोलन, सत्यशोधक चळवळीसारख्या क्रांतिकारी स्वभावाच्या अनेक सामाजिक-धार्मिक चळवळींना मदत केली. या हालचाली मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील नवीन सामाजिक नेतृत्वाच्या उदयप्रसारास मदत करण्याकरिता जबाबदार होत्या. हे लक्षात घेणे उचित आहे की छत्रपती शाहु महाराज हे या चळवळीचे व हालचालींचे सामर्थ्यवान व प्रमुख केंद्र होते. त्यांनी सामाजिक पुनरुज्जीवन आणि महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचा मार्ग बदलण्यावर प्रचंड प्रभाव पाडला. छत्रपती शाहूंच्या राजवटीनंतर, भोसले राजवंश घराणे हे कोल्हापूरच्या सिंहासनावर विराजमान आहेत. स्वातंत्र्योत्तर काळानंतर कोल्हापूर संस्थान प्रामुख्याने भारतीय राष्ट्रात विलीन होऊन एक अविभाज्य अंग बनले आहे. कोल्हापूरच्या लोकांमध्ये राजघराण्याबद्दलचा आदर सन्मान अजूनही अबाधित आहे. ९ मे १९८३ रोजी श्रीमंत शाहु छत्रपती महाराज दुसरे हे राजेशाही सिंहासनावर बसले असून सध्याच्या रॉयल हाउसचे प्रमुख आहेत.

shahu_maharaj

 कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?

फार पूर्वीपासून सामान्य लोक आपले नांव लिहिताना स्वतःचे नांव, वडिलांचे नांव व आडनाव या क्रमात लिहितात. पूर्वी बादशहांच्या पदरी असणारे मराठा सरदार फारतर नावापुढे आपला किताब अथवा बिरुद जोडायचे. शिवाजी महाराजांचे घराणेही यास अपवाद नव्हते. महाराजांचे वडील शहाजीराजे आपल्या नावाबरोबर फर्जंद व सरलष्कर ही बिरुदे लिहायचे(?) मात्र नांव लिहिताना स्वतःचे नाव व आडनाव असाच क्रम असायचा. शिवपूर्वकालापासून सर्वच मराठा सरदार याच पद्धतीने आपली नावे पत्रव्यवहारांमध्ये लिहीत असत. उदा., पिराजीराव घाटगे सर्जेराव, दौलतराव जाधव सरनौबत इत्यादी. अशापद्धतीने सामान्य रयतेप्रमाणे व सरदार-जहागिरदारांप्रमाणे नावामध्ये आडनावाचा उल्लेख शिवराय देखील करायचे. राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत त्या पत्रांमध्ये "राजेश्री सिवाजीराजे भोसले" असा अथवा अशा सर्वसामान्य पद्धतीनेच शिवरायांचा नामोल्लेख आढळतो. मात्र १६७४ साली महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर महाराज व महाराजांचे घराणे सामान्य राहिले नव्हते, शिवाजीराजे भोसले हे आता कुणी सरदारपुत्र नव्हते तर ते एक सार्वभौम अभिषिक्त राजे होते. शिवराय "छत्रपती" झाले होते. यामुळे साहजिकच आपल्या सर्वसामान्य नामाभिधानाचा त्याग करणे व नवीन नांव धारण करणे शिवरायांना क्रमप्राप्त होते, आणि म्हणूनच "राजेश्री शिवाजीराजे भोसले" या आपल्या नावाचा त्याग करुन सार्वभौम अभिषिक्त नृपतीस शोभेल असे,
"क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असे नवीन नांव महाराजांनी धारण केले. राज्याभिषेकानंतरच्या एकाही पत्रव्यवहारामध्ये महाराजांनी आपल्या नावापुढे "भोसले" हे आडनांव एकदाही जोडलेले नाही. महाराजांनी इतरांना लिहिलेल्या व इतरांनी महाराजांना लिहिलेल्या अशा सर्व पत्रांमध्ये "क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असाच उल्लेख आढळतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनंतर छत्रपतींच्या गादीवर विराजमान झालेल्या कोणत्याही छत्रपतींनी व छत्रपती घराण्यातील कोणत्याही सदस्याने आपल्या नावापुढे "भोसले" असे आडनाव लिहिलेले नाही व तसे ऐतिहासिक उल्लेखही आढळून आलेले नाहीत. छत्रपती, महाराणी व युवराजांसाठी वेगवेगळ्या बिरुदावल्या होत्या. उदाहरणासाठी अनुक्रमे :
क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति,
अखंडलक्ष्मी अलंकृत महाराणी लक्ष्मीबाई छत्रपति,
युवराज राजेश्री राजाराम छत्रपति किंवा चिरंजीव विजयीभव राजे राजाराम छत्रपति. यामध्ये कुठेही भोसले आडनावाचा उल्लेख आढळत नाही. सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने आडनावासहीत आपले नाव लिहितात त्या पद्धतीने नाव लिहायला छत्रपती म्हणजे कोणी सर्वसामान्य नव्हेत. छत्रपती म्हणजे क्षत्रिय कुलातील सर्वोच्च आहेत, ते अभिषिक्त राज्यकर्ते आहेत, म्हणूनच त्यांचे नामाभिधानही सर्वसामान्यांपेक्षा पूर्णतः अलग आहे; ज्यामध्ये आडनावाचा उल्लेख नसतो. भोसले हा सर्वसामान्य वंश आहे तर "छत्रपती" हा एकमात्र सर्वश्रेष्ठ वंश आहे.
याचे ऐतिहासिक संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची स्वतः महाराजांची पत्रे, स्वराज्याची नाणी, छत्रपती व सरदारांच्या राजमुद्रा, सरदार मंडळींच्या पत्रातील छत्रपतींचे उल्लेख असे अनेक पुरावे आहेत.
उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व कोल्हापूरचे छत्रपती दुसरे संभाजीराजे यांनी पाडलेल्या शिवराई, होण, शंभुराई या नाण्यांवर त्यांचा उल्लेख
- श्री राजा शिवछत्रपति
- श्री राजा शंभुछत्रपति असा आहे. तसेच महाराजांच्या पदरचे सरदार - जहागीरदार यांच्या मुद्रेतही महाराजांचा उल्लेख असाच असलेला दिसतो.
- कोल्हापूरच्या सर्व छत्रपतींच्या राजमुद्रेतही छत्रपतींचे नाव असेच आढळते. उदाहरणार्थ शाहू महाराजांची राजमुद्रा. ( श्री महादेव श्री तुळजाभवानी चांद्रीलेखेव वर्धिष्णुर्जनानंदप्रदायिनी शाहू छत्रपतेर्मुद्रा शिवसूनोर्विराजते.)
सदर लेखनास पूरक म्हणून एक प्रसंग सांगणे आम्ही उचित समजतो,
राजर्षि शाहू छत्रपती महाराजांचे चिरंजीव युवराज राजाराम महाराजांचा विवाह बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या नातीशी होणार होता. या विवाहाच्या पत्रिका काढताना गायकवाडांनी राजाराम महाराजांचा नामोल्लेख "राजाराम छत्रपती" असा न करता "राजाराम भोसले" असा केला. पुढे विवाह समारंभासाठी शाहू छत्रपती महाराज व कोल्हापूरचे सहाशे लोक बडोद्यास गेले असताना त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या विशेष निमंत्रणपत्रिकेत व हुंड्याच्या कागदपत्रांतही "राजाराम भोसले" असाच उल्लेख करण्यात आला होता. गायकवाडांनी आरंभलेला छत्रपती घराण्याचा उपमर्द कोल्हापूरच्या रयतेस रुचला नाही. कोल्हापूरकरांच्या वऱ्हाडामध्ये या प्रकरणामुळे तीव्र नाराजी उमटली. शाहू महाराजांकडे सरदारांनी गायकवाडांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. अर्थात महाराजही या प्रकाराने संतप्त झाले होते मात्र ऐन विवाहप्रसंगात ठिणगी पडू नये व काही विपरीत घडून छत्रपतींच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचू नये म्हणून छत्रपतींनी या प्रकरणाचा भडका उडण्याआधीच ते दडपले. (संदर्भ- महाराष्ट्र शासन प्रकाशित राजर्षि शाहू गौरव ग्रंथ, कृ.गो. सूर्यवंशीकृत राजर्षि शाहू छत्रपती राजा व माणूस.)
कोल्हापूरच्या छत्रपतींना उद्देशून काही लोक म्हणतात की यांना (म्हणजे छत्रपतींना !) शिवरायांचे "भोसले" आडनाव लावायला लाज वाटते ! तर प्रश्न लाज वाटण्याचा अथवा अभिमान वाटण्याचा नाही ; प्रश्न आहे गौरवशाली परंपरेचा, जी दस्तुरखुद्द थोरल्या महाराजांनी सुरु केली होती आणि कोल्हापूरचे विद्यमान छत्रपति महाराज ती तितक्याच श्रद्धेने पाळतात....
आता लोकांचा प्रश्न उरतो की असे आहे तर मग सातारचे छत्रपती का आडनाव लावतात ? तर याचे उत्तर, सातारचे छत्रपती हेदेखील भोसले आडनाव लावत नव्हते. जोपर्यंत सातारची गादी स्वतंत्र होती तोपर्यंत सातारचे छत्रपती देखील आपला उल्लेख याच पद्धतीने करायचे. (उदा. क्षत्रियकुलावतंस श्रीराजा प्रतापसिंव्ह छत्रपति.) मात्र सन १८४८ साली इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करुन सातारची गादी खालसा केली तेव्हापासून सातारच्या छत्रपतींचा उल्लेख कागदोपत्री भोसले असा होऊ लागला व पुढे तेच रूढ झाले. १८४८ पूर्वी सातारच्या गादीवरही कोणत्याही छत्रपतींनी भोसले आडनाव लावल्याची अस्सल कागदपत्रे मिळत नाहीत.
इतिहासविषयक अशाच माहितीसाठी Karvir Riyasat हे पेज जरूर Like करा.
पोष्ट साभार :- करवीर रियासत फेसबुक पेज

शाहू कालीन सिंचन व्यवस्था

कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानयानासाठी स्वतची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरण पूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती व आज हि सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे.या सिंचन व्येव्स्तेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झरा ला सुरवात होते तीतून ते कळंबा तलाव येथे आणले.तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच ठेवला जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा केवा इतर काही जाऊन दुषित होऊ नये कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्या द्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले या साठी भौगोलिक परीस्थिती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहरात पुरवले जात होते.


पंचगंगा नदी कोल्हापूर
पंचगंगा नदी कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक 'शिवाजी पूल'

२३ अॉक्टोबर १८७१ रोजी कोल्हापूरच्या राजगादीवर अभिषिक्त झालेले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना इतिहास 'चौथे शिवाजी' या नावाने ओळखतो, कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवर बसणारे 'शिवाजी' या नावाचे ते चौथे राजे होते.
चौथे शिवाजी महाराज यांची कारकिर्द सन १८७१ ते १८८३ अशी राहिली. महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर शहर व राज्यात काही नवीन व लोकोपयोगी बांधकामे करण्यात आली. कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल व पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पूल हा याच छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या काळात बांधण्यात आला.

वाहतूक व दळणवळणाच्या सोयीसाठी कोल्हापूर दरबारने पंचगंगा नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या बांधकामास सन १८७४ साली सुरूवात झाली. या कामावर आर्किटेक्ट म्हणून छत्रपतींच्या दरबाराने मेजर वॉल्टर डकेट यांची नेमणूक केली होती, तर बांधकामाचे कंत्राट 'मेसर्स रामचंद्र महादेव अँड कंपनी' यांना दिले होते. पूल बांधण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च हा छत्रपतींच्या दरबारातून करण्यात आलेला होता. सन १८७८ साली पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला झाला.
कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ, पुलाला 'शिवाजी पूल' असे नाव तेव्हाच देण्यात आले (छत्रपती शिवाजी महाराज पूल असे नव्हे !).
शिवाजी पूल बांधण्याचा निर्णय छत्रपतींच्या दरबारने घेतला, पूल बांधलाही दरबारने, पैसाही दरबारचाच वापरला. पण आज कित्येक लोक हा पूल इंग्रजांनी बांधला असे बेधडक ठोकून देतात. कोल्हापूरातील माध्यमांचे प्रतिनिधी देखील या पुलाचा उल्लेख 'ब्रिटीशकालीन पूल' असा करत याचे श्रेय ब्रिटिशांना देऊन मोकळे होतात. एखाद्या इमारतीच्या बांधकामाचा काळ सांगताना ती इमारत ज्या राज्यकर्त्यांच्या काळात बांधून झाली, त्यांच्या नावाने सांगितला जातो. कोल्हापूरचे राज्यकर्ते हे सन १९४९ पर्यंत छत्रपती महाराज होते, मग यात ब्रिटिश कुठून आले ? ते बांधकामासाठी पगारावर ठेवले म्हणून पूल लगेच ब्रिटिशकालीन होत नाही. अशात कुणी सांगत असेल की त्यावेळी देशभरात ब्रिटीशांची सत्ता होती, म्हणून पूल ब्रिटिशकालीन ! तर असेही होऊ शकत नाही, नाहीतर उद्या हेच लोक त्याकाळी देशभरात मुघलांची सत्ता होती म्हणून शिवरायांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंना मुघलकालीन वास्तू म्हणायला लागतील ! याबाबतीत कोल्हापूरकरांनी, माध्यम प्रतिनिधींनी गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. शेवटी आपला इतिहास हा आपल्यालाच जपावा लागणार आहे.
साभार :-
KarvirRiyasatFB

संस्कृती

कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.
कुस्ती
    कुस्ती’ मर्दानी कुस्ती हा कोल्हापूरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वतः एक चांगले पैलवान आहेत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात. येथील राजे शाहु महाराज हे एक पैलवान होते आणि त्यांनी स्वतः खासबाग मैदानाची कुस्ती खेळासाठी बांधणी केली. जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी तेथे रोम येथील प्रसिद्ध ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान उभारले.खासबाग हे एकमेवच भारतातील कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे.
    एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्‍या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-
१. कसबा बावडा कुस्ती केंद्र
२. खासबाग
३. नवी मोतीबाग तालीम
४. पंत बावडेकर आखाडा
५. मोतीबाग तालीम
६. शाहू आखाडा, चंबूखडी
७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड
८. शाहूपुरी आखाडा
९. शाहू विजयी गंगावेस
10.कालाईमाम तालिम 

कोल्हापूरची कुस्ती परंपरा

विविध क्षेत्रांत अग्रेसर असणार्या कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशय उल्लेखनीय आहे. कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर सार्या भारतात प्रसिध्द आहे. पुरातन काळापासून चालत आलेली एक विद्या म्हणजे मल्लविद्या! `यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचे कार्य करवीर नगरीत केलं! तळमळीनं केलं! भीमकाय, निरोगी शरीरयष्टी शाहू महाराजांना निसर्गत:च लाभली होती. स्वत:प्रमाणे आपली प्रजाही बलदंड व निरोगी शरीराची व्हावी म्हणून राजर्षींनी कोल्हापूरात अनेक तालमींची निर्मिती केली.

या तालमीतून पैलवानांच्या राहण्याची आणि दैनंदिन खुराकाची महाराजांनी व्यवस्था केली. पैलवानांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नामवंत वस्तादांची नेमणूक केली. साहित्य पुरविले आणि बघता बघता राज्याच्या आश्रयाखालील या तालमीत शड्डूचे आवाज घुमू लागले. तरुण पैलवानांची शरीर आकारु लागली. कोल्हापूरच्या विविध भागातील तालमीत व्यायाम घेऊन बलदंड शरीराचे पैलवान निर्माण होऊ लागले.

प्रत्येक तालमीत तयार होणार्या पैलवानांच्यात ईर्षा, स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कुस्त्यांची मैदाने महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भरु लागली. स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही हे त्यामागचे सूत्र होते. सुरुवातीची मैदाने मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी बाबूजमाल दर्गा आणि मंगळवार पेठेतील शिवाजी थिएटरच्या प्रांगणात भरत. शिवाय महत्त्वाच्या सणासुदीलाही कुस्त्यांची मैदाने भरविली जात. नव्या राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सभोवती कनात लावून मैदाने होत. ही सारी मोफत असल्याने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होई! कुस्त्यांच्या मैदानांचे हे लोण अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले. मैदान भरविताना होणार्या गैरसोयी महाराजांना जाणवत होत्या.

जेव्हा महाराज १९०२साली विलायतेला गेले तेव्हा त्यांनी रोमला भेट दिली. तिथली ऑलिंपिक नगरी आणि ओपन एअर थिएटर नजरेसमोरुन घातले. महाराजांचे विचार चक्र सुरु झाले. कोल्हापूरला येताच लाखभर प्रेक्षकांसाठी कुस्त्यांचे मैदान बांधण्याचे ठरले. आणि १९१२ साली खासबाग मैदानाच्या बांधकामाला सुरवात झाली. साठ फूट व्यासाचा व जमिनीपासून २ ।। फूट उंच असणारा आखाडा, प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, प्रवेशासाठी चारी बाजूला व्दार, नैसर्गिक लाभलेली उतरणी यामुळे कोल्हापूरचे खासबाग मैदान म्हणजे आशिया खंडात शोधून सापडणार नाही असे एकमेव मैदान. पुढे राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान या नावाने ओळखलं जाणारे! हजारो कामगार सहा वर्षे राबत होते.

अशा या मैदानाचे उद्घाटन अफलातून कुस्तीने झाले. कुस्ती होती गामा पैलवानचा भाऊ इमामबक्ष व गुलाब मोहिद्दीन यांच्यात. ही चित्तथरारक लढत इमामबक्षने जिंकली. कुस्ती शौकिनांनी फेटे उडवून दाद दिली. राजर्षींनी जोपासलेली ही कुस्ती परंपरा छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे सुरु ठेवण्याचे काम मनापासून केले. या मैदानात राजर्षीच्या काळापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपावेतो गामा-गुंगपासून युवराज सत्पाल अशा अनेक नामवंत मल्लांच्या लढती झाल्या. पंजाबातून आलेल्या मल्लावर इथल्या कुस्तीगिरांनी मात केली. श्रीपत चव्हाण, मल्लाप्पा तडाखे, शिवगौंडा मुत्नाळे, शामराव मुळीक, श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव, गणपतराव आंदळकर, महमंद हनीफ, दादू चौगुले, गणपत खेडकर, हरिश्चंद्र बिराजदार, युवराज पाटील इ. अनेकांची नावे घेता येतील.

ऑलिपिंक किंवा आतंरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीत कोल्हापूरच्या मल्लांनी महाराष्ट्राचे व देशाचे नाव उज्ज्वल केले. ज्यात दिनकरराव शिंदे, बी. टी. भोसले, ब्रॉन्झपदक विजेते खाशाबा जाधव, माणगावे मास्तर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. आशियाई कुस्ती स्पर्धातून कोल्हापूरच्या अनेक मल्लांनी सुवर्णपदके मिळविली. विष्णू जोशीलकर सारखे अनेक तरुण कुस्तीपटू निर्माण झाले. १ मे १९७९ रोजी खासबाग मैदान कोल्हापूर महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आल्यानंतर बर्याच सुधारणा झाल्या.

सध्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, शिवाजी विद्यापीठ आणि निरनिराळया तालमी ही परपंरा जोपासण्याचे कार्य करीत आहेत. जुन्या नामवंत मल्लांचे नव्या मल्लांना मार्गदर्शन मिळत आहे.

 शाहू महाराजांना कुस्तीचे मोठे व्यसन ..!!
कोल्हापूरचा गादीवर राज्याभिषेक झाला तेव्हापासून ते ३ ला पहाटे उठून २-३ तास लढती करत असत ..!!
महिन्यातून २ वेळा ते शिकारीला जात असत...तत्कालीन ब्रिटीश कलेक्टर यांना त्यांचा हा छन्द खूप आवडत असे,तेसुद्धा त्यांच्याबरोबर शिकारीला जात असत.
शाहू महाराज शिकार करत ती फक्त माजलेल्या वाघांची किंवा अपवाद वगळता कधीकधी जीवावर बेतले कि सांबर किंवा काळवीट याची..!!
एके दिवस रोजचा सराव संपवून राजे व ब्रिटीश कलेक्टर जंगलात शिकारीला गेले...आजचा सावज होता एक वाघ..!!
सकाळचा प्रहर टळून दुपार होत आली..शिकारी मंडळी दबा धरूनच होती..!!
मात्र पुढे त्यांना वेगळेच पाहायला मिळाले..एक पिसाळलेला गहू रेडा सैरावैरा धावत होता...त्याने जंगलात नुसता हैदोस मांडला होता .
राजे व अधिकारी घोड्यावर स्वार झाले व त्याचा पाठलाग करू लागले..
त्या गहू रेड्याने त्या माजलेल्या वाघाला आपल्या शिंगणे मारून टाकले होते..हे पाहून ब्रिटीश अधिकारी घोड्या वरून पाय उतार होऊन झाडावर चढायला धावले!!
नेमका हाच फायदा उठवत तो धुंद रेडा त्या ब्रिटीश अधिकारयाकडे आपला मोर्चा वळवत तुफान वेगाने धावत सुटला...
हे पाहून जातिवंत पैलवान असलेले शाहूराजे स्वत घोड्यावर पायउतार झाले व त्या घोड्याच्या आडवे गेले..ते ब्रिटीश अधिकारी सुसाट धावत पळत सुटले..,
राजांनी मोठ्या हिमतीने त्या रेड्याचे शिंग आपल्या दोन्ही हातात धरून त्याला रेटायचा प्रयत्न केला..रेडा व राजे दोन्हीही चवताळलेले ..!!
राजेंना मात्र आता राग अनावर झाला..त्यांनी हाताची मुठ आवळली व एक जबरदस्त ठोका रेड्याच्या डोक्यात मारला..२-३-५-६ असे सलग ठोके बसल्यावर रेडा जागीच चित पडला.मग राजांनी जवळ पडलेली बंदूक काढून ३ बार त्या रेड्यात उतरवले..!!


हे पाहून तो ब्रिटीश अधिकारी अक्षरश राजेंच्या पाया पडू लागला..!!!

आजही भवानी मंडप कोल्हापूर येथे हया रेड्याची भुसा भरलेली प्रतिकृती आहे.व कोणालाही विचारा कि हा रेडा राजांनी कसा मारला? ... उत्तर येईल बुक्कीने मारला.

 चित्रपट
    मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली.चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रभात स्टुडिओ आणि कोल्हापूर चीत्रनगरी सारखी उत्तम ठिकाणे उपलब्ध आहेत.

कोल्हापूर मराठी चित्रपटांचे माहेरघर

महाराष्ट्रातील काही शहरे आज कित्येक वर्षे आपल्या खास वैशिष्ट्यामुळे ओळखली जातात. राजर्षी शाहूरायांची ही करवीरनगरी! आपल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्वानं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं भूषण ठरली आहे.
व्यापार, यंत्रउद्योग, शिक्षण आणि कला कौशल्य इत्यादी उद्योग व्यवसायाप्रमाणेच चित्रपट व्यवसायालासुध्दा कोल्हापुरात पाऊणशे वर्षाहूनही अधिक परंपरा आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी जसा पहिला क्रॅमेरा कोल्हापुरात तयार केला त्याचप्रमाणे प्रभात फिल्म कंपनी या नामवंत संस्थेने `अयोध्येचा राजा' हा पहिला दैदिप्यमान बोलपट कोल्हापुरातच तयार केला. पुढे नावारुपाला आलेल्या पृथ्वीराज, राजकपूर यासारख्या बुजुर्गांनी भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात भूमिका केल्या. कितीतरी कलावंत, तंत्रज्ञ या मातीने चित्रपटसृष्टीला दिले. त्यातले बरेचजण कोल्हापूरच्या बाहेर आज चित्रपट सृष्टीत मोलाची भर घालत आहेत. आपल्या प्रतिभा सामर्थ्याने येथील कलावंतांनी अलौकिक चित्रपट महाराष्ट्राला दिले. `नेताजी पालकर', `थोरातांची कमळा', `मायभवानी', `नायकिणीचा सज्जा' असे एकापेक्षा एक ऐतिहासिक चित्रपट रसिकांना सादर करताना शिवरायांचा बालपणापासून ते अखेरपर्यंत त्यांच्या समग्र जीवनावर छत्रपती शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट काढून भालजी पेंढारकरांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक इतिहासच निर्माण केला. त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणेच त्यांची सामजिक चित्रेही रसिकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील अशीच आहेत. `सूनबाई', `मीठ-भाकर', `साधी-माणसं', ही अस्सल मराठी मातीतील चित्रे मराठी रसिकांच्या काळजाला जाऊन भिडली. बाबूराव पेंटर किंवा भालजी पेंढारकर काय या कला महर्षींच्या कर्तृत्वाचा आढावा असा सहजासहजी घेणे म्हणजे कंदिलानं सूर्य दाखवण्यासारखा प्रकार होईल. हे कलामहर्षी म्हणजे जणू पुढच्या कलावंतांना मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या चित्रपटात भूमिका करणारी माणसंसुध्दा भूमिका जगणारी माणसं होती.
नानासाहेब फाटक हे वास्तविक रंगमंचावरचे कलाकार. पण `थोरातांची कमळा' चित्रपटातील त्यांचा शिवाजी न भूतो न भविष्यति ठरला. चंद्रकांत, मास्टर विठ्ठल, झुंजारराव पवार, जयशंकर दानवे, ललिता पवार, सुलोचना, सूर्यकांत, जयश्री गडकर, वसंतराव पहेलवान, बाबूराव पेंढारकर अशी किती नावे सांगावीत? या आणि त्यांच्याबरोबर कामे करणाऱ्या दुय्यम कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक युगच निर्माण केले, अशीच नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.
चित्रतपस्वी शांतारामबापू यांनी आपला चित्रसंसार जरी मुंबईला थाटला असला तरी कोल्हापूरचा विसर त्यांना पडला नव्हता. ज्या मातीत आपण सुरुवातीला चित्र निर्मितीचे धडे गिरवले त्या मातीचे आपण काहीतरी ऋण लागतो याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच `पिंजरा' या भव्य चित्रपटासाठी त्यांनी कोल्हापूरचीच निवड केली. डॉ. लागू सारखा एक गुणी कलाकार त्यांनी चित्रसृष्टीला दिला.
निर्मिती दिग्दर्शनाबाबत दिग्दर्शक किती जागरुक असावा लागतो याची प्रचिती आम्हा लहान थोर कलाकारांना चित्रीकरणाच्या वेळेस नेहमीच येत असे. माझी त्यात फौजदारांची तशी छोटी भूमिका, पण माझा मेकअप विशेषत: मिशा व्यवस्थित लागलेल्या आहेत की नाहीत हे शांतारामबापू स्वत: मेकअप रुममध्ये येऊन पहात असत. बऱ्याच वेळेला त्यांनी माझ्या मिशा स्वत: लावून मेकअपमनची चूक त्याला समजावून दिली आहे. मला तर मनापासून असे वाटते, शांतारामबापूंच्याकडे काम केलेला कलाकार पृथ्वीतलावर कुठेही गेला तरी अभिनयात ते तसूभरही कमी पडणार नाही.
भालजींच्या प्रमाणे अनंत माने, गोविंद कुलकर्णी हे निर्माते - दिग्दर्शकही कोल्हापूरात स्थिर झाले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपट निर्मितीची परंपरा जोपासली. तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांच्या माथी उगीचच बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.
`काय हो चमत्कार' यासारखा चित्रपट मराठी प्रेक्षकांना ग्रामीण वातावरणात घेऊन जातो. चंद्रशेखर यांचं काव्यच त्यांनी रुपेरी पडद्यावर मूर्तिमंत साकार केले आहे.
`सांगू कशी मी', `असला नवरा नको गं बाई', `तोतया आमदार', `बंधन', `झेड. पी.', अशी समस्याप्रधान चित्रे देऊन माने यांनी स्वत:च्या प्रतिभेचा एक खास ठसा उमटवला. `एक गांव बारा भानगडी', `सवाल माझा ऐका', `केला इशारा जाता जाता' हे तर त्यांचे अविस्मरणीय महोत्सवी चित्रपट. अरुण सरनाईक सारखा एक उमदा नायक त्यांनीच चित्रपटसृष्टीला दिला. लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक यांना नायिका त्यांनीच बनविले आणि माझ्यासह कोल्हापूरातील कितीतरी दुय्यम कलाकार नावारुपास आणले. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक असावेत असे धाडसाचे विधान मी केले तर ते चुकीचे ठरु नये.
`बारा वर्षे सहा महिने तीन दिवस', `वारणेचा वाघ', `सुगंधी कट्टा', `पाच नाजूक बोटे', `दगा' इत्यादी दर्जेदार चित्रपट पेंटरांनी दिले. यशवंत दत्त सारखा एक प्रतिभाशाली कलाकार त्यांनीच प्रकाशात आणला. उत्कृष्ट चित्रकार आणि उत्तम तंत्रज्ञान यांचा संयोग वसंत पेंटर यांच्यात असल्याने त्यांची सर्वच चित्रे लोकप्रिय ठरली. शांतारामबापूंपासून ते कमलाकर तोरणे यांच्यापर्यंत सहदिग्दर्शक म्हणून उमेदवारी करीत असलेले गोविंद कुलकर्णी हे आणखी एक कर्तबगार निर्माते दिग्दर्शक. त्या दिग्दर्शकाला हाताशी धरुन दादा कोंडके यांनी सुरुवातीचे `सोंगाड्या', `एकटा जीव सदाशिव' हे चित्रपट निर्माण केले. त्याशिवाय `चुडा तुझा सावित्रीचा', `बन्या बापू', `मुरळी मल्हारी रायाची', `दैवत', `मर्दानी', `शपथ तुला बाळाची' इत्यादी अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केले.
`बाई मी भोळी', `औंदा लगीन करायचं', `बोला दाजिबा' अशा काही ग्रामीण चित्रपटांची निर्मिती कृष्णा पाटील या अनुभवी दिग्दर्शकाने केली. पण नंतर मात्र त्यांची चित्रनिर्मिती खंडित झाली. आघाडीचे चित्रपटकवी असा नावलौकीक मिळविलेल्या जगदीश खेबुडकरांचे देखील हेच घडले. `देवघर' या कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करुन त्यांनी निर्मिती क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकले खरे, पण चित्रपट चांगला असूनही आर्थिक अपयश आल्यामुळे त्यांच्या चित्रपट निर्मितीची वाट अजून तरी बंद आहे.
सुधीर ससे, शांताराम चौगुले, पितांबर काळे, रविंद्र पन्हाळकर, भास्कर जाधव, सतिश रणदिवे, यशवंत भालकर यासारखी मंडळी आपापल्या परीने चित्रपट निर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. सर्व नामावलीत आणखी एका बुजुर्ग व्यक्तीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे दिनकर द. पाटील. मास्टर विनायकांचे हे शिष्य लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत अजूनही आपला खास ठसा उमटवीत आहेत. `रामराम पाव्हणं' पासून अलिकडच्या `शिवरायांची सून' पर्यंत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनामोल चित्रांची भेट दिली आहे.

रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या `जय मल्हार', `देवाघरचं लेणं', `सासर-माहेर' इत्यादी चित्रपटांचे ज्येष्ठ दिग्दर्शक द. स. तथा तात्या अंबपकर आज दुर्दैवाने हयात नाहीत. अलिकडे कोल्हापूरच्या यशवंत भालकर या तरुण दिग्दर्शकाने `पैज लग्नाची' या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे राज्य पारितोषिक मिळवून कोल्हापूरची खंडित झालेली परंपरा जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूरच्या भूमीला निसर्गाचं वरदान आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनी कोल्हापूरचा परिसर बहरला आहे. म्हणून मुंबईचे निर्माते सुध्दा शुटिंगसाठी कोल्हापूरच पसंत करतात. महेश कोठारी, सचिन अरविंद सामंत, सय्यद देसाई, विश्वास सरपोतदार, दादा कोंडके, स्मिता तळवळकर इत्यादी अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट कोल्हापूरातच निर्माण केले आहेत. आणि तरीही मनात शंकेची पाल चुकचुकते की मराठी चित्रपट निर्मितीचे हे माहेरघर हळूहळू खचत जाणार काय? काही वेळा मन विषण्ण होतं आणि वाटायला लागतं, मराठी चित्रपटांचं भवितव्य काय? नवीन निर्मात्यांचे प्रयत्न काही फारसे यशस्वी झाल्यासारखे दिसत नाहीत. स्टुडिओत शूटिंग करण्याची प्रथा इतकी कमी होऊ लागली आहे की कोल्हापूरातील दोन्ही स्टुडिओ महिनोन महिने ओसच पडलेले असतात. कोल्हापूरातील निर्मात्याप्रमाणेच कलाकारांचीही वाणवाच आहे. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला कलावंत आणण्यापेक्षा मुंबईला शूटिंग करणे बरे असाही काही निर्मात्यांचा कल असतो. म्हणून आमचं माहेरघरच पोरकं झालं आहे. पण असं होता कामा नये. मराठी चित्रपटसृष्टीचा संसार पुन्हा इथं बहरला पाहिजे. बाबूराव पेंटरांचं डिस्नेलँडचं स्वप्न साकार करण्यासाठी कूर्मगतीनं होऊ घातलेली चित्रनगरी द्रुतगतीने पुरी झाली पाहिजे. मराठीच्या प्रभात कालाचा उदय पुन्हा कोल्हापुरात झाला पाहिजे. 

  चित्रपटगृहे

  • INOX* सिनेमा रिलायन्स मॉल
  • पीव्हीआर सिनेमा DYP city Mall
  • अयोध्या

अयोध्या चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव राजाराम.. याचे बांधकाम छत्रपती राजाराम महाराजांच्या सूचनेनुसार श्री. भोजराज दादासाहेब निंबाळकर यांनी १९३७ साली केले. त्याचे नामकरण १२ एप्रिल १९८६ साली अयोध्या असे करण्यात आले. सध्या या चित्रपटगृहाची क्षमता, बाल्कनी २५४, स्टॉल ३९४ आणि फर्स्ट १०० अशी एकूण ७४८ आहे. येथील ध्वनियंत्रणा ही अत्याधुनिक डॉल्बी तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

  • ऊर्मिला

ऊर्मिला चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव लक्ष्मी. आणि त्याच्याच शेजारी सरस्वती हे चित्रपटगृह. कोल्हापुरातील ताराबाई रोडवर असणारी ही दोन चित्रपटगृहे. ऊर्मिला अर्थात जुन्या लक्ष्मी सिनेगृहाचे बांधकाम नाना बेरी यांनी केले. याचे पूर्वीचे मालक श्री नितीन रेड्डी. त्यांच्याकडून १९९९ साली ’अयोध्या’ चित्रपटगृहाचे मालक दादासाहेब निंबाळकर यांनी ते विकत घेतले आणि त्याचे नाव ऊर्मिला केले. ऊर्मिला आणि सरस्वती ह्या चित्रपटगृहांचा बाहेर जाण्याचा रस्ता एकच आहे.

  • सरस्वती
  • व्हीनस

६ जून १९३१ साली तय्यब अली बोहरा यांनी याचे बांधकाम केले. कोल्हापुरात बांधले गेलेले हे पहिलेच चित्रपटगृह. ह्याच तय्यब अली यांनी व्हीनसच्याच शेजारी अप्सरा हेही सिनेगृह बांधले. आजतागायत दोन्ही चित्रपटगृहांची मालकी बोहरा कुटुंबीयांकडेच आहे. व्हीनसमध्ये ७८३ प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतात. जिथे व्हीनस उभे आहे तिथे पूर्वी दलदलीची जागा होती. आणि आजही जेव्हा पंचगंगा नदीला जोरदार पूर येतो तेव्हा इथे जाणारा मार्ग बंद पडतो. गेले ५ वर्षे येथे केवळ दक्षिणी भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. "आर्या" हा इथे आलेला पहिला तेलुगू सिनेमा. ह्या सिनेमाने या चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली करण्याइतके यश मिळवले. कोल्हापुरात २५ आठवडे चाललेला हा एकमेव तेलुगू सिनेमा. कोल्हापुरात राहणार्‍या दाक्षिणात्य भारतीय लोकांना तिकडचे सिनेमे पाहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच व्हीनस.

  • अप्सरा

. कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत शेजारी शेजारी ५ चित्रपटगृहे आहेत आणि स्टेशन रोड वर ५. त्यातीलच एक "अप्सरा".. अप्सरा आणि व्हीनस ह्या दोन्हीचे मालक एकच. श्री. तय्यब अली बोहरा. १९४८ च्या सुमारास हे चित्रपटगृह बांधले गेले. याचे पूर्वीचे नाव होते अन्वर. कारण तय्यबअलींच्या तिसर्‍या मुलाचे नाव होते अन्वर. नंतर याचे नाव झाले लिबर्टी आणि आता याचे नाव आहे अप्सरा..अप्सराची प्रेक्षकक्षमता आहे ६७३.

  • उषा

१४ जानेवारी १९४७ रोजी नगीनदास शहा यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. नागीनदास यांच्या दुसर्‍या मुलीच्या नावानेच (उषा) हे चित्रपटगृह ओळखले जाते. सर्वाधिक हिट चित्रपट देणार्‍या कोल्हापुरातील काही मोजक्या चित्रपटगृहापैकी एक म्हणजे उषा. "हम आपके है कौन" इथे ६० आठवड्याहून अधिक चालला. इथे लागलेले काही सुपरहिट चित्रपट म्हणजे.. लावारीस, बर्निंग ट्रेन, शोले, लगान, सत्या, तेजाब इत्यादी. या चित्रपटगृहाची प्रेक्षकक्षमता आहे ७८६.

  • प्रभात

लक्ष्मीपुरीत असणार्‍या ५ चित्रपटगृहापैकी एक म्हणजे प्रभात. दादासाहेब रुईकर यांनी १९४० साली प्रभात बांधले. याचे प्रेक्षकक्षमता आहे ५३१. २००३ साली प्रभातचे नूतनीकरण झाले. चित्रपटगृह संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले. पारंपरिक फर्स्ट, स्टॉल आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था बदलून फर्स्ट, स्टॉल, ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी करण्यात आली. मराठीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचे ७ सिल्वर ज्युबिली चित्रपट रुईकर यांच्या प्रभात आणि रॉयल मध्येच लागले.

  • रॉयल

दादासाहेब रुईकर यांचे आणखी एक चित्रपटगृह म्हणजे रॉयल. प्रभातच्या पाठीमागच्या बाजूला वसलेले हे चित्रपटगृह. रॉयलचा बाहेर जायचा मार्ग प्रभातमधूनच आहे. रॉयलची आसनक्षमता ५१३ आहे. याची बांधकाम १९३० चे आहे. २००५ साली या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.

  • शाहू

कोल्हापुरातील मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे शाहू. गेली कित्येक वर्षाची मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. १५ मे १९४७ साली या चित्रपटगृहाचे ओपनिंग झाले. शाहू महाराज व्हीनसमध्ये चित्रपट पाहायला जात असत. पण काहीतरी कारणाने खटका उडाला आणि महाराजांनी स्वतःचे एक चित्रपटगृह बांधले. आणि त्यांच्याच नावावरून याला शाहू नाव पडले.

  • पद्मा

कोल्हापूरच्या राजकुमारी पद्माराजे यांच्यावरून ह्या चित्रपटगृहाचे नाव " पद्मा" असे पडले. १९४० साली श्री. इंगळे यांनी या चित्रपटगृहाची उभारणी केली. फर्स्ट, स्टॉल, एक्झिक्युटीव आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था इथे आहे. इथे एकूण ६९६ प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. इथे सॅटेलाईट प्रोजेक्टर आहे.

  • पार्वती (मल्टिप्लेक्स) - तीन पडदे असलेले गांधीनगरातील चित्रपटगृह
  • (गणेशसह)
  • संगम

 अन्य

कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत.हि चप्पल पूर्णपणे चामड्या पासून बनवली जाते.कोल्हापुरी चपलाला GI मानांकन मिळाले.(२०१९) कोल्हापूरी साज, चपला हार इत्यादी दागिने प्रसिद्ध आहेत.

रंगभूमी

  • कोल्हापूरमध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नावाचे नाट्यगृुह आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी  मध्ये घोरपडे नाट्यगृह देखील आहे.

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यक्ती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

भालजी पेंढारकर, भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक

बाबुराव पेंटर, (बाबुराव कृष्णराव मेस्त्री), प्रसिद्ध दिग्दर्शक)

व्ही. शांताराम, मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माता आणि संचालक

सूर्यकांत मांडरा, मराठी चित्रपट अभिनेता

चंद्रकांत मंदारे, मराठी चित्रपट अभिनेता

लता मंगेशकर, सुप्रसिद्ध भारतीय गायक

आशा भोंसले, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची बहीण

सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध भारतीय गायक

अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता

खाशाबा जाधव, 1 9 52 हेलसिंकी गेम्समध्ये भारताचे प्रथम वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते कास्य पदक जिंकले.

श्रीमती खंननळे, पहिले हिंद केसरी

दादू चौगुले, हिंद केसर

विनोद चौगुले, महाराष्ट्र सीझर

जयंत नारळीकर, अॅस्ट्रोफिजिकल

डॉ वसंत गोवारीकर, वैज्ञानिक

रणजित देसाई, मराठी लेखक (श्रीमंत योगी, स्वामी)

शिवाजी सावंत, मराठी लेखक (मिथूनानं)

 कोल्हापूरला कसे पोहोचाल ?

कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या काठावर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण-पश्चिमेस वसलेले आहे. कोल्हापूर हे  रस्ता, ट्रेन आणि विमानतळाद्वारे चांगले जोडलेले आहे. खाली कोल्हापूर शहरासाठी प्रवासी मार्गदर्शक आहे.

कोल्हापूर रेल्वेने:
"छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" नावाचे कोल्हापूरचे  मोठे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकातून मुंबई, बेंगळुरू आणि नवी दिल्लीकडे जाणारे आणि येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत.

 कोल्हापुरात  येणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक तुम्हाला खालील लिंकवर मिळू शकेल.
https://indiarailinfo.com/arrivals/kolhapur-scsmt-kop/77

Express Railway:
S.No   Arrival    Train no.    Express Railway           Express  Railway                          Train no.            Departure
1.       21-40        1029             Mumbai-Kolhapur- Mumbai Koyana Express                  1030                         7-50
2.       8-50          1011             Mumbai-Kolhapur-Mumbai  Mahalaxmi Express           1012                          19-05
3.       14-05         7384           Kolhapur-Gondia- Kolhapur     Maharashtra Express    7383                            14-10
4.       6-35           7303           Mumbai-Kolhapur-Mumbai       Sahyadri Express           7304                            22-30
5.       22-30         2479          Miraj-Nijamuddin-Miraj       From Miraj junction               2489                           22-25
6.       21-40        1017           Kurla-Bangalore-Kurla         From Miraj junction               1018                           9-45

Passenger Railways:
S.No            Arrival            Train no.        Passenger Railway                              Train no.              Departure
1.                20-05                315              Pune - Kolhapur - Sasvad road              316                        4-45
2.               13-10                313              Miraj- Kolhapur - Miraj                             314                       15-30
3.                09-55               317             Satara - Kolhapur - Pune                          318                       16-15
4.               18-00                309              Miraj - Kolhapur - Sangli                         320                         18-40

Railway General inquiry Phone No - 131, Reservation Inquiry Phone No - 651489
Time of reservation
Monday to Saturday
8:00 to 14:00 and 14:30 to 20:00
Sunday 8:00 to 14:00

कोल्हापूर रोड मार्गे:
कोल्हापूर हे मुंबई-बेंगळूरू महामार्गाद्वारे (एनएच ४) चांगले जोडलेले आहे. कोल्हापुरात सेंट्रल बस स्टँड (सीबीएस) आहे जिथे राज्य परिवहन (एसटी) बसेस येत आहेत आणि मुंबई, पुणे आणि बेंगलुरुसह महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये सोडत आहेत.

 कोल्हापुरात एसटी बसची टाइम टेबल खालील अधिकृत एमएसआरटीसी साइटवर मिळू शकेल.
https://msrtc.maharashtra.gov.in/

एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानक हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे आणि एकमेकांपासून 10-15 मिनिटांच्या अंतरावर आहे. मध्यरात्री आणि पहाटे 12 पर्यंत आपल्याला दोन्ही ठिकाणाहून ऑटो रिक्षा मिळेल.
कोल्हापूर हवाई मार्ग:
     कोल्हापुरात "छत्रपती राजाराम महाराज विमानतळ" नावाचे विमानतळ आहे जे मुख्य शहरापासून काही अंतरावर आहे (कोल्हापूर शहरापासून 10 किमी). कोल्हापूर विमानतळ आता कार्यरत आहे. नुकतीच मुंबई, बेंगळुरू आणि तिरुपती बालाजीला दररोज सुरू झालेल्या काही उड्डाणे आहेत. पण त्या खूप जास्त नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला उड्डाण प्रवास करण्याचा अनुभव घ्यायचा नसेल तर आज  तरी त्यावर न अवलंबून राहणे चांगले.
    भविष्यात कोल्हापूर विमानतळावरून नियमित उड्डाणे होतील आणि यामुळे स्थानिक व्यवसायात देखील वाढ होईल.

 

मुंबईहून कोल्हापूरला कसे पोहोचाल:
कोल्हापूर हे मुंबईपासून 395 किमी अंतरावर आहे. साधारणत: जर मी मुंबईहून कोल्हापूरकडे जाण्याचा विचार करायचा असेल तर वेळ वाचवण्यासाठी मी रात्री प्रवास करणे पसंत करतो. मी बहुधा महालक्ष्मी एक्स्प्रेस (ट्रेन नंबर १ १७४११) पसंत करतो जी दादरहून रात्री ८.३० वाजता निघते , ठाणे ला ९ वाजता येते   आणि  कोल्हापूर ला सकाळी ७.३० वाजता पोहचते.. ही एक स्लीपर कोच ट्रेन आहे म्हणून आपला प्रवास खूप सोयीस्कर होईल.
   जर आपणास रेल्वेचे आरक्षण मिळाले नाही तर स्लीपर ट्रॅव्हल बस देखील एक सोयीचा पर्याय आहे जो रात्रीच्या वेळी मुंबईच्या विविध ठिकाणांहून (दादर / पुणे / वाशी) प्रारंभ होतो आणि पहाटे ५-६ च्या दरम्यान कोल्हापुरात पोहोचेल. तिथून आपण आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी स्थानिक ऑटो रिक्षा घेऊ शकता.
पुण्याहून कोल्हापूरला कसे जावे:
     कोल्हापूर हे पुण्यापासून 225 कि.मी. अंतरावर आहे. पुण्यापासून कोल्हापूरला रेल्वेने जाणा-या मार्गावरुन जाण्यासाठी थोडासा वेळ लागेल. मी साधारणपणे एसटी बस पर्यायाला प्राधान्य देतो ज्यासाठी पुण्याहून कोल्हापूरकडे ५ तासात पोहोचता येते. स्वारगेट स्थानकापासून एसटी बसची कोल्हापुरात जाण्याची चांगली वारंवारता आहे आणि दर अर्ध्या तासाने तुम्हाला कोल्हापूरला जाणारी बस मिळेल.
    तसेच आयटी लोकांसाठी एसटी विभागाने थेट हिंजवडी ते कोल्हापूरला जाण्यासाठी बस सुरू केल्या आहेत. ही बस हिंजवडी फेज -3 कार्यालयाकडून दर शुक्रवारी संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान सुटतात आणि कोल्हापूरला रात्री 10 ते 10.30 वाजता पोहोचतात.
    सोमवारी पहाटे कोल्हापूरहून त्याच बसेस सुटतात आणि सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत हिंजवडीला पोहोचेल ज्यायोगे लोक थेट कार्यालयात जाऊ शकतील. पुणे आयटी क्षेत्रात काम करणारे कोल्हापुरातील बरेच लोक हा सोयीस्कर पर्याय पसंत करतात.
कोल्हापूर शहरात प्रवास:
    शहरातील रिक्षा ही स्थानिक वाहतुकीसाठी सर्वात सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या  परवडणाऱ्या आहेत. तसेच, कोल्हापूर महानगरपालिका (केएमसी) चालवणा  बस देखील पर्यटक पकडू शकतात परंतु आपल्याला अचूक जागा व बस क्रमांक माहित असणे आवश्यक आहे.
    टॅक्सी  काही ठिकाणी उपलब्ध आहेत पण सर्वत्र नाहीत. अलीकडे कोल्हापुरात ओला कंपनी त्यांची सेवा सुरू केली आहे परंतु अद्याप ती लोकप्रिय नाही.

कोठे रहाल » हाँटेल्स आणि उपहारगृह |
S.No                         Name                                                Telephone No.
1.               Shalini Palace, Ashoka                                   2630401 Vo 04
2.                Pearl                                                                 2650451 Vo 56
3.                Opel                                                                  2536969, 2537044
4.                Ashni                                                                 2680040
5.                Panchashil                                                        2537517, 2537760
6.                Tourist                                                               2650421, 2650422
7.                 International                                                  2536641 Vo 44
8.                  Ayodhya                                                         2652293
9.                  Woodland                                                      2650941
10.               Lisha                                                                2651411, 2650991
11.              Elegant                                                            2653766, 2651641
12.              Vrushali                                                           2664631, 2651337
13.              Ashoka prestige                                             2537232
14.              Cassel                                                              2520343
15.              Samrat                                                             2651301
16.               Triveni                                                              2657947, 2656120
17.               Anugraha                                                        2666976, 2653451
18.               Victor Palace                                                  2537001 Vo 8
19.               Aishwarya                                                      2661144
20.               Padma, Tarabai Park                                     5689435
21.              Pavilion                                                             2654742, 2652751
22.             Vijayraj                                                                2651124
23.              Rajat                                                                   2648393, 2658080
24.              Meera                                                                2652666
25.              Maharaja                                                          2650829
26.              Hindusthan                                                       2640851
27.               Avanti                                                                1644841

 
खास कोल्हापूरी शब्दकोश
असे काही कोल्हापुरी शब्द आहेत की जे नादखुळा आहेत व जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार नाहीत..
वरकी (बटर)
डबरा (खड्डा)
ईस्कुट (खेळ खंडोबा)
बाउ (मटन)
वज्ज (ओझे)
शिप्पारस (शहाणपणा)
गबस (गप्प बस)
लांबडं(साप)
कानुला (करंजी)
आदुगर (आधी)
अडगं (वेडा)
निवद (नैवेद्य)
गुळमाट (गोड)
हानबडीव (मार)
डकीवणे (चिकटवणे)
ढांपी (फांदी)
पारबती टाकी (पार्वती थिएटर)
शिस्तात (हळू)
गुळमाट (गोड)
कडकडन सुट (परत जा)
बारडी (बादली)
डांब (खांब)
गुडग्यात मेंदू (अर्धवट)
महादबा रोड (महाद्वार रोड)
अंडरखालीरिक्स (रिस्क)
काय ताटाय लागलाईस (माज दाखवतोयस)
लज्गरी (लक्जरी बस)
टाम्याटु (टोमॅटो)
हारकलाईस काय (रोमांचित)
हरखून टुम्म (एकदम खुश)
टकुरर् (डोकं)
साळुता (झाडू)
बसल्या बैठकीला (लगेच)
वळका बघू...? (ओळखा पाहू)
डोस्क्यात काय येईना (आठवेना)
घुमीव (फिरव)
हान (मार)
रगात (रक्त)
गप गार (चिडी चुप)
ढोपर फोडिन (कोपर फोडीन)
लय राघु वानी बोलु नगस (मस्का मारू नको)
इरुन फिरुन गंगावेश (पुन्हा तिथेच)
डोस्क (डोकं)
बुंडुकल्या (छोट्या)
हेंगाड (वेडपट)
भस्का (भगदाड)
म्हनुनच कोल्हापूरी जगात भारी

खाद्यसंस्कृती

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे कि ज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे.कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यासोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील खाण्या पिण्यापासून फिरण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी खास आहेत.येथे येणाऱ्या पर्यटकांचे येथील संस्कृतीची सुंदरता पाहून मनच भरत नाही.महाराष्ट्रातील या सुंदर शहरामध्ये अशा बरयाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आकर्षक वाटतील.कोल्हापूर एक प्राचीन शहर आहे कि ज्याच्यावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते. स्थळ कोणतीही असो पण त्या ठिकाणची ट्रीप स्मरणात राहील अशी मजेदार होण्यासाठी त्या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ खाण्यास कधीच विसरायचे नाही.आणि विषय जेव्हा कोल्हापुर चा होतो तर त्याठीकाव्ची मिसळ कोण विसरेल .महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापुर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते जसे की बावडा मिसळ, फडतरे मिसळ , चोरगे मिसळ , हॉटेल साकोलीमिसळ ,खासबाग मिसळ आणखीन अशा भरपूर आहेत. ही गोष्ट झाली शाकाहारी पदार्थांच्या खाण्यासंदर्भात आता आपण मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात पाहू तांबडा रस्सा (मटणाचे सूप ),पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे ),मटणाचे लोणचे ,खिमा राईस बॉल्स कोल्हापुरात आलेली प्रत्येक व्यक्ती या पदार्थांची चव घेतल्याशिवाय राहत नाही.

कोल्हापूर ठिकाण तांबडा आणि पांढरा रस्सा, मिसळपाव, वडापाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच, कोल्हापूरची 'कोल्हापूरी चप्पल' ही खुप प्रसिद्ध आहे त्याला कोल्हापुरी चप्पल असे म्हंटले जाते .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे.तसेच बावडा मिसळ, फडतरे, चोरगे, हॉटेल साकोली अशी अनेक मिसळपावची ठिकाणे प्रसिद्ध आहेत.मिरजकर तिकटी,गंगावेस येथे दुध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दुध मिळते.कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांपुढं सर्वप्रथम येतो तो तांबडा रस्सा-पांढरा रस्सा. नंतर आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी खाद्यजीवनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मांसाहार. इथल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते. याच खाद्यसंस्कृतीचा हा परिचय, काही शाकाहारी पदार्थांसह.कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातलं मोठं शहर. इथलं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणं आहेत.लवंगी मिरची आणि तमाशा यासाठी विख्यात असलेल्या कोल्हापुरातला तांबडा रस्सा व पांढरा रस्साही प्रसिद्ध आहे. 

कोल्हापूर = मांसाहारी जेवण प्रकारचे गाव असे जे समीकरण तयार झाले आहे त्याला हल्ली बर्‍याच शाकाहारी हॉटेल्सनी चांगलाच छेद दिला आहे. केवळ शाकाहारी [कोल्हापूरी भाषेत "शुद्ध शाकाहारी"] जेवण देणार्‍या हॉटेल्सची संख्या लक्षणीय झाली आहे.

 कोल्हापुरातली खादाडी 

  प्रसिद्ध हॉटेल्स / रेस्टॉरंटस

   आपण रुचकर खाण्याचे चाहते  असाल आणि अस्सल महाराष्ट्रीयन चव आवडत असल्यास कोल्हापूरला भेट हि द्यायलाच हवी. कोल्हापूर मधील  सर्वात प्रसिद्ध खादाडीची ठिकाणे मी येथे लिहीत आहे.
    कोल्हापूरला भेट द्यायची असेल तर जाण्यासाठी आणि खाण्य्साठी देखील  हिवाळा हा  सर्वोत्तम हंगाम असतो. मांसाहारी  प्रेमींसाठी प्रसिद्ध असा तांबडा रस्सा  (लाल करी) आणि पांढरा रस्सा  ही जणू मेजवानीच जी  कोल्हापूर खाद्य परंपरेची वैशिष्ट्य आहे.
1. हॉटेल राजपुरुष


हे एसी डायनिंग हॉटेल असून शुद्ध व्हेज / शाकाहारी जेवण मिळते. हे हॉटेल कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे. रेल्वेमधून येणार्‍या पर्यटकांसाठी अगदी सोयीस्कर आहे.
      त्यांच्याकडे मुक्काम / लॉज सुविधा तसेच रेस्टॉरंट देखील आहे. इथली अमर्यादित थाळी  खूप चवदार असते आणि कर्मचारी वर्ग तुम्हाला अमर्यादित भोजन वढताना हात आखडता घेत नाहीत.

"राजपुरुष" चे नाव चांगलेच प्रसिद्ध झाले आहे, ते त्यांच्या शाकाहारी ताटातील वाट्यांच्या संख्येमुळे. ताट समोर आल्यानंतर गिर्‍हाईक "देवा, आता यातील काय आणि किती खायचे ?" असाच विचार करतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातील निम्म्याहून जेवण ताटात तसेच राहते. विशेषतः चार सदस्यांचे एक कुटुंब तिथे जेवायला आले आणि त्यानी चार ताटे मागविली तर दोन मुलांसाठी आलेल्या ताटातील जवळपास ७५% पदार्थ स्पर्श न लागता पडून राहतात.व्यवस्थापन काही करत नाही हे तर दिसल्येच कारण या हॉटेलची ख्याती पदार्थांमुळेच झाली आहे.

• गुलाबजामुन, हलवा, बासुंदी वगैरे या गोड पदार्थासाठी अतिरिक्त शुल्क आहे. आपण शाकाहारी असाल तर एकंदरीत हा चांगला पर्याय आहे.
• अमर्यादित शाकाहारी थाळीची किंमत 200 रुपये होती. (गोड समाविष्ट नाही).
• कार पार्किंगची जागा मर्यादित आहे परंतु दुचाकी वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे.
२. हॉटेल निलेश


हे हॉटेल शनिवार पेठेत प्रसिद्ध सोन्या मारुती मंदिराजवळ आहे. हॉटेल नीलेश हे शुद्ध नॉन-व्हेज हॉटेल आहे. अस्सल चिकन / मटण आणि तांबडा, पांढरा रसा यासाठी कोल्हापुरातील हे सर्वोत्तम हॉटेल आहे. हे महालक्ष्मी मंदिरापासून देखील जवळ आहे. ते आपल्याला अमर्यादित रस्सा देतात आणि सेवा खूप तत्पर आहे.
 
 
हॉटेलची जागा प्रशस्त नाही परंतु त्यांचा फॅमिलीसाठी वेगळा विभाग आहे. हे नॉन-व्हेजसाठी उत्तम हॉटेल आहे आणि दर देखील खूप कमी आहेत. आपणास मटण थाली १९० रुपयास  मिळेल ज्यात अमर्यादित तांबडा आणि पंढरा रस्सा चा  समावेश आहे. आपण मांसाहारी प्रेमी असल्यास दुसरे काय हवे आहे !! 
. पद्मा गेस्ट हाऊस



अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थ खाण्यासाठी हे देखील प्रसिद्ध ठिकाण आहे. हॉटेल उत्तम आणि नीटनेटके आहे. पदार्थांची किंमत थोडी जास्त असली तरी दर्जा चांगला आहे. आपणास मटण थाली मिळेल ३५० रुपयांमध्ये ज्यात अमर्याद तांबडा आणि पांढरा रसाचा  समावेश आहे.
 
 
या जागेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. येथे नक्कीच एकदा मटण खाऊन पहा. हे हॉटेल बसस्थानकापासून 2 किमी आणि रेल्वे स्थानकापासून 1.5 किमी अंतरावर आहे. पद्मा गेस्ट हाऊस, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी.
. हॉटेल ओपल


कोल्हापुरातील हे खूप जुने हॉटेल आहे. लाकडी फर्निचरची सजावट असलेला रेस्टॉरंटचा परिसर सुंदर आहे.
या हॉटेलमध्ये दोन्ही शाकाहारी आणि मांसाहारी भोजन मिळते. मटण थाली ते 250 रुपये घेतात. हॉटेलच्या आवारात कार पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे .

५. हॉटेल ओम गणेश (पन्हाळा)

जर तुम्ही पन्हाळा गडाला भेट देणार असाल तर ह्या हॉटेलला नक्की जावा. उत्तम पांढरा, तांबडा रस्सा , मटण थाळी आणि ते पण वाजवी दरात !


हॉटेल एकदम साधे आहे पण फॅमिली ला घेऊन जाऊ शकता. हॉटेल हे वीर शिव काशीद पुतळापासून जवळच आहे

 माझ्या माहितीतील कोल्हापूरातील काही हॉटेल्स:-
व्हिक्टर पॅलेस, रुईकर कॉलनी, हॉटेल वृशाली,कदमवाडी, हॉटेल पेवेलीयन , शाहुपुरी; आमराई, महावीर गार्डन जवळ, कावळा नाक्याचे हॉटेल पर्ल ,राजारामपुरीमध्ये जनता बझार समोरचे 'निसर्ग' हि हॉटेल दर्जा राखून आहेत. ताराबाई पार्क हा कॉलेज कुमारांचाचा अड्डा. इथे खट्टा-मीठा तर आहेच..पण त्याच्या समोरच ला-कर्टा म्हणुन होटेल आहे..पंजाबी डिशेस छान...तिथूनच स्टँडकडे जाताना, वाटेत वुडहाउस लागते.भाकरी-भाजी, वांग्याचे भरीत वैगेरे मेनू असतो.एकदम झकास. याशिवाय  ओशो (मंगळवार पेठ), साहिबा ( स्टेशन रोड), अयोध्या ( ताराबाई पार्क), वुड्लँड (नागाळा पार्क ), साई प्रसाद (कावळा नाका ) .कामत होटेल मधे स्पेशल काही नाही. आगदीच पर्याय नसेल तरच जावे. "गोकुळ" साऊथ इंडियन आहे.तेथील गर्दी अंगावर येते.केवळ प्रवाशांसाठी ते उपयुक्त आहे. खास प्लेट वा डिशसाठी ते ओळखले जात नाही.स्टँडसमोर शालीमार आणि सम्राटमधे थाळी बरी मिळते. टाकाळ्यातील रामकृष्णमध्ये उत्तम शाकाहारी जेवण मिळते.याशिवाय पार्वती टॉकीजच्या जवळ तसेच दसरा चौकात बासुरी हॉटेल

 मांसाहारासाठी :
१ )महादेवप्रसाद , दौलत - मंगळवार पेठ (कुणालाबी ईचारा..)
२ ) पऱख , रसिका गार्डन- मार्केट यार्ड जवळ.
३) वामन गेस्ट हाऊस (मासे)- शाहुपुरी.
४ ) शेतकरी- फुलेवाडी. रन्काळ्याकडून फुलेवाडीला जाताना वाटेत आहे.
५ ) राजारामपुरी ३ री गल्ली इथल्या सायबा इथल्या सुरमई थाळीमध्ये सुरमई फ्राय, गोलमा,(गोलमा हा खास कोल्हापुरी शब्द आहे असं मी गृहित धरलंय) मच्छी करी, तिसर्‍याचं कालवण, आणि वडे यांच्याबरोबर भात आणि सोलकढी बरोबर सुकट चटणी असा सॉल्लिड मेनु असतो!
६ ) हॉटेल आनंद भवन- शाहूपुरीत चौथ्या गल्लीत आहे हे. मांसाहारी विभाग रात्री सुरु असतो. दिवसा फक्त शाकाहारी.
७ ) मटण खायचे असेल तर "कृष्णा" ला जा एकदा. आदित्य कॉर्नरकडून दाभोळकर कॉर्नरला जाताना उजव्या हाताला वाटेत लागते. किंवा मग शिवाजी पेठेतल्या कुठल्याही घरगुती खानावळीत जा.
८) कोल्हापुरात जर मटण आणि तांबडा पांढरा खायचा असेल, तर मंगळवार पेठेला पर्याय नाही. दौलत, रामदूत, मेघदूत, आनंद प्रसाद, महादेव प्रसाद, समाधान, आणि असंख्य घरगुती खानावळी. मटण खाव तर इथच.ओपलच मटण चांगले आहे.पण तांबडा- पांढरा अनलिमिटेड नाही. मंगळवार पेठ सोडून जर कुठे चांगली हॉटेल्स असतील तर ती शनिवार पेठेत खासकरून निलेश.
९ ) कोल्हापुरात टाकाळा चौकात नवीन हॉटेल झाले आहे. Lava Rocks Inn नावाचे. इथे चिकनचे भरपूर प्रकार मिळतात जे कोल्हापुरात कोठेही मिळत नाहीत. असे बरेच पदार्थ आहेत की जे कोल्हापुरात कोठेही मिळत नाहीत. उदा. चिकन shawarma, veg shawarma, चिकन सबमरीन, veg सबमरीन. तुम्ही एकदा भेट द्याच. तसेच फुल्ल चिकनचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत.

१०. हॉटेल कृष्णा, रविवार पेठ
११. हॉटेल मालन, रविवार पेठ
१२. हॉटेल रेवती, बालिंगा रोड
१३. हॉटेल सम्राट, फुलेवाडी
१४. हॉटेल गंधार , शिवाजी चौक
१५. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड
१६. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ
१७. हॉटेल माणिक, साकोली कोरनर
१८. हॉटेल मनीष, अप्सरा चित्रपटगृहाजवळ, शाहूपुरी
१९. साळोखे'ज हॉटेल तांबडा-पांढरा, शिवाजी पार्क
२०. हॉटेल राजधानी, मुक्त सैनिक वसाहत
२१. हॉटेल परख, मुक्त सैनिक वसाहत   
२२.  हॉटेल करवीर किचन, मंगळवार पेठ
२३. हॉटेल राहुल, NH-४ ,टोप संभापूर 

२४ ) हॉटेल राहूल , मिनी वसंत , तांबडा पांढरा रस्सा, ताराबाई रोड, रंकाळा ,वेळ सयंकाळी 7 ते 10

 प्रसिद्ध नाश्ता सेंटर

खाद्यपदार्थ
१. राजा भाऊ भेळ

कोल्हापुरातील सर्वात जुन्या व प्रसिध्द भेळेपैकी एक. भवानी म॑डपातील राजा भाऊ भेळ बद्द्ल मी पामराने काय सा॑गावे ? जावे आणी खावुन यावे. आता म॑डपातील जागा बदललेली आहे पण भेळ तीच आहे. हे हॉटेल खासबाग मैदानाजवळील खाऊ गल्लीत आहे. 

 

जर आपण कोल्हापूरातून भेळ घेउन बाहेर-गावी जाणार असाल आणि पार्सल घ्यायचे असेल तर ते 8 ते 15 दिवस व्यवस्थित राहणारी भेळेची पॅकेजेस देतात. आपण त्या भेळेला हवे तेव्हा कसे तयार करू शकतो याबद्दल मालक स्वतःच माहिती देतात. इतके फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे कि रोज एक फ्लेवर खावा म्हटला तरी एक महिना निवांत निघून जाईल आणि रात्री १.३० वाजता जरी गेल तरी भेल मिळते..
राजाभाऊ नंतरची आवडती भेळ म्हणजे राजकमल.

कोल्हापूरातल्या मिसळी हा समस्त कोल्हापुर करांच्या जिव्हाळ्याचा विषय हे घ्या त्यांचे पत्ते..

२.फडतरे मिसळ

हे हॉटेल उदयम नगर मध्ये आहे. हॉटेलची सजावट फारशी नाही आणि स्वयंपाकघर खुल असलेले रेस्टॉरंट. हे कोल्हापुरी मिसळसाठी प्रसिद्ध आहे, मिसळ जरा  तिखट आहे याचा विचार करून ते सोल कढी देखील देतात. ही एक चांगली कल्पना आहे.



हे हाउस वैगेरे नसुन एक झोपडी वजा टपरी सारखे हॉटेल आहे... त्यांच्या मिसळीच्या चवी बरोबरच, जर तुम्ही मिसळ घरी नेणार असाल तर ते जे पॅकिंग करुन देतात ते निव्वळ अफलातून असते..उद्यमनगर, हुतात्मा पार्क जवळ आहे..(नविन लोकाना पटकन गावनार नाही.. रिक्षा करुन जाणे...घाबरु नये..कोल्हापुरातले रिक्षा वाले पुण्यासारखे नाहित.. ;))... सोमवार बंद असते. सकळी लाइन लागलेली असते..मिसळीसाठी.

2. चोरगे  मिसळ

हे ठिकाण महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे (महाद्वार रोडजवळ) आणि तेवढेच प्रसिद्ध आहे. इथली मिसळ थोडी कमी मसालेदार आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळ कट. कोल्ड ड्रिंक्स, सोलकढी ही इथे दिली जाते.


 याशिवाय आणखी काही मिसळीची ठिकाणे प्रसिध्द आहेत.तसं पहायला गेलं तर कोल्हापूरात कोठेही मिसळ खा, चांगलीच मिळणार याची शाश्वती! सगळीकडेच मस्त-खतरनाक-चरचरीत-झणझणीत-तर्रीदार मिसळ मिळते. पण तरीही प्रत्येकाच्या चवीला पटणारी अशी काही ठिकाणं नक्कीच असतात, जी प्रत्येकासाठी SOMEWHAT SPECIAL असतात. मग प्रत्येकासाठी त्या SOMEWHAT SPECIAL ची कारणं वेगवेगळी असू शकतात. काहींनी आयुष्यात पहिल्यांदा तिथेच मिसळ खाल्ली असेल किंवा काहींसाठी ती जागा GO-TO PLACE/अड्डा असेल किंवा आणखी काहीतरी!
३. खासबाग मिसळ - खासबाग मैदान, KMT बस स्टॉप जवळ..आता दर्जा एवढा राहिला नाही
४. मोहन मिसळ हाउस -मिसळ बघताच चेहेर्‍याला घाम फुटतो...महाद्वार रोड वर आहे..अजुन एक आहे महाद्वार रोड जवळ्..आतल्या गल्लीत् नाव विसरलो.
५. बावडा मिसळ - कसबा बावडा कोल्हापुर
६. आहार - मंगळवार पेठ
७. महाद्वार जवळची शिवपार्वतीची मिसळ पण झणझणीत मस्त असते.
८. पन्हाळ्याला तबक उद्यान बाहेरची मिसळ.

९) रमेश भगत मिसळ
    अगदी माफक दरात (₹३०/-) झणका देणारी गाड्यावरची मिसळ" असंच काहीसं वर्णन या मिसळीचं करता येईल. मालक, रमेश एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि तितक्याच मोकळेपणाने मिसळ खायला घालणारा अवलिया! एकट्याने मिसळीच्या धंद्याचा गाडा ओढणारा मनुष्य!
    एकदम कडक-चरचरीत पातळ भाजी-कट, चांगल्या चवीचा आणि QUALITY चा शेव-चिवडा आणि एकदम FRESH असा मऊसूत BREAD, असं SERVING असलेला हा खतरनाक विषय!
HALF मिसळ चा OPTION देखील AVAILABLE. पण मिसळ, आणि तीही HALF, हे बुद्धिला न पटणारं गणित. शक्यतो मालकांना PHONE करून जावं लागतं, MANPOWER कमी असल्याने काही वेळा मिसळ बंद असते.
रमेश भगत मिसळ,
OPP. KOLHAPUR ENGINEERING ASSOCIATION,
छ. शिवाजी उद्यमनगर
प्रोप्रा. रमेश भगत - 9049678089
१०) ठोंबरे मिसळ
   ज्यांनी अगदी मिसळ मंडणीपासून ते SERVE करण्यापर्यंत आपलं वेगळेपण जपलंय, ती म्हणजे "ठोंबरे मिसळ"प्लेटमधे एका बाजूला बटाटा-मटकी-शेव-चिवडा यांची रास, दुसऱ्या बाजूला AUTHENTIC कोल्हापूरी पातळ भाजी आणि सोबतीला कापून दिलेला पाव, निव्वळ स्वर्गसुख. दर पण अगदी परवडेबल ₹४०/-
ठोंबरे मिसळ,
भोई गल्ली, बिंदू चौक
१०) नादखुळा मिसळ
बहुधा कोल्हापूरातील एकमेव अशी मिसळ जी UNLIMITED मिसळ (UNLIMITED शेव-चिवडा आणि पाव) serve करते आणि तीही अगदी नगण्य अशा ₹५०/- मध्ये!
QUANTITY ला भरपूर आणि QUALITY ला १ नं. आणि सोबतीला मालवणी सोलकढी आहेच. फक्त पातळ भाजी-कटचा रंग बघून मन तृप्त होईल असा नजारा.
नादखुळा मिसळ,
OPPOSITE IDBI BANK, खरी कॉर्नर
११) कोल्हापूर मिसळ
अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मिसळ चरचरीत-झणझणीत अशा प्रकारात मोडते. पाहताक्षणी भुलवणारी पातळ भाजी-कट मन जिंकून जाते. ही मिसळ बाहेरगावच्या मिसळ महोत्सवामध्ये इतकी का नावाजली गेली आहे हे पाहिला घास घेतल्या-घेतल्या कळते. मिसळ संपेपर्यंत घाम फुटला नाही तरच नवल अशी या मिसळीची खासियत. प्रत्येक घासाला मिसळीमागच्या अफाट प्रयत्नांची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. हे झालं मिसळीचं! चहा तर त्याहून फक्कड. प्रत्येक घोटाला आकडी दुधाची चव किमया करून जाते. एकवेळ अवश्य भेट द्यावी अशी चव.
दर : मिसळ - ₹४०/-
       चहा - ₹१०/-
कोल्हापूर मिसळ,
TULSI GAS AGENCY नजीक, यल्लम्मा ओढा चौक
१२) शिव मिसळ
   या जागेबद्दल कौतुक करावं तितकं कमीच आहे. आदबीने मिसळ खायला घालणाऱ्या व्यक्तींमध्ये या दोन्ही मालक-बंधूंचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. दोघांच्याही स्वभावाला पर्याय नाही असं म्हणालो तरी काही वावगं ठरणार नाही. इथे गेल्या-गेल्या ज्या २ गोष्टी जाणवतात, मिसळीचा येणार कडक सुवास आणि मालक बंधूंची आपुलकी. कधी कधी असं वाटतं की या दोघांच्या बोलण्यानेच CUSTOMERS ची पोटं भरत असणार. इथली बाहेरगावच्या मंडळींची रेलचेल ही एक उल्लेखनीय बाब.
झणझणीत चवीसोबत आपुलकीच्या सेवेसाठी या ठिकाणाला महिन्यातून एकदा तरी नक्कीच भेट द्यावी लागते. दरही परवडेबल ₹३५/-
शिव मिसळ,
दसरा चौक
१३) गावरान मिसळ
सकाळी सहसा १०:३०-११ नंतर न मिळणारी अशी ही मिसळ.
गावरान STYLE INTERIOR, त्याच पेहरावातील SERVE करणारी माणसं आणि चुलीवर शिजणारी मिसळ, इतकं बस्स आहे एखाद्या मिसळ प्रेमीला वेडं करण्यासाठी. सोबत दिला जाणारा गावरान मसाला तर या सगळ्याहून लाजवाब. एका पातळ भाजी SERVING सोबत एक-दीड चमचाभर गावरान मसाला जादू करतो. Family साठी बसायला पुरेशी जागा असल्याने FAMILIES मध्ये HOT FAVORITE अशी ही मिसळ खायला गर्दी असते.
दर : ₹४०/-
गावरान मिसळ,
राजारामपुरी ९ वी गल्ली
१४) यश मिसळ
या मिसळ center मध्ये गेल्या-गेल्या नजरेला प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे "पितळी CUTLERY" पाण्याचा जग, पेले, ताट, वाट्या, चमचे, अगदी सगळं पितळी. एकदम चरचरीत मिसळ आणि ती खाताना येणारा एकदम ROYAL FEEL, अवर्णनीय. इथला कट म्हणजे "NOT FOR FAINT HEARTED" असंच काहीसं म्हणता येईल. मस्त, मजा आली!
दर : ₹४०/-
यश मिसळ,
राजारामपुरी २ री गल्ली,
V. T. PATIL CONVENTION HALL ची BACK SIDE
तळटीप : प्रत्येकाच्या मिसळीचा TYPE हा वेगळा असू शकतो. वरील LIST ही माझ्या आकलनीय बहुतेक सर्व मिसळींची चव चाखल्यानंतर आणि माझ्या चवीला मंत्रमुग्ध करणार्‍या मिसळींची आहे. प्रत्येकाच्या चवीनुसार ही LIST बदलू शकते. तरी वरील मिसळी सोडून बाकीच्या वाईट आहेत, असा अर्थ यावरून काढू नये.

आणि कोल्हापुरात कुठ्ल्याही हॉटेल मधे गेलात तरी मिसळ ही चांगलीच मिळते.डोळ्यातील पाणी आणी डिश मधली मिसळ या॑चा स॑गम झाला म्हणजे मिसळ साठी दिलेले पैसे फिटले असे समजायला हरकत नाही. 

  दीपक वडा सेंटर


हे दुकान  दसरा चौकात आहे आणि शहरातील वडा पावसाठी हे सर्वात जुने प्रसिध्द हॉटेल. अलीकडेच जागेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वडा मोठा आणि चवदार असतो, जर तुम्ही वडा पाव ऑर्डर केला तर ते त्याबरोबर पावा ऐवजी  ब्रेड देतात. आपण मुंबईकर किंवा पुणेकर असाल तर हे आपणास  वेगळेच वाटू शकते .
कोल्हापुरातील प्रसिध्द बटाटेवडेवाले:-
१)  न्यू पॅलेस जवळ बटाटेवडेवाला
२) राजाराम कॉलेजमागे मिळणारा शामचा वडा ,मस्त तिखट
३ )पॉलिटेक्नीक कॉलेजचा कट वडा
४ ) चारुदत्त वडा प्रसिध्द होता, अर्ध्या-शिवाजी पुतळ्या जवळचा.वडा एकदम मस्त. पण उशिरा गेलात तर हात हालवत परत यावे लागणार. मालक बोलायला एकदम उर्मट पण वडा एकदम मस्त म्हणुन सहन करायचे.
५ ) प्रकाश : शिवाजी पुतळा
६ ) इंडिया हॉटेल - महानगरपालिके समोर
७ ) तुकाराम वडा - महानगरपालिके कडून सम्राट चौकाकडे जाताना
८ ) प्रियदर्शनी वडा - रंकाळा
९ ) गंगावेशेतील छकुली वडा
१० ) शिंगोशी मार्केट जवळ अनेगा वडा

११) स्टेट बँक जवळ, उद्यमनगर येथील वडा

१२) सिद्धाळा गार्डन मागे मिळणारा वडा

१३ ) जाधव वडासेंटर ,ताराबाई रोड, यळगुड डेरीजवळ, वेळ संयंकाळी ५ ते 8

 कोल्हापुरात इतर खादाडीची ठिकाणे:-
 १. महाद्वार रोड- हॉटेल कामत आणी तिथला डोसा.
२. अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाला लागून उसाचे रसवंती गृह..अजुनही चव चांगली आहे..
३. एकेकाळी प्रार्थना हॉटेलची पावभाजी आणि गोकुळ (बसंत बहार समोरचे) हॉटेलची इडली फेमस होती.
४. रंकाळ्याजवळच्या बागेत माईणकरच्या भेळेच्या गाडीवर बेवडा मिक्श्चर
५. विद्यापीठ हायस्कूल दावणगिरी लोणी डोसा.एक खावुन समाधान होत नाही. गर्दी असते पण इ॑तजार का फल चा॑गला डोसा होता है.
६. वा॑गी बोळातला प्रकाशरावा॑चा चहा एकदम अफलातुन. कुठेही खावे पण चहासाठी वा॑गी बोळात यावे. प्रकाशराव बोलायला चहा पेक्षा गोड.
७. विद्यापीठ हायस्कूल जवळील चाटचे गाडे.
८. तेथेच जवळ असणारा हेन्द्रेचा पाचक सोडा. पहिल्या घोटालाच मे॑दुला झिणझिण्या येतात आणि सोडा पोटात कसा जातो ते बाहेरुन सुद्धा जाणवते.
९. सँडविच खायचं असेल तर राजारामपुरी शुन्यावी गल्ली किंवा खासबाग मध्ये किशोर.
१०. हल्ली न्यू पॅलेस जवळ संध्याकाळी रस्त्यालगत भाकर्‍या भाजुन मिळतात. तुम्ही ऑर्डर दिलीत की तुमच्या समोर खमंग भाजुन देतात

११. पातळ भाजी - (हॉटेल इंडिया, महानगर पालिके मागे), ( हॉटेल मिलन, बिंदू चौक)
१२. कांदा भजी,  मस्का पाव -  हॉटेल मिलन, बिंदू चौक
३३. भेळ -  विलास काकांची भेळ ( खासबाग जवळ)
१४. आईस क्रीम (कॉकटेल आईस क्रीम ) - (राजमंदिर, माळी कॉलनी), (इम्पिरिअल आईस क्रीम, शिवाजी चौक), (एम्पायर आईस क्रीम, शिवाजी चौक), (पाटील आईस क्रीम, शिवाजी चौक)
१५. खांडोळी - हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर
१६. चहा - (परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ),(सावली चहा सेंटर, रविवार पेठ), (टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी), (बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ जवळ, मंगळवार पेठ) (कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ)
१७. लस्सी - (तृशाशांती, महाद्वार रोड), (मोहक लस्सी, मराठा बँक जवळ), (श्री लस्सी, रंकाळा बस स्थानक जवळ, रंकाळावेश)
१८. कोल्हापुरी गुळ, काकवी, उसाचा रस -(कोल्हापूर जिल्हातील सर्व गुर्हाळ घरांमध्ये ताजा खायला, प्यायला मिलेल.)
१९. दुधसार - (होटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी), (राधानगरी गाव)
२०. झुणका भाकरी - (पन्हाळा किल्ला)
२१. कोल्हापुरी मसाले, लोणचे - (मराठा दरबार मसाले),  (महालक्ष्मी सुरेश मसाले), (श्रीकांत मसाले)

इतर खाद्यपदार्थ

1. राजमंदिर आईस्क्रीम
कोल्हापुरातील हा आईस्क्रीमचा प्रसिद्ध ब्रँड आहे. मिरची पावडर असलेली लाल पेरू ही त्यांची अनोखी चव आहे. परंतु आपण आंबा, पान मसाला किंवा सिझलिंग ब्राउन आईस्क्रीम देखील खाऊन पाहू शकता.इथले पान फ्लेवर आईस्क्रीम निव्वळ झक्कास.
 एका कपासाठी किंमत साधारण 35 ते 45 रुपये आहे. कोल्हापुरात राजमंदिराच्या ३ शाखा आहेत, रंकाळा, राजारामपुरी आणि नागाला पार्क जवळ आहेत.

सर्व ठिकाणी तुम्हाला एकच चव खाण्यास मिळते हे विशेष. राजमंदिर मधले केशर पिस्ता आईसक्रीम पण एकदम जबरदस्त आहे. आणि तिथल फ्रुट श्रीखंड पण छान आहे एकदम.
    आईस्क्रीम करीता माझ फेव्हरीट सोळंकी. तिथलं कॉकटेल आईस्क्रीम आज जवळपास शंभर रुपये झाल आहे. पण त्याची टेस्तच वेगळी आहे. त्यांचे फ्रुट कॉकटेल आणि जिंजर (सोडा घालुन करतात ते) सहीच असते.

 २. हिंदुस्थान बेकरी

कोल्हापुरातील ही सर्वात प्रसिद्ध बेकरी आहे. कोल्हापुरात त्याची २ शाखा आहेत. महालक्ष्मी मंदिराजवळील एक आहे. कपिलतिर्थ मार्केटच्या समोर् ताराबाई रोडला लागुन्..आतल्या बोळात ही बेकरी आहे.झक्कास एकदम!!आपल्याला येथे अस्सल आणि ताजी बेकरी पदार्थ  मिळतील. येथील खारी, ब्रेड, टोस्ट , बनपाव आणि नानकटाई खूप रुचकर आहेत. त्यांची खारी, पेस्ट्री खासच!! शिवाय आणखी एक अनोखा पदार्थ म्हणजे रस्क.जरुर खाउन बघा.

 त्यादिवशी तयार केलेली सर्व उत्पादने विकली जातात तेव्हा ते नवीन पदार्थ न बनवता दुकान बंद करतील हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
  आणि बर्‍याच वेळा असे घडते म्हणून तुम्हाला इथून काही  खरेदी करायची असेल तर सकाळी  लवकर जा.  हिंदुस्थान बेकरी म्हणायचे असेल त्यासारखे बेकरीचे पदार्थ आजवर आयुष्यात कुठेही खालेले नाहीत आणि यात काही अतिशयोक्ति नाही.

 भारत बेकर्स
कोल्हापूर पुरातील जूनी बेकरी , जोतीबा रोड, छत्रपती शिवाजी रोड, उद्यम नगर, 

इतक खाण झाल मंडळी ! आता पचायला पान तर पाहिजेच. पान खाण्यासाठी फेवरीट जागा म्हणजे राजाबाळ किंवा पद्मा टोकीज जवळच्या पान पट्ट्या.बाकी कोल्हापूरी खाण्याचा मन भरून आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे जाऊन खाण्याशिवाय पर्याय नाही......

  ३ . कोल्हापुरी दूध कट्टा

कोल्हापूर शहरात दूध कट्टा हा खूप प्रसिद्ध आहे. गंगावेश नावाच्या सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांच्या उपस्थितीत म्हशीला दूध देण्यास येते. कोल्हापूरच्या ताज्या दूध देणाऱ्या या सुविधेचा पर्यटकांना आनंद घेता येतो. कोल्हापुरातील पैलवानांना या दुधाची खास पसंती आहे .
 
धारोष्ण दुधासाठी या कोल्हापूरच्या दूध कट्ट्यावर...

    आज शहरातील विविध भागांत बॅंकांची "एटीएम' केंद्रे आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये दूध कट्टे दिसतात. प्रत्येक पेठेतील दूध कट्ट्यांची जागा आणि वैशिष्ट्य ठरलेले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरचे दूध कट्टे ही खासियत झाली आहे. महिन्याला पैसे देऊन दररोज दुधाचा "रतीब' लावणारे नामवंत पैलवानही या कट्ट्यावर हमखास दिसतात. 
     जागतिकीकरणाचा परिणाम आता खेड्यांवरही दिसू लागला आहे. डोळ्यांसमोर असलेलं गावाचं निसर्गरम्य चित्र बदलू लागलं आहे. खेड्यांमध्येही आता शहरासारख्या सुविधा दिसताहेत. व्यावसायिक सुधारणेमुळं खेडी आता निमशहरी झाली आहेत. अशा या बदलातही ग्रामीण जीवनशैलीचा बाज अजूनही मनापासून जपणारं शहर म्हणजे कोल्हापूर. या शहरात फिरताना तुम्हाला कोणत्याही रस्त्यावर मोकळ्या फिरणाऱ्या म्हशी दिसणारच. बिनधास्त फिरणाऱ्या म्हशी आणि तितकेच निवांत पशुपालक. समोरून येणाऱ्या लोकांना म्हैस मारेल याची भीती नाही किंवा म्हशींनाही वाहनांचा त्रास नाही. शहरात ही अडचण कशासाठी ? ...असे तुम्ही विचाराल? पण ही अडचण नाही..तर ही आहे परंपरा... शहरवासीयांना धारोष्ण दूध देण्याची. गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरसारख्या शहरी भागातही कोपऱ्या कोपऱ्यावर दूध कट्टे सुरू असलेले दिसतात. धारोष्ण दूध कट्टे ही कोल्हापूरची खासियत बनली आहे. धारोष्ण दुधाचा आस्वाद घेत ग्रामीण भागाचा अनुभव देणारे हे चित्र तुम्हाला इतर कोणत्याच शहरात दिसणार नाही.
...असे आहेत दूध कट्टे
आज जशी शहरात "एटीएम' केंद्रे आहेत तसेच हे दूध कट्टे कोल्हापुरातील ग्राहकाला जागच्या जागी धारोष्ण दूधपुरवठा करतात. प्रत्यक्ष कट्टा नसला तरी एका विशिष्ट ठिकाणी म्हशी उभ्या करून तिथे धारोष्ण दूध देण्याच्या ठिकाणाला कट्टा म्हटले जाते. कोल्हापूर शहर विविध पेठांमध्ये विभागले आहे. प्रत्येक पेठेची जशी खासियत आहे, तशी तेथील दूध कट्ट्यांची जागा आणि वैशिष्ट्यही ठरलेले आहे. शिवाजी पेठ, उत्तरेश्‍वर, पंचगंगा तालीम, बुधवार पेठ या पेठांमध्ये सकाळ-संध्याकाळ कधीही जा, तुम्हाला धारोष्ण दूध मिळणारच. सकाळ- संध्याकाळी या कट्ट्यावर म्हैसपालक आपली म्हैस घेऊन येतात. साधारणत: सकाळी दहापर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्री एकपर्यंत या कट्ट्यावर ग्राहकांना धारोष्ण दूध मिळू शकते.
      सध्या कोल्हापुरातील दूध कट्ट्यांचा विचार केला तर सुमारे तीन ते चार हजार म्हशी आहेत. पारंपरिक शेती व्यवसाय नसला तरी गवळी काम करणारी बहुतांशी कुटुंबे या व्यवसायात आहेत. विकतचा चारा घेऊन म्हैसपालन केले जाते. मंडई, उत्तरेश्‍वर पेठ या भागांत चारा विक्रीला येतो. तेथूनच ही गवळी मंडळी जितका चारा लागेल तितकाच खरेदी करून म्हैसपालन करतात. प्रत्येक कुटुंबाकडे सरासरी पाचपासून पंधरा म्हशी आहेत. म्हशीला वैरण घरात दिली जाते, तर पशुखाद्य ठिकठिकाणच्या कट्ट्यावर दिले जाते. म्हशीची धार काढल्यानंतर दूध थेट ग्लासमध्ये भरून ग्राहकाला दिले जाते. साधारणत: वीस रुपयांना एक ग्लास (सुमारे चारशे मि.लि.) या दराने दुधाची विक्री होते. कोणतीही भेसळ न होता धारोष्ण दूध प्यायची मजा काही औरच आहे. कोल्हापूर ही पैलवानांची नगरी. साहजिकच धारोष्ण दुधाकडे अनेक पैलवानांचा ओढा आहे. यामुळे महिन्याला पैसे देऊन दररोज दुधाचा "रतीब' लावणारे पैलवानही या कट्ट्यावर हमखास दिसतात. याशिवाय अनेक ग्राहक गेल्या कित्येक वर्षांपासून धारोष्ण दुधाचा आस्वाद घेत आहे. धारोष्ण दूध पिणे ही आता त्यांची सवयच बनली आहे.
अडचण नाही... अभिमान...
कोल्हापूर शहर झपाट्याने सुधारत आहे. पारंपरिक पद्धती कालबाह्य होत आहेत. धारोष्ण दूध पिण्याची पद्धत मात्र तशीच टिकून आहे आणि ती बदलणारही नाही. शहरात जनावरे असणे म्हणजे इतर शहरांसाठी ती अडचण झाली असती. ट्रॅफिक जॅम, शेणामुताचा वास अशा अनेक कारणांमुळे जनावरांना बाजूला करता आले असते; पण कोल्हापूर हे वेगळं शहर आहे. शहर जरी असले तरी त्याचा ढंग ग्रामीण आहे. शहरालागत असणाऱ्या ग्रामीण भागाचा प्रभाव या शहरावर आहे. खेड्यातील संस्कृती या दूध कट्ट्यावरही दिसते. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा दूध संघ देशभरात प्रसिद्ध आहेत. येथील दूधप्रक्रिया पदार्थ देशातील बाजारपेठेत पोचले आहेत. याचबरोबर "इथले दूध इथेच' ही परंपराही या शहराने मनापासून जपली आहे. आज ग्रामीण व्यवस्था शहरीकरणाकडे झुकली असली तरीही या जमान्यात कोल्हापुरातील दूध कट्टे अद्यापही धारोष्ण दुधासाठी प्रसिद्ध आहेच, हीच आमच्या अभिमानाची बाब असल्याचे शहरवासीय सांगतात.
धार काढण्याची खास लकब
गळ्यात तांबडा रुमाल बांधलेला आणि खास पोषाखातील गवळी लगेच ओळखू येतो. डोक्‍यावर कोंड्याचे घमेले, म्हशींना खाद्य म्हणून कोंडा, खपरी पेंडची पाटी, पितळेची कासंडी, पितळेचा पेला असे साहित्य घेऊन म्हैस मालक कट्ट्यावर येतात. म्हशीची धार काढायला बसण्याची लकबही विशिष्ट असते. धार पिळता-पिळता "हाय या!'ची आरोळी कट्टाभर घुमत असते.
व्यवसाय अडचणीत... पण चालविणारच
    आमच्या भागातील अनेक शेतकऱ्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. सध्या चारा आणि पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे हा व्यवसाय परवडत नाही. परंतु पूर्वीपासून आमचा हाच व्यवसाय असल्याने काटकसरीने दूध कट्टा सुरूच ठेवणार, कारण हीच कोल्हापूरची खासियत आहे.  

 कोल्हापूर मध्ये काय खरेदी कराल ?

१ . कोल्हापुरी साज
   महाराष्ट्रातील पारंपारिक दागिन्यांचा एक प्रसिद्ध प्रकार. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत, साज राजघराण्यातील विवाहित स्त्रियांनी परिधान केले होते पण आज महाराष्ट्राची प्रत्येक वधू हे दागिने आवडीने मिरवते. कोल्हापुरी साजला महाराष्ट्रीय महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. आताच्या आधुनिक जीवनात बहुतेक लोकांना ह्या  नेकलेसचे महत्त्व माहिती नाही.

   यामध्ये मंगळसूत्र, एक ठुशी (पारंपारिक हार), नथ (नाकाची अंगठी) इत्यादींचा समावेश आहे. आपण पारंपारिक मोहन माला, लक्ष्मी हार, राणी हार, अंबाडा (केसांची पिन) आणि वाकी (हातचे दागिने) देखील खरेदी करू शकता.
    कोल्हापुरी साज एक प्रकारचे महिलांनी गळ्यात घालावायचे आभूषण आहे.हा एक पारंपारिक अलंकार आहे कि ज्याची वापरण्याची सुरुवात कित्येक वर्षापासून कोल्हापुरातून झालेली आहे आणि आता तर महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्येही याला खूप पसंती आहे.पारंपारिक पद्धतीने या साजामध्ये २१ गोल आकाराची पाने असतात पण कोल्हापूर मधील महिला मात्र दररोजच्या दगदगीच्या जीवनात वापरण्यासाठी १० किंवा १२ पानांचा साज बनवून घेतात.हा अलंकार खूपच सुंदर दिसतो.याचे डिज़ाईन पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते म्हणून पर्यटक या डिज़ाईनमध्ये नकली नेकलेस बनवून घेतात.
कोल्हापुरी साज -
   काठपदराची भरजरी साडी (लुगडे), कपाळावर भव्य कुंकू, बुचड्यावरील (अंबाडा) वेणीत खोचलेला केवडा, कानातील नक्षीदार फुले, गळ्यातील टीक, मंगळसूत्र आणि त्यापुढे झेपावणारा भारदस्त असा कोल्हापुरी साज स्त्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवतो. कोल्हापुरी साजाच्या या कारागिरीने विविध प्रांतांतील स्त्रियांना जशी भुरळ घातली, तशी त्याने देशाच्या सीमाही ओलांडल्या.
    कोल्हापूर म्हटले की, येथील रांगडा आणि कणखर माणूस समोर येतो. येथील तांबड्या मातीने त्याच्या मनगटाची जशी मशागत केली, तशीच रवाळ कोल्हापुरी गुळाचा गोडवाही त्याच्यात पेरला आहे. या समृद्ध मातीने अनेक कलागुणांना जन्म दिला तशी विविध व्यवसायांतील प्रायोगिकताही वारंवार सिद्ध केली आहे. कालगतीत हे प्रयोग केवळ टिकूनच राहिले असे नाही, तर त्यात वैविध्यही येत गेले. त्यात गुळाबरोबरच कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साजाचे उदाहरण ठळकपणे सांगता येईल. गुळाचा गोडवा सर्वदूर पसरला, कोल्हापुरी चपलेने बाहेरच्या देशातील नागरिकांचा माथा शांत ठेवला, नजर निर्मळ केली, तसा कोल्हापुरी साजाने प्रांतोप्रांतीच्या स्त्रियांना सौंदर्य आणि खानदानीपणा बहाल केला. म्हणूनच शालीनता आणि घरंदाजपणा अधिक भारदस्त करणारा हा दागिना आपल्याकडेही असावा, असे प्रत्येक स्त्रीला वाटणे स्वाभाविक आहे.
    कोल्हापूर हा घाटमाथ्यावरचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात तिन्ही ऋतू समान असतात. त्यामुळे येथील पीकपाणीही कायम चांगले राहिले आहे. खूप आधीच्या काळापासून या समृद्धीमुळे येथे सर्व क्षेत्रांतील उलाढाल चांगली राहिली आहे. त्यामुळे येथील लोकांच्या हातात पैसाही कायम खुळखुळत राहिला. सामाजिक वातावरण शांत. त्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय येथे स्थिरावले आणि वाढले. सराफ व्यवसायही (कोल्हापुरात त्याला गुजरी म्हणतात.) भरभराटीला आला. विशेषतः राजर्षी शाहू महाराजांनी बाहेरच्या राज्यातील सराफ व्यवसायिकांनाही येथे आणून संरक्षण दिले.
     सुवासिनीचे लेणे समजला जाणारा हा साज फक्त येथेच तयार होतो. म्हणून त्याला ' कोल्हापुरी साज ' असे नाव पडले. त्याचा पत्रा पातळ आणि नाजूक असतो. येथील प्राचीन श्रम आणि कृषिसंस्कृतीचे प्रतिबिंबही या साजात पडलेले दिसते. साजाच्या रचनेतील मणी आणि पानांवरील नक्षीकाम समजून घेतले तर ते लक्षात येईल. सुवासिणीचे लेणे असलेल्या या साजाच्या सुरुवातीला चाफेकळी नंतर पाचपानाडी (विविध औषधी वनस्पतींची पाने आणि विड्याचे पान), बेलपान, दोडका, कारले, सूर्य, माणिक पानाडी, मत्स्य, कूकर्म, नृसिंह (अवतार), फूल, भ्रमर, चंद्र, पाचू पानाडक्ष, गंडभैरी, मोरचेल, मयूरपंख, शंख, वाघनख, नाग आणि शेवटी ताईत असे नक्षीकाम प्रत्येक पानावर केलेले असते. नक्षीकामानंतर पाने जवमण्यांमध्ये गुंफली जातात. प्रत्येक दोन पानांत एक पान गुंफले जाते. हे मणी डमरूसारखे असतात. पानाला घागऱ्यांचे घोस लावतात. ते तीन ते पाचदरम्यान असतात. घागर जसे जलकुंभाचे प्रतीक, तसेच प्रेमाचेही प्रतीक आहे. ‌शिव-शक्ती आणि सृष्टीच्या सर्जनशीलतेचा मिलाफ साजाच्या कारागिरीत बेमालूमपणे केलेला असतो. शेवटी साज हिरव्या रेशमी सुतात गुंफून त्याला लाल रेशमी भरजरी गोंडा लावला जातो. घागऱ्यांकडची बाजू सोन्याच्या अखंड बारीक तारेत गुंफलेली असते.
    जुन्या काळात १२ पानांचा साज असायचा. आता तो बजेटप्रमाणे कितीही पानांत केला जातो. पोकळ पानांचा साज करण्यासाठी किमान ३० ग्रॅम सोने लागते. आता भरीव पानांचा साजही केला जातो. हॉलमार्किंग आणि सोन्याच्या प्युरिटीसाठी भरीव पानांचा साज चांगला समजला जातो. आवटी काढण्यापासून मणी गुंफण्यापर्यंतची कारागिरी वेळखाऊ आणि त्रासदायक असली, तरी साज पूर्ण झाल्यानंतर कारागिरांना एकप्रकारचे वेगळे समाधान देऊन जाते.
    आजच्या ' ईएमआय ' च्या जीवनशैलीत सामान्य आणि मध्यमवर्गीय स्त्रियांना सोन्याची हौस परवडणारी नसते. त्यावर उपाय म्हणून येथील सराफ व्यवसायिकांनी उपाय शोधला. सर्वसामान्य स्त्रियांची साजाची हौस भागावी, यासाठी तांबे आणि चांदीमध्येही साज बनवायला सुरुवात केली. त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. कालांतराने मुलामा गेला, तरी परत चढवता येतो. त्यामुळे सोन्याचा नसला तरी तांब्या-चांदीत बनविलेल्या साजामुळे हौस भागविली जाते.
    काठपदराची भरजरी साडी (लुगडे), कपाळावर भव्य कुंकू, बुचड्यावरील (अंबाडा) वेणीत खोचलेला केवडा, कानातील नक्षीदार फुले, गळ्यातील टीक, मंगळसूत्र आणि त्यापुढे झेपावणारा भारदस्त असा कोल्हापुरी साज स्त्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवतो. कोल्हापुरी साजाच्या या कारागिरीने विविध प्रांतांतील स्त्रियांना जशी भुरळ घातली, तशी त्याने देशाच्या सीमाही ओलांडल्या. कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग बन‌लेल्या या साजाच्या भारदस्तपणाला उठाव मिळाला तो ' गदिमां ' च्या लावणीने. ' एक हौस पुरवा महाराज। मला आणा कोल्हापुरी साज... ' ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांनी या लावणीवर चढविलेल्या स्वरसाजाने कोल्हापुरी साज मराठी जनांच्या ओठांवर आजातागायत रुळला आहे. 

काळाच्या उदरात अनेक कला लोप पावत गेल्या, तरी कोल्हापुरी साजाची कला टिकून राहिली ती केवळ त्यातील हस्तकौशल्यामुळेच. साज पूर्ण होईपर्यंत त्यातील एक पान किमान १४ वेळा हाताळावेच लागते. म्हणून ही कारागिरी अत्यंत वेळखाऊ असते. साज बनविणारे कारागिर कमी झाले असले तरी आता हॅण्डमेड मशीन आणि पॉवर मशीनच्या माध्यमातून त्याच्या आवटी काढल्या जातात. फार पूर्वी साजाच्या आवटी काढण्यासाठी काशाचे ठसे वापरले जात. आता ते स्टीलचे वापरले जातात. त्यामुळे फिनिशिंग आणि बारीक कलाकुसरही चांगली होते. असे असले तरी पानाड्यांचे दोन्ही भाग जोडण्याआधी त्यात लाख भरून, डाक मारून ते ठोकण्याचे काम हातानेच करावे लागते. डायमेकिंगमुळे त्यातील कालापव्यय कमी झाला असला तरी बांधणी आणि गुंफणही हातानेच करावी लागते. ती कोल्हापुरी कारागिराशिवाय कुणालाच जमत नाही. म्हणूनच त्यातील अस्सलपणा आजही टिकून राहिला आहे. साजाची ओळख कोल्हापुरी म्हणूनच राहिली आहे.
  २ . कोल्हापुरी चप्पल:-
कोल्हापुरी पादत्राणे पारंपारिकपणे हस्तनिर्मित आहेत आणि  शुद्ध लेदरपासून बनविलेले असतात. कोल्हापुरी चप्पल अद्वितीय आहेत कारण त्यांना जोडण्यासाठी कोणताही धागा वापरला जात नाही. लेदरच्या तारांचा वापर सिलाई करण्यासाठी केला जातो. 
कोल्हापुरी चपला
जिल्ह्यातील २०,००० हून अधिक हस्तकलांना नोकरीसाठी हा एक हस्तकला उद्योग आहे.
आधुनिकीकरणामुळे हे कोल्हापुरी चप्पल वेगवेगळ्या आकारात, नमुन्यांमध्ये आणि रंगांमध्ये देखील उपलब्ध आहेत.
ते पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध आहेत. ही चप्पल खरेदी करण्यासाठी तुम्हाला बरीच पादत्राणेची दुकाने कोल्हापूर मध्ये  सापडतील पण कोल्हापुरी चप्पल महाद्वार रोडवर जास्त प्रमाणात  विकल्या जातात आणि त्या ओरिजिनल असतात. 
 पादत्राणांची दुनिया! इथं अनेक कंपन्यांनी नाव कमावलं. प्रचंड जाहिरातबाजी करुन या कंपन्या आपल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याकरिता धडपडतात.
परंतु प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल!
माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई. 

भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.
कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते.
सध्या मात्र या व्यवसायात चामड्यांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलांच्या निर्मितीच्या प्रमाणात घट होत आहे. चामड्याच्या वाढत्या किंमती हेही कारण आहे. याही परिस्थितीत कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट, वेणी चपलांना शहरी भागात तर कापशी चपलांना ग्रामीण भागात मागणी आहे. घडीच्या कोल्हापुरी चपलांना परदेशी खूपच मागणी आहे. 

स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या देशात कोल्हापुरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. त्यासाठी इथल्या उद्योजकांना निमंत्रणे येतात. कातडी कमावण्याच्या व्यवसायात कोरियाचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
कोल्हापूरला आलेली पाहुणे मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत हे जरी खरे असले तरी सद्य परिस्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने कामगार वर्गावर कठीण परिस्थिती आल्याचे जाणवते. जिल्हा चर्मोद्योग संघाचे कार्यकर्ते या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. चर्मोद्योग महामंडळाने प्रयत्न करणे जरुरीचे आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलेच्या निर्मितीला पुन्हा चांगले दिवस येतील.

आहे.  
त्यात पॅरिसमधील डिझायनर नेओना या मार्गदर्शन करतील. कोल्हापुरीच चपलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक व्यापारी, कारागीर, तज्ञांची व बाटा कंपनी तसेच इतर कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.

कोल्हापूरी फेटा

फेटा म्हणजेच पगडी हे कोल्हापुरातील वैशिष्ट्य आहे. फेटा घालणे हा प्रतिष्टेचा समजला जातो आणि जो पारंपारिक फेटा घालून पाहुण्यांचे स्वागत करतो तो एक सन्मान आणि पाहुणचार समजला जातो. 
 
वास्तविक पगडी 3.5 ते 6 मीटर लांब कपड्याची आहे. कोल्हापुरी पगडीसाठी हा विशिष्ट केशरचा रंग आहे.
कोल्हापूर मधून तुम्ही फेट्याचे कापड किंवा तयार फेटा पण विकत घेऊ शकता.

कोल्हापूरी नऊवारी साडी

साधी साडी हि सहावारी असते पण कोल्हापुरी साडी हि नऊवारी असते.  प्रत्येक महाराष्ट्रातील महिलेची नऊवारी साडी नेसण्याची तीव्र इच्छा असते, परंतु ती परिधान करणे फारच अवघड असल्याने ही इच्छा अपूर्ण राहिली आहे. 
 
अनेक स्त्रियांच्या मनातील ही अपूर्ण इच्छा आता  “रेडीमेड नऊवारी साडी” या संकल्पनेने पूर्ण होऊ शकते.
कोल्हापूर मध्ये तुम्हाला अमर्यादित प्रकारच्या नऊवारी साडया खरेदी करण्यास मिळतील.

५ . कोल्हापुरी गुळ

 कोल्हापुरात ऊस उत्पादन होते आणि साखर व गूळ उत्पादनामध्ये अनेक कारखाने आहेत. कोल्हापूरचा  पांढरा गूळ खरेदी करायला विसरू नका. तो  निरोगी आणि रुचकर आहे.

कोल्हापूर गूळ हा एक गोड पदार्थ आहे जो उसाच्या रसाचे केंद्रित उत्पादन आहे आणि त्याचा रंग सोनेरी तपकिरी ते गडद तपकिरी रंगात बदलू शकतो. कोल्हापुरी गूळ महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे, म्हणून पर्यटक कोल्हापूरला येतात तेव्हा बहुतेकदा गूळ खरेदी करतात.
भारतातील महाराष्ट्र राज्य हे गुळाचे सर्वात मोठे उत्पादक आणि ग्राहक आहे. कोल्हापूर जिल्ह्या मध्ये ऊसाचे ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे हा जिल्हा गुळ ऊत्पादनामध्ये अग्रेसर आहे तसेच येथील गुळ ईतर गुळापेक्षा कमी रंगीत आहे. रंगातील अशुध्दता सहजरित्या कमी केली जाते. जुने गुळ बांधणी करणारे हे त्यांच्या बांधणीमध्ये कमी लाल – तांबुस रंग बनवण्यामध्ये निपुण असतात. हा कमी रंगीत आणि जास्त गोड असलेला हा गुळ प्रसिद्ध आहे. जिथ गुळ बनवला जातो त्या ठिकाणाला गुर्‍हाळ म्हणतात. ह्या गुर्‍हाळा मध्ये पुर्वापार कालाप्रमाणे कोल्हापूरी मटण व रस्सा ह्यांचा आहार असतो.
जगातल्या कोणत्याच महागड्या मिठाईला येणार नाही अशी अद्वितीय चव कोल्हापूरच्या गुळाला आहे !
देखणं केशरी रूप ...
एक मधुर गंध ....
खाताना येणारी एक अनोखी चव .....
यामुळे हा गुळ साता समुद्राच्या पलीकडे पण भलताच प्रसिद्ध आहे...
साखर कारखान्यांमुळे उसाचे उत्पन्न कारखान्यात जास्त प्रमाणात जात असले तरी दहा बारा गुंठ्यातला उस तरी गुळासाठी गाळून घेणारा शेतकरी वर्ग कोल्हापुरात भरपूर आहे ....
आता उसाची गुऱ्हाळे चालू आहेत आलात तर एखाद्या गुऱ्हाळाला नक्की भेट द्या ...
गरमागरम आणि अवीट चवीचा ताजा गुळ चाखून तर बघा राव...

६ . कोल्हापुरी भडंग

भडंग हा चिरमुर्‍यापासून बनलेला पदार्थ आहे. त्यात जो मसाला आहे ती कोल्हापुरची खासियत आहे. कोल्हापुरी भडंग हा  मसालेदार, रुचकर आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे.


७ . कोल्हापुरी कांदा आणि लसूण चटणी 
 
कांदा, लसूण आणि लाल तिखट यांनी तयार केलेला कोल्हापुरातील हि एक अतिशय मसालेदार आणि प्रसिद्ध चटणी आहे आणि हिला फारच खुमासदार चव आहे. हि चटणी मांसाहारी आणि शाकाहारी डिशमध्ये खुपदा वापरली जाते.कोल्हापुरातील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. हि लोणच्यासह दही आणि चपाती बरोबर देखील खाऊ शकतो.

कोल्हापूरमधील खरेदीची ठिकाणे

कोल्हापूर मध्ये तुम्ही खाली दिलेल्या ठिकाणी  भेट देऊन खरेदी करू शकता.
1. महाद्वार रोड :-
महाद्वार रोड हे कोल्हापुरातील सर्वात जुन्या आणि गर्दीच्या खरेदी बाजारापैकी एक आहे. विविध प्रकारच्या खरेदीच्या वस्तूंनी भरलेल्या अरुंद गल्लींमधून बिनधास्त फिरा. भांडी ते कपड्यांपर्यंतच्या वस्तूंपर्यंत तुम्हाला या सर्व गोष्टी इथे सापडतील. बाजारपेठ सभोवताल असलेल्या कमानदार प्रवेशद्वारकडे जा आणि या जुन्या रचनेचे स्थापत्य आणि कोरीव कामांचे कौतुक करा. या जागेवर उभी असणारी घरे हि अनेक दशके जुनी आहेत. 

बाजाराच्या इतिहासाविषयी आणि येथील वैशिष्ट्यांविषयी दुकानदार खूप जाणकार आहेत, म्हणून त्यांच्याशी संवाद साधा. कोल्हापूर सुंदर सजावट केलेल्या आणि नैसर्गिक साहित्यापासून बनवलेल्या आरामदायक चपलासाठी प्रसिद्ध आहे. घरी घालण्यासाठी एक जोडी घ्या आणि बाहेर जाताना किंवा प्रासंगिक कारणासाठी एक जोडी घ्या. त्या नक्की उठून दिसतील.
• किती महाग आहे? -  मध्यम बजेट
• वैशिष्ट्य -  लेदर वस्तू,  फॅशन  
पत्ता:  73, महाद्वार रोड, डी वॉर्ड, पापाची तिकटी, कोल्हापूर, महाराष्ट्र
वेळः   10:00 सकाळी - रात्री  8:00 वाजता
2. शिवाजी रोड :-
हे खरेदीसाठी एक नंदनवन आहे. हे मार्केट एखाद्या खरेदीदाराला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी उपलबध करून देते.  फक्त बसस्टँडवर उतरून इथल्या शॉपिंग सेंटरवर जा. इथे कोल्हापुरी वैशिष्ट्य असलेले कपडे खरेदी करता येतील. हीरा पन्ना शॉपिंग सेंटर मध्ये जा आणि तुम्हाला चमकदार पितळेची भांडी आणि चमकदार धातू बनविलेल्या सुंदर मूर्ती आढळतील. 

जेव्हा आपण दिवसभर खरेदी करून थकाल, तेव्हा रस्त्यावरच्या एका खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर जा आणि काही चवदार पदार्थांचा आस्वाद घ्या. आपल्या घरासाठी योग्य उपयोगी वस्तू तुम्हाला येथे नक्की मिळतील . या मार्केट मध्ये बरेच इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आहेत. त्यामुळे ती खरेदीही येथे करता येईल.
• किती महाग आहे ? - मध्यम बजेट
• वैशिष्ट्य -  कॉटन टेक्सटाईल, कोल्हापुरी साडी
पत्ता:  शिवाजी रोड, कोल्हापूर, महाराष्ट्र
वेळः  10:00 सकाळी - रात्री  8:00 वाजता  

3. D Y P सिटी मॉल

कोल्हापुरातील  अगदी मोक्याच्या ठिकाणी डीवायपी सिटी मॉल उभा आहे. येथे संपूर्ण दिवस घालवा.इथे चित्रपटगृह आहे, आपण आपल्या कुटुंबासह नवीन  चित्रपट देखील पाहू शकता. आरामदायक जागा, गरम पॉपकॉर्न आणि जंबो आकाराचा सोडा हे सर्व तुम्ही नवीन चित्रपट बघत एन्जॉय करू शकता. हया मॉलमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्समध्ये नवं-नवीन वस्तू उपलब्ध आहेत. 
 
या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू देखील मिळतील. चित्रपटाचा आनंद लुटल्यानंतर, फूड कोर्टकडे जा आणि विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्या.
• किती महाग आहे ?  - मध्यम ते उच्च प्रतीचे
• वैशिष्ट्य -  फॅशन, इलेक्ट्रॉनिक वस्तू
पत्ता:  बी-504, जुना पुणे - बेंगलोर हायवे, निंबाळकर कॉलनी, रुईकर कॉलनी, कोल्हापूर, महाराष्ट्र
वेळः  11:00 सकाळी – रात्री 10:00 वाजता  
        याशिवाय कोल्हापुर शहराजवळ असलेल्या  कापड मार्केट (गांधीनगर) येथे अत्यंत स्वस्त दरात कापड खरेदी करता येइल.  

कोल्हापुर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे:-

ऐतिहासिक गड-कोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्व विलक्षण आहे. दुर्ग, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्ये, हेरिटेज वास्तू, धरणे, जंगल सफारीची ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूरच्या दीडशे किलोमीटरच्या परिसरात आहे. वस्तूत: साडेतीन पीठांपैकी एक शक्तिपीठ श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, शिलाहार राजांच्या कालखंडातील प्राचीन खिद्रापूर मंदिरासह अन्य पर्यटनस्थळे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा गोफच. छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्तीपंढरी, गुळाची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल, रंकाळा तलाव, आणि तांबडा-पांढरा रस्सा चाखायचा असेल तर कोल्हापुरला पर्यटकांनी नक्की भेट द्यायला हवी. आता उन्हाळ्याच्या कालावधीत शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर पर्यटनासाठी सहकुटूंब बाहेर पडण्याचा ट्रेंड रुळला आहे. याच काळात पर्यटकांना कोल्हापूर हे डेस्टिनेशनही खुणावते आहे. शहर परिसरातील, जिल्ह्यातील निसर्ग सर्वांना मोहात पाडतो. श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, पंचगंगा नदीघाट ही नेहमीची ठिकाणे. इथल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला रंकाळा तलाव. तलावाच्या मध्यभागी रंगभैरवाचे मंदिर. एका बाजूला संध्यामठ. पश्चिमेस असलेली शालिनी पॅलेसची वास्तू म्हणजे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. मग कलासक्त पर्यटकांना खुणावतात काही अनोखी ठिकाणे. राजारामपुरीतील मांडरे चित्रदालन, ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टे पहायलाच हवेत. कोल्हापुरातून बाहेर पडलं की जोतिबाचं तीर्थक्षेत्र. डोंगरावर भिरभिरणारा वारा आणि सुखद गारवा देणारा किल्ले पन्हाळा. ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारा कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग हेही पर्यटकांना खुणावतात. निसर्ग पर्यटनाला बाहेर पडलं तर मग कोल्हापूरपासून जवळचं गव्यांसाठी आरक्षित असलेले दाजीपूर अभयारण्य आणि भारतातील पहिले मातीचे धरण राधानगरीतले. चांदोली, आंबा, देवराई, मानोली, येळवण जुगाई, उदगिरी, दाजीपूर, बोरबेट, वाकीघोल, पेरणोलीचा सडा असं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत फिरता येतं. पारगड, सामानगड, रांगणा, शिवगड, गगनबावडा, पावनगड, विशाळगड हे किल्ले इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत स्फुल्लींग चेतवतात.

माणसाच्या जीवनातील धावपळ जसजसी वाढत जाईल, तसतसे ताणतणावाला फाटे देवून चैतन्याच्या वाटाही शोधण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे विविध निमित्तांनी, उद्देशाने, मार्गाने पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ धार्मिक उद्देशाने होणाऱ्या पर्यटनाचे स्वरुप आज नक्कीच बदलले आहे. निखळ आनंद, मौजमजा यापासून अगदी सामाजिक विषयावरील जनजागृतीपर्यंतच्या साऱ्या उद्देशांना पर्यटन या विषयाने स्वत:मध्ये सामावून घेतले आहे. धार्मिक, सामाजिक, गडकिल्ले पाहणी असो, वन्यजीवांना विविध वनस्पतींना भेटणे असो, पर्यटनाच्या साऱ्या वाटा, सारे रस्ते आपसूकच कोल्हापुरला आल्याशिवाय राहत नाहीत हेच खरं... आणि एकदा कोल्हापूरात आलं म्हटलं की, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरची भेळ, कोल्हापुरी साज, करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गुळाचा गोडवा, कोल्हापूरची चंदेरीनगरी, हुपरी येथील चांदीचे कलाकुसरीचे दागिने, कोल्हापुरी फेटा या साऱ्या गोष्टींबरोबरच ‘या पाव्हणं’ असं म्हणणारी कोल्हापुरी माणसं आहेतच आपल्या स्वागताला ...तर आपण आज जाणून घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाविषयी...दक्षिण काशी...महालक्ष्मी रंक असो वा राव साऱ्यांचे हात निस्सीम भक्तीनं जिथं जोडले जातात ती सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवतं असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील हे कोरीव मंदीर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्यावरील कोरीव काम ही प्रेक्षणीय आहेत. याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रातील रोषणाई या मुळातच अप्रतिम सुंदर असणाऱ्या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलविते. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते. जुना राजवाडा आणि भवानी मंडप हे याठिकाणचे आकर्षण आहे. कोल्हापूर एस. टी. स्टँडपासून केवळ दोन कि.मी. अंतर आहे. बस, रिक्षा, आदि सर्व माध्यमातून या ठिकाणी पोहोचता येते. दख्खनचा राजा ज्योतिबा दख्खनचा राजा असा लौकिक असणारे सर्व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजे ज्योतिबा. लगतच्या अन्य राज्यांमधूनही भाविक याठिकाणी येतात. वाडी रत्नागिरी येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. ज्योतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. ज्योतिबाच्या सासन काठ्या प्रसिद्ध आहेत. ज्योतिबावर 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे आहेत. पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. यात्रेच्यावेळी कित्येक टन गुलाल, खोबरे उधळले जाते. जवळच यमाई मंदिर आहे. यात्रेत ज्योतिबाची पालखी यमाई मंदिरास भेट देते.कसे जाल- कोल्हापूरपासूनचे अंतर 20 कि. मी.चे आहे. त्यासाठी सुमारे 40 मिनिटे लागतात. बसस्थानकापासून एस. टी. महामंडळाच्या बसेस अथवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत. न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी न्यू पॅलेस दिमाखात उभा आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे. राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. मध्यवर्ती बसस्थानकापासून 3 मि.मी. अंतरावर हे ठिकाण असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. टाऊन हॉल म्युझियम कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय असून याठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती येथे पाहता येतात. बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत. बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर असून बससह सर्व प्रकारच्या वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.

खासबाग मैदान कुस्ती म्हटले की कोल्हापूर ही संज्ञाच ठरलेली. खासबाग मैदान म्हणजे देशोदेशीच्या मल्लांच्या शिक्षणाचे माहेरघर, राजर्षि शाहू महाराजांनी दिलेली अनमोल भेट. 20 ते 30 हजार लोक कुस्ती पाहू शकतील इतके प्रशस्त मैदान. कुस्ती परंपरेत अजूनही या मैदानाला मानाचे स्थान आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून 2 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बसेसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते राजर्षि शाहू जन्मस्थळ- लक्ष्मीविलास पॅलेस रष्टा राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिजे जाते ते राजर्षि शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून शासन विकसित करीत आहे. शाहूकालिन कागदपत्रे, आरक्षणाचा जाहीरनामा, महाराजांच्या वापरातील वस्तू याठिकाणी आहेत. कोल्हापूर बसस्थानकापासून 3 कि.मी. व 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस व रिक्षानेही जाता येते. कणेरी येथील सिद्धगिरी मठ करवीर तालुक्यात कणेरी येथील सिद्धगिरी मठ हे धार्मिक तसेच पर्यटन केंद्र आहे. ग्रामजीवन समृद्धी, शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा असणारे हॉस्पिटल येथे आहे. प्राचिन विद्वानांची शिल्पे आहेत. कोल्हापूर बसस्थानकातून 15 कि.मी. व 40 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून एस. टी. ची सुविधा आहे. तसेच बस व अन्य खाजगी वाहनांचीही सोय आहे. दत्ताची वाडी अर्थात नृसिंहवाडी शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री दत्ताचे 500 ते 800 वर्षांची परंपरा असलेले पुरातन व प्रशस्त देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते. श्री नृसिंह सरस्वती यांचे याठिकाणी 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. देशभरातून भाविक दत्त पादुकांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रापर्यंत आहेत. कोल्हापूरपासून 55 ते 60 कि. मी. अंतर असून तेथपर्यंत जाण्यासाठी 1.30 ते 2 तास असा कालावधी लागतो. नजिकच्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड याठिकाणी राहण्याची व जेवणाची स्वस्त दरात सोय होऊ शकते. याठिकाणी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरज आदी स्थानकांपासून बसची सुविधा उपलब्ध आहे. जैन धर्मियांचे पवित्र स्थळ श्री क्षेत्र बाहुबली पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे जैन तीर्थक्षेत्र म्हणून याचा उल्लेख केला जातो. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ही या ठिकाणाने दिलेली देणगी आहे. कमालीची स्वच्छता व निसर्ग सौंदर्य आणि भगवान श्री बाहुबलींची 28 फुटी संगमरवरी देखणी आणि भव्य मूर्ती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. सभोवताली 24 तीर्थकरांची लहान-लहान मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी याठिकाणी महामस्तकाभिषेक होतो. या ठिकाणी दुर्गामातेचे पठार व त्यावर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संग्रहालय, कारंजे, रंगसंगतीचा नाविन्यपूर्ण अविष्कार, उद्यान, धबधबे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात. श्री आदिश्वर स्वामींची विशाल प्रतिमा परिवारासह आहे. श्री क्षेत्र बाहुबली हे आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिकदृष्ट्याही महत्वाचा परिसर आहे. कोल्हापूरपासून 27 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुमारे एक तास लागतो. कोल्हापूर, हातकणंगले स्थानकापासून बसच्या सुविधा आहेत. रिक्षानेही जाता येते.

शाहू तलाव व पुरातन शिव मंदीर आणि जागृत हनुमान मंदीर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर

  1. रंकाळा तलाव: महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दिशेला,रंकाळा तलाव आहे.हे सकाळी फिरण्यासाठी व करमणुकीचे लोकप्रिय ठिकाण आहे. हा तलाव राजा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे.या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. रंकाळ्याच्या मागील बाजूलाच शालिनी पॅलेस आहे.हे महाराष्ट्रातील तारांकित हॉटेल आहे. भूतकाळातील कोल्हापूर शहर हे चित्रीकरणातील प्रसिद्द ठिकाण आहे. पुष्कळ मराठी व हिंदी चित्रपट कोल्हापुरातील चित्र गृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरणचित्र गृहामध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. भूतकाळातील सर्वात मोठे नांदी असलेले संध्यामठ मंदिर बांधिले आहे.
  2. पन्हाळगड

कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्याी रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.हा किल्ला रक्षन करणार्याठ 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे, सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.किल्ल्या मध्ये अशाच प्रकारची आणखी एक ईमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, 1500 ए. डी. मध्ये ही ईमारत ईब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथुन फरार झाले.

येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट नाही आहे की, त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले, पन्हाळा हा असा गड आहे की, जेथे शिवाजी महाराजांनी 500 रहिवासी होते. ब्रिटीशांच्या काळात 1782 ते 1827 पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.हा किल्ला कोल्हापूर च्या ऊत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. ऊंचीवर येतो.युध्दकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे, त्याच्यातील एक जो महत्त्वाची भुमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे, जो मोठा व ईतिहासकालीन आहे. शिलहारा मुख्य राज्यकर्ता भोज II (1178 – 1209) यांच्या नंतर ही कारकिर्द यादवांच्याकडे सुफुर्त करण्यात आली. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, बिदारचे बहामनिस; महमुद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावनीपासुन दुर सैन्य ठेवुन पावसाळ्याच्या कालावधीत 1469 मध्ये ह्या गडावर हल्ला केला. पुढे जाऊन 16 व्या शतकात हा किल्ला बिजापुर ह्यांनी काबीज केला. अदिल शाहा यांनी ह्या गडाचे काही चबुतरे व दरवाजे करून घेतले.त्यानंतर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, व पुर्णपणे प्रस्थापित होईसतोपर्यंत गडाच्या दुरूस्तीचे काम थांबवले.

1701 मध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला, आणि येथुन मग मुघल बादशाह यांच्याकडुन ईंग्रज राज्यकर्ता, सर विल्ल्यमनरिस यांच्या हाती हा गड सुफुर्त करण्यात आला. काही महिने पंत अमात्य रामचंद्र ह्यांच्या सेनांनी हा किल्ला काबीज केला, ज्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकांमध्ये आहे. 1782 मध्ये ह्याचा राज्यकारभार कोल्हापुर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला. 1844 मध्ये स्थायिक राज्यकर्त्यांकडुन ब्रिटीशांनी हा किल्ला काबीज केला.गडाच्या मुख्यालया पासून 7 कि.मी. पेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत ह्या गडाची लांबी वाढवण्यात आली. ऊतरण असलेल्या मोठ्या भींती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या, ह्या भिंतीमध्ये पाहणीकरिता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. राहिलेल्या भागामध्ये 5 – 9 मी. मोठी तटबंदी, लांबीचे मोठे गोल बुरूज बांधले. पुर्वेकडील दरवजाला चार दरवजा म्हणतात, ज्याच्या मधुन गडामध्ये येण्यास मार्ग आहे, ह्याचा नाश ब्रिटीशांनी केला.

प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला टाकीसारखे हिरवे आणि पांढरे दरगे पहायला मिळतात. तीन दरवजा पर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ 400 मी. जातो.अदिल शाही पध्दतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण ऊदाहरण आहे. प्रवेशद्वारा आतील त्रिज्या खंड गोलाकार खंड दर्शवते. नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेंची ऊपखंडे आहेत.ह्याच्या वरती गणपती व ईतर देवांच्या मुर्त्या आहेत.बाजुच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली मार्या ची तटावरील भिंत आहे आणि सुधारीत पाने व फांद्या असलेली नक्षी आहे. सर्वात समोरची मार्यातची तटावरील भिंत वरती दिसते. पश्चिम बाजुच्या आंगणाच्या बाहेरील बाजुला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत. दोनभिंतीच्या मधल्या भागांमध्ये बाहेरच्या बाजुने प्रवेश द्वार आहे. इब्राहीम अदिल शहा यांची आतील त्रिकोणी जागांमध्ये इराणची कोरलेली नाणी आहेत. पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे.पन्हाळा टेकडीच्या मध्यावरती बालेकिल्ला येत नाही तोपर्यंत ऊत्तरेला जवळजवळ 1 कि.मी. पर्यंत हा मार्ग सलग्न आहे. हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे, आत्ता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे व काही पडला आहे. येथे तीन मोठ्या चौकोनी ग्यालरी आहेत,ह्यांच्या मध्ये संपुर्ण भुदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे व ते मोकळेणाने येथे ऊभा राहु शकतात. मोठ्या, काही 40m by 10m चे 16 रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत ज्याच्यामध्ये वरती 8 मी. पर्यंत चौकोनी जागा आहेत.काही पायर्यां वरून बाहेरील छतावर जाता येते.

  1. महालक्ष्मी मंदिर
  2. भवानी मंडप :छोटे वस्तुसंग्रहालय
  3. ज्योतिबा मंदिर
  4. न्यू पॅलेस : शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
  5. टाउन हॉल : छोटे वस्तुसंग्रहालय
  6. दाजीपूर : दाजीपुर कोल्हापूरच्या वन्य जीवांची ओळख करून देणारे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जेंव्हा दिवसभर शहरातील प्रदूषित वातावरणात श्वास घेणे मुश्कील होते तेंव्हा या ठिकाणी येऊन आपण खुल्या वातावरणामध्ये फक्त श्वासच नाही तर येथील वन्य जीवांना जवळून पाहण्याची संधी मिळवाल.हे अभयारण्य सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत खुले असते. अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी ३० रुपये तिकीट आहे त्याचबरोबर आतमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला जीप हवी असल्यास प्रत्येकी १०० रुपये तिकीट दर आहे.
  7. गगनबावडा :गगनबावडा हे तालुक्याचे ठिकाण आहे.गगनबावडा हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या व रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्ये येते हिरवीगार झाडी आणि एक छान धबधबा,गगनगिरी मंदिर,बावडेकर वाडा
  8. पावनखिंड आणि विशाळगड : सुप्रसिद्ध ऐैतिहासीक ठिकाणे
  9. धबधबे - राऊतवाडी, बर्की, मानोली (आंबा)
  10. भुदरगड (गारगोटी)
  11. गडहिंग्लज: सामानगड
  12. शालिनी पॅलेस
  13. शिवाजी विद्यापीठ परिसर
  14. राधानगरी धरण

 कोल्हापुरची भटकंती अशी करा:-

 ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचं असलेलं कोल्हापूर एरवी चटकदार मिसळीसाठी आणि मटणाबरोबरच्या पांढऱ्या-तांबडय़ा रश्शासाठीही प्रसिद्ध आहे. खवय्ये कोल्हापूरला जातात ते खाण्यापिण्याच्या चैनी करण्यासाठीच..कोल्हापूरच्या नावातच एक प्रकारचा रांगडेपणा दडलेला आहे. त्यामुळे उगा कुचकुचत जेवणाऱ्यांनी कोल्हापूरच्या वाटेलाच जाऊ नये. मुंबईच्या आणि पुणेकरांच्या हिशेबी वृत्तीनुसार वाटीभर 'एक्स्ट्रा' रस्सा आणि एक्स्ट्रा चटणीचा हिशेब येथे केला जात नाही. 'अजून घे की रं मर्दा' म्हणत बादलीनंच रस्सा वाढणारेदेखील आहेत या शहरात. त्यामुळे कोल्हापुरात जायचं तर भरपूर खावं-प्यावं आणि भरपूर फिरावं. भले आपण पैलवान नसू पण पैलवानांच्या गावात गेल्यावर शहरी कोतेपणा बाजूलाच ठेवावा. अर्थात त्याआधी आणखी एक ध्यानात घ्यावं. महाराष्ट्रातच नाही तर देशभरात उडपी हॉटेल अथवा अन्यांनी कोल्हापुरी जेवण म्हणून मिरची पावडर आणि गरममसाला टाकून जे काही लालभडक पदार्थ खायला लावले आहेत ते म्हणजे कोल्हापुरी नाही. कोल्हापुरी म्हणजे चमचमीत, पण उचकी लावणारं नाही. त्याची चव न्यारीच.स्वातंत्र्यलढय़ातील योगदान ते सामाजिक चळवळीचा भलामोठा वारसा या शहरास लाभला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या रुपाने एक प्रचंड मोठा सामाजिक बदल त्यांनी अनुभवला आहे. भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर अशा अनेक चित्रतपस्वींनी येथे कलेचा वारसा निर्माण केला आहे. सहकाराच्या क्षेत्राने सर्वात मोठी झेप घेतली ती याच जिल्ह्य़ात. संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता महालक्ष्मी आणि कुलदैवत जोतिबा असा कायमचा वरदहस्त लाभलेलं हे कोल्हापूर. आणि पंचगंगेच्या पाण्यावर पोसलेली येथील खाद्यसंस्कृती.किमान दोन ते तीन दिवस तरी हातात ठेवून कोल्हापुरी प्रस्थान करावं. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील हे शहर रेल्वे आणि रस्तामार्गाने व्यवस्थित जोडलेलं आहे. सकाळी सकाळी शहरात प्रवेश करते व्हावे. साताठशे रुपयांपासून ते दोन-तीन हजारांपर्यंत आपल्या खिशाला परवडेल असं लॉज/हॉटेल स्टेशन आणि एसटी स्टॅण्ड परिसरात सहज मिळून जातील. लांबून येणार असाल तर रेल्वे उत्तम. शहरात दोन-चार दिवसांसाठी गाडी मिळू शकते. रस्तामार्गे गाडी करून आलात तरी हरकत नाही. स्नानादी आन्हिकं उरकून महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं आणि खाद्य-भटकंतीचा श्रीगणेशा करावा तो कोल्हापुरी मिसळने. (आधी पोटोबा करून मग दर्शनाला जायचं असेल तरी हरकत नाही.)अस्सल कोल्हापुरी मिसळ. बारीक फरसाण, त्यात गरजेनुसार पोह्य़ाचा वगैरे चिवडा, एखादा महाभाग गोल भजी चुरूनदेखील घालतो. वर मटकीची उसळ. हो मटकीचीच. मुंबईसारखी वाटाण्याची नाही. कट हवा असेल मारून, नको असेल तर नुसतीच उसळ, डबल कट हवा तर तोदेखील मिळेल. उसळ करतानाच त्यात पाण्याचं प्रमाण अधिक ठेवून तो कट म्हणून वापरला जातो, तर काही ठिकाणी कट वेगळा करायचीदेखील पद्धत आहे. येथे पाव म्हणजे जाडा स्लाइस असतो. त्याला पेटी पाव म्हणतात. मुंबईच्या वडापावच्या गोल पावाला येथे किंमत नाही. पेटी पाव त्यातही साइडच्या पावचा (हा जरा जाड असतो) आग्रह धरणारा तो म्हणजे कोल्हापुरी.कोल्हापुरी मिसळ मिळणारी ठिकाणं अनेक आहेत. पण उद्यमनगरातली फडतरे आणि महालक्ष्मी मंदिराजवळचे चोरगे ही दोन ठिकाणं आवर्जून भेट देण्यासारखी. येथे शुद्ध मिसळ मिळते. म्हणजे पोस्टाच्या स्टॅम्पपासून शाम्पूच्या सॅशेपर्यंत सारं काही मिळणाऱ्या जनरल स्टोअरसारखं येथे नाही. फक्त आणि फक्त मिसळच, पोट आणि मन भरेपर्यंत. हवा तेवढा रस्सा मागून घ्या. फडतरेंचं अख्खं कुटुंबंच मिसळीत गर्क असतं. सुट्टीचा दिवस असेल तर तुम्हाला रांगेतदेखील उभं राहवं लागू शकेल याची नोंद घ्यावी.तर हे मिसळपुराण आवरतं घेऊन, तुडुंब भरलेल्या पोटाने गाडी जोतिबाकडे वळवावी. हा खरा रांगडा देव. त्याचं स्थान डोंगरातच. वपर्यंत गाडी जाते. पुन्हा काही पायऱ्या उतरून देवळात जाता येतं. सुट्टी सोडून गेलात तर शांतता असते. आरामात दर्शन घ्यावं, भंडारा माथी लावावा आणि त्या डोंगरावरून उतरून दुसऱ्या डोंगराच्या चढावर म्हणजे पन्हाळ्याला गाडी न्यावी. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून शिलाहारांच्या काळापासून ते थेट आताआतापर्यंतचा ताजा इतिहास. चार हजार फूट उंचीचा हा गिरिदुर्ग अत्यंत प्रशस्त आहे आणि वपर्यंत गाडी जाते. गाडीने संपूर्ण गड फिरता येतोच, पण पायी फिरलात तर इतिहासाची चार अधिक पानं वाचता येतील. पण आता येथील गाइडनाच गाडीतून किल्ला फिरवायची सवय झाली आहे. तुमच्या सुदैवाने एखादा जुना जाणता अथवा नवा हौशी तयार झाला तर पायी फिरता येईल. फार काही कष्ट पडत नाहीत.वेशीवरच शिवा काशिद यांचा भव्य पुतळा तुमचे स्वागत करतो. सिद्दी जौहारच्या वेढय़ाच्या वेळी हे प्रतिशिवाजी बनून सिद्दीला भेटायला गेले आणि गुंगवत ठेवलं. त्या संधीचा फायदा घेऊन महाराज वेढा तोडून निसटले. शिवा काशिदना वीरमरण आलं. त्याच्या समाधीकडे जाण्यासाठी पुतळ्यापासून थोडं खाली उतरून जावं लागेल. जाणकार असेल तर लगेच पाहता येईल. तीन दरवाजा, सज्जा कोठी, पुसाटीचा बुरूज, अंबरखाना, अंधारबाव, बाजीप्रभूचा पुतळा, सज्जा कोठी, चार दरवाजा असं सारं पाहवं, ऐकावं (दुर्गावरचं एखादं पुस्तक सोबत असेल छानच). दमून भागून मग मध्येच कधी तरी तीन दरवाजापाशी मस्त चुलीवरची भाकरी, झुणका आणि खर्डा (म्हणजे ठेचा) मनसोक्त खावी. ही इथली खासियत. आता पन्हाळ्याची पार दुदर्शाच झाली आहे. पर्यटनासाठी साऱ्या सोयी करण्याच्या नावाखाली अनेक गोष्टी येथे चालतात. अनेक दुर्गप्रेमी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करत असतात. असो.पुनश्च कोल्हापूर गाठावं. एव्हाना सायंकाळ दाटून आलेलीच असते. मग रंकाळ्यासारखं दुसरं ठिकाण नाही. त्यापूर्वी केशवराव भोसले नाटय़गृहाजवळच्या राजाभाऊंची भेळ बांधून घ्यावी, किंवा खाऊन परत बांधून घेतली तरी चालेल. अस्सल कोल्हापुरी चुरमुरे वापरून केलेली चटकदार भेळ ही राजाभाऊंची तीस वर्षांची परंपरा आहे. भेळेची रेडीमेडी पाकिटंदेखील मिळतात.कोल्हापुरी मटण हा दिवसाचा उत्कर्षबिंदू. आता तुम्ही म्हणाला दिवसभर तर चरतोच आहोत. म्हणूनच सांगतो की, कोल्हापूरच्या पर्यटनासाठी मस्त हिवाळाच निवडा. त्या आल्हाददायक हवेत कितीही खाल्लं तरी पचतं. तर मटणासाठी अक्षरश: असंख्य पर्याय तुमच्यापुढे आहेत. पण अस्सल मटण खायचं असेल तर मात्र शहरातील काही नामवंतांकडेच जावे लागेल. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो मंगळवार पेठेचा. मटणाचं जेवण ही या पेठेची परंपराच आहे म्हणा ना. अनेक घरी मटणाची खानावळ असाच प्रकार आहे. पेठेच्या मेन रोडला तब्बल ७२ हॉटेल्स असल्याचं जाणकार सांगतात. त्यातदेखील स्पेशलायझेशन आहे. पाण्याच्या खजिन्याजवळचं महादेव प्रसाद म्हणजे एकदम ऑथेंटिक मटन. पण येथे गर्दीच एवढी असते की साडेआठ - पावणे नऊलाच जेवण संपतं. आधीच नंबर लावावा लागतो. दिवसभराच्या दमणुकीमुळे इतक्या लवकर शक्य नसेल तर मग बुधवार पेठेतलं हॉटेल नीलेश, पद्मा टॉकीजजवळचं पद्मा गेस्ट हाऊस आहेच. किंवा जरा लांब जात आवर्जून खाल्लंच पाहिजे असं रुईकर कॉलनीसमोरचं परख.आपण अट्टल मांसाहारी असाल तर येथे येऊन उगाच चिकन खाण्याचा करंटेपणा करू नये आणि तसंही इतर फालतू पर्याय येथे नसतातच. मटण फ्राय, मटण रस्सा, चिकन, अंडाकरी थाळी आणि व्हेज थाळी इतपतच मेन्यू कार्ड असतं. काही ठिकाणी तर मेन्यू कार्डदेखील ठेवायची गरज नसते. ऐसपैस बसावं. थाळी लावायला घेतली की भाकरी थापायला सुरुवात होते, मस्त टम्म फुगलेली भाकरी, सुकं मटण, तांबडय़ा-पांढऱ्या रश्शाच्या वाटय़ा आणि सोबतीला कांदा-दही मिक्श्चर. रश्शाच्या वाटय़ावर वाटय़ा रिचवणं हा अस्सल कोल्हापुरी रिवाज. आपणपण रिचवाव्या. किती वाटय़ा प्यालात याचा कोणी हिशेब मागणार नाही. (तुमचा तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवा बापडे). भाकरी नको असेल तर पोळीचा पर्यायदेखील असतो. पण तीदेखील घडीची आणि थाळीभर मोठी. जे पचेल ते घ्यावं. फुकटचे शहरी रीतिरिवाज न बाळगता मटणाची नळी चाटून पुसून चोखावी. भाकरी संपली की येतो तो मसालाभात. लग्नाच्या पंगतीतला नाही. पण साधारण तसाच. त्यावर मस्त परतलेला चुरचुरीत कांदा भुरभुरलेला असतो. वेटरशी सलगी करून तो आणखी मागून घ्यावा. तट्ट भरलेल्या पोटाने निवासाचं ठिकाण गाठावं आणि झकास ताणून द्यावी.जरा वेगळं काही ट्राय करायचं असेल तर अट्टल खवय्यांसाठी रक्ती-मुंडी हा प्रकार आहे. शाहुपुरी सहावी गल्लीतलं हॉटेल केशव हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय. कोल्हापुरातील जुनेजाणते खाद्यप्रेमी येथे आवर्जून येत असतात. बोकड कापतानाचं पहिलं रक्त गोठून जातं ते आणि भेजा असं एकत्र शिजवलं जातं. हवं असेल तर वेगवेगळंदेखील मिळतं.कोल्हापूरच्या मटणाचं इतकं काय ते अप्रूप असं तुम्ही म्हणत असाल. मुळातच कसंय की, मुंबईसारखं अथवा इतर शहरांसारखं इथलं जनावर कृत्रिम अन्न खाऊन वाढत नाही. बोकड, मेंढय़ा ही हिरवा पाला खाऊन मोठी झालेली असतात. त्यात येथील हवामान आणि पाणी हे दोन घटकदेखील महत्त्वाचे. दुसरं अस की मुंबईतल्या मटणात कोथळा आणि आतडी वेगळी काढून विकली जाते. येथे तसं नाही. हे सारं काही एकत्रच शिजवलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाला हा मर्यादित असतो. खरा फरक आहे तो करण्यातला. या जेवणाला घरगुती चव असते. पाककला या शब्दाला न्याय देणारा. बहुतांश ठिकाणी बायकाच कामावर असतात. भाकऱ्या तर बायकाच करतात. अर्थात हे झालं वर नाव घेतलेल्या हॉटेलांसाठी.तुम्हाला जर हाय फाय स्टायलिश जेवायची सवय असेल तर मात्र मग हीच चव मिळेल याची खात्री देता येणार नाही. पर्याय आहेत. स्टेशन आणि एस.टी. स्टॅण्ड परिसरात अनेक हॉटेल्स आहेत, त्यात कॉन्टिनेंटलपासून सारं काही मिळेल. अर्थात ते सारं काही एटीकेट्सवाल्यांसाठी. पण कोल्हापुरात आल्यावर जरा एटिकेट्स बाजूला ठेवणंच उत्तम.आता इतकं वर्णन मांसाहाराचंच केल्यावर शाकाहारींनी कोठे जायचं हा प्रश्न खरं तर तुमच्यापेक्षा मलाच पडला आहे. पण कसंय की कोल्हापुरी जेवण म्हटलं की मांसाहारीच असा एक गृहीतक इतकं पक्कं रुजलंय की मी तरी काय करणार. असो, शाकाहारींसाठी मंडईतलं जोरबा हॉटेल आणि लक्ष्मीपुरीतलं खवय्या ही शाकाहारी थाळी मिळणारी ठिकाणं.दुसरा दिवस केवळ कोल्हापूर दर्शनासाठी राखून ठेवावा. कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि कला वारसा समजून घेण्यासाठी.काल मिसळ खाऊन तृप्त झाला असाल तर आज कटवडय़ाकडे वळू या. नसेल तर पुन्हा एकदा मिसळीचा राऊंड करायला हरकत नाही. कटवडा मिळणारी ठिकाणं अनेक आहेत पण राजाराम पुरीतल्या दहाव्या गल्लीत अंबिकाचा कटवडा म्हणजे एकदम जाऊं दे झाडून या कोल्हापुरी स्टाइलनं जाणारा आहे. मिसळीचाच कट किंवा वेगळा केलेला नुसता कट मारलेला वडा आणि पाव. अर्थातच पेटी पाव, जाडा स्लाइस. हा वडा म्हणजे बटाटावडाच असतो पण मुंबईच्या वडापावसारखा नाही. मुळात त्याचा आकारच एकदम सणसणीत. गरम गरम वडा आणि बाजूला पाव. पावात वडा घालायची पद्धत येथे नाही. शाहू स्मारकाजवळचा दीपकचा वडा, नाही तर राजाराम कॉलेजच्या कंपाऊंडला लागूनच असलेला श्यामचा वडा. शहरात कोणालाही विचारा. अगदी थेट नेऊन सोडणार. कायम गरम वडा. समोरासमोर वडा सोडून मिळणारी अशीच अनेक ठिकाणं फक्त याच शहरात सापडतील.पण आज फार काही मसालेदार नको असेल तर मग थेट शिवाजी पेठेतील शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळ जाऊन दावणगिरी लोणी डोसा चाखू शकता. कोल्हापुरातील दावणगिरीचा हा आद्य प्रवर्तक म्हणावं लागेल. अगदी हलकाफुलका प्रकार. स्पंजसारखे छोटे छोटे डोसे. वर लोणी सोडून केलेले. हा पदार्थ कर्नाटकातला. पण कोल्हापुरात अगदी फेमस झाला आहे. त्याच जोडीला गरमागरम अप्पे विकणारे अनेक गाडे महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात दिसतील. दोन्ही पदार्थ पचायला एकदम हलके असल्यामुळे दोन्ही ठिकाणी गेलात तरी हरकत नाही.पोटोबा व्यवस्थित झाला की कोल्हापूर दर्शनाला बाहेर पडावं. सुरुवात टाऊन हॉल म्युझियमपासून करावी. ब्रह्मपुरी ते कोल्हापूर हा प्रवास उलगडून दाखविणारं हे म्युझियम पाहिलं की कोल्हापूरच्या अथपासून इतिपर्यंतचा इतिहासाचं आकलन होतं.कोल्हापूर म्हटलं की, शाहू महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा आजदेखील त्यांचा वारसा सांगताना दिसतात. अर्थातच महाराजांच्या जन्मस्थानाला आवर्जून भेट द्यावी. साधारण चार किलोमीटरवर बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस हे त्यांचं जन्मस्थान. शाहू महाराजांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींच येथे जतन करण्यात आला आहे.त्यानंतर जवळच्या कण्हेरी मठाला भेट द्यावी. वाटेवरच गोकुळ शिरगाव एमआयडीसी लागते. येथील गोकुळ दूध प्रकल्प आहे. रीतसर परवानगी घेऊन हा सारा व्याप पाहता येतो. कण्हेरी मठात बारा बलुतेदार, अनेक थोर भारतीय ॠषी मुनी यांची म्युरल्स आहेत. हे सारं पाहावं आणि पुन्हा कोल्हापुरात येऊन पोटोबाच्या मागे लागावं. काल सांगितलेल्या हॉटेलपैकी जेथे जाता आलं नाही तिकडे जावं. काल सुकं मटन खाल्लं असेल तर आज रश्श्यातलं खावं. मटण खर्डा नावाचा आणखी एक प्रकार सध्या खूप फेमस आहे. तो खावा आणि थोडा वेळ आराम करून पुनश्च बाहेर पडावं. दुपारी शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, कैलासगडची स्वारी मंदिर, चंद्रकांत मांडरे कलादालन असे पर्याय आहेत.खासबाग मैदानजवळ असणारं कैलासगडची स्वारी मंदिरात कलायोगी जी. कांबळे यांची अनेक चित्रं जपलेली आहेत. त्यातील महत्त्वाचं चित्र म्हणजे जॉर्ज व्हॅलेंटाइन यांनी डच चित्रकाराकडून तयार करून घेतलेल्या रेखाचित्रावरून जी. कांबळे यांनी तयार केलेलं शिवाजी महाराजांचं तैलचित्र येथे आहे. १९७० साली राज्य शासन प्रमाणित केलेल्या या चित्रावरून पुढे सर्वत्र प्रती काढण्यात आल्या. कांबळे यांनी चितारलेली राज्याभिषेक, गंगावतरण, विश्वरूप दर्शन अशी चित्रं आहेत. हे मंदिर सकाळी पाच ते नऊ या काळात खुलं असतं.असाच एक दुसरा वारसा म्हणजे चंद्रकांत मांडरे यांचं चित्रदालन. मांडरे यांची शे-दोनशेहून अधिक चित्रं आणि त्यांनी काढलेली छायाचित्रं त्यांच्या राहत्या घरी प्रदर्शित केलेली आहेत. त्यांचं घरच त्यांनी या संग्रहालयासाठी दिलेलं आहे.त्यानंतर आता शाहू महाराजांचे निवासस्थान असणारे न्यू पॅलेस पाहायला जावं. कसबा बावडा रस्त्यावरील ही इमारत १८८४ साली बांधण्यात आली. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या या इमारतीत उत्तम संग्रहालय आहे. नाना प्रकारची शस्त्रे, तैलचित्रं, छायचित्रे अशा प्रकारे ही वास्तू सजलेली आहे. मराठेशाहीचं वैभव असणारी वास्तू आवर्जून पाहावी अशीच आहे.कोल्हापूर म्हटल्यावर पैलवानांचा शड्डू आपोआपच कानात घुमू लागतो. कोल्हापुरात आलो आणि मिसळ, मटण खाल्लं नाही तर उणीव राहते. तसंच तालिमीत किमान डोकावावं तरी लागेलच. शाहुपुरी गंगावेस तालीम मंडळ, मोतीबाग तालीम मंडळ अशा काही तालमी आजदेखील कार्यरत आहेत. सायंकाळच्या वेळी गेलात तर आजदेखील तेथे अनेक पैलवान घुमत असतात. कुस्ती खेळणार नसलो तरी इकडे जाऊन लाल माती आणि कोल्हापूरच्या रांगडेपणाचं मूळ नक्कीच पाहावं. खासबाग मैदानाच्या आसपासच आहे, हे सर्व काही.अर्थात तालमी पाहल्यानंतर आपणासदेखील चार जोर बैठका काढाव्याशा वाटल्या तर काढून घ्याव्यात आणि मग एक भन्नाट प्रकार अनुभवण्यासाठी दूधकट्टय़ावर जावं. केवळ कोल्हापुरातच पाहायला मिळेल असा हा प्रकार. गंगावेस, मिरजकर तिकटी आणि खासबाग मैदानाजवळ हे दूध कट्टे आजदेखील अस्तित्वात आहेत. 'दूधकट्टा गंगावेशी काळ्याभोर उभ्या म्हशी', असं शाहीर कुंतीनाथ करके यांनी कोल्हापूरच्या पोवाडय़ात याचं वर्णन केलं आहे. रात्री सात ते अकरा या वेळेत येथे म्हशी बांधलेल्या असतात. त्यांचे मालक त्यांना चारा-वैरण देत असतात. तुमच्या मागणीप्रमाणे अर्धा लिटर, लिटर असं धारोष्ण दूध तुम्हाला प्यायला मिळते. अर्थात हे पचवायची ताकद हवी हे मात्र नक्की.दुसरा पर्याय आहे तो जोतिबाच्या वाटेवरचा, उसाच्या गुऱ्हाळांचा. कालपरत्वे इतर ठिकाणची गुऱ्हाळं बंद झाली असली तरी येथे तुम्हाला ती पाहता येतील. उसाचा रस आटवून, त्यापासून गूळ तयार करण्याची सारी प्रक्रिया येथे पाहता येईल. चवदेखील चाखता येईल. मात्र डिसेंबर-जानेवारी या गुऱ्हाळाच्या मोसमात गेलात तरच.काल आणि आज भरपूर मटण खाऊन झालं असल्यामुळे आता आजच्या रात्री शाकाहाराचा प्रयोग करायला हरकत नाही. सध्या कोल्हापुरात गल्लीबोळात अख्खा मसूर आणि तंदूर रोटीचं पेव फुटलं आहे. पण याची सुरुवात करणारा आद्य पुरुष म्हणजे इस्लामपूर रोडवरचा पाटील धाबा. कोल्हापूरपासून सुमारे २५ किलोमीटरवरचे हे ठिकाण. मात्र उशिरा म्हणजे नऊनंतर गेलात तर रिकामं बॅरल - पिंप पाहावं लागेल. येथे अक्षरश: बॅरल भरून मसूर शिजवले जातात आणि सारे फस्त होतात. याची ख्यातीच इतकी की कोल्हापुरातील अट्टल मांसाहारी माणूसदेखील येथे जेवायला येतो.अशा खाण्या-पिण्यात भटकण्यात दोन दिवस भुर्रकन उडून जातात. आता परतीच्या प्रवासासाठी तिसरा दिवस आपण कोठे जाणार, कोणत्या मार्गाने कसे जाणार यावर ठरवावा. म्हणजे कोकणात उतरायचे असेल तर आंबा घाट, गगनबावडा घाट, भुईबावडा घाट असे पर्याय आहेत. हे तीनही घाट म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त उधळणच म्हणावे असे आहेत. गोव्यात जायचे असेल तर अंबोली घाटाने उतरण्याचा पर्याय आहे. कर्नाटकात जायचे तर हायवे आहेच. आंबा घाटाने जात असाल तर वाटेत मलकापुरजवळील लव्हाळे गावातील नागराज हॉटेलमधील चुलीवरच्या मटणाचा आनंद घेता येईल.देशावरच जायचे असेल तर मग पुण्याच्या दिशेने हायवे पकडा, जयसिंगपूर-सांगलीवरुन पुढे सोलापूर, उस्मानाबाद, बारामतीला जाता येईल. सांगलीला जाताना थोडी वाट वाकडी करून इचलकरंजी मार्गे खिद्रापूर गाठावं किंवा कोल्हापुरातूनच येथे जाऊन परत यावं असंदेखील करता येईल. कृष्णेच्या तीरावरील खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर पाहावं. शिलाहारांच्या काळात साधारण ११ व्या शतकातील हे पुरातन असं हे शंकराचे मंदिर पाहून मग पुढे २० किलोमीटरवरील नृसिंहवाडी या दत्त स्थानाला भेट देता येतील. वाटेत इचलकरंजीमध्ये पुन्हा मांसाहारींसाठी अनेक घरगुती खानावळी आहेत. अख्खीच्या अख्खी एक गल्लीच या खानावळींनी व्यापली आहे. घोडके आणि बुगड या दोन प्रसिद्ध खानावळी. पण त्या रात्रीच सुरू असतात.खिद्रापूर नृसिंहवाडी वाटेवर कुरुंदवाडला भेट द्यायची ती केवळ तेथील पेढय़ांसाठी. कंदी पेढय़ांसाठी आज जरी साताऱ्याचं नाव प्रसिद्ध असलं तरी एकदा कुरुंदवाडचे कंदी पेढे एकदा खाऊन पाहाच. दूध घोटून बासुंदी, ती घोटून खवा, तो घोटून कुंदा आणि तो आणखी घोटून घोटून त्यातील पाण्याचा संपूर्ण अंश नाहीसा झाल्यावर त्यापासून तयार केलेला पेढा. दोन-चार खाल्ले की शहरी माणसाचा नाश्ताच व्हायचा. या पेढय़ात वरून एक चमचाभरदेखील साखर मिसळली जात नाही. फ्रिजमध्ये न ठेवतादेखील किमान आठवडाभर तरी टिकतो. मार्केटिंगच कसलंच तंत्र नसल्यामुळे हा केवळ कुरुंदवाडपुरताच मर्यादित राहिलेला. नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडची बासुंदीदेखील प्रसिद्ध. ग्लासभर बासुंदी प्यावी किंवा जेवणात घ्यावी आणि दत्तदर्शन करून तृप्त होत घरच्या वाटेला लागावं

 करवीरवासिनी महालक्ष्मी :

महालक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेनंतर शहराचा उल्लेख करवीर असा आढळतो.तत्पुर्वी कोल्लापुर,कोल्लपुर,कोल्लगिरी,कोल्लादिगिरीपट्टण अशी नावे प्रचिलत होती. कोल्ल म्हणजे दरी व द-यांचे गाव म्हणजे कोल्हापुर,अशी ही व्युत्पत्ती मानली जाते. सारांश काय तर ब्रम्हपुरी,करवीर व कोल्हापुर अशी स्थल नामांची बहुविध रुपे उपलब्ध होतात.महालक्ष्मी देवालयाच्या स्थापनेमुळे कोल्हापुरात धार्मिक केंद्राचे स्वरुप प्राप्त झाले त्यातुनच सांस्कृतिक व आर्थिक क्रांतीची नानाविध रुपे प्रकट झाली.

इ.स.१२ व्या शतकाच्या कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला.त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणुन कोल्हापुर अग्रेसर राहिले.१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर 1306-1307 मध्ये कोल्हापुर शहरात मुस्लिम सत्तेचा अम्मल स्थापन झाला. श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर (१६६९) पुनश्च कोल्हापुर परिसर स्वराज्यात समाविष्ठ झाला.पुढे स्वातंत्र्य युध्दाच्या व कोल्हापुर शहराने मोलाचा इतिहास घडविला आहे.महाराणी ताराबाईच

महालक्ष्मी मंदिर संकुल...

महालक्ष्मी मंदिराचे गर्भगृह आधी बांधले व पुढील राजवटींमध्ये हे मंदिर पूर्ण झाले, पण मंदिरस्थापत्य व मूर्ती प्रतिष्ठापन शास्त्रांचा आधार घेता वरील विधान तितकेसे संयुक्तिक वाटत नाही. शिवाय याला पुष्टी देणारे सबळ पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मंदिर निर्माण कर्ता अजूनही अंधारातच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

महालक्ष्मी मंदिर समूह व त्याची एकंदर स्थिती विचारात घेता असे आढळून येईल की, हा त्रिकूट प्रासाद टेकडीवर वसलेला असावा. मंदिरापासून पश्चिमेकडे रंकाळा तलावापर्यंत जाणवण्याइतपत उतार आहे. शिवाय मुख्य त्रिकूट प्रासादाभोवतीची मंदिरे ही त्या मानाने खूपच खालच्या पातळीवर आहेत. महालक्ष्मी मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. (पूर्णत: पश्चिमेकडे नसून 50 ने वायव्येकडे तोंड करून आहे) नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये सूर्यास्तावेळी सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या विग्रहावर काही काळ स्थिरावतात.


कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती सुप्रसिद्ध असे महालक्ष्मी मंदिर आहे. किंबहुना, आपण असे म्हणू शकतो की, कालांतराने महालक्ष्मी मंदिराभोवती वस्ती वाढल्याने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती आले. प्राचीन कोल्हापूरसंबंधी विस्तृत माहिती देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे 'करवीरमाहात्म्य' कोल्हापूर आणि परिसरातील जवळजवळ सर्व देवता व त्यांच्या स्थानांची माहिती या ग्रंथात मिळते. या ग्रंथात प्रमुख वर्णन आढळते ते महालक्ष्मी व तिच्या विजयगाथांचे! करवीर महात्म्यानुसार महालक्ष्मीच सर्वाची जननी असल्याचे घोषित केलेले आहे. करवीरमाहात्म्य ग्रंथाच्या रचनेचा काळ मात्र अद्यापि वादाचा मुद्दा आहे. याच्या रचनेच्या काळासंदर्भात एकमत  नाही. कोल्हापूरला 'कोल्हापूर' (मूळ नाव : कोल्लापूर) हे नाव कशामुळे मिळाले याची कथा 'करवीर माहात्म्यात' पाहायला मिळते. महालक्ष्मीने कोल्लासुराचा वध केला व त्याच्या प्रार्थनेवरून या क्षेत्राला 'कोल्लापूर' असे नाव प्राप्त झाले. भारतातील प्रमुख शक्तिपीठांमध्ये महालक्ष्मीचे पीठ म्हणजेच कोल्हापूर किंवा करवीरक्षेत्र हे प्रमुख आणि पूर्ण पीठ आहे. इथे महालक्ष्मीचे स्थानिक नाव 'अंबाबाई' आहे. कोणे एके काळी हे क्षेत्र तीर्थयात्रेचे प्रमुख केंद्र होते आणि त्यामुळेच याला 'दक्षिण काशी' असे नाव प्राप्त झाले. (या क्षेत्राची तुलना 'काशी' बरोबर केली जाते.)

महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले, हा संशोधकांसमोर अद्यापि एक प्रश्नच आहे. या अनुषंगाने अनेक संशोधकांनी इतिहास व त्याच्या ताम्रपट, दस्तऐवज, शिलालेख यांसारख्या पुराव्यांच्या आधारे महालक्ष्मी मंदिर बांधणीच्या कालखंडाचा अभ्यास करून अनेक आडाखे बांधले आहेत. तसे पाहता, चालुक्या (बदामीचे) राजांनी महालक्ष्मी मंदिर बांधले अथवा बांधकामाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या पुढील राजवटींनी हे बांधकाम पुढे वाढवले असा एक समज सर्वमान्य झाला आहे. इतिहास सांगतो की, शालिवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार (कल्याणी चालुक्यांचे मांडलिक व नंतर स्वतंत्र राजवट घोषित) यादव, बहामनी, मराठेशाही यांसारख्या सत्ता कोल्हापूरवर राज्य करून गेल्या; पण बदामीचे चालुक्य ते देवगिरीच्या यादवांपर्यंतच्या कोणत्या राजवटीत महालक्ष्मी मंदिर बांधले गेले याचा अजून मागमूस लागलेला नाही वा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.

कोल्हापुरातच सापडलेल्या एका भग्न शिलालेखानुसार अशी माहिती मिळते की, परकीय आक्रमणे होण्याआधी महालक्ष्मी मंदिरावर स्वकियांनी हल्ला केला. दक्षिणेतील चोल राजांनी कल्याणी चालुक्यांच्या विरोधी मोहीम राबवून त्यांचे राज्य कोल्हापूरपर्यंत जिंकून घेतले. या विजयोन्मादात त्यांनी महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला. या नुकसानीतून मंदिराचे रक्षण व्हावे यासाठी कोणी मुथ्थैय्या नामक लढवय्याने आपले प्राण गमावले. कालगणनेनुसार ही घटना अकराव्या शतकात घडली, असा अनुमान निघतो. या सर्व वर्णनातून एक गोष्ट स्पष्टच प्रतीत होते की, जर महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या अर्थी ते त्या काळी लाकडाचे (पूर्णत: वा अंशत:) होते. म्हणून आपल्याला असा अंदाज बांधण्यास काही हरकत नाही की, सध्या दृश्यमान असलेले महालक्ष्मी मंदिर हे कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले असावे.

डॉ. मिराशी जे शिलाहार राजवंशाच्या इतिहासाचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या मते, महालक्ष्मीचे मंदिर हे शिलाहार राजवटीच्याही आधीचे असून कदाचित ते 'िंसद' राजवटीत बांधले गेले असावे. या सिंद राजांनी (करहाटपुराधीश्वर) कोल्हापूर-कराड या भागावर काही काळ राज्य केले) आणि शिलाहारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा. कोल्हापूरचे शिलाहार हे जरी 'महालक्ष्मीलब्धवरप्रसाद' असे बिरुद धारण करणारे असले तरी बहुतकरून या राजवटीत स्यादवादाला (जैनमत) प्राधान्य होते.

महालक्ष्मी मंदिर प्रकारात चार जैन द्वारपालांच्या मूर्ती आढळतात. त्यातील दोन मूर्ती महाकाली मंदिराच्या उपमंदिरामध्ये 'भरत' आणि 'शत्रुघ्न' या नावाने विराजमान आहेत, तर उर्वरित दोन सभामंडपाच्या प्रवेशिकेच्या दोन्ही अंगास कोनाडय़ांमध्ये स्थित आहेत.

तर अश्या या कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणापासून म्हणजे महालक्ष्मी मंदिरापासून भटकंतीची सुरवात करुया. महालक्ष्मीलाच  अंबाबाई हे नाव आहे.  देवी अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिराला करवीर निवासिनी देखील म्हटले जाते. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्यादेवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे.

 कोल्हापुरात सर्वोच्च स्थान कुणाला असेल तर या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. हे श्रीमहालक्ष्मीचे देवालया न उभारले जाते तर आज कोल्हापुर शहरच दिसले नसते. श्रीमहालक्ष्मीची आर्शीवादानेच श्री.शाहू छत्रपती व श्री.राजाराम महारांज्यांसारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले.आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला.त्यांच्या वाढीस महारांजांचे प्रयत्न कारणाभुत झाले.श्रीमहालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत,जुन्या राजवाडयानजीक आहे. भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्तीचे हे देवालय प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे या देवालयाचा आकार ता-यासारखा असून ते दोन मजली आहे देवालयात श्रीमहालक्ष्मीखेरिज दक्षिणेला महासरस्वती, उत्तरेला महाकाली वरच्या मजल्यावर गणतीच्या मुर्ती आहेत या देवालयाला असंख्य खांब असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे.
मुख्य देवालयालासमोर एक प्रवेश मंडप आहे याला गरुड मंडप असे म्हणतात.नवरात्रात येथे उस्तव साजरा केला जातो इतर वेळी र्कीतन,प्रवचन,भजन,ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील याचा उपभोग केला जातो महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेला मार्ग मंदिराच्या आतल्या बाजुसच असून अगदी वैशिष्टपुर्ण आहे.
मुख्य देवालयालाच्या सुरवातीस प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो. त्यांच्या दोन्ही बाजुला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्ह यांच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो.कलात्मक कोरीव काम आणि जय विजय द्वारपालांच्या मुर्ती मनमोहक आहेत.मुळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलेली जागा सन १७२२ पर्यंत श्रीमहालक्ष्मी मुर्ती मुस्लिम हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून न ठेवण्यात आली होती.मुख्य देवालयालाच्या बाहेरिल बाजुस चौसष्ट नृत्य करणा-या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले दिसते.श्री महालक्ष्मीच्या देवालयाच्या भोवती आवारामध्ये सर्व बाजुंना अनेक देवदेवतांच्चा मुर्ती आहेत. त्यामध्ये शेपशायी व नवगृह किंवा अष्टदिवाळ मंडप यांचा समावेश आहे.शेपशायीची मुर्ती तितकीशी आकर्षक नसली तरी त्या समोरिल मंडपातील नाजुक व सुंदर कोरीव काम आणि जैन तीथॅकर पाहण्यासारखे आहे. नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्लपकलेचा उत्कृष्ट नमुना या व्यतिरिक्त देवालयालाच्या आवारातील लहान लहान मंदिरापैकी मुख्य म्हणजे दतात्रय, हरिहरेश्नर, मुक्तेश्री, विठोबा, काशीविश्वेर, राम, राधाकृष्ण,शनी, तुळजाभवानी, महादेव इ.मंदिरे
श्रीमहालक्ष्मी देवालयालात येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या उत्तरेला काशी व मणिकार्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजुला दीपमाळांचा छोटा समुह असून दोन अधुनिक प्रकाराची पाण्याची कारंजी आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा वाजवलि जाते. महाराष्ट्रातील काही महत्तवाच्या व मोठ्या घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो.
दर पौष महिन्यामध्ये सायं सुर्यकिरणोत्सव साजरा केला जातो या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे सायंकाळी ठराविक वेळ सुर्यकिरण हे मंदिरात शिरून श्रीमहालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच नाहीसे होतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय व त्या समोरील गरूड मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर सुमारे १५० आच्छादित बांधकाम आहे. मंदिरासभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत.या तीन दिवसाखेरीज वर्षात केव्हाही देवीच्या मुखावर सुर्यकिरणे पडत नाहीत. 

मातृलिंग मंदिर :-

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री मातृलिंग मंदिरात सापडलेला शिलालेख हा फारसी लिपीतील असून आजवर त्यातील मुबारकखान इतकीच अक्षरे लागली आहेत. अनेक अभ्यासकांनी आपल्या महालक्ष्मी संदर्भातील आपल्या लिखाणात या शिलालेखाचा
उल्लेख केला आहे.या संंदर्भात कोल्हापूर चे जेष्ठ इतिहास संशोधक कै. अ.ब.करवीरकर यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता.
महालक्ष्मी मंदिरातील श्री मातृलिंग मंदिर हे एक अनोखे शिल्पवैभव आहे. महालक्ष्मी मंदिराच्या अंतराल मंडपाच्या बरोबर वर या मंदिराचा नंदी मंडप येतो. या नंदी मंडपाच्या उत्तरेकडील स्तंभावर हा लेख आहे.
महालक्ष्मी ची परीवार देवता असणाऱ्या महाकाली मंदिराच्या मंडपातून समोरच्या जीन्यावरून मातृलिंग मंदिरात जाता येते. वर जाण्या येण्याच्या दृष्टीने हा जीना चिंचोळा असल्यानेच केवळ शेजारती खेरीज इतर सर्व आरती वेळी. श्रावण सोमवार वैकुंठ चतुर्दशी महाशिवरात्री अशा दिवशी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते.
मातृलिंग म्हणजे काय?
श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मी ची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदूळाची रास सुपारी शिवलिंग यावर कोणतीही देवता आवाहीत करता येते. या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते.(उदा. सावित्रीश्वर गायत्रीश्वर देवहुतीश्वर). या प्रमाणे साक्षात जगदंबे च म्हणजे आईचं लिंग रुप ते मातृलिंग. यामुळे च शिवलिंगाला असलेल्या सोमसुत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही. (तीथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते)
मातृलिंग स्थापनेचे कारण
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तीला लिंगत्रयातीत म्हणले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. परंतु या सिद्ध स्थानाची उर्जा आकर्षित करते अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे तीन खोल्या (शेजघर भांडार घर स्नान घर ) व बाहेरून स्वतंत्रप्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे.

महालक्ष्मी मंदिराचा जुना फोटो

आठवड्याच्या शेवटी शनिवार्,रविवार व सुट्टीच्या दिवशी विशेष दर्शनासाठी लांबच लांब रांगा असल्याने सकाळी लवकर मंदिरात गेलेले चांगले.  महालक्ष्मी मंदिरापासून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक सुमारे २-. कि.मी. अंतरावर आहे. तेथून मंदिरापर्यंत आपणास ६० किंवा ७० रुपयात पोहोचता येते. 

मुख्य शहराच्या मध्यभागी मंदिर आहे. मात्र इथे पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने येथे कार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही लवकर येथे येत असाल तर तुम्हाला मंदिराजवळ पार्किंग मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला वाहन मंदिरापासून खूपच दूर उभे केले पाहिजे आणि तेथून थोडेसे चालणे आवश्यक आहे.


   मंदिराच्या प्रवेशद्वाराला ४ दरवाजे आहेत, प्रत्येक प्रवेशद्वाराचे वेगळे नाव आहे आणि मुख्यद्वार “महाद्वार” म्हणून ओळखले जाते. परिसरातील रस्ते एकमार्गी आहेत ( वन वे ) म्हणून आपण वाहन चालवत असाल आणि जर आपल्याला रस्त्यांविषयी निश्चित माहिती नसेल तर स्थानिक लोकांना विचारा . आपल्याला मदत करण्यात आणि मार्गदर्शन करण्यात स्थानिक लोकांना आनंदच होईल.

मंदिराच्या बाहेर आणि आत बरेच पूजा थाळी स्टॉल दिसतात.

बहुतेकदा मंदिरात अगदी सकाळीही लांब रांग लागलेली असते. ही रांग वेळ जसजशी  पुढे जाईल तशी अधिक लांब होत जते आणि संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते. सुरुवातीला सर्वांसाठी एकच रांग असते परंतु एकदा आपण मंदिरात प्रवेश केला तर तेथे स्त्री व पुरुष साठी स्वतंत्र रांग असते.

 

आपण रांगेत असतानाच आणि मंदिराच्या आत जात असताना फोटोमध्ये दाखविले आहे त्या प्रमाणे मुख्य मंदिराच्या भिंतीच्या वरच्या बाजूला खडकात कोरलेली छोटी गणेश मूर्ती तुम्हाला दिसेल. येथील स्थानिक लोक महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यापूर्वी  प्रथम या गणेश मूर्तीचे दर्शन घेतात. 

 

रांगेत उभारलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होउ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने कपड्यांच्या शेडद्वारे रांग उभा रहाण्याच्या जागेवर सावली केली आहे.

 रांगेत उभा राहून आपण अखेरीस महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर लीन होतो. महालक्ष्मीची मुर्ती खुप देखणी आणि शांत भाव दाखवणारी आहे. करवीर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती-पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या पश्चिमेस उघडा असलेला भाग आहे, जिथून प्रत्येक मार्च आणि सप्टेंबरच्या 21 तारखेच्या आसपास सूर्याचा प्रकाश मूर्तीच्या तोंडावर पडतो. या कार्यक्रमास “किरणोत्सव” असे म्हणतात. देवी महालक्ष्मी मूर्तीचे वजन साधारणत: 40 किलो आहे. महाराष्ट्रातील अनेक नवीन विवाहित जोडपे देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी विधीनुसार येथे येतात.
          कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.


जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला दगडांच्या आत खोदलेल्या विविध मूर्ती दिसतील ज्या तुम्हाला त्या काळाच्या स्थापत्यकलेची कल्पना देतील. 

 

मंदिरात छायाचित्रणास परवानगी नाही. दररोज देवी भिन्न रंगांची साडी परिधान करतात जी येथे येणाया भक्तांनी दिलेली असते.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्राआहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे.
       हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.
नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

 

तसेच, जर तुम्हाला रांगेत उभे रहायचे नसेल तर तेथे मुख दर्शन सुविधा देखील उपलब्ध आहे जिथून तुम्हाला थोड्या अंतरावरुन देवीची मूर्ती दिसते. तर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण हा पर्याय वापरू शकता. येथे सशुल्क रांगेची सुविधा उपलब्ध नाही.

 

  श्री महालक्ष्मी दर्शनाचा क्रम
1 काशी विश्वेश्वर घाटी दरवाजा शेजारी
2माधव
3धुंडीराज
4दंडपाणी
5 कालभैरव
6काशी कुंड
1-6 महालक्ष्मी मंदिराशेजारी उत्तरेला विश्वेशर मंदिरात
7 गुहा विश्वेश्वराच्या नंदी शेजारी
8 गंगा स्वामी समर्थ मंदिरात भोगावती कुंभी कासारी तुळशी सरस्वती या पंचगंगा मूर्ती
9 भवानी शंकर विश्वेश्वर मंदिरा मागे मंदिर (कार्तिक स्वामी )
10 मणिकर्णिका तीर्थ घाटी दरवाजा शेजारी महालक्ष्मी उद्यान लिंग माऊली लाॅजच्या तळघरात
11श्री गणेश देवी समोर
12 श्री महाकाली देवीच्या उजवीकडे
13श्री महासरस्वती देवीच्या डावी कडे
14 श्री महालक्ष्मी स्वयमेव क्षेत्रस्वामीनी
15 रंकभैरव (कोतवाल) महालक्ष्मी बॅकेजवळ स्वतंत्र मंदिर
16 महर्गलेश्वर इंदूमती हायस्कूल च्या आवारात शिवणकाम विभागा जवळ
17 अगस्त्य लोपामुद्रा घाटीदरवाजा समोर दिपमाळेखाली
18 एकमुखी दत्त (नारायण स्वामी स्थापित) गरूड मंडपाच्या दक्षिणेला दुकानांच्या उजवी कडे

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती
समस्त देवी भक्तांची आराध्या असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती ही किमान 1000 वर्षे जुनी असून स्थानिक बेसाल्ट पाषाणात घडवली असून ती शिवलिंगाकार चौथर्यावर उभी आहे . 2फूट 9 इंच उंचीची ही मूर्ती चतुर्भुज म्हणजे चार हाताची आहे.उजव्या खालच्या हातात म्हाळुंग (citrus in medica ) हे बीजफल जे कर्मवृंद किंवा ईच्छाशक्तीच प्रतिक; वरच्या हाताशी लांबसडक नाजूक बोटानी सावरून धरलेली क्रिया शक्तीची सूचक अशी गदा; डाव्या वरच्या हातात माग फीरवून धरलेली ढाल जी ज्ञानशक्ती रूप आहे.तर डाव्या खालच्या हातातल पानपात्र (वाटी) हे तिची तुरीया अवस्था दर्शवत. अंगावर भरपूर कोरलेले दागिने आणि घोट्या पर्यंत नेसलेल वस्त्र तीची संपन्नता दाखवतात.तर पुष्ट स्तन तिचा जगाबद्दलचा मातृभाव दाखवतात. कमरेला नाजूकपणा इतका की कटीच मापदंड असणारा सिंह लाजून मुकाट्यान पायाशी बसला( हे वर्णन संत दासगणू यानी पायाशी असलेल्या वामावर्ती म्हणजे डावीकडे मुख असलेल्या सिंहाच केलय) समचरण त्यात तोडे पैंजण . कपाळ रूंद चाफेकळी नाक ओठावर निरागस पण गूढ स्मित आकर्ण नेत्र त्यात वत्सलतेचा सागर. माथ्यावर कपाळपट्टी त्यावर समोर फणा धरून बसलेला साडेतीन वेटोळ्याचा नाग त्या काल रूपी नागाच्या फण्यामाग विश्वाच सृजन करणारे पुरूष प्रकृती सयोनी लिंग रूपात विराजमान आहे अशी ही आदिशक्ती ना विष्णूपत्नी ना शिवपत्नी तरी सर्व देवतांच्या भक्ताना उपास्य वाटणारी कोल्हापूरकरांची आई अंबाबाई तर मार्कंडेयांची सर्वस्याद्या श्री महालक्ष्मी!


 मंदिर आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूपच स्वच्छ आहे आणि सुरक्षा देखील चांगली आहे. मंदिरातील प्राचीन कोरीवकाम पहाण्यासारखे आहे, खांब आणि भिंतींवरील दगडी कोरीवकाम बारकाईने पहावे.

 

मंदिराच्या आवारात बऱ्याच दीपमाळा आहेत. विशेष काळात जसे नवरात्र त्यांच्यावर दिवे प्रज्वलित करुन त्या पाजळल्या जातात.त्या काळात रात्रीच्या वेळी ह्या दीपमाळांचे सौदंर्य पहाण्यासारखे असते.  

 

नवरात्री अश्विन प्रतिपदाच्या काळात दररोज महालक्ष्मी देवीची पालखी  काढली जाते जी दसऱ्यापर्यंत चालू असते. ही पालखी सोन्यापासून बनविली गेली आहे आणि वापरात नसताना ती बाजूच्या आरशाच्या भिंतीमध्ये ठेवली आहे. मंदिरात आपण ती पाहू शकतो.

 

 

मंदिराच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने दुकान आहेत जिथे खास कोल्हापुरचे वैशिष्ट्य असलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. येथे विकल्या जाणा या काही गोष्टी अतिशय खास आहेत आणि त्या तुम्हाला महाराष्ट्रात कोठेही मिळणार नाहीत. 

 उपयुक्त सूचना -
    कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची वेळः  सकाळी 6 वाजता उघडते आणि रात्री १० वाजता बंद होते (मंदिर दरवाजे सकाळी ४ वाजता उघडले तरी त्यानंतर पूजा आणि आरती होते.)
    कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर प्रवेश शुल्क - विनामूल्य
    पार्किंग  - कोणतेही पेड कार पार्किंग नाही. रस्त्यावर पार्क करावे लागेल. कार पार्किंग स्पेस क्रंच. त्याऐवजी स्थानिक सार्वजनिक वाहतूक वापरा.
    मंदिरात छायाचित्रण करण्यास मनाई आहे परंतु आपण मंदिर परिसरात फोटो घेऊ शकता. मंदिरात मोबाइल नेण्याची परवानगी आहे.
    शनिवार व रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी येथे खूप गर्दी असते जेणेकरून आपल्याला कधीकधी 3 तासांपेक्षा जास्त रांगेत थांबावे लागेल. म्हणून तयार रहा आणि शक्य तितक्या लवकर या किंवा शक्य असल्यास गर्दी नसलेल्या दिवसांवर येण्यास प्राधान्य द्या.
    मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या भवानी मंडप पॅलेसला भेट नक्की द्या.
    येथे स्थानिक फेरीवाले आणि दुकानदारांनकडून खास कोल्हापुरचे वैशिष्ट्य असलेल्या गोष्टी खरेदी करण्यास विसरू नका. 

भवानी मंडप

 कोल्हापूर शहराची शान म्हणजे, भवानी मंडप. हया सर्वात जुन्या व सर्वात जास्त विशाल इमारतीस ऐतिहासिक महत्त्व आहे.या जागेच्या मध्यभागी कुलस्वामिनी तुळजा भवानीचे मंदिर आहे आणि म्हणून त्या जागेचे नाव भवानी मंडप म्हणून ओळखले जाते. 

Bhavani Mandap 

DSCN9103-01-01.jpeg

कोल्हापूर स्वयंशासित झाल्यानंतर ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम चौदा चौकांचे, भक्कम आणि मजबूत आहे.

कोल्हापूर गादीची स्थापना ताराबाईंनी १७०७ मध्ये केली. कोल्हापुरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकी एक म्हणजे भवानी मंडप. भवानी मंडप ही कोल्हापूरची प्रतिष्ठा आहे. याची अद्भुत आणि जुनी रचना इतिहासाचे प्रतीक आहे.  १८१३ साली मुस्लीम सरदार सदाखान याने या महालावर आक्रमण केले, व त्याचा काही भाग जाळला.

 महालाची डागडुजी केल्यानंतर सात चौक बचावले. महालाच्या मध्यवर्ती भागात, कुलस्वामीनी तुळजा भवानीचे मंदिर आहे. शंभू उर्फ आबासाहेब महाराजांचा वध, या मंडपामधे झाला, अशी ग्वाही इतिहास देतो. 

SAVE_२०२०१००७_१६१७३२-01.jpeg

मंडपाच्या जवळच शाहू महाराजांच्या स्मरणार्थ, छत्रपती शाहूंचा हुबेहूब पुतळा आहे.

DSCN9098 - Copy.JPG

 शिकारीची त्यांची आवड चिरकाल लक्षात राहावी यासाठी, शिकार केलेले, पेंढा भरलेले वाघ व रेडा तिथे ठेवले आहेत. रंगीत माश्यांनी सजविलेली उजव्या बाजूची बखर, शिवाचे छोटेखानी मंदिर, – या साऱ्यामुळे इतिहास जणू इथे जिवंत होतो. शाहू महाराजांची कन्या, श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह सोहळयाच्या काळात, इ. सन. १९१८ मधे या देवळासमोरच भव्य मंडप बांधण्यात आला. नंतर १९२६ ते ३० च्या दरम्यान, छत्रपती राजाराम महाराजांनी सदर मंडपाला नवे रूप प्राप्त करून दिले. मूळच्या लाकडी कमानी बाजूला काढून, हया मंडपाचे एका भव्य आणि मोकळया सभागृहात रूपांतर केले. मंडपाच्या आवाराच्या विस्तृत रक्षक भिंतींच्या मोठमोठया चौकांमधे, मोतीबाग व्यायामशाळा, राजवाडा पोलिस स्टेशन, तसेच महाराष्ट्र बटालियन यांचे कामकाज सुरळीतपणे चालते.

  कसे जावे :

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून भवानी मंडप फक्त २.३ किमी आहे. ऑटो रिक्षा सहज मिळते व तसेच सिटी बस सुद्धा आहेत.

रंकाळा तलाव

कोल्हापुरातले पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचे महत्त्व आहे. महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव कोल्हापूर शहरात दुसर्‍या क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे.यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते. रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आणि महालक्ष्मी मंदिरापासून 2 किमी अंतरावर आहे. मंदिरातून तुम्ही ऑटो-रिक्षाने जाउ शकता, यासाठी तुम्हाला जवळपास 30-40 रुपये खर्च येईल. जर तुम्ही १० ते १५ मिनिटे चालू शकत असाल तर पायी जाणे हा देखील उत्तम मार्ग आहे.
Rankala talaw
   या रमणीय ठिकाणी संध्याकाळी कोल्हापुरातील बहुसंख्य नागरिक व कोल्हापुरात आलेले पर्यटक मोठय़ा संख्येने फिरावयास गर्दी करतात. रंकाळा ही कोल्हापुरच्या प्राचीन सहा वसाहतींपैकी एक स्वतंत्र वसाहत होती. रंकाळा तलावाचा घेर अडीच मैलांचा असून त्याची मध्यभागी खोली 35फूट आहे. आजच्या रंकाळा तलावाच्या जागी पूर्वी एक भली मोठी दगडाची खाण होती. या खाणीतूनच महालक्ष्मी मंदिरासाठी व राजा गंडरादित्य याने जी 360 जैन मंदिरे बांधली त्यासाठी दगडाचा पुरवठा करण्यात आला होता. आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या भूकंपामुळे या खाणीचा विस्तार होवून ती पाण्याने भरून गेली. पुढे याचेच रूपांतर तलावात झाले. कालांतराने पाणी पुरवठय़ाच्या निमित्ताने यामध्ये दक्षिणेकडील दोन ओढय़ांचे पाणी सोडण्यात आले. 1883 मध्ये गावाकडच्या बाजूला उत्तम दगडी बांध बांधल्यामुळे तलावातील पाणी साठा वाढून तलावाला शोभा आली. तलावाला सुरेख घाट बांधून, बंधार्‍यावर फिरण्यासाठी सुंदर रस्ता तयार केल्याने व टॉवर उभा केल्याने तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. या तळयाच्या उत्तरेस शालीनी पॅलेस तर तळयाच्या नैऋत्य दिशेस ‘पद्माराजे उद्यान’ आहे. एक चित्रसदृश विलोभनीयता हया तळयास लाभली असून, तळयाच्या काठाने पाय मोकळे करण्याचा अनुभव आनंददायी आहे. थेट जलसान्निध्याचा अनुभव हा राजघाट व मराठाघाट येथून घेता येतो. राजघाटावर एक मनोरा आहे. हया मनो-यासमोरच शालीनी महाल व अंबाई तरण तलाव आहे. सिनेमा चित्रीकरणासाठी हे स्थान प्रसिध्द आहे. पावसाळयात, तळयातील संध्यामठ हा अधिकांश काळ पाण्यात असतो.
Kolhapur
     काही वर्षापुर्वी  कोल्हापूर हे शहर चित्रिकरणातील प्रसिध्द होते. पुष्कळ मराठी, हिंदी चित्रपट कोल्हापूरातील स्टुडीओमध्ये चित्रीत झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरण स्टुडीओमध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. व्ही. शांताराम ह्यांचा हा स्वत:चा स्टुडीओ(व्ही म्हणजे वणकुंद्रे) होता.
रंकाळ्य़ाचा पदपथ, शालिनी पॅलेसची देखणी इमारत, रंकाळ्य़ाच्या बाजूंनी असलेली विविध उद्याने, खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या असंख्य गाडय़ा, रंकाळ्य़ातील बोटींग, लहान मुलांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन, झुले, घसरगुंडय़ा, फेरफटक्यासाठी देखणे घोडे इ. विविध आकर्षणे व सोबत उत्साहवर्धक वातावरण, नयनरम्य निसर्ग यामुळे सायंकाळच्या फेरफटक्यासाठी कोल्हापुरात रंकाळा अव्वल स्थानावर आहे.


बागेत मुलांसाठी खेळण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. जॉगिंग, योगासाठी किंवा थंड हवामानात आराम करण्यासाठी योग्य जागा. अलीकडेच येथे ओपन जिम देखील विकसित केले गेले आहे.
कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरिक मोठया संख्येने फिरावयास जातात. रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरची "मरीन ड्राईव्ह" असा केला जातो. रंकाळा तलाव शहराच्या नैऋत्य टोकाला आहे. त्याचे क्षेत्र सुमारे २०२.३४ हेक्टर असून खोली जवळजवळ १०.६७ मीटर आहे. हल्ली तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जाते. तलावातील पाणी सोडण्यासाठी एक दरवाजा बांधला आहे. तळयाकाठी शालिनी राजवाडा असून राजवाडयाच्या भव्यतेमुळे रंकाळयाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. 
पूर्व बाजूला आणि थोडयाफार अंशी खुद्द तळयामध्ये संध्यामठ आहे. हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांधणी हेमांडपंथी पद्धतीने केली आहे. मठाची वास्तू हल्ली सुस्थितीत नाही. पावसाळयामध्ये तलाव जेव्हा भरून वहातो तेव्हा संध्यामठ पूर्णपणे पाण्यात बुडतो. 

 ऑक्टोबर ते जानेवारी या काळात पक्षी निरीक्षणासाठी रंकाळा तलाव देखील एक उत्तम ठिकाण आहे. येथून विविध प्रकारचे पक्षी दिसू शकतात आणि पक्षी प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. पक्षी प्रेमींना बर्ड वॉचिंगसाठी उत्कृष्ट म्हणून पहाण्यासाठी गर्दी कमी असताना पहाटे लवकर यावे इथे आपल्याला विविध प्रकारचे पक्षी दिसतील.
रंकाळयाजवळ पद्‌माराजे उद्यान आहे. पूर्वीच्या काळी कोल्हापूरच्या राजांना तलावामध्ये विहार करणे सुलभ व्हावे म्हणून छोटया छोटया नावांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या तलावामध्ये मासे पकडण्याचा हक्क फक्त राजांचा होता. आता तलावात विहार करण्यासाठी महानगरपालिकेने सोय केली आहे. तळ्याला रंकाळा हे नाव रंक भैरव या देवाच्या नावावरून देण्यात आलेले आहे. रंकभैरव या शंकराचा अवतार समजल्या गेलेल्या व महालक्ष्मीच्या मर्जीतल्या देवाचे नाव या तलावाला देण्यात आलेले आहे. रंकाळ्य़ाच्या पूर्वेस पाण्यात असलेली संध्यामठ ही हेमांडपंथी बांधणीची प्राचीन वास्तू चित्रकारांचे आकर्षण आहे. रंकाळ्य़ाचे कोल्हापुरकरांशी जिव्हाळ्य़ाचे नाते असल्याने महानगरपालिका गेली कित्येक वर्षे पर्यटनाला प्रोत्साहीत करण्यासाठी रंकाळा महोत्सवाचे आयोजन करीत आहे. एकूणच कोल्हापुरच्या पर्यटनात रंकाळ्य़ाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हल्ली या तळयाला उत्तरेकडे असलेल्या दोन ओढ्यातून पाण्याचा पुरवठा होतो. १८८३ पासून रंकाळा तलावाच्या पाणीपुरवठयात बरीच सुधारणा झाली. शहराच्या दिशेने जो जुना बंधारा होता त्यापेक्षाही अधिक मजबूत बंधरा नव्याने बांधण्यात आला. हा बंधारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. परंतु त्याला लागून असलेल्या रस्त्यावर वारंवार भर टाकली गेल्यामुळे बंधाऱ्याची उंची तुलनेने कमी झाल्यासारखी वाटते. रंकाळा ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतीपैंकी एक असून तेथे वर नमूद केलेला संध्यामठ तसेच एक नंदीची मोठी मूर्ती असलेले देवालय आहे. ब्रह्मपूरीशी संबंध नसलेले रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते. या भागाला पूर्वी नवा बुधवार असे नाव होते. शहराची वाढ होत गेली तेव्हा रंकाळा भागही कोल्हापूरात समाविष्ट झाला. 

 न्यू पॅलेस ( नवा राजवाडा )

पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिध्द आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांमुळे कोल्हापूरने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरला पन्हाळा गड, रंकाळा तलाव, राधानगरी धरण,खासबाग मैदान, शालिनी पॅलेस या ठिकाणांनी वैभवसंपन्न बनविले आहे. या सर्व ऐतिहासिक ठिकाणांसोबत कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे तो शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसने!कोल्हापूर सेंट्रल एसटी स्टँडपासून ३ किमी अंतरावर न्यू पॅलेस संग्रहालय आहे. आपण एकतर रिक्षा किंवा सिटी बसने येथे जाऊ शकता. या ठिकाणी प्रामुख्याने तीन गोष्टी प्रेक्षणीय आहेत, पहिली पॅलेस, दुसरी पॅलेसमधील संग्रहालय आणि शेवटी पॅलेसच्या बाहेर गार्डन आणि प्राणीसंग्रहालय.

कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालखंडामध्ये हा नवा राजवाडा उभारणीस १८७७ साली सुरवात झाली व न्यू पॅलेस इ.स. १८८४ मध्ये बांधून पूर्ण झाले. अहिल्याबाई राणीसाहेबांनी ही इमारत बांधून घेतली. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. राजवाडा परिसरात तलाव, तलावाकाठी राखीव जंगल व जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत. न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे. मेजर मँटला हिंदू शैलीची माहिती होती. तरीही हिंदू धर्मांतील शूभ- अशुभ या सर्व गोष्टींना तिलांजली देत त्याने न्यू पॅलेसची उभारणी केली. न्यू पॅलेसचे प्रवेशव्दार दक्षिणाभिमुख ठेवले. न्यू पॅलेसची रचना आयताकृती असून प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला समप्रमाणात इमारत उभी केली. इमारतीच्या मध्यभागी १३५ फूट उंचीचा क्लॉक टॉवर उभारण्यात आला. मनो-यावरील घडयाळ १८८७ साली बसविले आहे. इतर दोन मनोरे निराळया अंतरावर आहेत. प्रत्येक काचेवर शिवरायांच्या जीवनातील प्रसंग चितारले आहेत. पॅलेसच्या चारही कोपऱ्याला, पुढील-मागील बाजूस अष्टकोनी दालने आहेत. मध्यभागी दरबार असून बाजूस बिलियर्ड्सचे दालन आहे. इमारतीच्या मागील बाजूस मध्यवर्ती चौक आहे. चौकाच्या मधोमध कारंजा आहे. भाऊसिंगजी मार्गापासून आणखी उत्तरेकडे, १.५ किमी. अंतरावर नवा राजवाडा, किंवा हा न्यू पॅलेस आहे. बॅझाल्ट आणि सँड स्टोन हया विभिन्न प्रकृतीच्या खडकांचा वापर करून, रचनेतील वैधर्म्य तसेच नाविन्य साधून, बांधलेली ही अभिनव इमारत ज्या वर्षी इस्पीतळ बांधून पूर्ण झाले, त्याच वर्षी बांधली. दक्षिणेकडील प्रवेशद्वार किंवा मुखांग हे दुमजली आहे. दुहेरी कक्षाची धाटणी असलेल्या दरवाजाच्या वरच्या बाजूला मंदिर शैलीचे कॉलम्स व ब्रॅकेट्स तर खालच्या बाजूला, नव्य-मुघल शैलीची उतरती (लोब्ड) कमान आहे. 

मधूनच उठाव देणाऱ्या, तिपानी आकृतीच्या कमानी, त्यावर बाकदार कार्निस, व छोटे घुमट यांनी हया इमारतीचे सौंदर्य खुलविले आहे. इमारतीच्या कोपऱ्यावरील अष्टकोनी मनोऱ्यांची शोभा याच वैशिष्टयांचा वापर केल्यामुळे वाढते. ठळक, बाकदार कार्निस लावून, मधला द्वारमंडप सजविला आहे. राजवाडय़ाच्या गच्चीवर थोडय़ा अंतरावर अतिशय सुंदर मनोरे व घुमट आहेत. राजवाडय़ाच्या शिल्पामध्ये निरनिराळ्या कालखंडातील हिंदू शिल्पशैलीचे उत्कृष्ठ मिश्रण आहे

   पॅलेस  बांधण्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. ही इमारत पूर्ण झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांचा दत्तक विधी झाला.

३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आला. यामध्ये वेगवेगळी प्रेक्षणीय दालने आहेत. या प्रत्येक दालनामध्ये प्राचिन काळातील महाराजांच्या कालखंडात वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. 
    म्युझिअमच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर प्रथमत: दृष्टीस पडते ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे घोडयावर आरूढ असलेले भव्य रंगचित्र, यानंतर आपण म्युझिअममधील वेगवेगळया दालनात प्रवेश करतो. या म्युझिअममध्ये हत्तीचे दालन, फर्निचरचे दालन,राजश्री छत्रपती शाहू दालन,शस्त्रास्त्र दालन, दरबार हॉल, प्राणी संग्रहालय अशी विविध दालने आहेत.
   हत्तीच्या दालनामध्ये आपणस प्रथम दर्शनी दिसतो तो विविध आभूषणाने सजलेला बैठक स्वरूपातील हत्ती. हत्तीला सजविण्यासाठी असणाऱ्या विविध आभूषणामध्ये हत्तीवरील भरजरी झूल (घाशा), जरी पटका तसेच चांदीची लहान तोफ, प्राचीन काळातील दुमिर्ळ नाणी आपणास या दालनामध्ये पहावयास मिळतात. 
   त्यानंतर येते ते फर्निचर दालन, या दालनात आपणास शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये वापरत असलेले विविध साहित्य पाहता येते.विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत आकर्षक पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजाचे फोटो या दालनात आपणास पाहावयास मिळतात.यानंतर आपण प्रवेश करतो राजश्री शाहू हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराजांची संक्षिप्त ओळख करून देणारे हे दालन खऱ्या अर्थाने आपणास छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना व जीवनपट छायाचित्राच्या स्वरूपात याठिकाणी पहावयास मिळतात. 
    महाराजांच्या बालपणीची छायाचित्रे, छत्रपती शाहू महाराज यांचे अधिकार ग्रहण केलेल्या प्रसंगाचे छायाचित्र, ऑफिसमधील तसेच दिल्ली दरबारात वापरत असलेली खुर्ची , पुर्वीच्या काळातील पितळी खलबत्ता, गिडी जग, तोटी असलेला पितळी तांब्या ठेवण्यात आलेला आहे. शाहू महाराज (पहिले) यांच्या वापरातील कपडे, महाराणी व्हिक्टोरिया यांनी छत्रपती शिवाजी (४ थे) यांना दिलेला करवीर 'राजचिन्हाचा ध्वज' ठेवण्यात आलेला आहे.शाहू कुस्ती मैदान येथे भरवण्यात आलेले कुस्ती मैदान पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचे छायाचित्र तसेच शिकारीचे विविध प्रकार पहावयास मिळतात. 

जसजसे आपण पुढे पाहत जातो तसे इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा मिळतो. याच दालनामध्ये इतिहास प्रसिध्द घराण्याच्या वंशावळींची ओळख करुन देणारा माहिती फलक पहावयास मिळतो. त्यामध्ये करवीर छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष, पवार छत्रपती घराण्याची वंशावळ, भोसले घराणे शाखेची वंशावळ, कागलकर घाटगे सर्जेराव घराण्यांची वंशावळ अधोरेखीत करण्यात आली आहे.

या दालनातील आणखी एक वैशिष्टये म्हणजे शिकारलेल्या निरनिराळ्या प्राण्यांच्या अवशेषापासून बनविलेल्या नाविन्यपूर्ण व विविध उपयोगी वस्तू पाहताना आपण भारावून जातो. सांबराचे शिंग व गेंड्याच्या पायापासून तयार केलेले टी पॉय,गव्याच्या पायापासून तयार करण्यात आलेले पेटी स्टँड, वाघाच्या शेपटीतील मणक्यापासून बनविलेली छडी, वाघाच्या व गव्याच्या पायापासून बनविलेला ऍ़श ट्रे, डुकराच्या दातापासून तयार केलेली फुलदाणी, शहामृगाच्या पायापासून बनविलेले मेणबत्तीचे स्टँड, वाघाच्या कवटीपासून तयार केलेली सिगारेट केस व ऍ़श ट्रे हे सर्व पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. 

शस्त्रास्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे या ठिकाणी पहावयास मिळतात. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी करण्यासाठी तयार करुन घेतलेली विविध प्रकारची हत्त्यारे, इ. स. १८७० मध्ये श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज (पहिले) इंग्लंडला गेले असता त्यांनी खास ऑर्डर देऊन मागितलेली सोन्याचा मुलामा चढवलेली बंदुक, विविध नमुन्यातील बंदुका तसेच दहा फुटी आकर्षक पुनी गन या ठिकाणी सर्वाचे लक्ष वेधून घेते. जुन्या काळातील ढंका, नौबत, नगारे, चौघडे तसेच डुकराची शिकार करणेसाठी वापरण्यात येणाऱ्या भाल्याची ओळख या शस्त्रास्त्र दालनात होते. 

यानंतर आपण प्रवेश करतो ते न्यू पॅलेसचा मुख्य भाग असलेला दरबार हॉल. अतिशय प्रशस्त व कलात्मकतेचा एक उत्कृष्ट नमुना आपणास पहावयास मिळतो. दरबार हॉलचे हे भव्य विलोभणीय दृश्य पाहताना पूर्वीच्या काळातील राजे महाराजांचे वैभव आवाक् करुन टाकते. दरबार हॉलमध्ये महाराजांसाठी असलेले कलाकुसरीने भरगच्च सजलेले 'राजसिंहासन' सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

तसेच या हॉलमध्ये पुूर्वी जसा दरबार भरायचा तशीच मांडणी अजून ठेवलेली आहे. हॉलमधील छताकडे नजर टाकली असता त्याकाळी कलाकारांनी केलेले नक्षीदार कोरीव काम पाहीले की डोळयाचे पारणे फिटते. हॉलच्या दोन्ही बाजूस खिडकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने बेल्जीअम ग्लासवर अतिशय दुर्मिळ आकर्षक रंगचित्राव्दारे चित्तारलेली आहेत. 
आपण पुढे जातो ते भारतासह विविध देशातील हिंस्त्र प्राणी, पशू आणि पक्षी यांची शिकार केलेले प्राणी आपणास पाहावयास मिळतात.महाराजा शहाजी छत्रपती (दुसरे) यांनी मारलेला आफ्रिकन गेंडा पाहावयास मिळतो, हिमालयातील खोकड, बर्फाळ प्रदेशातील अस्वल, हिमालयातील काळे अस्वल लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. 

वेगाने धावणारे चित्त्तळ ( रायबाग), पाहताना त्याच्या नजरेतील धार लक्षात येते हॉलच्या मध्यभागी सर्वाचे लक्ष वेधून घेतो तो वाघांचा कळप, सांबर, चौसिंगा, दुर्मिळ असे कस्तुरी मांजर व खवल्या मांजर, तसेच बुलबुल, बदक,लाव्हऱ्या, कोकीळ, मलबारी खार, हरिचल, ब्लड फेजंन्ट असे विविध प्रकारचे पशू , पक्षी व प्राणी पाहून त्याकाळी महाराजांनी केलेल्या शिकारी डोळयासमोर येऊन उभे राहतात.

आपण म्युझिअमच्या बाहेर येतो बाहेरील सर्व भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. म्युझिअमच्या समोर हिरवेगार लॉन आहे. विविध प्रकारच्या वृक्षांमुळे सर्व परिसर निर्सगरम्य वाटतो. बाहेरील आवारामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज तसेच इतर महाराजाचे पुतळे पहावयास मिळतात. 
राजवाड्याच्या आवारात ही युद्धात वापरली जाणारी तोफ बागेत ठेवलेली दिसते.हि तोफ अजूनही चांगल्या स्थितीत आहे.
 

पॅलेस बागेत तयार केलेल्या विविध किल्ल्याचे सुंदर मॉडेल तयार केलेली आहेत.
प्राणीसंग्रहालय आणि उद्यान :-
पुढील बाजूस प्राणी संग्रहालय व विस्तृत असे जलाशय आहे.या जलाशयामध्ये विविध प्रकारचे प्राणी तसेच दुर्मिळ पक्षी आपणास पहावयास मिळतात. 

या प्राणी संग्रहालयातील खास वैशिष्टय म्हणजे मध्य भारत येथून प्रत्येक वर्षी साधारणत: जानेवारी महिन्यामध्ये या जलाशयामध्ये स्थलांतरीत होणारा पक्षी म्हणजे चित्रबलाक. हा दुर्मिळ पक्षी इतर कोणत्याही ठिकाणी आपणास पाहावयास मिळत नाही. 
तसेच जलाशयाच्या मध्यभागी असणाऱ्या झाडावर काळया रंगाचे दुमिर्ळ असा कांडेसर पक्षी झाडाच्या फांदीवर बसलेला आपणास पहावयास मिळतो. जलाशयाच्या कडेला आपण अगदी बारकाईने पाहिले असता आपणास हॉर्न बील डक्स व कासव ही आपल्या मनाला भुरळ घालतात.
• स्थानः भवानी मंडप-कसाबा बावडा रोड, कोल्हापूर
• वेळः सकाळी ९  ते दुपारी १  आणि दुपारी २:३०  ते संध्याकाळी ६  (सोमवारी बंद)
• प्रवेश शुल्क: रु. प्रौढांसाठी 35 आणि रु. 12 मुलांसाठी
• पार्किंग: उपलब्ध आणि विनामूल्य.
 उपयुक्त सूचना -
• संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही परंतु आपण बाहेरुन पॅलेसचे फोटो घेऊ शकता.
• राजवाड्यात प्रवेश करत असताना आपला फोन बंद करणे चांगले. जर त्यांना आपला फोन वापरताना सापडला तर आपल्याला 500 रुपये  दंड भरावा लागेल
• संपूर्ण परिसराला भेट देण्यासाठी एक तास किंवा जास्त वेळ लागतो.
• संग्रहालयात पादत्राणे घालण्याची परवानगी नाही आणि तेथे पादत्राणे स्टॅन्ड ची सुविधा  नाहीत म्हणून आपल्याला आपले शूज बाहेरच काढावे लागतील.

टाऊन हॉल

Town Hall 

     कोल्हापुर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विस्तृत परिसरामध्ये दिमाखाने उभी असलेली ही खास इमारत आहे. ही इमारत १८७२ ते १८७६ च्या दरम्यान बांधण्यात आली. चार्लस् मॅन्ट याने १८७२-७६ या काळात टाऊन हॉल या नावाने ही सुंदरशी ‘निओ गथिक’ रचना उभी केली. कोल्हापूरातील त्याची ही पहिली वहिली निर्मिती असून, ही एकच इमारत अस्सल ‘निओ गथिक’ शैलीतील आहे. संग्रहालयाचा द्वारमंडप दोन्ही बाजूंच्या मनोऱ्यांच्या मध्ये विस्तारला असून, उंच सुळक्यांप्रमाणे पिरॅमिड आकाराचे धातूचे छप्पर त्याला आहे. दोन युरोपियन तोफा इथे ठेवल्या आहेत. ‘१६०९’ असे साल कोरलेल्या तोफेवर रोमन रणदेवता मार्सची उठावदार प्रतिकृती दिसते. टाऊन हॉलच्या विशाल प्रवेशद्वाराला साजेसे भव्य कॉरिन्थियन शैलीचे स्तंभ असून, स्तंभांच्या कमानींवर दैत्यांचे मुखवटे व  मर्कट कोरलेले दिसतात.
           टाऊन हॉलच्या आवारात शासनाची कार्यालये, न्यायालय, शासकीय रूग्णालय, निम-शासकीय कार्यालये, दूरध्वनी कार्यालय, ‘पुढारी’ दैनिकाचे कार्यालय इ. असल्यामुळे, हा परिसर कायम गर्दीचा गजबजलेला असतो. टाऊन हॉलच्या बागेमध्ये महादेवाचे मंदिर, मोठे कारंजे, तलाव, झाडे, वेली व पुष्कळशी फुलझाडे आहेत.
          इथे ऐतिहासिक वस्तूंचे एक संग्रहालय असून, हा भाग महाराष्ट्र शासनाचा आहे. इमारतीच्या मध्यभागी एक गॅलरी असलेले सभागृह असून दोन्ही बाजूस खोल्या आहेत. येथे 500 माणसे एकावेळेला बसू शकतील असे प्रशस्त सभागृह असून सभागृहाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन खोल्या, प्रशस्त व्हरांडय़ाने जोडलेल्या आहेत. समोर व्हरांडा आहे. या इमारतीचा उपयोग संस्थानकाळात कार्यालयासाठी व इतर कामासाठी केला जात असे. काही वर्षाच्या दिवाण ऑफिस व त्यानंतर टेलिफोन एक्स्चेंज या इमारतीत होते. सध्या या इमारतीचा उपयोग पुरातत्व विभाग, महाराष्ट्न् शासन यांच्या कोल्हापूर वस्तु-संग्रहालय या करिता केला जातो. या इमारतीभोवती एक सुदंर बाग आहे. या बागेत. दक्षिणेला काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीकरिता कांच महाल बांधलेला आहे. इमारतीच्या समोरच छ. शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारलेला आहे. संस्थानकाळात या बागेकरिता दरबारकडून वर्षाला चार हजार रुपये मिळत असत. टाऊन हॉलमधील वस्तुसंग्रहालय उद्घाटन दिनांक ३० जानेवारी १९४६ रोजी झाले. ब्रह्मपूरीजवळ उत्खननामधे सापडलेल्या सातवाहनकालीन वस्तू, संग्रहालयामधे आहेत. गजारूढ सरदार, पोसायडन हया ग्रीक देवतेची छोटी प्रतिमा, मेडॅलियन्स सह हेलेनिस्टिकच्या प्रतिकृती त्यात आहेत. महालक्ष्मी मंदिरातून आणलेल्या गायक वादकांच्या आकर्षक स्त्री-शिल्पाकृती येथे आहेत. पन्हाळा येथून आणलेले चामरधारी स्त्री मदतनीस वा परिचारिकेचे शिल्प केवळ अप्रतिम आणि सर्वोत्कृष्ट आहे. महालक्ष्मी मंदिरात बसविण्याकरिता १७३९ मधे, वसईवरून आणलेली तांब्याची घंटा या संग्रहालयामधे पाहायला मिळते. संग्रहालयाच्या एका बाजूला उंचावर बांधलेल्या सज्जामधे सर्व प्रकारची शस्त्र-अस्त्रे ठेवली आहेत.  हे संग्रहालय शुक्रवार पेठेतील जैन स्वामींच्या मठात मांडण्यात आले होते. सध्या या वस्तुसंग्रहालयात एकूण सात विभाग आहेत. त्यात शस्त्रास्त्रे, संकीर्ण कलाकृती, उत्खनन वस्तू, नाणी, शिल्पाकृती, शिलालेख व ताम्रपट, चित्रकला कृती यांचा समावेश होतो. चित्रकलाकृती विभागात आबालाल रहमान, बाबुराव पेंटर आदी कोल्हापुरच्या आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती येथे आहेत.या सात दालनाखेरीज आणखी एक दालन प्रदर्शन दालन म्हणून राखून ठेवण्यात आले आहे. या दालनाचा उपयोग वस्तूसंग्रहालयामार्फत वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष प्रदर्शनासाठी केला जातो. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींची वैयक्तिक प्रदर्शने भरविण्यासाठी या दालनाचा उपयोग केला जातो. संग्रहालयाच्या समोरच असलेले छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय हे मँन्ट याने, १८८१-८४ या कालावधीमधे बांधले.
   संग्रहालयाची वेळ १०.३० ते ५.३० असून प्रवेश शुल्क आहे. संग्रहालय रविवारी बंद असते.

कोल्हापुरचे ऐतिहासिक चौक

कोल्हापूर शहरात अनेक चौक आहेत. पण त्यापैकी काही चौक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे असून आजही कोल्हापुरच्या दैनंदिन जीवनात ते आपले स्थान टिकवून आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो बिंदू चौक. पूर्वी कोल्हापूर शहराचे संरक्षण करण्यासाठी शहराभोवती रूंद असा दगडी कोट होता. कोटाच्या भिंतीला समान अंतरावर 45 बुरूज व बाहेरच्या बाजूस खोल खंदक होता. बुरूजास ठिकठिकाणी प्रवेशद्वारे होती. यापैकी रविवार पेइ बुरूजाच्या प्रवेशद्वाराजवळचा चौक मिरची बाजार म्हणून प्रसिद्ध होता. 

या चौकात ब्रिटिशांविरूद्धच्या स्वातंर्त्यासाठीच्या लढय़ामध्ये भारत छोडो चळवळ जोरात असताना 15 ऑगस्ट, 1942 मध्ये एका सभेचे आयोजन झाले होते. ब्रिटिशांनी ही सभा उधळून लावण्यासाठी करवलेल्या लाठीहल्ल्यात सभेसाठी आलेला बिंदू नारायण कुलकर्णी हा युवक हुतात्मा झाला. त्याच्या स्मरणार्थ मिरची बाजार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या चौकाचे बिंदू चौक असे नामकरण उत्स्फूर्तपणे झाले.

   कोल्हापूरचे एकेकाळी गावचे टोक म्हणून ओळखला जाणारा भाग आता विस्ताराने शहरात मध्यभागी आला आहे. त्याकाळी शहराच्या टोकाला पिंपळाचे झाड आणि त्याखाली मारुतीचे मंदिर ही वेशीची हद्द होती. कोल्हापूरचा बिंदू चौक ही मूळची रविवार वेस. याठिकाणी दगडी तटबंदी आणि त्या पुढे गाव नव्हते. याठिकाणी दोन मारुतीची मंदिरे होती. त्यातील एक मंदिर आणि पिंपळाचा पार अजूनही बिंदू चौकात आहे. दुसरा मारुती कमानीलगत होता. त्या मारुतीचे मंदिर जेलच्या आतील भागात आहे.

     सुमारे १२ हजार खर्च करून १८४७-४८ मध्ये तुरुंग बांधण्यात आला. नंतर १८७३ मध्ये तुरुंगाच्या उत्तर बाजूचे नवीन बांधकाम करण्यात आले. या मंदिरासमोरच जुने फाशी गेट आहे. संस्थानकाळ, स्वातंत्र्य चळवळीपासून अनेक लढ्यांचा साक्षीदार असलेले हे कारागृह कोल्हापूरचे मुख्य कारागृह होते. आता ‘बिंदू चौक’ असे नाव असले तरीही पूर्वी बाराईमाम म्हणून  ओळख होती. तत्पूर्वी कोल्हापूरचे कारागृह गुजरीत निंबाळकर वाड्याजवळ होते, तर बिनखांबी गणेश मंदिराजवळ रंकभैरव मंदिराच्या परिसरात अंधार कोठड्या होत्या.नंतर या ठिकाणी दगडी बांधकाम करून हे फाशीगेट बंदिस्त करण्यात आले. नंतरच्या काळात या ठिकाणी एमएसईबीचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. बारकाईने निरीक्षण केल्यास या जुन्या फाशी गेटचे अवशेष अजूनही लक्षात येतात. 

दृष्टीक्षेप :-

 संस्थान काळात फाशी गेट अस्तित्वात 
 बिंदू चौक तुरुंग बांधकामास १२ हजार रुपये खर्च
 १८७३ मध्ये तुरुंगाच्या उत्तर बाजूस नवीब बांधकाम
  रंकभैरव मंदिराच्या परिसरात अंधार कोठड्या
 जुने कारागृह गुजरीत निंबाळकर वाड्याजवळ होते

 चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत मांडरे एक उत्कृष्ट चित्रकार होते. आपली चित्रे रसिकांना पाहता यावीत या उद्देशाने त्यांनी आपला चित्रसंग्रह घरासहित महाराष्ट्र शासनाला दिला. त्याचे शासनाने चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय रूपांतर केले आहे. या संग्रहालयात सध्या तीन दालने असून त्यात आबालाल रहमान, बाबुराव पेंटर आणि इतर कलावंतांच्या कलाकृतींची मांडणी केली आहे.

साठमारी :
साठमारी हा शब्द शहरात येणाऱ्या पाहुण्यांना अपरिचित आहे. साठमारी हा एक खेळ आहे. भारतात स्वातंत्र्यापूर्वी फारच थोड्या ठिकाणी हा खेळ खेळला जात असावा. कोल्हापूरात संस्थानकाळात हा खेळ खेळला जात असावा. परदेशात हल्ली देखील खेळल्या जाणाऱ्या बुल फाईट या खेळासारखाच पण त्याहूनही रोमांचकारी खेळ असून या खेळाचे स्वरूप असे की एक मोठा बंदिस्त आखाडा असे, या आखाड्यात काही अतंरावर संरक्षणाच्या दृष्टीने गोलाकार बुरुज (तटबंदी) असे. प्रत्येक तटबंदीला चार लहान दरवाजे असत. सर्व तटबंदीच्या भोवती खेळण्याला पुरेशी जागा असे. 
 

_Sathamari_Maindan_1_0.jpg 

साठमारी हा जुना खेळ आहे. तो भारतात फारच थोड्या ठिकाणी खेळला जात असावा. त्यातील एक होते कोल्हापूर संस्थान. साठमारी हा खेळ परदेशात खेळल्या जाणाऱ्या ‘बुल फाईट’सारखाच, पण त्याहून रोमांचकारी! खेळात एक मोठा बंदिस्त आखाडा असे, आखाड्यात काही अंतरावर संरक्षणाच्या दृष्टीने गोलाकार बुरुज (तटबंदी) असे. प्रत्येक तटबंदीला चार लहान दरवाजे असत. सर्व तटबंदीच्या भोवती खेळण्याला पुरेशी जागा असे.

खेळणारे वीर खेळाडू आखाड्यात उतरल्यानंतर तेथे मुख्य प्रवेशद्वारातून एक हत्ती सोडण्यात येई व ते दार बंद केले जाई. खेळाडू व हत्ती यांचा खेळ बंदिस्त आखाड्यामध्ये सुरू होई. खेळाडू हातातील भाल्याने हत्तीला टोचत व त्याला डिवचत. खेळाडूने त्याच्या अंगावर हत्ती धावून आल्यावर जवळच्या संरक्षित तटबंदीमध्ये घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. हत्ती संरक्षित तटबंदीचे दार लहान असल्यामुळे आत जाऊ शकत नसे. दुस-या खेळाडूने तेवढ्या वेळेत हत्तीला दुसऱ्या बाजूने भाल्याने टोचायचे. हत्ती पहिल्याचा नाद सोडून देऊन दुसऱ्या खेळाडूच्या मागे धावे. जर का हत्तीने यदाकदाचित एखाद्या खेळाडूला पकडलेच तर त्याच्या सुटकेकरता, बाण व आपटबार (दारुकाम) घेऊन तयार असलेले लोक आपटबार उडवत व बाण हत्तीच्या अंगावर सोडत. त्यामुळे हत्ती घाबरून जाऊन पकडलेल्या व्यक्तीस सोडून देत असे. तरीदेखील काही वीरांना त्यांचे प्राण हत्तीच्या तावडीतून सुटू न शकल्यामुळे गमावावे लागले आहेत!

हजारो प्रेक्षक आखाड्यासभोवताली उंचावर बसून, हत्तीला हैराण करून त्याच्याबरोबर खेळण्याचा हा अत्यंत धाडसी खेळ पाहत असत. खेळातील वीरांचे कौतुक औत्सुक्याने केले जात असे. त्यांना इनामे देण्यात येत.

खेळाला साठमार, साठमाऱ्या किंवा साठ्य असेही म्हणतात. खेळ भूतपूर्व कोल्हापूर व बडोदे संस्थानांत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकप्रिय होता आणि तो खास पाहुण्यांसाठी विशेषतः इंग्रज गव्हर्नर वगैरेंसाठी प्रदर्शित केला जाई. त्या खेळातच डागदारी, हत्तींच्या टकरा इत्यादी प्रकारांचाही समावेश केला जाई. खेळासाठी भारी खुराक देऊन हत्ती तयार करत. त्यांना साठमारीच्या खेळाच्या वेळी दारू पाजून व ‘माजूम’ (साखर, बदाम, पिस्ते इत्यादी घालून बनवलेल्या भांगेच्या वड्या) खायला घालून बेफाम करत. हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी मस्तवाल हत्तीला खेळवणारी माणसे खास प्रशिक्षण देऊन तयार केली होती. मल्ल हत्तीचा मोहरा चुकवून त्याच्या पोटाखाली कधी कधी शिरत व त्याला जोरदार गुद्दे मारून हैराण करत.

हत्तीच्या झुंजीसाठी खास मैदान तयार केले जात असे, त्याला ‘अग्गड’ अशी संज्ञा होती. त्याला साठमारीचा आखाडा असेही म्हणत. अग्गड बडोदे येथे आहे. बडोदे येथील अग्गड सुमारे साडेतीनशे फूट (सुमारे. १०६.६८ मीटर) लांब व सुमारे दोनशेवीस फूट (६७ मीटर) रुंद अशा विस्तीर्ण जागेत असून त्याच्या मैदानाभोवती चारी बाजूंना पंचवीस फूट (७.६२ मीटर) उंचीचा तट बांधलेला होता. त्यात प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केली होती. मस्त हत्तीस अग्गडात आणण्यासाठी उत्तर-दक्षिणेस दोन मोठे दरवाजे ठेवलेले होते. ते भिंतीत बसवलेले वजनदार अडसर हत्ती आत येताच सरकावून बंद करत. त्याशिवाय तटाच्या भिंतीत काही ठरावीक अंतरांवर एकेकटा मनुष्य आत-बाहेर ये-जा करू शकेल अशी लहान दारे [ सात फूट (२.१३ मीटर) उंचीच्या कमानी] ठेवलेली आहेत. मैदानाच्या मध्यभागी गोलाकार, पण आतून मोकळा असा चाळीस फूट (१२.१९ मीटर) व्यासाचा लहान बुरुज आहे. त्याच्या आत जाण्यासाठी लहान कमानी दरवाजे आहेत. मस्त हत्ती साठमाराच्या अगदी जवळ आल्यास बचावाचा आपत्कालीन मार्ग म्हणून साठमार त्या कमानीतून बुरुजात शिरू शकत व दुसऱ्या बाजूने बाहेर पडून स्वतःचा बचाव करत. तसेच, साठमाराचा बचाव अग्गडाच्या एका बाजूस पस्तीस फूट (१०.६६ मीटर) व्यासाचा गोल कट्टा केलेला असून त्याच्याभोवती गोल फिरण्यानेही हत्तीपुढे पळणाऱ्याचा बचाव होऊ शकतो; कारण हत्ती समोर व सरळ रेषेत वेगाने धावू शकतो; तथापी तो त्याच्या बोजड शरीरामुळे वक्र गोलाकार रेषेत धावू शकत नाही. साठमाराला वाकडेतिकडे धावून त्याचा फायदा घेता येतो. खंडेरावमहाराज गायकवाड यांनी बडोदे येथे त्या खेळासाठी खास अग्गड बांधवून घेतले होते व सयाजीराव गायकवाडांनी सभोवतीच्या भिंतीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधली होती. साठमारीचे आखाडे कोल्हापूरमध्ये व कोल्हापूर संस्थानात राधानगरी, सोनतळी, रूकडी आणि पन्हाळा येथे शाहू महाराजांनी बांधून घेतले होते.

कोल्हापुरातील खासबागेनजीकचा साठमारीचा आखाडा औरसचौरस असून दोनशे फूट (६०.९६ मीटर) लांब व दोनशे फूट (६०.९६ मीटर) रुंद असा आहे. सामान्यतः साठमारीचा आखाडा वर्तुळाकार असतो व त्याचा व्यास दोनशे फूट (६०.९६ मीटर) असतो. त्याच्या सभोवती पंधरा फूट (४.५७ मीटर) उंचीचा भक्कम दगडी कोट बांधलेला असतो. जुन्या वाड्यात ज्याप्रमाणे भिंतीतून जिने असतात, त्याप्रमाणे तटबंदीच्या ठरावीक अंतरावर एक माणूस शिरेल एवढीच दिंडी व आतून कोटावर जाता येईल असा कोटाच्या भिंतीतून जिना ठेवलेला असतो. ६०.९६ मीटर व्यासाचा जो आखाडा तयार होतो, त्यास खेळाचे ‘रंगण’ म्हणतात. रंगणामध्ये पोकळ व बळकट असे गोल बुरुज बांधलेले असतात. त्या बुरुजांना आरपार जाणाऱ्या दिंड्या असतात. खेळाचे सर्वसाधारण स्वरूप असे : मस्त हत्तीस रंगणात एका कमानीजवळ आणून उभे करतात. जवळच्या कमानीत उभे राहून साठमार हत्तीच्या मागच्या पायात बांधलेले साखळदंड सोडतात. त्याचवेळी साठमार हत्तीच्या पुढच्या पायांत असलेली काट्यांची पोची आकडीने काढतात. बिगुलाचा इशारा होताच हत्तीस मोकळे सोडण्यात येते. आजुबाजूस उभ्या असलेल्या साठमारांपैकी एक जण हत्तीच्या पुढे जातो व त्याच्या जवळचा भाला अगर डोक्यावरील रंगीत फेटा सोडून, तो हत्तीपुढे नाचवून त्याला डिवचतो. चिडलेला हत्ती त्या साठमारामागे धावू लागताच, दुसरा साठमार त्याला दुसरीकडून चिडवून त्याला त्याच्या स्वत:च्या अंगावर घेतो. तितक्यात तिसरा साठमार त्याच्याकडे हत्तीचे लक्ष वेधून घेत त्याला त्याच्यामागे धावण्यास भाग पाडतो. साठमाराने हत्तीला चिडवून त्यांच्या अंगावर घेणे व हत्तीला हुलकावण्या देऊन पळावयास लावणे ह्यात साठमाराचे साहस, कौशल्य व चपळपणा पणास लागतो. हत्तीही चिडून चिडवणाऱ्याच्या मागे सैरावैरा धावू लागतो. साठमाराने हत्तीला सर्व मैदानभर पळवण्यात व त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्यात खेळाची गंमत आहे.

हत्ती जरी स्थूल व अवाढव्य प्राणी असला तरी त्याची सरळ दौड मनुष्यापेक्षा जास्त वेगवान असते. म्हणून साठमार त्याला एकाच माणसाच्या मागे एकसारखे धावू देत नाहीत. दुसरा साठमार पहिल्याच्या बचावासाठी हत्तीचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेऊन त्याला त्याच्या अंगावर घेतो. अशा संकटप्रसंगी कित्येकदा साठमारास त्याचा भाला व फेटा जागच्या जागीच टाकून पलायन करावे लागते आणि स्वतःचा बचाव करावा लागतो; तर काही प्रसंगी अग्गडात दारुचे बाण सोडून व धुराच्या साहाय्याने हत्तीस घाबरवून साठमारास वाचवावे लागते. एखाद्या साठमाराच्या अगदी जीवावर बेतल्यास हत्तीच्या मागच्या पायांत चिमटे टाकून त्याला जेरबंद केला जातो व खेळ थांबवतात. हत्तीच्या पायांत चिमटे टाकण्याचे काम जोखमीचे असते, कारण बिथरलेला हत्ती अचानक मागे वळून चिमटे टाकणाऱ्या साठमारावर हल्ला चढवण्याचा संभव असतो. बडोदे व कोल्हापूर येथील साठमारीमध्ये मैदानपरत्वे थोडा फरक आढळतो; कारण कोल्हापूरच्या साठमारीत मैदानाऐवजी बरेच बुरुज आहेत.

 खेळणारे वीर खेळाडू आखाड्यात उतरल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून आत एक हत्ती सोडण्यात येई. व ते दार पुन्हा बंद केले जाई. या बंदिस्त आखाड्यामध्ये खेळाडू व हत्ती यांचा खेळ सुरु होई. प्रत्येक खेळाडू हातातील भाल्याने हत्तीला टोचत. हत्ती अंगावर धावून आल्यावर खेळाडूने जवळच्या संरक्षित तटबंदीमध्ये घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. संरक्षित तटबंदीचे दार लहान असल्यामुळे हत्ती आत जाऊ शकत नसे. इतक्या वेळेत दुसऱ्या बाजूने हत्तीला भाल्याने टोचायचे. हत्ती पहिल्याचा नाद सोडून देऊन दुसऱ्या खेळाडूच्या मागे धावे आणि जर का यदा कदाचित हत्तीने एखाद्या खेळाडूला पकडलेच तर त्याच्या सुटकेकरिता बाण व अप्पटबार (दारुकाम) घेऊन तयार असलेले लोक अप्पटबार उडवीत व बाण हत्तीच्या अंगावर सोडत. त्यामुळे हत्ती घाबरुन जाऊन पकडलेल्या व्यक्तीस सोडून देत असे. असा प्रयत्न होऊन देखील हत्तीच्या तावडीतून सुटू न शकल्यामुळे अनेक वीरांना आपले प्राण गमावले आहेत.
अशारीतीने स्वरक्षण करीत हत्तीला हैराण करून त्याच्याबरोबर खेळण्याचा हा अत्यंत धाडशी खेळ हजारो प्रेक्षक बंदिस्त आखाड्यासभोवताली उंचावर बसून पाहत असत. अशा वेळी या रोमांचकारी खेळातील वीरांचे मोठ्या औत्सुक्याने कौतुक केले जात असे. त्यांना इनामे देण्यात येत असत. अॅन्ड्न्युक्लिज अँड दि लायन या कथेतील वर्णनासारखे वातावरण निर्माण होई. त्याच वर्णनाशी मिळतीजुळती रचना त्यावेळी असे, परंतू त्या कथेत क्रुरता होती. पण येथे शूरता भरलेली असे.
हल्ली सुमारे गेल्या ७५ वर्षात असा खेळ कोल्हापूरात खेळला गेला नाही आणि यापुढेही खेळला जाणार नाही. तरी मंगळवार पेठेमध्ये शाहू स्टेडियम जवळच्या या साठमारी जवळ गेल्यावर त्या रोमांचकारी खेळाचे काल्पनिक चित्र डोळयासमोर उभे केले तरी अंगावर काटा उभारल्याखेरीज नाही. तसा खेळ कोल्हापुरात गेल्या सुमारे पाऊणशे वर्षांत खेळला गेलेला नाही. मंगळवार पेठेमधील शाहू स्टेडियमजवळ साठमारीचा खेळ होई. साठमारीचे नाममात्र अवशेष पाहण्यासही मिळतात.

 शाहू महाराजांचे प्राणीप्रेम : गजराज मोतीची शस्त्रक्रिया

छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी "गजराज मोती" हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. "मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली." असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, "महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला." असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. "अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस." असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.

दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. "तुटक्या दाताची वाढ होते काय?" महाराजांनी विचारले.
"नाही" डॉक्टरांनी सांगितले.
"दुसरा काही मार्ग?"
"दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार."
"मग त्या दात्र्या तरी काढून टाका." महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,"उरलेल्या दाताला जिथून दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू." महाराजांनी पिराजीच्या योजनेस संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले. लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती. शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन तयार केले. "गळसाज" असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली. लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी. अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !
अशाप्रकारे मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू लागला. त्यातूनही पिराजीने दाताला करवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, "पिराजी निघ बाहेर. मोती पायाखाली धरतोय तुला." पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली. तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून बाहेर काढले.
महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली. मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले. त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या. हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली. 

    मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता. हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, "पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही." तेव्हा पिराजी म्हणाला, " बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल." पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला

 खासबाग 
       
कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले. हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी  वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान पिचतच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कु स्त्या केल्या जातात. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो. आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.

     श्री शाहू महाराज सन 1902 साली विलायतेला गेले. त्यावेळी त्यांनी ग्रीस साम्राज्याची राजधानी रोम नगरीस भेट दिली. ऑलिंपिक स्टेडियम व ओपन एअर थिएटर पाहिले आणि त्याचवेळी त्यांना आपल्याकडील कुस्त्याच्या मैदानातील उणिवेचे उत्तर सापडले. विलायतेवरून आल्यानंतर त्यांनी कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर, साठमारी या योजना आखून कामास सुरुवात केली. कुस्ती मैदानाच्या बांधकामास 1907 साली सुरुवात केली व फेब्रुवारी 1912 साली पूर्ण केले. या कुस्ती मैदानाची घडण अशी आहे की, मैदानात कोठेही बसले तरी कुस्ती आपल्यासमोर चालली आहे, असे प्रत्येकाला वाटते. कारण डोळ्याचा अँगल खाली असल्याने जवळ कुस्ती चालली आहे, असे वाटते.


 राजर्षी शाहू महाराजांना लहानपणापासून कुस्तीचा नाद होता. त्यांनी लहान वयातच कागल मुक्कामी कुस्ती केली होती. राजांना निसर्गत:च भीमकाय देहयष्टी, निरोगी संपदा लाभली होती. कोल्हापुरात अंबाबाईच्या दारी मंगळवार, शुक्रवार या दोन दिवशी कुस्ती मैदाने भरावयाची. ही मैदाने जुन्या राजवाडय़ाच्या पश्चिमेच्या दरवाजाजवळ आजचे बी डिव्हिन पोलीस चौकी, बाबू जमाल दर्गा, मंगळवार पेठेतील विठोबा देवळ, शिवाजी थिएटर आताचे नवरे मंगल कार्यालय येथे होत होती. ही कुस्ती मैदाने संक्रांत, महाशिवरात्र, ईद , धूलिवंदन, जोतिबा यात्रा, शिवजयंती, नागपंचमी, माही, उरूस इत्यादी सणांना भरत असत. या मैदानाचे लोण प्रत्येक खेडय़ात पोचले. अशातर्हेची मैदाने सणा दिवशी प्रत्येक गावात होऊ लागली असून, ही प्रथा आजही खेडोपाडी चालू आहे. वरील कोल्हापुरातील कुस्ती मैदाने सपाट जागेवर माती टाकून केली जायची. त्यामुळे प्रेक्षकांना कुस्ती नीट दिसायची नाही, त्यांना उभे राहून पाहावी लागायची. ही गैरसोय महाराजांच्या सतत लक्षात यायची. महाराजांना शाळा, कॉलेज, पिण्याच्या पाण्याचे तळे, रंकाळा जनतेच्या उपयोगी योजना करून त्या पूर्ण करण्याची सवय होती. कुस्ती मैदानाला खासबाग हे नाव ठेवणेच कारण.. मिरजकर तिकटीच्या राधाकृष्ण मंदिरानजीक एक बाग होती. तिचे नाव खासबाग. म्हणजे राजांच्या परिवारातील लोकांसाठी फिरण्यासाठी खास राखून ठेवलेली जागा. ही खासबाग सामाजिक बांधीलकी मानणार्या शाहू राजांनी मोडीत काढून कुस्ती आखाडा बांधला. कुस्ती मैदान काम 1907 ला सुरू करण्यात आले. प्रथम उत्तर, पश्चिम व दक्षिणेच्या बाजूने 20 फूट उंचीच्या भिंती किल्ल्याच्या तटासारख्या भक्कम केल्या आहेत. मैदानाच्या मध्यभागी कुस्तीचा 60 फूट व्यासाचा आखाडा, दोन फूट उंची गोलाकार आहे. स्टेजच्या उत्तरेकडून मैदानात पैलवान, वस्ताद यांना प्रेक्षकात मैदानात येण्यासाठी व दक्षिणेस राजे व मान्यवर मंडळी मैदानात येण्यासाठी, उत्तरेस येण्यासाठी दोन मोठे दरवाजे आहेत. या मैदानाचे काम दगडी जिना व त्या दगडी जिन्यावर पाण्याची टाकी व पाठीमागे टुमदार इमारत सदनाचे रेशनकार्ड कार्यालय बांधले आहे. या इमारतीतून राजघराण्यातील स्त्रिया कुस्ती पाहण्यास बसत. या मैदानाचे काम 1912 साली पूर्ण झाले आहे. खासबाग मैदानात प्रेक्षक बसण्यासाठी उतरण असल्याने कुस्ती स्पष्ट दिसते.
    श्री शाहू खासबाग मैदानाचे उद्घाटन इमामबक्ष-मोहिदीन यांच्या चित्तथरारक कुस्तीने झाले. मैदान पूर्ण एक लाख प्रेक्षकांनी भरले होते. या मैदानातील नं. 1 ची कुस्ती इमामबक्ष यांनी जिंकली. शाहू महाराजांनी कोल्हापुरात खालील पैलवानांना आणले.
      पै. सादिक, रमजी, गुटा, किकर, गुलाम , यात्रा, गोबरबाबू, जगज्जेता गामा, शहानवाझ तानीवाला, गुलाब भोईटदिन, गामा, गुलाम कादर, हादिमा, जिजा, भोला.
        महाराष्ट्रातील पैलवानाबरोबर किंवा त्यांना जोड मिळाली नाहीतर पंजाबी विरुद्ध पंजाबी यांच्या कुस्त्या लावून कुस्तीचा शौक वाढविला. या मैदानात गणपत शिंदे, बाळ पानारी, गोपाळ परीट, कमाल अथणे, श्रीपती चव्हाण, बाबू बिटे, चंदर शिंदे, म्हादू हांडे, हरी पोवार, शंकर हेर्ले, सदाशिव वास्कर, देवाप्पा हलंगडी, आण्णाप्पा पाडळकर, विष्णू नागराळे, जिन्नाप्पा अकिवटे, दिनकर शिंदे यांच्या पंजाबी पैलवानाबरोबर कुस्ती झाल्या आहेत. याच मैदानात माणगावे खेळले आहेत. माझ्या पाहण्यात झालेल्या कुस्त्या पैलवान सादिक विरुद्ध केशव पाटील, सादिक विरुद्ध शिवा आरेकर, महंमद हानिफ विरुद्ध बिल्ला, हानिफ विरुद्ध सादिक, आंदळकर विरुद्ध सादिक, विष्णू सावर्डे विरुद्ध सादिक. यामध्ये सादिक यांनी सर्व कुस्ती मारल्या आहेत तसेच सादिक विरुद्ध गोगा, गोगा विरुद्ध गणपत आंदळकर यामध्ये गोगा विजयी, गणपत आंदळकर विरुद्ध नशीर पंजाबी ही कुस्ती चालू असताना संध्याकाळी अंधार पडला म्हणून दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता कुस्ती लावली. या कुस्तीत आंदळकर विजयी झाले. मोतीबागचा चंबा मुत्नाळे विरुद्ध गणपत खेडकर यांची कुस्ती फार चांगली झाली. चंबाने कुस्ती जिंकली, बंडा पाटील व चंबा ही कुस्ती प्रेक्षणीय झाली. दादू चौगुले यांनी तर खासबाग गाजवून सोडले. त्यांनी 9 कुस्त्या या मैदानात केल्या. सन 1975 मध्ये रुस्तम-ए- हिंद या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा झाल्या. यामध्ये पैलवान सतपाल, मास्टर चंदगीराम, चंबा मुत्नाळ, गणपत खेळकर, हरिशचंद्र बिराजदार, वडार, अ‍ॅग्झॅक निग्रो इत्यादी 75 पैलवानानी भाग घेतला. होता. या स्पर्धामध्ये पैलवान सतपाल यांना 'रुस्तम -ए-हिंद' किताब मिळाला.

 पॅलेस थिएटर

नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणार्‍या या वास्तूची बांधणी देखील स्वत: छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. याच कालावधीत संगीत आणि नाट्यकलेची बीजेदेखील कोल्हापूरात रूजली. याचं सारं श्रेय जातं पॅलेस थिएटरला... अर्थात आजच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला.

रोम भेटीवरून परतल्यानंतर तिथे असलेले ऑलिंपिक मैदान व त्याला लागूनच असलेले नाट्यगृह यांची प्रेरणा घेऊन छ. शाहूंनी या वास्तू उभारल्या. सन 1913 ते 1915 या कालावधीत बांधल्या गेलेल्या या नाट्यगृहाचा रंगमंच 20 फूट बाय 34 फूट इतका प्रशस्त असून रंगमंचाखाली आवाज घुमण्यासाठी पाण्याने भरलेला 10 फूट खोल खड्डा आहे. पाणी खेळते राहण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत. नाट्यगृहास कोठेही खांब नाहीत. कुठेही बसले तरी नाटक व्यवस्थित दिसावे व स्पष्ट आवाज ऐकू यावा अशी रचना केलेली आहे. नाट्यगृह आखीव, रेखीव व राजेशाही थाटाचे असून त्या काळी राजघराण्यातील स्त्रियांना नाटक पाहता यावे म्हणून बाल्कनीमध्ये दोन बंदिस्त खोल्यांची विशेष रचना करण्यात आलेली आहे.

 कैलासगडची स्वारी शिवालय

    केशवराव भोसले नाटय़गृहाजवळील कैलासगडची स्वारी हे शिवमंदीर दक्षिण काशी कोल्हापूर येथील एक जागृत व भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून प्रसिध्द आहे. या प्राचिन मंदिराचा जिर्णोध्दार वेळोवेळी झाला असून अलिकडे १९७२ मध्ये मंदिराचा विस्तार वाढवून जिर्णोध्दार केलेला आहे. जिर्णोध्दार करताना मंदिर कलात्मकतेने नटवल्याने सध्य स्थितीतील हे मंदिर म्हणजे ऐतिहासिक, पौराणीक आणि आधुनिक कलेचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल. मंदिर उभारताना ज्योतिबा डोंगर येथील काळा पाषाण वापरून कलाकुसर केलेली आहे. मंदिरासमोरील एक टन वजनाचा पितळी नंदी व मंदिराच्या दोन्ही बाजूचे दीड टन वजनाचे व २२ फूट उंचीचे पितळी दीपस्तंभ आकर्षक आहेत. मंदिराला आवर्जून भेट देण्याचे दुसरे कारण म्हणजे मंदिरात असलेली कोल्हापूरचे प्रख्यात रंगकर्मी कलायोगी जी. कांबळे यांची अप्रतिम तैलचित्रे छ. शिवाजी महाराजांचे शासन दरबारी मान्यता पावलेले जी. कांबळे यांची अस्सल तैलचित्रे येथेच आहे.   कोल्हापुर... | Maayboli

  बिनखांबी गणेश मंदीर
बिनखांबी गणेश मंदीर किंवा जोशीरावचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेले हे मंदीर महाद्वार रोडवर आहे. या मंदिराचे मुख्य दोन भाग म्हणजे आतील गाभारा व त्यापुढील मंडप. गाभारा किंवा मंडप यांचे छत हे खांबाच्या आधाराविना उभारलेले आहेत हेच या मंदिराचे वैशिष्ट्य होय. मंडप सुमारे २५ फूट लांब व रुंद २५ फूट रुंद आहे. कळस गाभाऱ्यावरच उभारलेला असून गणपतीची मूर्ती दगडी आहे. 
 
गणेश मुर्तीवरचा शेंदुर काढल्यावर मुळ मुर्ती
 
 Binkhambi Ganesh Mandir, Kolhapur (2020) - Images, Timings | Holidify

  काशी विश्वनाथ मंदिर-
श्रद्धाळू भारतीय मनाची परिसीमा म्हणजे काशी दर्शन, प्रयाग येथील त्रिवेणी संगम व गया येथील पिंडदान. पण करवीरच्या यात्रेकरूंना इतके कष्ट करण्याची काहीच गरज नाही. कारण ही तीनही क्षेत्रे कोल्हापुरातच आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात काशी यात्रेपेक्षाही या 'दक्षिण काशी'चे महत्त्व अधिक मानतात.

महालक्ष्मी मंदिरात घाटी दरवाजाच्या बाजूला काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. तेथे कालभैरव, दंडपाणी, गंगा, धुंडिराज, गणेश ही काशीतील सर्व दैवते आहेत. तर मंदिरासमोर जाळीआड काशीकुंडात गंगा आहे. समोरच्या दीपमाळेत अगस्ती व लोपामुद्रा यांच्या मुर्ती आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेल्या उद्यानात 1960 पूर्वी मणिकर्णिका तीर्थ होते. दुर्दैवाने हे मणिकर्णिका तीर्थ सध्या मुजवले गेले आहे. काशीकुंडात गंगा, मणिकर्णिका तीर्थाचे अस्तित्व व काशीविश्वनाथाचे मंदिर यामुळे कोल्हापूरला काशीचा मान आहे. करवीर माहात्म्यानुसार देवी या क्षेत्री आल्यावर पाठोपाठ शिव आले. त्यामुळे इतर सर्व देवता या ठिकाणी येवून राहिल्या.

 फिरंगाई मंदिर

वरुणतीथाजवळील फिरंगाई देवीचे मंदिर असून हे बहुजन समाजाचे दैवत मानले जाते. फिरंगाईस प्रत्यागिरादेवी म्हणूनही ओळखले जाते. भाविक लोक देवीला पीठ, मीठ, हळद आणि तेल अर्पण करतात. पूर्वीच्या काळी देवीसमोर रेडय़ाचा बळी दिला जात असे. आता ती प्रथा बंद झालेली असून आता बोकडाचा बळी देतात. मंदिराची बांधणी साधी असून ओबडधोबड दगडात केलेली शिल्परचना सामान्य आहे. मात्र हे देउळ महालक्ष्मी देवीच्या स्थापनेच्याही पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. मंदिर साधे असले तरी कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या प्रभावापूर्वीच्या कोल्हापुरातील प्राचीन आणि बहुजन समाजाच्या द्राविड संस्कृतीच्या प्रभावाचे प्रतीक म्हणून अभ्यासकांच्या दृष्टीने या मंदिराचे स्थान अत्यंत महत्वाचे असे आहे. या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे.

शंकराचार्य मठ
जगद्गुरू शंकराचार्य हयांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी, शृंगेरी हा एक मठ. तेराव्या शतकामधे त्यावेळचे अधिपती शंकराचार्य, श्री. विद्याशंकर भारती यांनी कोल्हापूर येथे हा मठ स्थापन केला.शुक्रवार पेठेत पंचगंगा नदीच्या घाटावर जाण्याच्या मार्गावर हा मठ आहे. हा मठ दुमजली असून त्याच्या बांधणीमध्ये भव्यता किंवा कलाकुसर आढळून येत नाही. कोल्हापूरच्या त्या काळातल्या धार्मिक महात्म्यामुळे, त्यांनी हा मठ स्थापन केला. महालक्ष्मी जगदंबेच्या पवित्र स्थानापाशी, दक्षिण काशीच्या पुण्य-भू पाशी, एक मठ असावा असे, स्वामींना वाटले असल्यास त्यात काहीच नवल नाही. ‘अभिनव पंचगंगा तीर्वास’, ‘कमल निकेतन करवीर सिंहासनाधिश्वर श्री. विद्या शंकर भारती स्वामी’ हया प्रस्तुत मठातील शंकराचार्यांच्या उपाधी आहेत. पंचगंगेचा काठ आणि महालक्ष्मी मंदिर हयांचे स्थान माहात्म्य शंकराचार्यांना, श्री. विद्या शंकर भारती यांना वाटत होते, हे यावरून समजते. मठासाठी जागा मुक्रर करताना सुध्दा, पंचगंगेचा काठच त्यांनी त्यामुळे पसंत केला. मठाची ही जागा निवडण्यामागे, दुसरे देखील एक कारण दाखवता येईल. मठ म्हणजे शेवटी समाधीची जागा, हे विसरणे शक्य नाही. समाधी स्थान हे नदीकिनारी असणे, खरे तर उचित ठरते. त्यामुळे शंकराचार्यांनी हया ठिकाणाची निवड केली. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे चार मठ स्थापन केले त्यापैकी एक कर्नाटकातील शृंगेरी मठ होय. या मठावर अधिष्ठित असलेल्या विद्याशंकर भारती या शंकराचार्यानी इ.स. 13 व्या शतकात कोल्हापुरात या मठाची स्थापना केली. प्रारंभी हा मठ संकेश्वर मठाबरोबर संलग्न होता पण आता हा मठ 'करवीर पीठ' या नावाने स्वतंत्र आहे. कोल्हापूर मठाधीश शंकराचार्यांच्या बिरूदावलीत 'अभिनव पंचगंगातीरवास कमलानिकेतन करवीर सिंहासनाधीश्वर श्री विद्याशंकरभारती स्वामी' असा उल्लेख केला जातो. 
 ब्रम्हेश्वर मंदिर
ब्रम्हेश्वराचे हे प्राचीन मंदिर वरुणतीर्थ वेशीत जनता बझारच्याजवळ आहे. या मंदिराची रचना महालक्ष्मी मंदिरासारखीच आहे. फक्त याला शिखर नाही व ते विस्ताराने लहान आहे. मंदिराचा बराचसा म्हणजे निम्म्याहून अधिक भाग पृष्ठभागापासून खाली खोलगट भागात आहे. मंदिराच्या गर्भगृहातील लिंग भूमिगत आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर छोटासा मंडप आहे. या प्राचीन मंडपाला लागून आता नव्याने दुसरा मोठा मंडप बांधण्यात आला आहे.
महाकाली मंदिरः-
    ब्रह्मेश्‍वर बागेतून उभा मारुती मंदिराकडून व नागोजीराव पाटणकर विद्यालयाच्या दिशेने ताराबाई रोडवरून महाकाली मंदिराकडे जाता येते. त्या मार्गावर नव्याने उभारलेल्या दगडी कमानी हे वारसास्थळ असल्याचे अधोरेखित करतात.

    अंबाबाई मंदिरापासून पश्‍चिमेला रंकाळ्याकडे जाताना महाकालीचे मंदिर आहे. ‘करवीर माहात्म्या’मध्ये उल्लेख असलेले हे मंदिर वेशीबाहेर होते. रंकाळावेस व वरुणतीर्थ वेशीच्या दरम्यान ते रंकाळ्याच्या दिशेला आहे. आज ते शिवाजी पेठेच्या मध्यवर्ती भागात आले. अगस्ती मुनी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी करवीर यात्रा केली. त्या वेळी महाकालीचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरात प्रवेश करताना पृष्ठभागावरील कासवाच्या प्रतिकृतीनंतर अगस्ती व लोपामुद्रा यांची प्रतिमा पायात दिसते.
   तीन फूट उंचीची स्थानिक काळ्या दगडात कोरलेली सर्वांगसुंदर मूर्ती मंदिरात आहे. मंदिर परिसरात महाकाळ कुंड व नागेश्वराचे स्थान असल्याचे नमूद आहे. खांबांवर उभारलेले दगडांच्या अडक पद्धतीचे हे मंदिर फार मोठे नाही. गर्भगृह, सभामंडप, मुख मंडप अशी रचना असून, त्यापुढे चौक व पालखीचा चौथरा दिसतो. मंदिराचे शिखर इतर मंदिराप्रमाणेच दिसते. कोपऱ्यात एक छोट्या आकाराची, कमी उंचीची दीपमाळ दिसते. डाव्या बाजूला मारुती, महादेव, नागमूर्तीचे मंदिर आहे. मागील बाजूस एक छोटे मंदिर आहे. महाकाली ही युद्धदेवता असून, तिच्या मंदिरात होम, जागर, हवनाचा विधी होतो. अक्षय्य तृतीयेला होम, पालखी, मिरवणूक, प्रसाद, पशुबळी देण्याची परंपरा आहे.
   नवरात्रोत्सवातील नवदुर्गा दर्शन घेताना महाकालीचे दर्शन घेतले जाते. चिंचेच्या झाडांच्या विस्तीर्ण सावलीच्या परिसरात असलेला हा मंदिर परिसर आज नागरी वस्तीत गुरफटलेला दिसतो. तरीही तो तसा शांत वाटतो. त्याच परिसरात नाथ संप्रदायाच्या काही समाधी आहेत. त्याच ठिकाणी आणखी एक मारुतीचे छोटेसे मंदिर असून, त्याच्या कळसाची बांधणी लक्ष वेधून घेते. ब्रह्मेश्‍वर बागेतून, उभा मारुती मंदिराकडून व नागोजीराव पाटणकर विद्यालयाच्या दिशेने ताराबाई रोडवरून मंदिराकडे जाता येते. त्या मार्गावर नव्याने उभारलेल्या दगडी कमानी हे वारसास्थळ असल्याचे अधोरेखित करतात.मात्र, ऑईलपेंट व फरशीतील नव्याने केलेले बदल हे त्यांचे प्राचीनत्व प्रश्‍नांकित करतात.
 वैशिष्ट्ये...
  अगस्ती मुनी व त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी करवीर यात्रेत महाकालीचे दर्शन घेतल्याचा उल्लेख
  मंदिरात तीन फूट उंचीची स्थानिक काळ्या दगडात कोरलेली सर्वांगसुंदर मूर्ती
  नवरात्रोत्सवातील नवदुर्गा दर्शनात महाकालीचे दर्शनही घेतले जाते
  परिसरात मारुतीचे छोटेसे मंदिर असून, त्याच्या कळसाची बांधणी लक्षवेधी

  अंतर्गृही शेषनारायण
करवीर माहात्म्य व लक्ष्मीविजय या गं्रथात शेषनारायण विष्णूच्या करवीरच्या सीमेच्या आतील चार म्हणजे अंतर्गृही शेषशायी रूपातील स्थानांची वर्णने आहेत. यातील एक विष्णू मूर्ती महालक्ष्मी मंदिरात पूर्वबाजूस आहे. त्यास न्यग्रोधतीर्थ म्हणतात. पालाशतीर्थ म्हणून ओळखली जाणारी दुसरी मूर्ती महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणातील अतिबलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणातील अतिबलेश्वर महादेवाच्या मंदिरात उजव्या कोपर्‍यात आहे. पूर्वी ही मूर्ती प्रांगणातील राम मंदिरासमोरील पिंपळाच्या पारावर होती. तिसरी शेषशायी विष्णूची मूर्ती गंगावेश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या मारूती मंदिरात आहे. याला अश्वत्थतीर्थ म्हणतात. चौथी औदुंबर तीर्थ म्हणून ओळखली जाणारी शेषशायी विष्णूची मूर्ती मिरजकर तिकटीत सुभाष चौकातील रिक्षा स्थानकाच्या समोर एका साध्या छोटय़ा मंदिरात आहे. ही प्राचीन मूर्ती पूर्वी रविवार पेठेतील बिंदू चौक जेलजवळील बुरूजावर होती. ही मूर्ती शेषशायी विष्णूच्या अंतर्गृही चार व बहिगृही असलेल्या चार मूर्तीच्यापेक्षा सर्वात मोठी आहे. भूदेवी, लक्ष्मी (श्री) देवी, नारद, ब्रह्म यांच्यासह ही मूर्ती साधारणपणे 5 फुट रूंदीची आहे. विष्णूच्या चेहर्‍यावरील शांत भाव मनोहर आहेत. मूर्ती काळ्य़ा पाषाणात कोरलेली असून तिची घडण अतिशय सुबक व चित्तवेधक आहे. ओंकारेश्वर, विठोबा मंदिराच्या दर्शनाबरोबरच मिरजकर तिकटीवरील या शेषशायी विष्णूचे दर्शन करता येते.
 
 कोटीतीर्थ मंदिर

या परिसराला कोटीतीर्थ हे नाव का पडले याच्या अनेक दंतकथा आहेत. एका दंतकथेप्रमाणे असुरांनी देवांवर विजय मिळवला असताना महालक्ष्मीने देवांच्या मदतीस धावून जावून एक कोटी असुरांना येथे ठार मारल्याने या जागेला कोटीतीर्थ असे नाव मिळाले. महालक्ष्मीनेच येथे कोटीश्वर लिंगाची स्थापना केली. दुसर्‍या एका कथेप्रमाणे पुष्करेश्वराने करवीरात हे तीर्थ निर्माण केले. या ठिकाणी भानुराजाने आपल्या कोटीजन्मींची पातके घालविली म्हणून याला कोटीतीर्थ किंवा पुष्करतीर्थ असे नाव पडले.


हे तीर्थ पापनाशिनी असल्याचे कल्पून आणि ते सर्व तीर्थात श्रेष्ठ असल्याचे समजून काहीजण कोल्हापुरात आल्यावर प्रथम दर्शन कोटीतीर्थाचे घेतात. येथे पूर्वी महालक्ष्मीचे मंदिर होते पण ते भूकंपात गडप झाल्याचीही समजूत आहे. कोटीतीर्थाजवळील स्वामी समर्थ मंदिर शांत व रमणीय आहे.

 ओंकारेश्वर मंदिर
विठोबा मंदिराच्या प्रांगणात पूर्वेस असलेले हे मंदिर विठोबा मंदिरापेक्षा मोठे असून या मंदिरावर तुलनेने कोरीव काम जास्त आहे. मंदिराला गर्भगृह, अंतराळ, नंदीमंडप अशी रचना असून अतिशय कलात्मक व शिल्पवैभवाने नटलेली प्रवेशद्वारे हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे.या मंदिराच्या नंदीमंडपाचे छत बाहेरून कलात्मक असे 16 खांब व आतून 4 खांब अशा एकूण 20 खांबावर तोललेले आहे. छताच्या 16 खांब असलेल्या भागावर बाहेरील बाजूंनी चोहोबाजूंनी जैन तीर्थकरांच्या मुर्तीची रांग आहे. नंदीच्या वरील बाजूचे छतावर शिल्पकलेचा अत्युत्तम अविष्कार दाखवत फुललेले कमळ खोदण्यात आले आहे. गर्भगृहात शिवपिंडी असून अंतराळगृहातील खांबाची रचना महालक्ष्मी मंदिराच्या खांबरचनेशी मिळती-जुळती आहे. मंदिराच्या प्रांगणात एकमुखी दत्त मंदिर, राम-सीता मंदिर व मारुती मंदिर आहे. मारुती मंदिर 20 व्या शतकातील आहे. पण एकमुखी दत्त मंदिरातील मूर्ती मात्र प्राचीनत्व दर्शवते. दत्तमंदिरासमोर एक छोटे शिवमंदिर असून याच्या आजुबाजूला अनेक विरगळ असलेल्या शिल्पशिला आहेत. हे विरगळ अन्यत्र आढळणार्‍या विरगळाच्या तुलनेत मोठे असून शिल्पकामही जास्त आहे. त्यामुळे या शिल्पशिला महत्वाच्या योद्ध्यांच्या असाव्यात असा तर्क आहे.

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्तमुर्ती

श्री एकमुखी दत्तमुर्ती

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. मूळ मूर्ती उत्तर भारतातील असून तिची प्रतिष्ठापना कुणी केली ? याची माहिती उपलब्ध नाही. पू. मौनी महाराजांनी (पाटगाव, जि. कोल्हापूर) मंदिराचा जीर्णोद्धार केला. शके १८८६ मध्ये श्री. पांडुरंग गोविंदराव भोसले आणि वर्ष १९९७-९८ मध्ये श्री. अमोल जाधव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मूर्तीचे वर्णन 

पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून ५ फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्‍चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्‍या हातात कमंडलू, तिसर्‍या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्‍या हातात शंख अन् तिसर्‍या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्‍यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.

गुरुपीठ आणि मंदिर पंचायतन 

या परिवारास मंदिर पंचायतन असे संबोधले जाते. श्रीविष्णु मंदिर, नरसिंह मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर. (एकमुखी) श्री दत्त मंदिर हे पूर्ण गुरुपीठ असून अवधूतस्वरूप आहे, असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी दक्षिण बाजूस १ सहस्र वर्षापूर्वीचा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षामध्ये वड, उंबर आणि अन्य दोन वृक्ष एकाच बुंध्यातून आले आहेत. वटवृक्ष हा दत्तमंदिराकडे झुकला आहे, तर पिंपळ वृक्ष हा दक्षिणेकडील हनुमान मंदिरावर झुकला असून त्याला पारंब्या नाहीत. पिंपळाला औदुंबराप्रमाणे फळे येतात.

शिलालेख

दत्तमंदिरातील दत्तमूर्तीमागील खांबावर एक शिलालेख आहे. सध्या तो बुजवण्यात आला आहे. ओंकारेश्‍वर मंदिरात एक, श्रीराम मंदिराच्या पायरीवर एक, नरसिंह मंदिराच्या खाली भूमीत जोडलेले २ आणि विष्णु मंदिराच्या छतावर एक असे एकूण सहा शिलालेख या मंदिर पंचायतन परिसरात आहेत.

दत्तयागाच्या ठिकाणी खोदकामाच्या वेळी सापडलेले ७०० वर्षांपूर्वीचे यज्ञकुंड

१५.१२.२०१४ या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दत्त महाराजांनी स्वप्नात आदेश दिला, माझी धुनी शाश्‍वत करा! त्या वेळी त्याचा अर्थ समजला नव्हता. अभ्यास करून ज्या ठिकाणी १६.११.२०१४ ते ६.१२.२०१४ या काळात दत्तयाग यज्ञ केला होता, त्या ठिकाणी १७.१२.२०१४ या दिवशी सकाळी खोदण्यास प्रारंभ केला. खोदकाम करतांना त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता यज्ञकुंड दिसून आले. खोदकाम अडीच फूट करावे लागले. खोदकाम जसजसे खाली जात होते, तसतशी उष्णता वाढत होती. त्यामुळे तेथे धुनी असावी, हे खरे आहे. हे यज्ञकुंड ७०० वर्षांपूर्वीचे असावे, असे वाटते. या ठिकाणी दुर्वासऋषींनी साधना केली असून तेव्हापासूनच तेथे धुनी आहे.

 जैन स्वामी मठ

हा मठ शुक्रवार पेठेत असून गंगावेशपासून थोड्याच अंतरावर आहे. या प्राचीन मठाचे प्रवेशव्दार (नगारखाना) जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यासारखाच असून अतिभव्य व आकर्षक राजवाड्याच्या नगारखान्यासारखा असून अतिभव्य व आकर्षक आहे. या नगारखान्याच्या मोठ्या खांबावर आधारित मनोरे आहेत. नगारखान्याची मुख्य कमान भव्य व सुंदर नगारखान्यास शोभेल अशीच आहे. हा नगारखाना सुमारे ९० वर्षापूर्वी मठाधिपती लक्ष्मीसेन महाराज यांनी बांधला. संपूर्ण काळया पत्थरात बांधलेला हा नगारखाना ६५ फूट उंचीचा आहे.

मठाच्या मध्यभागी मोकळी जागा असून सभोवताली नगारखान्याला जोडणाऱ्या इमारती आहेत. या इमारतींचा व नगारखान्याचा मठ म्हणून वापर केला जातो.
या मठात अलिकडे काही वर्षापूर्वी सुमारे २० ते २२ फूट उंचीची भगवान पार्श्वनाथ यांची संगमरवरी भव्य अशी मूर्ती स्थापन केलेली असून ही मूर्ती तितकीच सुंदर व आकर्षक आहे.

Shri Laxmisen Digamber Jain Math en Kolhapur: 1 opiniones y 10 fotos

लक्ष्मीसेन मठाला दोन हजार वर्षाचा इतिहास

   जैन संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक लक्ष्मीसेन मठाने दोन हजार वर्षाची परंपरा जोपासली आहे. शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन महास्वामींच्या मठातील आदिनाथ तीर्थकरांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सुवर्णमहोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. अशा मठाला दोन हजार वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे.

दोन हजार वषार्र्पूर्वीचे गौरवशाली प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा सुंदर आविष्कार आहे. जोतिबा डोंगर भागातील पाषाणांचा वापर या प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. भवानी मंडप प्रवेशद्वाराशी साधम्र्य असलेल्या या प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना नगारखाने आहेत. येथे हत्तींचे वास्तव्य असताना हत्तींचे मंगलमय स्वागत करून सलामी देण्यासाठी नगारे वाजवले जात होते. लक्ष्मीसेन मठाच्या मध्यभागी असणारा श्री चंद्रप्रभ तीर्थकरांचा मानस्तंभ कलेचा सुंदर नमुना आहे. या मानस्तंभाची अखंड 41 फुटांतील मूर्तीची उभी रचना करण्यात आली आहे. या दगडास आकार देण्याचे काम केसापूर पेठेचे मुस्लिम कारागीर याकूब मुल्ला यांनी केले आहे. या मानस्तंभाच्या चारी बाजूंना चतुमरुख मूलनायक श्री चंद्रप्रभ तीर्थकारांच्या मूर्ती विराजमान आहेत. आचार्य विद्यानंद महाराज यांच्या पावन उपस्थितीत या मानस्तंभाची 1983 मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री चंद्रप्रभ दिगंबर जिनमठातील चंद्रप्रभ तीर्थकरांची तीन फुटी बैठी मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. तसेच भगवान 1008 श्री आदिनाथ तीर्थकर यांची मठामधील 28 फुटी मूर्ती अखंड अमृतशिलापासून तयार करण्यात आली असून, मूर्ती बनवण्यासाठी लागणारा अमृतशिला 1958 मध्ये राजस्थान येथून आणण्यात आला होती. मूर्ती रेल्वेने कोल्हापुरात आणण्यात आली. मठात आणण्यासाठी खास लाकडी गाडा तयार करण्यात आला होता. या मूर्तीची स्थापना 1962 मध्ये लक्ष्मीसेन जैन मठात करण्यात आली.

अनेक दानशूर, जैन श्रवक यांच्या देणगीतून येथे प्रशस्त जैन भवन बांधण्यात आले आहे. येथे अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येतात. येथे बाहेरगावाहून येणार्‍या जैन श्रवक-श्रविकांची राहण्याची सोय केली जाते. मठाच्या जुन्या इमारतीत स्वामीजींचे निवास्थान असून येथे धर्म आज्ञा दिल्या जातात. अकबर राजाच्या राज्यकारभारात मठात दिगंबर अवस्थाधारण साधूंची मठ संस्थान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; मात्र धर्मप्रसारासाठी करावा लागणारा प्रवास त्यांना शक्य नसल्याने भगवे वस्त्र परिधान केलेल्या श्री लक्ष्मीसेन महास्वामींची मठाधिपती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्र्यंबोली अथवा टेंबलाई

शहराच्या पूर्वेला एका छोट्या टेकडीवर काही देवळांचा समूह आहे. तिथेच त्र्यंबोलीचे मंदीर आहे. या टेकडालाही टेंबलाई नावानेच ओळखले जाते. त्र्यंबोली किंवा टेंबलाई ही अंबाबाईची (श्री. महालक्ष्मी) बहीण मानली जाते. त्र्यंबोली ही अंबाबाईशी भांडण झाल्यामुळे शहराबाहेरील टेकडीवर जाऊन राहिली अशी समजूत आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा अंबाबाई ही त्र्यंबोलीची समजूत काढण्याकरिता जात असते. त्या दिवशी(अश्विन शुक्ल पंचमी, ललिता पंचमी - स्थानिक शब्द - कवाळ पंचमी) या घटनेचे प्रतीक म्हणून यात्रा भरविली जाते. अंबाबाईची प्रतिमा पालखीतून मिरवणुकीने गाजत वाजत नेली जाते. या मिरवणुकीत राजघराण्यातील व्यक्ती, अमीर उमराव, सरदार, मानकरी इत्यादी लोक भाग घेत असत. ही मिरवणूक खास बघण्यासारखी असे. इतर लवाजम्यात हत्ती, घोडे, वाघ, उंट इत्यादी प्राणी मोठ्या थाटात नेत असतात. त्यावेळी म्हैसूरच्या दसऱ्याची आठवण निघत असे. सध्या काहीही पहावयास मिळत नाही. नाममात्र छोटीशी मिरवणूक नेली जाते. 

 Shri Temblai Mandir, Lakshtirth Road - Temples in Kolhapur - Justdial

आषाढी एकादशी झाली की कोल्हापूर कराना वेध लागतात ते त्र्यंबुली च्या आषाढ पाण्याचे.
आषाढ महीन्याचा दुसरा पंधरवडा म्हणजे एव्हाना पावसाची दोन नक्षत्र उलटून गेलेली असतात पंचगंगा लालबुंद होऊन वाहत असते. गल्लीत मिटींग भरते एकादशी संकष्टी नसलेल्या मंगळवार शुक्रवार चा दिवस धरला जातो. मंडळाच्या बोर्डावर वर्गणीची नोटिस लागते . यात्रेच्या आदल्या रात्रीच गल्लीत पी ढबाक वाजायला लागत. पी ढबाक म्हणजे सुंद्री( बारकी सनई ) आणि डफ. पहाटे पहाटे तरूण कार्यकर्ते नदीवर जातात कावडी भरून पाणी आणतात. इकडं गल्लीच्या कोप-यावर टेंबला मरगाईच्या आणि म्हसोबाच्या नावाने दगडाला शेंदूर लागतो आणि कापूर लावून बक-याचा बळी दिला जातो . सकाळ उजाडायच्या आत त्याचे वाटे म्हणजे भाग पडतात आणि वर्गणी देणाऱ्या घरात ते पोच होतात. इकड एखाद्या घरात सार्वजनिक नैवेद्य.शिजतो .आंबिल(कढी) वडी भाकरी भाजी एक पालेभाजी शक्यतो मेथी आणि एक फळ भाजी विशेषतः वांगी दही भात असा नैवेद्य सजतो. गल्लीतल्या कवारणींचे मळवट भरले जातात. सजवलेल्या मातीच्या मोग्यात म्हणजे लहान घागरीत नदीच आणलेल पाणी भरतात . हा कार्यक्रम तरूण कार्यकर्त्यांचा पण मार्गदर्शन असत ते जेष्ठ महिलांच . परातीत दहीभात घुग-या कालवल्या जातात. गुलालाच्या उधळणीत पी ढबाक घुमायला लागतं आणि गल्लीच्या सीमावर हा कालवलेला भात शिंपडत कापूर लावत धूप घालत ही मिरवणूक त्र्यंबुली पर्यंत पोहचते. देवळाला पाच प्रदक्षिणा घालून नदीच पाणी देवीच्या पायरीवर ओतल जात नैवेद्य गाभा-यात जातो या नैवेद्यावर आठवणीन बक-याच मस्तक( कोल्हापूरी भाषेत मुंडी) पाय ठेवले जातात. इकड घराघरात वाट्याच मटण शिजत आणि गल्लीची जत्रा संपन्न होते .
हा झाला विधी पण याच कारण शोधायचा प्रयत्न केला तर लक्षात आल हा विधी आहे कृतज्ञतेचा आणि प्रार्थनेचा . कृतज्ञता नवं पाणी दिल्या बद्दल आणि प्रार्थना. या पुढही असच रक्षण कराव म्हणून . टेंबलाबाई कोल्हापूर ची रक्षक देवता तीनं आपल असच अखंड रक्षण करावं. सगळ्या पीडांचा परिहार करावा आणि हा बली घेऊन तृप्त व्हावं .( आता काही जण म्हणतील की ही देवी असून बळी कसा घेते तर करवीर माहात्म्य ग्रंथात उल्लेख आहे की कामाक्ष दैत्याने महालक्ष्मी सह सर्व देवांना बकऱ्याच रूप दिले होते म्हणून त्र्यंबुलीने कामाक्षाला शाप दिला की एक कल्प पर्यंत तुझं सगळं कुळ बकरं म्हणून जन्माला येईल आणि तुझा बळी आम्ही घेऊ) मरगाई म्हणजे महाकाली ( पहा दुर्गा सप्तशती प्राधानिक रहस्य ) तीने पावसाळ्यात होणा-या आजारांपासून रक्षण कराव यासाठी चा तसंच नदी च नवीन पाणी कृतज्ञता म्हणून सर्व देवांना अर्पण करायचा हा सोहळा कदाचित एक कारण असही असावं की पावसा मुळ उंदीर घुशी बाहेर पडतात अन्नाच्या शोधात ते घरात शिरतात त्यांच्या माग साप . दुसर हे उंदिर मरून पुन्हा साथीचे रोग पसरतात यालाच मरिआईचा फेरा म्हणत असावेतया आणि अशा दृष्टादृष्ट संकटापासून भगवतीन आपल रक्षण कराव यासाठी तिला पूजण्याचा हा सण दरवर्षी प्रमाणं असाच उत्साहात साजरा करूया पण पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि परंपरागत पद्धतीने 

#सटवाई 

आपल्या लोकजीवनात अनेक दैवतांना मानाचं स्थान असतं पण काही देवता या केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात एरव्ही त्यांचा नामोल्लेख हा कायमच उपरोधाने होतो. अशीच सर्वांच दैव लिहीणारी पण स्वतः मात्र या उपरोधाच्या बाबतीत दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई अर्थात षष्ठी ! 

षष्ठी अर्थात सटवाई ही मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंशापासून प्रगट झाली म्हणून तीचं नाव षष्ठी . ती विष्णूमाया रूपिणी आणि ब्रम्हदेवाची मानसकन्या आहे तीला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात. बाळाचं दैव लिहीणारी देवी म्हणून तीचा लौकीक आहे. मांजर हे तिचं वाहन आहे‌ जन्मानंतर पाचव्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते महाराष्ट्रात पाचव्या दिवशी संध्याकाळी तर गुजरात मध्ये सहाव्या दिवशी षष्ठी पूजन करतात. कृत्य दिवाकर ग्रंथात म्हटल्या प्रमाणे बाळाच्या जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी संध्याकाळी, रात्रीच्या पहिल्या यामी( दिवसांचा तो प्रहर रात्रीचा तो याम म्हणुन ती यामिनी) बाळाच्या बापाने सुस्नात होऊन देवता स्मरण संकल्प युक्त असा कलश मांडून त्यावर ताम्हण ठेवावे. त्यात तांदळाचे अष्टदल काढून आठ कोपऱ्यात अनुक्रमे विघ्नेश ( गणपती) जन्मदा, जिवंतिका,शस्त्रगर्भा ,स्कंद ( कार्तिक) राका , अनुमती,सिनीवाली,कुहू, वातघ्नी या देवता सुपारीवर , शस्त्रावर शिशुरक्षिणी आणि मूर्तीवर ( चांदी किंवा सोन्याची पुतळी ) यांचं आवाहन करून विघ्नेशादी आवाहित देवताभ्यो नमः असं म्हणून षोडषोपचार पूजन करावे आणि मग प्रार्थना करावी 

संपुज्य क्षेत्रस्याधिपती देवी सर्वारिष्ट विनाशिनी बलीं गृहाण मे रक्ष क्षेत्रं सूतींच बालकम् ( अर्थ या जागेची मालकीण असणारे हे देवी हा बली घे आणि या सुतिका घराचं आणि बाळाचं रक्षण कर. इथे बली 

म्हणजे उडिद घातलेला भात याला अनुसरून कोल्हापूर भागात काही ठिकाणी थेट मुंडी पाय ठेवले जातात. ) त्या नंतर या आवाहित देवांना विनंती करतात 

जननी सर्व भूतानाम् बालानाम् च विशेषतः नारायणी स्वरूपेण बालं रक्ष मे सर्वदा (अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळाला आईसारखे सांभाळणारी नारायणी स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचं रक्षण करो ). 

ग्रह भूत पिशाच्चेभ्यो डाकीनी योगिनीषुच मातेव रक्ष मे बालं श्वापदे पन्नगेषुच 

गौरीपुत्रो यथा स्कंदः शिशुत्वे रक्षितः पुरा तथा मप्याययं बाल: षष्ठिके रक्ष ते नमः

( म्ह. हे षष्ठी जसं पूर्वी तू गौरीपुत्र कार्यिकेय बाळ असताना त्याच सर्व संकटातून रक्षण केलस तसं माझ्या या बाळाचं ग्रह भूत पिशाच्च डाकिनी योगिनी जनावर साप नाग यांपासून आई सारखे रक्षण कर ) 

हा झाला शास्त्रोक्त विधी पण लोकाचारात सुतिका घर म्हणून न्हाणीत शेणाचा गोळा थापून त्यावर सटवाई चिकटवून तिची पूजा केली जाते त्यावेळी तिथे बाळाच्या नशिबात जे जे लिहावं असं वाटतं त्या वस्तू उदा पाटी पेन्सिल पेन पैसे अशा वस्तू पुजल्या जातात ( यावरूनच एखादं माणूस प्रसंग वस्तू सारखी सारखी आयुष्यात येत असेल तर पाचवीला पुजलेला असा वाक्प्रचार रूढ झाला आहे) काही घरात वरच्या आवाहित देवतांच्या प्रतिनिधी म्हणून पाच कुमारिका पूजन करून त्यांना बाळाला ओलांडून जायला सांगतात. पाचवीच्या पुड्यात असलेल्या ओवा जायफळ मुरडशेंग वावडिंग खारीक बाळंतशेप यांची पूजा करतात खरंतर ही बाळाला लागणारी रोजची औषधी गुटी आहे. बाळंतिणीला पथ पालटणी ( पथ्यात आहारात बदल)म्हणून पाच भाज्या एकत्र करून खायला घालतात. असा हा पाचवीचा सोहळा! यानंतर बाळ सव्वा महिन्याच झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात . ही सटवाई कधीही गावाबाहेर असते म्हणून एखादी महिला उच्छृंखल वागत असेल तर तिला सटवी म्हणतात. कोल्हापूरात अशी रानसटवाई हुतात्मा पार्क येथे आहे. खरंतर या बागेच नाव जुन्या कागदपत्रांत सटवाईची बाग असंच येत 

सोबत मुळगावकर यांनी रेखाटलेली सटवाई बाळाचं नशीब लिहीताना

शोध रूद्रेश्वराचा !

करवीर माहात्म्यातली कोल्हासुर वधाची कथा जवळपास सर्वच कोल्हापूरकरांना तोंड पाठ आहे. पण या कथेतली एक कडी फार कमी वेळा समोर येते ती म्हणजे कोल्हासूराचे युद्ध पहिल्यांदा भगवान शंकरांबरोबर झालं. त्याच्या युद्धकौशल्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी कोल्हासूराला वर देऊ केला. तेव्हा माझ्यामुळे देवीला हे क्षेत्र सोडून जावे लागले त्याचा तिला राग आला असेल तर तिने तो राग सोडून माझ्याशी युद्ध करावे आणि मला मुक्त करावे . असा वर कोल्हासूराने मागितला. तेव्हा शंकरांनी मध्यस्थी करून देवीला रणात आणलं अठरा हाताच दिव्य रुप धारण करून देवीने कोल्हासुराचा वध केला. या प्रसंगी तीनं दिलेलं वरदान सर्वांना माहीत आहेच. पण आज विषय आहे तो रूद्रेश्वराचा ! हा सगळा प्रसंग घडला तो सध्याच्या राजाराम ( अयोध्या) टॉकीज च्या परिसरात. आजही देशभूषण हायस्कूल च्या समोर गया मंदिर आहे. जिथे सर्व पितृदोष हरण होऊ शकतात ( त्या बद्दल पुन्हा केव्हातरी) तर करवीर माहात्म्य ग्रंथात एक आश्र्चर्य कारक उल्लेख आहे ‌. या गयेच्या दक्षिणेला देवी अठराहातांच्या असुर मर्दिनी रुपात विराजमान आहे जिचे दर्शन अपार पुण्य देते. ( ही मात्र आजही सापडली नाही) तर उत्तरेला भगवान शंकर रूद्रेश्वर नावाने विराजमान आहेत. खुप वर्षे या क्षेत्राचा मी आणि श्री उमाकांत राणिंगा शोध घेत होतो. याच कारण म्हणजे महर्षी अगस्ती या शिवलिंगाची महती सांगताना म्हणतात की १२ ज्योतिर्लिंगांच्या सह पंपा तीरावर विरूपाक्ष ( हंपी) आणि गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी शिवाने स्वत:चे अंश स्थापन केले आहे पण करवीरात मात्र स्वत: रूद्र शंकर या कोल्हासूराला दिलेल्या वरदानामुळे अखंड वास्तव्य करतात. अशा या पवित्र शिवलिंगाची जागा गो.द.पत्की प्रकाशित करवीर माहात्म्य व यात्रा प्रकाश या अक्कलकोट स्वामींचे शिष्य ब्रम्हानंद कुमार परमहंस यांनी १८८३-८७ या दरम्यान केलेल्या यात्रेवर आधारित पुस्तकात रूद्रेश्वराचे स्थान टाऊन हॉलच्या मागे कृष्णा भोसले ( वारकरी) यांच्या परसात असा उल्लेख केला आहे. शेवटी गेल्या महिन्यात या पत्त्यावर शोधत असताना टाऊन हॉलच्या मागे शनीवार पेठेत गोसावी समाजाची काही समाधी मंदिर आढळली. तिथे जायचा नक्की पत्ता म्हणजे टाऊन हॉलच्या बाजूला गंगाराम कांबळेंच्या उपहारगृहाचे स्तंभ सोडला की लगेच एक अरूंद गल्ली लागते ती शनीवारी पेठेत जाते तिथून पुढे लगेचच उजव्या बाजूला तीन मंदिर लागतात . त्यातलं एक मात्र समाधी मंदिर नाही तर रूद्रेश्वराचे लिंग आहे असा पक्का अंदाज करता येतो. दोन खणी मंदिर नंदी मंडप अशा मंदिरात यंत्राकार पिठीकेवर असणारा रूद्रेश्वर बघीतला आणि मन प्रसन्न झालं. सोबत छायाचित्र जोडल आहे.


करवीरची शाकंभरी 

आपल्या सर्वांनाच माहीत आहे. की कोल्हापूर म्हणजे आई जगदंबेच लाडकं निवासस्थान ! जग सगळ विपदांनी तळमळेल पण करवीर क्षेत्र एखाद्या निरागस बालका प्रमाणं कायम तृप्त राहतं असच काहीस झालं होतं एकदा.
कडकडीत दुष्काळ पडला. लोक तर कधीच हतबल झाले पण देवही जेरीला आले. यज्ञयागादी धर्माचरण तर कधीच लयाला गेले होते अशा परिस्थितीत एकमेव जागा सुखरूप होती ती म्हणजे कोल्हापूर. सगळे देव दानव यक्ष गण गंधर्व ऋषी मुनी जन लोक सगळेजण *क्षुधार्ता तृषार्ता जननी स्मरंती*म्हणजे तहानभूक लागली कि आईची आठवण होते तसे धावत करवीरी आले. बयेला साकड पडलं या सगळ्याना तृप्त करावं म्हणून जगदंबा लगबगीन उठली हातीच्या त्रिशूलाने पाताळातला अमृत ओघ जमिनीवर आणला. तो सुधाब्धी म्हणजे अमृताचा सागर राखण्यासाठी तीने आठ भैरव नेमले. त्यातला एक स्वतःच्या कर्तृत्वानं देवीचा लाडका क्षेत्रपाल झाला. इतकच नाही तर तीने त्याला या क्षेत्राचा कोतवाल बनवून यमाचे सर्व अधिकार;स्वतः जवळ अखंड वास्तव्य तर दिलंच शिवाय सुधाब्धीच नाव बदलून नाव दिल रंकतीर्थ अर्थात रंकाळा आणि तो भैरव म्हणजेच रंकभैरव.

तर पाण्याची सोय झाली आता अन्नाचं बघावं म्हणून मातेनं स्वतःच्या शरिरातून शाक भाज्या निर्माण केल्या शिंगणापूरच्या विशालतीर्थाच भलं मोठं स्वयंपाक घर केलं चौसष्ठ योगिनीसह स्वतः पाकसिद्धी करायला उभी राहीली. समस्त प्रजा तिच्या हातच अन्न खाऊन तृप्त झाली. खरच हेच आईच लिला कौतुक आहे. ईच्छामात्रे ब्रम्हांड घडवणारी बालकांच्या तृप्तीसाठी स्वतः अन्न निर्माण करते.
इतका वेळ शक्तीहीन झालेले असूर देवीच्या हातच अन्न खाऊन पुन्हा उन्मत्त झाले. त्यातील दुर्गमासूराचा अंत करायला भगवतीनं दुर्गारूप घेतलं. आजही जगदंबा महालक्ष्मी शाकंभरी नावानं पण चतुर्भुजा दुर्गा रूपात आजही रंकाळ्याच्या पश्चिमेला चंबुखडी टेकडीच्या पायथ्याला विराजमान आहे.

*वेताळ* 
साक्षात शिवाचा तमोगुण अंश म्हणजे वेताळ तो भूतगणांचा अधिपती. श्री देवांना औरस संतती होणार नाही असा पार्वतीचा शाप आहे. पण भैरवाला पार्वतीचा पुत्र व्हायचे होते म्हणून शिव पार्वतीने *करवीरात*तारा आणि चंद्रशेखर नावाने अवतार घेतला. त्यांच्या उदरी कालभैरव आणि वेतालभैरवाचा जन्म झाला हाच वेताळ करवीरात शहराच्या पश्चिमेला राहून शहराचे रक्षण करतो . शिवाजी पेठेतील वेताळ माळावर वेताळाचे स्वयंभू मूर्ती स्थान आहे. त्याला करवीर माहात्म्यात अग्निजिव्ह असे नाव आहे. हाच वेताळ मूर्ती रूपात करवीर निवासिनीच्या दाराच रक्षण करायला पितळी उंब-याच्या डावी कडे उभा आहे . त्यालाच आपण विजय म्हणून ओळखतो. करवीर माहात्म्यात *काल वेतालकौ महाबली* असा या मूर्तींचा उल्लेख आहे. वेताळ हा भूत गणांचा अधिपती सर्व तामसी तत्वांवर त्याचा अधिकार चालतो .कोकण आणि गोवा भागात वेतोबा नावाने त्याची चालुक्य काळापासून पूजा होते. अनेक गावांचा वेतोबा ग्रामदैवत आहे. चार फूटांहून उंच हातात खड्ग आणि पानपात्र घेतलेला वेतोबा पाहीला की आपोआपच आदरयुक्त भिती वाटते. अनेक ठिकाणी त्याला मोठे कातडी चपला अर्पण केल्या जातात. त्या घालून वेताळ गावाभोवती गस्त घालतो असे म्हणतात.

कुमार कार्तिकेयाचे दर्शन

शिवलीलांमधला सगळ्यात रम्य भाग म्हणजे कुमार कार्तिकेयाचा जन्म माता सतीने देहत्याग केला. भगवान शंकर आपल्या सृष्टी कर्मातून बाजूला होऊन आत्म समाधीमध्ये लीन झाले.त्यांना पुन्हा सृष्टीकार्यात आणण्यासाठी शक्तीच्या पुन्हा अवतार घेण्याची आवश्यकता पडली. म्हणून एक अनोखा प्रसंग घडला ब्रह्मदेवांनी तारकासुर नावाच्या दैत्याला एक वरदान दिले की तुझा वर शिवपुत्रा च्या हातून होईल या वरदानाचा प्रभाव म्हणून तारकासुर उन्मत्त झाला. कारण भगवान शिव आत्मानंदामध्ये लीन होते तर त्यांच्या शक्तीचा अवतार झाला नव्हता मग देवांच्या विनंतीवरून आदिशक्तीने हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्म घेतला. तपाचरण करून कठोर परिक्षेनंतर माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी झाली खरी पण दोघेही सदासर्वकाळ एकमेकाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून गेले त्यामुळे शिवपुत्रा चा जन्म दृष्टिक्षेपात येईना म्हणून मग एके दिवशी समस्त देव अग्नीला समोर ठेवून भगवान शंकरांच्या दारात आर्त हाक घालू लागले असही म्हणतात की परमप्रतापी भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र उद्या आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून इंद्र विकल्प भावनेने शंकरांच्या द्वारी उभा राहिला माता पार्वतीला सोडून भगवान देवाच्या भेटीला आले त्यांनी स्वतःच सगळं तेज अग्नीच्या ओंजळीत टाकले शिवाचं तेज धारण करून लज्जित झालेल्या अग्नी त्यने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केले गंगा मातेने ते तेज स्वतःच्या उदरात वाढवले म्हणून तो गांगेय नंतर कोणे एकेकाळी सहा कृतिका गंगेत स्नान आल्या गंगेने त्या तेजाचे सहा भाग करून सहा जणींच्या उदरात ठेवले कालांतराने लोकापवाद नको म्हणून त्यांनी जन्म दिलेल्या सहा पुत्रांना एकत्र करून कुठेतरी ठेवण्याचा निर्णय घेतला त्या क्षणी तो पुत्र एकाकार होऊन त्यांने 6 मुखे बारा हाताचे रूप घेऊन एकाकार झाला कृतिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय अशा कार्तिकेयाला कृत्तिकांना शरकांडा मध्ये काही संदर्भाने दर्भाच्या वनात सोडून दिले आकाश मार्गाने जाणाऱ्या पार्वतीने त्याचे रडणे ऐकून त्याला उचलून घेतले त्याला पोटाशी धरताच स्वतःचे स्तन्य पाजून तिने त्या पुत्राचे पोषण केले शरकांडामध्ये सापडला म्हणून त्याला शर्वणभव असेसुद्धा म्हणतात कार्तिकेय आपलाच पुत्र आहे हे लक्षात आल्यावर पार्वतीने त्याला स्वतःच्या सगळ्या शक्ती दिल्या ती शक्ती मूर्तिमंत रूपाने स्वामीच्या हातातला भाला म्हणून ओळखली जाते .यथा काळी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला आता मातेला स्वतःच्या पुत्राच्या लग्नाची घाई झाली .सूनमुख पाहायला आतुर पार्वतीने कार्तिकेयाला लग्नाची गळ घातली .पण स्त्री कशी असते या प्रश्नाचे उत्तर मातेने माझ्या सारखी असे म्हणताच समस्त स्त्रिया मला तुझ्या स्वरूपात आहेत म्हणून मी लग्न करणार नाही असा निश्चय कार्तिकेयिन केला तो निश्चय करताच कार्तिकेयाला कुमारस्वामी असे नाव मिळाले ही घटना कोल्हापुरातील कपिलतीर्था शेजारी घडली इथे कार्तिकेयाचे कुमार स्वामी नावाचे मंदिर होते माता अधिकच आग्रह करताच कोणतीही स्त्री माझे दर्शन करेल तर ती विधवा होईल अशी शापवाणी उच्चारून कार्तिकेय दक्षिणेला मोरावर बसून निघाले त्यांच्या मोराच्या घामापासून मयुरी नावाची नदी झाली तोच दुधाळी नाला हा दुधाळी नाला जिथे पंचगंगेला मिळतो तिथे कार्तिकेयाचे मयूर स्वामी नावाचे मंदिर होते यानंतर कार्तिकेय प्रयागा मध्ये जाऊन दार म्हणजे कपाट लावून बसले म्हणून त्यांना कपाट स्वामी असे नाव मिळाले आजही प्रयागात कार्तिकेयाचे सहा मुख आणि बारा हात असलेली मूर्ती असणारे मंदिर आहे. इथेही पार्वती येईल हे जाणून कार्तिकेय दक्षिणेला गेले तिथे माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी वारंवार समजूत घातल्याने विवाहाला तयार होऊन इंद्रकन्या देवसेना आणि वनकन्या वल्ली यांच्याशी विवाह केला कार्तिकेयाचे ब्रह्मचर्य हे फक्त महाराष्ट्रातील परंपरांमध्ये उल्लेखित असल्याने महाराष्ट्रात स्त्रिया जिथे एकट्या कार्तिकेयाचे मंदिर असेल तेथे दर्शन करत नाहीत याउलट शिवपंचायतन म्हणजे गौरी गणपती शंकर आणि नंदी यांच्या बरोबर असलेल्या कार्तिकेयाचे कायम दर्शन घेता येते कारण इथे कुमार प्रधान देव नाही कार्तिकेयाचा जन्म कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना झाला म्हणून या दिवशी माझे दर्शन घेणारा तो स्त्री असो वा पुरुष सात जन्म धनधान्य विद्या यांनी संपन्न होईल असा वर दिला म्हणून कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असताना महाराष्ट्रात स्त्रियादेखील कार्तिकेयाचे दर्शन करतात काही लोक कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांची सांगड घालतात वास्तविक श्लोकाप्रमाणे पौर्णिमेचा उल्लेख नसून फक्त कृतिका नक्षत्र आणि कार्तिक महिना यांचा उल्लेख आहे त्यामुळे कृतिका नक्षत्र पौर्णिमा सोडून जरी आले तरी कार्तिक महिना असल्याने तो दर्शनाचा योग समजावा.कुमार स्वामिनी स्त्रियांना शाप देण्यामागे त्याचा स्त्रीद्वेष हे कारण नसून आपला कधी विवाह होऊ नये ही भावना होती त्यामुळे निष्काम भावनेने पार्वतीपुत्र म्हणून स्नेहाने त्याचे दर्शन घेणाऱ्या स्त्रीला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही शेवटी परमदयाळू मातापित्यांचा तो एक लडिवाळ पुत्र आहे जसे ते दोघे भक्तीला भुलतात तसाच तोही भक्ती लाच भुलतो हे ध्यानात घ्यावे इतकच .     

कथा एका अलक्षित नृसिंहाची

आज वैशाख शुद्ध चतुर्दशी कोल्हापूर शहरात असलेल्या जवळपास 11-12 नृसिंह मंदिरात अतिशय उत्साहात नृसिंहाचा प्रकट दिन साजरा होईल पण यासगळ्यात कोल्हापूर करांनी अभिमानानं जिथं नृसिंहाच प्रागट्य साजर करावं तिथं मात्र काहीच नसेल. हे नृसिंह क्षेत्र म्हणजे जयप्रभा स्टुडियो जवळच पद्मावती मंदिर!
तुम्ही म्हणाल मंदिर तर पद्मावतीचं मग नृसिंहाचा काय संबंध?
पण करवीर माहात्म्य उघडा आपोआप हा संबंध सापडेल.
प्रल्हादाची निष्ठा खरी करायला भक्तवत्सल नारायण कोरड्या खांबातून प्रगटले.जी जागा लक्ष्मीला नाही ती जागा म्हणजे दोन्ही मांडीवर आडवं घेऊन करूणाघन नरहरीनं हिरण्यकश्यपूला असलेल्या वरदानाचा मान राखत त्याचा वध केला.भक्ताचा अवमान पाहून खवळलेल्या नरशार्दूलाला पाहून लक्ष्मी ती मागे फिरली पण बाळ प्रल्हादानं देवाला शांत केलं. ही गोष्ट आपण सगळेच जाणतो. पण हा प्रल्हाद मोठा झाला. जस वय वाढलं तसा मनात एक सल वाढला आपल्या पित्याच्या मृत्यूच कारण आपणच आहोत. नारदांच्या सल्ल्यानं या पापातून मुक्त होण्यासाठी प्रल्हाद महाराज करवीरात आले. पद्माळा तीर्थाच्या तीरावर तप करायला लागला.तप पूर्ण झालं भगवती जगदंबा महालक्ष्मी स्वतः प्रगट होऊन म्हणाली वत्सा प्रल्हादा वर माग ! प्रल्हाद म्हणाला माते माझ आराध्य रूप तू नाहीस भगवान नृसिंह आहेत. देवी म्हणाली बाळा हे क्षेत्र माझं मी सर्वस्याद्य शक्ती! इथं सर्व देवता माझ्यातच समाविष्ट आहेत. तू निष्पाप आहेस जे झालं त्यात तुझा दोष नाही. तू एक निमित्तमात्र! तुझ्या सारख्या हरीभक्ताला कर्मलेप लागत नाही. तरीही लोकांना शिक्षण म्हणून गंडकी नदीचे बारा गाडे शालीग्राम या पद्मालय तीर्थात टाक ! आणि तुझ्या मनातली शंका काढायला मी तुझ इष्ट नृसिंह रूप दाखवते. त्याक्षणी जगदंबा स्वतः नरसिंह रूपात प्रगटली. या घटनेची स्मृती म्हणून तिथे नृसिंहाचा तांदळा आणि प्रल्हादेश्वर शिवलिंग आजही पहायला मिळते.
या खेरीज नृसिंहाची करवीरातली इतर मंदिरे.-
1 महाद्वाराच्या बाजूला
2दशावतार ओवरीत
3काशीविश्वेश्वराच्या दारात स्तंभावर योगनृसिंह
हे तिन्ही महालक्ष्मी मंदिरात
4 पापाची तिकटी
5कपिलतीर्थ
6 लिमये पुस्तकालय समोर न्यू महाद्वार रोड
7 कमलजा नृसिंह बलभीम बॅकेजवळ
8 रंकाळा स्टॅन्ड ते गुजरी रस्ता
9 जुना बुधवार पेठेत
10 कोळेकर तिकटी
11 मिरजकर तिकटी  


करवीरच्या आठ दिशांना असलेली ही शिवलिंग म्हणजे करवीरची सर्वात बाहेरची सीमा रेषा आज पासून आपण यांचं अक्षरमय दर्शन करू.

कपिलेश्वर :-

फार कमी लोकांना कोल्हापूर चं ग्रामदैवत माहीत आहे. सर्वसामान्यपणे लोक करवीरनिवासिनी महालक्ष्मीलाच ग्रामदैवत समजतात पण कोल्हापूर चं ग्रामदैवत महालक्ष्मी नसून भगवान कपिलेश्वर आहेत. हे कपिलेश्वर लिंग ज्यांच्या तपसामर्थ्याची स्मृती म्हणून स्थापित झाले ते महर्षी कपिल म्हणजे कर्दम आणि अनुभुती चे पुत्र, अनुसया मातेचे बंधू , दत्तगुरूंचे मामा आणि नारायणाच्या २४ अवतारापैकी पाचवा अवतार.
या कपिल मुनींनी आपल्या मातेच गुरुपद घेऊन तिला आपल्या सिद्धांताची दिक्षा दिली. एरव्ही आई मुलांची गुरू असते पण आईनं मुलांचं शिष्यत्व पत्करले ही उलटी गंगा फक्त या कोल्हापूरातच.
या महर्षी कपिलांनी मांडलेला सिद्धांत म्हणजे सांख्य तत्वज्ञान.हे विश्र्व प्रकृती आणि पुरुष यांच्या मुळे घडते.तर आत्मा मन बुद्धी चित्त अहंकार ५ ज्ञानेंद्रिय ५ कर्मेंद्रिय ५महाभूते ५ तन्मात्रा ( रस रुप शब्द गंध स्पर्श) या २५ तत्त्वांनी ते साकार झाले आहे असे तत्वज्ञान मांडणारा हा सिद्धांत. या दिर्घ चिंतनामुळेच कपिल मुनींना सिद्ध असे नाव मिळाले. श्रीमद्भगवद्गीतेतही सिद्धानाम् कपिलो मुनी असा उल्लेख आहे ‌. तर अशा सिद्ध कपिल मुनींच्या सांख्य तत्वज्ञानाची स्मृती जपणारं महालिंग म्हणजे सिद्ध सांख्येश्वर ! आजही हे लिंग कोल्हापूर पासून नैऋत्येला ४२ किमीवर असणाऱ्या संकेश्वरमध्ये हिरण्यकेशी नदीच्या तीरावर शंकराचार्य मठात सुंदर मंदिरात विराजमान आहे. इथले लोक त्याला शंकरलिंग म्हणून ओळखतात. दरवर्षी रथसप्तमी वेळी भव्य लाकडी रथातून शंकरलिंगाचा रथोत्सव संपन्न होत असतो.

कपिलेश्‍वर म्हणजे कोल्हापूरचे ग्रामदैवत

आज जेथे कपिलतीर्थ मार्केट आहे ते पुर्वीचे कपिलतीर्थ तळे. या तळ्याच्या काठावर कपिलेश्‍वराचे मंदिर. कपिलेश्‍वर म्हणजे कोल्हापूरचे ग्रामदैवत. जो काही धार्मिक निर्णय घ्यायचा तो या कपिलेश्‍वराच्या साक्षीने एवढे त्याचे महत्व. पण कपिलतीर्थ तळे मुजवले. आता मंदिर आहे. पण त्याचे तत्कालिन महत्व नव्या पिढीला माहितच नाही. अशी परिस्थिती आहे. कपिलेश्‍वर खरोखर होता की नाही हे माहित नाही. पण कोल्हापूरचा इतिहास भुगोल शोधताना, अभ्यासताना ही मंदिरे अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कोल्हापूर परिसराला धार्मिक सांस्कृतिक प्राचिॆन परंपरा आहे. अनेक जुनी मंदिरे किंवा त्यांचे अवशेष बदलत्या काळाच्या ओघातही...

विरभद्रेश्वर
सती दाक्षायणीने आपला देह योगाग्नीत भस्म केला (काही लोक तीने यज्ञ कुंडात उडी घेतली असे म्हणतात पण सतीला शास्त्र माहीत होते. यज्ञीय अग्नीत इतर काही जाळणे हे शास्त्र विरूद्ध आहे ) हे ऐकून कोपायमान झालेल्या शंकरांनी आपल्या जटेतून विरभद्र आणि भद्रकाली ला प्रगट केले. ते दोघे प्रचंड शिवसैन्य घेऊन दक्षाच्या यज्ञाजवळ आले. दोघांच्या पराक्रमाने उपस्थितांची पळापळ झाली. सगळी मोडतोड करून विरभद्र दक्षाजवळ पोहोचला त्यान हातातल्या तलवारीने दक्षाचे मस्तक तोडले आणि ते यज्ञकुंडात टाकले( आता इथं विरभद्राने मुद्दाम ही कृती केली कारण ज्याच्या उपस्थितीत माता पित्याचा अपमान झाला तो अग्नी देखील दोषी आहे असं मानून त्याने प्रजापतीचे मस्तक कुंडात टाकले). हा सगळा आकांत सुरू असताना भगवान शंकर तिथे आले सतीचा जळालेल्या अवस्थेतील देह बघून त्यांना शोक अनावर झाला. तीचे कलेवर घेऊन ते संपूर्ण विश्वात फिरू लागले त्यावेळी त्यांना भानावर आणायला विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे ५१ भाग केले. ते भाग जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठ निर्माण झाले. भगवान शिवाच्या कोपाची जागा आता शोकाने घेतली इकडं वीरभद्राचा आवेश ही शांत झाला. देवांच्या विनंती वरुन प्रजापतीला बकऱ्या च मस्तक जोडून सजिव केले. भगवान शंकर कृष्णा नदीच्या ऐलतीरावर कोपेश्वर नावाने खिद्रापूर गावात राहीले. तर वीरभद्र नंदी भद्रकाली सह पैलतीरावर यडूर गावात राहीले. आजही आपण याच वीरभद्रासाठी लग्नाकार्यात घुग्गुळ काढतो. असा हा वीरभद्रेश्वर कोल्हापूर पासून ८३ किमीवर यडूर ता. चिक्कोडी येथे विराजमान आहे.

अमरेश्वर मंदिर :-

अमरेश्वर कोल्हापूर च्या पूर्वेला ५० कीमी वर सोपं करून सांगायचं तर नृसिंहवाडी च्या पैलतीरावर ( वाडीत औरवाड पूल प्रसिद्ध आहे) औरवाड नावाचं गाव आहे.त्याच मूळ नाव अमरापुर. तर या अमरापुरात अष्टमहालिंगापैकी एक अमरेश्वर विराजमान आहे. अमर म्हणजे देव. अमृत प्राशना मुळे सर्व देव अमर झाले म्हणून त्यांना अमर म्हणतात.करवीरात ब्रम्ह देव आयोजित यज्ञासाठी उपस्थित देवतांची तपस्थली म्हणजे अमरेश्वर. याच ठिकाणी श्रीगुरूंची सेवा करणाऱ्या ६४योगिनी निवास करतात. त्यांचं प्रतिक म्हणून अमरेश्वराच्या गाभाऱ्याच्या मागे आठ योगिनींच शिल्प आहे. गाभाऱ्यात श्री अमरेश्वरासह दत्त पादुका स्थापित आहेत. गंमत म्हणजे या औरवाड गावाचा उल्लेख गुरूचरित्रात आहे. इथल्याच विप्राच्या दारातला घेवड्याचा वेल तोडून विप्राला धन दिले पण विशेष म्हणजे करवीर माहात्म्य ग्रंथात शिरोळ किंवा वाडीचा इतकंच नाही तर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा देखिल उल्लेख नाही. आज देखील औरवाडचा परिचय देताना वाडी शेजारच गाव असा करून द्यावा लागतो कारण नृसिंहवाडी किंवा नृसिंह वाटिका ही वस्तीच मूळात श्री गुरूंच्या वास्तव्यामुळे तयार झाली. गुरुंचा देहावर असण्याचा काळ हा इ.स १३७८ ते १४५९ मानला जातो. त्यामुळे करवीर माहात्म्य (संस्कृत, कारण त्याच दाजी जोशीराव कृत मराठी भाषांतर हे १७व्या शतकातले असल्याचा उल्लेख ग्रंथातच आहे.) हा ग्रंथ १२ व्या शतकातला आहे हे अभ्यासक ग.वा. तगारे यांनी शिवाजी विद्यापीठ प्रकाशित करवीर माहात्म्य ( संस्कृत ) या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ‌केलेले विधान समर्पक असल्याचे जाणवते. अशा या प्राचिन अमरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून श्री दत्त अमरेश्वर देव संस्थान या नावाने ओळखले जाते 
कर्दमेश्‍वर महादेव : -
 वांगी बोळातून कपिलतीर्थ मंडईकडे जाताना आराध्ये यांचा वाडा लागतो. या वाड्याच्या मागे किमान दहा ते बारा फूट खाली एक माणूस कसाबसा जाऊ शकेल एवढीच चिंचोळी वाट आहे. ही वाट उतरून गेले की खाली एक मंदिर लागते. हे कर्दमेश्‍वर महादेवाचे मंदिर किती प्राचीन आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. याच रस्त्याने पुढे मुनिश्‍वर वाड्याच्या छोट्या बोळात वळले की वळणावळणाचा रस्ता थेट महादेव मंदिरासमोरच घेऊन जातो. जोशीरावांचे हे मंदिरही रस्त्यापासून खोलातच. या मंदिराजवळ दिंडे पाटलांच्या घराच्या मागे असाच जेमतेम एक माणूस खाली उतरेल एवढीच पायऱ्यांची वाट. चार-पाच पायऱ्या उतरले की पाणी आणि उजव्या हाताला भिंतीतच एक अरुंद वाट तेथेही शिवलिंग...पूर्वी चारुदत्त वाड्याची जेथे गाडी थांबत होती, त्याच्यामागे एक बोळ. या बोळाच्या टोकाला भवानी शंकर मंदिर. या मंदिरातील शिवलिंगही जमिनीपासून आठ-दहा फूट खोलातच. तेथेही पाणी. तेथे तर पाण्याच्या वरचेवर उपसा करण्यासाठी मंदिरातच एक मोटर (पंप) बसवली आहे. ही चार महादेव मंदिरे म्हणजे केवळ चार उदाहरणे.
 वांगी बोळातल्या आराध्येच्या वाड्यातील कर्दमेश्‍वराची रचना तर खूप वेगळी आहे. २०१९ च्या पावसाळ्यात पाच वेळा या मंदिरात जमिनीतून पाण्याचे उमाळे फुटुन पाणी आले. हेमंत आराध्ये व त्यांचे कुटुंबीय एक प्राचिन धार्मक ठेवा म्हणून मंदिर जपतात. त्याची माहिती इतरांना देतात. 

महाद्वार रोडला लागून जोतिबा रोड म्हणजे मोठ्या वर्दळीचा रोड. किंबहुना महाद्वार रोड इतकेच महत्त्व या रोडला आहे. या रोडवरून घाटी दरवाज्याकडे निघाले की आपल्याला पटणारही नाही उजव्या हाताला रस्त्याखाली दहा-बारा फुटावर महादेवाची मंदिरे आहेत. राधेशाम मंगल कार्यालय व माऊली लॉज परिसरात अशी रस्त्याखाली दोन प्राचीन महादेव मंदिरे आहेत. विशेष हे की त्यांची नित्य पूजा आहे.

उत्तरेश्‍वर पेठ हा जुन्या कोल्हापूरचा महत्वाचा भाग

याशिवाय खोल खंडोबा या नावातच हे मंदिर खोल जागेत असल्याचे स्पष्ट आहे. बुरूड गल्लीजवळ असलेले हे मंदिर कोल्हापूरकरांनी पहाणेच गरजेचे आहे. कारण जमिनीपासून २५ ते ३० फूट खाली खोलात शिवलिंग आहे. आत मंदिराचे दगडी खांब आहेत. कोल्हापूरचा सर्वांत जुना परिसर म्हणून खोलखंडोबा हा परिसर आहे. त्यामुळे तत्कालीन कोल्हापूरच्या प्राचीनत्वाचे अवशेष या मंदिराच्या माध्यमातून खुले आहेत.
याशिवाय गुजरी, भेंडे गल्ली (पेडणेकर), सोमेश्‍वर गल्ली, हत्तीमहाल रोड, सिद्धाळा सोमेश्‍वर, कपिलतीर्थ सांगावकर वाडा, मिणचेकर वाडा, जोशी वाडा देवहुतीश्‍वर, इंद्रेश्‍वर, सूर्येश्‍वर, रोहिडेश्‍वर, जासुद गल्ली, पद्माळा, टाऊन हॉल कुकुटेश्‍वर, सद्रेश्‍वर पंचगंगा, फलगुलेश्‍वर विल्सन पूल, लक्षतीर्थ, फुलेवाडी, रावणेश्‍वर शाहू स्टेडियम अशी महादेव मंदिरे आहेत. त्याचे धार्मिक महत्त्व ज्याच्या-त्याच्या श्रद्धेवर आहे. पण, ही जुन्या कोल्हापूरची रचना पेठापेठांत विभागली आहे. त्यापैकी उत्तरेश्‍वर पेठ हा जुन्या कोल्हापूरचा महत्वाचा भाग. या पेठेत महादेवाचे प्राचिन मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग जिल्ह्यातले सर्वांत मोठे शिवलिंग आहे. एका व्यक्तीच्या कवेत बसणार नाही एवढा मोठा त्या शिवलिंगाचा व्यास आहे. धार्मिकतेबरोबरच या मंदिराला व्यायाम व कुस्तीची परंपरा आहे. हे मंदिर व वाद्याची तालीम म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

एवढेच काय या मंदिराला भजन संगीताचाही परंपरा आहे. दर सोमवारी रात्री या मंदिरात भजन होते. भजन एवढे सुरेल की या भजनाला ठिकठिकाणी आंमत्रित केले जाते. न्यायमुर्ती गोविंद महादेव रानडे व या मंदिराचे नाते खूप वेगळे. ते या मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होते. हे मंदिर म्हणजे आता केवळ धार्मिक नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व क्रीडा घडामोडीचा केंद्रबिंदू उत्तरेश्‍वर महादेव आहे. शिवलिंग इतके मोठे व सुंदर आहे की कोल्हापूरकरांनी किंवा कोल्हापूरच्या नव्या पिढीने ते एकदा येऊन पहाणेच गरजेचे आहे.

जयंती व गोमतीचा संगम

जयंती व गोमती या कोल्हापूरातून वाहणाऱ्या एकेकाळच्या स्वच्छ खळाळत्या पाण्याच्या दोन नद्या. 
कात्यायनी, कळंबा, पाचगाव परिसरातून उगम पावणाऱ्या या नद्यात सांडपाणी मिसळत गेले व त्यांचे रूपांतर जयंती व गोमती नाल्यात झाले. जयंती व गोमती हे नाले नव्हते तर स्वच्छ पाण्याचे प्रवाह होते. याचे पुरावे त्यांच्या काठावर असलेल्या छोट्या छोट्या महादेव मंदिरावरून मिळतात. कारण मंदिरे कोणी सांडपाण्याच्या नाल्याच्या काठावर बांधत नाही. ते स्वच्छ पाण्याच्या काठावर बांधतात. जयंती व गोमतीचा संगम गोखले कॉलेजच्या पिछाडीस हुतात्मा पार्काजवळ होतो. बरोबर त्या ठिकाणी महादेव मंदिर आहे. पुढे शेळके पुलाजवळ महादेव मंदिर आहे. त्यापुढे विल्सन पुलावर फलगुलेश्‍वर महादेव मंदिर व जेथे जयंती पंचगंगेचा संगम आहे तेथेही महादेव मंदिर आहे.
लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, रावणेश्‍वर, वरूणतीर्थ, कुंभार तळे, कुकुटेश्‍वर (टाऊन हॉल), कपिलतीर्थ, रंकाळा, जयंती नदी अशा सर्व पाण्याच्या ठिकाणी महादेव मंदिरे आहेत. लक्षतीर्थ तलाव फुलेवाडीजवळ आहे. तोफेचा माळ असे पुर्वीचे नाव असलेल्या या माळावर अका बाजूला स्वच्छ पाण्याचे लक्षतीर्थ तळे आहे. या तळ्याच्या काठावर दगडी घाट व काठावर जुन्या वृक्षांच्या छायेत लक्षतीर्थ महादेव मंदिर आहे.

रावणेश्‍वर महादेव

 

आजचे कोल्‍हापूर हे पूवीच्या सहा खेड्‍यांनी बनले असून, त्‍यातील एका खेड्‍याचे नाव म्‍हणजे रावणेश्वर. करवीर महात्‍म्‍यात देखील याच कारणाने याला राक्षसालय असे नाव मिळाले असावे. या खेड्‍याची ग्रामदेवता मुक्‍तांबिका तर भैरव आणि काळभैरव हे क्षेत्रपाल असून रावणेश्वर हा गावचा महादेव होता. या तळ्‍यातील अनेक भाग सीता, मारुती व त्रिजटा यांच्या नावाने तसाच राहीला.

आरंभी साध्या लोखंडी छत्री खाली असणार्‍या देवालयाचा जिर्णोध्दार १९९४ साली झाला आणि त्‍याठिकाणी शिवलिंगाच्या आकाराचे नवे मंदिर बांधण्यात आले. सन २०१३ मध्ये शिखर चढवण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी कर्नाटकातील कसबी कारागिरांच्या हातून एक एक शिल्‍पकृती साकारली गेली त्‍यांचा आपण थोडक्‍यात परिचय करून घेऊ.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दारावरती आपणास शिवशंकराची ध्यानस्‍थ मूर्ती पाहावयास मिळते, नंदी व मोर यांच्या शिल्‍पांनी अलंकृत अशा या प्रवेशव्दारातून आत येताणाच मंदिराच्या संरक्षक भिंतीवरती आपणास बारा ज्‍योतिर्लिगांची उठाव शिल्‍पे पहावयास मिळतात. ही शिल्‍पे पहात येतानाच दोन स्‍तंभावरती शृंगी आणि भृंगी हे दोन शिवगण दिसतात. विशेष म्‍हणजे हे त्रिपाद (३ पायांचे ) असून यातील कुठलाही एक पाय झाकला असता उरलेल्‍या दोन नृत्‍यमुद्रा दिसतात. यातील श्रृंगीच्या हातात कर ताल तर भृंगीच्या हातात वीणा आहे. या शिवगणांचे दर्शन घेत आपण मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ येतो. तीर्थ दाराच्या दोन बाजूला काचेमध्ये आपणास उजवीकडे वीरभद्राचे तर डावीकडे भैरवाचे चित्र दिसते. 

पुढे येताच कोपर्‍यात असणार्‍या गंगा व गौरी यांच्या आकर्षक मुर्ती लक्ष वेधून घेतात. लगतच्या भिंतीवर भगवान रावणेश्वराकडे मुख करून नमस्‍कार केलेली त्रिजटा पहावयास मिळते. सीतामाई अशोक वनात असता तिने प्राणपणाने त्‍यांचे रक्षण केले म्‍हणून प्रभू रामचंद्रांनी तिला वरदान दिले की, कार्तिक महिण्याचे स्‍नान संपल्यावरदेखील लोक ३ दिवस जास्‍त तुझे नावाने स्‍नान करतील. अशा या त्रिजटेचे अपवादात्‍मक तीर्थ या करवीरी होते. त्‍याची आठवण म्‍हणून हे शिल्‍प स्‍थापन केले आहे. 

त्रिजटे पुढे नंदी व त्‍यापुढे गर्भागाराच्या उजवीकडे श्रीमारूती तर डावीकडे श्रीगजानन विराजमान असून गाभार्‍यात रावणेश्वर महाराज पुर्वाभिमुख असून शिवलिंगाची नाळ उत्‍तरेला आहे. दक्षिणेच्या रामेश्वराप्रमाणेच चौकोणी पिठीकेत देवाचे लिंग आहे. 

महादेवाचे दर्शन घेवून गाभार्‍यातून बाहेर पडताच वर  महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणूकामाता व सप्तशृंगी या साडेतीन शक्‍तीपीठ देवतांच्या प्रतिमा त्‍यांच्या स्‍तुतीमंत्रासहीत आहेत.मंदिरात अमरनाथ गुंफाची व हिमलिंगाची प्रतिकृती व तेथेच देव लक्ष्मणेश्वर आणि गणेशाचे आपणास दर्शन होते. 

या मंदिराचे वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे शिवनिर्माल्‍य कुठेही ओलांडले जात नाही. मात्र येथे श्रीलिंगाजवळ चंडेश गणाची स्‍थापना केल्‍याने निर्माल्‍य दोष नाहीसा झाला असून, त्‍यामुळे मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. या मंदिराचे अधिक लक्ष वेधणारे वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे याचे शिखर, या शिखराच्या पूर्वेस भगवान महादेव, गौरी-गणपती, स्‍कंद (कार्तिक) यांच्या समवेत सहपरिवार वात्‍सल्‍यरूपात आहेत. अशा शिल्‍पवैभवांनी समृध्द असणारे असे हे श्रीरावणेश्वर मंदिर भाविकांच्या श्रध्देचे असून, पर्यटकांच्या आकर्षनाचे केंद्र बनले आहे. 

सध्याच्या शाहू स्टेडीयमच्या जागी पूर्वी रावणेश्‍वर तलाव होता. या तलावात रावणेश्‍वर महादेवाचे मंदिर होते. तलावातील या मंदिराची प्रतिष्ठापना पुढे साठमारी परिसरात करण्यात आली. काही वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. या मंदिराचे वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे हे मंदिर महादेवाच्या शिवलिंगाच्या आकाराचे बनवले आहे. 

तसेच मंदिराच्या परिसरात देवी देवतांच्या आकर्षक मुर्ती, हिमालय, नंदी, मोर तसेच भारतातील बारा जोतिर्लिगांच्या प्रतिमा भिंतित साकारण्यात आल्‍या आहेत. सुंदर कलाकुसर आणि त्‍यावर आकर्षक विद्‍युत रोषनाईमुळे या मंदिराला नवे रुप प्राप्त झाले आहे. रावणेश्‍वर मंदिर हे प्राचिन शिवालयांपैकी असल्याने याठिकाणी भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.

रावणेश्‍वर महादेव म्हणजे आताचे शाहू स्टेडियम. या स्टेडियमच्या मुळ जागेवर रावणेश्‍वर तलाव होता. पाण्याने तुडुंब भरलेला होता. तलावात मध्ये रावणेश्‍वर महादेवाला जायची वाट होती. तेथे छोटेखानी मंदिर होते. काळाच्या ओघात तलाव बुजवला गेला. रावणेश्‍वराचे मंदिर काठावर आणून पुन्हा बांधण्यात आले तलावाच्या जागी शाहू स्टेडियम उभे राहिले. आता फुटबॉल स्पर्धेच्या वेळी मैदान गर्दीने तुडुंब भरते. तर काठावर रावणेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची रांग  लागलेली असते.

ऋणमुक्तेश्‍वर महादेव ​

कुंभार तळे म्‍हणजे गंगावेशीतले शाहू उद्यान. तळे बुजवून तेथे उद्यान तयार करण्यात आले. त्याच्यासमोरच ऋणमुक्तेश्‍वराचे मंदिर आहे. हा ऋणमुक्तेश्‍वर महादेव व त्याचे मंदिर म्हणजे कोल्हापुरातल्या असंख्य लग्नसमारंभाचा साक्षीदार. त्या काळात कोल्हापुरात मंगल कार्यालये, हॉलची सोय नव्हती. लग्न समारंभ दारात मांडव उभा करूनच करावे लागत होते. पण तेही अनेकांना परवडणारे नव्हते. त्यामुळे ऋणमुक्तेश्‍वर मंदिराचा हॉल सर्वांना अगदी अल्प शुल्क भरून किंवा केवळ एक नारळ पान सुपारी घेऊन लग्नासाठी उपलब्ध करून दिला होता. एकावेळी चार-चार पाच-पाच लग्न समारंभ तेथे होत होते. एक प्रकारे ते त्या काळातील सामुदायिक विवाह समारंभच होते. ऋणमुक्तेश्‍वर मंदिरात असे असंख्य विवाह ऋणमुक्तेश्‍वर महादेवाच्या साक्षीने झाले. 

कुकुटेश्‍वर महादेव

टाऊन हॉल म्हणजे कोल्हापूरचे निसर्ग वैभव. या उद्यानातले प्रत्येक झाड औषधी वनस्पतीचा गुणधर्म असणारे आहे. अशा झाडांच्या सावलीत या उद्यानात कुकुटेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागे पूर्व एक मोडी विहीर होती. या विहिरीला मोठा जिवंत झराही होता. त्यामुळे कुकुटेश्‍वर विहीर कायम भरलेली असायची. पण, निसर्गाने भरूभरून दिलेल्या या विहिरीत आज पूर्णपणे कचरा आहे. काठावर कुकुटेश्‍वराचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून दिल्याची कोनशिला मंदिरावर आहे. 

इंद्रेश्‍वर महादेव

महाद्वार रोडवरच कामत हॉटेलच्या शेजारी इंद्रेश्‍वर महादेव आहे. काळाच्या ओघात या मंदिरातले शिवलिंग वेगळ्या जागी ठेवले असावे. कारण एका टेलरिंगच्या दुकानातच हे शिवलिंग आहे. भेंडे गल्लीत पेडणेकर यांच्या घराच्या परड्यातच एक प्राचीन महादेव मंदिर आहे. आता भेंडे गल्ली म्हणजे सोन्या चांदीच्या मोठ्या आर्थिक उलाढालीची गल्ली आहे. पण, पूर्वी ही गल्ली कशी होती याची साक्षच हे मंदिर आजही देते. 

करवीर नगरीतील प्राचीन शिवालये

Responsive image

कोल्हापूर : प्रिया सरीकर

आई अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या करवीरनगरीत अनेक प्राचीन शिवालये आहेत. यातील अनेक मंदिरांचा संदर्भ करवीर महात्म्यातही आहे. परिसरातील तलाव, तीर्थ, कुंड आणि त्यांच्या धार्मिक महत्त्वातून या शिवालयांची नावे पडली आहेत. याशिवाय क्षेत्र रक्षणाची जबाबदारी  बजावणार्‍या महाद्वार लिंग आणि अष्टमहालिंग म्हणून प्रचलित असलेली शिवस्थाने आहेत. कोल्हापूर शहरामध्ये लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, वरुणतीर्थ, रावणेश्‍वर, काशीविश्‍वेश्‍वर, अरिबलेश्‍वर, सोमेश्‍वर, ऋणमुक्‍तेश्‍वर, वटेश्‍वर, चंद्रेश्‍वर, सूर्येश्‍वर, उत्तरेश्‍वर, बाळेश्‍वर अशी अनेक प्राचीन महादेव मंदिरे आहेत. शहराच्या चारी दिशांना वसलेल्या तलावाच्या काठी तसेच शहराच्या मध्यावर अनेक ठिकाणी ही मंदिरे आहेत. अनेक मंदिरांचा 

जिर्णोद्धार करण्यात आला आहे. तर आजही अनेक मंदिरे आपले प्राचीन सौंदर्य टिकवून आहेत. महाशिवरात्रीनिमित्त यापैकी काही मंदिरांचा अल्पपरिचय... ग्रामदैवत कपिलेश्‍वर, वरुणतीर्थ आणि लक्षतीर्थ महादेव तळ्यांचे शहर म्हणूनही परिचित असलेल्या कोल्हापुरात अनेक ठिकाणे पाणथळांच्या नावांनी वसली आहेत. या तळ्यांच्या काठी हमखास प्राचीन महादेवाची मंदिरे पाहायला मिळतात. कपिलतीर्थही या तिर्थांपैकीच एक कपिलतिर्थाच्याकाठी कपिलेश्‍वराचे मंदिर आहे. कालांतराने कपिलतीर्थ उरले नसले तरी कपिलेश्‍वराचे अस्तित्व याठिकाणी कायम आहे. कपिलेश्‍वराचे हेमाडपंथी मंदिर आजही कोल्हापूरचे ग्रामदैवत मानले जाते. सध्याचे गांधी मैदान म्हणजे वरुणतीर्थ. वरुणराजाने तपश्‍चर्या करून प्राप्त केलेले तीर्थ म्हणूनही याची ख्याती आहे.

याठिकाणीही वरुणतीर्थ महादेवाचे लहानसे मंदिर आहे. अंबाबाई मंदिरात श्री अतिबलेश्‍वराचे मंदिर आहे. तर ब्रम्हेश्‍वर बाग परिसरात ब्रम्हेश्‍वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. शहरातून फुलेवाडीकडे जाताना लक्षतीर्थ महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथील शिवलिंग चौकोनी आहे.  रावणेश्‍वर महादेव : सध्याच्या शाहू स्टेडियमच्या जागी पूर्वी रावणेश्‍वर तलाव होता. या तलावातील मंदिर म्हणजे रावणेश्‍वर महादेवाचे मंदिर. तलावातील या मंदिराची प्रतिष्ठापना पुढे साठमारी परिसरात करण्यात आली. चार वर्षांपूर्वी मंदिराचा  जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराला नवे रूप प्राप्त झाले आहे. रावणेश्‍वर मंदिर प्राचीन शिवालयांपैकी असल्याने याठिकाणी भक्‍तांची दर्शनासाठी गर्दी असते. 

सर्वेश्‍वर महादेव :

 पंचगंगेच्या काठी असणारे महादेव मंदिर म्हणजे सर्वेश्‍वर महादेव मंदिर. शिवाजी पुलाच्या बाजूला पंचगंगा स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस सर्वेश्‍वराचे छोटे पण सुंदर मंदिर आहे. सर्वेश्‍वर महादेवाचे दर्शन घेतल्याने करवीर क्षेत्रातील सर्व देवदेवतांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते, असा पुराण ग्रंथात उल्लेख आहे. मंदिरात मोठाले शिवलिंग आहे. या मंदिरानजीकच उग्रेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. उग्रेश्‍वर महादेवाला स्मशानभूमीतील महादेव म्हणूनही ओळखले जाते. 

शिव-पार्वतीचे सोमेश्‍वर मंदिर :

 पंचगंगा नदीच्या मार्गावरच एका गल्लीमध्ये सोमेश्‍वराचे मंदिर आहे. मंदिरात शिवलिंग आणि नंदीसोबत पार्वतीचीही आकर्षक मूर्ती आहे. सोमेश्‍वर मंदिराच्या मूळ दगडी बांधकामावर संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. सखलात कोरीव दगडी शिवलिंग आणि त्यामागे हाती तलवार, त्रिशूल आणि कुंकवाचा करंडा घेतलेली पार्वतीची मूर्ती आहे. करवीर महात्म्यात या मंदिराचा उल्लेख असून उमा (पार्वती) व ईश्‍वर म्हणजे उमेसह ईश्‍वर म्हणजेच सोमेश्‍वर असा त्याचा नामोल्लेख केला जातो. 

पेटाळ्यातील शंभू महादेव :

 पूर्वीचा पेटाळा तलाव आणि सध्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. भक्‍कम दगडी आणि उंच पायावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. शिवलिंग, नंदी, गणेश यासह विविध मूर्ती शिल्पे या मंदिरासमोर आहेत. काही वर्षांपूर्वी  काळ्या पाषाणातील मंदिरालाही संगमरवराने झाकण्यात आले आहे. बाळेश्‍वर महादेव :  पंचगंगा नदीकाठी सन 1597 च्या सुमारास करवीर पीठाच्या शंकराचार्य मठाची उभारणी झाली. मठाच्या मागील बाजूस असलेल्या मस्कुती तलाव परिसरात बाळेश्‍वर मंदिर आहे. हेमाडपंथी पद्धतीच्या या मंदिरात शिवलिंग, नंदीची मूर्ती अत्यंत देखणी आहे. मंदिर परिसरात गणेश व मारुतीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मागे द्वादशकोणी विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या असून विहीर दगडी बांधकामानी बंदिस्त आहे.

नंदीशिवाय चंद्रेश्‍वर आणि नंदी महादेव मंदिर : 

महादेव मंदिराची रचना म्हणजे साधारणत: गाभार्‍यात शिवलिंग आणि गाभार्‍याबाहेर नंदी अशी पाहायला मिळते; पण याला छेद देणारीही काही मंदिरे कोल्हापूर शहरात पाहायला मिळतात. शिवाजी पेठेतील चंद्रेश्‍वर महादेव मंदिर नंदीशिवाय पाहायला मिळते. तर शेजारीच म्हणजे मर्दानी खेळाच्या आखाड्यालगत नंदी महादेव मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गाभार्‍याबाहेर शिवलिंग असलेले पाहायला मिळते. भारतात मद्रास येथे असे मंदिर असल्याचे सांगितले जाते. शिवाजी पेठेत चंद्रेश्‍वर गल्लीत चंद्रेश्‍वर महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही; पण इथला नंदी म्हणजेच नंदी महादेव मंदिरातील नंदी असल्याचे लोक सांगतात.

पाचगाव येथील पांचालेश्‍वर मंदिर

येथील पांचालेश्‍वर मंदिर पुरातन असून त्याची नोंद करवीर महात्म्य या ग्रंथात आढळते. महाभारतातील पाच पांडव येथे वास्त्यव्यास असताना त्यांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची अख्यायिका आहे. यावरूनच पाचगाव हे नाव या गावाला मिळाले आहे, असे ज्येष्ठ जाणकार नागरिक सांगतात. महाशिवरात्रीला मंदिराची सजावट मोठ्या थाटामाटात करून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
 

बालिंगेचे जागृत देवस्थान श्री महादेव

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर रस्त्यालगत असणारे बालिंगे  (ता. करवीर) येथील महादेव मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून उदयास आले आहे. हे मंदिर महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उभारले आहे. तरुणांच्या प्रयत्नातून साकारलेले हे मंदिर आजच्या तरुणांपुढे एक आदर्श आहे.  बालिंगे-दोनवडे गावच्या सीमेवर असलेल्या रिव्हज पूल तयार करण्याचे काम सुरू असताना पायखुदाईवेळी कारागिरांना एका भल्या मोठ्या दगडावर महादेवाचे लिंग आढळून आले, तसेच बालिंगे गावाच्या नावातच लिंग हा शब्द असल्याने यामध्ये केवळ योगायोग नाही तर काही साधर्म्य असावे, अशी धारणा झाली आणि लिंगाची प्रतिष्ठापना केली हा पूल पूर्ण होईपर्यंत कामगार त्याची दररोज पूजा करत असत पूल पूर्ण झाला मात्र येथील लोकांची भक्‍ती कायम राहिली. प्रतिष्ठापना केलेले लिंग ओढ्यावर असू नये म्हणून त्यावेळच्या लोकांनी एक मंदिरवजा वास्तू या लिंगावर बांधली.

मंदिर उभारणी केल्यावर येथील तरुणांनी एकत्र येऊन 10 मे 1983 साली महादेव तरुण मंडळाची स्थापना केली 2007 साली या मंडळाने रौप्यमहोत्सव साजरा केला. महादेवावर असलेली भक्‍ती आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्‍तांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागल्या, अशी धारणा तरुणांची झाली आणि मंदिर सुशोभित करण्याचा सर्वांनी निर्धार केला. दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी येथे अभिषेक घालण्यात येतो. ही प्रथा मंडळाच्या पुढच्या पिढीने आजही जपली आहे. देवाची पूजाअर्चा नित्यनेमाने बाळासाहेब अतिग्रे हे करतात. बालिंगे, दोनवडे, नागदेववाडी, साबळेवाडी, खुपिरे, वाकरे आदी परिसरात या मंदिराची ख्याती आहे. येथील अनेक भक्‍त येथे दर्शनासाठी येतात.

 नारायण गडकरी :  हेमाडपंथी वैजनाथ मंदिर; भक्‍ती अन् पर्यटनाचा संगम

 डोंगरात वसलेल्या वैजनाथ मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. विरंगुळा म्हणून भक्‍ती आणि पर्यटन या भूमिकेतून पर्यटकांची वाढ झाली आहे.  वैजनाथ मंदिर बेळगावपासून केवळ 18 कि. मी. आणि चंदगडपासून 28 कि. मी. अंतरावर आहे. देवरवाडी ते वैजनाथ 2 कि. मी. चा मोठा चढ आहे. तर वैजनाथ-महिपाळगड पासूनचा खाली सुंडी पर्यंत 5 कि. मी.चा मोठा उतार आहे. वाढत्या पर्यटकांच्या  द‍ृष्टिकोनातून या परिसराचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. या पर्यटनस्थळाला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळाला असला तरी अद्यापही याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

दक्षिण भारतातील ‘होयसळ’ राजवटीच्या सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी या प्रदेशावर दाक्षिणात्य होयसळ या राजाची राजवट होती. त्यादरम्यान वैजनाथ आरगम्मा देऊळ हे संयुक्‍त मंदिर बांधण्यात आले होते. देवळाच्या वरच्या बाजूच्या तिर्थातून ओसंडणारे पाणी दोन्ही देवळांच्या मधून वाहत होते. त्या जागी कालांतराने आदिलशाही राजवटीत कमानीचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच 500 वर्षांपूर्वी मुस्लिम राज्यकर्त्यांकरवी ‘अग्यारी’ धर्मशाळा बांधण्यात आली आहे.

हे या मंदिराचे मोठे वैशिष्ट्य आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे झर्‍याचे ठिकाण ‘गायमुख’ पर्यंत वाट केल्यास या प्राचीन जलस्त्रोताचे दर्शन घेता येते. त्याच प्रमाणे गावाजवळचे दक्षिणाभिमूख गणेश मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकंदरीत हा परिसर डोंगरात उंच ठिकाणी असल्याने अतिशय विलोभनीय द‍ृष्य या डोंगरावरून न्याहाळता येते. चंदगड, सातवणे, कोवाड, गंधर्वगड, येथेही महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी होते.

कोल्हापूरातील श्री नृसिंहाचे पुराणप्रसिद्ध पण दुर्लक्षित स्थान :-

 श्रीमहालक्ष्मी व श्री नृसिंह यांची एक अनोखी लिला साकार झालेल स्थान असलेल्या पदूमाळा तीर्थाचा मात्र भक्तांना विसर पडला आहे.कृत युगात नृसिंह रूप घेऊन नारायणांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. या अवतार धारणाला कारण ठरला तो हिरण्यकश्यपू चा मुलगा भक्तराज प्रल्हाद . भगवान नृसिंहानी प्रल्हादाला दैत्यराज करून पाताळाचे राज्य दिले. प्रल्हादासारख्या सोज्वळ हरीभक्ताला हा सल मात्र कायम राहीला की आपल्या पित्याच्या मृत्यू ला आपण कारण ठरलो या करता प्रल्हाद नारदमुनींच्या सल्ल्याने सर्वपापविमोचन अशा करवीरात आला . येथील पद्मावती देवी जवळ त्याने तप सुरू केले. त्याच्या तपावर प्रसन्न होऊन श्री करवीर निवासिनी प्रगट झाली. तिला पाहताच प्रल्हाद म्हणाला की मी भगवान नृसिंहाचे तप करतो आहे तेव्हा महालक्ष्मी म्हणाली वत्सा मी स्वयमेव आदिशक्ती असून या क्षेत्रात मी स्वामिनी आहे इथे सर्व देव माझ्याच रूपात विलीन आहेत तरी तुझी नृसिंह भक्ती जाणून मी तुला या रूपात दर्शन देते. असे बोलून देवी नृसिंह रूपात प्रगट झाली व प्रल्हादाला म्हणाली पुत्रा तू गंगे प्रमाणे पवित्र व निष्पाप आहेस तुझ्या पित्याचा वध हे विधिलिखित होत त्यात तुझा दोष नाही तरिही या पद्मतीर्थात 12 गाडे शालीग्राम आणून घाल म्हणजे इतर जनाचा उध्दार होईल. त्याप्रमाणे प्रल्हादाने पद्माळा तळ्यात शाळीग्राम अर्पण केले. आजही पद्मावती मंदिराच्या मंडपात श्रीनृसिंहाचा तांदळा प्रल्हादेश्वर लिंग म्हणजे त्याची तपस्थलि पहावयास मिळतो.  

लक्षतीर्थ महादेव मंदिर

कोल्‍हापूर शहरातून फुलेवाडीकडे जाताना लक्षतीर्थ महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर लक्षतीर्थ नावाच्या तळ्‍याच्या ठिकाणी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील शिवलिंग चौकोनी आकाराचे आहे. मंदिर छोटेसे असले तरी, या मंदिराचा निसर्गरम्य परिसर आणि लक्षतीर्थ तळ्‍याचे शांत पाणी, यामुळे या मंदिराचा परिसर रमणीय आहे.

उत्तरेश्‍वर महादेव

करवीर महात्म्यात उत्तरेश्‍वर महादेव मंदिराचा उल्‍लेख आहे. कोल्हापुरातील जुन्या वसाहतींपैकी एक म्हणजे उत्तरेश्‍वर होय. हे मंदिर तत्कालिन वसाहतीच्या उत्तरेला वसल्याने त्याला उत्तरेश्‍वर महादेव असे नाव देण्यात आले. मंदिराचे वैशिष्ट म्हणजे आकाराने भव्य असलेले शिवलिंग होय. साधारणत: चार ते पाच फुट उंच आणि आकाराने भव्य असलेल्या या शिवलिंगाला पाहण्यासाठी अनेक लोक मंदिरात येतात. मंदिरात गणपती आणि 11 मारुती असलेली वैशिष्टपूर्ण मूर्ती आहे. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीदिवशी या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते

सर्वेश्‍वर महादेव

पंचगंगेच्या काठी असणारे महादेव मंदिर म्हणजे सर्वेश्‍वर महादेव मंदिर. शिवाजी पुलाच्या बाजूला पंचगंगा स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस सर्वेश्‍वराचे छोटे पण सुंदर मंदिर आहे. सर्वेश्‍वर महादेवाचे दर्शन घेतल्याने करवीर क्षेत्रातील सर्व देवदेवतांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते असा पुराण ग्रंथात उल्लेख आहे. मंदिरात मोठे शिवलिंग आहे. या मंदिरानजीकच उग्रेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. उग्रेश्‍वर महादेवाला स्मशानभूमीतील महादेव म्हणूनही ओळखले जाते. 

वरुणतीर्थ महादेव मंदिर.....

सध्याचे गांधी मैदान म्हणजे वरुणतिर्थ. वरुणराजाने तपश्‍चर्या करुन प्राप्त केलेले तिर्थ म्हणूनही याची ख्याती आहे. याठिकानीही वरुणतीर्थ महादेवाचे लहानसे मंदिर आहे. 

बाळेश्‍वर महादेव 

पंचगंगा नदीकाठी सन 1597 च्या सुमारास करवीर पीठाच्या शंकराचार्य मठाची उभारणी झाली. मठाच्या मागील बाजूस असलेल्या मस्कुती तलाव परिसरात बाळेश्‍वर मंदिर आहे. हेमाडपंथी पध्दतीच्या या मंदिरात शिवलिंग, नंदीची मूर्ती अत्यंत देखणी आहे.

शिवपार्वतीचे सोमेश्‍वर मंदिर

पंचगंगा नदीच्या मार्गावरच एका गल्लीमध्ये सोमेश्‍वराचे मंदिर आहे. मंदिरात शिवलिंग आणि नंदी सोबत पार्वतीचीही आकर्षक मूर्ती आहे. सोमेश्‍वर मंदिराच्या मुळ दगडी बांधकामावर संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. सखलात कोरीव दगडी शिवलिंग आणि त्यामागे हाती तलवार, त्रिशूल आणि कुंकवाचा करंडा घेतलेली पार्वतीची मूर्ती आहे. करवीर महात्म्यात या मंदिराचा उल्लेख असून उमा (पार्वती) व ईश्‍वर म्हणजे उमेसह ईश्‍वर म्हणजेच सोमेश्‍वर असा त्याचा नामोल्लेख केला जातो. 

पेटाळ्यातील शंभू महादेव 

पूर्वीचा पेटाळा तलाव आणि सध्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. भक्कम दगडी आणि उंच पायावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. शिवलिंग, नंदी, गणेश यासह विविध मूर्ती शिल्पे या मंदिरासमोर आहेत. काही वर्षापूर्वी  काळ्या पाषाणातील मंदिरालाही संगमरवराने झाकण्यात आले आहे. 

नंदी शिवाय चंद्रेश्‍वर आणि नंदी महादेव मंदिर

महादेव मंदिराची रचना म्हणजे साधारणत: गाभार्‍यात शिवलिंग आणि गाभार्‍याबाहेर नंदी अशी पहायला मिळते. पण याला छेद देणारीही काही मंदिरे कोल्हापूर शहरात पहायला मिळतात. शिवाजी पेठेतील चंद्रेश्‍वर महादेव मंदिर नंदीशिवाय पहायला मिळते. तर शेजारीच म्हणजे मर्दानी खेळाच्या आखाड्यालगत नंदी महादेव  मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, गाभार्‍याबाहेर शिवलिंग असलेले पहायला मिळते. भारतात मद्रास येथे असे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. शिवाजी पेठेत चंद्रेश्‍वर गल्लीत चंद्रेश्‍वर महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही. पण इथला नंदी म्हणजेच नंदी महादेव मंदिरातील नंदी असल्याचे लोक सांगतात.

श्री अतिबलेश्‍वराचे मंदिर.....

अंबाबाई मंदिरात श्री अतिबलेश्‍वराचे मंदिर आहे. तर ब्रम्हेश्‍वर बाग परिसरात ब्रम्हेश्‍वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे.

 हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक - बाबुजमाल दर्गा

महालक्ष्मी मंदिरापासून काही अंतरावर ताराबाई रस्त्यावर असलेल्या पार्किगच्या जागेजवळ हा कोल्हापुरातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दग्र्याचे बांधकाम कोल्हापुरात जेंव्हा प्रथम मुस्लीम आले त्या काळात झाल्याचा अंदाज आहे. हा दर्गा शहरातील सर्व हिंदू मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान आहे. मोठय़ा संख्येने मुस्लिमांबरोबरच हिंदू लोकही श्रद्धेने या दग्र्याच्या दर्शनासाठी येतात. मोहरम सणामध्ये येथील पीर व पंजे हे एक मोठे आकर्षण असते. 

दग्र्यामध्ये जाण्यासाठी एक मोठे प्रवेशद्वार असून त्याचा वरील भाग काढून टाकण्यात आलेला आहे. दग्र्यासभोवती असलेल्या मोकळ्य़ा जागेत छोटय़ा छोटय़ा इमारती आहेत. येथे पूर्वी एखादे हिंदू मंदिरही असावे. मुख्य दर्गा मध्यभागी असून हा नेहमीच्या मुस्लीम पद्धतीचा आहे. मध्यभागी मोठा घुमट असून चारही बाजूला लहान घुमट आहेत. या दग्र्यास मुस्लीम रूढीप्रमाणे संपूर्ण पांढरा रंग देण्यात आला आहे. या दग्र्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या दग्र्याच्या चौकटीवर कोरण्यात आलेली गणपतीची मूर्ती होय. या दग्र्याचा उरूस मोठय़ा उत्साहात साजरा होतो.

 शिवाजी विद्यापीठ

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बोलके व्यासपीठ म्हणजे, कोल्हापूर! १९६३ या सालात दिवंगत माननीय श्री. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्यामधे पुढाकार घेतला. हया विद्यापीठाच्या सीमांतर्गत, सांगली, सातारा आणि सोलापूर यांचा समावेश होतो. 

१००० एकराच्या प्रशस्त वास्तुचे हे विद्यापीठ म्हणजे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आघाडीवरील एक लक्षणीय घोडदौड आहे. प्रमुख कार्यालयाच्या बरोबरीने बॅ. कर्देकर ग्रंथालय, मानव्यशाखा इमारत, जीवशास्त्र इमारत, सांस्कृतिक सभागृह तसेच महिला व पुरूष विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल हे सारे दिमाखदारपणे उभे आहे. पदवीदान समारंभाकरिता एक खास सभागृह आहे. 

Shivaji University 

 मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हे नयनरम्य दृष्य होय. नानाविध झाडे, वेली, फुले, फळझाडे यांनी विद्यापीठाचे आवार हिरवेगार आहे. एस्. एस्. सी. परिक्षेसाठी दरवर्षी १,२५,००० विद्यार्थी इथे दाखल होतात. हया परिक्षा सुकर होण्यासाठी, लेखा विभाग, स्टोर कंट्रोल आणि निधी विभाग हे व्यवस्थापनातील भाग कार्यरत असतात. कुलपती, कुलगुरू, विद्यार्थी प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी इ. हया व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात.



वि. स. खांडेकर कलादालन


ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पहिले मराठी लेखक व थोर साहित्यीक श्री. वि. स. खांडेकर यांची स्मृती जपणारे एक भव्य कलादालन आपण आवर्जून पहावे असेच आहे. 

कोल्हापुर जिल्हयाचे पर्यटन :-

 कोल्हापुर शहरातील बहुतेक सर्व पर्यटनस्थळांचा आढावा घेतल्यानंतर आपण बाहेर पडुया कोल्हापुर जिल्ह्याच्या भटकंतीला. आधी उत्तर मग पश्चिम, नंतर दक्षिण विभाग आणि शेवटी जाउया उगवतीकडे म्हणजे पुर्व विभागात.

उत्तर विभागः-

 वारणा नदीने सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्याची सीमारेषा आखली आहे.सहाजिकच उत्तरेकडे फार कमी परिसर येतो. यामध्ये समर्थस्थापित दोन मारुती तसेच रामलिंग डोंगर आणि नवीनच आकर्षण असलेला चिन्मय गणेश हे आहेतच शिवाय मन रिझवायला या परिसरात दोन वॉटर स्पोर्टसचा आनंद देणारे रिसॉर्ट देखील आहेत.

ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क :-

 ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क हे २००० साली कोल्हापुरात कसबा बावड्याच्या परिसरात सुरु झाले.सध्या हे रिसॉर्ट शेट्टी-नायडू ग्रुप चालवितो. कसबा बावड्याच्या मेन रोडवर डि.एस.पी. ऑफीसजवळ हे रिसॉर्ट आहे. कोल्हापुरातील एतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना भेट देउन झाली की धमाल करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.तसेच कुटूंबीय आणि मित्रमंडळी यांच्यासोबत आउटींगसाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. ईथे फॅमिली राईड, स्पीड राईड,ड्रॅगॉन राईड, ट्युब राईड आणि हॉर्स राईड असे पर्याय आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळ आहेत. याशिवाय पाण्यात निवांत पहुडण्यासाठी जलतरण तलाव आहे. शिवाय मस्तीच्या मुडमध्ये धमाल करायला रेन डान्स देखील आहे.







   ईतके झाल्यावर भुक तर लागणारच. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. वॉटर पार्कमध्येच जंगल ढाबा आहे.त्यात चायनिज्,पंजाबी,महाराष्ट्रीयन्,दाक्षिणात्य अश्या सर्व तर्हेचे  जेवण मिळते.
पत्ता :- मेन रोड, एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा, कोल्हापुर, ४१६००३
भेट देण्याचा उत्तम कालावधी:- ऑक्टोबर ते मे
वेळः- सकाळी १० ते रात्री १०
दरपत्रकः-
 650 per person Adult (Full day Package)
600 per person 8-12 years (Full day Package)
530 per person 4-8 years (Full day Package)
590 per person Adult (Morning Package)
540 per person 8-12 years (Morning Package)
470 per person 4-8 years (Morning Package)
590 per person Adult (Afternoon Package)
540 per person 8-12 years (Afternoon Package)
470 per person 4-8 years (Afternoon Package)
700 per person Adult (Evening Package -1 Time 02:00 Pm to 09:00 PM)
640 per person 8-12 Years (Evening Package -1 Time 02:00 Pm to 09:00 PM)
580 per person 4-8 Years (Evening Package -1 Time 02:00 Pm to 09:00 PM)
550 per person Adult (Evening Package -2 Time 04:00 Pm to 09:00 PM)
500 per person 8-12 Years (Evening Package -2 Time 04:00 Pm to 09:00 PM)
430 per person 4-8 Years (Evening Package -2 Time 04:00 Pm to 09:00 PM)
संपर्क क्रमांकः- 07947249425
वेबसाईटः-  www.dreamworldkolhapur.co..

 गंधर्व फार्म अँड रिसॉर्ट

पुण्याकडून कोल्हापुरला अशियायी महामार्ग ४७ वरुन निघाले कि कोल्हापुर शहराच्या अलिकडे टोप संभापुर गावाच्या हद्दीत गंधर्व फार्म अँड रिसॉर्ट आहे. कोल्हापुरकडे जाताना डाव्या हाताला गणपतीची प्रचंड मुर्ती महामार्गावरुन दिसते,याला चिन्मय गणेश म्हणतात.या गणपतीच्या शेजारी हे वॉटर पार्क आहे.
    गंधर्व फार्म अँड रिसॉर्ट हे १९९८ ला सुरु झाले. या ठिकाणी अम्युझमेंट पार्क्,कॉन्फरन्स हॉल ( २०० व्यक्तींसाठी )पार्टी लॉन आणि ५० व्यक्तींसाठी छोटा कॉन्फरन्स हॉल आहे.



व्हर्टीकल अ‍ॅडव्हेंचर पार्क :-

व्हर्टीकल अ‍ॅडव्हेंचर पार्क पन्हाळा हे जेउर गावाच्या हद्दीत मसाई पठाराच्या पायथ्याला आहे. वन खात्याने हे पार्क उभारले आहे. पन्हाळा आणि कोल्हापुर हे पर्यटन केंद्र म्हणून पुढे यावे यासाठी याची उभारणी झाली आहे.या ठिकाणी पर्यटक अनेक साहसी खेळ खेळु शकतात.या पार्कच्या उभारणीमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. '
      एतिहासिक पन्हाळ्याला पर्यटक आणि दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत असतात.त्यांची साहसी क्रिडाप्रकाराचा आनंद घेण्याची हौस पुरी व्हावी यासाठी २०१८ मध्ये व्हर्टीकल अ‍ॅडव्हेंचर पार्कची उभारंणी झाली. परिसरातील वातावरण आल्हादायक आणि घनदाट वनश्रीने बहरलेले आहे. ज्यांना नवीन काही करुन बघायचे आहे त्यांनी या पार्कला भेट दिलीच पाहिजे.पन्हाळ्यावर रहाण्यासाठी लॉज आहेत शिवाय या पार्कच्या परिसरात रहायचे असेल तर तंबुमध्ये निवासाचा आनंद घेता येईल. 











    साधारण एक हेक्टर परिसरात हे पार्क मसाई पठार आणि जेउर गावाच्या हद्दीत पसरलेले आहे. ईथे ८०० फुट झीप लाईन्,क्लाइंबिंग्,रॅपलिंग, ९ अडथळ्याचा रोप वॉल इत्यादी खेळ आहेत.

PackagePrice (12+)Price (<12)Zip Line Bungee ActionHigh Rope CourseRappellingSports ClimbingSlack LineJummeringBronzeRs. 650Vertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkSilverRs. 800Vertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkGoldRs. 1300Rs. 1100Vertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkPlatinumRs. 1500Rs. 1300Vertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure ParkVertical Adventure Park

https://www.verticaladventurepark.com/

अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाईटला भेट देता येईल
संपर्क क्रमांक ( हेच व्हॉटस अ‍ॅप क्रमांक आहेत )
 8981818080
 7588594070
 9767101947
 9422044107

ज्योतिबा :-

    दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा, श्री कात्यायनी देवी, नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र, त्याचप्रमाणे विशाळगड दर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लोकिक त्रिखंडात झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरास अलोकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे. या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्नचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक एैश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.जोतिबा मंदिर हे कोल्हापुरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जर आपण कोल्हापूर मधील मंदिरांना भेटी देनार  असाल तर श्री जोतिबा मंदिर आपल्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे.
  स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका : 
डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून, सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९% लोक गुरव समाजाचे आहेत. देवताकृत्य तसेच नारळ, गुलाल व मेवामिठाईची दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.
जोतिबा मूर्ती
         याला ‘केदारनाथ’ आणि ‘वाडी रत्नागिरी’ ही देखील दोन नावे आहेत. माता महालक्ष्मीच्या दानवांबरोबर झालेल्या युध्दामधे जोतिबाने तिला मदत केली आशी आख्यायिका पुरांणांमधे सापडते. हया डोंगरावरती त्याने आपले राज्य स्थापन केले. नाथ पंथीयांचे हे विख्यात दैवत आहे.वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी. वर आहे. सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच जोतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे.
श्री जोतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच जोतिबा किंवा केदारनाथ ! जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा जोतिबा !
          पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यानी तपश्चर्या करून बद्रिनाथांना संतुष्ट केले. बद्रिनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुध्द षष्ठीच्या मुहूर्तावर स्वत: आठ वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रिनाथांची प्राणज्योती ! म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती, त्याप्रमाणे तिच्या आंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली, तेच जोतिबाचे रूप होय. श्री जोतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका प्रिय ! त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे.ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते
कथा
      ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.

 मुख्य मंदिर आणि शिखर
मंदिराचा पूर्वेतिहास:
ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.     
 श्री जोतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. मूळ मंदीर कराड जवळच्या किवळ येथील रावजी नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे जे देवालय आहे ते इ. स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या बेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.
    दुसरे केदारेश्वराचे देवालय. विशेष म्हणचे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे. हे मंदीर इ,स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पटांबा म्हणजेच चोपडाईचे देवालय आहे. इ.स. १७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. या तीन देवळांचा एक गट होतो. चौथे सामाश्वरीचे देवालय. हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले.
ज्योतिबाच्या मंदिराची रचना :-
    देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.
 jotiba
ज्योतिबाची मूर्ती
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.
 
 जत्रा आणि सासनकाठी
उत्सव
ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरश: फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात. या मध्ये पहिला सासनकाठीचा मान निनाम गावाचा असतो. या पाडळी (निनाम) गावाचे भक्त १०० कीलो मीटर हून जास्त अंतर म्हणजे रत्नागिरीवाडी ते पाडळी (निनाम) या गावी ५ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन त्यांच्या गावी यात्रेदिवशी भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देतात. सासनंकाठीचा रत्नागिरीवाडी ते पाडळी (निनाम) हा प्रवास सुरु असतांना सासन काठीचे वजन ३०० किलो हुन जास्त असते. जोतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे.
 डोंगरावर जाणारा रस्ता
   ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. भक्तिरसाने न्हाऊन निघालेल्या या ओव्या व लोकगीते ज्योतिबाच्या प्रती बहुजनांची उमटलेली स्पंदने आहेत. चैत्री पौर्णिमेच्या सोहळ्यांत भक्तांच्या ओठांतून शब्द फुटतात.
‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा
चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’
       ज्योतिबाचा जन्मदिवस हा रविवार असल्यामुळे रविवारी भाविकांची खूप गर्दी असते. रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवसांमध्ये गर्दी असल्याने शक्यतो आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी जाणे टाळा.

कसे जाल ? :
     कोल्हापूर एसटी स्टॅन्ड पासून जोतिबा ला जाणाऱ्या अनेक बस आहेत. या बस तुम्हाला डोंगरावर अगदी पायथाशी घेऊन जातात. स्टॅन्ड पासून सहा आसनी शेअर रिक्षा देखील आहेत. डोंगरावर मुबलक पार्किंगची सोय आहे.
पार्किंग पासून मंदिराकडे जाताना लागणारी दुकाने
    पार्किंग पासून मुख्य मंदिराकडे जाताना वाटेत अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये  धान्य , कापड , तांबे पितळेची भांडी , पूजा साहित्य, मेवा - मिठाई , खेळणी अश्या अनेक वस्तू आहेत. नवविवाहित जोडपी लग्नानंतर या मंदिरात भेट देतात. नवविवाहीत जोडप्यांमध्ये चांगले संबंध रहावेत आणि सुखी संसार व्हावा यासाठी हि प्रथा आहे.
कर्नाटक , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातून भक्त या ठिकाणी येत असतात. 
मसाई पठार :-









पोहाळे लेणी
 कोल्हापुरला आलेल्या प्रत्येक पर्यट्काचा उद्देश हा ज्याप्रमाणे आई अंबाबाईचे दर्शन हा असतो. त्यानंतर त्याची आपसुक पावले श्री श्रेत्र जोतिबाकडे वळतात. जोतिबा म्हणजेच वाडी रत्नागिरीला आपण वडणगे, कुशिरे मार्गाने जोतिबाकडे जाताना जोतिबाच्या पायथ्याशी पोहाळे गावाच्या माथ्याशी पोहाळे लेणी कोल्हापुर पासुन 15 कि.मी. अंतरावर आहेत. रस्तालगतच खाली काही अंतर चालुन गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत पोहाळे लेण्याचे दर्शन होते.

    आपण पोहाळे लेण्याजवळ पोहचतो ही लेणी देखील गजपृष्ठकार असुन अलंकृत नाही यामुळे ती हिनयान पंथीय असावी याची ओळख पटते. आपल्या डावीकडे पाण्याची पोडी (कुंड) दिसतात.  डोंगरातुन वाहत येणारे पाणी साठवण्याची तसेच पाण्याचा निचरा होऊन वास्तु सुस्थितीत राहण्याची ही नेटकी व्यवस्था आहे. येथे वरील बाजुने प्रणाल (पन्हळ) असुन तिचे पाणी या पोडींमध्ये येते. लेण्यांमध्ये सुरुवातीस पोडी त्यानंतर आपल्याला तीन गुहा /लेण्या दिसतात. त्यानंतर आपण चैत्यगृहात येतो. गाभा-यात स्तुप आहे; त्यासमोर सध्या शंकराची पिंड व समोर नंदी आहे. तथापि मागील स्तुप त्यावरील हर्मिका तुटली आहे मात्र स्तुपाच्या वरील बाजुच्या छतावरुन तेथे हर्मिका असावी असे वाटते. नेहमीप्रमाणे याही लेण्याचे ब्राम्हणी लेण्यात संस्करण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

त्याच्या बाजुस विहार आहे हा प्रशस्त असुन 35*32*9 इतका आहे तो स्तंभावर पेलला आहे.  यावरील एका स्तंभावर चंद्र, सुर्य, घोडा कोरणेत आला आहे. त्याच्या बाजुस चिंतन मननाची छॊटॊ अनेक दालने आहेत. सध्या लेण्याच्या डाव्या व उजव्या बाजुची बरीच पडझड झाली आहे. या लेण्यांसमोरही पाण्याचा योग्य निचरा करणेकरिताचे छॊटे पाट आहेत. लेण्यांतील खिडक्या- दरवाजांची रचना पाहता स्वच्छ, खेळती हवा राहणेच्या दृष्टिने केलेली व्यवस्था आढळते. तसेच पावसाच्या पाण्यापासुन संरक्षण होणेकरिता समोरील छत दरवाज्याच्यापुढे असुन व्हरांडा आहे, तर दोन्ही बाजुच्या भिंतीना खिडक्या (दालने) असुन बाजुचा भाग भिंतींनी पुर्ण  बंद आहे. या भागात पडणा-या पावसाच्या पध्दतीचा देखील लेणी खोदताना अभ्यास केला आहे. येथील खडक जांभा असल्यानेच लेण्यांची पडझड झाली आहे. सध्या लेण्यासमोर मध्यावर एक पिंपळाचे झाड आहे. येथे बाराही महिने पाणी उपलब्ध आहे. हे लेणे 7 व्या शतकातील असल्याचे कोल्हापुर जिल्हायाच्या गझेटियरमध्ये म्हटले आहे; परंतु नव्याने झालेल्या संशोधनानुसार हे लेणी मोर्यकालिन असुन ही लेणी धार्मिक प्रसाराचे केंद्र होते असे संशोधनातुन पुढे आले आहे. आपण अगदी कमी वेळात हे सुरेख लेण पाहु शकता तर जोतिबाला जाताना गाडी या थांब्यावर थोडया वेळाकरिता नक्की थांबवा.
 पांडवदरा लेणी
पन्हाळागडजवळच्या मसाई पठारावर इंजोळे गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील गर्द झाडी असलेल्या डोंगरमाथ्यावरील कडय़ात खोदण्यात आलेली इ.स. पूर्व तिसर्‍या शतकातील लेणी पांडवलेणी म्हणून ओळखली जातात.

पन्हाळ्याचे  दुर्लक्षित अश्नीस्तंभ

      अस एक ठिकाण जे खूप जवळ आहे आणि प्रचंड दुर्लक्षित आहे. कारण याच्याबद्दल लोकांना माहितीच नाही . म्हणून हा लेखनप्रपंच. अश्नीस्तंभ....
     पन्हाळा ते पावनखिंड मोहिम करत असताना जेव्हा मसाई पठार सोडून कुंभारवाडी मधून खोतवाडीकडे चालत निघालो डाव्या हाताला दगंडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना लक्ष वेधून घेते. अर्थात आपण चालत असलेल्या वाटेवरुन हि रचना व्यवस्थित दिसत नाही आणि पुढे ५० किलोमीटर गुडघ्याएव्हढ्या चिखलातून पावनखिंड गाठायची असल्याने कोणी सहसा वाट वाकडी करून त्या दगडांपाशी जात नाही. 


       या रचनेला अश्नी स्तंभ असे म्हणतात. साधारण साठ लाख  छप्पन हजार वर्षांपूर्वी जेव्हा पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाला अस्तित्वात आली तेव्हा ही रचना बनली . ही सर्वात तरुण डोंगररांगांपैकी एक आहे. गरम असलेला शिलारस बेसॉल्ट प्रकारच्या काळ्या दगडात परावर्तित होऊन ही रचनेचा हा समूह तयार झाला आहे. हवामान आणि भूगर्भीय हालचालीमुळे यातील माती आणि इतर गोष्टी यांची धूप होऊन हे अद्भुत नैसर्गिक आश्चर्य कारक दगड उघड्यावर आले . अगदी कोरून एकमेकांवर रचल्याप्रमाणे हे भल्या मोठ्या दगडांचे उंचच उंच असे नैसर्गिक दगडी खांब बनले आहेत. दहा ते बारा किंवा जास्ती दगड एक एका खांबात आहेत भक्कमपणे उभे आहेत. यातील एखा खांबात तर मधील दगड फुटून या खांबतच सुंदर अशी आरपार सुंदर अशी खिडकी बनली आहे. यांची उंची 15 फुटापासून साधारणतः 25 फुटापर्यंत आहे. अशीच आणखी एक शृंखला पन्हाळा ते मसाई पठार या दरम्यान आहे अस वाटत . पण ती एकदम लहान आहे . एका रांगेतील दोन पाठाराना जोडतानारया चिंचोळ्या नाळीवर अशी रचना दिसून येते. पूर्ण जगात अश्या तीनच साईट आहेत . आयर्लंडमध्ये डेविल्स रॉक्स, कर्नाटक मध्ये मेरी आयलंड वरील रचना आणि पन्हाळ्यापाशील ही रचना. (त्यामुळे लय लांब जायला लागत न्हाई , आयर्लंड ला बघायला जाण्यापेक्षा पन्हाळ्याला जावा. ) बाकी दोन्ही ठिकाणी ही रचना समुद्रकिनारी आहे आणि तीच रुप वेगळं दिसते . पण ही रचना पूर्णपणे भिन्न दिसते. इथे एक गुहापन आहे.
 




      तिथल्या लोकांच्या कथेनुसार इथे एक लग्नाचे वऱ्हाड गुप्त झाले ते म्हणजे हे अश्नी स्तंभ. येथील लोक याला उतरंड किंवा कुआरी म्हणतात . कुआर यासाठी की याच्या शेवटाला कुआरी देवीचे जागृत देवस्थान आहे. या जागेला कुआर खिंड असे म्हणतात. ही आश्चर्य जर इतर देशात असते ते पर्यटनासाठी याचा भरपूर वापर करून घेतला गेला असता . पण प्रशासन उदासीन असल्याने आमच्या तालुक्यातील लोकांना सुद्धा ही रचना माहीत नाही. या ठिकाणी भूगोल, ज्वालामुखी,शिलारस, बेसॉल्ट यांचा भरपूर सखोल अभ्यास केला जाऊ शकतो. सह्याद्रीची ही भौगोलिक वैशिष्ट्ये नक्कीच पाहिली पाहिजेत.
 जायचं कस 
    जर कोल्हापूर किंवा पूर्व पन्हाळ्याकडून येणार असाल तर पन्हाळा -इंजोळे ते बांदिवडे हे अंतर 9 किलोमीटर आहे आणि कोल्हापुर वरून बांदिवडे 30 किलोमीटर अंतर आहे. सरळ मसाई पठाराच्या बाजूने पुढे डांबरी रोड ने पुढे बांदिवडे च्या अलीकडे उजव्या बाजूला हे पिलर दिसून येतात. उत्तर पन्हाळा किंवा मलकापूर बांबवडे मार्गे जाणार असाल तर बांबवडे मधून वरती खोतवाडी पर्यंत गाडी ने जावे. तिथून एक किलोमीटर वरती हे पिलर उभे आहेत. चार चाकी असेल तर राक्षी मार्गे इंजोळे ला व तिथून पुढे बांदिवडेला जावे. (मसाई पठाराच्या वरून इथे जाता येत नाही .गेला तर चालत जाऊ शकता वाट सापडली तर....किंवा पन्हाळ्यावरून जेऊर मार्गे पण जाता येत नाही.) मोबाईल जपून ठेवा पडला की कायमचा गेला. चिलारीच्या जाळ्या आहेत .जपून चाला.
     पन्हाळ्याच्या पायथ्याशी दुर्लक्षित आसणारे अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थाळात नोंद होत असलेने पन्हाळ्याचे नांव आणखीनच उंचावले आहे. पन्हाळा वनविभागाने विशेष प्रस्ताव दाखल करुन हे अश्नीस्तंभ जागतिक वारसास्थाळात नोंद करण्याच्या प्रक्रीयेने वेग घेतला आहे.

 आंबा घाट आणि परिसरातील पर्यटन स्थ़ळे :-

कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर आंबा घाटाच्या आधी हे गाव आहे. चहाच्या लागवडीचा येथे प्रयोग चालू आहे व तो यशस्वी होईल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील चहाचे मळे येथे पाहायला मिळतील. पर्यावरणदृष्ट्या जैवविविधतेने संपन्न आणि प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटामध्ये आंबा हे गाव आहे. थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. गावातील बहुतेक लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. बरोबरीने पर्यटनउद्योग वाढीला लागला असून, अनेक लोक रिसॉर्टमध्ये काम करतात. काही गावकऱ्यांची स्वत:च्या मालकीची रिसॉर्ट आहेत.   
 धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय. पावसाळ्यात हा संपूर्ण प्रदेश हिरवाईनं नटलेला असतो.
    पाहावं तिथं धबधब्यांचं साम्राज्य. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वाऱ्याच्या झुळकीवर झुलणारं हिरवंगार गवत आणि विविध रानफुलं लक्ष वेधून घेतात. याच सह्याद्रीच्या कुशीत वसलाय आंबा घाट. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर. पश्‍चिम घाटातलं जैववैविध्य इथंही ठायी-ठायी दिसतं. पावसाळ्यात आंबा घाटाचं सौंदर्य तर खुलतंच, पण उन्हाळ्यातही थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटक इथं गर्दी करतात. ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरहून कोकणात उतरण्यासाठी या परिसरातून रस्ता नव्हता. आंबा गावच्या एका गुराख्यानं तो ब्रिटिश अभियंत्याला दाखवला. कालांतरानं हा घाटरस्ता झाला. त्यानंतर त्याचं नाव पडलं आंबा घाट.



     इतिहासाच्या पाऊलखुणा आजही या परिसरात आढळून येतात. कोल्हापूरपासून सुमारे ७६ किलोमीटरवरील किल्ले विशाळगड किंवा खेळणा हा इतिहासातील गतवैभवाचा ठळक दागिना. शिलाहारांच्या राजवटीत राजा मानसिंह यानं १०५८मध्ये हा किल्ला बांधला. त्यानंतरची काही शतकं तो हिंदू राजांच्या ताब्यातच होता. पुढं १४५३मध्ये बहामनी राज्याचा सरदार मलिक उत्तुजार, हा प्रदेश काबीज करण्यासाठी आला. सर्वांत प्रथम तो थडकला पन्हाळगडाच्या पायथ्याला. दीर्घकाळ त्याचा वेढा उठण्याचं लक्षण न दिसल्यानं, किल्लेदार शिर्के यांनी त्याला विशाळगडाचं आमिष दाखवलं.
     या आमिषाला भुलून तो विशाळगडाच्या पायथ्याच्या निबिड अरण्यात तळ ठोकून बसला. विशाळगडाचे किल्लेदार मोरे यांनी वरून जोरदार हल्ला केला आणि दुसरीकडून शिर्क्‍यांनी हल्ला चढवला. दोन्ही सैन्याच्या कात्रीत सापडलेल्या उत्तुजारची दाणादाण उडाली. स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६५९मध्ये खेळणा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव विशाळगड असं ठेवलं. विजयपूरच्या आदिलशाहचा सरदार सिद्दी जोहर यानं पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर, त्याच्या हातावर तुरी देऊन महाराजांनी चोरवाटेनं विशाळगड गाठला. अवघ्या ३१२ मावळ्यांच्या साह्यानं जोहरच्या भल्या मोठ्या सैन्याला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा हा प्रदेश साक्षीदार आहे.
     वाहनतळावरून गडाकडं जाण्यासाठी एकच वाट आहे. प्रत्यक्ष गडाची चढाई सुरू करण्यापूर्वी एक लोखंडी पूल ओलांडावा लागतो. ही चढाई साधारणपणे अर्ध्या तासांची आहे. गडावर हजरत मलिक रिहान यांची कबर आहे. दरवर्षी हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. तट आणि काही बुरूज यांशिवाय गडावर काहीच शिल्लक नाही. गडावर निवास आणि भोजनाची सोय होऊ शकते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंच आहे.
    विशाळगडाच्या पूर्वेला सुमारे दहा किलोमीटरवर पावनखिंड आहे. बाजीप्रभूंच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी गजापूरच्या या खिंडीचं नाव पावनखिंड असं ठेवलं. गजापूर, पांढरपाणी आणि येळवण जुगाईच्या मध्येच ही खिंड आहे. खिंड आणि त्यापुढची दरी सुमारे सात किलोमीटर लांबीची आहे. दरीतून कासरी नदीचा उगम होतो. खिंडीशेजारी ध्वज उभारण्यात आला आहे. जवळच बाजीप्रभूंचं स्मारक उभारण्यात आलं आहे. ही खिंड समुद्रसपाटीपासून सुमारे १७०० फूट उंचीवर आहे.
      ज्या गावामुळं घाटाचं नाव पडलं, त्या आंबा गावाला लागूनच जुनी देवराई आहे. संपूर्ण परिसर दाट जंगलानं व्यापलेला आहे. सदाहरित, मिश्र सदाहरित आणि पानझडी अशा तिन्ही प्रकारची जंगलं इथं अनुभवता येतात. आंबा गावाजवळच्या माणोली बंधाऱ्याच्या परिसरातील जंगलात दिवसा भटकता येतं. इथल्या जंगलात गवे रेडे विशेषत्त्वानं दिसतात. विशाळगडाच्या रस्त्यावर घाटमाथ्यावर सकाळी किंवा संध्याकाळी ते हमखास दिसतात.
    त्याशिवाय विविध प्रकारचे पक्षी इथं वास्तव्य करून आहेत. शेकरू किंवा जायंट स्क्विरलही इथं दिसते. या जंगलात बिबटे, सांबर, भेकर आणि क्वचित पट्टेरी वाघही दिसतो. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तीनही ऋतूंमध्ये आंबा घाट पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात सर्वत्र धुक्‍याची दाट दुलई पसरलेली असते. मात्र, पावसाळ्यात जळवांचा सुळसुळाट वाढतो. त्यासाठी योग्य सावधगिरी घ्यावी लागते. 
पावनखिंडीच्या वाटेवर
     पूर्ण एक दिवस असेल तर पावनखिंड, विशालगड व वाटेवरील अरण्यात भटकण्याची खूप संधी आहे. गाडीरस्त्याने पायी चालले तर काही वन्यजीवन दिसण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या खेपेला थंडीत आम्हाला येथील जंगलात निळ्या डोक्याचा कस्तूर (ब्लू-कॅप रॉक थ्रश) दिसला होता. अलीकडे चिंब पावसात दुसऱ्यांदा भटकताना चक्क शेकरू दिसलं! तांबूस तपकिरी रंगाची ही साधारण दोन फूट लांबीची खार पावसात अंग चोरून उजवीकडच्या झाडाच्या फांदीवरून टुणकन उडी मारून डाव्या बाजूच्या झाडावर सरसर गेली. याच खेपेत मलबार कस्तूरची (मलबार विस्लिंग थ्रश) स्वर्गीय सुंदर शीळ वेळोवेळी कानांना सुखावत होती. कुंद ढगाळ वातावरण, पावसाची रिपरिप, मधेच सुटणारा गार वारा आणि ही कर्णमधुर शीळ! केवळ अप्रतिम. जंगलात अनेक ठिकाणी पांढऱ्या गळ्याचा सातभाई (पफ-थ्रोटेड बॅबलर) पावसाने जरा उघडीप घेतली की आपलं ‘गोपी गोपी, तुझी काळी टोपी’ चं गाणं सुरू करायचा. सोबतीला नाचण पक्ष्याचा चिवचिवाट होताच.
     अंजनी, हिरडा, हाडक्या जांभूळ, लेंडी जांभूळ, आंबा, चांदण व बांबूच्या या सदाहरित जंगलात कोणत्याही ऋतूत एक सुखद शांत अनुभव मिळतो. धीरगंभीर वृक्षराजीतून चालताना आपण कोकणदर्शन पॉईंटवर येतो आणि ढग आणि धुके नसेल तर एक नयनरम्य दृश्य आपली नजर खिळवून ठेवतं. आपण सह्य़ाद्री घाटमाथ्यावर उभे असतो आणि खाली खोलवर ताशीव कडे थेट कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात उतरतात. घटामाथा इथे अर्धवर्तुळाकार असून समोर पश्चिमेला त्यावरील विशालगड दिसतो.
   आंबा घाटावरील हे जंगल हा एक महत्त्वाचा जंगल कॉरीडोर (दोन मोठय़ा जंगलांना जोडणारा पट्टा) आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे आणि इथे भटकंती केल्यावर आपल्याला हे लगेच लक्षात येते. दक्षिणेकडे बावडा मार्गे हे जंगल राधानगरी अभयारण्याला जोडलेले आहे, तर उत्तरेकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान मार्गे थेट कोयना अभयारण्य व महाबळेश्वरला जोडलेले आहे. तसेच कोकणातील सह्य़ाद्री पायथ्याच्या साखरपा, मालेश्वर, गोठणे, लांजा यासारख्या ठिकाणच्या जंगलांनासुद्धा हे आंबाघाट मार्गे जोडलेले आहे.
        समृद्ध जंगलात अनेक वर्षांचे सोनचाफा, हिरडा, बकुळ, पाम, आमसूल, तमालपत्र आणि भरपूर औषधी वनस्पती आहेत. सभोवती प्रचंड वनसंपदा असली तरी गावाने हा ऑक्सिजन पार्क जाणीवपूर्वक जपला आहे. अगदी वाळवी, आळंबीपासून ते जायंट वुड स्पायडरसारखे कीटक आणि इतर पशु-पक्षी... ही माहिती पर्यटकांना देणार कोण? सध्या हे काम काही तरुण करत आहेत. त्यात प्रमोद माळी, अजिंक्य बर्डे आदींचा समावेश आहे. डोंगर कपारी आणि जंगलाचा विस्तीर्ण परिसर मनसोक्त अनुभवायाचा असेल तर या परिसराची माहिती असणारा जाणकार हवाच. त्यासाठी माळी यांच्याशी ९९७५३८३९५२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
      नितळ तलाव आणि अनेक नद्यांचे उगमस्थानही येथेच आहे. समृद्ध निसर्गसंपदेची जाणीव स्थानिक लोकांतच व्हायला हवी, यासाठी हे तरुण अभ्यासक स्थानिक विद्यार्थ्यांच्या जंगल सहली घडवताहेत. शिवाय बाहेरील विद्यार्थी आले तर त्यांनाही येथील जैवविविधतेची माहिती दिली जाते. श्रमदानामुळे जंगलात भटकंतीचा आनंद आणि आपणही निसर्गासाठी काही केल्याचे समाधान मिळते, असा अनुभव माळी सांगतात.
     स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या जंगलात बिबटय़ा, सांबर, भेकर, गवा यांच्याबरोबरच कधीकधी एखादा फिरस्ता वाघसुद्धा दिसतो! आज जंगल कॉरीडोर वाचवणे हे अभयारण्य वाचवण्याइतकेच महत्त्वाचे आहे, हे सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे. आंबा घाटमाथा व त्यासारखी सह्य़ाद्रीतील अनेक जंगले वाचवणे ही काळाची गरज आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे अनेक जंगल पट्टे हे पूर्वापार खासगी मालकीचे आहेत व आपल्या प्राचिन वेदिक संस्कृतीला अनुसरून लोकांनी ते आजवर टिकवले आहेत. शाश्वत विकासाकडे नेणाऱ्या रोजगार संधी उपलब्ध झाल्या, तर झटपट पैशाकरिता अशी जंगले तुटण्याचे टळेल. अशा कामी कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, सेंद्रिय शेती यासारख्या पर्यावरणपूरक व्यवसायांना खूप महत्त्व आहे. आंबा पुण्यापासून २५० किमीवर आहे, तर मुंबईपासून ३९०. चला तर मग आंबा घाटात आणि अनुभवा रौद्र सह्य़ाद्रीचे तितकेच लावण्यमयी रूप!

पावनखिंड एक वीरभूमी

   कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील पावनखिंड या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा आहे. पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेडा घातला होता. शिवाजी महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले आणि सिद्दी जौहरने वेढा ढिला केला. इकडे शिवरायांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला.

        राजे विशाळगडच्या दिशेने निघाले आणि मसूद त्यांच्या पाठलागावर होता. घोडखिंडीत आम्ही शत्रूला थांबवितो आपण विशालगडाकडे रवाना व्हा असं बाजीप्रभू देशपांडेनी राजेंना सांगितलं त्याच घोडखिंडीत मसूद आणि मराठ्यांच्यात घमासान युद्ध झाले. अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १६६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा या इतिहासात अजरामर झालेल्या या ठिकाणी जाताना छाती अभिमानाने फुलून येते.
काय पहाल


पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभे आहे. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोट्याशा ओढ्यावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी. 
 
पण तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल-तलवार अन् भगवा झेंडा असं स्मारक सामोरं येतं. इथून पुढे सुरू होते पावनखिंड. इथे जवळच कासारी नदीचं उगमस्थान आहे. ओढ्याच्या रूपानं ती पुढे वाहत जाते.

सध्या खिंडीत उतरण्यासाठी लोखंडाच्या दोन शिड्या बनवल्या आहेत. २५-३० फूट खाली उतरताना आपली चांगलीच तारांबळ उडते. खिंडीमध्ये जागोजागी मोठमोठे खडक, शिळा पडलेल्या आढळतात. पुढे जाऊ तसं खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते, पण तरीही जास्तीत जास्त रुंदी सुमारे पंधरा फुटापर्यंत असावी. खिंडीत जमीन अशी दिसतच नाही. सगळीकडे शिळांचा खच पडलेला. दीड-दोनशे मीटरनंतर खिंड काटकोनात वळून डावीकडे जाते. शेवटपर्यंत लांबी सुमारे पाचशे मीटरपर्यंत असावी. असं सांगतात की खिंड पूर्वी एवढी रुंद नव्हती. काळाच्या ओघात पाण्याच्या प्रवाहामुळे शिळा कोसळून ती अधिक रुंदावली आहे. आजही पावनखिंड जंगलांनी अशी आच्छादली आहे की भर दुपारीसुद्धा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत.
कसे जाल
   कोल्हापूरहून मलकापूर मांजरे रोड, येळवण मार्गे तसेच पुण्याहून कराड, मलकापूर मांजरे रोड, येळवण मार्ग पावनखिंडीस जाता येते.
     विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी पावनखिंड आहे.
अत्यावश्यक सेवा
       प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा (संपर्क -०२३२९२६४९१५), सरकारी ग्रामीण इस्पितळ मलकापूर (संपर्क- ०२३२९२२४१००), रुग्णवाहिका वाहक (संपर्क – ८९७५९४७६३३),
अत्यावश्यक रुग्णवाहिका टोल फ्री संपर्क – डायल १०८
आंबेश्वर देवालय
 


 
येथील आंबेश्वर देवालय महाराष्ट्रातील जुन्या देवरायांपैकी एका देवराईमध्ये आहे.सुमारे 4 एकर परिसरात ही देवराई पसरलेली आहे. सुमारे 300 ते 400 वर्षे जुनी आहे. देवराई मधील वृक्ष तोडले जात नसल्यामुळे ही देवराई घनदाट आहे आणि मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता सुद्धा आढळते. आंबेश्वर मंदिरात शंकराची पिंड आहे. हे ग्रामदैवत आहे. तसेच विठ्ठलाई, नवलाई, वाघजाई, खानजाई, चांदभैरी या इतर ग्रामदेवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत.नवरात्रामध्ये उपास करणारे भक्त नऊ दिवस देवळातच मुक्काम करतात, अशी येथील प्रथा आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा सुद्धा आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. तसेच वीरगळ आहे.

माणोली बंधारा परिसर :-

सकाळी किंवा संध्याकाळी मस्त पायी फिरत नजीकच्या माणोली बंधाऱ्यावर जाता येते. वाटेत पांढऱ्या छातीचा खंडय़ा, पांढऱ्या भुवईचा धोबी, लांब शेपटीची भिंगरी (वायर टेल स्वालो), वेडा राघू व पाकोळी यासारखे पक्षी हमखास दिसतात.
बंधाऱ्याच्या एका बाजूस शेती असून, बाकी तिन्ही बाजूस घनदाट मिश्र सदाहरित जंगल आहे. तलावाच्या काठाकाठाने जाताना प्रथम थोडा मोकळा भाग लागतो. पूर्वी इथे सुद्धा जंगल असणार याचा अंदाज काही उरलेल्या झाडांवरून येतो. 
 



 पाण्याच्या काठी काटेरिंगणी जागोजागी उगवलेली दिसते. पाण्याच्या पृष्ठभागावर उडत जाणारे पाणकावळे मधेच एखाद्या खडकावर ध्यानस्त बसतात. थोडं पुढे गेलं की जंगल सुरू होतं व जांभूळ, आंबा, हिरडा यांसारखे उंच वृक्ष सभोवार दाटीवाटीने उभे असतात. आम्हाला याच ठिकाणी शेकरूचा आवाज पानांच्या दाटीतून ऐकू आला. थोडय़ा वेळाने समोरच्या काठावरील जंगलातून मलबार धनेशचा आवाजसुद्धा ऐकू आला! पावसाळ्यात हा सगळा परिसर धुकं व ढगांनी भरून जातो व रिमझिम पावसात ही भटकंती एक वेगळाच अनुभव देते. मात्र या ऋतूत जळवा लागण्याची शक्यता लक्षात घेऊन मीठ किंवा तंबाखू सोबत ठेवलेली बरा.
वाघझरा
 
  या ठिकाणी वाघ पाणी पिण्यासाठी येतो असे मानले जाते.
गेळवडे डॅमः-
 
आंबा गावाजवल असलेले आणि गर्द जंगलाची पार्श्वभुमी असलेले धरण
कोकण दर्शन पॉईंट :-

आंबा घाटात उभा राहिले कि खाली रत्नागिरी जिल्ह्याचे विहंगम दृष्य दिसते.तसेच लांबवर दरीत विशाळगड दिसतो.
आंबा येथे पर्यटकांना रहाण्याची सोय :-
१ ) सवाई मानसिंग रिसॉर्ट
  At Post  आंबा, शाहुवाडी , कोल्हापुर, 415101
   मोबाईल : 9158446629 , 9527999000, 9145222552
    Email: sawaimansing@yahoo.com
२ ) वनविसावा रिसॉर्ट
At Post  आंबा, शाहुवाडी , कोल्हापुर, 415101
मोबाईल: +91-9423547192, +91-9423769192
Whatsapp No. :- +91-9421199192
info@vanvisavaresort.com
३) वनश्री हॉलिडे रिसॉर्ट
मोबाईल- +91 9822534679 / +91 9372234679/ +91 9325101502
Email us - vanashreeholidayresort@gmail.com
४ ) THE JUNGLE RESORT, AMBA
Plot No. 104, At & Post Vishalgad-Amba Kolhapur -
 Ratnagiri Highway Taluka Shahuwadi - 415101
District Kolhapur,
मोबाईल -+91 9323 812 422
ईमेल - info@jungleresortamba.in
वेळ- 8 am to 8 pm IST (7 Days a Week)
५ ) अंबा रिसॉर्ट
Email- anil.gavare41@gmail.com
मोबाईल- 9423264762, 7875483735
कोल्हापुर बुकींग
Kolhapur Office
डॉ. अजित जोशी
23, दत्त कॉलनी, कावळा नाका, कोल्हापुर,  416003
Email - anil.gavare41@gmail.com
मोबाईल- 0231-2650268
६ ) पावनखिंड हॉलिडे रिसॉर्ट
मोबाईल-9404258087,9373513384, 9423076167
पुणे ऑफिस- 94230-76167, 020-25439860
Email : pawankhind@gmail.com
१.शांत सुंदर व स्वच्छ जागा.३ बेड , ४ बेड , ६ बेड अशा मोठ्या मोठ्या आणि एकमेकांना जोडलेल्या खोल्या आहेत.मोठ्या ग्रुपसाठी अतिशय मस्त.
२.पूर्ण रीसोर्ट सौर उर्जेवर चालते.रुम मधे पंखे, दिवे ई सौर उर्जेवर चालतात.रुमसमोर मोठी प्रशस्त जागा, झोपाळे, भरपुर खुर्च्या.गप्पा टाकत बसायला बेस्ट.
३.रीसॉर्ट वर एक छोटे स्टेज, कराओके सिस्टीम, बाके ईतर वाद्ये ई पण आहेत.स्विमिंग पूल मस्त आणी स्वच्छ होता.तिथे एक छोटीशी लायब्ररी पण आहे.
४. मालक शिरगावकर काका अस्सल पुणेकर आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक व्यवस्था अतिशय चोख आहे.पुणेरी पाट्या जागोजागी दिसतील पण त्या गरजेच्या ठीकाणीच आहेत.रीसॉर्टचा सगळा स्टाफ खुप मस्त मदतीला सदैव तयार.
५.जेवण अत्यंत सुंदर आहे.तिथे खाल्लेले अनेक पदार्थ जसे की फणसाची भाजी, कैरीची कढी,खावापोळी विथ दाट मसाला दुध.,चिकन मिळते
धरणावरची सहल, पावनखिंड सहल, ओपन जिप्स वर बसुन केलेली जंगल सफारी, जंगलातले जेवण सगळाच अनुभव मस्त आणि व्यवस्था चोख असते.

विशाळगड किल्ला

   विशाळगडाला प्राचीन नाव होते "खेलणा". विशाळगड किल्ला हा नावाप्रमाणेच विशाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण विशाळगड केले होते.  कोकणातील बंदरांना कोल्हापूर मधील  बाजार पेठेशी जोडण्याकरिता घाटमार्गावर लक्ष्य ठेवण्याकरिता आणि संरक्षणाकरिता हा किल्ला बांधला गेला. म्हणूनच या किल्ल्याला इतिहासामध्ये लष्करीदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते. विशालगड  कोल्हापूराच्या वायव्येला ८० कि.मी. अंतरावर आहे.तर पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिमेस अंदाजे 60 किमी वर आहे.कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याच्या दक्षिणेस सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे. याच परिसरात अणूस्कुरा घाट आणि अंबा घाट आहेत. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चोहोबाजूने खोल दर्‍या आहेत.
कसे पोहोचाल ?
 विशाळगडला जाण्यासाठी कोल्हापूर बस स्थानकांवर सारख्या बस आहेत ज्या तुम्हाला पायथ्यापर्यंत पोहचवतात. विशालगडाला जाणारा रस्ता हा सुंदर आणि वळणा-वळणाचा आहे. 
 
 
 
त्यामुळे प्रवासाची एक वेगळीच मज्जा येते.पावसाळ्यामध्ये तर हा रस्ता एक वेगळीच अनुभूती देतो. त्यामुळे आपणास बिलकुल थकवा जाणवत नाही.

प्रेक्षणीय स्थळे -
    गडावर जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. गडाच्या खाली पार्किंगची व्यवस्था आहे आणि काही दुकाने देखील आहेत.
 
गडावर अनेक ऐतेहासिक विहिरी आणि तलाव आहेत. 
 
 विशाळगडावर पायथ्यापासून वर जाण्यासाठी पूल बांधला गेला आहे. 
गड माथ्यावर हजरत रेहान मलिक दर्गाह आहे.

गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळदरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. 
 याशिवाय गडावर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधी आहेत.

गडमाथ्यावरून खाली दरीत पहताना अफाट दृश्य दिसते. सभोवताली गर्द हिरवीगार झाडे दिसतात. निसर्गाने ह्या परिसरावर मुक्त हस्ते उधळण केली आहे हेच खरे !
इतिहास -
शिलाहरांनी उभारलेला हा किल्ला पुढे विजापूरच्या आदिलशहाच्या अख्यारीत होता. 
 
 
 
मात्र अफझलखानाचा वध केल्यावर पन्हाळ्याबरोबरच विशाळगड देखील शिवाजी राजांनी जिंकून घेतला.पुढे औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या स्वारीत या परिसरात खुप काळ युध्द सुरु होते.
 

कवी कलश यांचा वाडा।।

छत्रपती शंभुराजेंचा विश्वासु साथिदार म्हणजे कविकलश ज्याने मृत्यूपर्यंत आपले स्वामींची पाठ सोडली नाही. कवि कलश यांच्याविषयी सांगायचे तर
“आज्ञापत्र धर्माभिमान कर्मकांडपरायण दैवलोकानिष्ठाग्रहताभिमान सत्यसंध समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी छंदोगामात्य”
ज्याची मुद्रा शंभूराजांच्या राजवटीतील त्याचे महत्त्व सांगून जाते -
“विधीरर्थीमनीषीणामवधीर्नयामवर्तमना। वैशधी: कार्यसिद्धीनाम मुद्रा कलशहस्तगा।।
अर्थात – “सर्व याचकांची इच्छा पूर्ण करणारी, राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असणारी ही मुद्रा आता कलशाच्या हातात आहे”
आज भीमा नदीच्या काठावर असलेल्या त्याच्या समाधी शिवाय त्याचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. मात्र दक्षिण कोकणमध्ये राजकीय कारभारासाठी त्याचं वास्तव्याच ठिकाण होत मलकापूर शहर
दक्षिण कोकण मध्ये त्याच्या वाड्याचे ठिकाण आणि शेवटी परशुराम पंतप्रतिनिधी यांच्या जहागिरीचे ठिकाण म्हणजेच मलकापूर.! दक्षिण कोकणच्या सागरी किनाऱ्यावरून अनुस्कुरा या घाट मार्गाने कराड,सातारा व कोल्हापूर या प्रमुख शहरांकडे जाता येते.

आणि या अनुस्कुरा घाटातील शिवकालीन एक महत्त्वाचे नाक्याचे शहर म्हणजे मलकापूर होय.! मलकापूर हे सागरावरून देशावर येणाऱ्या प्रमुख व्यापारी घाट मार्गावर वसलेले प्राचीन शहर ! या घाट मार्गावर रक्षण व नियंत्रण करण्यासाठी मलकापूर शहर म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाचे नाके होय.

इतिहासातील सुप्रसिद्ध बंदर राजापूरकडे जाण्यासाठी मलकापूर मार्गे जावे लागते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, अरब आणि इतर देशी व्यापाऱ्यांना अरबी समुद्रातील माल किनाऱ्यावरून देशावर नेण्यासाठी व देशावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी हा एक प्रमुख घाट मार्ग होता.कवी कलश यांनी मलकापुरमध्ये एक विस्तीर्ण तटबंदीयुक्त गढी व राजवाडा निर्माण केला होता. कवी कलश हा येथील राजवाड्यात राहत असे. तिथे त्याच्या अखत्यारीतील अश्वदल असे. इकडील मुलखाचा कारभार करण्यासाठी तो बर्‍याचदा मलकापुरात थांबत असे. बादशहा औरंगजेबाचा बंडखोर पुत्र अकबर हा सुद्धा दुर्गादास सोबत कवी कलशाला भेटावयास मलकापुरात येत असे. आणि महत्त्वाचे म्हणजे कवी कलश या भागात असतानाच त्याचे शिर्क्यांशी भांडण उद्भवले. शिर्क्यांनी कशाला पराभूत केले व मलकापूरवर स्वारी करून कलशाची घोडे पागा आणि राजवाडा उध्वस्त केला. कवी कलश आश्रयासाठी जवळ असलेल्या विशाळगडावर गेला. शंभूराजेंना रायगडावर ही खबरबात मिळताच ते तातडीने निवडक सैन्यासह कवी कलशाच्या मदतीस धावले आणि त्यांनी शिर्क्यांना युद्धात परास्त केले. शिर्के बादशहाकडे गेले आणि शंभुराजे पन्हाळ्याच्या व्यवस्थेसाठी निघून गेले. कारण शेख निजाम मुकर्रबखान हा पन्हाळ्याकडे वेढा देण्यासाठी निघाला होता. मात्र झाले सारेच विपरीत.!!असो.

    आज मलकापुरातील हा राजवाडा "पंतप्रतिनिधी विशाळगड सरकार" या नावाने मालकीचा आहे. पंतप्रतिनिधी अर्थात शाहूकालीन परशराम पंत प्रतिनिधी होत. 

बर्की धबधबा,

Waterfall 

धरणीमाता हिरावा शालू लेण्यासाठी पावसाची वाट पहात असते. डोंगरदर्‍यांमध्ये पडणारा धुवाँधार पाऊस, त्यामुळे डोंगरकपारीमधील छोटया-मोठया कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रुपांतर, त्याचा झुळझुळणारा खळाळत जाणारा आवाज आपल मन गुंतवून टाकतो. आणि हे पाणी सर्व डोंगरदर्‍यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो, ते आपल्याला कळतच नाही.

कोल्हापूरनगरी महालक्ष्मीचे अधिष्ठान, शिवरायांची स्नुषा ताराराणी त्यांनी स्थापन केलेली मराठयाची ही नगरी म्हणजे कोकण आणि घाट माथा यांचा सुंदर संगम आहे. पर्यटकांना भुरळ घालतील अशा अनेक स्थळांचं आगर या जिल्ह्यात आपणाला येण्याचा आग्रह करीत आहे. अशाच एका पावसाळी पर्यटन स्थळा विषयी जाणून घेऊ.

निसर्गाची ओढ मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. पावसाळ्यात तर निसर्गाचे सौंदर्य नेहमीच खुलते. हिरवाई, ऊन-पावसाचा लंपडाव, येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, त्यावर पडलेले सोनेरी किरण मनाला मोहवतात. शाहुवाडी जवळील बर्की या छोटयाश्या गावाजवळ सह्याद्रीच्या रांगामध्ये हा धबधबा निर्माण झालेला आहे. या परिसरात हा बर्की धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळी पर्यटनाचे बेळगाव, सांगली, कोल्हापूर परीसरातील पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. हजारो पर्यटक दरवर्षी येथे स्नानाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतांना, धबधब्याखाली भिजणे, म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे. निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहून आपले मन प्रसन्न होते. आणि एक वेगळी ऊर्जा पुन्हा आपली नेहमीची दैनंदिन कामे करण्यास यामुळे प्राप्त होते.

कोल्हापूरपासून ५६ कि. मी. अंतरावर हा धबधबा आहे. या ठिकाणी बाजारभोगाव- करंजफेणमार्गे किंवा मलकापूर-येळवण यामार्गे येथे आपण पोहोचू शकतो. धबधबा पाहण्यासाठी मात्र ३ कि. मी. पायी जावे लागते. धबधब्याकडेही जात असताना हिरवे डोंगर, दर्‍या, ओढे-नाले, डोलणारी झाडे-फुले-पाखरे अशी निसर्गाची किमया आपल्या दृष्टीस पडते. दाट जंगलातून पायी जात असतांना छोट-छोटे ओढे पार करताना होणारा पाण्याचा स्पर्श; एक वेगळी अनुभूती देतो.

एका वेळी 5 धबधबे दिसतात, 3 धबधब्या जवळ जात येते. फक्त पावसाचा अंदाज घ्या, ओढ्या वरील पूल छोटा आहे, पुलावर पाणी आल्यास अडकून पडावे लागेल. 

अणुस्कुरा घाट : 

हा घाट कोकण आणि कोल्हापूरला जोडतो. सातवाहन काळापासून हा रस्ता रहदारीचा होता. या भागात जुने शिलालेखही आढळून येतात. राजापूरहून इंग्रजही या मार्गाने व्यापार करीत असत. तेव्हापासूनच दळणवळणाच्या दृष्टीने या घाटाला विशेष महत्त्व आले. घाटाच्या पायथ्याशी अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आदी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांची पुनर्वसन वसाहतही या घाटाच्या पायथ्याशीच वसविण्यात आली आहे. या घाटातील जंगलामध्ये वन्य जीवांचे वास्तव्य असून, बिबट्या, सांबर, गवा आदी प्राण्यांचा समावेश आहे. असंख्य नागमोडी, धोकादायक वळणे, उंच दगडी सुळके यामुळे हा घाट पार करताना छाती दडपून जाते. 

पळसंब्याची एकपाषाण मंदिरे :-

सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झपाटय़ाने होत असताना बौद्ध प्रचारक भिक्षूक कोल्हापूर परिसरात होते. इ.स. पूर्व 400 ते इ.स. 300 पर्यंतच्या कालखंडात मूर्तीपूजा नसलेल्या हिनयान बौद्धपंथीयांच्या काळात कोल्हापूर परिसरात बौद्ध भिक्षूंसाठी ठिकठिकाणी लेणी खोदली गेली. हा सांस्कृतिक वारसा आजही दुर्लक्षितच आहे.


कि.मी. अंतरावर गगनगड या ऐतिहासिक किल्ल्याच्या अलीकडे 15 कि.मी. अंतरावर पळसंबा गावाजवळ हे नितांत रमणीय ठिकाण आहे. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट जंगलाच्या पाश्र्वभूमीवर बौद्ध गुंफा व एकपाषाणी तीन मंदिरे दुर्लक्षितपणे उभी आहेत. बौद्ध गुंफेमध्ये आता शिवलिंगाची स्थापना झाली आहे. खळाळत्या ओढय़ाच्या पात्रात दोन हजाराहून अधिक वर्षे ही मंदिरे एकटेपणाचे दु:ख भोगत आहेत. पर्यटनवृध्दीसाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे ठरू शकते.

 पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंगमधील अखंड शिळेमध्ये असलेले मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून, गुहा गारवाही देते. कोल्हापूर शहरापासून ४२ कि.मी. अंतरावर गगनबावडा रोडवर पळसंबे गावापासून दक्षिणेकडे तीन कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेर थांबल्यानंतर या ठिकाणची कल्पनाही येत नाही. केवळ हिरवीगार झाडे दिसतात. गावकऱ्यांनी मात्र या पर्यटनस्थळाला अद्याप व्यावसाईक रूप दिलेले नाही हे विशेष, धार्मिक परंपरा असलेल्या या ठिकाणी एक तर शालेय सहली किंवा कौंटुबिकच सहलीच भेट देत असतात. मंदिराकडे जाण्यासाठी आता दगडी फरशा लावून वाट केली आहे. पण, कोणताही कृत्रिमपणा येथे येणार नाही याचीही दक्षता येथे घेतली आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगांतून कोसळणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळतात. रामलिंगचा धबधबा सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला असा आहे. हा धबधबा ८-१० फुटांवरून कोसळत असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. पुरात्तत्व खात्याच्या माहितीनुसार ही बुद्धकालीन लेणी असल्याचे बोलले जात आहे. पण, स्थानिक नागरिकांनी मात्र याला पांडवकालीन गुहाचा दर्जा देत याला धार्मिकस्थळच ठेवले आहे. अज्ञातवासात पांडवांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते.

 गगनबावडा

Gaganbawada 

कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनाचा लाजवाब अनुभव देणारा, कोकणाशी नाते जोडणारा, निसर्गसौंदर्याने बहरलेला, सह्याद्रीच्या कडेकपारीत ४६ वाड्यावस्तींसह विस्तारलेला, विपुल जैवविविधता व बाराही महिने पर्यटकांना गारवा देणारा गगनबावडा उन्हाळ्यात पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. गगनबावडा तालुक्याला लाभलेल्या नैसर्गिक वरदानामुळे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूत पर्यटकांना आपलेसे करण्याची किमया गगनबावड्याला लाभली आहे.
कोल्हापूरपासून अवघ्या ५६ किलोमीटरवर गगनबावडा आहे. वेगात गेले तर दीड तास आणि रमत गमत गेले तर दोन तासांचा प्रवास आहे. हा प्रवास जिथे थांबतो तो गगनबावडा म्हणजे निसर्गाने कोल्हापूर जिल्ह्याला दिलेले एक वरदान आहे. अजूनही व्यापारीकरणाचा फारसा स्पर्श न झालेल्या या परिसरात बारा महिने प्रसन्न निसर्ग आहे. प्रत्येक ऋतूत त्याची नजाकत वेगळी आहे.
   कोल्हापूर शहर सोडले की, कुडित्रे, वाकरे, मरळी, कळे व साळवण ओलांडले की, गगनबावड्याचे वेगळेपण जाणवू लागते. खुद्द गगनबावड्यात गेले की, या सौंदर्याला कोकणी वातावरणाची झालर लाभते.
    गगनबावडा हे संस्थानकाळातील जहागिरीचे गाव.  १८५७ च्या बंडापूर्वी इंग्रजांच्या विरोधात जे बंड झाले, गडकऱ्यांचे बंड अशी त्यांची इतिहासात ओळख आहे,तर असा गगनबावडा पर्यटनाच्या यादीत मात्र केवळ कागदावरच आहे. गगनबावड्यापासून कोकण इतका जवळ की, करूळ व भुईबावडा घाटातून खाली डोकावून पाहिले तर समोर क्षितिजापर्यंत पसरलेला कोकणच दिसतो. उन्हाळ्यात सारे कोल्हापूर घामाघूम झालेले असताना गगनबावडा मात्र गारेगार असतो.
   गगनबावडा हे स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीचे एक छोटे गाव. करवंदवाडी अशीही त्याची ओळख. १८५७ च्या बंडापूर्वी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गडकऱ्यांनी बंडाचा पवित्रा घेतला. हा पवित्रा इंग्रजांना मोठा धक्‍का देणारा होता. हे बंड यशस्वी झाले असते तर इंग्रजांच्या अस्तित्वालाच धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बळाचा पूर्ण वापर करून गडकऱ्यांचे हे बंड मोडून काढले. गगनगडाची तटबंदी, बुरूज, वाटा, तोफा लावून फोडून टाकल्या. जेणेकरून बंडाची ताकद कमी केली गेली. त्यामुळेच गगनगडावर असलेली वस्ती गडाच्या पायथ्याला आली. आजही मूळ गगनबावड्याच्या स्मृती अर्धवट वास्तू रूपाने गगनगडावर टिकून आहेत.
   गगनबावड्यात निसर्गाबरोबरच गगनगिरी महाराजांचे आध्यात्मिक स्थान आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनही आहे. पावसाळ्यात गगनबावड्यात पडणारा पाऊस पर्यटकांना आकर्षित करतो. समोर पाच फुटांवरचे दिसू शकत नाही, इतका पाऊस व धुक्‍याचा लोट गगनबावड्यात असतो.
   करूळ व भुईबावडा घाटातील वाहतूक पावसाळ्यात जवळ जवळ थांबलेली असते आणि या कोकणातून येणाऱ्या ढगांनी घाटाची वाट आपल्या ताब्यात घेतलेली असते. एका मागून एक येणारे ढग गगनबावड्यात येऊन कोसळत असतात आणि पावसाळ्याचा एक झिम्माड अनुभव पर्यटकांना देत असतात.
  गगनबावड्यात चौफेर वनराई आहे. जंगल आहे. गेले आठ महिने हत्तीचेही वास्तव त्यामुळेच गगनबावड्यात आहे. लोणावळा, खंडाळा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत; पण त्या तुलनेत त्याहून झिम्माड पाऊस गगनबावड्यात आहे. गगनबावड्याचा पर्यटन खर्चही कमी आहे;
     गगनबावडा तालुक्याला एतिहासिक वारसा लाभलेला आहे. तालुक्यातील अनेक पुरातन व एतिहासिक स्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बोरबेट येथील विस्तीर्ण पठार, तेथील आकर्षक मोरजाई मंदिर, गुहा, नजीकचा कलकसांडे प्रकल्प, साखरी-तिसंगीयेथील तामजाई मंदिर, तळगे बुद्रुक येथील वळताई देवीचे अधिष्ठान, मुटकेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर व तेथील पुरातन वारुळ तसेच पळसंबे येथील पंत अमात्य बावडेकर सरकारांचा वाडा यांचा उल्लेख करता येईल. कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावरील असळज या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर रामलिंग आहे. याठिकाणी प्राचीन पांडवकालीन लेण्या आणि गुंफाही पाहता येतात.
   उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटकांच्या दृष्टीने पाणी, डोंगर, हिरवाई, गारवा, प्रसन्न वातावरण यांना फार महत्त्व प्राप्त होते. या सर्व गोष्टींची अनुभूती उपलब्ध करून देणारा असा हा तालुका आहे. तलाव्यांमुळे गगनबावडा तालुक्याचे नैसर्गिक सौंदर्य आणखीनच खुलून येत आहे. तालुक्यातील लखमापूर-नरवेली येथील कुंभी मध्यम प्रकल्पाबरोबरच अणदूर, कोदे, वेसरफ येथील तलाव पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. तलाव आणि तलावाच्या सभोवतालच्या परिसरात पर्यटक इतके रममाण होतात की त्यांना तेथून माघारी फिरणे जड होऊन जाते.
कसे जाल: 
रंकाळा व सी. बी. एस. स्टँड , कोल्हापूर येथून एस. टी.ने किंवा स्वतःच्या अथवा खासगी वाहनाने.
अंतर व वेळ: कोल्हापूर ते गगनबावडा ६० किलोमीटर, पोहोचण्यास एक तास वेळ.
जेवण/ राहणे: राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व खासगी हॉटेल्सकडून सुविधा.
उन्हाळी आकर्षण: गगनगड, कोकण पॉईंट, तालुक्यातील चार तलाव व अन्य एतिहासिक स्थळे.
दृष्टिक्षेपात गगनबावडा -
 ऐतिहासिक गगनगड, गगनगिरी महाराज मठ
 करूळ, भुईबावडा घाट व घाटात फेसाळणारे धबधबे
 अणदूर, लखमापूर, कोदे, वेसरफ तलाव
 पळसंबे येथील रामलिंग (पांडवकालीन एकपाषाणी मंदिरे)
 पंत अमात्यांचा वाडा
 मोरजाई पठार 
गगनगिरी/ गगनबावडा : 
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. जणू गगनात दिसणारा किल्ला, म्हणून गगनगिरी किंवा गगनबावडा असे नाव पडले असावे. कोल्हापूर-देवगड मार्गावर तीन हजार फूट उंचीवरील हे अत्यंत रमणीय असे ठिकाण आहे. येथून कोकणात जाणारा घाटरस्ता फारच विलोभनीय दिसतो. फार पूर्वीपासून सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या मोक्याचे जागेवर तत्कालीन राज्यकर्त्यांनी टेहळणीसाठी नाकी उभारली होती. या किल्ल्याची निर्मिती भोजराजाच्या काळातील असावी. कोकणाकडे जाणारी वाट म्हणून प्राचीन काळापासून याचे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६०मध्ये हा किल्ला आदिलशाकडून घेतला. येथे नाथपंथीय लोकांचे देवस्थान असावे. येथे गगनगिरी महाराज यांचे आठ वर्षे वास्तव्य होते. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील सणबूर गावचे. ते चालुक्य वंशातील होते. त्यांनी भारतभ्रमण केले होते. बद्रीनाथ येथे त्यांनी नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता. काही कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरच्या जंगलात ते राहिले होते. तेथे त्यांनी योगसाधना केली. तसेच वनौषधींचा अभ्यासही केला. पुढे ते गगनगिरी किल्ल्यावर आले. तेथे त्यांचा मठ आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथेही त्यांचा पाताळगंगा मठ आहे. तेथेच त्यांचे चार फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.  

  पंत अमात्यांचा वाडा

छत्रपतींच्या अष्टप्रधानांपैकी पंत आमात्य बावडेकरांचा शिवकालीन वाडा हेही एक आकर्षण आहे.गगनबावडयापासून साधारण ९ किमी. अंतरावर एक भव्य ऐटबाज हवेली आहे. ही हवेली छत्रपती शाहू महाराजांच्या पंतप्रधानांनी बांधली आहे. त्यांचे उपनाव केळकर होते. या हवेलीमध्ये आल्यावर थंड गारवा, निलगिरीची रांगेनी उभी राहिलेली झाडे आणि नयनरम्य परिसर यांनी मन अतिशय मोहून जाते. या हवेलीमध्ये गतकाळाचे वैभव, मराठयांची शान, यांच्या निशाण्या सतत साद देत राहतात. हवेलीची भव्यता प्रथमदर्शनीच नजरेत भरते. सुरवातीला मोठे पोर्च, लांबलचक पाय-या आहेत. आतल्या दालनांमधील काळोख पचवण्यासाठी एक आंतरिक धीटपणा लागतो. 

       आतल्या भव्य मोठमोठया पण अंधाऱ्या चार खोल्या सोडल्या की वर जाणारा एक उंच पायऱ्यांचा जीना लागतो. या जिन्याने वर पोहोचल्यावर हंडया-झुंबरे असलेला उठ-बस करण्याचा खास दिवाण आहे. त्याची शान, आजूबाजूची झाडे आणि भरपूर मोकळी जागा यामुळे मनातील सर्व प्रकारची किल्मिषं दूर होतात. या जागी असणाऱ्या दोनही भव्य दिवाणखान्यांना मोठया खिडक्या जशा आहेत, तसेच मोठे व्हरांडे देखील आहेत. एक कोठीची किंवा साठवणीची खोली बाजूलाच आहे. त्या पलीकडे निजायच्या खोल्या लागतात. शिसवी पलंग, जुन्या काळातील घडवंच्या यांनी ह्या खोल्या सजल्या आहेत. या हवेलीच्या आवारात दोन विहिरी आहेत.
   जिन्यावरून पुन्हा खाली आल्यावर थोडं पुढे सरल्यानंतर डावीकडे दोन खोल्या व बाथरूम आहे. तिथून मागच्या मोकळया अंगणात पाऊल पडल्यावर बऱ्याच वेळानंतर प्रकाश दिसल्याची गंमत वाटते. तिथे समोरच पाटाचं खळखळ वाहणारं पाणी येतं. मनसोक्त पाण्यात डुंबण्यासाठी या पेक्षा मस्त जागा या परिसरात दुसरी नाही. हवेलीच्या चहुबाजूला बागा आहेत.
आपला परंपरागत इतिहास, पेशव्यांचा कालखंड, मराठयांचा उदय, सरंजामशाही, शाहू राजांचा कालखंड याच्या अस्तित्त्वाच्या खुणा या हवेलीच्या भव्यतेमध्ये सापडतात. अनेक मराठी मालिका व चित्रपटांचे शुटिंग या हवेलीमध्ये झाले आहे. विविध प्रसंगी, विविध प्रकारे इथल्या जागेचा उपयोग करता येतो. या हवेलीची शान, वैभव, शांत परिसर, झाडी, मागेच डोंगराळ अरण्य यामुळे निर्भरशील दिग्दर्शकांना प्रस्तुत लोकेशनचा वापर करावा असं वाटत राहीलं तर काहीच नवल नाही.
गगनबावडा या शब्दामध्ये आकाश व बावडी म्हणजे विहीर हे दोन शब्द आहेत. आकाश जेंव्हा विहिरीत पडतं, त्यावेळी आपल्या मनामध्ये पसरणारी निळाई ही याच बावडयात कशी?…, असं वाटत राहतं. एक असीम तन्मयता आपल्यात सामावते. या जागेची हीच तर मज्जा आहे. इथे नागर परिसरातील कोलाहल नाही. फॅशन नाही. गलबला नाही. गिचमिड नाही. म्हणूनच इथल्या ‘बावडयात गगन’ डोकावतं.  

हत्तीमहाल,राधानगरी

राधानगरी परिसरावर राजर्षी शाहू महाराजांचे शिकारीच्या निमित्ताने सारखे येण जाण असेे. राधानगरी धरणाच्या निर्मिती संकल्पनेनंतर या परिसराला शाहूंचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यातूनच पुढे राधानगरी शहराची निर्मिती झाली.राधानगरीपासून धरणाकडे जाणा-या मार्गावर दोन कि.मी अंतरावर शाहू महाराजांच्या काळात या ऐतिहासिक हत्तीमहालाची निर्मिती झाली. हत्तीमहाल म्हणजे हत्ती ठेवण्याची किंवा खेळण्याची साठमारी. एकमेकांशी काटकोनात असणा-या भव्य दोन इमारती आणि प्रत्येक कोप-यातील प्रवेश कामानीने एकमेकांशी जोडला गेल्याने आतील बाजूस भव्य चौक असे या इमारतीचे वर्णन आहे. संपूर्ण इमारत दगडी बांधकामातील दुमजली असून तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लोखंडी पँनेलवर भाजीव विटांच्या सहाय्याने घालण्यात आलेला स्लब त्यावेळच्या वास्तुकलेचा एक आदर्श उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. यापैकी खालील समोरच्या दोन इमारतीमध्ये हत्ती बांधण्यासाठी दोन हॉल असून या इमारतींना छोटी प्रवेशद्वारे आहेत. तर वरच्या मजल्यावर प्रेक्षाग्रह म्हणून वापरण्यात येत असावे. चिडलेल्या हत्तींचे चित्कार आणि आपापसातील झुंज हि या खेळाची वैशिष्ठे होती.हत्तिमहालाच्या मागिल बाजूस भव्य असे पिंपळाचे झाड व आहे.हत्तीमहाला शेजारी एक छोटेे हनुमानाचे मंदिर आहे.
विशेष आभार - विजय काताळे.

बोरबेट

पळसंबे येथुन काही अंतर गेल्यानंतर बोरबेट गावाच्या टोकाशी असणा-या डोंगरावर चढाई करुन वर गेल्यास आपण बोरबेट पठारावर पोहोचतॊ. या पठारावर  हिनयान पद्धतीची लेणी आहे सध्या येथे मोरजाई देवीचे मंदीर आहे. येथे अनेक वीरगळी, सती शिळा  आहेत.या लेण्यापर्यंत पठारावरुन जात असता तीन दग़डी चौकटी लागतात, येथे दरवाजा किंवा तटबंदीचे अवशेष अस्तित्वात नाहीत मात्र या चौकटी मात्र दिमाखात उभ्या आहेत. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दिपमाळ तसेच दगडी समाध्या इतिहासाचे साक्षीदार उन वारा सहन करत उभी  आहेत. येथे अनेक दगड अस्ताव्यस्त पसरले आहेत. त्यावरुन ते तटबंदीचे दगड असावेत असे निदर्शनास येते. सध्या येथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही तसेच पोडी आढळत नाही. त्यामुळे सोबत जाताना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी. सध्या या लेण्याच्या दर्शनी भागात पडझड झाल्याने दगडी बांधकाम केलेले असल्याचे बाजुचे कातळावरुन दिसुन येते.





इ. स. पुर्व दुस-या शतकात सातवाहन काळात बौद्ध भिक्खु, सार्थवाहक यांनी स्थानिक आदिवासीचे (स्थानिक लोकांचे) नागरीकरणाचे प्रयत्न केले. व्यापारीदृष्टीने  त्यांना ज्ञान दिलेः पळसंबा हे पळस व आंब्यापासुन रेशमी कापडाकरिता केशरी रंग बनविण्याचे व निर्यात करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या अनुशंगाने पळसंबे कदाचित चिंतनाचे व बोरबेट हे व्यापारी ठिकाण असण्याची शक्यता आहे.
 
 मोरजाई पठार :-
 









 
https://mrudaghandha.blogspot.com/ 

  मुडागड : -

कोल्हापूर जिल्ह्यातील फारसा कोणास माहिती नसलेला, किल्ल्याचे अगदी तुटपुंजे अवशेष शिल्लक असलेला पण सुंदर जंगल भटकंतीचे अपरंपार सौख्य मिळवून देणारा हा किल्ला. कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव ते पडसाळी हा गडाकडे जाण्याचा मार्ग. पडसाळी या छोटय़ा गावात कोणी वाटाडय़ा मिळाला तरच ही गडयात्रा शक्य होते. पडसाळी गावातून यासाठी जवळजवळ दोन तासांची जंगलयात्रा करावी लागते. गडमाथ्यावर फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागाच नाही. सगळे जंगलच जंगल. तेही घनदाट. या गडाचा फारसा इतिहास ज्ञात नाही, फक्त 1748 च्या पेशव्यांच्या अधिकार्‍याने पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आढळतो. पडसाळी येथे झालेले धरण, घनदाट जंगलातील भटकंती यासाठी जर का इकडे वाट वाकडी केली तर अविस्मरणीय आनंदाची प्राप्ती मात्र नक्कीच होते.

 भोगेश्वर
श्री क्षेत्र करवीर म्हणजे जगदंबेच आनंद विहार क्षेत्र. या क्षेत्री शरिराला क्लेष म्हणजे त्रास देऊन केलेल्या उपासनेचा निषेध केला आहे. आई च्या मते सर्व लेकरांनी खाऊन पिऊन सुखी असावं.
अगदी ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे
*इंद्रिया न कोंडी, भोगासी न सोडी*
*अभिमान न सोडी, स्वजातीचा ॥*(इथं स्वजाती म्हणजे आपल कर्तव्य. संदर्भ तुका म्हणे येथ पाहिजे जातीचे येरागबाळाचे काम नोहे)
*कुलधर्म ते आचरून, विधीनिषेध ते पाळून*
*सर्व सुखॆ भोगून, मुक्ती आहे ॥* या प्रकाराची साक्षात अनुभुती घ्यायची जागा म्हणजे करवीर. इथं नित्य नदीला होळी आणि अंबाबाई ला पोळी अशी भुक्ती म्हणजे आयुष्यातली सर्व सुख समृद्धी आणि मुक्ती म्हणजे मृत्यू नंतर चा मोक्ष अगदी सहज मिळतो. अशा या करवीर च पाचवं महालिंग विराजमान आहे तो कोल्हापूर पासून पश्चिमेला ३१ किमीवर असणाऱ्या बाजार भोगाव गावात. (काटे भोगावात ज्योतिबा आहे). सुंदर अशा नवीन बांधलेल्या जिर्णोद्धारीत मंदिरात करवीरचा हा भुक्तीदायक भोगेश्वर विराजमान आहे. भोगी हे नागांच आणि एक संबोधन त्यामुळे भोगीश्वर म्हणजे नागांचा ईश्वर अशी देखील व्युत्पत्ती सांगता येते. ही पश्र्चिम दिशेची सीमा पूर्वेच्या तुलनेत फारच जवळ आहे कारण पश्र्चिमेचा सह्याद्री देवी क्षेत्र आणि परशूराम क्षेत्र (कोकण) यांची सीमा म्हणून उभा आहे. 

महाद्वार चतुर्थ लिंग यात्रा
1पूर्व रामलिंग आळते ता. हातकणंगले
2 दक्षिण चक्रेश्वर चक्रेश्वरवाडी ता. राधानगरी
3 पश्चिम कलहेश शंकर ( कल्लेश्वर) कळे ता.पन्हाळा
4 उत्तर गुप्त मल्लिकार्जूनहर येडे निपाणी ता.वाळवा
या सर्व ठिकाणांचे कोल्हापूरहून अंतर 35-40 किमी आहे
बहिर्गृही जलशायी चतुष्क यात्रा
कोल्हापूर पासून 20-25 किमी अंतरावरच्या या चार गावच्या तळ्यात शेषनारायण मंदिरे आहेत अतिग्रे वगळता तीन मूर्तीचे दर्शन होते
पूर्व अतिग्रे ता हातकणंगले
दक्षिण कुर्डू ता.करवीर
पश्चिम बहिरेश्वर ता.करवीर
उत्तर तळसंदे ता. हातकणंगले या चारी तळ्याना अब्धी म्हणजे समुद्र अशी संज्ञा असून त्याना औदुंबर अश्वत्थ न्यग्रोध पलाश अशी नावे देखिल आहेत

 बहिरेश्वर


       कोल्हापूर ते बहिरेश्वर अंतर १८ की. मी. रंकाळापासून गगनबावडा कणकवली हायवेवर बहिरेश्वरसाठी मध्येच डाव्या बाजूच्या फाट्याने आत  वळायचे . बहिरेश्वरला जायचं म्हणजे भोगावती  नदीचा पूल पार करून जावे लागते. नदीवर जुन्या काळातील घडीव  दगडांचा छोटा  पूल आहे. पूल  बघता क्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो. पावसाळ्यात भागीरथीला  पूर आला की हा पूल पाण्याखाली जातो आणि या नदीवरील गावांचा  संपर्क तुटतो. 

                       भोगावती नदीवरचा दगडी पूल

     थोड्याच वेळात एका फाट्यावर बहिरेश्वर गावाची कमान ओलांडून आपण तळ्याजवळ पोहचतो. गावाच्या तिन्ही बाजूंना डोंगरांचा पहारा आहे. जसं डोंगरांच्या कवेत हे गाव वसले आहे. तळ्याच्या पाण्यावर कमळांच्या पानांची दाटी झालेली दिसते . जणू तळ्याने गुलाबी फुल विणलेली, हिरवी रजई आपल्याभोवती लपेटून घेतली होती. त्या रजईच्या  मध्यभागी भगवान विष्णूच छोट पण टुमदार, रंगीबेरंगी मंदिर उठून दिसतं. तळ्यातली कमळाची फूल बघून देहभान हरपत. पाणी, कमळ म्हटलं की बदक असणारच. तेथील पांढरी बदके, काळी बदके आपला तोल सांभाळत कमळाच्या या पानावरुन त्या पानावर जाताना दिसतात.




         पूर्वी तळ्यातील मंदिरात जाण्यासाठी ' काहिली ' चा वापर व्हायचा. पण गावकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून सिमेंट काँक्रीटचा पूल देवळापर्यंत बांधलेला आहे.

          मंदिरापर्यंत जाण्यासाठी केलेला सिमेंटचा पूल

    शेषशाही विष्णूची शाळीग्राम मधील मूर्ती
            मंदिर खूपच छोट आहे ६ X ६ असावं. गाभारा ही एकच छोटी खोली आहे. त्यात शेषनागावर निद्रिस्त विष्णूची मूर्ती आहे.   मुर्ती खूपच आखीव - रेखीव आणि सुंदर आहे. हे शिल्प शाळीग्राम दगडात कोरलेलं असून, भोज राजाच्या काळातील असावे असा अंदाज आहे. मंदिराबाहेर कृष्ण शिल्प शीळा व सती शिल्प शीळा आहे. एखादी महिला आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सती गेली असेल तर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शिळा बनवली जायची त्याला सती वृंदावन किंवा सतीशिळा म्हणतात .

सातेरी

हिरवे - हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे

    बहिरेश्वर पासून सातेरी ९ कि. मी अंतरावर आहे साधारण पंचवीस मिनिटांचा  छोटासा घाट रस्त्याचा प्रवास आहे. सातेरी  डोंगराच्या माथ्यापर्यंत गाडी जाते. डोंगराच्या माथ्यावर  महादेवाचे छोटस मंदिर आहे. मंदिराच्या थोडं खालच्या बाजूस पूर्वाभिमुख भला मोठा नंदी आहे. नंदीचे वैशिष्ट्य असं याच तोंड मंदिराकडे नाही आणि कोणत्याही सुशोभीकरणा शिवाय तो विलोभनीय दिसतो. डोंगर माथ्यावर मंदिराच्या शेजारी एक छोटी विहीर आहे. पूर्वीच्या काळी येथे घनदाट जंगल होतं.
महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार यावेळी येथे  भाविकांची गर्दी असते .

                       डोंगर माथ्यावरील महादेवाचे मंदिर      

      लोभस नंदी                                                 

                                 सातेरी मंदिर 

        डोंगरापासून थोड्याच अंतरावर डाव्या बाजूला सातेरी देवीच मंदिर आहे. मंदिरात सात  शिळा आहेत. ज्या सप्त मातांच्या नावाने पूजल्या जातात. गावातील कोणत्याही शुभ कार्यामध्ये त्यांची पूजा महत्त्वाची मानली जाते. याची एक आख्यायिका सांगितली जाते.या गावात एका गरीब व्यक्तीला सात मुली होत्या त्यांचा पालन-पोषण तो करू शकत नव्हता म्हणून  मुलींना घेऊन तो या ठिकाणी आला आणि त्यांना, मी परत येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा म्हणून सांगून गेला. तो परत फिरला नाही आणि त्या मुली  पितृ आज्ञा नुसार तिथेच थांबल्या.  महादेवाच्या कृपेने त्यांच्या या शिळा बनल्या आणि त्या सप्त माता म्हणून वंदनीय झाल्या.
           या मंदिराची एक विचित्र प्रथा आहे. इथे देवाला कोल्हापुरी बनावटीच्या कातड्याच्या चपलांचा जोड वाहिला जातो. या गोष्टीचा कोणताही खुलासा झाला नाही. 

गाभाऱ्यातील सात शीळा

                     देवीला वाहिलेल्या कोल्हापुरी चपला

   बीड    

 

           सातेरी  ते बीड साधारण 13 ते 14 किमी आहे. हे तुळशी व भोगावती या नद्यांच्या संगमावर वसलेले गाव आहे. हे सध्या तेथे सापडणाऱ्या ' सोन्याच्या मुद्रा ' मुळे  प्रकाश झोतात आलेलं गाव आहे. या गावाचा ऐतिहासिक वारसा भोजराजाच्या इतिहासापर्यंत जातो. 
          येथील शिवमंदिर पांडवकालीन  आहे. पांडवांनी ते एका रात्रीत बांधलं  अशी आख्यायिका आहे.  त्याचे बांधकाम हेमाडपंथी शैलीतील  आहे.सभामंडपात विविध देवतांच्या मूर्ती आहेत तर गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. शंकर पार्वतीचे पितळी मुखवटे असून, त्या दोघांचे आलिंगन युक्त एक शिल्प ही आहे.  नंदीच तिरप्या मानेचं शिल्प सुंदरच आहे. पण नंदीचे स्थान प्रवेश द्वारासमोर नसून मंदिराच्या एका बाजूला आहे.  मंदिरासमोर ची दिपमाळा आजही दिमाखात उभी आहे. सणासुदीला त्यावर दिवे तेवत ठेवतात.  आज मितीस गावकऱ्यांनी मंदिराचं सुशोभीकरण केलेले आहे. त्यामुळे मंदिराच्या मूळच्या डामडौलाला थोडी बाधा आल्यासारखं वाटतं. पूर्वी मंदिराभोवती खूप झाडी होती . या मंदिराच्या प्रांगणात गेलं की आपोआप मनाला शांती  लाभते.
 मंदिराच्या बाहेरच्या बाजूला  छोट्याशा मंदिरात गणपतीची अवाढव्य मूर्ती आहे.

   

      डाळीपेक्षा लहान आणि कागदा  एवढी पातळ असलेली सोन्याची मुद्रा 

  (   फोटो लार्ज करून बघितला तर त्याच्यावरच डिझाईन दिसते)      

            या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात स्वाती नक्षत्रात जो पहिला पाऊस पडतो त्यावेळी गावकऱ्यांना सोन्याच्या मुद्रा सापडतात. त्या कुठून येतात, कशा सापडतात याचा गौडबंगाल आजही सुटलेले नाही, समजलेलं नाही.  याचा आकार हरभऱ्याच्या डाळी पेक्षाही  लहान आहे. एकदम कागदा सारख्या  पातळ  सोन्याच्या पत्र्यावर मुद्रा/ नक्षी कोरलेली आहे. आणि आश्चर्य म्हणजे  त्यावरील  नक्षीकाम वेगवेगळे आहे. शिवाय इतका पातळ पत्रा आणि त्यावरची नक्षी, कोणते उपकरण वापरून केली असेल याचं कोडं सुटत नाही .गावातील बऱ्याच लोकांना या मुद्रा सापडलेल्या आहेत त्या त्यांच्या संग्रही आहेत.
            आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावात  बऱ्याच ठिकाणी खोदकामात ' विरगळा ' मिळाल्या आहेत. वीरगळ म्हणजे युद्धात वीरमरण आलेल्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ  बनवलेलं शिल्प. यामध्ये खालच्या पट्टीत युद्ध दाखवले जात. त्याच्या वरच्या पट्टीत घोड्यावरून त्याला यक्ष घेऊन जातात. त्याच्या वरच्या पट्टीत शिवलिंगाची पूजा दाखवली जाते   म्हणजेच त्याला स्वर्ग प्राप्ती होते. त्याच्यावर चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात याचा अर्थ चंद्रसूर्य आकाशात असेपर्यंत त्या व्यक्तीचं नाव अजरामर राहील. गावकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विरगळा शिव मंदिराच्या प्रांगणात एकत्रित ठेवून एक संग्रहालय बनवल आहे.

                 मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या विरगळा

         गावाच्या लक्ष्मी तलावावर माता लक्ष्मीच प्राचीन मंदिर आहे. तेथेही अशाच विरगळा पाहण्यास मिळतात. एकूणच या गावाची जुनी ओळख ' वीरांचे गाव ' अशी असावी.
        इतिहास जाणकारांनी याचा अभ्यास करून तो सर्वसामान्यांसाठी आकलनीय केला पाहिजे. खरंतर अशा प्राचीन वास्तूंचे सुशोभीकरण न करता संवर्धन केले पाहिजे. जेवढे शक्य असेल तेवढे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या रूपात जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. हे बनवताना त्या कारागिरांनी आपल्या रक्ताचा घाम सांडला असेल, आपलं आयुष्य त्याच्यासाठी  वेचलं असेल याची कदर केली पाहिजे. इतिहास हे जगण्याची प्रेरणा असते. हा  प्रेरणा स्त्रोत आपण आपल्या वारसांना भेसळ न करता दिला पाहिजे.

   काही सूचना -:

१) हि  ठिकाण पाहण्याचा क्रम आपण आपल्या सोयीनुसार बदलू शकता
२) या ठिकाणांना ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत भेट देणे उत्तम
२) कोल्हापूर सोडल्यानंतर या बाजूला जेवण किंवा नाश्त्याची हॉटेल्स नाहीत तेव्हा जाताना आपल्या सोयीनुसार जेवणाचा टिफिन किंवा नाश्त्याचे साहित्य  घेऊन जाऊ शकता.  वनभोजनाचा आनंद मिळतो.     
लेखन सौजन्य -  सुनीता शाह दाजीपूर-

राधानगरी अभयारण्य : 

    करवीरनगरीला पश्चिम घाटाचा शेजार लाभल्यानं अप्रतिम निसर्गसौंदर्याबरोबरच नानाविध जाती-प्रजातींचे प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक तिथं आढळून येतात. कोकण किनारपट्टीकडून रांगडा सह्याद्री चढून घाटावर आलं की हा जैवविविधतेचा खजिना सापडतो. याच खजिन्यात एक असं रत्न आहे, ज्यानं आपल्या महाकाय काळ्याभोर शरीरानं या खजिन्याच्या सुंदरतेमध्ये भर टाकली आहे. हीच रत्नं असंख्य प्रमाणावर सापडणाऱ्या क्षेत्राची सफर आज आपण करू या. होय...तुम्ही बरोबर ओळखलंत! दाजीपूर वन्यजीव अभयारण्य...अजस्र शरीराच्या आणि अफाट ताकदीच्या गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं दाजीपूर.

स्वातंत्र्यपूर्वकाळात हे जंगल शिकारीसाठी राखून ठेवलेलं होतं. पुढं भारत स्वतंत्र झाल्यावर आणि कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात विलीन झाल्यावरही काही वर्षं या जंगलाचा शिकारक्षेत्राचा दर्जा कायम होता. पुढं महाराष्ट्र शासनातर्फे इथल्या शिकारीवर बंदी आणली गेली आणि १९५८ मध्ये दाजीपूरला संरक्षित अभयारण्याचा दर्जा मिळाला. गव्यांसाठी संरक्षित केलं गेलेलं हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात जुनं अभयारण्य आहे. पुढं १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी या धरणांच्या आसपासचा प्रदेश या अभयारण्याच्या हद्दीला जोडण्यात आला आणि या सर्व भागाचं नामकरण करण्यात आलं ‘राधानागरी वन्यजीव अभयारण्य.’ दक्षिण आणि उत्तर या पश्चिम घाटांच्या भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील पट्टा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या या ३५१ चौरस किलोमीटरच्या अभयारण्यात ‘दाजीपूर’ आजही स्वतःची वेगळी ओळख टिकवून आहे. निमसदाहरित जंगल या प्रकारात मोडणाऱ्या या दाजीपूर अभयारण्यात उत्तम पर्जन्यमानामुळे उभयचर प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे.

बेडकांच्या विविध प्रजाती दाजीपूरमध्ये आढळतात. अगदी बोटाच्या पेरापासून ते मोठ्या आकारापर्यंत इथं बेडूक आहेत. ‘देवगांडूळ’ हा इथला अजून एक खास उभयचर रहिवासी. निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्राणी त्यामानानं दुर्लक्षितच राहिला आहे. सापांच्याही अनेक प्रजाती दाजीपूरमध्ये आढळतात. नाग, फुरसे, मण्यार, घोणस या चार विषारी सापांबरोबरच बिनविषारी सापांचीही संख्या इथं जास्त आहे. पायवाटांवरून चालताना बाजूच्या एखाद्या झाडावर आपल्या खास ‘शैली’त बसलेला ‘बांबू पिट वायपर’ अर्थात ‘चापडा’ दिसू शकतो. विषारी सापांच्या वर्गाचा हा सदस्य हिरव्या तुकतुकीत रंगामुळे हिरव्या पानांमध्ये इतक्या बेमालूमपणे मिसळून गेलेला असतो की त्याला ओळखायला जरा कष्टच पडावेत. ‘वाइन स्नेक’ अर्थात् ‘हरणटोळ’ हा इथला अजून एक हिरवा सदस्य. बारीक लांबलचक शरीर आणि निमुळतं नाजूक तोंड असलेलं डोकं अशी ठेवण असणारा हा इथला निमविषारी रहिवासी एखाद्या झाडावर आढळू शकतो. रुका सर्प, एरिक्स व्हिटेकरी, खापरखवल्या अशा जातींच्या सापांची नोंदही इथं झालेली आहे. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही इथं मोठ्या प्रमाणावर आहे. एका नव्या प्रजातीच्या पालीचा शोध ‘बीएनएचएस’च्या संशोधकांनी याच परिसरात लावला. या पालीला Cenmaspis kolhapurensis असं नाव दिलं गेलं.

फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती इथं आहेत. निसर्गाच्या पुनर्निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घटक इथं मोठ्या संख्येनं आढळतो. परागीभवनाच्या माध्यमातून बीजप्रसार होण्यात फुलपाखरांचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय, फुलपाखरांची संख्या हा अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे. ‘सदर्न बर्डविंग’ हे भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू आणि ‘ग्रास ज्युवेल’ हे भारतातील सर्वात लहान फुलपाखरू. ही दोन्ही फुलपाखरं इथं बघायला मिळतात.

भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या दाजीपूरनं आणखी एक वैशिष्ट्य जपलंय व ते म्हणजे इथलं वनस्पतीवैभव. बराचशा भूभागावर ‘निमसदाहरित’ आणि काही भागात वर्षअखेर पानं गळणारं ‘पानगळी’ असं दोन्ही प्रकारांचं मिश्रण असलेल्या या जंगलात अनेक प्रजातींची झाडं आढळतात. सह्याद्री या भूभागाला लागूनच असल्यामुळे डोंगराळ भाग इथं मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे डोंगराळ भागात घनदाट अरण्य आहे. याशिवाय गवताळ कुरणं, विस्तीर्ण सडेही असल्यामुळे नानाविध जातींचे वृक्ष, वेली, झुडपं, ऑर्किड, फुलं, नेचे, बुरशी अशी विविधता इथं दिसते. झुडपं आणि वेलीही इथं मोठ्या प्रमाणावर आहेत. कारवीदेखील बऱ्याच प्रमाणावर आढळून येते. धरणीनं गर्द निळी शाल पांघरलेली वाटावी असा नयनरम्य देखावा कारवीला फुलं आल्यानंतर दिसू शकतो. कारवीला साधारणतः सात वर्षांतून एकदा फुलं येतात.

पक्ष्यांच्या बाबतीतही दाजीपूर ‘सधन’ आहे! मुबलक खाद्य आणि सुयोग्य निवारा यामुळे पक्ष्यांची संख्या इथं विपुल. निसर्गात होणाऱ्या बदलांचे सूचक असणारे हे पक्षी मोठ्या प्रमाणावर असणं हेच जंगलाच्या सुदृढतेचं लक्षण मानलं जातं. आजपर्यंत दाजीपूर इथं सुमारे २३५ प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातीची आणि सुमारे ३० ते ३२ प्रजातींच्या सस्तन प्राण्यांची नोंद झालेली आहे. अतिशय दुर्मिळ असं ‘पिसोरी’ हरण दाजीपूरमध्ये आढळलं आहे. ‘सह्याद्री व्याघ्रप्रकल्पा’च्या सीमा जवळ असल्यामुळे पट्टेरी वाघाचा वावरही दाजीपूरमध्ये आहे. सस्तन प्राण्यांच्या बाबतीत ‘श्रीमंत’ असणाऱ्या दाजीपूरचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गवा. गव्यांसाठी राखीव असणाऱ्या या अभयारण्यात गव्यांची संख्या साहजिकच मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

भारतात बहुतेक भागांमध्ये आढळणारा गवा हा तृणभक्ष्यी वन्यप्राणी. इंग्लिशमध्ये या प्राण्याला Indian Gaur म्हणतात. अनेक लोक चुकीनं या प्राण्याला Bison असंही म्हणतात; पण Bison भारतात आढळत नाही.

नरगव्याचा रंग काळाकुट्ट, तर मादीगव्याचा रंग तपकिरी असतो. पिल्लांचा रंग सोनेरी पिवळा असतो. नराची खांद्यानजीक उंची १७५ ते १८० सेंटिमीटर, तर शिंगांची व्याप्ती साधारणतः ८५ सेंटिमीटर. कळपानं वावरणारा हा प्राणी निशाचर असून तो समपादांगुलीय कुळात मोडतो. गव्याचं घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण असतं; पण श्रवणशक्ती व नजर मात्र कमजोर असते. महाकाय शरीर, अजस्र ताकद आणि वास ओळखण्याची कला ही त्याची वैशिष्ट्यं. पूर्ण वाढ झालेल्या नराचं वजन एक टन म्हणजे एक हजार किलोग्रॅमपर्यंत असू शकतं! गवत, झाडपाला, झाडाची साल हे मुख्य खाद्य असणाऱ्या या प्राण्याला दाजीपूरमध्ये मुबलक संख्येनं आढळणारी कारवी अतिशय प्रिय आहे. शरीरातील मिठाचं प्रमाण कमी झालं की गवे इतर प्राण्यांप्रमाणेच क्षार आणि खनिजयुक्त माती चाटतात. हा प्राणी बुजरा आहे. शीळ घालून गवे एकमेकांशी संवाद साधतात, तर धोक्याच्या प्रसंगी मोठ्यानं फुत्कार सोडतात.

 दाजीपूरच्या त्या अनवट वाटा तुडवताना वेगळाच आनंद प्रत्येक वेळी मला मिळत गेला. घनदाट जंगल, नैसर्गिक पाण्याची ठिकाणं, लांबलचक सडे, मुबलक खाद्य या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर असलेले विविध पशू-पक्षी, उभयचर, सरीसृप या सगळ्यांनी मला भुरळ घातली आहे. जंगलाची तटबंदी असणारा सह्याद्री चढून वर आल्यावर घामानं थबथबलेल्या अंगाला गार वारा लागला की जे सुख मिळतं त्याची तुलना कशाशीही होऊ शकणार नाही. इतक्या उंचीवर आलो की निसर्गाचं निराळंच रूप नजरेसमोर येतं. समोरची खोल दरी, वळसा घालत जाणारे ते सह्यकडे, आपण येताना पाठीमागं राहिलेलं आणि समोरच्या कड्यांवर असलेलं घनदाट अरण्य पाहिलं की माणसाच्या खुजेपणाची जाणीव व्हायला लागते. अध्यात्माशिवायच आपलं मन निसर्गाशी तादात्म्य पावतं आणि मग एकमेकांचे असे हृदयस्थ झाल्यावर, नकळत आपणच आखून घेतलेली लक्ष्मणरेषा पुसली जाते आणि निसर्गाच्या वाटेवरचा खरा प्रवास सुरू होतो. तो गुरू आणि आपण शिष्य हे नातं मनात पक्क होतं आणि मग त्याचं बोट धरून चालताना आपण आपलं माणूसपण पुन्हा शिकत जातो.

   राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे.या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. तसेच २३५ प्रकरच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. तर ३०० औषधी वनस्पती आढळतात.
      वनसंपदा व जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक वारसास्थळ असलेल्या या परिसरात राधानगरी, तुळशी आणि काळम्मावाडी असे तीन जलाशय जलसंपदेत भर घालत आहेत. त्यामुळे हा परिसर अधिक खुलून दिसतो. साताऱ्याच्या कास पठाराप्रमाणेच इदरगंजचा सडा (पठार) रानफुलांनी व्यापलेला पावसाळ्यात अनुभवता येतो. काळम्मावाडी धरणाची जागा छत्रपती शाहूमहाराजांनीच निश्चित केली होती. दूधगंगा आणि भोगावती नदीजोड प्रकल्पाचा यशस्वी प्रयोग धरणामुळे सहज शक्य झाला असून, नऊ टीएमसी पाणी भोगावती खोऱ्यात बोगदा (गॅबी बोगदा) करून वळवले आहे. दाजीपूर हे रानगव्यांचे मोठे वसतिस्थान आहे.
       भारतातील अतिसंवेदनशील ठिकाण असणार्‍या पश्चिम घाटात राधानगरी म्हणजेच दाजिपुर अभयारण्य आहे.दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगलपट्टा आहे.निमसदाहारीत जंगल प्रकारात याचा समावेश होतो. कोल्हापुर जिल्हयाच्या पश्चिमेस असणार्‍या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मि. आहे.समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फ़ूट असून येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मी.मी. आहे.
     दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्यचाच एक भाग आहे. पूर्वी हे जंगल शिकारी करता राखीव होते. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली.महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून याची नोंद आहे. राधानगरी व काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परीसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत.सडयावर व सडयाच्या भोवताली असणार्‍या दाट जंगलामधे एक संपन्न जैवविविधता आढळते.
प्राणी:.
राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३५ प्रकारच्या वन्यप्राण्याची नोंद झालेली आहे. यामधे दुर्मिळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ,बिबळ्या व फ़क्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरीण गेळा(पिसोरी) यांचा समावेश आहे. तसेच गवा, सांबर,भेकर,रानकुत्रा,अस्वल,चौसिंगा, रानडुक्कर, साळींदर,उदमांजर, खवलेमांजर,शेकरु, ससा,लंगूर याच बरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.
पक्षी:
निरीक्षणासाठी राधानगरी वन्यजीव अभयारण्य एक स्वर्गच आहे.राधानगरी अभयारण्यात आजमितीस २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबील, निलगीरी वूड पीजन, मलबार पाईड हॉर्नबील, तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे. जगात फ़क्त पश्चिम घाटात आढळणार्‍या पक्षांपैकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदीर ही पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत.
वनस्पती:
भारतातील राधानगरी अभयारण्याचे महत्व म्हणजे निमसदाहरीत व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगल प्रकारामुळे असंख्य झाडांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे.डोंगरातील दर्‍याखोर्‍यातील घनदाट जंगल,विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष,वेली,झुडपे,ऑर्किड्स,फुले,नेचे, बुरशी आढळतात.अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतातील द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथील भागात आहेत. ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडारआहे.करवंद,कारवी,निरगुडी,अडुळसा, तोरण,शिकेकाई,रानमिरी,मुरुडशेंग,सर्पगंधा, वाघाटी,धायटी इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.
सरिसृप व उभयचर:
सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली,सरडे,साप-सुरळी आढळतात.उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात.गांडुळासारखा दिसणारा देवगांडूळ यासारख्या पर्यावरणात महत्वाच्या पंरतू दुर्लक्षीत अश्या उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात.एका नव्या पालीच्या प्रजातीचा शोध प्रथमच राधानगरी येथे बी.एन.एच.एस. चे वरिष्ठ संशोधक यांनी लावला.त्या पालीचे नामकरण cenmaspis kolhapurensis करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३३ प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.ऑलिव्ह ‍फ़ॉरेस्ट स्नेक,एरिक्स व्हिटेकरी,पाईड बेली शिल्डटेल या दुर्मिळ सापांची नोंद झाली आहे.
फ़ुलपाखरे:
१२१ प्रजातींच्या फ़ुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे.सदन बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फ़ुलपाखरु (१९० मी.मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फ़ुलपाखरु (१५ मी.मी.) आहे.ही दोन्ही फ़ुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमुन सामुहिक स्थलांतर करणारी ब्लु टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फ़ुलपाखरे या ठिकाणी ऑक्टो-नोव्हेंबर महिन्यात आढळतात.

कसे जाल? : पुणे/मुंबई-कोल्हापूर-गगनबावडा-दाजीपूर

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : गवा, सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, खवलेमांजर, शेकरू, वानर, रानकुत्रा, बिबट्या, वाघ इत्यादी.

पक्षी : रानभाई, भांगपाडी मैना, लालबुड्या बुलबुल, नारदबुलबुल, कोतवाल, करियल, रानकस्तुर, शामा, मलबारी पोपट, पंचरंगी पोपट, सर्पगरुड, तुरेवाला सर्पगरुड, शिक्रा, मलबारधनेश, मुंगीखाऊ सुतार, पगडीवाला सुतार, चष्मेवाला, नाचरा, स्वर्गीय नर्तक इत्यादी.

राधानगरी धरण

       पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा म्हटला, की समृद्धीची शिखरे समोर येतात. अलीकडच्या काळात जिल्ह्याच्या शेतीत मोठी सुधारणा झाली आहे. पण याचे खरे श्रेय जाते ते राजर्षी शाहू महाराजांना. त्यांनी उभारलेल्या राधानगरी धरणामुळे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शिवारे हिरवाईने फुलली आहेत. या धरणाला शंभरहून अधिक वर्षे झाली आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या मनात या धरणाविषयी अतिशय जिव्हाळ्याची भावना आहे. या धरणाने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकले आहे. राजर्षी शाहू महाराज यांची पाण्याबाबतची ही दूरदृष्टी आजही पथदर्शी ठरत आहे.
       तलाव, विहिरी, बंधाऱ्यांसाठी साहाय्य केले महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणे कोल्हापूर संस्थानातही दुष्काळ पडत असे. दुष्काळाच्या काळात मदत करण्याची शाहू महाराज यांची भूमिका होतीच; परंतु दुष्काळ निर्मूलनाचा खरा मार्ग शेतीला पाणीपुरवठा वाढविणे हाच होय; असा विचार शाहू महाराज यांचा होता. यासाठी नद्या, विहिरी आणि तलाव या सर्व घटकांचा अवलंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संस्थानात होत होता. 1915-16 या वर्षांतील अहवालावरून असे दिसते, की कोल्हापूर संस्थानात नद्यांमधून 39,783, विहिरींमधून 39,845 आणि तलावांमधून 232 एकर असा एकूण 79,860 एकर क्षेत्रावरील शेतीला पाणीपुरवठा होत होता. तळी, विहिरी, बंधारे बांधण्यास शाहू महाराज यांनी प्रोत्साहन दिले व साह्यही केले.
राधानगरी धरण दूरदृष्टीचे प्रतीक
          केवळ भूजलातून पाणी न घेता नद्यांमधील पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी धरणाची संकल्पना मांडली. नद्यांचे पाणी अडवून ते पाणी शेतीतील पिकांसाठी उपयोगात आणावे यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. १९०९ मध्ये राधानगरी धरण प्रकल्प हाती घेण्यात आला. शाहू महाराज यांनी या धरणावर १९१८ पर्यंत १४ लाख रुपये खर्च केले. या धरणाच्या माध्यमातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी अडविले. जलसाक्षरता व जलसंधारण क्षेत्रात आजही मार्गदर्शक ठरावे, असे मौलिक कार्य राजर्षी शाहू महाराज यांनी केले. संस्थानाचा आकार, आर्थिक कुवत आणि तंत्रज्ञानाची मर्यादित उपलब्धता हे लक्षात घेता शाहू महाराज यांनी आखलेली व कार्यान्वित केलेली राधानगरी धरणाची योजना त्यांच्या महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीच्या धोरणाचे प्रतीक आजही मानली जाते.राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्‍नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ.स. १९०७ मध्ये महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. १९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव "राधानगरी' ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. राजर्षी शाहू महाराज यांनी धरण बांधण्यापूर्वी १९०२ मध्ये इंग्लंड, स्कॉटलंड व इटलीचा दौरा केला. तसेच येथील शेतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न केले.
         इ.स. १९०७ पासून पाहणी व आखणीचे काम सुरू होते. नोव्हेंबर १९०९ मध्ये या धरणाच्या बांधकामास सुरवात झाली. धरणाने तयार झालेल्या विशाल तलावाला ज्यांचे नाव देण्यात आले आहे, त्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते हे काम सुरू करण्यात आले होते. धरण बांधणी करताना अनेक अडचणी आल्या. पैसा कमी पडू लागला. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. 
         बांधकामाच्या टिकाऊपणाबद्दल शंका व्यक्त झाल्या. सुरवातीला कालव्यांचाही विचार होता. मधूनमधून काम थंडावलेसुद्धा; परंतु चिकाटीने शाहू महाराज यांनी हे काम सुरू ठेवले. संस्थानातील त्यांचे सर्वांत भव्य स्मारक ठरलेले हे धरण शाहू महाराज यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही; पण बरेच काम झाले होते. पुढे राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत हा प्रकल्प पुरा झाला. पायथ्याशी विद्युतनिर्मिती केंद्रही स्थापन झाले.महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते.हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो.
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ३८.४१ मीटर (सर्वोच्च)
लांबी  : १०३७ मी्टर
दरवाजे
प्रकार : स्वचलित
लांबी : १०६.६८ मीटर.
सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला २८३ घनमीटर
संख्या व आकार : ७ ( १४.४८ X १.५२ मी)
पाणीसाठा
ओलिताखालील क्षेत्र
क्षेत्रफळ  : १८.१३ चौरस कि.मी.
क्षमता  : २३६८ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २२०० लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १७२३ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ८
...असे आहे राधानगरी धरण
* राधानगरीजवळ भोगावती नदीवर संस्थानकाळात उभारलेले धरण
* आठ टी.एम.सी. पाणी साठवण्याची क्षमता
* सात स्वयंचलित दरवाजे
* या धरणामुळे, भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा फायदा
* धरणक्षेत्रात जलविद्युत प्रकल्प
* जिल्ह्याचा पश्‍चिम भाग झाला धरणामुळे समृद्ध  

राधानगरी धरण
ऐतिहासिक बेनझिल व्हिला

राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या राधानगरी धरणातील जलाशयात नयनरम्य आयलँड आहे. या आयलँडवर धरणाच्या बांधकामावर देखरेखीसाठी शाहूंनी बांधलेली वास्तू दुर्लक्षामुळे भग्नावस्थेत आहे. ही ऐतिहासिक दगडी वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राजर्षी शाहूंचा सहवास लाभलेली ही वास्तू राजर्षींचे एक जीवंत स्मारक आहे. त्यामुळे ही वास्तू नष्ट होण्यापूर्वी डागडुजी व जतन करण्याची गरज आहे. राजर्षी शाहूंच्या दूरदृष्टी आणि परिश्रमाचे प्रतीक असणारी ही वास्तू विलोभनीय असल्याने हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होऊ शकते. जगात जे चांगले ते जनतेसाठी करण्याच्या जिद्दीतून राधानगरीसारखे विख्यात धरण त्यांनी साकारले. 1907 साली राधानगरी धरणाची योजना पुढे आली. दुसर्यावर्षी लगेच धरण परिसरातील राधानगरी नावाने नव्याने गाव वसवले. धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम 1909 साली सुरू करण्यात आले. धरण बांधणीत कसल्याही त्रुटी राहू नयेत व प्रत्यक्ष बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी राजर्षी शाहूंनी या धरणासमोरच असणार्या डोंगरांच्या उंचवट्यावर दगडी वास्तू बांधली. स्वत: शाहू महाराज या धरणाचे बांधकाम पाहण्यासाठी येऊन या वास्तूत राहात. ही वास्तू आयलँडवर असून अत्यंत देखणी आहे. त्यामुळे या वास्तूला बेनझीर व्हीला (पार्शी भाषेतील हा शब्दाचे भाषांतर अद्वितीय सौंदर्य किंवा नयनरम्य असे मराठीत होते) असे नाव देण्यात आले. सध्या आसपासच्या गावांमध्ये या वास्तूला शब्दातील अपभ्रंशामुळे बेनगर नावाने ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून या वास्तूकडे कोणीही फिरकलेले नाही. त्यामुळेच ही वास्तू एकाकी भग्न राजवाड्यासारखी बनली आहे. वास्तू मोडकळीस आली आहे. ही वास्तू सध्या साप, विंचवासह सरपटणार्या प्राण्यांचे घर बनली आहे. आगामी काही वर्षांतच ही वास्तू नष्ट झालेली कळणारही नाही इतकी दुरावस्थेत आहे. उन्हाळ्यात धरणाचे पाणी कमी झाले कि हौशी पर्यटक याठिकाणी भेट देतात. जाण्याचा मार्ग --- राधानगरी-पडळी-राऊतवाडी गावापासून पाच मिनीटे वेळ लागतो . चार चाकी गाडीने गेल्यास थोडे अंतर चालावे लागते तर मोटर सायकल पायथ्याशी जाते.



दाजीपूर⭕*

कोल्हापूर जिल्ह्याचे राधानगरीच्या पुढे पश्चिमेकडचे शेवटचे टोक आणि तेथून कोकणला जाऊन भिडणारी फोंड्याची खिंड या दरम्यानचा परिसर म्हणजे दाजीपूर .
दाजीपूर म्हणजे फोंडा घाटाची सुरवात . दाजीपूर म्हणजे तुफान पाऊस. दाजीपूर म्हणजे घनदाट जंगल . अशी जरूर ओळख ; पण दाजीपूरची खरी ओळख आजही लपलेली आहे . *" दाजीपूर ' हे नाव म्हणजे दाजीराव अमृतराव विचारे* या संस्थानकालीन कर्तृत्ववान बांधकाम अधिकाऱ्याची स्मृती आहे . राजर्षी शाहू महाराजांच्या खास विश्वासातले जे चार - पाच अधिकारी होते, त्यापैकी एक दाजीराव विचारे होते . आज अभयारण्यामुळे दाजीपूर हे नाव सर्वांना माहिती आहे . पण दाजीराव विचारे यांची ओळख फक्त इतिहासालाच आहे .
दाजीपूरची चर्चा सर्व स्तरावर आहे . या पार्श्वभूमीवर दाजीपूर म्हणजे नेमके काय या स्मृतींनाही उजाळा मिळाला आहे .
आता जो दाजीपूरचा परिसर आहे , तो ओलवण या ग्रामपंचायतीचाच मूळ भाग आहे . किंबहुना दाजीपूर जंगलही ओलवणच्याच हद्दीत आहे . दाजीराव विचारे हे नाव त्यांच्या कर्तृत्वामुळे या परिसराशी जोडले गेले आहे . दाजीराव विचारे हे मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते . ती नोकरी सोडून शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत घेतले . ब्रिटिश अभियंता आर. जे. शानन यांच्या नंतर त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून दाजीराव विचारे यांची नियुक्ती झाली. ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ होते . राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान राहिले . बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून होतकरू मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते . त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला .
दाजीराव विचारे ,शाहूपुरीतील पाच बंगल्यापैकी एका बंगल्यात राहत होते. त्याकाळी हे पाच बंगले म्हणजे शान आणि मानाचे स्थान होते . आता त्यातल्या चार बंगल्यांच्या जागी मोठ्या अपार्टमेंट उभ्या आहेत. फक्त दाजीराव विचारे यांचा बंगला शिल्लक आहे .
या विचारेंनी एस . टी . स्टॅंडजवळ आता जे जेम्स स्टोन आहे , ती जागा शाळेसाठी नगरपालिकेला दान केली . विचारे विद्यालय म्हणून तेथे शाळा होती . काळाच्या ओघात ही शाळा पाडली . शाळेच्या मैदानावर बीओटी तत्त्वावर जेम्स स्टोन हे व्यापारी संकुल उभे राहिले . ज्यांनी जागा दान केली , त्यांचे नाव या संकुलाखाली गाडले गेले .
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने
*शाहू महाराजांनी 1909 च्या सुमारास त्यांच्या कर्तृत्वाला मान म्हणून ओलवण गावाच्या परिसराला दाजीपूर हे नाव दिले* . हेच नाव पुढे अभयारण्याला मिळाले . त्यामुळे दाजीपूर हे नाव जरूर सर्वतोमुखी झाले ; पण दाजी म्हणजे कोण हेच काळाच्या ओघात दडले गेले . आता स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने या परिसरातील कचरा तर दूर होईलच ; पण विस्मृतीत गेलेले दाजीराव विचारे पुन्हा नव्या पिढीसमोर येतील . 

अश्मयुगीन खजिना : चक्रेश्वर

निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (६) कि. मी अंतरावर  सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे.  चक्रेश्वरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील भोगावती साखर कारखान्यानजीकचे एक छोटे व दुर्लक्षित खेडेगाव. आज या गावात अश्मयुगीन संस्कृती, इ.पू. पहिले शतक ते इ.स. ८ वे शतक आणि १२ व्या ते १४ व्या शतकातील यादव काळ अशा मानवी इतिहासातील तीन महत्वपूर्ण टप्प्यांतील अवशेष आढळल्याने प्रसिध्दीस येत आहे. येथे पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या शिवलिंगाच्या उत्क्रांतीतील सुरुवातीचे सयोनी शिवलिंग, मानुषलिंगयुक्त शिवलिंग, मुखलिंग असे सर्व प्रकार तसेच पंचसुत्री, त्रिसुत्री आणि सर्वतोभद्र असे परंपरेनुसार दिसणारे प्रकार आढळले आहेत. त्यामुळे हा परिसर म्हणजे तंत्रमार्गी शैव सांप्रदाय कापालीक काळातील असावा असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. 

  चक्रेश्वरवाडी गाव, येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.

 गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे हेमाडपंथी मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असुन ते त्रिमुखी पुर्वाभिमुखी आहे. मंदिराच्या सभामंडपात दिपमाळेकडे मुख असणारी गणेशाची मुर्ती असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते. त्याच्या मागील तीन नंदी महादेवाचे पिंडीकडे तोंड करुन उभे आहेत. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभागृहात भैरव, कार्तिक स्वामी. महिषासुरमर्दिनी,इ देवतांच्या मुर्ती आहेत. येथे टप्प्यांची रचना असलेले शिखर आढळुन येते. मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी १२.३० वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो. मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचे बाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते 

या मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा बांधणी इ. स. १४९९ मध्ये झाली असण्याची शक्यता आहे, मंदिर पंचायतन आहे. वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत. येथे महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन त्या वाहनांवर विराजित आहेत.  मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुना शिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.

    पश्चिम महाराष्टातील प्रत्येक गावात वीरगळी, नागशिळा, सतीशिळा आढळतात. कोल्हापुरच्या बीड व त्याच्या शेजारील गावात मोठ्या प्रमाणात वीरगळी आहेत. गधेगळी या मात्र कोकण परिसरात आढळुन येतात. त्यांचा कालखंड शिलहार राजवटीचा मानला जातॊ. जो शिळेवरील विहीत केलेला नियम हुकुम यांचे पालन करणार नाही त्यांना दगडावर चित्रीत केलेप्रमाणे अभद्र शापवाणी (स्त्रि गधे मैथुन शिक्षा) वचने कोरली आहेत. 
अशा दोन गधेगळी या मंदिराच्या परिसरात आहेत. मंदिराच्या उजवीकडे चौकोनी पुष्यकरणी असुन ती बारामहिने पाण्याने भरलेली असते तीच गंगाबाब. तेथुन पुढे भुंगिरा आहे (भुंगीरा म्हणजे जमीनी खालील गुहा)त्याचे उत्खनन झालेनंतर एतिहासिक पुराव्यात भर पडेल. या मंदिराच्या डावीकडे अदिलशाही शैलीतील दर्गा आहे. 
पुढे गावातील ग्रामपंचायतीसमोरील मैदानात दगडी गुंड्या आहेत (गोलाकार गोळ्यसारखे मोठे दगड) या होळी, गावातील जत्रा तसेच रंगपंचमी दिवशी गावातील लोक पाच सात अशा विषम संख्येत प्रत्येकी एका बोटावर उचलण्याचा प्रघात बरीच वर्षांपासुन चालत आलेला आहे. याची माहिती मंदिराचे सध्याचे पुजारी सुरेश गुरव यांनी दिला. त्यामागेही काही खास कारण असण्याची शक्यता आहे, जे आज कालऒघात विस्मृतीत गेले आहे. 

         तेथुन पुढे गावाच्या उत्तरेस साधारणपणे दिड कि. मी अंतरावर तपस्या गुहा आहे, स्थानिक बोलीभाषेत ती तपशाची गुहा अशी तीची ओळख आहे.  तपस्या महायान लेणी समुह या समुहात सुरवातीच्या लेण्यात शिवलिंग असुन पुढील लेणी समुहात सुरुवातीस तीन ध्यान मग्न बुद्ध मुर्ती शेजारी एका राजाची (सम्राट अशोक) यांची मुर्ती, शेवटच्या लेण्यात बुध्द मुर्ती आहे ती सुस्थितीत आहे. तेथील उभी बुद्ध मुर्ती मात्र झिजलेने ओळखता येत नाही. लेणी समुहाच्या समोर स्तुप सादृश्य रचना आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर आहे ही जागा गंगासागर महाराज यांचे मालकिची असुन त्यांची ही सातवी पिढी आहे. तपस्या लेणी समुह ही पोहाळे प्रमाणे सम्राट अशोक कालीन असावी. या लेणी समुहात तपस्येकरिता खास दालन असुन तेथे वायुविजनाची सोय आहे मात्र या दालनात दोन्ही बाजुने येणारा प्रकाश आत येत नसल्याने ही ध्यान साधनेकरिताचे सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे. लेणी पाहुन होईपर्यंत सुर्यमावळतीकडे झुकल्याने आम्ही परत गावातील आडापर्यंत आलॊ तेथुन पुर्वेस असणा-या टेकडीवर शिळावर्तुळ पाहण्यास जाउ शकतो.

        
 टेकडी चढुन खालुन दिसणा-या झाडाच्या खाली असणा-या मंदिराजवळ येऊन पोहोचतॊ. यास छत नाही हे ठिकाण शिवालय म्हणुन ओळखले जाते. येथे दोन वर्तुळाकार दगड असुन त्यावर मेगलिथिक बांधकाम शैलीप्रमाणे (500 BCE) दगडी रचना त्यावर वर्तुळ, कंकाळ, प्राणी मनुष्याकृती कोरल्या आहेत. तेथेच पुढे कोडबाव आहे, अभ्यासकांचे मते हे ज्वालामुखी मुख असावे गावातील प्रचलित दंतकथेनुसार या ठिकाणी पुर्वी ज्वालामुखी वाहत होती पुर्वजांनी येथे कपडे घालुन ती बंद केली कदाचित प्राचिन काळी ज्वालामुखी बाबत योग्य माहिती ज्ञात नसल्याने ज्वालामुखी थंड झालेनंतर ही कथा प्रचलित झाली असावी. पुढे या टेकडीवरील सर्वात उंच ठिकाणी शिलावर्तुळ आहे त्यावर उभे राहिल्यास आकाश धरणीला पुर्व – उत्तर ४० कि.मी. व दक्षिण-पश्चिमेस २५ कि.मी. अंतरावर असल्याचे भासते. अवकाश संशोधनाकरता ही जागा उपयुक्त असल्याचे अनेक खगोल शास्त्रज्ञांचे मत असुन त्याबाबत अभ्यास सुरु आहे. येथुन सुर्योदय सुर्यास्त अनुभवणे ही एक पर्वणीच आहे. शिलावर्तुळे म्हणजे दगड गोलाकार रचनेत मांडले जातात. अशी शिलावर्तुळे नागपुर, माहुरझरी इथे आढळली आहेत तेथे झालेल्या संशोधनानुसार ती अश्मयुगीन दफ़नभुमी असावी मृत व्यक्ती पुरल्यानंतर तेथे गोलाकार दगडरुपी स्मारक उभारले जायचे. हेही शिलावर्तुळ अश्मयुगीन स्मारक असावे.
अशाप्रकारे अश्मयुग, मोर्यकाळ, यादवकाळ ते आजअखेरीच्या इतिहासाचे चक्रेश्वरवाडी साक्षीदार आहे. तसेच चक्रेश्वरवाडी दुधगंगा व भोगावती नदीच्या मध्ये असुन येथुन कोकणात जाताना नदी पार करण्याची गरज नसल्याने हा जुना व्यापारी मार्ग असल्याचे वरील पुराव्यांनी अधोरेखित केले आहे. एकमात्र नक्की काळोघात प्रत्येक ठिकाणाचा वापर बदलत गेला. असा आहे अश्मयुग ते आजअखेरच्या काळाचा मुकसाक्षीदार ! 

शिवगड

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिध्द दाजीपूर अभयारण्याच्या वनक्षेत्रात हा फारसा कुणालाही ज्ञात नसलेला किल्ला आहे. शिवगडाचा माथा आटोपशीर असून गडाच्या चार कोपर्‍यावर बुरुज, मध्यभागी घरांच्या चौथर्‍याचे अवशेष, तट-बुरुजांचे अवशेष पाहावयास मिळतात. गडावर मनुष्यप्राण्यांचा वावर नसल्याने वन्य श्वापदांचा मुक्त वावर असतो. दाजीपूरच्या अभयारण्याच्या भटकंतीबरोबरच जिज्ञासू गडप्रेमी शिवगडाची भटकंती करु शकतात. शिवगडाचा वापर पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी होत असावा.

कोहलापुर पर्यटन - कोहलापुर दर्शन - कोहलापुर टॉप 10 टूरिस्ट पैलेस - Alvitrips
 

राउतवाडी धबधबा
कोल्हापुर शहरापासून साधारण ५० कि.मी.वर राधानगरी धरणाजवळ हा धबधबा आहे. पावसाळ्यात याठिकाणी जरुर भेट द्यावी. या बरोबरच परिसरातील राधानगरी धरणाचे बॅक वॉटर, दाजीपुर अभयारण्य अश्या बाकीच्या ठिकाणांना भेट देता येईल. 

दक्षिण विभागः-

भौगोलिकदृष्ट्या कोल्हापुर जिल्हा दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात पसरला आहे.इथे चंदगड,भुदरगड सारखे निसर्गाने समृध्द तालुके असल्यामुळे बरीच पर्यटनस्थळे आणि गड्,किल्ले आहेत. शिवाय कण्हेरी मठासारखे पर्यटकांचे मुख्य आकर्षणही आहे.

कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय

   
     कोल्हापूरापासून काही मैल अंतरावर हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे.असे म्हणले जाते की, लिंगायत धर्माच्या लोकांनी येथे एक शिवपिंडीची स्थापना, नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ह्या घनदाट अरण्यात करण्यात केली.मुळचे हे मंदीर हेमडपंती आहे. त्याच्या आतील 10’x10′ कोरीव बाजुच्या बाहेरील दोन मंडप आहेत, ह्या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. ५00 वर्षापूर्वी लिंगायत धर्माकार काडसिध्देश्वर यांनी ह्या मंदीराची बांधणी केली. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी या मंदीराला भेट दिली व मदत केली. मुस्लिम धर्माच्या मुख्य मिरासाहेब, ज्या शिवाच्या भक्त होत्या, त्यांनी मिरज येथील टेकडीवर अशा प्रकारच्या मंदिराची स्थापना केली.
      
  शिवरात्रीला महाराष्ट्रातून व कर्नाटकातून येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. काडसिध्देश्वर ईंस्टिट्युट मधुन तयार केलेल्या वस्तु इथे विकायला आहेत. कोल्हापूर शहरातून येथे येण्यासाठी बसची सोय आहे.तसेच आपले वाहन असल्यास अधिक सोयीचे आहे.
   कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणेरी गावातील सिद्धगिरी मठ हा ग्रामसंस्कृतीचे केंद्र आहे. ही संस्कृती जपण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करून मठाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्रामसंस्कृतीबरोबर सेंद्रिय शेतीचे वैविध्य पाहायचे झाले, तर या मठाला भेट द्यायलाच हवी.

    ग्रामजीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कणेरी (ता. करवीर) या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. दोनशेहून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे. मठ म्हटले, की आपल्या डोळ्यांपुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा-अर्चा आदी प्रकार. परंतु, कणेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनाची झलक तर इथे पाहावयास मिळतेच; परंतु सेंद्रिय शेतीबाबत अनोख्या पद्धतींचे संशोधन येथे केले जाते. कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळा, जोतिबा, अंबाबाई मंदिर याप्रमाणे आता कणेरीमठाचे स्थान पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी आले आहे. कणेरीमठाला प्राचीन धार्मिक परंपरा आहे. एका टेकडीवर दाट झाडीत हा रमणीय परिसर आहे.या ठिकाणचे सिद्धगिरी म्युझियम पाहण्यासारखे आहे.

    कणेरी मठ किंवा सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय हे कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. कुटुंबासमवेत संपूर्ण दिवस घालवण्यासाठी, खासकरुन मुलांसाठी हे ठिकाण आनंददायक आहे.

तिकीट काढून आत प्रवेश केला कि सुरवातीला गुहेसारखा भाग आहे. इथे आपलया प्राचीन संस्कृतीची ओळख करुन दिली जाते.सर्व देवांच्या कथा देखील दाखवल्या आहेत, तसेच अनेक ऋषी मुनींच्या कार्याची माहिती मिळते.

      नंतरच्या भागात ग्रामीण भागातील जीवनशैली अनेक शिल्पातून दर्शविली गेली आहे. तसेच भारतातील विविध सण देखील दाखविले आहेत.आपण एका खेडेगावात उभे असल्याचा अनुभव येतो. बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले; तरी ही बलुतेदारी म्हणजे काय? तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. 
प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे, इतकी जबरदस्त कारागिरी शिल्पकारांनी केलेली आहे. हे म्युझियम पाहताना जणू आपण जिवंत कारागिरांच्या घरीच जाऊन पाहतोय, असा भास होतो. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतातील घराच्या प्रतिकृतीही विलोभनीय आहेत. 


म्युझियम पाहण्याच्या सुमारे एक तासाच्या या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा आभास होतो. या ठिकाणी चारही वेद, आयुर्वेद यावर आधारित शिल्पे लक्ष वेधून घेतात.सात एकर पसरलेल्या जागेत जवळपास 300 पुतळे किंवा कलाकृती आहेत जे आपण पाहू शकता. काही पुतळे मेणाचे तर काही  सिमेंटचे बनवलेले आहेत. जेव्हा हे सर्व पाहून एखादी व्यक्ती बाहेर येते तेव्हा असे वाटते की ते प्रदर्शन नाही तर ही ग्रामीण संस्कृतीची वास्तविक जीवन कथा आहे आणि आपल्या देशातील प्राचीन इतिहास आणि संस्कृती या ठिकाणी प्रदर्शित होत आहे.
            कणेरी मठात वर्कशॉप आहे जिथे आपण आपल्यासमोर ताजे बांबू, कलाकृती , भांडी आणि बरेच काही वस्तु तयार होताना पाहू आणि शिकू शकता. मठामध्ये 4डी, 7डी टेकनॉलॉजि च्या  शॉर्ट फिल्म आणि  हॉरर हाऊससारखे आधुनिक शो देखील आहेत. हॉल ऑफ मिररला भेट देणे आवश्यक आहे कारण ते खुपच मजेशीर आहे ईथे वेग-वेगळे आरसे आहेत ज्यात मजेशीर प्रतिबिंब दिसते. परिसरात अनेक लहान सभागृहे, खाण्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स इ. विकणारी दुकाने आहेत. तसेच पुस्तकविक्रीही होती.
परिसरात स्वच्छतागृहाची चांगली सोय आहे तसेच रस्त्याच्या कडेलाही डस्टबिन (कचराकुंडी ) आहेत.
     मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे दोनशे देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या, मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना मठाच्या वतीने करण्यात आली आहे.
• प्रवेशाचे तिकिट - मूल: 100 रुपये आणि प्रौढ: 200 रुपये
• कणेरी मठ वेळ - सकाळी 9 ते संध्याकाळी 6
• पत्ता - सिद्धगिरी मठ आणि गुरुकुल फाउंडेशन, कनेरी, कोल्हापूर
• पार्किंग - कार आणि बस पार्किंगसाठी बरीच जागा
उपयुक्त सूचना -
• हे सुंदर संग्रहालय फिरण्यासाठी आपल्याला बरेच चालणे आवश्यक आहे.
• एकदा आपण चालणे सुरू केल्यास, मध्ये परत येण्याचा कोणताही मार्ग नाही जेणेकरून आपल्याला संपूर्ण फेरी पूर्ण करावी लागते.
• संग्रहालय बघण्यात आपण किती रस  घेत आहात यावर अवलंबून तुम्हला 1 ते 2 तास फिरण्यासाठी  लागू शकतात.
Map
कसे जाल?
कोल्हापूर गोकूळ-शिरगाव रस्त्यावर कणेरीमठाचा फाटा आहे. तिथून जाता येते.कोल्हापूर शहर येथून गाडीने साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.सिटी बसने: सिद्धगिरी म्युझियम बस स्टॉप येथे उतरणे. कोल्हापूर बसस्थानक व कणेरी मठ दरम्यान अंदाजे १२ कि.मी. अंतर आहे
 
 http://www.kolhapurtourism.org/kolhapur-siddhagiri-meseum.php

बाळूमामांचे आदमापूर

        संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या आडवळणी खेडेगावातील मायाप्पा-सत्यवा या पती-पत्नीच्या पोटी झाला. मायाप्पा-सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने कलागुणी म्हणून प्रसिद्ध होता. बाळू ग्रामस्थांपासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा होता. पण, बाळूचे असे वागणे आई वडिलांच्या जिव्हारी घोर लावण्यासारखे होते.
    बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पांनी त्याला गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले.
    बाळू त्याचे काम व्यवस्थित करत होता. काम करत असताना तो बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसायचे अस सांगितलं जातं.
   चंदूलाल शेटजींच्या गोठय़ातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे.एकदा सहजच गोठय़ामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन घडले अशी कथा आहे.
मायाप्पा आणि सत्यवा यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले. योग्य त्या वेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला. आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य-अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली.
   बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीनारायण महाराज-श्रीमौनी महाराज (पाटगाव) आणि श्रीमुळे महाराज अशी होती. येथून पुढे अनेक वर्षे ही गुरुशिष्यांची जोडी सर्वत्र संचार करती झाली. दरम्यान, बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र-भेटीला बाळूमामा जाऊ लागले. बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. पण, जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही.
       ‘स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चामडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलितपणे बोलत, तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती.
         ‘अखंड नामस्मरण’ आणि ‘रामकृष्णहरी’चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक सश्रद्ध मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी  ४ सप्टेंबर १९६६ रोजी आदमापूर येथे समाधी घेतली.
आदमापूर
   समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भक्तांची गर्दी वाढत आहे. आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे. या मंदिरात पहाटे ५ वाजता पुजा व आरती होते, ९ वाजता नैवेद्य होतो, संध्याकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यानंतर नैवेद्य होतो. दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबलीचा प्रसाद दिला जातो.
    या मंदिरात  सदगुरू संत बाळूमामा यांच्या समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात.

   बाळूमामांचे आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर येथे भव्य मंदिर, धर्मशाळा, प्रसाद हॉल अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत. रविवार, अमावस्या, पौर्णिमेस येथे भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. देवस्थानचे बकर्‍यांचे कळप देवमामांची बकरी म्हणून महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वत्र फिरत आहेत. ही देवमामांची बकरी आपल्या शेतात बसावीत म्हणून लोक श्रध्देने आग्रह करत असतात.

अदमापुरातील श्री संत बाळूमामा मंदिरात कसे पोहोचाल--
      श्री संत बाळूमामा यांचे समाधी स्थान आदमापूर नावाच्या खेड्यात आहे .कोल्हापूर शहर ते आदमापूर हे अंतर ५० कि.मी. आहे. जर आपण कर्नाटकहून येत असाल तर जवळचे शहर म्हणजे निपाणी. निपाणी ते आदमापूर २५ कि.मी. अंतरावर आहे  

गारगोटी : -

    हे भुदरगड तालुक्याचे मुख्यालय आहे. गार्ग्य मुनींच्या नावामुळे या गावाला गारगोटी नाव पडले असेही समजले जाते. त्याच पद्धतीने या गावातील लोकांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. ११ डिसेंबर १९४२ रोजी येथील खजिना लुटण्याच्या प्रयत्नावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात जणांना हौतात्म्य आले. इंग्रज राजवटीत सैनिकांच्या घोड्यांसाठी या ठिकाणी एक पागा होती. ही पागा इमारत आजही इतिहासाची ठळक निशाणी आहे. या इमारतीत शाहू महाराजांच्या काळापासून शाळा भरते. तसेच इंग्रज राजवटीत येथे कारागृह होते. या कारागृहांतील कैद्यांसाठी वेदगंगा नदीवर एक घाट आहे. तो आजही ‘कैदी घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. गारगोटी हे गाव शैक्षणिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. गारगोटीच्या आसपास काही भागात बॉक्साइट ही खनिज संपत्ती आढळते. अलीकडच्या संशोधनात जिप्समचे साठेही डोंगररांगांत सापडले आहेत. याशिवाय शाडू, कौलांची - विटांची माती, काळे बेसॉल्ट व जांभा दगड येथे आढळतो. मौनी विद्यापीठ हे गारगोटीजवळील बहिरेवाडी गावाचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. जे. पी. नाईक यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले शैक्षणिक संकुल. बालवाडी ते महाविद्यालयीन शिक्षण, तसेच पीएचडीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळणारे हे ग्रामीण भागातील एकमेव ठिकाण आहे. कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, स्थापत्य, संगणक, व्यवस्थाप शास्त्र असे सर्व प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी येथे मिळते.

तालुक्यात लक्षवेधी प्रेक्षणीय स्थळे
गारगोटी येथील मुळे महाराज, आदमापूर येथील संत बाळूमामा, शेणगाव येथील फातिमा चर्च, मडीलगे खुर्द येथील डोंगरावरील जोतिबा मंदिर ,पाल येथील गुहा, अशा प्रकारच्या अनेक प्रेक्षणीयस्थळांना भेटी देता येतील.  सुट्टीतील पर्यटनासाठी स्वस्त पर्यटन म्हणून या तालुक्याला पसंती दिल्यास निश्चितच मनाला समाधान लाभेल. ठिकठिकाणी नव्याने सुरू झालेल्या फार्म हाऊसवर आपण एकदिवस वस्ती करू शकता. याशिवाय तालुक्यातील बेडीव येथील म्हातारीचा पठार, मिणचे येथील ८00 मीटर उंचीवरील बसुदेवाचे पठार, भटवाडी आडे गावातील बुद्धकालीन सिद्धगुहा, नवले येथील राईचा झरा, अशी अनेक स्थळे आपण पाहू शकता.

गारगोटीजवळ फाये नावाचे गाव आहे तिथे नदीपात्रात एक नायकिनीचा दगड म्हणून प्रशस्त दगड आहे.याला स्थानिक लोक तमाशाचा दगड म्हणतात. अगदी रंगमंच वाटेल असा हा दगड आहे. पुर्वी नायकिनी तिथे नाचायच्या आणि श्रीमंत तो पहाण्यासाठी यायचे.



पाटगाव : 

     भुदरगड तालुक्यातील गारगोटी या तालुका मुख्यालयापासून ३४ कि.मी. तसेच कोल्हापुरपासून ८४ कि.मी. अंतरावर असलेले पाटगाव छत्रपती शिवरायांचे गुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौनी महाराजांच्या समाधीस्थानामुळे प्रसिद्ध आहे. ब्राह्मण धर्मगुरूंकडून होणारी बहुजन समाजाची धार्मिक आणि आर्थिक पिळवणूक कायमची थांबवण्यासाठी शाहू छत्रपतींनी मौनी महाराजांच्या गादीवर १९२० साली सत्यशोधक विचारांचा अभ्यासक असणार्‍या सदाशिव लक्ष्मण पाटील-बेनाडीकर या तरूणाची मराठय़ांचा 'छात्र जगदगुरू' म्हणून नेमणूक केली होती. मौनी महाराजंची समाधी असलेल्या मठाची इमारत भव्य असून नगारखाना असलेल्या महाद्वाराच्या आतील बाजूस भव्य सभामंडप आहे. मंडपात संपूर्ण दगडी फरशी असून मोठे लाकडी खांब आहेत. समाधीच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून तेथील खांबावर कोरीव काम केलेले आहे.मौनी महाराजांच्या समाधीच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून तेथील खांबावर कोरीव काम केलेले आहे. मौनी महाराजांची समाधी व मंदिराचे सर्व बांधकाम दगडी आहे. समाधी समोरील कोनाडय़ात मौनी महाराजांची उत्सवमूर्ती असून ती चंदन उगाळून बनवलेली आहे. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी निघताना येथे येवून मौनी महाराजांची गुरुकृपा-संपादन केली होती. त्यांच्या भेटीच्या ठिकाणी स्मारक उभारलेले आहे. शिवराय दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येईपर्यंत मौनी महाराज समाधिस्त झाले होते. दिनांक तीन जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्र भोजनासाठी सनद दिली होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या काळात सुरुवात झाली होती. महाद्वार, सभामंडप, कोरीव खांबांच्या सजावटीसह ओवऱ्या, तसेच भद्रकालीचे मंदिर हे यथील वैशिष्ट्य.
जवळच मौनी महाराजांचे प्रथम शिष्य तुर्तागिरीची जिवंत समाधी आहे. मौनी महाराजांनी आयुष्यभर मौनव्रत धारण केले होते. मठात प्रतिवर्षी श्रवणात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत व माघ महिन्यात रथसप्तमीपासून त्रयोदशीपर्यंत दोन उत्सव साजरे केले जातात. गावात यादवकालीन भद्रकालीचे मंदिर असून या मंदिरातच करवीर संस्थापिका ताराबाई आणि पहिला छत्रपती शाहू यांचा समेट झाला होता. गावात शिवलिंग, दत्तात्रय, शंकर आदी अन्य मंदिरे आहेत. वेदगंगा नदीमुळे पाटगावचे दोन भाग झाले आहेत.

शिरसंगी येथील वटवृक्ष

शिरसंगी : 

   या गावात लक्षवेधी महाकाय वटवृक्ष आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हे ठिकाण आहे. याचा विस्तार एक एकरापेक्षा जास्त जागेवर झाला आहे. महाकाय या शब्दाचा अनुभव देणारा हा वटवृक्ष आहे.

भुदरगड:-

The historic 'Bhudargad' attraction to the tourists -: the natural beauty of the landscapes | ऐतिहासिक ‘भुदरगड’ची पर्यटकांना भुरळ -: निसर्गसौंदर्याची उधळण

ऐतिहासिक ‘भुदरगड’ची पर्यटकांना भुरळ -: निसर्गसौंदर्याची उधळण

 भुदरगड तालुक्यातील ऐतिहासिक गडकोट, तीन संतांच्या संजीवन समाधी, मडीलगे खुर्द येथील डोंगरमाथ्यावरील जोतिबा ही पर्यटनासाठी उत्तम आणि सुरक्षित स्थळे आहेत. तर ट्रेकिंग हौशींसाठी अनेक डोंगरदर्‍या साद घालत आहेत. याशिवाय ज्या गडावर चारचाकी वाहनाने जाता येते, असा गडकोट भुदरगड आहे.
   शिलाहार राजा दुसरा राजा भोज यांनी पंधरा गडकोटांची निर्मिती केली. त्यातील रांगणा आणि भुदरगड हे दोन गडकोट भुदरगड तालुक्यात आहेत. तालुक्याच्या पश्चिमेला रांगणागड, तर पूवेर्ला भुदरगड असे दोन गड आहेत.
     ज्या गडांच्या नावावरून तालुक्याला नामाभिधान लाभले तो भुदरगड किल्ला हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गड आहे.  त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७मध्ये स्वराज्यात आला. इ. स. १६६७मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला घेतला व त्याची दुरुस्तीही केली आणि लष्करी ठाणे उभारले. मुघलांनी हे ठाणे परत ताब्यात घेतले. पुन्हा पाच वर्षांनी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक हल्ला करून मुघलांच्या प्रमुख सरदारास ठार केले व किल्ला जिंकून घेतला. मुघलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली. ती अजूनही देवळात पाहण्यास मिळतात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून, त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात आला. इ. स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड हे प्रमुख होते. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगड पुन्हा ताब्यात घेतला.
मराठा शाही, मुघल, इंग्रज अशा अनेक राजांची कारकीर्द पाहिलेला हा गड इंग्रजांच्या विरोधात देशातील सर्वांत पहिला लढा म्हणजे तात्या टोपेंच्या लढ्याच्या १३ वर्षे अगोदर या गडावरील सामान्य गडकऱ्यांनी लढलेले लढा आहे. यामध्ये इंग्रजांना तीन महिने हा गड जिंकता आला नव्हता. सामान्य गडकºयांनी लढलेली ही लढाई इतिहासात प्रथमच वेगळी लढाई म्हणून नोंदली गेली.
    समुद्रसपाटीपासून ९७८ मीटर उंचीवर बेसाल्ट जातीच्या एकाच खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा असून, सध्या सुस्थितीत आहे. या गडाच्या भिंती चिरा दगडात बांधलेल्या आहेत. जेथून चिरा काढला गेला येथे १४ हेक्टर क्षेत्रांत मोठे तलाव निर्माण झाले आहेत. सहसा गडावर एवढे मोठे तलाव कोठेही पाहावयास मिळत नाहीत. बेसाल्ट खडकावर कधीही पाणी साचून राहत नाही; पण या गडावरील या तलावात बारमाही पाणी असते.गडावर भैरवनाथ, महादेव मंदिर, दोन विहिरी, तर मुस्लिम राजवटीतील गोल घुमट असलेले मंदिर पाहता येते.
   गडावर भैरवनाथाचे प्रसिद्ध जागृत देवस्थान असून, येथे दर वर्षी माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.  भैरवनाथाच्या मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे. येथे जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाड्यात गडसदरेचे अवशेष आहेत. वाड्याच्या पलीकडे करवीरकर छत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे. सभामंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे. जवळच दूधसागर तलाव आहे. हा तलाव भुदरगडचे वैभव मानले जाते. किल्ल्यावरून दूधगंगा, वेदगंगेचे वनश्रीने नटलेले खोरे दिसते. 
    ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडाच्या सभोवताली दुर्मीळ वनौषधी सापडतात. हा किल्ला कोल्हापूरपासून सुमारे ५०-५५ किलोमीटरवर आहे.तर गारगोटी शहरापासून अवघ्या दहा कि.मी. अंतरावर हा गड आहे. या गडावर जाण्यासाठी पक्की सडक असल्याने वर्षातील बारा महिने कधीही येथे जाता येते. या गडावर पुष्पनगर मार्गे जाता येते. याखेरीज पाल मार्गे देखील जाता येते.

रांगणा किल्ला : 

शिलाहार राजा भोज दुसरा याने साधारण इ. स. ११०० मध्ये हा किल्ला बांधला. समुद्रसपाटीपासून याची उंची २६०० फूट आहे. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. किल्ल्याची लांबी १६०० मीटर असून, रुंदी ९०० मीटर आहे.

 इ. स. १४७०मध्ये तो महंमद गावानने जिंकला. त्या वेळी ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला’ असे उद्गार महंमद गावानने काढले होते. त्यानंतर किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. त्याने सावंतवाडीकरांच्या ताब्यात तो सोपविला होता. छत्रपती शिवरायांनी कोकणातील हा किल्ला घेतला. आदिलशहाने परत किल्ला घेतला, त्या वेळी महाराज आग्र्याला कैदेत होते. त्या वेळी स्वत: जिजाबाईंनी खास मोहीम काढून १५ ऑगस्ट १६६६ रोजी रांगणा जिंकला. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी सहा हजार होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. औरंगजेबालाही दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. इतर किल्ले खालून वर चढून जाता येतात. हा किल्ला मात्र दरीच्या एका टोकाकडून खाली उतरत यावे लागते. युद्धशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे प्रवेशद्वार परिसराची रचना आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे. या किल्ल्यावर इमारतीचे अवशेष दिसून येतात. बारमाही पाणी असलेला तलावही आहे. रांगणाई देवी, तसेच गणपतीचे मंदिरही येथे आहे. पदभ्रमण, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे कोल्हापूर, पाटगाव, तांबडेवाडी, चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते; पण पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो.  तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमार्गे नारुरला येउन तिथून मस्त जंगलभ्रमंतीचा आनंद घेत गडावर जाता येते.मात्र गड विस्तृत असल्याने एक मुक्काम आवश्यक आहे. 

पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित
सिद्धाच्या प्राचीन गुहा
भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील भटवाडीच्या शेजारील सिद्धाच्या डोंगरांमध्ये असणाऱ्या प्राचीन गुहा पर्यटन व पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिल्या आहेत. या गुहेमध्ये असणाऱ्या शिवलिंग मंदिराचा(सिद्धनाथ) विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.



पाटगावपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर ताब्यांची वाडी उर्फ भटवाडी गावाच्या उजवीकडे दूरवर आकाशात घुसलेल्या गर्द अरण्याने लपेटलेल्या डोंगरास सिद्धास डोंगर म्हणून ओळखले जातो. पाटगाव धरणक्षेत्रातील पुनर्वसन झालेल्या ग्रामस्थांचा हा सिध्ददेव असून या डोंगरावर एकमेकाला लागून तीन गुहा आहेत. घनदाट जंगल, गर्द वनराई आणि सपाट मैदान पाहून मन भारावून जाते. कडक उन्हाळ्यातदेखील येथील हवामान थंडगार असते. रांगणा किल्ल्याकडे जाणारे कवचितच पर्यटक या गुहेकडे भेट देतात.
गुहेच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी पंधरा ते वीस फूट खाली पायऱ्या उतरून जावे लागते. मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाची पिंड व अनेक त्रिशूल आहेत. या गाभाऱ्याची उंची बारा फूट इतकी आहे. लांबी वीस, तर रुंदी बारा फूट इतकी आहे. यामध्ये आणखी लहान-मोठया आकाराच्या पाच गुहा आहेत. यांपैकी पहिली गुहा तीस फुटांपर्यंतच आहे. दुसरी 55 फूट लांब आहे. तिसऱ्या गुहेला डाव्या-उजव्या बाजूला अनेक मार्ग फुटलेले आहेत. त्यातूनच हा मुख्य मार्ग नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. हा मार्ग वेडीवाकडी वळणे घेत गेलेल्या आहे. गुहेमध्ये आत सरकेल तसा मार्ग चिंचोळा होत गेला आहे. गुहा वेडीवाकडी असल्यामुळे हवाही कमी प्रमाणात आत येते. गुहेच्या मुख्यावर महादेवाची पिंडी आणि त्रिशूल आहे; त्यामुळे याला सिद्धनाथ असे नाव देण्यात आले. या देवाची वर्षातून दोन वेळा यात्रा होतात. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री दिवशी पाटगाव, भटवाडी, शिवडाव येथील भाविक या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात हा सण दोन दिवस साजरा करतात. त्यानंतर एरवी हा भाग निर्जन राहतो. या परिसरात रानागवा, अस्वल, बिबट्या, साळीदर, विषारी साप यांचा वावर असतो. गुहेत वटवाघूळ आणि वन्यप्राण्यांचा वावर असल्याने उग्र वास येतो. या तीन गुहांतील मार्गांची माहिती घेतली असता या गुहा शिवकालीन असून, यातील एक मार्ग रांगणा किल्ल्याकडे जात असल्याचे सांगाण्यात आले. या गुहेमध्ये पडझड झाल्याने 50 फूट अंतर गेल्यानंतर मार्ग बंद झाला आहे; त्यामुळे या गुहांचे जतन करावे अशी मागणी जीत फौंडेशनचे अध्यक्ष सुनील धोंड यांनी केले आहे.
सिद्ध गुहा ह्या बुद्धकालीन गूढ रम्य, निसर्गसौंदर्याने रमणीय अशा आहेत. मुळात ह्या दक्षिणाभिमुख. महादेवाचे दैवी अधिष्ठान असल्याने येथील जंगलसंपदा सुरक्षित आहे. व्यसनी विक्रुतीला इथं थारा नाही. अशा पावित्र्यामुळे जंगल आणि पिढी सुरक्षित राहील.
-दत्ता मोरसे,
जंगल संशोधन.
ग्रुप ट्रेकिंग .. वन डे ट्रेक साठी खूप छान असे पर्यटन स्थळ आहे.
अधिकमहिती साठी संपर्क साधा
अभिजीत लोखंडे, कोल्हापूर.
9011234999

प्रतापराव गुजर स्मारक
   कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेला एक नितांतसुंदर तालुका म्हणजे गडहिंग्लज. अफगाणिस्तानातून आलेली हिंगुळजा देवी एका टेकडीवर आहे, ते मंदिर पाहावे. हिंगुळजा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज हे नाव गावाला मिळाले. गडहिंग्लजमधील काळभैरवाचे मंदिर पाहावे. तिथून १२ किलोमीटरवर असलेल्या सामानगड किल्ल्यावर जावे. गाडी किल्ल्यावर जाते. सातकमान असलेली हनुमान विहीर, वेताळ बुरूज, अंधार कोठडी पाहून घ्यावी. तिथून खाली यावे आणि पुढे २० कि.मी. वर असलेल्या नेसरीला जावे. सरनौबत प्रतापराव गुजर यांचा अंत इथे झाला. त्यांच्या स्मारकापुढे नतमस्तक व्हावे. तिथून पुढे इब्राहिमपूरला जाऊन झाडीत वसलेली जुळी जैन मंदिरे पहावीत .

नेसरी : 

  पावनखिंडीप्रमाणेच जिल्ह्यातील आणखीन एक स्फुर्तीदायक स्मारक म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे स्मारक. गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे.

    ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात...’ हे कुसुमाग्रजांचे काव्य ऐकले, की अंगावर रोमांच उभे राहतात. त्या घटनेचे साक्षीदार असलेले हे गाव घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अपूर्व बलिदानाने पवित्र झालेले हे स्थान आहे. येथे प्रतापरावांचा अश्वारूढ, आवेशयुक्त पुतळा बसवला असून, सभोवताली छोटे उद्यान विकसित केले आहे. सात ढाली आणि सात तलवारी आणि या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करणारी माहितीही येथे दिली आहे. तसेच शिवाजीमहाराजांचा सिंहासनारूढ पुतळाही येथे आहे.

     प्रतापरावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारीमुंड्या चीत केले. खान शरण आला आणि तह केला. प्रतापरावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले... ‘स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका...’ प्रतापराव संधी शोधत होते. परंतु बेहलोलखान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती. कारण रायगडावर राज्याभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर ‘तोंड दाखवू नका’ असा इशारा दिला होता. सरनोबत कात्रीत सापडले होते... हेच ते कुडतोजी गुजर ज्यांनी मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिले. अखेर खान पुन्हा एकदा समोर आला आणि अवघ्या सात जणांनी खानाच्या छावणीवर हल्ला केला. या वेळी सात जणांना वीरगती आली. सात वीरांची नवे पुढीलप्रमाणे १) विसाजी बल्लाळ, २) दीपोजी राउतराव, ३) विठ्ठल पिलाजी अत्रे, ४) कृष्णाजी भास्कर, ५) सिद्धी हिलाल, ६) विठोजी शिंदे, ७) सरनोबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. 

    धन्य ते वीर, धन्य त्यांची ती स्वामीनिष्ठा, असे छत्रपतींच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणारे वीर होते म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. सात ढाली व सात तलवारी यांच्या प्रतिकृती वापरून बांधलेले हे प्रेरणादायी स्मारक. 'म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे. 

हिंगुळजा देवी

   महाराष्ट्रामध्ये भटकंती करत असताना खरोखरच काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधू गेलो तर एकतर मिळत नाहीत, आणि जे मिळतात ते थक्क करणारे असतात.

     गडहिंग्लज हे गाव आणि तिथल्या हिंगुळजा देवीबद्दल असेच काहीसे म्हणावे लागेल. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार सतीचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकड्यांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानी बीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. हे जरी हिंदूंचे तीर्थस्थान असले तरीदेखील इथली मुसलमान जनता नानी बीबी या नावाने या देवीची पूजा करतात असे सांगितले जाते.हिंगुळजा देवी - पाकिस्तान ते गडहिंग्लज

    या हिंगुळजा देवीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. अगदी पराशुरामापासून ते श्रीरामापर्यंत अनेकांशी या कथा निगडीत आहेत. परशुरामाच्या क्रोधाला याच हिंगुळा देवीने शांत केले. तसेच रावणवधानंतर काही प्रायश्चित्त घेण्यासाठी श्रीराम हे सीता, लक्ष्मण, आणि हनुमानासमवेत याच हिंगुळा देवीच्या दर्शनाला आले होते. अशा प्रकारच्या अनेक कथा प्रचलित आहेत. याठिकाणी असलेली देवीची मूर्ति शेंदूरचर्चित तांदळा स्वरुपात आहे. ती स्वयंभू असल्याचे सांगतात. पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंसाठी एप्रिल महिन्यात येणारी हिंगुळा देवीची यात्रा म्हणजे मोठी पर्वणी असते. पूर्वी जवळजवळ ३०० कि.मी. ची रणरणत्या वाळवंटातून पायपीट करून तिथे जावे लागे. आता मात्र तिथपर्यंत उत्तम सडक झालेली आहे. नानी की हाज या नावाने पण ही यात्रा प्रसिद्ध आहे.

      तीच हिंगुळा देवी गडहिंग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली. गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेले तालुक्याचे गाव. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेले सुंदर असे शहर. हिंगुळा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. याच गडहिंग्लजमध्ये एका छोट्याशा टेकडीवर हिंगुळा देवीचे मंदिर वसलेले आहे. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठ्या व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली.

      मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात असलेले तेर हे गाव अगदी प्राचीन म्हणजे सातवाहनांच्या काळापासून एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. या गावीसुद्धा हिंगुळा देवीचे मंदिर आहे. हिंगुळा देवीचे अजून एक मंदिर राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात देखील ही हिंगुळादेवी असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते. गडहिंग्लज गावाला लागूनच असलेल्या छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत असून तिथून सगळ्या गावाचा परिसर न्याहाळता येतो. या डोंगराला गुड्डाईचा डोंगर या नावानेच ओळखले जाते. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या डोंगरावरून खाली आले की भडगाव मध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल, कमळ अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात. नाईक घराण्यामध्ये परंपरागत देवीची पूजा चालू आहे. गडहिंग्लज गाव आणि सारा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. सुप्रसिद्ध गिरीस्थान आंबोलीच्या जवळच असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. मुळात हिंगुळा देवी आणि तिची मंदिरे भारतात अगदीच दुर्मिळ. त्यातही महाराष्ट्रात या देवीच्या नावावरून एका मोठ्या गावाचे नाव पडलेले आहे. अशा या गडहिंग्लज ठिकाणी येऊन मुद्दाम या आगळ्या वेगळ्या हिंगुळा देवीचे दर्शन आवर्जून घ्यावे. नवरात्रात देवीची उपासना करताना मुद्दाम वेगळ्या रुपात असलेल्या निरनिराळ्या देवींना भेट देऊन त्यांचे दर्शन घ्यावे. आणि आपली नवरात्राची उपासना सत्कारणी लावावी.

- आशुतोष बापट 

किल्ले सामानगड

     कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या तालुका मुख्यालयापासून आग्नेयेस १० कि.मी.अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग फाटय़ावरील दीर्घ वर्तुळाकार टेकडीच्या माथ्यावर शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला हा दक्षिणेचा राखणदार म्हणजे किल्ले सामानगड. समुद्र सपाटीपासून 792 मीटर उंचीवरील या किल्ल्याने स्वराज्याच्या उभारणीत आपल्या वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे फार मोठे योगदान दिले आहे. वाहतुकीस सुलभ पण तरीही सुरक्षित असलेल्या या किल्ल्यावरून इतर गडांना किंवा सैनिकांना लागणारे सर्व युध्द साहित्य व इतर आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात असे. इ.स. १६७६ मध्ये छत्रपतींनी या किल्ल्याची दुरुस्ती केली होती. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढला असून त्यावर १० ते १५ फूट उंचीची तटबंदी व जागोजागी बुरुज बांधले आहेत.

     सामानगडावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता आहे. पर्यटकांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी. अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी आभुषणे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायर्‍या, पायर्‍यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. किल्ल्यातील सोंडय़ा बुरुजासमोर मुघल टेकडी आहे. किल्ल्यावर तोफ डागण्यासाठी मोघलांनी ती निर्माण केल्याचे सांगतात. गडभटकंतीबरोबरच हनुमान मंदिर, कातळ खोदून काढलेली लेणी, गडाच्या दक्षिणेकडील उतरणीवरील भीमशाप्पा नावाच्या सत्पुरुषाची समाधी व वनभोजनासाठी स्वच्छ पाण्याचे कुंड, 'भीमसासगिरी' हा मंदिर समूह यांच्या भटकंतीमुळे सामानगडाची सहल आनंददायी होते.

रामलिंग शिपूर

 आजरा मार्गावर स्तवनिधी घाट ओलांडला की  रस्त्यावर लगेच उजव्या हाताला एक भव्य कमान लागते. या कमानीतून आपण खाली पोचलो की दृष्टीस पडतं ते श्रीरामेश्वर मंदिर. अनेक रामेश्वरांप्रमाणे या रामेश्वराचा संबंध भगवान रामचंद्रांबरोबर जोडला जात असला तरी विचार करता हे स्थान परशूरामाशी संबंधित असल्याचे नाकारता येत नाही. मध्ययुगीन पाषाणी शिव  मंदिर  हे जरी वैशिष्ट्य असलं तरी क्षेत्रस्वामिनी महालक्ष्मी आणि परिवार देवतांची मूर्ती शिल्प हे इथल वैशिष्ट्य.मंदिरामध्ये आपल्याला पाण्याचे एक छोटे कुंड पन पहायला मिळते.मंदीरामध्ये श्री गणरायाची व श्री दत्तात्रयांची मुर्ती आहे.श्रावण महिन्यात मोठी यात्रा असते.

मंदिरातील काही छायाचित्रे









रामतीर्थ धबधबा :- 

गडहिंगलज -आजरा रोडवर आजर्‍याच्या अलिकडे उजव्या हाताला रामतीर्थकडे जाणारा रस्ता फुटतो. इथे हिरण्यकेशी नदीच्या तीरावर हे ठिकाण आहे.इथे रामतीर्थ हे शिवमंदिर आहे.मंदिराजवळच धबधबा आहे.उंचीने फार नसला तरी रुंदी बर्‍यापैकी आहे.जाता जाता आवर्जून भेट द्यावे असे हे स्थळ आहे.


गिजवणे- 

येथे एतिहासिक पेशवेकालीन गणपती मंदिर आहे.गडहिंग्लज आजरा रोडवर गिजवणे हे गाव आहे.

 चंदगड : 

      हे तालुक्याचं गाव आहे. तिलारीगड पॉइंट, ‘श्रीपादवाडी’ दत्तमंदिर ही येथील ठिकाणे. या ठिकाणी पावसाळी पर्यटन वाढू लागले आहे. इथे भातशेती, ऊस, नाचणी, तूर ही पिके आणि काजू, भुईमूग, नीलगिरी, फळभाज्या यांची लागवड केली जाते. आंबा, फणस, नारळ, सुपारी आदी परंपरागत झाडे आहेतच. काजूचे दहा-बारा कारखाने आहेत. येथील काजूला उत्तम चव आहे. 

      चंदगड परिसर ८ दिवस हिंडावा असा आहे. लाल माती, काजूची झाडे, कौलारू मंदिरे पाहून चंदगडला आल्यावर अगदी कोकणात आल्याचा भास होतो. रवळनाथाचे मंदिर बघून कलानंदीगडला जावे. तो पाहून आंबेवाडीपर्यंत मागे येऊन पारगडला जावे. तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा याच्याकडे पारगडची किल्लेदारी होती. भवानी मातेचे मंदिर आणि देवीची देखणी मूर्ती पहावी. चौकुळ-मार्गे आंबोलीला जावे. परिसर दाट झाडीचा आहे. प्रवास फारच रमणीय होतो. आंबोलीतला धबधबा पाहावा. तसेच हिरण्यकेशी नदीचा उगम आणि देवीचे मंदिर पाहावे. आंबोलीवरून सावंतवाडीला जाता येईल. अन्यथा आजऱ्याकडे निघावे. येताना वाटेत पुन्हा हिरण्यकेशी नदी लागते. रामतीर्थ मंदिर अवश्य पाहावे. 

गंधर्वगड :- 

चंदगड तालुक्यातील चंदगड-नेसरी राज्यमार्गावर चंदगडपासून 10 कि.मी. अंतरावर वळकुळी गावाचा फाटा लागतो. तेथून साधारण 3 कि.मी. अंतरावर गंधर्वगड आहे. गडाला लागूनच गाव आहे. सभासद बखरीप्रमाणे हा शिवनिर्मित गड आहे. पण शासकीय गॅझेटियरमध्ये मात्र याच्या निर्मितीचे श्रेय सावंतवाडीच्या थोरल्या फोंड सावंताच्य नाग सावंत या मुलग्यास दिले आहे. गॅझेटीयरमध्ये 1724 मध्ये नाग सावंतानी हा किल्ला बांधल्याचे म्हटले आहे. इतिहासात मात्र 15 जानेवारी 1687 मध्ये शिवराय स्वत: चार हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरात असल्याचा उल्लेख आहे. गडावरील चाळोबाचे प्रशस्त मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवताली जुन्या काळातील मूर्त्या व नक्षीकाम केलेले दगड आढळतात. इतिहासकालीन आजही वापरात असलेली विहीर आहे. गडाची काही तटबंदी सुस्थितीत असून त्यामध्ये चोर दरवाजे पाहता येतात. गडावर फेरफटका मारताना मुजलेली विहीर व जुन्या इमारतींच्या चौथर्‍यांचे अवशेष दिसतात.

प्रेक्षणीय पण उपेक्षित : पारगड

     कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील चंदगडपासून ३५ कि.मी. अंतरावरील हा शिवनिर्मित किल्ला. गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी याची निर्मिती शिवरायांनी 1675 साली केली आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील एका उंच शिखरावर हा बांधलेला आहे. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवरील पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी व जंगली जनावरांनी आणि पशु-पक्षांनी भरलेले आहे. ह्या हिरवाईमुळे कोणत्याही तूत गडास भेट देता येते. शिवकाळापासून किल्ल्यावर आजही वस्ती आहे. किल्ला चढून जाण्यासाठी ३६० पायर्‍यांची एक अरूंद चढावाची वाट आहे. किल्ल्याचा विस्तार ४८ एकर क्षेत्रफळाचा असून पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक अशी ताशीव कडय़ाची तटबंदी असून दक्षिणेला थोडय़ा उतारानंतर प्रचंड खोल दरी आहे. गडावर शिवकालीन जीर्णोध्दारात झालेले भवानी माता मंदिर आहे. याशिवाय गडावर महादेव मंदिर, मारुती मंदिरही आहे.

      पारगडावर फेरफटका मारताना आपणास चार तलाव, शिवकालीन बर्‍याचशा मुजलेल्या स्थितीतील १८ विहिरी, दगडी तटबंदी, तटबंदी व त्यावरील अनेक ठिकाणी केलेले बुरुजाचे बांधकाम, काही समाधी स्थाने, शिवकालीन पाणी पुरवठा करणारी कुडे, तोफा इत्यादी ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होते. संपूर्ण गड व्यवस्थित फिरण्यास दोन तास पुरतात. गडावर मुक्काम करायचे ठरवल्यास भवानी मातेचे मंदिर किंवा येथील शाळेत त्याची सोय होवू शकते. इ.स. १६८९ मध्ये हा गड जिंकण्याचा मोगलानी अयशस्वी प्रयत्न करून पाहिला होता. १७४९ मध्ये कोल्हापूर छत्रपतींनी हा किल्ला इनाम-जहागीर म्हणून सदाशिवराव भाउंना दिला होता. पारगड जवळचा तिलारी धरण परिसर इको टुरिझम झोन म्हणून विकसित करण्याचे प्रयास सुरू आहेत.    

तिलारी :-

 आपल्यातल्या बऱ्याच जणांनी यापूर्वी तिल्लारी बद्दल बरच वाचलं असेल, लिहलं असेल, बऱ्याच जणांना तिल्लारी माहित देखील असेल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील सीमाभागातील लोकांना हे ठिकाण जरूर माहीत असेल. पण हे सगळं असूनही तिल्लारी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातल्या, कोल्हापूर शहरातल्या आपल्यातला खूपशा लोकांना माहीत नाहीय, 

             तसं बघायला गेल्यावर आपल्यातल्या बहुतांशी कोल्हापूरकरांना आजरा व गडहिंग्लज हे दोनच तालुके जास्त परिचयाचे आहेत. चंदगड म्हणाल तर  दुर्गम, लांब आणि जंगली भाग असच चित्र आपल्याला माहीत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका व याचे शेवटचे टोक म्हणजे तिल्लारी. महाराष्ट्र, गोवा आणी कर्नाटक या राज्यांना जोडणारा सीमावर्ती भाग. पश्चिमेकडे वाहणाऱ्या व सह्याद्रीच्या घाट माथ्यावर उगम पावणाऱ्या तिल्लारी नदीमुळे या भागाला तिल्लारी म्हणून ओळखलं जातं. 

            तुम्ही कोल्हापुरातून निघून गडहिंग्लज नेसरी मार्गे चंदगड मध्ये पोहचाल व तिथून पुढे तिल्लारीकडे मार्गस्थ व्हाल तेव्हा चंदगडची वेस पार केल्यावर निसर्गानं स्वतः च तुम्हाला 'वेलकम टू द जंगल' असं ग्रीट केल्याचा फील येईल. साधारणपणे २० किमी अंतर आहे चंदगड ते तिल्लारी. तिथून पुढं मग सुळे, हेरे, मोटनवाडी व पार्ले ही लहान लहान गावं लागतात.  पार्ले क्रॉस केल्यावर पुढं रस्त्यावर कळसगादे हे गाव लागतं. साधारण २ ते ४ किमी च्या अंतरावर ही छोटी छोटी गावे लागतात. जेव्हा तुम्ही कळसगादे ओलांडून तिल्लारीकडे कूच करता तेव्हा मात्र इथून पुढं तुम्हाला जे जे काही दिसणार आहे ते ते खूप अवर्णनीय आणी अत्यंत विलोभनीय असणार आहे.

              कळसगादे पार केल्यावर तुम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूला विस्तीर्ण असा सपाट प्रदेश दिसेल की जो पुढं पारगडकडे जातो. जसं की टेबल टॉप म्हणता येईल असा भाग. तर डावीकडे कलांनदीगडाचा उत्तुंग अन भव्य असा नजारा तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडेल. याच्या बरोबर मध्ये सलग सगळा मोकळा रस्ता की जो तुम्हाला तुमच्या शहरी बेचैनीपासून दूर कुठंतरी शांत ठिकाणी घेऊन जाणार आहे. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान लहान भाताची शेतं, नाचण्याची रोपं, गवताची कुरणं, जास्त मोठी नाही आणि जास्त लहान ही नाहीत अशी झुडुपं आणि झाडं, मागं फुटबॉल खेळायला पाहिजे तसं विस्तीर्ण मैदानी भूभाग असं सुंदर दृश्य दिसेल. मग पुढं गुळम्ब गाव लागेल ते पण छोटसं त्याच्या बाजूलाच मस्त अगदी नियोजितपणे वसलेली बैठी घरं दिसतील ती म्हणजे MSEB कॉलनी. जसं जसं तिल्लारी जवळ येईल तसं तसं इथल्या आल्हाददायक वातावरणामुळे तुम्ही तुमचा थकवा, मरगळ मागे सोडून द्याल. मग तिथून पुढं तुम्ही लगेच तिल्लारी चौकात पोहचाल.

            तिल्लारीनगरच्या चौकातून एक रस्ता डावीकडं जातो त्याला मेन डॅम रोड म्हणतात. चौकातून मेन डॅम जवळजवळ १५ किमी अंतरावर आहे. हा सगळा पूर्ण रस्ता जंगलाकडनं जातो. रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण घनदाट  जंगल आणि दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी लांब पसरलेले गवताळ पठार दिसेल. या पठारावर परत मस्त छोटी छोटी रंगीबेरंगी फुलांचं गालीचे तुमचं स्वागत करायला तयार आहेतच. मेन डॅम च्या रस्त्याला लागूनच जंगलातून एक कालवा गेला आहे. तिल्लारी डॅम मधून या कालव्याद्वारे पुढं कोदाळी गावच्या पिछाडीस असलेल्या फोरबे धरणात पाणी सोडलं जातं. मग हे पाणी पुढे वीज निर्मितीसाठी वापरले जाते. या पाण्याच्या कालव्याच्या आजूबाजूचं जंगल खूप घनदाट आहे.  या कालव्याचा प्रवास थक्क करणारा आहे. मेन डॅम मधून येणार पाणी technically वॉटर हेड सांभाळून जलसेतुमधून तर कधी जमिनीच्या खालून बोगद्यातून असं सगळं जंगलं, दऱ्या डोंगर, चढ सखल अडथळे पार करत फोरबे डॅम पर्यंत आणलंय. पाण्याचा हा प्रवास पाहून वर म्हटल्याप्रमाणे नक्कीच थक्क व्हाल तुम्ही. कालव्याच्या बाजूने एक पायवाट टाईपचा छोटा रस्ता परत मेन डॅम कडे जातो. या रस्त्यावर तुम्हाला परत अगदी तुमच्या डोळ्यासमोर गवे, भेकर, कोळशिंद्याचे कळप, बिबट्या, अस्वल व इतर निशाचर प्राणी दिसतील. इथं खूप प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट तुमचं मन प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं नशीब जोरावर असेल तर तुम्हाला या रस्त्यावर वाघाची डरकाळी पण ऐकायला येईल आणी नशीब लय म्हणजे लईच जोरावर असेल तर कदाचीत तुम्हाला इथं हत्ती पण दिसतील. हे सगळं पाहताना, अनुभवताना, इथं मनसोक्त हिंडताना तुम्हाला या जागेचा, या ठिकाणाचा 'एक्स फॅक्टर' नक्कीच कुठंतरी जाणवेल तेव्हा तुमच्या तोंडून आपसूकच बाहेर पडेल, "कसलं भारी हाय राव हे सगळं". 

             मग चौकातून सरळ वर कालवा क्रॉस करून गेल्यावर कोदाळी हे छोटसं व सुंदर गाव लागेल. माऊलीचं दर्शन घेऊन तुम्ही जेव्हा पुढं घाटाकडे मार्गस्थ व्हाल तिथून तिल्लारीचा घाटरस्ता सुरू होतो त्याच्या जरासं अलीकडं उजव्या बाजूला विस्तीर्ण असं लहानमोठ्या झाडाझुडपांनी आच्छादलेलं पठार दिसेल तिथं तुम्हाला पावसाळा सरल्यावर अगदी कास पठारावर आहेत तसली रंगीबेरंगी फुलं दिसतील. मस्त कलरफुल छोटया छोट्या फुलांचं गालिचे पाहिल्यावर तुम्ही कास पठार कशाला पाहिजे, हाय हेच लय भारी व नादखुळा आहे असं स्वतःशीच नक्की म्हणाल. मस्त उंच सखल टेकडीसारख्या भागात उमलणारे हे गालिचे पाहताक्षणी तुम्हाला प्रेमात पाडतील. हे झालं उजव्या बाजूला तर याच्या बरोबर डाव्या बाजूला एक विस्तीर्ण असे पठार दिसेल. या पठाराच्या एक टोकाला रावतोबा पॉईंट आहे. सगळी खरं तर याला रातोबा पॉईंट म्हणतात. विरळ झाडीच्या या पठारावर गवताळ कुरणे पसरलेली आहे. संध्याकाळ झाली की या कुरणांवर चरण्यासाठी गवा-सांबरांसारख्या प्राण्यांचे कळप गर्द जंगलातून हळूहळू बाहेर पडतात व या रातोबा पॉइंटचा ताबा घेतात. तुम्ही जेव्हा जेव्हा या रातोबा पॉइंटच्या ठिकाणी जाल, तेव्हा तेव्हा अगदी ९९.९९% वेळेला तुम्हाला गव्यांचा एकतरी कळप दिसणार म्हणजे दिसणारच. पावसाळ्यात हा पूर्ण परिसर हिरवागार असतो. पाऊस सरल्यावर ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात ही दोन्ही उजवी डावी पठारे रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातात. 

         आता डावी बाजू झाली, समोरची बाजू झाली आता तिल्लारीच्या चौकातून तुम्ही उजव्या बाजूस गेला तर तुम्ही ग्रीन valley रिसॉर्टकडे याल. इथे तुम्हाला मस्त खाणे पिणे राहण्याची उत्तम सोय तर मिळेलच पण त्याहून जास्त पुढची व्हॅली पाहून तुमच्या अंगावर रोमांच उभा राहील. खूप खोल व सदाहरित झाडांनी आच्छादित अशी ही दरी तुम्हाला महाबळेश्वर व इतर प्रसिद्ध ठिकाणांची आठवण करून देईल. व्हॅलीच्या बरोबर मधून उंचावरून कोसळणारा धबधबा व त्याचा पाण्याचा आवाज ऐकून त्याची भव्यता सहज लक्षात येईल. इथं पण तुम्हाला गवा, भेकर, सांबर व सामान्य माणसाने कधीच पाहिले नसतील असे विविध पक्षी दिसतील. नयनरम्य व आकर्षक असं हे व्हॅलीतलं दृश्य पाहून तुम्ही स्वतःशी नक्की म्हणाल, कुठलं महाबळेश्वर आणी कुठलं पाचगणी, भावा सगळं तर इथंच आहे अगदी आपल्या चरणी. पुन्हा इथपण तुम्हाला कायतरी वैशिष्ट्यपूर्ण असं वेगळेपण जाणवेल. वातावरणाचा आल्हाददायीपणा व सभोवतालचा स्वच्छंदपणा तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित करेल.

    बहुतांशी आपल्यातील बऱ्याच लोकांना आंबोलीतील कावळेसाद, साताऱ्याचे कास पठार, पाचगणी, राधानगरीचे दाजीपूर, आंबा, महाबळेश्वर, कोकण ही टिपिकल निसर्गरम्य ठिकाणे माहीत असतात. पण तिल्लारी याला अपवाद आहे, खरा निसर्ग जर पाहायचा असेल अगदी unseen, untouched आणी unexplored तर तिल्लारी हेच योग्य ठिकाणी आहे तेही अगदी आपल्या घराजवळ, आपल्या कोल्हापूरजवळ. 













           तिल्लारीतला पाऊस म्हणाल तर नेहमीच मुसळधार बरसणारा दररोज जवळपास १०० मिमी च्या पुढेच. दिवसातले १६ ते १८ तास पडणारच पाऊस, उघडीप अशी फार फार तर ५-१० मिनिटांची. सामान्य माणसांना जीव अगदी मेटाकुटीला आणणारा असा हा पाऊस असतो. एकतर तो सदैव बरसत असतो म्हणजे जसं इंग्लिशमध्ये म्हणतात तसं 'Raining Cats and_Dogs' या टाइपचा. जसं शहरी भागात थोडासा जरी पाऊस पडला आणि उघडला की एक वेगळीच स्फुर्ती आणि उत्साह आलेला असतो. वातावरण लय भारी झालेलं असतं, तेव्हाचा पाऊस हा लय हवाहवासा असा वाटतो. वर्षाकाठी पडणारा जवळपास ५००० ते ६००० मिमी. पाऊस हेच दर्शवितो की निसर्गाने खूप खुश होऊन तिल्लारीला पावसाचं वरदान दिलंय. तर हे सगळं झालं पावसाचं.... पण आता या वरच्या सगळ्या स्वप्नवत गोष्टी प्रत्यक्षात अनुभवायच्या असतील तर या पावसाळ्यात नक्कीच "तिल्लारी" ला आलं पाहिजे. एकदा का तुम्ही इथं आलात की समजा तुम्हाला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळालाच. तिल्लारीत तुम्हाला बघेल तिकडं नयनरम्य व विलोभनीय अशी दृश्य दिसतील....अगदी नजरेत सामावणारी आणी नजरेच्या पल्याडची पण...!!! असाच एक विलोभनीय व डोळ्यांचं पारणे फेडणारा पॉईंट म्हणजे स्वप्नवेल पॉइंट....म्हणजेच कोल्हापूरचे प्रती महाबळेश्वर....पावसाळयात हिरवळीने नटलेले नयनरम्य असं हे ठिकाण...जिथं साक्षात ढग जमिनीवर उतरतात.....जिथं प्रत्यक्षात धरती धुक्याची दुलई पांघरून घेते....आणी जिथं नभ धरतीचा अनोखा संगम पाहून आपण निसर्गाच्या प्रेमात पडतो. निसर्गाच्या या सर्व अनोख्या व अप्रतिम छटामुळे एक मस्त असं आल्हाददायक वातावरण स्वप्नवेल पॉईंटला तयार होतं....... इथल्या जंगलातून वाहत येऊन ओढयाचे पाणी कडयावरून कोसळते आणि दोन सुंदर धबधबे तयार होतात. हे दोन्ही धबधबे आपल्याला अप्रतिम नयनसुख देतात....दरीतील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे यातील धबधब्याचे पाणी कधी कधी अक्षरशः उलट्या दिशेला ही फेकले जाते. म्हणजेच उलटा खालून वर वाहणारा धबधबा ही आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच योगायोगाने कधी कधी आपल्याला एखाद्या जंगली प्राण्याचेही दर्शन होऊ शकते आणी या सर्वांसोबत पक्ष्यांचा मनसोक्त किलबिलाट हा कानावर पडतच असतो. स्वप्नवेल पॉईंट पाहून झाल्यानंतर आपणांस परत तिल्लारी चौकाकडे येऊन परत वर कोदाळीच्या दिशेने थेट सर्ज पॉईंटला जायला लागतं, मग इथं असलेल्या लष्कर पॉईंट व सनसेट पॉईंटला छान सूर्यास्त दर्शन घेता येतं व सुर्यास्तासोबतच गोव्याला जाणार्‍या नागमोडी वळणाच्या घाटाचे विहंगम हिरवगार दृश्य येथून तुम्ही पाहू शकता. मग घाटातून जेव्हा तुम्ही खाली निघाल तेव्हा अवघड अशी दोन तीन वळणे पार केल्यानंतर, जयकर पॉईंटच्या थोडसं अलीकडे डावीकडे तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अविरत असा जलप्रपात दिसेल. एक असा धबधबा जो बघताक्षणीच बघणारा स्तब्ध होऊन जाईल. उंचच्या उंच असा सह्याद्रीचा कडा आणी त्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा व त्यापासून बाजूला हवेत उडणारे तुषार पाहिल्यावर अक्षरशः तुम्ही जागेवरून हलणार नाही. पण हा धबधबा आपल्याला फक्त पाहताच येतो कारण त्याच्याजवळ आपल्याला जात येत नाही. (आजपर्यंत कोणीच या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या सुंदर धबधब्याचा उल्लेख केलेला नाहीय). तुम्ही जसं जसं घाट उतरत खाली याल तसं तसं घाटातून कोसळणारे असंख्य छोटे मोठे धबधबे तुम्हाला भिजायला आमंत्रण देतील. त्यातल्या त्यात जयकर पॉइंटच्या खालच्या बाजूला अगदी कोपऱ्यात कॉर्नरला ठाण मांडून बसलेला धबधबा पाहून एखादा सिनेमाचा सेट आठवेल तुम्हाला. इथं पण या धबधब्यात फोटो काढल्याशिवाय कोणीच पुढं जाणार नाही. इतका सौंदर्याने ओतप्रोत भरलेला असा हा जलप्रपात आहे. पूर्ण घाटात नाही म्हटलं तर जवळपास २८ ते ३० छोटे मोठे नैसर्गिक धबधबे तुम्हाला दिसतील. सोबत आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगातून उगम पावणारे इतर जलप्रपात पण तुम्हाला खुणावतील._ घाटाचा प्रवास करून परत घाटमाथ्यावर आल्यावर इथं तिल्लारीत तुम्हाला  सूर्यनारायणाचे दर्शन तर पूर्ण तीन चार महिने दुरापास्तच. जरा पण ऊन नाही आणि उन्हाशिवाय जीवन म्हणजे नकोच. वाऱ्याची जशी झुळूक येते तशी धुक्याची झुळूक येते, तुम्ही अक्षरशः त्या धुक्याला हात लावू शकता. जरा लांबून पाहिलं तर ढगांच्या आच्छादनात आपण उभे आहोत असा भास होतो. कधी कधी एवढं धुकं येतंय की कायचं दिसत नाही. डोळ्यासमोर सगळं पांढरं वातावरण. सह्याद्रीच्या उंची आणि घाटमाथा याचा पुरेपूर वापर जणू हे धुकं आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी करून घेत असावं. तुम्ही तिल्लारीच्या घाटमाथ्यावर उभं राहून अक्षरशः धुक्याला आलिंगन देऊ शकता व सोबत असणारा उनाड वारा व खट्याळ पाऊस निश्चितच तुमचा जीव वेडापिसा करून सोडणार. 

तिलारीत कीटकभक्षी वनस्पती;डॉ. एस. आर. यादव यांच्या शोधकार्याला यश

     कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांना तिलारी परिसरातील तिलारी बायो नॅचरल फार्ममधील बांधावर दुर्मिळ प्रजातीतील कीटकभक्षी वनस्पती ‘ड्रॉसेरा बर्मानी’ आढळली.

    डॉ. यादव यांनी जवळजवळ ६० हून अधिक वनस्पतींच्या नवीन प्रजातींची विज्ञानात भर घातली आहे. डॉ. यादव प्रकल्प अध्ययनातून विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शनासाठी देशातील विविध भागांत वर्षभर अभ्यास दौरे करतात. अशाच अभ्यास दौऱ्यासाठी तिलारी परिसरातील तिलारी बायोनॅचरल फार्म या ठिकाणी जैवविविधता संरक्षण, संगोपन आणि संशोधनासाठी आले होते. त्यांची संशोधनात्मक व चिकित्सक वृत्ती असल्याने परिसरात अस्तित्वात असलेल्या पाणथळ जागांच्या वनस्पतींची त्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा बर्मानी आढळली.

परिसरातील ऑर्किडच्या विविध प्रजातींचा शोध घेताना कॉटोनिआ पेंडीक्युलारीस म्हणजे भ्रमरी या वैशिष्ट्यपूर्ण ऑर्किड प्रजातीचे अस्तित्व असल्याचे निश्चित केले व त्याविषयी मार्गदर्शनही केले.वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशा कीटकभक्षक वनस्पतींच्या सुमारे ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त पाच-सहा जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्‍या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. ज्या ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो, तेथे त्या वनस्पतींची विशिष्ट प्रकारे वाढ होते.

     महाराष्ट्रात सापडणाऱ्‍या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन प्रजाती उपलब्ध आहेत. ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानी. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते.

  वैशिष्ट्ये

    ड्रॉसेरा बर्मानी कीटकभक्षी वनस्पती

    शास्त्रज्ञ जोहान्स बर्मन यांच्याकडून श्रीलंकेत १७३७ मध्ये शोध

    त्या सन्मानार्थ त्यांचे नाव या वनस्पतीला

    वनस्पतीची रचना फुलासारखी, पाने गुलाबी, लाल

कसे खातात कीटक?

    पानांच्या कडांना बारीक केसतंतूंवर चिकट द्रवाचे बिंदू असतात. या वनस्पतीकडे आकर्षित झालेले कीटक या चिकट द्रवामुळे अडकून बसतात. अडकलेले कीटक वनस्पतीद्वारे स्रवलेल्या रसायनाद्वारे विघटित केले जातात. त्यातील पोषक तत्त्वे वनस्पती शोषून घेतात. या वनस्पतींच्या पानांच्या चमच्यासारख्या पात्यावर लाल व जाड टोकाचे केस असतात. या केसांवर चिकट द्रवाचे आवरण असते. केसाच्या टोकावर चिकट द्रवाचे बिंदू असतात. बिंदू उन्हात दवबिंदूप्रमाणे चकाकतात. म्हणून याला इंग्रजीत ‘सन ड्यू’ हे नाव पडले आहे. एखादा कीटक या वनस्पतीच्या पानावर बसला, की केस आतल्या बाजूस वळतात आणि कीटक पकडला जातो. वनस्पतीच्या ग्रंथीतील स्रावामुळे कीटकाचे अन्नद्रव्यात रूपांतर होऊन त्याचे वनस्पतींच्या पेशींकडून शोषण होते.


     कसे जाल :- 

कोल्हापूर - गडहिंग्लज - चंदगड - तिल्लारीनगर (साधारणत: १३० ते १४० किलोमीटर )_ कधी जाल :- वर्षाचे पूर्ण १२ ही महिने हा परिसर विलोभनीय सौंदर्याने नटलेला असतो, पण पावसाळयात जास्त नयनरम्य व आल्हाददायक वातावरण असते....(जून ते ऑगस्ट) पावसाळ्यातील स्वप्नवेल पॉइंटच्या पुढील मेन डॅम येथील धबधबा व डोह खूप धोकादायक आहे, त्यामध्ये पोहणे/जाणे टाळावे. पावसाळी वातावरणामुळे बरेच स्पॉट हे निसरडे, ओलसर व धोकादायक झालेले असतात त्यामुळे पाहताना पूर्ण काळजी घ्यावी. 

कलानिधीगड :-

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यातील आटोपशीर आकाराचा सुस्थितीतील तट, बुरुज, देखणे प्रवेशद्वार, घनदाट जंगल व सोपी चढण असलेला आणि सहकुटुंब पाहता येण्यासारखा हा डाेंगरी किल्ला आहे. सभासद बखरीनुसार हा किल्ला शिवरायांनी बांधला आहे. गडावरील उंचीने ठेंगणी व उतरती, पसरट छप्परे असलेली बैठी दोन मंदिरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. दोन विहिरी एकत्र असलेले विहिर संकुल आहे. हा किल्ला तसा दुर्लक्षित आहे, पण तो पाहण्यासाठी अलिकडे पर्यटकांची गर्दी होत आहे.

महिपाल गड :-

चंदगड तालुक्यातील हा फारसा इतिहास ज्ञात नसलेला किल्ला. याला चंदगडप्रमाणेच बेळगावमार्गेही जाता येते. गडावर गावाची वस्ती असून गडावर थेट वाहनाने जाता येते. येथील प्रचंड विहीर, शिवरायांनी स्थापन केलेले अंबाबाई मंदिर, प्राचीन गुंफा पाहण्यासारख्या आहेत. येथून जवळ असलेला वैजनाथ मंदिर परिसर प्रसिध्द असून पंचक्रोशीचे तीर्थस्थळ आहे. येथील प्राचीन जोड मंदिर वैद्यनाथ व आरोग्य भवानी यांचे असून असून ते भव्य आहे. मुख्य मंदिराजवळ चवदार पाण्याचे दगडी कुंड असून तेथे जुने दत्त मंदिर आहे. गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात या ठिकाणाचा उल्लेख असून त्याला दक्षिणेचे महाक्षेत्र म्हटले आहे. या मंदिर परिसराचे व्यवस्थापन कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानमार्फत चालते. 

पुर्व विभागः-

 आता येउ या कोल्हापुर जिल्ह्याच्या पुर्व विभागात.इथे दोनच तालुके आहेत हातकणंगले आणि शिरोळ.पंचगंगा नदीमुळे हा भाग सुपिक आणि समृध्द आहे.इथेही पर्यटनस्थळे आहेत.यात नृसिंहवाडी,खिद्रापुर्,बाहुबली हि प्रमुख ठिकाणे आहेत.

 कात्यायनी देवी मंदिर

 एक आकर्षक ठिकाण: नानाविध प्राचीन मंदिरांमुळे कोल्हापूर हया श्री. क्षेत्राचा एक विवक्षित सांस्कृतिक प्रभाव आहे. देवी महालक्ष्मीच्या रक्षणार्थ महालक्ष्मी मंदिरासभोवती, इतर देवतांची मंदिरे सुरवातीला स्थापन केली गेली. पूर्वेकडे सिध्द बटुकेश्वर, पश्चिमेकडे त्रयंबोली, उत्तर दिशेला ज्योर्तिलिंग तर दक्षिण दिशेला कात्यायनी. ‘करवीर माहात्म्या’मधे हया देवतेचा उल्लेख आहे.


फार प्राचीन काळी कोल्हासूर राक्षसाने रक्तबीज नामक दैत्याला प्रस्तुत परिसराच्या रक्षणार्थ, इथेच ठेवले. या दरम्यान कोल्हासूराविरूध्द महालक्ष्मीने युध्द पुकारले आणि, रक्तबीजाचा नि:पात करण्यासाठी तिने भैरवाला पाठविले. पण त्याच्यावर वार करताक्षणी, त्याच्या रक्तातून अनेक दैत्य उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे भैरव निष्प्रभ ठरू लागला. लगेच देवी महालक्ष्मीने कात्यायनीला पाठविले. तिने अमृत कुंड घडविला. रक्तामधून निर्माण झालेले भासमान दैत्य तिने त्या कुंडामधे ठेवले. भैरवाच्या सेनेचे पुनरूज्जीवन करून, कात्यायनीने रक्तबीजाचा नाश केल्याचा उल्लेख पुराण कथेमध्ये सापडतो. शिकारी, स्वाऱ्या इ. प्रसंगी, छत्रपती शाहू, राजाराम, व आक्कासाहेब या मंदिराला भेट देत असत, असे दफ्तरी बाडामधील ऐतिहासिक नोंदींवरून लक्षात येते. थकलेल्या, रोजच्या कटकटींनी ग्रासलेल्या कोल्हापूरवासियांसाठी, हे मंदिर म्हणजे, एक विसाव्याचे, विरंगुळयाचे रमणीय ठिकाण ठरते.

कात्यायनी म्हणजे करवीरची दक्षिण द्वार देवता. बालिंगे गावची ग्रामदेवता! ( बालिंगा गाव पूर्वी कळंबा तलावाच्या काठावर होते पण कळंब्याचे पाणी कोल्हापूर शहराच्या पिण्यासाठी वापरायचे ठरल्यावर हे गाव संपूर्ण पणे रंकाळ्याच्या पुढे पुनर्वसित करण्यात आले. आजही बालिंगे गाव कात्यायनीलाच ग्राम देवता मानते) कोल्हासूराचा दक्षिण द्वाररक्षक असणा-या रक्तबीजाचा वध करण्यासाठी श्रीमहालक्ष्मीने भैरवाला पाठवले पण आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवा असूर प्रकट करणारा रक्तबीज भैरवाला आवरेना तेंव्हा त्यानं कात्यायनीला साद घातली. ती पाताळमार्गाने अमृताचा ओघ घेऊन भूमीवर आली ते कुंड आजही तिच्या समोर आहे. हाच जयंतीचा उगम . महाकालीच्या सहाय्याने रक्तबीजाला मारून कात्यायनी इथे उत्तराभिमुख विराजमान आहे. कात्यायनी दर्शनाने व रामकुंडाच्या स्नानाने भगवान परशूराम मातृहत्या व गोत्र वधाच्या पापातून मुक्त झाले. केवळ एक रक्षक देवता एवढीच कात्यायनीची ओळख नाही. कोल्हासूराला दिलेल्या वराप्रमाणे शंभर वर्षासाठी महालक्ष्मी हे क्षेत्र सोडून गेली असता तीनेच भक्तांचा सांभाळ केला. कात्यायनी कृपेनेच गोपिकांना श्रीकृष्ण मिळाले म्हणून आजही विवाह लवकर व्हावा आणि मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कात्यायनी च दर्शन घेऊन साकडं घातल जातं. सोन्याच्या आरतीत दिवे उजळून महालक्ष्मीची आरती करण्याचा अधिकार चौसष्ट योगिनींसह कात्यायनीचाच आहे. आजही कोल्हापूर च्या दक्षिणेला १० कि.मी. वर गारगोटी रस्त्यावर शांत डोंगरात कात्यायनीचे मंदिर आहे. जिथे देवी तांदळा ( स्वयंभू पाषाण ) रूपात विराजमान आहे. दर अमावस्येला इथे महाप्रसाद असतो. तर के.एम.टीची बससेवा थेट मंदिरापर्यंत जाते.

कागल : 

हे कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवरील तालुक्याचे मुख्य गाव आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १५७२मध्ये या गावाची जहागिरी विजापूरचा आदिलशाही सुलतान महंमदशाह याने राजपूत वंशातील पिराजीराजे (घाडगे) यांना दिली. त्यांना एकूण ६९ गावांची जबाबदारी देण्यात आली होती. पिराजीराजांना झुंझारराव या नावानेही ओळखले जायचे. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात काँग्रेसच्या संस्थापकांपैकी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. प्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव यांचे हे जन्मगाव आहे. या गावामध्ये सुंदर राममंदिर आहे. कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे.



श्रीराम मंदिर, कागल

गांधीनगर : 

हे ठिकाण कोल्हापूरच्या पूर्वेस १० किलोमीटर अंतरावर असून, मुख्यत्वे येथे कापडाची होलसेल विक्री होते. स्वातंत्र्यानंतर येथे सिंधी लोकांची मोठी वसाहत झाली. जन्मतःच उद्योगी असलेल्या सिंधी लोकांनी येथे जम बसवून व्यापाराचे केंद्र बनविले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील व उत्तर कर्नाटकातील लोक येथे खरेदीला येतात. येथे सुमारे १२०० फर्म्स आहोत. अलीकडील काळात कापडाबरोबर रेडिमेड कपडे, फर्निचर, फुटवेअर, नाइटवेअर , अंडरगार्मेंट्स, इलेक्ट्रॉनिक होम अॅप्लिकेशन्स, गिफ्ट अँड नॉव्हेल्टी आयटम्स, प्लास्टिक मोल्डेड फर्निचर, घड्याळे, प्लायवूड, रंग, सिरॅमिक्स आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल या नवीन उत्पादनांचीही बाजारपेठ येथे आहे. गांधीनगर येथे काही प्लास्टिक शीट उत्पादन कारखाने आहेत.

 जयसिंगपूर : -

     जयसिंगपूर हे तंबाखू व्यापार व उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराजे यांचे नाव या शहराला देण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनजवळ चार-पाच घरे असलेल्या ठिकाणी राजर्षी शाहूमहाराजांनी हे योजनाबद्ध, टुमदार गाव वसविले. या गावातील राम मंदिर अतिशय आकर्षक आहे. हे गाव शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. 

श्रीराम मंदिर, जयसिंगपूर
इचलकरंजी : 

हे ठिकाण वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. विठ्ठलराव दातार यांनी १९०४ मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना स्थापन केला. त्यानंतर इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कृष्णदेव साळुंखे आणि फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली आणि वस्त्रोद्योगाला सुरुवात झाली. पूर्वी इचकरंजी सुती साड्यांसाठी प्रसिद्ध होते; आता साड्यांच्या बरोबरीने सुटिंग व शर्टिंगही येथे बनविले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे असे वस्त्रांचे अनेक प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे एक लाखांच्या आसपास यंत्रमाग आहेत. दररोज एक कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. येथील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी रुपये आहे. सध्या अनेक अडचणींवर मात करून उद्योग टिकविण्याची किमया उद्योजक करीत आहेत. येथील बहुतेक रहिवाशांचे आयुष्य पॉवरलूमच्या उबदार चक्राच्या भोवती फिरते, जणू त्यांचे हृदय पॉवरलूमच्या ‘खटखट’वर चालत असते. इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत वेगवान औद्योगिक क्षेत्र आहे.

इचलकरंजी संस्थानचे मूळ संस्थापक नारो महादेव हे होय. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात रत्नागिरी जिल्ह्यातील वरवडेकर जोशी येथे आले. नारो महादेवांचे वडील महादेवपंत हे सावंतवाडी संस्थानातील म्हापण गावच्या कुलकर्णीपणाचे काम करीत होते. नारोपंत हे अवघे चार-पाच वर्षांचे असताना, त्यांचे वडील महादजीपंत निवर्तले. त्यामुळे महादजीपंतांची बायको गंगाबाई आपल्या मुलाला घेऊन उदरनिर्वाह करण्याकरिता घाटावर बहिरेवाडी येथे आली. प्रसिद्ध मराठा सेनापती संताजी घोरपडे यांचे हे राहण्याचे ठिकाण होते. या ठिकाणी असताना नारोपंतांच्या अंगचे विलक्षण गुण संताजींच्या नजरेस पडल्यामुळे संताजींनी त्यांना आपल्या दिमतीला ठेवले. लिहिणे, वाचणे, घोड्यावर बसणे, निशाण मारणे इत्यादी त्या काळच्या सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था लावून दिली. नारोपंतांवर संताजींची बहाल मर्जी होती व नारोपंतांचीही संताजीवर अतिशय भक्ती होती. ती इतकी, की  नारोपंतांनी आपले मूळचे जोशी हे आडनाव बदलले व आपल्या धन्याचे-संताजींचे घोरपडे हे आडनांव धारण केले. अद्यापही, नारोपंतांचे वंशज ‘घोरपडे’ हेच आडनाव अभिमानपूर्वक आपल्या नावापुढे लावतात. संताजीराव घोरपडे यांनी नारोपंतांना मिरज प्रांताच्या देशमुखी, सरदेशमुखीची वहिवाट दिली होती. तसेच इचलकरंजी व अजरे हे गाव इनाम दिले होते. १८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरू झालेले आणि आता आपटे वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे येथील वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे. 

जोशी बनले घोरपडे🚩

इचलकरंजीकर घोरपडे घराण्याचा इतीहास

महाराष्ट्रात मराठ्यांच्या ९६ कुलनामामागे उत्पत्तीपासूनचा इतिहास दडलेला आहे. त्यानुसार शिवरायांच्या कुळाचा अभ्यास केला तर त्यांच्या घराण्याच्या दोन शाखा पडल्या. एक भोसले आणि दुसरे घोरपडे. भोसले घराण्यातील भोसाजीपर्यंत या घराण्याला भोसले नावाने ओळखले जात होते. भोसल्यांचे पूर्वज बहामनी साम्राज्यात चाकरी करत असताना कोकणातील किल्ला खेळणा घेण्याकरिता कर्णसिंह भोसल्यांची नियुक्ती करण्यात आली. कर्णसिंहाने आपला मुलगा भीमसिंहासह किल्ल्यावर हल्ला चढविला. तेव्हा दुर्गम असणारा खेळणा ताब्यात येत नसल्याचे दिसताच गडाच्या पाठीमागून घोरपडीच्या साह्याने चढून तो हस्तगत केला. कर्णसिंहाला यात मरण पत्करावे लागले. त्यांचा पराक्रम पाहून बहामनी सुलतानाने भीमसिंहाला ‘राजा घोरपडे बहाद्दर’ व मुधोळची जहागिरी दिली. तेव्हापासून या भोसले घराण्याला घोरपडे नाव पडले. बहामनी सत्तेनंतर निजामशाही, आदिलशाही व मोगलांकडे आपली तलवार गाजवत घोरपडे घराण्याच्या शाखाही विस्तारित झाल्या. त्यानुसार कापसी, रेठरे, दत्तवाड, गजेंद्रगड, गुत्ती, सांडूर या मुख्य शाखेबरोबर घोरपड्यांचे वंशज पुण्यातील पिंपरी-चिंचवडपासून कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात भागातही घोरपडे घराण्याचे वंशज स्थायिक झालेले दिसतात. घोरपडे म्हटलं की, आपोआपच संताजी नाव पुढे येते. 

     शिवकालखंडात म्हाळोजी घोरपडेंनी स्वराज्यासाठी अनेक लढाया मारल्या. मोगलांचा सेनापती मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी संगमेश्वर या ठिकाणी वेढा घातला तेव्हा म्हाळोजीबाबांनी पराक्रमाची शर्थ करत राजांसाठी आपले प्राण अर्पण केले. म्हाळोजीसोबत त्यांची तिन्ही मुले मालोजी, बहिर्जी आणि संताजीने आपल्या कर्तृत्वाने मध्ययुगात आपली छाप सोडली. विशेषत: छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर या बंधूंचा पराक्रम अद्वितीय होता. संताजीला सेनापती बनविल्यानंतर त्याने मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. कोल्हापूर परिसरातील कापशी या ठिकाणी संताजीने आपले जहागिरीचे ठाणे ठेवल्यानंतर पुणे ते जिंजीपर्यंत मोगली फौजांचा समाचार घेतला. प्रत्येकाला जीवनात उभे राहण्यासाठी कुणाचे तरी बोट धरावेच लागते. ज्याप्रमाणे संताजी छत्रपती शिवरायांपासून राजारामांपर्यंत वरच्या पदापर्यंत पोहोचत होता त्याप्रमाणे त्यांच्या कडक शिस्तीखाली अनेक पराक्रमी माणसं निर्माण झाली. 

 असाच एका सर्वसामान्य ब्राह्मणाचा मुलगा संताजीच्या पदराखाली आला आणि त्याचे जीवन बदलून गेले. सिंधुदुर्र्गजवळील महापण नावाच्या खेडेगावात तेथील कुलकर्णीपणाच्या वादातून गंगाबाईला वैधव्य आले. आपला ५ वर्षांचा मुलगा घेऊन ती आश्रयाकरिता स्वराज्यातील कापशी गावात आली. मुलगा तल्लख बुद्धीचा असल्याने त्याने घोरपडे सरदाराकडे नोकरी धरली. संताजीच्या पराक्रमासोबत जहागिरीचा व्याप वाढला तसा कारभाराच्या व्यवस्थेकरिता स्वतंत्र मुजुमदार (अकाऊंटंट) ची नेमणूक केली. त्या मुलाचे नाव होते- नारो महादेव जोशी. 

नारोपंत अतिशय तल्लख बुद्धीचा असल्याने थोड्याच दिवसांत त्याने सेनापती संताजी घोरपडेचे मन जिंकले. संताजीचे दोन विवाह झाले. त्यांच्यापासून त्यांना राणोजी व पिराजी ही दोन मुले झाली. 

  छत्रपती राजारामाच्या कालखंडात मराठ्यांची गादी तामिळनाडूमधील जिंजी या ठिकाणी सेनापती म्हणून संताजीची फारच धावपळ होत होती. अशा वेळी नारोने जहागिरीची व्यवस्था चोखपणे सांभाळण्याचे काम केले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नारोपंत संताजीच्या एवढ्या जवळ गेला की, संताजीने आपल्या मुलाप्रमाणे नारोला मानले. नारो महादेवही संताजीला आपल्या पित्याप्रमाणे मानून जहागिरीची व्यवस्था सांभाळत होता. हे मानामानीचे नाते असले तरी नारो हा ब्राह्मण तर घोरपडे मराठा. त्यातच मध्ययुगीन कालखंडात जातीव्यवस्था फारच गुंतागुंतीची असल्याने भारतातील कुठल्याही लष्करात भोजनाची स्वतंत्र व्यवस्था होत होती. असेच एका निवांतक्षणी संताजीसोबत नारोपंतही जेवायला बसला. संताजीच्या पत्नी द्वारकाबाई जेवण वाढताहेत. जातीव्यवस्थेचा पगडा आणखी दूर झालेला नसल्याने नारो महादेव आपले जेवण स्वतंत्रपणे वेगळ्या थाळीत करत होता. 

एका बाजूला पती तर त्यांच्यासोबत त्यांना वडिलासमान मानणारा नारो जेवत असताना द्वारकाबार्इंनी नारोची फिरकी घेत म्हटले की, तू संताजीराजांना वडिलासमान मानतो ना? मग केवळ ब्राह्मण असल्यानेच वेगळ्या थाळीत जेवण करतो आहेस. त्यांना वडील मानत असशील तर त्यांच्यासोबत जेवून दाखव. संताजीबाबावर मनापासून प्रेम करणा-या नारो महादेव जोशीला या गोष्टीचा फारच खेद वाटला आणि आपला ब्राह्मणी पगडा दूर सारून क्षणाचाही विचार न करता संताजीच्या ताटात बसून एकत्र भोजन सुरू केले. सर्वांचेच मन भरून आले. परंतु नारो हा मनापासून संताजीभक्त होता. त्याचे डोळे भरून आले आणि त्याने आवेशात द्वारकाबार्इंना उत्तर दिले, आईसाहेब! आजपासून फक्त जेवणच नाही तर मी माझ्या नावापुढे जोशी नावाऐवजी घोरपडे आडनाव लावणार आहे. 

त्यानुसार नारो महादेव जोशी आता नारो महादेव घोरपडे बनला. संताजीने नारोची भक्ती पाहून स्वत:च्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. एवढेच नाही तर पुढे त्याला दत्तक घेऊन आपल्या जहागिरीतील इचलकरंजी ठाणे नारो महादेवला देऊन आपल्या बरोबरीचा दर्जा दिला. गंगाबाई नावाच्या ब्राह्मण मुलीशी त्याचा विवाह लावून दिला. दिवसेंदिवस इचलकरंजीची जहागिर फुलायला लागली.संभाजीराजांच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या 

महाराष्ट्राला पुन्हा संजीवनी देण्याचे काम संताजी, धनाजीने सुरू केले. त्यांच्या पराक्रमामुळे मोगलांच्या घोड्यांनाही पाणी पिताना ते दिसायला लागले. एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत. धनाजी, संताजीमध्ये वितुष्ट येऊन शिखर शिंगणापूरजवळील महादेवाच्या डोंगरात संताजीचा गफलतीने खून करण्यात आला. मराठी साम्राज्यासोबतच घोरपडे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा वेळी नारोजीने वडीलकीच्या नात्याने घराला आधार दिला. राजारामाचे अमात्य रामचंद्रपंतांच्या मदतीने पिराजीला सेनापतीपद मिळवून दिले. घोरपडे घराण्याची मोट बांधून पुन्हा एकदा हे घराणे मराठी साम्राज्यात पूर्ववैभवाने उभे राहिले, अर्थातच यामागे नारो महादेवाचा सिंहाचा वाटा होता. 

          संताजीचे वंशज म्हणजे दोन्ही मुले राणोजी व पिराजी कापशीत राहिले तर घोरपडेंच्या पदस्पर्शाने नारोचे भाग्यही उदयाला आले. इचलकरंजी संस्थानने एवढे बाळसे धरले की, सातारचे छत्रपती शाहू महाराज, रामचंद्रपंत अमात्य, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथबरोबर त्याचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. पुढे नारो घोरपडेचे वजन एवढे वाढले की, बाळाजी विश्वनाथने आपली मुलगी अण्णूबाईचा विवाह नारोचा मुलगा व्यंकटरावाशी निश्चित केला. नारो एवढा वाढला तरी घोरपडे घराण्याविषयी त्याची निष्ठा अजिबात कमी झालेली नव्हती. शाही विवाहसोहळा इचलकरंजी या ठिकाणी होणार असल्याने सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपतीबरोबरच अनेक शाही पाहुणे दाखल झाले होते. परंतु नारोला आस होती आपल्या आईसाहेब द्वारकाबाई संताजी घोरपडेंच्या आगमनाची. हरका-याने वर्दी दिली. सन्मानपूर्वक द्वारकाबाईसाहेबांची पालखी मंडपापुढे येऊन टेकविली. भोई बाजूला झाले आणि उतरण्यापूर्वी बाईसाहेबांनी पडद्यातून मंडपामध्ये सहज नजर फिरविली. सर्वत्र पुणेरी भरणा असल्याने स्त्रियांच्या डोक्यावर पदर ना पडदा दिसला. ९६ कुली द्वाराकाबाईसाहेबांनी नारोकडे याचा जाब विचारला. हे लग्न जोशींचे नाही घोरपडेंचे आहे. नारोची पंचाईत झाली. एका बाजूला खुद्द पेशव्यांचे व-हाड आणि दुस-या बाजूला आईसाहेब; परंतु त्याही अवस्थेत त्याच्यातला घोरपडे जागा झाला आणि त्याने ही गोष्ट पेशव्यांच्या कानावर घातली आणि कडक शब्दांत ताकीद दिली की, आमच्या ग्रामीण रीतीरिवाजाप्रमाणे तुमच्या पुणेरी स्त्रिया पदर आणि पडदा वापरणार असतील तरच लग्न होणार, नाही तर होणार नाही. ही अट मान्य झाल्यानंतर आईसाहेब पालखीतून खाली आल्या आणि हा शाही विवाह पार पडला. अण्णूबाई या बाळाजी विश्वनाथच्या मुलगी तर पहिल्या बाजीरावाच्या बहीण असल्याने त्यांचे पुण्यातील वजन वाढले. साहजिकच पती व्यंकटरावसह त्या पुण्यामध्ये मोठ्या वाड्यात राहात असत. साहजिकच यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इचलकरंजी गावाचे महत्त्वही फारच वाढले. इचलकरंजीच्या या घराण्याने आजतागायत घोरपडे नावात बदल केलेला नाही. ब्राह्मण समाजात घोरपडे आडनाव अन्यत्र सापडणारही नाही. परंतु या घराण्याने मिळविलेले नाव पराक्रमातून मिळवून नावारूपाला आणले. पुढे व्यंकटराव दुसरे यांच्या काळात इचलकरंजीत सूतगिरण्याच्या रूपाने एवढी प्रगती केली की गावाला पश्चिमेकडील मँचेस्टर म्हटले गेले. अशा रीतीने कर्तृत्वाने एखाद्याने नाव मिळविले म्हणतात त्यांच्याकरिता हे एक आदर्श उदाहरण आहे.

सदर फोटो सरसेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळ कन्हेर जिल्हा सोलापूर येथील आहे

डॉ. सतीश कदम मो.९४२२६५००४४



हुपरी येथील चांदीची कारागिरी
हुपरी

   भारतातील रुप्याची नगरी (सिल्व्हर सिटी) म्हणून हे गाव ओळखले जाते. इ. स. १९०० पासून या भागात चांदी कारागीर या व्यवसायात गुंतले आहेत. कोल्हापूरचे महालक्ष्मी देवस्थान प्रसिद्ध असल्याने सतत येणारे भाविक येथील दागिन्यांच्या मोहात पडले व बघता बघता हा उद्योग विक्रीबरोबर दागिन्यांचे उत्पादन करणारा झाला. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या हस्तकलेला प्रोत्साहन मिळाले. कृष्णाजी रामचंद्र सोनार यांनी सन १९०४ पासून या व्यवसायास खऱ्या अर्थाने दिशा दिली. आजच्या घडीला १००० कोटींचा व्यवसाय येथून चालतो. येथे चांदीच्या गाळण्यापासून निरनिराळ्या आकाराचे पत्रे, दागिन्यांसाठी आवश्यक साचे तयार केले जातात. रूपाली, सोन्या, गजश्री आणि गजश्री छुम छुम या चार पारंपरिक प्रकारच्या हुपरी पैंजणांना महिला वर्ग पसंती देतो. चांदीच्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे आता प्रतिष्ठेचे झाले आहे. भेटवस्तू देताना चांदीच्या वस्तूंचा वापरही आता मोठ्या प्रमाणावर होतो. गेल्या काही वर्षांपासून हुपरीसारखे छोटे गाव भारतातील चांदीच्या दागिन्यांचे केंद्र म्हणून अधोरेखित झाले आहे. कोल्हापूरच्या पूर्वेला २० किलोमीटरवर हे गाव आहे. 

पट्टणकोडोली व वाशीच्या प्रसिध्द बिरदेव यात्रा

  कोल्हापूरपासून १० कि.मी. अंतरावरील धनगरांचे बिरदेव देवस्थान पश्चिम महाराष्ट्रातील बिरदेवाचे सर्वात मोठे मंदिर म्हणून प्रसिध्द आहे. या बिरदेवाच्या यात्रेस खूप मोठी गर्दी जमते. बिरदेवाच्या पालखी मिरवणुकीत सारा परिसर भंडार्‍याने रंगून जातो. या यात्रेतील फरांडेबाबांची भाकणूक अत्यंत प्रसिध्द आहे. येथील धनगर जमातीची ही यात्रा मात्र पूर्ण शाकाहारी असते. येथे पुरण पोळीचा नैवेद्य लागतो. जिल्ह्यातील कोल्हापूरपासून ६ कि.मी. अंतरावरील वाशी येथील बिरदेवाची यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार्‍या या यात्रेस राज्यातून मोठय़ा संख्येने धनगर लोक जमतात. त्यावेळी बिरोबासमोर हजारो बकर्‍यांचे बळी देतात. वाशी येथील धनगरी नृत्याच्या पथकांनी राज्य व देशपातळीवर नाव कमावले आहे. येथील घोंगडीही प्रसिध्द आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात धनगर समाज लक्षणीय असून त्यांच्या २२ पोटजाती आहेत. त्यापैकी मेंढय़ांचे कळप बाळगणारे आणि बकर्‍या, मेंढय़ा व लोकर विकणारे मेंढे धनगर आणि सह्याद्रीच्या डोंगराळ भागात राहणारे व गुरे चारणारे, गुरांचा व्यापार करणारे डांगे धनगर या दोन पोटजाती प्रमुख आहेत. डांगे धनगरांना औषधी वनस्पतींची चांगली माहिती असते. डोक्याला सर्वसाधारण रंगीत पागोटे, खांद्यावर घोंगडी, काखेत पिशवी, अंगाज जाड कापडाचा कुडता, पायात करकर वाजणारे धनगरी पायताण, कमरेस लंगोटी व हातात जाड काठी अशी वैशिष्टपूर्ण वेषभूषा असणारी ही कष्टाळू, काटक व अतिथ्यशील जमात. हातात चांदीचे कडे, कानात सोन्याची बाळी असते. स्त्रिया व मुलांच्या अंगावर चांदीचे बरेच दागिने असतात. या धनगर जमातीचे आराध्य दैवत म्हणजे बिरदेव.

सांगवडे गावात नांदतय नृसिंहाच हरीहरात्मक रुप
कोल्हापूर पासून पूर्वेला १७-१८ किलोमीटरवर सांगवडे गावात नृसिंहाच प्राचीन मंदिर आहे. मंदिराची रचना किमान ३०० वर्ष तरी जुनी आहे. तीन खणी मंदिरात (गाभारा, अंतराल मंडप ,मुखमंडप) भगवान नृसिंह तांदळा म्हणजे स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. हजारो घरांचा कुलस्वामी असलेल्या या नरहरीच वेगळेपण बघायला गेलो तर लक्षात येईल की हे केवळ विष्णूंच नृसिंह रूप नाही तर याच मूर्ती त भगवान शिवांचाही अंश आहे.

आपण क्रमाने ही वैशिष्ट्ये पाहू
१) अंतराल मंडपातील नंदी
सर्वांना माहीत आहेच की नंदी हे शिवाचे वाहन आहे पण सांगवडे गावच्या या नृसिंहासमोर एक प्राचिन नंदी आहे.
२) लक्ष्मी देवीचे स्थान
लक्ष्मी म्हणजे विष्णूंची पर्यायाने नृसिंहाची पत्नी देवपत्नी चे स्थान देवांच्या डावी कडे असते (पहा: म्हाळसा खंडोबा रामसीता ) पण इथे लक्ष्मी माता देवांच्या उजवी कडे आहे कारण या रूपात शिवही आहेत.
३) उपासनेचा वार : सोमवार
नृसिंह उपासना ही मुख्यतः शनिवारी केली जाते पण सांगवडे येथे सोमवार ला खूप महत्त्व आहे इतक की भक्त श्रावणात मोठी गर्दी करतात नृसिंहाच्या नावाने मुंजा वाढतात.
४) आगळी ललकारी.
जेव्हा जेव्हा नृसिंहाची पालखी निघते तेव्हा जी ललकारी दिली जाते ती *शिवहरी* अशी आहे यावरून लक्षात येईल की मंदिर निर्मात्यांना देवांच्या या समन्वयात्मक रूपाची जाणिव होती.
५) रूद्राचा अभिषेक
इथे देवांना अभिषेक घालताना रूद्र सुक्ताचा पाठ करतात. एरव्ही नृसिंह देवांना पुरुष सुक्त किंवा पंचसुक्त पवमानाने अभिषेक केला जातो.
६) भाविकांच्या देव्हाऱ्यातील अश्वारूढ भैरव स्वरूपी मूर्ती
इथे भाविक आपलं कुलदैवत म्हणून श्री नृसिंहाची घोड्यावरची मूर्ती बसवतात.
७) वैशाखा बरोबर चैत्रातला उत्सव
या अशा अनेक आगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की की नृसिंह स्वामीचे हे हरी हरात्मक रुप कुठले ?



तर जेव्हा हिरण्यकश्यपूला मारूनही देव शांत होईनात तेव्हा भगवान शंकराने त्यांना शांत करायला उग्र शरभ भैरवाचे रूप घेतले तर या रूपातून भद्रकाली (जटेश्वरी) प्रत्यंगिरा (फिरंगाई) प्रगट झाली . या शरभाने नृसिंहाला युद्धाला आव्हान दिले. दोघांनाही परस्परांचे कपटवेष ( सिंह आणि शरभ) ओढून काढले आणि हरी हर‌ एकाकार झाले हेच गंडभेरूण्ड नृसिंह
हिरण्यकश्यपूला मारूनही नृसिंह भगवान शांत होईनात साक्षात लक्ष्मी माता देखील देवाला समोर जाऊ शकेनात तेव्हा भगवान शंकरांनी वीरभद्राला पाठवले त्याने उग्र असं भेरूण्ड ( जे म्हैसूर सरकारचे राज चिन्ह आहे) म्हणजे दोन मुखाच्या गरूडाचे रूप घेऊन नृसिंहाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले पण ते ही जमेना तेव्हा शंकरांनी शरभ म्हणजे पंख असलेल्या उग्र विक्राळ सिंहाचे रूप घेतले या दरम्यान देवी भद्रकाली ( जी सांगवड्यात जटेश्वरी / जखुबाई म्हणून पुजली जाते) आणि सिंह मुखी देवी प्रत्यंगिरा( फिरंगाई) या देखील मदतीला धावून आल्या. शरभ आणि नृसिंहाचे प्रचंड युद्ध झाले. आता प्रत्येक पुराणात या युद्धाचा निकाल वेगळा दिला आहे. काही पुराणं म्हणतात शरभेंद्राने नृसिंहाचा पराभव केला तर काहींच्या मते नृसिंहाने शरभाला हरवलं .
वास्तविक हे युद्ध जय पराजया पेक्षा विश्वाच्या पालक आणि संहारक अशा दोन शक्तीनी ( अनुक्रमे विष्णू आणि महेश) यांनी भानावर यावे म्हणून होते. शेवटी दोघांनी एकमेकांचे हे कपट वेष ओढून काढले ( नृसिंहाचे सिंह कातडे शिवांनी वस्त्रा सारखं नेसल म्हणूनच त्यांना शार्दुलचर्मांबरम् म्हणतात.) तर शिवाचे शरभ रूप ओढून काढतानाच्या या रूपाला गण्डभेरूण्ड नृसिंह म्हणतात या रूपात देवांना आठ मुखं आहेत ती अशी
सिंह मुख्य मुख नृसिंह
वराह
भेरूण्ड
हयग्रीव घोडा
भल्लुक अस्वल
वानर हनुमान
गरूड
वाघ
या आठ मुखासह मांडीवर शरभ महादेव समोर लक्ष्मी असं हे रूप आहे. हे उग्र रूप आपल्या इथे तांदळा म्हणजे स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे. एकाच वेळी त्यांच्या उग्र आणि प्रेमळ अशा दोन्ही प्रकारच्या रूपाची अनुभुती पुजारी मंडळीसह अनेक भक्तांनी आजवर प्रत्यक्ष घेतलेली आहे.

जैन तीर्थक्षेत्र बाहुबली :-

    जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली (कुंभोज) हे स्थान शतकापासून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि.मी. अंतरावर हे स्थान वसले आहे. बाहुबलीस येण्यासाठी विविध मार्ग आहेत. मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर हातकणंगले मार्गे बाहुबलीस येता येते. पुणे-बेंगलोर महामार्गावर वाठार गांवापासून पेठवडगांवमार्गेही बाहुबलीला येण्याचा मार्ग आहे. बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे. ते वर्णन बाहुबली डोंगराला पूर्णपणे लागू आहे. त्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६ फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्त्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत.
     

  ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुध्द दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर चैन तीथक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. येथे अनेक जैन संतांनी भेटी दिल्यामुळे हे पवित्र ठिकाण मानले जाते. २५० वर्षांपूर्वी तपस्वी संत श्री बाहुबली महाराज येथे राहत असत. येथे प्रमुख जैन तीर्थस्थळांच्या प्रतिकृती दर्शनासाठी ठेवल्या आहेत. तसेच २४ तीर्थंकरांच्या मूर्तीही आहेत. मुख्य बाहुबलीची मूर्ती २८ फूट उंचीची असून, ५० पायऱ्या चढून जावे लागते. संध्याकाळच्या सुमारास हा परिसर खूपच सुंदर दिसतो. तीर्थप्रतिकृतींमध्ये उजव्या बाजूला गजपंथा, तरंगा, मांगी-तुंगी, सोनगिरी, पावगिरी व डाव्या बाजूला कैलास पर्वत, शिखरजी आणि गिरनारजी आहेत. तसेच मुख्य मंदिराजवळ जलमंदिर, रत्नात्रय मंदिर, शांतिनाथ मंदिर, चंदप्रभा मंदिर, आदिनाथ मंदिर आणि समावाश्रम मंदिरदेखील बांधले आहे. कुंभोजजवळ आदिवन शंकरी शाकंभरीचे मंदिर आहे. शिक्षणमहर्षी पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हे जन्मठिकाण आहे.

सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. 


३०० वर्षांपूर्वी महान साधक बाहूबलींनी ज्या जागी तपाचरण केले होते, तिथे ऋषी बाहूबलींच्या नावाने १९३५ साली एक ध्यानगृह’ बांधण्यात आले. चार मनोऱ्यांची संगत असलेली त्यांची समाधी येथे आहे. गुरूदेव, सामंत भद्र महाराज १०८ वे यांच्या मार्गदर्शनाखाली, ७५ वर्षांपूर्वी, अनेक रिसॉर्टस् व शाळा बांधण्यात आल्या.

 मूळनायक : भगवान बाहूबली यांची श्वेत-मूर्ती, ही जवळपास ८५० सेमी. उंच असून खड्गासनातील आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : हे तीर्थ म्हणजे, अनेक तपस्व्यांची तपोभूमी आहे. दिगंबर सन्यास्यांच्या नुसार हे क्षेत्र एक ‘अतिशय क्षेत्र’ आहे. ३५० वर्षांपूर्वी, महान व ज्ञानी आचार्य, सामंतभद्रजी महाराज साहेब यांनी हया जागी अतिशय उग्र तपश्चर्या केली. हया टेकडीवर प्राचीन मंदिरे आहेत. पण सामंतभद्रजी महाराज साहेबांच्या धर्मकारणाच्या विद्यमाने बाहूबलींच्या नव्या मूर्तीची अलिकडेच प्रतिष्ठापना झाली.

इतर मंदिरे : हया मंदिराच्या आवारात कलात्मकतेने व सौंदर्यपूर्ण रीतीने बनविलेल्या सिध्दक्षेत्र आणि सामोवसरण यांच्या भव्य तसेच मनमोहक प्रतिकृती आहेत. हया टेकडीवर श्वेतांबर तसेच दिगंबर मंदिर आहे.

कला व शिल्पाकृती : जंगलातील टेकडयांनी वेढलेल्या हया परिसरातले हे मंदिर फारच सुंदर व रमणीय आहे. बाहूबलीची मूर्ती व प्रवेशद्वारावरील दोन गज-आकृती हया भव्य आणि विलोभनीय आहेत. 

जहाज मंदिर :- 

  भारतातील जैन मंदिरे खूप लोकप्रिय आहेत कारण त्यांची सुंदर रचना तयार करण्याची परंपरा आहे. "श्री बाहुबली" अतिशय क्षेत्रांचे जहाज मंदिर हे उत्तम कारागिरीचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण आहे. 

01.jpeg०१. 

 जहाज मंदिर हे एक जैन मंदिर आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज या गावी श्री बाहुबली अतिशय क्षेत्र या ठिकाणी हे मंदिर बांधलेले आहे. श्री बाहुबली अतिशय क्षेत्र हे सुद्धा बघण्यासारखे आहे. 

02.jpeg०२. 

 मुख्य संकुलाच्या अगदी समोर श्वेतांबर जहाज मंदिर आहे. या जहाज मंदिराची स्थापना १९९३ मध्ये झाली आहे.  जहाजाच्या आकारात बांधले गेलेले मंदिर संपूर्णपणे संगमरवरी कार्याने ५५ फूट उंचीवर भव्यतेने उभे केले आहे. जहाज मंदिर सुंदर लँडस्केप केलेल्या बागांनी वेढलेले आहे आणि चारही बाजूंनी विदेशी फुलांसह एक छान चालण्यासाठी मार्ग केला आहे. या बागेमध्ये फुले व झुडपांच्या मदतीने बऱ्याच देवी देवतांचे आकार साधले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती सांगायला एक व्यक्ती तिथे असते. संध्याकाळी, संपूर्ण परिसर दिव्यांनी चमकून निघतो आणि कारंजे चालू केले जातात. या ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे. येथील प्रवेश शुल्क ७ वर्षे व वरील व्यक्तींसाठी रु. १०/-  व त्याखालील व्यक्तींसाठी रु. ०५/- आहे.

    जहाजाच्या वरच्या बाजूला मुख्य मंदिर आहे. व जहाजाच्या आतमधल्या जागेत खूप छान असे भव्य संग्रहालय व अजून एक मंदिर आहे. तिथे फोटोग्राफीची परवानगी नाही. संग्रहालय व मंदिर बघण्यासारखे आहेत. संग्रहालय बघण्याकरिता आपल्याला अंदाजे ४५ मिनिटे लागतील व त्याचे प्रवेश शुल्क रु. २०/- आहे. लहान ७ वर्षेखालील मुलांसाठी काही शुल्क नाही. 03.jpeg

   संग्रहालयाकडूनच जहाजाच्या वरती असलेल्या मुख्य मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. वरती मुख्य मंदिराकडे पोचल्यावर हवेशीर अशी जागा आहे. समोर "श्री बाहुबली" अतिशय क्षेत्र आणि भव्य डोंगर. तिकडून येणारी मोकळी हवा, जहाजाच्या मागच्या बाजूस असणारे शेत परिसर. असा हा छान परिसर अनुभवायला मिळाला.  

   सायंकाळी ७ वाजता जहाजासमोरील बागेत कारंजे सुरु करतात. लहान मुलांसाठी खूप चांगले वातावरण तयार होते. शेवटी जाता जाता एक स्मरणिकाचे दुकान आहे. खूप साऱ्या वस्तू आपण स्मरणिका म्हणून विकत घेऊ शकता. 

 04.jpeg

कसे जावे:

कोल्हापूर रेल्वे स्टेशन किंवा मध्यवर्ती बस स्थानक येथून कुंभोज जवळपास २९.४ कि मी आहे व अंदाजे ४५ मिनिटे लागतात. राज्य महामंडळाच्या बसेस उपलब्ध असतात.
शिरोळ येथील 'दत्तगुरु भोजनपात्र मंदीर
    श्री दत्तप्रभूंच्या हाताच्या ठशांची पूजा होत असलेले  महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. याबाबतची आख्यायिका अशी : 
 दत्तगुरुंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह स्वामी महाराज यांचे १२ वर्ष वाडी परिसरात तपासाठी वास्तव्यास  होते.  एकदा ते भिक्षा मागण्यासाठी शिरोळला श्री गंगाधरपंत कुलकर्णी यांच्या कडे आले . त्यांच्या गृहिणीने महाराजांसाठी जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या. मात्र कण्या वाढण्यासाठी घरी पात्र नव्हते .
       हे जाणून महाराजांनी एक पाषाण आणला त्यावर प्रोक्षण करून प्रणव) ॐ )  लिहून भिक्षा वाढण्यास सांगितले. 
या पाषाणास दुधाचा अभिषेक केल्यानंतर दत्ताप्रभूंच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसतात 
सविस्तर कथा :- 
   कृष्णापंचगंगा परिसरात श्री नृसिंहसरस्वती महाराज १३६४ ते १३७६ या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते.या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत.असेच ते शिरोळ या ग्रामी गंगाधरपंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता माई भिक्षा वाढा असे म्हणाले.गृह्स्वमिनीने त्यांना नमस्कार केला व चांगले स्वागत करून म्हंटले कि गृहधनी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत कृपया थोडे थांबावे.कुलकर्णीच्या घरी अठराविश्व दारीत्र्य होते.मी स्वयंपाक करते असे त्या म्हणाल्या.त्यांच्या घरी जोंधळ्याच्या कण्या शिवाय काही शिल्लक नव्हते.त्याच त्यांनी शिजवल्या,पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता.साधी व धड पत्रावळ देखील नव्हती.
     महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रणवचिन्ह काढले व भिक्षान्न त्यावर वाढण्यास सांगितले.भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ह्या पात्राची पूजा करा ४२ पिड्यांचा उधार होईल,दारीत्र्य ,दुःख,पीडा नाहीश्या होतील, अन्नपूर्णा सदैव वास करेल असा आशीर्वाद दिला.थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृतांत कळाला. महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले.परंतु ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली.त्या पाषाणावर शंख,चक्र,पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली !

   हेच ते शि   रोळचे भोजनपात्र,या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आली आहे.प्रत्येक गुरुवारी पूजा,रात्री श्रीची पालखी आरती इत्यादी कार्यक्रम होतात.शाही दसरा महाराजांना ५ तोफांची सलामी दिली जाते व १२ वर्षांतून येणारे कन्यागत महापर्वकाळ वेळी २१ तोफांची सलामी असते. दत्तजयंतीला १० दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
 श्री क्षेत्र नृसिंहवाडी

 कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. पुरातन काळी इथे घनदाट जंगल होते. नरसिंह सरस्वती स्वामी हे भगवान दत्ताच्या १६ व्या अवतारांमधील एक. कुरूंदवाड ही त्यांच्या तपश्चर्येची जागा. इ. सन १०३४ ते १९८२ या दीर्घ कालावधीमधे, रामचंद्र योगी, नारायण स्वामी, मौनी महाराज, टेंबे स्वामी, महादबा पाटील या तपस्वी जनांच्या समाधी ‘वाडी’ येथे बांधल्या गेल्या. हया ठिकाणी कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या मंदिरास ५०० ते ६०० वर्षांची परंपरा लाभली आहे.

     श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. 'श्रीपादश्रीवल्लभ' हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर 'नृसिंहसरस्वती' हा 'दुसरा अवतार' समजला जातो. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.

     अमरापूर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरू चरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंहसरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते याठिकाणी येऊन पोहोचले. त्यावेळी या ठिकाणी औदुंबर वृक्षाची बनेच बने होती. दत्तभक्तांच्या आग्रहपूर्वक विनंतीवरून स्वामींनी आपले पुढील वास्तव्य येथेच केले. सुमारे १२ वर्षे नृसिंह सरस्वती स्वामींे वास्तव्य याच ठिकाणी होते व त्याचमुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच या ठिकाणी श्री दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा-पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे मुळातच एक प्रकारची प्रसन्नता आलेली होती. त्यातच स्वामींच्या वास्तव्यामुळे त्यात आणखीनच पावित्र्याची भर पडली, येथील आकर्षकता वाढण्यास मदत झाली.याठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप... असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो.

        नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदीर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.

          सांप्रत उभे असलेले मंदीर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदीर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरूचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक याठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. श्रीजनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी याठिकाणी घाट बांधला आहे. हा घाट पाहण्याजोगा आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते.

        मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.

       या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे केवळ त्रिकाळपुजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते. इतरवेळी‍ ही वाद्ये वाजवायची नाहीत असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे. पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. नित्य उपासनेमधे सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून, पाने ग्रहण करण्याचा विधी असलेली, रोज पहाटे होणारी ‘महापूजा’ पाहण्यासारखी असते. चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. हया मिरवणूकीच्या पूर्वी निरनिराळया मंत्रांचे उच्चारण होते, तेंव्हाचे मंगल, धार्मिक वातावरण प्रभावशाली असते.

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ‘भक्त मंडळा’मार्फत, हया मंदिराची सर्व व्यवस्था ठेवली जाते. दत्त संप्रदायाच्या वस्तूंची दुकाने तसेच मिठाईची दुकाने नरसिंहवाडीला आहेत.  कान्यगत अवसर असताना, तसेच प्रत्येक पौर्णिमेस इथे जत्रा भरते. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तजयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्वान आलेच, त्याचप्रमाणेच याठिकाणीही श्वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात. वाडीचे पेढे, कवठाची बर्फी आणि बासुंदी तर प्रसिध्दच आहे.

या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.


  दत्तमहाराजांची तपोभूमी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी

कसे जाल -

           कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. कोल्हापूरहून जयसिंगपूरमार्गे नृसिंहवाडीस जाता येते. त्याचप्रमाणे कोल्हापूरहून इचलकरंजी-कुरूंदवाडमार्गेही वाडीस जाता येते. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांना मिरज अथवा सांगली येथे उतरून नृसिंहवाडीत येणे सोयीचे होते. 

एस.टी मार्ग - मुंबई व पुणे येथून कोल्हापूर अथवा सांगली येथे येण्यासाठी थेट बसगाड्यांची सोय असून मुंबईपासून सुमारे ५०० तर पुण्यापासून सुमारे २४५ किलोमिटर अंतर आहे. कोल्हापूर अथवा सांगलीतून नृसिंहवाडीसाठी बसगाड्यांची सोय आहे.

रेल्वे - महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण मध्य रेल्वे मिरज-कोल्हापूर विभागाच्या जयसिंगपूर स्टेशनपासून १५ किलोमीटरवर. मुंबई, पुणे, बेळगांव येथून येथून कोल्हापूरसाठी रेल्वेगाड्या आहेत.

विमान - मुंबई व पुण्यातून कोल्हापूर येथे विमानसेवा आहे.

कुरुंदवाड : 
कोल्हापूर शहरापासून हे गाव ५५ किलोमीटरवर आहे. कुरुंदवाड हे पटवर्धन सरदारांचे गाव असून, नरसोबाच्या वाडीपलीकडे (नृसिंहवाडी) हे गाव पंचगंगा व कृष्णेच्या संगमावर वसले आहे. येथील राजवाडा, रघुनाथराव पटवर्धन यांनी बांधलेला घाटही प्रेक्षणीय आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. येथे संताजी घोरपडे यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन केले गेले. संताजी घोरपडे यांची म्हसवडजवळ कारखेल गावात हत्या करण्यात आली होती. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरिभट यांचे तिसरे पुत्र त्र्यंबक ऊर्फ अप्पा हे कुरुंदवाडचे संस्थापक. राणोजी घोरपडे यांनी त्र्यंबक पटवर्धन यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीत राणोजीने कुरुंदवाडची आपली जमीन १७३३ साली पटवर्धन यांच्या नावाने केली. या गावातील पं. विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी आशियातील पहिली सर्कस स्थापन केली. तसेच भारतातील संगीत परंपरा जोपासणारे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे कुरुंदवाड हे जन्मगाव आहे. 

कुरुंदवाड येथल्या (दत्ताचे प्रसिद्ध ठिकाण नरसोबाचीवाडी वरून हे ठिकाण दिसते. अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे.) पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे असे मानतात. येथे संताजी घोरपडे यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन केले गेले.संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी - म्हाळोजीराव घोरपडे यांनी- कुरुंदवाड येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणार्‍या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर एक सुब्रह्मणेश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे असे मानले जाते. कुरुंदवाड संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे.  अर्थात आणखी एक समाधी सातारा जिल्ह्यात आहे. म्हसवड गावापासून दहा किलोमीटर अंतरावर कारखेल गाव आहे. त्या गावात ही समाधी आहे. 






इतिहास मंदिराचा!
     सरसेनापती सेनापती संताजीं घोरपडे यांचे अंत्यविधी-समाधी स्थळ नृसिंहवाडी ( नरसोबावाडी ) जवळील कुरूंदवाड येथे आहे तिथेच त्यांच्या पूर्वजांचे ( खासगी मालकीचे ) शिवपंचायतन मंदीर आहे
याच मंदिराची २ वैशिष्ट्ये:-
येथील कार्तिकस्वामींचे दर्शन सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांना बारमाही खुले आहे
तसेच मी स्वत: नंदी म्हणून सेवा देईन असे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पूर्वजांनी शंकराला वचन दिल्याने या मंदिरात नंदी नाही

 खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर :-

कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात. आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.
खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण कोपेश्वर देवालय आहे. खिद्रापूरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. सांगली - खिद्रापूर या मार्गे यावे. सुमारे ३ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या खिद्रापूरचे ' कोपेश्वर ' हे ग्रामदैवत आहे.
आख्यायिका
येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला.  'कोप्पेश्वर' या नावामागे रंजक पौराणिक कथा आहे.शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान.
  दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

कधीही खिद्रापूर ला गेलो की मनात मंदिराच्या अनोख्या सौंदर्यानुभुतीचा आनंद तर होतोच पण मन एका न पाहिलेल्या पण अनेकदा ऐकलेल्या वाचलेल्या प्रसंगाच्या स्मृतीन मन कातर होतं. तो प्रसंग म्हणजे शिवपत्नी माता सतीचा देहत्याग. दक्ष प्रजापतीची कन्या आणि भगवान शंकराची पत्नी माता सतीने आपल्या पित्याने म्हणजे दक्ष प्रजापतीने शिवाचा केलेला अपमान सहन न होऊन योगाग्नीत स्वत:चा देह भस्म केला‌. संतापलेल्या शंकराने जटेतून विरभद्र आणि भद्रकाली ला प्रगट केले आणि त्या दोघांना दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली. नंदी आणि इतर शिवगण आधीच यज्ञाजवळ होते. फक्त यज्ञ मोडून विरभद्र थांबला नाही. तर प्रजापतीच मस्तक तोडून यज्ञात टाकून यज्ञ भ्रष्ट केला. सतीच्या विरहात शोक आणि क्रोधाने संतप्त शंकर भूमीवर आले यज्ञापासून दूर अंतरावर शोकमग्न बसून राहीले. हा सगळा प्रसंग घडला तो परिसर म्हणजे कोल्हापूर पासून ५८ किमी अंतरावर असलेल्या खिद्रापूर परिसरात . खिद्रापूर म्हणजेच गुरूचरित्र ग्रंथात काशीपुर म्हणून वर्णन केलेले जुगूळ . जुगूळचा मूळ शब्द युगूल म्हणजे जोड. आता हा जोड शिवशक्ती चा जोड नाही तर हरीहराचा. एरव्ही मूर्ती रूपात असणारे विष्णू इथे लिंग रुपात आहेत. शोकसंतप्त कोपेश्वराचे सांत्वन करायला विष्णू इथे धोपेश्वर लिंग रूपाने विराजमान झाले आहेत. गंमत म्हणजे इथे शिवाचा लाडका नंदी नाही कारण तो कृष्णेच्या पैलतीरावर यडूर गावात आहे. जिथे तिसरं महालिंग विरभद्र आहे. अशा या कोपेश्वराचे मंदिर म्हणजे शिलाहार काळातील शिल्पशास्त्राचा उत्तम नमूना आहे. 
 इतिहास
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी.पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.
 जवळपास ९०० वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे.
मंदिराचे सौंदर्य
       देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. 

खिद्रापूर मंदिराविषयी
     बस स्थानकावर उतरल्यावर पूर्वेस भव्य कृष्णेचे पात्र आणि पश्चिमेस एक अद्वितीय मंदिर दिसल्यावर नजरेचं पारणं फिटतं. मंदिराचं आवार सुरू झाल्यावर एक फलक आहे. त्यात आपल्याला वाचायला मिळते की हे प्राचीन मंदिर केंद्र शासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले आहे.

      मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.

आपण कोप्पेश्वर मंदिरात प्रवेश करतो, तो मंडप स्वर्गमंडप म्हणून ओळखला जातो. मुख्य मंडपापासून काहीसा विलग. खुला. या मंडपाला छत नाही. अठ्ठेचाळीस खांबांवर तोललेल्या या मंडपाला छताच्या जागी मधोमध वर्तुळाकार मोकळी जागा. या आकाशगवाक्षाच्या नेमकी खाली गुळगुळीत काळ्या दगडाची रंगशिळा आहे. एका मोठया, अखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने स्वर्गमंडपाचे गोल छत उभे केले आहे. अशी दुसरी स्थापत्यरचना माझ्या ऐकण्यात नाही. या मंडपातील दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहात राहावे असे आहे. खांबांवरील कामात सुबकता आहेच, पण एका साच्यातून काढावेत इतकी एकसंधता या कामात आहे. अष्टदिक्पालांची दंपती मंडपात कोरून काढलेली आहे. छताखाली नऊ ग्रहांची मांडणी केली आहे.

म्हणतात, स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. या मंडपाला यज्ञमंडप असेही म्हणतात. होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी छत गोलाकार मोकळे सोडले असावे, असे सांगितले जाते. पण यज्ञयागाच्या अन्य कोणत्याही खुणा येथे दिसल्या नाहीत. या मंडपात रंगशिळा आहे, म्हणून एक वेगळा विचार मनात येतो. पूर्वी गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन, नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर झाला, असे म्हणतात.

मंदिराचे अवयव कसे असावेत, हे अग्निपुराणात सांगितले आहे. मनुष्यदेहाशी मंदिराचे साम्य दाखवण्यात आले आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस. गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. गर्भाशयात काळोख असतो म्हणून गर्भगृहही फार प्रकाशमान असणार नाही, याची काळजी घेतली जाते. गर्भाशयात गर्भ तशी गर्भगृहात मूर्ती. गर्भात आत्मा, तसा गाभाऱ्यातील मूर्तीत सृष्टीचा आत्मा. असे काही. कोपेश्वराच्या मंदिराचा गाभाराही अंधाराच आहे. मंद तेवत्या समईंच्या प्रकाशात कोपेश्वर व धोपेश्वर दिसतात. दक्षिणाभिमुखी आडवे विभूती लेपन केलेला कोपेश्वर आणि त्याच्यापुढे समजूत घालायला आलेला उभा गंध लावलेला धोपेश्वर. डोळे अंधाराला सरावले की भिंतीवर कोरलेल्या शिवलीलामृतातील कथाही दिसतील.

मंदिराच्या प्रत्येक भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. खिद्रापूरच्या मंदिराला मुखमंडप नाही. त्याऐवजी मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला स्वर्गमंडप आहे. त्यानंतर सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे.

आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो. पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. सभामंडपात मधोमध असणार्‍या चार खांबांमध्ये जमिनीवर रंगशिला आहे. येथेही रंगभोग म्हणजे देवाची कलेच्या माध्यमातून सेवाउपासना केली जाते. येथे भक्तगण उपासनेला, कीर्तन-प्रवचन ऐकायला बसलेले असतात. त्यांना सहज आतबाहेर करता यावे यासाठी या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. एक व्यालशिल्प आवारात पडलेले दिसले. पण यापेक्षा मंदिरातील शिल्प अधिक सुबक आहे. सर्वच व्याल मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे व्याल कोरलेला असतो. हा काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला होता, असे लक्षात येते. सभामंडपाच्या मधे बारा स्तंभ आहेत. त्यांच्याभोवती वीस स्तंभ आहेत. या स्तंभांच्यापलीकडे मंडपाची भिंत आहे. मंडपाला प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. तसेच हवा खेळती राहावी यासाठी जालवातायनेही आहेत.

या मंडपातून अंतराळकक्षात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. अंतराळकक्षातही सुरेख कोरीव स्तंभ आहेत. इथल्या प्रत्येक खांबावर रामायणातील कथा कोरलेल्या आहेत. नरसिंह अवतार, भक्त प्रल्हाद, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आढळतात. पंचतंत्रामधील माकड आणि मगरीची कथा, दोन पक्ष्यांनी काठीच्या आधारे कासवाला वाचवण्याची केलेली धडपड या कथा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहात जाताना उंबरठ्यापाशी सुंदर रांगोळीसारखी सुघड नक्षी कोरलेली दिसते. कोप्पेश्वर मंदिर ही अंतर्बाह्य सुंदर, सुघड कलाकृती आहे. हे मंदिर जेवढे आतून सुंदर आहे, तेवढेच बाहेरूनही. कितीही वेळ निरखावे, डोळे निवत नाहीत.

मंदिराच्या दक्षिण-उत्तर अंगाला ऋषभ जोडलेले रथ आहेत. रथात दंपती. शिव-पार्वती वाटत नाहीत, पण तीच अपेक्षित असतील का? विवाहानंतरची नवथरता चेहऱ्यावर दिसते. दक्षाघरी यज्ञाला जाण्याआधीची शिव-पार्वती असतील का ही? मंदिराच्या मागे भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत. या शिल्पाच्या एका बाजूला ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णूही आहेत. मंदिराच्या समोर नंदी नसला तरी, भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.

एक स्मरण..
कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात.

गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जुळणी आहे. येथील गजथरातील पंच्याण्णव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. मंडोवरावरील विष्णू अवतार, गणपती, चामुंडा, दुर्गा यांची शिल्पेही सुंदर आहेत. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर अनेक अन्य शिल्पेही लक्ष वेधून घेतात. बाळाला खेळवणारी माता, विविध केशरचना करणाऱ्या ललना मला पाहता आल्या. सगळ्याच शिल्पांची रेखणी आखीव आहे. शिल्पांमध्ये आखीव ऱेखणी करणे अवघड असते, पण येथे ते सुघड झाले आहे. ही शिल्पे पाहायला वेळ कमी पडतो. शिल्पपट्टीतील गुजराती-राजस्थानी भारतीय व्यापारी, अरब व्यापारी, माल वाहून नेणारे हबशी यांची शिल्पे  वरच्या पट्टीत आहेत ती निरखायला एक छोटी दुर्बीणही सोबत असायला हवी.

   असं  म्हणतात, औरंगजेबाच्या कन्येने कोप्पेश्वराचे मंदिर पाहिले आणि ती येथील शिल्पांच्या प्रेमात पडली. ती येथेच राहिली. अनेक प्रकारे तिच्या मिनतवाऱ्या करण्यात आल्या, पण ती खिद्रापूर सोडेना. अखेर, या मंदिराला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही, असे औरंगजेबाने वचन दिल्यावर ती माघारी परतली. या मंदिराच्या रक्षणासाठी खैदरखान याची नेमणूक करण्यात आली.

      खैदरखानलाही हे मंदिर, हा परिसर खूप आवडला. त्याने आपल्या नावावरून कोप्पमचे खिद्रापूर केले. खैदरखानने या मंदिराच्या बाह्यभागावरच्या शिल्पांची नासधूस केली. अनेक कहाण्या या मंदिराच्या प्राकारात विखरून पडल्या आहेत ध्वस्त शिल्पासारख्याच. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवल्यावर या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराच्या खर्चासाठी दान दिले होते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्याबाहेरच्या शिलालेखात तसा उल्लेख आहे. जे उरले आहे तेही विलक्षण आहे.

कोप्पेश्वर मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात. शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले दिसते, तेच कीर्तीमुख. येथील या शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख नावाचा असूर शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली. महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेव म्हणाले, स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवालयाच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली.

या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्‍या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असेही अनेकजण मानतात. या सुरसुंदरी मंदिराच्या भिंतीवर आवर्जून कोरण्यात येतात. आपल्याला शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध या विषयांनी ग्रासलेले असते. या विषयांत मन न गुंतवता, मंदिरात जातांना सावध चित्त असावे, असे  या सुरसुंदरी सुचवतात. तसेच, यातील काही जणी देवदर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे, देवदर्शनाला कसे जायचे असते याचेही मार्गदर्शन करतात. रिक्त हस्ते देवाला जाऊ नये. पाने, फळे, फुले असे काहीच जवळ नसेल तर मनोभावे केवळ जलही अर्पण केले तरी चालते. या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी, भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.

प्राचीन काळापासून लोकश्रद्धेत स्थान मिळवून बसलेल्या यक्ष-यक्षींची योजना भारतीय शिल्पकारांनी वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते. मंदिरशिल्पात यक्ष-यक्षीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पौराणिक कथांमधून यक्ष-यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी दिलेली दिसते. यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. या मंदिरावरही ती दिसेल. एका यक्षाला भक्तांकडून हळद-कुंकू वाहिलेलेही दिसते.

दक्षिण भारतात नाग अनंताची पूजा मंदिराच्या प्राकारात केलेली आढळते. या मंदिराच्या प्राकारातही बाहेर एका वृक्षातळी भंगलेले शिल्प आढळते. नाग हे काळाचे प्रतीक आहे. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो, वेगाने पुढे सरकणाऱ्या काळासारखा. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाला अंत नाही म्हणून तो अनंत. म्हणूनच नागालाही अनंत म्हणतात. हा नागपुरूष सर्वांवर कृपाक्ष ठेवून असतो. तोच विष्णूसाठी शय्या होतो आणि शिवाच्या गळ्यात डोलतो.

 मंदिराची रचना
         स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमूना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. मध्यवर्ती स्वर्गमंडपालाच यज्ञमंडप असेही नाव आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.
   एका मोठया, अखंड शिलेवर अट्ठेचाळीस खांबांच्या आधाराने गोल छत उभे आहे. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहावं असं वाटतं. एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे या कोरीव कामामध्ये एकसंधता, सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणा त्या खांबांवर आपले प्रतिबिंब उठावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जातं. या स्वर्गमंडपाचे उघडे छत हे होम-हवनाच्या समिधांचे धूर जाण्यासाठी ठेवले आहे. आणि छिद्रांमुळेच या गावाचे नाव छिद्रापूर… ते खिद्रापूर असे पडले असा एक तर्क आहे.    

 















 
















         स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. सभामंडप हा सुध्दा दगडी खांबांवर उभा आहे. सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत.वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे. या दालनाला सहा खिडक्या, तीन दरवाजे आहेत. या सभामंडपाच्या मध्यभागी गोलाकार शिळा आहे. त्यावर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. या मंडपाच्या खांबावर रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवर सुंदर दगडी कोरीव काम आहे. पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे दालन खरोखरच अप्रतिम आहे.या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. 

 या नंतरचा मुख्य भाग म्हणजे, गर्भगृह. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.जय-विजय या दोन द्वारपालांनी गर्भगृहाचा दर्शनी भाग सजला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक राहीला आहे. मोठया दरवाजाच्या पायथ्याशी कासव व बाजूला भितीवर यक्ष यक्षिणीचे दर्शन होत आपली नजर खिळते ते दक्षिणाभिमुख असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर. हे शिवलिंग किंचिंत तांबूस रंगाचे असून शाळुंखा रंगाने काळी कुळकुळीत आहे. गाभाऱ्यात भरपूर गारवा जाणवतो. गर्भमंडपाच्या दालनात तीन लहान कमानी आहेत, परंतु तेथील सिंहासनांवर मूर्ती मात्र नाहीत.
    शिवलिंग व कोपेश्वराचे दर्शन घेऊन ज्यावेळी सभामंडपात येतो त्यावेळी उजव्या बाजूला मंदिर पाहण्यास बाहेर पडल्यावर एक शिलालेख आढळतो. प्राचीन भाषेतील हा शिलालेख अनाकलनीय आहे. वाटाडयांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव सम्राट सिंहाण देव याने खिद्रापूरच्या लढाईत मोठा विजय मिळवून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आणि मंदिराच्या खर्चासाठी ‘कुडलदामवाड’ नावाचे दान दिल्याचा या शिलालेखात उल्लेख असल्याचे सांगितलं जातं. बाहेरुन मंदिराचे निरीक्षण करताना वेरुळच्या लेण्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण मंदिर एकशे आठ गजपीठांवर विराजमान आहे. हत्तींच्या वरच्या रांगेमध्ये कोरलेल्या देव, यक्ष, यक्षिणी यांची रूपे फार मोहक आहेत. पण खालील हत्तीची ओळ अखंड अशी मिळत नाही. या तळातील गजरुपानंतर साधारणपणे ८ ते ९ फुटावर अनेक नर्तकी, नर्तक, वादक आणि शस्त्रधारी शिल्पांची मुक्त उधळण शिल्पकाराने येथे केली आहे. त्यावेळच्या बांधकामांची रचना, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा व या परिसरातील तत्कालीन राजांचा वैभवशाली कालखंड, त्याचं कलाप्रेम खिद्रापूरमुळे मनात अधोरेखित केलं जातं.
जैन मंदिर
   हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूरपेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे तशी आज जतन होत नाही, याचेच फार दु:ख वाटते.
१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही.
२. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे.
३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही.
४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.

 कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
जाल कसे?
सांगली किंवा कोल्हापूर या दोन्हीकडून नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे जायचे. तेथून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर. नरसोबाच्या वाडीपासून 25 किलोमीटरवर.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...