कच्छचे रण
कच्छच्या विस्तृत भागात कच्छचे मोठे रण (Great Rann of Kachchh) पसरले आहे. त्याच्या आग्नेयेला कच्छचे छोटे रणही (Little Rann) आहे. कच्छचे मोठे रण त्याच्या विस्तारासाठी, भूवैज्ञानिक इतिहासासाठी आणि जीवाश्मांसाठी एकमेव (Unique) म्हणून जगात प्रसिद्ध आहे. सोळा हजार चौरस किमीपेक्षाही जास्त क्षेत्रफळाच्या या प्रदेशात २० कोटी वर्षे जुन्या ज्युरासिक कालखंडातील अवसादी (Sedimentary) खडकांपासून तीन कोटी वर्षे जुन्या इओसीन कालखंडातील स्तरित अवसादी खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात अगणित जीवाश्मांचा अक्षरशः खच पडल्याचे आढळून येते. या प्रदेशाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची पाच मीटरपेक्षाही कमी आहे. दर वर्षी इथे ३०० ते ४०० मिमी पाऊस पडतो. याच्या उत्तरेला थरच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांचा परिसर असून दक्षिणेला बानीचा गवताळ प्रदेश आहे. बानीचा प्रदेश मूलतः उत्थापित (Uplifted) चिखल सपाटीचा (Mud flat) असून दहा हजार वर्षांपूर्वी तो पाण्याखाली होता. बानी प्रदेशाचे आजचे स्वरूप गेल्या आठ हजार वर्षांत तयार झाले आहे.

मोठ्या रणातील पच्छम, खदीर, बेला आणि चोरार या बेटांवर २५ ते ०.५ कोटी वर्षांपूर्वीचे समुद्रात तयार झालेले स्तरित, अवसादी खडक असून तेही असंख्य जीवाश्मांनी समृद्ध आहेत. सात ते दोन कोटी वर्षांपूर्वी कच्छच्या रणाला उथळ समुद्राचे रूप प्राप्त झाले होते. एक लाख वीस हजार पासून बारा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आंतर हिमानी (Inter glacial) काळात हे रण नळ सरोवरातून गुजरातच्या खंबायतच्या आखाताला जोडले गेले होते.
आजपर्यंत अनेक वेळा कच्छ आणि गुजरातच्या इतर भागांत समुद्र पातळी कमी अधिक प्रमाणात वर खाली होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्या त्या वेळी अनेक सागरी वनस्पती आणि प्राणी समुद्रातील गाळात अडकून नष्ट झाले. त्यांचे जीवावशेष कच्छमध्ये आज जीवाश्मांच्या (Fossils) स्वरूपात फार मोठ्या संख्येने आढळून येतात. या जीवाश्मांतील विविधता खरोखरच आश्चर्यकारक असून जगात आज जीवाश्मांचा खजिना असलेले ठिकाण म्हणून कच्छ आणि कच्छचे रण ओळखले जाते!
कच्छचे रण हा प्रदेश जसा हंगामी (Seasonal) क्षारयुक्त म्हणून ओळखला जातो, तसा तो वाळवंटी पाणथळ (Desert Werland) म्हणूनही ओळखला जातो. पावसाळ्यात पाण्याखाली बुडालेला प्रदेश कोरड्या ऋतूत पाणी कमी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनामुळे क्षारांनी भरून जातो आणि सगळा प्रदेश पांढऱ्या शुभ्र रंगाने आच्छादून जातो. राजस्थानातील लुनी नदीतून या रणाला अधून मधून पाण्याचा पुरवठा होत असतो. आपल्या प्रचंड मोठ्या भूशास्त्रीय प्रवासातील विविध घटनांचे अनेक पुरावे जीवाश्म, खडक आणि भूरूपांच्या स्वरूपात या क्षार प्रदेशाने जपून ठेवले आहेत.
भूशास्त्रीय काळात हा अरबी समुद्राचाच एक भाग होता. त्यानंतर या भागाचे जे उत्थापन (Uplifting) झाले, त्यामुळे तो समुद्रापासून तुटला आणि त्याचे रूपांतर एका मोठ्या पाणथळीत झाले. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत खोल पाण्यामुळे तिथे नौकानयनही (Navigation) करता येत असे. नंतरच्या काळात मात्र पाणथळीत झालेल्या गाळाच्या प्रचंड संचयनामुळे इथे चिखलाचे विस्तीर्ण सपाट भाग (Mud flat) तयार झाले. आज केवळ पावसाळ्यात हे रण पाण्याने भरून जाते आणि वर्षाच्या उर्वरित काळात क्षारांचे एक विशाल वाळवंट होते!
या प्रदेशाच्या उत्क्रांतीत वारंवार होणाऱ्या भूकंपांचे मोठे योगदान आहे. १८१९ मध्ये इथे झालेल्या विनाशकारी भूकंपात अनेक गावे नष्ट झाली होती आणि ‘अल्लाह बंड’ (Allah bund) या ९० किमी लांब आणि ४ ते ५ मीटर उंच नैसर्गिक बंधाऱ्याची निर्मितीही झाली. या बंधाऱ्यामुळे सिंधू नदीचा मार्ग बदलला आणि कच्छच्या रणाला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही संपुष्टात आला. या भूकंपाच्या साधारणपणे ८०० वर्षे आधीही असाच मोठा भूकंप झाल्याची नोंद आहेच. त्या भूकंपानेही या प्रदेशाच्या भूरूपिकीत (Geomorphology) मोठे बदल घडवून आणले होते.

या पाणथळीच्या प्रदेशात आज लोकसंख्या खूपच कमी असली तरी मानवी वस्त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात याला खूप मोठे महत्व आहे. ६० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे जे प्राचीन मानवाचे स्थलांतर (Migration) झाले, त्या स्थलांतराच्या दुसऱ्या टप्प्यात ते मुख्यतः कच्छच्या रणाकडेच झाले, असे मानववंशशास्त्रज्ञ स्पेन्सर वेल्स यांचे मत आहे. ख्रिस्तपूर्व २६५० ते १४५० वर्षांपूर्वी हा प्रदेश सिंधू संस्कृतीचा किंवा हराप्पा संस्कृतीचा भाग होता. मोठ्या कच्छच्या रणात खदिर बेटावर ढोलावीरा नावाचे पुराजीवशास्त्रीय (Archaeological) वसतिस्थान उत्खननात मिळाले आहे. धोलावीराच्या जवळच ११ किमी अंतरावर १७ ते १८ कोटी वर्षे जुन्या झाडांचे अवशेष सापडले असून ते किनाऱ्यावरच्या दगडांत जीवाश्म स्वरूपात दिसतात. इथली नऊ मीटर लांब आणि अर्धा ते एक मीटर व्यासाची झाडे वालुकाष्मांत व चुनखडकांत अश्मिभूत (Petrify) झालेली आहेत! या भागाला त्यामुळेच जीवाश्म उद्यानाचा (Fossil Park)चा दर्जा देण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशाचे संधारण आणि तिथल्या नैसर्गिक संपदेचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीने, इराणमधल्या रामसर शहरात १९७१ मध्ये रामसर आंतरराष्ट्रीय कराराला (Treaty) मान्यता देण्यात आली होती. या करारानुसार कच्छच्या रणाला २००२ मध्ये रामसर पाणथळीचा (Ramsar Wetland) दर्जा देण्यात आलाय.
आज या क्षारयुक्त पाणथळ प्रदेशात अठरा जमातींचे वास्तव्य आढळते. मात्र इथली पारिस्थितिकी आज मोठ्या वाहनांची वर्दळ, वृक्षतोड, क्षार उत्पाटन (Extraction) यासारख्या घटनांनी बाधित होऊ लागली आहे. या विस्तीर्ण पाणथळीतच अनेक छोट्या पाणथळीही दिसून येतात. वाळवंटी पाणथळ, क्षार पाणथळ, लगून पाणथळ, दलदल पाणथळ यांनी आणि त्यातील जैवविविधतेने कच्छचे रण अगदी समृद्ध झाले आहे. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना, फ्लेमिंगोंना आणि अनेक प्राण्यांच्या जमातींना या प्रदेशाने मोठाच आधार दिला आहे.
आज भारतातल्या या अशा संवेदनशील भूवारसा ठिकाणच्या जीववैविध्याला कुठलेही संरक्षण नाही आणि म्हणावी तशी ओळखही दिली गेलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रदेश हे जलीय जैवविविधतेचे (Aquatic biodiversity) प्रचंड मोठे साठे असतात. परिसरीय, पर्यावरणीय आणि आर्थिक असे त्यांचे महत्त्वही खूप मोठे आहे. हे भूवारसा स्थान आज शहरीकरण, प्रदूषण आणि बदलले भूमी उपयोजन (Land use) यांचा खूप मोठा ताण तणाव सहन करीत आहे. परिणामी या स्थळाचा भौगोलिक विस्तार अक्रसतो आहे आणि त्याची आर्थिक, पर्यावरणीय आणि जलशास्त्रीय क्षमताही कमी होते आहे. या क्षारयुक्त जागेत जलजीवांची पैदास होत असते, ती माणसाच्या त्या भागात चालणाऱ्या विविध उद्योगांमुळे कमी होऊ लागली आहे. कच्छमधल्या या भूवारसा पर्यटन स्थळाचा अभ्यास असे दाखवतो की आपल्याकडे ह्या क्षेत्राच्या संधारणाची व विकासाची कुठलीही ठोस आणि सुनिश्चित यंत्रणा आजही नाही. त्यामुळे २० कोटी वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आणि भूवारसा असलेल्या या स्थळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे हे नक्की.
कच्छचे रण
- स्थान संदर्भ : २३.९० उत्तर अक्षांश/६९.७४० पूर्व रेखांश
- समुद्रसपाटीपासून उंची : पाच मीटरपेक्षा कमी
- भूशास्त्रीय वय : २० कोटी वर्षे
- जवळची मोठी ठिकाणे : भूज (९० किमी), खबडा (१५ किमी), लोद्राणी (९ किमी).
सोळाव्या शतकापर्यंत सिंध-गुजरातचे राज्यकर्ते कच्छवरही अंमल चालवीत. नवव्या शतकात सिंधमधील सम्मा राजपुतांचा कच्छशी संबंध आला. त्यांच्याच एका शाखेतील जाडेजा राजपुतांपैकी खेंगारने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वायत्त संस्थान स्थापिले. राजधानी भूज येथे होती. जहांगीरने हाज यात्रेकरूंच्या कच्छी जहाजातील मुक्त प्रवासाच्या बदल्यात खंडणी माफ केली टाकसाळीचा परवाना दिला. प्रागमल (१६९८), लाखो (१७४१) या राजपुत्रांनी गादी बळकावण्यासाठी कारस्थाने केली. लाखोने मोगलांकडून माहीमरातिबचा मानही मिळविला (१७५७). १७३० मध्ये गुजरातच्या सरबुलंदखानाने आणि १७६२ मध्ये सिंधच्या गुलामशाह काल्होराने केलेल्या स्वाऱ्यांचा यशस्वी प्रतिकार झाला. अठराव्या शतकात कलावंत रामसिंग मालम याने कलावैभव कळसाला नेले,राजकारणावर दिवाण देवकरण, त्याचा मुलगा पुंजासेठ यांचा प्रभाव राहिला. महाराव गोदजी (१७६१ — ७८) याने फौज वाढवली. व्यापाराला उत्तेजन दिले,मांडवीला ४०० जहाजांचा ताफा राहू लागला. दुसऱ्या रायधनच्या (१७७८ — १८१३) काळात बजबजपुरी माजून सत्ता समादार फतह मुहम्मदच्या हाती गेली. चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी हस्तक्षेप करून (१८०९) कच्छला मांडलिक संस्थान बनवले (१८१६, १८१९). तहान्वये भयताना (महारावचे भाऊबंद) दिलेले महत्त्व एकोणिसाव्या शतकात भोवले. त्यांचे उत्पन्न व अधिकार महारावपेक्षाही अधिक असत. मिठाच्या निर्यातीवर बंदी, मोरवीशी अढोईसाठी शतकभर चाललेला झगडा, काठेवाडातील संस्थानांचे वाढते नाविकी महत्त्व ही कच्छच्या प्रगतीला मारक ठरली. तरी भ्रुणहत्या, गुलामगिरी (विशेषत: झांझिबारशी संबंधित), सती पध्दती यांना आळा बसला आणि शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा इ. सुधारणा झाल्या. तिसऱ्या खेंगारने (१८७८ —१९४२) रापड,भाचौ, मुंद्र, भूज, मांडवी, अब्दासा, लखपत, अंजार, नख्तराना असे शासकीय विभाग पाडले, चराऊ कुरणे राखीव केली व कांडला बंदराचा पाया घातला. सतरावे महाराव मदनसिंहजी यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली (१ जून १९४८). १९५६ पर्यंत कच्छ मुख्यायुक्ताचा प्रांत व १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट झाले. १९६५ मध्ये सिंध-कच्छचा सीमाप्रश्न चिघळला आणि पाकिस्तानने कच्छवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय लवादमंडळाने रणाचा सु. ८३७ चौ. किमी. भाग पाकिस्तानला दिला. सीमांकन १९६९ मध्ये पूर्ण झाले. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात भारताने यातील बहुतेक मुलूख परत मिळविला. परंतु सिमला कराराने तो परत पाकिस्तानला मिळाला.
कच्छचे रण आणि वन्यजीवन :-
संध्याकाळच्या वेळी इकडचे वन्यप्राणीही हालचाल करायला सुरुवात करतात. अंधार पडायला लागताच कोल्हेकुई सुरू होते. इथे खोकडाचेही दोन प्रकार पाहायला मिळतात. त्यातले एक खोकड हे फक्त वाळवंटात किंवा शुष्क गवताळ प्रदेशात सापडतं. बन्नीतले लोक या खोकडाच्या हुशारीच्या अनेक गोष्टी सांगतात. उदाहरणार्थ, खोकडाला पकडणं खूप कठीण असतं. त्याच्या मागे कोणी लागले तर खोकड आपली झुपकेदार शेपूट एका दिशेला वळवतं आणि पळून जातं दुसऱ्याच दिशेला! अगदीच पकडलं गेलं, तर खोकड पटकन त्याच्या घरात घुसतं आणि त्या घराची भुयारं एवढी लांब पसरलेली असतात की खोकड काही हातात येत नाही. या गोष्टी बऱ्यापकी प्रमाणात खऱ्या आहेत. शुष्क, झाडं नसलेल्या जंगलात बहुतेक प्राणी जमिनीखाली घरं करून राहतात. त्यात खोकडाच्या घराला सर्वात जास्त भुयारं असतात आणि ती पाच-दहा ठिकाणी वेगवेगळ्या दिशांना उघडतात!
कच्छमध्ये काही अतिशय दुर्मीळ असे पक्षी आणि सरपटणारे प्राणीही आढळतात. रण असले तरीही एकदा का पाऊस पडला की काही भागांत साठलेलं पाणी उन्हाळा येईपर्यंत वाहून जात नाही. अशा पाण्याच्या साठय़ांमध्ये हिवाळ्यात अनेक पक्षी जगातील इतर भागांमधून स्थलांतर करून इथे येतात. लांब माना असलेले, अंगावर छान गुलाबी रंगाच्या छटा असणारे अग्निपंख किंवा रोहित पक्षी तर इथे अंडी घालण्यासाठी येतात. याशिवाय फक्त गवताळ प्रदेशात किंवा वाळवंटात सापडणारे काही प्राणी, उदाहरणार्थ टिटवीचा एक अतिशय दुर्मीळ असा प्रकार आणि सरडय़ाच्या काही जाती इथे आढळतात. इथे एक शाकाहारी सरडा राहतो. अंगावर अनेक काटय़ासारखे खवले असणारा सरडा दिसायला दंतकथांमधील ड्रॅगनचीच एक इवलुशी नक्कल असावी की काय असा असतो. पण हा सरडा जवळपास पूर्णपणे गवताच्या आहारावर जगतो. एक पक्षी, ग्रे हायपोकॉलीयस, हा संपूर्ण भारतात फक्त कच्छमध्येच सापडतो. आशिया आणि आफ्रिका खंडात इतर ठिकाणी हा सापडत असला तरी त्या जातीचा पक्षी सगळ्या दुनियेत फक्त एकच आहे, त्यामुळे अनेक पक्षी निरीक्षकांची त्याला एकदा तरी बघण्याची इच्छा असते. हे सर्व प्राणीपक्षी आणि वनस्पतींचे प्रकार घनदाट जंगलात राहू शकत नाहीत, त्यांना असं खुलं रणच लागतं.
रण म्हणजे तरी काय? कच्छचा भाग हा पाकिस्तान आणि भारतामधील जमिनीचा अत्यंत समतल असा, समुद्राजवळचा प्रदेश आहे. उन्हाळ्यात अतिशय गरम, ५० डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाणारं तापमान, तर उन्हाळ्यात चार डिग्रीच्या खाली जाणारा गारठा! इथल्या जमिनीत वनस्पती वाढत असल्या तरी काही भाग असा आहे जिथे मातीत मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जवळपास काहीच उगवत नाही. पाऊस पडला की नद्यांचं, पावसाचं आणि समुद्राचं पाणी मिसळून हा भाग काही महिने पाण्याखाली जातो. एकदा ते पाणी सुकलं की मागे राहते ते भेगा पडलेली, मिठाने भरलेली जमीन. अशा जमिनीला ‘रण’ म्हटलं जातं. रणांत काही बेटंही असतात. हे छोटे टेकडीसारखे भाग पाण्याखाली जात नाहीत आणि त्यामुळे या बेटांवर वनस्पती, प्राणी आणि पक्षी जास्त प्रमाणात सापडतात. भारत-पाकिस्तान सीमारेषा बनण्यापूर्वी कच्छमधील लोक या बेटांवर गुरं चारायलाही घेऊन जायचे. एवढंच नव्हे, तर हे रण पार करूनच लोक भारत-पाकिस्तान असा प्रवास करत असत. त्यात अनेक वेळा कठीण प्रसंगही येत. पाणी नीट सुकलेलं नसेल तर त्या चिखलात अडकून पडण्याच्या घटना आधी बऱ्याच झाल्या आहेत. मिठाच्या थरामुळे जमीन दिसायला कडक दिसते पण पाऊल टाकताच मिठाचा पातळ थर अगदी बर्फाच्या थरासारखा फुटतो आणि पाय किंवा गाडीची चाकं अगदी खोलवर रुतून बसतात. अजून एक म्हणजे रणात जागांची ओळख पटायला काहीच दिसत नसल्यामुळे माणसाची दिशाभूल होते. त्यात पाण्याच्या कमतरतेमुळे आधीच डोकं गरगरत असेल तर वेगवेगळे भास होतात. जिन आणि भुतांच्या गोष्टी ऐकाव्यात तर त्या रणामध्येच.
गेल्या फक्त वीस वर्षांत या भागात अनेक बदल झाले आहेत. शुष्क गवताळ प्रदेश अजूनही सरकारला पडीक वाटत असल्यामुळे इथे मोठय़ा प्रमाणात झाडं लावण्यात आली. भराभर वाढवीत म्हणून दक्षिण अमेरिकेत वाढणारी, प्रोसोपीस जुलीफ्लोरा नावाची एका काटेरी झाडाची जात निवडण्यात आली, अगदी विमानाने बी पसरवण्यात आले. हे झाड एवढं भराभर पसरलं की काही वर्षांतच गवताची ५० टक्क्य़ांहून जास्त कुरणं संपुष्टात आली. दिसायला प्रदेश आता जास्त हिरवागार दिसत असला तरी वन्यप्राणी, माणूस आणि त्यांची गुरं यांना मात्र त्याची अडचण हाऊ लागली. कांकरेज गाई तर या झाडाचा पाला खाऊन आजारी पडू लागल्या. आधीच संपुष्टात येऊ लागलेल्या कुरणांना वनखात्याने कुंपण घातलं. गवत पुरेसं नसल्यामुळे आणि दुधाची मागणी वाढल्यामुळे नसíगक चारा कमी पडू लागला. मग बाजारातून चारा विकत घेण्याची सुरुवात झाली. सामाईक जमिनी जाऊन जमिनीचे खासगी तुकडे पडू लागले. कुंपणं वाढली. आजूबाजूच्या सर्व नद्यांवर धरणं बांधण्यात आली. एकही ओहोळ मुक्त राहिला नाही. त्यामुळे, रणात येणाऱ्या गोडय़ा पाण्यावर मर्यादा आली. जमिनीतील आणि पाण्यातील मिठाचं प्रमाण वाढलं. वन्यप्राणीच नव्हे तर तिथे राहणाऱ्या लोकांवरही याचा परिणाम होऊ लागला. पाण्यासाठी टँकर आणि नळावर अवलंबून राहायला लागले. खाऱ्या जमिनीत मिळणाऱ्या रासायनिक पदार्थाच्या अवाढव्य खाणी उभ्या राहिल्या. याशिवाय इतर अनेक बदल झाले, विशेषत तिकडच्या व्यवस्थापनात आणि पर्यावरणात. या सगळ्याचा परिणाम असा झाला की माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं तुटलं. जमिनीचा टिकाऊपणा कमी झाला आणि लोक जास्त जोखमीचं असं, पशावर अवलंबून असणारं आयुष्य जगू लागले.
भारतातील अनेक शुष्क भागातील जंगलांची परिस्थिती अशीच आहे. गवताळ प्रदेश, माळरानं वेगाने संपुष्टात येऊ लागली आहेत. आणि त्याबरोबर तिकडचा निसर्ग आणि माणूसही. तरीही आपण या अनुभवातून फारसे शिकलेलो नाही. परिस्थितीत बदल करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. तुम्ही आफ्रिकेची दृश्य पाहिली आहेत का? तिकडचे ‘सव्हाना’ प्रकारचे गवताळ भाग जिथं जिराफ, सिंह इत्यादी प्राणी राहतात हे भारतातील भागांपेक्षा फार वेगळे नाहीत. इथेही गुरं पाळणाऱ्या अनेक जमाती आहेत आणि तिथेही अशा प्रकारचे बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिकडचं व्यवस्थापन बदलायला सुरुवात केली आहे. पण भारतात अजूनही या जमिनीकडे लक्षं दिलं जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. हे मान्य की हे बदल प्रचंड वेगाने होत आहेत. त्यांचा काय परिणाम होतोय हे लक्षात यायच्या आधीच अजून एक मोठा बदल झालेला असतो. पण म्हणून त्याच चुका पुन्हा करत राहणं (की कशाला उगीच काळजी करायची या गोष्टींची असं वाटत असतं आपल्याला?) आणि त्या जमिनीवर अवलंबून असणाऱ्या लोकांनाच गुन्हेगार ठरवणं, यापलीकडे का जात नाही आपण? याउलट असाही एक प्रयत्न होतो की जुनं होतं तेच उत्तम, त्यामुळे लोकांनी (फक्त तिथे स्थानिक असणाऱ्या) आधीच्या पद्धतीने, परंपरेने चालत असलेल्या नियमानुसारच राहावं. पण सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूचा निसर्ग आणि आपली अर्थव्यवस्थाच बदलली असताना हे तरी कितपत शक्य आहे? निसर्ग आणि माणसाचं नातं जपण्याची जबाबदारी सरकारची, उद्योगपतींची आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांचीही नाही काय?
कच्छ आणि काठेवाड
मंगळवार
मुंबईहून भुजला जाणारे माझे विमान, निदान अर्धा तास तरी उशीरा सुटणार आहे. म्हणजेच मुंबईच्या आंतर्देशीय विमानतळावरचा माझा मुक्काम आता निदान 4 तासाचा तरी नक्कीच होणार आहे. आज सकाळी मी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी म्हणून एस.टीच्या शिवनेरी सेवेने 8.30 वाजताच पुणे सोडले होते. ही शिवनेरी बस सेवा मात्र आहे अगदी वक्तशीर आणि अतिशय आरामदायी. मी या सेवेची तरफदारी मनापासून करायला तयार आहे. बसने मला विमानतळाच्या शेजारून जाणार्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विमानतळाच्या अगदी समोरच सोडले होते व तेथून विमानतळावरील निर्गमन कक्षात मी अगदी सहज पोचू शकलो होतो. 1बी टर्मिनल मधील हा निर्गमन कक्ष आहे मात्र अगदी ऐसपैस! याच्या एका बाजूला प्रवाशांच्या सोईसाठी म्हणून बरीच दुकाने व एक कॅफेटेरिया दिसत आहेत. शो केसमध्ये मांडलेल्या वस्तू, पुस्तके यांचे विंडो शॉपिंग करत मी माझा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आहे. अखेरीस आमच्या उड्डाणाची घोषणा होते. नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लगबग, व गोंधळ थोड्याफार प्रमाणात अनुभवल्यानंतर मी विमानापर्यंत पोचण्यात यशस्वी होतो. विमान पूर्ण भरलेलेच दिसते आहे आणि स्वस्त विमानसेवा या वर्गाखाली हे उड्डाण मोडत असल्याने पिण्याच्या पाण्याखेरीज दुसरी कोणतीच सुविधा विमानात उपलब्ध नाहीये.
कच्छ आणि काठेवाडचा प्रवास हा इतिहासाची सोबत घेतल्याशिवाय करताच येत नाही असे मला वाटते. पावला पावलावर पर्यटकाला येथे, पार इ.स.पूर्व 2500 ते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ, यांमधील इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत राहतात आणि या शिवाय गेल्या 50 वर्षात, औद्योगिक क्रांतीमुळे या भागात जो आमुलाग्र बदल होतो आहे तोही क्षणाक्षणाला सतत जाणवत राहतो. निसर्गाने येथे दिसणार्या अथांग आणि असीम अशा आसमंतात, इतक्या अद्भुत आणि रौद्र सौंदर्याची लयलूट केली आहे की आपले मन आश्चर्याने आणि कौतुकाने पुरेपूर भरून जाते.
आमचे विमान भुज विमानतळावर उतरते आहे तेंव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले आहेत. समोर दिसणारा विमानतळ खूपच मोठा वाटतो आहे परंतु समोर टरमॅक वर उभे असलेले विमानदलाचे एक MI17 हेलिकॉप्टर सोडले तर बाकी काहीच विमाने दिसत नाहीत. भुज विमानतळावर दिवसाला फक्त 2 किंवा 3 उड्डाणे उतरतात ही गोष्ट लक्षात घेतली तर इथला आगमन कक्ष त्या मानाने खूपच प्रशस्त वाटतो आहे. मी मुंबईला चेक–इन खूपच लवकर केले होते त्यामुळे अपेक्षेनुसार माझे सामान सर्वात उशीरा बेल्ट्वर येते. मी टर्मिनलच्या बाहेर येतो तोपर्यंत बहुतेक मंडळी निघून गेलेली आहेत. आहेत.अगदी थोडी वाहने वाहनतळावर उभी आहेत. मात्र नशिबाने मला एक टॅक्सी मिळते. पण ती ज्या पद्धतीने मला लगेच मिळते ते काही चांगले चिन्ह नाही आणि आपल्या खिशाला जबरदस्त चाट बसणार आहे हे ही माझ्या लक्षात येते. पण तरी सुद्धा मी ती टॅक्सी घेतो कारण या निर्जन विमातळावर टॅक्सीची वाट एकाकीपणे बघत बसण्याची माझ्या मनाची काही तयारी नाही. हा विमानतळ शहरापासून फक्त 3 किमी लांब आहे आणि शहराच्या भरवस्तीमध्ये असलेल्या हॉटेलवर पोचल्यावर जेंव्हा टॅक्सी चालक माझ्याकडे 500 रुपयांची मागणी करतो तेंव्हा माझा होरा बरोबर असल्याची मला खात्रीच पटते. नाईलाजाने मी पैसे काढून देतो आणि हॉटेलमधल्या माझ्या रूमकडे वळतो. संध्याकाळी नंतर मी जरा पावले मोकळी करायला म्हणून बाहेर पडायचे ठरवतो व शहराच्या बाजारपेठेतून सरळ ‘हमिसर‘ तलावाकडे जाणारा रस्ता पकडतो. हा तलाव म्हणजे भुज शहराचा मध्यवर्ती बिंदू आहे आणि माझ्या हॉटेलपासून या तलावापर्यंतचे अंतर जेमतेम 15 मिनिटात चालत जाता येते आहे. मी तलावापाशी पोचतो तेंव्हा सूर्यास्त होतो आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर तलावात पाणीच नाहीये. या वर्षी म्हणे पाऊस फारच तुरळक पडला आणि तलावाला पाणी आलेच नाही. बाजारपेठेतील रस्ता गर्दीने नुसता फुलला आहे. वेडीवाकडी कशीही उभी केलेली वाहने, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, मोकाट सोडलेल्या गाई यामधून चालणे मुश्किल वाटते आहे. रस्त्याला पदपथ वगैरे नाहीतच आणि सगळीकडे कचर्याचे ढीग साठलेले दिसत आहेत. भुजचे प्रथम दर्शन तरी माझ्या मनाला फारसे पटलेले किंवा आवडलेले नाहीये. मी जरा कंटाळूनच हॉटेलवर परततो.
बुधवार
पुढचे 2 दिवस माझा मुक्काम कच्छच्या रणाजवळ असलेल्या ज्या कॅम्पमधे होणार आहे, त्या कॅम्पच्या व्यवस्थापनाने मला भुज रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या स्वागत कक्षात सकाळी बोलवले आहे. तेथे लवकर पोचता यावे म्हणून हॉटेलमधून 7.30 पर्यंत चेक आऊट करायचे असा माझा बेत होता. पण या हॉटेलची सेवा जरा मंद गतीनेच दिली जाते आहे असे दिसते. सकाळी 6 वाजता जो चहा येणार होता तो मिळालाच नाही व हॉटेलमधील रेस्टॉरन्ट मधे जाऊन प्यावा म्हणावे तर ते 7.30 शिवाय उघडत नाही. शेवटी सकाळी 8 च्या सुमारास चेक आऊट करण्यात मी यशस्वी होतो होतो आणि भुज स्टेशन जवळच्या स्वागत कक्षात पोचायला मला 8.15 होतात. मी गरम कपड्यात मला गुंडाळून घेतले आहे कारण येथे थंडी जबरदस्त आहे आणि झोंबणारे गार वारेही आहेत.
स्टेशन जवळच्या या स्वागत कक्षासमोर दिसणारे एकूण चित्र मला जरा निरुत्साही करणारेच वाटते आहे. समोर बर्याच बसेस कशाही वेड्यावाकड्या पार्क केलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे सामानाचे ढीग आणि या कॅम्पमधे भाग घेण्यासाठी आलेले लोक घोळक्या घोळक्यांनी उभे आहेत. मी स्वागत कक्ष अशी पाटी लावलेल्या शामियान्यात शिरतो आणि एका काऊंटरपाशी जातो. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी आहे. आतले काम भलतेच शिस्तशीर आणि पद्धतशीर रितीने होताना दिसते आहे. समोरचा स्टाफ अतिशय अदबीने वागतो आहे आणि प्रवाशांच्या अडचणींचे निवारण करण्यास तत्पर दिसतो आहे. माझी कागदपत्रे बघितल्याबरोबर मला एक तंबू अलॉट केला जातो व बरोबर आणलेल्या सर्व सामानावर त्या तंबूचा नंबर लिहिलेले टॅग्ज दिले जातात. ते मी सामानाला लावायचे आणि कोणत्याही बसमधे चढायचे एवढे सोपे काम आहे. फक्त माझे सामान मी प्रवास करतो आहे त्याच बसमध्ये ठेवले जाईल हे माझे मलाच बघायचे आहे. मी बाहेर येतो व समोरच असलेल्या एका बसच्या सेवकाकडे माझे सामान देतो. ते त्याने बसमध्ये ठेवले आहे याची खात्री झाल्यावर बसमध्ये चढतो.
पुढच्या 10 मिनिटात, भुजच्या वायव्येला 80 किमी अंतरावर असलेल्या धोर्डो या गावाकडे जाण्यासाठी बस निघते. भुजच्या उत्तरेकडे असलेला हायवे 45 वरून आम्ही निघालो आहोत. परत एकदा भुज विमानतळाचे दर्शन होते. विमानतळाच्या कडांना असलेल्या हॅन्गर्समध्ये ताडपत्र्यांचे आच्छादन घातलेली बरीच लढाऊ विमाने दिसत आहेत. आजूबाजूचे दृष्य काही आगळेच, सहसा बाकी कोठे न दिसणारे असे आहे. मधे मधे हिरवट काळसर रंगाची उभी पिके असलेली शेते व त्याच्या मधे मधे ओसाड जमीनीचे मोठाले पॅचेस दिसत आहेत. मधून मधून साठलेल्या पाण्याची डबकी पण दिसत आहेत. 2 दिवसांपूर्वी भुजमधे जोरदार वर्षा वृष्टी झाली होती त्यामुळे बहुदा हे पाणी साठलेले असावे. शेतात जी पिके उभी आहेत ती बहुतांशी एरंडीची आहेत. एरंडी (Ricinus communis, or Euphorbiaceae) हे पीक त्याच्या बियांपासून मिळणार्या एरंडेल तेलासाठी घेतले जाते. शेतकर्यांना नगदी रक्कम मिळवून देणारे हे पीक येथे खूपच घेतले जाते कारण येथली अतिशय खराब जमीन आणि वाळवंटी हवामान! हे तेल म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगातील अनेक उत्पादनांसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा उत्पादन घटक आहे. या उत्पादनांत, सौंदर्य प्रसाधने आणि मोटरगाड्यांच्या आणि इतर डिझेल, पेट्रोल इंजिनांसाठी जे वंगण लागते ते तेल, अशी दोन महत्त्वाची उत्पादने मोडत असल्याने एरंडी तेलाला खूपच मागणी असते.
आता शेतांच्या मधे मधे लागणार्या ओसाड पॅचेस मधली जमीन पांढरट दिसायला लागली आहे. हा पांढरा रंग, जमिनीत क्षारांचे प्रमाणे अवाजवी असल्याने दिसतो आहे. या ओसाड खारवट जमिनीत, फक्त बाभळीची झुडुपे उगवतात व टिकू शकतात. आम्ही जसजसे उत्तरेकडे जातो आहोत तसतसे या ओसाड जमिनींचे प्रमाण वाढते आहे व शेती अगदी थोड्या प्रमाणात, फक्त खेडेगावांजवळ, दिसते आहे. खेडेगावांतली घरे गोल आकाराची बांधलेली आहेत आणि त्यावरची छते शंकाकृती आकाराची दिसत आहेत. येथील पूर्वापार चालत आलेल्या घरांमध्ये, पूर्वी या शंकूच्या आकाराच्या छतावर गवत पसरण्याची पद्धत होती व त्यांना भुंगा असे नाव होते. आता सर्रास पणे मंगलोरी कौले छतावर घातलेली दिसत आहेत. मात्र छताचा आकार तसाच शंकू सारखाच आहे. घरांचा हा आकार असा बनवला जातो कारण, अशी घरे भूकंप झाला किंवा वादळ आले तरी त्यांना चांगले तोंड देतात व सहसा पडत नाहीत.
1 तासभर प्रवास केल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी रहाते. आजूबाजूला दिसणारे दृष्य अगदी कॉमन आहे. दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुकाने, चहाच्या टपर्या आणि भाज्या वगैरे विकणारे स्टॉल्स. या गावाचे नाव आहे भिरंडीयारनी आणि हे गाव तसे प्रसिद्ध आहे. या गावात चप्पल, सॅन्डल या सारख्या चामड्याच्या वस्तू आणि खवा, किंवा त्यापेक्षा हुबळी, बेळगाव कडे जसा कुंदा मिळतो तसाच दिसणारा आणि चवीला लागणारा, मावा मिळतो. या गावाबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून पुढे उत्तरेला जायचे असले तर इनर लाइन परमिट घ्यावे लागते असे म्हणतात. खरे खोटे मला माहीत नाही.
हे गाव सोडून आमची बस आता डावीकडे असलेल्या एका छोट्या फाट्याला वळली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी आहे. येथून पुढे कच्छ्ची प्रसिद्ध चराऊ राने ज्यांना येथे ‘बन्नी‘ असे नाव आहे ती सुरू होतात. मात्र मला दिसत आहेत ती बाभळीची झुडपे व त्या खाली वाळलेले गवत. कच्छ मध्ये गाई आणि म्हशी यांच्या दुधाचे प्रचंड उत्पादन होते याला प्रामुख्याने ही बन्नी चराऊ राने कारण आहेत. इथल्या गवतावर पोसलेल्या बलदंड दुभत्या जनावरांचे कळप किंवा ताफे मला दोन्ही बाजूंना बाभळीच्या झुडपांमागे दिसत आहेत. आणखी अर्धा तास प्रवास केल्यानंतर बस एकदम थांबते. आम्ही रणाजवळच्या कॅम्पपाशी पोचलो आहोत.
शेकडो तंबू ठोकून उभा केलेला हा कॅम्प म्हणजे एक प्रचंड वसाहतच आहे. प्रत्येक तंबूमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जवळच वातानुकूलित भोजनगृह, खरेदीसाठी अनेक स्टॉल्स असलेली एक बाजारपेठ व एक सभागृह आहे. तंबूमध्ये वायफायची सुविधा देखील आहे. प्रथम मी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण करतो व त्या नंतर मला एक कॅम्पचे ओळखपत्र आणि भोजनासाठीची कुपॉन्स देण्यात येतात. ती सगळी घेऊन मी आरामात माझ्या तंबूकडे जातो. आशचर्याची गोष्ट म्हणजे माझे सामान, तंबू समोर आणून ठेवलेलेच आहे. तेथील सेवक वर्ग मला प्रथम न्याहरी घ्यावी अशी अशी सूचना करतो कारण न्याहरीची वेळ थोड्याच वेळात संपणार असते. मोठ्या थोरल्या भोजन गृहात अगदी गरम गरम जेवण तुम्हाला सर्व्ह केले जाते. संपूर्ण गुजराथी पद्धतीची पोहे, जिलबी आणि गाठिया यांची न्याहरी व त्यानंतर मसाला चहा याची लज्जत येथे काही औरच येते आहे.
आता दुपारच्या भोजनापर्यंत तसा मला मोकळा वेळ आहे. त्या नंतर आम्हाला जवळपास असलेल्या कच्छी खेड्यांच्यात तेथील कारागिरांनी केलेले भरतकाम आणि इतर कलाकुसर बघण्यासाठी नेण्यात येणार आहे. मी जवळच असलेल्या बाजारपेठेतील स्टॉल्समध्ये भटकण्यात वेळ घालवून आणि थोडीफार खरेदी करून माझ्या तंबूमध्ये परतण्याचे ठरवतो.
प्रत्यक्षात मात्र मी शेवटी अंदाजे 2 तास तरी तिथल्या दुकानांच्यात घालवतो. भरतकाम किंवा बांधणी प्रकारची वस्त्रे, त्यांचे रंग हे सगळे मनाला फारच लुभावणारे वाटते आहे. कलाकुसरीच्या इतर वस्तूंची कारागिरी सुद्धा फारच अप्रतिम वाटते आहे.
12.30च्या सुमारास मी माझ्या तंबूकडे परत येतो. प्रत्येक तंबूमध्ये, 2 शयनमंच, 2 टेबले, खुर्च्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे एक रूम हीटर, पाणी गरम करण्यासाठी एक इलेक्ट्रिक किटली आणि चहाचे किट टेबलावर ठेवलेले आहे. तंबूच्या मागच्या बाजूस आधुनिक सुविधा असलेले स्वच्छता गृह आहे.
मी जरावेळ आराम करतो व परत एकदा भोजन गृहात जाऊन संपूर्ण गुजराथी भोजनाचा आस्वाद घेतो व नंतर या कॅम्पच्या स्वागत कक्षाजवळ असलेल्या वाहनतळाकडे वळतो.
वातानुकूलित बसेसचा एक ताफाच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला या कॅम्पच्या व्यवस्थापनाने कॅम्प रहिवाशांच्या सोईसाठी म्हणून नेहमी तयार ठेवलेला असतो. त्यापैकी पुढे असलेल्या एका बसमध्ये मी चढतो आणि पुढच्या काही मिनिटातच बस संपूर्ण भरल्यामुळे निघते सुद्धा! आम्ही परत एकदा भिरंडीयारनी गावाकडे जाणार्या चिंचोळ्या रस्त्याने निघालो आहोत. या गावाजवळ आमची बस आता हायवे 45 वर डावीकडे म्हणजे सकाळी आलो त्याच्या विरूद्ध दिशेला वळते आहे.
दुपारचे ऊन आता चांगलेच रणरणते आहे. वर सूर्य सुद्धा तळपतो आहे आणि अंग भाजून काढतो आहे. काही क्षणातच आम्ही गोल आकाराच्या 3 किंवा 4 भुंगा झोपड्यांच्या मधे असलेल्या एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो.
खाली उतरल्यावर एका दृष्टीक्षेपातच माझ्या लक्षात येते की हे काही खरे भिरंडीयारनी गाव नाही. ते बहुदा या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेल्यावर असावे. या भुंगा झोपड्या, कच्छ्च्या हस्तकला आणि भरतकाम केलेले कपडे, यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी गुजरात सरकारने स्थापन केलेले एक विक्री केंद्र आहे. पण समोर जे काही विक्रीसाठी दिसते आहे ते इतके सुंदर आणि अप्रतिम आहे की आम्ही खर्या गावात न आल्याबद्दल मला तक्रार करण्यासारखे काहीच नाहीये. कपडे, चादरी या सारख्या वस्त्रांवर या इथल्या कारागीरांनी रंगांची जी बहारदार उधळण केलेली दिसते आहे त्याला खरोखरच तोड नसेल. या रंगांबरोबरच या वस्त्रांवर भरतकाम करून ज्या आकृत्या विणलेल्या आहेत त्या ही अजोड आहेत. अनेक प्राणी, पक्षी, भूमितीय आकृत्या, या वस्त्रांवर, कच्छी टाका म्हणून परिचित असलेल्या एका टाक्याने, विणलेल्या दिसत आहेत. सभोवती टाके विणून छोटे छोटे आरसे या आकृत्यांत बसवलेले आहेत त्यामुळे आसमंतावर तळपणार्या सूर्याचे किरण त्यावरून परावर्तीत होऊन ही वस्त्रे चमचम करत झगमगत आहेत. विक्री करणार्या स्त्री पुरुष खेडूतांनी याच प्रकारची वस्त्रे अंगावर व डोक्यावर घेतलेली आहेत. खरे तर हे रंग अतिशय गडद आणि उठावदार आहेत तरीही ते वापरून बनवलेली वस्त्रे भगभगीत किंवा बेगडी असल्यासारखी वाटत नाहीत. परंपरागत चालत आलेल्या या हस्तकलांचे हेच वैशिष्ट्य असते. ही वस्त्रे म्हणजे माझ्या डोळ्यांना एक मेजवानी असल्यासारखीच मला वाटते आहे. भिरंडीयारनी गावातील हे भुंगा विक्री केंद्र, जरी खरा भुंगा नसले तरीही डोळ्यांना अतिशय आल्हाद्कारक मात्र नक्कीच वाटते आहे.
एका भुंग्यामध्ये मला भिंतीपाशी एक विचित्र दिसणारे एक उपकरण ठेवलेले दिसते आहे. मुळात हे एक लाकडी कपाट आहे. त्यावर शाडूच्या मातीचा लेप देऊन त्यावर पांढरा रंग दिलेला आहे. कपाटाच्या समोरील बाजूस एक छोटा दरवाजा दिसतो आहे. या कपाटाच्या वरच्या बाजूवर 3 मडक्यांच्या प्रत्येकी केलेल्या 2 उतरंडी ठेवलेल्या आहेत. त्यांनाही पांढरा रंग दिलेला आहे. या सर्वच उपकरणाच्या बाह्य पृष्ठभागावर छोटे आरसे शाडूच्या मातीत रोवून पक्के बसवून टाकलेले आहेत. हे येथील खेडूतांचे विद्युत किंवा दुसरी कोणतीही शक्ती आवश्यक नसलेले असे शीतकपाट आहे. कपाटावर असलेली मडकी पाण्याने भरून ठेवली की अन्नपदार्थ किंवा दूध यासारखे पदार्थ कपाटातील छोट्या कप्प्यामध्ये खराब न होता व्यवस्थित राहू शकतात. कच्छ मध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो व तपमान 50 अंश सेल्सस पर्यंत सहजपणे जाते. अशा परिस्थितीत हे ग्रामीण शीतकपाट खेडूतांना एक वरदानच ठरते.
आता आम्ही ‘होडको‘ नावाच्या दुसर्या एका खेड्यापाशी पोचलो आहोत. या खेड्याच्या थोड्या बाजूला, एक आदर्श खेडेगाव सरकारने उभारले आहे. या आदर्श गावाकडे जाण्याच्या रस्त्याच्या अखेरीचा 100 मीटर लांबीचा भाग हा दाट भरलेल्या बाभळींच्या वनामधून जातो आहे. मात्र ही बाभूळ आपल्याकडे दिसते तशी काटेरी बाभूळ (Gum Arabic) नसून आपण ज्याला विलायती बाभूळ (Prosopis juliflora) म्हणतो त्या प्रकारची चांगली उंच वाढलेली झाडे असल्याने त्यांच्या खालून सहजपणे जाता येते आहे. समोर दिसणार्या रंगवलेल्या भुंगा झोपड्या, स्वच्छ सारवलेली अंगणे, सगळीकडे आणि मुख्यत्वे भिंतींवर केलेले कलात्मक नक्षीकाम आणि चित्रे, पॉलिश केलेली घरांची दारे, यामुळे हे आदर्श गाव एखादा बॉलीवूड चित्रपटाचा सेट लावावा त्याप्रमाणे दिसते आहे.
असे असूनही हा चित्रपटाचा सेट मात्र नाही. या भुंगा झोपड्यांमध्ये लोक प्रत्यक्षात रहात आहेत. मला काही अतिशय गोंडस दिसणारी मुले या भुंगा झोपड्यांभोवती खेळताना दिसत आहेत. मी एका झोपडीत डोकावून बघतो. आतले घर अगदी स्वच्छ आणि टापटिपीने आवरलेले आहे. भिंतीवर लाकडी शेल्फ अडकवलेली आहेत व त्यांच्यावर घरातली भांडी–कुंडी व इतर सामान नीट लावून ठेवलेले दिसते आहे. समोरच्या भिंतीवर एका सपाट पाटीवर, शाडूच्या मातीचा थर देऊन त्यात बारके आरसे खोचून तयार केलेल्या डिझाइनचे एक पॅनेल लावलेले आहे. त्यातली कारागिरी दाद देण्यासारखीच आहे. या प्रकारच्या पॅनेल्सवरची डिझाइन्स, बहुधा भूमितीय आहेत व ती भिंतीवर बसवलेली आहेत. त्याच प्रमाणे स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या अनेक कलावस्तू आणि इतर गोष्टी आम्हाला बघता याव्यात म्हणून नीट मांडून ठेवलेल्या आहेत. कला गुण बहुदा या कच्छी खेडूतांच्या जनुकांमधेच असले पाहिजेत. नाहीतर त्यांनी बनवलेली अगदी साधी साधी डिझाइन्स सुद्धा दाद द्यावी अशीच आहेत. या लोकांच्या अंगात असलेल्या सृजनशीलतेचे किती कौतुक करावे तरी ते कमीच पडेल असाच कलाविष्कार येथे प्रदर्शनासाठी मांडून ठेवलेला आहे.
या कच्छी खेडेगावांची ही कलासफर करताना संध्याकाळ कधी झाली ते मला कळतही नाही. आम्ही परत बसमध्ये चढतो पण कॅम्पकडे परत न जाता साधारण ईशान्य दिशेला असलेल्या एक गेस्ट हाऊसकडे आमची बस वळते. तेथे संध्याकाळचा चहा व बिस्किटे यांचा मी समाचार घेतो आणि जरा फ्रेश होऊन आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अतिशय भव्यदिव्य मानल्या जाणार्या अशा एका निसर्ग करामतीचे दर्शन घेण्यासाठी तयार होतो. या निसर्ग करामतीला, धवल मरुभूमी (the white desert) या नावाने ओळखले जाते.
मी वर ज्या बन्नी या नावाने ओळखल्या जाणार्या चराऊ रानांचा उल्लेख केला आहे ती राने कच्छ्च्या सर्वात उत्तरेला असलेला व ज्यात मानवी वस्ती आहे अशा एका प्रदेशाभोवती पसरलेली आहेत. या प्रदेशाच्या उत्तरेला, एक अफाट मोठी अशी एक मरूभूमी सुरू होते. या मरूभूमीमध्ये कोणतीही खेडी किंवा वस्त्या नाहीत व येथे कोणी रहात सुद्धा नाही. ही मरूभूमी उत्तर–दक्षिण दिशेला 50 ते 125 किमी एवढी पसरलेली आहे तर भारताच्या पश्चिम किनार्यापासून ते पूर्वेला जवळजवळ 300 किमी पर्यंत या मरूभूमीचा आवाका आहे. मात्र ही मरूभूमी म्हणजे नुसत्या रेतीच्या टेकड्यांनी भरलेले एक वाळवंट नाही. मॉन्सूनचे वारे सुटले की ‘रण‘ या नावाने ओळखल्या जाणार्या या मरूभूमीमध्ये, अरबी समुद्राचे पाणी घुसते व या मरूभूमीच्या आसमंतात असलेल्या पर्जन्यपोषित नद्या सुद्धा तुडुंब वहात येऊन या पाण्यात भर टाकतात. या कारणांमुळे ही सर्व मरूभूमी दर वर्षी, या सर्व मॉन्सून कालात, काही फूट खोल पाण्याखाली असते. मात्र मॉन्सूनचे वारे ओसरले की हे सर्व पाणी परत समुद्राकडे धाव घेते आणि पाणी गळून गेल्यावरचे हे रण, प्रथम दलदलीच्या स्वरूपात बदलते व शेवटी त्याला एका कोरड्या वाळवंटाचे स्वरूप येते. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये येथील जमीन कोरडी व पापुद्रे सुटलेली अशी दिसते. मात्र या मरूभूमीच्या काही भागावर मात्र गळून जाणारे समुद्राचे पाणी, मिठाचा (Sodium Chloride) एक थर सोडून जाते. जमिनीवर पसरलेला हा पांढर्या शुभ्र मिठाचा थर आसमंतात एक जादूमय वातावरण निर्माण करतो. रणाच्या या भागांना धवल मरूभूमी म्हणून यासाठीच ओळखले जाते व निसर्गाची अतिशय दुर्मीळ व अद्भुत अशी ही करामत डोळे भरून बघण्यासाठी मी आता निघालो आहे.
बस थांबते आणि मी खाली उतरतो. समोर काही अंतरावर एक बांबूचे कुंपण किंवा बॅरिकेड उभारलेले दिसते आहे. या कुंपणाच्या पलीकडच्या बाजूस कोणत्याही वाहनांनी जाऊ नये यासाठी ही तजवीज आहे. या कुंपणापलीकडे फक्त उंटाने ओढलेल्या गाड्या जाऊ शकतात. मात्र पलीकडे मला एक मोठा जनसमुदाय जमलेला दिसतो आहे. हिवाळ्याच्या दिवसातील संध्याकाळी, येथे पर्यटक शेकड्यांनी जमा होतात व पांढर्या शुभ्र क्षितिजामागे होणारा सूर्यास्ताचा भव्य खेळ, डोळे भरभरून बघत राहतात. या बॅरिकेडच्या मागे बर्याच अंतरावर, अगदी क्षितिजाजवळ मला एक पांढरा स्वच्छ पट्टा दिसतो आहे. तो शुभ्र पट्टा अर्थातच या धवल मरूभूमीचा आहे आणि तेथेच मी आता जाणार आहे.
मी बॅरिकेडमधून पुढे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, डबे तुम्हाला याच्या पुढे नेता येत नाहीत. मी खाली बघतो. पायाखालची जमीन जरा भुरकट–मातकट रंगाची वाटते आहे. मधून मधून पाणी साचलेली छोटी छोटी डबकी पण दिसत आहेत.
जमीन संपून ही धवल मरूभूमी जेथे सुरू होते आहे तेथे स्थानिक कलाकारांनी एक छोटेसे स्टेज उभारले आहे. त्यावर 5 किंवा 6 कलाकारांचा एक संच वाद्यांच्या साथीवर लोकगीते प्रस्तुत करतो आहे. साधारण लोकसंगीताच्या चाली असतात तसेच हे संगीत कानाला थोडे गूढ वाटत असले तरी कर्णमधुर आहे. अर्थात शब्द कच्छी भाषेतील असल्याने समजणे शक्यच नाही. मात्र या लोकसंगीताने या धवल मरूभूमीवर जो एक माहौल उभा केला आहे तसा परत आयुष्यात अनुभवणे कठीण आहे. मी माझे 1/2 फोटो या संगीत संचाबरोबर काढून घेतो आणि पुढे निघतो.
आता पायाखालची जमीन हळूहळू मळकट पांढरी होत जाते आहे आणि थोड्या अंतरावर अचानकपणेच ती शुभ्र धवल बनली आहे. वेड लागल्यासारखा मी तरातरा चालतच राहतो. पुढे आणखी एखादा किलोमीटर अंतर गेल्यावर मी स्तब्ध उभा राहतो. आता माझ्या चहूदिशांना फक्त एकच रंग उरला आहे. पार क्षितिजापर्यंत जाणवते आहे ती फक्त अपार आणि अफाट अशी धवलता. गेल्या काही मिनिटात येथे जादूने जोरदार हिमवर्षाव तर झाला नाहीये ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून जावी इतका आसमंत आता पांढरा शुभ्र झाला आहे. बरोबरचे कोणीतरी मला विचारते की आपण असेच चालत राहिलो तर कोठे पोचू? मला खरे तर क्षितिजावर! असे उत्तर द्यावे असे मनापासून वाटते आहे पण मी ते उत्तर न देता रूक्षपणे सिंधमध्ये पोचू असे सांगून टाकतो.
मगाशी डोक्यावर तळपणारा सूर्य, आता पश्चिम क्षितिजावर 10 ते 15 अंशावर आला आहे. आणि माझ्या पश्चिमेला, जमिनीवर पाणी साचून तयार झालेल्या शेकडो खळग्यांच्या पुंजक्यांनी अचानकपणे सुवर्णकांती प्राप्त केली आहे. सूर्यकिरणांमुळे हे साचलेले पाणी, मोजता येणार नाही अशा अनंत ठिकाणीं, नुसते झळाळून उठले आहे व सह्स्त्रावधी सुवर्णतारका एकदम चमकाव्यात तसे चमचमते आहे. समोरचे हे अवर्णनीय दृष्य मला या अवनीतलावरचे वाटतच नाहीये. या प्रकारचे स्वर्गीय दृष्य माझ्या उर्वरित आयुष्यात परत बघता येईल असे काही मला वाटत नाही.
वेळ तर पुढे सरकतोच आहे. मी आसमंताची अक्षरश: शेकडोंनी छायाचित्रे घेतो आहे. पश्चिम क्षितिजावर पोचलेल्या सूर्याने आता थोडी नारिंगी छटा असलेला सुवर्णमय अवतार धारण केला आहे. सूर्याला हिरण्यगर्भ हे नाव पूर्वी ऋषींनी देण्यामागचे कारणच मला समोर दिसते आहे. सूर्याचा इतका शुद्ध आणि स्वर्गीय अवतार मी या पूर्वी कधीच बघितलेला नाही. मी सहाज पूर्वेकडे वळून बघतो. क्षितिजापासून साधारण 40 अंशावर दुधाच्या रंगाचा सफेद चंद्र आकाशात मला सहजपणे दिसतो आहे.
आणखी काही क्षण जातात. सूर्याची एक कड आता क्षितिजाला टेकते आहे. क्षणार्धात पश्चिमेला असलेले पाण्याचे सर्व सुवर्णमय पुंजके एकमेकाचा हात हातात घेतात व मला समोर दिसू लागतो नारिंगी सुवर्ण रंगाचा परंतु सबंध क्षितिजाच्या लांबीचा एक चिंचोळा पट्टा!हा पट्टा तर आता सूर्याचा एक भागच असल्यासारखा झळाळतो आहे. आणखी काही क्षण जातात.सूर्याची वरची कडही क्षितिजाआड लपते. त्याचबरोबर मगाशी झळाळणारे पाण्याचे ते पुंजकेही हरपतात.
मी एक उसासा टाकतो व परत फिरण्यासाठी मागे वळतो. चालत असतानाच माझ्या अचानक लक्षात येते की आजूबाजूच्या जमिनीने आता अचानक रुपेरी रंग प्राप्त केला आहे. सूर्य क्षितिजाआड गेल्याने आणि नारिंगी रंगाचा मागमूस न राहिल्याने चंद्राने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. मगाशी सुवर्णकांती धारण केलेली ही शुभ्र धवल मरूभूमी आता रुपेरी बनली आहे. अगदी रूक्षपणे सांगायचे म्हटले तरी ही सभोवार दिसणारी अवनी आता अचानक जादूमय बनली आहे.
अगदी नाईलाजाने पाय निघत नसतानाही मी परत बसकडे वळतो व आमच्या कॅम्पकडे येण्यास निघतो. रात्री गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर माझे पाय जवळच असलेल्या अॅम्फीथिएटर कडे वळतात. आजा अहमदाबाद येथील एका नृत्य शाळेच्या विद्यार्थिनींचा ‘कुचिपुडी‘ पद्धतीच्या नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. आता परत चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे. मी अंगावर भरपूर कपडे चढवतो व डोळ्यावर पेंग येत असूनही हा प्रेक्षणीय कार्यक्रम पूर्ण बघतो.
नंतर झोपेची आराधना करत असताना माझे विचार उद्याच्या विशेष कार्यक्रमाच्या भोवतालीच केंद्रित झाले आहेत. उद्या सकाळी, जवळचे हे विराण आणि विशाल रण ओलांडून आम्ही, जेथे परत एकदा मानवी वस्ती शक्य आहे अशा पलीकडच्या म्हणजेच उत्तरेच्या बाजूच्या काठावर जाणार आहोत. परंतु या काठाच्या पलीकडे असलेला भूभाग मात्र आता भारताच्या स्वामित्वाखालील नाही.
गुरूवार
आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने उतरून जातात व मला बसच्या पुढच्या भागात खिडकीजवळची जागा मिळते. पुढच्या काही मिनिटातच बस भरते आणि आम्ही निघतो सुद्धा. या प्रवासासाठी असलेला आमचा गाईड सैन्यदलातून निवृत्त झालेला आहे आणि बर्यापैकी विनोदी स्वभावाचा असल्याने त्याच्या सूचनांची आम्हाला सगळ्यांनाच गंमत वाटते आहे. परत एकदा आम्ही भिरंडीयारनी गाव गाठतो व परत एकदा डावीकडे वळून हायवे 45 वरून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. आसमंत साधारण तसेच आहे. बन्नी चराऊ राने, मधून मधून धष्टपुष्ट गाई म्हशींचे कळप आणि मधूनच एरंडीची शेते. या रस्त्यावरच असलेल्या ‘खावडा‘ गावामध्ये आम्ही पहिला हॉल्ट घेतो. रणाच्या वैराण आणि विशाल मरूभूमीमध्ये प्रवेश करण्याआधी लागणारे हे शेवटचे मोठे गाव आहे. येथे चहाचा कप घेणे अनिवार्य आहे असे आमच्या गाईडचे म्हणणे पडते व आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन गरमगरम चहाचा थोडा आस्वाद घेतो. या गावाचे सुद्धा एक हस्तकला वैशिष्ट्य आहे. येथे कलात्मक रित्या बनवलेल्या चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. चपला व पर्सेसची डिझाइन अतिशय सुरेख आहेत. पण मला पुढच्या प्रवासाची इतकी उत्कंठा आहे की सध्या खरेदीकडे माझे फारसे लक्ष नाहीये.
खावडा गावातील रहिवासी मात्र इतर कच्छी लोकांपेक्षा खूपच भिन्न दिसत आहेत. चेहर्याची लांब ठेवण, धारदार आणि टोकदार नाके, सुरमा घातलेले डोळे यामुळे या लोकांचे बलुची किंवा पख्तुन लोकांशी असलेले साम्य लक्षात येण्याजोगे आहे. त्यांच्या डोकयावरील पगड्या, अंगावरील पठाणी पोषाख व गळ्याभोवती घेतलेले उपरण्यासारखे वस्त्र यामुळे हे लोक इथले मूळ स्थानिक नसावेत असा अंदाज मी बांधतो. आमचा गाईड खुलासा करत मला सांगतो की ही मंडळी काही पिढ्यांपूर्वी वायव्येकडून येथे येऊन स्थायिक झालेली आहेत आणि त्यांनी हे गाव आता आपले केलेले आहे. या लोकांचे मूळ स्थानिक कच्छी लोकांबरोबर फारसे संबंध नसल्याने आता गुजरात सरकार त्यांना इतर समाजाबरोबरच सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे खावडा गावाजवळ मूळ कच्छी लोकांची वस्ती वाढावी म्हणून येथे नव्या उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. नवीन उद्योगधंदे आले की नोकरीसाठी मूळ कच्छी मंडळी येथे येतील व सध्या या स्थलांतरितांचे जे इथे प्राबल्य आहे ते कमी होईल अशी कल्पना या मागे आहे.
आमच्या गाईडचा बरोबर आणलेल्या कागदपत्रांचा आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या नावांचा व संख्येचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे कारण म्हणजे खावडा गावानंतर येथील स्थानिक सोडले बाकी असैनिक किंवा सिव्हिलियन लोकांना खास परवाना असल्याशिवाय पुढे प्रवास करता येत नाही. अखेरीस बसचा ड्रायव्हर, कंडक्टर स्वत: गाईड आणि आम्ही सर्व, यांचा ताळमेळ जमतो व आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. कुरन नावाचे एक छोटेसे खेडे रस्त्यात लागते. यानंतर आसमंत हळूहळू बदलू लागला आहे हे माझ्या लक्षात येते. आता एरंडीची शेते जवळजवळ दिसतच नाहीयेत. टाकाऊ आणि वरकड जमिनीचे मोठमोठे तुकडे आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागले आहेत. बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झाडे आणि खाली वाळके गवत हे मात्र विपुल प्रमाणात सगळीकडे आहेत. थोडे अंतर पार केल्यावर आता आम्ही रणाच्या तीरावर असलेल्या जमिनीच्या शेवटच्या कडेवर येऊन पोचतो आहोत. बस काही क्षण स्तब्ध उभी आहे. मी त्याचा फायदा घेऊन समोरचे दृष्य मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आहे.
माझ्या अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे एक पूल. या पुलाखाली आता जरी कोरडीच जमीन असली तरी वर्षातील बराच काळ येथे समुद्राचे पाणी असते. माझ्या डाव्या हाताला दिसते आहे ती काल मी अनुभवलेली व मिठाचे थरावर थर असलेली धवल मरूभूमी. ही धवल मरूभूमी पार पश्चिम क्षितिजापर्यंत विस्तारली आहे. मात्र प्रत्यक्षात या धवल मरूभूमीच्या पुढे दलदलीचा प्रदेश व नंतर अरबी समुद्राकडे नेणारी कोरी खाडी लागते असे माझ्या जवळचा नकाशा सांगतो आहे. माझ्या उजव्या हाताला दिसते आहे कोणत्याही प्रकारच्या झाडाझुडपांचा लवलेश सुद्धा दिसत नसलेली, किरमिजी, मळकट रंगाच्या जमिनीची, एक अफाट पसरलेली वैराण मरूभूमी. मात्र अगदी पूर्व क्षितिजाजवळ, याच मरुभूमीने आपला रंग बदलला आहे. या ठिकाणी ही मरुभूमी थोडीशी निळसर ग्रे दिसते आहे. हा रंग बघणार्याला सहजपणे फसवतो आहे. असे बघितल्यावर येथे समुद्रकिनारा असला पाहिजे असे वाटते आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही.
मात्र रणाचा हा देखावा बघताना निसर्गाची ही अद्भुत आणि दुर्मीळ करामत बघून माझे मन इतके आश्चर्यचकित झाले आहे की निस्तब्धपणे समोरचा देखावा बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. समोर दिसणार्या वैराण रणाचा वायव्येकडचा भाग, येथे गोड्या पाण्याची विपुलता असल्याने 200 वर्षांपूर्वी अतिशय सुपीक होता व येथे वर्षभर पिके डोलत असत असे मी वाचले आहे. परंतु समोर सध्याची परिस्थिती बघितल्यावर हे जवळपास अशक्यप्रायच वाटते आहे.
एखाद्या खोल पाण्याने भरलेल्या समुद्रात असावीत तशी अनेक बेटे या रणामध्ये आढळतात. ही बेटे मॉन्सून कालात पाण्याने वेष्टिलेली असली तरी बाकीच्या काळात या बेटांवर जमिनीवरच्या वाटांनी पोचता येते. अगदी ऐतिहासिक कालांपासून असे अनेक मार्ग येथील स्थानिक लोकांना ज्ञात होते व आहेत आणि या मार्गांनी उन्हाळ्यात रण सहजपणे ओलांडता येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात, रणाचा उत्तर किनारा हा त्यांच्या अधिपत्याखाली असलेला सिंध प्रांत व कच्छ संस्थान यामधील सीमारेखा म्हणून मानली जात असे. त्या काळात रण ओलांडण्यासाठी 4 मार्ग सर्वसाधारणपणे वापरात होते. यापैकी पहिला मार्ग हा कच्छ मधील लुना गाव आणि सध्याच्या पाकिस्तानातील ‘रहिम की बझार‘ हे गाव यांना विगाकोट आणि कांजरकोट या मार्गे जोडत होता तर पाकिस्तानातील नगरपरकर हे गाव आणि कच्छ मधील बेला आणि लोदरानी यांना जोडणारे 2 स्वतंत्र मार्ग अस्तित्वात होते. मोरी बेटावरून जाणारा व कच्छ मधील खावडा आणि पाकिस्तानातील डिप्लो या गावांना जोडणारा 4था मार्ग त्या वेळी वापरात होता. आता यापैकी कोणतेच मार्ग आता उपलब्ध नाहीत व सीमा सुरक्षा दलाने बनवलेले 2 किंवा 3 पक्के रस्ते आता रण ओलांडण्यासाठी वापरले जातात. या रस्त्यापैकी, खावडा गावापासून निघून रणाच्या उत्तर काठावर असलेल्या विगाकोट या एका जुन्या किल्याच्या भग्नावशेषांपर्यंत, अनेक बेटे जोडत गेलेल्या एका रस्त्याने, आम्ही रण ओलांडणार आहोत.
आमची बस आता परत पुढे निघाली आहे. रणाचा दक्षिण काठ आणि उत्तरेकडे, सर्वात जवळ असलेले कुवर बेट, या मध्ये वाहणारा रणातील जलप्रवाह इतका अरूंद आहे की एका पुलाच्या सहाय्याने तो सहज ओलांडता येतो. इंडिया ब्रिज किंवा भारत सेतू या नावाने ओळखला जाणारा हा पूल आमची बस आता ओलांडते आहे. या पुलाला लागून धर्मशाळा या नावाने ओळखले जाणारे पहिले सीमा चेक पोस्ट समोरच आहे. पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने या चेक पोस्ट्पासूनच पुढे सुरक्षा नियम पालन अतिशय कडकपणे केले जाते. बस चेक पोस्टवर थांबते. आम्हाला आमच्या जवळचे मोबाइल फोन, कॅमेरे वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षा दलाच्या हवाली करावी लागतात. मोबाइल मधले सिम कार्ड सुद्धा चालत नाही. या नंतर आमची बस सुरक्षा दल कर्मचार्यांकडून व या साठी मुद्दाम तरबेज असलेल्या नीलम या श्वानाकडून संपूर्णपणे तपासली जाते. अखेरीस आम्हाला हिरवा सिग्नल मिळतो व आम्ही पुढे निघतो. कुवर बेट, येथे तैनात असलेले सैनिक वगळले तर, बाकी तसे निर्मनुष्य आहे. आजूबाजूच्या जमिनीवर पिवळे पडलेले वाळके गवत व त्यातून मधून मधून वर डोकावणारी बाभळीची झुडुपे या शिवाय काहीच दिसत नाही. मधून मधून दिसणारे उघडे वाकडे खडक मला सह्याद्रीची आठवण करून देतात. मात्र रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना एका पाठोपाठ एक, सैनिकांचे बंकर्स मात्र दिसत राहतात. एक वळण घेतल्यावर रस्ता बर्यापैकी सरळ होतो व थोड्याच वेळात आम्ही कुवर बेट ओलांडून रणावर असलेला आणखी एक पूल पार करतो व पुढच्या बेटावर प्रवेश करतो. या बेटाला सीमा सुरक्षा दलाने ‘चिडियामोर‘ असे नाव, येथे पक्षी खूप दिसत असल्याने, बहुधा दिलेले असावे. परत एक चेक पोस्ट समोर येते व बस थांबते. येथे बस चालकाने खाली उतरून काही औपचारिकता पूर्ण करणे अपेक्षित असते. बस मधील आमचा गाईड आमचे लक्ष उजव्या बाजूला लांबवर वेधतो व तेथे उभा असलेला चिंकारा किंवा इंडियन गॅझेल आम्हाला दाखवतो. भारतीय वन विभागाने संरक्षित म्हणून ही प्रजाती घोषित केलेली आहे व यांची एकूण संख्या आता मर्यादित असली तरी वृद्धिंगत होते आहे. हे चिंकारा या बेटांवर सुखाने रहातात, कारण त्यांना त्रासदायक ठरतील अशी हिंस्र श्वापदे किंवा माणसे ही दोन्हीही या बेटांवर रहात नाहीत व स्वत:ला परमेश्वराचा आधुनिक अवतार मानणारे चित्रपट नट त्यांची शिकार करण्यासाठी अवैध रित्या येथे फिरकू शकत नाहीत. मॉन्सूनचा काल सोडला तर हे चिंकारा एका बेटावरून दुसर्या बेटावर आरामात रणामधून फिरत असतात.
चिडियामोर बेट पार केल्यावर आता आमची बस खर्या रण प्रदेशातून प्रवास करते आहे. आम्ही प्रवास करत असलेला रस्ता भराव घालून जमीन पातळीपासून सुमारे 3 ते 4 फूट उंच केलेला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चौरस आकाराचे चिरे ( दगड) कॉन्क्रीटमध्ये बसवून पेव्हमेंट केलेले आहे. हे पेव्हमेंट बहुधा रण पाण्याने भरले की रस्त्याच्या भरावाची हानी होऊ नये म्हणून केलेले असावे. रस्त्याचे डांबरीकरण केलेले असले तरी तो जेमतेम एक प्रवासी वाहन जाऊ शकेल एवढाच रुंद असल्याने दर 100 मीटर्सवर समोरून येणार्या वाहनांना एकमेकाला क्रॉस करणे सुलभ जावे म्हणून रस्त्याच्या बाहेरील बाजूस कॉन्क्रीट्मध्ये चिरे बसवून शोल्डर्स बांधलेले आहेत. बाजूला दिसत असलेला रणाचा पृष्ठभाग मात्र अजून ओलसरच दिसतो आहे. बर्याच ठिकाणी जमिनीमधे असलेल्या खळग्यांमध्ये पाणी साचलेले अजूनही दिसते आहे. आणखी एखाद्या महिन्याभरात रण वाळून पूर्णपणे शुष्क होईल व मग त्याला पापुद्रे सुटत जातील. मधेच रणामधून आरामात चालताना काही चिंकारा आम्हाला दिसतात. ते बहुधा एका बेटावरून दुसर्या बेटाकडे निघालेले असावेत. सुमारे 4 किमी अंतर रणामधून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका बेटावर पोचतो आहोत. या बेटाचे नाव सीमा सुरक्षा दलाने बॉप्स BOPS बेट असे ठेवलेले दिसते आहे. येथे हेलिकॉप्टर उतरू शकतील असा तळ बांधलेला असावा कारण तशी पाटी समोर दिसते आहे. बेटावर पोचल्यावर परत एकदा आसमंत खूपसा बन्नी चराऊ जमिनींसारखा वाटतो आहे. वाळलेले गवत, त्यात मधून मधून काटेरी झुडपे असे दृष्य दिसते आहे. येथे थोडी मोठी विलायती बाभळीची झाडेही बरीच दिसत आहेत. रणातील या बेटांवर आतापर्यंत न बघितलेले एक झुडूप मला दिसते आहे. एखाद्या पुंजक्याप्रमाणे असलेल्या या झुडपातून, सूर्याच्या चित्रात लहान मुले किरण फाकलेले जसे दाखवतात तसे गवताचे दांडे फाकलेले आहेत व त्याला बारीक काटे किंवा पाने असावीत असे दिसते आहे. सेंन्च्रस Cenchrus प्रजाती पैकी ही झुडपे बहुधा असावीत. आम्हाला आणखी काही चिंकारा चरताना दिसतात.
बॉप्स बेट पार केल्यावर आमची बस आता परत एकदा रणामध्ये प्रवेश करते आहे. रस्ता नाकासमोर काढावा तसा सरळसोट दिसतो आहे. हा रस्त्याचा भाग अंदाजे 10 ते 12 किमी तरी असावा व तो सरळ रण ओलांडतो आहे. दोन्ही बाजूंना रणाची वैराण मरूभूमी शिवाय दुसरे काहीही दिसत नाहीये. परत एकदा डाव्या हाताला किंवा पश्चिमेला मला धवल मरूभूमीचे काही पॅचेस तळपणार्या सूर्याच्या उन्हात झगमगून उठताना दिसतात व बसच्या समोरच्या काचेतून पार उत्तरेला, झाडे झुडपे असलेला हिरवा पट्टा असल्याचा भास मधून मधून होत राहतो. बहुधा ते मृगजळ असावे किंवा बेटेही असण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येत नाही. बाजूला दिसणार्या रणाच्या मरूभूमी मध्ये पाण्याचे ओढे व ओहोळ तेथे काही महिन्यांपूर्वी वहात होते याच्या स्पष्ट झिग–झॅग आकृत्यांच्या खुणा खालील मातीमध्ये दिसत आहेत. रस्ता थोडा पश्चिमेकडे वळतो व पुढे पुढे जात राहतो. सुमारे 30 ते 40 किमी अंतर असेच पार केल्यावर दूर उत्तर क्षितिजावर, मला वर उचललेली जमीन high ground दिसू लागले आहे आणि त्यावर 3 आधुनिक इमारतीही दिसत आहेत. प्रथम हे मृगजळ असावे असे मला वाटते पण त्या इमारती तशाच दिसत राहतात व त्या प्रत्यक्ष असल्याची खात्री पटते आहे. आमच्या गाईडच्या माहितीप्रमाणे या इमारतींना विगाकोट अतिथी गृह Vigokot guest house या नावाने ओळखतात. विगाकोट ही जागा आता आम्हाला हे स्पष्टपणे दर्शवते आहे की आम्ही रण ओलांडले आहे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही आता सिंधमध्ये आहोत.
विगाकोट या स्थानावर 200 वर्षे पूर्वीपर्यंत एक भुईकोट किल्ला होता व या किल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. मला तर कोठे काही अवशेष दिसले नाहीत, परंतु तो भाग अलाहिदा. येथे एका स्थानिक राजाचे संस्थान 1819 मधील भयानक भूकंपापर्यंत होते. परंतु या भूकंपात हा किल्ला व गाव हे सर्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि या गावाचा एकुलता एक जलस्रोत असलेली व गावाजवळून वाहणारी एक छोटेखानी नदीही आटली. त्यामुळे येथील वस्ती 1819 नंतर बहुधा उत्तरेकडे सरकली असावी.
विगाकोट अतिथी गृहापाशी आमची बस अजूनही थांबलेलीच आहे कारण अजूनही समोर दिसणार्या सीमा सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवरून आम्हाला स्पष्ट असा कोणताच संदेश मिळालेला नाही. कदाचित आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असावे. अखेरीस आम्हाला हिरवा दिवा मिळतो व आमची बस तेथून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका तारेच्या कुंपणापाशी जाऊन थांबते. मी खाली उतरतो व चालत जाऊन या तारेच्या कुंपणापाशी उभा राहतो. मी आता भारताच्या आंतर्राष्ट्रीय सीमेपाशी पोचलो आहे. या कुंपणापासून साधारण 150 मीटरवर ही आंतराष्ट्रीय सीमा आहे व त्या पलीकडे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाखालील भूभाग सुरू होतो आहे. प्रत्यक्ष सीमा रेषेवर दर 40 मीटर अंतरावर साडेचार फूट उंचीचे व पांढर्या रंगाने रंगवलेले खांब दिसत आहेत. या खांबांवर आमच्या बाजूला इंडिया व विरुद्ध बाजूस पाकिस्तान अशी अक्षरे कोरलेली आहेत. मात्र पाकिस्तानच्या बाजूला पुढे कोणतेही काटेरी कुंपण घातलेले नाही. भारताच्या बाजूने तिकडे कोणी घुसखोरी करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला बहुधा अशा कुंपणाची गरज भासत नसावी. आमच्या बरोबर सीमा सुरक्षा दलाचे हवालदार राणा आहेत. ते आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात. पलीकडे पाकिस्तानने उभारलेले निरीक्षण मनोरे ते आम्हाला दाखवतात. या क्षणाला पाकिस्तानमधील कोणीतरी आमच्या कडे बघतो आहे आणि आम्ही कशासाठी येथे आलो आहोत? असे आश्चर्य मनात व्यक्त करतो आहे ही कल्पनाच मला मोठी थ्रिलिंग वाटते आहे. आमच्या बसमध्ये भारताच्या कानाकोपर्यातून आलेले स्त्री पुरुष आहेत परंतु या क्षणी सीमेवर उभे असताना ते एकच आहेत आणि फक्त भारतीय आहेत हे सर्वांच्या चेहर्यावरून मला स्पष्ट दिसते आहे.
या स्थानाच्या साधारण 5 किमी उत्तरेला कांजरकोट नावाच्या किल्ल्याचे भग्नावशेष आहेत. हा किल्ला विगाकोट येथील संस्थानिकाच्या भावाच्या मालकीचा होता व तेथे सन 1819 पर्यंत त्याचे संस्थान होते. कांजरकोट किल्ला व गाव हे दोन्ही विगाकोट प्रमाणेच भूकंपात संपूर्णपणे नष्ट झाले होते. कांजरकोटच्या आणखी काही किमी उत्तरेला, रहिमकी बझार हे गाव लागते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हा सर्व भाग आणि रहिमकी बझार गाव हे कच्छ्च्या राजाच्या अधिपत्याखालील भाग होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याने कच्छच्या या अधिपत्याबद्दल आपत्ती उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि हा भाग सिंधमध्ये मोडत असल्याने आपल्या सार्वभौमत्त्वाखालील आहे असा दावा भारताकडे केला.
आम्ही उभे असलेल्या स्थानी 1965 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते अशी माहिती हवालदार राणा आम्हाला देतात. येथे पाकिस्तानने हल्ला करून सीमा सुरक्षा दलाच्या 6 जवानांना शहीद केले होते. या जवानांच्या रक्ताने पुनीत झालेल्या भूमीवर मला काही क्षण का होईना स्तब्ध उभे राहण्याचे भाग्य लाभते आहे यासाठी मी मनोमन सीमा सुरक्षा दलाचा ऋणी आहे. त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान यांच्या मध्यस्तीने नंतर येथे युद्धबंदी झाली व एक आंतर्राष्ट्रीय लवाद नेमला गेला. या लवादाच्या निर्णयाप्रमाणे कांजरकोट आणि रहिमकी बझार पाकिस्तानला देण्यात आले व विगाकोट भारतात राहिले. पण या सगळ्या घटनांना 47/48 वर्षे लोटली आहेत. आता ही सीमा पूर्णपणे शांत व सुरक्षित आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून येथे आता काटेरी तारेचे तिहेरी कुंपण घातलेले आहे. माझ्या बायनॉक्युलर मधून पाकिस्तानमधील प्रदेशाचे निरीक्षण करण्यात मी आणखी काही मिनिटे घालवतो. परंतु आता परत जाण्याची वेळ आली आहे व थोड्या जड पावलांनीच आम्ही बसमध्ये चढतो व बस परत एकदा विगाकोट अतिथी गृहाशी पोचते. येथे आमच्यासाठी एका शामियान्यात उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या नंतर मी गेस्ट हाऊसच्या गच्चीवरून परत एकदा बायनॉक्युलर्सच्या सहाय्याने पाकिस्तानचा भूप्रदेश न्याहाळतो. मी उंचीवर असल्याने मला आता दिसते आहे की सीमेपार असलेल्या भूभागावर एक छोटीशी टेकडी सीमेच्या समांतर पश्चिमेकडे पसरलेली दिसते आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला मी या टेकडी बद्दल विचारतो व तेथे टेकडी आहे हे पक्के होते. माझ्या मनात ही टेकडी म्हणजे 1819 च्या भूकंपात तयार झालेली अल्ला बंड ही टेकडी असली पाहिजे असा विचार येतो आहे. या अल्ला बंडमुळेच ज्या नदीला सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख असे नाव मिळालेले होते त्या कोरी नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन तिच्या नदीपात्राचे, दलदलीच्या प्रदेशात रूपांतर झालेले होते. मात्र खरे खोटे सांगणे खूप कठीण असल्याने मी जास्त विचार करणे सोडून देतो. परंतु येथे दिसत असलेली टेकडी अल्ला बंड असण्याची शक्यता माझ्या मनाला वाटते आहे हे नक्की.
दुपारच्या भोजनानंतर आमची बस परत एकदा रण ओलांडून खावडा गावाकडे जाण्यास निघते. वर तळपणार्या सूर्याच्या प्रखर उन्हात आता प्रवास करावयाचा आहे ही कल्पनाही मला नकोशी वाटते. परंतु बस चालक वातानुकूलन यंत्र चालू करतो आणि त्या सुखद गारव्यात सर्वांचेच डोळे मिटतात. धर्मशाळा चेक पोस्ट पाशी गरम गरम चहाची व्यवस्था आहे. तो घेऊन खावडा मध्ये आम्ही पोचतो आहोत तोपर्यंत दुपारचे 4 वाजून गेले आहेत. रणाला दिलेली भेट जरी संपली असली तरी एक प्रमुख आकर्षण अजून बघायचे राहिले आहे. आमचा गाईड जेंव्हा आता आपण कालो डुंगर किंवा Black hillकडे आता जाणार आहोत याची घोषणा करतो तेंव्हा मी जरा साशंकतेनेच त्याला तिथे काय आहे असे विचारतो. परंतु तिथे एक मंदिर आहे एवढीच माहिती मला मिळते. बस साधारण पूर्वेकडे जाणार्या एका रस्त्याकडे वळते. पुढचे 10 ते 15 किमी रस्ता असंख्य चढउतारांचा आहे. मात्र बाहेर दिसणारा आसमंत मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिसतो आहे. बाजूला दिसणार्या टेकड्या व दर्या या एकावर एक फरशा रचून तयार केल्या आहेत की काय असे दृष्य बाहेर दिसते आहे. 2001 च्या भूकंपात या दर्याखोर्यांमधे प्रचंड पडझड झालेली आहे व ती अजूनही अर्थात तशीच आहे. वाटेत एक टेकडी चुंबकीय टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. बसमध्ये मला तरी फारसे काही विशेष जाणवत नाही. बस वर पोचते व मुद्दाम तयार केलेल्या वाहन तळावर उभी राहते. आता येथून पुढे निदान अर्ध्या ते पाऊण किलोमीटर लांबीचा अगदी खड्या चढाचा रस्ता समोर दिसतो आहे. बसमधले बरेच जण गारठतात. मी नेटाने पुढे जाण्याचे ठरवतो. पहिल्या लागणार्या शिखरावर एक देऊळ आहे त्याच्याकडे मी फक्त एक दृष्टीक्षेप टाकतो व पुढे आणखी उंचावरील शिखराकडे चालू लागतो. या शिखरावर आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी एक निरीक्षण चौथरा उभारलेला आहे.
या निरीक्षण चौथर्यावरून दिसणारे दृष्य मात्र इतके अप्रतिम आहे की वर येण्यासाठी घेतलेले कष्ट मी केंव्हाच विसरलो आहे. माझ्या अगदी डावीकडे अगदी पार क्षितिजापर्यंत धवल मरूभूमी पसरलेली मला दिसते आहे. त्याच्या एका कडेला थोडी मिठागरे आहेत. समोरच खावडा व कुवर बेट मार्गे पाकिस्तानातील सिंध प्रांत यांना जोडणारा इंडिया ब्रिज व त्याच्या मागे कुवर बेट दिसते आहे. इंडिया ब्रिजच्या उजवीकडे दिसते आहे अथांग रण. मात्र या उंचीवरून रणाचा हा भाग वैराण मरूभूमी दिसत नसून निळसर ग्रे रंगाचा एक अथांग सागर वाटतो आहे. या सागराच्या किनार्यावरील कडा खर्या समुद्रकाठी लाटांच्या फेसामुळे दिसतात तशा पांढर्याशुभ्र दिसत आहेत. मात्र येथे त्या तशा साचलेल्या मिठामुळे दिसत आहेत. या जागेवरून रण हे एखाद्या समुद्राच्या खाडीसारखे दिसते आहे. कोण्या जादूगाराने करावा तसा हा प्राकृतिक दृष्टी विभ्रम निसर्ग मला दाखवतो आहे.
नंतर तिन्हीसांजाच्या सुमारास मी कॅम्पवर परत पोचतो, गुजराथी जेवणाचा आस्वाद घेऊन आणखी एक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम डोळे मिटू लागेपर्यंत बघतो. परंतु अंथरुणावर पडल्यावर मला निद्राधीन होण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. रण, भारतीय सीमा आणि कालो डुंगरच्या माथ्यावरून दिसणारे अशक्यप्राय दृष्य हे सर्व माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हायलाच तयार नाहीत.
उद्या मी परत भूजकडे जाण्यासाठी निघणार.
शुक्रवार
मी आज सकाळी जरा लवकरच तयार झालो आहे. भोजन कक्षात जाऊन मी चटकन न्याहरी उरकतो व भारताच्या एका दुर्लक्षित कोपर्यामधे स्थापन केलेल्या या विस्मयकारक कॅम्पला अलविदा म्हणतो. अतिशय आरामदायी व्यवस्था आणि कॅम्प व्यवस्थापनाने दाखवलेले उत्तम आतिथ्य यामुळे गेले 3 दिवस इतक्या पटकन संपले आहेत की विश्वास बसणेही कठीण होते आहे. बिनचूक प्लॅनिंग आणि त्याच बरोबर कमालीची कार्यक्षमता यामुळे कॅम्प व्यवस्थापनाला मला मनापासून दाद द्याविशी वाटते आहे. आमची बस कॅम्प सोडते व काही वेळातच परत एकदा भिरंडीयारनी गावात थांबते. या गावातला थांबा हा पूर्वीच्या मुंबई–पुणे रस्त्याला जसा खोपोलीचा थांबा अनिवार्य असे तसाच बहुधा इथल्या वाहन चालकांना वाटत असावा. परंतु या खेपेस मात्र मी बसमधून खाली उतरतो व दुधापासून बनवलेला इथला प्रसिद्ध मावा खरेदी करतो. भूजमध्ये मी पोचतो तेंव्हा सकाळचे 11 वाजले आहेत आणि हॉटेलमध्ये चेक इन करायला मला काहीच अडचण नाही. आजचा दिवस मी या पुरातन शहरामध्ये साइट सीइंग करण्यात घालवायचा असे ठरवले आहे. या शहराचे भूज हे नाव येथे जवळच असलेल्या 160 मीटर उंचीच्या भुजियो डुंगर किंवा Serpant Hill या नावाने ओळखल्या जाणार्या पर्वतामुळे पडले आहे. सर्पांचा राजा भुजंग याचे हे वसतीस्थान होते अशी एक आख्यायिका आहे व त्यामुळे या पर्वतावर भुजंगाचे एक मंदीर सुद्धा आहे.
8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत कच्छ्वर सिंध मधील सामा या राजपूत घराण्याची सत्ता होती. हा काळ सिंधच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्याबद्दल लिहून ठेवावे असा सुवर्णकाल होता असा समज आहे. या नंतर या राजांची सत्ता कमजोर पडत गेली. राजघराण्याच्या अंतर्गत अनेक कट कारस्थाने व हत्या घडवल्या गेल्या आणि अखेरीस या सामा राजपुतांचे वंशज असलेलेच लाखो जडेजा घराणे सत्तेवर आले. तेंव्हापासून हे घराणे जडेजा राजपूत या नावाने ओळखले जाते. या राजांनी सिंधमधून कच्छ्चा राज्यकारभार न चालवता तो कच्छ मधील अंजर गावातून चालवण्यास सुरुवात केली. कच्छच्या भौगोलिक मध्यावर भूज गाव येत असल्याने त्याचे महत्त्व ओळखून इ.स.1549 मध्ये खेंगराज 1 या राजाने आपली राजधानी भूजला हलवली आणि कच्छची भूज ही राजधानी अस्तित्वात आली.
प्रथम मोगल काळात व नंतर ब्रिटिश राजवटीत, जडेजा राजे बर्याच प्रमाणात आपले स्वतंत्र सार्वभौमत्त्व राखण्यात यशस्वी ठरल्याने भूज शहराला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व राखून ठेवता आले आहे. 18 व्या शतकात गादीवर आलेल्या लखपतजी 1 यांच्यापासून पुढे गादीवर आलेल्या सर्व जडेजा राजांनी भूजमध्ये नवे नवे महाल बांधले आणि शहर शोभिवंत करण्याकडे लक्ष बरेच केंद्रित केले. परंतु दर काही दशकांनंतर होत गेलेल्या महाभयंकर भूकंपांमुळे कच्छ्मध्ये बांधल्या गेलेल्या जवळपास सर्व इमारती जमीनदोस्त होत राहिल्या व जडेजा राजांनी बांधलेले महाल सुद्धा याला अपवाद ठरू शकले नाहीत. या भूकंप मालिकेपैकी सर्वात भयावह भूकंप 16 जून 1819 या दिवशी झाला. यानंतर 1844-45, 1864 आणि शेवटी 2001 मध्ये असेच जबरदस्त भूकंपाचे झटके भूजला बसले. या भूकंपांमध्ये कच्छ मधील जवळपास सर्वच जुन्या इमारती जमीन सपाट झालेल्या आहेत.
ऐना महल
भूजच्या साधारण मध्यभागात असलेल्या हमिसर तलावाच्या चहूबाजूंना भूजमधील बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बांधलेली/ बनवली गेलेली असल्याने भूज मधील पर्यटन हे फारशा प्रयासांविना पर्यटकांना करता येते. मागच्या वर्षी हा तलाव तुडूंब भरून वहात होता म्हणे! परंतु या वर्षी पाऊसच न पडल्याने तलावात पाणीच नाहीये. तलावाभोवतीची प्रेक्षणीय स्थळे बघण्याआधी मी प्रथम पेटपूजा करण्याचे ठरवतो व बस स्टॅन्ड जवळील एका बर्या दिसणार्या हॉटेलात जाऊन कच्छी पावभाजीची ऑर्डर देतो. चमचमीत पावभाजीच्या भोजनानंतर भूजमधील साइट सीइंग, हमिसर तलावाच्या काठावर असलेल्या ऐना महालापासून सुरू करावे असे ठरवून एक रिक्षा ठरवतो. भूजमधील रिक्षा मात्र अत्यंत त्रासदायक वाटतात. एकतर बसण्यासाठी असलेल्या सीट्स आरामदायक अजिबातच नाहीत व पळताना त्या आवाजही प्रचंड प्रमाणात करत राहतात. ऐना महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचल्यानंतर मात्र माझी मोठी निराशा होते. ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने ऐना महालाचे दरवाजे बंद असल्याचे मला दिसते आहे.
1750 मध्ये राव लखपतजी यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या साठी त्यांनी आधीच्या वर्षांत रामसिंघ मालम या कारागिराला आरसे बनवणे आणि धातू काम यांचे विशेष शिक्षण घेण्यासाठी युरोपला पाठवले होते. होते. तो परत आल्यावर त्याने या महालाचे काम व्हेनिसहून काचा मागवून पूर्ण केले होते. या दुमजली इमारतीत दरबार हॉल, आरसे महाल आणि राजपरिवारासाठी कक्ष बनवण्यात आले होते. संगमरवरी फरशांनी आच्छादलेल्या भिंती व त्यावर सोन्याचे पाणी चढवलेल्या पत्र्याच्या कोंदणांत बसवलेले आरसे हे या महालाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्याचप्रमाणे तळाच्या थोड्या वर असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर बसवलेली कारंजी हे ही या महालाची एक खासियत आहे. हा महाल रामसिंघ मालम याच्या कारागिरीची कमाल मानली जाते. 18व्या शतकाच्या मध्यावर बांधलेला व युरोपियन छाप असलेल्या भारतीय स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या महालाचे नेहमीच नाव घेतले जाते.
ऐना महालाच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम
प्रागजी महाल
ऐना महालाच्या अगदी बाजूलाच हा महाल आहे. 1838-76 या कालात कच्छच्या गादीवर असलेले राव प्रागमलजी दुसरे यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या महालाचे डिझाइन एक सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद कर्नल हेनरी सेंट विल्किन्स यांनी केलेले होते. याच काळात बांधल्या गेलेल्या पुण्यातील डेक्कन कॉलेज, ससून हॉस्पिटल आणि ओहेल डेव्हिड सिनेगॉग (लाल देऊळ) या सारख्या इमारतींचे आराखडे याच वास्तुविशारदांनी केलेले असल्याने हा महाल मला अगदी सुपरिचित असल्या सारखाच भासतो आहे. हा महाल बांधण्यासाठी 10 वर्षे लागली व अंदाजे 20 लाख रुपये एवढा खर्च आला होता. मला मात्र हा महाल, मुंबईच्या फोर्ट विभागात असलेला राजाभाई टॉवर व त्या शेजारील मुंबई विद्यापीठाची मुख्य इमारत, या दोन्ही सारखाच हुबेहुब वाटतो आहे व त्यामुळे त्याची खास अशी छाप माझ्यावर पडू शकत नाहीये. या महालाच्या व्हरांड्यातील आधार स्तंभ आणि त्यावरील कॉर्निस हे भाग सुद्धा मला ओळखीचेच भासत आहेत. हा महाल सुदैवाने प्रवेश करण्यास आज खुला आहे. मी प्रवेश पत्रिका विकत घेतो व आत पाऊल टाकतो.
ब्रिटिश काळात भारतात असलेल्या अनेक छोट्या छोट्या संस्थानिकांचे जसे महाल होते साधारण त्याच धर्तीवर असलेल्या या महालामधे आता एक संग्रहालय बनवण्यात आलेले आहे. त्या कालातील फर्निचर, राजपरिवारातील व्यक्तींच्या वापरातील वस्तू, तैलचित्रे, भांडीकुंडी, शिकारीत मारलेल्या प्राण्यांची पेंढा भरलेली डोकी, बंदुका आणि राजपुत्र व राजकन्या यांची खेळणी या सारख्या गोष्टी येथे मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. राव प्रागमलजी यांच्या दरबार हॉलचे नूतनीकरण चालू असल्यामुळे तो हॉल बंदच आहे. या संग्रहालयातील वस्तूंपैकी मला सर्वात काय आवडले असेल तर राजा रविवर्मा यांनी चित्रित केलेल्या चित्रांच्या छापील प्रतींची एक फ्रेम करून ठेवलेली मालिका. या फ्रेम्समध्ये या चित्रांमधील व्यक्तींच्या, विशेषेकरून स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रांचे पदर किंवा काठ यावर बारीक चमचम करणारे खडे चिकटवले आहेत व त्यामुळे या चित्रांचे मूळ सौंदर्य मोठे खुलून दिसते आहे.
या प्रासादाच्या गच्चीवरून मला जवळचा असलेला पण संपूर्णपणे आटलेला हमिसर तलाव दिसतो आहे. त्याच प्रमाणे पलीकडेच असलेला रामकुंड हा पाणी तलाव ही कोरडा ठणठणीत दिसतो आहे. महालाच्या पुढच्या पोर्चपाशी एक चाकांवर बसवलेली तोफ ठेवलेली आहे. तिचा वापर कधी झाला असेल असे वाटत नाही. ही तोफ़ बहुधा एक शो पीस म्हणूनच ठेवलेली असावी. या महालाच्या समोर असलेल्या राणी महालाची 2001 मधील भूकंपात अपरिमित हानी झालेली असल्याने प्रागजी महालाचा संपूर्ण परिसर हा पडझड झालेल्या अवस्थेत दिसतो आहे. समोर दिसणारी तोफ या पडझडीची एकुलती एक मूक साक्षीदार असावी असे माझ्या मनाला वाटत राहिले आहे.
रामकुंड
या राणी महालाची एवढी हानी भूकंपामध्ये झालेली आहे की यात प्रवेश करणेही धोकादायक समजले जाते आहे. या राणी महालाचे स्थापत्य मात्र अप्रतिम आहे यात शंकाच नाही. गवाक्षे आणि द्वारे यांच्या बाहेर असलेल्या षटकोनी आकाराच्या बाल्कनी व त्यावर बसवलेल्या आणि कोरीव काम करून तयार केलेल्या जाळ्या, दरवाज्यांबाहेरील चौकटी या अतिशय सुंदर रितीने बनवल्या गेलेल्या आहेत. राणी महालाच्या स्थापत्याचे बाहेरून कौतुक करण्याशिवाय बाकी काहीच करणे शक्य नसल्याने मी तेथे काही मिनिटे घालवतो व कच्छ संग्रहालयाकडे जाण्यास निघतो.
महाराव खेंगरजी तिसरे यांनी सन 1877 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली होती. जुन्या काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये दाखवणारे नमुने, कच्छमधील हस्तकलांचे नमुने याचा मोठा संग्रह येथे आहे. परंतु ईदची सुट्टी असल्याने हे संग्रहालयही बंदच आहे. मला संग्रहालयाची बंद दारे बघूनच समाधान मानणे आवश्यक आहे.
राणी महाल
हातात भरपूर वेळ असल्याने जवळच असलेल्या स्वामी नारायण मंदीराला भेट देण्याचे मी ठरवतो. हे देऊळ म्हणजे झगमग करणार्या भव्य आधुनिक स्थापत्याचा एक नमुना आहे. या भव्य देवळाच्या वास्तूमधील स्तंभ आणि भिंती यावर संपूर्णपणे संगमरवर पाषाणाच्या फरशा बसवलेल्या असल्याने देऊळ संगमरवरातून बनवले असल्याचा भास होतो आहे. स्तंभ आणि बाहेरील भिंती यावर फुल रिलिफ प्रकारच्या अक्षरशः हजारोंच्या संख्येने मूर्ती–शिल्पे बसवलेली आहेत. ही शिल्पे मला छापलेल्या चित्रांप्रमाणे असावी अशी किंवा अगदी एकसारखी दिसणारी, वाटतात. शिल्पातील मूर्तींचे ओठ व कपाळावरील टिळा हा लाल रंगात रंगवलेला पाहून मात्र मला गंमत वाटते आहे. या देवळात भाविकांची नुसती झुंबड उडालेली आहे.
स्वामीनारायण मंदीराला भेट देऊन मी जवळच असलेल्या छटर्डी या ठिकाणाजवळ रिक्षा उभी करण्यास सांगतो. छटर्डी म्हणजे छत्र्या. पुण्याला शिंद्याची छत्री या नावाने प्रसिद्ध असलेली महादजी शिंद्यांची समाधी आहे. त्याच धर्तीवर कच्छ्च्या राजांच्या येथे छत्र्या किंवा समाध्या आहेत. यापैकी बहुतेक छत्र्या 2001 च्या भूकंपात पूर्णपणे कोसळल्या व आता त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुरू आहे. या छत्र्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून आत जाण्यास बहुधा मज्जाव केलेला आहे. मी दुरूनच या छत्र्या बघतो व काही छायाचित्रे काढतो. या छत्र्यांवर मूळ स्वरूपात अतिशय उत्तम शिल्पे कोरलेली होती याच्या खुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत.
छटर्डी
हॉटेलवर परतण्याच्या आधी भूजमधील मुख्य बाजारपेठेमध्ये मी थोडा वेळ घालवतो व काही खरेदी करतो. नंतर हॉटेलवर व्यवस्थित भोजन घेऊन मी निद्रेची आराधना जरा लवकरच करण्याचे ठरवतो. भूजपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या एका स्थानी मला उद्या जायचे आहे. हे ठिकाण, सुमारे 4000 वर्षांपूर्वी 20000 रहिवासी रहात असलेले व अत्यंत भरभराटीस आलेले व श्रीमंत असे बंदर व शहर होते. अर्थात आता तेथे फक्त भग्नावशेष उरलेले आहेत.
शनिवार
कच्छ्च्या रणाच्या साधारण मध्यभागी 313 चौरस किमी क्षेत्रफळाचे एक बेट आहे. या बेटाला खादिर बेट या नावाने ओळखले जाते. मी गुरुवारी भेट दिलेला व रणाच्या दक्षिण किनार्यालगत खड्या असलेल्या कालो डुंगर किंवा Black hill या नावाने परिचित असलेल्या पर्वतरांगांच्या साधारण पूर्वेला हे बेट येते. कालो डुंगर नजिकचा किनारा व खादिर बेट यामधील सरळ रेषेचे अंतर 25 किमी पेक्षा कमीच भरेल. परंतु या दोन्हींना जोडणारा कोणताच रस्ता अस्तित्वात नाही. गुजरात सरकारने काही काळापूर्वी या दोन्हींना जोडणारा रस्ता व पूल बांधण्याची तयारी केली होती. परंतु मध्यवर्ती सरकारने नेमलेल्या एका तज्ञांच्या समितीने असा रस्ता व पूल बांधण्याची कल्पना रणाच्या पर्यावरणास अत्यंत घातक ठरेल असे मत व्यक्त केल्याने हा प्रकल्प गुजरात सरकारला बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले.
मी आज भेट देऊ इच्छित असलेले स्थान, धोलाविरा, हे या खादिर बेटाच्या पश्चिम टोकावर असलेली एक छोटी वस्ती आहे. परंतु सरळ रस्ता नसल्याने मला रणाच्या काठाने जाऊन या बेटाच्या पूर्व टोकाकडून या बेटावर प्रवेश घेणे गरजेचे आहे. या बाजूने खादिर बेटावर येण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्याने भूज आणि धोलाविरा यामधे पडणारे 250 किमी अंतर लक्षात घेऊन सकाळी शक्य तितक्या लवकर भूजहून प्रयाण करण्याचा माझा बेत फारसा यशस्वी होत नाही व मी हायवे 42 वर प्रवेश करतो तेंव्हा घड्याळात सकाळचे पावणेआठ वाजून गेल्याचे माझ्या लक्षात येते आहे. आहे. भूजच्या सीमेच्या बाहेर पडल्याबरोबर उजव्या हाताला मला भुजंगिया डुंगर किंवा Hill of the serpent व त्यावर असलेल्या भारदस्त किल्याची मजबूत तटबंदी दिसते आहे. हायवे 42 मात्र मोठ्या सुस्थितीत राखलेला दिसतो आहे. मात्र इतक्या ठिकाणी या रस्त्यावर पुराचे पाणी येऊ नये म्हणून सांडवे बांधण्याचे काम चालू आहे की त्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डायव्हर्शन्स वरून गाडी न्यावी लागत असल्याने दर काही मिनिटांनी गाडीची गती अगदी हळू होते आहे. या हायवेच्या भूज ते भचाउ या संपूर्ण टप्यावर रस्त्याच्या उजव्या हाताला मोठमोठे उद्योग धंदे उभे राहताना दिसत आहेत. गाडीच्या ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व विकास गेल्या 10 वर्षात झालेला आहे व त्याच्या आधी ही सर्व जमीन वैराण व ओसाड स्वरूपात होती. सकाळचे सव्वादहा वाजलेले असताना आम्ही सामखियाली गावाजवळ पोचतो आहोत व नंतर चित्रोड या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता 15 वर वळतो आहोत. चित्रोड जवळ हा रस्ता सोडून आम्ही रापर गावावरून पुढे जाणार्या हायवे 51 वर वळतो. .वन प्रदेशातून जाणारा हा संपूर्ण रस्ता सुद्धा अतिशय सुस्थितीत आहे. हा वन विभाग सुद्धा कच्छ्मध्ये इतरत्र ठिकाणी दिसणार्या वनांसारखाच आहे. कोरडी जमीन, त्यावर वाळलेले गवत आणि बाभूळ व विलायती बाभूळ यांची झाडे झुडपे हेच दृष्य सगळीकडे दिसते आहे. मात्र सर्वत्र दुभत्या जनावरांचे मोठे कळप चरताना दिसत आहेत. रापर नंतर देसालपार, बालासार आणि लोडराणी या खेड्यांमधून हा रस्ता जातो व अखेरीस पश्चिमेकडे वळतो. लोडराणी खेड्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर मला नाकासमोर जाणारा एक लांब पूल समोर दिसतो आहे. व हा पूल परत जमीन लागेपर्यंत धवल मरुभूमीमधून जाणार आहे हेही लक्षात येते आहे.
आमची गाडी पुलावरून जाऊ लागल्यानंतर दोन्ही बाजूकडील परिसराचे गाडीच्या काचेतून मला दिसणारे दृष्य, थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वप्नातील दृष्याप्रमाणे अवर्णनीय आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसते आहे ती पार क्षितिजाला जाऊन पोचणारी धवलता. माझे दिशा ज्ञान आता हरवल्यासारखेच झाले आहे कारण डोळ्यासमोर दिसणारा डांबरी रस्ता सोडला तर सर्व दिशांना शुभ्र धवलतेशिवाय दुसरे काही दिसतच नाहीये. या धवलतेच्या वर आहे निळे स्वच्छ आकाश आणि तळपणारा सूर्य. अशा भ्रामक वातावरणात आम्ही बरीच मिनिटे घालवतो व अखेरीस पूल संपतो व आमची गाडी खादिर बेटावर पोचते आहे. रणातील इतर बेटांप्रमाणे हे बेट निर्मनुष्य नसून येथे छोटी छोटी बरीच खेडेगावे आहेत. रस्त्याने जाता जाता अमरपूर, गणेशपूर, बांबिनिका व अखेरीस जनान या गावांच्या पाट्या मला दिसतात. जनान मध्ये सीमा सुरक्षा दलाची एक चौकी आहे. येथून आम्ही पुढे जातो आणि मला समोर एक प्रशस्त असा वाहनतळ आणि ‘धोलाविरा पुरातत्त्व संग्रहालय असा मोठा नामफलक दिसू लागतो. मी घड्याळाकडे बघतो. दुपारचे सव्वाबारा झाले आहेत आणि आम्ही गुजरात शासनाने बनवलेल्या प्रशस्त व आरामदायी रस्त्याच्या कृपेने धोलाविराला अगदी वेळेत पोहोचतो आहोत.
बर्याच वाचकांना असा प्रश्न पडला असण्याची शक्यता आहे की भारताच्या पश्चिम सीमेजवळच्या एका कोपर्यातल्या स्थानावर असलेल्या व कोणत्याही मोठ्या शहर किंवा गावापासून दूरवर असलेल्या या खादिर बेटावर येण्यासाठी एवढी धडपड करून येण्याचा मी का प्रयत्न करतो आहे? अर्थातच यामागे एक कारण आहे. पुरातत्त्व विभागाचे संचालक श्री जगत पती जोशी यांनी 1967-68 मध्ये शोधून काढलेल्या व 1990 ते 2005 एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये दरवर्षी या जागी श्री आर. एस. बिश्त यांच्या नेतृत्त्वाखाली केले गेलेल्या उत्खननामुळे, भारताच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्या व परकीयांच्या मनात असलेले अनेक गैरसमज आणि भ्रम, निखालस खोटे असल्याचे आढळून आले आहे आणि त्या कालखंडामधील भारतीय द्वीपकल्पामधे सत्य परिस्थिती काय होती याची बर्यापैकी कल्पना या उत्खननामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकली आहे. त्यामुळे या जागेला मला भेट द्यायचीच आहे.
धोलाविरा संग्रहालयाजवळ मी थोडी चौकशी करतो व पुढच्या 2 तासासाठी श्री रावजीभाई यांना या पुरातन महानगरामध्ये फेरफटका करताना गाईड म्हणून घेण्याचे ठरवतो व त्यांच्या बरोबर, समोर दिसणार्या एका टेकडीवजा उंचवट्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात करतो.
या टेकाडाचा बराचसा भाग उत्खनन करून फोडलेला दिसतो आहे. प्रथम समोर दिसते आहे सध्या पूर्ण कोरडी ठणठणीत असलेली आणि ‘मनहर‘ हे नाव असलेली एक पावसाळी नदी. या नदीवर कधी काळी बांधलेल्या एका पुरातन बंधार्याचे दगड पात्रात पडलेले दिसत आहेत. रावजी भाई सांगतात की या टेकाडाच्या वायव्य कोपर्यालगत सुद्धा ‘मनसर‘ या नावाची आणखी एक अशीच पावसाळी नदी आहे. या दोन नद्यांतून, पावसाळ्यात वाहणार्या पाण्याचा पूर्णत: वापर करता येईल अशी व्यवस्था या नगरीमधील नियोजनकारांनी केली होती. या पुरातन नगरीत एके काळी 15000 ते 20000 नागरिक रहात असत त्यांना पिण्यासाठी व इतर उपयोगासाठी पुरेसे पाणी केवळ या दोन पावसाळी नद्यांमधून उपलब्ध होत होते. परंतु 1 किंवा 2 महिनेच उपलब्ध होत असलेले हे पाणी वर्षभराच्या उपयोगासाठी म्हणून साठवून ठेवण्याची अतिशय विस्मयकारक व्यवस्था धोलाविरामधील नियोजनकारांनी केली होती.
टेकडाच्या पुढे उजव्या हाताला प्रथम मला दिसतो आहे एक मोठा पाणी साठवण्याचा तलाव. या तलावाच्या एका बाजूच्या भिंतीच्या कडेने पायर्या खोदलेल्या दिसत आहेत. ‘मनहर‘ नदीचे पाणी प्रथम या तलावात वहात येत असे. या तलावालगत 11 ते 13 मीटर रुंदीची एक भिंत मला दिसते आहे. मातीच्या विटा व मातीचेच प्लॅस्टर वापरून बांधलेल्या या भिंतीला दोन्ही बाजूंनी दगड किंवा चिरे पृष्ठभागांवर बसवून त्यांना मजबूती आणलेली आहे. इजिप्त मधल्या पिरॅमिडच्या भिंतींना जसा ढाळ दिलेला दिसतो तसाच काहीसा ढाळ या भिंतीला आहे. या नगरीतील किल्ल्याला चहूबाजूंना असलेल्या चार भिंतींची मजबूत तटबंदी केलेली होती. रावजीभाई मला सांगतात की हे शहर अस्तित्वात होते त्या 1200 वर्षांच्या कालखंडात ( इ.स.पूर्व 2600 ते इ.स.पूर्व 1400) या तटांची उंची 3 किंवा 4 वेळा वाढवली गेलेली होती. किल्यामध्ये पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र हौद व एक विहीर होती. या विहीरीचे पाणी बैलाच्या सहाय्याने मोटेद्वारा उपसले जात असे. पाणी साठवण्याच्या किल्यामधील हौदांच्या तळाला मध्यभागी गाळ साठून रहावा व वरील पाणी स्वच्छ रहावे म्हणून चौरस आकाराची कुंडे तळाशी खोदलेली होती. होती.या कुंडात पाण्यातील गाळ व इतर जड कचरा साठून रहात असे व ठरावीक कालानंतर या कुंडांमधील गाळ साफ केला जात असे.
पूर्वेकडचे महाद्वार
धोलाविरा मधे पर्जन्य वृष्टीचे प्रमाण अतिशय स्वल्प असले तरी पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जाईल अशी परिपूर्ण व्यवस्था केलेली होती. या साठी तटाच्या भिंतींना उभे चर ठेवलेले होते व यातून खाली येणारे पाणी भाजलेल्या मातीच्या बनवलेल्या नळांतून आणून एका हौदामध्ये साठवले जात होते.
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेला चर
उत्तर महाद्वार
गुळगुळीत पॉलिश केलेला स्तंभाचा तळातील दगड
स्टेडियमच्या बाजूस प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायर्या
किल्यामधील विहीर
किल्यावरून पश्चिमेच्या बाजूस दिसणारी धवल मरूभूमी
धोलाविरा किल्यामध्ये पाणी पुरवठा वर्षभर सुरळीतपणे व्हावा या साठी केलेल्या योजनेच्या कांकणभर सरस अशी योजना, किल्यातील सांडपाणी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी धोलाविराच्या नियोजनकारांनी केली होती. किल्यामध्ये असलेल्या महालांमधील खोल्यांच्या कोपर्यांतून, भाजलेल्या मातीतून बनवलेले सांडपाण्याचे नळ भिंतींच्या तळाना बसवलेले होते. या नळांतून वाहत जाणारे पाणी मुख्य सांडपाण्याच्या वाहिनीला जोडलेले होते. जमिनीखालून जाणार्या या सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये हवा अडकून पाण्याचा प्रवाह बंद होऊ नये यासाठी जमिनीवर उच्छ्वास बांधलेले होते. सांडपाणी नंतर पश्चिमेला, शहरापासून जवळच असलेल्या समुद्रात ( सध्या तेथे धवल मरूभूमी आहे) सोडले जात असे. प्रत्येक खोलीच्या कोपर्यात वापरलेले पाणी फेकून न देता साठवण्यासाठी ते मातीच्या मोठ्या कुंभांत साठवून ठेवण्याची प्रथा होती असे दिसते.
किल्याच्या पश्चिम तटबंदीच्या बाहेर सेवकवर्गाची निवासस्थाने आणि धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे हौद बांधलेले होते. त्याच्या पलीकडे आणखी अनेक पाणी साठवण्याचे तलाव बांधलेले होते. किल्याच्या पूर्व, उत्तर आणि पश्चिम तटबंदीमध्ये प्रवेशद्वारे बांधलेली होती. या द्वारांजवळ 1 किंवा 2 देवड्या बर्याच उंचीवर बांधलेल्या आढळून आलेल्या आहेत. कदाचित उंटांवर बसण्यासाठी चढ उतार या देवड्यांमधून केली जात असावी. देवडीला 3 बाजूंना भिंती बांधलेल्या होत्या व आता येण्याच्या मार्गाजवळच्या बाजूला दगडी गोलाकार स्तंभ उभारून छताला आधार दिलेला होती. हे गोलाकार स्तंभ एकमेकात अड्कवले जातील अशा छोटे गोलाकार आकाराचे चिरे एकावर एक ठेवून बनवलेले होते व हे गोलाकार तुकडे आजही इतस्ततः पडलेले दिसू शकतात. किल्याच्या मध्यभागी असलेल्या मार्गाचे, पॉलिश केलेल्या सॅन्डस्टोनचे व 4 फूट उंचीचे असे स्तंभ जमिनीवर उभे करून 3 भागात वर्गीकरण केलेले होते. उत्तर द्वाराजवळच्या एका देवडीत, पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना, सिंधू संस्कृतीतील चिन्ह लिपी मध्ये लिहिलेला आणि 15 इंच उंच असलेली चिन्हे असलेला एक मोठा नामफलक सापडला होती. 3 मीटर लांबीचा हा फलक लाकडी होता व त्यावर जिप्सम या खनिजातून कोरलेली 10 चिन्हे बसवून हा नामफलक बहुधा द्वारावर उभा केलेला असावा. हे शहर नष्ट झाल्यावर हा फलक बहुधा तसाच देवडीमध्ये पडून राहिल्यामुळे त्याचे लाकूड कुजून नष्ट झाले व फक्त जिप्समची चिन्हे खालच्या पाषाणावर चिकटून राहिल्याने टिकली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मताने या नामफलकावर या शहराचे नाव बाहेरगावांहून येणार्या प्रवाशांना वाचता यावे म्हणून मोठ्या आकारात लिहिलेले होते.
उत्तर द्वाराबाहेर 10000 प्रेक्षक बसू शकतील असे एक मोठे स्टेडियम बांधलेले होते. हे स्टेडियम सांस्कृतिक किंवा औपचारिक समारंभ आणि आठवड्याचा बाजार या सारख्या प्रसंगी बहुधा वापरले जात असावे, धोलाविरा हे बंदर असल्याने तेथे कोणते जहाज माल घेऊन आले की त्यावरील मालाची खरेदी विक्री सुद्धा या स्टेडियम मध्ये केली जात असल्याची शक्यता वाटते. रावजीभाई मला सांगतात की किल्यातील जिन्यांना 7, 15 आणि 30 पायर्या आहेत व त्यावर काही सांकेतीक वस्तू ठेवून ती बहुधा रोजा सकाळी हलवली जात असे. या सोप्या पद्धतीने आठवडा, पंधरवडा व महिना यांची कालगणना केली जात असे. येथे पूर्वी समुद्र होता याच्या स्पष्ट खुणा किल्याच्या भिंती बांधण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत त्यावर असलेल्या जीवाश्म खुणांवरून कळते. रावजीभाई मला शिंपल्यांच्या खुणा असलेला एक दगड दाखवतात.
पॉलिश केलेला दगडी स्तंभ
दगडी खांबाच्या तळातील खाचा घेतलेला दगड
किल्याची भेट आटोपून मी आता जवळच असलेल्या संग्रहालयाला भेट देतो आहे. येथे सापडलेली भाजलेल्या मातीची पात्रे, हत्यारे, मातीतून बनवलेल्या बाहुल्यांसारख्या वस्तू आणि उत्खननात सापडलेल्या असंख्य वस्तूंची छायाचित्रे येथे मांडलेली आहेत. या वस्तू व चित्रे बघून हे पुरातन शहर आणि येथे वास्तव्य करणारे लोक यांच्या जीवनशैलीबद्दल खूपच माहिती मला मिळते आहे.
भाजलेल्या मातीतून बनवलेली खेळणी
मनाला समाधान देणार्या या भेटीनंतर आम्ही बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेतो आणि थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो. रापर आणि चित्रोड गावांच्या मध्ये आम्हाला रस्त्यावर एक नीलगाय (Boselaphus tragocamelus the largest Asian antelope, family Bovidae) आडवी येते व आपण खरोखरच वन विभागात अजून आहोत याची खात्री पटते. आम्ही सामखियाली गावाजवळ एका धाब्यावर चहा पितो व उजवीकडे भचाउ मार्गाने परत भूजकडे जाण्याऐवजी हायवे 27 वरून काठेवाड कडे जाण्यास निघतो. आजचा आमचा मुक्काम मोरवी किंवा मोरबी या शहरात आहे. हे शहर छोटया रणापासून फक्त 40 किमी अंतरावर असल्याने मला उद्या छोट्या रणाला धावती भेट देता येईल अशी आशा वाटते आहे. मोरवीला पोचायला आम्हाला तिन्हीसांजा होतात. मोरवी गावात शिरताना प्रथम काय जाणवते आहे ती आसमंतात आणि हवेत सर्वत्र असलेली धूळ. मोरवीमध्ये सिरॅमिक टाईल्स बनवणारे अनेक कारखाने असल्याने ही धूळ बहुधा अनुभवण्यास येते.
रविवार
मोरबी किंवा मोरवी हे काठेवाड मधील साधारण अडीच लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेले एक छोटेसे शहर आहे. काठेवाड मधील बहुतेक शहरांप्रमाणेच 1947 पर्यंत हे शहर म्हणजे सुद्धा एक संस्थानच होते आणि एकोणिसाव्या शतकात तरी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेले ( ब्रिटिशांच्या वर्गवारी प्रमाणे तृतीय दर्जाचे) आणि उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नसलेले असे संस्थान होते. सन 1879 मध्ये ब्रिटिश सरकारने वाघजी ठाकोर यांना या संस्थानाच्या राज्यपदावर आरूढ होण्यास मान्यता दिली व त्यांच्या कारकिर्दीत संस्थानाचे चित्र पालटले. राज्यपदावर आरूढ झाल्याबरोबर वाघजींनी मोरवी संस्थानाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न चालू केले. सन 1886 मध्ये त्यांनी मोरवी शहरापासून रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम सुरू केले. त्या काळात मोरवीच्या परिसरात मिठाचे उत्पादन हा एकच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने कच्छ्च्या खाडीच्या पूर्वेकडील टोकांवर असलेल्या नवलाखी बंदरातून मिठाची वाहतुक करणे सोपे जाईल या कल्पनेने या बंदराचा विकास करणे त्यांनी सुरू केले. वाहतुकीच्या प्रकल्पांशिवाय त्यांनी मोरवी मध्ये नवीन शाळा, कॉलेजे व हॉस्पिटल्स यांची स्थापना केली. वाघजी यांच्या नंतर संस्थानाच्या राज्यपदी लखदीरजी ठाकोर यांना ब्रिटिश सरकारने बसवले. लखदीरजी यांनी सुद्धा मोरवी संस्थानासाठी बरेच कार्य केले. वीज निर्मितीसाठी पॉवर हाऊस, टेलेफोन एक्सचेन्ज, नवी मंदीरे, टेक्निकल हाया स्कूल आणि इंजिनीयरिंग कॉलेज या सारख्या असंख्य नवीन गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात सुरु झाल्या.
मोरवीचे राजे आपल्या संस्थानात नवनवीन उद्योग चालू व्हावेत यासाठी प्रयत्नशील असत. चिनी मातीचे उद्योग, त्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची उपलब्धता संस्थानात विपुल असल्याने, सुरू व्हावेत यासाठी अनेक सवलती व सुविधा या उद्योगाला मोरवी संस्थानाने देऊ केल्या. परशुराम पॉटरीज हा 40/50 वर्षांपूर्वी मोठे नाव कमावलेला पॉटरी उद्योग मोरवी संस्थानातच कार्यरत होता. आज मोरवी मध्ये 350 च्या वर सिरॅमिक टाइल्स बनवणारे कारखाने आहेत. याशिवाय भिंतीवर लावण्याची घड्याळे बनवणारे सर्व सुप्रसिद्ध कारखाने मोरवीतच आहेत.
लखधीरजी ठाकोर यांनी 1940च्या दशकात राज परिवारासाठी एक नवा पॅलेस बांधला होता. या पॅलेसला भेट देणे हा माझ्या आजच्या कार्यक्रमातील पहिला भाग आहे. मोरवीमध्ये जी रेल्वे लाईन बांधली गेली होती, त्या लाईनवर असलेल्या नझरबाग स्थानकाच्या बाजूला हा पॅलेस बांधलेला आहे. पॅलेसचा परिसर आणि त्या बाजूने बांधलेले कंपाऊंड हे दोन्ही अतिशय भारदस्त आणि मनावर छाप पाडणारे आहेत. बाहेरच्या कंपाऊंडला असलेल्या अनेक प्रवेशद्वारापैकी एकातून आम्ही आत शिरतो आणि एक वळण घेऊन आतील कंपाउंडच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. आम्ही प्रवास करत असलेली एस.यू.व्ही गाडी आतील कंपाऊंडरला असलेल्या या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी (आणि बंद) असलेल्या सर्वात मोठ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जी दोन छोटी प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एकातून सहजपणे आत जाऊ शकते आहे यावरून रॉट आयर्नमधून बनवलेल्या या संपूर्ण प्रवेशद्वाराच्या आकाराची कल्पना करणे सहज शक्य आहे. या प्रवेशद्वारापासून एक रस्ता सरळ पॅलेसच्या भव्य दर्शनी भागाच्या मध्यावर असलेल्या द्वाराकडे जातो. परंतु आम्ही डावीकडे वळतो आणि या बाजूला असलेल्या पोर्चखालील एका द्वाराजवळ गाडी थांबवतो.
पॅलेसची वास्तू दुमजली आहे व 1940च्या दशकात आधुनिक वास्तुकला म्हणून मानल्या जाणार्या आराखड्यानुसार ही वास्तू बांधलेली आहे. ही वास्तू बघताना मला मुंबईच्या मरीन लाइन्स स्टेशन जवळच्या भागातील याच कालात बांधल्या गेलेल्या इमारतींची असलेले या वास्तूचे साधर्म्य लक्षात येते आहे. वास्तूच्या दोन्ही कोपर्यात असलेल्या कक्षांना अर्धवर्तुळाकार आकार दिलेला आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर ऑफसेट दिलेले पट्टे आहेत आणि सर्व खिडक्या अशाच एका पट्ट्यात सरळ रेषेत बसवलेल्या आहेत. खिडक्यांच्या लिंटेल्सच्या जरा वर लिंटेल्सच्या स्लॅब्ज मधूनच छज्जे बाहेर काढलेले असल्याने बाहेरच्या कडक सूर्यप्रकाशाला आत येण्यास मज्जाव केला जातो आहे.
आम्हाला तळमजल्याला भेट देण्याची फक्त परवानगी मिळालेली असल्याने हा मजला आम्हाला दाखवण्यात येतो आहे. या मजल्यावर उत्तर–दक्षिण असे बांधलेले 3 स्वीट्स (Suits) आहेत. प्रत्येक स्वीट्मध्ये एक हॉल, डायनिंग रूम आणि शयनगृह हे एकापाठोपाठ एक किंवा रेल्वेच्या डब्यांप्रमाणे बांधलेले आहेत. या 3 स्वीट्सच्या मध्ये 2 खुली प्रशस्त अंगणे आहेत. या स्वीट्सच्या दोन्ही टोकांना पूर्व–पश्चिम अशी विस्तारलेली अनेक दालने आहेत. यापैकी उत्तर टोकाला असलेल्या दालनांत एक मोठा दरबार हॉल, भेटीसाठी आलेल्या इच्छूकांना बसण्यासाठी असलेला बैठकीचा हॉल व एक शयन गृह आहे. दक्षिण टोकाच्या दालनांमध्ये एक पोहण्याचा तलाव, जिम्नॅशियम आणि बिलियर्ड्स कक्ष आहे. येथील बिलियर्डस टेबल नेहमीच्या टेबलांच्या दीड ते 2 पट मोठ्या आकाराचे आहे. तसेच जिम्नॅशियममधे असलेली व 1940च्या दशकात बनवलेली निरनिराळी व्यायाम करण्याची उपकरणे बघायला मला मोठी रोचक वाटत आहेत. पॅलेसमधील प्रत्येक कक्ष हा निराळ्या पद्धतीने बांधला गेलेला आणि सजवला गेलेला आहे. आतील सजावट पहाताना तिचा खानदानी व श्रीमंती रुबाब मनाला मोठी भुरळ् घालतो आहे. प्रत्येक कक्षाच्या तळाला असलेल्या इटालियन संगमरवराच्या टाइल्स सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या संगमरवरातून घडवलेल्या आहेत. हा पॅलेस बघताना त्या काळातील संस्थानिकांची जीवनशैली आणि श्रीमंती यांची चांगलीच कल्पना येते आहे. अर्थात ही सर्व संस्थानिक मंडळी शेवटी इंग्रज सरकारच्या इशार्यानुसार चालत होती हे सत्य या देखाव्यामागे अबाधित आहेच. लायब्ररी कक्षात असलेला एक 1940 मधील नकाशा मला अतिशय रोचक वाटतो आहे. हा नकाशा निरनिराळ्या प्रकारच्या झाडांच्या लाकडांचे तुकडे एका पॅनेलवर ‘इनले‘ करून बनवलेला आहे. प्रत्येक मोठ्या संस्थानासाठी निराळ्या झाडाचे लाकूड वापरलेले आहे. दरबार हॉलमधील ब्रिटिश कलाकारांनी काढलेली तैलचित्रे आणि छायाचित्रे मला खूपच भावतात.
मोरवी रेल्वेची इंजिन शेड
जुन्या पॅलेसचा दर्शनी भाग
मच्छू नदीवरचा झुलता पूल
मणी मंदीर
मोरवीची मच्छू नदी
पॅलेसची भेट आटोपून आम्ही बाहेर पडतो. बाजूलाच मोरवी मधील जुन्या रेल्वे इंजिनांसाठी बांधलेली शेड आहे. ती बघून आम्ही मच्छू नदीवरील झुलता पूल, जुना किंवा दरबार गढ पॅलेस आणि मणी मंदीर यांना एक धावती भेट देतो. परतत असताना हिरव्या रंगाच्या व ग्रीन टॉवर असे नाव असलेल्या एक लोखंडी स्ट्रक्चरकडे माझे सहज लक्ष जाते.
भोजन झाल्यावर दुपारी, मोरवीचे प्रमुख आकर्षण ( निदान माझ्या मताने) असलेल्या छोट्या रणाकडे जाण्यास आम्ही निघालो आहोत. हे छोटे रण मोरवीपासून फक्त 40 किमी अंतरावर आहे. मोरवी शहर जरी गुजराथच्या काठेवाड भागामध्ये मोडत असले तरी छोटे रण हे नेहमीच कच्छचा एक भाग म्हणून मानले गेले असल्याने मी परत एकदा कच्छ्कडे चाललो आहे असे म्हणता येईल. मोरवी– जेतपूर यांना जोडणारा हायवे 321 आम्ही जेतपूरजवळ सोडतो व गुजराथ सरकारने नवीनच बांधलेल्या हायवे 7 वर वळतो. गुजराथची राजधानी अहमदाबाद व उत्तरेकडील शहरे या नवीन रस्त्याने आता सरळ जोडली गेलेली आहेत. खाखरेची गावाकडे जाणारा दुसरा एक छोटा रस्ता आम्हाला घ्यायचा असल्याने आम्ही हायवे 7 लगेचच सोडतो व या रस्त्यावर वळतो. नर्मदा नदीचे पाणी आता इतपर्यंत कॅनॉलने आणले गेले आहे. या पाण्यावर वाढणारी एरंडी व जिरे यांची जोमदार पिके रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. नर्मदा कॅनॉलचे पाणी पोचल्याने हा भाग आता संपन्न झालेला दिसतो आहे.
जंगली गाढवाची कवटी
थोड्याच वेळात आम्ही वेणसर गावाजवळ पोचतो. येथून छोटे रण सुरु होते व उत्तरेला त्याचा विस्तार होत जातो. रणात जाणारा एक कच्चा रस्ता आम्ही पकडतो. आजूबाजूचा आसमंत परत एकदा गेले काही दिवस सतत बघितल्यामुळे ओळखीच्या झालेल्या मोठ्या रणातील आसमंतासारखा दिसू लागला आहे. लालसर ब्राऊन जमीन, त्यावर मधून मधून असलेली बेटे किंवा उंचवटे, गवताळ जमीन व सर्वत्र पसरलेली बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झुडपे हेच दृष्य चारी बाजूंना दिसते आहे. थोड्याच वेळात रस्ता संपतो आणि आम्ही सुकलेल्या रणातील सपाट जमिनीवर पोचतो आहोत. येथे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये गाडी चालवता येते मात्र दुसर्या कोणाच्या गाडीच्या टायरच्या खुणांवरून मार्गक्रमण करणे हे नेहमीच बिनधोक असते. काही अंतरावर मला एक फुटलेला बंधारा दिसतो. या बंधार्याला सागर बंधारा असे नाव दिलेले होते परंतु मागच्या वर्षीच्या पुरामध्ये तो वाहून गेलेला आहे. थोड्या उंचीवर असलेल्या एका जागी आम्ही गाडी थांबवतो आणि रानटी गाढवे दिसतात का हे बघण्यासाठी खाली उतरतो. छोटे रण हे रानटी गाढवांसाठी अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे व ही रानटी गाढवे पहाण्यासाठीच खरे म्हणजे आम्ही येथे आलो आहोत. खाली मला एका जागी गाढवाची काही हाडे व कवटी पडलेली दिसते. हे गाढव बहुधा काही वर्षांपूर्वी मृत झालेले असावे परंतु गिधाडे आणि नंतर मुंग्या यांनी आपले काम उत्कृष्ट रित्या करून नंतर ही हाडे इतकी चाटून पुसून स्वच्छ केलेली आहेत की ही आता ती धुतल्यासारखी स्वच्छ दिसत आहेत. लांब अंतरावर एक नर गाढव एकटेच फिरताना आम्हाला दिसते ( रानटी नर गाढवे नेहमीच एकटी फिरत असतात.) पण ते बर्याच अंतरावर असल्याने त्याचे छायाचित्र काढणे मला शक्य होत नाही.
आम्ही पुढे निघतो. पुढे काही अंतरावर एक तळे दिसते आहे. याला स्थानिक लोक कॅनॉल तळे या नावानेच ओळखतात कारण नर्मदा कॅनॉल मधून गळती झालेल्या पाण्यामुळे हे तळे तयार झालेले आहे. मला तळ्याच्या निळ्याभोर पाण्याच्या पृष्ठभागावर काही पांढरे ठिपके तरंगताना दिसतात. आम्ही थोडे पुढे जातो व पक्षी विचलित होणार नाहीत एवढ्या अंतरावर गाडी थांबवतो. बायनॉक्यूलर्स मधून बघताना लक्षात येते की तेथे 4 पेलिकन आणि त्यांच्या मागे 6 फ्लेमिंगो दिसत आहेत. फ्लेमिंगो कुटुंबात 4 मोठे पक्षी व 2 पिल्ले आहेत. जरा काळजीपूर्वक5 बघितल्यावर5मी त्यांना नीट बघू शकतो आहे. खरे तर कच्छचे रण् हे फ्लेमिंगो पक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे पण आतापर्यंतच्या या सहलीत, मला फ्लेमिंगो पक्षी कोठेच दिसू शकले नव्हते. फ्लेमिंगो बघता येतील ही माझी अपेक्षा येथे छोट्या रणात थोड्या प्रमाणात का होईना! शेवटी पूर्ण होते आहे. पाण्यामध्ये हे फ्लेमिंगो आपली मान मुरडुन घेऊन खाली पाण्यातील मासे शोधत अगदी स्तब्धपणे उभे आहेत. निळ्याशार पाण्यामध्ये त्यांचे केशरी रंगाचे पाय उठून दिसत आहेत.
आम्ही परत वळतो व जरा उंचावर असलेल्या हांडी बेटाकडे गाडी वळवतो. काही काळापूर्वी या ठिकाणाचा फायरिंग रेंज म्हणून पोलिस वापर करत असत. परंतु पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे त्यांनी आपली फायरिंग रेंज येथून आता हलवली आहे व रानटी गाढवांना हे रान परत मोकळे झाल्याने ती परतली आहेत.
हांडी बेटावर गाडी थांबवून आम्ही खाली उतरतो व इकडे तिकडे जरा बघितल्यावर 3 धष्टपुष्ट जनावरे शोधायला आम्हाला फारसा वेळ् लागत नाही. मध्यम आकाराच्या आणि घोड्याच्या उंचीएवढ्या असलेल्या या सर्व माद्या आहेत. त्यांच्या अंगावर ब्राऊन आणि पांढर्या रंगाचे पॅचेस दिसत आहेत.
हांडी बेटावर आणखी पुढे गेल्यावर आम्हाला धवल मरुभूमीचा एक पट्टा दिसतो. छोट्या रणाच्या काही भागात ही धवल मरुभूमी मोठ्या रणाप्रमाणेच दिसते. मात्र येथे असलेल्या मिठाचे व्यापारी स्वरूपात उत्पादन केले जाते आहे असे समोर उभे असलेली मिठागरे व ट्रक यावरून कळून येते आहे.
छोट्या रणातून परतताना खाखरेची गावाजवळ मला दोन किंवा तीन् मोर व सात किंवा आठ लांडोर यांचा एक थवा दिसतो. मोरांची निळसर–हिरवी पिसे पूर्णपणे झडून गेलेली दिसत आहेत. फक्त त्यांच्या माना व डोक्याजवळचा भाग तेवढा निळसर हिरवा दिसतो आहे. दोन मोरांनी आपला पिसारा खरे तर पूर्णपणे पसरलेला आहे. परंतु निळसर पिसे झडून गेल्याने हा पिसारा सध्या पिवळट ब्राउनिश दिसतो आहे. हा असा पिसारा बघितल्यावर कोणतीही लांडोर साहजिकपणे त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीये.

ब्रिटिश आमदानीत अभ्यासकांनी रामायण व महाभारत तसेच इतर पौराणिक साहित्य या भाकडकथा आहेत म्हणून घोषित केल्या, ते साहजिकच होते. तत्कालीन विदेशी अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीतील समाजरचनेनुसार किंवा त्यांच्या प्रादेशिक ऐतिहासिक मापदंडानुसार भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या देशावर नेहमी परकीयांनी राज्ये केली, नेहमी परकीय आक्रमणे होत राहिली त्या भूमीत रामायण, महाभारत या केवळ कथाच असू शकतात असे प्रतिपादले जाऊ लागले, त्यामागची सत्यता पडताळून पाहण्यात आली नाही. यामधूनच मग आर्य भारताबाहेरून आले (आर्यन थिअरी) यासारखी गृहितके मांडली गेली त्यातून अनेक यक्षप्रश्न निर्माण झाले. भारताचा इतिहास हा अॅलेक्झांडरपासून सुरू होतो असे मानले जाऊ लागले, परंतु या पार्श्वभूमीवर एक आश्चर्याची घटना घडली, ही घटना जगाचा इतिहास बदलणारी ठरली. असंस्कृत भारतीय इतिहासाला ‘सुसंस्कृत’ बनवणारी हडप्पा संस्कृती जगासमोर आली. जगात चार प्राचीन मानल्या जाणाऱ्या संस्कृतींत ही हडप्पा संस्कृती गणली जाऊ लागली. या संस्कृतीची अनेक स्थळे उघडकीस आली; यामध्येच गेल्या काही दशकांत एक महत्त्वपूर्ण स्थळ आपला संबंध या संस्कृतीशी दर्शवत होते; हे म्हणजे द्वारका. द्वारकेचा कृष्णाशी असलेला संबंध आणि त्याच वेळी हडप्पा संस्कृतीशी असलेला संबंध हा भारतीय पौराणिक संस्कृती व भारतीय इतिहास या दोन्ही गोष्टींना आत्मचिंतन करायला लावणारा होता. आज आपण श्रीकृष्णाच्या ज्या शहराला द्वारका म्हणून ओळखतो, त्या शहराचे जुने नाव द्वारिका. भारतीयांच्या जीवनात द्वारकेचे वेगळेच महत्त्व आहे. आपल्या संस्कारातून, मनातून कृष्ण जसा आपण वेगळा काढू शकत नाही तसेच द्वारकेचे अस्तित्व भारतीयांच्या संस्कारातून पर्यायाने इतिहासातून वगळता येत नाही. पौराणिक कथा म्हटल्या, कीत्यात तथ्य किती, हा प्रश्न नेहमीच उभा राहतो आणि भारतात तर हा प्रश्नच जटिल केला गेला आहे. एक तर या कथा भाकड ठरविल्या जातात किंवा त्यांचे सादरीकरण अद्भुत दैवीकरणाच्या आच्छादनात केले जाते. त्यामुळे या कथांच्या गíभताकडे साहजिकच दुर्लक्ष होते. ऐतिहासिक तथ्य हाताळत असताना कुठल्याही पुराव्याला कमी लेखून चालत नसते; म्हणूनच साहित्यिक पुरावा हादेखील इतिहासात तितकाच महत्त्वपूर्ण असतो. एखादे साहित्य मग ते धार्मिक असो किंवा अधार्मिक, ते तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करत असते. त्यातील अद्भुततेचा किंवा लालित्याचा भाग वगळून त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे असते. तसेच महाभारत- द्वारका यांच्या संदर्भात झालेले आढळते. भारतीय धार्मिक संकल्पनेत महाभारत, कृष्ण, द्वारका यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक साहित्यातून श्रीकृष्णाने वसवलेल्या द्वारकेविषयी भरभरून लिहिलेले आहे. आता ही द्वारका अस्तित्वात होती का, असा प्रश्न निर्माण होतो? गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून द्वारकेचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे; परंतु याबरोबरच अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
पौराणिक पार्श्वभूमी
द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर असून पश्चिम किनारपट्टीवर पाण्याने वेढलेल्या ओखामंडल या भागात गोमती नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसलेले आहे. द्वारका हे हिंदू तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ, पुरी, रामेश्वर, द्वारका या चार धामांतील एक, तर मथुरा, अयोध्या, काशी, कांचीपुरम, उज्जैन, पुरी, द्वारका या सप्तपुरीतील एक महत्त्वपूर्ण स्थळ मानले जाते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत एक गोमती द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका ही पुरी आहे. बेट द्वारका ही गोमती द्वारकेपासून २५ किलोमीटर अंतरावर असून बेट द्वारकेला जाण्यासाठी नावेने समुद्र ओलांडावा लागतो. खरं तर हा समुद्र नसून कच्छची खाडी आहे. द्वारकेत श्रीकृष्णाचं मंदिर हे गोमती नदीच्या काठी आहे. ती नदी सागरात एकरूप होण्यासाठी तिथे येते. १७० फूट उंचीचे असे हे मंदिर असून त्याचे शिखर पाच मजली आहे. त्या मंदिराचा सभा मंडप साठ खांबांवर उभा असून गर्भगृहात श्रीकृष्णाची चतुर्भुज अशी चार फुटांची मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांची स्थापना जवळच्याच एका वाडय़ात केलेली आहे.
द्वारिका हा मूळ संस्कृत शब्द असून याचा अर्थ अनेक द्वार असलेलं नगर असा होतो. महाभारतात या स्थळाचा उल्लेख कुशस्थली असा करण्यात आलेला आहे. हे नगर भगवान श्रीकृष्णांनी वसवलेलं असून कालांतरांने सिंधु सागरात विलीन झाले अशी आख्यायिका आहे. असे असले तरी महाभारतातील व इतर पौराणिक साहित्यानुसार द्वारका ही कृष्णाने वसविण्यापूर्वी कुशस्थली या नावाने अस्तित्वात होती. देवी भागवत व श्रीमद भागवतानुसार जुनी द्वारका म्हणजेच कुशस्थली हे शहर ‘शर्यत’ राजवंशाचा राजा रेवत याने उभारलेले होते. राजा रेवत हा आनर्ताचा मुलगा असून वैवस्वत मनू याचा नातू होता. तर बलरामाची पत्नी रेवती ही रेवत राजाची कन्या होती. वायू-पुराणानुसार यादवांपूर्वी हे स्थळ आनर्ताच्या राजधानीचे ठिकाण होते. या राजवंशातील ककुद्मी या राजाच्या कारकीर्दीत पुण्यजन नावाच्या राक्षसाने हा प्रदेश बळकावला व कालांतराने जुनी द्वारका पाण्याखाली गेली. या घटनेनंतर बऱ्याच काळाने श्रीकृष्णाने द्वारका या नावाने येथे नवीन शहर वसवले. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे श्रीकृष्ण व बलरामाने यादवांसह राजस्थानमाग्रे रैवतक पर्वताचा पायथा गाठला आणि तिथे सागरतीरावर त्याने नवी द्वारकानगरी उभारली, म्हणूनच श्रीकृष्ण रणछोडदास या नावाने प्रसिद्ध झाला. श्रीकृष्णाने नव्या नगरीसाठी भगवान विश्वकर्मा यांचे आवाहन केले. विश्वकर्मा प्रगट झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णाच्या विनंतीवरून समुद्रावर तरंगत्या अशा अद्भुत द्वारकेची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या द्वारकेच्या प्रवेशद्वाराची रचना होती, असे वर्णन पुराणात सापडते. परंतु दुर्दैवाने त्या शहराचा अंतही पाण्यात विलीन होऊनच झाला. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर द्वारकेला सागराने गिळून टाकले, प्राचीन द्वारका ही बेटावर वसलेली होती व बंदर स्थान होती. बंदर अर्थव्यवस्थेमुळे आíथकदृष्टय़ा पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचा नाश झाला, यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारकेला समुद्राने आपल्या अंतरात सामावून घेतले अशी आख्यायिका आहे. ती द्वारका समुद्रात बुडाल्यावर कृष्णाच्या नातवाने वज्रनाथने ती पुन्हा उभारली. परंतु कालांतराने तिचा अंतही तसाच झाला.
श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली.
द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.
एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला दिलेला शाप.
अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत. पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप
महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की, ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.
ऋषींनी दिला होता सांबाला शाप
महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले. त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की, ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ? सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप दिला की,श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील. श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार.
ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली. नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले. श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे.
हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन राहू लागले.
प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला. सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये परावर्तीत झाले.
त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली. श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की, तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.
दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वसुदेवांना सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वसुदेवलाही झाले.
ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते जमिनीवर पडून राहिले. ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला. बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप झाला.तेव्हा –
“हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच संपणार होता…”
हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते स्वर्गात निघून गेले.
इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप दु:ख झाले. वसुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा देखील अंत होणार होता. अर्जुनाने वसुदेवाची ही विनंती मान्य केली आणि आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार केले. वसुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा वसुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा अंतिम संस्कार केले. सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला. सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच द्वारकेला जलसमाधी मिळाली.
तर अशी ही आख्यायिका! म्हटलं तर आख्यायिका…म्हटलं तर कथा…म्हटलं तर इतिहास…!
सध्या द्वारका व बेट द्वारका ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी पुराणकाळातील द्वारका होती का? यावरून अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. ‘पेरीप्लस ऑफ एरिथ्रीअन सी’ या ग्रीक-रोमन ग्रंथात द्वारिकेला ‘बराका’ असे म्हटले गेले आहे, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे, तर टॉलेमी म्हणतो की, बराका हे एक द्वीप असून चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. महाभारतकालीन द्वारका नेमकी कुठे स्थित आहे, यावर पुष्कळ मतभेद आहेत. पहिला लेखी पुरावा आपल्याला पालीटाना येथील ताम्रपटामध्ये सापडतो. या ताम्रपटाचा कालावधी इ.स. सहाव्या शतकात जातो. भारतीय पुरातत्त्वाचे जनक डॉ. हसमुखलाल सांकालिया यांच्या मते सध्याची द्वारका हीच महाभारतकालीन द्वारावती आहे. पौराणिक साहित्यात दोन द्वारकांचा उल्लेख प्रकर्षांने येतो, एक म्हणजे रेवत राजाची द्वारका व दुसरा उल्लेख म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका. महाभारतातील सभापर्व व आदिपर्वानुसार तसेच विष्णू व वायू पुराणात उल्लेखलेली द्वारका ही गुजरातमधील रैवत पर्वताच्या परिसरातील आहे, तर महाभारतातील मौसल पर्व हरिवंश, भागवत पुराणानुसार द्वारका ही समुद्रकिनारी वसलेली आहे. हरिवंशाच्या विष्णुपर्वात द्वारकेचा उल्लेख वारीदुर्ग म्हणजेच जलदुर्ग म्हणून केलेला आहे. हा दुर्ग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला आहे असे वर्णन केलेले आहे. पुरातत्वज्ज्ञ डॉ. सांकलिया यांच्या मतानुसार या दोन्ही द्वारका वेगवेगळ्या काळांतील असून आदी पर्व, सभा पर्व, विष्णू पुराण व वायू पुराण यात नमूद केलेली द्वारका ही इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहे, तर मौसल पर्वातील द्वारका ही त्यानंतरच्या कालखंडातील आहे. बौद्ध साहित्यातही आपल्याला द्वारकेचा उल्लेख सापडतो. घट जातकात इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील द्वारकेचा उल्लेख केलेला आहे. या उल्लेखानुसार द्वारकेच्या एका बाजूस समुद्र, तर दुसऱ्या बाजूस डोंगर आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या वेळेस यादव मथुरेहून द्वारकेस स्थलांतरित झाले त्या वेळेस त्यांनी एक द्वारका वसवलेली नसून तब्बल पाच द्वारका वसवल्या असाव्यात. केवळ साहित्यातच नव्हे तर गुजरातमध्ये अनेक लोककथांमध्ये वेगवेगळ्या स्थळांचा द्वारका म्हणून उल्लेख केला जातो. त्यात मूळ द्वारका, सध्याची द्वारका, माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळांचा समावेश होतो.
मार्कंडेय पुराणाचे भाषांतर करताना ब्रिटिश प्राच्यविद्या संशोधक एफ. ई. पार्जिटर यांनी द्वारका नगरी रैवतक पर्वताजवळ असल्याचे म्हटले होते. भारतविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक ए. डी. पुसाळकर यांनी सध्याची द्वारका हीच प्राचीन द्वारका असल्याचे मत मांडले होते. १९६३ मध्ये डेक्कन कॉलेजच्या झैनुद्दीन अन्सारी व म. श्री. माटे यांनी द्वारकेत उत्खनन केले. तेथे त्यांना प्रारंभिक ऐतिहासिक काळातील (इ.स. पहिले शतक) व मध्ययुगीन वसाहतीचे पुरावे मिळाले; तथापि द्वारकेसंबंधी पुराणांमधील माहिती व मौखिक परंपरेतील उल्लेख अधिक महत्त्वाचे आहेत, असे मानणाऱ्यांनी द्वारका फक्त दोन हजार वर्षे जुनी असल्याचे मान्य केले नाही.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे एस. आर. राव (१९२२–२०१३) यांनी १९७९-८० मध्ये द्वारकाधीश मंदिराच्या प्रांगणात केलेल्या उत्खननात इ.स. नवव्या शतकातील विष्णू मंदिराचे अवशेष मिळाले. त्यानंतर राव यांनी १९८१ पासून केलेल्या संशोधनात द्वारकेच्या समुद्रात आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. १५००) अवशेष मिळाल्याचे व श्रीकृष्णाच्या समुद्रात बुडालेल्या द्वारकेचा शोध लागल्याचे जाहीर केले; तथापि ही कालनिश्चिती वैज्ञानिक पद्धतीने केलेली नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच पाण्यात मिळालेली दगडी बांधकामे आणि अन्सारी व माटे यांना मिळालेल्या प्रारंभिक ऐतिहासिक काळातील दगडी भिंती यांच्यात साम्य आहे. डॉ. एस. आर. राव यांनी कुशस्थली हीच द्वारका आहे असा निष्कर्ष मांडला. त्यांच्या मतानुसार गोमती द्वारका व बेट द्वारका याच प्राचीन द्वारका आहेत; परंतु पुरातत्वज्ज्ञ डॉ. अलोक त्रिपाठी यांनी त्यांच्या मताचे खंडन करत, गुजरातमधील माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळे यांचा संबंध प्राचीन द्वारकेशी असावा, असे मत मांडले. त्रिपाठींनी जुनागढ हे स्थळ प्राचीन द्वारका असावे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्या संशोधनात केला आहे. यासाठी त्यांनी सॅटेलाइट रिमोट सेिन्सग फोटोग्राफीद्वारे घेतलेल्या चित्रणाचा वापर केला. या छायाचित्रात त्यांना जुनागढ परिसरात आटलेल्या नदीचे पुरावे सापडले. त्या आधारे त्यांनी प्राचीन काळात जुनागढ येथे पूर्वी पाण्याचा स्रोत होता व तो कालांतराने आटला, अशी मांडणी त्यांच्या संशोधनात केली. प्राचीन साहित्यात पाण्याच्या स्रोतास सागर असे म्हणत, त्याचा आधारही त्यांनी घेतला. तसेच येथे डोंगररांग असून पुराणात द्वारकेचे वर्णन केल्याप्रमाणे सागर व पर्वत असे दोन्हीही येथे आहेत. म्हणूनच त्रिपाठी यांनी जुनागढला प्राचीन द्वारकेचा दर्जा दिला. याशिवाय सम्राट अशोक व शक राजा रुद्रदामन पहिला यांचे शिलालेखही जुनागढला सापडले आहेत, हे विशेष.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाने सन १९९०-९१ आणि पुन्हा १९९७ ते २००२ या काळात पाण्याखालील पुरातत्त्वीय संशोधन मोहिमा पूर्ण केल्या. साधारण एक चौ. किमी. परिसरात २५ मीटर खोलीपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. मिळालेल्या अवशेषांमध्ये घडीव दगडांच्या अर्धवर्तुळाकार भिंती व इतर दगडी रचना यांचा समावेश होता. त्यातल्या एका दगडावर गुजराती भाषेतील काही अक्षरे कोरलेली होती. द्वारकेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी एक दगडी धक्का बांधवून घेतला असल्याची माहिती पाहता पाण्याखालील दगडी बांधकामे विसाव्या शतकातील असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. सर्वेक्षणात गोमती नदीच्या मुखापाशी समुद्रात एक किमी. अंतरापर्यंत ८ ते १० मी. खोलीवर अनेक दगडी नांगर पडलेले आढळले. परंतु द्वारकेला आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. १५००) वसाहत असल्याचा व ती समुद्राच्या पाण्यात असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
एकंदर सागरी पुरातत्त्वीय संशोधनातून असे दिसते की, द्वारका प्रारंभिक ऐतिहासिक काळात अस्तित्वात असली व किमान इ.स. नवव्या शतकापासून द्वारका हे वैष्णव पंथाचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असले, तरी पाण्याखालील उत्खननात एखादी नगरी समुद्रात बुडल्याचा कोणताही थेट पुरावा मिळालेला नाही. फक्त एस. आर. राव यांचे संदर्भ देऊन व नंतरच्या संशोधनाकडे काणाडोळा करून श्रीकृष्णाची ३५५० वर्षे जुनी द्वारका सापडली असल्याचा दावा करणारे बरेच लेखन वर्तमानपत्रांमध्ये व पुरातत्त्वीय क्षेत्राबाहेर इतरत्र प्रसिद्ध झाले आहे; तथापि कोणताही ठोस पुरावा नसताना असा दावा करणे हे छद्मपुरातत्त्वाचे उदाहरण ठरते.
सर्वात आधी १९६३ मध्ये गुजरात पुरातत्त्व विभागाने व पुण्याच्या डेक्कन अभिमत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिराच्या बाजूलाच उत्खनन करण्यात आले. या उत्खननातून इसवी सन पूर्व कालखंडात तिथे वस्ती होती याचे पुरावे सापडले. या संशोधनातून द्वारका दोनदा बुडाली असाही निष्कर्ष निघाला. या पुरातत्त्वीय उत्खननात पाच वेगवेगळ्या कालखंडाचे थर अभ्यासकांनी उघडकीस आणले. या थरांतून रेड पॉलिश वेअर, मातीचे चेंडू, रोमन अॅम्फोरा, शंखांपासून तयार केलेल्या बांगडय़ा, मंदिराचे भग्न अवशेष, मध्ययुगीन कालखंडातील गुजरातच्या सुलतानाची नाणी, मध्ययुगीन काचेच्या बांगडय़ा, मध्ययुगीन चमकदार मृदभांडी असे काही महत्त्वपूर्ण अवशेष मिळाले. तर डेक्कन महाविद्यालयानंतर डॉ. एस. आर. राव आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने १९७९-८० च्या काळात या भागात पुन्हा पुरातत्त्वीय उत्खनन केले. या उत्खननातून आठ कालखंडांचे थर उघडकीस आले. या शिवाय या भूभागावर इसवी सन पूर्व १५०० या कालखंडात एक प्रगत हडप्पाकालीन संस्कृती नांदत होती आणि ती समुद्रामुळे नष्ट झाली असा निष्कर्ष अभ्यासा अंती मांडण्यात आला. द्वारका हे भारतातील पहिले सागरी पुरातत्त्वीय स्थळ असून समुद्राच्या तळाशी झालेले उत्खनन आणि सर्वेक्षण गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मार्फत करण्यात आले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मदतीने १९८२-८३ साली बेट द्वारकेला सर्वात प्रथम ऑन शोअर म्हणजे किनाऱ्यावर आणि ऑफ शोअर म्हणजे थेट समुद्रात पाण्याखाली असे सर्वेक्षण सुरू झाले. १९८२ पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने २००१ पर्यंत चालले. किनाऱ्यालगत आणि समुद्राअंतर्गत चाललेल्या या सर्वेक्षणात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या. २००५ आणि २००७ मध्ये भारतीय नौदल व भारतीय पुरातत्त्व खात्याने एकत्रितपणे सर्वेक्षण केले. १९९७ आणि २००१ या कालावधीत समुद्री उत्खननात बरेच महत्त्वाचे पुरावे आढळले. त्यासाठी अभ्यासकांनी द्वारकेच्या किनाऱ्यापासून इंटर-टाईडल झोन ते २५ किमी खोल पाण्यात गवेषण केले. या संशोधनात एक चौरस किमी एवढा समुद्री सपाटीचा भाग अभ्यासण्यात आला. हा परिसर दोन भागात विभागलेला होता. पहिल्या भागात म्हणजेच लोकेशन-ए मध्ये स्थापत्य अवशेष आढळून आले. या स्थापत्य अवशेषात बरेच अर्धवर्तुळाकार खडक सापडले. त्यांचा आकार ९० अंश म्हणजेच इंग्रजी ‘छ’ आकाराचा आहे. या स्थापत्य रचना ६०-८० सेमी. एवढय़ा उंचीच्या असून, याचबरोबर काही आयताकृती दगडी ठोकळेसुद्धा सापडले. वेगवेगळ्या प्रकाराचे जहाजांचे दगडी नांगरसुद्धा या उत्खननात सापडले, त्यावरून असे सिद्ध होते कीद्वारका ही कधी काळी महत्त्वाचे बंदर असण्याची शक्यता आहे. तसेच या शिवाय बेट द्वारका इसवी सन पूर्व १५०० मध्ये मुख्य भूमीला जोडलेली होती हेही या अभ्यासात सिद्ध झाले. एकूणच संपूर्ण सर्वेक्षणात दगडी वास्तूंचे अवशेष, उत्तर हडप्पाकालीन मृद भांडय़ांचे अवशेष, पाटे, भग्न विष्णू मूर्ती, मंदिराचे अवशेष, किल्ल्याच्या िभतींचे अवशेष, नांगर, पितळेच्या वस्तू, लोखंडाच्या गंजलेल्या वस्तूंचे भाग, जीर्ण लाकडी वस्तूंचे भाग, मणी, कुशाण कालीन नाणी असे अनेक पुरावे हाती लागले. थोडक्यात डॉ. एस. आर. राव यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर द्वारका हे भारतीय इतिहासातील पहिले सागरी बंदर हडप्पा संस्कृतीबरोबरच भारतातील नागरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचेही प्रतिनिधित्व करते. हा दुसरा टप्पा इसवीसनपूर्व सहाव्या शतकातील आहे. श्रीमद्भागवतामध्ये द्वारकेचे वर्णन करताना नारदमुनी म्हणतात, ‘हे शहर उद्यान, पक्षी, पाखरं यांनी समृद्ध असून, इकडची जल-तलाव विविध पुष्पानी बहरलेली होती. त्यात इंदिवरा, अंभोजा, कहलारा, कुमुद, उत्पला कमळ आणि हंसाचे मधुर स्वर तरंगत असत. सोन्या-चांदी-पाचूनी बांधलेले नऊ लक्ष राजमहाल, या महालांमध्ये सोन्या- माणकांनी सजवलेल्या वस्तूंची आरास होती. शहर-रचना अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना होती. रस्ते, बाजारहाट, अनेक सभागृहे आणि देवतांची देवालये शहराची शोभा वाढवत असत. मार्ग, राजमार्ग, वस्तील मार्ग, या सर्वावर उष्णता कमी करण्यासाठी पाणी िशपडले जात असे. भगवान विश्वकर्मानी आपली विशेष कला भगवान श्रीकृष्णासाठी या नगर रचनेतून दाखवली. विश्वकमार्ंनी १६ सहस्र महाल उभारले. या सर्व महालात श्रीकृष्णांच्या १६ सहस्र राण्या राहत होत्या. या शहराला महाभारतात द्वारावती म्हणून ओळख होती. हे वर्णन जरी लालित्यपूर्ण असले तरी सापडलेल्या पुराव्यांवरून श्रीमद् भागवतामध्ये द्वारकेची वर्णन केलेली नगररचना अगदीच नाकारता येत नाही, असे संशोधकांना पुराव्यांवरून लक्षात आले.
द्वारकेचा शेवट
द्वारका हे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. द्वारकेचे धार्मिक महत्त्व हे तिच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीपेक्षा नेहमीच वरचढ ठरते. हे धार्मिक महत्त्व केवळ अस्तिकांसाठी नाही तर नास्तिकांसाठीही तेवढेच महत्त्वाचे असते. आस्तिक आपल्या श्रद्धेच्या चष्म्यातून द्वारकेकडे पाहतात तर नास्तिक अस्तिकांना विरोध करण्याच्या भूमिकेतून द्वारकेकडे पाहतात. या वादाच्या द्वंद्वाचे चटके भारतीय इतिहासाला उजाळा देणाऱ्या स्थळाला सोसावे लागतात. मग घडते ते राजकारण, म्हणूनच सगळ्या प्रकारचे पडदे, चष्मे डोळ्यांवरून बाजूला सारून एक ऐतिहासिक स्थळ म्हणून द्वारकेकडे पाहिल्यास आपल्यालाच पूर्वजांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा समजण्यास मदत होईल.
द्वारकेच्या संशोधनात बेट द्वारका हे तत्कालीन प्रसिद्ध बंदर आहे हे सिद्ध झाले आहे. तरीही उपलब्ध पुराव्यांवरून द्वारकेच्या काळासंबंधी अनेक वाद आहेत. नवीन संशोधनात जहाजांचे नांगर मोठय़ा प्रमाणात सापडले, या नांगरावरून ते कुठल्या भागातील असावेत, कुठल्या प्रकारच्या नौकांसाठी वापरले जात असावेत, असे अनेक अंदाज बांधता येतात. त्याचबरोबर अभ्यासकांनी द्वारकेच्या आजूबाजूच्या परिसरातही सर्वेक्षण आणि उत्खनन केले, या सर्वेक्षणात त्यांना गुजराती लिपी असलेला एक दगडी ठोकळा मिळाला. या दगडी ठोकळ्याची धाटणी, जहाजांच्या नागरांप्रमाणे असल्याने अभ्यासकांनी गुजराती लिपीच्या आधारे या नांगराचा काळ मध्ययुगीन असून अशा प्रकारचे नांगर इंडो-अरब व्यापाराचे निदर्शक होते, असा निष्कर्ष मांडला. वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्यात बुडालेल्या द्वारकेच्या अवशेषांना जगासमोर आणण्यात आले आहे, असे असले तरी या पुराव्यांची कालनिश्चितीही तशीच वैज्ञानिक पद्धतीने होण्याची गरज आहे. जहाजांच्या नांगरांचा काळ हा गृहीतकांऐवजी रेडिओमेट्रिक डेटिंगसारख्या वैज्ञानिक पद्धतीने शोधला असता तर सत्याकडे अधिक अचूक वाटचाल करता आली असती. नांगर मध्ययुगीन तर पूर्वीच्या उत्खननात मिळालेली मृदभांडी हडप्पाकालीन असल्याने अनेकविध कालखंडांमध्ये हा भूभाग वापरात होता, हेच लक्षात येते. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात नेहमीच लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ते स्थळ केवळ एकाच काळाचे निदर्शक असू शकत नाही. कालपरत्वे एक संस्कृती वसते, फुलते व कालांतराने नष्ट होते व त्याच ठिकाणी नव्याने दुसरी संस्कृती रुजू होते. असे असले तरी द्वारकेला सापडलेल्या पुराव्यांवरून हे मात्र नक्की सिद्ध होते की, द्वारका हे नागरीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरक्षित कार्यरत बंदर होते व इंडो-अरब व्यापाराच्या काळात ते प्रगतीच्या सर्वोच्च िबदूवर होते. म्हणूनच द्वाराकेच्या संदर्भात अजून सखोल व शास्त्रीय संशोधनाची गरज आहे.
द्वारकाधीश मंदिर :-
गोमती नदीच्या काठावरील द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वात पवित्र व प्राचीन मंदिर मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर असून देशातील श्रीकृष्णाच्या प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येतात.
द्वारकाधीश मंदिर सुमारे 2 हजार दोनशे वर्ष जुने असल्याचे मानले जात आहे. असे म्हणतात की हे मंदिर कृष्णा काळात व्रजभान यांनी बांधले होते. व्रजभान हे भगवान श्रीकृष्णाचे नातू समजले जातात. पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की हे स्थान 'हरि गृह' अर्थात भगवान श्रीकृष्ण जी यांचे निवासस्थान होते, जे नंतर मंदिर म्हणून बांधले गेले.
द्वारकाधीश मंदिर अनेक नावांनी देखील प्रसिद्ध आहे. यात 'कृष्णा मंदिर', 'द्वारका मंदिर' आणि 'हरि मंदिर' असे म्हटले जाते, परंतु द्वारकाधीश मंदिराच्या नंतर हे मंदिर 'जगत मंदिर' म्हणून सर्वाधिक ओळखले जाते. हे शहर भगवान श्रीकृष्णाने समुद्रातून ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बनवले होते, तेथे आप मंदिर आहे.
द्वारकाधिश मंदिर भव्य असून चुनखडी आणि वाळूचा वापर करून हे स्मारक चालुक्य शैलीमध्ये बनवले गेले आहे. जे भारतातील सर्वात प्राचीन शैली प्रतिबिंबित करते. तसेच हे मंदिर दगडाच्या तुकड्यावर बांधले गेले आहे असे देखिल म्हतले जात असून हे पाच मजली मंदिरआहे.
या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकावलेला असून भक्त सूर्य आणि चंद्राचे प्रतीक याला मानतात. या ध्वजाची उंची सुमारे 75 फूट असल्याचे सांगितले जाते. असेही म्हटले जाते की मंदिराचा ध्वज दिवसातून किमान पाच वेळा बदलला जातो, जेव्हा जेव्हा ध्वज खाली केला जातो तेव्हा भाविक त्यास स्पर्श करण्यास उत्साही असतात. या मंदिरात उपस्थित असलेले दोन दरवाजेही खूप महत्वाचे मानले जातात. उत्तरेकडे एक दरवाजा आहे, ज्याला 'मोक्ष द्वार' म्हणून ओळखले जाते. दुसरा द्वार दक्षिणेकडे दिशेला आहे ज्याला 'स्वर्ग द्वार' असेही म्हणतात. दक्षिण दरवाजामार्गे तुम्ही गोमती नदीच्या काठावरही जाऊ शकता.
द्वारकेचा राजा कृष्ण म्हणून कृ ष्णाला येथे द्वारकाधीश म्हटले जाते. द्वारका कृष्णासाठीच विश्वकर्म्याने वसविली असा समज आहे. या शहराचे उल्लेख महाभारत, हरिवंश, भागवत पुराण, स्कंद पुराण, विष्णुपुराणातही आहेत. संपन्न अश्या सौराष्ट्रातील हे शहर गोमती नदीकाठी असून त्याला द्वारमती, द्वारवती, कुशस्थली अशीही नावे आहेत.
गावात पाहायचे ते पहिले द्वारकाधीशाचे मंदिर. सहाव्या सातव्या शतकातले हे मंदिर असून मूळ मंदिर कृष्णाचा पणतू राजा वज्राने बांधले होते असा इतिहास आहे. पाच मजल्यांचे हे मंदिर चुनखडी आणि दगडात बांधले असून मंदिरावर असलेला ध्वज दिवसातून पाचवेळा बदलला जातो. येथेच स्वर्गद्वार आणि मोक्षद्वार आहे. गोमती जेथे सागराला मिळते तेथेच हे मंदिर असून द्वारकाधीशाची अप्रतिम सुंदर आणि दागदागिन्यांनी मढलेली मूर्ती भाविकांच्या नजरेचे पारणे फेडते. याच परिसरात कृष्णाचा पिता वसुदेव, देवकी, बलराम, रेवती, सुभद्रा, रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती यांचीही मंदिरे आहेत.
द्वारकेतील सुंदर रस्ते, महाल , सुदामा सभा या आणखी काही पाहण्यालायक वास्तू. येथे कृष्णाच्या राण्यांचे सात हजार महाल होते असेही सांगितले जाते. त्यातील कांही आजही पाहायला मिळतात. सुंदर बगिच्यांनी या शहराला अधिक देखणे बनविले आहे.
द्वारकेत निवासासाठी अनेक चांगली ठिकाणे असून खाण्यापिण्यासाठीच्या सोयीही चांगल्या आहेत. खास गुजराथी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. जाण्यायेण्यासाठी रस्ते वाहतूक अतिशय सोयीची आहे. रेल्वेची थेट सेवा आहे.
नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर :-
या क्षेत्रासंबधीत कथा अशी, दारुका या राक्षसीने माता पार्वतीकडून वर मिळवला आणि ती उन्मत्त झाली.तीचा पती राक्षस दारुक हा देखील बलवान राक्षस होता.त्याने राक्षसांच्या टोळीच्या सहाय्याने सगळीकडे हाहाकार माजवला होता.तो यज्ञ सुरु असताना तिथे जाउन ते नष्ट करायचा,तसेच ऋषी,मुनींची हत्या करायचा.हा दारुक भारताच्या पश्चीम किनार्यावर सोळा योजना विस्तार असलेल्या एका वनात रहायचा.
एकदा त्या समुद्रातून सुप्रिय नावाच्या वैश्य व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काही यात्रेकरु निघाले होते.सुप्रिय हा सदाचारी होता.तो कपाळावर नेहमी भस्म लावत असे तसेच गळ्यात रुद्राक्षाक्षी माळा धारण करीत असे,भगवान शंकराची पुजा केल्याशिवाय सुप्रिय कधीही भोजन करीत नसे.त्याच्याबरोबर असलेले यात्रेकरुसुध्दा शिवभक्त होते.ते सतत नमः शिवायचा जप करीत असत.सुप्रिय शंकराचा परमभक्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष शंकरानी दर्शन दिले होते.अश्या या सज्जन यात्रेकरुना दारुकाच्या राक्षसांनी पकडले आणि साखळदंड घालून कारागृहात बंद केले.दारुकाला जेव्हा या बंदीवान यात्रेकरुंविषयी समजले तेव्हा तो कारागृहात आला.
सुप्रिय व इतरांना दारुक धमकावू लागला.घाबरलेल्या सुप्रियने भगवान शंकराची प्रार्थना सुरु केली.त्याचा हा धावा एकून शिवशंकर एका विवरातून प्रगट झाले.त्याचबरोबर त्या ठिकाणी एक चार दरवाजे असणारे मंदिर निर्माण झाले.
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात एक दिव्य ज्योर्तिलींग प्रकाशमान झाले होते.भगवान शंकर आणि पुर्ण परिवार त्या ज्योतीच्या रुपात तिथे होते.सुप्रिय व इतरांनी शिवलिंगाची पुजा केली.सुप्रियच्या पुजेने प्रसन्न होउन भ्गवान शंकरांनी पाशुपत अस्त्राच्या सहाय्याने राक्षसांचा वध केला व ते वन सर्वांना निवास करण्यासाठी मुक्त केले.रक्षसांवर आलेले हे संकट पाहून दारुकाने माता पार्वतीची प्रार्थना केली व आपल्या कुळाच्या रक्षणाची विनंती केली.पार्वतीने दारुकाच्या विनंतीचा स्विकार केला व भगवान शंकराना माता पार्वती म्हणाल्या कि मी दारुकाला अभय दिले आहे.तेव्हा हे वन राक्षसांना रहाण्यासाठी असावे.यावर शंकर उत्तरले कि मी माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कटीबध्द आहे.जी व्यक्ती धर्माचे पालन करुन श्रध्द्दापुर्वक माझे दर्शन करेल ती व्यक्ती चक्रवर्ती राजा होईल.कलीयुगाच्या शेवटी व सत्ययुगाच्या प्रारंभी महासेनाचा पुत्र वीरसेन राजा हा महाराज होइळ.तो माझा परमभक्त व पराक्रमी असेल.या वनात येउन त्याने माझे दर्शन घेतले कि तो चक्रवर्ती सम्राट होइल.
रुक्मिणी मंदिर,द्वारका :-
श्रीकृष्णाची पहिली राणी रुक्मिणी होती हे आपण लहानपणापासून वाचले आणि ऐकले आहे. म्हणजेच त्याने प्रथम रुक्मिणीशी लग्न केले. त्यानंतर सत्यभामा, जांबवती आणि इतर पत्नीशी विवाह केला. मात्र कृष्णाच्या लोकप्रिय चित्रांमध्ये आणि प्रतिमांमध्ये, आपण त्याला मुख्यतः राधासोबत बघतो. तसेच काही रूपांमध्ये कृष्णाचे रुक्मिणीसह चित्रण केले गेले आहे. कृष्णाच्या विठ्ठल रूपामध्ये रुक्मिणी त्यांच्यासोबत राहते. म्हणून, कृष्णाबरोबरच, राधा आणि रुक्मिणी ही नावे दोन्ही श्रद्धेने घेतली जातात. एकीकडे ब्रिजभूमीवर राधाचे वर्चस्व आहे. त्याला राधाक्षेत्र असेही म्हणतात. दुसरीकडे, द्वारकेमध्ये कृष्णाबरोबर फक्त रुक्मिणीची पूजा केली जाते. राधाच्या काही मूर्ती द्वारकामध्येही आहेत, परंतु बहुतेक भक्त फक्त रुक्मिणीची पूजा करतात.
श्रीकृष्णांच्या विनंतीवरून विश्वकर्मा यांनी द्वारका नगरीचे निर्माण केल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णांच्या अवतारकार्य समाप्तीनंतर तत्कालीन द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली, असे सांगितले जाते. महाभारतकालीन एका कथेनुसार, रुक्मिणी देवीचे मंदिर द्वारका नगरीपासून लांब असल्यामागे एक विशिष्ट कारण असल्याचे सांगितले जाते. विवाहानंतर श्रीकृष्णाकडून एक चूक झाली होती. त्या चुकीमुळे रुक्मिणी आणि श्रीकृष्णांना १२ वर्षांपर्यंत वेगळे राहावे लागले होते. आता ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने कठोर तप केले होते, असेही सांगितले जाते.
रुक्मिणी देवी मंदिराची कथा :-
यदुवंशी ऋषी दुर्वासा यांना कुलगुरू मानत असत. त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर कुलगुरूंचे आशिर्वाद घेण्यासाठी ते दुर्वासा ऋषींच्या आश्रमात येतात. द्वारका नगरीत आदरातिथ्य करण्याची आणि सेवा करण्याचा मानस असल्याचे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना सांगतात. आजही द्वारकेपासून काही अंतरावर दुर्वासा ऋषींचा आश्रम असल्याचे आढळून येते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत. एक गोमती द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका ही पुरी आहे.
श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी दिलेले निमंत्रण दुर्वासा ऋषी आनंदाने स्वीकारतात. मात्र, श्रीकृष्णासमोर एक अट ठेवतात. आपण दोघे ज्या रथातून या आश्रमात आला आहात, त्या रथातून मी येणार नाही. माझ्यासाठी दुसऱ्या रथाची व्यवस्था करावी, अशी अट दुर्वासा ऋषी श्रीकृष्णाला सांगतात. कोणतेही आढेवेढे न घेता श्रीकृष्ण दुर्वासा ऋषींची अट मान्य करतात.

रुक्मिणीला दिलेले मह्त्व आपल्याल पहिल्यांदा द्वारकेत जाणवते. त्यांच्या अनेक कथा द्वारकेत लोकप्रिय आहेत. द्वारकेतील रहिवासी तिला प्रेमाने रुक्षमणी म्हणतात. द्वारका शहराच्या सीमेपलीकडे असलेले रुक्मिणी मंदिराला भेट देउ शकतो. तिथे एका फलकावर रुक्षमणीच्या लग्नाची माहिती लिहिलेली आहे.चला तर मग रुक्मिणी देवीचे सुंदर मंदिर बघायला जाऊया.

द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिरापासून 2 किमी. अंतरावर हे रुक्मिणीचे मंदिर आहे. आश्चर्य म्हणजे हे मंदिर द्वारकेच्या हद्दीत न राहता शहराबाहेर बांधले गेले आहे. प्राचीन काळी येथे जंगल असावे. द्वारकाधीशच्या मुख्य मंदिराचा समकालीन, हे मंदिर 12 व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. सध्या येथे फक्त एक मंदिर आहे आणि जवळच एक लहान पाण्याचे स्त्रोत आहे.
रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर एक उंच शिखर आहे ज्यावर प्राचीन कोरीवकाम अजूनही स्पष्ट बघु शकतो. शिखराच्या संपूर्ण पृष्ठभागावर अनेक मदनिकांचे म्हणजे कोरीव स्त्रियांचे कोरीवकाम आहे. त्याच वेळी, मंदिराचा पाया उलटा कमळ फुलाच्या आकारात आहे. या फुलाच्या वर हत्तींची एक रांग आहे, ज्यावर विष्णूच्या प्रतिमा तयार केलेल्या कोनाड्यांमध्ये आहेत. शिखरावर फडकणारा तेजस्वी भगवा ध्वज या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो.
समुद्राच्या पाण्यामुळे होणारी झीज मंदिराच्या दगडावर स्पष्ट दिसते. मंदिराच्या वरच्या बाजूस असलेल्या मंडपाचा वरचा भाग घुमट आहे. याचे कारण, मध्ययुगीन काळातील केलेले नूतनीकरण किंवा मुख्य मंदिराची बदलेली शैली असू शकते. एकतर हा मंडप मध्ययुगीन काळात जोडला गेला असता किंवा मुख्य मंदिराच्या जागी नवीन रचना केली गेली असावी.
तुम्ही रुक्मिणी मंदिरात प्रवेश करताच तिथले पंडित तुम्हाला थांबवतील आणि आधी रुक्मिणीची गोष्ट सांगतील. त्यानंतर भाविकांच्या लहान गटांमध्ये तुम्हाला मुख्य मंदिराच्या आत प्रवेश करण्याची परवानगी मिळते. मंदिरात प्रवेश करताच रुक्मिणीजींची सुंदर प्रतिमा मोहित करते. मंदिराच्या आतील भिंतींवर त्यांच्याशी संबंधित अनेक घटनांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. यावरून आपण अंदाज लावू शकता की त्यांना लोकांच्या मनात किती महत्त्व आहे. रुक्मिणी देवी मंदिर परिसरातील आणखी एक मंदिर आहे जे अंबा देवीला समर्पित केलेले आहे. अंबा देवी श्रीकृष्णजींच्या कुलदेवी होत्या.
रुक्मिणी मंदिराच्या बाहेर एकच मंडप होता ज्याचा हेतू समजू शकत नाही.रुक्मिणीचे मंदिर द्वारकेच्या मुख्य मंदिरांपेक्षा लहान आहे परंतु द्वारका शहराच्या बाहेर असलेल्या या मंदिराचे स्वतःचे एक वेगळेपण आहे.
लोक म्हणतात की कृष्ण आणि रुक्मिणीला शाप देऊनही मुनी दुर्वासाचा राग शांत झाला नाही. त्याने अगदी द्वारका शहराला वांझ होण्याचा शाप दिला. त्याच्या शापाचा परिणाम आजही इथे पाहायला मिळतो. द्वारकेच्या सभोवतालची जमीन कोरडी आणि नापीक आहे ज्यावर काहीही उगवत नाही. येथील लोक मीठ बनवून उदरनिर्वाह करतात.
गोपी तलावातही रुक्मिणीचे छोटे मंदिरही आहे.
रुक्मिणी देवीशी संबंधित श्रीमद् भागवतात 3-4 कथा प्रसिद्ध आहेत.
कृष्ण - रुक्मिणी विवाह
रुक्मिणी विदर्भाची राजकुमारी होती. विदर्भ म्हणजे सध्याच्या नागपूरच्या आसपासचा परिसर. म्हणूनच त्याला वैदर्भी असेही म्हणतात. रुक्मिणी विदर्भ राज भीष्मकाची मुलगी होती. तिचे लग्न चेदी राजा शिशुपाल बरोबर ठरले होते. हे लग्न रुक्मिणीला मान्य नव्हते. त्याने नारद मुनी आणि इतर अनेक महान व्यक्तिकडून श्री कृष्णाची इतकी स्तुती ऐकली होती की तीने कृष्णाशी लग्न करण्याचे ठरवले होते. भागवत पुराणानुसार,रुक्मिणीने फक्त गुणांच्या आधारे कृष्णाला स्वतःसाठी योग्य पती मानले होते.
असे म्हटले जाते की भारतीय पुराणानुसार रुक्मिणी ही आतापर्यंतची सर्वात सुंदर स्त्री आहे.ती महालक्ष्मीचा अवतार आहे. ती लक्ष्मीच्या रूपात नारायण आणि रुक्मिणीच्या रूपात कृष्णाची शक्ती आहे.
श्रीकृष्णाच्या कीर्तीने प्रभावित होऊन रुक्मिणीने त्याला आपला पती म्हणून स्वीकारले. शिशुपाल बरोबर लग्न ठरल्यानंतर त्यांनी कृष्णाला एक प्रेम पत्र लिहिले जे एकूण सात श्लोकांपुरचे होते. तीने स्वतःला पळवून नेण्याचा आग्रह कृष्णाना केला. लग्नापूर्वी मंदिर दर्शनासाठी जाताना अपहरण करण्याचा सल्लाही त्याना दिला.रुक्मिणीने हे पत्र एका दुताबरोबर पाठवले होते. काहींच्या मते पत्र नेणारा ब्राह्मण होता तर काहींच्या मते रुक्मिणीने हे पत्र हनुमानाला देउन पाठवले होते. काही जण म्हणतात की दूत गरुड होता.
रुक्मिणी पत्र
या पत्राची छापील प्रत द्वारकेच्या रुक्मिणी मंदिरात उपलब्ध आहे. पांढऱ्या पानावर लाल अक्षरात लिहिलेल्या या पत्रात मूळ 7 श्लोक आणि त्यांचे हिंदीतील अर्थ लिहिलेले आहेत. तसे, पंडित पंडित हे तासन्तास समजावून सांगू शकतात. तरीसुद्धा, या पत्रातील सविस्तर विवेचन पुरेसे आहे.
पत्राची सुरुवात रुक्मिणीने श्रीकृष्णाची स्तुती करून केली आहे. त्यानंतर प्रेम व्यक्त करणे आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणे. शिशुपाल यांच्यासोबत त्यांच्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान, त्यांच्यासाठी अपहरणाची योजना आखली. भविष्यातील युद्ध आणि रक्तपात होण्याची भीतीही तीने व्यक्त केली.त्याच्याशी विवाह व्हावा यासाठी कशी जन्मानंतर जन्माची वाट पाहत राहण्याचे व्रत कसे केले हे ही रुक्मिणीने लिहीले.
रुक्मिणी पत्र वाचन
द्वारकाधीश मंदिरात प्रत्येक रात्री, कृष्ण झोपायच्या आधी हे पत्र वाचले जाते. असे म्हटले जाते की इच्छित प्रियकरासोबत लग्नाची आशा करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ते वाचावे.
कृष्णा-रुक्मिणीच्या विवाहाच्या कथेकडे परत येउया. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण रुक्मिणीचे अपहरण करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर चैत्र महिन्याच्या एकादशीला दोघांचे लग्न पोरबंदरजवळील माधवपूर खेड नावाच्या गावात झाले. द्वारकेला पोहोचल्यानंतर कृष्णा आणि रुक्मिणीचे पुन्हा एकदा लग्न झाले.
आजही द्वारकेमध्ये कृष्ण-रुक्मिणी विवाहाचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी कृष्णाची मिरवणूक द्वारकाधीश मंदिरातून निघते आणि रुक्मिणी मंदिरात पोहोचते जिथे त्याचे लग्न झाले आहे. ही प्रथा द्वारकामध्ये बेट द्वारका आणि माधवपूर खेडसह सतत चालू आहे. रुक्मिणीला नऊ मुलगे आणि एक मुलगी अशी संतती झाली. नंतर त्यांचा मुलगा प्रद्युम्न श्री कृष्णाचा उत्तराधिकारी झाला.
वजनाची कथा :-
या कथेनुसार, एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णाच्या तिसऱ्या पत्नी सत्यभामाच्या मनात अशी शंका निर्माण केली, की कृष्णाचा कल रुक्मिणीकडे अधिक आहे. कृष्णावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी, त्याला त्याच्या ओझ्याइतकी मालमत्ता दान करण्यास सांगितले गेले. आव्हान स्वीकारून सत्यभामा यांनी कृष्णाला तुला राशीवर बसण्याची विनंती केली. पण तिची सर्व संपत्ती शिल्लक दुसऱ्या बाजूला ठेवूनही ती कृष्णाच्या ओझ्यावर मात करू शकली नाही. पराभवाच्या भीतीने सत्यभामांनी कृष्णाच्या इतर बायकांना मदत मागितली. त्याची संपूर्ण संपत्ती देखील सत्यभामाला मदत करण्यात अपयशी ठरली. शेवटी सत्यभामा ने रुक्मिणीला तिच्या मदतीसाठी विनवणी केली.
अखेरीस रुक्मिणीची पाळी आली, कृष्णाबद्दल बिनशर्त प्रेम आणि तिच्या अंत: करणात असणार्या अतूट भक्तीने,तीने फक्त एक तुळशीचे पान शिल्लक दुसऱ्या बाजूला ठेवले. आणि वजानाचा काटा दुसऱ्या बाजूला झुकला! म्हणजे कृष्ण केवळ भक्ती आणि समर्पणाने प्राप्त होऊ शकतो, संपत्तीद्वारे नाही.
द्वारकेमध्ये तुळभरची प्रथा अजूनही प्रचलित आहे. गोमती नदीच्या काठावर ठेवलेल्या तूळेवर भक्त हे गरीब आणि पीडितांना त्यांच्या वजनाच्या बरोबरीचे 7 प्रकारचे धान्य दान करतात. द्वारका यात्रेदरम्यान अशा प्रकारे दान करणे मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.
पंढरपुरातील रुक्मिणी
रुक्मिणीला महाराष्ट्रात पंढरपूरला आणण्यामागे एक रोचक कथाही आहे. कृष्णाची मुख्य राणी असल्याने, सर्व गोपी आणि इतर राण्यांनी रुक्मिणीला आदराने नमस्कार करणे आवश्यक होते. एकदा ती कृष्णा सोबत असताना राधा त्याला नमस्कार करायला उठली नाही. यामुळे संतप्त होऊन रुक्मिणी द्वारका सोडून निघून गेली आणि रागाने दिंडीर्वाणात आली. दिंडीरवन सध्या पंढरपूर म्हणून ओळखले जाते.
असे म्हटले जाते की कृष्णा, त्याची गाय, गंगा आणि गोवर्धन पर्वत देखील रुथी रुक्मिणीला राजी करण्यासाठी त्याच्या मागे गेले. अखेरीस कृष्ण त्यांना राजी करण्यात यशस्वी झाला. मग दोघांनी मिळून दही आणि मक्यातून दहीकाला नावाचा पदार्थ बनवला आणि उपस्थित सर्व हितचिंतकांना मेजवानी दिली. ही प्रथा जिवंत ठेवून आजही वार्षिक पंढरपूर यात्रेदरम्यान दही कला भक्तांना दिली जाते.
द्वारकेतील कृष्ण आणि सुदामा यांच्या विशेष भेटीची गोष्ट सांगताना रुक्मिणीचीही आठवण येते. कृष्णाने रुक्मिणीला सुदाम्याला पंख्याने वारा घालायला सांगितला. कृष्णाने सुदाम्याच्या आदरातिथ्याच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी रुक्मिणीला दिली होती.
हाजी किरमानी पीर,
बेट द्वारका, हाजी पीर किरमानी हे हॉटेल बेट द्वारकाच्या पूर्व किनाऱ्यावरील एक धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण इराणमध्ये स्थित किरमानचे सूफी संत हाजी किरमानी पीर यांना समर्पित आहे.
गोपी तलाव :-
द्वारकेमध्ये या ठिकाणी एक लहान तलाव आहे. आणि असे मानले जाते की भगवान श्रीकृष्ण येथे गोपिकांसोबत रासलीला खेळत असत. द्वारका शहरापासून उत्तरेकडे 20 किमी. या तलावाच्या काठावरील वाळू गोपी चंदन नावाची अतिशय मऊ आणि पिवळ्या रंगाची आहे जी भाविक टिळक लावण्यासाठी वापरतात. या गोपी तलावाशी संबंधित अनेक कथा आहेत. यातील एकाच्या मते, ज्या गोपींसोबत भगवान वृंदावनात नाचत असत, जेव्हा कृष्ण द्वारकेला आला, तेव्हा त्या गोपिका कृष्णापासून अंतर सहन करू शकल्या नाहीत आणि म्हणून या तलावाच्या काठावर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी येथे आल्या.
भालका तीर्थ :-
सोमनाथच्या उत्तरेस भालाका तीर्थ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. असे मानले जाते की ही तीच जागा आहे जिथे शिकारीने कृष्णाच्या पायावर अनवधानाने बाण मारला ज्यामुळे कृष्णाचा मृत्यू झाला आणि नंतर कृष्णाचा अवतार झाला. या मंदिराच्या आवारात तुळशीचे रोप आहे जे परमेश्वराच्या स्मरणार्थ लावण्यात आले आहे. जवळच देहोत्सर्गाचे मंदिर आहे. असे मानले जाते की ही तीच जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. भालका तीर्थात श्रीकृष्णाची एक मूर्ती आहे ज्यात असे दाखवले आहे की तो एका शिकारीच्या बाणाने मरण पावला ज्याने श्रीकृष्णाला चुकून हरिण समजले. सोमनाथ मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर बलदेव गुहा नावाचे एक ठिकाण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा भाऊ बलराम/बलदेव या गुहेतून पांढऱ्या नागाच्या रूपात काल्पनिक जगात गायब झाला, अशी आख्यायिका आहे, ज्यासाठी तो शेषनागाचा (सापांचा भगवान) अवतार असल्याचे म्हटले जाते.






मेवाडमधील चित्तौडगडची राणी मीराबाई लहानपणापासूनच श्रीकृष्णाची मोठी भक्त होती हे सर्वांना माहीत आहे . पण, मीराबाईंनी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण बेट द्वारकेमध्ये घालवले होते, हे फारसे कोणाला माहिती नाही. पौराणिक कथेनुसार, लग्नानंतरही मीराबाई कृष्णाच्या भक्तीत लीन झाल्या होत्या.पण लग्न झाल्यावर पतीसोबत राजवाड्यात रहात असताना त्यांच्याकडून केल्या गेलेल्या अपेक्षा आणि षड्यंत्रांनी निराश होऊन शेवटी तो राजवाडा सोडून बालकृष्णाच्या नगरी वृंदावनला गेला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कृष्ण स्तोत्र रचण्यासाठी आणि त्यांची स्तुती गाण्यासाठी समर्पित केले. गावोगावी प्रवास केल्यानंतर, कृष्णा भजने गायणाऱ्या मीराबाईंची ख्याती सर्वत्र पसरू लागली.

आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये बेट द्वारका गाठून त्यांनी मंदिरात भोग अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या कीर्तीची जाणीव असलेल्या पंडितांनी त्याला मान्यता दिली. मंदिराच्या आत ती तिच्या भक्तीद्वारे भगवान श्रीकृष्णात विलीन झाली. कृष्णाच्या मूर्तीला त्याचे पवित्र कपडे अर्पण करण्यात आले. या कथेवर विश्वास ठेवायचा कि नाही हे आपल्यावर अवलंबून आहे.पण ही कथा निश्चितपणे एक गोष्ट स्पष्ट करते की मीराबाईने तिचे शेवटचे क्षण बेट द्वारकेत घालवले.
बेट द्वारका मंदिर
बेट द्वारका, कृष्णा नगरीत अनेक मंदिरे असतील, तुमचा अंदाज असेल. पण बेट द्वारकेची जीवनरेखा द्वारकाधीश मंदिराभोवती फिरते. या मंदिराला भेट देण्यासाठी बहुतेक प्रवासी येतात.

बेट द्वारकाचे द्वारकाधीश मंदिर
द्वारकाधीश मंदिर हे बेट द्वारकेचे एक विशेष मंदिर आहे.लाखो भाविक त्याच्या दर्शनासाठी ओखा येथून फेरीने येतात. बेट द्वारका मध्ये इतर अनेक महत्वाची मंदिरे आहेत.असे म्हटले जाते की येथे स्थापित श्री कृष्णाची मूर्ती रुक्मिणी देवीने स्वतः स्थापित केली होती. सुमारे 5244 वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने शरीर सोडताना रुक्मिणीने ही मूर्ती स्थापित केली होती. गंमत म्हणजे बेट द्वारकेच्या या मंदिर परिसरात रुक्मिणी देवीचे एकही मंदिर नाही.

नाथद्वारा मंदिराप्रमाणेच बेट द्वारकेच्या या श्री कृष्ण मंदिरालाही शिखर नाही. इतर घरांप्रमाणे, त्याचे छप्पर साधारणपणे सपाट आहे.याचे कारण असे की द्वारकाधीश मंदिर हे काल्पनिक मंदिर आहे परंतु प्रत्यक्षात ते कृष्णाचे निवासस्थान होते जेथे ते आपल्या कुटुंबासह राहत होते.
द्वारकाधीश मंदिर परिसरातील इतर मंदिरे
बेट द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिर परिसरात कृष्णाची तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांची मंदिरे आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत-
राधिका राणी मंदिर - राधा द्वारकेतील गोकुळची राणी म्हणून ओळखली जाते. राधेच्या या मंदिराचे लाकडी दरवाजे आणि कोरीवकाम या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. जिथे कृष्ण आहे तिथे राधा असलीच पाहिजे. परंतु राधाजी कृष्णाची प्रिय मैत्रीण असल्याने तिचे मंदिर येथे मुख्य मंदिर परिसराच्या बाहेर आहे.मंदीर समुहामध्ये फक्त श्रीकृष्ण, त्यांचे भाऊ, त्यांची मुले आणि त्यांच्या पत्नींची मंदिरे आहेत.
या मंदिरात राधाजीची उत्सवमूर्ती आहे, म्हणजेच ती मूर्ती अचल नाही. याचा अर्थ असा की त्याची मूर्ती येथे सतत स्थापित केली जात नाही, परंतु तीला खास आणून येथे नेले जाते. जर तुम्हाला राधाजीची मूर्ती पाहायची असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यात येथे यावे लागेल. श्रावण महिन्यात राधेची मूर्ती महिनाभर बाहेर काढली जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी मूर्तीही बाहेर आणली जाते.
द्वारकाधीश मंदिर- द्वारकाधीश मंदिराचे मुख्य आकर्षण श्री कृष्णाची मूर्ती आहे, जी स्वतः रुक्मिणीने बनवली आहे. त्याची मूर्ती पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. दिवसभर मुर्तीला वेगवेगळे पोषाख परिधान केलेले असतात. जर जन्माष्टमीच्या दिवशी येथे आलात तर तुम्हाला या शृंगाराचा कळस पाहायला मिळेल. कृष्ण मंदिराच्या चांदीच्या द्वारावर तुम्हाला सूर्य, चंद्र, शंख, चक्र, गदा आणि पद्म दिसतात. गायीच्या जवळ उभे राहून बासरी वाजवत आहे.
बलराम - श्री कृष्णाचा मोठा भाऊ, बलरामाचे येथे त्रिविक्रम रूपात शिल्प आहे. त्रिविक्रमाची काळ्या दगडाची प्राचीन मूर्ती चार शस्त्रधारण केलेली आहे.
कृष्ण-रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न कल्याणरायाच्या रूपाने येथे उपस्थित आहे.
पुरुषोत्तमराय - त्यांना अधिक महिन्यांची देवता म्हटले जाते. अधिका मास म्हणजे एक अधिका मास जो हिंदू कॅलेंडरनुसार दर 3-4 वर्षांनी येतो. तपकिरी वाळूच्या दगडाने बनवलेल्या पुरुषोत्तम यांच्या मुर्तीच्या पुढे त्यांचा पलंग ठेवलेला आहे.
देवकी मंदिर- तुम्ही देवकीचे मंदिर कोठेही पाहिले नसेल. ज्या अंगणात कृष्णाची मूर्ती आहे, तिथे तपकिरी वाळूच्या दगडामध्ये बनवलेली देवकीची मूर्तीही आहे. द्वारकेमध्ये आई यशोदेचा कुठेही उल्लेख नाही. देवकी कृष्णाची आई म्हणून मंदिराच्या आत निवास करते.
मुख्य अंगणाभोवती प्रदक्षिणा करताच तुम्हाला इतर अनेक मंदिरे दिसतील. यातील काही मंदिरे खालीलप्रमाणे आहेत-
महालक्ष्मी मंदिर - कृष्ण मंदिरातील महालक्ष्मी मंदिर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल! येथे रुक्मिणी महालक्ष्मीचा अवतार असल्याचे मानले जाते. म्हणून कृष्णाची पत्नी म्हणून महालक्ष्मीची स्थापना केली जाते. येथे त्याचे स्वतःचे मंदिर आहे जिथे त्याची मूर्ती काळ्या पाषाणात स्थापित आहे.

मत्स्येश्वर मंदिर
अंबाजी ही कृष्णाची कुलदेवता होती. त्यामुळे त्याचे मंदिर येथे आहे. याशिवाय गोवर्धन मंदिर आहे. पुढे शेषावतार मंदिरात शेषावतारची मूर्ती आहे, ज्यावर शेषनागाची छत्री दिसते.या परिसरात कलियुगाची देवता सत्यनारायणाचे मंदिर देखील आहे. मंदिराच्या आत संगमरवरात बनवलेली त्याची सुंदर मूर्ती बघता येते.
साक्षी गोपाल, ही एक उत्सव मूर्ती आहे जी बेट द्वारकेच्या द्वारकाधीशजींच्या अचल मूर्तीच्या ऐवजी सर्वत्र नेली जाते. त्यांना द्वारका धाम येथे तीर्थक्षेत्राची देवता मानले जाते. लक्ष्मी नारायण, म्हणजे शक्तीसह विष्णू. बेट द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिरात लक्ष्मीनारायण मूर्तीची जोडी आहे जी काळ्या दगडापासून बनलेली आहे.
तुम्ही कधी कृष्णाचा मुलगा आणि नातूची मंदिरे पाहिली आहेत का? जर नसेल तर अशी मंदिरे तुम्हाला इथे नक्कीच दिसतील. येथे कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि नातू अनिरुद्ध यांची मंदिरेही आहेत. कृष्णाचे कुलपिता दुर्वासा यांना समर्पित एक मंदिर देखील आहे.
जामवंती - ती कृष्णाची दुसरी पत्नी आणि अस्वल राजा जांबवनची मुलगी होती.
सत्यभामा - ती कृष्णाची तिसरी पत्नी होती आणि द्वारकेच्या कोषाध्यक्ष सत्रजितची मुलगी होती.
गरुड - पौराणिक कथेत गरुडाबद्दल वाचले असेल. द्वारकाधीश मंदिराच्या आत गरुडाला देखील स्थान आहे. विष्णूचे वाहन गरुड दररोज सकाळी भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पाठीवर घेऊन त्यांची राजधानी गोमती, द्वारका येथे घेऊन जात असतो आणि दररोज सकाळी त्यांना बेट द्वारका येथील त्यांच्या महालात आणतात, अशी समजुत आहे.
गणेश मंदिर - मंदिराच्या आवारात प्रवेश करताच दिसणारे पहिले मंदिर गणेशाचे आहे. या गणेश मंदिरात गणेशाची स्थायी मूर्ती बसवली जाते.
द्वारकेच्या कृष्ण मंदिराबद्दल एक अनोखी गोष्ट अशी कि येथे सर्व पंडित, प्रत्येक देव किंवा देवीची माहिती देताना कृष्णाचा संदर्भ नक्कीच देतात. देवी -देवतांच्या महत्त्वाची स्तुती करताना ते कृष्णाशी असलेले त्यांचे संबंध आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान याविषयी माहिती दिली जाते.

दांडी हनुमान मंदिर
दांडी हनुमान मंदिर द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. येथे जाताना खडबडीत रस्ता आणि दोन्ही बाजूंना समुद्राने वेढलेली बेट द्वारका बेटाची अरुंद जमीन दिसते. जवळच एक छोटासा समुद्र किनारा आहे. मंदिराभोवती धर्मशाळा बांधलेली आहे. मंदिर खूप लहान आहे. आत दोन मूर्ती दिसतात. हनुमानजींची एक मूर्ती व दुसरी मूर्ती हनुमाजींचा मुलगा मकरध्वजची आहे. म्हणून याला पिता -पुत्राचे मंदिर म्हटले जाते.
रावणाचा बंधू अहिरावण आणि पाताळ राजा महिरावण यांची कथा ऐकली असेल. असे मानले जाते की मुलगा इंद्रजितच्या मृत्यूनंतर, रावणाच्या विनंतीवरून, अहिरावण आणि महिरावणाने या ठिकाणी राम व लक्ष्मणांचे अपहरण केले. याचा अर्थ हा की बेट द्वारका बेटाचा इतिहास कृष्ण युगापेक्षाही अधिक प्राचीन आहे. येथील रहिवाशांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही या मंदिरात हनुमानजींना सुपारी अर्पण केली तर ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
रणछोड तलाव :-
कोरीवकाम प्रवेशद्वार असलेला हा तलाव आकाराने बर्यापैकी मोठा आहे.हा तलाव या प्रदेशाचे शासक, बडोद्याचे गायकवाडांनी बांधला होते.
नवलखा मंदिर धुमाली, काठियावाड, गुजरात येथे आहे. हे मंदिर पौराणिक शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. दुरून हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने असेल असे वाटते, परंतु जवळून पाहिले तर ते खूप जुने असल्याचे लक्षात येते. असे मानले जाते की बाबरा नावाच्या भूताने हे मंदिर बांधले होते. नवलखा मंदिर सोमनाथच्या ज्योतिर्लिंगाप्रमाणे खूप उंच आहे.
मंदिराच्या आत, इतर मंदिरांप्रमाणे एक मोठामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दिशांना प्रवेशद्वार आहेत. त्याच्या तीन खिडक्यांमधून येणारी हवा आणि भरपुर प्रकाशामुळे हे मंदिर पाहणे पर्यटकांसाठी एक सुखद अनुभव आहे. नवलखा मंदिराच्या छताचा घुमट अष्टकोनी आकाराचा आहे. त्याच्या वर दगडांवर विविध पक्ष्यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. सभा मंडपाच्या दोन्ही मजल्यांच्या खांबांच्या वरच्या भागाला विविध आकार देण्यात आला आहे. यामध्ये, विशेषतः मानवी चेहरा, हत्तीचा चेहरा, माशांची जोडी, माकड आणि कामुक स्त्रीची शिल्प कलात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे. नवलखा मंदिराच्या पाठीमागील भागात दोन हत्तींचे शिल्प आहे, ज्यात दोघांना एकमेकांशी लढा देताना आणि त्यांच्या सोंडेने मस्ती करताना दाखवले आहे. मंदिराच्या बाहेरील भागात उत्तरेत लक्ष्मी-नारायण, दक्षिणेत ब्रह्मा-सावित्री आणि पश्चिमेला शिव-पार्वती यांची शिल्पे दिसतात. मंदिराच्या वास्तुकलेत खूप वैविध्य आहे. 10 वी ते 12 वी, 13 वी शतके दरम्यान धुमाळीतील जेठवा राज्याची समृद्धी, मंदिराच्या कारागिरीतून समजू शकते.
खिजाडिया, जामनगर (गुजरात ) पक्षी निरीक्षण :-
जामनगर हे पुरातनकाळी 'हलार' या नावाने ओळखले जायचे. इ.स.१९२० साली महाराज श्री रणजीत यांनी आताचे जामनगर वसवले आहे. इथे निसर्ग निर्मित बेट आणि समुद्र किनारे, टेकड्या, देवळे, राजवाडे, जंगल तसेच मरीन नॅशनल पार्क, मरीन सेन्चुरी मधले समृद्ध असे पक्षी जीवन, जलचर हे इथले वैशिष्ट आहे.ह्या पार्कचा इ.स.१९८२ साली मान्यता मिळालेले देशातले पहिले नॅशनल पार्क म्हणून उलेख करावा लागेल. ह्या नॅशनल पार्क १६२.८२ चौ.कि.मी. एवढा परिसर व्यापला आहे. तसेच मरीन सेन्चुरीने ४५७.९२ चौ.कि.मी परिसर व्यापला आहे. जामनगर ला काठीयावाडचा हिरा म्हणून संबोधले जाते.
या पार्कमधे समुद्रजिवनाचा एक नमुनाच नजरेस पडतो. गाईड अत्यंत अनुभवी असल्यामुळे त्याला साधारणतः कुठल्या दगडाखाली काय सापडेल याचा अंदाज असतो. आपल्या नशिबात असेल तर आपल्याल बरेच समुद्री जीव दिसतात.

सी-अॅनिमल. हा स्पर्ष झाल्यावर खाली जमिनीत एका सेंकदात नाहीसा होतो व वरती फक्त एक छोटेसे टोक राहते. वर जी भोके दिसतात त्यातून हा आपले खाद्य गिळतो...
द्वारका ते पोरबंदर रस्त्यावर कुसडी हे ठिकाण पक्षीनिरीक्षकांच्या दृष्टिने महत्वाचे आहे.
वास्तविक भूज पासून हे अंतर एक तासाचेच आहे पण जळगावकडून येणारी गाडी गांधीधामपर्यंतच असल्याने आम्ही तेथेच उतरायचा निर्णय घेतला होता. साडे नऊला मांडवीला पोहचून एका हॉटेलमध्ये तात्पुरत्या वेळेकरिता रूम सांगून ठेवल्या होत्या तेथे जाऊनताजेतवाने झालो. कपडे बदलले, जिलेबी-फाफड्याचा नाश्ता झाला आणि निघालो विजय विलास पॅलेस बघायला.
सन १९२९ साली महाराव केंगरजी III यांच्या काळात युवराज विजयराज यांच्यासाठी हा राजवाडा फक्त ग्रीष्म काळात वापरायच्या उद्देशाने बांधला होता. सन २००१ च्या भूकंपात भुज येथील 'रणजित विलास' महालाच्या काही भागात पडझड झाली त्यानंतर शाही कुटुंब (महाराव प्रागमूळजी व राणी प्रीती देवी) येथे वास्तव्यास आले होते. महालाच्या डागडुजीनंतर सन २०१८ ला ते परत रणजित विलास पॅलेसला राहावयास गेले. प्रागमूळजी यांचे याच वर्षी मे महिन्यात करोनामुळे निधन झाले.
४५० एकराच्या विस्तीर्ण जागेत हा राजवाडा वसवला आहे. याचे बांधकाम वाळूचे दगड (सॅण्ड स्टोन) वापरून करण्यात आलं आहे. राजवाड्याचे झरोके, सज्जे, छत्री अतिशय विलोभनीय आहेत. तळमजल्यावर भित्तिचित्रे आहेत, पाहुण्यांसाठीचा दिवाणखाना व छोटेसे वस्तू संग्रहालय पाहता येते. पहिला मजला शाही कुटूंबासाठी राहण्यासाठी असून तेथे प्रवेश नाही. या मजल्यावर गच्ची असून अतिशय सुंदर कठडे, सज्जे आहेत. मध्यभागी आणखी एक मजला इतक्या उंचीवर छत्री आहे जेथून आजूबाजूचा अतिशय सुंदर परिसर नजरेस पडतो. सभोवती बगीचे असून परिसरातच हेरिटेज हॉटेलही झालेले आहे. जवळपास दोन किमीचा खाजगी समुद्र किनारा आहे. हॉटेलचे बुकिंग असल्यास हा किनारा वापरता येतो.
तिकीट दर
महालाचे प्रथम दर्शन
दिवाणखाना
सुंदर खिडक्या
महाराणी प्रीतीदेवी ( मूळची त्रिपुराची राजकन्या,आज महाराणी ८३ वर्षांच्या आहेत!)
गच्चीतून दिसणारे कठडे, कमानी, छत्र्या.
गच्चीतून वरच्या छत्रीत जाण्यासाठीचा गोल जिना
वरच्या छत्रीतून दिसणारा परिसर
वरच्या छत्रीत थोडा आराम
महाल पाठीमागच्या बाजूने
महाल बघण्यास जास्त वेळ लागत नाही पण गच्ची व वरच्या छत्रीत फोटोग्राफी करण्यात तास-दीड तास केव्हाच निघून गेला . मांडवीत इतरही काही बघण्यासारखी ठिकाणे आहेत पण वेळेअभावी ती सोडण्यात आली आणि दुपारी येथून एक वाजता कच्छच्या रनसाठी रवाना झालो.
विजय विलास पॅलेस पाहून मांडवीतून कच्छच्या रन साठी निघालो. थोडी भूक
लागायला सुरुवात झाली होती पण जास्त वेळ वाया घालवायची इच्छा नव्हती. वाटेत
दाबेली आणि तसेच काही पदार्थ एका गावातील छोट्याशा स्टॉलहून खरेदी केले.
बाकी घरून आणलेलेही काही खाद्य पदार्थ होतेच. गाडीतच जेवण झाले.
भुज पार करून पुढे निघालो. एका ठिकाणी आपण काल्पनिक कर्कवृत्त रेषा ओलांडून
पुढे आलो. यानंतरही संपूर्ण सहलीत काही वेळा नकळत कर्कवृत्त ओलांडणार
होतो.
कच्छच्या रन प्रवेशासाठीचा ऑनलाईन परवाना काढायचा राहून गेला होता. वाटेत
एका चौकीवर शुल्क भरून तो घेतला. (रु.१००/- प्रति व्यक्ती अधिक गाडीचे ५०).
साडे तीनपर्यंत भुजपासून साठ किमीवर असलेल्या होडका या गावात आमचे
बुकिंग ज्या रिसॉर्टला होते तेथे पोहचलो. रिसॉर्ट पारंपरिक "भुंगा"
प्रकारच्या घरे असलेले होते. या प्रकारची घरे गोलाकार असून वर छप्पर
शंकूच्या आकाराचे असते. बांधकामासाठी चिखल,लाकूड, व गवताचा वापर केलेला
असतो.
आम्ही दोन दिवसांकरिता सहा भुंगा आरक्षित केलेले होते. भुंगा बाहेरून
जितके सुंदर वाटत होते तितकेच आतूनही होते. खिडक्या दारे, छत व त्यांची
रंगसंगती खूपच आवडली.
चार वाजले होते. कच्छचे श्वेत रण पाहण्यासाठी निघालो . साधारण अर्ध्या
तासात (२५किमी) येथे पोहचलो. रण सुरु झाल्यापासून थोड्या अंतरापर्यंत
रस्ता आहे. येथे एक उंच लोखंडी मनोरा बनविला आहे ज्यावरून दूरपर्यंचे रण
नजरेस पडते.
पावसाळा संपल्यावर पाणी भरलेला भाग सुकतो व समुद्री क्षारांमुळे उन्हात
अतिशय शुभ्र असा चमकतो. मावळत्या सूर्यप्रकाशात येथील बदलत्या रंगछटाही
सुंदर वाटत होत्या. चंद्रप्रकाशात विशेषतः पौर्णिमेच्या रात्री याचे
सौंदर्य अधिकच खुलते.
दूरपर्यंत पसरलेले शुभ्र रण , येथील सूर्यास्त वगैरे बघण्यात अलौकिक आनंद
आहे. उंटावरची फेरी व पगडी/पारंपरिक वेष भाड्याने घेऊन फोटो काढण्यात एक
वेगळीच मजा.
पार्किंग
मनोऱ्याहून दिसणारा नजारा
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLVtkX73xO-IttZrsiq8cnvRnCYkokN...
मनोरा
उंट सफारी
सूर्यास्त
अमावसेची रात्र असून सुद्धा विद्युत झोतात झगमगणारे रण
काही नकारात्मक गोष्टी : गुजरात पर्यटन मंडळातर्फे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात येथे रणोत्सव आयोजित केला जातो. प्रत्यक्षात जागेवर असे काहीच कार्यक्रम होताना दिसले नाहीत. भरपूर पैसे मोजून गुजरात टुरिझमच्या टेन्ट सिटीत राहिलो तरच तिथले भव्य सेट, या काळात तेथे होणारे स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम वगैरे अनुभवता येतील. रेतीच्या वाळवंटात भुसभुशीत वाळूत चालायला, छोट्या मोठ्या वाळूच्या टेकाडांवरून घरंगळायला खूप मजा येथे. इथे मात्र दूर दूरपर्यंत ओलसर मिठाचा एकसखल थर असलेली जमीन. आराम करण्यासाठी थोडेसे कुठे बसण्याचीही सोय नाही. एकच एक स्थिर देखावा आपण बघणार तरी किती वेळ. ज्या गोष्टीचा इतका उदो उदो होतो आहे ती एकदा अनुभवली. परत परत जाण्याइतके हे ठिकाण मात्र इतके काही खास वाटले नाही.
अंधार पडल्यावर परत निघालो. टेन्ट सिटी ते रण या अंतरात वाटेत दुतर्फा
काही खाण्यापिण्याचे तर काही कपड्यांचे, भेटवस्तूंचे स्टॉल लागलेले दिसले.
आमचे जेवण रिसोर्टलाच असल्याने आम्ही मात्र थांबलो नाही.
जेवणानंतर आमच्या रिसॉर्टला स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम झाला.
बहुतेक गाणी गुजराती, कच्छी भाषेत होती. कच्छी भाषेतील काही शब्द कळत
नव्हते पण कानाला गोड वाटत होते. मध्यभागी पेटवलेली शेकोटी थंडीला पळवून
लावत होती. कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या भुंग्यात पळाले.
आज सहलीचा दुसरा दिवस. आज माता ना मढ़ (आशापुरा देवी), नारायण सरोवर , कोटेश्वर मंदिर, लखपत फोर्ट असा जवळपास अडीचशे-तीनशे किमी भटकंतीचा कार्यक्रम होता पण काहींना थोडा थकवा जाणवत होता त्यामुळे लांबचा प्रवास रद्द करून ढोलावीरा जाण्याचा विचार केला. कच्छच्या रण पासून नवीनच झालेल्या शॉर्टकटमुळे हे शक्यही होते पण ड्रायव्हरने नकार दिला. रस्ता कच्चा व काही ठिकाणी अरुंद आहे. मोठ्या गाडीने जाणे कठीणआहे असे त्याचे म्हणणे.. त्यामुळे हाही पर्याय संपला. शेवटी सकाळी जवळचेच एक ठिकाण "कालो डुंगर" व दुपारनंतर भुज जवळील खेडे भुजोडी व तेथील वंदे मातरम स्मारक याला भेट द्यायचे ठरले.
सकाळी नऊला कालो डुंगरसाठी निघालो. आमच्या रिसॉर्ट पासून एक दीड तासाच्या अंतरावरील डोंगर म्हणजे कच्छ मधील सर्वात उंच ठिकाण. आपल्या महाराष्ट्रातील डोंगर पहिले तर याला एखादी टेकडीच म्हणता येईल. समुद्रसपाटीपासूनची याची उंची ४६२ मीटर असून येथून दूरपर्यंतचे कच्छच्या रण नजरेस पडते. येथून फक्त ४०किमी दूर भारत-पाकिस्तान सीमा आहे. डोंगरावर ४०० वर्षांपूर्वीचे दत्त मंदिर आहे. आजूबाजूला श्वेत रंगाचे रण व मधे हा काळपट दिसणारा डोंगर म्हणून याचे नाव काला डुंगर पडले असावे.
वाटेत पक्षी दर्शन
कालो डुंगर
दत्तात्रय मंदीर
दुपारी जेवणाच्या वेळी हॉटेलवर परत आलो. जेवण आटोपून लगेच भूजोडीला जाण्यासाठी निघालो. भुजोडी हातमागावर विणलेल्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लोकरी किंवा सुती शॉल , ब्लॅंकेट, गालिचे येथे रास्त दरात मिळू शकतात. भुजोडीला पोहचता पोहचता पाच वाजले. खरेदीला जायच्या आधी येथे असणाऱ्या वंदे मातरम स्मारकाच्या संग्रहालय व उद्यानाची तिकिटे आधी काढून घ्या असे ड्रायव्हरने सांगतले. घाई करूनसुद्धा संग्रहालयाची तिकिटे मिळाली नाहीत, फक्त उद्यानाची तिकिटे मिळाली यातच संध्याकाळच्या 'लाईट अँड साउंड शो" पाहता येतो. आतमध्येही हस्तकला व कपड्यांची दुकाने आहेत असे कळल्याने बाहेर फिरण्याचा विचार सोडून उद्यानात प्रवेश केला. हे स्मारक ब्रिटिश राजवटीशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंगांची आठवण करून देते. हे भव्य स्मारक १२ एकर जागेत वसलेले आहे.
सेल्फी पॉईंट
सातचा लाईट अँड साउंड शो पाहून रात्री रिसॉर्टला परत आलो. आज रात्रीही येथे स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होता तो जवळपास संपलाच होता. थोडा वेळ बाहेर शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो. थंडी वाढायला लागली तसे सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले.
सहलीचा पाचवा दिवस.
आज सोमनाथसाठी प्रवास सुरु करायचा होता. द्वारका ते सोमनाथ प्रवास चार तासांचा (२३०किमी) असला तरी वाटेत काही ठिकाणे बघायची असल्याने हा प्रवास सात-आठ तासांचा होणार होता. सकाळी सात वाजताच चहा पाहिजे म्हणून कॅन्टीनवाल्याला रात्रीच सांगून ठेवले होते. साडेसहालाच सर्व जण तयार होऊन सामानही गाडीत रवाना झाले होते. चहा झाला. हॉटेलचे बिल चुकते करून साडेसातला प्रवास सुरु झाला.
आज पहिला थांबा होता 'पोरबंदर'. रस्ता अतिशय चांगला असून सकाळच्या वेळी रहदारीही जास्त नव्हती. साडे नऊला पोरबंदरला पोहचलो. कधीकाळी ही नगरी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा याच्या नावाने सुदामापुरी नावाने ओळखण्यात येत होती. सध्याचे पोरबंदर हे महात्मा गांधीजींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
आजचे पहिले बघायचे ठिकाण होते अर्थातच 'कीर्ती मंदिर'. गांधीजींचे जन्मस्थान असलेले हे स्मारक म्हणजे तीन मजली घर (खरं तर दोनच मजली G +२) व घराला लागून असलेल्या वास्तूत नव्याने विकसित केलेले छोटेसे संग्रहालय. म.गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. गांधीजींच्या वापरात असलेल्या वस्तू, त्याचे काही जुने फोटो असलेली गॅलरी, पुस्तक संग्रहालय इ. गोष्टी येथे पाहावयास मिळतात. स्मारकाचे उदघाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते २७ मे १९५० रोजी करण्यात आले आहे.
गांधीजींचे जन्मस्थान स्वस्तिक चिन्हाने दाखविण्यात आले आहे.
गांधीजींच्या घराच्या मागील दरवाजाने बाहेर पडल्यावर बाजूच्याच गल्लीत कस्तुरबा गांधी यांचे जन्मस्थान असलेले घर आहे. कस्तुरबा यांच्या लग्नाआधीचे हे घरही जतन करण्यात आले आहे.
कस्तुरबा १३ वर्ष्यांच्या असताना त्यांचा विवाह गांधीजींशी झाला होता.
कस्तुरबा यांचे जन्मस्थान स्वस्तिक चिन्हाने दाखविण्यात आले आहे.
कीर्ती मंदिरापासून थोड्या अंतरावर (पायी किंवा रिक्षाने) सुदामा मंदिर आहे.
सांदिपनी आश्रमात शिकत असताना श्रीकृष्ण व गरीब कुटुंबातील सुदामा यांची चांगली मैत्री होती. शिक्षण आटोपल्यावर कृष्ण द्वारकेवर राज्य करण्यास निघून गेला. सुदामा मात्र येथेच गरिबीत आयुष्य काढीत होता. नंतरची कृष्ण-सुदामा भेट सर्वश्रुतच आहे. असं सांगतात सध्याचे मंदिर हे सुदामाची झोपडी ज्या जागेवर होती त्याच जागेवर उभे आहे.
साधारण दोन तासात हि सर्व ठिकाणे बघून गाडीपाशी आलो. चहा घेतला व पुढच्या प्रवासाला निघालो. सोमनाथकडे जातांना पोरबंदरपासून ६० किमीवरील माधवपूर हे पुढचे ठिकाण होते. जसजसे माधवपूर जवळ यायला लागले तसे महामार्गाच्या उजव्या बाजूने समुद्र किनारा दिसू लागला तर डाव्या बाजूने प्रचंड मोठ्या नारळाच्या बागा .
एका ठिकाणी उजवीकडे वळून समुद्र किनाऱ्याजवळ गेलो. एक भले मोठे शिवलिंग नजरेस पडत होते. बाजूने लांबच लांब समुद्र किनारा. लाटा जोरजोरात किनाऱ्यावर आदळत होत्या. आवाजावरून किनाऱ्याच्या बाजूलाच खोल पाणी असावे असा अंदाज येत होता. पोहण्यासाठी हा बीच निश्चितच सुरक्षित नसावा. छान वारा वाहत होता. मध्यान्ह असूनही ऊन जाणवत नव्हते..
थोड्याच अंतरावर महामार्गाहून डावीकडे वळल्यावर एक मंदिर आहे.
"रुख्मिणी नो चोरो "/ रुख्मिणी मंदिर, चोरी के फेरे
रुख्मिणीच्या विनंतीवरून कृष्णाने तिचे हरण केले. द्वारकेला पोहोचण्याआधी या ठिकाणी कृष्णाने रुख्मिणीसोबत फेरे घेऊन विवाह केला. मंदिराच्या बाजूने सुंदर नारळाची बाग आहे.
थोडे थांबून सोमनाथला निघालो. दीड तासाचा प्रवास होता पण वाटेत जेवणासाठी थांबल्यामुळे अजून अर्धा-पाऊण तास जास्त गेला. चार वाजता आमचे बुकिंग असलेल्या हॉटेलवर पोहचलो. लगेच आम्ही काही जण हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये शिरलो. गार पाण्यात प्रवासाचा सगळा शीण निघून गेला.
संध्याकाळी येथील स्थानिक ठिकाणे बघण्यास बाहेर पडलो.
सोमनाथ पाटण हे प्रभास पाटण या नावानेही ओळखले जाते. मुख्य मंदिरातील लाईट अँड साउंड शो जो रात्री आठ वाजता असतो तो बघायचा असल्याने आधी इतर ठिकाणे बघण्याचे ठरविले.
प्रथम गेलो त्रिवेणी संगमावर. येथे हिरण्या, कपिला आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. येथून पुढे त्या अरबी समुद्रात विलीन होतात. संगमावर किनाऱ्याने सुंदर घाट बांधले आहेत. द्वारकेप्रमाणे येथेही समुद्री पक्षांची झुंबड पाहायला मिळते.
येथून पुढे दोन किमीवर आहे "गोलोकधाम तीर्थ". यालाच देहोत्सर्ग तीर्थ असेही म्हटले जाते.
येथे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या अवताराची समाप्ती केली असे म्हणतात. असे सांगतात श्रीकृष्णाला विषारी बाण लागल्यानंतर ते काही अंतर चालत त्रिवेणी संगमावर आले. तेथे त्यांनी स्नान केले व पुढे या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला. या पवित्र ठिकाणी श्रीकृष्णाच्या पादुकांचे दर्शन आपणास घेता येते. येथे बलदेव गुंफा, गीता मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर अशी इतरही काही मंदिरे आहेत. (श्रीकृष्णला बाण लागला ते ठिकाण 'भालका तीर्थ" व जेथून बाण सोडला गेला ते ठिकाण 'बाणगंगा" आम्ही उद्या सकाळी बघणार आहोत)
सोमनाथ येथे अजून एक आवडीचे ठिकाण बघायचे होते ते म्हणजे येथील "प्रभास पाटण संग्रहालय". येथे अनेक प्राचीन शिल्प आहेत. पण आज वेळ नव्हता आणि त्यातच आजचा दिवस बुधवार होता ज्या दिवशी संग्रहालय बंद असते. एक चांगले ठिकाण बघायला मुकलो याची थोडी रुखरुख मनात राहिली.
संध्याकाळचे सात वाजून गेले होते. येथील सोमनाथाचे मुख्य मंदिर पाहण्यासाठी निघालो.
मंदिरात मोबाईल वगैरे कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येत नाही तसेच पैशांची वगैरे छोटी पर्स सोडली तर इतर कुठलीही मोठी पिशवी/बॅग सोबत नेता येत नाही.
मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य मंदिर मानले जाते. मंदिरात गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप असे भाग असून १५० फूट उंच याचे शिखर आहे ज्यावर २७ फूट लांब ध्वज फडकत आहे.
मंदिराचा इतिहास खूप प्राचीन असून इ.स.१०२६ मध्ये मोहम्मद गजनीने येथे प्रचंड लूट केल्याचे कळते. लुटीबरोबरच मंदिराची नासधूस व प्राणहानीही करण्यात आली होती. यानंतरही मंदिर अनेक वेळा वसवण्यात आले व अनेक वेळा आक्रमणांना बळी पडले.
सध्याचे मंदिर सन १९४७ मध्ये बांधले गेले असून हे सातवे पुनर्निर्माण असल्याचे सांगितले जाते.
मंदिराचा इतिहास सांगणारा "लाईट अँड साऊंड शो " रात्री आठ वाजता आयोजित केला जातो. साधारण पाऊण तासाचा हा सुंदर कार्यक्रम आम्हाला पाहण्यास मिळाला.
आहिल्याबाई होळकर यांनी सन १७८३ मध्ये विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळच एक नवीन मंदिर निर्माण केले. या मंदिराला जुने सोमनाथ मंदिर किंवा आहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखल्या जाते. वेळेअभावी आम्ही हे मंदिर बघू शकलो नाही.
हा फोटो जालावरून साभार
हॉटेलवर जाण्यास रात्रीचे साडे नऊ झाले. जेवण आटोपून आवारात लावलेल्या झोपाळ्यावर, खुर्च्यांवर थोडावेळ विसावून झोपायला गेलो.
हॉटेल सरोवर पोर्टिको
सकाळी नाश्ता आटोपून नऊ वाजता हॉटेल सोडले. दहा मिनिटात (५ किमी) वेरावळ येथील "भालका तीर्थ" या ठिकाणाला पोहचलो.
पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण येथे पिंपळाच्या झाडाखाली एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून
आराम करीत होते. लांबून एका पारध्याला पायांची हालचाल जाणवली. हरीण असावे वाटल्याने त्याने बाण सोडला तो कृष्णाच्या डाव्या पायाचा अंगठा व शेजारील बोट या जागेत लागला. पारध्याने जवळ जाऊन पहिले असता त्याला आपली चूक कळली. कृष्णाने न रागवता त्याला उदार अंत:करणाने माफ केले.
हा फोटो जालावरून साभार
येथून जवळच "बाणगंगा" हे ठिकाण आहे. असे मानल्या जाते कि येथूनच पारध्याने बाण सोडला होता. समुद्र किनारी हे ठिकाण असून ओहोटीच्या वेळी समुद्रात असलेली दोन ज्योतिर्लिंगे नजरेस पडतात. येथे जास्त काही बघण्यासारखे नाही. तासाभरात दोन्ही ठिकाणे बघून आम्ही आमचे पुढचे ठिकाण सासन गीर साठी रवाना झालो
क्रमश:
No comments:
Post a Comment