Saturday, September 12, 2020

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

नांदेड.. मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा.महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवरील, मराठवाडा विभागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १०,४९२ चौ. किमी. म्हणजे राज्याच्या ३·३८ ट्क्के.या जिल्ह्याच्या पूर्वेस तेलंगाणा राज्याचे आदिलाबाद व आग्नेयीस निझामाबाद हे जिल्हे असून दक्षिणेस कर्नाटक राज्याचा बीदर जिल्हा आणि आग्नेयीस व पश्चिमेस उस्मानाबाद, पश्चिमेस व वायव्येस परभणी व उत्तरेस यवतमाळ हे महाराष्ट्राचेच जिल्हे आहेत. या जिल्ह्याचे नांदेड, हदगाव, किनवट, भोकर, बिलोली, देगलूर, मुखेड व कंधार हे आठ तालुके आहेत.
   जिल्ह्यातील सर्वांत मोठी नदी गोदावरी परभणी जिल्ह्यातून येऊन या जिल्ह्याच्या मध्यातून वाहते व पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाते. आसना, सीता व सरस्वती या तिच्या या जिल्ह्यातील उत्तरेकडील उपनद्या असून, मांजरा नदी पूर्व सरहद्दीवर दक्षिणोत्तर वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळते. मन्याड (मनार) ही मांजरा नदीची उपनदी कंधार तालुक्यातून व नंतर मुखेड, देगलूर व बिलोली तालुक्यांच्या सीमेवरून वाहते. दक्षिण भागात पूर्वेकडे वाहणारी लेंडी ही मांजरा नदीची उपनदी होय. हदगाव तालुक्यातून वाहणारी कयाधू ही पैनगंगेची उपनदी आहे. पैनगंगा ही जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे वर्धा नदीस मिळते. 
 ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळे असलेल्या नांदेडला प्राचीन इतिहास लाभला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेले नांदेड शहर म्हणजे रामायण काळातले नंदीग्राम असल्याचे सांगितले जाते."नांदेड" या नावाचा उगम "नंदी-तट" या शब्दामधून झालेला असून, "नंदी" म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि "तट" म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. नंद साम्राज्याची गोदातीरावरची उपराजधानी नवनंदडेहरा म्हणजेच आजचे नांदेड होय. वैदर्भीय वाकाटकांच्या वाशिम ताम्रपटात नांदेडला नंदीतट असेही म्हटले आहे.महाभारतातील आणि रामायणातील ग्रंथांमध्ये नंदीग्राम ऊर्फ नंदीतर (आताचे नांदेड) याचे उल्लेख आढळतात. असे म्हणतात द्रौपदीचं लग्न नजीकच्या कंधार गावी झाले. प्रभू रामचंद्र वनवासात असताना इथे आले होते. श्रीराम वनवासाला निघाले तेव्हा भरत आपल्या आजोळी नंदीग्रामात होता असं मानतात. मौर्य सम्राट अशोकानंतर सातवाहन राजे इथे राज्य करीत होते. इथूनच ते प्रतिष्ठान म्हणजे पैठणला गेले. राष्ट्रकूट चालुक्य, यादव राजे इथे राज्य करून गेले. मुस्लिम आक्रमणाच्या वरवंटय़ाखाली संपूर्ण मराठवाडा भरडला गेला आणि वरील राजवटींचे भग्न अवशेषच उरले.
       आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला.
प्राचीन राजवंश :
इसवीसन पुर्व सहाव्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्रातील विविध प्रदेश अश्मक, कुंतल, मलक, अपरांता, ऋषिक नावाने संबोधिले जाऊ लागले. नांदेड भोवतीच्या प्रदेशाचा समावेश त्याकाळी विदर्भात होत असे. या भागाची दक्षिण सीमा गोदावरी नदीपर्यंत होती. नांदेड हे नावच मुळी गोदावरीशी निगडीत आहे. नदीच्या काठावर वसलेले म्हणुन नांदीकट, नंदिकड आणि नांदीकट या संस्कृत शब्दापासुन नांदेडची व्युत्पती होते. गोदावरीच्या दोन्ही तीरावर वसलेले म्हणुन नंदीकट. नांदेडचा उत्तरेकडील नंदवंशाच्या कारकिर्दीशी संबंध असावा, “नवनंदडेरा“ यापासून नांदेड झाले असावे.
राजकीयदृष्ट्या सुमारे ४०० पेक्षा अधिक वर्षापर्यंत नांदेडचा परिसर सातवाहनांच्या साम्राज्यात होता. सातनाहनानंतर इ.स. २५० चे सुमारास वाकाटकांनी राज्य केले. या घराण्यातील विन्ध्यशक्ती याने विदर्भात राज्य स्थापिले. व्दितीय रुद्रसेन या वाकाटक राजाची अग्रमहिषी प्रभावती गुप्त ही व्दितीय चंद्रगुप्ताची कन्या होती. प्रथम प्रवरसेन हा या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा. तो पराक्रमी होता. साहित्यिक आणि प्रजाहितदक्ष होता. याने ६० वर्षे राज्य केले. दख्खनच्या फार मोठया भागावर यांचे अधिपत्य होते. वाकाटकांनंतर दक्षिण भारताच्या कांही भागांवर राज्य करणारे घराणे “बदामीचे चालुक्य“ म्हणुन संबोधिले जाते. यांची राजधानी कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातील वातापी (बदामी) येथे होती म्हणुन याला “बदामीचे चालुक्य घराणे” असे म्हणतात. या घराण्याच्या लेखात नांदेडचा “नंधाल” असा उल्लेख आढळतो.
नांदेडचे परिसराचे भाग्य राष्ट्रकूटांचे काळ उजळले होते तेवढे व तसे भाग्य आजतागायत त्याच्या नशिबी आले नाही, बदामीच्या चालुक्यानंतर “लत्तलूरपुरवराधि वर” असे स्वत:ला म्हणवुन घेणार्‍या राष्ट्रकूटांचे राज्य आले ते सुमा २०० वर्षे टिकले. राष्ट्रकूटांनी त्याच काळात कंधारला राजधानीचा मान मिळवुन दिला.
राष्ट्रकूटांनंतर या भागावर राज्य केले ते कल्याणीच्या चालुक्य वंशीय राजांनी, महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही प्रदेशापेक्षा नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्याशी या घराण्याचा निकटचा संबंध होता. या काळात या परिसरात कितीतरी मंदिरे उभारली गेली. पैकी होट्टल, मुखेड, खानापूर, बार्‍हाळी, सुगांव, एकलारे, येशगी, सगरोळी, संगम करडखेड, तडखेल इत्यादी ठिकाणच्या मंदिरांची माहिती मिळते.
कंधारपुरला राजधानी स्थापणारे राष्ट्रकूट पूढे कल्याणी चालुक्यांचे मंडलिक म्हणुन अकराव्या शतकात राहत होते. कल्याणीच्या चालुक्यांचे राज्य चालू असता या घराण्याच्या राज्यकालामुळे त्यात मध्येच खंड पडला. प्रस्तुत घराण्याला मराठवाड्याचे कलचुरी असे म्हणता येईल.
महाराष्ट्रभर केवळ नव्हे तर त्या बाहेरच्या विस्तृत प्रदेशावर राज्य करणारे हे यादवांचे घराणे, महाराष्ट्र महोदयाच्या इतिहासाच्या उष:काली सातवाहनांचे साम्राज्य जेवढ्या मह्त्वाचे होते तेवढेच प्रचीन काळच्या शेवटी या यादव घराण्याचे महत्त्व होते. सहाजिकच संपूर्ण नांदेड परिसर त्यांच्या अधिपत्याखाली होता. पांचव्या भिल्लमाने देवगिरी हे नगर वसलिले आणि तेथे आपली राजधानी हलविली. तेव्हां पासून मराठवाडा मह्त्वाचा ठरला. कृष्णेच्या उत्तरेकडील सारे राज्य. याच्या ताब्यात होते. रट्ट घराण्याच्या बल्लाळाची अमर्दकपूर (औंढा जि.हिंगोली) येथे राजधानी होती आणि उपराजधानी होती अराध्यपूर (अर्धापूर जि.नांदेड) येथे, या ठिकाणी बल्लाळाचा सेनापती चालुक्य याचा निवास असे.
मध्ययुगीन इतिहास :
सन.१३१८ मध्ये यादवांचे राज्य कायमचे बुडले. महाराष्ट्र मुसलमानी सत्तेचा अमंल सुरू झाला. नांदेड परिसर त्याला अपवाद नव्हता. इसवी सन. १२९६ पर्यंत नांदेड परिसरावर देवगिरीच्या यादवांचा प्रभाव होता. यादवांच्या सत्तेचे एक प्रमुख ठाणे नांदेड नजिकच्या अर्धापूरात होते. हे अर्धापूर म्हणजे यादवकालीन आराध्यपूर. १४ व्या शदकाच्या प्रारंभी घडलेल्या या राजकीय स्थित्यंतराचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि दख्खनच्या इतिहासावर झाले. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने राजकीय संघर्षाचे एक नवे पर्व दख्खन पठारावर झाले.
आजच्या नांदेड जिल्ह्याचा मध्ययुगीन इतिहास एकुण दख्खन पठारावरील राजकीय घडामोडीशी प्रत्यक्ष संबंध ठेवून होता. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भूप्रदेशात घडणार्‍या संघर्षाचे पडसाद नांदेड घेण्याअगोदर दख्खन पठारावरील राजकीय स्थित्यंतरे समजुन घेणे अगत्याचे आहे. इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत मराठवाड्याचा वरिसर म्हणजेचे महाराष्ट्रातील गोदा खोरे, संपन्न अशा राजसत्ताचे माहेरघर होते. इसवीसन पूर्व ५ व्या शतकातील अश्मक आणि मूलक ही दोन्ही महाजनपदे या परिसरातील, त्यानंतर अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, पुर्वचालुक्य, राष्ट्रकुल, उत्तरचालुक्य, यादव शिलाहार, कलचुरी या राजसत्तांच्या कालखंडात या परिसराने आर्थिक संपन्नता, राजकीय स्थैर्य, प्राचिन व्यापार उदीम उपभोगली. मोठ मोठी व्यापारी शहरे इथे उदयाला आली. अप्रतिम कालाविष्कार घडविले. द-याखो-यातून सह्याद्रीच्या कड्याकपारीतून अप्रतिम कला अविष्कार घडविले होते. या कला अविष्काराला उदार हस्ते मदत करणारे संपन्न व्यापारी इथे होते. राजघराण्याच्या कोषागारात अमित संपती होती. इथल्या संपन्नतेच्या कथा अरब व्यापार्‍यामार्फत सर्वदूर पसरल्या होत्या. १३ शतकात हे सारे बदलू लागले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सुरु झाला. त्याची झळ नांदेड जिल्ह्यालाही बसली. या संघर्षाबरोबरच प्रशासन व्यवस्थेतही बदल घडले, नवी सुभेदारी व्यवस्था उदयास आली. इ.स. १३४६ साली दिल्लीच्या सलतनतीने दख्खन पठारावर चार सुभे निर्मीले. नांदेडचा समावेश या सनतनती सुभ्यामध्ये झाला. नांदेड जिल्ह्याचा समावेश व-हाड आणि बिदर तरफेत झालेला होता. सफदरखान सिस्तानी हा व-हाड तरफेचा तरपफदार होता. सत्तासंघर्षाचे नांदेड परिसरातील आणखी एक केंद्र होते माहुर, येथला डोंगरी किल्ला अनेक लढ्याचा साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या परिसरात खरे तर गोंडाचे राज्य होते. गोंड हे दख्खनच्या पठारावरील वनक्षेत्राचे खरे राजे, तुघलक आणि बहमनी सत्तांच्या विस्ताराला गोंडांनी सतत विरोध केला. नांदेड जिल्ह्यातील खेरलाचा गोंड राज नरसिंगदेव हा देखील अनेक वर्षे बहमनीशी लढत राहिला. महमनी सलतनतीचा वजीर महंमद गवान याने बहमनी राज्याची प्रशासकीय पुर्रचना करण्याचे काम हाती घेतले. या महंमद गवानचे लष्करी ठाणे नांदेड शहराच्या परिसरातच होते. त्याची आठवण म्हणुन आजही नांदेडमध्ये वजिराबाद नावाची वस्ती आहे. या वजीर महंमद गवानने केलेल्या प्रशासकीय सुधारणेत बहमनी राज्याचे चार तरफ रद्द करण्यात येऊन आठ नवे सुभे निर्माण करण्यांत आले. या पुनर्रचनेनुसार आजचा नांदेड जिल्हा माहुर सुभ्याचा भाग बनला. नांदेड जिल्हा आकाराला यायला लागला तो येथपासून.
महंमद गवानच्या विरुध्द राजदरबारात मात्र बरेच राजकारण घडले इ.स. १४८१ साली या राजकीय कट कारस्थानचा परिणाम वजीर महंमद गवानच्या मृत्युत झाला. त्याला देहदंड देण्यापर्यंत सलतनतीतले कटकारस्थान पोहोचंले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सगळीकडे चालु होता. १४८२ साली सुलतान महमंदशाह तिसरा बहमनी मृत्यु पावला व त्याचा १२ वर्षाचा मुलगा महमुदशाहा अल्पवयीन राजा म्हणून सत्तेवर आला. सलतनतीतील सारी सत्त कासीम बरीदने आपल्या हाती घेतली व पालनकर्ता राजा म्हणून तो कारभार पाहु लागला. नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला हा कासीम बरीदचे प्रमुख लष्करी ठाणे बनला. इसवीसन १५२६ साली तिकडे दिल जहिरुद्दीन मुहंमद बाबरने मुघल सत्तेची स्थापना केली ही मुघलसत्ताही दख्खनच्या सत्ता्संघ येऊन उतरली. अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट असलेला व-हाड सुभा आणि त्यातला नांदेड जिल्हा इ.स. १५९६ मध्ये मुघलांच्या राज्यात समाविष्ट झाला. गेली तिनशे-साडेतिनशे वर्षे चाललेला स्थानिक मुस्लीम सलतनतीचा संघर्ष संपला आणि नांदेड जिल्हा पुन्हा दिल्लीपतीच्या अधिपत्याखाली आला.
१७ व्या शतकातील नांदेड :
१७ व्या शतकातील नांदेड जिल्ह्याचा इतिहास म्हणे अहमदनगररची निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्यातल्या संघर्षाची गाथा होय. दोन आडीच दशके हा संघर्ष चालला. १६३२ साली दौलताबादही मुघलांच्या ताब्यात आले. निजामशाहीतील कंधार आणि दौलाताबाद सारखी प्रमुख लष्करी ठाणी पडल्यामुळे मुघलांचा प्रभाव वाढला. नांदेड हे सुभ्याचे प्रमुख ठिकाण झाले. नांदेडच्या किल्यातून सुभ्याचा कारभार होऊ लागला. छत्रपती शिवरायांनी सामान्य रयतेचा विश्वास जागवला. त्याना लढण्याचे सामर्थ्य दिले. सत्तेचा उपभोग स्वत:च्या स्वार्थासाठी करण्यांच्या या मध्ययुगीन कालखंडात काळाची चौकठ भेदुन लोककल्याणाचा विचार करणारे मराठी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजानी निर्मीले. मुघल-मराठा संघर्षातील लक्षणीय अशी लढाई नांदेड जिल्ह्यात झाली नसली तरी उभय पक्षाच्या पक्षाच्या फौजानी नांदेड परिसरात घोडदौड मारली. १६७० साली व-हाडवरील चढाईच्या वेळी शिवाजी महाराज नांदेडला आले होते. इ.स. १६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट बनला. इ.स. १६८६ साली मुघलांनो विजापूर जिंकले. विजापुरची आदिलशाही आणि गोवलकोंड्याची कुतूबशाही या दोन सलतनतीच्या पाडवानंतर औरंगजेबाने मराठ्यावर सगळे लक्ष केंद्रीत केले. कंधारचा आपला लष्करी तळही मजबुत केला हमिदुद्दीनखान या किल्लेदाराने याच काळात कंधारच्या किल्यावर आपला तळ ठोकला, मुघल-मराठा संघर्ष तीव्रतर बनत चालला. हा संघर्ष चालू असतांना नांदेड परिसरातील सामान्य रयतेचे जिव अत्यंत हालाखीचे झाले होते. अनेक लोक स्थालांतरीत होऊ लागले. याच काळात नांदेड मधील कांह घराणी काशी प्रयाग अशा तिर्थक्षेत्री स्थलांतरत झालेली दिसतात. १८ व्या शतकातील संघर्षही मुख्यत: मुघल आणि मराठा यांच्यातला सत्तासंघर्ष होता.
श्री गुरुगोविंद सिंघाची नांदेड भेट :
इ.स. १७०४ च्या नंतर मुघल–मराठा संघर्ष अशा वळण येऊन पोहोचला की मुघलांचा पराजय स्पष्टपणे जाणवावा. मराठ्यानी दख्खन पठारावरील आपली सारी ठाणी परत मिळवली. आजचा नांदेड जिल्हा त्याकाळातल्या नांदेड आणि माहूर जिल्ह्यात विभागलेला होता. त्यातले माहुर हे वर्‍हाड सुभ्यात समाविष्ट होते तर नांदेड समावेश बिदर सुभ्यात झालेला होता. नांदेडची विभागणी ३० परगण्यात आणि ९४९ गावात झाली होती तर माहूर जिल्ह्यात २० तालुके- परगणे आणि ११४१ गावं होती. राजकीय सत्तासंघर्षाच्या या धामधुमीत नांदेड शहराला अन्यनयसाधारण मह्त्व प्राप्त करुन देणारी एक लक्षणीय घटना घडली. या घटनेचे महत्व स्थानिक नांदेड पुरते मर्यादित न राहता भारतीय इतिहासात नांदेडला एक आगळे स्थान प्राप्त करुन देणारी ही घटना आहे. एका नव्या युगाचा प्रारंभ झाल्याची साक्ष नांदेड परिसर देत होता. आज पासून तीनशे वर्षापूर्वीची श्री गुरुगोविंद सिंघाची नांदेड भेट ही घटना केवळ त्यांच्या अंतकाळापुरती मर्यादत राहत नाही तर गुरु ग्रंथसाहिबच्या रुपात झालेल्या तत्वचिंतनाची ती मुहुर्तमेढ ठरते. शिखधर्मासंबंधीचे कांही मह्त्वपुर्ण हुकूम नांदेड मुक्कामाहून निघाले आहेत. त्यामुळे नांदेडला एक आगळे मह्त्व आहे. १७२४ च्या आक्टोबर महिन्यात मुघल आणि निजामी सैन्यात साखरखंडी येथे मोठी लढाई झाली. दख्खनचे सहा मुघल सुभे निजामच्या ताब्यात आले. मुघल साम्राज्याचा सुभेदार म्हणुन निजामाने दख्खनचे सुभे ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात साखरखंडी येथील लढाईतील विजयामुळे मुघलाना पराभूत करुन चिन कुलीखान निजाम-उल् मुल्कने आपले स्वतंत्र राज्यच अस्तित्वात आणले होते. या स्वतंत्र राज्याचा कारभार औरंबादेतुन पाहिला जाऊ लागाला. नांदेड जिल्हा आता मुघलाच्या वर्चस्वातुन बाहेर पडला आणि स्वतंत्र निजामी राज्याचा भाग बनला कालांतराने निजामी राज्याची राजधानी, हैद्राबादला स्थलांतरीत झाली.
इ.स. १७२४ मधला नांदेड जिल्हा म्हणजे नांदेड सरकार खुप विस्तृत होते. आजचा नांदेड जिल्हा,अदिलाबादद आणि निजामाबाद जिल्हा हा सारा परिसर मिळुन हे नांदेड सरकार बनले होते. या काळात इंग्रज आणि फ्रेंच व्यापारी आपल्या फौज दख्खनच्या राजकारणात उतरले होते.
आधुनिक काळ :
महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सन.१८१८ पासून आधुनिक काळाची सुरुवात मानावी लागते. या एतद्देशीय सत्तेचा अस्त होऊन पेशवाई संपुष्टात आली व ब्रिटीस राज्य स्थिरावले. इ.स. १८५३ साली इंग्रज आणि निजाम यांच्यात एक नवा करार झाला. या करारान्वये हैद्राबादच्या निजामाने आपल्या राज्यातला पन्नास लाख शेतसारा वसुल करता येण्याजोगा भूप्रदेश इंग्रजाच्या ताब्यात द्यायचे कबुल केले. त्याअन्वये सारा विदर्भ सरकार हा विभाग इंग्रजांचा बराचसा बाग आणि नांदेड परिसरातील हदगांव, माहुर, किनवट हा भाग मात्र हैद्राबाद राज्यातच राहिला. अशा प्रकारे हदगांव, माहूर, किनवट हे भाग विदर्भ सरकारातून नांदेड सरकारात दाखल झाले. नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने हा बदल लक्षणीय आहे. नबाब सालारजंगने ही गुत्तेदारी पध्दत आणि शेतसारा वसुलीच्या इतर पध्दती बंद करुन एक नवी शेतसारा पध्दत, जिल्हाबंदीपध्दती अंमलात आणली. रोव्हेन्यू सर्वे अँन्ड सेटलमेंट डिपार्टमेंट स्थापन करण्यांत आले. शेतसारा वसुलीसाठी शासकीय महसुल यंत्रणा निर्माण करण्यांत आली. १८८१ च्या दरम्यान आठ तालुक्यांचा नांदेड जिल्हा आकाराला आला आणि औरंगाबाद सुभ्याचा भाग बनला. १८८५साली सुभेदार पद पुन्हा निर्माण झाले आणि ते १९४९ पर्यंत कायम होते. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणुन तालुकापद निर्माण झाले ते १९४९ पर्यंत कायम होते. तालुका पातळीवर तहसिलदार पद होते. जिल्हा प्रशासनात नायब तालुकदार,पेशकार, शिरस्तेदार अशी कांही पदेही होती. हैद्राबाद शहरात १८५५ साली स्टेट बँक काढण्यांत आली. अधुनिक बँकींग व्यावस्था सुरु झाली. कालातंराने निजामी राज्यातल्या कांही गावांत स्टेट बँकेच्या शाखा निघाल्या. नांदेड जिल्ह्यातील उमरी या बाजारपेठत अशीच एक शाखा उघडली गेली. हैद्राबाद राज्याची राजभाषा फार्शी होती, फार्शी शिक्षण देणारे मदरसे कांही ठिकाणी होते. १८६८ साळी नांदेडलाही एक फारसी मदरसा निघाली. इ.स.१८८४ मध्ये फार्शी एेवजी उर्दुला राजभाषेचा मान मिळाला. शिक्षणाचे माध्यम उर्दु झाले. इग्रजांच्या प्रभावातुन दळणवळणाची साधने वाढली. हैद्राबाद ते वाडी पर्यंत रेल्वे सुरु झाली. इ.स. १९०० साली नांदेड या गावात रल्वे आली. हैद्राबाद-मनमाड असा मिटर गेज रेल्वे मार्ग पुर्ण झाला. आणि या रेल्वेमार्गावरील एक रेल्वे स्टेशन नांदेड गावाजवळ उभारले गेले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाचेही असेच पडसाद राज्यात उमटले. स्वामी रामानंद तिर्थानी या आंदोलनाच्या दृष्टीने संघटन कार्य सुरु केले. हैद्राबाद राजकारणाची पावले आझाद हैद्राबादच्या दिसेने पडु लागली होती. हैद्राबादच्या निजामाची भूमीकाही या वाटचालीला पुरक होती.
मुक्तिसंग्राम पर्व :
१६ ऑगस्ट  १९४६ रोजी स्टेट कॉंग्रेससाची बैठक हैद्राबादला संपन्न झाली. कॉंग्रेस मधला जहाल गट प्रभावी पणे सक्रिय झाला. रझाकाराच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता जीवनमरणाचा अंतिम संघर्ष पुढे दिसत होता. १९४६ च्या अखेरीस महाराष्ट्र परिषदेचे हैद्राबाद स्टेट कॉंग्रेस मध्ये विलीणीकरण झाले. हैद्राबाद स्टेट कॉंग्रेससाचे पहिले अधिवेशन मुझीराबाद येथे १६ ते १८ जुन या काळात संपन्न झाले. स्वामी रामानंद तिर्थाची स्टेट कॉंग्रेससचे पहिले अध्यक्ष म्हणुन निवड झाली. त्यानी या अधिवेशनातच निजामाच्या आझाद हैद्राबाद विरुध्दच्या आणि प्रस्तावित स्वतंत्र भारतातल्या हैद्राबादच्या विलीनीकरणाच्या अंतिम लढ्याचे रणसिंघ फुंकले.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होणार या पार्शभुमीवर हैद्राबादच्या निजामाने राज्यातल्या रयतेवर अनेक निर्बध लादले.सभा बंदी, भाषण बंदी, हिंदी संघराज्याच्या म्हणजेच तिरंगा झेंड्यावर बंदी अशा अनेक प्रकारच्या बंदी लादणारे फर्मान काढले गेले. स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताचा तिरंगा ध्वज हा हैद्राबाद राज्यात परकीय ध्वज ठरवला जाऊन  तो ध्वज फडकवणार्याणस राजद्रोही मानले गेले. अशा अवस्थेत स्वतंत्र भारतात विलीन होऊ इच्छिणारी राज्यातली ८५% जनता अधिकाधिक अस्वस्थ होत गेली. असंतोष भडकत गेला. विलिनीकरणाच्या मागणीने उग्र अशा आंदोलनाचे रुप धारण केले.इंग्रजांनी भारतसोडुन जायचे ठरवले त्याच्या ताब्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार ही गोष्ट स्पष्ट झाली. त्याचबरोबर भारतातल्या ५६५ राजांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्य द्यावयाचे ठरवले, याचा अर्थ हैद्राबादच्या निजाम उस्मान अलीला स्वातंत्र्य मिळणार होते. १५ आगस्ट १९४७ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा या स्वातंत्र्य प्राप्तीचा निखळ आनंद नांदेड परिसरातील लोकांना उपभोगता आला नाही. सार्या  हैद्राबाद राज्यातच पोलिसांचा रझाकराचा ससेमिरा चुकवत तीर फडकावण्याचे प्रयत्न झाले. तिरंगा फडकवणार्याी कार्यकर्त्याना राज्यद्रोही ठरवुन तुरुंगात डांबण्यात आले. विलिनीकरण दिन म्हणुन हा दिवस साजरा झाला.
१५ सप्टेंबर १९४७ पर्यंत राज्यभरात आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केले होते. हैद्राबाद राज्य पुरभिलेखागारातील उपलब्ध कागदपत्रातून तुरुंगात डांबलेल्या १९४८ च्या ऑगस्ट सप्टेबर महिन्यात हैद्राबाद राज्यातली परिस्थिती दिवसेन् दिवस तणावपुर्ण बनत गेली. रझाकाराचे अत्याचार वाढत गेले. १३ सप्टेंबर १९४८ या रोजी स्वतंत्र भारताच्या फौजा हैद्राबाद राज्यात शिरल्या आणि     “आपरेशन पोलो” सुरु झाले. चार दिवसात हैद्राबादच्या सैन्याने शरणागती पत्कारली, हैद्राबाद सैन्याचा सेनापती अल् इद्रुसने शरणागती पत्कारली आणि हैद्राबादेत तिरंगा फडकला. नांदेडच्या अव्वल तालुकदार कार्यालयावरही तिरंगा फडकला. हळुहळु स्थित्यंतर घडु लागले. अव्वल तालुकदाराच्या जागी नांदेडलाही कलेक्टर आला. मध्ययुगीन निजामी सलतनतीच्या कारभाराचे रुपांतर अधुनिक पजासत्ताकीय यंत्रणेत होऊ लागले. प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी प्रशासक, जिल्हा पोलीस प्रमुख नेमला गेला. लष्करी प्रशासनाचा काळ संपल्यानंतर नागरी प्रशासकाच्या जागी कलेक्टर नेमले गेले.
राज्य पुनर्रचना आणि महाराष्ट्र राज्य निर्मिती :
१९२० साली अखिल भारतीय कॉंग्रेसने घटनेच्या पहिल्या मसुद्यातच भाषावार प्रांत रचनेचा विचार समाविष्ट केला होता. १९५५ साली फाजलअली अहवाल सादर झाला. व्देभाषीक मुंबई राज्य अस्तित्वात आले. हैद्राबाद राज्याचे विभाजन झाले. मराठवाडा मुंबई राज्यात समाविष्ट झाला. नांदेड जिल्ह आता हैद्राबाद राज्यातून मुंबई राज्यात समाविष्ट झाला. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये निर्मीली गेली.
आता नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारे मध्ययुगीन सलतनतीतले नांदेड आता झपाट्याने बदलु लागले. नंदीतटांचे नांदेड आता लहान गावठाण राहीले नाही, शहर बनले, पाहता पाहता शहराचा विस्तार घडत गेला आणि नांदेड- वाघाला महानगरपालीका अस्तित्वात आली. संपुर्ण जिल्ह्यात मिळुन एक हायस्कुल असलेल्या नांदेडात स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ स्थापन झाले. अनेक महाविद्यालये निघाली. मेडीकल, इंजिनिअरीग,लाँ,फार्मसी अशा विविध विद्याशाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये अस्तित्वात आली. नांदेड जिल्ह्याने मध्ययुगीन मागसलेपणाची कात टाकुन २१ व्या शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे.
नांदेड दर्शन
नांदेड जिल्हा रेल्वे, रस्ते मार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यात एकूण २०८ किमी. लांब रेल्वे असून जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिमेकडून पूर्वेकडे मनमाड–काचीगुडा हा लोहमार्ग जातो व त्यावर या जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, पेठ उमरी व धर्माबाद ही स्थानके आहेत. दुसरा लोहमार्ग मुदखेडहून आंध्र प्रदेशातील आदिलाबादकडे गेलेला आहे व त्यावर मुदखेड, भोकर व किनवट ही स्थानके आहेत. नांदेड येथे अद्ययावत व सर्व सोयींनी युक्त असे श्री गुरू गोबिंद सिंगजी विमानतळही आहे. याठिकाणाहून पुनश्च: लवकरच विमानसेवाही सुरु होणार आहे. त्यामुळे येथून मुंबई, नागपूर आणि दिल्लीसाठी हवाई प्रवासाची सुविधाही सुरू होईल, अशी आशा आहे. रेल्वेद्वारे नांदेड, हैदराबाद, तिरुपती, बंगळुरू, दिल्ली, अमृतसर, मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांशी जोडले गेले आहे. नांदेड जिल्हा रस्त्यांद्वारे राज्यातील इतर शहरांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांशी जोडला गेला आहे.
नांदेड तालुक्यातील अर्धापूर येथील केशवराज मठ, दर्गा, बारुळ येथील मन्याड नदीवरील धरण, देगलूर येथील गुंडा महाराजांचा मठ व जुनी मशीद हदगाव येथील दत्तमंदिर, कंधार येथील किल्ला, कुंडलवाडी येथील कुंडलेश्वर मंदिर, माहूर येथील दत्तात्रेयाचे जन्मस्थान समजले जाणारे दत्तशिखर व रेणुका देवीचे मंदिर, मालेगाव येथील खंडोबाचे देवालय, मुदखेड येथील अपरंपार स्वामींची समाधी, काझिपुरा मशीद व देवीचे मंदिर मुखेड येथील दशरथेश्वर महादेव व वीरभद्र मंदिरे, नांदेड येथील अमृतसरच्या खालोखाल महत्त्वाचे शिखांचे गुरुद्वार, नगिना घाट, किल्ला, हिंदूंची अनेक देवालये, जामा मशीद, बडी दर्गा इ. मुस्लिमांची पवित्र स्थाने, तामसा येथील बारालिंग मंदिर व गौतम तीर्थ, पेठ उमरी येथील बाबा महाराजांची समाधी, उनकदेव येथील उनकेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारची दोन उष्णोदकाची कुंडे ही प्रेक्षणीय होत.
    नांदेडला पर्यटनासाठी येताना पहिल्या दिवशी नांदेड परिसरातील प्रमुख गुरुद्वारांना भेट देऊन सायंकाळी काळेश्वर मंदिर परिसरातील शंकरसागर जलाशयाच्या निसर्गरम्य परिसराला भेट देता येते. सायंकाळी सहाच्या सुमारास श्री हजुरसाहिब सचखंड गुरुद्वारा येथे मुख्य प्रार्थनेनंतर श्री गुरु गोबिंद सिंग यांची शस्त्रे भाविकांना दाखविली जातात. गुरुद्वाराला लागूनच असलेल्या गोबिंदबाग येथे 7.30 वाजता अप्रतिम ध्वनी-प्रकाश योजनेद्वारे (लेजर शो) शीख धर्माचा इतिहास अर्ध्या तासात प्रस्तुत केला जातो.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघाल्यास माहूरला (130 किमी) निवांतपणे शांततेत श्री रेणुकादेवीचे दर्शन घेता येते. तसेच साधारण तीन तासात लेणी, किल्ला, दत्तशिखर, अनसुया मंदिर आदी स्थानांना भेट देता येते. येथूनच दुपारी उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे व त्यानंतर (पावसाळा असल्यास) सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी रूप अनुभवता येते. रात्री नांदेडला मुक्काम सोईचा ठरतो.
माहूर अथवा किनवटला मुक्काम केल्यास इतिहासप्रेमींना केदारगुडा आणि शिऊरच्या लेण्यांना भेट देणे शक्य होते. तिसऱ्या दिवशी सकाळी कंधार किल्ला आणि प्रसिद्ध दर्गाला भेट देता येते. त्यानंतर बिलोली येथील मशिदीस भेट देऊन सायंकाळी होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरातील अप्रतिम शिल्पकला पाहता येते.  श्री गुरु गोबिंद सिंग यांचे नांदेडमधील पावन वास्तव्य श्री गुरू गोबिंद सिंगांचे जीवन विविधता आणि विशालतेने भरलेले आहे. देशाच्या विविध भागांशी त्यांचा शीख धर्माच्या प्रसाराच्या निमित्ताने संबंध आला. त्यांचा जन्म पाटण्याचा, कार्यक्षेत्र उत्तर पूर्वेकडे व महापरिनिर्वाण दक्षिणेत झाले. जीवनाच्या अंतिम क्षणी ते नांदेड (श्री हजुरसाहिब) येथे वास्तव्यास होते. श्री गुरू गोबिंद सिंग हे राजस्थान, दिल्ली, आग्रा, मथुरा, उज्जैन, वृंदावन, बऱ्हाणपूर, बाळापूर, अकोला, बडनेरा, अमरावती, हिंगोली, वसमतनगरमार्गे ते दक्षिणेत नांदेडला आले.
नांदेडला त्यांचा पहिला मुक्काम ब्राह्मणवाडा भागात होता. तेच ठिकाण गुरुद्वारा हीरा घाट साहिबजी तर त्यांची तपोभूमी तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगरसाहिब म्हणून ओळखली जाते. श्री गुरू गोबिंद सिंग हे शिखांचे दहावे गुरू होते. संवत 1765 कार्तिक शुद्ध द्वितीयेला गुरुपद पवित्र श्री गुरुग्रंथसाहिबला सोपवून त्यांनी देहधारी गुरु परंपरा संपुष्टात आणली. 7 ऑक्टोबर 1708 रोजी त्यांनी नांदेड येथेच देह ठेवला. या परलोक गमनाला 2008 मध्ये 300 वर्षे पूर्ण झाली.
तख्त सचखंड श्री हजुर साहिब यांच्याकडून वर्षभर तिथी आणि धार्मिक औचित्याप्रमाणे विविध सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये बैसाखी महल्ला, दशहरा महल्ला, दिवाली महल्ला, होला महल्ला, महल्ला गुरियाई, महल्ला गुरुपर्व- 1970 पासून गुरु-त्ता-गद्दी उत्सव तख्त सचखंडमार्फत साजरा केला जातो. संध्याकाळी नगर कीर्तनाचे आयोजन केले जाते. या उत्सवांबरोबरच श्री गुरुनानकदेव व श्री गुरुगोबिंद सिंग जन्मोत्सव व 10 वी ज्योती ज्योत पातशाहीचे (कार्तिक शुद्ध पंचमी) उत्सवदेखील उत्साहाने साजरे केले जातात. गुरुद्वारा संगतसाहिब, गुरुद्वारा शिकार घाटसाहिब, गुरुद्वारा मातासाहिब, गुरुद्वारा हिरा घाटसाहिब, गुरुद्वारा नगिना घाटसाहिब, गुरुद्वारा बंदाघाटसाहिब यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील राज्य परिवाहन मंडळाचे प्रमुख शहरातील संपर्क क्रमांक:-
NANDED DIVISION bus stand depot contact number
Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id
Office
18 Divisional Controller Nanded , 02462 260175
dcstnnd@rediffmail.com
msrtcstrnnd@yahoo.in
1 Divisional.Traffic Officer Nanded Division, 02462 260621
2 Divisional. Accounts Officer Nanded Division 02462 260878
3 Divisional. Personnel Officer Nanded Division 02462 267175
4 Labour Officer Nanded Division 02462 260522
1 Depot Manager Nanded bus stand depot contact number 02462 234626
2 Depot Manager Bhokar bus stand depot contact number 02467 222644
3 Depot Manager Kinwat bus stand depot contact number 02469 222035
4 Depot Manager Mukhed bus stand depot contact number 02461 222537
5 Depot Manager Deglur bus stand depot contact number 02463 255106
6 Depot Manager Khandar bus stand depot contact number 02466 223455
7 Depot Manager Hadgaon bus stand depot contact number 02468 222345
8 Depot Manager Biloli bus stand depot contact number 02465 223316
9 Depot Manager Mahur bus stand depot contact number 02469 268348
  वामन पंडित
   वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते. वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. 'यथार्थ दीपिका'कार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारे वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
     वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो. मूळ विजापूरचे रहिवासी. यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे. 
नांदेडचा नंदगिरी किल्ला :- 
 नंदगिरी ही सातकाहनांची पहिली राजधानी असल्याने या किल्ल्याला नंदगिरीचा किल्ला म्हटले जाते. नंदगिरीहून सातकाहन नृपती प्रतिष्ठानकडे (पैठण) कळले. नांदेड रेल्वेस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर कळंबच्या राजाने बांधलेला नांदेडचा नंदगिरी किल्ला आहे. संथ वाहणाऱया गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राच्या शेजारी दिमाखदार तटबंदीचे कवच अंगावर घेऊन तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास सांगणारा नंदगिरी किल्ला कात टाकत आहे.
  गोदावरी नदीच्या काठावर शहराच्या दक्षिणेला जुन्या नांदेडात उत्तर दिशेला किल्ल्याचे प्रवेशद्वार असून, नदीच्या मोठय़ा वळणाकर असलेला हा किल्ला लांबूनच आपली ओळख सांगतो. या किल्ल्याने सातवाहन,वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादवांचा कालखंड पाहिला आहे. सुभेदारी महाल, नियोजनबद्ध उद्यान, कारंजे, वॉटरटँक ही या किल्ल्याची वैशिष्टय़े होती. परंतु, त्यांच्या खुणाही पाहण्यास मिळत नाहीत. किल्ल्याला सहा बुरूज असून, तीन बुरूज गोदावरी नदीच्या दिशेने तोंड करून उभे आहेत. दक्षिणेकडचा बुरूज सर्वा उंच असून, त्याला टेहळणी बुरूज म्हणून संबोधले जात असे.
गोदावरीच्या तटावर किल्ला असल्यामुळे इथून नागमोडी वळण घेत जाणाऱया गोदावरी नदीचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यात दोन, तीन तोफा इतस्ततः पडल्या आहेत. काही पुरातन अवशेष आहेत. इथले खास आकर्षण म्हणजे निजामशाहीत उभारले गेलेले पाणी शुद्धिकरण केंद्र. निजामाने इंग्रजांच्या सहाय्याने नांदेड शहराला गोदावरी नदीतून पाणी उचलून शुद्ध करून ते गावाला वितरित करण्याची व्यवस्था केली होती. आजही पाणी शुद्धिकरण केंद्र किल्ल्यात पाहू शकतो.
     उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही त्यावर नांदेड महानगरपालिकेने पाण्याच्या दोन टाक्या आणि बंगले बांधून किल्ल्याचा उरलेला भागही गिळंकृत केला आहे. किल्ल्यावरील पुष्कर्णीचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केलेले आहे.
पुष्कर्णी, नांदेड किल्ला
नांदेड शहराच्या जुन्या भागातील अरब गल्लीत गोदावरीच्या पात्रा लगत किल्ल्याचे अवशेष उरलेले आहेत. नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम, इत्यादी नावाने इतिहासात प्रसिध्द असलेल हे नगर नंद वंशातील राजाने वसवलेले होते. पैठण ही नंदवंशाची दक्षिण भारतातली राजधानी होती.तर नंदआहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. याच नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड हे आजचे नाव प्रचलित झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आनि व्यापारी केंद्र असल्याने त्याकाळी त्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी असणार. नांदेड हा नगर किल्ला होता.सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपिठ होते.सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आहे. वाकाटक त्यानंतर चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर म्हणुन प्रसिध्द होते.त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे हा किल्ला होता.  
नांदेडचा सचखंड गुरूद्वारा
dharmayatra
याच ठिकाणी त्यांनी रहायला सुरवात केली. त्यांच्या आयुष्याचा बहुमुल्य काळ येथे गेला. येथेच त्यांनी आपण शीखांचे शेवटचे गुरू असे जाहीर करून गुरू परंपरा थांबवली. शिवाय 'गुरू ग्रंथ साहिब' या ग्रंथाला शीखांचा पवित्र धर्मग्रंथ म्हणून जाहीर केले. त्यांच्याच शब्दांत त्यांनी जाहीर केलेली ही घोषणा अशी.
आगिआ भई अकाल की तवी चलाओ पंथ।।
सब सिखन को हुकम है गुरू म‍ानियो ग्रंथ।।
गुरू ग्रंथ जी मानियो प्रगट गुरां की देह।।
जो प्रभ को मिलबो चहै खोज शब्द में लेह।
यानंतर त्यांनी या जागेला अबचलनगर असे नाव दिले. येथेच १७६५ मध्ये कार्तिक शुद्ध पंचमीला गुरू गोविंद सिहांचे निर्वाणही येथेच झाले. नुकतीच या घटनेला तीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'गुरू दा गद्दी' सोहळा थाटात साजरा झाला. त्यासाठी देश-विदेशातून लोक आले होते. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचीही सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.
गुरुद्वारा हजूर साहिब

येथे रोज सकाळी गोदावरीतून घागर भरून सचखंडमध्ये आणली जाते. धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते. दिवसभर भजन, कीर्तन सुरू असते. या गुरूद्वारात दसरा, दिवाळी व होला मोहल्ला उत्साहात साजरा केला जातो.
कसे जाल:
हवाई मार्ग :- नांदेडमध्ये विमानतळ आहे. सचखंडपासून तो फक्त पाच किलोमीटरवर आहे.
रस्ता मार्ग - औरंगाबादपासून नांदेड ३०० किलोमीटरवर आहे. राज्य परिवहन मंडळाची बस तसेच खासगी बसही येथे जाण्यसाठी उपलब्ध असतात.

 नांदेडच्या तलवारींचा खणखणाट :-

 नांदेड, महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेजवळचे जिल्ह्यचे शहर. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पोलीस कारवाईनंतर नवीन हैद्राबाद स्टेटमध्ये समावेश झालेले आणि नंतर भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रात आलेले अशी नांदेडची प्राथमिक ओळख आपल्याला असते. पण त्याशिवाय शीख धर्मीयांची दक्षिण काशी अशी नांदेडची खास ओळख जागतिक पातळीवर आहे. जगभरातील शीख धर्मीय आयुष्यात एकदा का होईना येथील गुरुद्वारात येतात. शिखांचे दहावे गुरू, गुरू गोिवद सिंग यांनी शीख धर्मातील देहधारी गुरू परंपरा खंडित करून यापुढे गुरू ग्रंथ साहिब हाच शिखांचा गुरू असेल असे नांदेड येथेच सांगितले. १७०८ मध्ये गुरू गोिवद सिंग यांचे येथे देहावसान झाले. याच ठिकाणी गुरुजी भक्तांची वाट पाहतात असे सांगितले जाते. म्हणजे वयाच्या साठीपर्यंत तरी भक्तांनी तिथे जाणे अपेक्षित आहे. शीख धर्मीयांसाठी तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी नांदेड हे चौथे तख्त असून ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
शीख धर्मीयांच्या दृष्टीने नांदेडला असे महत्त्व असल्यामुळे नांदेडमध्ये काही घटकांना चालना मिळाली. त्यापकी एक म्हणजे येथील शस्त्रांची बाजारपेठ. खालसा पंथीय केस, कडं, कंगवा (लाकडी), कच्छा आणि कृपाण या पाच गोष्टींचे धारण करतात. यापकी कृपाण म्हणजे धारदार शस्त्रच. धर्मकारणासाठी शीख धर्मीयांना ते बाळगायची परवानगी आहे. अर्थातच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्री जगभरातून शीख भाविक येत असतील तर त्यांच्या धर्माशी निगडित अशा अनेक गोष्टींची नांदेडमध्ये विक्री वाढणार हे अगदीच साहजिक आहे. कृपाण हे त्यापैकीच एक. भारतीय कायद्यानुसार नऊ इंचांपेक्षा जास्त धारदार शस्त्र बाळगणे, विकणे बेकायदेशीर ठरत असल्याचे नांदेडचे पोलिस सांगतात. कृपाण हे सर्वसाधारणपणे या मर्यादेच्या आत असते. पण कृपाणाबरोबरच शीख धर्मीय तलवारदेखील बाळगतात. आणि त्याला धर्माचा आधार असल्यामुळे कायदा – सुव्यवस्थेचं रक्षण करणारे पोलीस शिखांच्या तलवार हे शस्त्र बाळगण्याला आक्षेप घेत नाहीत. त्यामुळेच नांदेड येथे कृपाण आणि तलवार सहजगत्या उपलब्ध झाली तर त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. पण येथे शीख धर्मीयांबरोबरच शीख नसलेल्या लोकांनादेखील या गोष्टी विकत घेता येतात असे समजले होते. आणि केवळ तलवारीच नाही तर त्या आडून अँटिक तलवारी विकण्याची एक बाजारपेठच येथे विकसित झाली आहे, असेही समजले.
नांदेडला गोदावरी नदीकिनारी तख्त सचखंड साहिबजी ही भव्य वास्तू उभी आहे. तेथून गुरुद्वारा लंगर साहिबजीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा अगदी रोजच जत्रा भरल्याप्रमाणे दुकानांची रेलचेल असते. कुठे पारंपरिक वस्त्रांची दुकाने, कुठे कडे, कृपाण वगरे हारीने रचून ठेवलेले. मध्येच एक -दोन हॉटेलांचे पराठय़ाचे बोर्ड. रस्त्यावर शिखांचाच वावर अधिक. सारेच पगडी बांधलेले, दाढी मिशा वाढलेले, कोणी एखादा कच्छा नेसलेला (गुडघ्यापर्यंत धोतर असावे असे पांरपरिक वस्त्र) आणि खांद्यावर लटकवलेले कृपाण. काही महिलादेखील कृपाण बाळगणाऱ्या. नगिना घाटाच्या बाजूस लंगर साहिब गुरुद्वारा आहे. तेथेच निवासाची सोय असणाऱ्या भल्या मोठय़ा इमारतीदेखील आहेत. त्यात मध्येच ये-जा करणाऱ्या प्रवासी बसेस. साधारण पाचशे मीटरच्या या परिसरातून जाताना जणू काही आपण पंजाबातील एखाद्या गल्लीतून चालत आहोत असे वाटते.
शस्त्र बाजार असा उघडय़ावर दिसणार नव्हता. किंबहुना ते असे सहज पाहायला मिळणे जरा कठीणच होते. पण सुरुवात म्हणून तख्त सचखंडच्या समोरच असणाऱ्या कृपाण विक्रीच्या एका दुकानात गेलो. अगदी छोटीशी टपरी असावे असे हे दुकान. येथे वेगवेगळ्या आकारांतील कृपाण तर होतेच, पण त्याच जोडीला असंख्य फॅन्सी सुरेदेखील. कमांडो डॅगरसारखे सुरे तर हवे तेवढे. त्या दुकानात खरेदीला आलेली तरुण मुलं शीख नव्हती. त्यामुळे त्यांचा सारा भर हा त्या विविधढंगी, विविधरंगी डॅगरवरच होता. मी कृपाणाबद्दल विचारले. चार-पाचशेपासून ते दोन-तीन हजारांपर्यंतचे कृपाण तेथे होते. मग हळूच तलवार मिळेल का असे विचारले, तर तलवारीसाठी नगिना घाटाकडे जावे लागेल असे त्या व्यापाऱ्याने सांगितले.
मग मुख्य रस्त्यावरील दुकानांकडे आलो. तेथेदेखील एका दुकानात शेदोनशे कृपाण टांगलेले होते. त्या दुकानदाराने मात्र शीख नसणाऱ्या व्यक्तीला कृपाण विकत घेता येणार नाही, असं सांगितलं; पण मग हळूच तो म्हणाला की, ‘‘आपको पूजा में रखना है तो ले लो, लेकिन सिगारेट-बिडी पी के या तंबाखू के हात इसे मत लगाना.’’ शीख धर्मीयांमध्ये तंबाखूबद्दल प्रचंड तिटकारा आहे आणि मी शीख नसलो तरी तो ते कृपाण मला विकायला तयार दिसत होता.
पण तलवारच हवी असल्याने एका मोठय़ा दुकानात शिरलो. तेथे असंख्य कृपाण व अन्य वस्तू मांडून ठेवल्या होत्या. एक-दोन फॅन्सी (चायनीज) तलवारीदेखील लटकावलेल्या होत्या. येथे तलवार मिळू शकेल असं दिसत होतं. दुकानदाराकडे पूजेसाठी तलवार हवी आहे, अशी मागणी केल्यावर त्याने दोन क्षण निरखून पाहिलं.
मी काही शीख नव्हतो, त्यामुळे त्याने परत विचारले, ‘‘तलवार ले के क्या करोगे?’’
‘‘पूजेत ठेवणार.’’ माझे उत्तर तयारच होते.
‘‘कोठून आलात? आणि कसे आलात?’’ दुकानदाराचाही पुढचा प्रश्न तयार होता.
‘‘गाडीने आलो.’’ या उत्तरानंतर मग मात्र त्याने दुकानातील पोरांना तलवार काढायला सांगितली.
झगमगीत गुलाबी म्यानबंद तलवार समोर आली. एकदम चकाचक. म्यानातून तलवार बाहेर काढून बाजूला ठेवली. एकदम चकाकणारी अशी दोनेक फूट लांबीची ती तलवार. मुठीपासूनच पाते सुरुवातीला थोडे सरळ गेलेले आणि पुढे वक्राकार झाले होते.
तलवारीची किंमत होती तीन हजार रुपये; पण नेणार कशी हा प्रश्न होताच. दुकानदाराने सांगितले की, तुम्ही ही तलवार विकत घ्यायचे नक्की करा, तुम्हाला तलवार कशी घेऊन जायचे ते सांगतो. मी तलवार घ्यायचे ठरवले. तेव्हा दुकानदार बोलू लागला. ‘‘यह तलवार मने आपको बेची नही और आपने खरीदी नही. कोई आपको पकडता है तो बताना की, आप ये तलवार सायन कोळीवाडा के गुरुद्वारा में चढाने के लिये लेके जा रहे हो.. और घबराना नही, मुंबई के लोग बहुत घबराते है ऐसी बातो में. कल गाडी लेकर आ जाओ और तलवार ले लो.’’
खरं तर कायद्यानुसार त्या दुकानदाराला मला तलवार विकायला बंदी होती, पण तिथे निव्वळ व्यापार होता. त्यापुढे जणू कायद्याची भीती नव्हती.
      त्याच्या दुकानात असंख्य कृपाण होते. एकूणच नांदेडमधील कृपाणांची संख्या पाहिल्यास कृपाणांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होत असणार हे नक्की होते. त्यामुळे ती उत्सुकता होतीच. त्या संदर्भात दुकानदाराकडे विचारणा केली असता त्याचे उत्तर धक्कादायक होते. तो सांगतो की, हल्ली हा सारा माल मुंबईवरून येतो आणि मुंबईला हा माल चीनमधून येतो. ‘‘अगर ये सब अपने इधर बनता तो हम इतना सस्ता बेचही नही पाते.’’
खरं तर कृपाण हा एका समुदायाशी निगडित असा घटक. त्यांच्या धार्मिक संकल्पनांमुळे धारण केले जाणारे हे हत्यार. तेवढीच त्याची मागणी मर्यादित असायला हवी; पण आज थेट चीनमधून त्याची आयात करावी लागणे इतकी बाजाराची मागणी आहे. चीनमधून येणारा माल कंटनेरच्या हिशोबाने येतो. हे पाहता एकूण भारतात कृपाणांच्या मागणीचा अंदाज करता येऊ शकतो.
इतर दुकानात इतक्या मोठय़ा प्रमाणात कृपाण आणि तलवारी पाहायला मिळत नव्हत्या. गुरुद्वारासमोरील दुकानात ढाल-तलवारीची एक जोडी पाहायला मिळाली, पण ती धारदार असण्यापेक्षा त्यात शोबाजीच अधिक होती.
      नांदेडच्या तलवारीची बरीच चर्चा ऐकली होती, पण तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात खुलेआम बाजार दिसत नव्हता. त्याची कारणं नंतर कळली. कधी काळी नेहमीच्या तलवारी खुलेआम विकण्याचे ठिकाण होते नगीना घाटाजवळच्या रस्त्यावर. पण २००८ सालच्या काही घटनांनी हा खुला बाजार आता जवळपास बंद झाल्याचे तेथील व्यापारी सांगतात. मालेगाव बॉम्बस्फोट आणि त्याच्या अलीकडे पलीकडे वाढलेल्या कट्टरतावादी घटनांच्या संदर्भात टाकण्यात आलेल्या धाडीत सापडलेल्या तलवारी नांदेडातून आल्याचे अनेकदा निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यानंतर नांदेडमधील अनेकांवर धाडी पडल्या. परिणामी हा खुला बाजार जवळपास बंदच झाला. आणि त्याचबरोबर तथाकथित अँटिक तलवारींच्या बाजाराला तेजी आली. इतिहासकालीन तलवारींना वाढलेल्या मागणीमुळे हा बाजार सध्या कसा कार्यरत आहे हेदेखील पाहायचे होते. पण हा बाजार असा खुलेआम चालत नाही.
       येथे मात्र तुमची ओळख असेल तरच पुढील सूत्रं हलतात. अन्यथा तुम्हाला तलवारच काय साधं कृपाणदेखील घेता येत नाही. एका मध्यस्थाच्या मार्फत अशाच एका दुकानात गेलो. एकंदरीत दुकान अगदीच साधं, पण आतमध्ये गेल्यावर एकेक वस्तू दाखवल्या जाऊ लागल्या. त्यात एखादं जुनंपुराणं कुलूप होतं, काही खंजीर होते आणि एक तलवारदेखील. पण ही तलवार आधीच्या दुकानात पाहिलेल्या गुलाबी म्यानबंद झगमगीत तलवारीसारखी आकर्षक नव्हती आणि तिला धारदेखील नव्हती. किंबहुना तिचा हा लुक हीच अँटिकची पूर्वअट असावी असे जाणवले. कारण अशा काही तलवारी नंतरदेखील पाहायला मिळाल्या. काहींचे फोटो पाहिले. काही म्यानावरील कव्हर फाटलेले होते, तर काही तलवारींची पाती खराब दिसत होती, धार नव्हती, मूठ बऱ्यापकी नीटस होती, म्यानाचा मूळ रंग कळत नव्हता. मात्र असे असतानादेखील तलवारींच्या किमती  पाच हजारांपासून पुढे सुरू होत होत्या. दुसऱ्या एका दुकानात फक्त तलवारीच होत्या. तिथेही हाच प्रकार होता. त्यात पुन्हा एखाद्या तलवारीच्या मुठीवर काही चिन्हं वगरे कोरले असेल तर मग त्याची किंमत आणखीन वाढणार. म्हणजे अगदी १५-२० हजार. त्या दुकानात पाहिलेली तलवार ही दहा हजार रुपयांची होती. मूठ जुनीच होती मात्र त्यावरील कलाकुसर नवीन होती. पाते कापून, वाकवून, म्यान वाकवून साध्या तलवारीचे गोलिया तलवारीत रूपांतर केले होते. हे रूपांतरण हाच एक मोठा व्यवसाय झाला आहे.
हे सारे पाहून आणखी एका तलवार विक्रेत्याला गाठले. हा पक्का सरदार. पण मराठी बोलणारा. त्याच्या तोंडून मग एकेक किस्से ऐकायला मिळत गेले. अँटिक तलवारींची मागणी असल्यामुळे बनावट तलवारी हा मोठा प्रश्न आहे. तो सांगू लागला की, या अँटिकच्या वाढत्या मागणीमुळे हल्ली अनेक जण बनावट अँटिक विक्रीचा उद्योग करतात. नेहमीसारखी किंवा इतिहासकालीन रचना असलेली तलवार तयार करून घ्यायची आणि त्यावर खराब पाणी, मिठाचे पाणी, अ‍ॅसिड वगरे टाकून ती मातीत नाल्यात किंवा चिखलात खुपसून ठेवायची. जेणेकरून ती जुनी वाटावी. किंवा मग म्यान फाडायचे. हा व्यवसाय बऱ्यापकी तेजीत असल्याचे हा विक्रेता सांगतो.
      खरे तर तो स्वत:देखील तलवारी तयार करतो, काही अँटिक तलवारी शोधून खरेदी करतो आणि नांदेडात येणाऱ्या गिऱ्हाईकांना विकतो. त्याची किंमतदेखील पाच-दहा हजारांच्या खाली नसते. त्याच्या मते या तलवारी तो फक्त शीख धर्मीयांनाच विकतो. त्याबाहेर कोणालाही तो अशा तलवारी विकत नाही.
या अशा अँटिक तलवारींना सध्या प्रचंड मागणी आहे. ही मागणी दोन प्रकारच्या लोकांकडून येते. एक म्हणजे अभ्यासक, संग्राहक किंवा संग्रहालयांचे मालक आणि दुसरा वर्ग  केवळ हौस म्हणून अँटिक वस्तू साठवणाऱ्यांचा. दुसऱ्या प्रकारचे लोक उच्चभ्रू वर्गात अधिक प्रमाणात आढळतात. या दुसऱ्या वर्गाला अँटिक वस्तूंची पारख म्हणावी तेवढी असतेच असे नाही. त्यांचा भर असतो तो अशी एखादी ऐतिहासिक वस्तू आपल्याकडे हवी यावर. तलवारीबद्दलचे आकर्षण मोठे आहे, तर हा वर्ग चार पसे जास्त मोजून तलवारी विकत घेऊ शकतो, किंबहुना तो घेतोच. म्हणूनच या तलवारींची किंमत हजारांमध्ये जाते. त्यातूनच मग एखाद्या तलवारीची मूठ मिळाली तर त्याला साजेसं पातं तयार करायचं किंवा पातं चांगलं असेल तर मूठ सुधारून घ्यायची. थोडक्यात विकण्यासाठी योग्य माल तयार करायचा.
      हे सगळं नांदेडमध्येच का होतं हे पाहण्यामागे अनेक कारणं आहेत. एक तर हे ठिकाण शिखांचं महत्त्वाचं धर्मस्थळ आहे, त्यामुळे तेथे मागणी प्रचंड आहे; पण त्याचबरोबर बनावट अँटिकची बाजारपेठदेखील तयार होऊ लागली आहे. याला पूरक अशा शीख समाजातील एका गटाकडे पाहणे त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. ते म्हणजे शिकलगार. सिकल हा मूळ फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ हत्यारांना धार करणारे, हत्यारांना पाणी देणारे. हत्यार अर्थातच लोखंडापासून तयार केलेले. हा समूह मूळचा मारवाडातून आलेला, लोहारकाम करणारा होता. १५९५ मध्ये शिखांचे सहावे गुरू गुरू हरगोिबदजी यांच्या काळात हा समाज शीख समाजाशी जोडला गेला. गुरू हरगोिबदजी यांनी भक्त व अनुयायांना संत सिपाही बनण्याचे आदेश दिले. मिरी व पिरी या दोन समशेरींचा त्यांनी वापर केला. त्यांच्या काळात मारवाडातून आलेला हा लोहार समाज शिखांच्या बरोबर राहिला. त्यांना हत्यारांचा पुरवठा करणे हे त्याचे काम. हत्यारांचे म्हणजेच तलवार, कृपाण आदी तयार करण्याचे त्यांचे कसब चांगले होते. त्याचबरोबर त्यांनी युद्धासाठी पूरक अशी धातूंची अनेक हत्यारं तयार केल्याचे उल्लेख आहेत. लोहगड किल्ल्यातील हत्यारांचे उत्पादन यांच्याकडून केले जात असे. दहावे गुरू गोिबद सिंह यांच्या काळात तर या समाजाने काही लढायांमध्येदेखील भाग घेतला. गुरू गोिबद सिंह यांच्या पुढाकारानेच हा समाज त्या वेळी शीख समाजाचा भाग बनला. शिकलगार ही उपाधी गुरू गोिबद सिंह यांनी दिली अशी माहिती मिळते. गुरू गोिबद सिंह यांच्यांबरोबरच हा समाज नांदेड येथेदेखील आला; पण त्यानंतर तो देशभर छोटय़ा छोटय़ा समूहांत विखुरला. आजदेखील विशिष्ट सणाच्या दिवशी नांदेड येथील गुरुद्वारातील हत्यारांच्या पॉलिशिंगचा मान या समाजाला दिला जातो.
     ब्रिटिश काळात शिकलगार समाज हा गुन्हेगार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचं कारण ब्रिटिशांनी केलेले कायदे. तलवार आदी हत्यारं तयार करणारा समाज म्हणजे धोकादायक असा संबंध त्यांनी लावला होता. मग हा समाज देशभरात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली येथे विखुरला. स्वातंत्र्यानंतर त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारणारं कलम रद्द झालं; पण आपल्याकडे अशा समाजाच्या उत्थानाबद्दल असणाऱ्या उदासीनतेचा हा समाज बळी आहे. आजही अनेक ठिकाणी शिकलगार समाजातील लोक दैन्यावस्थेत जगत आहेत. एक तर तलवारींच्या आणि धातूंच्या अन्य उत्पादनाची गरज जवळपास संपलीच आहे. त्यातच यंत्राचा वापर शिकलगारांच्या पारंपरिक कौशल्यावर घाला घालणारा ठरला आहे. आज देशात तलवारींचे उत्पादन करणारे जे अधिकृत व्यवसाय आहेत तेथे यंत्राचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असतो. दुसरीकडे कृपाण आदी वस्तूंचे उत्पादन हे चीनमधून मोठय़ा प्रमाणावर आयात केले जाते. अशा वेळी त्यांच्या हस्तकौशल्याचा वापर कमी होणे स्वाभाविकच आहे. त्यातच शिक्षणाचा अभाव. त्यामुळे शिकलगारांनी बेकायदेशीररीत्या हत्यारे तयार करून दिल्याचे उल्लेख अनेकदा बातम्यांमधून आढळतात.  काही वृत्तांनुसार या समाजाने नंतर देशी बनावटीच्या बंदुकादेखील तयार करायला सुरुवात केली. मध्य प्रदेशात दोन वर्षांपूर्वी एकाच वेळी ५०० पोलिसांनी खांडवा जिल्ह्य़ातील पांडोरी येथील जंगलात शिकलगार समाजाच्या वस्तीवर धाड घातल्याचे वृत्त ‘ट्रिब्युन’ने दिले होते.
      नांदेड येथील उत्पादक, व्यापाऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आले की, तलवारीसंदर्भातील कामे  शिकलगार मंडळी करतात. नगिना घाटाच्या जवळच त्यांची वस्तीदेखील आहे. २००८ पूर्वी नांदेडमध्ये या शिकलगार समाजातील लोक नगिना घाटाच्या जवळ लंगर साहिबच्या बाहेरील रस्त्यावर तलवारी घेऊन विक्रीला बसायचे, अशी माहितीदेखील मिळाली; पण २००८ नंतर या व्यवसायावर गंडांतरच आले. त्यामुळे आज नांदेडात उघडउघड तलवारी विकल्या जाताना पाहायला मिळत नाहीत; पण यातूनच वाढलेला अँटिक तलवारींचा बाजार मात्र बहरताना दिसत आहे.
    तलवारी तयार करण्यासंदर्भातील ही थोडीशी पूरक माहिती. पण आपल्याकडे तलवारींच्या वापराची क्रेझ नेमकी कशी आहे हेदेखील यानिमित्ताने पाहावे लागेल. आज आपल्याकडे अस्मिता मिरवण्याला अतोनात महत्त्व आले आहे. राजकीय पक्षांची व्यासपीठं असोत, लग्नाची वरात असो की शिवजंयतीची मिरवणूक तलवारीचा वापर तथाकथित प्रतिष्ठेचा असतो. आमच्या घराण्यात लग्नात तलवार लागतेच, असं अभिमानाने सांगितलं जातं. पुढे भाऊबंदकीत एका घराची चार घरं होतात. आणि त्या चार घरी लग्न असेल तेव्हा मूळ तलवारीसारख्याच आणखीन तीन तलवारी तयार करून घेतल्या जातात. यामुळे तलवारीची मागणी वाढतच राहते. सर्वच राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर कधी ना कधी तलवार प्रदान केल्याचा सोहळा दिसतो. अिहसेचा वारसा सांगणारेदेखील या तलवारी उगारून पोझ देत असतात. या दोन घटकांशिवाय तलवार घरी पूजेत असावी किंवा िभतीवर शोपीस म्हणून असावी असं वाटणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे.
या वर्गामध्ये सध्या मागणी आहे ती कर्नाटकी धोप या तलवारीला. मराठा सरदारांच्या तलवारी या मोगलांप्रमाणे जड नसायच्या. मराठी माणसाची शरीरयष्टी पाहता त्या कमी वजनाच्या पण मजबूत असत. वक्राकार तलवार ही मुस्लीम काळातील तलवार म्हणून ओळखली जाते. तर कर्नाटकी धोप हा प्रकार सध्या मराठेशाहीतील तलवार म्हणून सर्वाधिक लोकप्रिय आहे. आपल्याकडे शिवजयंतीच्या मिरवणुकीत असे धारकरी हमखास दिसतात.
      या हत्यारांच्या मागणीचादेखील एक ट्रेण्ड आहे. तो बऱ्याच अंशी अस्मितेशी निगडित आहे. काही वर्षांपूर्वी दांडपट्टय़ांना बरीच मागणी होती. तशीच मागणी सध्या कटय़ारींना आहे. ही दोन्ही शस्त्रं मराठय़ांची अस्सल शस्त्रं मानली जात असल्याने ही मागणी असावी. तर दुसरीकडे वरच्या वर्गातील संग्राहक सध्या सिरोही तलवार (वक्राकार असणारी गुजरातेतील तलवार) आणि समशेरीच्या प्रेमात आहेत. थोडक्यात अशा मागणीमुळे त्या त्या हत्यारांची बाजारपेठदेखील तेजीत चालते. कर्नाटकी धोप हा प्रकार सध्या किमान २० हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत विकला जातो.
       हे सर्व पाहता एक सहज साधा प्रश्न उपस्थित होतो. आपल्याकडे अशा अँटीक तलवारी आहेत तरी किती? मराठा सरदारांच्या तलवारी, ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगालांच्या काही तलवारी या आपल्याकडे अँटीक सदरात मोडणाऱ्या तलवारी म्हणता येतील. आज दोन-तीनशे वर्षांनंतरदेखील त्या तलवारी आपल्याकडे विक्रीला येत असतील तर त्यातील खऱ्या किती आणि खोटय़ा किती हा प्रश्न पडतोच. कर्नाटकी धोपाचा एकूण प्रसार पाहिला तर हे सर्व कर्नाटकी धोप काही मूळ नसून त्या प्रतिकृतीच आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजेच या तलवारी तयार करण्याचं काम कोणीतरी करत असतं. मग त्यातूनच हा तथाकथित अँटीक बाजार आकाराला येतो.
नांदेडात असा बाजार बऱ्यापकी जोर धरत आहे. त्यात कायदेशीर बाबी, गुन्हे वगरे मुद्दे तर आहेतच. पण त्याचबरोबर बनावट अँटीकच्या नादात मूळ अँटिक स्वरूप हरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत व्यवसाय असणाऱ्या ठिकाणी सांगून सवरून प्रतिकृती दिल्या जातात. त्यांना धार नसते. केवळ शिकलगारच नाही तर इतरही अनेक जण यामध्ये सहभागी आहेत. राजस्थानातील बलोत्रा येथील घोडे आणि जनावरांची जत्रा, पुष्कर मेळा, जोधपूर जत्रा अशा ठिकाणी आजही अगदी खुलेआम कटय़ार, कृपाण, तलवारींची दुकानं दिसून येतात. अमृतसरमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. तलवारी उपलब्ध करणारी काही संकेतस्थळं ऑनलाइनदेखील कार्यरत आहेत. थोडक्यात हा बाजार मोठय़ा प्रमाणात आहे. हे पाहता खरं तर अणुयुगामध्ये तलवारीची गरजच काय, असा प्रश्न पडू शकतो. पण एकूणच मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात डोकावले तर लक्षात येते की दगडाची हत्यारं वापरणारा माणूस ते तलवार वापरणारा माणूस हा क्रांतिकारी बदल होता. या तलवारीच्या जोरावरच युरेशियातील छोटय़ा समूहाने जगातील अनेक मोठय़ा समूहांना नमवले होते. त्यातूनच मानवाच्या साम्राज्य विस्ताराची सुरुवात झाली. मानवाची तलवारीशी जवळीक अनादी काळापासून आहे. कदाचित हीच ओढ त्याला पुन:पुन्हा खेचून नेत असावी.
विष्णुपुरी धरण
maxresdefault
गोदावरी नदीवर बांधलेले हे आशियातील सर्वात मोठे लिफ्ट सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प जवळ जवळ 8 कि.मी. असरंजन गावात आहे. नांदेड शहरापासून हा प्रकल्प 1988 मध्ये पूर्ण झाला. या पाण्याचा वापर 40 किलोमिटर इतका आहे. गोदावरी नदीची लांबी प्रकल्पाचे कल्चरल कमांड एरिया 23222 आहे. आणि महत्त्वाचे आदेश क्षेत्र 1 9 14 हेक्को आहे.
आता पर्यंत 15856 हेक्साचे सिंचन क्षमता तयार आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार आणि लोहा तालुक्यात या प्रकल्पाचा आदेश क्षेत्र वितरित केला जातो. प्रकल्पांची थेट साठवणूक 80.79 दशलक्ष घनमीटर आहे ज्यापैकी नांदेड शहरासाठी 43.95 दशलक्ष घनमीटर साठवण राखीव आहे आणि 10.26 दशलक्ष घनमीटर साठवण औद्योगिक उद्दिष्टांसाठी राखीव आहे. मोठे धरण 18 उभे दरवाजे आहेत. या प्रकल्पाच्या संकल्पनेची अंमलबजावणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण म्हणूनच त्यांच्या स्मृती मध्ये शासकीय महाराष्ट्रातील शंकर सागर जलशयास या नावाने जलसंपत्तीचे  नाव देण्यात आले आहे. प्रचंड जलसाठ्यांसह, कलेश्वर मंदिर, लँडस्केपिंग, घाट आणि रत्नाश्वरी पर्वत हिची आसपासची ती ठिकाणे यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी यात्रेकरूंसाठी यात्रेकरू नसतात. गोदावरी नदीवर स्थित आशिया उप-उपनगरातील हा सर्वात मोठा लिफ्ट सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे नाव डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प असे करण्यात आले आहे.
काळेश्वर मंदीर
04_full
श्रीक्षेत्र काळेश्वर हे नांदेड शहराला लागून असलेले शांत निवांत तीर्थक्षेत्र आहे. नांदेड-लातूर रस्त्यावर शहरापासून सात किलोमीटरवर काळेश्वर आहे. मंदिर अत्यंत प्राचीन आहे. मंदिर उभारणीचे संदर्भ मध्ययुगातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर यादवकालीन कलेचा नमुना आहे. मूळ मंदिर 13 व्या शतकातील असून 20 व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराला लागूनच गोदावरी  नदीवर उभारलेला आणि विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प आहे. कै. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रकल्पाच्या जलाशयाला शंकर सागर जलाशय म्हणून ओळखले जाते. या अथांग जलाशयात सायंकाळच्या वेळी नौकाविहाराचा मनमुराद आनंद लुटता येतो.
दत्त मंदिर तिर्थक्षेत्र संस्थान
maxresdefault
  श्री दत्त मंदिर तिर्थक्षेत्र संस्थायन हे नांदेड तालूक्यात मौ.वाहेगाव येथे आहे. सदर मंदिर जवळपास 300 वर्षापासून नांदेडच्याद बाजूने वाहणा-या गोदावरी नदी काठी वसलेल आहे. या मंदिरास मोठे वैभव प्राप्त आहे. हे नांदेड शहरापासून जवळपास 10 कि.मी. अंतरवर आहे.
मरळकचे महादेव मंदिर
marlak mahadev.png
नांदेड तालूक्यात.मरळक बु. येथे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर आहे. सदर मंदिराच्या‍ ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते.ह्या मंदिरात अति प्राचीन मूर्ती आहेत ह्या मंदिरात भाविकांची नेहमीच उपस्थिती असते. ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला तरोडा नाका नांदेड बस स्टॉप पासून ऑटो किंवा बस मिळेल.

शंखतीर्थ

shankhtirth
    नांदेडपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शंखतीर्थ गाव गोदावरीच्या तटावर वसलेले आहे. विशिष्ट प्रकारचे शंख याठिकाणी आढळतात. गोदावरीचे नाभिस्थान हेच असल्याचे सांगितले जाते. चालुक्यकालीन स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेले नरसिंहाचे मंदिर येथे आहे.महाराष्ट्रात यादवाची सत्ता होती. यादवांचा काळ म्ह‍णजे सुवर्ण काळ म्हपणुन संबोधला जाते कारण याच काळात यादवांची राजधानी देवगीरी (दौलताबाद) ला जगाची बाजारपेठ म्हणून मोठे स्था्न मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे यादवांच्या राज्याच हेमांद्री पंडीत नावाचा एक प्रधान होता. त्यााला वास्तु कलेविषयी आवड होती.आणि त्या‍च्या कलेच्याच आवडीतुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वास्तु निर्माण करण्यारत आल्यास त्यालाच हेमाडपंथी मंदीर असे म्हणतात. त्याच मंदीरापैकी मुदखेड तालुक्यावतील शंखतिर्थ या ठिकाणी गोदावरी नदी काठावर नरसिंहाचे मंदीर बांधण्यात आले आणि काही आभ्यासकाच्या मते दोन मंदीरे आहेत असे सुध्दा समजले जाते एक मंदीर नदीकाठावर आहे. आणी दुसरे मंदीर नदीमध्ये आहे आणि या दोन्ही मंदीरामध्येध भुयारी रस्ता असल्याचे सुध्दा सांगितले जाते, आणि आज सुध्दा भुयार रस्ता भग्न अवस्थे‍त पहायला मिळतो. मंदीराचे बांधकाम पाहील्यास सर्व यादवकालीनच आहे हे सुध्दा सिध्द होते. आतिल गाभा-यातील दगडावर कोरलेले नक्षीकाम आजही पर्यटकाला मोहरुन सोडणारे आहे. ही ऐतिहासिक पार्श्वभुमी सांगीतली जाते. धार्मिक दृष्टया मुदखेड तालुक्याातील सर्वात जुने मंदीर म्हणुन पाहीले जाते. एकंदरीत गोदावरी नदीच्या नांभीचे ठिकाण असाही उल्लेख केला जातेा म्हणुन या ठिकाणी आजही हजारो भाविक भेट देतात. म्हणुन महाराष्ट्र पुरातत्वे खात्याने या मंदीराचा जिर्णोध्दार करण्यांचे काम केले आहे. आणि आजही यादवकालीन इतिहासाचे अभ्यासकांला ऐतिहासिक वास्तु अभ्या्सकांनी व पुरातत्व खात्याने त्याजकडे लक्ष देवून गुपित असलेला इतिहास माहिती करुन देण्यायस वाव आहे.
या पर्यटन स्थळांखेरीज केदारगुडा येथील निसर्गरम्य परिसरातील हेमाडपंथी मंदिर, राहेर येथील यादवकालीन नृसिंह मंदिर, नांदेडमधील मध्यकालीन बडी दर्गा आदी स्थळेदेखील ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून परिचीत आहेत. पर्यटनासोबत वारंग्याची खिचडी आणि लोह्याच्या दही-धपाट्याची लज्जतही पर्यटकांना चाखता येते. नांदेडच्या शेजारील जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ तसेच बासर येथील प्रसिद्ध सरस्वती मंदिरास नांदेड मुक्कामी राहून भेट देणे शक्य होते.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा

श्री खंडोबा रायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव एक आहे. मराठवाड्याची ही सर्वात मोठी ग्रामदेवता आहे. नांदेड-लातूर मार्गावर माळावर वसलेल्या या गावात प्रवेश करताच खंडोबाच्या मंदिराच्या परिसरातील भव्य कमान नजरेस पडते. कमानीच्या उजव्या हातास मंदिराची इमारत आहे. मंदिराचे बांधकाम 17 व्या शतकातील आहे. माळेगावची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष (कृ.) महिन्याच्या 14 व्या दिवशी भरविली जाते.
Malegaon-yatra1
माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान कलामहोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येत असतात. ही यात्रा उत्कृष्ट प्रतीच्या पशुधनाच्या व्यापारासाठी देशात प्रसिद्ध आहे. नांदेडचे स्थानिक लाल कंधारी वळूदेखील येथील पशुप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असते. येथील घोड्यांचा व्यापार विशेष प्रसिद्ध आहे.मालेगांव लोहा तालुक्यात स्थित आहे. हे गाव भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यात प्रसिद्ध आहे.मालेगाव नांदेडपासून सुमारे 57 कि.मी. अंतरावर आहे.
श्री सत्यगणपती देवस्थान दाभड ता.अर्धापूर
satyaganpati.png

.अपंरपार महादेव मंदिर पाटनूर, ता.अर्धापूर

Screenshot_2017-07-31-16-03-00.png

महाविहार बावरी नगर दाभड, ता.अर्धापूर

Screenshot_2017-07-31-16-03-10

अडीच हजार वर्षांपूर्वी गोदातटीच्या निबीड अरण्यात अश्मक आणि मुलक जनपदे अस्तित्त्वात होती. अश्मक जनपद नांदेड परिसरात बोधन याठिकाणी होते. या जनपदातील एक जिज्ञासू सिद्धार्थ गौतम बुद्धांची ख्याती ऐकून गोदातटावरून त्याकाळी कपीलवस्तूला प्रयाण करता झाला. गौतम बुद्धांच्या तत्वचिंतनाने तो भारावला आणि बुद्धचरणी लीन झाला. त्याने बौद्धधर्म स्वीकारला. त्याची ही स्मृती लोकपरंपरेने बावरीजातक कथेच्या स्वरुपात जोपासली आहे. या लोकस्मृतीचे पुनर्जीवन बावरीनगर महाविहाराच्या रुपाने नांदेडपासून 10 किलोमीटरवरील दाभड येथे झाले. या परिसराचा विकास शासनामार्फत करण्यात येत आहे.
महादेव मंदिर कैलास गड भेाकर
Screenshot_2017-07-31-16-07-43
भोकर शहराच्या मध्यमभागी, एक गड असुन सदर गडाला कैलासगड असे नाव आहे. सदरचे ठिकाण हे भोकर शहरामध्येच असुन भोकरमध्‍ये येण्याासाठी राष्ट्रीदय महामार्ग व लोहमार्ग उपलब्ध आहेत. मंदिराचे ठिकाण भोकर बसस्थानकापासुन खाजगी ऑटो किंवा खाजगी वाहनाव्दा‍रे ५ ते १० मिंनीटाच्या अंतरावर आहे. कैलास गडावर पुरातन काळापासुनचे हेंमाडपंथी महादेव मंदिर आहे. महादेव मंदिर गट क्र २६१ मध्ये असुन मंदिराच्या परिसराचे एकुण क्षेत्रफळ ३.८५ हे.आर एवढे आहे. महादेव मंदिराचा कारभार पुर्वी बिलोली तालुक्यातील कोळंबी ह्या गावाच्या ट्रस्टव्दारे चालत होता. सद्यस्थितीमध्ये महादेव मंदिराचा कारभार भोकर येथील श्री उत्तमबन गुरु ज्ञानबन हे महाराज पाहतात. सदरील महादेव मंदिराचे कळस दिनांक २६ जानेवारी २०१५ रोजी बसविण्यात आला आहे.सदर मंदिराच्या परिसरामध्ये् सन १९९३-९४ या वर्षामध्येि अंदाजे ०.८१ आर क्षेत्रामध्ये श्री दत्त मंदिराची स्था पणा करण्यायत आली आहे. कैलास गडावर मंदिराच्या बाजुलाच एक मोठे तळे आहे. प्राचिन काळापासून या तळ्यामध्येम श्री गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते. कैलासगडाच्या पायथ्याशी देखील महादेवाचे एक प्राचिन मंदिर आहे. सदर मंदिराच्या परिसरामध्ये् दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या यात्रेचे आयोजन करण्याात येते.

श्रृंगऋषी देवस्थाडन मौजे रेणापुर ता भोकर

भोकर तालुक्यामध्ये सावरगाव माळ,देवठाणा व रेणापुर या तीन्ही गावांच्यामध्ये. रेणापुर हद्दीमध्ये वसलेले थोर तपस्वी श्री श्रृंगऋषी महाराज यांचे प्रेक्षणीय आश्रम आहे. मंदिराचे ठिकाण भोकर पासुन ५ ते ६ किमी अंतरावर असुन तेथे जाण्या्साठी ऑटो किंवा खाजगी वाहनांनी जावे लागते. तपस्वी श्री विष्णुसदत्तीबाबा यांनी अंदाजे ६० वर्षापुर्वी श्री श्रृंगऋषी महाराज यांचे मंदिर बांधले आहे. मंदिराचा परीसर अंदाजे १.६० हेक्टार आर असुन मंदिराच्यात परिसरामध्येद अंदाजे ४० वर्षापुर्वी बांधलेले प्राचिन महादेव मंदिर देखील आहे.
 सदर देवस्थानाची देखभाल पुर्वी श्री विष्णदत्ताबाबा हे पाहत असत. विष्णुीदत्ती बाबा हे देखील थोर तपस्वी असुन त्यांना आयुर्वेदाची चांगली माहिती असल्याचे सांगीतले जाते. अंदाजे २५ ते ३० वर्षापुर्वी काशीचे जगतगुरु यांचे हस्ते‍ श्री श्रृंगऋषी मंदिराच्या कळसाचा कार्यक्रम पार पाडण्या्त आला आहे. सद्य स्थितीमध्ये श्री आप्पाराव देशमुख सोमठाणकर हे श्री श्रृंगऋषी देवस्थाजनाचा कारभार पाहतात. दत्त‍ जयंतीच्या दिवशी तसेच श्रावण महिन्यामध्ये श्री श्रृंगऋषी देवस्थानामध्ये भावीकांची गर्दी असते. तसेच कार्तीक महिन्यामध्ये येथे दरवर्षी शक्तचा कार्यक्रम आयोजीत केला जातो.मंदिराच्या परिसरामध्ये पुर्वबाजुस उत्तर- दक्षिण असा वाहणा-या नाल्या्च्या पात्रामध्ये एक झरा असुन तो झरा बारा महिने वाहत असतो. तो झरा किशी येथुन वाहत आलेला आहे. असे सांगितले जाते. मंदिराच्याी जवळच सिता नदिवरील सुधाप्रकल्पाचा अतिशय नयन रम्य जलाशय आहे.
मातासाहेब गुरूव्दारा, मुदखेड तालुका
हिराघाटपासून अर्धा किमी अंतरावर मुगटनजिक मुदखेड तालुक्यात असलेले मातासाहेबजी गुरूव्दारा शिख धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून मानले जाते. नांदेड येथील अन्य गुरूव्दारात मातासाहेब गुरूव्दारास अनन्य् साधारण असे महत्व प्राप्त आहे. 250 एकर जमिनीसोबत मातासाहेब गुरूव्दा्राची निहांगसिंग यांच्या देखरेखीखाली पार पाडली जाते. गुरूगोविंदसिंगजी दखनमध्ये आल्या‍नंतर सदर ठिकाणी मातासाहेबांनी ध्यान धारणा तपस्यात केली त्यामुळे सदर स्थळास पावितत्र्य प्राप्त‍ होते.गुरूगोविंदसिंगजी यांनी दुपारचे जेवण याठिकाणी घेतल्यापासून आजतागायत येथे गुरू का लंगर सुरू आहे यात्रेकरूना सेवा भावे मध्यांन्ह भोजनाची व्यवस्था केली जाते. 
शिकार घाट, मुदखेड तालुका
maxresdefault
  शिख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंघजी दख्खनच्या धर्तीवर आले तेंव्हा शिकार खेळत खेळत शिकारघाट येथे आल्याची आख्यायिका आहे. शिकार करतांना त्यांनी एक सस्याची शिकार केली त्या वेळी औरंगजेबाचा मुलगा बहादरशहा गरुंजीसोबत होता. तो म्हणाला “ महाराज मारायचाच होता तर एखादा मोठा प्राणी मारायचा होता एका छोटया सस्याला का मारलात?” यावरुन गुरु गोविंदसिघांनी तो ससा म्हणजे मुला खत्री होता जो की शिखधर्माचे दहावे गुरु गुरुनानक देवजी यांचा सेवक होता. ती शिकारी नव्हती उध्दार होता असे सांगितल्याची आख्यायीका परिसरात सांगितली जाते. त्यावरुन सदर स्थानास शिकार घाट असे नाव पडले. व गुरु गोविंदसिंघाच्या पदस्प‍र्शाने ही भुमि पावन झाली असल्याने शिख धर्मात सदर ठिकाणास अत्यंत महत्व आहे

शितलादेवी बारड, मुदखेड तालुका
बारड येथील शितलादेवी ही जागृत देवता म्हणून प्रसिध्द असून पोचम्मा , पोचम्माेदेवी, शितलादेवी हे नाव तेलगू असून आंध्रप्रदेशातील भाविकांच्यामते, देवीचे मुळ स्थान आंध्रात आहे. नंतर देवीने बारड येथे वास्तव्य केले. शितलादेवीची मोठी बहिण म्हाणून गडचांद्याची आई मानली जाते.
 चैत्र गुडी पाडव्यालपासून बारड येथे देवीची यात्रा भरते. गडचांदयाच्या आईचे दर्शन घेऊन हजारो भाविक भक्त गण बारड येथील देवीच्यास दर्शनास येतात. नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नऊ दिवस किर्तन भजन, गोंधळ असे कार्यक्रम होतात. तसेच आरंभीच्या दिवशी दुधाच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. स्वांतत्र्यापुर्वीच्या बारड जमाबंदी संचिकेवर जिम्मे पुजा पोचम्मापदेवी इलाखे बारड नऊ, बिघे रूपया तेरा असा उल्लेख आहे.

मुखेडची ऐतिहासिक बारव

नांदेडपासून 85 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुखेड शहरात राष्ट्रकुट चालुक्यकालीन स्थापत्याचे नमुने पाहायला मिळतात. येथील दशरथेश्वर मंदिर आणि नागनाथ मंदिरात उत्कृष्ट शिल्पकला पाहायला मिळते.
सुंदर अशा बारवसाठी मुखेड प्रसिद्ध आहे. 10व्या आणि 11व्या शतकातील मंदिरे तीर्थकुंडाशेजारी स्थापित झालेली दिसतात. या तीर्थकुंडांना बारव म्हटले जाते. मुखेडमध्ये अशाच स्वरूपाचे बारव दशरथेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस आहे.
ग्रामदैवत श्री. विरभद्र स्वामी ऐतिहासीक मंदीर
Screenshot_2017-07-31-16-06-52.png
ग्रामदैवत श्री. विरभद्र स्वामी ऐतिहासीक मंदीरकर्नाटकातील बस्वकल्याण यांनी मुखेड शहरात विरभद्र यांच्या मुर्तीची स्थापणा केली. काही काळानंतर तेथे वस्ती झाली. अशी श्रद्धा आहे की विरभद्र नवसाला पावतो. मुर्तीच्या मुखाला चांदीचे नाक, डोळे, मिश्या लावलेल्या आहेत. डोक्यावर चांदीचा मुकूट आहे. या भागात कापसाचे पिक भरपुर मिळते त्यामुळे विरभद्राला कापसाची माळ चढविण्यात येते. कार्तीक पोर्णीमेपासुन पाच दिवस येथे यात्रा भरते. बसस्थानकापासुन मंदीराचे अंतर 2 कि.मी आहे.
ऐतिहासीक महादेव मंदीर,ता.मुखेड
Screenshot_2017-07-31-16-07-16.png
 महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी असलेले शिवमंदिर हे इसवी सनाच्या अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असा अंदाज आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराच्या गर्भगृहात एक मीटर उंचीच्या भद्रपीठावर शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील मंडोवरावर मूर्तिशिल्पे आहेत. चौरस तळखडा, त्यावर अष्टकोनाकृती आणि वर्तुळाकृती घटक, त्यावर शीर्ष आणि कीचकहस्त असा सामान्यपणे मंदिरातील स्तंभांचा घटकक्रम आहे.
     श्रावणाला दशरथाचा बाण लागुन तो मरण पावल्याने पापक्षालनार्थ राजा दशरथाने या ठिकाणी यज्ञ केला व शिवलिंग स्थापण केले. म्हणुन याचे नाव दशरथेश्वर असे पडले. आष्टाग्रहीचे वेळी अंदाजे 1968 चे सुमारास श्री. हरिहरमहाराज दिक्षीत यांनी यज्ञ केला होता. बसस्थानकापासुन या मदीराचे अंतर 3 कि.मी. आहे.
     विविध रोगांचा नाश करणाऱ्या देवीसुद्धा प्रसिद्ध आहेत. जसे शीतलादेवी, मरीआई, गुडघेमोडी माता. विशिष्ट रोग झाल्यावर विशिष्ट देवतेची उपासना केली म्हणजे तो रोग बरा होतो ही समज अगदी प्राचीन काळापासून बघायला मिळते. नांदेड जिह्यातल्या मुखेड गावातील महादेव मंदिरात ही देवी बघायला मिळते. या मंदिरावर असणारी ज्येष्ठा अथवा अलक्ष्मी म्हणजे दुर्मीळ शिल्प आहे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले, पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. दक्षिण हिंदुस्थानात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. मुखेडच्या महादेव मंदिरावरील ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्भुज असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे तर एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातलेला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाळा खाली लोंबते आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव दिसते आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे. अभ्यासक तर तिथे जातीलच, पण खरे तर सर्वांनीच अशा आगळ्यावेगळ्या देवींचे दर्शन अवश्य घ्यायला हवे. 
बासरची श्री महासरस्वती :-
नांदेड - निजामाबाद रेल्वे मार्गावर धर्माबादनंतर १० कि. मी . अंतरावर बासर हे रेल्वेस्टेशन आहे. स्वातंत्र्यपूर्वी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हे गाव होतं, मात्र राज्य पुनर्रचनेच्या वेळी ते आंध्र प्रांतात गेले.  या घटनेला ही जवळपास पंचेचाळीस वर्ष होताहेत. तरीही या गावावर मराठी संस्कृतीची जबरदस्त पकड आहे. 
आज मध्यम लोकवस्तीचं जरी हे गाव असलं तरीही हजारो वर्षांची परंपरा या गावाला आहे, या परिसराचं प्राचीनत्व महाभारत पूर्वकालापर्यंत जातं , महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी पाच हजार वर्षांपूर्वी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ' महाभारता' सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले. आचार्य परंपरेत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे.
       ज्या परिसरात महर्षी व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
संपूर्ण भरत खंडात हे एकमेव श्री महासरस्वतीचं मंदिर आहे.
 त्यामुळे देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. अनेकजण अनुष्ठानं करतात. 
श्री महासरस्वतीचं मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती जवळपास तीन फूट आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अर्ध्या भागात देवघर, गाभारा तर अर्ध्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पवित्र पादुका देवीपासून थोड्या अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचं शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते. देवीला दही-दुधाचे स्नान घातल्यानंतर जे तीर्थ बाहेर येते त्याला सोमसूत्र असे म्हणतात. भक्त मोठ्या श्रद्धेने ते प्राशन करतात.
जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे.
       मंदिरासमोरच्या टेकडीवर अगदी जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे. म्हणजे या पवित्र क्षेत्री श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री महालक्ष्मी या त्रिगुणात्मक महाशक्तीची महर्षी व्यासांनी प्रतिष्ठापना करून अखिल मानवजातीचं कल्याण केलं, या जगन्माऊलीच्या दर्शनानं आयुष्यातील दुःख, संकट संपून मनाला सात्विक समाधान लाभते. म्हणून शेकडो माणसं इथे अनुष्ठान करतात.
अन्य शक्तीपीठात भक्तगण प्रामुख्याने नवरात्रात घटी बसतात, अनुष्ठानं करतात पण बासर येथील सरस्वती मंदिरात अखंड सप्तशतीचं पाठ चालू असतात. अनेक सत्पुरुषांनी, संतमहंतांनी चा पवित्र क्षेत्री अनुष्ठानं केल्याची नोंद सापडते.
        ' दुर्गे दुर्गट भारी' या आरतीचा कर्ता नरहरी मालू यांनी श्री महासरस्वतीच्या मंदिरात किती तरी वर्षे अनुष्ठानं केली. ज्या गुहेत अनुष्ठानं केली ती गुहा आजही पहावयास मिळते. भक्तगण मोठा श्रद्धेनं या गुहेचं दर्शन घेतात, श्री शंकराचार्यांनी येथे अनुष्ठान केलं होतं तर अनेक योगी पुरुषांनी इथे यज्ञ केल्याची नोंद कागदपत्रात सापडते. धवलवस्त्र परिधान केलेली महासरस्वती भक्ताच्या कल्याणासाठी इथ उभी आहे. भगवती कल्यणदायी आहे.
     देशभरात देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. त्यात बासर येथील श्री महासरस्वतीचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञान हाच माणसाचा खरा अलंकार आहे. जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे. सरस्वतीच्या आशीर्वादाने माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं, कविकुल गुरू कालिदास याचं उदाहरण आहे. नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्‍याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन्‌ फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.
      माघ वद्य १४ पासून फाल्गून शुद्ध प्रतिपदेपर्यंत येथे फार मोठी यात्रा भरते. अन्नदानही मोठ्या प्रमाणात होते. यावरून याच काळात महर्षी व्यासांनी श्री महासरस्वतीनं दर्शन दिलं असावं, किंवा महर्षी व्यासांनी प्राणप्रतिष्ठा केलेली असावी म्हणूनच हजारो वर्षांपासून या काळात आनंदोत्सव साजरा केला जातो.
        दगडावर रचलेली दगडे या परिसरात आणखी एक आश्चर्य पहावयास मिळते. भल्या मोठे दगडावर दगडं इथे रचलेले आहेत, या संदर्भात कथा व लोककथा प्रचलित आहेत. लंकाधीश रावणाने सीता देवीला पळवून नेत्यानंतर प्रभू रामचंद्र अस्वस्थ झाले. वानर सेनेने शोध सुरू केला. शोध घेता घेता मारूतीराय या परिसरात आले व त्यांनी आपण आल्याची खूण म्हणून दगडाची उतरंड रचली अशी कथा लोकगीतातून, लोककथेतून आढळते, तरीही या प्रंचंड मोठा दगडाची उतरंड कुणी रचली? व का रचली? का हा निसर्गाचा चमत्कार आहे? या प्रश्नाचं नेमकं उत्तर आजपर्यंत कुणालाही गवसलं नाही, असाच चमत्कार कर्नाटक प्रांतातील हम्पीजवळ दिसतो. तिथेही अशाच लोककथा सांगितल्या जातात, सुग्रीव, वाली, हनुमान या महाबलीचा, वानरराजाचा हा परिसर आहे. बासरजवळील दगडाच्या उतरंडीतून पितळी भांड्यांसारखा आवाज येतो, हे एक फार मोठे आश्चर्य आहे.
       श्री महासरस्वती मंदिरासमोर कांही अंतरावर एक भव्य सरोवर आहे. कधीकाळी हे उत्तम बांधलेलं होतं, पण आज मात्र ढासळलेला आहे. या तलावातील पाणी कधीच आटत नाही या तलावाला अष्टतीर्थ असेही म्हणतात. कारण या तलावाच्या काठी हजारों वर्षांपूर्वी इंद्र, वरूण, यम, कुबेर, वायू, चंद्र यांनी तपश्चर्या केल्यामुळे हा तलाव अमरतीर्थ म्हणून ओळखला जातो तर मंदिरासमोर पिंपळ-लिंब, औदुंबर वृक्ष श्री महासरस्वतीवर चवर्‍या ढाळीत आहेत. श्री महर्षी व्यासांनी स्थापन केलेली श्री महासरस्वतीची मूर्ती अत्यंत रेखीव अन्‌ प्रसन्न आहे की, समोर कितीही वेळ बसलो तरी मन तृप्त होत नाही. एवढं देखणं रूप आहे. महर्षी व्यासांनी ते शब्दबद्ध केलं आहे.
या कुन्देंदुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता।
या वीणावरदण्डमंडित करा या श्वत पद्मासना॥
या ब्रम्हाच्युतशंकर प्रभूर्तिभिः देवैः सदा वंदिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा॥
        शुभ्र वस्त्र परिधान केलेली, वीणाधारिणी, सुहास्यवदना श्री महासरस्वती पांढर्‍या कमलदलावर अत्यंत शोभून दिसते, दिव्यत्वाचा, मांगल्याचा साक्षात्कार होतो, अशा महासरस्वतीला सृष्टीनिर्मात्या ब्रह्मदेवापासून श्री शंकरापर्यंत सर्वच देव वंदन करतात, दर्शनानं आयुष्याचं कल्याण होतं, म्हणून देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनास येतात.
विद्यां देहि सरस्वती बुद्धिं देहि सरस्वती।
ज्ञानं देहि सरस्वती मुक्ति देहि सरस्वती॥
माहिती सौजन्य- श्री.निखिल बागडे
श्रीक्षेत्र माहूरगड
   नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे. (धार्मिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना हिंदू धर्मातील परंपरेत 'श्रीक्षेत्र' पूर्वजोडित केले जाते). ते नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.माहूर चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढले आहे. देवीचे मंदिर, तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची मंदिरे माहूरगड या नावेने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर आहेत आणि पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेली आहेत.महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी माहूरचे श्री रेणुकादेवीचे स्थान पूर्ण पीठ मानले जाते. समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंचीवर असलेल्या दोन शिखरांच्या टोकावर श्री दत्तात्रय आणि रेणुकादेवीचे स्थान आहे. गडाच्या परिसरात माता अनसुया आणि परशुरामाचे मंदिर आहे. माहूर ही गोंडांच्या आदिवासी राज्याची राजधानी होती. पुराणकाळातील परशुरामाच्या कथा या भागात प्रचलित आहेत. ऋषीमुनींची तपोभूमी  म्हणूनही माहूरचे प्राचीन काळापासून महत्त्व आहे. देवीच्या मानसपूजा, भोजीपूजा आणि अलंकारपूजा अशा तीन पुजा आहेत. या पुजेनंतर पानाचा विडा 'तांबुल प्रसाद' म्हणून देवीला अर्पण केला जातो. माहूरला मूळ पीठ म्हटले जाते.
श्रीक्षेत्र माहूर हे नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. पण त्याचबरोबर ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.
रेणुका जन्माची आख्यायिका
भागिरथी नदीच्या तीरावर सूर्य वंशीय रेणु राजा प्रजापालनदक्ष होता. पण त्यास संतती नसल्यानं तो फ़ार उदासीन असे. नंतर त्यानं कन्याकामेष्टि यज्ञ केला. त्या यज्ञकुडांतून श्री रेणुका उत्पन्न झाली. ही अयोनीसंभव होती. तिला पाहून राजास फ़ार आनंद झाला. तिचं पालनपोषण करण्यात राजाराणीचे दिवस उत्तम त-हेनं जाऊ लागले. ही शक्ती पार्वतीचा अवतार होती. ती लावण्यसंपन्न असून गुणानं अत्यंत तेजस्वी असल्यानं तिला क्षत्रिय पुत्र कोणीच मागनी घालीना. शेवटी राजानं तिचं स्वयंवर करण्याचं ठरविलं. स्वयंवरास ऋचीक व त्यांचा पुत्र जगदग्नि आले होते. पुष्कळ राजपुत्रही होते. रेणुकेनं जगदग्नि पति समजून त्याच्या गळ्यांत पुष्पमाला घातली. त्यावेळी इतर राजांनी जगदग्नीशी लढाई केली. त्यांत जगदग्नि यशस्वी झाले. नंतर त्यांचे लग्न मोठया थाटांत झालं. रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहे. विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचंच रूप आहे. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे.

Mahurजमदग्नि ऋषी...
जमदग्नि हे भगवान शंकराचे अवतार मानले जातात. ते अत्यंत रागीट होते. त्यांचा आश्रम नर्मदा तीरावर होता. तिथं हाटकेश्वर तीर्थ होतं. एकदा हे लीलेनं बाण आणण्यास रेणुकेस सांगत होते. ती वेळ कडक उन्हाची असल्यामुळं रेणुका दमली व विश्रांतिस्तव एका झाडाखाली बसली व विश्रांती घेऊ लागली. थोडी विश्रांती घेऊन बाण घेऊन गेल्यावर जगदग्नींनी मोठ्या रागानं बाण आणण्यास का उशीर झाला, असं विचारलं. रेणुकेनं सूर्याचा ताप झाल्यानं थोडी विश्रांती घेऊन आल्याचे सांगताच ते सूर्यावर संतापले व बाणानं सूर्याचा वेध घेण्यास तयार झाले. तेव्हा त्यांना सूर्य शरण आला व त्याने त्यांना छत्री व पादत्रानं दिली. शिवाय मी तुझ्या पोटी येईन असे जमदग्निस सांगितलं. पुढं तो परशुरामाच्या रुपानं जमदग्निच्या पोटी जन्मला अशी कथा विष्णुधर्मोत्तरांत १-३६ त व महाभारत अनुशासन पर्वात ९४-९५ अध्यायांत आहे.
        एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
       त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले.!! तसेच कालांतराने माहूर ला (मा=मायेच,(आई) हूर:-हृदय) "आई चे हृदय" असलेले ठिकाण म्हणजे "माहूर " असे संबोधले जाऊ लागले .
श्री रेणुका माता
रेणुकादेवी मंदिर

दत्तात्रेय मंदिर
     पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.
      माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अध्याय ३०) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.
    माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनी सध्याचे मंदिर सन १२९७ मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त १०' X १२' या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.
   या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिऱ्या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. 'माळवातीर्थ' म्हणून ओळखले जाणारे तीर्थ म्हणजे महानुभावी साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.
      मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, किनवट तालुका येथील माहुरगडावर श्रीदत्तात्रेय, श्रीरेणुका, अनसूया इत्यादींचा निवास असल्याने दत्तभक्तांना माहूरची ओढ नेहमीच असते. माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून येथे दत्तात्रेय निद्रेसाठी येतात असा समज आहे. स्कंदपुराणातील सह्याद्रिखंडात रेणुकामाहात्म्य आणि कालिकाखंडात आमली (माहूर)- माहात्म्य अशा दोन कथा आल्या आहेत. ब्रह्मदेवास सृष्टीची रचना करण्यास सोयीचे व्हावे म्हणून विष्णूंनी एक नमुना म्हणून सृष्टीच्या अगोदर हे क्षेत्र सात कोस लांब व सात कोस रुंद अशा विस्तृत प्रमाणावर निर्माण केले. या क्षेत्राला चार दरवाजे आहेत.
१) पूर्वेकडील हाटकेश्र्वर असून येथे बंजरा नदीवर धबधबा आहे.
२) दक्षिणेस पैनगंगेच्या काठी फुलसावंगी गावाजवळ एका टेकडीवर विमलेश्र्वराचे स्थान आहे.
३) पश्र्चिमेस इज़नी गावाजवळच्या पहाडात दर्दरेश्र्वर आहे.
४) उत्तरेकडे सिद्धेश्वर व कापेश्वर अशी स्थाने आहेत.
माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते. नदी ओलांडून गेल्यावर दोनचार मैलांवर पहाडाच्या पायथ्याशी माहुरक्षेत्र हे गाव आहे. रेणुकामाता, दत्तात्रेय व अनसूया यांची शिखरे गावाच्या पार्श्र्वभूमीस लागून स्वतंत्रपणे आहेत. पैनगंगा नदीसही पौराणिक पार्श्र्वभूमी आहे. विदर्भातील लोणारक्षेत्रात लवणासुरास विष्णूंनी मारले. म्हणून ब्रह्मदेवाने श्रीविष्णूचे पाय कमंडलूतील पाण्याने धुतले. भगवंताच्या चरणतीर्थातून पावन होणारी जी नदी ती पैनगंगा झाली. हिलाच पुढे प्रणिता अथवा प्राणहिता असे नाव मिळाले.
       ‘प्रणिता प्रदक्षिणा वाहते । दुजें वैकुंठ महीवतरें’ असा महिमा या क्षेत्राचा विष्णुदासांनी वर्णन केला आहे. आमलीग्राम, सिद्धपूर, देवनगर, मातापूर अशी विविध नावे निरनिराळ्या युगात या क्षेत्रास मिळालेली दिसतात. काशीक्षेत्रापेक्षाही याचे महात्म्य मोठे असल्याने ‘जवा आगळी काशी’ असे माहूरसंबंधाने म्हटले जाते. काशी क्षेत्रास जसा काळभैरव तसा या क्षेत्रास झंपटनाथ हा क्षेत्रपाल कोतवाल आहे.
मातापूरचा तांबूलप्रसाद...
परशुरामाला या डोंगरावर मातेचं दर्शन झालं म्हणून याला 'मातापूर' म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात 'ऊर' म्हणजे गाव ते 'माऊर' म्हणतं. त्याचंच पुढं ' माहूर ' झालं..!! आदिमाया रेणुका, एकवीरा, पार्वती या नामानं प्रसिध्द आहे. रेणुकामातेची तांबड्या रंगाची तांदळारूपातील स्वयंभू मूर्ती असून शेंदूर फासल्यामुळं त्याचं तेज डोळ्यात न मावणारे आहे. देवीच्या मुखाचीच माहूरला पूजा होते. देवीच्या मानसपूजा भोगीपूजा व अलंकार पूजा अशा तीन प्रकारच्या पूजा घातल्या जातात. जेवण झाल्यावर हस्तमुखप्रक्षालन, त्रयोदशगुणी तांबूलदान झाल्यावर २५ पासून ५०० पानांचा विडा देवीच्या तोंडातील तांबूलप्रसाद म्हणून घेतात. मातापूरला गेल्यानंतर हा तांबूलप्रसाद बरोबर घेऊन जणू आई भेटल्याचा आनंदात भक्तगण परततात.
      या माहूर क्षेत्रात जगदंबा रेणुका, दत्तात्रेय व देवदेवेश्र्वर या प्रमुख दैवतांचा वास असल्याने सर्वच भाविकांना याची ओढ नित्य असते. जमदग्नी, रेणुका, परशुराम यांची स्थाने येथेच आहेत. जमदग्नीच्या चितेवर रेणुका सती गेली ती येथेच. दत्तात्रेय या प्रसंगी उपस्थित होते. चितेतून गळ्यापर्यंतच निघालेली रेणुका आज येथील रम्य शिखरावर निवास करून आहे. शिखराच्या पायथ्याशी मोवाळा नावाचा एक तलाव असून त्याला मातृतीर्थ म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो. रेणुकाशिखरापासून तीन मैलांवर दत्तात्रेयांचे शिखर आहे. हे संस्थान गोसावी महंतांच्या ताब्यात होते. तूर्त तेथील व्यवस्था सरकार पाहते. येथील मंदिरात दत्ताच्या पादुका व महादेवाची पिंड आहे. दत्तस्थानापासून खालच्या बाजूस सर्वतीर्थ आहे. जवळच अमृतकुंड असून येथेच प्रथम परशुराम व दत्तात्रेय यांची भेट झाल्याचे सांगतात. दत्तशिखराच्या दक्षिणेस मैल-दीड मैलावर अनसूयेचे शिखर असून तेथे अत्री ऋषींचा आश्रम होता. दत्तात्रेय व अनसूया यांच्या मूर्ती या शिखरावर आहेत. दत्तात्रेयांच्या चरित्रातील अनेक सुरस कथा याच भागात घडल्याचे सांगतात.माहूर .
     दत्तशिखर व अनसूयाशिखर येथून भोवतालचा प्रदेश फारच रमणीय दिसतो. दत्तशिखरावरही अनसूया, विठ्ठलरखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दत्तमंदिराबाहेर लक्ष्मीनारायण व धुनीधर दत्त अशी दोन मंदिरे आहेत. धुनीतील दत्ताचे भस्म प्रासादिक मानले जाते. दरवाज्यासमोर पश्र्चिमेस उजव्या सोंडेचा गणपती आहे. जवळच कामाक्षीचे लहानसे मंदिर आहे. आसपास गोसावी महंतांच्या अनेक समाध्या आहेत. अनसूया पहाडावर अनसूया व दत्तात्रेय यांच्या मूर्तीखेरीज अत्रिऋषींच्या पादुका आहेत.
श्री दत्त गुरुचे निद्रस्थान श्रीक्षेत्र
     माहुर गावालगतच पायथ्याशी महानुभवांच्या ताब्यात असलेले सुप्रसिद्ध देवदेवेश्र्वर हे दत्तस्थान आहे. रेणुका व दत्तात्रेय यांच्या आज्ञेने एकदा ब्रह्मदेव क्षीरसमुद्रावर गेले आणि त्यांनी विष्णूला माहूरात आणले. विष्णूंनी येताना आवळीचे झाड बरोबर आणले. विष्णू दत्तात्रेयांच्या आश्रमात आल्यावर परशुरामाने रेणुकेच्या सांगण्यावरून विष्णूच्या पोटात शिरून शंकराची प्रार्थना केली. परशुराम दत्तात्रेयांच्या आश्रमात जगाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तीन देवांच्या रूपाने राहू लागला. हाच देवदेवेश्र्वर म्हणून प्रसिद्धीस आला. दत्तात्रेयांचेही मन येथे रमले व ते आवळीच्या झाडाखाली ध्यानधारणा करू लागले. पिंगलनाग नावाचे ऋषीही या ठिकाणी दत्तात्रेयांच्या कृपेने महादेवाच्या रूपात राहिले. देवदेवेश्र्वर याप्रमाणे महादेव व विष्णू यांचे स्थान असून महानुभाव दत्तप्रभूंच्या रूपात या स्थानास महत्त्व देतात. रोज सायंकाळची आरती येथे पाहण्यासारखी असते. दत्तप्रभूंना आळविताना अनेकांच्या अंगातील पिशाच्चबाधा दूर होते. देवदेवेश्र्वराच्या खालच्या बाजूस पद्मतीर्थ आहे. शंखतीर्थ, बद्रितीर्थ अशी काही स्थाने येथून जवळच आहेत.माहूर .
   माहूरगडावरील किल्ल्यात एक ब्रह्मतीर्थ असून त्यास विंझाळे म्हणतात. याच गडावर महाकालिकेचीही मूर्ती आहे. जम नावाच्या एका रजपूत राजाने हा किल्ला सहाव्या शतकात बांधला असल्याचे सांगतात. याचे स्मारक म्हणून ‘जमठाकरी’ नावाच्या एक सण नागपंचमीसारखा आषाढ शु. पंचमीस साजरा करतात. किल्ल्यात गौतम झरा आहे. माहुरच्या वायव्य दिशेस पहाडात कोरलेले पांडवलेणे आहे. तेथील तीर्थास पांडवतीर्थ म्हणतात. रेणुकाशिखरापासून चार मैलांवर कैलासटेकडी आहे. येथे एक शिवलिंग आहे. रेणुकेपासून अर्ध्या मैलावर औदुंबर झरा आहे. अत्रिकुंड, चरणतीर्थ, आत्मबोधतीर्थ, कमंडलुतीर्थ, कज्जलतीर्थ, मूलझरी, रामतीर्थ अशी आणखीही काही पवित्र स्थाने माहुरगडावर आहेत. जमदग्नीच्या खोरीत सूर्यतीर्थ, चंद्रतीर्थ, पापमोचन केदा, मुद्गलेश्र्वर, ऋणमोचन, काशी, प्रयाग, कपिला, भान, परशू, गदा, रामगया इत्यादी नावांची क्षेत्रे आहेत.
याच माहुरगडावर दासोपंत, साधुमहाराज, विष्णुदास इत्यादींना दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला. मातृतीर्थाजवळच श्रीविष्णूदासांचा मठ आहे. विष्णूदासांचे बंधू श्रीगुरुदासमहाराज यांचीही समाधी येथेच आहे. दत्तप्रभू, अत्री, अनसूया यांची भक्तिपर स्तवने विष्णूदासांनी अतिशय लडिवाळ व वात्सल्यपूर्ण भाषेत केली आहेत. रेणुका व दत्तात्रेय यांची वाङ्मयीन पूजा श्रीविष्णूदासांनी केलेली आपण पाहिली आहेच. दत्त, रेणुका, अनसूया, देवदेवेश्र्वर, परशुराम, अत्री इत्यादींच्या वास्तव्यामुळे अनेक भाविकांचे चित्त माहुरगडाशी निगडित झालेले दिसते. येथील पहाडावरील दाट झाडी व एकांत यांचा शोध अनेकांना झाला असल्यास नवल नाही. अलीकडे धनोडे येथे पैनगंगेवर मोठा पूल झाल्याकारणाने रेणुकामाता व दत्तप्रभू यांच्या दर्शनार्थ येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चैत्री पौर्णिमा, नवरात्र, दत्तजयंती अशा प्रसंगी येथे मोठीच यात्रा भरत असते.
    मातापूर’ अर्थात माहूर या नावाने श्रीदेवीच्या साडेतीन शक्तिपीठांपकी एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र ‘प्राचीन दत्तक्षेत्र’ म्हणूनही तितकंच प्रसिद्ध आहे. अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या ‘दत्तशिखरा’वर श्रीदत्तात्रेयांचा वास आहे. माहूर गावापासून  चार-पाच कि. मी. अंतरावर असलेल्या दत्तशिखरावरील मूळ मंदिर १०-१२ फूट एवढय़ाच लांबीरुंदीचे आहे. मूळ मंदिराची बांधणी संवत १२९७ मध्ये महंत मुकुंदभारती यांनी केली. येथे आपणांस एकमुखी दत्ताची मूर्ती पाहावयास मिळते. येथे ‘भारती’ परंपरेतील गोसाव्यांचा नित्य वावर आहे. दत्तस्थानापासून मलभर अंतरावर सती अनुसयेचे मंदिर आहे. येथून जवळच अत्री ऋषींच्या पादुका व आश्रम आहे. येथील दत्तमंदिराच्या प्रशस्त आवारात दत्तपादुका, शिविलग आदी स्थापित आहेत. श्रीदत्तात्रेय हे संचारी दैवत आहे. दत्तात्रेयाचा आश्रम सिंहाचळाजवळ प्रयागवनात आहे. तो स्वेच्छाविहारी अर्थात संचारी असल्याने माहूर, पांचाळेश्वर, कोल्हापूर ही त्याची विहारस्थाने आहेत. यांतील माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयाचे शयनस्थान समजले जाते. तो पांचाळेश्वरी स्नान करतो आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतो, अशी श्रद्धा रूढ आहे. मात्र दिवसाची अखेर अर्थात निद्रास्थानासाठी मात्र तो मातापूर ‘माहूर’ येथे सती अनुसयेच्या वात्सल्यभरल्या कुशीत येतो. दत्तमहाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्तशिखरावर येते हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई आहे.

दत्त शिखर माहूर येथील जागृत धुनी

माहूरला आधी मुनी अत्री आणि महासती अनसूया तिसर्या डोंगरावर राहत असत जे आजही आहे. तिथे श्री दत्तात्रेय, श्री दुर्वास आणि चंद्र जन्म झाला. चंद्र हे ब्रम्हा रूप, दुर्वास हे शिव रूप आणि दत्त हे विष्णू रूप मानले गेले. दुर्वास मुनी चा छोटा आश्रम आजही आहे. दत्त शिखर अलीकडचे आणि सर्वात उंच, आणि त्याआधी माता रेणुका शिखर. परशुरामांना मातृशोक झाल्यानंतर सहस्रार्जुनावरचा क्रोध आवरेना, तेंव्हा काही मुनींनी त्यांना माहूरला जाऊन दत्त मुनींना भेटा असे सांगितले. ते पार्थिव घेऊन तिथे गेले आणि दत्त मुनींनी त्यांचे सांत्वन केले. जिथे गडाखाली तीर्थ आहे तिथे संस्कार केले. म्हणून आजही मातृ संस्कार करण्यासाठी बरेच जण तिथे जातात. जवळचे शिखर हे आईच्या नांवे होईल म्हणून सांगितले. ते तिसरे शिखर. माहूर जवळ (हिवरा संगम जि यवतमाळ येथे) पूस आणि पेनगंगा संगम होऊन नदी उत्तरवाहिनी होते, म्हणून ते पवित्र ठिकाण.
दत्त शिखर माहूर- जागृत धुनी
दत्त शिखर माहूर येथील जागृत धुनी
    माहूरगडाविषयी विशेष सांगायचे झाल्यास, गडावर जाणारा रस्ता पूवी खूप धोकादायक होता. आधी तर लोक पायी जायचे. नंतर डांबरी रस्ता बांधण्यात आला, माहूरवरून जेव्हा पहिली एसटी गड चढली, तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान होता आणि त्याने देवीचा जयजयकार करून गाडी सुरु केल्याचा किस्सा माहुरातले लोक सांगतात. हा रस्ता एवढा कठीण कि खूप अपघात व्हायचे. अर्थात वेग कमी असल्याने फार वाईट काही घडायचे नाही, मात्र गाडी बंद पडणे, तोल जाणे वगैरे.. गडावर जाणारे शेवटचे वळण तर पिन पॉईंट, आणि जवळपास ३० डिग्री एलेवेशन चा, पहिल्यांदा येणारा नवखा दुचाकीस्वार तिथे हमखास पडणार.
यवतमाळहून महामार्गानं माहूरला जाताना अवघ्या १५ किमीवर 'मनदेव' नावाचं क्षेत्र आहे. तेथील महादेवाच्या सुंदर मंदिरामागं एक तलाव आहे. माहूर बसस्टँडपासून ३ किमीवर 'मातृतीर्थ' नावाचा तलाव आहे. परशुरामानं माता रेणुकेच्या अंत्यविधीसाठी बाण मारून हे मातृतीर्थ निर्माण केलं, अशी वदंता आहे. आजही रेणुकादेवीच्या स्नानासाठी येथील पाणी नेलं जातं. मातृतीर्थाकडं जाणाऱ्या रस्त्यावर 'झंपटनाथा'चं मंदिर आहे. 'तुझ्या आज्ञेवाचून हा गड कुणी चढणार नाही आणि कुणी चढल्यास त्याला माझं दर्शन पावणार नाही', असा वर रेणुकामातेनं झंपटनाथास दिला होता. त्यानुसार भक्तगण खरोखरच प्रथम झंपटनाथाचं दर्शन घेऊन मातृतीर्थावर स्नान करतात आणि मगच गड चढून रेणुकादेवीचं दर्शन घेतात. रेणुकामातेचं परमभक्त 'विष्णुकवी' यांचा मठही याच वाटेवर आहे. माता रेणुकेनं दर्शन दिलेलं रूप ते वनस्पतींच्या सहाय्यानं तयार केलेल्या रंगांनी हुबेहूब रेखाटत. झंपटनाथाच्या मंदिरानंतर येतं ती 'जमदग्नी खोरी'. हे जमदग्नी ऋषींच्या तपश्चर्येचं ठिकाण समजलं जातं. तपश्चर्येसाठी इथली नीरव शांतता किती उपयोगी होती याचा अनुभव येतो. पुढं 'मूलझरी' नावाचं तीर्थस्थान लागतं. पौराणिक कथेनुसार आजही इथं झाडं उगवत नाहीत. जमिनीतून सतत भस्म बाहेर येत राहतं. हे भस्म कपाळी लावूनच भक्तगण पुढं जातात. अर्धा रस्ता चालून गेल्यावर सतत वाहणारं गोमुख लागतं. त्याचा उगम आणि ते कसं निर्माण झालं, याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर रेणुकामातेच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. तिथून ३०० पायऱ्यांचा गड चढून गेल्यानंतर रेणुकामातेचं दर्शन होतं.
     पाऊस झाल्यानंतर लगेच गेलात तर माहूरगडची खरी मजा कळेल तुम्हाला. माहूरगडचे जंगल खूप मोठे आहे.  पौर्णिमेला लोक माहूरची परिक्रमा करतात. परिक्रमेमध्ये माहूरच्या पायथ्यापासून सुरु करून संपूर्ण जंगलाला प्रदक्षिणा घालतात. जंगलात बिबटे, अस्वल मुबलक असल्याने खूप सावधपणेच फिरावे लागते. पुसदकडून येणाऱ्या घाटात स्वयंभू शिवपिंड आहे, ज्यावर १२ महिने झऱ्यासारख्या ओहोळातून पाणी पडत राहते. (पूर्वी एसटीतुन लक्षपूर्वक पाहिल्यावर हि पिंडी दिसायची, आता मंदिर बांधले आहे. ) तिथून पुढे गाव सुरु झाल्यावर डाव्या बाजूला सोनापीर दर्गा आहे. सोनापीरच्या थोडं पुढे पायी गेल्यावर पांडवलेणी लागतात. दाताळा मोताळा तलाव, तलावावरून रेणुकादेवी मंदिरापर्यंत जाणारी पायवाट सगळे काही बघण्यासारखे, रेणुकादेवी गडावरून त्या वाटेने तलावावर अंघोळीस जायची/ जाते अशी आख्यायिका आहे. पहाटे पहाटे या तलावावर वाघ यायचे पूर्वी. ते देवदेवेश्वर मंदिर, (स्थानिक भाषेत देवदेवसरी) महानुभाव पंथीयांसाठी विशेष असे हे मंदिर फार गूढ आहे. एरवी साखळ्यांनी बांधलेले निपचित पडलेले लोक,ज्यात महिला, पुरुष आणि लहान बालके सुद्धा असतात, संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मोठमोठ्याने "सोड दत्त्या सोड" म्हणत शिव्या देतात, आवारातल्या खांबावर चढतात, उड्या मारतात वगैरे अचाट प्रकार सुरु असतात.  
Mahur 1 श्री दत्तगुरुंचं निद्रस्थान...

माहूर बसस्टँडपासून २ किमीवर श्रीदत्तगुरूंचं निद्रास्थान समजलं जाणारं 'देवदेवेश्वरी' संस्थान आहे.  रेणुकामाता मंदिराच्या उजवीकडील मार्गावर खाली 'परशुरामा'चं मंदिर आहे. मुख्य पायऱ्यांवरून पायथ्याशी आल्यावर दत्तशिखराकडे जाणाऱ्या चढावावरून ३ किमी पुढं गेल्यावर दत्तशिखराच्या पायथ्याशी 'सर्वतीर्थ' आहे. परशुरामानं सर्व तीर्थांतून आणलेलं तीर्थ एकत्र करून या कुंडात समाविष्ट करून तिथं पिता जमदग्नीऋषींचा अंत्यविधी केला होता. म्हणून यास 'पितृतीर्थ' किंवा 'सर्वतीर्थ' म्हणतात. येथील पाणी श्रीदत्तात्रयांच्या स्नानासाठी दत्तशिखरावर नेलं जातं. दत्तशिखरावर 'श्रीदत्तात्रयां'चं जागृत मंदिर आहे. इथं ते वास्तव्यास होते. तिथं एक 'धुनीमंदिर'ही आहे. दत्तशिखराहून थोडं खाली येऊन वेगळ्या मार्गानं चढून गेल्यास 'महासती अनुसये'चं मंदिर आहे. हे मंदिरशिखर म्हणजे माहूरगडावरील सर्वात उंच ठिकाण आहे. माता अनुसयेच्या दर्शनाशिवाय माहूरदर्शन पुरं होत नाही, असं म्हणतात.
माहूर किल्ला

 इतिहास प्रेमींसाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून स्वराज्यावर चालून आलेली मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन (राजव्याघ्री) उर्फ सावित्रीबाई ही सुद्धा माहुरची. सावित्रीबाई माहूरचे राजे उदाराम देशमुख यांची पत्नी. राजे उदाराम यांच्या मृत्युनंतर वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व वऱ्हाड प्रांतातील मोघली अंमल कायम राहिला. सावित्रीबाईच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबाने सावित्रीबाईला ‘पंडिता’ आणि ‘रायबाघन’ हे दोन किताब बहाल केले.माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात. माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात.
माहूर गावापासून दक्षिणेस उंच अशा दोन टेकड्यांवर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
12 व्या शतकात देवगिरीचे राजा रामदेव यांनी माहूरचा किल्ला जिंकून घेतला. नांदेड व उमरखेड मार्गे किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्यास राजगड असेही म्हणतात. माहूर

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दक्षिण दरवाजा, उत्तरेकडील मुख्य दरवाजा व रेणुकादेवीकडील महाकाली बुरुज येथून जाण्यासाठी रस्ते आहेत. किल्ल्यात हत्ती दरवाजा, बारुदखाना, महाकाली बुरुज, धनबुरुज (दलबुरुज) यासह अनेक बुरुज आजही जसेच्या तसे आहेत. माहूर किल्ला हा गिरीदुर्ग आहे. किल्ल्याच्या स्थापत्यशैलीवरून या किल्ल्याचा विकास बहामनी व मोगलांच्या काळात झाला असावा.
या किल्ल्याला दोन तट आहेत. किल्ल्याचा विस्तार ९ कि.मी. असून या किल्ल्याला डोंगरी किल्ला, गिरी दुर्ग गोंड किल्ला असेही म्हटल्या जाते. किल्ल्याचा पहिला तट राष्ट्रकूट राजींनी तर दुसरा तट देवगिरी साम्राज्याचे राजा रामदेवराय यादव यांनी बांधला आहे. विशेष बाब अशी की, राष्ट्रकुटांनी देवगिरी किल्ला, कंधारचा किल्ला व माहूरचा रामगड किल्ला एकाच कालखंडात बांधला असल्याचे बांधकाम शैली व वास्तुच्या बाबीतील साम्यावरून स्पष्ट होते. प्रवेशद्वारावर संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार भिंत बांधलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी रस्त्याने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी वाटेने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वार १३ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून ७२५ फूट अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे. रामगिरी किल्ल्यातील इंजाळा तलाव (फुलतीर्थ) जलाशय दुसरे मातृतीर्थ  आहे.
चोहोबाजूंनी चिरेबंदी बांधकाम असून दोन दोन कठडे आहेत. हवामहलची उंची ५३ फूट व लांबी ५२ फूट आहे. हत्ती दरवाजातून पुढे गेल्यास उजवीकडे पश्चिमेस चिनी महल बांधलेला आहे. या ठिकाणीसुद्धा सैनिक तैनात असायचे. चिनी महलाच्या पश्चिमेस निशाण बुरूजाजवळ दोन मशीद आहेत. किल्ल्यामध्ये त्याकाळी जलव्यवस्थापनाची साधने म्हणजे बारव, तलाव, कटोरा बावडी, गौतम झरा आहेत. जवळपास ५० टक्के भाविक किल्ला पाहण्यासाठी व पर्यटनाचा व निसर्गसान्निध्याच्या सहवासाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, कोट्यवधी रुपये डागडुजीसाठी खर्च केलेला हा किल्ला काम झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच पूर्वीसारख्याच बकाल अवस्थेत पोहोचला. पुरातत्त्व विभागाचे पण या किल्ल्याकडे लक्ष नसल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून किल्ल्याची राखण करून घेत केवळ राखणदारीची औपचारिकता करण्यात येत आहे. त्यामुळे किल्ल्याची संपूर्ण माहिती पर्यटकांना देणारी यंत्रणा व इतर कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे.


७० हेक्टर ४० आर क्षेत्र विस्तार
किल्ल्यात संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी चोरदरवाजाही बांधण्यात आलेला आहे.याचबरोबर सभामंडपाची दक्षिण उत्तर लांबी ४२ फूट व रुंदी २१ फूट आहे. सभामंडपात एकूण १८ स्तंभ आहेत. किल्ल्यात समान आकाराचे ४५ बुरुज आहेत. हा किल्ला ७० हेक्टर ४० आर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी ६ हजार २५४ तर रुंदी २४ फूट आहे. अशाप्रकारची लांबी क्वचितच आढळते. हा ऐतिहासिक रामगड किल्ला आज पडझडीच्या मार्गावर असून पुरातत्त्व विभागाने तीन वर्षांपूूर्वी १२ कोटी रुपये खर्चून किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती केली. मात्र करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले.

माहूरची पांडवलेणी

माहूरच्या जुन्या बसस्टँडजवळ असलेल्या टेकडीच्या एका भागात लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. एक प्रचंड सभागृह आणि त्यात गाभारा कोरण्यात आला आहे. ही लेणी राष्ट्रकूटकालीन असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असंख्य खांबांचे हे सभागृह मोठे आकर्षक आहे. खांबांची आणि एकूण रचनेची भव्यता नजरेत भरते. 15 मीटर उंचीचे हे सभागृह असल्याने व सभागृहाची लांबी रुंदी खूपच असल्याने सभागृह वैशिष्ट्यपूर्ण ठरते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेतात. अजिंठा-वेरूळची आठवण यावी एवढी भव्यता याही शिल्पात आहे. गाभाऱ्यात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. ही लेणी पांडवलेणी म्हणून संबोधिली जातात.
पांडव लेणी..किरण मुधोळकर
  पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.
  तीन क्रमांकाची लेणी कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून पूर्वाभिमुख असलेल्या या लेणीत सर्वाधिक शिल्प आहेत. यात द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश या चित्राची रेलचेल आहे़ लेणी चार दक्षिणमुखी असून या लेणीत कोरीव गणेश शिल्प आहे. पाच क्रमांकाच्या लेणीचे दालन रिकामे आहे. या लेणीच्या पाठीमागील भिंतीत नागदेवतेचे पंचमुखी कोरीव शिल्प आहे़ अमेरिकेतील मिशीगण विद्यापीठातील कला आणि स्थापत्याचे अभ्यासक प्रो़ वॉल्टर स्पिक यांनी सर्वप्रथम माहूर येथील लेण्याचे सर्वेक्षण करून खोदकामाचा कालखंड राष्ट्रकुट इ़स़ ७५७ ते ९५४ काळातील असल्याचे नमूद केले. वेरूळ, कंधार, मान्यखेट या राष्ट्रकुटाच्या राजधान्या होत्या़ धाराशिव आणि माहूर येथील लेण्यांमध्ये साम्य आहे़ भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. परंतु मागील ६५ वर्षाच्या काळात पुरातत्त्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झालेला नाही. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.
 माहूर वस्तुसंग्रहालय, माहूर (ता. किनवट, जि. नांदेड ) : 
   स्थापना वर्ष १९८४. प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,२५१. वंजारी समाजाच्या दैनंदिन जीवनाची कल्पना देणाऱ्या वस्तू मुख्यत्वेकरून येथे आहेत. त्याशिवाय मध्ययुगीन नाणी, शिल्पे वगैरे वस्तू आहेत.याशिवाय कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. 
कसे जायचे
  • नांदेडपर्यंत - नांदेड हे लोहमार्गानुसार मध्य रेल्वेवर येते. मुंबईपुणेहैद्राबादऔरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला आगगाडीने थेट जाता येते.
  • माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्‌‍टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे.
  • माहूर गांव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.
  • नागपूर ते माहूर हे अंतर (वर्धा-यवतमाळ-मार्गे) रस्त्याने सुमारे २२० किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.

कंधारचा किल्ला – 
    नांदेडचे ऐतिहासिक पर्यटन म्हणजे हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्याआ शिल्प स्थापत्य अवशेषांचे दुर्मिळ दर्शन. राष्ट्रकुट कलाशैलीचे असंख्य अवशेष राष्ट्राकुटाच्या उपराजधानीत म्हणजे कंधार येथे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यामध्ये कंधारचा किल्ला सर्वात मोठा आहे.
 कंधार का किला
 नांदेड शहरापासून ५८ किलोमीटरवर असलेले कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या उतारावर मन्याड नदीच्या खोर्‍यात वसलेल आहे. इसवीसनाचा चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगत्तुंग समुद्र या विशाल तलावाची निर्मिती केली. राष्ट्रकुटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे.

    कंधार किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे.

    हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले.
   औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. इसवीसनाच्या सातव्या शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला . त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने इसवीसनाच्या ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले.

   राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याच बरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळील म्यानखेटला याठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला. १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले . १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले. इसवीसन १३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला.
   बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर इसवीसन १५६५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. इसवीसन १५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला इसवीसन १६२० मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला . किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा , मशीद बांधली आणि किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली . मोगल बादशाह शहाजहानने इसवीसन १६३१ मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसनाच्या १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता.
  राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला स्थापत्यकलेची अतिशय देखणी वास्तु मानली जाते़ २४ एकरवरील विस्तीर्ण बांधकाम इतिहासप्रेमी व पर्यटकांना भुरळ घालणारे आहे़ तटबंदी, बुरुज व आतील बारादरी, लालमहाल, राणीमहाल, शिशमहाल, बारूदखाना, कैदखाना, जलमहाल, दरबार महल, राजा महाल, राजबाग स्वार, अंबरखाना, प्रवेशद्वार, भुयारी मार्ग आदी किल्ल्यातील बांधकामे, कलाकुसर आदीने वास्तु भक्कम करण्यात आली़ या वास्तुला खंदकाचे संरक्षण कवच देण्यात आले़. ऐतिहासिक वास्तुचा बाराशे वर्षांचा वैभवशाली समृद्ध वारश्याचे संवर्धन करण्यात कमी पडत आहोत.
    किल्ल्याचा विस्तार सुमारे 24 एकराचा आहे. या जागेभोवती प्रचंड कोट बांधलेला आहे. संपूर्ण किल्ल्याभोवती 18 फूट रुंद व 100 फूट लांबीचा खंदक आहे. या खंदकास लागून असलेली किल्ल्याची भिंत 120 फूट उंचीची आहे. किल्ल्यास सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. इसवी सनाच्या 10 व्या शतकातले प्राचीन कंधारपूर, प्राचीन कला अवशेष आणि शांती घाटावरील तत्कालीन शिलालेख यामुळे महाराष्ट्राच्या प्राच्य परंपरेची आठवण करून देते.

कंधारचा दर्गाह

मध्ययुगीन अवशेषांमध्ये सुफी संत हाजी सरवर महदूम सैय्या यांचा दर्गा, मध्ययुगीन वास्तु परंपरा जोपासून आहे. मध्ययुगीन कंधारलाच एक मदरसाही होता. सुफी संतांपैकी हजरत शेख अली ही बडी हस्ती कंधारला वास्तव्यात होती. त्यांची याद जागवीत सांगडे सुलतनाचा दर्गा उभा आहे. इसवी सन 1348 च्या दरम्यान सैइदुद्दीन रफाई उर्फ हाजी सरवर मकदूम सैय्या या नावाचे अवलिया कंधारला आले. त्यांचा इंतखाल कंधारलाच झाला. त्यांचा दर्गा हाजी सैय्या दर्गा म्हणून आज प्रसिद्ध आहे. येथील उरूसही हिंदू-मुस्लिम भाविकांचे एक आकर्षण राहिला आहे. शेवटी- कंधारला भेट देताना इथल्या डोंगराळ भागातील प्रसिद्ध असलेल्या सिताफळाची चव चाखता येते. शिवाय बारुळ प्रकल्पाच्या गोड्या पाण्यातील कोळंबीदेखील प्रसिद्ध आहे. बाचोटीच्या आंब्याची चव वेगळीच असते.
darga kandhar
  सयद सैदोद्दिन आलीयास हाजी सय्य्य सरवार मगदुम दरगाह म्हणून ओळखले जातो ७५० वर्षांपूर्वी (७३६ हिजरी मध्ये) शहराच्या दक्षिण पूर्वेला वसलेले आहे. 16 रज्जब कडून तीन दिवस दऱर्षावर एक वूरुस आयोजित केला जातो.
शांतीघाटावरील शिल्पवैभव

प्राच्य कंधारपुरातील शिल्पाविष्कार पाहायचा तो इथल्या अप्रतिम मूर्तिशिल्पातून. शहरभर विखरून पडलेला हा प्राच्य शिल्पसंभार शांती घाटावरील एका इमारतीत संग्रहित करून ठेवला आहे.

या शिल्पसंग्रहातील सहस्र कोटी स्तंभ, सप्त मातृकांची प्रचंड मूर्तिशिल्पे, लज्जागौरी लक्षणीय आहेत. याच संग्रहात 10 व्या शतकातला शिलालेखही पाहायला मिळतो. बौद्ध विहारातील सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती ही नांदेड परिसरातील प्राचीनतम अवशेषांपैकी एक महत्त्वाचा वारसा आहे. शहरामधील जैन शिल्पावशेषही लक्षवेधी आहेत.
बिलोली मस्जिद
ह्या मस्जिदीला हजरत नवाब सर्फराज खान शहीद मस्जिद असेही म्हणतात.तेथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हि मस्जिद ३३० वर्षापूर्वी बांधली गेली आहे . हि मस्जिद बांधताना दगडाचा वापर केला आहे आणि हि मस्जिद चार स्तंभांनी मिळून बनलेली आहे. खाली दिलेल्या फोटोत दिसून येईल कि कश्याप्रकारे हि मस्जिद अति प्राचीन दगडांचा वापर करून तयार केली आहे या दगडी स्तंभावर कोरीव काम पण पाहायला मिळते.
BiloliMasjid1
औरंगजेबाच्या काळातील एक मशीद बिलोली येथे आहे. औरंगजेबाच्या सैन्यातील अधिकारी हजरत नबाब सरफराजखान याचा दर्गा या मशिदीत बांधला गेला. ही वास्तू पूर्णपणे दगडी बांधणीची असून चारमिनार व घुमट विशेष लक्षणीय आहेत. या मिनारावर साखळीच्या आकाराचे शिल्पकाम आढळते. या मशिदीच्याजवळ एका कोपऱ्यात चौकोनी आकारातील कुंड बारव आहे.

सहस्रकुंड धबधबा :-
    हिमायतनगर तालुका ओलांडून किनवट तालुक्यात प्रवेश केल्यावर इस्लामपूरपासून अवघ्या चार किमी अंतरावर सहस्रकुंड धबधबा आहे. नांदेडहून रेल्वेमार्गानेदेखील येण्याची सुविधा आहे. पैनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. प्राचीन आख्यायिकेनुसार याठिकाणास प्रभू परशुरामाचा पदस्पर्श झाल्याचे मानले जाते. 20 मीटर उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहून 'नांदेडचा नायगरा' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून दिसणारे सहस्रकुंड धबधब्याचे सौंदर्य वेगळे तेवढेच मोहक असते. दोन मोठ्या धारांच्या मधला काळाशार खडक या सौंदर्यात भर घालतो. किनवटकडे जाताना रस्त्यात पिवळी, जांभळी, तांबडी, लाल फुले आणि हरणांचे कळप पाहण्याची मजा काही औरच असते. जुलै ते ऑक्टोबर हा सहस्रकुंडला भेट देण्यासाठी आदर्श कालावधी आहे. विशेषत: पडत्या पावसात याठिकाणी अनोखे सृष्टीसौंदर्य अनुभवायला मिळते.
     सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो तर पलीकडचा भाग यवतमाळ जिल्ह्याच्या (विदर्भ) उमरखेड तालुक्यात येतो. हा धबधबा नांदेडपासून अवघ्या १०० किलोमीटरवर आहे. वरुणराजाच्या कृपेमुळे गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच हा धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसते. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो.
    सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. बागेत विविध रंगाची फुलपाखरे पर्यटकांना मोहिनी घालतात. धबधब्यात मनसोक्त भिजल्यानंतर या बगीच्यात विश्रांती करत धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद काही औरच. तेलंगणातील अदिलाबाद जिल्हा या धबधब्यालगत असल्याने या पर्यटन स्थळाला तेथील पर्यटकांची जास्त गर्दी दिसते. धबधब्याच्या काठावर असलेल्या पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे.
दोन दिवसांच्या पावसाळी पर्यटनात सहस्रकुंड धबधब्यापाठोपाठ माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर आदी सैर करता येईल. किनवट परिसरात पक्षी आणि वन्य प्राण्यांचे वैविध्य पहावयास मिळते. यामुळे पैनगंगेवर धोधो कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यास पावसाळी पर्यटन समृद्ध होऊ शकेल.

शिऊरच्या लेण्या

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात पैनगंगेच्या काठी, नांदेडच्या उत्तरेला साधारण 70 कि.मी. अंतरावर शिऊर नावाचे एक लहानसे खेडेगाव आहे. या गावाच्या नैऋत्येला एक लहानसा डोंगर असून गावाकडील डोंगरउतरणीचा भाग कोरून तीन लेण्यांचा एक समूह येथे कोरण्यात आला आहे. एका टेकडीच्या कुशीत 100 फुटात तीन लेण्या कोरण्यात आल्या. लेण्यांमधील पुतनावधाचे शिल्प व महिषासुरमर्दिनीचे शिल्प तसेच गर्भगृहाची रचना लेणी निर्मितीचे टप्पे दर्शविणारी आहे. भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाच्या अभ्यासासाठी या लेण्यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.
shiur
   हदगांव तालुक्यात शिऊर हे गांव उत्तर दिशेला असुन, हदगांव तालुक्याच्या शेवटचे गांव असुन तालुक्यापासून ३७ कि.मी अंतरावर असुन, त्या ठिकाणी वैष्णवधर्मीय तीन लेण्याचा समुह असुन, ह्या लेण्या खूप प्राचीन काळातील असुन, या लेण्याची देखभाल पुरातत्व विभागाच्या तर्फे केली जाते. ह्या लेण्या पाहण्यासाठी हदगांव बस व खाजगी वाहनाची व्यवस्था आहे.

उनकेश्वर

उनकेश्वरला माहूर अथवा किनवटमार्गे बसने जाता येते. सागाच्या दाट वनातून होणारा हा प्रवास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अधिक आल्हाददायक असतो. किनवट तालुक्यातील उनकेश्वर तथा उनकदेव येथे रामचंद्र यादवाच्या काळातला शिलालेख आहे. इ.स.1280-81 सालातील हा शिलालेख म्हणजे नांदेड परिसरातील शेवटचा यादवकालीन शिलालेख आहे. या ठिकाणचे देऊळ बांधल्याचा संदर्भ या शिलालेखात आहे. उनकेश्वरला वेगळेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. येथील गरम पाण्याचे कुंड प्रसिद्ध आहे.
उनकेश्वर मंदिर हे भगवान महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे गरम पाण्याचे झरे आहेत . ते मंदिर भोवती आढळतात. असा म्हणतात कि येथील गरम पाण्याच्या झऱ्यातील केमिकलमुळे त्वचारोग बरे होतात. येथील पाण्याचे तापमान हे ४२.२० सेल्सियस एवढे पाहायला मिळते आणि तसेच या झऱ्यामध्ये सल्फर आढळून येते.



होट्टल
राष्ट्रकुटांचा कलाविष्कार जसा कंधारला पाहायला मिळतो. तसा चालुक्य शिल्पशैलीचा वारसा देगलूर तालुक्यातील होट्टल या चालुक्यनगरीने जोपासलेला आढळतो. इसवी सनाच्या 11 व्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांचा प्रभाव नांदेड परिसरावर होता. पोट्टलनगरी म्हणजे आजचे होट्टल हे गाव. त्यांच्या राज्यातले महत्त्वाचे ठाणे. सिद्धेश्वर मंदिर गावाच्या पश्चिमेला असून मंदिराची रचना ताराकृती आहे. समोर मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूस अर्ध मंडप आहे. मधोमध कलात्मक सभामंडप आहे. तसेच अंतराळ आणि गर्भगृह अशा अन्य रचना आहेत. येथील नंदीमंडपात असलेल्या शिलालेखावरून या मंदिराची रचना वन्ही कुळातील राजाच्या सहकार्याने केल्याचे लक्षात येते.हा शिलालेख सहाव्या विक्रमादित्याच्या काळातील आहे. शिलालेखाच्या माध्यमातून त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ कळतात. इथे तीनशे वर्षांतले म्हणजे 11 व्या व 12 व्या आणि तेराव्या शतकातले चार शिलालेख सापडले आहेत. होट्टल आणि परिसरात आजपासून हजार, आठशे वर्षांपूर्वीचे संस्कृत भाषेतले आणि कन्नड व मराठी लिपीत कोरले गेलेले आहेत. नांदेड जिल्ह्यात चालुक्यकालीन 40 शिलालेख आहेत. एकूण शिलालेखांपैकी चार शिलालेख होट्टल येथे पाहायला मिळतात.
देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल) – होट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेल्या होट्टल गावातील चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असणारे होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.
याचबरोबर या जिल्ह्यात नांदेडचा किल्ला, बिलोली मशिद, श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा हीसुद्धा पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
एखाद्या ठिकाणी भटकायला जातांना त्या परिसरावर मिळतील तितकी पुस्तक ,इंटरनेट वर उपलब्ध असलेली माहिती वाचायची सवय लागली आहे . इंटरनेटवर उपलब्ध असलेली गॅझेटियर हा भटकणाऱ्यासाठी खजिना आहे. इंग्रजानी स्वत:च्या सोयीसाठी बनवलेल्या या गॅझेटियर मध्ये भरपूर माहीती असते . त्यातच मुखेड, तडखेल , होट्टलच्या मंदिराची माहिती मिळाली ही तीनही ठिकाण आता बघायची होती.
शिव मंदिर, मुखेड
कंधारहुन मुखेड ३२ किलोमीटरवर आहे . मुखेड छोट गाव आहे . गावातल्या दाट वस्तीत शंकराचे पुरातन मंदिर आहे . मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सिमेंटीकरणाने त्यामुळच्या सुंदर मंदिराचे केलेले विद्रूपीकरण डोळ्यात सलायला लागल होते. मंदिराच्या सभागृहाच्या पुढे कॉंक्रीटचा स्लॅब आणि पिलर टाकून एक्सटेंशन दिल होते. मुळचा कळस कोसळलेला आहे त्या जागी अतिशय बेढब कळस बांधला होता. मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम आणि मुर्ती कोरल्ता आहेत . त्या खांबावर आणि सर्वच दगडी बांधकामांवर गुलाबी ऑईलपेंट लावला होता. गर्भगृहाचे तर निळ्या टाईल्स लावून बाथरुम करुन टाकल होते . मंदिराच्या बाह्यभिंती कशा काय माहिती नाही पण या अत्याचारापासून वाचल्या होत्या . त्यावर सुरसुंदऱ्यान्च्या मुर्ती आहेत . एकंदरीत मुखेडच्या मंदिराने निराशाच केली.  
सिध्देश्वर मंदिर, होट्टल
मुखेड - होट्टल अंतर ५० किलोमीटर आहे. (नांदेड - होट्टल ९० किमी) आता होट्टल गाठण आवश्यक होते. पावसाळी वातावरण आणि वेळेशी चाललेली मारामारी यामुळे आम्ही जेवणाचा विचार सर्वानुमते रद्द केला आणि देगलूर गाठले . महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल हे मोठ गाव. इथल्या लोकांच्या पेहरावात आणि भाषेच्या लहेजातही थोडा फरक होता. होट्टलचा रस्ता विचारुन आणि अमृततुल्य चहा पिउन होट्टल गाठल. गावा बाहेर दोन मंदिरांच संकुल आहे . जसजस मंदिरांच्या जवळ जायला लागलो तसतशी त्याची भव्यता आणि सुंदरता डोळ्यात भरायला लागली  संध्याकाळची वेळ असल्याने गावातली सगळी मुल मंदिर परिसरात खेळायला जमली होती. आम्ही म्हणजे त्यांना आयतीच करमणूक होती. जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती या उक्तीप्रमाणे ते आमच्या मागेमागे फिरत होते. फोटो काढणे कठीण झाले होते . त्यावर उपाय म्हणून त्यासर्वाना गोळा करुन एक ग्रूप फोटो काढला . त्यांना प्रत्येकाला तो दाखवला , मग मुल पांगली आणि आम्ही शांत पणे मंदिर पाहायला सुरुवात केली . 
सिध्देश्वर मंदिर, होट्टल
या ठिकाणी दोन मंदिर बाजूबाजूला असून एका मंदिराला सिध्देश्वर मंदिर आणि दुसर्‍या मंदिराला महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते.  पुरातत्व खात्याने मंदिराची नुकतीच पुनर्बांधणी करुन त्याला गतवैभव प्राप्त करुन दिलेले आहे. होट्टल गावात चालुक्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराला चालुक्य राजा विक्रमादित्य याने इसवीसन ११०१ मध्ये त्याच्या २६ व्या राज्यारोहण दिनानिमित्त दान दान दिल्याचा शिलालेख मंदिरात आहे. त्या अर्थी हे मंदिर ११ व्या शतकापूर्वी अस्तित्वात होते. या सिध्देश्वर मंदिराच्या बाह्यभिंतींवर अनेक सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती बाह्यभिंतीवर पाहायला मिळते. या गणेशाच्या बाजूला एक दगडी घट बसवलेला आहे. त्यात पाणी ओतले असता ते थेट गर्भगृहातील पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे. देवकोष्ठात शंकराच्या विविध मुर्ती आहेत. गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. छतावर सुंदर नक्षीकाम आहे. बाजूला असलेल्या महादेव मंदिरात सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत.   शिवाय गावात सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर त्रिदल रचनेचे असून याला तीन गर्भगृहे आहेत.  ती अनुक्रमे ब्रम्हा, विष्णू, महेश यांची आहेत. 
दगडी घट,सिध्देश्वर मंदिर, होट्टल
नृत्य गणेश
सुरसुंदरी
सुरसुंदरी
सुरसुंदरी
देगलूर ते तडखेड अंतर १२ किलोमीटर आहे. गावात शिरलो तेंव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. शंकर मंदिर कुठेय ? अस विचारल्यावर गावातल्या लोकांनी आम्हाला भरवस्तीत नेल आणि सिमेंटने बांधलेले एक मंदिर दाखवल . ते ओबडधोबड सिमेंटमध्ये बांधलेले मंदिर पाहून आल्या पावली मागे फिरावे अस वाटायला लागले. पण एवढे आलोच आहोत तर पाहून जाउया म्हणून मंदिराच्या जवळ गेलो तर दोन गाय वासरु खांब खांब पडलेले होते . त्यावर सुबक गाय वासरु कोरलेले होते आणि खाली तेलगू लिपीतला शिलालेख होता . गाय वासरू दगड महाराष्ट्रात अनेक गावात गायवासरु दगड उर्फ़ धेनुगळ पाहायला मिळतात धेनूगळ हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.
धेनुगळ, तडखेड 
शिलालेख , तडखेड 
मंदिरात शिरलो गर्भगृहाच्या बाजूला ४.' ५ " उंच आणि २ ' रुंद शिलालेख आहे . त्याची वरील बाजूस कलश कोरलेला आहे . त्याख्हालच्या पट्टीवर मध्यभागी पिंड कोरलेली आहे. त्या बाजूला चंद्र सुर्य कोरलेले आहेत आणि सर्वात बाहेरील बाजूस दोन्ही बाजूला बैल आणि तलवार कोरलेली आहे. . खाली तब्बल ४० ओळींचा तेलुगू लिपीतील शिलालेख आहे . कल्याणी चालुक्यांची सत्ता या भागावर होती त्यावेळी त्यांनी कोरुन घेतलेले अनेक तेलगु लिपीतील शिलालेख महाराष्ट्र पाहायला मिळतात. मंदिराच्या आजूबाजूच्या घरांचा बांधणीमध्ये जुन्या मंदिराचे अनेक अवशेष वापरलेले दिसत होते . एक चांगला ठेवा काळाच्या उदरात गडप झाला . आता पाऊसही सुरु झाला होता . रात्री उशिरा नांदेडला पोहोचलो.

गोळे गावातली गढी:-

मध्ययुगापासून  मराठवाड्यात अनेक वर्ष अस्थिर राजकीय परिस्थिती होती.  त्यामुळे परकीय सैन्य , दरोडेखोर यांच्या पासून संरक्षण होण्यासाठी गावच्या पाटलांनी , इनामदारानी गढ्या बांधलेल्या पाहायला मिळतात. ही गढी बामणाची म्हणजेच ब्राम्हण कुटुंबाची होती . ते सध्या इथे राहात नाहीत . गढीच्या बाजूला असलेला चौसोपी वाडा पाहीला. वाड्याच्या मालकाने चांगल्या प्रकारे ठेवला होता .
गोळे गावातली गढी 
चौसोपी वाडा
 गढी म्हणजे मिनी किल्लाच असतो. छोट्या दरवाजाच्या आत पाहारेकर्यांसाठी देवडी होती . पुढे तटबंदी काटकोनात वळून दुसरा मोठा दरवाजा होता . त्याला दिंडी होती दिंडीतून आत गेल्यावर चौसोपी वाडा होता . सागात आणि शिसवी लाकडात बनवलेल्या या एक मजली वाड्याची पडझड झाली होती . वाड्याला लागून विहीर होती. तटबंदीवर चढण्यासाठी जीना होता . तटबंदीत बंदुकीतून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्यांची रचना केलेली होती .

पैनगंगा अभयारण्य

जंगलात पावलापावलांवर निसर्गाची अद्भुत रूपं आणि रहस्यं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील बहुतेक अभयारण्यांमध्ये पर्यटनाला भरपूर वाव आहे. असेच वन पर्यटनाची अनोखी साद घालणारे अभयारण्य म्हणजे पैनगंगा. यवतमाळ आणि नांदेड जिल्हा यांना जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेले संरक्षित जंगल म्हणजे पैनगंगा. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले हे एकमेव अभयारण्य असावे.
यवतमाळ जिल्ह्यच्या उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीकाठी वसलेल्या या अभयारण्याला भरपूर जैविक समृद्धी लाभली आहे. नांदेड जिल्ह्यत या वनाचा काही भाग येतो. अनेक वृक्षवेलींची आणि औषधी वनस्पतींची रेलचेल असलेलं हे अभयारण्य हिरवागार शालू नेसून नटले आहे की काय असं वाटावं इतकं हिरवंगार आहे. विविध प्रजातीचे पशुपक्षी इथं आहेत. पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद ज्यांना घ्यायचा आहे, त्यांना पैनगंगा अभयारण्याच्या कुशीत लपलेला सहस्रकुंड धबधबा खुले निमंत्रण देत असतो.
२५ फेब्रुवारी १९८६ ला ३२४.६२ चौ.कि.मीचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर २००१४ ला १००.२७ चौ.कि.मीचे विस्तारित क्षेत्र मिळून ४२४.८९ चौ.किमीच्या क्षेत्रावर हे अभयारण्य वसले आहे.
श्यामा कोलामचीची टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.  उत्तम पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन, मोहा, साग, साजड, सूर्या, हलदू इत्यादी अनेक वृक्ष आहेत. अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती आहेत. कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर, चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठय़ा संख्येत दिसतात.
     अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, यासारखे सरपटणारे प्राणी ही आहेत. अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, घनवर किंवा हळदी कुंकू (स्पॉटबिल बदक), जकाना, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन यांसारख्या पक्ष्यांनी हे अभयारण्य सजले आहे. पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमांना जोडणाऱ्या या अभयारण्यात जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्टेशन किनवट, नांदेड आणि अकोला आहे. तीन चार दिवसांचा वेळ असेल तर नांदेडमधील गुरु गोिवद सिंह साहिबांचा गुरुद्वारा, साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेली माहुरची रेणुकामाता, माहुरगड किल्ला. रामगड किल्ला. विष्णुपुरी धरण आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला कंधार किल्ला पाहायला हरकत नाही. लोहा तालुक्यातील खंडोबाची यात्रा आणि इथला घोडय़ाचा बाजार ही प्रसिद्ध आहे. बारा ज्योतिर्लिगांपकी एक औंढा नागनाथ, शिरड शहापूर येथलं मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर, नामदेवांचं जन्मस्थळ गाव नरसी, तुळजादेवी मंदिर ही आपण पाहू शकतो.
काही जवळची ठिकाणे
  • नांदेड किनवट रस्त्यावर किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा.
  • किनवटपासून ३५-४० कि.मी. अंतरावर उनकेश्वर येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे.
  • उनकेश्वरहून जवळच देवीच्या साडेतीन पीठांपकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर.
  • किनवटपासून १८ किमी अंतरावर पेंदा नागढव येथे शिवमंदिर आहे. पेंदा नागढव येथे जाण्यासाठी किनवटवरून रिक्षा उपलब्ध आहेत.
कसे जाल?
किनवट पासून उमरखेड ३५ किमी अंतरावर आहे. या रस्त्याने अभयारण्याला जाता येते. पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळहून सुमारे १५० किमीवर आहे. यवतमाळ-उमरखेडमाग्रे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमाग्रे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गावर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. जवळचे रेल्वेस्टेशन नांदेड आहे, तर जवळचे विमानतळ नांदेड आणि औरंगाबाद आहे.
संदर्भग्रंथः-
1) https://www.mpsckida.com/2017/11/nanded-district-history-in-marathi.html
2) https://vishwakosh.marathi.gov.in/19460/
3) https://www.majhimarathi.com/nanded-district-information/
4) http://www.dattamaharaj.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0
5) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/infomarathi-epaper-infomar/barashe+varshancha+vaibhavashali+samriddh+varasa+kandhar+killa-newsid-120852628
6) http://rajeshivchatrapati700.blogspot.com/2014/07/

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...