


गिरनार परिसरातील जैनधर्मीयांची स्थाने:- तिसर्या शतकापासून गिरनार हे जैनधर्मीयांचे महत्वाचे धर्मिक ठिकाण आहे.इथे तीर्थंकर नेमिनाथ मंदिर, भगवान ऋषभदेव, मल्लीनाथ, भगवान पार्श्वनाथ मंदिर हि प्रमुख मंदिर शिवाय अन्य काही मंदिर आहेत.
प्रवेश शुल्क :- निशुल्क
गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान
कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.
त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.
मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.
गिरनार बद्दल नक्की कधी ऐकले होते लक्षात नाही पण लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंकडे श्री. प्रमोदजी केणे यांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक वाचायला मिळाले व गिरनार विषयी उत्सुकता वाढली. तरीही गिरनार इथून किती लांब आहे, शिवाय १०हज्जार पायऱ्या चढायच्या.. छे.. हे काही आपल्याने होणार नाही म्हणून सोडून दिलेले.. प्रमोदजींना आलेले अनेक दिव्य अनुभव वाचून लोक भारावून गिरनारला जातात.. तसे माझे काही झाले नव्हते.. आणि हे त्यांचे अनुभव त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याईच्या शिदोरीमुळे होते.. सगळ्यांना थोडी येतात ते.. माझे व्यावहारीक मत.. शिवाय अश्या अनुभवांमुळे नक्की काय फरक पडतो जीवनात तेही माहीत नाही.
पण मग गिरनार विषयी गुगलवर वाचत गेले, जेंव्हा जेंव्हा जे जे वाचायला मिळेल ते वाचत होते. त्यात असे कळाले की पायऱ्या कठीण असतात वारा जोराचा वहात असतो, शिखर खूप उंच आहे, रस्ता एकदम घनदाट जंगलातून जातो. जंगल इतके दाट आहे की रात्रीच्या वेळी वन्य श्वापदे मार्गावर दिसतात.. का कुणास ठाऊक पण दाट जंगल म्हटले की मला त्याची ओढ लागते.. भीतीही वाटतेच.. पण जंगलात जायला, रहायला मनापासून आवडते. त्यामुळे अजुनच जावेसे वाटायला लागले. त्यात अचानक ध्यानी मनी नसताना माझ्या सासुबाई आणि माझ्या २ नणंदा गिरनारवर जाऊन आल्या.. त्यांचा उत्साह पाहुन माझी इच्छा आणखीन प्रबळ झाली.. ६० च्या आसपास वय असलेल्या माझ्या सासुबाई लीलया गिरनार चढून उतरल्या.. मग आपण का बर कच खावी असं वाटायला लागलं.. (सासुबाईंची क्षमता आणी इच्छाशक्ती अफाट आहे हे अलहिदा.)
मग काय सगळ्यांना सांगून झालं की कुणी जाणारं असेल गिरनारला
तर मला सांगा, मलापण यायचं आहे. साधारण ३ एक महिन्यांपुर्वी आमच्या पुर्वी
शेजारी रहाणाऱ्या काकुंचा फोन आला.. पुण्याहून एक ग्रुप नोव्हेंबरमधे
जातोय तर आपण जायचं का. तेव्हा माझ्या प्रोजेक्टचं काम चालू होतं पण
नोव्हे. पर्य्ंत ते कमी होणार होतं, तेंव्हा सुट्टी मिळण्याची शक्यता
होती.. मी हो म्हणून टाकलं. मनी विचार केला पुढचं पुढे पाहू..
पण लगेचच
त्यांचा दुसरा फोन आला की नवरात्रापर्यंत त्यांच नक्की काय ते ठरेल.. काही
अडचणींमुळे त्यांचं नक्की होत नव्हत.. झालं मी थोडी थोडी माहीती वाचायला
सुरवात केलेली, सकाळी लवकर उठून चालायला जाण्याची मनाची तयारी करत असतानाच
(हो, मला आधी लवकर उठण्यासाठी मनाची तयारी करावी लागते, मग शरीराची.. लै
अवघड काम असतंय ते) काकूंनी अस सांगितल्यामुळे परत सगळ शांत झाल.. कांकू
दिवाळी दरम्यान जाण्यासाठी मोकळ्या झाल्या आणी आता परत आमच जाण्याच ठरू
लागलं.. त्या ग्रुपला फोन केला तर जागा नव्हती ती लोकं ८ तारखेलाच निघणार
होती.
शेवटी आम्ही आमचं जायचं ठरवलं आणि १२, १३,१४ ची तिकिटे काढली.. जातानाची वेटिंगवर होती तर येतानाची कन्फर्म झालेली. आता ऑफीसमध्ये सांगून सुट्टी टाकून, कामे मॅनेज करून परत चालण्यासाठी, लवकर उठण्यासाठी, मनाची, शरिराची थोडी थोडी तयारी सुरु केली. नेटवर वाचताना असे लक्षात आले की कार्तिकी पौर्णिमा दत्तदर्शनासाठी महत्वाची मानली जाते, त्यामुळे तिथे खुप गर्दी असणार.. आम्ही रहाण्याचे तिथे गेल्यावर पाहू असे ठरवले होते कारण अनेक धर्मशाळेत सहज जागा उपलब्ध होते, पण आता तसे चालणार नव्हते.. मग परत शोध सुरु झाला.. ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो, त्यांची काकुंशी अधीची ओळख होती म्हणून त्यांनाही विचाराचे ठरले कारण ते निघणार तेंव्हा आम्ही गिरनारला पोहोचत होतो, त्यांच्यापैकीच एखादी खोली आम्हाला मिळाली असती तर काम सोपे होणार होते. ऑनलाईन धर्मशाळा फुल दिसत होत्या.. काकुंनी त्यांना फोन केला तर त्या म्हणाल्या असे नाही होऊ शकणार पण ऐनवेळी ३ जणांनी रद्द् केल्याने जागा आहे तेंव्हा तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. जातानाची ३ तिकिटे आहेत आमच्याकडे फक्त येतानाची २ च् आहेत एकाच तात्काळमध्ये पहावं लागेल.
हे सगळे ६ तारखेला चालले होते आणि ही लोकं ८ तारखेला निघणार
होती. मी तारखा पाहिल्या तर मला जास्तीची सुट्टी टाकावी लागणार नव्हती पण
सुट्टी अलिकडे मात्र घ्यावी लागणार होती.. एक कांम नेमके शुक्रवारी किंवा
सोमवारी येऊ शकत होते, आता परत डेव्हलमेंट टिम, आमचा ऑनसाईट असलेला माणूस,
मॅनेजर या सर्वांशी परत बोलावे लागणार होते.. अधीची मंजूर झालेली रजा परत
कॅन्सल करणे, नव्याने रजा टाकणे, कामाची आखणी करणे आले. पण सर्वांनीच
सहकार्य दिले आणि ६ तारखेला संध्याकाळी ग्रुप बरोबर ८ तारखेच्या
संध्याकाळच्या गाडीने निघण्याचे नक्की झाले.
हे सगळे होईस्तोवर Open SAP
teamचा इमेल आला.. मी एका कोर्ससाठी नाव नोंदणी केली होती तो बरोबर ६
तारखेपासून सुरु होणार होता आणि पहिल्या आठवड्याचे साहित्य आणि सराव
परिक्षा नेटवर उपलब्ध झाले होते. सराव परीक्षा १४ तारखेच्या आत द्यायची
होती.. आम्ही १३ला रात्री येणार म्हणजे जायच्या आधी हे सगळे पुर्ण करायला
हवे होते..
७ तारखेचा दिवस यातच गेला आणि ८ला दुपारी आम्ही निघणार होतो.. तयारी तर शुन्य होती.
आधी १२ तारखेच ठरलेलं तेंव्हा शनि, रवि हातात असणार होते.. तेंव्हा मायबोलीवर एकीचा गिरनारचा प्रवास वाचायला सुरू केलेली.. तिने बरीच शारीरीक तयारी, आखीव व्यायामाचे नियोजन वगैरे केलेले.. ते आठवले आणि ताण यायला लागला.. इतका की संध्याकाळी पित्ताने डोके दुखी वाढली.. याला अजुन एक कारण होते.. आम्ही गिरनारचा विचार केलेला तो गुरुशिखर चढून पादुकांचे दर्शन घेण्याचा.. पण ह्या ग्रुपमधे परिक्रमाही होती ज्यासाठी ३८ ते ४० किलोमीटर चालावे लागते.. दोन्ही कसं जमणार, परिक्रमा तर आधी होती आणि मग गुरुशिखर.. म्हणजे परिक्रमेने दमलो तर गुरुशिखरावर पाणी सोडावे लागणार होते आणि ते मन मानायला तयार होत नव्हते.. शेवटी मनाची तयारी केली कि परिक्रमा वर्षातून फक्त ५ दिवस - कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंतच करता येते तेंव्हा तिला प्राधान्य द्यायचे गुरुशिखरावर १२ही महिने जाता येते तेंव्हा तिथे परत जाता येईल.
मनाला आश्वस्त करित ८ तारखेला घरची कामे मार्गी लावीत
तयारी पुर्ण केली. ८ तारखेला घरून काम करण्याची परवानगी मिळाल्याने अनेक
गोष्टी कमी वेळात मार्गी लावणे शक्य झाले.
अगदी निघायच्या वेळी बॅग भरत २.३०ला निघणारे आम्ही ३ ला मार्गस्थ झालो.
मला जसे आठवत होते तशी मी सामानाची यादी करत होते अगदी टूथपेस्ट्, कंगवा ई. ई. ज्याचा फायदा निघताना ऐनवेळी बॅग भरताना झाला व काहीही न विसरता ३ वाजता मी बांद्रा स्थानकाकाडे निघाले..
क्रमश:
नीलाक्षी
माझ्याबरोबर
शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार
नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र
प्रवास सुरु झाला..
ओला बुक केली होतीच गाडीत बसल्यावर गेले २/३ दिवसाचा
ताण निवळला आणि डोळे पेंगू लागले.. मनोमन कुलदेवतेला, दत्तात्रयांना आणि
आई बाबांना नमस्कार केला. त्यांच्या पुण्याईनेच हा दिवस उजाडला होता..
बाबा, माझी आजी, आई आणि आजोळ हे दत्तभक्त. मी त्यांच्यामध्ये नास्तिकच!
बाबा आणि आजीला स्वामी समर्थांचे वेड.. त्यांचा स्वामींवर गाढ विश्वास..
बाबांनी अगदी शेवट पर्यंत गुरुवारचे स्वामी दर्शन सोडले नव्हते.. आईने तर
सगळे आयुष्यच त्यांच्या भरवश्यावर जगलेले.. माझी धाकटी बहीणही त्यांच्याच
पावलावर चालणारी.. मीच कशी काय नास्तिक जन्मले या लोकात देव जाणे.. माझे
म्हणणे अगदी स्पष्ट असे की देवाला जर सगळ्यांची काळजी आहे तर त्याला
नमस्कार न करता, त्याची पुजा न करता त्याने सर्वांना आनंदी ठेवायला हवे. हा
म्हणजे व्यवहारच झाला की तु माझे स्तोत्र म्हण मग मी तुला बळ देतो.. आता
जसे वाचन वाढते आहे तसे हळुहळू उमगतंय असं वाटते आहे.. देव म्हणा निसर्ग
म्हणा ही एक उर्जा आहे, आणि तिची शक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर
तिच्याशी संधान हवे. जसे इलेक्ट्रीसिटी घराबाहेर पोलवर वाहते आहे, पण घरात
दिवा लावण्यासाठी, पंखा लावण्यासाठी, एसी ला वेगवेगळ्या पॉवरची बटणे, वायर
टाकून ती घरात आणावी लागते. तिचे बटण गरज असताना दाबावे लागते तेंव्हा दिवा
लागतो.. देवाचंही तसंच काहीसं असावं!
असो..तर
आम्ही अगदी वेळेत गाडी सुटायच्या तासभर आधी स्टेशनवर पोचलो. गाडी फलाटावर
लागली होती आणि बरीचशी लोकं गाडीत आपापल्या जागेवर गेलेली होती. जी थोडीफार
मंडळी फलाटावर होती त्यांना भेटलो आणि आमच्या जागा जाणून घेऊन स्थानापन्न
झालो.. गाडी अगदी वेळेवर सुटली आम्ही राजकोटच्या दिशेने निघालो. आजुबाजुला
पाहीले तर सगळीच मंडळी गिरनारला निघालेली.. हळुहळू असे जाणवले की सारा डबाच
गिरनारयात्रींनी भरलाय.. प्रत्येक ग्रुपच्या सहकाऱ्यांची वेगवेगळ्या
डब्यांत वाटणी झालेली त्यामुळे बराच वेळ लोक या डब्यांतुन त्या डब्यात करत
होती.
अखेर सगळे स्थिरस्थावर झाले, रात्री आम्हाला पॅक फूड देण्यात आले,
मस्त पोळी भाजी, मसाले भात होता.. आम्ही जेवून झोपेची आराधना करू लागलो..
काही लोकांना ५ वाजता अलिकडच्या स्टेशनावर उतरायचे असल्याने दिवे बंद करून
मंडळी ढाराढूर झोपली.
मला मात्र काही केल्या झोप येईना एक तर सर्वात वरचा बर्थ होता त्यामुळे सतत पडण्याची भीती. शेजारी एक लहान मुलगी होती एकदम चुणचुणीत, ती सर्वांना बालसुलभ विनोद सांगत होती, अखंड बडबड चाललेली. तिच्या निरागस गप्पा ऐकीत झोपेच्या आधीन झाले.. सकाळी ६लाच जाग आली, म्हणजे रात्रभर गाढ झोप नव्हतीच पण आता डुलकीही येईना तेव्हा उठून बसले.. थोड्याच वेळात बाकीची मंडळी उठली. गाडी बरोब्बर वेळेत राजकोटला पोचली. आयोजकांनी बस तयार ठेवली होती, मधे आंघोळीसाठी थांबून सोमनाथकडे प्रयाण केले.
सोमनाथची २ मंदिरे आहेत, एक नवे जिथे पाताळात खाली महादेव स्थापिले आहेत व त्यावरच्या मजल्यावरपण एक पिंड. पुर्वी हिंदूमंदिरे आक्रमणांपासून वाचविण्यासाठी ही व्यवस्था.
बऱ्याच लोकांना जुने मंदिर माहीत नसते ते फक्त नवीन मंदिरच पहातात. दोन्ही मंदिरे एकदम जवळ जवळ आहेत. हे मंदिर अनेकवेळा पाडले गेले व पुन:पुन्हा उभे केले गेले असे म्हणतात. अतिशय सुंदर बांधकाम, शंकराची पिंडही मोठ्ठी आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. मी मंदिरात शिरले तेंव्हा प्रदोषाची सायंकाळची पुजा चालु होती. विविधरंगी, विविधसुगंधी फुले इतक्या आकर्षकपणे मांडली होती की पहात रहावे. मंत्रांचा धीरगंभीर आवाज गाभाऱ्यात घुमत होता.. एक प्रसंन्नता मंदिर वेढून राहीली होती. मनात शंकराचार्यांचे आत्मषटक घोळत होते - चिदानंदरुपम् शिवोहं शिवोहं !
चंद्राने दक्षाच्या शापातून मुक्त झाल्यावर येथे शिवलिंगाची स्थापना केली असे पौराणिक कथा सांगतात तर मंदिराचा उल्लेख अगदि इ.स. पुर्वीपासून इतिहासकारांना मिळतो. सध्याचे मंदिर हे सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधले आहे.
मी दर्शन घेतले आणि मागे गेले, देवळाभोवती बाग
थाटली होती, हिरवळ पसरलेली चहूबाजूनी. त्याच्याकडेने सज्जा होता सागर
दर्शनासाठी. देवळातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूलाच प्रसिद्ध असलेला
बाणस्तंभ पाहीला. म्हटलं व्हॉटस् ॲपचे सगळेच मेसेजेस् फेक नसतात तर
तर या खांबावर एकबाण दाखवून एक श्लोक कोरलेला आहे. त्याचा अर्थ असा की बाणाच्या दिशेने सोमनाथ मंदिर आणि दक्षिण ध्रुव यात कुठलाही भुभाग नाही. हा स्तंभ ६व्या शतकातील आहे म्हणतात.
मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, पुर्वी आलेली लोकं सांगत होती की भरतीच्या वेळेत पाणी मंदीरात शिरत असे. आता मात्र भर टाकून बहुतेक, समुद्रापासून थोड उंचावर वाटलं देऊळ. मस्त समुद्रजल शांतपणे हेलकावत होतं.. दूरवर काही नावा दिसत होत्या एकूण शांतता वाटत होती मनाला..
सोमनाथाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान ठेवलं. जुनागढ हे गावच एक गड आहे म्हणे. त्यामुळे गावाला अनेक मोठमोठाले दरवाजे दिसतात. तसेच बाजूची तटबंदीही सतत दिसत रहाते. काही ठिकाणी पडझड झालीय. पण बऱ्याच अंशी तटबंदी शाबूत असावी.
रात्री जुनागढ स्टेशनजवळ गीता लॉजमधे जेवलो, जेवण अप्रतीम होतं. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी मधुर ताकाचा जगच टेबलवर आणून ठेवला.. मी मस्त २/३ ग्लास ताकच प्यायले.. केरळमध्ये सांबार, रस्सम, नाशिकला मिसळीच्या ठिकाणी रस्सा तस इथे अनलिमिटेड ताक.. भारीच.. जुनागढला जाणाऱ्यांनी एकदातरी इथे जेवाव. जेवणे आटोपून रात्री १०.३०ला आम्ही आमच्या खोल्यात पोचलो.
रहाण्याची सोय तळेठीला नरसी मेहता धर्मशाळेत होती. धर्मशाळा असली तरी सोय उत्तम होती. खोलीत गरमपाणी, एसी, सगळ्या सुविधा होत्या. आता २/३ दिवस आमचा ईथेच मुक्काम असणार होता. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आलेला होता. उद्या सकाळी ४.३०लाच परिक्रमेला निघायचे होते. तेंव्हा खोलीत गेल्यावर ताबडतोब झोपून गेलो.
क्रमश:
सकाळी ४.३०ला बाहेर प्रांगणात सगळ्यांनी भेटायचे ठरलेले. ३.३०लाच उठलो, आवरून बरोब्बर ४.३०ला बाहेर हजर झालो. समोर गिरनारच्या पायऱ्यांवरील लाईटस् दिसत होते.. त्या दिव्यांच्या ओळीवरून रस्ता कसा जात असेल ते कळत होते. सारी मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. ग्रुपलीडरने परिक्रमेच्या दृष्टीने काही सूचना दिल्या उदा. टॉर्च घेतल्याची खात्री करणे, काठ्या गरज लागत असेल तरच घ्या.. बऱ्याचदा घेऊन नुसतेच ओझे होते इत्यादी. धर्मशाळेच्या बाहेर पडून आम्ही सगळ्यांनी चहा/ कॉफीपान केले, ज्यांना काठ्या घ्यायच्या होत्या त्यांनी काठ्या निवडल्या आणि चालायला सुरुवात केली. हो आता कुठेही जायचं तर खोलीतून निघायचं व थेट चालू लागायचं
आता परिक्रमेविषयी थोडेसे:
गिरनार
पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे
असे म्हणतात. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट
डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत
नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला करतात.
ही परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत करतात. पहिला दिवस भवनाथमंदीरापासुन सुरु होतो. दुसरा मुक्काम जीना बाबांची मढी, तिसरा मालवेल आणि शेवटचा बोरदेवी मंदीर. अश्याप्रकारे एकादशीपासून सुरु करुन पौर्णिमेला परीक्रमेची समाप्ती करतात. हल्ली एखादा मुक्काम करुन किंवा एका दिवसात सलग चालून १२/१४ तासात पुर्ण करतात. पण एक तरी मुक्काम असावा असे शास्त्र आहे. (मी भाडीपाची फॅन आहे) यादरम्यान सर्व देव, यक्ष, गंधर्व, यती, ऋषी असे सगळेजण परिक्रमा करत असतात व त्यांचा सहवास व आशीर्वाद मुक्काम केल्याने मिळतो अशी भावना आहे.
तर अश्या या परिक्रमेच्या वाटेवर आमची पाऊले पडू लागली.
एवढ्या
पहाटेसुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी आश्रम उघडे दिसत होते. अखेर ती कमान
आली.. गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार... आता खऱ्या अर्थाने चालणे सुरु होणार
होते. अंधार मी म्हणत होता.. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा अंधार
होता. या रस्तावर चालायला विजेरी अत्यावश्यक आहे. मधे मधे इतरांच्या
विजेरीचा उजेड मिळतो पण तुमच्या पायाखाली खड्डा आहे की उंचवटा आहे ते
पहाण्यासाठी तुमच्या हातात विजेरी हवीच हवी..
हेच ते प्रवेशद्वार :
मी परिक्रमेला सुरवात झाल्यावरच आमचा ठरलेला ग्रुप सोडून पुढे चालायला सुरवात केली. काल सोमनाथ मंदीरात झालेल्या चुकामुकीमुळे जरा लीडरनी प्रेमळ दटावणी केली. पण त्यांना मी विनंती केली की त्यांच्या इतक्या हळूहळू वेगाने मला चालता नाही येणार. इथून मी जी पुढे गेले ते शेवट पर्यंत पुढेच राहीले. आपण जर आपल्या सहज वेगाने चाललो नाही तर पाय जास्त दुखू लागतात. परिक्रमेचे अंतर पाहता मला ती रिस्क घ्यायची नव्हती.
जंगल सुरु झाल्यावर, म्हणा कमान ओलांडली की जंगलच सुरु होते; तेही घनदाट. तर इथून लगेचच हळूहळू चढालाच सुरुवात होते. या पहील्या चढाला जवानी की घोडी म्हणतात.. जवानीकी घोडी चढुन गेल्यावर जीनाबाबाकी मढीपाशी जरा रेंगाळलो. त्यांची चिलीम आजही तिथे आहे. बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदीर आहे. इथे बरेच नागासाधू बसलेले असतात आणि तुमचा रस्ता अडवून पैसे मागतात. ते जे काही चित्र होते ते फारच भयंकर वाटत होते.. काही साधूंची बडबड चालू होती - "१रुपयात काही येतं का आता १०रुपये तरी द्या." माझ्या मागून आलेल्या काहीजणींनी सांगितले की बायकांवरही शेरेबाजी करत होते म्हणे.. कसले हे साधू! मी फार बघू शकत नव्हते.. आपल्याला अश्या दिंगंबर अवस्थेतील माणसांना पहायची एकतर सवय नसते त्यामुळे आधी अवघडायला होतं.. त्यात इथे अनेकजण असे नुसते भस्म फासून बसलेले.. त्यांचाबद्दल अनेक वदंताही आहेत जसे की ही लोकं फार कोपिष्ट असतात, त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर संमोहीत करतात इत्यादी इत्यादी.. आमच्या लीडरलातर पकडून पैसे द्यायला लावले म्हणे..
मी यु ट्युबवर पाहिलं होतं की ही लोकं पैसे मागतात, तेंव्हा हा मुक्काम जवळ आल्यावर मी काही नाणी हातात ठेवली. आणि कुणाकडेही न बघता भराभर चालायला सुरवात केली.. हात पुढे आला की नाणं ठेवायच आणि चालू लागायचं. त्यात मला एक जाणवलं की नामस्मरण चालू असेल तर ही लोकं बाजूला होऊन तुम्हाला रस्ता मोकळा करुन देतात.. नामस्मरण थांबलं की पैसे मागणार.. जीना बाबाच्या मढीच्या आधीपासून, नंतरही बऱ्याच अंतरापर्यंत ही लोकं रस्त्याच्या दुतर्फा बसलेली असल्याने मला माझा अनुभव टेस्ट करता आला.. पुढे पुढे साधूंबरोबर साध्वीपण होत्या (त्या मात्र दिगंबर नव्हत्या). त्याही पैसे मागत असत पुरुषयात्रेकरूंना ते त्रासदायक होई. यातून सुटकेचा मार्ग एकच, नामस्मरण. असे अनुभव यायला लागले की ही परिक्रमा नुसता जंगल ट्रेक न राहता यात्रा बनून जाते व जाणवते त्यांच्या इच्छेनेच केवळ आपण हे करु शकतो.
इथे येईस्तोवर चालणाऱ्यांचे वेगानुसार गट पडले होते. सर्वात आधी सुपरफास्ट बर्वेदादा, श्री. अभ्यंकर आणि अजून दोघे सासरा जावयाची जोडी होती. सासरेबुवाही ७०च्याजवळपास होते पण चालण्याचा वेग अफाट होता. त्यानंतर आमचा ग्रुप मी, राणे आजी, नगरचे चव्हाणदादा, शुभांगी, पुण्याचे पंकजभाऊ, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची मैत्रिण, तेजस आणि शिरवळकडचा रोशन. तेजस आणि रोशन एकदम उमदे गडी होते आणि अगदी टणाटण उड्या मारत परिक्रमा पार करत होते. मी बऱ्याचदा पंकजभाऊंच्या आई आणि त्यांच्या मैत्रिणी बरोबर चालत होते. मधेमधे एकमेकांसाठी थांबून आमचा हा चमू मार्गक्रमण करत होता. आमच्या मागे माझ्याबरोबर आलेल्या २न्ही काकू आणि अजून २जणी होत्या. सर्वात शेवट सगळे लीडर आणि ज्यांचा वेग कमी आहे अशी माणसे. जंगल घनदाट होते व एकदा आत शिरल्यावर चालूनच बाहेर पडायचे त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. म्हणून ग्रुप लीडर्स या लोकांना चीअर अप करत, मदत करत मागून येत असावेत.
चालताना दिसलेली पवनचक्की व पाण्याची उन्हाळी सोय
एकूण तीन डोंगर चढायचे आणि उतराचे असतात हे माहित होते. पण चढ एवढा होता की २रा डोंगर संपेपर्यंत थकायला झाले होते. मधे थांबत होतोच आम्ही. जवळपास ७०अंशाचे चढ होते.
परिक्रमा ही वर्षातून काही ठराविक दिवसच करता येत
असल्याने गर्दीचा नुसता पुर आलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल्स
लागलेले दिसत होते.. भजी, पापड, खारे दाणे, फुटाणे, मसाला आलू, मीठ, मिरची,
मसाला, भाज्या असे काय काय न् काय काय.. सर्वात कहर म्हणजे पानाचे ठेलेही
होते. ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी मोफत वाटत होते.. अनेक महाराजांचे
रस्त्यात लंगर होते, ते चहा नाष्टा, जेवण वाटत होते.. हा सेवाभाव पाहून
सद्गतीत व्हायला होत होतं..
असाच एक अमूलचा स्टॉलः
मीठ, मिरची, भाजीचे ठेले:
सुरवातीला
टेंपो, गाड्या काही अंतरापर्यंत येऊ शकतात म्हणून दुर्लक्ष केलेले पण
दुसऱ्या डोंगरावरही पाणी मोफत वाटत होते जे त्यांनी खालून कुठुनतरी लांबून
वाहून आणलेले.. बरं ही लोकंही गरीबच दिसत होती.. हे सगळे मोफत वाटणारे अगदी
हात जोडुन तुम्हाला आमंत्रण देतात.. तो सेवाभाव बघून शब्द सुचत नाहीत.
काही ठिकाणी शहाळेही ५/५ रुपयांना विकत होते.. का? केवळ परिक्रमा वसीयांची
सेवा हा भाव.. इकडे शहरातील विक्रेते असते तर अश्या ठिकाणी अजून १००
रुपयांना शहाळे विकले असते.. पहिल्याचढापासुन पुढे तुम्हाला सगळे पाठीवर
वाहून न्यावे लागते.. गाडी अगदी ३ऱ्या डोंगराचा उतार संपल्यावरच! मला या
माणसांची खूप कमाल वाटली.. मी मनातून या सगळ्यांना नव्हे त्यांच्या
सेवाभावाला साष्टांग दंडवत घातला.
वारीत जशी सगळ्या प्रकारची माणसे दिसतात तशी परिक्रमेतही दिसत होतीच. सेवाभावी अनेक गरीब लोक होते तसेच लहान मुलाला घेऊन भीक मागणारे, अपंगलोक, वृद्ध भीकारी अनेक ठिकाणी दिसत होतेच. काही मुलांना शंकर, राम, लक्ष्मी असे साज चढवलेले व पैसे मागायला लावलेले तर काही ठिकाणी साधू जमीनीत पुर्ण डोके गाडून झोपलेले अशी अनेक निरीक्षणे करीत मी चालले होते. दुसऱ्या डोंगरमाथ्याला आम्ही साधारण ११.३०च्या सुमारास होतो. उन आजिबात जाणवत नव्हते. मला जरा जरी उन लागले तरी लगेच पित्ताचा त्रास होतो.. म्हणजे पित्त उसळतेच.. मग विश्रांती घेतल्याशिवाय आराम पडत नाही. पण आज मी अखंड चालत होते, थकवा जाणवल्यावर मधे लिंबू सरबत घेत होते, बरोबर इलेक्ट्रॉलचे पाणी घोट घोट घेत होते. पण पित्ताचा त्रास आजिबात जाणवत नव्हता. उन्हाचे अस्तित्वही डोंगरमाथ्याला जाणवत होते थोडेफार नाहीतर नाहीच.
मधे मधे अनेक ओढे दुथडीभरून वहात होते आणि बूट ओले होऊनयेत म्हणून मी कसरत करत होते. मधल्या एका ओढ्याला अशीच कसरत करताना उडी चुकली आणि पाण्यात पडले.बूट वाचवत होते आता बऱ्यापैकी पाय भिजले. झाले, सगळ्यांना करमणुकीला नवीन विषय मिळाला- "मी व ओढा". पुढे जिथे जिथे ओढा येत असे तिथे लोक आधीच हसायला सुरवात करत. या करमणुकीने आमचा थकवा विसरायला मदत होत होती.
३रा डोंगर अगदी लहान आहे असे ऐकले होते. लोकही असेच सांगत होते आता फार चढण नाही. त्यामुळे जरा बरे वाटत होते. पण ३रा चढ सुरु झाला आणि संपायचे नाव घेईना. शेवटी १.३० की २च्या सुमारास आम्ही कालीका देवळापाशी आलो. हे ठिकाण मालवेल व परिक्रमेचा मध्य आहे असे नंतर कळले. तेंव्हा मात्र चला आता हा डोंगर उतरला की परिक्रमा संपणार असे वाटत होते. उतारावर एक शॉर्टकट मिळाला, अजून अंतर कमी झाले. ३ऱ्या डोंगराच्या पायथ्यापाशी आलो तेंव्हा २.३० वाजलेले. आता भूक लागली होती. पायथ्याशी असलेल्या एका लंगर मध्ये पुरी, भाजी, गाठीया, शिरा, खिचडी असे पुर्ण गरमागरम जेवण जेवलो. आता मालिशवाले दिसायला लागले होते, निरनिराळ्या माळा, तेले अश्या वस्तूंची विक्री चालू झालेली. हे पाहून मला अजूनच वाटायला लागले की परिक्रमा संपत आली. काही लोक मालीश करून घ्यायला, झोप काढायला थांबले. मी मात्र चालणे सुरूच ठेवले होते. आता थांबायचे ते रूमवर जाऊनच.
चढत जाणारी नागमोडी वाटः
तासाभरात शेवटची कमान आली परिक्रमा संपल्याची, समोर बोरदेवी मंदिराची पाटी दिसली. मनातल्या मनात मी आनंदाने एक उडी मारली. (शारिरीक शक्यच नव्हते.) देवाचे आभार मानले. बोरदेवीचे दर्शन घेऊन पुढे जाण्याची प्रथा आहे परंतू पाटीवाचली तर एक कि.मी. अंतर होते म्हणजे येऊन जाऊन २ कि.मी. बापरे.. आता २किमी सुद्धा जास्त वाटायला लागले होते. मी तिथेच स्टॉल्सवाल्यांजवळ चौकशी केली तर म्हणाले इथे परिक्रमा संपली बोरदेवीचे दर्शन घेतले पाहिजेच असे नाही. ऐकून किती बरं वाटलं सांगू. थोडं चालल्यावर म्हटले किती अंतर बाकी ते तरी विचारू.. तर कळाले की इथून भवनाथ मंदीर अजून १२किमी. आहे. हे ऐकून फक्त पडायचीच बाकी होते. मनाला आवरलं, इतके अंतर चालून आलो आता हेही संपेल. तशी धुगधुगी होती अजून शरीरात आणि मन थकायला तयार नव्हतं.
हाही रस्ता जंगलातूनच आहे पुर्ण. मधे मधे गिरनार दर्शन देत होता. आजूबाजूला दाट झाडी छोटेसे ओहोळ.. रस्ता खरोखर सुंदर होता. मन प्रसंन्न् करत होता. हळूहळू चालत होते, आता टेकायचे झाल्यास अगदी खाली बसावे लागत होते, त्यामुळे शक्यतो ते टाळून उभ्या उभ्या विश्रांती घेऊन चालणे सुरु ठेवले होते. (एकदा खाली बसल्यावर उठताना काय परिस्थीती होत होती ते केवळ माझे मीच जाणे) तिसऱ्या डोंगराच्या उताराच्यावेळी पंकजभाऊंनी काठी दिलेली; तिचा खूपच उपयोग होत होता. त्याचे झाले असे की knee capsमी पहिल्यांदाच वापरत होते आणि त्याने उजव्या पायाची नस कुठेतरी दुखावली होती. मधे रस्त्यात थांबून मी त्या कॅपस् काढल्या तरी पाय उचलायला खूपच त्रास व्हायला लागला होता. मग काठीच कामी आली. मध्ये मध्ये शॉर्ट्कटस् होते पण पाउल नीट पडेल का याची शाश्वती न वाटल्याने सरळ मार्गावरुनच चालत राहिले.
बोलणे कधीच बंद झाले होते. थकव्याने डोळे मिटायला लागले होते. जेंव्हा जेंव्हा विचारू तेंव्हा सगळेजण ५किमी. राहिले सांगत होते पण हे शेवटचे ५ किमी काही संपायला तयार नव्हते. एकदातर मी केवळ खुणेनेच पोलीसांना विचारले किती अंतर आहे.. त्यांनाही माझी परिस्थिती पाहुन हसू आले. अर्थात उत्तर तेच होते -५ किमी. संपूर्ण परिक्रमेत मधे मधे पोलीसांचा तंबू होता, किंवा पोलीस येताजाताना दिसत होते. मदतीलाही तत्पर असावेत कारण एका कुटुंबातील मुलगा हरवला होता तो त्यांनी विक्रमी वेळात शोधून दिला होता.
मी मजल दर मजल करीत चालत होते. खोडीयारमातेचे छोटेसे देऊळ अगदी रस्त्यातच लागते. तिथे कळाले की बोरदेवीचे दर्शन नसेल घेतले त्यांनी इथे दर्शन घेतले तरी चालते. जणू भक्त्तांसाठी माता रस्त्यावर येऊन उभी होती. परिक्रमा सोपी करत होती. स्वत:ला मोटीवेटकरत होते. निघाल्यापासून अनेक वृद्ध माणसे दिसत होती, गुजराथी बायका केवढाली वजने डोक्यावर वहात वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून अचंबीत होत होते. शेवटी ती वेळ आलीच. एका पाणीवाटपाच्या ठिकाणी बसायला जागा होती, समोर गिरनार दिसत होता.. आता मैलाचे दगड सुरुझाल्याने खरे अंतर कळत होते व खरोखर शेवटचे ५किमी. राहिले होते. शरीर प्रचंड थकले होते, वाटले बस्स आता कोणी काही म्हणो, मी काही इथून ऊठणार नाही.. मागून येणाऱ्यांना विचारू की एखाद्या गाडीवानाला विनंती करायची का ते. आता इथे अगदी दुचाकीपण दिसत होत्या पण रिकामी गाडी एकपण नाही. तेवढ्यात भलमोठं बोचकं घेऊन एक बाई आली आणि माझ्या शेजारी जरा टेकली. तिला विचारलंच न राहवून की बाई गं, एवढ सगळ ओझे कसे वाहतेस. तर ती हसून म्हणाली आम्हाला याची सवय आहे. ओझे नसेल तर भरभर चालता नाही येणार. तिचं कुटुंब आता लवकरच परिक्रमा पुर्ण करणार होतं आणि मग डोक्यावरच्या साहित्यातून तिला स्वयंपाक करायचा होता. बापरे.. इथे चालायची शक्ती नाही आणि ही बाई त्यानंतर स्वयंपाकपण करणारे.. मी स्वत:वरच रागवले.. ते काही नाही हे अंतर पुर्ण करायचेच.. चला यात्रावीरहो.. चालायला लागा.. तु हे करु शकतेस. आता फक्ता ५ किमी म्हणजे १च तास.. "common, you can do it!". परत चालणे सुरु झाले, दत्तात्रयांचे नाम मुखी सुरु केले. मागे नामस्मरणात चालताना असे जाणवले होते की आपले पाय जमिनीला लागतच नाहीयेत.. तो अनुभव आठवला आणि स्वत:ला सांगितले की तेच करून घेत आहेत तेंव्हा परिक्रमा पुर्ण होणारच ! जय गिरिनारी!
आतातर अगदी हळूहळू चालत होते,
चालणे कसले म्हणा खुरडतच होते. काठी टेकवायची मग तिच्यावर जोर टाकून पाय
ओढायचे. मधे क्षणभरच उभे रहायचे की उर्जा मिळायची, तिचा पुरेपूर उपयोग
करायचा आणि जेवढा वेग साधता येईल तो साधायचा की परत थोड्यावेळाने पाय ओढणे
सुरु, परत विश्रांती असे चक्र चालू होते. एकीकडे पुणेरी मन म्हणत होते,
यांना कुणीतरी सांगायला पाहिजे, जिथे परिक्रमा संपल्याची कमान आहे तिथून
पब्लिक ट्रान्सपोर्ट ठेवा. किती लोक घेतील तो. दुसरीकडे स्वत:ला सांगत
होते, तुला कैलास-मानसरोवर चालत जायचे आहे ना, त्याची रिहर्सल समज. हे अंतर
पुर्ण केलेस तर तुझी थोडी तरी तयारी होऊ शकते तिकडे जायची. तुला हे अंतर
पुर्ण करायलाच हवे. मधेच रुम मधील बेड आणि आरामदायी वातावरण डोळ्यासमोर येत
होते, हे अंतर कापले की आपल्याला आराम मिळणार आहे. तेंव्हा एकला चलो रे..
अश्या
प्रकारे अनेक विचारांना फाटे देत, नामस्मरणकरत पावणे सहाला मी धर्मशाळेत
प्रवेश केला. सकाळी ४.३०ला निघालेली मी ५.४५ म्हणजे जवळ जवळ १४ तासांनी
परतले होते.
न आलेल्या व आधी पोचलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत
केले तेंव्हा खुप मस्त वाटले. बाहेरच बाकावर बसून घेतले, रुमची चावी
काकूंकडे होती. त्या मागे होत्या पण परिक्रमा चालत पुर्ण केल्याचे समाधान
एवढे होते की लगेच आडवे व्हायला नाही मिळाले त्याचे आजिबात दु:ख झाले नाही.
मी एक उद्देश्य पुर्ण केले होते. लगेच उद्या गडावर येणार का लोकांची चर्चा
सुरु झाली. सगळेच इतके दमले होते की उद्याची कल्पना करवत नव्हती. मी
म्हटले उद्याचे उद्या पाहू. खोलीवर गेल्यावर गरम पाण्यानी अंग शेकले, लवकर
जेवून आडवे झालो तेंव्हा काय वाटत होते ते शब्दात मांडणे कठिण आहे.
क्रमश:
काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल. ह्यात दुपारच्या झोपेचे खोबरे झाले, हो ती आली आणि झोप लागल्यामुळे आपण दारच उघडले नाहीतर.. शेवटी ४.३०ला तिला पहायलाच बाहेर पडले तेंव्हा सापडली एकदाची. तिला जवळ जवळ पकडूनच रुमवर आणली. अजून कोणी बोलावल तर उशीरच झाला असता. तसेच मसाजची खूप गरजही होती. तिने फटाफट १५-२०मिनिटात मसाज केला. तिचा हात जरी पायाला लागला तरी कळ येत होती त्यात तीने शेवटी फटके मारले.. देवा रे.. पण तिला नसांची चांगली जाण असावी, माझा पाय तिने छान मोकळा करून दिला. आम्ही आंघोळी उरकल्या व जेऊन तयार झालो. रात्री १०.३०ला निघायचे ठरले होते; परत झोप काही येईना; मग असाच वेळ घालवला.
१०.३०ला बरोब्बर बाहेर आलो, ज्यांनी दुपारी डोली ठरवल्या होत्या ते लोक थोडे उशीरा निघणार होते. शेवटी सगळे जमून ११ला चालायला सुरुवात केली. ज्यांनी काल काठ्या घेतल्या नव्हत्या त्यांनी आज काठ्या घेतल्या. गुरुशिखरावर सगळ्यांनी काठी घेतलीच पाहिजे असे सांगितले होतेच. आधी भवनाथाचे दर्शन घेतले. भवनाथ हे शंकराचे देऊळ आहे, तेथील ग्रामदैवत. त्याला आधी प्रार्थना करायची की महादेवा, गुरुशिखर चढत आहोत, सगळा प्रवास सुखरुप होउ दे!
जाता जाता भवनाथ मंदिरा विषयी थोडेसे :
हे
महादेवाचे जागृत मंदीर आहे असे म्हणतात. बाजूलाच मृगीकुंड आहे. त्याची
काहीतरी गोष्ट ऐकलेली, पण लक्षात नाही आता. येथे शिवरात्रीला फार मोठी
यात्रा भरते व मुहुर्तस्नाना साठी साधू थेट कुंडात उड्या टाकतात. हे मी
कुंभमेळ्याबाबतपण ऐकले आहे. असे म्हणतात भगवान शिव स्वत: इथे त्यादिवशी
स्नानाला येतात. कुंडाला प्रदक्षिणा करुन आल्यावर बाहेरच्या बाजूला एक दगड
पाण्यात ठेवलेला आहे. पाण्यावर तरंगणारा दगड. असे म्हणतात की रामसेतूतील हा
दगड इथे आणला गेला आहे म्हणूनच पाण्यावरही तरंगतो. रात्रीच्या अंधारात खरच
तरंगत होता की नाही हे कळाले नाही. दिवसा पहायला हवे.
रात्रीचे भवनाथ मंदिर :
म्रुगी कुंडः
असे महादेवाचे दर्शन झाले की थेट पहिल्या पायरीशी चढावा हनुमान आहे, त्याला नमस्कार; त्यालाही प्रार्थना की शक्ती दे. त्यानंतर पहिल्या पायरीवर नारळ फोडला जातो. त्या पायरीवर डोके ठेवायचे, दत्तात्रयांना सांगायचे, तुम्हीच घेऊन जा आणि सुखरुप खाली आणा. मग सुरुवात. आम्ही भवनाथानंतर जवळच असलेल्या जुन्या आखाड्याच्या आश्रमातील दत्तालापण नमस्कार केला. उत्सुकतेने सभोवार नजर फिरवीली. चारी बाजूंनी बांधकाम करुन साधू आणि साध्वींसाठी रहाण्याची सोय केलेली अनेक मजली इमारत होती ती. अनेकसाधू, साध्वी दिसत होत्या. या प्रवासात साध्वींना तेही अनेक संख्येने मी पहिल्यांदा पाहिले.
दर्शन घेऊन गिरीशिखराकडे वाटचाल चालू ठेवली.
गिरनार हे भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला परिसर आहे. त्याची रेवताचल, कुमुद, उज्जयंत, श्वेताचल, श्वेतगिरी अशीही नावे आढळतात. श्रीराम व पांडवांनी इथे भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. श्रीकृष्णाद्वारे रुक्मिणी हरणही इथेच झाले अशीही मान्यता आहे. गिरनारचे उल्लेख सम्राट अशोकापुर्वीच्या इतिहासातही आहेत असं वीकीपीडिया सांगतो. असा हा गिरनार पर्वत हिमालयापेक्षाही जुना. अनेक साधू, बैरागी यांची तपोभूमी. स्वत: दत्तात्रयांनी इथे १२हजार वर्षे तपश्चर्या केली होती ब आजही त्यांचे अक्षय निवासस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच स्थानावर आज दत्तपादुका उमटलेल्या आहेत. हां आता कुणी म्हणू शकतं की हातानी छिन्नी हातोड्याने त्या कोरू शकतं! तसे असेलही.. पण या स्थानावर अनेकांना अनेक अनुभव येतात जे पादुका उमटल्या ह्यावर श्रद्धा ठेवायला लावतात. गिरनारला जसे धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणेच तो अनेक वन्यप्राणी, वनस्पती यांचे वसती स्थान आहे. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती इथे मिळतात.
आम्ही सुरवात केली, चढाई रात्रीची असल्याने किती चढलो ते काही कळत नाही. हवा छान थंड असते त्यामुळे लवकर थकवा येत नाही. आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला चढत होतो. परिक्रमेचा काळ, त्यातून पौर्णिमा त्यामुळे वाटेवरची सगळी दुकाने चालू होती. त्यांचा प्रकाश मिळत होता. पायऱ्यांवर दिवेही लावले आहेत. अगदीच अंधार वाटेल तर तिथे पौर्णिमेचा चंद्र नैसर्गिक प्रकाश पुरवत होता. सुचना पुर्वीच दिल्या गेल्या होत्या की चढताना आजिबात घाई करायची नाही. अगदी सावकाश एकेक पायरी चढायची. प्रत्येकजण त्याची अंमलबजावणी करत होता. तसंपण ही स्पर्धा थोडीच होती..
इथेही खूप गर्दी होती. अगदी सतत एकाबाजूने चढणारे चालत होते तर दुसऱ्या बाजूने उतरणारे. जसजस वर जाऊ तसतशी गर्दी कमी न होता वाढतच होती. कुणी मोबाईलवर दत्तनामाचा जप लावून चालले होते तर कुणी स्वामी समर्थांचा. काही तरुण मंडळी एवढ्या गर्दीतही धसमुसळेपणा करत सिनेमाच्या गाण्यांवर उड्या मारत चालत होती व यात्रेकरुंच्या रोषास पात्र होत होती. मी सावकाश चालत होते तरी पहिल्या सुपरफास्ट बॅचचे लोक माझ्या आजुबाजूला होते. आश्चर्यच वाटलं माझ्या वेगाचं.
मन स्थिरही होते, शांत होते पण भावूकही झालेले. माझे बाबा अनेकवेळा गुरुचरित्राचे पारायण करीत. त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी आठवत होत्या. दत्तगुरु व गणपती हे देव न वाटता लहानपणी आम्हाला आमचे कुटुंबीयच वाटत असत त्यामुळे आजपर्यंत गुरु किंवा देव या नजरेने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही; मला कुणा नातेवाईकालाच फार वर्षाने भेटायला जातोय असंच वाटत होतं.
पायरी चढताना आम्हाला सांगण्यात आलेले की विश्रांती उभ्यानेच घ्या, सारखे खाली बसलात तर अजून त्रास होईल. पायऱ्यांना एका बाजूला कठडे आहेत बहुतांशी. सुरवातीच्याच काही पायऱ्यांना आजिबात कठडे नाहीत. सतत चालत असल्याने हवा थंड असूनही थंडी आजिबात वाटत नव्हती. १५०० पायऱ्यांजवळ एक तरुण मुलगा खाली जाताना पाहिला. २५०० पायऱ्यांपासून परत आला होता तो. मला त्याचं आश्चर्य आणि स्वत:ची काळजी वाटली. हा मुलगा परत आला, आपण जाऊ ना ! पण मला थकवा आजिबात जाणवत नव्हता अगदी आरामात चढत होते. २०००पायरीच्या दरम्यान बेलनाथबाबा समाधी आहे. ते एक मोठे सिद्ध होते. २२५० पायरीवर डावीकडे राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. ३/४ पायऱ्या चढून आतमध्ये जाऊन दर्शनास दोन सुंदर मूर्ती आहेत. तिथून एका कपारीतून अजून वर गुहेत जाता येते. अगदी घसपटत जावे लागते. वर ३शिळांमुळे एक छोटीशी खोली तयार झाली आहे. मस्त वाटलं वर गेल्यावर. इथे भर्तुहरी नाथांनी राजा गोपीचंदाला उपदेश करून तपाला बसवले होते. वरच्या गुहेत ५/६ माणसे बसू शकतात, मस्त उबदार वातावरण होते आत.
रात्रीचे खाली दिसणारे गाव :
यादर्शना दरम्यान सुपरफास्ट बॅच पुढे गेली, ती शेवट पर्यंत भेटली नाही. मी काहीकाळ एकटीच चालत होते, मग परत मंडळी भेटली. २,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे अजून वर गेल्यावर ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर भाविक येथे त्या संतानाला घेऊन येतात. आम्ही राणकमातेपाशी दिवा लावला. सगळेजण त्रिपुरवाती घेऊन आलेले व जिथे शक्य आहे तिथे वात लावत होते. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. चढता चढता आम्ही पहिल्या मुक्कामी पोहोचलो- जैन मंदिर - साधारण ४हजार पायऱ्या इथे पुर्ण होतात. इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी बसायला जागा आहे. कुणी आडवे झालेले, कुणी बसल्या बसल्याच झोपलेले. आम्ही इथे पावणे ३ वाजता पोहोचलो.
कुड्कुडणारे आम्ही:
आता असं ठरलं की इथून पुढे सगळ्यांनी एकत्रच जायचं. जैन मंदिराच्या मागच्या बाजूस वळणावर बऱ्यापैकी मोकळी जागा मिळते. आम्ही तिथे थांबलो. मागची लोकं बऱीच मागे होती. झोपाळू मंडळींनी ताबडतोब खाली अंथरले व आडवे झाले. मी पण पाठ टेकून झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न केला. आता चांगलच गार वाटू लागलं. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून थंडी जाणवत नव्हती. अजून थांबलो तर थंडीने हुडहुडी भरेल अस वाटायला लागलं. इथे पोचल्यावर लगेचच कमरेला बांधलेले स्वेटर्स अंगावर चढले होते, कानटोप्या घातल्या गेल्या.
खरंतर चालून आता उत्साह आला होता. मोठ्या विश्रांतीची गरज वाटत नव्हती. चव्हाणदादा तर उभं राहुन अस्वस्थपणे येरझारा घालायला लागले होते. त्यांना आजिब्बात नुसत थांबून रहायचं नव्हतं. तसाच साधारण तासभर काढला असेल. मागून आमची मंडळी एकेक करून यायला लागली. आता अजून थांबणे फारच जीवावर आलेले, मागून आलेल्या लोकांनापण झोपायचे नव्हते. मग थोड्याच वेळात सगळेच निघालो. आता इथून नुसती चढाई जवळ जवळ संपली. म्हणजे चढाई होती पण मधे मधे पायऱ्या उतरायच्याही होत्या.
इथून डावीकडे जुना रस्ता खाली जाताना दिसतो. या जुन्या मार्गाने स्वामी समर्थ गिरनार चढुन आले होते असे म्हणतात. अजूनही बरेच सिद्ध योगी याच मार्गानी येतात अशी वदंता आहे. डोलीवाले मात्र या मार्गावर नसतात व आता सामान्यही सगळे नवाच रस्ता वापरतात. परंतु गर्दीमुळे येणाऱ्या लोकांना इकडे वळवत असल्याचे कळले. त्यामुळे आम्हालाही या मार्गाने यावे लागले असते कदाचित जो आत्तापेक्षाही अवघड आहे असे म्हणत होते. परंतू तसे झाले नाही.
आपल्याला उजवीकडून अंबाजीमाता शिखराकडे जायचे असते. तशी पाटीही इथे लावली आहे. गोमुखी मंदिराकडे, अंबामाता मंदिर, सहसावन मंदिर यासाठी बाणांनी दिशा दाखविली आहे.
हाच तो चौकः
रात्र असल्याने गोमुखी मंदिरावरून सरळ अंबामातेच्या मंदिरापाशी आलो. एरवी रात्री सारी मंदिरे बंद असतात पण आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने सगळी मंदिरे उघडी होती व सगळीकडे भाविकांची गर्दी होती. इथे जवळपास ५हजार पायऱ्या संपतात. म्हणजे खरतर अर्धाच रस्ता झालेला असतो.पण पुढच्या रस्त्यात पायऱ्या उतरणेही असल्याने कदाचित, जास्त वेळ लागत नाही. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की पुढचा मार्ग अंबामाताच सुकर करते.
मी मातेला बाहेरूनच नमस्कार केला व पुढे गोरक्ष शिखराकडे चालत राहिले. हा मार्ग थोडा अवघड वाटला बाजूच्या कठड्यांची उंची जेमतेम घोट्या पर्यंतच वाटत होती. एका बाजूला दरी, रस्ता लहान वाटत होता व तीव्र वळणेही होती. जर वळणांवर जोरात वारा आला किंवा गर्दीत चालताना थोडा जरी धक्का लागला तर एका बाजूला कडप्प्याचा सपोर्ट नव्हता आणि खाली पडायला झाले असते. रात्र असल्याने नेमकी दरी किती खोल ते कळत नव्हते तरी विचाराने भीती वाटली.
आता समोरचा डोंगर चढून गेला की गोरक्षशिखर. इथून एक मधुर सुगंध दरवळायला लागला. खुप प्रसंन्न आणि उल्हसित वाटत होतं. तसं गिरनारवर काय परिक्रमेतही नैसर्गिक विधींसाठी काहीही सोय नाही. सरकारी शौचालये तोडक्या मोडक्या अवस्थेत, आतून झाडोरा वाढलेली होती नाहीतर बंदच. त्यांचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी जिथे सपाट भाग आहे तिथे लोक आडोसा बघत आणि विधी उरकत होते. मधे मधे तो वास तुमची सोबत करतो. हा सुगंध वेगळा होता. जसजसे शिखर जवळ येत होते तसा वाढत होता. मला वाटले की रस्त्यात अनेक ठिकाणी छोटी छोटी देवळे आहेत. आपल्याकडे काय दगडाला शेंदूर फासला कि झाला देव. तिथे धूप, उदबत्ती लावलेली होती त्याचा वास असेल. नंतर लक्षात आलं की ते तर सगळीकडेच होतं मग हा सुवास फक्त गोरक्षशिखराजवळच का येत होता?
तर सुगंध उत्साह वाढवत होता आणि फार म्हणजे फारच छान वाटत होते. गोरक्ष गुहेपाशी डावीकडे गोरक्ष मंदीर आहे आणि उजवीकडे गुहेत तुम्हाला धुनी भस्म मिळते. तिथेच अगत्याने तुम्हाला चहा पाजला जातो. त्या प्रसादाला नाही म्हणायचे नसते हे आधी वाचलेले आणि अगत्य पाहून चहा घेतलाच. आतापर्यंत एखाद् दोन घोटच पाणी प्यायले होते, तहान अशी लागली नव्हतीच. चहा घेताना लक्षात आले की बराच वेळ आपण काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही.
इथेच उभ्या उभ्या विसावा घेतला. तिथे एक साधू बसलेले होते व अनेकजण सेवेकरी होते. गरम गरम ताजा चहा करून सगळ्यांना देत होते. त्या बाबाजींना मी थोडी माहिती विचारली की गिरनार यात्रा का व कशी करतात. गर्दीमुळे असावं पण त्यांनी थोडक्यात जुजबी माहिती दिली.
गिरनार दर्शन हे आता फक्त पादुका दर्शन घेऊन पुर्ण करतात. पण खरतर इथे अनुसूया माता, महाकाली शिखर आहे. कमंडलू तीर्थाबरोबर यांचेही दर्शन घेतल्यावर गिरनार यात्रा पुर्ण होते. पण हल्ली लोकांना शक्य नसते त्यामुळे फक्त दत्त शिखर करतात. त्याचीही पद्धत त्यांनी सांगितली - खाली दामोदर तीर्थावर आंघोळ करायची मग भवनाथ, चढावा हनुमान अशी दर्शने करत कमंडलूतीर्थाला जायचे. तिथे परत आंघोळ करायची मग दत्तात्रय पादुका दर्शनाला जायचे. ते सांगत होते आताही जाणते लोक, साधू आधी कमंडलू तीर्थाला जातात, आंघोळ शक्य नसली तरी डोक्यावर तीर्थाचे प्रोक्षण करतात मग वर जातात. त्याबरोबर गोरक्ष धुनीपाशी असलेली घंटा आणि मोक्षाची गुहेविषयीपण त्यांनी माहिती दिली.
मी त्यांना नमस्कार केला पुढे डावीकडे धुनीचे दर्शन घेतले. इथली घंटा ३ वेळा वाजवायची व वाजवताना आपल्या पितरांची नावे घ्यायची म्हणजे सर्व पितरांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. ती मोक्ष गुहा काही मला दिसली नाही.
पुढे गेल्यावर पायऱ्या उतरतानाही सुगंध बरोबर होता. खाली जैन मंदिराच्या अलिकडे असतानाच लोक म्हणत होते वर खूप गर्दी आहे तुम्ही थांबून जा. दर्शनाची रांग कमंडलू तीर्थापर्यंत पोचली आहे. आम्ही गोरक्ष शिखराचा एक जीना उतरला असेल् नसेल, रांगच सुरु झाली. आता जसजशी रांग पुढे सरकेल तसतस पुढे जायचे. हा रस्ता खरोखर लहान वाटतो त्यात डोलीवाले विश्रांतीला थांबले तर मग आपण त्या पायरीवर थांबूच शकत नाही.
डोलीवाल्यांची मात्र दया आली. एक डोलीवाला वयस्कर होता, ओझे उचलून त्याच्या तोंडाला अक्षरश: फेस आला होता. पोटासाठी माणसाला काय काय करावे लागते. हे ५ दिवस त्यांचा सिझन होता. वर्षभरातील सर्वात जास्त गर्दी या दिवसांत होते इथे. त्यामुळे याच दिवसांत कमावण्याची संधी. बरं एक डोली झाली की दुसरी डोली मिळेपर्यंत काम नाही. त्यासाठी त्यांना वरखाली फिरावं लागतं गिऱ्हाईक शोधत; म्हणजे परत पायऱ्या चढणे उतरणे आलेच. खुप कष्टामय जीवन आहे हे. तुम्हाला डोली आधीच धर्मशाळेत विचारुन ठरवता येते किंवा रस्त्यात वाटले तरी मागवता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानात विचारले तर त्यांच्याकडे डोलीवाल्याचे नंबर असतात ते मागवून देतात. फक्त मग डोलीवाला जिथे असेल तिथून येईपर्यंत वाट पहावी लागते. तुमच्या वजनानुसार ११ ते १४ हजारापर्यंत डोलीचे दर ठरतात. आमच्यापैकी काहीजणांनी डोली आधीच ठरविली होती तर एकीने येताना केली.
या डोलीवाल्यांचा आमच्या बरोबरच एक किस्सा झाला. गर्दी खूपच होती. रांगेतही माणसे अगदी गर्दी करुन उभी होती. डोलीवाले भरभर चालत व मध्ये जागा मिळताच विश्रांती घेत. ते मोठमोठ्याने सुचना देतच चालत जेणेकरुन त्यांना मार्ग मोकळा मिळेल व डोलीतील माणसाला आणि चालणाऱ्यांना एकमेकांचा धक्का लागणार नाही. ते विश्रांतीसाठी थांबताना देखील लोक पुढेमागे सरकून जागा करुन देत. गोरक्षशिखरापासून पुढे बऱ्याच वेळा एका बाजूला दरी असते. दुसऱ्या बाजूला डोंगर जरी असला तरी पायऱ्यांची कड आणि डोंगर यामधे अंतर असते व खड्डास्वरुप झालेले असते. म्हणजे जिन्याच्या पहिल्या दुसऱ्या पायरीवरुन पाहिले तर चांगला दिड दोन पुरुष उंचीचा खड्डा. तर झालं असं की डोली वाल्याला जागा देताना पुढेमागे लोक पटकन् सरकतात त्याच वेळी आमच्यातील एक अगदी कॉर्नरला गेली व पडणार इतक्यात तिच्या सॅकला पकडून एकाने खेचले तिला. इथे डोंगरबाजूला सगळे पाषाण आहेत त्यामुळे काय झालं असतं हा विचारही न केलेलाच बरा.
इथे दुसरे एक महत्वाचे म्हणजे गोरक्षशिखरापासून पुढे एकही दुकान नाही. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचे असल्या अंबामातेपाशी घेऊन ठेवावे किंवा नंतर शिखरापर्यंत काही तुरळक दुकाने आहेत तिथे. गोरक्षशिखरापासून पुढे पाणी जरी लागले तरी ते कमंडलू तीर्थापाशीच मिळणार. म्हणजे जवळपास तीनेकहजार पायऱ्या गेल्यानंतर. तेंव्हा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी.
गोरक्षशिखरानंतर जी रांग लागली ती थेट पादुका दर्शन, कमंडलूतीर्थाचे दर्शन झाल्यावरच संपली. अनेकजण सांगतात या पायऱ्या खूप कठिण आहेत, जोराचा वारा असतो, रस्ताही तसा अवघड आणि चढही खडा आहे. वारा वगैरे इथे उंचावर आला तर काही खरे नाही. पण आम्ही रांगेत असल्याने आम्हाला चढाचा त्रास झाला नाही. वाराही शांत होता. एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकत रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. ५.३०/६ च्या सुमारास आम्हाला आमच्या डोल्या दिसायला लागल्या. त्यांचे एकदम छान ४.३०/५ला वरती दर्शन झाले होते. खूप खुष होते ते सगळे. आमच्या एकूण ६ डोल्या होत्या, त्यांची वाट पहाण्यात, त्यांना भेटण्यात थोडा वेळ गेला. मध्ये एक दोन छोटी मंदिरे लागली. त्यांचे नाव विसरले, पण प्रसिद्ध असावीत. सगळेजण न चुकता नमस्कार करत होते. रांगेतून चालतानाच ती लागतात त्यामुळे दर्शने घेणे सहज होत होते. त्यातले पुजारी साधू काही लोकांना भस्म लावत होते व काही लोकांना रुद्राक्ष देत होते. माझ्या असं लक्षात आलं; रुद्राक्ष फार कमी लोकांना मिळत होता. मला दोन्ही मिळालं. भस्म व रुद्राक्ष.काहींना हाताला त्यांनी काहीतरी लावले. त्याला एक अप्रतीम सुगंध होता. आमच्यापैकी चव्हाण दादांच्या हाताला त्यांनी ते लावले त्यामुळे आम्हाला सुगंध कळाला. नंतर घरी आल्यावर पाहिले तर रुद्राक्षालाही तोच अवर्णनीय सुगंध येत होता. नंतर कळाले की तिथे गिरनारी बापूंची गुहा आहे, ते मंदिर भैरवाचे होते. तसेच तिथे ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार रुद्राक्ष दिला जातो.
आता आम्ही कमंडलू तीर्थापाशी असलेल्या कमानी पर्यंत पोहोचलो होतो. उजवी कडच्या कमानीतून ३५० पायऱ्या खाली उतरून तीर्थाकडे जायचे तर डावी कडच्या कमानीतून पादुकांकडे. गर्दी इतकी होती की आम्हाला काही पर्यायच नव्हता; आम्ही दत्तशिखराकडे जात होतो. गर्दीचा उत्साह ओसंडून वहात होता. जय गिरिनारीच्या घोषणा दुमदुमत होत्या. येणारी लोकं घोषणा देत त्याला प्रतिसाद म्हणून तेवढ्याच मोठयाने रांगेतील लोक घोषणा देत. अशी घोषणाई सगळा आसमंत व्यापून राहिलेली. त्यामुळे कंटाळा, थकवा जाणवत नव्हता.
मागे गोरक्षशिखरापर्यंत गेलेली रांग
बाजूने अनेक साधूवर जाताना दिसत होते. त्यांचे निरिक्षण करण्यातही वेळ चांगला जात होता. कुणी भगवी वस्त्र नेसलेले, जटाधारी, हाती दंड व कमंडलूवाले, कुणी मोठ्ठा जटाभारवाले नुसतेच लंगोटीवाले, कुणी शुभ्र वस्त्रातील, या सर्वांचे डोळे खतरनाक वाटत होते, काही सामन्यांसारखे पण भगवी पचंगी नेसलेले किंवा भगवी वस्त्र घातलेले. सर्वजण आपल्या तंद्रीत भराभर वर जात होते. कधीकधी त्यांचा वेग पाहून तोंडात बोटे जात होती. घरी आल्यावर मामानी विचारलं त्यातले किती साधू खाली येताना तु पाहिलेस लक्षात आहे का? आणि डोक्यात प्रकाश पडला खरंच की वर जाणारे तर अनेक होते, खाली येणारा एखाद् दुसराच. खाली यायला मार्ग तर एकच आहे, निदान जैन मंदिरापर्यंत तरी. मग ही लोकं गेली कुठे?
आम्ही कमंडलू तीर्थाच्या अलिकडे असतानाच समोर अरुणोदय झाला. समोर क्षितिजावर तांबडे फुटले होते. अगदी एखादा रंगाचा फुगा फुटावा किंवा डब्यातून रंग सांडावेत तसे रंग क्षितिजावर पसरले होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की सूर्य कुठून डोंगराच्या मागून वगैरे न येता सरळ क्षितीजरेषेवरुन वर आला. अरुणोदयापासून सुर्योदयापर्यंतचे आकाश पहाणे केवळ अप्रतीम, अलौकिक अनुभव होता.
सूर्योदयाचे काही क्षण
समोरच्या दातार पर्वतावर मच्छिंद्रधुनी अंधारात पेटती दिसत होती, तिच्यावरचा झेंडाही आता नीट दिसत होता. इथे शंकराने दत्तात्रयांना, तर दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले असे म्हणतात. इतक्यात काही टारगट पोरे रांग तोडून जेष्ठांना न जुमानता पुढे आली. आमच्यातील तरुणांनी मग त्यांना अडवले व मागे जाण्यास भाग पाडले. त्यांची देहबोलीसुद्धा कीती बेफिकीरीची होती..
आता गुरुपादुका मंदिर दिसत होते. एक धीरगंभीर वातावरणात आपण प्रवेश करत आहोत असे वाटत होते. डोळे मिटले की ओम् च्या उच्चारवाने जसे तरंग तयार होतात तसे काहिसे वाटत होते. इथे येताना दत्तसंप्रदाय, दत्तमहाराज यांच्या लहानपणापासून कानावर पडलेल्या गोष्टी मनात रुंजी घालत होत्या. हळूहळू पायऱ्या कमी होत होत्या. आम्ही एकाठिकाणी बूट काढले. थोड्याच वेळात आता दर्शन होणार होते.
डोंगरा आडून दिसणारे मंदिर
क्रमश:
आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे. ज्याची बोटे इतकी रेखीव ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसायला कशी असेल. पादुकांभोवती कुंपणाप्रमाणे स्टीलच्या सळया उभ्या लावल्या आहेत. आपण लांबूनच दर्शन घ्यायचे. मागे गर्दी खुप होती, म्हणून प्रदक्षिणा करतच आम्ही बाहेर पडलो. याचसाठी केला होता सारा अट्टाहास.. मी इतके चढून वर पोहोचले होते, कोणत्याही थकव्याशिवाय.. मन तृप्त झाले होते. धीरगंभीरता मनात खोलवर उतरली होती. गोरक्षशिखरापासून दत्तशिखरापर्यंत आम्हाला जवळ जवळ ३/३.३० तास लागले होते. पण इतकावेळ कसा गेला आजिबात कळले नाही.
रांगेत उभे असताना खडकावर पडणार्या सावल्या:
आता उतरायला सुरवात. मनातून तिथून जाऊच नये असे वाटत होते. पण जाणे भाग होते. आम्ही परत कमंडलू तीर्थाच्या रांगेत उभे राहिलो. इथे एकदम शिस्तबद्ध कारभार होता. आधी धुनीचे दर्शन घ्यायचे, मग प्रसादासाठी दुसऱ्या मंडपात जायचे. तिथून बाहेर येऊन तीर्थ प्राशन करायचे मग बाहेर. इथेही बरेच लोक सेवेसाठी जाऊन रहातात. अखंड अन्नदान इथे केले जाते व येथील प्रसाद आवर्जून घेतला जातो. येथील धुनी दर सोमवारी सकाळी ६वाजता उघडतात आणि त्यात पिंपळाची पाने व पिंपळाचीच लाकडे ठेवली जातात. त्यातून आपोआप अग्नि प्रकट होतो. त्यात अनेकांना दत्तगुरूंचे दर्शन झालेले आहे. असं म्हणतात की दत्तगुरु जेंव्हा तपस्या करत होते तेंव्हा जुनागडमधे दुष्काळ पडला, म्हणून अनुसया मातेने त्यांच्या तपश्चर्येला थांबवून आजूबाजूची परिस्थिती त्यांना सांगितली. त्या प्रसंगी त्यांनी कमंडलू खाली फेकला, त्याचे कमंडलू तीर्थापाशी २ तुकडे झाले. एकातून अग्नी निर्माण झाला, तर एकातून पाणी. असे हे कमंडलूपासून निर्मिलेले कमंडलू तीर्थ.
इथे आम्हाला गरम गरम खिचडी, भाजी, दलीयाचा
गुळाचा शिरा असा प्रसाद मिळाला, तोही सकळी सकाळी ८.३०च्या सुमारास. एकदम
चविष्ट. सकाळी सकाळी एवढे अन्न गरमा गरम बनविणाऱ्या व वाढणाऱ्या
सेवेकऱ्यांची कमाल वाटली.
आम्हाला असे सांगितले होते की वर बऱ्याचदा
तीर्थ बाटलीत भरून देत नाहीत तेंव्हा बाटली नेऊ नका. पण आज बाटलीतही तीर्थ
देत होते. त्यांना उन्हाळ्यात अक्षरश: १ गडूमधे आंघोळ, कपडे धुणे करावे
लागते तरी अन्नदानात कधी खंड पडत नाही. हे ऐकून आम्ही अवाक् झालो. इथे
एकूणच वर शिधा आणणेही खूप कष्टाचे आहे. अनेक लोक थोडाफार शिधा, पैसे असे
दान देतात. आम्हीपण केले. आम्हाला दत्तगुरूंचा फोटो व प्रसाद भस्मासह
मिळाला.
हे सगळ करून येईपर्यंत बरेच वाजले असणार. आता आम्ही आश्रमात पोचल्यावरच वेळ पाहिली. आता १५०० पायऱ्या चढून गोरक्ष शिखर गाठायचे, मग अंबाजी. परत गोरक्षांचे दिवसा उजेडी दर्शन झाले. आता मोक्षाची गुहापण दिसली. त्याला पापपुण्याची गुहापण म्हणतात. गुहाम्हणजे छोटासा बोगदाच आहे. त्यातून सरपटत सरपटत बाहेर पडायचे. मी डोके आधी घालायच्या ऐवेजी पायाकडून शिरले आणि बाहेर पडले. तर लोक म्हणायला लागले हे चुकीचं आहे, परत जा आणि डोक्याच्या बाजूने शिरा. मी म्हटले अहो असतं एखादं बाळ पायाळू..:)
काही रस्त्यातले फोटो :
तिथून अंबाजी माता शिखर गाठले. इथे एका दुकानी, आधी आलेल्यांचे चहापान चालू होते. मी लिंबू सरबत घेतले. रात्रीतून पाणी असे प्यायलेच नव्हते. खाली तीर्थावरही अगदी अर्धा ग्लास प्यायलेला. आता लिंबूसाखरेने अजून ताजंतवान वाटलं. अंबाबाईच्या मंदीरात गेले. आता गर्दी कमी झाली होती. चढणारे तर जवळपास कुणी नव्हतेच. अंबेचे मंदीर अगदी शांतपणे आतून पहायला मिळाले. देवी तर थेट आमची रेणुकामाताच. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे असे ऐकले होते म्हणून पुजाऱ्यांना विचारले की देवीच्या कुठल्या अवयवामुळे हे स्थान निर्माण झाले. त्यांनी नाभी असे सांगितले. स्थानिक लोक बऱ्याचवेळा इथपर्यंत येऊन मातेचे दर्शन घेतात आणि खाली जातात असेही सांगितले. आता पुढचा टप्पा जैन मंदीरे.
जैन मंदिरांचा समूह इथे वसलेला आहे. ती दिसतातही खूप सुंदर. बरेच कोरीवकाम केलेली अनेक मंदीरे आहेत. त्यातील शिवमंदीर प्राचीन आहे असे म्हणतात. जाताना पटापट अंबामाता शिखराला पोहोचलो होतो. येताना मात्र वेळ लागला. त्यात मधे मी गोमुखी गंगेचे दर्शन घेतले तिथेही वेळ गेला. कितीतरी वेळ मंदिरे नुसती लांबूनच खुणावत होती. पण शेवटी एकदा त्यांच्या जवळ पोचलेच. आता उनही जाणवत होते. उन सावलीचा खेळ चालल्याने उन्हाचा त्रास मात्र झाला नाही.
बरीचशी मंदीरे बंद होती. मी नेमीनाथांचे मात्र पाहिले. हे मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. जैनलोकं इथपर्यंत दर्शनाला येत असतात. जरासा थकवा वाटत होता. मन मात्र एकदम फ्रेश होते. इथे क्षणभर विश्रांती घेऊन उतरू लागलो. आता फक्त पायऱ्या उतराच्या. पण तेच अवघड जाते असे म्हणतात, भराभर पायऱ्या उतरल्या तर नंतर पायात गोळे येतात तेंव्हा सावकाश उतराच्या.
सतत खुणावणारी जैन मंदिरे :
उजवीकडे रस्ता दिसतोय तिथे मंदिराच्या भिंतीमुळे उन्हापासून संरक्षण होते.
आता मी आणि शुभांगी थोडावेळ एकत्र उतरलो, मध्येच आम्ही एक काकडी खाल्ली दोघींनी मिळून आणि मस्त थंडगार वाटले, भूकही भागली, थकवाही गेला. मग मात्र ती पटापट पुढे निघून गेली. उतरताना परत भर्तुहरी-गोपीचंद गुहा, बेलनाथ महाराज करत सावकाश उतरत होते. मधे मधे उन जाणवत होते, मधेच आभाळ, छान वातावरण होते. आजूबाजूला निसर्ग ठासून भरलेला, दाट झाडी, झाडे तरी कीती वेगवेगळी. बेल, तुळस तर अमाप होते. मधे मधे पांढरी आणि पिवळी कोरांट फुललेली. कोरांटीची एवढी मोठी फुले पहिल्यांदाच पहात होते. लहानपणी अंगणात कोरांट होती पण तिची फुले म्हणजे साधारण अबोलीपेक्षा थोडी मोठी. इथे प्रदूषण नसल्याने सगळीच झाडे वेली तरारून वाढलेली.
खाली उतरता उतरता संध्याकाळ व्हायला लागली. वानरे आता खूप दिसायला लागली. त्यांचे मस्त खेळ चालू होते व आश्चर्य म्हणजे एकाही वानराने त्रास दिला नाही की रस्त्यात आले नाही. माकडेच फक्त त्रास देतात की काय कुणास ठाऊक. त्यांचे खेळ बघत किती पायऱ्या उतरतोय हेही कळत नव्हते. मधेच एका ठिकाणी एकदम सारे चिडीचूप झाले, वानरानी झाडावरुनच खॉक् असा इशारा दिला; मी ज्या पायरीवर होते तिथेच जवळच झाडीत खसपस झाली. मला वाटले कुठलेतरी जनावर पायरीच्या दिशेने येत असावे. मी जिथे होते तिथेच थांबले पण तो आवाज लांब जाऊ लागला. थोड्याच वेळात वानरे परत खाली उतरली आणि खेळू लागली म्हणजे जनावर गेले असावे मग मी ही चालू लागले. शेवटच्या पायरीवर आले तेंव्हा - " अरे पायऱ्या संपल्यापण" अशी मनाने प्रतिक्रीया दिली. परत पायरीवर डोके टेकले, दत्तगुरु, चढावा हनुमान यांचे आभार मानून भवनाथाकडे निघाले. मला असे कळले होते की शेवटच्या पायरीशी ॲक्युपंक्चरवाला बसतो आणि त्याचा खूप फायदा होतो. पण मला काही तो दिसला नाही.
मी भवनाथाचे दर्शन घेतले, जुन्या आखाड्यात जाऊन दत्तमुर्तीसमोर डोके टेकले. ही मुर्ती सुद्धा खूप प्रसंन्न आणि हसरी आहे. तिथे डोके टेकल्यावर क्षणात् जाणीव झाली की आपले उद्देश्य आता पुर्ण झाले. माझे डोळे भरुन आले, अश्रूंना बांध घालणे अवघड झाले. झ्टकन् उठून बाहेर पडले. जवळच धर्मशाळा होती. तिथे जवळपास सर्वच आलेले होते आणि आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. सर्वात शेवटी माझ्या २न्ही काकू आणि अजून एक जण होती. तिचे बूट कमंडलू तीर्थापाशी चोरीला गेले त्यामुळे अनवाणी उतरत होती. ते पण मग निवांत उतरले. रात्री १२.३०ला गाडी होती त्यामुळे सगळ्यांनीच आंघोळ विश्रांतीला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशी रात्री घरी पोचलो आणि ही गिरनार यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
दिवसाचे भवनाथ मंदिर :
आम्ही रहात असलेले नरसी मेहता धामः
एक स्वप्नवत असा हा प्रवास झाला. स्टेशनजवळचा स्कायवॉक पार करताना त्या जिन्यांनीही माझी दमछाक होते, मधे थांबावं लागतं आणि हे एवढे परिक्रमेचे अंतर, इतक्या हजारो पायऱ्या कसेकाय पुर्ण केल्या माझाच विश्वास बसत नाही. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मला कळाले की रात्रीचे चढायचे असते तेंव्हा पहिली प्रतिक्रिया नको रे बाबा अशीच होती कारण मला झोप आजिबात आवरता येत नाही. (लक्ष्मी रस्त्यावर भर गणपती मिरवणुकीमध्येही मी दुकानाच्या पायरीवर बसून झोप काढलेली आहे ! ). पण गुरुशिखराच्या रस्त्यावर एकही क्षण थकवा किंवा झोप जाणवली नाही. उतरताना पाय लटपटतात, एकेक पायरी नको होते असे ऐकले होते, यातला एकही अनुभव मला आला नाही. उलट घरी आल्यावरही मी ताजीतवानी होते. सहज चालता येत नव्हते किंवा खाली मांडी घालून बसायला १/२दिवस त्रास झाला तेवढेच!
असे अनुभव आले की त्या जगतगुरुंवर आपोआप विश्वास बसतो आणि मस्तक त्यांच्या चरणी लीन होतं मनात शब्द उमटतात "जय गिरीनारी !"
असा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी केलाच पाहिजे! एकदा तरी जंगल जोखले पाहिजे, गुरुशिखरावरील गूढता, रमणीयता अनुभवली पाहिजे. वरजाताना मुळीच फार खाणे पिणे नेऊ नये. रस्त्यात अनेक दुकाने आहेत व तिथे सर्व काही मिळते. पेनकिलर किंवा स्प्रे मात्र जवळ ठेवावा. त्याचा उपयोग होतो. वर जाताना कपडे सैलसर, सर्वांग झाकणारे व सुटसुटीत असावेत. त्याने चढाउतरायला व उन वाऱ्याचा त्रास होत नाही. गिरिनारची विशेषता हीच की इथे तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता, अगदी ट्रॅकपॅण्ट टी शर्ट देखील.
या अश्या प्रकारच्या यात्रा आपणही करु शकतो हे बीज माझ्या सासूबाईंनी रोवले. त्यांच्या ठिकठिकाणच्या वाऱ्या पाहूनच मनातील सुप्त इच्छेला सत्यात आणणे शक्य वाटले. परत इतक्या ऐनवेळी जा तू मी काम संभाळतो म्हणणारा माझा कलीग, माझा बॉस यांचाही यात हातभार आहे. माझ्या नवऱ्यानेही जाण्याविषयी कुठलीच तक्रार केली नाही त्यामुळे मी समाधानाने जाऊ शकले. माझ्या नणंदेने औषधांची यादीच मला पाठवून दिली व ती उपयोगीही पडली. बहिणीनेही वेळोवेळी मॉरलसपोर्ट दिला ज्यामुळे ताण कमी होऊन तयारीवर व धेयावर लक्ष केंद्रीत करता आले. या अश्या अनेक लोकांच्या शुभेच्छा व शुभाशिर्वादाने ही यात्रा पूर्ण झाली.
सर्वात शेवटी असेच म्हणेन की एकतरी वारी अनुभवावी गुरुशिखराची! जय गिरिनारी!
नीलाक्षी
गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार
पार्श्वभूमी:
आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचा ध्यास घेतला असतो. ती गोष्ट पुरी करण्यासाठी आपण जीवाचे रान करुन ते ध्येय गाठतो. पण कधीतरी असेही होते की कसलीही इच्छा, योजना मनात नसतांना एखादी गोष्ट आपसुक आपल्या पुढ्यात येऊन ठाकते आणि आपण अगदी झपाटल्यागत त्या मागे लागतो. ती पुरी करण्याच्या दॄष्टीने योग्य ती कार्यवाही अगदी नकळत घडून येते. घरात एखादं पक्वान्न बनवलं असतं आणि आई ते पक्वान्न आपल्या बाळाने खावं म्हणून आग्रह करत असते, पण अजाणतेपणामुळे बाळ मात्र नको नको म्हणत आढेवेढे घेत असतं. शेवटी आई बाळाचा हात धरुन स्वहस्ते त्याला भरवते आणि ती अवीट गोडी चाखतांच बाळाला जो आनंद होतो त्याचे वर्णन शब्दातीत असतं.
ऑगस्ट अर्थात श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्याकडून गिरनार पर्वताची यात्रा घडली. त्याची कहाणीही थोडीफार अशीच आहे. ही यात्रा अगदी पाच सहा दिवसांची असली तरी तो प्रवास माझ्या मनात त्याआधी तीन महिन्यांपासून सुरु झाला होता. या प्रवासात जे जे घडले ते तुमच्याबरोबर शेअर करावे तसेच हा अनुभव कायम स्मरणात रहावा यासाठी हा लेखनप्रपंच.
हे निव्वळ प्रवासवर्णन नाही. तर त्याला माझ्या विचारांची,अनुभवांची जोड आहे. वर लिहिल्याप्रमाणे मूळ प्रवासाच्या ३ महिने अगोदर ज्या आणि जशा घटना घडून आल्या आणि ध्यानी मनी नसलेली ही यात्रा माझ्याकडून घडवली गेली त्याचे मला जसे जाणवले तसे वर्णन यात असेल. या लेखनमालिकेचा 'श्रद्धा' हाच मूळ गाभा आहे, हे लक्षात घेऊनच हे वाचाल तर हे लेखन अधिक भावेल असं वाटतं.
साधारण फेब्रुवारी महिन्यात माझा चुलत भाऊ माझ्या घरी आला होता. त्या वेळी त्याने 'दत्त अनुभुती' नामक एक पुस्तक मला भेट दिले. "वाच तुला नक्की आवडेल", असं म्हणाला. यात काय आहे? असं विचारताच या पुस्तकाच्या लेखकाने गिरनार पर्वताच्या ११ वार्या केल्या आहेत आणि त्या दरम्यानचे अनुभव यात लिहिले आहेत हे सांगितलं त्याने. “मी वाचेन” म्हणून ते पुस्तक असंच टीपॉयमध्ये इतर पेपरांसोबत ठेवून दिले आणि त्याबद्दल विसरून गेले. या घटनेला तीन साडेतीन महिने उलटून गेल्यावर १८ मे या दिवशी घरात एकटी असतांना अचानक मला या पुस्तकाची आठवण झाली. लगेच ते वाचायला घेतले. अक्षरशः ते खाली ठेववेना, इतके थरारक अनुभव त्यात लिहिले होते. तोवर मला गिरनार नामक एक उंच पर्वत असून तिथे दत्तगुरुंचे जागॄत स्थान आहे जिथे गीरच्या जंगलातून जावे लागते,इतपत जुजबी माहिती होती. मात्र हे पुस्तक वाचत असतांना बर्याच गोष्टी कळल्या. काही शंका कुशंका मनात आल्याही ज्यांचे निरसन गूगल भाऊंनी केले. दहा हज्जार पायर्या चढून या दत्तगुरुंच्या स्थानी पोहोचता येते हे वाचताच "माझा आपला इथूनच नमस्कार घे दत्तबाप्पा" हे सहजोद्गार निघाले. याचं कारण मी मुळात श्रद्धावान असले तरी आवाक्याबाहेर असलेली शारिरीक मेहनत घेऊन, खूप उंच चढून किंवा खूप वेळ चालत त्याचप्रमाणे तासंतास रांगा लावून देवदर्शन घेणार्यांतली नाही. देव तर आहेच ना सर्वत्र , मग काय गरज आहे इतका त्रास करुन कुठे जायची हे असं साधं सोपं लॉजिक मी नेहमी लावत आले आहे. त्यामुळे गिरनारबद्दल काही वेगळे घडण्याची सुतराम शक्यता माझ्या बाबतीत नव्हती. पण.....
तसे घडायचे नव्हते………..
हे पुस्तक वाचल्यापासून गिरनार माझ्या डोक्यात घोळू लागाला. दुसर्या दिवशी नेटवर गिरनार बद्दल माहिती वाचून काढली. यू ट्युबवर काही व्हिडीओज पाहिले. पुस्तक वाचून आवडल्याची पोच रविवारी रात्री भावाला व्हॉटसअपवर दिली. त्याच्याशी चॅटींग करत असतांना सहज बोलून गेले की “हे पुस्तक वाचल्यापासून एकदातरी गिरनारला जावंस वाटतंय रे”. त्यानेही थम्ब्स अप ची स्मायली पाठवली आणि मी झोपले. दुसर्या दिवशी स्वप्नात मी स्वतःला गिरनार पर्वत चढत असलेलं पाहिलं. दोन दिवस सतत हेच विचार करतेय त्याचा परिणाम म्हणून असले स्वप्न पडले असणार असा विचार करतच सकाळी उठले. दूध तापत ठेवले असतांना सहज म्हणून फोन हातात घेतला, नेट ऑन केलं. सर्वात पहिले दिसला तो भावाचा मेसेज की श्रावण महिन्यात २४ ते २९ ऑगस्ट गिरनार यात्रा,इतर माहिती आणि लवकर नावे नोंदवण्याची सुचना. माझ्या भावाची मेडीकल कॉलेजातील मैत्रीण, जी स्वतः ज्या ग्रुपसोबत गिरनार यात्रा करुन आली होती तिने याच ग्रुपच्या पुढच्या यात्रेसंबंधित माहिती माझ्यासाठी भावाला पाठवली होती.
आपलं स्वप्न खरं होऊ घातलंय की काय असं मनात येऊन जीवाची उगीचच तगमग होऊ लागली. का कोण जाणे पण आपण गिरनारला जावं असं वाटू लागलं, पण त्याचबरोबर दहा हजार पायर्या समोर दिसू लागल्या. हे काही आपल्याला झेपायचे नाही. लहानपणापासून आजतागायत कधीच कुठला मैदानी खेळ, नियमित व्यायाम काहीही न केलेली मी, आता एकदम दहा हजार पायर्या कशा काय चढणार? याबद्दल साशंक होते, नव्हे माझ्या आवाक्यातलं हे नाहीच अशी खात्री होती.पण आतला आवाज काही वेगळं सांगत होता आणि ते म्हणजे प्रयत्न तर करुया, इतके लोक जाऊन आले आहेत की.कदाचित जमेलही आपल्याला. द्विधा मनःस्थिती झाली. लेकाचे दहावीचे वर्ष, त्याला फक्त आईंसोबत ठेवणे नवर्याला योग्य वाटेना, आईंचे ही वय झाले आहे. मग नवरा म्हणाला की तुझी मनापासून जायची इच्छा दिसतेय तर तू जा, मी आणि आई मिळून घरचं मॅनेज करु. तरीही अशा अनोळखी ग्रुपसोबत एकटं जायला मन धजावत नव्हतं. गिरनार चढाई ग्रुपनेच करतात. तो रात्री चढला जातो त्यामुळे शक्यतो लोक ग्रुपनेच जातात. माझं हो /नाही अजूनही नक्की ठरत नव्हतं. शेवटी भावाशी बोलले. त्याने त्याच्या मैत्रिणीशी बोलायला सांगितलं. तिने अगदी आश्वस्त केलं, की “बिनधास्त नाव दे, तुला घेऊन जाणारा 'तो' आहे इतकं लक्षात ठेव, बाकी कसलीही शंका मनात आणू नकोस”. बस्स ! मनाचा निर्णय झाला होता की आता मागे पहायचं नाही, फक्त कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती. ऑफिसमधली माझी एक मैत्रीण गुजराती आहे, देवभोळी आहे. ती येईलसे वाटले. ऑफिसमध्ये पोचताच तिला अमुक अमुक तारखांना गिरनारला येशील का? विचारले. क्षणाचाही विलंब न लावता तिने होकार दिला आणि मी आमच्या दोघींचं नाव रजिस्टर केलं. नाव देऊन पैसे तर भरुन ठेवू, जाणं, न जाणं पुढे बघू असाच विचार करुन.
का माहीत नाही एकदम शांत, निवांत वाटू लागलं. मनाची दोलायमान अवस्था शमली होती.पण खरी कसोटी आता सुरु होणार होती. ती म्हणजे इतक्या पायर्या चढून उतरण्यासाठी शरीराला आणि मनालाही तयार करणे. तीन महिने माझ्या हातात होते. स्वतःच्या शारिरीक क्षमतेबद्दल खात्री होती की हे माझ्याच्यानं होण्यासारखं नाही. त्यात कॉलेस्टेरॉल वरचेवर धोक्याची पातळी गाठत असतं माझं. आपल्यामुळे ग्रुपमधल्या कोणाला त्रास होऊ नये असं वाटत होतं.जे आधी जाऊन आले होते ते ट्रेकर्स वगैरे, ज्यांच्या गाठीशी असे डोंगरमाथे पालथे घालण्याचा मुबलक अनुभव आहे. माझ्यासारख्या ‘कच्च्या लिंबू’ कॅटेगरीतलं कोणी चढून गेलंय याबद्दल काही माहिती मिळत नव्हती.शेवटी मनाशी निर्धार केला की गिरनारची वारी ‘दत्तगुरुंच्या’ इच्छेनेच पुरी करता येते ही वदंता आहे, ते निर्विवादपणे खरं, तरीही आपण आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवायचे, स्वतःची शारिरीक क्षमता वाढवायची,तितकं आपल्या हातात नक्कीच आहे. मगच देवाला आळवायचं की यापुढंचं सगळं तू बघून घे देवा.
झालं, दुसर्या दिवसापासून चालायला नियमितपणे सुरुवात केली, जी मी माझ्या लहरीनुसार कधी-मधी करत होते. ३-४ दिवस झाले, पण असे वाटू लागले की जिने चढण्यासाठी आवश्यक त्या व्यायामाची आता खरी गरज आहे. माझ्या काही ट्रेकर्स मैत्रिणींनी मोलाचे सल्ले दिले, त्यांचा फायदा चढताना झालाच. माझा भाचा गेली काही वर्षे मॅरेथॉन्स करत आलाय. त्याच्याशी बोलले. त्याच्याकडून जिने चढणे-उतरणे यासाठी शरीराची तयारी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम प्रकार जाणून घेतले. त्याने पाठवलेले व्हिडिओज पाहिले आणि सुरु झाली माझी भौतिक तपश्चर्या. दररोज सकाळी सूर्यनमस्काराने सुरुवात, हॅमस्ट्रींगचे व्यायाम,क्रंचेस, स्क्वॅटस इ. त्याचबरोबर प्रोटीन्सयुक्त आहार. संध्याकाळी ऑफिसातून निघतांना जिने चढून -उतरण्याचा सराव. हे दररोज करत, हळू हळू वाढवत महिन्या दीड महिन्याभरात रोज १४ सू.न., ४५ स्क्वॅटस, 30 क्रंचेस आणि २० ते २२ जिने चढणे -उतरणे इथवर गाडी आली. त्यानुसार आहारात बदल केल्यामुळे असेल कदाचित किंवा व्यायाम हळू हळू वाढवत नेल्यामुळे शरीराला सवय झाली असावी म्हणून असेल, पण थकवा जाणवत नव्हता. याच्या जोडीला ऑफिसला येण्या- जाण्यासाठी ट्रेनचे जिने चढणे-उतरणे हे तर होतच होते.
दिवस पुढे पुढे सरकत होते. अधून मधून
भेटणारे बारीक दिसतेयस असे बोलू लागले. माझ्या गिरनार यात्रेबद्दल आणि
त्यासाठीच्या तयारीबद्दल फारच कमी जणांना माहीत होते. बापरे दहा हज्जार
पायर्या? जमणार आहे का तुला? काही झालं म्हणजे? असं माझ्या काळजीपोटी
बोलून माझा आधीच डळमळता निर्धार गळपाटून जाऊ नये म्हणून मीच ठरवलं जेव्हा
जायला निघू तेव्हा सांगायचं सर्वांना. वजनावर लक्ष ठेवून होते, ते काही कमी
झाले नव्हते, मला थकवा, अशक्तपणा जाणवत नव्हता, So I was on a right track
असे स्वतःला समजावत माझी साधना चालू ठेवली.
दिवस सरत होते. बघता बघता
ऑगस्ट महिना येऊन ठेपला. घरापासून, घरच्यांपासून दूर रहाणं हे
ऑफिसनिमित्तानं अधेमधे होत असलं तरी आता जिथे जाऊन रहाणार होतो ते एक गाव
असणार होतं. तळेठी नावाचं गाव जिथून गिरनारचा पायथा सुरु होतो. या गावात
काहीच सुविधा नाहीत. अगदी बँकेचं एटीएमही नाही असं आम्हाला सांगण्यात आलं
होतं.त्यामुळे तिथे जाऊन दुसरं काही होऊ नये म्हणून स्वतःला मी या काळात
विशेष जपलं. केव्हाही डोकं वर काढणारी माझी दाढदुखी., या ऐन मोक्याच्या
वेळेस कशी कच खाईल? जुलैमध्ये तिने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली.
महिन्याभराचा अवधी होता. ताबडतोब डेंटीस्ट गाठून अक्कलदाढ काढण्याची
शस्त्रक्रिया उरकून घेतली. इतर फिलिंग्स वगैरे पूर्ण केली.
माझ्या सोबत येणारी माझी मैत्रीण तर दररोज नियमित चालण्याचा व्यायाम कित्येक वर्षे करत आली आहे, तसंच ती पूर्वी गिरनारलासुद्धा जाऊन आली होती, पण ५००० पायर्यांवरील अंबा मातेच्या देवळापर्यंत. त्यामळे तिला बर्याच गोष्टी माहीत होत्या. ती रोज काही ना काही सल्ला देत असे. ती माझ्या सोबत असणार ही गोष्ट मला फारच दिलासादायक होती. पण याच सुमारास काहीतरी विपरीत घडले.
तिची आई आजारी पडली. प्रकॄती खालावत जाऊन ती अत्यवस्थ झाली. हॉस्पिटल, आय सी यू, या चक्रात ती अडकली. आईचे वय ८७. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती. जर ती येऊ शकली नसती तर मी पुन्हा एकटी पडले असते. मी एकटीने गिरनारला जावे याला आमच्या आई तयार नव्हत्या. त्यांनी जरी असे बोलून दाखवले नाही तरी त्यांचा काळजीचा सूर मला जाणवत होता. त्यांच्या मनाविरुद्ध आणि जीवाला घोर लावून माझा पाय घराबाहेर पडला नसता. त्यावेळी मनोभावे दत्तगुरुंना प्रार्थना केली की “इतकं सारं घडवून आणलंयस तर आता काही मोडता येऊ नये असं वाटतंय, याउप्पर माझ्यासाठी जे उचित असेल तसं घडू दे आणि ते स्वीकारायची ताकद मला दे”.
७ ऑगस्टला माझ्या मैत्रिणीची आई देवाघरी गेली, तिचे दिवसकार्य वगैरे होऊन मैत्रीण २० तारखेला घरी आली. २४ तारखेला निघायचे होते, दत्तगुरुंनी मार्ग दाखवला होता.
ऑगस्ट सुरु झाला तसा आयोजकांनी गिरनारयात्रेत सहभागी होणार्यांचा व्हॉटस अप ग्रुप तयार केला. त्यावर रोज काही ना काही सुचना येत असत. प्रवासात आणायचे सामान, पर्वत चढताना घेऊन जायच्या वस्तू, अगदी चढतांना चप्पल, बूट कसे असावेत इतक्या बारीक-सारीक बाबतीत मार्गदर्शन केले जाऊ लागले.त्यांच्या अनुभवी सल्ल्याबरहुकुमच मी माझी बॅग भरत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयत्या वेळी नवे बूट नकोत, म्हणून आधी बूट घेऊन ते घालून चालण्याचा, चढ-उताराचा सराव करु लागले. नऊ हजार पायर्यांच्या टप्प्याला भणाणता वारा असतो, छत्री कुचकामी ठरते, त्यामुळे रेनकोटच न्यायचे ठरवले. चढतांना आपण थकतो त्या वेळी पटकन एनर्जी मिळेल असे खाऊचे पदार्थ जवळ ठेव असा मोलाचा सल्ला भाच्याने दिला होता. त्याप्रमाणे स्निकर्स एनर्जी बार्स आणि खजूर, इलेक्ट्रलचे सॅशेस सोबत घेतले. बाम, रोल ऑन, सेंसर अशा वेदनाशमक गोष्टींनी औषधांची बॅग पूर्ण भरली.
या सुमारास पर्वतावर प्रचंड धुकं असतं. काही फुटांवरचंही दिसत नाही. त्यामुळे ७ ते ८ फूट लांब प्रकाशझोत पडेल अशी टॉर्च सोबत घ्यायची होती. ती घेतली. संपूर्ण चढाई रात्री करायची असली तरी अध्येमध्ये देवळात न्यायचे सामान विकणार्यांची दुकाने/घरे असतात. त्या लोकांशी संपर्क करुन कोणत्याही क्षणी डोलीची व्यवस्था करता येते ही दिलासाजनक खबर मिळाली. डोलीवाले किती पैसे घेतात तो अंदाज दिला गेला. मी तेव्हढे पैसे जवळ बाळगायचे ठरवले. कोणत्याही वेळी असे वाटले की आपण नाही चढू शकत तर अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, किंवा एकटे वाटेत थांबण्यापेक्षा डोलीचा पर्याय चांगला होता. चढतांना जास्त वजन नको, म्हणून देवासाठीही घरुन काहीही प्रसाद्,वगैरे नेला नव्हता. आयोजक त्याची व्यवस्था करणार होते. अगदी रिक्त हस्ताने जात होते आणि खरंतर त्याला देऊन तरी काय देणार होते मी? तोच तर देत आला होता आजवर.
२४ ऑगस्ट २०१९....... गेले तीन महिने उराशी बाळगलेलं स्वप्न साकार होत होतं. आज दुपारी १२.४५ ची बांद्रा टर्मिनसवरुन ट्रेन होती. सकाळपासून शुभेच्छांचे फोन, मेसेजेस येत होते. समोरच्याच्या आवाजात काळजी जाणवत होती. मग मीच त्या प्रत्येकाला धीर दिला की काळजी करु नका, मी सुखरुप जाऊन येईन.
१०:३० वाजता निघाले.सर्वांनी बान्द्रा टर्मिनसलाच भेटायचे होते. तिथेच सारे सदस्य प्रथम भेटले. हा वसईचा ग्रुप.काही जण एकमेकांना ओळखत होते, तर काही अनोळखी. एकूण २४ सदस्य होते. पैकी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ६९ वर्षांचे आजोबा आणि सर्वांत ज्युनियर त्या आजोबांचा ७ वर्षांचा नातू. बाकी सगळे अधले मधले. बरेचसे एकेकटे होते, आम्हा दोघींसारखे, फक्त एक जोडपं आणि आजोबा-नातवाचं कुटुंब. विशेष म्हणजे २४ पैकी फक्त ३ जण जे आयोजक होते तेच आधी गिरनारला जाऊन आले होते, पैकी एक मी वाचलेल्या 'दत्त अनुभुती' या पुस्तकाचे लेखक बाकी सर्व नवखे, माझ्यासारखेच साशंक, त्यामुळे अगदी हुश्श झालं. जुजबी ओळख वगैरे झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
क्रमशः
तुमच्या गावी आलो आम्ही
प्रवास सुरु झाला. दोन वेगळ्या डब्यांत मिळून आमचे २४ लोक बसले होते. आयोजक थोड्या थोड्या वेळाने चक्कर मारुन कुणाला काही हवं नको ते पहात होते. मिनरल वॉटरचे वाटप करीत होते. जाताना दुपारचे जेवण बोरीवली येथे तर रात्रीचे अहमदाबाद येथे गाडीत चढवले गेले. आयोजकांचे टाय अप्स असलेल्या कॅटररने पॅक्ड फूड गाडीत पोहोचते केले. पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुनागढ येणं अपेक्षित होतं, जिथे आम्हाला उतरायचं होतं. त्यामुळे अहमदाबादला जेवण झाल्यावर सगळे गुडुप झोपून गेलो. झोपताना अडीचचा गजर लावला होता. त्याप्रमाणे उठलो. सामान आवरले. गाडी वेळेवर पोहोचत होती. साधारण तीनला दहा मिनिटे असतांना आम्ही उतरलो. रिक्षात बसून लगेच तळेठी गाठले. तिथेच आमची रहयची सोय केली होती आणि तिथूनच सगळीकडे जायचे होते.
पंधरा-वीस मिनिटांत आमचे हॉटेल आले. रूम्स ताब्यात दिल्या गेल्या. रूमवर गेल्यावर काही वेळ आराम केला. सकाळी नऊ-साडेनऊला तयार रहायला सांगितले होते. त्याप्रमाणे आवरत होतो. रुमवरच चहा नाश्ता केला.
आज २५ ऑगस्ट रविवारचा दिवस होता. आज रात्री गिरनार चढण्यास सुरुवात करायची होती. खोलीबाहेर असलेल्या गॅलरीतून आजुबाजूला पर्वत शिखरे दिसत होती. त्यांपैकी अनेकांच्या माथ्यावर ढगांनी दुलई पसरली होती.हिरव्यागार पर्वतशिखरावर अधेमधे पिंजलेल्या कापसासारखे भासणारे ढगांचे पुंजके लक्ष वेधून घेत होते. यातलं नेमकं कुठलं आपल्याला चढायचंय? उत्सुकता शीगेला पोचत होती. डाव्या बाजूला दिसत असणारा पर्वत आम्हाला दाखवला गेला. त्यावर काही बांधकाम केलेलं दिसत होतं. तो जैन मंदीर परिसर, जो ४००० पायर्या चढल्यावर येतो तो. इथवर जाणारे बरेच आहेत. विशेषतः स्थानिक जैन लोक. तेथून अजून वरती अगदी इवलुसं काहीतरी दिसत होतं ते अम्बाजी धाम होतं, ५००० पायर्या चढून येणारं अंबा मातेचं मंदीर. मग दहा हजार पायर्यांवरचं दत्तशिखर कुठे होतं? तर तिथे पोहोचण्यासाठी हा अम्बाजी धामचा पर्वत चढून विरुद्ध बाजूने उतरावा लागणार होता आणि त्या पुढे अजून एक डोंगर चढून उतरल्यावर मग तिसर्या सुळक्यावर दत्तशिखर. अबब.....
त्यामुळे पायथ्यापासून वर नजर टाकली तर दत्तशिखर नजरेत येणे शक्यच नाही. मनात म्हटलं इथे काही मुखदर्शन, लांबून दर्शन, व्हीआयपी दर्शन, नवसाची रांग अशा कॅटेगरीज नाहीत. जे आहे ते दहा हज्जाराचा पल्ला गाठूनच पहायचं.
तळेठी गाव
साधारण दहाच्या सुमारास बाहेर पडलो. सर्वप्रथम तळेठी गावचे ग्रामदैवत 'भवनाथ' मंदीरात निघालो. गिरनार यात्रा ज्या गावातून सुरु होते त्या गावच्या दैवताला सर्वप्रथम आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकडं घातलं जातं. त्यासाठी सर्वात आधी या शिवमंदीरात आलो.पाऊस नव्हता. प्रसन्न हवा होती. सुंदर नक्षीदार बांधकाम असलेले हे शिवमंदीर खूप छान आहे. दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो.
भवनाथ मंदीर
आता कुठे? याचं उत्तर आलं "जटाशंकर", बरं म्हणत निघालो. तसं आम्हाला सांगितलं गेलं की जास्त नाही पण पाचएकशे पायर्या चढायच्या आहेत. माझा 'आ' वासला. एकतर गेले काही दिवस कोणत्याही संख्येपुढे ‘पायर्या’ हा शब्द ऐकू येताच माझे कान टवकारले जात होते. माझी चलबिचल सुरु झाली. डोळ्यांसमोर भाच्याचं मॅरेथॉनचं शेड्युल आलं. स्पर्धेसाठी ढोर मेहनत घेतात मात्र स्पर्धा ज्या आठवड्यात आहे तो पूर्ण आठवडा आरामाचा असतो. कसलाही व्यायाम करायचा नसतो शेवटचे काही दिवस. स्पर्धेसाठी एनर्जी साठवून ठेवायची असते. मी सुद्धा असेच केले होते. पण हे काय भलतेच? आज रात्री ‘मिशन गिरनार’ आहे तर त्याआधी कशाला ५०० पायर्या चढून उतरायच्या? ते ही उन्हात? आपण ग्रुपसोबत आहोत त्यामुळे ग्रुप लीडरच्या मतानुसारच वागायला हवे हे कळत होते, तरी देखील मी एक खडा टाकायचा असे ठरवून बोलले की “आता रात्री जाणारच आहोत ना, तेव्हाच ५०० पायर्यांवर जटाशंकराचं दर्शन घेतलं तर नाही का चालणार?”, "नाही हो ताई, जटाशंकर या अंगाला आणि गिरनार त्या तिथे". “अरे देवा”, हे स्वगत होतं. शेवटी ठरवलं की आपण स्पष्ट बोलून तर बघू. म्हटलं, "दादा, आपण आत्ताच ५०० पायर्या चढून उतरलो तर आपली एनर्जी वाया नाही का जायची या उन्हात? रात्रीसाठी ठेवायला हवी ना शिल्लक? उद्या करुयात का जटाशंकर?” तर उत्तर आले की "जटाशंकर म्हणजे प्रिलिम आहे असं समजा आणि रात्री फायनल एक्झाम." “बोंबला… म्हणजे प्रिलिम नंतर लग्गेच त्याच दिवशी फायनल? आपल्या चुका सुधारायला काही वावच नाही की..”. हे ही अर्थात स्वगत होतं. आता ठरवलं की जाऊ दे आता हे लोक जिथे नेतील तिथे गपगुमान जायचं, सांगतील तसं चढायचं , सांगतील तेव्हा उतरायचं. बाकी कोणीच काही बोलत नव्हते तर आपणच का विरोध करावा? त्यात ६९ वर्षांचे आजोबा, दुसरे साठीचे जोडपे उत्साहात चढायला तयार होते त्यांच्यासमोर मी हॉटेलवर जाऊन आराम करते हे बोलायचीही लाज वाटू लागली. मनाशी पक्कं केलं जे व्हायचंय ते सर्वांसोबत माझंही होईल, आता जास्त आढेवेढे घेणं नको. आमच्या म्होरक्याने शेवटी म्हटलं “ताई तुम्ही चला तर खरं, नक्की आवडेल तुम्हाला असं ठिकाण आहे ते.”
त्यांच्या शब्दांची प्रचिती काही वेळातच आली.गल्लीबोळ पार करत एका आडवाटेला लागलो आणि काही क्षणांतच घनदाट जंगलात. आजूबाजूला प्रचंड मोठमोठाली झाडं आणि अवतीभवती दगडा-खडकांतून जाणारी वाट, काही ठिकाणी कच्च्या पायर्या. बाजूलाच खळखळत वाहणारा झरा. ज्याचा आवाज मन प्रसन्न करीत होता. झाडे झुडपे इतकी दाट होती की सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचतही नव्हती, अंधारुन आलं होतं.जाता जाता पक्ष्यांचे विविध आवाज अगदी मोराचा केकाही ऐकू आला. वाटेत भरपूर माकडे दिसली. पण ती माणसांना त्रास देत नव्हती. एकंदर परीसर आल्हाददायक होता. अजून एक आनंदाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जिथे सूर्यकिरणे पोचू शकत नव्हती तिथे जिओचे नेटवर्क मात्र व्यवस्थित मिळत होते. ताबडतोब घरी व्हिडिओ कॉल लावला आणि घरच्यांना ही रम्य जागा दाखवली. कधीही कुठेही माझ्यासोबत असणार्या घरच्या तीन मेम्बरांची प्रकर्षाने आठवण येत होती.मध्ये एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह ओलांडून पुढे जायचे होते, तिथे मात्र जरा भिती वाटली इतकंच. मुंबईकरांसाठी भुशी डॅमचे जे स्थान ते इथल्या स्थानिकांसाठी जटाशंकरचे. जागॄत देवस्थान म्हणून ज्ञात असलं तरी पिक्निक स्पॉट सारखी गर्दी, पाण्याच्या प्रवाहाखाली डुंबणारी जनता. पाचशे पायर्यांची तमा न बाळगता ट्रंका, पेटारे भरभरुन घरून आणलेले खाणे-पिणे उत्साहात वाहून नेणार्या बायका आणि दर पाचेक मिनिटांवर एखाद्या डेरेदार वॄक्षाखाली गोलाकार विसावलेला कुटुंब कबिला, मधोमध वर्तमानपत्राच्या कागदांवर उघडलेले खाण्याचे डबे, अगदी बाटल्या भरभरुन ताकसुद्धा घरुन घेऊन आली होती ही मंडळी. हे दॄश्य पाहून माझी मैत्रीण अगदी सद्गदीत झाली. मला म्हणे गुजराथी माणूस कधीही कुठेही भुकेला रहात नाही, ठाण मांडून खाणं चालू करतो आणि त्यापुढे मी गुजराथी माणूस आणि त्याची खाद्ययात्रा यावर एक चमचमीत व्याख्यान ऐकले.
पुढे
जात जात आम्ही मंदीरात पोहोचलो. एका गुहेत , कपारीत ते स्वयंभू शिवलिंग
होते आणि त्या भोवती डोंगर कपारीतून वाहत आलेल्या झर्यातील पाणी वाहत होतं.
खरंच खूप शांत, रम्य वातावरण होतं तिथलं. मन प्रसन्न करुन गेला तो माहोल.
दर्शन झल्यावर आम्ही परतीचा मार्ग घेतला.
जटाशंकर मंदीर
यापुढचं
ठिकाण होतं साक्षात गिरनार पर्वताची पहिली पायरी. नाही चढाई रात्रीच
करायची होती. पण भवनाथ आणि जटाशंकर दर्शनाननंतर गिरनारच्या प्रथम पायरीवर
नतमस्तक होत दत्तगुरुंना आणि स्वतःच्या आराध्य दैवताला प्रार्थना करायची
असते की आज रात्री आम्ही तुमच्या दर्शनासाठी निघणार आहोत. आम्हाला सुखरुप
वरपर्यंत नेऊन आणा. त्यानुसार आमच्यातील प्रत्येकाने पहिल्या पायरीवर डोके
टेकून मनोभावे प्रार्थना केली. शेजारीच 'चढवावा हनुमान' नामक हनुमान मंदीर
आहे. हनुमानाकडेही पर्वत चढून उतरण्यासाठी शक्ती द्यावी अशी याचना करायची
असते. ते ही केले आणि जेवून हॉटेलवर परतलो.
आराम केला. डोंगरावर नेण्याचे जुजबी सामान सॅकमध्ये भरले. आपल्याकडे काही देवळांत विशिष्ट पोशाख घालूनच प्रवेश दिला जातो असे बंधन इथे अजिबात नाही. ज्याला चढतांना जे कंफर्टेबल वाटेल ते घालावे असे सांगण्यात आले होते. जीन्स, शॉर्टस, थ्री फोर्थ काहीही. संध्याकाळी जरा पाय मोकळे करुन आलो आणि जेवलो. रात्रीसाडेअकराला पुन्हा आंघोळ करुन निघायचे होते. डोंगर चढतांना आधारासाठी प्रत्येकाला काठी देण्यात आली होती.
एका हातात टॉर्च आणि दुसर्या हातात काठी या दोन गोष्टी प्रत्येकाकडे असायलाच हव्यात असे सांगितले गेले होते. दुसर्या दिवशी दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत डोंगरावर नेटवर्क नसल्यामुळे संपर्क करता येणार नाही, तरी काळजी करु नये असे घरच्या सदस्यांना सांगून ठेवायची सुचना आधीच केली गेली होती. निघतांना घरी फोन केला, सर्वांशी बोलले. मन भरुन आले होते. नवर्याला म्हटलं की जोवर नेटवर्क मिळतंय तोवर मी तुला एसेमेस पाठवत राहीन, किती पायर्या चढले , कशी आहे वगैरे. तू सकाळी उठशील तेव्हा मी नेटवर्कमध्ये नसेन पण तुला निदान समजेल तरी माझा प्रवास.
गेले तीन महिने सतत ज्याचा विचार मनात घोळत होता, अगदी ध्यास लागला होता, ते आता काही तासांनंतर दॄष्टीपथात येणार होते. खरंच डोळ्यांनी दिसणार होते की अर्धवट परतावे लागणार होते? माहीत नाही. पण आता त्याची पर्वा नव्हती. ज्याने इथवर आणलं तोच ठरवेल पुढचं. पण जर त्रास झाला, विशेषतः श्वास लागला, धाप लागली तर न लाजता डोली करायची हे मी मनाशी ठरवले होते. तरीही ती वेळ येऊ नये, आपण पायी चढून जावे ही इच्छाही होतीच.
आता ज्यासाठी इतका अट्टाहास केला त्या गिरनारस्थित दत्तगुरुंबद्दल थोडेसे:-
(ही माहिती 'दत्त अनुभुती' हे पुस्तक तसेच आंतरजालावर गिरनार बद्द्ल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार इथे देत आहे).
गुजरात राज्यातील जुनागढ शहरात गिरनारच्या पर्वतरांगा आहेत. समुद्रसपाटीपासून ३६६५ फूट उंचीवर या पर्वतरांगांवरील सर्वांत उंच शिखर - गोरक्षशिखर आहे. तसेच 'गुरुशिखर' - हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय्य निवासस्थान आहे असे मानतात. 'गुरुशिखर' या ठिकाणी दत्तगुरुंच्या पादुका - खडकावर अर्धा ते एक इंच आत रुतलेल्या पावलांच्या ठशांच्या रुपात आहेत. पादुकांच्या मागे त्रिमुर्ती स्थापन केली आहे. पूर्वी गुरुजींव्यतिरिक्त केवळ एक व्यक्ती जाऊन दर्शन घेऊ शकेल इतपतच जागा होती, मात्र आता बांधकाम करुन साधारण १५ ते २० माणसे आत मावू शकतील इतकी जागा केली आहे. या स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी, ज्या वेळी अत्री ऋषी - आणि अनसुयामातेचे पुत्र म्हणून पृथ्वीवर लौकिक अवतार धारण केला होता तेव्हा, या गुरुशिखरावर तब्बल १२००० वर्षे तपश्चर्या केली होती असे म्हणतात. तपश्चर्या सुरु असताना जुनागढ येथे दुष़्काळ पडला. पाऊस पडत नव्हता, त्यामुळे पिक-पाणी होत नव्हते, गुरे, वासरे, माणसे मरु लागली. त्यावेळी अनसुया मातेने आपल्या लेकाला तपश्चर्येतून जागे केले. जागे होताच त्यांनी आपल्या हातातील कमंडलू खाली फेकला, तो दुभंगून दोन ठिकाणी पडला, एका ठिकाणी पाणी उत्पन्न झाले तर दुसर्या ठिकाणी अग्नी. अशा प्रकारे दत्तात्रेयांनी अग्नी व पाण्याची सोय करुन जुनागढ मधील दुष्काळ दूर केला होता. या स्थानावर आजही अन्नपूर्णेचा वास आहे असे म्हणतात व येथे येणार्या प्रत्येकाला अन्नपूर्णेचा प्रसाद दिला जातो. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून. त्यामुळे गिरनार चढत असतांना उपवास करु नये, इथला अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण केल्यावरच ही यात्रा संपन्न होते असे म्हणतात. त्या ठिकाणी आजही पाण्याचे कुंड आहे. या स्थानाला ‘कमंडलू तीर्थ’ असे संबोधले जाते. जिथे अग्नी प्रकटला तिथे आजही दर सोमवारी पिंपळाच्या पानांची मोळी ठेवून विशिष्ट मंत्रोच्चरण करतांच स्वयंभू अग्नी प्रकट होतो. हीच धुनी. दत्तगुरु तेथे धुनीच्या रुपात प्रकटतात व अनेकांना त्या धुनीत त्यांचे आजही दर्शन होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथे गोरक्षनाथांचे स्थान आहे. त्यांनी आपले सद्गुरु श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली होती की जिथे मी आहे तिथे तुम्ही, माझे गुरु असायलाच हवेत. म्हणूनच गोरक्षनाथांनी अधिक उंचावर जाऊन तापश्चर्या केली जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर दत्तपादुका राहातील. हे गोरक्षशिखर म्हणूनच सर्वात जास्त उंचीवर (३६६५ फूट) आहे. पायथ्यापासून ४००० पायर्यांवर जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे स्थान व जैन मंदीरे आहेत. तर ५००० पायर्या चढल्यावर अंबा मातेचे देऊळ आहे. अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन,तिचा आशिर्वाद घेऊनच गुरु शिखराकडे मार्गस्थ व्हावे असा प्रघात आहे. साधारण अडीच ते तीन हजार पायर्यापर्यंतची वाट ही गीरच्या जंगलातील आहे. त्यामुळे वन्य श्वापदे दिसू शकतात. यासाठी काठी आणि टॉर्च सोबत घ्यायला सांगितले जाते.
स्वतःभोवती अनेक गूढ वलये ल्यालेला, अद्भुत अशा आख्यायिका ज्याबद्दल सांगितल्या जातात असा हा गिरनार पर्वत. गिरनार चढण्यास जायचे असल्यास व्यवस्थित रस्ता माहीत असलेली व्यक्ती सोबत असावी, त्याचप्रमाणे जो वहिवाटीचा रस्ता आहे, त्या वाटेनेच चढावे आणि उतरावे असे सांगितले जाते. गिरनार ही पर्वत शॄंखला आहे. वहिवाटेनुसार जैन मंदीर, अंबाजी, गोरक्षशिखर,गुरुशिखर या मार्गाने न जाता, वेगळ्याच पर्वतावरुन, वेगळ्या मार्गानेही जाता येत असावे, मात्र अशा कोणत्याही वेगळ्या मार्गावर पायर्या, लाईटस नाहीत. पायरी मार्गावर लाईटस आहेत पण फार अंधुक प्रकाश, त्यामुळे पावसाळी वातावरणात टोर्च शिवाय पर्याय नाही. इतर मार्गाने जाता -येतांना वाट चुकण्याची, वन्य श्वापदांची भिती असते. या पर्वतांवर बर्याच गुहा आहेत. तिथे आजही अनेक जण तपसाधना करीत असतात. अशा आडमार्गावर अनेक तांत्रिक त्यांची साधना करीत असतात, त्यांच्या मार्गातून आपण जाऊ नये आणि म्हणून वहिवाटेनेच पायर्या चढत जावं असं सांगितलं जातं.
शिर्डी, अक्कलकोट आणि इतरही काही देवस्थानांबद्दल जी वदंता आहे तीच या तीर्थक्षेत्राबद्दलही आहे की इथे कुणीही स्वतःच्या इच्छेने येऊ शकत नाही. 'दत्तगुरुंची इच्छा' असावीच लागते. अशा अनेक आख्यायिका, पुरातन कहाण्या मनात साठवत आम्ही २४ जण सांगितल्या गेलेल्या सुचनांचा आदर करुन, शंका कुशंकांना स्थान न देता, असं खरंच असेल का? असे उलट प्रश्न न करता अर्थात पूर्ण श्रद्धेने चढू लागलो. जास्त लोक ३० ते ५० या वयोगटातील होते. कौतुक करावे तर आमच्या चमूतल्या बाल शिलेदाराचे, रजत त्याचं नाव. खूप उंचावर असलेल्या दत्तबाप्पाच्या दर्शनाला आजी आजोबा आणि आजीची बहीण जात आहेत हे कळताच त्याने येण्याचा हट्टच धरला. इतका की शेवटी आयत्या वेळेस त्याला आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आईलाही आमच्या सोबत घेतले. कराटे शिकत असलेल्या या चिमुरड्याचा स्टॅमिना जबरदस्त, सात वर्षांचा हा पोरगा, न थकता उत्साहात चढला तसेच सकाळी उतरलाही, कुठेही झोप येतेय, दमलो अशी तक्रार, कुरकुर नाही की आईला त्याला कडेवर घ्यावे लागले नाही. हॅटस ऑफ टू रजत.
साडेअकराच्या सुमारास एकमेकांना शुभेच्छा देत बाहेर पडलो. पुन्हा एकदा बंद असलेल्या भवनाथ मंदीराला बाहेरुन नमस्कार करुन गार्हाणे घातले आणि मार्गस्थ झालो. पहिल्या पायरीपाशी आलो. बूट काढून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो. त्यावेळी कंठ दाटून आला. सद्गुरुंना म्हटलं, “हे इतकं मोठं दिव्य करायला धजावतेय पण एकटी आहे, तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स”. 'चढवावा हनुमंतालाही प्रार्थना केली. बूट घातले आणि चढण्यास सुरुवात केली.
क्रमशः
चालविसी हाती धरुनिया
आम्ही निघालो त्यावेळी पाऊस अजिबात नव्हता. काही पायर्या चढून होताच घाम येऊ लागला. पहिल्या पाचशे पायर्या खूप थकवणार्या असतात. त्यापुढे शरीराला सवय होते. आम्हाला दिलेल्या सुचनांनुसार आम्ही सावकाश चढत होतो. तसेच चढत असतांना जास्त बोलत राहिले की दम लागतो हे ही लक्षात घ्यायला सांगितले होते. पाणी अगदी गरज वाटली तरच, घोटभर पित चढण्यास सांगण्यात आले होते. काही अंतर चढून गेल्यावर आमच्या मागे-पुढे मराठी भाषिक लोक दिसू लागले. चौकशी करतां तो ५० जणांचा ग्रुप नाशिक, मनमाड येथून आला होता असे कळले. आपल्या सोबतच आपली भाषा बोलणारी मंडळी आहेत हे पाहून जरा बरं वाटलं. आमच्या ग्रुप मध्ये सर्वांत पुढे आयोजकांतील एक व शेवटी सर्वांत सावकाश चढणार्या सदस्याच्या मागे एक आयोजक अशी ग्रुपची रचना सुरुवातीपासून होती. त्यामुळे कोणीही रस्ता चुकण्याची, भरकटण्याची भिती नव्हती. तसंच चढत असतांना सर्वांत पुढे गेलेला ग्रुप जिथे थांबून विश्रांती घेई, तिथे मागून चालणारी मंडळी पोचली की आधी पोचलेली मंडळी मार्गस्थ होत असत आणि हेच मग त्या नंतरच्या मंडळींनी पुढच्या टप्प्यातील मंड्ळींसाठी केले, त्यामुळे चढतांना संपूर्ण ग्रुपमध्ये एक समन्वय होता . कुणीतरी फारच पुढे निघून गेलंय आणि कुणीतरी मागे एकटं पडलंय अशी मिसिंग लिंक कोणाच्याच बाबतीत चढतांना घडली नाही.
पहिल्या पाचशे पायर्या चढून होण्याआधीच आमच्या ग्रुपमधील एक काका थकले. त्यांनी मी चढू शकत नाही. डोलीनेच जाईन हा निर्णय घेऊन टाकला. ते खरच घामाने निथळत होते, प्रचंड धापही लागली होती. त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला होता.ते जरा स्थिरस्थावर झाल्यावर आयोजकाने डोलीची व्यवस्था केली. डोलीवाल्याचे पैसे ठरवले. काकांना त्या डोलीवाल्याच्या ताब्यात देऊनच मग आयोजक पुढे चालू लागले.
मजल दरमजल करीत आमचे चढणे सुरु होते. आजूबाजूला बरीचशी टपरीवजा बंद दुकाने दिसत होती. साधारण अडीच हजार पायर्यांपर्यंत जंगलातील रस्ता असल्यामुळे वन्य श्वापदे आढळू शकतात. मध्यभागी दगडी पायर्या, एका बाजूला दरी तर दुसर्या बाजूला जंगल अशी रचना. ज्या बाजूला दरी होती,त्या बाजूला कठडा होताच असे नाही. त्या जंगलात कीर्र अंधारात पाहिले तर धुक्यामुळे काही अंतरावर पुढचे अजिबात दिसत नव्हते. भयपटात दाखवतात तसे झाडाचे बुंधे आणि धुक्यात अस्पष्ट होत गेलेली वाट...यामुळे वातावरणातील गुढ अजून वाढत होते. एका बाजूची अंधारात हरवलेली खोल दरी आणि दुसर्या बाजूचे धुक्यात अस्पष्ट दिसणारे जंगल. या दोन्ही गोष्टीची नाही म्हटलं तरी भिती वाटत होती. एकदा कधीतरी मी एकटीच राहिले. पुढची मंडळी किती पुढे गेलीत आणि मागून कोण येतंय हे धुक्यामुळे समजत नव्हते. कुणाचा बोलण्याचा आवाजही येत नव्हता. त्या क्षणी मी प्रचंड घाबरले आणि मनापासून सद्गुरुंना आळवले, मला भिती वाटतेय हे ही बोलले, काही वेळातच मागून आमची मंडळी येतांना दिसली. आता यापुढे चुकुनही डाव्या-उजव्या बाजूला बघायचे नाही, फक्त समोरच्या पायर्यांवर लक्ष केंद्रीत करुन पुढे चालायचे हे ठरवले.
हळूहळू चढतां चढतां ५०० पायर्या, १००० पायर्या, १२०० पायर्या असे टप्पे येत होते. अनेकदा येऊन गेलेल्या आयोजकांना ते टप्पे ओळखता येत होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. नवर्याला सांगून ठेवलं असल्यामुळे मला जेव्हा कळत होतं की ५०० पायर्या झाल्या, १००० झाल्या मी त्याला मेसेज करत होते. मी बरी आहे, फ्रेश आहे, हेही सांगत होते. माझा मेसेज गेल्यावर लगेच त्याचे उत्तर येत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याला सांगितलं की आता कधीही नेटवर्क जाईल आणि मग तू काळजी करशील, त्यापेक्षा झोप आता.तसेच झाले. चार हजार पायर्यानंतर मेसेजेस जात नव्हते.
आता बरेच उंचावर आलो होतो. धुकं वाढत असल्यामुळे सुरुवातीला जसा दरदरून घाम येत होता तो येणं थांबलं. धुक्यातूनच आमचे मार्गक्रमण चालू होते. साधारण दोन फुटांवरचंही दिसत नहतं. आजूबाजूचेही थांबत चढत होते. माझ्यासाठी आश्चर्याची वाटणारी गोष्ट घडत होती ती म्हणजे मला अजूनतरी धाप लागली नव्हती, थकवा जाणवत नव्हता. एरव्ही थोडेसे चालून दमणारी मी, चालण्याचा आळस करणारी मी चढत असूनही ताजीतवानी होते. मी माझ्या आयुष्यात स्वतःला इतके फिट फक्त या चढाई दरम्यान अनुभवले. तरीही अति आत्मविश्वास दूर सारून मी अधे मधे थांबत होते. घोटभर पाणी, खजूर, स्निकर्स हे अधे मधे खात होते.
माझी मैत्रीण हळू हळू चढत होती. तिचा आणि एका काकींचा चालण्याचा वेग समान होता. त्यामुळे त्या दोघी एकत्र चालत होत्या. मी त्यांच्या जरा पुढे चालणार्या मंडळींसमवेत होते. चारहजार पायर्या झाल्यावर पहिला टप्पा - नेमिनाथ स्थान म्हणजे जैन मंदिरे आली. खूप भारी वाटत होते. इथवर तर सुखरुप पोचलो हा अनांद सोबत होता. जैन मंदीरांना वळसा घालून आम्ही पुढचा रस्ता धरला.
काही अंतर चालून गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते आढळले. एक डाव्या बाजूला जिथे आता जशा पायर्या चढत आलो त्याच धाटणीच्या पायर्या होत्या तर उजवीकडे पायर्या नसून साधी वळणावळणांची वाट दिसत होती. प्रथम येणार्याला अर्थातच जिथे पायर्या दिसत आहेत तिथून जायचे असे वाटले असते. त्यानुसार मी डावीकडे वळणार तोच आमचे नेहमी सर्वांत शेवटी रहाणारे आयोजक आता 'वाटाड्याची' भुमिका चोख बजावत होते. त्यांनी उजवीकडे जिथे पायर्या नव्हत्या तो आपला रस्ता असे सांगितले. मी प्रश्न केला की मग ही पायर्यांची वाट कुठे जातेय? त्यावर तिथे थोडे अंतर चढून गेल्यावर रस्ताच नाही असे समजले. त्या प्रसंगी गिरनारसारख्या ठिकाणी रात्री चढत असताना अनुभवी ग्रुप सोबत असणं किती गरजेचं आहे हे जाणवलं.
आता पुढचा टप्पा अंबाजी धाम - ५००० पायर्या हे आमचं लक्ष्य होतं.आमच्यासोबतच ज्या दुसर्या ग्रुपने चढण्यास सुरुवात केली होती त्या ग्रुपमध्ये एक गॄहस्थ झांजांच्या तालावर "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा नामघोष करत चढत होते. त्या नीरव गूढ शांततेत त्यांचा धीरगंभीर आणि खणखणीत आवाज आश्वस्त करीत होता.बाळ जसं आईला "आई, आई" हाकारत तिच्या दिशेने पुढे चालत रहाते तसं वाटत होतं. ग्रुपमधील अनेकांनी गिरनार उतरुन परतल्यावर हाच अनुभव सांगितला की ते "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामस्मरण ऐकले की एक प्रकारची उर्जा मिळत होती चढण्यासाठी आणि चालण्याचे श्रम जाणवत नव्हते.
आता चढतांना ढग आम्ही ज्या उंचीवर होतो त्यापेक्षा खाली दरीत विहरतांना दिसू लागले. हळू हळू जमिनीपासूनचे अंतर वाढत आहे हे दरीत नजर टाकतांच लक्षात येत होते. दिवसाउजेडी हा परिसर किती विहंगम दिसत असेल याची कल्पना मनात करत चालत होते. अजूनतरी पाऊस आला नव्हता. अगदी एखादी चुकार सरही नाही. मात्र वातावरण तसेच धुक्याचे. चढत असतांना हा एकच फोटो वरुन दिसणार्या वाटेचा काढला. बाकी सारे फोटो दुसर्या दिवशी उजेडात काढलेले आहेत.
कालपर्यंत एकमेकांना अनोळखी असलेल्या ग्रुपमध्ये आता चढतांना मात्र मस्त 'बाँडींग' झालं होतं. कुणाला कसलीही मदत लागली तरी अनेक हात पुढे सरसावत होते. सोबत आणलेला खाऊ, चॉकलेटस यांची देवाणघेवाण होत होती. जे आयोजक नव्हते त्या पुरुषांनीही स्वतःहून एकेका स्त्रियांच्या ग्रुपसोबत राहून, त्यांच्या वेगाने चढत कोणीही एकटे मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली.
आम्हां सर्वांची चढत असतांना करमणूक करण्याची, श्रमपरिहार करण्याची जबाबदारी जणू आमच्यातील छोट्या सदस्याची होती. तो पठ्ठ्या भारी उत्साही. पटापट पायर्या चढून तो पुढे जाई आणि आपल्या घरची माणसे कुठवर पोचली हे तपासायला वरुन टॉर्च मारुन शोधत बसे. नेमका तो प्रकाशझोत मागून चढणार्यांच्या डोळ्यांवर पडून डोळे दिपत असत. बर्याचदा तर वीसेक पायर्या चढून गेलेला रजत परत तितक्याच तत्परतेने आई कुठवर आली हे बघायला खाली उतरत असे.या हिशोबाने मला तर वाटते त्याने गिरनार पर्वत सलग दोन वेळा चढून उतरला असावा.
हळूहळू वातावरणातील बदल जाणवत होते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. तीन- सव्वातीनची वेळ असेल. ब्राह्म मुहुर्ताची वेळ. यावेळी केलेली उपासना, साधना अधिक फलदायी असते असं मानलं जातं. आमचीसुद्धा ही एक प्रकारची उपासनाच चालू होती की आणि ती देखील या सिद्ध भुमीत जिथे साक्षात दत्तगुरुंनी स्वतः तपाचरण केले आणि त्यांना सद्गुरुस्थानी मानणार्या त्यांच्या कैक शिष्य, साधकांनी देखील. अशा कित्येकांच्या तपसाधनेची पवित्र स्पंदने या पवित्र भुमीत, इथल्या आसमंतात भरुन राहिली असतील जी आम्ही त्या ब्राह्म मुहुर्तावर ग्रहण करु शकत होतो. आधी जाणवली तशी भिती आता अजिबात वाटत नव्हती.खूप प्रसन्न असे वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.
धिम्या गतीने चढत-चढत आता अंबाजी धाम दॄष्टीपथात येऊ लागले. बघता-बघता ५००० म्हणजे निम्म्या पायर्या होत आल्या की. मी ज्यावेळी अंबाजी मंदीराजवळ पोचले तेव्हा ३.५८ वाजले होते. ११.३५ वाजता पहिल्या पायरीपासून सुरुवात करुन, मध्ये अनेकदा विश्रांतीसाठी थांबूनही साडे चार तासांत आम्ही ५००० चा टप्पा गाठू शकलो होतो. मंदीर तर अजून बंदच होते. माझ्या आधी पोचलेली मंडळी हसतमुखाने स्वागत करत समोर आली. त्यांनी सांगितल्यानुसार मंदीराच्या पायरीवर डोके टेकवून नमस्कार केला. ‘इथवर सुखरुप आणलंस आई, आता पुढेही असंच सुखरुप ने अशी प्रार्थना केली ‘आणि जिथे सगळे बसले होते त्या टपरीवजा हॉटेलात आले. आधी पोचून ताज्यातवान्या झालेल्या मंडळींनी नुकत्याच पोचलेल्यांना जागा करुन दिली. आयोजकांनी या हॉटेलच्या मालकांना झोपेतून उठवून आमची मंडळी आता हळूहळू पोचतायत तर चहा तयार ठेवा असे सांगितले. गरम गरम चहा आणि पार्ले़ जी बिस्कीटस खाऊन तरतरी आली.
हळूहळू एकेक करत सर्व पोचले. सारे वेळेत पोहोचलो होतो. आता पावणेपाचपर्यंत इथेच थांबायचे होते.कारण यापुढचे अंतर एक ते दीड तासात पूर्ण होणार होते. गुरुशिखर -मंदीर पहाटे साडे पाच वाजता दर्शनासाठी उघडते. त्या आधी तिथे पोचल्यास कुठेही थांबायची सोय नव्हती. पायर्यांवर बसावे लागले असते. त्यामुळे इथेच थांबलो. खरं तर अजून निम्म्या पायर्या बाकी होत्या. मग दीड तासांत कसे काय पोचलो असतो आम्ही? असं म्हणतात की ५००० पायर्या चढून अंबा मातेचा आशिर्वाद घेतला की यापुढचं अंतर ती अंबा माता लीलया पुरे करुन घेते, तिच्या कूपाशिर्वादाने पुढचा टप्पा झरझर पार केला जातो. ती आईच दत्तगुरुंच्या पुढ्यात आपल्याला नेऊन ठेवते, हे ऐकतांच अगदी भारावून गेले.
आमचे पाचही आयोजक मदतीस तत्पर होते. गिरनार पर्वत यात्रेचा आनंद जो आपल्याला मिळाला तो इतरांनाही मिळावा या नि:स्वार्थी भावनेने या यात्रेचे आयोजन केले जाते आणि ही नि:स्वार्थी वॄत्ती प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होती, हे विशेष. कुठेही चिडचिड नाही, हातचे राखून माहिती देणे नाही. आताही जिथे थांबलो होतो तिथे थोडं स्ट्रेचिंग करा म्हणजे पाय मोकळे होतील अशी हळुवार सुचना त्यांनी दिली. त्यानुसार स्ट्रेचिंग करुन आम्ही पावणे पाचच्या सुमारास पुन्हा निघालो.
आता गोरक्षनाथ शिखराकडे जाऊ लागलो. याच रस्त्यावर प्रचंड वारा असतो. इथे एकमेकांचे हात पकडून कडं करुनच पुढे जाता येते असे ऐकले होते. आम्ही जेव्हा इथे पोचलो त्या वेळी वारा तर होताच पण असा वादळी वारा नव्हता. व्यवस्थित एकेकटे चालता येत होते. आता हा पर्वत उतरुन दुसरा चढायचा होता. त्यामुळे १०००-१५०० पायर्या उतरायच्या होत्या. काठीच्या आधारे त्या नीट उतरुन पुन्हा पुढील पायर्या चढू लागलो.
याच वाटेवरुन जात असतंना जर कदाचित मुसळधार पाऊस आला असतां तर?..... पाऊस पडत असतांना आजूबाजूच्या कडेकपार्यांतूनही पाण्याचे ओहोळ वहात पायर्यावर येतात, वार्याचा वेग अशा वेळी प्रचंड वाढतो, चढणे मुश्कील होते असे ऐकले होते. अंगावर सरसरून काटा आला. आम्ही दुसर्या दिवशी दुपारी खाली उतरेपर्यंत पाऊस मात्र अज्जिबात आला नाही. जुनागढ हा भाग कमी पावसाचा, त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस संपला असावा असे म्हणावे तर आम्ही मुंबईत परतल्यावर नंतरच्याच आठवड्यात तिथे मुसळधार पाऊस पडला होता, रस्त्यांवर पावसाचे पाणी वेगाने वहात असल्याचे व्हिडीओज आमच्या गिरनार यात्रेच्या ग्रुपवर पाहिले आणि मनोमन देवाचे आभार मानले.
या घटनेचा नंतर विचार करीत असतंना जाणवलं की अरे आपल्याला तर गिरनारच्या वाटेवर व्ही आय पी ट्रीटमेंटच मिळत होती जणू काही, तेही कसलेही व्ही आय पी स्टेटस नसतांना. पण व्ही आय पी स्टेटस नाही कसे म्हणावे बरं? आपण सारी तर ‘दत्तगुरुंची बाळं’... हा एकच निकष पुरेसा आहे की व्ही आय पी पास मिळवण्यासाठी. जणू काही दत्तगुरुंनी स्वतः आमच्यासाठी रदबदली केली होती. पंचमहाभुतांना जणू आदेश दिले होते की "माझी बाळं डोंगर चढतायत मला भेटायला येण्यासाठी. तुम्ही तुमचं रौद्र रुप दाखवलंत तर भांबावतील बिचारी, हाल होतील त्यांचे. खरी 'राज की बात' तर ही आहे की ती सारी चढत नाहीचेत मुळी, मीच त्यांना कडेवरुन घेऊन येतोय. तेव्हा हे पंचमहाभुतांनो, माझ्या कार्यात मला मदत करा." आणि या आदेशाचे पालन प्रत्येक ठिकाणी केले जात होते. आम्हाला मोकळा मार्ग मिळत होता. अगदी जिथे कुठे पायर्या पाण्यामुळे ओल्या आढळल्या, तिथे त्यांच्यावर शेवाळ मात्र नव्हते. त्यामुळे कुठेच घसरायलाही झाले नाही.
आजूबाजूला आता स्थानिक काठियावाडी स्त्री-पुरुष दिसू लागले. आसमंत हळूहळू उजळू लागला होता. काळ्याकुट्ट अंधाराचे रुपांतर निळ्या सावळ्या रंगात होत होते. पुढे जात असतांना हळूहळू गुरुशिखराचा सुळका दिसू लागला. सरळसोट सुळका.... बघूनच धडकी भरावी असा. पण पायर्या मात्र वळणा-वळणाने सावकाश वर जाणार्या होत्या. घाटातल्या रस्त्यासारख्या. या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आणि मन भरुन आले.
पहाट होत असतांना
आजूबाजूचं वातावरण भारलेलं जाणवत होतं. कोणत्याही मंदीरात, मंदीर परिसरात आपण पावित्र्य अनुभवतो. मात्र त्यात त्या स्थानमहात्म्याइतकेच योगदान इतर गोष्टींचेही असते, जसं फुलांचा मंद सुवास, धूप, उदबत्तीचा दरवळ, त्यांची हवेत विरत जाणारी वलये, शांतपणे तेवणारी समई, निरांजन, सोबत त्या मंदीरातील आराध्य दैवताची ऐकू येणारी आरती, स्तोत्र, धीरगंभीर आवाजातील मंत्रोच्चरण या सार्या गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. म्हणून गर्दीत,कोलाहलातही आपण ती शांती, पावित्र्य अनुभवू शकतो. इथे मात्र त्यांपैकी काहीच नव्हते. जे होते ते अजून नजरेस पडलेही नव्हते, तरीही ती शांती, ते पावित्र्य, शुचिता प्रत्ययास येत होती. अरुणोदयाची मंगल वेळ आणि गुरुशिखराचे सान्निध्य.....
गुरुशिखराबाहेर चपला, बूट काढायला जागा नाही,
त्यामुळे आधी पन्नास एक पायर्या शिल्लक असतांना चौथरा असेल तिथेच काढून वर
जा असे सांगितले होते आम्हांला.त्यानुसार ज्या टप्प्यावरुन मंदीराचे
प्रवेशद्वार दिसत होते तिथे बूट काढले आणि सुरु झाला अखेरचा पन्नास
पायर्यांचा प्रवास.....भावभावनांचे कल्लोळ मनांत उठवणारा.. तरीही मनाला
तॄप्तीची अनुभुती देणारा......
क्रमशः
पायर्यांची झलक
गुरुशिखर - गिरनार (या सुळक्यावर वरती जे निळ्या पांढर्या रंगात दिसतंय ते गुरुशिखर)
आजि म्या ब्रह्म पाहिले
तॄप्तीची अनुभुती ? कसं काय? अजून तर दर्शन व्हायचे होते त्याआधीच तॄप्ती? पण 'देवाघरची अशीच उलटी खूण असते', कुणाची ही वाट पहाण्यात एक अधीरता असते, घालमेल असते, पण या वाट पहाण्यात खरोखर तॄप्ती जाणवत होती, वाट पहाण्यातली तॄप्ती केवळ परमेश्वरच देऊ शकतो.
फक्त पन्नास पायर्या बाकी राहिल्यात या जाणीवेनेच आतून भरुन येत होते. जसजशी जवळ येत चालले होते, शरीरात सूक्ष्म कंप जाणवू लागला होता. धडधड वाढली होती. मी इथवर आले होते? नाहीच मुळी "तो" घेऊन आला होता.... माझं इथवर येणं घडून येण्यासाठी माध्यम ठरलेले अनेक जण आता नजरेसमोर येऊ लागले. पुस्तक देणारा भाऊ, या यात्रेविषयी माहिती देणारी त्याची डॉ. सहध्यायी, परीक्षा चालू असतांनाही “आई तू जा बिनधास्त म्हणणारा मुलगा”, वयाच्या ८२ व्या वर्षी घरची, लेकाची जबाबदारी सांभाळेन म्हणणार्या आई, आईला आणि लेकाला सोबत म्हणून , मनात असूनही माझ्याबरोबर न येता “तू निर्धास्तपणे जा”, म्हणणारा नवरा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफिसातून सुट्टी मिळू शकेल की नाही अशी शंका येत असंताना बाणेदारपणे बॉसना Sir, let her take leave I will take care of her work in her absence असे म्हणून आश्वस्त करणारा ऑफिसातील सहकारी, मला व्यायाम आणि आहारासंबंधी योग्य मार्गदर्शन करणारा माझा भाचा, या यात्रेचे पाचही आयोजक आणि इतर ग्रुप मेंबर्स…. सर्वांची मी ॠणी आहे, तुम्ही सर्व नसता तर हे भाग्य माझ्या वाट्याला आले नसते.
गिरनारची वारी करतांना वाटेत 'दत्तगुरु' कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे ऐकले होते. पण मला असे कोणीही दिसले/भासले नव्हते. कसलीही अनुभुती, चमत्कारीक अनुभव का ही ही नाही. हा विचार मनात येताच सद्गुरुंचे शब्द आठवले. "बाळांनो, चमत्कार पाहून नमस्कार करु नका.समोर दिसणार्या चमत्काराने तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खरा चमत्कार सद्गुरु घडवून आणतात तो भक्ताच्या मनात आणि मनात बदल घडला की प्रारब्ध बदलायला वेळ लागत नाही”. अचानकच आठवले ज्या वेळी 'दत्त अनुभुती' पुस्तकात दहा हजार पायर्यांच्या प्रवासाबद्दल वाचले, त्या वेळीच मुखपॄष्ठावर असलेल्या गुरुशिखरावरील दत्तगुरुंच्या फोटोकडे पाहून म्हटले होते की "माझा नमस्कार इथूनच घे दत्तबाप्पा" असं बोलणारी मी आणि गिरनार दर्शनाची आस मनात घेऊन इथवर पोचलेली मी.... हा माझ्या मनातील बदल होता. हा माझा प्रवास होता नकारात्मक भावनेतून, सकारात्मकतेकडे नेणारा, न्युनगंडाकडून आत्मविश्वासाकडे नेणारा..... सद्गुरुंनी सांगितलं होतं की “जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ताकदीच्या बाहेरील कार्य आपण संपादन करतो, तेव्हा जाणावे की कुठेतरी, कुठल्यातरी क्षणाला ह्या कार्यामधील कुठलातरी भाग स्वयंभगवानाने माझे रुप घेऊन घडवून आणलेला आहे”. याहून जास्त अनुभुती कसली हवी होती मला? सद्गुरु म्हणतात की “परमेश्वराकडे प्रत्येकाची रांग ही वेगळीच असते, माझ्या रांगेत माझ्या पुढे कोणी नाही आणि मागेही नाही, मी एकटीच चालत असते माझ्या रांगेत, त्यामुळे अमक्याला हे मिळालं/दिसलं तर मला का नाही? हे विचार सोडा. 'ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळणारच आहे , कारण 'तो' तर भरभरुन द्यायलाच बसला असतो आपल्या लेकरांना, आपलीच झोळी फाटकी असते”..... हे सारं आठवून डोळे पाझरतील की काय अशी अवस्था झाली. कसेबसे स्वतःला सावरत चढू लागले.
श्रावणासारख्या पवित्र महिन्यात, एकादशीच्या दिवशी, सोमवारी हे दुर्लभ दर्शन घ्यायला मिळणार होते. माझ्यासाठी आजच्या दिवसाला आणखी खास महत्व होते. कारण आज २६ ऑगस्ट हा माझ्या आईचा जन्मदिन. ती असती तर आज तिचा ७५ वा वाढदिवस असता.नेमक्या याच दिवशी मला सद्गुरुपादुकांचे दर्शन होणे हा निव्वळ योगायोग खचितच नव्हता. आई-वडीलांची पुण्याई मुलांच्या कामी येते असं म्हणतात, तेच घडत असावं माझ्या बाबतीत.
पावणेसहा ते सहाचा सुमार. शेवटची पायरी चढले. समोर, लोखंडी सरकते दार, त्या दाराजवळ बसलेला गणवेषधारी पहारेकरी. आतमध्ये दॄष्टीक्षेप टाकत मी आत पाऊल टाकले, जिथे साक्षात दत्तगुरु पादुकांच्या रुपात स्थिरावले होते, त्या गुरुशिखरावरील मंदीरात मी आता या क्षणी उभी होते. चालत थोडी पुढे गेले, पादुकांसमोर , सभोवती गोलाकार बॅरीकेडस होते, तरीही पादुका व्यवस्थित दिसत होत्या. राखाडी रंगाच्या पाषाणावर, साधारण सहा ते साडे सहा फूट उंचीच्या व्यक्तीच्या पायांचा आकार जितका असेल त्या आकाराची दोन पावले, त्या पाषाणात रुतलेली, त्यामुळे जरा खोलगट, पायाच्या बोटांपासून मध्यभागापर्यंत पादुका तशाच अनावॄत्त होत्या. मागच्या भागांवर फुले वाहिली होती, जरी अर्धा भागच दिसत असला तरी अंदाज येत होता पावलांच्या लांबीचा. पादुकांच्या मागेच त्रिमुर्ती, ती मात्र पादुकांच्या आकाराच्या तुलनेत, छोटीशी, साजरी. पादुकांकडे एकटक बघत असतांना नकळत हात जोडले गेले आणि इथवर आवरुन ठेवलेले अश्रू घळघळा डोळ्यांतून वाहू लागले. आता ते आवरणं शक्य नव्हतं. त्याच स्थितीत डोकं टेकलं. आपल्या खूप जवळच्या कुणालातरी आपण बर्याच काळानंतर भेटतोय असं वाटत होतं. असा काही वेळ गेला. सावरलं स्वतःला. समोरच पुजारी बसले होते, ते पहात होते.पण त्यांना हे सवयीचं असावं बहुदा, कारण प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होत होती. मंदीरात अर्पण करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेलं खडीसाखरेचं पाकीट आणि पादुकांसठी हिना अत्तराची छोटी बाटली, बाहेर काढली.गुरुजींना दिली. खडीसाखर लगेच प्रसाद म्हणून परत केली गेली. उभी राहिले, प्रदक्षिणा घालण्यासाठी. हात जोडून प्रदक्षिणा घालत परत समोर येत असतांना गुरुजी माझ्याकडे पहात माझ्या दिशेने येत असलेले दिसले, म्हणून तिथेच थांबले. त्यांनी एक लहानशी पोथी माझ्या हातात दिली आणि म्हणाले की "बेटी इसे रोज पढना, तुम्हारी हर इच्छा महाराज पुरी करेंगे!' त्या क्षणी पुन्हा एकदा कंठ दाटून आला. गुरुजी परत फिरुन पादुकांशेजारी जाऊन बसले. मला पुन्हा एकदा नमस्कार करायची अनिवार इच्छा झाली. पुन्हा एकदा पादुकांसमोर नतमस्तक झाले. मनोभावे नमस्कार केला. हुंदका दाटून आला. आवंढा गिळत उठले. अजून मागे बरीच माणसं खोळंबली आहेत. त्यांना माझ्यामुळे ताटकळत रहावं लागू नये असं वाटलं, कारण थोड्या थोड्या लोकांनाच एकावेळी आत सोडत होते. पादुकांकडे पहात- पहातच परत फिरले.
त्याच पायर्यांवर चढणारी माणसे होती. मी उतरु लागले. अगदी थोड्याच पायर्या उतरल्यावर माझी मैत्रीण दिसली. तिला म्हटले, “तू दर्शन घेऊन ये, मी थांबते इथे." अजूनही सूर्योदय झाला नव्हता. तांबडं फुटू लागलं होतं. ढगांआडून एखाद-दुसरी सोनेरी रेघ आकाशात पसरत चालली होती. एरव्ही हिल स्टेशन्सना, समुद्रकिनारी जाऊन सुर्यास्त कैक वेळा पाहिला आहे पण सूर्योदय पहाण्याची ही पहिलीच वेळ.तो सुद्धा गुरुशिखरावरुन दिसणारा सूर्योदय. पण तितका वेळ हाताशी नव्हता. आता धुनीचे दर्शन घ्यायचे होते. जी फक्त दर सोमवारीच प्रज्वलित होत असते.सहा वाजून गेले होते. आम्ही दोघी झटपट उतरु लागलो. अंधारात जे जाणवलं नव्हतं ते आता उजेडात दिसून आलं की बर्याच पायर्यांना कठडाच नाहीये. उतरतांना त्यामुळे जरा भिती वाटत होती. एकमेकींचा हात धरुन आम्ही खाली आलो. आता बर्याच पायर्या चढायच्या होत्या. त्या चढून झाल्या एकदाच्या. धुनीपाशी आणि त्याबाहेर गर्दी जमली होती. आम्ही पोहोचेपर्यंत आत धुनी प्रज्वलित झाली होती. आमच्यापैकी केवळ दोघे त्या वेळी तिथे होते, ज्यांना तो क्षण पाहण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले. पुन्हा एकदा मनाला बजावले "ज्याला ज्याची गरज आहे, ते त्याला मिळणारच." शांतपणे रांगेत आत जात धुनीपाशी आलो. शिर्डीतल्या साईनाथांच्या द्वारकामाईतील धुनीची आठवण आली. लहानपणापासून देव म्हणजे साईबाबा हे समीकरण मनात फिट्ट झालेले. त्यांचंच बोट धरीत इथवर पोचले होते. मनोभावे धुनीला नमस्कार केला.
आता अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण करायची वेळ. इतक्या लवकर पोचलो असूनही आत आमच्या आधीच पहिली पंगत बसली होती. त्यामुळे बाहेर थांबलो.पहिल्या पंगतीतील भाविकांचे प्रसादग्रहण झाल्यानंतर आम्हाला आत घेण्यात आले.एका वेळी साधारण तीस - चाळीस माणसे बसू शकतील इतकी जागा होती. सेवेकरीही तत्पर होते.भराभर पाने वाढण्यात आली. सकाळी साडे सहाच्या सुमारास डाळ, भात, शिरा-पुरीचा आस्वाद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.
तिथून गोरक्ष गुफेकडे जायचे होते. पण स्त्रियांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे बाहेरच बाकीच्यांची वाट बघत थांबलो. तोवर सकाळचे साडे सात वाजले होते.गिरनार जागा झाला होता. वर्दळ वाढली होती. आम्ही आता अंबाजी मंदीराकडे चालू लागलो. ते दर्शन अजून बाकी होते. अंबाजी मंदीरापाशी आता पुजेच्या, ओटीच्या सामानाची दुकाने उघडली होती. ते घेऊन आत दर्शनासाठी गेलो. रेणुका मातेसारखं दिसणारं अंबामातेचं रुप मनात भरलं. बाहेर येऊन परत एकदा पहाटे जिथे चहा घेतला होता, त्या हॉटेलात विसावलो. गिरनार वारीतील सर्व स्थळांचे दर्शन घेऊन झाले होते. आता परतीची वाट धरायची होती. कोल्ड्रींक घेऊन थोडा आराम केला. साधारण सव्वा आठ-साडे आठच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली.
आता खरी कसोटी होती. उतरतांना अधिक त्रास होतो, पाय लटपटतात, पायांत गोळे येतात असे ऐकून होते. उतरायला सुरुवात केली आणि अगदी ८-१० पायर्या उतरताच उजव्या पायांत क्रँप आल्यासारखे वाटले. धस्स झालं. चढतांना अगदी पिसासारखी चढले होते. आता काय ? पायाची बोटे जरा हलवली. काही क्षण थांबले. बरं वाटू लागल्यावर पुन्हा उतरायला सुरुवात केली. पायांत गोळे ,पाय लटपटणे यांपैकी काहीच होत नव्हते. त्यामुळे हायसं वाटलं. आता फक्त एकच चिंता होती , ती उन्हाची. उन्हं प्रखर झाली की त्याची झळ लागणार. मला तर उन्हात गेलयावर त्रास होतोच होतो. त्यामुळे शक्यतो उन्हं चढायच्या आत खाली उतरण्याचा प्रयत्न करायचा असे ठरवले. माझी मैत्रीण अगदी सावकाश उतरत होती. तिच्याशी बोलले. तिच्या सोबत ग्रुपमधल्या काही जणी होत्या. त्यामुळे ती म्हणाली की तू पुढे झालीस तरी चालेल आणि मी पुढे निघाले. मध्ये-मध्ये वाटेत आमच्या ग्रुपमधले कु़णीतरी भेटत होते. उतरतांनाही थांबत, विश्रांती घेतच उतरलो.
एका ठिकाणी एक भली थोरली शिळा तिरप्या अवस्थेत - (४५ डीग्री च्या कोनात कललेली) आढळली. ती शिळा देवीमातेने आपल्या दोन्ही हातांनी धरुन ठेवली आहे असे मानले जाते. त्या स्थानावर देवीला हळदी-कुंकू, बांगड्या वाहिलेल्या दिसत होत्या.
आजूबाजूचे सॄष्टीसौंदर्य आता नजरेत भरत होते. उतरत असतांनाच
काही फोटो काढले. सकाळच्या लख्ख प्रकाशात गिरनार डोळ्यांत साठवून घेत उतरत
होतो.
या अशा डोंगरातील गुहा अधेमधे दिसत होत्या.
आता विरुद्ध दिशेने चढून येणारी माणसे वाटेत दिसत होती. वर्दळ वाढत होती. ते लोक "दत्तात्रेय" पर्यंत चढून परत येताय का? कधी चढायला सुरुवात केलीत वगैरे चौकशी करत होते.
एका ठिकाणी जे पाहिलं ते बघून थबकलेच. एक कॄश
अंगकाठीचा युवक एल पी जी सिलिंडर खांद्यावर घेऊन अनवाणी चढत होता, घामाने
निथळत. त्यानंतर लगेच काही बायका सुद्धा मोठाल्या फरशा डोक्यावर घेऊन
चढतांना दिसल्या. स्वतःची लाज वाटू लागली.
इथे यायचं म्हणून किती ते
जीवाला जपलं होतं मी... ब्रॅण्डेड, अॅण्टीस्किड, कंफर्टेबल शूज निवडून
घेतले होते, अशाच इतरही अनेक गोष्टी कंफर्ट देणार्या. स्वतःच्या कंफर्ट
झोनमधून बाहेर यायचीच तयारी नसते नं आपली... इथे हे बिचारे कष्टकरी....
त्यांच्या पायांत साध्या चपलाही नव्हत्या नि शिरावर एव्हढं ओझं. मनात आलं
आपल्याला मिळालेलं ‘व्ही आय पी स्टेटस’ हे या यात्रेपुरतं नसून त्या
‘दयाघनाने’ जन्मापासून आपल्याला बहाल केलं आहे. आपल्याला फक्त किंमत नाहीये
त्याची. म्हणून तर साध्याशा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचा आपण इतका बाऊ
करत असतो. या कष्टकर्यांच्या रुपात खरोखर ‘देव दर्शन’ झाले आम्हा
सर्वांनाच. इतर तीर्थस्थळांवर गर्दी करणार्या भिकार्यांपेक्षा हे लोक
स्वाभिमानाने जीवतोड मेहनत करुन कष्टाची भाकरी मिळवत होते. मनोमन कडक
सॅल्युट ठोकला त्यांना.
गिरनार यात्रेदरम्यान जाणवलेली एक खंत म्हणजे इतकं जागॄत देवस्थान असूनही हे फार दुर्लक्षित आहे. दुसर्याच दिवशी पाहिलेल्या सोमनाथ, प्रभास क्षेत्र येथील देवस्थानांचे वैभव बघता इथे तर किमान सुविधाही नाहीत. प्रसाधनगॄहही ९००० पायर्या चढून गेल्यावरच. सरकार इथे का लक्ष देत नाही? माहीत नाही. यात्रेकरुंसाठी नाही पण निदान इथल्या मजूरांचे असे अवजड सामान वाहून नेण्याचे कष्ट तरी दूर व्हावेत अशी मनोमन इच्छा आहे.
जैन मंदिरे दिसू लागली. त्या मंदीरांचे बाधकाम खूप सुंदर
होते. गिरनारच्या पार्श्वभुमीवर ही जैन मंदीरे सकाळच्या उन्हात खूप
लोभसवाणी दिसत होती. जैन मंदिरे
हळूहळू उन्हे चढू लागली. नेमक्या किती पायर्या उतरुन झाल्या, किती राहिल्या, कळत नव्हते. थोड्याच पायर्या आता शिल्लक राहिल्या असाव्यात असं स्वतःला समजावत मी उतरु लागले. अता कधी एकदा खाली पोचतोय असे होऊ लागले होते. साडेदहाच्या सुमारास उन्हाची झळ जाणवू लागली. मी थांबले एके ठिकाणी. सॅकमधून टोपी, गॉगल काढला. इलेक्ट्रलची पावडर पाण्यात घालून प्यायले. जरा बरं वाटू लागलं. पुन्हा उतरायला सुरुवात. आमच्या ग्रुपमधील एकाने गुढगे दुखू लागल्यामुळे उतरतांना डोली केली असे समजले. वाटेत प्रत्येक दुकानदार डोली हवी का? असे विचारत होता. “नाही, नाही” म्हणत मी आपली शक्य तितक्या लवकर उतरण्याचा प्रयत्न करीत होते. दहा- पंधरा पायर्या मग सपाट चौथरा, त्यापुढे वळण पुन्हा पायर्या, चौथरा, वळण ही रचना आता इतकी सवयीची झाली की डोळे मिटूनही तेच दिसू लागले.
वाटेत एका दुकानात मालिशचे तेल विकण्यास ठेवले होते. सांधेदुखीवर रामबाण औषध म्हणून. मागे माऊंट अबूवरील गुरुशिखरावर जातांनाही असेच मालिशचे तेल विकत घेतले होते, त्याचा आईंना बराच फायदा झाला होता. त्यामुळे इथेही २ बाटल्या घेतल्या. गिरनारवर शॉपिंग ही करुन झाले.
आता जमिनीपासूनचे अंतर कमी कमी होत चाललेले दिसले आणि आपण आता अगदी अंतिम टप्प्यात पोचलोय हे जाणवले. माझ्या ग्रुपमधील दोघे वाटेत भेटले. आम्ही तिघेही आता एकत्रच उतरत होतो.साडेअकरा वाजता पहिल्या पायरीवर पोचलो. रात्री साडेअकराला इथूनच सुरुवात केली होती. बारा तास पूर्ण झाले होते. परततांना पहिल्या पायरीवर डोकं टेकून आणि शेजारील हनुमानाला नमस्कार करुन सुखरुप नेऊन आणल्याबद्द्ल आभार मानायचे असतात. तसंच ग्रामदैवत भवनाथांचे दर्शन घेऊन त्यांचेही आभार मानायचे असतात. मगच यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. त्यामुळे बूट काढले. पायरीवर डोके टेकायला म्हणून खाली वाकले, डोके टेकले, कंबर प्रचंड दुखत होती हे तेव्हा जाणवलं. कसंबसं उठून चढवावा हनुमानालाही नमस्कार केला आणि भवनाथ मंदीराकडे निघालो.
रस्त्यावर रहदारी वाढली होती. आमच्या हातातील काठी आणि एकूणच अवतार बघून लोक गिरनार चढके आये क्या? दत्तात्रेय तक गये थे क्या? अशी चौकशी करु लागले. हो हो म्हणत आम्ही कसे तरी स्वत:ला रेटत भवनाथ मंदीरात आलो. दर्शन घेतले. कितीही थकला असलात तरीही न जेवता झोपायचे नाही अशी सक्त ताकीद आयोजकांनी दिली होती. जेवण्याचे हॉटेल आणि कुपनही आदल्या दिवशी निघतांनाच दिले होते. त्यामुळे आम्ही तिघे त्या हॉटेलात गेलो. कसेबसे दोन घास खाल्ले आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. इथे परत २ मजले चढायचे म्हणजे दिव्य.... ते पार पाडलं. खोलीत आल्यावर फ्रेश झाले, एक क्रोसिन घेतली आणि पायांना रोल ऑन फासून झोपून गेले.
एकेक करत सारे परतू लागले. दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रुपमधील सर्व खाली आले. आयोजकांनी एक मसाज करणारा माणूस बोलवून घेतला. तो प्रत्येकाच्या खोलीत जाऊन पायांना मसाज करुन देत होता. त्यामुळे खूप बरं वाटू लागलं.
सर्वांची गिरनार यात्रा पूर्ण झाली होती. यात्रा जरी पूर्ण झाली असली तरी या यात्रेआधी आणि त्या दरम्यान 'दत्तगुरुंशी' जुळलेली नाळ तशीच रहावी…..अगदी जन्मजन्मांतरीसाठी हीच इच्छा.
ही लेखमाला म्हणजे गिरनार वारीचे वर्णन आहे. पण ज्याप्रमाणे गिरनार वारी ‘दत्तगुरुंच्या इच्छेनेच’ घडते तसेच हे लेखनही. कारण बुद्धिदाताही 'तोच'. त्यामुळे हे लिहिणारी मी केवळ एक निमित्तमात्र, त्यानेच त्याला हवं तसं लिहून घेतलंय माझ्या हातून. असं असलं तरी या लेखनात अनवधानाने काही त्रुटी आढळल्या तर ते न्यून माझे समजून क्षमा कारावी.
शेवटी एकच सांगणे….
इदं न मम | इदं सद्गुरो:||
लेखनसीमा.
आयोजक - श्री. मंदार पाध्ये नंबर 99230 13375
गीर; आशियातील सिंहगर्जना! :-

गीर - सिंहांच्या देशात
अखेरीस ठरल्याप्रमाणे १६ जानेवारीला सकाळी आम्ही ११ जण टेम्पो ट्रॅव्हलर करून अहमदाबादहून सकाळी ६:१५ ला निघालो आणि दुपारी १:३० वाजताच्या सुमारास आमच्या हॉटेल वर पोचलो.
गीर - आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक वसतीस्थान. अहमदाबाद पासून साधारण ४००-४५० कि.मी. दूर - जुनागढ जिल्ह्यामध्ये आहे गीर अभयारण्य. १४३६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात आजमितीला साधारण ४११ सिंह आहेत. आमच्या सफारी दुसर्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी होत्या - मुद्दामहून आम्ही त्या तश्या बुक केल्या होत्या कारण सकाळी लवकर आणि संध्याकाळी जंगली जनावरे दिसण्याची शक्यता जास्तं असते.
म्हणून पोचल्या दिवशी दुपारी आम्ही जवळ्च्या सासण गावात फेरफटका मारायला निघालो.
तिथे नदीकाठाजवळ काही पक्षी बघायला मिळाले.
एका छोट्या खारुताईचा झकास फोटो मिळाला.
दुसरा दिवस. सोमवार सकाळ - ६:१५ वाजता बर्फाळ गार वारं अंगावर घेत ओपन जिप्सी जीप्समधून आम्ही निघालो - सिंहांच्या देशात.
सुरवातीला spot झालं चितळ. ४११ सिंहाना पुरेसे भक्ष्य मिळावे म्हणून या जंगलात अंदाजे ४०००० चितळ, २०००-२५०० सांबरे आहेत.
आजूबाजूला दिसणारे विविध पक्षी बघत जंगल शोभेचा आनंद लुटत आम्ही चाललो होतो.
आणि मग तेवढ्यात आमच्या गाइडने दाखवले - pug marks - जंगलच्या राजाच्या पावलाचे ठसे.
आणि थोडे पुढे गेल्यावर दर्शन झाले जंगल च्या राजाचे. जेमतेम दहा ते पंधरा फुटांवरून जंगलामध्ये मुक्त असलेला सिंह बघणे हा एक अत्यंत रोमांचक आणि थरारक अनुभव आहे.
थोडे पुढे गेल्यावर दिसल्या महाराणी.
सिंह दिसल्याच्या आनंदात , तो थरार मनात ताजा ठेवत आम्ही होटेल वर परत आलो - सन्ध्याकाळच्या सफारी ला जाण्याच्या तयारीने.
दुपारी पुन्हा एकदा पहिल्यांदा दिसले सांबर.
आणि आमचं नशीब जोरावर असल्याचे परत एकदा सिद्ध झाले. आम्हाला परत "Lion Sighting" झाले - या वेळी दिसली एक सिंहीण तिच्या छाव्यासहीत.
तिथून थोडे पुढे गेलो आणि परत एक पूर्ण वाढलेली सिंहीण दिसली - अत्यंत जवळून.
गीर ला जाण्याचा मुख्य ऊद्देश आमच्या अपेक्षेबाहेर सफल झाला होता. आम्ही खरोखर नशीबवान होतो. आम्हाला दिसले त्याच्या आधी ४ दिवस कोणालाही सिंहांचं दर्शन झालं नव्हतं - इति आमचा गाईड.
ते खरं की खोटं ते माहीत नाही पण आम्हाला मात्र जंगलच्या राजाचं, राणीचं आअणि राजकुमाराचं एकदम जवळून झकास रोमांचक आणि थरारक दर्शन झालं.
अमिताभ बच्चन जाहीरातीमध्ये म्हणतो - "गीर की जंगलोंमें अपनेसे पंधरा फुट की दूरी पर जब शेर को देखा तो पैर जमींपर आ गये और अभिमान घुटनोपर". या वाक्याची सत्यता पूर्णपणे अनुभवायला मिळाली.
जमेल तेव्हा परत गीर ला यायचं असं मनाशी नक्की करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
रजनी देवधर
आज आमच्या जंगल सफारीची वेळ दुपारी ३ ते संध्याकाळी ६ असल्याने आमच्याकडे वेळ होता. सर्व जणी स्विमिंग पुलला पळालो. येथे फक्त आमचा महिलांचाच ग्रुप होता. स्विमिंग येत नसले तरी पोहण्याची रिंग घेऊन सगळ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. येथे सायकलीही आहेत ज्यावर काहींनी रपेट केली.
दुपारचे जेवण आटोपून आम्ही सिंह सदनला पोहचलो.
आमचे सफारीचे आगाऊ बुकिंग झालेले होते. काउंटरला बुकिंगची पावती
दाखवल्यावर आम्हाला गाडी नंबर व कुठल्या मार्गाने जायचे त्या मार्गाचा
नंबर असलेला परवाना मिळाला. गाडीबरोबर एक गाईडही आपल्यासोबत असतो. तीन
तासाच्या एका जीप सफारीची फी रु.४५००/- इतकी असून त्यात परवाना फी, जिप्सी
चार्जेस, गाईड आणि टॅक्स सर्व खर्च समाविष्ट असतात. बुकिंग करतांना
सहाच्या पटीत माणसे असतील तर बराच खर्च वाचतो. कारण एकट्यासाठीही संपूर्ण
जिप्सीचा खर्च द्यावा लागतो. किंवा तेथे जाऊनच इतर लोकांसोबत मिळून सफारीचे
बुकिंग करावे. प्रत्येक गाडीला GPS असते त्यामुळे ठरविक मार्गानेच प्रवास
करावा लागतो. सफारीचे असे १३ मार्ग असून प्रत्येक मार्ग २४ किमी ते ३२ किमी
इतक्या अंतराचा आहे.
आशियन सिंहाची घटती संख्या बघून १९६५ मध्ये शासनाने जवळपास ११५०
चौ.किमीच्या अभयारण्याची रचना केली. एक दशकानंतर यातील जवळपास २६०
चौ.किमीचे क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करून प्रवेश ठिकाण सासन
गीर निश्चित करण्यात आले.
सासन गीर पासून काही अंतरावर आणखी एक 'देवलिया पार्क " नावाचा झोन निर्माण
करण्यात आला आहे. हमखास सिंह दिसण्याचे हे ठिकाण. येथे काही हेक्टरच्या
बंदिस्त जागेत सिंह सोडलेले असतात . येथे बसने अगदी कमी किमतीत अर्ध्या
तासाची सफारी करता येते.
विनंतीनुसार आमच्या तीनही गाडयांना एकच मार्ग (चार नंबर) मिळाला.
तीन-सव्वातीनला सिंह सदनहुन गाड्या आपापल्या मार्गाकडे रवाना झाल्या .
जंगलात प्रवेश करण्याच्या चेक पोस्टला परवाना बघून आत सोडल्या गेले.
कच्चा, उंचसखल दोन्ही बाजूने झाडी असलेला रस्ता सुरु झाला. अनेक प्रकारच्या
वनस्पती, झाडे दिसत असली तरी प्रामुख्याने सागवान वृक्षांचेच जंगल आहे.
जंगलात सिंहांव्यतिरिक्त हरीण, कोल्हे, तरस बिबट्या, नीलगाय असे विविध
प्राणी आहेत. पाणवठ्यांच्या बाजूने पक्षीदर्शनही होऊ शकते.
जंगलात शिरून थोडा वेळ होऊन गेला. सगळ्यांच्या नजरा सिंह बघण्यासाठी
भिरभिरत होत्या पण दिसत होती फक्त चितळ (ठिपक्यांवाली हरिणे). कधी
दोन-तिनच्या संख्येने तर कधी समूहाने. विटकरी रंग व पांढरे ठिपके असलेल्या
या हरणांच्या फक्त नरांना शिंग असतात ती दरवर्षी गळतात व पुन्हा उगवतात.
क्वचित कुठेतरी मोरही दिसत होते.
एके ठिकाणी एक सुंदर सांबर झाडीतून डोकावून आमच्याकडे बघत होते. चितळांप्रमाणेच यांचीही शिंगे दरवर्षी नवीन येतात. याच्या शिंगाना पुढे एक व मागे दोन टोके असतात. नर सहसा एकटा असतो व माद्या कळप करून राहतात.
दोन तास होऊन गेले. सिंहाचे मात्र दर्शन नाही. रूटचा शेवटचा पॉईंट आला. कमलेश्वर डॅम पॉईंट. सिंचनाच्या उपयोगासाठीचे हे धरण हिरन नदीवर आहे. या पॉइंटला एक उंच मनोरा बनविला आहे ज्यावरून धरणाचे पाणलोट क्षेत्र व आजूबाजूच्या परिसराचे नयनरम्य दर्शन होते.
मनोरा
मनोऱ्याहून दिसणारा परिसर
संध्याकाळचे साडेपाच वाजले. परतीचा प्रवास सुरु झाला. सहाला जंगलाच्या
चेक पॉइंटला पोहचायचे होते. आजची सफारी छानच झाली होती पण सिंह दिसला
नसल्याने थोडे निराश झालो होतो. चेक पॉइंटला पोहचण्यासाठी शेवटची पाच
मिनिटे बाकी होती आणि अचानक ती दिसली! सिंहाची एक मादी आणि सोबत दोन इवलेसे
छावे .
आधी केव्हातरी तिने शिकार केली असावी आणि आता पिलांना भरवण्यासाठी ती आली
असावी. एका ठिकाणी तिने बसकण मारली. पिले मात्र दुडू दुडू पळत झाडामागे
गेली आणि मेजवानीवर ताव मारू लागली .
काही गाड्या पुढे निघून गेल्या होत्या . आमच्या नशिबात मात्र आज सिंह
दर्शन होते. क्रिकेटच्या खेळात शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून विजय
मिळाल्यावर जो आनंद होत असेल तोच आज मिळाला होता. वेळ संपली होती. गाड्या
चेकपोस्ट पार करून सिंह सदनला आल्या. सिंह सदन बाहेर चहा-नाश्ता, कपडे,
भेटवस्तू वगैरे मिळणाऱ्या दुकानाची रांग आहे. मस्तपैकी चहा घेतला. थोडीफार
खरेदी करून रिसॉर्टला परत आलो.
येऊन फ्रेश झालो. आठ वाजले होते. रिसॉर्टतर्फे स्थानिक कलाकारांचा करमणुकीचा कार्यक्रम होता तो पाहण्यासाठी येऊन बसलो.
आज सहलीचा सातवा दिवस.
ठरल्याप्रमाणे सकाळी सहालाच सिंह सदनसाठी रवाना झालो. तिकीटाची येथील पद्धत
आता माहिती झालेली होती. एकच जण तिकीट काउंटरला थांबला. थंडी असल्याने
बाकीचे सगळे चहासाठी परत कालच्याच ठिकाणी गेले. कालचे परमिट जपून ठेवा असे
गाईडने सांगितले होते त्याचा फायदा झाला. कालचे परमिट दाखविल्याने आज
आम्हाला नवीन रूट मिळाला. काल दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या. गाडीत
आपल्या पाण्याच्या बाटल्या नेऊ देत नाहीत. निघण्याच्या वेळी दहा रुपये भरून
त्यांची बाटली घ्यावी लागते जी आल्यावर परत केल्यास आपले पैसेही परत
मिळतात. कॅमेरा वापरणार असू तर एंट्री चेक पॉइंटलला रु.२००/- फी भरावी
लागते.
एंट्री चेक पॉइंट
आज नशीब जोरदार होते. पहिल्या दहा मिनिटातच सिंह दिसला. थोडेसे दुरून का होईना पण दर्शन झाले. या मादीने बहुतेक नुकतीच एका मोठ्या म्हशीची शिकार केली असावी व आता तिचे लचके तोडत असल्याचे दिसत होते.
थोडे पुढे गेल्यावर जवळच्याच एका कृत्रिम पाणवठ्यावर वनराज पाणी पीत असल्याचे दिसले. जवळपास गाड्या थांबूनसुद्धा अगदी शांतपणे पाणी पिऊन स्वारी आरामात चालत जंगलात नाहीशी झाली.
एका ठिकाणी जुनागड-वेरावल ही मीटर गेज रेल्वे लाईन पार केली. सासन गीर हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
कालच्यासारखे आज चितळ दिसत नव्हते. सकाळच्या वेळी सिंह किंवा इतर शिकारी
श्वापदे पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात. त्यामळे हरीण किंवा छोटे प्राणी थोडे
उशिराच बाहेर पडतात. थोडे पुढे गेलो आणि अजून एक सिंहाची मादी डाव्या
बाजूने झाडीतून पळत दिसेनाशी झाली व काही अंतरावर परत एकदा रस्त्याच्या
बाजूला येऊन दर्शन दिले.
वाटेत एक घर व त्याच्या बाजूला मोरांचा मोठा थवा दिसला. साधारणपणे एका थव्यात एक मोर(नर) व ४-५ लांडोर (मादी) असतात असे वाचले होते. पण येथे तर मोर भरपूर व लांडोर अगदीच कमी दिसत होत्या. जंगलात काही वनरक्षकांची घरे आहेत तसेच पशुपालन करणाऱ्या काही लोकांचीही घरे आहेत. शासनातर्फे खुप लोकाना येथून स्थलांतरित करण्यात आहे. परंतू अजूनही काही लोक येथून जाण्यास तयार नाहीत. बहुतेक 'मालधारी' जमातीचे उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसाय करणारे लोक येथे आहेत.
एका ठिकाणी आमची चाहूल लागताच दोन रानडुक्कर फोटो काढायला वेळही न देता जंगलात नाहीशी झाली. माकडेही बऱ्याच ठिकाणी झाडांवर उद्या मारताना दिसत होती. नदीच्या बाजूने जातांना दूरवर एक मगरही दिसली परंतु फोटो घेता आला नाही.पुढे एक मुंगूस झर्रकन एका झाडावर चढलेला पहिला.
अर्धा रस्ता पार केल्यावर व परतीच्या वाटेत मात्र चितळं दिसायला लागली.
वेळ संपली तसे सिंह सदनला परत आलो. चहा घेतला. आज "मिठी-कडक" सांगावे
लागले नाही. नाश्त्याची वेळ संपत आली होती म्हणून आधी खाऊन नंतर रूमवर आलो.
दोन्ही सफारी व गीर विहार रिसॉर्टचा एक मस्त अनुभव घेऊन साडेअकराला चेक आऊट केले.
पुढचे ठिकाण जुनागड.
सोरटी सोमनाथ :-
मंदिराला असे नाव पडले
शिवपुराणानुसार राजा दक्ष प्रजापतीच्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने येथे भगवान शिवची तपश्चर्या केली. आणि त्यांनी ज्योतिर्लिंग म्हणून येथेच रहावे अशी प्रार्थना केली. सोम हे चंद्राचेच नाव तर शिवने आपले नाथ स्वामी मानून येथे तपस्या केल्यामूळे या ज्योतिर्लिंगास सोमनाथ म्हणतात.





बाण स्तंभाचे रहस्य :-
मंदिराच्या दक्षिणेस समुद्राच्या किनाऱ्यावरील बाण स्तंभ हे प्राचीन आहेत. सुमारे 6 शतकापासून इतिहासात बाण स्तंभाचा उल्लेख आहे. परंतु हे कधी बांधला गेला आणि कोणी बांधला हे कोणालाच माहिती नाही. तज्ञ म्हणतात की बाण स्तंभ हा एक दिशात्मक स्तंभ आहे, त्याच्या वरच्या टोकावर बाण (बाण) आहे. ज्याचे तोंड समुद्राकडे आहे. या बाण स्तंभावर असमुद्रांत दक्षिण ध्रुव, तोपर्यंत अखंड ज्योतिमार्गा असे लिहिले आहे. त्याचा अर्थ की, याचा अर्थ असा आहे की समुद्राच्या या बिंदूपासून दक्षिण ध्रुवाकडे सरळ रेषेत एकही अडथळा नाही. या ओळीचा साधा अर्थ असा आहे की जर सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदूपासून दक्षिणेस ध्रुवाकडे, म्हणजेच अंटार्क्टिकाकडे सरळ रेषा काढली गेली तर मध्यभागी एकही डोंगर किंवा जमिनीचा तुकडा नाही. म्हणजे प्राचीन काळातील लोकांना माहित होते की दक्षिण ध्रुव कुठे आहे आणि पृथ्वी गोल आहे? बाणाच्या बाणामध्ये काही अडथळा नाही हे त्यांना कसे कळले असते? हे आत्तापर्यंत एक रहस्य आहे.
बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती
हा स्तंभ कोणी, नेमका कधी बांधला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. कार्बन डेटिंग पद्धतीने केवळ जैविक (organic) वस्तुंच्या काळाचे अनुमान काढता येते परंतु हा स्तंभ दगडी असल्यामुळे ह्या पध्दतीने त्याचा काळ, आयुष्य ठरवता येणार नाही.
Wikimapia नुसार त्या बाणस्तंभाचे अक्षांश-रेखांश 20°53'15"N 70°24'3"E आहेत [1]. बाणस्तंभावरील मजकूरानुसार त्या स्तंभापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत 70°24'3"E ह्या रेखांशावर कोठेही जमिन नाही. फार zoom न करता जर Google Maps, Wikimapia अथवा Google Earth मधे बघितले तर ते खरेही वाटते. तशा काही images internet वरच्या काही संकेतस्थळांवर दाखवलेल्यादेखील आहेत.
परंतु बरेच zoom in करून Google Maps मध्ये 70°24'3"E रेखांशाची रेषा पकडून दक्षिण ध्रुवाकडे खालच्या दिशेने निघालो तर 49° अक्षांशाच्या आसपास फ्रान्सच्या अधिपत्याखालील Kerguelen Islands हे बेट लागतं. ह्याचे दुसरे नाव Desolation Islands आहे [2]. 70°24'3"E रेखांशाची रेषा ही ह्या बेटाच्या Courbet Peninsula ह्या प्रदेशातून जाते. आणि बेटाला केवळ किंचित स्पर्श करून गेली आहे वगैरे असे काही नाही तर ती चक्क, धडधडीत समुद्रापासून कित्येक किलोमीटर लांबून, आतून जमिनीवरून जाते.*
त्यामुळे बाणस्तंभावर लिहिलेल्या मजकुरातील दावा चूक आहे.
कॉंस्टंटिनोपलच्या, म्हणजे आत्ताच्या इस्तंबूलच्या, पाडावा नंतर रेशीम मार्ग हा युरोप आणि चीन यांना जोडणारा खुष्कीचा रस्ता बंद पडला. त्यामुळे युरोपातील देशांना पौर्वात्य देशांशी व्यापार करण्यासाठी दुसर्या मार्गाची निकड भासू लागली. त्यात आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपातून भारतापर्यंत पोचणारा पहिला युरोपियन म्हणजे वास्को द गामा. म्हणून *वास्को द गामाने भारताचा नव्हे तर युरोप पासून भारतापर्यंत पोचायचा सागरी मार्ग शोधून काढला* असे म्हंटले जाते.
कसे पोहचाल
सोमनाथला जाण्यासाठी बस हा उत्तम मार्ग आहे, कारण तेथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोमनाथला अनेक नॉन-एसी तसेच लक्झरी एसी दोन्ही बस सेवां उपलब्ध आहेत. सोमनाथला राजकोट, पोरबंदर आणि अहमदाबाद सारख्या इतर जवळच्या ठिकाणांहून बसनेही जाता येतं. या व्यतिरिक्त, खाजगी बसची सेवा देखील उपलब्ध आहे.
सोमनाथ पासून जवळचे रेल्वे स्टेशन वेरावल आहे, जे सोमनाथ पासून 5 किमी अंतरावर आहे. हे स्टेशन मुंबई, अहमदाबाद आणि गुजरातच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रेल्वेने चांगले जोडलेले आहे. येथे दररोज 14 रेल्वे गाड्या धावतात. या व्यतिरिक्त, वेरावळ स्थानक प्रवासी गाड्यांद्वारे देखील पोहोचता येते. त्यानंतर तेथून ऑटो, टॅक्सीने सोमनाथ मंदिरात जाता येते.
दीऊ - पावसाळ्यातील भटकन्ती
१४ तारखेला सकाळी पाच वाजता आम्ही तीन कुटुम्बे निघालो. स्वतःजवळ वाहन असल्यामुळे बस, ट्रेन पकडण्याची कुठचीही गडबड नव्हती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा तडाखा कुठेही जाणवत नव्हता. गाणी गात, ऐकत, गप्पागोष्टी करत , मध्ये दोन ठिकाणी चहा व नाश्त्यासाठी थाम्बून दुपारी साधारण दोन अडीच च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. जेवण करून, थोडासा आराम करून आम्ही बाहेर पडलो.
सन्ध्याकाळची वेळ झाली होती. दीऊ अशी जागा आहे की कुठलयाही रस्त्यावरून थोडे अन्तर प्रवास केला की बाजूने समुद्र साथ करायला लागतो. वळणावळणान्चे रस्ते आणि साथीला सागर.
पहिल्यान्दी आम्ही गेलो गन्गेश्वर महादेव या ठिकाणी. येथे थोडेसे खाली उतरून गेले की शन्कराच्या पिन्डी आहेत. बाजूलाच आहे उफाळता सागर. भरतीच्या वेळेला तर ईथे जाताच येत नाही. आम्ही गेलो तेव्हा ओहोटी होती पण लाटा तरीही फेसाळत्याच होत्या. याचे कारण दीऊ मध्ये कुठेही गेले तरी किनार्यापासून थोडे आतमध्ये खडक आहेत. त्यामुळे सागर कायम फेसाळलेला असतो.
तिथेच एका दगडावर दिसला एक खेकडा.
मग तिथून निघालो सनसेट पॉईन्ट बघायला. पावसाळी वातावरण असल्यामुळे मधूनच ढगान्मुळे अन्धारून येत होते तर मधूनच सुर्यप्रकाश ढगान्च्या आडून दोकावत होता.
आम्ही सनसेट पॉईन्टच्या जवळ पोचलो आणि थोड्या वेळापुरता स्वच्छ सुर्यप्रकाश आला. सनसेट पॉईन्ट वरून समोर अथान्ग सागर पसरलेला दिसतो तर उजव्या बाहूला दिसतो चक्रतीर्थ बीच.
आजूबाजूचे सगळा नजारा बघता बघता सुर्यास्ताची वेळ झाली. दररोज सुर्यास्त होत असला तरी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बघण्यात काही वेगळीच मजा असते. त्यातही समुद्र किनारी तर खासच.
दुसरा दिवस उजाडला. आज दीऊचा किल्ला आणि सेन्ट पॉलचे चर्च बघण्याचे ठरले होते. प्रथम आम्ही भेट दिली चर्चला. हे सेन्ट पॉल चर्च सन १६९१ मध्ये बान्धले गेले. आतमध्ये सुरेख लाकडी कोरीव काम आहे आणि त्यामध्ये आहेतयेशू आणि मदर मेरीच्या सुन्दर मुर्ती.
तिथून आम्ही निघलो व आलो दीऊच्या किल्ल्याला भेट द्यायला. हा किल्ला पोर्तुगीज व गुजरातच्या तत्कालीन राजानी मिळून सन १५३१ ते १५४६ या कालावधीत बान्धला. याच्या तिन्ही बाजूनी अरबी समुद्र आहे . त्यामुळे सुरक्षेच्या द्रुष्टीने याचे विशेष महत्व आहे. किल्ल्यावर अजूनही चान्गल्या अवस्थेतील तोफा आहेत, तोफगोळे आहेत.
सम्पूर्ण किल्ल्यामध्ये पावसाळ्याचा परिणाम म्हणून हिरवेगार दिसत होते. किल्ल्यामध्ये असलेले दीपग्रुह त्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर छन दिसत होते.
आता उन्हे चान्गलीच वर आली होती. आरामाची पिकनिक असल्यामुळे फारसे कष्ट घ्यायचे नाहीत हे ठरलेच होते. त्यामुळे हॉटेलवर परत येऊन ताणून दिली. सन्ध्याकाळी दीऊच्या प्रसिद्ध नागवा बीचवर समुद्र स्नानाचा आनन्द घेतला आणि तिसरे दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. नजरेसमोर मात्र दिसत होता दीऊच्या सम्पूर्ण ट्रीपमध्ये आमची साथ करणारा सागर.
पुराने समय में दीव अरब सागर समुद्र तट का मुख्य बंदरगाह
में गिना जाता था। दीव आईलैंड को अरबसागर का मोती कहते हैं। दीव आइलैंड
खूबसूरती यानी कि जन्नत का अेहसास गुजरात का मिनी गोवा है।
पर्यटक
दिव पहुंचते ही मंत्रमुग्ध हो जाने वाली खूबसूरती देखकर यहां के दीवाने हो
जाते हैं। नीला समुंद्र, समुद्र तट पर ताड़ के पेड़ रेत और नीले समुद्र
में सूरज की किरने अपना रंग बिखरती है ऐ नजारा अदभुत होता है ऐसा एहसास
होता है कि आप फॉरेन कंट्री में आ गए है।
रोड से लदे एकदम नजदीक समुद्र तट और दूर-दूर तक नीला समुद्र यहां के अद्भुत नजारे पर्यटक को अपनी ओर आकर्षित करता है।
• दीव घूमने के खूबसूरत पर्यटन स्थल - Beautiful Tourist Places To Visit In Diu
पुराने समय में पोर्तुगीज सभ्यता का शहेर रहेसुका दीव मैं आज भी पोर्तुगीज आर्किटेक्चर की झलक देखने को मिलती है। दीव पहेचाना जाता है खूबसूरत समुद्र तट, गुफाएं, किल्ले, पुराने चर्च, म्यूजियम, मंदिर और यहां के जेल के लिए प्रख्यात है।
1. नागोवा बीच दीव पर्यटन स्थल - Nagoa Beach Diu Tourist Places In Hindi
नागवा बीच दीव का सबसे प्रसिद्ध बीच है।
नागोवा समुद्र तट बूचडवाड़ा प्रांत में स्थित है नागवा समुद्र तट घोड़े की नाल जैसे आकर मैं दिखता है। जो तकरीबन 2.5 किलोमीटर में फैला है।
नागवा समुद्र तट पर ताड़ के पेड़ नीला समुंद्र और एक दम शांत समुद्र तट लोगों को अपनी ओर आकर्षित करता है नागवा समुद्र तट पर वॉटर स्पोर्ट ,बोटिंग ,स्विमिंग , रेत पर आर्ट, फोटोशूट इत्यादि।।
पास में काफी सारी 5स्टार होटल एवं रेस्टोरेंट है जहां पर आप रुक सकते हो ।
नागवा बीज के करीब समुद्र तट के किनारे बच्चों के लिए शांत माहौल में डायनासोर पार्क है। यहां पार्क बच्चों के लिए पसंदीदा जगह है। इस पार्क में डायनासोर की कई सारे पिसीज और समुद्ररी जीव के स्टेचू है। समुद्र के किनारे बैठकर पर्यटन समुद्र की बड़ी-बड़ी लहरें देखने का आनंद ले सकते हैं। यहां का समुद्र किनारा शांत नहीं है इसलिए यहां पर स्विमिंग करना मना है।
2. दीव किल्ला पौराणिक पर्यटन स्थल - Diu Fort Tourist places In Hindi
दीव किल्ले का निर्माण तकरीबन 1535 से 1541 मैं पोर्टुगीजो द्वारा करवाया गया था। किले के चारों ओर समुद्र और एक लाइट हाउस सुरक्षा को ध्यान में रखते हुए बनवाया गया था जो आज भी उपयोग हो रहा है। किले के ऊपर कई सारे तोप लगवाएं जो आज भी पर्यटन ओ को अपनी ओर आकर्षित करता है।
दीव का यह किला पोर्टगर्ल सभ्यता और वास्तुकला का बेजोड़ नमूना है। इस किले ने कई सारे युद्ध देखें है। दीव का यह पूरा किला पुर्तगालिन वास्तु कला में बनवाया गया है।
दीव किल्ले से सूर्योदय और सूर्यास्त का अद्भुत नजारो साथ पर्यटक यहां पर किले के ऊपर से दूर-दूर तक फैले समुद्र को निहार सकते है और अपना टाइम बिता सकते हैं।
दीव का किल्ला समुद्र के किनारे होने की वजह से यहां पर पर्यटक फोटोग्राफी और वीडियोग्राफी कर सकते हैं यहां पर कई सारे फिल्म शूटिंग और वीडियो शूटिंग हुई है।
3. पानीकोटा दीव का खूबसूरत पर्यटन स्थल - Panikota Diu Tousrist Places In Hindi
दीव से थोड़ी दूरी पर समुद्र में पोर्टुगीजो ने एक पानी कोटा किला बनवाया था। जो दीव किले का एक हिस्सा है। पानी कोटा किले के ऊपर एक लाइट हाउस, मिनी ट्रेन, लिफ्ट अंडर वॉटर सुरंग, इत्यादि सुविधा से सजाया गया था।
पानी कोटा दीव किले का दूसरा हिस्सा है। किस किले में पहले पोर्टुगीज रहा करते थे। बाद में इसकाेे जेल के रूप में उपयोग होने लगा। पानी कोटा किल्ले तक पहुंचने के लिए पर्यटक को बोटिंग का सहारा लेना पड़ता है। यहां तक पहुंचने का एकमात्र जरिया है वोटिंग का पानी कोटा किला 450 साल के बाद भी जो का त्यों खड़ा है,आज भी लेकिन अब यहां पर पर्यटक को घूमने जाने पर पाबंदी है। लेकिन कुछ समय बाद केंद्र सरकार निर्णय के बाद यहां पर पर्यटक के लिए यह किला खोल दिया जाएगा।
देश आजाद होने के बाद भारत सरकार ने इस जेल में सात कैदी को रखा था इनमें से दो महिला थी। चार कैदी को अमरेली जेल में स्विफ्ट कर दिया गया और दो कि रिहाई हो गई अब जेल में केवल एक व्यक्ति रखा गया है जिसका नाम दीपक कांजी है।
दीपक कांजी के देखरेख में 5 सिपाही को रखा गया है जेल में खाना ,न्यूज़पेपर ,मनोरंजन के लिए दूरदर्शन, वगैरे सुविधा मुहैया कराई जाती है।
![]() |
Diu Fort |
31 दिसंबर के दिन पानी कोटा किले को रंग बिरंगी लाइटों से सजाया जाता है। पानी कोटा जिला समुद्र के बीच में होने की वजह से रात में यह रंग बिरंगी लाइटो का यह नजारा देखने लायक होता है।
4. नोएडा गुफाएं दीव का मशहूर पर्यटन स्थल - Noida Caves Famous Tourist place In Diu
नोएडा गुफाएं किले के एकदम नजदीक भूल भुलैया सुरंगो की एक बड़ी श्रृंखला है
नोएडा गुफाएं के बारे में! ऐसी मान्यता है की पुर्तगल ने दीव के निर्माण कार्य मैं सारा पत्थर और मलबा यहां से निकाला था।
लेकिन कुछ लोगों का कहना है कि नोएडा गुफाएं प्राकृतिक रूप से बने हैं
नोएडा गुफाएं फोटोग्राफी के लिए एकदम बेस्ट पैलेस है नोएडा गुफा में दिन में सूरज की किरणें गुफा के अंदर प्रवेश करती हैं तब अदभुत दृश्य देखने को मिलता है। नोएडा गुफाएं फोटोग्राफी के लिए एकदम बेस्ट पैलेस है।
5. गंगेश्वर महादेव देवालय दर्शनीय स्थल दीव - Gangeshwar Mahadev Devalay Diu
गंगेश्वर महादेव भगवान शिव को अर्पित है गंगेश्वर महादेव समुद्र के एकदम नजदीक स्थित है जब समुद्र ज्वाहार की लहरें आती है तब भगवान शिव के 5 शिवलिंग पर अपना पानी बीखेरती है।
महाभारत काल में जब पांच पांडव को 14 साल वनवास हुआ था तो वह कुछ समय इसी गुफा में रुके थे इन पांचों भाइयों ने यहां पर 5 शिवलिंग की स्थापना की थी ए मंदिर 5000 साल पुराना है।
श्रावण मास में यहां पर दूर-दूर से श्रद्धालुओं आते हैं।
6. चक्रतीर्थ समुद्र तट दीव पर्यटन स्थल - Chakratirth Beach Diu Tourist places
सतयुग में भगवान विष्णु जब जालंधर दानव का संघार करने उतरे तब इसी जगह से अपना सुदर्शन चक्र छोडा था इसलिए इस क्षेत्र का नाम चक्रतीर्थ स्थल पड़ा है
यहां पर समुद्र में छोटे-छोटे पहाड़ बेहद खूबसूरत देखने को मिलेंगे ।पहाड़ों से टकराती लहरी और एक दम शांत स्थान है पास की पहाड़ी में भगवान शिव का एक मंदिर है इस पहाड़ी पर सूर्यास्त खूबसूरत नजारा देख सकते हो।
7. सेंट थॉमस चर्च (दीव म्यूजियम) पर्यटन स्थल - St. Thomas Church (Diu Museum) Tourist places
सेंट थॉमस सर्च 1589 मैं बनवाया गया था! आजादी के बाद भारत सरकार ने इसे 1992 मैं म्यूजियम में बदल दिया गया है।
दीव मुख्य आकर्षण केंद्रों में से एक है और भारत के चुनिंदा सर्च में गिना जाता है!
आज इस म्यूजियम में पुर्तगालिन समय के ,वुडन स्कॉल्टन ,स्टोन स्कॉल्टन ,छोटे-बड़े स्टेचू ,शिलालेख ,इत्यादि कीमती चीज वस्तु और दीव की ऐतिहासिक एवं पौराणिक वस्तुएं संभाल कर रखी है।
दीव में इसके अलावा सेंट पॉल चर्च, बर्ड सेंचुरी, घोघला समुद्र तट, सनसेट पॉइंट, डायनासोर पार्क इत्यादि जगह पर आप घूमने जा सकते हो प्रकृतिक एवंम नेचुरल ब्यूटी का आनंद उठा सकते हो।
8. घोघला बीच दीव पर्यटन स्थल - Ghoghala Beach Diu Island Tourist place
घोघला बीच बहुत खूबसूरत समुद्र तट और वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटीज के लिए दीव के मुख्य पर्यटन स्थलों में से एक है। घोघला बीच को 2020 में ब्लू फ्लैग रेट हासिल हुआ है। दीव शहर के उत्तर में स्थित यह समुद्र तट घोघला गांव के करीब स्थित है इसलिए इस बीच को घोघला बीच के नाम से जाना जाता है।
घोघला बीच पर पर्यटक समुद्र के किनारे वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटीज कर सकते हैं जैसे कि पैरासेलिंग, सर्फिंग, मोटरबाइकिंग, बोट सवारी, हॉर्स राइडिंग, कैमल राइटिंग्स, और समुद्र के किनारे रेत में आर्ट कला कर सकते हैं।
घोघला बीच समुद्र तट पारिवार छुट्टियों के लिए सबसे बेस्ट स्थान है। यहां के समुद्र तट पर पर्यटक को आराम करने के लिए आर्टिफिशियल खूबसूरत छत हैं। जिस पर से पर्यटक खूबसूरत समुद्र निहार सकते हैं। और तट पर ही वॉच टावर है।
दीव शहर की भीड़भाड़ वाले क्षेत्रो से यह बीच एकदम शांत और खुशनुमा माहौल में स्थित है। यहां पर पर्यटक प्राकृतिक सौंदर्य के साथ शांत माहौल में अपना टाइम बिता सकते हैं।
9. सेंट पॉल चर्च दीव का आकर्षित पर्यटन स्थल - St Paul's Church Diu Tourist attraction
सेंट पॉल चर्च दीव के मुख्य आकर्षित पर्यटन स्थलों में से एक है। और यह सर्च पूरे भारत के सुनंदा चर्चेा में से एक है। सेंट पॉल सर्च को "दीव सर्च" के नाम से भी जाना जाता है। सेंट पॉल सर्च का निर्माण तकरीबन 400 साल पहले 1601 से लेकर 1610 मैं पोर्टुगीज द्वारा करवाया गया है।
सेंट पॉल चर्च पोर्टुगीज आर्किटेक्ट सभ्यता का अद्भुत नमूना है। यह पूरा चार्ज सफेद मार्बल पर जटिल नक्काशी से बनवाया गया है और लकड़ी पर अद्भुत नक्काशी से सजाया गया है। यह सर्च बाहर की साइड से तो अद्भुत लगता है लेकिन अंदर का नजारा की बात ही कुछ अलग है।
सेंट पॉल चर्च को नीव से लेकर सत्त तक सजाया गया है और यहां पर अद्भुत नक्काशीदार मूर्तियां चार चांद लगाती है। चर्च का प्रार्थना ग्रुह बहुत बड़ा और खूबसूरत आज तक सजाया हुआ है। आज भी यहां पर प्रार्थना होती है सेंट पॉल चर्च कि चारोंऔर हरे भरे बागान है।
पर्यटक को यहां पर पोर्टुगीज सभ्यता की झलक देखने को मिलेगी
दीव प्राचीन काल से ही गुजरात का मुख्य बंदरगाह रहा है दीव ऊपर कितने सारे राजा और राजवंशों ने शासन किया है फिर 1458 मैं वास्को डी गामा भारत आइए कालीकट बंदरगाह पर पहुंचे कालीकट बंदर के राजा जेबुरीन को व्यापार का न्यौता दिया!! लेकिन जेबुरीन ने तुरंत ही ना बोल दिया ..
उसके बाद( पेट्रो एल्विस कैबरील )आई उसको जुबरीन ने व्यापार की अनुमति दे दी।। उसके बाद धीरे-धीरे पुर्तगालीयो का भारत में आगमन हुआ। पोर्टगल ने तुरंत ही पहली फैक्ट्री बना दी।।
इससे स्थानीय मुस्लिम समुदाय के व्यापारीयो को व्यापार में दिक्कतें आने लगी। उसने जेमूरीन को बोला आपने विदेशीयो को यहां व्यापार की अनुमति क्यों दी।। जेमुरीन चुप रहे.....
थोड़े समय बाद मुस्लिम समुदाय के व्यापारी और पुर्तगल के बीच दंगे होने लगे। (पेट्रो एल्विस कैबरील) ने जेमुरीन को फरियाद की लेकिन जेमुरीन चुप रहे इससे पुर्तगल गुस्से में आकर कोचिंन चले गए और कोचीन के राजा के साथ मिलकर जमोरिन के साथ युद्ध किया और पुर्तगल जीत गए । फिर कोचीन में बड़ी कोठी की स्थापना की।
अब पुर्तगल की नजर गुजरात के दीव पर थी
पुर्तगल भारत में व्यापार करने लगे इससे (वेनिस शहेर) यूरोपियन कंट्री और ईराक में व्यापार ठप होने लगा।।अब पुर्तगल के कई सारे दुश्मन हो गए थे। 1508 मैं एक तरफ पुर्तगल और सामने की तरफ कहीं सारे दुश्मन 1.मुस्लिम व्यापारियों (योद्धाओ)और जेमुरिन 2. इजिप्शियन (योद्धा)(वेनिस)इटालियन 3.गुजरात राजा और लश्कर
सब ने साथ मिलकर पुर्तगल को हरा दिया।
1509 मैं पुर्तगल फिर से युद्ध करने आ गए इस बार पुर्तगल युद्ध पूरी तरह से जीत गए इस बार भी नेवल युद्ध किया था पुर्तगल सारे युद्ध समुद्र में करते थे। इस युद्ध को बेटेल ऑफ दीव के नाम से जाना जाता है।
उसके बाद पुर्तगल ने कई बार दीव पर चौकिया बनाने की कोशिश की थी लेकिन वे नाकाम रहा है
बाद में गुजरात के बादशाह बहादुर शाह ने मुगल सम्राट हिमायू अपने राज्य की रक्षा के लिए पुर्तगल के साथ समझौता किया.. पुर्तगल ने दीव में चारों तरफ किल्ले बनवा दिए !बाद में गुजरात के बादशाह को अपनी उदारता पर अफसोस हुआ उसने पुर्तगल के साथ युद्ध किया और मारा गया!
उसके बाद दिव में कहीं सारे युद्ध हुए डच लोगों के साथ भी लेकिन पुर्तगल कभी नहीं हारे
1535 से 1961 तक पुर्तगल ने दीव पर राज किया! इस दौरान पुर्तगल ने दीव में काफी निर्माण कार्य किया किल्ले महेल सर्च इत्यादि! दीव मैं आज भी पोर्टग्लिश वास्तु कला (आरकीस्ट्रक्चर) देखने को मिलता है
दीव को दारू के मदिरा नहीं परंतु मंदिरों की नगरी के लिए जाना जाता था।। दीव मैं 40 किलोमीटर क्षेत्र में तकरीबन 950 से अधिक छोटे बड़े मंदिर थे जिनमें से कुछ आज भी है दीव अपनी खूबसूरती के लिए जाना जाता है इसलिए यहां पर कितने सारे फिल्म की शूटिंग, प्रे-वेडिंग वीडियोस, वलोग , इत्यादि वीडियो शूटिंग एवं फोटोग्राफी के लिए बेस्ट स्थान है
• दीव में कहां पर रुके और यहां का फेमस खाना
दिव भारत का केंद्र शासित प्रदेश है और यह एक खूबसूरत पर्यटन स्थल और पोर्टुगीज सभ्यता का शहर होने की वजह से दीव में रुकने के लिए कई सारी फाइव स्टार होटल एवं गेस्ट हाउस की व्यवस्था है। दीव हनीमून का बेस्ट पैलेस माना जाता है।
दीव शहेर में पर्यटक को हर तरह का खाना मिल जाएगा। दीव शहेर में पोर्टुगीज की व्यंजन के साथ गुजराती मिक्स स्वाद का आनंद ले सकते है। दीव केंद्र शासित प्रदेश होने की वजह से यहां पर शराब पर प्रतिबंध नहीं है इसलिए आप समुद्री डिसिस के साथ शराब भी ले सकते हैं।
होटेल और फ्लाइट ट्रेन बस इत्यादि ऑनलाइन बुक करने के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें
• दीव घूमने का सबसे बेस्ट टाइम - Best Time To Visit In Diu Island
वैसे तो दीव में पर्यटक घूमने के लिए साल में कभी भी आ सकते हैं। लेकिन सर्दियों के मौसम में पर्यटक को यहां के खूबसूरत समुद्र तट पर कई सारे स्पोर्ट्स एक्टिविटीज और घूमनेे के साथ साथ वाटर स्पोर्ट, रेत कला, ऐतिहासिक वास्तु कला, और लिफ्ट स्मोकिंग भोजन और शराब के कारण सर्दियों मैं दीव आईलैंड किसी जन्नत से कम नहीं लगता का मौसम नवंबर से फरवरी तक का समय बेस्टट माना जाता है।
दीव आईलैंड होने की वजह से गर्मियों के मौसम में भी यहां पर पर्यटको की भीड़ रहती है। गर्मियों के मौसम में ज्यादातर पर्यटक विदेशी सैलानी आते हैं।
![]() |
Diu Island |
31 दिसंबर के दिन न्यू ईयर मनाया जाता है। दीव को पूरी तरह से लाइट से सजाकर धूमधाम से पार्टी मनाते हैं।
• दीव कैसे पहुंचे - How to reach Diu...?
• सड़क मार्ग ( By Road)
दीव सड़क मार्ग को राष्ट्रीय राजमार्ग महाराष्ट्र से गुजरात के साथ जुड़ा हुआ है
राजकोट अहमदाबाद वडोदरा सूरत मुंबई से दीव पहुंचने के लिए सरकारी ,एवं निजी लग्जरियस बस मिल जाएगी
अन्यथा आप अपना खुद का प्राइवेट वाहन लेकर आ सकते हो।
• रेल मार्ग
दीव का सबसे नजदीक जंक्शन देलवाड़ा और वेरावल है
जहां पर अन्य शहरों से नियमित रूप से ट्रेन आती है
राजकोट अहमदाबाद मुंबई जयपुर इत्यादि शहरों से
• हवाई मार्ग
दीव का खुद का हवाई मार्ग है जो नागवा में स्थित है शनिवार को छोड़कर हफ्ते में नियमित रूप से मुंबई टू दीव की उड़ान भर्ती है।
आज सहलीचा आठवा दिवस.
सकाळी नाश्ता करून साडेसातलाच हॉटेल सोडले. गिरनार रोपवेचे सकाळी आठ ते
नऊच्या स्लॉटचे ऑनलाईन बुकिंग केलेले होते. वेळेवर पोहचलो.
गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेले तलेटी ते अंबा माता मंदिर यांना
जोडणारा हा २.३ किमीचा आशिया खंडातील सर्वात मोठा रोप आहे. ऑक्टोबर २०२०
मध्ये सुरु झालेल्या या रोपे वे मुळे अंबे माता मंदिरापर्यंत पाच हजार
पायऱ्या चढायचा त्रास वाचून अनेकांना दर्शन घेणे सुलभ झाले आहे. गिरनार
पर्वत चढून दत्तात्रय मंदिरापर्यंत जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या
लागत. आता रोप वे मुळे अर्धे अंतरच म्हणजे पाच हजार पायऱ्या चढाव्या
लागतात,
रोप वे प्रवासासंधार्बत काही माहिती.
रोप वे चे आगाऊ तिकीट बुकिंग https://udankhatola.com/ या संकेत स्थळावर करता येते.
* रोपवेची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५
* एका बाजूचे तिकीट रु.४०० व जाऊन येऊन रु.७००/-
* अंतर २.३ किमी. वेळ साधारण आठ मिनिट
* तीन वर्षांच्या वरील सर्वांना तिकीट लागू.
* एकदा बुक झालेले तिकीट रद्द होत नाही/परतावा मिळत नाही.
* एक पाळणा /केबल कार /गंडोल्यात आठ प्रवासी बसू शकतात,
गंडोला
गंडोल्यातून दिसणारा नजारा
अंबा माता मंदिर
अंबे मातेचे मंदिर हे ५१ शक्ती पीठांपैकी एक आहे. मंदिरात मातेची सुंदर मूर्ती आहे,
मंदिर पाहून झाल्यावर आमच्याकडे दोन पर्याय होते. एक म्हणजे अठराशे पायऱ्या उतरून जैन मंदिर संकुल पाहून परत रोप वेला येणे. दुसरा पर्याय म्हणजे पाच हजार पायऱ्या चढून गोरक्षनाथ व गुरुशिखर यांना भेट देणे व परत रोपवेला येणे. आम्ही गुरुशिखर जाण्याचा निर्णय घेतला. ग्रुपमधील अर्ध्या जणांनी इतके अंतर चालणे शक्य नसल्याने रोप वेच्या वेटिंग रूममध्येच थांबण्याचे ठरविले. आम्ही पर्वत चढायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने पर्वतराजीचे अतिशय मनोहर दृश्य दिसत होते.
आधी लागते गोरक्षनाथ शिखर. नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. गुरुचे स्थान नेहमी उच्च असते परंतु गोरखनाथांनी दत्तगुरूंना विनंती केली की आपले चरण दर्शन मला सतत होत रहावे.गुरूंनी हि विनंती मान्य केली.म्हणून गोरक्ष शिखर उंचावर आहे.
येथून थोडे पुढे गेल्यावर दोन कमानी आहेत . उजव्या कमानीपासून ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या कमानीतून प्रवेश करत आपण गुरुशिखराला जातो. या शिखराला जाण्यासाठी प्रथम हजार पंधराशे पायऱ्या उतराव्या लागतात व परत हजार पायऱ्या चढून आपण या शिखराला पोहचतो. असे मानतात कि श्री दत्तात्रेयांनी येथे बारा हजार वर्षे तपश्चर्या केली व त्यांच्या चरण पादुका येथे उमटलेल्या आहेत. सुळक्यावर अतिशय छोट्याशा जागेत चरण पादुका, दत्त मूर्ती यांचे दर्शन घेता येते. मंदिरात फोटो घेण्यास मनाई आहे. येथे येणारे बहुतेक भाविक महाराष्ट्रातीलच होते.
उतरताना एके ठिकाणी पायऱ्यांच्या बाजूला बसलेल्या फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतला.
फोटोग्राफर एक वयस्क माणूस होता व रेडिओवर गाणे ऐकत बसला होता. आशा-महेंद्रच्या आवाजात एक सुरेल गाणे ओ नीले पर्बतों की धारा..
सुरु होते. त्याच्याकडून कळले की आजचा ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन
असल्याने गाण्यांमध्ये पर्वत हे बोल असलेली अतिशय चांगली गाणी सुरु आहेत.
किती छान योगायोग. ध्यानीमनी नसतांना आज आमचे पर्वतारोहण झाले होते.
अंबे माते मंदिराजवळ परत आलो. दोन तासात दोन्ही शिखरांवर जाऊन आलो होतो.
येथे जाणे खूप कठीण आहे असे आधी वाचले होते पण थोडीशी चालण्याची सवय असेल व
मनाचा निश्चय असेल तर सहज शक्य आहे.
प्रतीक्षालयाजवळून घेतलेला एक फोटो
वेळेअभावी जैन मंदिराला भेट देणे शक्य होणार नव्हते. परत कधीतरीयेऊ असे म्हणून परतीच्या गंडोल्यात बसलो.
गंडोल्याातूनच जैन मंदिर संकुलाचे दर्शन . मुख्य मंदिर २२ वे जैन
तीर्थांकर नेमिनाथांचे आहे. नेमिनाथांनी येथे ७०० वर्षे तपश्चर्या केली
होती असे मानतात.
उतरल्यावर एक डिजिटल फोटो काढून घेतला. एकच फोटो वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या सात प्रती आपल्या मोबाईलवर मिळतात.
दुपार झाली होती. चहा घेऊन अहमदाबादसाठी प्रवास सुरु केला. आजचा प्रवास खूप जास्त (३०० किमीचा) होता. दुपारचे जेवण, चहापाणी, व शेवटी अहमदाबाद शहरातील रहदारी यामुळे मुक्कामाचे हॉटेल गाठण्यास रात्रीचे अकरा वाजले.
No comments:
Post a Comment