डाकोर धाम मंदिर :-
गुजरातमधील प्रमुख धार्मिक स्थळापैकी एक म्हणजे डाकोर.इथे द्वारकानाथाची पुजा केली जाते.डाकोर हे आनंद-गोध्रा रेल्वे मार्गावर आहे.इथले प्रमुख मंदिर अर्थातच गोमतीच्या किनार्यावर असलेले मुख्य बाजारातील 'रणछोडजी मंदिर'.या मंदिरातील शिल्पकला आवर्जून जाउन पहावी अशी आहे. हे ठिकाण आणंद्पासून केवळ ३० कि.मी. दुर आहे.इथे स्वामी नारायण मंदिराबरोबरच वैष्णवांची इतर मंदिरे आहेत.
इतिहास :-
या मंदीराचा इतिहास मोठा रोचक आहे. एका पौराणिक कथेनुसार डाकोर गावात बाजे सिंग नावाचा एक राजपुत रहात होता. तो द्वारकाधीशांचा परम भक्त होता.हातात तुळ्शीचे रोप घेउन तो आपल्या पत्नीसह द्वारकेला चालत जात असे. आणि भगवाम श्रीकृष्णांना तुळशीपत्र वहात असे. मात्र बाजे सिंग पुढे बहात्तर वर्षाचा झाला आणि वृध्दापकाळामुळे तो द्वारकेला जाउ शकला नाही.त्यामुळे तो दुखी होता.स्वतः द्वारकाधीश त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी बाजेसिंगला सांगितले कि आता त्याला द्वारकेला येण्याची गरज नाही. द्वारकेतील आपली मुर्ती डकोरला घेउन जाण्यासाठी बाजे सिंगला सांगितले. परमेश्वराने दिलेल्या आदेशानुसार बाजेसिंगने द्वारकेत रात्री प्रवेश केला आणि सर्व गावकरी झोपले आहेत याची खात्री करुन त्याने मुर्ती उचलून डाकोरला आणली. इकडे सकाळी जेव्हा द्वारकेतील मंदिराचे दरवाजे उघडले गेले तेव्हा सर्वत्र शोध सुरु झाला.द्वारकेच्या मंदिराचा पुजारी गावकर्यांना घेउन मुर्तीच्या शोधात बाहेर पडला. बाजेसिंगला हि हकिकत समजल्यावर त्याने मुर्ती आधी गोमती नदीत लपवून ठेवली. नंतर तलावात लपवून ठेवली.पुजार्याला याचा संशय आला.तलावात मुर्ती आहे कि नाही हे पहाण्यासाठी जेव्हा भाल्याने तलावाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाल्याचे टोक मुर्तीला लागले आणि त्याची खुण आजही आपण मुर्तीवर पाहु शकतो. याप्रकारे द्वारकेच्या मंदिरातील पुजार्याला मुर्ती तर मिळाली पण बाजे सिंगने मुर्तीच्या वजना इतके सोने देण्याचे कबुल करुन मुर्ती डाकोरमध्येच स्थापन करण्याची विनंती केली. ज्या दिवशी डाकोरमध्ये या मुर्तीची प्रतिष्ठापणा झाली त्यादिवशी कार्तिक पौर्णिमा होती. त्यामुळे डाकोरच्या मंदिरात कार्तिक पौर्णीमेचे वेगळे महत्व असते.

डाकोरजी मंदिराची सुंदरता और भव्यता – Dakor Temple Architecture
गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिराप्रमाणेच डाकोर भगवान रणछोडजी मंदिराचे महत्व आहे.या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची सावळ्या रंगाची अति सुंदर मुर्ती प्रतिष्टापीत केली आहे.गोमतीच्या किनार्यावर उभारलेल्या या देखण्या मंदिराची निर्मिती संगमरवरी दगडात केली आहे.द्वारकेच्या श्रीकृष्णाच्या मुर्तीप्रमाणेच हि मुर्ती असून भगवान श्रीकृष्णांनी हातात चक्र आणि शंख धारण केले आहेत. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस चढवला आहे.हे सुंदर मंदिर भाविकाना आकर्षीत करते. डाकोरच्या या मंदिराजवळच गोमती तलाव आहे.याच्या तीरावर डंकनाथ महादेव मंदिर आहे.याशिवाय भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त बाजेसिंग याचे मंदिरही आहे.
विमानमार्गे- सर्वात जवळचा विमानतळ आहे ९० कि.मी.अंतरावरील अहमदाबाद विमानतळ
रेल्वेने :-
आनंद-गोधरा ब्रॉडगेज मार्गावर डाकोर आहे.
रस्त्याने :-
अहमदाबादवरुन डाकोरला जाण्यासाठी बस,टॅक्सी यांची सोय आहे.
लोथल
तिथं असणाऱ्या विहिरीसाठी ज्या विटा वापरल्या त्या विशेष आहेत. त्या विटांचा आकार पुढे ४ इंच आणि मागे ६ इंच असा आहे. या विटा एकमेकांना जोडत गेल्या की आपोआप वर्तुळ तयार होते.
डभोई :-
डभोईचे प्रचिन नाव आहे दर्भावती. डभोई बडोद्यापासून ३२ एक किमि आहे. गावापर्यंतचा रस्ता मस्त, आजुबाजूला कोथींबिरेची शेती. कोथिंबीर फुलाला आली असल्यामुळे खाली हिरवी रोपे व वर पांढऱ्या फुलांचे तुरे असा मोठा बहारदार देखावा दिसत होता. मधेच वाऱ्याची झुळूक आली की रोपांची ती पागोटी मस्तपैकी डुलत होती.
डभोईमधे शिरताना मात्र हे सगळे दृष्य बदलू लागले व इतिहासात वाखाणलेल्या सिद्धराजा जयसिंगाने बांधलेले हेच का ते डभोई ही शंका येऊ लागली. खरोखरच उकिरडा बरा अशी पहिली वेस लागली.
सिद्धराजा
जयसिंग हा एक कलासक्त राजा होता व त्याने जी बांधकामे केली आहेत त्यावरुन
दिसून येते. त्याने डभोईचा किल्ला बांधला व त्याने बांधलेल्या अजून दोन
वास्तूंनी याची प्रचिती येते. पहिली वास्तू आहे रुद्रमहालय व दिसरी
सहस्रार्जून तलाव. प्रबंधचिंतामणीमधे या राजाबद्दल एक श्र्लोक आहे तो असा :
महालयो महायात्रा महास्थानं महासर: |
यत्कृतं सिद्धराजेन कियते तन्न कियेचित. ||
याचा
अर्थ साधारणत: असा होतो...भव्य महाल,(रुद्रमहालय), धार्मिक यात्रा
(सोमनाथ), स्थान (दरबार) व सागराप्रमाणे भव्य तलाव (सहस्रलिंग तलाव) यात
सिद्धराजाचा हात धरणारा या भूतलावर कोणी नाही.....
डभोईला चार वेशी आहेत व त्या उत्कृष्ट कलाकृतींनी नटलेल्या आहेत. पण मला हे उमजले नाही की या वेशींचा गावाच्या संरक्षणासाठी काय उपयोग होता. कदाचित त्यावेळी हा राजा एवढा बलाढ्य होता की त्याला त्याची गरज भासली नसावी. माझ्या मते हा दुरदृष्टीचा पूर्णपणे अभाव असल्याचे द्योतक आहे. मी तरी असली नाजूक वेस व तटबंदी संरक्षणासाठी बांधली नसती. परकीय आक्रमकांना दोष देण्यात काय हशील आहे ? एक वेस आहे पूर्वेला तिचे नाव आहे हिराभागोल, हे नाव ज्याने ती बांधली त्या हिराधर नावाच्या वास्तूविशारदाच्या नावावरुन ठेवले आहे. पश्चिमेला आहे वडोदरा वेस, उत्तरेला चंपानेर वेस व दक्षिणेला आहे माहुडी किंवा नांदेड वेस. यातील पहिल्या व शेवटची वेस अप्रतीम शिल्पांनी सजलेली आहे. अर्थात उकिरडा तुडविल्यानंतर ही रत्ने आपल्या दृष्टीस पडतात....
राजा होता हिंदू, पण जैनधर्माला त्याने उदार राजाश्रय दिला असल्यामुळे दभोईमधे अनेक जैन देवळेही दिसतात. मराठ्यांसाठी डभोईचे अजून एक महत्व आहे. डभोईला एक महत्वाची लढाई झाली ज्याने शाहूमहाराजांचा दरारा महाराष्ट्रात सिद्ध झाला. ही लढाई झाली बाजीराव पेशवे पहिले व सरसेनापती त्रंबकराव दाभाडे यांच्यात. राजाराममहाराजांनी खंडेराव घाटग्यांची योग्यता पाहून त्यांना भली मोठी जहागिरी दिली व त्यांनीही त्याचे चिज केले. १७१७ साली जानेवारीत शाहूमहाराजांनी दाभाड्यांस गुजरातला पाठवून तिथे वसूली करण्याचा अधिकार दिल्यावर खंडेराव व बाळाजी विश्र्वनाथ यांच्यात चांगली मैत्री हो़ऊन त्यांनी बरीच फायदेशीर कामे पूर्णत्वास नेली. परंतू त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा त्रंबकराव व त्याचा सरदार पिलाजी गायकवाड हे मोहिमांच्या खर्चाचा हिशेब देईनासे झाल्यावर शाहूमहाराजांनी बाजीरावास या दोघांची समजूत काढण्यास गुजरातेत पाठविले. बाजीराव शेवटपर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला अपयश आले. याच्यातच निजामाने दाभाडे व पिलाजीचे कान भरले व गुजरातमधे त्यांचे आता काम राहणार नाही असे पटविले. अर्थात बाकी अनेक कारणेही होती त्यात आता आपण जायला नको. त्यावर एक भला मोठ्ठा लेख होईल. बाजीराव डभोईस मुक्कामास असता १ एप्रिल १७३१ रोजी दाभाड्यांनी त्यांच्या तळावर अचानक हल्ला चड्गविला. बाजीरावाची फौज होती अंदाजे २५००० व दाभाडे व गायकवाडांची मिळून होती ५०,०००. त्रंबकराव स्वत: हत्तीवर बसून लढाईत सहभागी झाले होते. तेही शूर होतेच. असे म्हणतात त्या हत्तीचा माहूत जखमी झाल्यावर ते पायाने हत्तीला पराणे टोचत लढाई करत होते तेवढ्यात कपाळात गोळी लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पुढे शाहू महाराजांनी पेशवे व दाभाड्यांमधे दिलजमाई करुन दिली पण दाभाड्यांना मोहिमांचा हिशेब द्यायला लावलाच. शाहू महाराजांनी स्वत:च्या सरसेनापतीस वठणीवर आणले हे बघून इतर सरदारांचीही टाळकी ठिकाणावर आली असे म्हणतात. मी या लढाईबद्दल डभोई येथे चौकशी केली पण कोणालाच काही माहिती नव्हते.
माहुडीची वेस:
या
वेशीशेजारीच अलिकडेच बांधलेले एक कालिमातेचे छोटे मंदीर आहे. वेशीच्या
भिंतीवर नाथ पंथीय साधूंची शिल्पे आहेत. (असे काही जणांचे म्हणणे आहे)
त्याबद्दल प्रत्येक छायाचित्रांखाली जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न
केला आहे.
या वेशीला आतून अशा पाच कमानी आहेत. व प्रत्येक कमानीच्या मधे
जी जागा आहे त्यात शिल्पे कोरलेली दिसतात....कमानी वर पूर्वी बांधकाम होते
असे म्हणतात पण आता तसे काही दिसत नाही. दिसते ते तारांचे जंजाळ ज्याचे
छायाचित्र घेववत नाही.
या कमानींवर गजव्यालावर बसलेल्या स्त्रिचे शिल्प प्रत्येक ठिकाणी आढळते. बहुदा ते सजावटीसाठी असावे.
कमानीवर
थोडे वर पाहिल्यास दोन योगाचार्यांच्या प्रतिमा दिसतात. त्यातील
डाव्याबाजूच्या योग्याने गुडघ्याभोवती योगपट्टा लावलेला दिसतो. असे म्हणतात
हा एकदा चढविला की त्याच स्थितीत साधक १०-१२ तास सहज बसू शकतो.
हे
पाहिल्यावर मला एलोरामधे एका भिंतीवर असलेल्या एका योग्याच्या चित्राची
आठवण झाली. सध्या हा योगपट्टा साधक वापरतात का ते माहीत नाही.....बघायला
पाहिजे एकदा.........
अजून शिल्पे पुढच्या भागात बघू....व त्यानंतर हिराभागोलला जाऊ.
क्रमशः
२ दभोई
हे
शिल्प बहुदा चांमुंडाचे किंवा कालिचे असावे. सातव्या शतकात योगिनींच्या
पूजेस प्रारंभ झाल्यावर भारतात अनेक ठिकाणी त्यांची देवळे तयार झाली (
वर्तुळाकार असतात) त्यातील काही देवतांच्या मूर्ती स्वतंत्रपणेही आढळतात.
मला शंका आहे कदाचित या मूर्ती तत्सम असाव्यात.
या देवतेखाली जे वाहन दाखविले आहे ते नीट दिसत नाही कारण छायाचित्र खालून काढले आहे. पण ही बहुदा सरस्वती किंवा ब्राह्मणी असावी.
एका
देवतेचे वाहन उंदरासारखे दिसते तर दुसरीचे मनूष्य. उंदीर हे गणेशाचे वाहन
आहे तर मनूष्य हे कुबेराचे. पण यात मला सुसंगती लागली नाही. अर्थात गणेशीचे
शिल्प आपल्या येथे आहे पण कुबेरावरुन एखादी देवता असेल असे मला वाटत नाही.
वल्लीने किंवा अजून कोणाला माहिती असल्यास यावर प्रकाश टाकावा.
शेजारच्याच देवळाच्या भिंतीत चिणलेला एक दगड. खाली अजून दोन दगडांची छायाचित्रे दिली आहेत.
ही
बहुद उमा योगिनीचे शिल्प असावे. सप्त मातृकांनंतर स्त्रिशक्तीच्या विविध
रुपांचे प्रतिनिधित्व मूर्तींमधे दिसू लागले त्याचेच हे उदाहरण.
आतल्या खांबांवर प्रकाश इतका मस्त पडला होता की फोटो काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
हिंदू
देवळात हमखास आढळणारे शिल्प या माणसाचे असते. भारवाहक. अशी कल्पना आहे की
हा आपल्या हाताने मंदीराचा भार उचलतो. काही भारवाहकांच्या शिल्पात त्याला
तो भार वाहताना होणारे कष्ट स्पष्ट दिसतात. यात एक वेगळी गोष्ट मला आढळली
ती म्हणजे त्याचे पाय. ज्या प्रकाराने ते गुडघ्यात वाकविलेले आहेत तसे
अंतराळात/अवकाशात उडणार्या यक्षाचे दाखविले जातात. शिवाय याला चार हात
आहेत. हा भारवाहक आहे का यक्ष ? का एखाद्या यक्षाला भारवाहकाचे काम दिले
आहे ? (शिक्षा म्हणून ?)
थोडे
उजवीकडे बघितल्यास एक छोटी कमान दिसते त्यावर ही मुद्रा आढळली. बहुतेक ही
नजर लागू नये म्हणून जे कोहळे तामिळनाडूमधे घरावर टांगतात त्याप्रकारचे
काहीतरी असावे पण खात्री नाही.
आपल्याकडे
जसे गधेगाळ सापडतात त्याप्रमाणे येथे गधेगाळ नव्हता पण भिंतीवर तत्सम
शापवाणी कोरली होती. व गधेगाळावर जशी मूर्ती असते तशी अस्पष्ट असे चित्रही
कोरले होते. एक माणूस उत्साहाने आम्हाला ते दाखविण्यास घेऊन गेला व त्याने
जे सांगितले ते ऐकून मी पडायचाच बाकी होतो. " पूर्वी राजाची राणी
गाढवाबरोबर झोपायची त्याचे ते चित्र आहे'' त्याचे ताबडतोब शंका निरसन
करण्यात आले व पुढे खरे काय तेच सांगावे असे त्याला बजाविले.
शेजारी जे मंदीर आहे त्याच्या कुंपणामधे जे दगड चिणले आहेत त्यावरील काही कोरीवकाम.
ही कमान बघून आम्ही हिराभागोलची चौकशी केली. त्यावरील नक्षिकाम अप्रतीम आहे त्याचा एक नमूना.....व बाकीची छायाचित्रे पुढच्या भागात.
याच ठिकाणी आम्हाला वढवाणा तलावाबद्दल माहिती कळाली आणि आम्हाला पक्षांचा खजिनाच सापडला तेही पुढच्या भागात.....
दुसरी देवता कदाचित ब्राह्मणीच असावी. सरस्वतीची शक्यता कमी वाटतेय. कारण वाहन मोर असते तेव्हा त्याचा पिसारा लांबलचक दाखवलेला असतो. तसे येथे दिसत नाही.
तिसरी
प्रतिमा गुंतागुंतीची आहे खरी. मूषकवाहिनी खरे तर गणेशिनी किंवा विनायकी
असते मात्र तीचे मुख गणपतीसारखेच असते. शेजारची प्रतिमा बहुधा प्रेतवाहिनी
चामुंडा असावी.
किंबहुना ह्या दोन्ही प्रतिमा गणेशिनी आणि चामुंडेपैकी नसून त्या योगिनींच्या असाव्यात.
पोपटाचे मुख असलेली योगिनी उमा का योगिनी शुकी?
डभोई हिरागेट
आत्तापर्यंत गुजरातमधे प्रवेश केल्यावर जेवढा प्रवास केला त्यात लक्षात राहणार्या बाबी म्हणजे रस्त्यांचा दर्जा. जगभरातील रस्त्यांना टक्कर देतील अशा दर्जाच्या रस्त्यावरुन जाताना पोटातील पाणीही हलत नव्हते. सगळे रस्ते डांबरी, त्यामुळे आवाजही कमी येत होता व मधे खटखट येणारे आवाजही नव्हते. बरेचसे रस्ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केले होते. रस्ते म्हणजे नुसते डांबर टाकून त्यावरुन रोड रोलर फिरवणे असे नसते तर त्यामागी काहीतरी तंत्रज्ञान असते ही महाराष्ट्रातील राजकारण्यांना केव्हा उमगणार देव जाणे. टोल नाक्यावर एकदाही दोन मिनिटापेक्षा जास्त थांबावे लागले नाही. टोलही जाचक वाटला नाही. काका पुतण्या भाच्यांना काँट्रॅक्टर बनवून त्यांच्याकडून रस्ते बनवून घेतल्यावर काय होते हे आपण इथे बघतोच आहे. एका ठिकाणी चहा पिताना एका कर्नाटकमधून आलेल्या एका पर्यटकाशी बोलताना मला माझीच लाज वाटली. तो म्हणाला, "गुजरात, मध्यप्रदेश मधे सगळे प्रमुख रस्ते चांगले आहेत. गोव्यातही चांगले आहेत एक येही महाराष्ट्रमे प्रॉब्लेम !'' नुकताच कोकणात जाऊन आल्यावर सातार्याच्या पुढच्या रस्त्यावरुन प्रवास केला असल्यामुळे त्याच्याशी सहमत होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मला आता वाटू लागले आहे की आपण निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी नालायक असतील व जर स्वतःच्या तुंबड्या भरत असतील तर राज्य सरकारने व केंद्रसरकारने एक टेंडर काढावे ज्यात दर ठरवून, त्या दराने कुठेही काम करण्यास परवानगी द्यावी. त्यात काही % बदलाची परवानगी द्यावी. कारण लोकहो ही मामा, काका, भाच्चे, पुतणे कंपनीने केलेली कामे शेवटी अपल्याच खिशातून पैसे घेऊन जातात. मला आठवते, भारतातील सगळ्या राज्य परिवाहन मंडळाने अशी योजना राबविली होती ज्यात ते गाड्यांना लागणार्या सुट्ट्या भागांची एकदम खरेदी ओईकडून करायचे. ती अजून चालू आहे का ते माहीत नाही. मागच्या महिन्यात जेथे लहानपणी रहात होतो त्या वाड्यात गेलो होतो. लहानपणी वाड्यात जाण्यास दीडफुटी पायरी चढावी लागे. आता उंबरा रस्त्याच्या पातळीवर आलेला दिसला. गेल्या १० वर्षात पालिकेने एवढे डांबर त्या रस्त्यावर ओतले आहे. पण रस्ता चांगला झाला का ? या प्रश्नाचे उत्तर "नाही !'' असेच आहे. असो........आणि एक राहिलेच. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते तेथील डायव्हर्जनचे रस्ते आपल्या हमरस्त्याहूनही चांगले होते. मी गुजरातमधे बर्याच खेड्यात फिरलो पण रस्त्याचा अनुभव हा चांगला होता असेच म्हणावे लागेल. हे अर्थात माझे निरिक्षण आहे....
आता काही हिराभागोलची छायाचित्रे बघू....
घराच्या
सज्जात उभी राहिलेली माणसे यात दाखविली आहेत. पण या पेक्षही जास्त चांगली
सज्जा व त्यात उभी राहिलेली स्त्री बेलूर येथे दाखिविले आहे व ते सुद्धा
अत्यंत लहान आकारात.
बेलूरची गॅलरी. या देखाव्यातील स्त्रिच्या मुर्तीची उंची फक्त सहा/सात इंच आहे.
या
जागेत एक समरप्रसंग अत्यंत बारकाईने कोरला आहे. हा प्रसंग त्रिमीतीत
असल्यामुळे जास्त परिणामकारक आहे. मधे असलेला हत्ती, त्याभोवती असलेले
सैनिक, वाजणारी वाद्ये....फारच मस्त..हत्तीवरची अंबारी......
समुद्रमंथन....यात
दोरी म्हणून नागाचा उपयोग केलेला स्पष्ट दिसतो पण हे मंथन एका पात्रात का
दाखविले आहे हे समजत नाही. कदाचित ते प्रतिकात्मक असावे.
या देवतेच्या हातात दिसतो तो बहुदा शुळ आहे.
दोन
झुंजणार्या हत्तींचे एक अप्रतीम शिल्प. एवढ्या उंचावर ते कसे चढविले असेल
आणि बरोबर कसे बसविले असेल....अर्थात ते एवढे काही अवघड नसावे... :-)
नरसिंम्हाची
पुजा आपल्याकडे बर्याच प्रांतात प्रचलीत होती. हंपीमधे तर आपण त्याच्या
अनेक भाव असलेल्या मुर्ती पाहिल्या असतील. अर्थात महत्वाचे देव आले की
त्यांचे स्त्रिस्वरुप आलेच. डाविकडे दिअसते आहे ती नरसिंहाचे स्त्रिरुप.
उजवीकडे बहुदा मदन व रती असावेत. खात्री नाही.
गेटला
एक मोठा वीस एक फुटाचा लाकडी दरवाजा आहे. हा अजूनही रात्री बंद करतात.
डभोईच्या या भागातून त्या भागात जाण्यासाठी हा वापरात आहे. या दरवाजातून
आपण गेटच्या मागील भागात येतो. त्याचे एक छायाचित्र.
वरील चित्रात जो डावीकडील भाग दिसत नाही त्या भिंतीवर असलेला हा एक सज्जा.
खालील
२ छायाचित्रे ही खाली जमिनीवर धुळ खात पडलेल्या दगडावरच्या कलाकुसरीची
आहेत. ३ इंच आकाराच्या या शिल्पातही कारागिराने काय कमाल दाखविली आहे
बघा....
हिरागेटच्या
मागील भागाचे बाजूने घेतलेले छायाचित्र..... नशीबाने ही कमान त्या काळात
पूर्णपणे ढासळलेली असल्यामुळे बहुदा मुर्तीभंजकांपासून वाचली असवी. ही कमान
एएस्आयने मोठ्या कष्टाने उभी केली. यावर कित्येक दगडांवर क्रमांक टाकलेले
स्पष्ट दिसतात. मनोमन त्या कारागिरांना व ज्यांनी ही कमान परत उभी केली
त्यांना सलाम करुन आम्ही बाहेर पडलो.
स्टॅच्यु ऑफ युनिटी:-
हा पुतळा जगातील सर्वात उंच म्हणजे १८२ फुट उंचीचा आहे असा दावा या पुतळ्याच्या पायाभूत कामात सहभागी असलेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीने केला आहे. यात पुतळ्याच्या पायाची उंची ८० फुट, हाताची उंची ७० फुट, खांद्याची उंची १४० फुट, चेहरा ७० फुट असून त्याचे वजन आहे १७०० टन. या पुतळ्याला काश्याचा लेप दिला गेला असून फक्त हेच काम परदेशी मदतीने केले गेले आहे. बाकी सर्व काम स्वदेशी आहे.
हा पुतळा बनविण्यासाठी सल्लागार म्हणून काम करणारे राम सुतार महाराष्ट्रीय असून त्यांना २०१६ साली पद्मविभूषण सन्मान दिला गेला आहे. मुंबईत अरबी समुद्रात उभारल्या जाणार असलेल्या शिवाजी महाराज याच्या भव्य पुतळ्याचे काम सुतार यांच्याच देखरेखीखाली केले जाणार आहे.

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात नर्मदा नदीतल्या साधू बेटावर सरदार सरोवर प्रकल्पाजवळ हा पुतळा आहे.
या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हटलं जाणार असून हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे. ज्या संस्थेअंतर्गत या पुतळ्याचं व्यवस्थापन होणार आहे त्या ट्रस्टचं नाव सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल इंटिग्रेशन ट्रस्ट असं आहे.

अहमदाबादजवळ केवडिया येथे नर्मदा नदीच्या सरदार सरोवराजवळ उभारला गेलेला सरदार पटेल याचा जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यु ऑफ युनिटी अंतराळातूनही अगदी स्पष्ट दिसत असल्याचे फोटो अमेरिकन व्यावसायिक उपग्रह नेटवर्क प्लॅनेटने प्रसिद्ध केले आहेत. १५ नोव्हेंबरला काढलेले हे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले गेले आहेत.
यामुळे या स्मारकाची गणना पृथ्वीबाहेरून म्हणजे अंतराळातून दिसणारया मानवनिर्मित रचनेत झाली आहे. दुबईचे पाम आयलंड, चीनची भिंत, इजिप्त मधील गिजा पिरामिड याच्या यादीत आता स्टॅच्यु ऑफ युनिटी सामील झाला आहे. अमेरिकन कंपनी स्कायलॅबने हे फोटो दिले आहेत. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकशात प्रक्षेपीत करण्याचे जे रेकॉर्ड नोंदविले त्यातील उपग्रह याच स्कायलॅब कंपनीचे होते. स्टॅच्यु ऑफ युनिटी ७ किमी अंतरावरून दिसू शकतो. त्याच्या उभारणीसाठी ५ वर्षे लागली आहेत तरीही तो जगातील सर्वात कमी वेळात उभारला गेलेला सर्वाधिक उंच पुतळा असून त्यासाठी २९९० कोटी रु. खर्च केले गेले आहेत.


देशातील सर्वाधिक कमाई करणारे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे स्मारक ठरले आहे. २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला एका वर्षात भेट दिली असून त्या माध्यमातून या स्मारकाने ६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. पण केवळ ५६ कोटी रुपये कमाई असून ताजमहाल कमाई करणाऱ्या स्मारक पर्यटन स्थळांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर ताजमहल, आग्र्याचा किल्ला, कुतुब मिनार, फतेहपूर सीकरी आणि दिल्लीचा लाल किल्ला यांचा नंबर लागतो. ताजमहलने मागच्या वर्षी ५६.८३ कोटींची कमाई केली होती. दरम्यान ताजमहालला सर्वाधिक पर्यटक हे भेट देत असले तरी स्ट्रच्यू ऑफ युनिट स्मारकाची कमाई जास्त होत आहे. दिवसेंदिवस जगातील सर्वाधिक उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
सरदार पटेल यांचा जगातला सर्वांत उंच पुतळा कसा बनला माहितीये?
हा पुतळा ज्या पायावर आहे तो पाया 25 मीटर उंच आहे आणि पुतळ्याची उंची 167 मीटर आहे. या दोन्हीची एकत्र उंची 182 मीटर होते. स्टॅच्यू ऑफ यूनिटीची उंची न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे.सध्या जगातला सर्वांत उंच पुतळा चीनमध्ये आहे. गौतम बुद्धाच्या 'स्प्रिंग टेंपल बुद्ध' नावाच्या या पुतळ्याची उंची 128 मीटर आहे. पण अरबी समुद्रात 2021पर्यंत बनून तयार होणाऱ्या शिवस्मारकाची उंची स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही आठ मीटर जास्त असेल.

किंमत :-
या प्रकल्पाची नियोजित किंमत 2,232 कोटी रुपये होती. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 42 महिने लागले. तोपर्यंत सर्व खर्च 3,000 कोटी रुपये झाला असं सांगण्यात आलं आहे.

प्रकल्पाचं डिजाईन
दुबईच्या बुर्ज खलिफाचं व्यवस्थापन ज्या कंपनीने केलं त्या टर्नर कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून करण्यात आली. या कंत्राटदाराची निवड, रोजचं व्यवपस्थापन, गुणवत्ता नियंत्रण हे अधिकार त्यांचेकडे देण्यात आले.
2014 साली लार्सन अॅंट टुब्रो कंपनीची निवड प्रत्यक्ष बांधकाम करणारी कंपनी म्हणून करण्यात आली. पुतळ्याचं स्थापत्य कसं असेल, त्याचं डिजाइन ठरवण्यासाठी त्या-त्या विषयातल्या तज्ज्ञ कंपन्यांची निवड करण्यात आली. तसंच हा प्रकल्प नदीच्या बेटावर होईल म्हणून पूर आणि भूगर्भजलतज्ज्ञांची मदतही घेण्यात आली.

बांधकाम :-
पूर्ण अभ्यास झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पाया बांधणं आणि त्यावर नंतर पुतळा उभं करणं असं दोन स्तरात हे काम करावं लागलं. सुरुवातीला पाया बांधण्यात आला. त्यानंतर मेझानाइन फ्लोअर बांधण्यात आलं. नंतर पुतळा ज्यावर उभं करण्यात आला आहे तो चौथरा बनवण्यात आला. या ठिकाणी एक गॅलरी उभी करण्यात आली आहे. जिची क्षमता 200 लोकांची आहे. जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांनी या स्मारकाच्या निर्मितीचं काम केलं आहेत. त्यात काही चीनी कामगारांचासुद्धा समावेश आहे.

धातूचा वापर :-
स्टॅच्यू ऑफ युनिटीचं वजन 67,000 मेट्रिक टन आहे. भूकंप, पूर किंवा सोसाट्याचा वारा यापासून संरक्षण व्हावं अशी रचना करण्यात आली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पाया 45 मीटर खोल खोदण्यात आला आहे. हे खोदकाम करताना नर्मदेला धोका होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं अधिकारी सांगतात.
सुरक्षा या पुतळ्याची उंची पाहता सोसाट्याचा वारा आल्यावर हा पुतळा तग धरेल की नाही अशी शंका होती. त्यासाठी या क्षेत्रातल्या नामवंत कंपनी RWID यांची मदत घेण्यात आली. 60 मीटर प्रतीसेकंद या वेगानं जरी वारा आला तरी या पुतळ्याला काही होणार नाही. हा उभा पुतळा आहे त्यामुळे त्याचं डिजाइन बनवणं हे आव्हानात्मक होतं. रुंदी आणि उंची प्रमाणबद्ध बनवण्यासाठी इंजिनिअर लोकांना डिजाइनवर खूप काम करावं लागलं.
प्रकल्पासाठी 22,500 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात येईल असा अंदाज होता. सिमेंटबरोबरच 18,500 मेट्रिक टनाच्या लोखंडी सळ्या वापरण्यात येतील असाही अंदाज होता. जर सामान्य प्रकारचं सिमेंट वापरलं तर त्यामुळे लोखंड गंजण्याची शक्यता होती म्हणून M65 या ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आलं. त्यामुळे लोखंड गंजत नाही.
लोहपुरुषाचा पुतळा कांस्याचा :-
हा पुतळा बनवण्यासाठी 12,000 कांस्य पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी 1850 टन कांस्य लागलं. हे पॅनल्स चीनकडून बनवून घेण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. हा पुतळा राम सुतार यांनी बनवला आहे. इतक्या उंचीचा पुतळा आधी कुणीच बनवला नसल्यामुळे त्यांनी आधी प्रयोग करुन पाहिले. सुरुवातीला त्यांनी तीन फुटाचा पुतळा बनवला, नंतर 6 फुट असं करत करत योग्य मोजमापाचा अंदाज घेऊन हा पुतळा त्यांनी बनवला.

जवळच रेल्वे स्थानक / एअर पोर्ट :- बडोदा (गुगलला वडोदरा कळत म्हणे ) इथून नर्मदा सरोवर किंवा पुतळा साधारण पण ९० km / २ तासावर आहे.
बडोदा शहरापासून सरदार सरोवर साठी बसेस सुटतात त्या बसने ये-जा करू शकतो किंवा बडोद्याहून एखादी प्रायव्हेट गाडी बुक करून तुम्ही येऊ शकता
जर ठाणे / मुंबई हुन ड्राईव्ह करून जाणार असाल तर साधारण अंतर ४२० किमी आहे पण जायला सहजच ७/८ तास लागतात. सरदार वल्लभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा केवडिया कॉलनी राजपिपला गुजरात येथे आहे मुंबईहून जाणार असल्यास सकाळी पाच वाजता निघावे जेणेकरून दुपारी बारा किंवा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचता येईल.
वडोदराशिवाय जवळचे रेल्वे स्टेशन भडोच आहे. अहमदाबादपासून स्टॅच्यु २०० कि.मी.वर आहे.साबरमती रिव्हरफ्रंटपासून पंचमुली लेक असे सी प्लेन सुरु करणार आहेत.
रेल्वे मार्गाने येणार्या पर्यट्कांच्या सोयीसाठी देशाच्या विवीध भागातून थेट केवडीयाला जोडणार्या ट्रेन अश्या आहेत.ग्रीन बिल्डींग सर्टीफिकेट मिळवणारे केवडीया हे देशातील पहिले रेल्वे स्थानक आहे.
केवडिया-वाराणसी महामना एक्सप्रेस (वीकली)
दादर-केवडिया एक्सप्रेस (डेली)
अहमदाबाद-केवडिया जनशताब्दी एक्सप्रेस (डेली)
निजामुद्दीन-केवडिया संपर्क क्रांति एक्सप्रेस (हफ्ते में 2 दिन)
केवडिया-रीवा एक्सप्रेस (वीकली)
चेन्नई-केवडिया एक्सप्रेस (वीकली)
प्रतापनगर-केवडिया मेमू (डेली)
केवडिया-प्रतापनगर मेमू (डेली)
स्टॅच्यु ऑफ युनिटीला जाताना काही महत्वाच्या टीप्स :-
१) शनिवार / रविवार लिफ्ट साठी खुप लांब रांग असते असे ऐकून आहे. दोन तास लागु शकतात. रांगेत बसण्याची काही सोय नाही.तसेच पुतळ्याच्या आवारात शिरण्यापूर्वी दोनदा सुरक्षातपासणी होते. (पुन्हा रांग).
२) कोणतेही खाण्याचे पदार्थ आत नेउ देत नाहीत. सुरक्षातपासणीत फेकून द्यावे लागते.फूडकोर्ट आहे.
३) ऑनलाईन तिकिट काढावे.( एक रांग कमी !)
४) एक्सप्रेस तिकिट काढल्यास कोणतीही रांग नाही. १००० रु -मोठे, मुले समान दर.
५) शनिवार , रविवार शक्यतो टाळावेत , सोमवारी बंद असतो आणि मंगळवारी सोमवारी बंद असल्याने थोडी गर्दी जास्त असतात
६) पुतळा शक्यतो सकाळी दहा पर्यंत बघून घ्यावा जेणेकरून नंतर ऊन आणि वाढलेली गर्दी ह्याचा फटका बसणार नाही .
७) महाराष्ट्रातून जाणार असल्यास एका दिशेने ४०० किमी चा प्रवास थोडा जास्त होतो आणि जाऊन येउन तुमचे दोन दिवस त्यात जातात. या पेक्षा उत्तम म्हणजे शताब्दी एक्स्प्रेसने सकाळी ६ २५ ला मुंबई सेंट्रल ला बसलात ( किंवा बोरिवली ला ०७.००) तर भरूच ला १०.२५ ला पोटातले पाणी न हलता नाष्ट्यासकट पोचता.माणशी तिकीट ७२५ रुपये. भरूच पासून हे अंतर ९० किमी च आहे तेथून तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा सरकारी बसने जाऊ शकता. परत येताना दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी निवांतपणे येऊ शकता.
राहायची सोय :-
एकतर बडोद्याला राहावं आरामात किंवा मग सर्वोत्तम पण बऱ्यापैकी महाग पर्याय म्हणजे नर्मदा टेन्ट सिटी , टेंथ सिटी मध्ये राहणार थोडसं महाग असलं तरी तिथल्या सोयीसुविधा अत्यंत चांगल्या आहेत जर दिवसाचं तपमान जास्त असेल तर एअर कंडीशन चा पर्याय निवडावा अन्यथा एअर कंडिशन शिवाय चालू शकेल. टेन्ट सिटीचे वेगवेगळे पॅकेज येतात २ दिवस १ रात्र किंवा ३ दिवस आणि २ दोन रात्र , एकदा टेंट सिटी रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सर्व खाणं-पिणं ब्रेकफास्ट चहा जेवण आणि साईट सीन याचा समावेश आहे , जेवणाची Quality अर्थातच उत्तम. टेंट सिटीमध्ये राहणार असाल तर बारा वाजता चेकिंग आहे चेक इन करून जेवण करून इतर स्पॉट बघता येतात पुतळ्याला जाण्यासाठी आणि गॅलरीचे तिकीट याची सर्व व्यवस्था टेंट सिटी व्यवस्थित पणे करते. रिसॉर्ट मधून पुतळ्यासाठी सरदार सरोवर धरणासाठी आणि आजूबाजूचे इतर छोटे-मोठे स्पॉट बघण्यासाठी बसेस आहेत. या बसेस एअरकंडीशन आहेत. तसेच रिसॉर्टचा एक गाईड तुमच्याबरोबर येतो आणि सर्व माहिती देतो पुतळ्यासाठी जर viewing गॅलरी जायचं असेल तर त्याची तिकीट बुक करता येतात.
viewing गॅलरीतुन जे काही दृश्य आहे चित्तथरारक आहे , पुढे सरदार सरोवर धारण आणि भोवताल नर्मदा खोर डोळ्याचं पारणे फेडतात आणि तळ मजल्यावरून viewing गॅलरीला जाणारी लिफ्ट ३६ सेकंदात वर पोहोचवते.
१. टेन्ट सिटी छानच आहे पण अतिशय महाग आहे.
२. देखभाल-दुरुस्ती व्यवस्था अतिशय खराब.
३. पुतळा बघण्यासाठी लांबलचक रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी शनिवार, रविवार टाळावा
४. या भागात उन्हाचा तडाखा खूपच जाणवतो त्यामुळे उन्हाळ्यात पुतळा व टेंट सिटी सहल शक्यतो टाळावी.
टेन्ट सिटीत तंबूचे तीन प्रकार आहेत
१. स्टॅंडर्ड २. डिलक्स ३. प्रिमिअम व तीनही प्रकारात ए सी व नॉन ए सी.
स्टॅच्यु ऑफ युनिटी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. तसेच https://www.soutickets.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुकींग करु शकता. तिकीटाच्या १) डेक व्ह्यु २) एंट्री तिकीट असे दोन प्रकार आहेत.३ वर्षापेक्षा लहान मुलांना मोफत प्रवेश आहे.ऑनलाइन तिकीट काढताना नेट बैंकिग किंवा डेबिट कार्ड से पैसे भरताना कोणतेही अतिरीक्त शुल्क लागत नाही मात्र क्रेडिट कार्डने बुकिंग करताना एकुण रकमेवर 1 टक्का जीएसटी लागतो.
डेक व्ह्यु तिकीटाचा दर ३५०/- रुपये आहे. यामध्ये स्टैचू ऑफ यूनिटी बरोबरच ऑबझर्व्हेशन गॅलरी, व्हॅली ऑफ फ्लॉवर, सरदार पटेल मेमोरियल, म्यूजियम, ऑडियो-व्हिजुअल गॅलरी आणि सरदार सरोवर धरण याची सैर करता येते.
तर एंट्री तिकीट ३ ते १५ वर्षापर्यंत मुलांसाठी ६०/- रुपये तर प्रौढांसाठी १२०/- रुपये आहे. या तिकीटात व्हॅली ऑफ फ्लॉवर, मेमोरियल, म्यूझियम आणि ऑडियो-विजुअल गॅलरी याबरोबरच सरदार सरोवर धरणाची सहल करता येते.शिवाय या तिकीटात बसचे शुल्क समाविष्ट केले असल्यामुळे बसचे वेगळे तिकीट काढवे लागत नाही.

स्टॅच्यु ऑफ युनिटीविषयी :-
स्वच्छता कमालीची आहे. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी अतिशय स्वच्छ अशी स्वच्छतागृहे जागोजागी निःशुल्क आहेत. त्यामुळे विशेषतः स्त्रियांची अजिबात कुचंबणा होत नाही.
आपण भरतो त्याचे पैशात तेथे असलेल्या फुलांची बाग आणि धरणाची सहल अंतर्भूत आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या पातळीचे हे स्थळ आहे असे असूनही तेथे असलेल्या फूड मॉल मध्ये सर्व तर्हेचे उत्तम पदार्थ सर्वाधिक किरकोळ किमतीलाच मिळतात (MRP). म्हणजे थंड पाण्याची बाटली सुद्धा १५ रुपयालाच मिळते किंवा समोसा ४० रुपये लाच मिळतो. एवढे मोठे पर्यटन स्थळ असूनही मॉल सारखे २०० रुपये पॉप कॉर्न आणि ९० रुपयाला पेप्सी असा चावटपणा नाही. याशिवाय तेथे स्थानिक मिळणारी फळे, बोरे, चिंचा, मेवे, खारे दाणे हे सुद्धा मुबलक मिळते. कुठेही आपल्याला लुटण्यात आले आहे अशी भावना अजिबात येत नाही.
एकंदर -- आंतर राष्ट्रीय पातळीचे पर्यटन स्थळ म्हणून ताजमहालसारखे केवळ एकात्मतेचा पुतळा हे पर्यटन स्थळ भेट देण्याच्या नक्कीच लायकीचे आहे.
पुतळ्याच्या जवळच टेंट असलेली दोन गावं नदीच्या किनारी वसवण्यात आली असून पर्यटक तिथे भाड्याने राहू शकतात. संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी जवळजवळ अर्धा तासाचा एक लेझर शो आयोजित केला जातो तोही अत्यंत सुंदर आहे शक्य असल्यास हा शो नक्की पाहावा. हेलिकॉप्टर चे १५ मिनिटाच्या राईडचे माणशी तीन हजार रुपये आहेत
सरदार पटेल म्युझीयम :-
पुतळ्याच्या खाली असलेल्या म्युझीयममधे सरदार पटेल यांच्याशी संबधीत स्मृती असणार्या वस्तुंचे संग्रहालय आहे.
सेल्फी पॉइंट:-
पुतळ्याजवळ व्हॅली ऑफ फ्लॉवर उभारली आहे.येथेच सेल्फी पॉईंटही विकसित केला आहे.
पुतळ्याचे आणि भोवतालचे काही फोटो
पुतळ्याची भव्य सावली
आम्ही इवलुसे
लेझर शो क्षणचित्रे
टेन्ट सिटी
मस्जिद और मिनारोंका शहर : चंपानेर

या परिसराचे दोन भाग पडतात.पहिल्याला शादी म्हणतात.इथे प्रवेशद्वार,तटबंदी ,बगीचे ,शाही मशीद आणि राजवाडे आहेत. दुसरा परिसर आहे जहांपनाह ज्याचे खोदकाम अद्याप केले गेले नाही.इथे सुंदर नक्षीकामाची मंदिर आणि मशिदी आहेत.इथे जमी मस्जिद. केवड़ा मस्जिद, नगीना, लीला गुम्बज मस्जिद, कमानी मस्जिद या मशिदी आहेत तर मंदिर लकुलीश मंदिर, जैन मंदिर, कलिका माता हि मंदिर आहेत.


पुढे पेशव्यांच्य राजवटीत देखील या परिसराला काही महत्व नव्हते.अगदी थोडे लोक इथे रहात होते. सहाजिकच इथे जंगल माजले.खुप कमी मोगल आणि पोर्तुगीज लेखकांनी या परिसराचा उल्लेख केला आहे. मात्र पावागडला काली मातेचे दर्शन करण्यासाठी हिंदु भाविक या परिसरात येत होते.एकोणिसाव्या शतकात जेव्हा इंग्रजांनी हा परिसर ताब्यात घेतला तेव्हा इथे पुर्ण जंगल माजले होते. इथे फक्त ५०० लोक रहात होते. जर्मनी आर्कियोलोजिस्ट हरमन गोएट्जने या परिसराचे संशोधन् सुरु केले. इ.स. १९६९ मध्ये बडोदा युनिव्हर्सिटीने सलग सात वर्ष या भागाचा अभ्यास केल्यावर इथल्या परिसराचा उत्कर्ष, पतन आणि इथली ओळख या विषयी समजु शकले.



पाच मिनिटाच्या अंतरावर असलेली जामा मस्जिद ही मस्जिद मुस्लिम स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.

मशिदीच्या आतमध्ये प्रशस्त वावर असून दोन्ही बाजूला खिडक्या आहेत मशिदीच्या वरील बाजूस उत्तम कलाकुसर असलेले नक्षीकाम असून बाहेरील बाजूस राजस्थानी राजवाड्यासारख्या खिडक्या आहेत.





No comments:
Post a Comment