ह्या ब्लॉगवरील लिखाण कोण्या एकाने लिहीले नसून ते अनेकांनी लिहीलेल्या लिखाणाचे संकलन आहे.ह्या ब्लॉगवरील माहिती ट्रॅव्हल या व्हॉटस अॅप ग्रुपसाठी संकलीत करण्यात आली होती. ईथली माहिती पर्यटक, जिज्ञासु, अभ्यासक, स्पर्धा परिक्षा देणारे विध्यार्थी, शालेय शिक्षक आणि आपल्या परिसराविषयी जाणुन घेण्यात रस असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठि एकत्रित आपल्या मातृभाषेत मराठीत उपलब्ध केलेली आहे.तीचा लाभ घ्यावा.
Saturday, September 5, 2020
बहुरंगी पर्यटनाचा बीड जिल्हा
बीड
जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे.हा जिल्हा महाराष्ट्र
राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे
आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा
कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग
दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात
मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात.
बीड जिल्ह्याच्या चतुःसीमा
पूर्वेला : परभणी जिल्हा
पश्चिमेला : अहमदनगर जिल्हा
उत्तरेला : जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा
दक्षिणेला : लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा
भौगोलिक माहिती
बीड जिल्हा समुद्रापासून दूर आहे. बीड जिल्ह्याचा अधिकांशी भाग दुर्गम
अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानी आहे. जिल्ह्याच्या
मध्य-दक्षिण भागात बालाघाटचे डोंगर आहेत. येथे चिंचोली, नेकनूर हे भाग
येतात. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभाहून बीडकडे जाताना
पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या
उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग
गाळापासून बनला आहे. यात गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश
होतो.
हवामान
जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा मोठा व कडक
असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम
असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच
वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील
बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व
थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे
दिसून येते.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय
कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग
अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे.
पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते.
जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, धारूर आदी
तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर
यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड,
माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या
अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.
नद्या:-
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून
वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा
जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे
वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी
तालुक्यांतून वाहत जाते.
जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना
नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम
पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी पाटोदा
तालुक्यातील हरिश्चंद्र बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी
सुरुवातीस उत्तर - दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण
सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात
प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्याच
ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील
नैसर्गिक सीमेचे काम केले आहे. मांजरा नदी सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा
प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज,
रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या
डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
सिधंफणा
नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यांत उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर
पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत
माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे
धरण सिधंफणा नदीवर आहे.
बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक
उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. ही
नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला
मिळते.
कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते.
सीना
नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही
अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम
केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड
जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाते.
पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत
कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
इतिहासः-
बीड जिल्हा म्हणजे विराट संस्कृतीचं माहेरघरच आहे. या जिल्ह्याचा इतिहास
वैदिक काळापासून ज्ञात आहे.
वेद आणि पुराणात त्याचा उल्लेख 'अस्माक' असा
केलेला आहे.
उज्जैनीच्या राजांची साडेसाती याच ठिकाणी संपली, त्यावेळी बीडला
'तामलिंगचूर' या नावानं ओळखलं जाई. असं शनी महात्म्यामध्ये वर्णन केले आहे.
आंध्र, चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादवांनी त्यावर राज्य केलं. फारशी भाषेत
'भीर' या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. त्याचा अपभ्रंश होऊन बीड हे नाव मोघल
काळात रुढ झाले. बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या
किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या
अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती
सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी
बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.
बीड शहरातील
जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत.
रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास
रोखण्याचा प्रयत्न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने
त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत
सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात
जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन
चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे
नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही
पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत.
शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.
किल्ले मैदान, लक्ष्मीबाग-
बीडचा तुरुंग इ.स. १९३४
सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची
साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग
कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकाऱ्याच्या सरकारी
क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब
आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.
शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने
इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही
खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये,
हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले
होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या
काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने
पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये
भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन
छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड - जालना अशी
धावायची.
विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील प्रेक्षणीय स्थळे
विसाव्या शतकात केवळ भौतिकच नव्हे बीडकरांचे सांस्कृतिक जीवनदेखील
विलक्षण बदलून गेले. बीड शहरातील शंभर वर्षांपूर्वीची अनेक महत्त्वाची
स्थळे कालौघात नष्ट झाली. काही स्थळे मात्र अद्यापही अवशेषांच्या रूपात
शहराच्या शतकापूर्वीच्या कथा सांगत आहेत. फरशीचा वाडा, खिडकी, कान्होबाची
हवेली, सटवाई मैदान, लक्ष्मीबाग, खासबाग, नेताजी मैदान, लाईन गल्ली,
महेबूबगंज, धोंडीपुरा ही शंभर वर्षांपूर्वीची बीड शहरातील महत्त्वाची
स्थळे. यात धोंडीपुरा नावापुरता उरलाय, तर अन्य स्थळे विस्मृतीत गेली
आहेत. फरशीवरचा वाडा हे बीडच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचे स्थळ होते.
इथे अवघ्या बीडकरांचा न्याय व्हायचा. बांधकामात सर्वप्रथम फरशी वापरली
गेल्याने बीडकर त्याला फरशीवरचा वाडा म्हणत.
धोंडीपुरा
बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व 'धोंडीपुरा'
करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण
या भागात राहणाऱ्या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या
राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन
रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुऱ्यातील मशिदीलाही जागा दिली होती,
असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर
वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा
भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे.
त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची
हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना
बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम
सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य
देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या
बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही
कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती.
हिरालाल चौक
पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणाऱ्याभागाचे पूर्वीचे नाव
महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला
(इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले.
पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक
सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना
निवडले ते कट्टर गांधीवादी हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या
स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल
कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो.
'बलभीम चौक' या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ 'चौक' या नावानेच
ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणाऱ्या कदम घराण्यातील कर्तृत्ववान
व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील
महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे.
नेताजी मैदान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा
होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी 'छोटा सुभाष' ही पदवीच
दिली होती. सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक
निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक 'सुभाष रोड' संबोधू लागले तर ज्या
मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही 'नेताजी मैदान' संबोधले
गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण
त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले.
सटवाई
’सटवाई’ ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर
पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे.
माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच
मंदिरामुळे हा सर्व भाग 'सटवाई मैदान' म्हणून ओळखला जात असे. नंतर
'बारादरी' व आज 'माळीवेस' या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही.
ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश
साळुंके यांच्या 'बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास' या ग्रंथात
या वेशीवरील शिलालेख आला आहे.
शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात
महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान
आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज
नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच
भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी
निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच
न्यायालयाने इ.स. १८९०
मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली.
शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने
संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी
अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.
बशीरगंज
बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५
मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा
महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा
होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील
प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख
वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले.
तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच
नावाने ओळखला जातो.
राजुरी वेस
बीड शहरातील भुइकोट किल्ल्याचे अवशेष
बीड
शहरात काही एइहासिक अवशेष आहेत, त्यात बाब-उझ-जफर ( विजयाचे द्वार ) हा
दरवाजा आजही पाहू शकतो. याला सध्या कोतवाली वेस म्हणतात. हा दरवाजा
बिंदुसरा नदीच्या पश्चिम किनार्यावर आहे. किल्ला भागात मिल्लीया परिसरात
आणखी एक दरवाजा पहायला मिळतो. चौथा दरवाजा बशीरगंज भागात आहे, ज्याला बुरुज
आहेत. याला सुफी बुलंदशहा वली म्हणतात.
मन्सुरशहा दर्गा
बीड शहरात मुघल बादशहा जहांगीर याने बांधलेली मोठी जामा मस्जिद आहे, ज्याला
शहेशहावल्ली म्हणतात. १४ व्या शतकातील सुफी संत मन्सुरशहा यांचे थडगे
असलेले संगमरवरी घुमट असलेला दर्गा देखील प्रेक्षणीय आहे.
गाजीपुरा
गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात
बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन)
नावावरून सन इ.स. १६८५ मध्ये ठेवले.
महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद महसूल विभागामध्ये
केंद्रस्थानी असलेला बीड जिल्हा हा उत्तर अक्षांश 18.3 ते 19.3
अक्षांशामध्ये आणि 74.5 ते 76.5 पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे.
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 वर बीड शहर असून बीड
जिल्ह्याच्या उत्तरेस औरंगाबाद आणि जालना हे जिल्हे, वायव्य, पश्चिम आणि
नैऋत्य बाजूस अहमदनगर जिल्हा, दक्षिण बाजूस अहमदनगर आणि उस्मानाबाद आणि
आग्नेय, पूर्व आणि ईशान्येस लातूर आणि परभणी हे जिल्हे आहेत. बीड शहराला
रेल्वेने जोडलेले नाही मात्र जिल्ह्यातील परळी हे रेल्वे स्थानक 90 कि.मी.
अंतरावर आहे. मुंबईपासून रस्तामार्गाने बीडचे अंतर हे 401 कि.मी.आहे.
पर्यटन :-
बीड शहराच्या परिसरातील पर्यटनस्थळे:-
बीड शहर आणि परिसर पर्यटकांना नेहमीच आपलासा वाटतो. परळीला बारा
ज्योर्तिलगापकी एक वैजनाथ, बीडच्या जवळ कपिलधारचा मोठा धबधबा, नामलगावचा
श्रीगणेश इथल्या लोकांचं श्रद्धास्थान. बीड शहराबाहेर खंडेश्वरी मंदिर,
त्याला लागून असलेल्या दीपमाळा, शिदोड गावची रेणुकामाता आणि तिथे असलेली
हलती दीपमाळ, जुन्या बीडमधील पाषाणात कोरलेले हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर,
राक्षसभूवनचे शनी महाराज, धारूरचा किल्ला, कधीही न आटणारी खजाना बावडी,
सौताडय़ाचा रामेश्वर अशा अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असलेलं हे शहर व परिसर.
या शहरात जो कुणी येईल त्याला पर्यटनाचा तृप्त अनुभव आणि आनंद देणारं हे
शहर आहे.
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक वहातुकीच्या परिवहन मंडळाचे संपर्क क्रमांक:-
कंकालेश्वर मंदिर बीडमधील एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी
बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर
१.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. बीड
शहराच्या पूर्वेस असलेलं कनकालेश्वर हे शिवशंकराचे मंदिर आहे. शिल्पकलेचा
आणि वास्तूकलेचा हा एक सुंदर नमुना.
मंदिराची रचना
कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप
आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा तलविन्यास या
मंदिराचा आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास
तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या चार
मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभजोडी आहे. या
सोळा स्तंभांवर घुमटाकार छत पेललेले आहे. हे छत उत्तरोत्तर लहान होत
गेलेल्या वर्तुळाकृती वलयांनी बनलेले आहे. छतावर फुलांची नक्षी आणि अलंकरण
आहे. छताच्या मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.
मंडप आणि गर्भगृहामधील स्तंभांची रचना चौरस तलविन्यासाची असून चौरस
तळखड्याच्या वर काही अंतरावर अनुक्रमे अष्टकोनी, चौरस आणि वर्तुळाकार
बनणारा चौरस खांब आणि खांबाच्या वर्तुळाकृती भागावर किचकहस्त असा या
स्तंभांचा घटकक्रम आहे.
मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने
तर सगळ्यात वरचा थर कीर्तिमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील
अंगाच्या भद्रावरील देवकोष्ठांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील
देवदेवता आहेत. वर मंडोवरावरील जंघाभागात विष्णुचे दहा अवतार आणि
अष्टदिक्पाल दाखविले आहेत.
कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांची द्वारे पंचशाखा प्रकारची असून त्यावर
कमळदल, पुष्प आणि व्याल यांचे अलंकरण आहे. या द्वरशाखांच्या खालच्या भागात
कुंभ आणि चौरी धारण करणार्या दासी आणि निधी दाखविले आहेत. मुख्य
गर्भगृहाच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे.
मंदिराविषयी
दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे
मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत
प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणार्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर
ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन
तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून
मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद आहे.
कंकालेश्वर मंदिर अनेक वष्रे बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे
महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या
मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या
पुजार्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला 1915 उगवावे
लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता
पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17
सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खर्या
अर्थाने मुक्त झाले.[१] या पुरातन मंदिराचा उल्लेख पुरण ग्रंथात ही आहे
.अत्री ऋषी व अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला.
ब्रम्ह-विष्णू -महेशाला प्रसन्न करून घेतल्याची दंतकथा सांगितली जाते .
बीडचं
ग्रामदैवत असल्यानं इथं दरवर्षी महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते. याच
मंदिराच्या पूर्वेस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं खंडेश्वरी
देवीच मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शहराचं भूषणच. आदिशक्ती माहूरवासिनी
रेणूकादेवी सूर्यसुरी या भक्ताच्या विनंतीवरुन ही देवी इथं आली, अशी
आख्यायिका आहे. दरवर्षी नवरात्रात येथे फार मोठी यात्रा भरते.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिर परीसर प्रदूषित होत आहे या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
खजाना विहीर
बीड शहरापासून पाच कि.मी. अंतरावर खजाना बावडी ही विहीर आहे.सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला
पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन
सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या
काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ ( हिजरी 991 ) मधे ही विहीर
बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला,
म्हणून या विहीरीला 'खजिना विहीर' म्हणतात.
जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली ७ मी. आहे. जमीनीपासून ४.७ मी.
खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास १९ मी. इतका आहे. आणि त्या खाली विहीराचा
मूख्य व्यास १२.६० मी. एवढा आहे. विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा
वापर केलेला आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे,
त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले
आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं आणि ते कधीच आटत नाही.
या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर
दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे
इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा
बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीतला उत्तर दिशेचा
बोगदा हा एक कालवा आहे. त्या काळात शेताला ह्याच कालव्याद्वारे पाण्याचा
पुरवठा व्हायचा. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही
पाणी येतं. या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागातील साडेचारशे एकर
शेती कुठलेही उपकरण न वापरता सिंचनाखाली आहे.
विहिरीतून जाणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याला हवा पुरवठ्यासाठी या कालव्यावर
अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात 'झडपा' बांधलेल्या आहेत. ह्या
एखाद्या छोट्या आडासारख्या दिसतात. त्यांची खोली १५ फूट ते १६.५ फूट इतकी
तर त्यांचा व्यास २ फूट इतका आहे. यात उतरायचीही व्यवस्था केलेली आहे.
पूर्वी लोकं यातून पोहत पलीकडे निघायची. आजही या पाण्याचा प्रवाह कायम आहे.
यातून येणारं पाणी अतिशय स्वच्छ आहे. अडीच कि.मी. लांबीच्या भूमिगत
कालव्यावर अशा एकूण ५३ झडपा आहेत. हे सगळं पाणी भूमिगत म्हणजे जमिनीच्या
खालून जवळपास ३ किमी पर्यंत कालव्याने शेताला पोचवण्याचं तंत्रज्ञान
आश्चर्यचकीत करणारं आहे !
पण आज ही वैभवसंपन्न विहीर एका मोठ्या संकटात सापडली आहे. विहीर बघायला
येणारे पर्यटक बिलकूलच स्वच्छता बाळगत नाहीत. विहिरीच्या पाण्यात बॉटल्स,
कचरा वगैरे साचत आहे. विहिरीपर्यंत जायला पक्का रस्ता नाही. यावरून सरकारचं
या जलवास्तूबद्दलचं दूर्लक्ष दिसून येतं. विहिरीला तातडीने संरक्षण व
संवर्धनाची गरज आहे. शिवाय दुष्काळामुळे विहिरीची सिंचन क्षमता दिवसेंदिवस
कमी होत चालली आहे. वाढत्या कन्स्ट्रकशन्समुळे ह्या कालव्याच्या झडपा बुजत
आहेत. शहराजवळून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे ह्या कालव्याचं शेवटचं टोक
'फुटका नळ'ही उध्वस्त केला असून पुढे शेताला जाणारं पाणी नदीत वळवलं आहे.
याने विहीराचं आणि शेतीचं नुकसानच झालं आहे.
हे जर असंच सुरू राहिलं तर लवकरच या विहीरचं अस्तित्व धोक्यात येऊन हे सगळं नष्ट होण्याची शक्यता आहे.
लेखन - इंद्रजीत उगले
साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेले बीडचे शनि देवस्थान : उज्जैन,
नांदगाव (जि. नाशिक), राक्षसभुवन हे तीन आणि बीड येथील शनि देवस्थान अर्धे
असे साडेतीन पीठ आहेत. शनि अमावस्येनिमित्त शनि महाराजांच्या दर्शनासाठी
येथे गर्दी होत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या
वाढत असल्याचे दिसु लागले आहे.बीड येथील हे शनि देवस्थान जवळपास सध्या २
एकरच्या
जागेत वसलेले आहे. बीड शहराला तसा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा. शहरातील
कनकालेश्वर, शहेंशाहवली दर्गा, मन्सूरशहा दर्गा, किल्ला, खंडोबा मंदिर,
दीपमाळ, जटाशंकर मंदिर, खंडेश्वरी मंदिर, शिदोडचे महालक्ष्मी मंदिर, खजाना
बावडी आदी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे हे बीड शहर परिसरातील.
विक्रमादित्य
राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची अख्यायिका. १९५२ साली
निजामशाहीत या मंदिराला सनद प्राप्त झाली. कोल्हेर (ता.गेवराई) येथे ४० एकर
आणि शिदोड येथे ३६ एकर जमीन देवस्थानच्या नावावर आहे. पैकी शिदोडच्या
जमिनीचा वाद चालू आहे. ऐतिहासिक काळात शहरातून वाहणाऱ्या बिंदूसरा नदीचे
पात्र या शनि देवस्थानपर्यंत होते. पुढे पर्जन्यमान घटत गेले, तशी मंदिर
आणि बिंदूसरा पात्राच्या मध्ये वस्ती वाढली. एक जागृत देवस्थान म्हणून
ख्याती पसरत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
अतिक्रमणामुळे ४ एकर जागा असलेले हे मंदिर १८०० स्क्वेअर फूट जागेतच
मर्यादित होते. आता पैकी २ एकर जागा मोकळी झाली असून, उर्वरित जागेचा वाद
न्यायप्रविष्ठ आहे. मंदिरात दोन विहिरीपैकी एक पुरातन बारव आहे. या दोन
विहिरींचे पाणी पिण्यायोग्य असून, कधीही आटत नाही. दुष्काळातही या
विहिरीतून पाणीपुरवठा सुरू होता.
बीड येथील खंडोबा मंदिरः-
एखाद्या शहराची प्राचीन ओळख म्हणजे खंडोबा मंदिर. बीड शहराच्या
पुर्वेला असलेल्या टेकडीवर उभारलेल्या खंडोबा मंदिराची दुरावस्था झालेली
आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे.
या मंदिरासमोर उभारलेल्या दीपमाळेची उंची २१.३३ मीटर ( सुमारे ७० फुट ) आहे.
या दीपमाळेवर प्राणी आणि मानवाकृती कोरल्या आहेत. अर्थात सध्या बहुतेक
कोरीवकाम अस्पष्ट झाले आहे. हे मंदिर दुमजली आहे. काही जणांच्या मते हे
मंदिर निजामशाहीतील सरदार सुलतानजी निंबाळकर यांनी बांधले. तर काही
जणांच्या मते "तारीख ए बीड" या ग्रंथानुसार हे मंदिर महादजी शिंदे यांनी
बांधले.
भारतातील एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या गणेशधाम इथं आहे.
शशी केवडकर, बीड: भारतातील
एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या
गणेशधाम इथं आहे. समोर महामंगलेश्वर, मागच्या बाजूला शेषाद्रीदिष्टीत,
उजव्या बाजूला मयुरेश्वर आणि डाव्याबाजूला उत्तिष्ठ गणपती. बीड-पुणे या
महामार्गावर असलेलं हे देवस्थान अत्यंत जागृत देवस्थान असल्याची भाविकांची
श्रद्धा आहे.
बीड शहारापासून दहा किलोमीटरवर असलेलं नवगण राजुरी खुद्द
ब्रह्मदेवानं स्थापित केलं, अशी आख्यायिका आहे. या गावाला गणपतीचं गाव
म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चार मुख असलेली गणेशमूर्ती इथं आहे. आणि
मूर्तीच्या चारही गणपतीची नावंसुद्धा वेगवेगळी आहेत. समोरच्या बाजूचा
महामंगलेश्वर, मागच्या बाजूचा शेषाद्रीदिष्टीत, उजव्या बाजूचा मयुरेश्वर
आणि डाव्याबाजूचा उत्तिष्ठ गणपती.
गावाच्या चारही दिशेलासुद्धा गणपतीच्या चार
मूर्ती आहेत. चिंतामणी, वरद, संगमेश्वर आणि त्रिपुराधिष्टीत. तर उत्सव
मूर्ती असलेल्या गणपतीचं नाव आहे निर्विघ्नेश्वर. म्हणजे एकूण नऊ गणपती या
नवगण राजुरीत आहेत. प्रभू रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी यज्ञ करत
होते, तेव्हा दानवांनी यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गणपतीनं
चारही दिशेने स्वतःचा अवतार घेऊन दानवांचा नाश केला अशी दंतकथा आहे.
नायगाव मयूर अभयारण्य :-
बीड शहरापासून 25 कि.मी. अंतरावर पश्चिमेला असलेल्या नायगाव या गावाच्या
परिसरात हे अभयारण्य आहे. 1994 साली शासनाने या अभयारण्यास मान्यता दिली.
त्यामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलं मयूर अभयारण्य
म्हणून नायगावला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मयूर अभयारण्यात 10 ते 12
हजारांच्या दरम्यान मोरांची संख्या आहे. त्याचबरोबर तरस, लांडगे, कोल्हे,
सायाळ, खोकड, रानससे, रानमांजर, काळवीट, हरिण, मुंगूस इत्यादी प्राणी देखील
आहेत. या अभयारण्यापासून साधारण 40 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असा सौताडा
धबधबा आहे. समाधानकारक पाऊस झालेला असेल तर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत
मनमोहक धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो.
बस किंवा कार प्रवासात अचानक आपल्या गाडीसमोरून मोरांचे थवे
उडत आडवे गेले तर? किंवा आपल्या दोन्ही बाजूंनी खिडकीबाहेर डोकावताच
फुलवलेल्या पिसाऱ्यांनी नाचणारे, उडणारे मोर, मोरांचे थवेच्या थवे पाहायला
मिळाले तर? आनंदालाही पंख फुटतील ना? पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेले तर नायगावच्या रस्त्यावर
दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोडय़ाच जोडय़ा पहायला मिळतात. पाणवठय़ावर आलेले
मोर, झाडाच्या फांद्यांवर आपला भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून बसलेले मोर,
डोंगराच्या पायथ्याशी बसलेले मोरांचे थवे, असे मोरच मोर आपल्याला पहायला
भेटतात तरी मन शांत होत नाही. ‘‘दिल मांगे मोर’’ अशी आपली मन:स्थिती झालेली
असतानाच एखादा मोर आपला देखणा फुलोरा नाचवत थुईथुई चालत आपल्यासमोर येतो
आणि हे चित्र डोळ्यांत साठवतो.
बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर
बीड-पाटोदा-नगर व बीड लिंबादेवी-डोंगरकिन्ही-नगर या दोन रस्त्यांच्या
बाजूला असलेल्या डोंगराळ भागात हे अभयारण्य वसले आहे. पावसाळ्यात हे डोंगर
हिरवेगार झालेले असतात. हे अभयारण्य असून खुरटया झाडाझुडपांनी
आणि खुरट्या गवताने आच्छादलेले आहे. हे अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय
शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारातील आहे. या वनात राष्ट्रीय
पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शासनाने ८ डिसेंबर १९९४ ला हे
क्षेत्र “नायगाव मयूर अभयारण्य” या नावाने संरक्षित केले. त्या वेळी त्याचे
क्षेत्र २९.९० चौ. किमी होते. यात काही खाजगी वन क्षेत्र मिळून ते ५०.६०
चौ.किमी. झाले आहे. १००–५०० मी.चा पट्टा याप्रमाणे एक पट्टा खुरट्या
गवताचा, दुसरा पट्टा लागवडीखालील वनस्पतींचा, नंतर झाडाझुडपांचा मधेच उजाड
माळरानाचा व पुन्हा नैसर्गिक वन अशा पद्धतीने हे वन विखुरलेले आहे. उपलब्ध
माहितीनुसार २००४ या वर्षी येथील मोरांची संख्या ५,७०० होती. शासनाबरोबरच
इथल्या गावकऱ्यांनीही मोरांना अभय दिले आहे. मोराबरोबरच इतर पक्ष्यांच्या
शंभराहून अधिक जाती-प्रजाती या अभयारण्यात आढळतात. हे अभयारण्य डॉ. सलीम
अली पक्षी अभयारण्य या नावानेही ओळखले जाते.
अभयारण्याचे क्षेत्र डोंगर उताराचे असल्यामुळे व कमी पावसाचे असल्यामुळे कुसळी (Heteropogon contortus), पवना (Sehima sulcatum), मारवेल (Dicanthium annulatum), शेडा (Sehima nervosum) अशाप्रकारची खुरटी गवते तसेच करवंद (Carissa congesta), घाणेरी (Lantana cammara) इत्यादी प्रकारची झुडुपे येथे आढळतात. चिंच (Tamarindus indica), जांभूळ (Syzigium cumini), लोखंडी (Ventilago madaraspatana), साग (Tectona grandis), चंदन (Santalum album), खैर (Senegalia catechu), बेहडा (Terminalia belirica), पळस (Butea monosperma), बिबा (Semecarpus anacardium), आवळा (Embilica officinalis), सीताफळ (Annona squamosa), बेल (Aeglemarmelos), सालई गुग्गुळ (Boswellia serrata), तेंदू (Diospyrosmelanoxylon) इत्यादी नैसर्गिक अवस्थेत आढळणारी झाडे आहेत. वनखात्याने या अभयरण्यात सु. १२०० हेक्टर क्षेत्रात सुबाभूळ (Leucaena leucocephala), कडूनिंब/लिंब (Azadirachta indica), गिरिपुष्प (Gliricidia sepium), शिरस (Pseudotsuga japonica) आणि बोर (Zizyphus mauritiana)
या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. वड-पिंपळ प्रजातीतील काही
जातीही इथे वाढतात. वनस्पतींप्रमाणेच येथील प्राणी जीवनही वैविध्यपूर्ण
आहे. रानमांजर, तरस, काळवीट, लांडगा, कोल्हा आणि ससे हे प्राणी सापडतात.
यांच्याबरोबरच काही सापांच्या जाती, मुंगूस, अजगर आणि सरडे या अभयारण्यात
आहेत. येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी., उन्हाळ्यातील कमाल तापमान
४५० से. आणि हिवाळ्यात कमीत कमी तापमान १०० से.पर्यंत खाली जाते. अशा विषम वातावरणातही जैववैविध्य आढळून येते. या अभयारण्याला भेट देण्याचा योग्य काळ ऑक्टोबर ते जून असा आहे.
या परिसरात मदरशा दर्गा, डोंगरीचे
गुरुकूल, डोंगरकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.
नायगावच्या मयूर अभयारण्याचे वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क
पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या
क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. या
अभयारण्यात मोराबरोबर तरस, लांडगा, कोल्हा, रानमांजर, काळवीट, ससे
यांसारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या
पक्षांच्या प्रजाती आढळतात. नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे असून
बीडपासून या अभयारण्याचे क्षेत्र बीड-पाटोदा-अहमदनगर या मार्गावर २०
कि.मी.च्या अंतरावर आहे.नायगाव येथे बांधकाम खात्याचे दोन विश्रामगृह आहेत.
त्याचे आरक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांच्या
कार्यालयात होते. याशिवाय इतर निवास व्यवस्था येथे उपलब्ध नसली तरी बीड शहर
जवळच असल्याने खासगी निवासव्यवस्था मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे.
सौताडा धबधबा
सौताडा हे पाटोदा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून, श्रीक्षेत्र रामेश्वराचे
येथे मंदिर आहे. मंदिराजवळ ७०० फूट खोल दरीत धबधब्यातील पाणी पडते.
पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य नयनरम्य असते.
बीड-अहमदनगर राज्यरस्त्यालगत सौताडा हे गाव वसलेले आहे. पाटोद्यापासून
त्याचे अंतर १७ कि.मी. आहे. औरंगाबादहून बीड-पाटोदा मार्गे सौताड्याला जाता
येईल. मुंबईवरून यायचे असेल तर अहमदनगर, जामखेडमार्गे सौताडा लागते. बीड व
नगर जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने दोन्ही जिल्ह्यातील पर्यटकांना
सोयीचे ठरते. येथे मुक्कामी राहण्याची व्यवस्था नाही; परंतु नजिकच्या
हॉटेल, लॉजिंगमध्ये राहून पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. खोल दरीत
रामेश्वराचे मंदिर असून, चोहोबाजूंनी निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात
हा परिसर हिरवा शालू पांघरून पर्यटकांचे मन मोहून घेतो. वन विभागाने
चोहोबाजूला वृक्ष लागवड करून नैसर्गिक सौंदर्य जोपासले आहे. मंदिराजवळ
वेदशिक्षण देणारी संस्था आहे. त्यात ४० मुले निवासी वैदिक शिक्षण घेत आहेत.
सीता व राम हे वनवासात असताना सौताड्याला आले होते. सीतेला तहान
लागल्यानंतर रामाने बाण मारला. त्यानंतर धबधब्याची निर्मिती झाली, अशी
पौराणिक आख्यायिका आहे. या ठिकाणी सीतेची न्हाणी असून, ती इतिहासाची साक्ष
ठरली आहे.
सौताडा हे बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. निजामकाळात निजामाची
चौकी म्हणून गाव ओळखले जात असले, तरी येथील सुप्रसिद्ध धबधबा व दरीतील
रामेश्वराचे मंदिर यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. बालाघाट डोंगररांगांत
असलेल्या खोल दरीत विंचरणा नदीची धार पडत असून, हा प्रसिद्ध धबधबा पाचशे
फुटांपेक्षा अधिक उंचीवरून दरीत कोसळतो. दरीत घनदाट झाडी, विविध प्रकारची
वृक्षवेली, हरीण, मोर, वन्यप्राण्यांबरोबरच विविध प्रकारच्या
पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात असलेले रामेश्वराचे सुंदर मंदिर यामुळे
नैसर्गिकदृष्ट्या व आध्यात्मिक वारसा असलेले हे ठिकाण भाविक व पर्यटकांचे
आकर्षण ठरले आहे. दरवर्षी या ठिकाणी शैक्षणिक सहली, भाविक व पर्यटकांची
गर्दी असते.महाशिवरात्रीला येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
विशेषत: श्रावणात सुरू होणारा धबधबा व मोहरणारा निसर्ग यमुळे मोठी गर्दी
असते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी होत असली, तरी तिसऱ्या
श्रावणी सोमवारी येथे यत्रा भरते. य यात्रेस लाखो पर्यटक व भाविक हजेरी
लावतात.
नागमोडी वळणाचा सौताडा घाट, पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर,
धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेला रामेश्वर साठवण तलाव, तर धबधब्याच्या
खालच्या बाजूचा भुतवडा तलाव, पूर्वेकडून दरीत पडणारा छोटा धबधबा, तर
उत्तरेकडून पडणारा विंचरणा नदीचा प्रसिद्ध धबधबा यामुळे य निसर्गरम्य
परिसराची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून झाली आहे.
कपिलधार
वीरशैव पंथाचे पुनर्जिवन करणारे महात्मा बसवेश्वर तसेच शिवयोगी मन्मथ
स्वामी यांनी कपिलधार याठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. नयनरम्य
डोंगरदऱ्यांचा हा प्रदेश असून याच ठिकाणी संख्या शास्त्रकार कपिल
महामुनींनी तपश्चर्या केली होती. म्हणून या भागास कपिलधार असे म्हणतात.
येथील धबधबा मनमोहक आहे.
कपिलधार वीरशैव पंथाचे पुनर्जिवन करणारे महात्मा बसवेश्वर तसेच शिवयोगी
मन्मथ स्वामी यांनी कपिलधार याठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. नयनरम्य
डोंगरदऱ्यांचा हा प्रदेश असून याच ठिकाणी संख्या शास्त्रकार कपिल
महामुनींनी तपश्चर्या केली होती. म्हणून या भागास कपिलधार असे म्हणतात.
येथील धबधबा मनमोहक आहे.
राज्यात प्रसिद्ध असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ
लागली आहे. हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरातील हा धबधबा सर्वाच्याच
आकर्षणाचा केंद्रिबदू ठरू लागला आहे. कपिलधार येथेही धबधबा पाहण्यासाठी
पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मन्मथ स्वामींचे समाधीस्थळ असलेल्या
कपिलधारची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यात देखील आहे.
बीड जिल्ह्यातील सौताडा व कपिलधार हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून
ओळखले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच राज्याबाहेरूनही पावसाळ्यात
येथे निसर्गप्रेमी सहलीसाठी येत असतात. सौताडा हे धबधब्यासाठी, तर कपिलधार
हे मन्मथस्वामींचे समाधीस्थळ व उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेसाठी
प्रसिद्ध आहे.
कपिलधारला
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून, सौताडा येथील पर्यटनस्थळाचा प्रस्ताव
प्रलंबित आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच बीड शहरापासून अवघ्या
१३ कि.मी. अंतरावर कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे. कपिलमुनींनी ४७०
वर्षांपूर्वी या ठिकाणी अनुष्ठान केले होते. तेथे त्यांची समाधी आहे.
त्यानंतर मन्मथस्वामींनी येथे संजीवन समाधी घेतली होती. लाखो भाविकांचे हे
श्रद्धास्थान आहे.
सोलापूरहून
येणाऱ्यांसाठी मांजरसुंबा घाटातून कपिलधारला जाता येते, तर बीडहून
येणाऱ्यांसाठी घाटापासून स्वतंत्र रस्ता आहे. बीडमधून बसगाड्यांची व्यवस्था
आहे. कपिलधारमध्ये येणाऱ्यांना निवासी व्यवस्थेसह जेवणाची सोयही
देवस्थानात केली जाते. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा आनंद
घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली येत असतात. चोहोबाजूंनी डोंगरदऱ्या
असून, मध्ये मन्मथस्वामींची समाधी आहे. हेमांडपंथी मंदिरालगत उंचावरून
पडणारे धबधबे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. येथे छायाचित्र घेण्यासाठी
भाविकांबरोबरच पर्यटकांचीही गर्दी असते. येथे सहकुटुंब मुक्कामी राहता
येते. थुईथुई नाचणारे मोर, पक्ष्यांच्या किलबिलाट व निसर्गसौंदर्याची मुक्त
उधळण अशा आकर्षक वातावरणाचा आनंद लुटण्याची पर्यटकांना सुवर्णसंधी आहे.
कार्तिकी पौर्णिमा, श्रावण महिन्यात व माघ शु. पंचमीला येथे विविध धार्मिक
कार्यक्रम पार पडतात,
गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडण्याचं महात्म्य ज्या
ठिकाणाला लाभतं ते ठिकाण म्हणजे बीड जिल्ह्यातलं लिंबागणेश अशी भाविकांची
श्रद्धा आहे. गणपतीने चंद्राला शाप दिला मात्र इतर देवतांच्या विनंतीवरून
त्याची शापातून मुक्तता देखील केली, हे करताना चंद्राला बारा वर्ष
तपश्चर्या करावी लागली तेही हेच ठिकाण आहे.
नांदेड-पुणे या राज्य महामार्गावर एका वेगळ्याच नावाचं गाव तुम्हाला
लागतं, त्या गावाचं नाव आहे लिंबागणेश. अंदाजे साडेचार हजार लोकवस्तीचं हे
गाव आहे. गावातले बहुसंख्य गावकरी हे शेतकरी आणि वारकरी संप्रदायाला
मानणारे. एके काळी दंडकारण्याचा भाग असलेला हा परिसर लिंबासूरच्या
आधिपत्याखाली होता असं मानलं जातं.
या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या दक्षिणेकडून गंगा वाहते. लिंबा
नावाच्या भक्ताने भगवान शंकराची तपस्या करून वर प्राप्त केला. पण
मिळालेल्या आशीर्वादाचा दुरूपयोग केल्यानं गणपतीने या लिबांसूराचा अंत याच
ठिकाणी केला अशी दंतकथा सांगितली जाते. एवढाच नाही तर चंद्राला उप:शाप
मिळाला ते ठिकाणही हेच. अशी पौराणिक कथा देखील सांगितली जाते.
वर्षभरात या देवस्थानात विविध उत्सव आयोजित केले जातात. यात गणेशोत्सव हा
सगळ्यात मोठा आणि वेगळा असतो. या शिवाय वर्षभरातले इतर सण-समारंभ इथे
मोठ्या प्रमाणात होत असतात.
भक्तांच्या हाकेला धावणारा हा गणपती भालचंद्र या नावाने राज्यभर प्रसिद्ध
आहे. महामार्गावर असल्यानं या ठिकाणी भाविकांचा ओघ हा कायम सुरूच असतो.या
गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मागील अडीचशे - तीनशे वर्षाची एक अनोखी
परंपरा आहे. परिसरातील १४-१५ गाव-तांडा वस्तीत फक्त एकच गणपती बसविण्यात
येतो. हा गणपती देखील पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबात असतो.
धारूर
बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्त्वाचं ठिकाण आहे. राष्ट्रकुळांच्या काळात शहराचं संरक्षण करण्यासाठी धारूर किल्ला बांधण्यात आला होता.
बीड
जिल्ह्यातील धारूर हे महत्त्वाचं ठिकाण आहे. घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि
सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची
निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली
आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर अशी नावे रूढ झाली
असावीत. धार या शब्दाचे दोन अर्थ होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड
वाहणार्या पाण्याच्या धारेवर हे गाव वसलेलं आहे. तसेच गावाजवळच
धारेश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. मोगल राजवटीत अहमद नगरच्या
निजामशाहीने या गावाचे नाव बदलून फतेहाबाद असे ठेवले. पण मध्ययुगीन
कागदपत्रात किल्ले धारूर अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे
मोगल काळात या शहराला विशेष महत्त्व होते. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव
धारूर पडले. अशी माहिती अनेक जण सांगतात. पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे
सापडत नाही.
या स्थानाचा विकास काळाच्या ओघात होत गेला. आज मध्यम वाटणारे हे गाव मध्य
युगामध्ये राजकीय दृष्टा स्वतःचे वेगळे अस्तित्त्व टिकवून होते. उत्तर
मध्ययुगीन कालखंडात चंदीप्रसादजी मिश्रा, नगराध्यक्ष स्वरुपसिंह जहारी,
रामचंद्र शंकर शेटे, प्रमोद माधवराव शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले
आणि त्यांनी स्वतंत्र वसाहती वसवल्या. धारूरच्या वाढत्या विस्ताराबरोबरच
नगररचनेत आवश्यक त्या वास्तुंची निर्मिती होत होती. पाणी पुरवठ्यासाठी ज्या
बारवाची निर्मिती करण्यात आली त्यात २ हरिणपीर बावडी, रंगारोनी बावडी
यांचा उल्लेख करावा लागतो. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आढळतात.
उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून
ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात
उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद
तत्कालिन कला वैभवाची साक्ष आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी होती. कधीकाळी
हातमाग हा व्यवसाय इथे खूपच जोरात होता. धारूरचे शेले, साडा, धोतरजोडे
प्रसिद्ध होते. पण आज हा व्यवसाय संपूष्टात आला आहे.
किश्वरखानने महादुर्गाची उभारणी केल्यानंतर त्यांनी धारूर शहराची अत्यंत
योजनापूर्वक वसाहत केली. व्यापारी, उद्योगपती, विद्वान ब्राह्मण, सरदार
आदींना निमंत्रित करून धारूर शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. सन १६५८ साली
सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी पापय्या शेटे यांना सन्मानाने निमंत्रित
करून त्यांना रोअगिरी दिली. पापय्यांनी आपल्या बरोबर आणखी काही
व्यापार्यांना बोलावून धारूरची बाजारपेठ वसवली, वाढवली. त्याकाळी या
शहराचा लौकिक सर्वदूर पसरला होता. आजही मराठवाडातील एक महत्त्वाची
विश्वसनीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दूरवरून सोनं, चांदी खरेदीसाठी लोक
इथे येतात. सुवर्णकारांची संख्याही इथे फार मोठी आहे. आज कोल्हापूर,
सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, अंबाजोगाई इत्यादी शहरात सुवर्ण काम करणारे
कारागिर धारूर शहरातीलच आहेत.
धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे.
अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने
देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे
एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख
अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या
दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते
११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी
नोंद आहे.
किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा
सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर
नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून
पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही
बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला
हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा
तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच
अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा
सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात
ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत
असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग
जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात
प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.
मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड
जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात
काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक
म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी
स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी
पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही
काळ विठोजी राजे भोसले थांबले होते.शहाजीराजांनी बिदरशहाला या भागातच पराभूत केलं होतं. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला
जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद
झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे
वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी
दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये
नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.
त्यानुसार नेताजीस धारूर किल्ल्यात कैद करून दिल्लीस नेले. तिथे त्यांचे
धर्मांतर करून अली कुलीखान हे नाव ठेवले. पुढे कालांतरणाने नेताजीस आपल चुक
कळून आली. तो शिवरायांना शरण आला. त्याला पुन्हा त्यांना हिंदू धर्मात
घेतले. यावेळी शिवराय जातीने हजर होते. कधीकाळी अत्यंत मजबूत असणारा हा
किल्ला आता उद्ध्वस्त झाला आहे. शासनाचे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य
दुर्लक्ष आहे. पण आजही किल्ल्यात फेरफटका मारताच किल्ल्याची भव्यता आणि गत
वैभव लक्षात येते. किल्ल्यात टाकसाळ होती. राजाने स्वतःचे असे स्वतंत्र असे
नाणे काढले होते. सर्वच राज्यांचा हा किल्ला ताब्यात असावा असा जोरदार
प्रयत्न होता.
सत्ता-संपत्ती बरोबरच नगरात फार मोठा संख्येत बुद्धीमान माणसं होती.
ज्ञानी पंडित होते. तसेच संत महंतही होते, वेदोनारायण, कीर्तनकार होते.
उद्धवचिद्पन असाच एक महान संत कीर्तनकार, चरित्रकार. उद्ध्वचिद्धनसचे
चरित्र लेखन समोर ठेऊन अनेक संताचे चरित्र लेखन केले असे संत चरित्रकार
महिपती निम्रपणे कबूल करतो. अशा महान संतांची समाधी धारूर शहरात आहे. पण आज
ती दुर्लक्षीत अवस्थेत आहे. संत साहित्यात उद्धव चिद्धनाचे स्थान अत्यंत
श्रेष्ठ आहे.
भक्ती मार्गाने संत पदापर्यंत गेलेले शेख महंमद बाबा यांची समाधी (कबर)
जरी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे असली तरी त्यांची जन्मभूमी धारूर होती.
शेख महंमद बाबा जरी मुसलमान असले तरी त्यांचे शिष्य हिंदूही होते. आजही
श्रीगोंदा इथे त्यांच्या समाधीची पूजा हिंदू-मुसलमान एकत्र येऊन करतात. शेख
महंमदच्या जीवन कार्यावर मोरोपंत, महिपती, हनुमंत स्वामी या व अशा
अनेकांनी ग्रंथात गौरवाने उल्लेख केला आहे. शेख महंमदबाबाद अभंग लेखनही
भरपूर केलं.
साधुवर्य देशिकानंदन महाराजांचे मूळ वंशात त्यांचा जन्म झाला. कृष्णाजीपंत
हे धारूर सोडून अंबाजोगाईस गेले. गदाधरपंत, साळूबाई यांच्यापोटी बाळकृष्ण
जन्माला आले. शुकानंद महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर बाळकृष्णाचे देशिकानंदन
झाले. उमरी इथे त्यांची समाधी आहे. अंबादास बुवा, विठ्ठलशास्त्री धारूरकर,
भगवान शास्त्री धारूरकर, लिंबादेव वारेकर यांचा महाराष्ट्र आणि
महाराष्ट्राबाहेर फार मोठा लौकिक होता. त्यांचा कघाशीपर्यंत शिष्यसंप्रदाय
होता. वेदोनारायण म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक होता. अनेक ग्रंथाचे या
ज्ञानी पंडितांनी लेखन केले आहे. प्रभाकर शास्त्री पारेकर, बाबादेव पारेकर,
दत्तात्रय पारेकर, नरहरी शास्त्री पारेकर हे उत्तम प्रवचनकार आणि
कीर्तनकार म्हणून ओळखले जात. प्रभाकर पारेकरांना तर कीर्तन केसरी हा बहुमान
मिळाला.
हैदराबाद मुक्ती आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन यात धारूरकरांचा
महत्त्वपूर्ण वाटा होता. हा एक स्वातंत्र लेखाचाच विषय आहे. दक्षिण
भारतातील दुसरा आर्य समाज व नहले गुरुकुल धारूर इथे होते. तसेच वैदिक
अध्ययन-अध्यापनासाठी धारूरला फार मोठी वैदिक शाळा होती. अनेक विद्यार्थी
पाठशाळेत अध्ययन करीत. वेदाबरोबरच संस्कृत साहित्याचा, ज्योतिषाचा अभ्यास
करीत पुढे पुढे वैदिक शाळा बंद झाली. त्यामुळे धारूरच महत्त्व थोडं कमी
झालं. पंढरपुरला आजही धारूरकर पाठशाळा सुरू आहे. ही एक जमेची बाब आहे.
एकंदरीत धारूर ही एक प्राचीन, ऐतिहासिक, वैभव संपन्न नगरी होती व आजही
आहे. साहित्य, संगीत, नाट-कला या क्षेत्रातही धारूरकरांनी महाराष्ट्रभर
आपलं अस्तित्त्व सिद्ध केलं आहे. एक व्यापारी पेठ म्हणून सोन्या-चांदीची
विश्वसनिय पेठ म्हणून सारा महाराष्ट्र या नगरीकडे पाहतोय. धारूर ही एक
ऐतिहासीक सूवर्ण नगरी आहे. बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर एक तालुक्याचे
ठिकाण, एक प्राचीन ऐतिहासीक शहर. आजही गत वैभवाची साक्ष म्हणून प्रचंउ मोठे
चिरेबंदी वाडे तग धरून उभे आहेत. सोन्या चांदीची पेठ म्हणून महाराश्ट्रभर
या शहराचा लौकीक आहे. राष्ट्रकूट, यादव, चालुक्य, मोगल या सर्व राजवटीशी या
शहरांचा संबंध होता.
राष्ट्रकुळांच्या काळात
शहराचं संरक्षण करण्यासाठी धारूर किल्ला बांधण्यात आला होता. धारूर गावातून
गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाता येतं. धारूर गाव आणि किल्ला एकाच पातळीवर
असल्यामुळे त्याला भुईकोट असं म्हणतात. किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४.२
मीटर रुंद आणि ४.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे.
खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव
असून त्याला ‘सोलापूर दिंडी’ किंवा ‘खारी दिंडी’ असं म्हणतात. धारूर
किल्ल्यावर प्रवेश करताना दोन बुरूज लागतात. त्यातील डाव्या बुरुजाला
‘फतेह’ आणि उजव्या बुरुजाला ‘टाकसाळ’ बुरुज म्हणतात. शाही बुरुजावरून खाली
उतरून डावीकडे गेल्यावर ‘गोडी दिंडी’ या तलावाजवळ जाता येतं. हा तलाव दगडात
कोरून तयार करण्यात आला आहे. किल्ल्याच्या प्रमुख दरवाज्याकडे येताना दोन
मजली वास्तू दिसते. तिला ‘रंगमहाल’ या नावाने ओळखलं जातं.सुमारे 30 ते 40 एकर क्षेत्रामध्ये तो बांधलेला आहे.
धर्मापूरी
धर्मापूरी हे बीड जिल्ह्यातील परळी
तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई-अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी,
अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.
इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे.
गावामध्येच एक जुने राम मंदिर आहे. येथे बस स्थानक असून सर्वच बस इथे
थांबतात. जवळील रेल्वे स्थानक परळी आहे. बीडला पांडवकालीन ‘दुर्गावतीनगर’
म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले
‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव आहे.
पूर्वी राणी चंपातवतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही
पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत.
शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब
इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोत्त्क परिसर पुढे यादवांच्या
अंमलाखाली होता.
अल्लाउदीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो
(१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतल्याने ‘भीर’ म्हणून
ओळखला जाऊ लागला (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उद्यानंतर या प्रदेशावर
बहामनी सत्ता प्रस्थापित झाली.
त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला.
पेशवाईच्या कालखंडात निजाम आणि मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन आणि खर्डा
येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिध्द आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा
प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर
पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी
निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यंत.
बहामनी आणि निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता.
१ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनरचनेदरसम्यान बीड जिल्हासाहित्य
मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन व्दैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले.
शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये वेगळी
झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम आणि ब्रिटीश
यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले
गेले होते.
जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. बीड
जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील ब्राह्मणी (हिंदू) लेणी आणि
योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. आंबेजोगाई पासून २७ किमी
अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य
कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे.
या गावत मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला
धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला बांधण्यासाठी जे दगड
वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात.
या वरून या गावात अनेक मंदिरे होती आणि त्यांचेच दगड वापरून हा किल्ला
बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला आणि अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले
केदारेश्वर मंदिर ही दोन्ही ठिकाण आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
पहाण्याची ठिकाणे
धर्मापूरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतो.
किल्ला हा गावा मागील छोट्याश्या उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची
तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे.
किल्ल्याला ऐकेरी
तटबंदी आहे. तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात ९ अष्टकोनी बुरूज बुरूज आहेत.
चर्या, तटबंदी आणि बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनलेल्या
आहेत.
किल्ल्याला एकामागोमाग एख असे २ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य
दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. या
परकोटाच्या तटबंदीत छोटे पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. तेथून पायर्या चढून
वर जाऊन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे मुख्य पूर्वभिमूख प्रवेशव्दार आहे.
हा १० फूटी दरवाजा सध्या दगडानी अर्धा बंद केलेला आहे. दरवाजा समोरील
बुरूजावर आणि तटबंदीत फूले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या
दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्टया
बसवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला दोन तटबंदी लगत दोन
खोल्या बांधलेल्या आहेत.
या खोल्यांवरून पुढे गेल्यावर तटबंदीला लागून एक अप्रतिम चौकोनी विहिर
आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दुसऱ्या पायरीवर कमलपुष्प कोरलेले
आहे. २५ पायऱ्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या दोन
कमानी आहेत. सर्वात खालच्या पायरीवर आणि भिंतीवर किर्तीमुख कोरलेले आहे.
उपास नसल्याने विहिरीचे पाणी खराब झालेले आहे. विहिर पाहून बाहेर
आल्यावर समोरच्या तटबंदीवर जाणारा जिना दिसतो आणि बाजूला तटबंदी लगत काही
कमानी दिसतात. या कमानी म्हणजे रहाण्यासाठीच्या खोल्या असून या खोल्यांमागे
तटबंदीत २ संडास बनविलेले पहायला मिळतात.
यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. या खोल्या पाहून बुरूजावर
जाणाऱ्या जिन्याकडे जावे. येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणाऱ्या
मारूतीचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली चोर दरवाजा आहे. पण माती
पडल्यामुळे हा मार्ग सध्या बंद झाला आहे. पण तटबंदीच्या बाहेरून चोर दरवाजा
पहाचा येतो.
जिन्याने बुरुजावर गेल्यावर तिथे एका पीराचे थडगं पहायला मिळते.
तटतबंदीवरून प्रवेशव्दाराकडे येतांना डाव्या बाजूला किल्ल्याच्या खाली
असलेल्या रस्त्याच्या कडेला काही नागशिल्प दिसतात. तटबंदीला असलेल्या
जिन्याने प्रवेशव्दाराजवळ उतरावे. किल्ल्यातून बाहेर पडून नागशिल्पांकडे
जातांना तटबंदीत बाहेरच्या बाजूने एक भवानी देवीचे मंदिर आहे.
या मंदिराच्या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. त्यावर नक्षी आणि
खालच्या बाजूस काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. ते पाहून परत रस्त्यावर येऊन
नागशिल्पाच्या पुढे जाऊन तटबंदी पर्यंत चढून जावे. या ठिकाणी चोर दरवाजा
आहे. या ठिकाणी चोर दरवाजा आहे. या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे.
महिरपीच्या वरच्या बाजूस दोन कोनाड्यात दोन व्यालमुख आहेत.
दरवाजा समोर व्यालाची पूर्णाकृती मूर्ती पडलेली आहे. हे पाहून झाल्यावर
आपली गडफेरी पूर्ण होते. तटबंदी बाहेरील दोनही ठिकाणे झाडीत लपलेली
असल्याने शोधणे कठीण जाते, त्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी. केदारेश्वर हे
प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली
आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.
धर्मापुरीच्या किल्ल्याचा इतिहास :
या किल्ल्यास विशिष्ठ असे नाव नाही. हा
किल्ला धर्मापुरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. धर्मापुरीचा हा किल्ला, या
गावामध्ये निजामाच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला होता. मराठवाड्यातील या
परिसरामध्ये हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. आणि त्यावेळी अंबेजोगाई
परिसरात त्याची काही सत्ता केंद्रे होती. अंबेजोगाई येथे निजामाच्या सत्ता
केंद्राचे आज ही काही अवशेष दिसून येतात.
धर्मापुरीचा किल्ला ज्या दगडांपासून
बांधण्यात आलेला आहे, त्या दगडांवर कोरीव काम केलेले आहे. परिसरात एक मोठा
तलाव देखील आहे. धर्मापुरीच्या किल्ल्याचा आणि येथील मंदिरांचा इतिहास
रझाकारांशी जोडलेला आहे. असे म्हणतात की, हैद्राबाद मुक्ती संग्रामावेळी
रझाकारांनी या परिसरातील काही मंदिरे उध्वस्त केली होती.
धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरातील पहाण्यासारखी ठिकाणे :
अंबेजोगाईहून धर्मापुरीला आल्यानंतर
वाटेवरूनच आपल्याला किल्ला दिसतो. धर्मापुरी गावामधून किल्ल्याच्या मुख्य
दरवाज्यापर्यंत वाहन घेवून जाता येते.
किल्ल्याचा उंचवटा आणि तटबंदी : हा
किल्ला धर्मापुरी गावामधील एका उंच वट्यावर बांधलेला आहे. हा उंच वटा
दुरूनच आपल्याला दिसतो. तसेच पडझड झालेली किल्ल्याची तटबंदी देखील दिसते.
किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदी उंचवट्याच्या खालपासून बांधलेली आहे.
तटबंदीमध्ये उभारण्यात आलेले अष्टकोणी बुरुज आहेत.
अष्टकोनी बुरुज आणि तटबंदीवरील जंग्या : किल्ल्याच्या
तटबंदीवर अष्टकोनी बुरूज आहेत, आणि तटबंदीवरून मारा करण्यासाठी जागोजागी
जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. या जंग्या देखील किल्ल्याच्या बाहेरील
बाजूने दिसतात.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा : किल्ल्याला
दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ संरक्षक म्हणून कोट
बांधलेले आहेत. या कोटाच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.
यापुढे दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच
याठिकाणी नक्षीकाम देखील केलेले आहे.
किल्ल्यातील चौकोनी विहिर :
किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर अवशेषरूपातील खोल्या आहेत. या
ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर एक चौकोनी आकाराची विहिर आहे. या विहिरीमध्ये
उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
हनुमानाचे मंदिर : विहिरीपासून
पुढे गेल्यानंतर तटबंदीतील एका दगडावर कोरण्यात आलेले उड्डाण करणाऱ्या
हनुमानाचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली एक चोर दरवाजा देखील आहे.
पीर : धर्मापुरीचा हा
किल्ला निजामशाही सत्तेच्या कालखंडात बांधण्यात आलेला असल्यामुळे
किल्ल्याच्या परिसरात एक पीर आहे. किल्ल्याच्या परिसरातील एका बुरुजावर
पिराच हे थडगं आहे.
किल्ल्याच्या परिसरातील तलाव :
किल्ल्याच्या बाहेरील बाजूस एक तलाव आहे. धर्मापुरी गावातील लोक या
तलावाच्या पाण्याचा वापर करतात. जास्त प्रमाणात सांडपाण्यासाठी या पाण्याचा
वापर केला जातो.
केदारेश्वर मंदिर :
धर्मापुरी गावाच्या परिसरामध्ये केदारेश्वर हे प्राचीन मंदिर आहे.
मंदिराच्या परीसरात काही शिल्प पडलेली आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर
देखील शिल्प कोरलेली आहेत. या व्यतिरिक्त धर्मापुरीच्या किल्ल्याच्या
परिसरामध्ये काही नागशिल्प आहेत, भवानी देवीचे मंदिर आहे.
अंबेजोगाई
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामधील अंबेजोगाई या शहराचा स्वतः चा असा इतिहास
आहे. पूर्वी या शहराचे नाव मोमिनाबाद असे होते. या ठिकाणी कोकणवासीयांचे
कुलदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. आद्य कवि मुकुंदराज स्वामी
आणि दासोपंत महाराज यांची समाधी आहे. हत्तीखाना या ठिकाणी प्राचीन लेण्या
आहेत. काशी विश्वेश्वर मंदिर, बारा खांबी, खोलेश्वर मंदिर, बुट्टेनाथ
मंदिर, नागनाथ मंदिर तसेच खोपननाथ मंदिर ही मंदिरे स्थापत्य कलेचा उत्तम
नमुना असलेली महादेवाची मंदिरे आहेत. नुकतेच उत्खननात बाराखांबी याठिकाणी
काही मुर्त्या सापडलेल्या आहेत. येथील सर्वांत जुना उपलब्ध शिलालेख १२४० मधील सिंघण यादवाच्या कारकीर्दीतला
आहे. यादववंशीय जैत्रपाळ राजाची गढी (सध्याचा शहाबुर्झ) सु. ७००
वर्षोपूर्वीची आहे. यादवकालात या नगरीची विशेष भरभराट झाली. चक्रधाराच्या
तिर्थयात्रेत ज्या‘खोलानायकाचे आंबिया’ चा उल्लेख आहे, त्या सिंघण
यादवाच्या सेनापती खोलेश्वराचा शिलालेख येथील चोभाऱ्याच्या गणेश मंदिरात
आहे. ज्ञानेश्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचे नमूद आहे.
सोळाव्या शतकात दासोपंतांनी व सतराव्या शतकात कृष्णदयार्णवांनी येथे
ग्रंथनिर्मिती केली. समर्थ रामदासांनी या तीर्थाची यात्रा केली होती.
महाराष्ट्रामध्ये देवीची मुख्य पीठ आणि अनेक उपपीठे असली तरी अंबेच्या
नावाने प्रसिद्ध असलेले अंबेजोगाई हे एकच शक्तीपीठ अस्तित्वात आहे.
योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषत: कोकणातील चित्पावन
ब्राम्हणांची ही कुलस्वामिनी आहे. 'योगेश्वरी महात्म्य' या ग्रंथात देवीने
दंतासूराचा वध करण्यासाठी अवतार घेतल्याची कथा मांडली आहे. बीडपासून 100
कि.मी. अंतरावर असलेले अंबाजोगाई शहरात मंदिराच्यावतीने भाविकांसाठी यात्री
निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिर प्राचिन व हेमाडपंथी आहे.मंदिराच्या
बाहेरच्या भिंतीवर चार हत्ती,सिंह व माणसाचं कोरीव काम असलेली शिल्पपट्टी
दिसली.अंबेजोगाई गाव तसं प्राचिन.यादवांचा सेनापती खोलेश्वर याने बांधलेली
हेमाडपंथी शिवालयं पण आहेत गावात.तसंच मंदिराच्या बाजुला लागुनच पुरातत्व
खात्याचं मूर्ती संग्रहालय आहे.त्याच्या प्रांगणात अनेक मूर्ती ठेवल्या
होत्या.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर
अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र
देवीचे मुळस्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या शक्तीपिठापैकी हे मुळपीठ
म्हणून प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासीयांची कुलस्वामिनी व
अंबाजोगाई वासियांचे ग्राम दैवत म्हणूनहि प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते
कि श्री योगेश्वरी देवी मंदिर हे अनादिकालापासून आहे व देवीचा अवतार
स्वयंभू आहे. रुद्रयामाल या तांत्रिक ग्रंथातून देवीच्या सहस्त्रानामात
‘अंबापूर संस्थाना पातु योगेश्वरी देवी ‘ असा उल्लेकही आहे. त्याचपुढे
‘मुलादिवासिनी चंब अंबापूर निवासिनी’ याचा अर्थ म्हणजे या मुलस्थानी ती
अवतार घेऊन निवास करते. ‘सर्वतीर्थ परादेवी तीर्थ दक्षिणतः स्थितः’
त्याचप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे वास्तव्य अंबाजोगाई येथे सर्वतीर्थ
नावाच्या तीर्थाच्या दक्षिण दिशेस असल्याचे त्यामध्ये उल्लेख आहे.
योगिनी र्हदयदीपिका या ग्रंथत योगिनीचे वर्णनकेलेले ते असे कि ,
आदिशक्ती पार्वतीचे शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यवर जगताला प्रकाशभूत
होणाऱ्या आणि ब्रम्हा-विष्णू-महेश्वर आदि देवतामध्ये अंतर्भूत असलेल्या
लहान मोठ्या सर्व पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधले
जाते . अश्या या योगीनिमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी
देवता हि योगेश्वरी आहे . याप्रमाणे योगसाधनेला प्राधान्य देणारी देवी
म्हणूनही योगेश्वरी नाव प्रचलित झालेले आहे .
श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे. तसे पहिले तर अंबानगरीने
साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी
अनेक भूषणे धारण केली आहेत. मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज व मराठी
साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दासोपंत यांचे समाधिस्थान ही त्यापैकी दोन
उल्लेखनीय आहेत. अंबानगरीचे महत्व या कारणामुळे अतोनात वाढले असून प्राचीन
काळी ही नागरी इतर नगरांना बुशन भूत ( नगर भूषण भवः ) होऊन बसली
होती.योगेश्वरीचे शक्तिपीठ असल्यामुळे तर तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप
प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे.
मराठीचे आद्यकवी मुकुंदराज संस्कृत
भाषेमधील वेदांत शास्त्रासारखं अवघड तत्वज्ञान सामान्य
जनतेसाठी सोप्या
मराठी भाषेमध्ये सांगणाऱ्या ग्रंथकारांमध्ये आद्यकवि पदाचा मान
मुकुंदराजांना मिळाला आहे.
जैनधर्मिय राजा जैत्रपाळ याला त्यांनी परमार्थ मार्गाचे ज्ञान दिले.
'विवेकसिंधू' हा मराठीतील आद्यग्रंथ आहे. मुकुंदराजांनी 'परमामृत ' हा
ग्रंथ लिहिला. 'विवेकसिंधू' या ग्रंथाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन
भाग आहेत. पूर्वार्धामध्ये 777 ओव्या आणि उत्तरार्धामध्ये 894 ओव्या आहेत.
विवेकसिंधूमध्ये अव्दैतवादाची महती सांगितली असली तरी सामान्य जनतेसाठी
राजयोगाचा मार्ग सांगितला आहे. राजयोग प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे
सगुणोपासना होय. विवेकसिंधूमध्ये प्रतिपादन केलेल्या विषयांचा सारांश
परमामृत ह्या छोट्याशा ग्रंथात मुकुंदराजांनी सांगितला आहे. या ग्रंथांच्या
14 प्रकरणामध्ये एकंदर 303 ओव्या आहेत. अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस
पाच किलोमीटर अंतरावर मुकुंदराजांची समाधी आहे. संतकवी दासोपंत संतकवी
दासोपंत यांची अंबाजोगाई ही कर्मभूमी आहे. एकट्या गीतेवरच त्यांचे सहा
निरनिराळे टीकाग्रंथ आहेत. त्यापैकी 'गीतार्णव' नावाचा ग्रंथ सव्वा लाख
ओव्यांचा आहे.
दासोपंत :-
श्री दासोपंत स्वामी, अंबेजोगाई
स्थान: देशपांडे गल्ली, अंबेजोगाई, जिल्हा बीड
सत्पुरुष: श्री दासोपंत, आद्यकवी मुकुंदराज
विशेष: दत्तमंदिर, योगेश्वरीदेवी अंबेजोगाई
दासोपंतांचा दत्त, योगेश्वरी देवीच्यास्थानामुळे प्रसिद्ध असलेले
आंबेजोगाईचे ठिकाण आद्यकवी मुकुंदराज व संत दासोपंत यांच्या
वास्तव्यामुळेही पुनीत झालेले आहे.
दत्त संप्रदायातील तीन भिन्न पंथ आहेत. ते म्हणजे दासोपंती, गोसावी आणि
गुरुचरित्र पंथ. संत कवी दासोपंत हे त्यातल्या पहिल्या पंथाचे अध्वर्यु
होते. त्याच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे
एकमुखी द्विभुजी दत्त हेच सद्गुरूंचे रूप मान्य केलेले आहे.
दासोपंत हे एक महान दत्तभक्त होऊन गेले. दत्तात्रेयांनी त्यांना सगुण
रूपात दर्शन दिलेलें होते असे सांगितले जाते. दासोपंतांनी स्थापन केलेले एक
दत्तमंदिर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे देशपांडे गल्लीत आहे. तेथे
थोरले देवघर धाकटे देवघर असे दोन भाग आहेत. दासोपंतांनी आपले आयुष्य याच
मंदिरात व्यतीत केले होते. भगवान दत्तात्रेयांबरोबर त्यांचा सुखसंवाद येथेच
चालत असे असे स्थानिक सांगतात. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचे अनुयायी
सांगतात.
दासोपंतांची औरंगजेबाबरोबर घडलेली एक हकीकत येथे सांगितली जाते. ती खूप
रंजक आहे. औरंगजेबाची दासोपंतांवर खूप श्रद्धा होती. परंतु त्यांचे संशयी
स्वभावानुसार त्यांनी दासोपंतांची दत्तभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले.
दासोपंतांच्या दर्शनाला जाताना एकेदिवशी त्यांनी दत्तात्रेयांचे समोर
ठेवण्यासाठी नैवेद्याचे एक ताट बरोबर घेतले. या ताटात बकऱ्यांच्या मांसाचे
तुकडे होते. कपड्याने झाकलेले ते ताट बादशहाने दासोपंतासमोर ठेवले आणि
देवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले. कुठलीही शंका मनीं न घेता समंत्रक
प्रोक्षण करून दासोपंतांनी झाकलेल्या त्या ताटाचा नैवेद्य आपल्या आराध्याला
दाखवला. नैवेद्य दाखवून होताच औरंगजेबाने ताटावरील आवरण दूर करण्यास
सांगितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. हे सगळे नैवेद्याचे ताट सुंदर अशा
गुलाबाच्या फुलांनी भरून गेलेले होते. त्या फुलांचा सुगंध संपूर्ण मंदिरात
दरवळलेला होता. हा चमत्कार पाहताच औरंगजेब नतमस्तक झाला, आणि त्यांनी
तिथल्या तिथे दासोपंतांच्या दत्त मंदिरास तीन गावे इनाम म्हणून दिली अशी
ही कथा.
या मंदिरात दत्त जयंती आणि दासोपंतांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात
साजरी केली जाते. हे मंदिर क्षेत्र अतिशय पवित्र व श्रीगुरूंच्या आगमनाने
परमपवित्र झालेले आहे.
छापखान्याची सोय नसलेल्या 400 वर्षांपूर्वीच्या काळात आपलं बहुमोल
साहित्य दीर्घ काळापर्यंत टिकून रहावं म्हणून त्यांनी पासोडी वस्त्रावर
परिश्रमपूर्वक लेखन केलं. 40 फूट लांब अणि 4 फूट रुंद पासोडीवर दासोपंतांनी
'पंचीकरण' हा ग्रंथ लिहिला. ही दासोपंतांची पासोडी आजही त्यांच्या
वारसांकडे येथे जतन करुन ठेवण्यात आलेली आहे. संगीताच्या क्षेत्रातही
दासोपंतांनी अत्यंत मौलिक कार्य केलं आहे. दासोपंतांनी 'गीतार्णव',
'पदार्णव', 'गीतार्थबोध चंद्रिका' यासारखे ग्रंथ लिहिले. योगेश्वरी मंदिरापासुन थोड्या दूर अंतरावर
दासोपंतांच्या समाधी आहे.
गावा पासुन दुर असलेली दासोपंतांची समाधी निसर्गरम्य वातावरणात आहे.
दासोपंत हे दत्त संप्रदायाचे मध्ययुगीन संत कवी होते.त्यांनी काव्य
लिखाणाचा एक अभिनव प्रयोग केला होता.कागदावर काव्य लिहीण्याऐवजी त्यांनी
एका मोठ्या वस्त्रावर आपलं लिखाण केलं होतं.त्याला दासोपंताची पासोडी असं
म्हणतात.एका मोठ्या खोलीच्या मध्यभागी
दासोपंतांची समाधी होती.खोलीला चार ही दिशांनी चॅनेल गेट्स होते.समाधीच्या मागे जवळ प्राचिन
हेमाडपंथी शिवालय होतं.तिथुन थोडं वर चढलं की एक बारव होती.तिच्या विरूद्ध
बाजुला समोरच दुसरी बारव होती.दुसऱ्या बारवे समोर जुनी दगडी ओसरी
होती.तर बाजुला एक मंदिर होतं. ते मंदिर नृसिंहाचं
आहे व आत गडद अंधार असतो,जवळ मोबाइल चा टाॅर्च असेल तरच आतली नृसिंह मूर्ती
दिसेल आत मध्ये वाकुन जायला लागतं.मंदिराचं गर्भगृह तळघरात होतं.एका अत्यंत अरूंद चौकटीतुन
वाकुन खाली उतरलं की उजव्या हाताला वळून पुन्हा डाव्या हाताला परत एका
अरूंद चौकटीतून आत प्रवेश केला.तळघराला हवा व थोडा प्रकाश येण्यासाठी एक
झरोका होता.एका
कोनाड्यात ठेवलेली योगनृसिंहाची मूर्ती दिसली. त्या मूर्तीच्या बाजूला
दुसऱ्या भिंतीतील एका कोनाड्यात सांब सदाशिवाची पण मूर्ती
दिसली. कदाचित मूर्ती भंजकांपासुन सुरक्षित ठेवण्या
साठी असं केल्या गेलं असावं.औंढा नागनाथचं शिवलिंग पण असंच तळघरात आहे.
दासोपंतांच्या समाधी परिसरातच एका झाडाखाली कोण्या अनाम योग्याची
सिद्धासनात बसुन आशीर्वाद देणारी भग्न मूर्ती ठेवलेली आहे.
दासोपंतांच्या समाधी पासुन थोडं समोर गेलं की लागते मराठीचे आद्यकवी
मुकुंदराज यांची समाधी. मुकुंदराजांचं व त्यांच्या विवेकसिंधू या
ग्रंथाचं नाव बरेच वेळा ऐकलेलं असत..दोन डोंगरांच्या दरीत एका डोंगर उतारावर
मुकुंदराज समाधी आहे. खाली दरीत वाहणाऱ्या जयंती नदीच्या प्रवाहाचा खळाळणाऱ्या प्रवाहाचा
आवाज ऐकून प्रसन्न वाटत.
मुकुंदराजांची समाधी डोंगरात थोडी खाली आहे.
फार
तर पन्नास पायऱ्या असतील.वरून दिसणाऱ्या पायऱ्या संपल्यात की डाव्या हाताला
वळून पाच दहा पायऱ्या उतरलं की आपण समाधी समोर येतो.तिथुन तर समोरचा
डोंगर,खालचा नदी प्रवाह सगळं चित्रवत दृश्य दिसतं. एका रंगीत दारातुन आत गेलं की मुकुंदराजांची
समाधी आहे.समाधीला स्टील चे कठडे लावुन बंदिस्त केलंय. एका गुफे मध्ये ही
समाधी आहे.बाहेर एका ठिकाणी
ज्ञानेश्वरांची मूर्ती ठेवलेली आहे.व बाजूला ओसरी आहे.
मुकुंदराजांविषयी
माहिती मध्ये खुप मतांतरं आहेत.मुकुंदराज मुळचे आजच्या भंडारा जिल्ह्यातील
पवनीचे,त्यांनी विवेकसिंधूची रचना अंभोरा या गावात केली असं मानल्या
जातं.विदर्भातील झाडीपट्टी भागात विवेकसिंधू प्रचलित होता.मुकुंदराजांची
मूळ समाधी ही छिंदवाड्याजवळ खेडला या गावी आहे.परंतू जैत्रपाळाला
ब्रह्मानुभव देण्यासाठी मुकुंदराज अंबेजोगाईला आले होते अशी मान्यता
आहे.मुकुंदराज त्यांच्या काळात फार लोकप्रिय होते त्यामुळे त्यांची विदर्भ व
मराठवाड्यात ठिकठिकाणी प्रतिरूप समाधी निर्माण झाली होती.त्या समाधींना
नामसमाधी म्हणत.अंबेजोगाईची नामसमाधी खुप प्रसिद्धीला आली व लोकांना हळूहळू
खेडला येथील मुळ समाधीचा विसर पडला असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.
एकदा समर्थ रामदास अंबेजोगाईला आले व मुकुंदराजांच्या समाधीच्या दर्शनाला
गेले.तिथे त्यांना विवेकसिंधू सारखा ग्रंथ लिहीण्याची प्रेरणा झाली.तिथुन
पुढे शिवथर घळीत जाऊन रामदासांनी दासबोध लिहीला अशी कथा मी ऐकली आहे. एका
गुफेत असलेल्या समाधीचं सुशोभीकरण करणाऱ्यांनी गुफा पण रंगवली आहे.
तसंच योगेश्वरी देवीचं प्राचिन हेमाडपंथी मंदिर सुद्धा आतुन बाहेरून रंगवलं
आहे.बराच वेळ झाला होता.
जैन लेणी ‘हत्तीखाना :-
इथं असलेली बाराव्या शतकातील प्राचीन जैन लेणी ‘हत्तीखाना’ नावानं प्रसिद्ध
असून ती आज अतिशय दुर्लक्षित आहेत. त्यांनी आपलं अस्तित्व कसंतरी टिकवून
ठेवलं आहे.
आंबाजोगाई इथल्या योगेश्वरी मंदिराच्या वायव्येला केवळ
अर्ध्या किलोमीटर अंतरावर, जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून २०० मीटरवर
इ. स. १०६६ मधे खोदण्यात आलेली मंदिरं आहेत. यांना हत्तीखाना लेणी किंवा
शिवलेणी गुहा, जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवी लग्न मंडप असंही म्हटलं
जातं. १०६० ते १०८७ या काळात शासन करणाऱ्या उदयादित्य राजाच्या काळात ही
लेणी खोदली गेली. आज ही लेणी महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराशास्त्रीय
स्थळे आणि अवशेष १९६०च्या अधिनियमानुसार संरक्षित केलेली आहेत. चौकोनी
आकाराच्या या लेण्यांचं प्रवेशद्वार दक्षिणेकडे असून प्रवेशद्वाराजवळ खडकात
कोरलेले हत्तीचे दोन भव्य पुतळे दिसतात. त्यावरूनच या लेण्यांचं नाव
हत्तीखाना असं पडलं असावं. बहामनी काळात या जागेचा उपयोग हत्ती पाणी
पिण्यासाठी करत होते, असेही संदर्भ सापडतात. लेणी मंडपाच्या आत साडेआठ चौरस
मीटरचं प्रांगण आहे. हा मंडप चार दगडी स्तंभांवर तोललेला आहे. प्रांगणामधे
कुशलतेनं खोदलेला ९.१४ x ९.१४ मीटर आकाराचा नंदी मंडप आहे. मध्यभागी
नंदीची मूर्ती आहे. प्रांगणाच्या चारही बाजूंना चार हत्ती आहेत. यातील एक
हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो. लेण्यांतील गुहांचा अंतर्भागही पूर्वी खूप
आकर्षक असावा. लेण्यांतील एक गुहा ३२ खांबांवर तोललेली आहे. तिथे शंकर आणि
गणपतीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. पूर्वेला एक सभामंडप आहे. त्यात तीन
प्राचीन गर्भगृहं असावीत. नंदीमंडपाच्या शेजारी एक तुटलेला मानस्तंभ असावा.
तो असावा असं दर्शविणारी एक गोलाकार संरचना आजही शिल्लक आहे. इथे एक
शिलालेख सापडला होता. तो अंबाजोगाईच्या तहसीलदार कार्यालयात सुरक्षिततेसाठी
हलविण्यात आल्याचं कळलं. या शिलालेखात महामंडलेश्वर उदयादित्य या
राष्ट्रकूट राजाने सेलू, राडी, जवळगाव आणि कुंभेफळ ही गावं लेण्यांच्या
देखभालीसाठी इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आढळतो. डोंगर उताराच्या सपाट
भागावर आणि त्या काळच्या समृद्ध नदीकाठी ही लेणी खोदली गेली.
आज मात्र
लेण्यातील अनेक मूर्ती आणि दगडात कोरलेली हत्ती शिल्पं दुभंगलेल्या अवस्थेत
दिसून येतात. आजही या नदीच्या किनाऱ्यावर अनेक जैन, हिंदू मंदिरं दिसतात.
प्राचीन काळी हा प्रदेश खूप विकसित व संपन्न असावा. पावसाळ्याव्यतिरिक्त
वर्षाच्या इतर वेळी या नदीची आजची अवस्था अगदीच दयनीय आहे. युद्धजन्य किंवा
तत्सम परिस्थिती उद्भवल्यानं किंवा अनुदान न मिळाल्यामुळे यातील बरीच लेणी
अपूर्ण राहिली असावीत, असं जाणकारांचं निरीक्षण आहे. एका समृद्ध आणि
संपन्न कालखंडाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या लेण्यांची झालेली दुर्दशा बघून
आपण आपल्या वारशाबाबत किती असंवेदनशील आहोत त्याची कल्पना येते
अंबेजोगाई ला देवीच्या मंदिरात दर्शन आटोपल्यावर बाहेर पडण्यापूर्वी
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या यज्ञकुंडाच्या बाजुला ओसरीत
अंबेजोगाई गावातील ऐतिहासिक प्राचिन प्रेक्षणीय स्थळांची सचित्र माहिती
दिलेली आहे,ती वाचली.
हत्तीलेणीचा फोटो बघुन मनात कुतूहल जागं झालं होतं.दासोपंतांची समाधी व
मुकुंदराजांच्या समाधीला दर्शनासाठी जाण्याचं मी आधीपासुनच ठरवलं होतं
त्यात आता हत्तीलेण्याची भर पडली होती.मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला
हत्तीलेणं कुठं आहे? कसं जायचं तिथे? खुप चढायला उतरायला लागतं का? याची
चौकशी केली.त्यांनी सांगितलं की मंदिरापासुन जवळच हत्तीलेणं आहे,फार चढायला
उतरायला लागत नाही व दासोपंत व मुकुंदराजांच्या समाधीच्या रस्त्यावरूनच या
लेण्याला जाता येतं.हे ऐकून मला फारच हायसं वाटलं.तत्क्षणीच मी हत्तीलेणं
बघायचंच ठरवलं.
मुकुंदराजांची समाधी बघुन देवीच्या मंदिराकडे परत येताना भक्तनिवासाच्या
थोडं अलिकडेच डाव्या हाताला एक वाट जाते,ती सरळ हत्तीलेण्यापर्यंत.मूळात
हत्तीलेणं हे एक शिवमंदिर आहे.मी आजपर्यंत अनेक शिवमंदिरं व लेण्या
बघितल्या आहेत परंतू या ठिकाणी बाहेर एका प्रशस्त मंडपात नंदीचं बसलेलं
शिल्प आहे तितका प्रशस्त नंदीचा मंडप इतरत्र कुठेही बघायला मला तरी भेटला
नाही.या नंदीमंडपाच्या अवतीभवती चार दिशांना हत्तीचे विशालकाय शिल्प
बनवलेले आहे. या शिल्पांमुळे त्याला हत्तीखाना किंवा हत्तीलेणं हे पण नाव
लाभलंय.
आपल्या भारतामध्ये अदमासे चार हजाराच्या जवळपास तरी लेण्या
असतील.त्यातील अठराशे ते दोन हजार एकट्या महाराष्ट्रात
असाव्यात.(जिज्ञासूंनी माहिती तपासुन घ्यावी.मी लिहीलंय हे शब्दशः प्रमाण
मानू नये,ही विनंती,मानवी बुद्धी व स्मरणशक्तीच्या मर्यादांना मी अपवाद
नाहीये.) सटवाई ने माझ्या भाग्यात अनेक लेण्या व गुफांना अकस्मात भेटीचा
योग लिहीला असावा असा मला कधीकधी संशय येतो.माहुरचं पांडव
लेणं,गांधारपाल्याच्या बौद्धलेणी, घारापुरीच्या एलिफंटा व कार्ले आणि
भाज्याच्या लेण्या या पण मी अशाच बघितल्यात.बाकीच्या आठवायचं झालं तर
कर्नाटकातील बदामी,हंपी,ओरिसातील भुवनेश्वरच्या,उज्जैनच्या अशा
ठिकठिकाणच्या लेण्या पण बघितल्यात.या सर्व ठिकाणी एखाद्या डोंगरात लेण्या
कोरल्या आहेत.हत्ती लेण्यांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य हे आहे की हे लेणं
डोंगर कोरून बनवलेलं नसून जमिन खोदून बनवलेलं आहे.
लेण्यात जाण्यासाठी जमिन खोदून चार-पाच पायऱ्या जमिनीखालून लेण्याच्या
आवारात जातात.वर जमिनीची कमान आहे व खालून पायऱ्या उतरून आपण लेण्याच्या
आवारात प्रवेश करतो. लेणं खुप प्रशस्त व ऐसपैस आहे. आत प्रवेश केल्या बरोबर
आपल्या उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला हत्तींचं शिल्प बनवलेलं आहे.समोरच
नंदीमंडप आहे.तो पण प्रशस्त व ऐसपैस आहे.मंडपात नंदीचं शिल्प आहे जे मुख्य
लेण्याकडे तोंड करून बसवलेलं आहे.या नंदीमंडपाच्या डाव्या व उजव्या बाजुला
समोर पण हत्तीचं शिल्प आहे.नंदीमंडप व लेण्यांची भिंत यामध्ये छत नाही
त्यामुळे भरपुर हवा व सूर्यप्रकाश येतो.
या नंदीमंडपाजवळच प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला एक कुंड आहे.मी गेलो
तेव्हा ते कुंड पाण्याने तुडूंब भरलेलं होतं.परंतू पाण्याचा वापर किंवा
उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलं होतं.हे पाणी पावसाचं जमा झालेलं होतं की
कुंडात पाण्याचा झरा आहे याची माहिती देणारं कसलाही माहितीफलक किंवा कोणी
पुरातत्व विभागाचा कर्मचारी तिथं नव्हता.
नंदीमंडपासमोर मुख्य शिवलेणं आहे.शिवलेण्याला चांगलाच प्रशस्त वऱ्हांडा
सोडला आहे व त्यानंतर भिंतीमध्ये दरवाजा असून छोटे छोटे कक्ष आहेत.एका
दाराच्या दोन्ही बाजुला कोरलेले प्रचंड शिल्प बघुन माहुरच्या
पांडवलेण्यातील द्वाररक्षकांच्या शिल्पांचीच आठवण आली मला. भिंतीवर कधीकाळी
अनेक शिल्पं कोरलेले असावेत याची स्पष्ट चिन्हं दिसत होती.तसंच कधी काळी
या शिल्पांना रंग पण दिला असावा .या लेण्यामध्ये मला एक विशेष बाब जाणवली
ती ही की इथे मूर्तीभंजकांचा उपद्रव होण्यापेक्षाही निसर्गाचा
या शिल्पांवर प्रभाव पडला होता.कालौघात इथली सगळी शिल्पं झिजून गेली
आहेत.मी काही पुरातत्वशास्त्र किंवा मूर्तीशास्त्र तज्ञ नाही पण मला लेण्या
गुफा व शिल्पं बघायला आवडतं.या लेण्या बघतांना पण मनात विचार आला तो या
लेण्या बनवणाऱ्या शिल्पकारांचा.त्यांना भुगर्भातील दगडाच्या रचनेचा किती
अभ्यास असावा ना! जमिन कुठपर्यंत खोदत न्यायची,खोदलेल्या जमिनीत कुठेपर्यंत
लेण्या कोरायच्या? कारण समजा दहा फुट कोरत न्यायचं ठरवलं असेल आणि दगड जर
दहा फुटांपूर्वीच संपला तर सगळेच श्रम वाया जाण्याची भीती होती. हे प्रचंड
हत्ती पण मुळ दगडातूनच खोदताना कोरलेले असावेत…थोडीफार जरी चूक झाली तर
सगळं शिल्प विद्रुप झालंच असतं पण पूर्ण लेण्याच्या सौंदर्याला बाधा आली
असती. आजही हत्तींच्या झिजलेल्या शिल्पांवरील झुलीतलं नक्षीकाम आपण बघू
शकतो. हा ब्लाॅग लिहीत असताना मला हे जाणवतंय की ज्या शिल्पकारांनी दगडातुन
एवढं सुंदर शिल्पकाव्य निर्माण केलं त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचं वर्णन
करायला माझे शब्द फारच अपुरे आहेत.तिथल्या शिल्पांच्या छायाचित्रांसह या
पोस्टचा समारोप करत मी आपली रजा घतोय.
परळीचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग :-
देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात
आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ
हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ
हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व
धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
हे मंदीर देवगिरीच्या यादवांच्या श्रीकरणाधिप हेमाद्री यानं बांधलं. त्या
मंदिराच्या अवशेषापैकी फक्त नंदी सुस्थितीत राहिलेला होता. त्यानंतर
शालिवाहन शक १६९९ ला इंदोरचे राजे मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई व
खंडेराव होळकर यांच्या पत्नी साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर
जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. याचा उल्लेख मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात
असलेल्या शिलालेखात करण्यात आल्याचे दिसून येते. गुढी पाडव्याच्या दिवशी
वैजनाथांच्या मंदिरात गुढी उभारण्याचा समारंभ असतो. श्रावण महिन्यात येथे
रुद्राभिषेक चालतो. दसऱ्याच्या दिवशी देवाची पालखीतून मिरवणूक निघते.
मंदिराच्या सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत.
येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंडपाशिवाय मंदिरात दोन
गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीनं सजविलेले आहेत. मुख्य
ज्योतिर्लिंगाच्या सभोवती बारा लिंग आहेत.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून
वैद्यनाथ ओळखले जाते. परळी शहराच्या पश्चिमेला मेरू पर्वताच्या पायथ्याशी
वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. या शिवपिठाचे
वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी शंकराचा निवास हा सहकुटुंब आहे. वैद्यनाथाचे मुळ
मंदिर हे यादवकालिन आहे. बाराव्या शतकाच्या प्रारंभी हे मंदिर बांधले गेले
असावे असे मानले जाते.श्री. वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती आहे.
या मंदिराच्या दगडी शिखरावर विविध देवतांच्या मुर्ती आहेत. मुख्य मंदिराला
पाच दरवाजे आहेत. पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो. या वरील
दगडी कोरीव काम, शिल्प व भक्कम बांधकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते. चैत्र
पोर्णिमा व अश्विन पोर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली किरणे याच
प्रवेशद्वारातून वैद्यनाथाच्या पिंडीवर पडतात. या महाद्वारावर त्रीकाल
चौघडा करण्यात येतो. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर विस्तीर्ण, उंच
व प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप आहे. १८८५ च्या सुमारास
हे काम करण्यात आले आहे. या मंडपाच्या भव्यतेने मंदिराची शोभा वाढली आहे.
या मंडपाखाली आठ फुट लांब व त्यापेक्षा कमी रुंद असा दगडी चबुतरा असून
त्यावर चार कोरीव दगडी खांब आहेत. या खांबावर दगडी मंडप उभारलेला आहे. या
मंडपात नंदीच्या चार व गणेशाची एक मुर्ती आहेत. आत आल्यावर विशाल गर्भगृह
आहे. या गर्भगृहात प्रवेश करताना गणेश व पार्वतीचे दर्शन होते. या ठिकाणी
शाळिग्रामची दिव्य पिंड आहे. या मंदिराशी दोन लोकप्रिय प्रख्यात जोडलेले
आहेत. एक पौराणिक कथा अमृत व राक्षस राजा रावण आणि शिव यांच्या
स्वभावाविषयीची इतर वार्तांबद्दल बोलते.
या मंदिराच्या परिसरात ओवर्या, शिवमंदिरे, ध्यान मंदिर, वीरभद्र पितळी
विशाल मुर्ती, नारद मंदिर, गायत्री मंदिर आहे. मंदिरालगत भव्य दगडी
दीपमाळेचा दीपस्तंभ आहे. याच्या पायथ्याशी अहिल्याबाई होळकर यांचा
अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. मार्च १९८५ ला देवल कमिटीने हा पुतळा
बसवला आहे. वैद्यनाथ मंदिर हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा
आहे.
धार्मिक महत्त्व
कांतीपुरी,वैजयंतीक्षेत्र, जयंतीक्षेत्र, प्रभाकर क्षेत्र, पर्यली ही परळी
वैजनाथ ची प्राचीन नावे आहेत. जगाच्या उद्धारासाठी भारतभुमीत शिवलिंग
आवतरले. वायूच्या संघर्षाने या ज्योतिर्मय स्वरुपाचे बारा भाग होउन ते
इतस्ततः विखुरले तीच आज प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंगे होत, असा उत्पत्ती
विषयी 'परळी महात्म्य' या प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे.
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग येथे येण्यासाठी
विविध साधने उपलब्ध आहेत , रेल्वे , राज्य परिवहन बसेस , ईत्यादी . औरंगबाद
हे सर्वात जवळचे विमानतळ आहे . औरंगबाद येथून खाजगी वाहनाने श्री क्षेत्र
ज्योतिर्लिंग परळीला येता येते .औरंगबाद ते परळी ज्योतिर्लिंग अंतर अंदाजे
230 किमी आहे , तसेच पुणे व मुंबई हून रोज रात्री खाजगी ट्रॅवल्स उपलब्ध
आहेत. मोठे औष्णिक विज निर्मिती केंद्र व सीमेट कारखाना ही श्री क्षेत्र
परळी ज्योतिर्लिंगची वैशिष्ठे आहेत.
देशभरातून लाखो भाविक श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगचा दर्शनास येतात .
त्यांच्या दर्शनाची चोख व्यवस्था मंदिर विश्वस्थाकडून केली जाते तात्काळ
दर्शनासाठी स्पेशल दर्शन पास महा शिवरात्रिस व श्रावण सोमवारी उपलब्ध
असतात. राहण्यासाठी येथे उत्तम व्यवस्था देवस्थान भक्त निवासात
आहे.सुरक्षेसाठी शंभर पेक्षा जास्त सिसिटीव्ही कॅमेरा व सेक्युरिटी गार्ड
यांची करडी नजर मंदिरावर असते. पिण्यासाठी शुध्द आरो पाणी याची चोख
व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून केली आहे . रोज खिचडी प्रसाद व दोनवेळा
भोजन प्रसाद श्री सदाशिवसेवा अन्नछत्र मार्फत केली आहे. यात्रेकरूंचे सामान
ठेवण्यासाठी लॉकर रूमची सुविधा उपलब्ध आहे .वाहन पार्किंग साठी मोठे वाहन
तळ उपलब्ध आहे .
मंजरथ:-
मंजरथ हे माजलगाव
तालुक्यातील एक गाव आहे ,माजलगाव पासूनचे अंतर १० कि.मी आहे .मंजरथ हे
पुरातन गाव असून ,'दक्षिण काशी' या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.मंजरथ हे
सिंधुफेणा व गोदावरी नदीच्या संगमावर वसलेले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून
प्रसिद्ध आहे. त्या गावाचे रामचंद्र दीक्षित. त्यांचा अडीचशे-तीनशे
वर्षांचा जुना वाडा मंजरथ येथे उभा आहे!
मंजरथ हे गाव टेकडीवजा थोड्या उंचीवर वसले आहे. सतराव्या शतकात वाडा
बांधला गेला.
असे म्हणतात कि मंजरथ चा गोदावरी नदीवरील एक घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधून दिला आहे.
गोदावरी
नदीला गौतम ऋषी नि आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे.या नदी मध्ये
महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे आहेत त्यामध्ये मुख्य ३ तीर्थे आहेत ,१
त्रीम्बके ( गंगेचे उगमस्थान)२ अब्जके (गंगेचे हृदय स्थान ) ३ गोदासागर
संगमे( गोदावरीचे सागर संगम स्थान ) या तिन्ही दुर्मिळ तीर्थात अब्जके चे
स्थान विशेष महत्वाचे आहे, हे अब्जक तीर्थ मार्जार क्षेत्र म्हणजेच श्री.
क्षेत्र मंजरथ ,ता. माजलगाव जी. बीड (मराठवाडा) येथे आह.
मंजरथ येथे बरेच प्राचीन मंदिरे आहेत .त्यातले एक म्हणजे हनुमंतेश्वर मंदिर
हनुमंतेश्वर
मंदिर ,मंजरथ :- गोदावरी नदीचे सिंधुफेना(सिंदफणा) नदीशी संगम स्थान ते
हनुमंतेश्वर मंदिर पर्यंत च्या मधल्या भागाला अब्जक तीर्थ म्हणतात. गोदावरी
नदीला गौतम ऋषी नि आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे.या नदी मध्ये
महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे आहेत त्यामध्ये मुख्य ३ तीर्थे आहेत ,१
त्रीम्बके ( गंगेचे उगमस्थान)२ अब्जके (गंगेचे हृदय स्थान ) ३ गोदासागर
संगमे( गोदावरीचे सागर संगम स्थान ) या तिन्ही दुर्मिळ तीर्थात अब्जके चे
स्थान विशेष महत्वाचे आहे, हे अब्जक तीर्थ मार्जार क्षेत्र म्हणजेच श्री.
क्षेत्र मंजरथ ,ता. माजलगाव जी. बीड (मराठवाडा) येथे आहे.
त्यानंतर अजून एक त्रिविक्रमाचे मंदिर आहे ज्यामुळेच मंजार्थ ला मंजरथ हे नाव पडले आहे .
मंजरथ महात्म्य :- केसरी नावाच्या गंधर्वाला अंजना आणि आद्रिका
नावाच्या दोन भार्या होत्या श्रापामुळे अंजना वानरी तर आद्रिका मार्जार
(मांजर) झाली.काही काळानंतर आद्रीकेने अब्जक तीर्थात (गोदावरी-सिंदफणा संगम
) स्नान केले असता तिचे मूळ रूप तिला प्राप्त झाले म्हणून हे क्षेत्र
मार्जार क्षेत्र म्हणून ओळखले जाते जे पुढे मंजरथ म्हणून ओळखले जाते.
मांजरीच्या नावाने मंजरथ ओळखले जाते ती मांजर भगवान श्री त्रीविक्रमासोबत दिसते .
त्रिविक्रम मंदिर खूपच सुंदर आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे .
मंजरथ विषयी माहिती मिळवण्यासाठी नांदुरकर गुरुजींचे खूप सहकार्य मिळाले.
गंगामसला:-
मंजरथपासून १५ कि.मी. वर गंगामसला हे माजलगाव तालुक्यातील भालचंद्र
गणेश मंदिरासाठी प्रसिध्द असलेले स्थान आहे. हे गणपतीच्या प्रमुख २१
क्षेत्रापैकी एक मानले जाते.
हे मंदिर पेशव्यांचे एक सरदार हरी विनायक फडके यांनी तीनशे वर्षापुर्वी
बांधले असे मानले जाते. तसेच या देवस्थानाला सरदार निंबाळकर यांनी ईनाम
दिले.त्यांचे वंशज आजही गणेश चतुर्थीला पुजा करतात. हे मंदिर गोदावरी
नदीच्या तीरावर आहे.
या स्वयंभु मुर्तीच्या दर्शनासाठी ईथे यात्रेकरुंची मोठ्या प्रमाणात वर्दळ
असते. दरवर्षी भाद्रपद महिन्यात तसेच दिवाळी व श्रावणात यात्रा असते,
त्यावेळी भाविकांची विशेष गर्दी असते.
विज्ञान गणेश मंदिर - राक्षसभुवन
हे गोदावरी नदीच्या काठावर असलेले एक छोटेसे, छान गणेश मंदिर आहे.
श्री गणपतीच्या २१ पूर्ण पीठांपैकी एक पूर्ण पिठ असून, ह्या गणेशाची
स्थापना श्री दत्तात्रेयांच्या हस्ते झाली अशी मान्यता आहे. तसेच ह्या
ठिकाणी श्री दत्तात्रेयांनी अनुष्ठान पण केले होते अशी मान्यता आहे.
मंदिराचे मंदिराची पुनर स्थापना पेशवे कालीन आहे अशी मान्यता आहे.
श्री विष्णुपद - पांचाळेश्वर
ह्या ठिकाणी श्री शिवदत्त महाराजांची संजीवन समाधी आहे. हे त्यांचे
अनुष्ठान स्थान पण आहे. तसेच श्री शिवदत्त महाराज हे स्वत: श्री दत्त
अवतारी सत्पुरुष होते. त्यांचा आध्यात्मिक आणि दैवी वार्तालाप, प्रत्यक्ष
श्री वासुदेवानंद सरस्वती व श्री दत्त प्रभुन सोबत रोज रात्री ह्याच ठिकाणी
होत असे. हे प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या भक्तांना त्रिमूर्ती अवतारात
दर्शन देऊन सांगितले आहे. श्री शिवदत्त महाराजांनी ह्या ठिकाणी संजीवन
समाधी साधारणत: १३० वर्षां पूर्वी घेतली. त्यांचे चरित्र आणि जीवनगाथा
ग्रंथावर सविस्तर पुनर्लेखन श्री भगवंत कुलकर्णी हे करत आहेत. हे ग्रंथ
निर्मितीचे काम सध्या चालू असून लवकरच श्री शिवदत्त महाराजांच्या चरित्राचे
प्रकाशन होणार आहे.
संजीवन समाधी वर सुरेख, सुबक अश्या शिवलिंगाची आणि नंदीची स्थापना केलेली आहे.
ह्या समाधी च्या दुसऱ्या भागात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे.
संजीवन समाधी च्या समोरील बाजूस श्री शिवदत्त महाराजांचे बसण्याचे ठिकाण (गादी - श्री विष्णुपद) असून त्यांच्या पादुका पण आहेत.
ह्याच भागात श्री दत्तात्रेयांची अतिशय सुंदर, सुबक अशी मूर्ती स्थापिली आहे.
श्री
शिवदत्त महाराजांची संजीवन समाधी, हे ठिकाण श्री आत्मतीर्थ,
पांचाळेश्वर ला जाताना अलीकडेच साधारणत: १ कि. मी. अंतरावर उजवीकडे थोडेसे
आतील बाजूस आहे.गर्द झाडी आणि वनराईने नटलेला हा परिसर एकदम शांत असून, मन
प्रसन्न करणारा, प्रफुल्लित करणारा, अंगावर शहारे आणणारा आहे.
ह्या
ठिकाणी महाराजांची संजीवन समाधी असल्यामुळे एक अद्भुत वेगळ्याच प्रकारची
सकारात्मक ऊर्जा आपणास जाणवते, मिळते.संजीवन समाधी मागे एक भव्य, दिव्य,
विशाल असा अश्वत्थ वृक्ष (पिंपळ) आहे.
श्री शिवदत्त महाराजांच्या आयुष्याचा, कर्तृत्वाचा, कार्याचा, संजीवन
समाधीचा हा वृक्ष साक्षीदार आहे, असे आम्हाला श्री भगवंत कुलकर्णींकडून
कळाले. ह्या ठिकाणांवरून निघण्यास मन तयार होत नाही, पण आपण गृहस्थाश्रमी
असल्याने, वेळे अभावी निघावे लागते.
श्री विज्ञानेश्वर महादेव मंदिर - पांचाळेश्वर / आपेगाव
हे ठिकाण / मंदिर श्री आत्मतीर्थ, पांचाळेश्वर पासून पायी जाण्यासारखे आहे.
आपण श्री आत्मतीर्थ, पांचाळेश्वर समोर उभे राहिले असता, उजव्या बाजूस
टेकडीवर आहे. येथे जाण्यासाठी गोदावरी नदीतून जावे लागते. आता गोदावरी नदी
पात्रात पाणी नसल्याने सहज जात येते.
ह्या ठिकाणी श्री दत्तात्रेय आणि श्री महादेव यांच्यात संवाद झाला होता अशी
मान्यता आहे. श्री महादेव या ठिकाणी ज्योतिस्वरूप प्रकट झाले होते असे
सांगण्यात येते. श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे जे - जे विधी केल्या जातात
ते सर्व विधी येथे होऊ शकतात.
या ठिकाणी विशाल, भव्य असे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर सारखेच शिवलिंग असून नजर स्थिरावत नाही. येथे अन्नछत्र पण आहे.
राक्षसभुवन येथे इतर बघण्यासारखी, दर्शन घेण्यासारखी काही ठिकाणे -
अ) आशापूरक गणेश मंदिर
हे मंदिर राक्षसभुवन गावाच्या वेशीजवळ श्री संदीप लिंग्रज ह्यांच्या घरात
आहे. गणेशाची अतिशय मोहक अशी मूर्ती असून येथे प्रवेश करतानाच अष्ट
विनायकाचे चित्र दर्शन पण होते.
ह्या गणेश मूर्तीची आख्यायिका अशी सांगितली जाते की, श्री संदीप लिंग्रज
यांच्या पंजोबांनी ही मूर्ती त्यांच्या पाठीवरून येथे आणली. त्यांना
गणपतीने स्वप्नात येऊन मूर्तीची स्थापना आपल्या घरात करावी असे सांगितले
होते.
ब) श्री नरसिंह मंदिर
हे अतिशय पुरातन श्री नरसिंह मंदिर असून राक्षसभुवन गावात आहे, येथील श्री
नरसिंह मूर्ति ही भूगर्भात (जमिनिखाली) आहे. थोड्या पायऱ्या उतरून खाली
जावे लागते.
क) अन्नपूर्णा मातेचे मंदिर
ह्या ठिकाणी सर्व आयुधांसहीत असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे.
हा दर्शनाचा एक दुर्मिळ योग असून, अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती दुर्मिळ आहे.
हे मंदिर राक्षसभुवन गावात असून श्री नरसिंह मंदिरला जाताना अथवा येताना आपण दर्शन घेऊ शकतो.
लहानपणापासून मी श्री क्षेत्र राक्षसभुवनला बऱ्याच वेळा गेलो, तसेच दोन ते
तीन वेळेस श्री क्षेत्र पांचाळेश्वर गेलो. पण ह्या वेळी दर्शनाची गोडी आणि
मजा काही वेगळीच अनुभवली.
आपण पण एकदा अवश्य भेट द्या आणि एका वेगळ्या अनुभूतीचा लाभ घ्या.
क्षेत्र राक्षसभुवन येथील वरदसुत दत्तस्थान
आद्यपीठ
श्री वरद दत्त संस्थान राक्षसभुवन ता. गेवराइ, जि. बीड, एक मुखी षड्भुज
वालुकामय मूर्ति भारतातील सर्वात प्राचीन मूर्ति आहे. ज्या स्थानी अनुसया
मातेला पुत्र प्राप्तिचा वर दिला तेच हे स्थान. याच कारणे दत्त मूर्तिस
"वरद दत्त" नामभिधान प्राप्त
स्थान: राक्षस भुवन, जिल्हा बीड, मराठवाडा.
सत्पुरूष: अत्रि ऋषी.
विशेष: श्री रामचंद्रांना दत्तगुरुनी येथे दर्शन दिले.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन या ऐतिहासिक क्षेत्रात अनेक
महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. निजाम व पेशवे यांच्यांतील लढाई येथेच होऊन
साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर मारला गेला. पौराणिक दृष्टीने हे
स्थान महत्त्वाचे आहे. राक्षसभुवन हे दत्तप्रभूंचे आदिपीठ मानले जाते.
प्रभु रामचंद्र यांना अत्री ऋषींच्या आश्रमातून याच गावी दत्तात्रयांचे
दर्शन झाले होते. ‘रक्षोभुवन माहात्म्य’ नावाच्या संस्कृत ग्रंथात येथील
शनीचे महत्त्व वर्णन केले आहे. येथे गौतम, अगस्ती, अत्री, दधीची इत्यादी
ऋषींनी निवास केला होता. येथील आत्मतीर्थावर अत्री ऋषींनी अनुष्ठान केले
होते. येथेच ब्रह्मा, विष्णु, महेश हे देव अतिथींच्या रुपाने आले. यांनी
अनसूयेच्या सत्त्वहरणाचा प्रयत्न केला.
अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ वरद दत्तमंदिर आहे. जवळच दधीची ऋषींचे
दादेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. येथेच दासोपंतांना दत्तात्रयांची
कृपा झाली. त्यांनी राक्षसभुवन येथे बरेच दिवस अनुष्ठान केले.
वरददत्तमंदिराची रचना आश्रमासाररवी आहे. मंदिरावर शिखर नाही. दत्तस्वामींनी
स्थापना केलेल्या दत्तमूर्तीची ख्याती एकमुखी व षड्भुज अशी आहे.
दत्तात्रयांचा तिसरा अवतार म्हणजे दत्तस्वामी मानले जातात. ‘दत्तलीला
गुरुचरित्र’ हा ग्रंथ केशव उर्फ बाबास्वामी यांनी लिहिला आहे. दत्तनाथ
उज्जैनीकर हे याच मठाच्या परंपरेतील होते. बा. न. मुंडी यांनी दत्तनाथ
उज्जैनीकर (ढोली बुवा) यांचे साहित्य व चरित्र लिहिले आहे. एकनाथ
महाराजांपासून येथे आजपर्यंत नाथषष्ठी व दत्तजयंती हे उत्सव सुरू आहेत.
श्री क्षेत्र राक्षसभुवन दत्तात्रेयांचे अद्यापीठ वरद दत्त संस्थान
राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात
वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या
तीर्थक्षेत्री शनिदेवाचे प्रथम पीठ प्रसिद्ध आहेच, १७६३ मध्ये येथे
झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही
लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे.
राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ. स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व
हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे गाव शनीबरोबरच दत्त प्रभूंच्या जन्म
स्थानामुळे प्रसिद्ध असून याठिकाणी सहा दिवस पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म
सोहळा शेकडो वर्षांपासून साजरा होत आहे. दत्त संस्थानामुळेही ते तितकेच
प्रसिद्ध आहे. आत्मानुभूती प्राप्त करून देणारे आत्मतीर्थ, अगस्तीतीर्थ,
नृसिंहतीर्थ, भारतातील प्रख्यात २१ गणपतींपैकी एक विज्ञान गणेशतीर्थ,
सोमेश्वरतीर्थ, कालिकातीर्थ अशी आठ तीर्थेदेखील प्रसिद्ध आहेत. अशा या
पवित्र क्षेत्री गोदावरी तीरावर अतिशय प्राचीन असे 'दत्तस्थान' आहे. या
स्थानी प्राचीन काळी दंडकारण्य होते, असा उल्लेख पुराणात आढळतो. दत्त
प्रभूंना दत्त अत्रे, असे नाव याठिकाणी प्राप्त झालेले आहे. अत्री अनुसया
यांचा आर्शम याठिकाणी असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. या स्थानावर त्यांना
पुत्रसुख अनुभवता आले, असे भाविक सांगतात. पूर्वी हा दंडाकारणाचा भाग
असल्यामुळे अत्री, अगस्ती, दाक्षीची, पिपल्लाद, दक्षप्रजापती महर्षी गोतम
आदी मान्यवर ऋषी याठिकाणी वास्तव्यास होते. याचस्थानी वनवासात असतांना
प्रभू रामचंद्रांनी सीतामातेसह दत्त दर्शन झाल्याचा उल्लेख रामविजय ग्रंथात
आढळतो. संपूर्ण वनवासात प्रभू रामचंद्र एकाच स्थानावर दोन वेळा येऊन गेले
असे एकच ठिकाण येथे आहे. सती हरणापुर्वी व सिता हरणानंतर शनी देवता
स्थापनेवेळी अन्य कोणत्याही स्थानावर प्रभू रामचंद्र दोन वेळा गेलेले
नाहीत. ज्या दत्त मूर्तीचे व अवतरणाचे वर्णन सुंदरतेने करण्यात आलेले आहे.
याक्षेत्रावर दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) यांनी गोदा
दक्षिणेच्या वेळी वास्तव्य केल्याचे आढळते. अशा या प्राचिन दत्त संस्थानाची
माहिती कमी दत्त भक्तांना आहे. या स्थानावर शिखर नसलेले आर्शमाप्रमाणे
रचना असलेले एकमुखी षडभूज दत्ताची मूर्ती खोल गाभार्यात आहे. कारण माता
अनुसयेस सत्त्वहरणेच्या वेळी आपली ओळख पटू नये म्हणून भगवान शिव आपल्या
वाहनाशिवाय येथे आले त्याची खूण म्हणून येथील महादेव मंदिरासमोर नंदी नाही.
या संस्थानाचा दत्त जयंती उत्सव सहा दिवसांचा असतो. प्रतीवर्षी मार्गशिर्ष
शुद्ध १४ रोजी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी संपन्न होतो. दुसर्या दिवशी
भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. छबीना, पाच सोंग, तीर्थप्रसाद
हे कार्यक्रम होतात. महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गावात
भिक्षाही मागितली जाते. भिक्षान्न गृहण केले जाते.
याच स्थानावर दत्तभक्त दासोपंतांना प्रत्यक्ष दत्तदर्शन झाले. त्यांना
स्वत:च्या चरण पादुका दत्तमहाराजांनी दिल्या तेच हे पवित्र स्थान असल्याचा
उल्लेख आहे. येथील मंदिरातील वरद दत्तमूर्ती एकमुखी असून, अतिशय दुर्मिळ
आहे. ही मूर्ती वालुकामय, षड्भुजा आहे. मूर्ती अत्यंत खोल गाभार्यात असून
हे भारतातील असे एकमेव स्थान आहे, ज्या ठिकाणी 'दत्त यंत्र' आहे. बीडच्या
राष्ट्रीय महामार्ग २११ पासून हे स्थान फक्त ११ किलोमीटर अंतरावर आहे.
श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ:
एक
मुखी षड्भुज वालुकामय मूर्ति भारतातील सर्वात प्राचीन मूर्ति आहे. ज्या
स्थानी अनुसया मातेला पुत्र प्राप्तिचा वर दिला तेच हे स्थान. याच कारणे
दत्त मूर्तिस "वरद दत्त" नामभिधान प्राप्त.
‘सती अनसूयेच्या सतित्वाची परीक्षा पहाण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि
महेश भूतलावर आले अन् तिच्या तपोबळामुळे त्यांचे अवतरण तीन छोट्या बालकांत
झाले. त्यामधे श्रीविष्णूचे अवतरण ज्या बालकात झाले, ते म्हणजे श्रीगुरु
दत्तात्रेय!
ही घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण आहे श्रीक्षेत्र रक्षोभुवन!
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या दक्षिण
तिरावर वसलेले एक पवित्र दत्तपीठ! कालांतराने या तीर्थक्षेत्राचे नाव ‘श्री
राक्षसभुवन’ असे झाले.
१. श्री राक्षसभुवन येथील स्थानाला ‘आद्य दत्तपीठ’ असे का म्हणतात ?
श्री दत्तगुरूंची अन्य पिठे, उदा. कारंजा, माणगाव, नृसिंहवाडी इत्यादी
ठिकाणे म्हणजे मानवी देहावतारी दत्तपिठे आहेत. ही पिठे श्री
दत्तात्रेयाच्या त्या त्या अवताराच्या नावाने प्रसिद्ध आहेत; मात्र
राक्षसभुवन येथे प्रत्यक्ष दत्त जन्माला आले. त्यामुळे ते तत्त्वरूपी
दत्तपीठ आहे. त्यामुळेच या स्थानाला ‘आद्य दत्तपीठ’ असेही म्हणतात. येथे
ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी माता अनसूयेला वर दिला असल्याने हे ‘वरद
दत्तात्रेय मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे निर्गुण पीठ असल्याने या
मंदिराला कळस नाही.
२. दत्तमंदिरातील दत्तप्रभूंची विलोभनीय एकमुखी मूर्ती
दत्त मंदिराच्या गाभार्यात गेल्यानंतर समोर दिसते, ती वालुकाश्मापासून
बनवलेली आणि पूर्वाभिमुख असलेली सुंदर एकमुखी दत्तमूर्ती! मूर्तीवर नागाचा
फणा आहे. या मूर्तीचे उजवे पाऊल पुढे उचललेले आहे. दत्ताच्या वरच्या दोन
हातांत शंख आणि चक्र, मधल्या दोन हातांत डमरू अन् त्रिशूळ, तसेच खालच्या
दोन हातांत दीपमाला आणि कमंडलू आहे. अशी ही दत्तप्रभूंची विलोभनीय एकमुखी
मूर्ती आहे.श्री क्षेत्र राक्षसभुवन- दत्त यंत्र
३. दत्तयंत्र
दत्त मंदिराच्या वरच दत्तयंत्र आहे. यंत्र हे निर्गुणाशी संबंधित असते.
या दत्तयंत्राच्या साहाय्याने वातावरणातील निर्गुण दत्ततत्त्व या ठिकाणी
आकर्षिले जाते. हे अतिशय दुर्मिळ असे दत्तयंत्र आहे. या यंत्राची रचना तीन
भागांत केली आहे. वरच्या भागात ‘दत्तयंत्र’ असे लिहिले आहे. मधल्या भागात
‘श्री गुरवे नमः।’
लिहिले आहे आणि शेवटच्या भागावर ‘श्री वरद दत्तात्रेय’ असे लिहिले आहे.
हे यंत्र दगडी आहे. या यंत्राची रचना अष्टकमलदलाकृती आहे. मधे तारका आहेत.
दत्तमूर्तीच्या शिरोभागावर यंत्र असलेली अशी रचना अन्यत्र कुठेही बघायला
मिळत नाही. संपूर्ण भारतात दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला दत्तयंत्र
असलेले, असे हे एकमेव स्थान आहे.
४. सर्व आयुधांसह असलेली अन्नपूर्णामातेची मूर्ती
ज्या ठिकाणी दत्तकार्य असते, त्या ठिकाणी अन्नपूर्णामाता असतेच.
त्यामुळे या ठिकाणी अन्नपूर्णा सगुण रूपात वास्तव्यास आहे. अन्य ठिकाणी
अन्नपूर्णेची मूर्ती हातात पळी असलेली असते; पण येथे ती सगुण रूपात आल्याने
ती सर्व आयुधांसह आहे.
५. मंदिरात होणारी अन्नपूर्णामातेची आराधना
प्रत्येक मासाच्या (महिन्याच्या) पौर्णिमेला महाकाली, महालक्ष्मी आणि
महासरस्वती, असा उल्लेख करून तिला पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवला जातो. तिचा
जोगवा मागितला जातो आणि तिची आराधना केली जाते. आजही साधक किंवा स्त्रिया
यांना सेवेनंतर अन्नपूर्णेचे सगुण रूपात दर्शन झाल्याची अनुभूती प्राप्त
करता येते.श्रीक्षेत्र राक्षसभुवन- सर्व आयुधांसह असलेली अन्नपूर्णामातेची मूर्ती
६. दत्त महाराजांची फेरी निघाल्यावर साधक आणि भाविक यांना येणार्या अनुभूती
आजही दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि अन्नपूर्णामातेचा वावर आपल्याला
जाणवतो. ज्या वेळी दत्त महाराजांची फेरी निघते, तेव्हा चमेली आणि गुलाब या
फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो. कधी कधी साधक किंवा भाविक यांना
स्नान-संध्या करतांना पळी-भांड्याचा जो मंजुळ ध्वनी निर्माण होतो, तो ऐकू
येतो. असे हे जाज्वल आणि जागृत ठिकाण आहे.
७. श्री. नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे यांच्या कुळातील दत्तभक्तांची माहिती
दत्तमूर्तीच्या चरणांपाशी आमचे मूळ पुरुष, म्हणजे सद्गुरु भाऊ महाराज
उपाख्य दत्तास्वामी डोळे यांची समाधी आहे. प.पू. भाऊस्वामी हे अयोनी
संभवातून जन्माला आले होते. त्यामुळे गऊबाई आणि गोपालस्वामी हे त्यांचे
ऐहिक युगातील माता आणि पिता होते. ते अजानुबाहू होते. त्यांच्या कानांच्या
पाळ्या खांद्यापर्यंत होत्या. भाऊसाहेब महाराज, अंतोबादादा, दत्तास्वामी,
अवधूतबुवा, केशवबुवा, ऋषीकेशस्वामी इत्यादी सात पिढ्यांपर्यंत अजानबाहू
परंपरा कायम होती. आठव्या, नवव्या आणि दहाव्या पिढीत त्यात पालट झाला.
आमच्या परंपरागत गादीवर एक पुत्र आणि दोन कन्या अशी परंपरा होती. एकच पुत्र
असल्याने म्हणजे शके १६०० पासून भाऊ महाराजांपासून ते आमच्या गुरूंपर्यंत
परंपरा अखंड होती. त्या काळात अपत्यसंख्या अधिक असायची. तेव्हाही आमच्याकडे
एकच पुत्र असे. मला मात्र दोन भाऊ आहेत आणि आता आमचा वंशवृक्ष विस्तारेल.
पिठावरील महाराजांनी अन्नदान, गुरुमंत्र, शिष्य संप्रदाय, कुलधर्म अशा
प्रकारे साधना केली. त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य वाढत गेले.
दत्त मंदिराच्या डाव्या बाजूला, म्हणजे आपल्या उजव्या बाजूला डोळे
कुळातील दुसर्या पिढीतील दत्तभक्त, म्हणजे प.पू. भाऊस्वामी यांचे चिरंजीव
प.पू. बाबास्वामी, उपाख्य केशवस्वामी यांची समाधी आहे. त्या समाधीच्या
वरच्या बाजूला एक शिवलिंग आहे. या समाधी मंदिरावर शीलालेख कोरलेला दिसतो.
याच मंदिराच्या डाव्या बाजूला एक घुमटी दिसते. या घुमटीतून प.पू.
बाबास्वामी यांच्या समाधीकडे जाण्याचा भुयारी मार्ग आहे.
दत्तपिठातील भगव्या रंगातील पाच समाध्या डोळे कुळातील दत्तभक्तांच्या
आहेत. भगवा रंग वैराग्याचे दर्शक आहे. प.पू. भाऊस्वामी आणि प.पू.
बाबास्वामी यांच्यासह एकूण सात समाध्या या ठिकाणी आहेत. नंतरच्या तीन
पिढ्यांना आदेश नसल्याने त्यांच्या समाध्या येथे नाहीत. मी (श्री. नितीन
उपाख्य योगिराज महाराज डोळे) प.पू. भाऊस्वामींचा अकरावा वंशज आहे.
८. भारतातील नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर !
प.पू. बाबास्वामी डोळे यांच्या समाधी मंदिराकडे नेणार्या घुमटीच्या
बाजूला सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. अत्रिऋषींची पत्नी अनसूया सती
जाण्याच्या वेळी भगवान शिव नंदीविना या ठिकाणी आले होते. त्यामुळे हे मंदिर
भारतातील नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर आहे.
९. दत्तभक्त श्री. नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे यांचे आध्यात्मिक कार्य
९ अ. सद्गुरूंच्या आज्ञेने वैद्यकीय व्यवसाय बंद करून आध्यात्मिक
क्षेत्रात कार्य करणे : माझे पिता आणि सद्गुरु एकच ! त्यांनी मला वर्ष २००८
मध्ये आज्ञा केली, ‘‘अजून किती काळ वैद्यकीय सेवा करणार ?’’ मी १६ वर्षे
वैद्यकीय सेवा केली. ‘कोणताही पिता आपल्या पुत्राला व्यवसाय बंद कर’, असे
सांगणार नाही; पण ‘ती माझ्या पित्याची नसून गुरूंची आज्ञा आहे’, हे माझ्या
लक्षात आले. मग मी व्यवसाय हळूहळू न्यून केला. मी आध्यात्मिक क्षेत्रात काम
चालू केले. संस्थानाचे काम वाढवले. एक वर्षात माझे पिता कालवश झाले. मग
माझ्या लक्षात आले, ‘एक वर्षापूर्वी त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी
का सूचना केली होती ?’
९ आ. आद्यपिठाचे महत्त्व जाणण्यासाठी अभ्यास करणे : वर्ष २००९ पासून
संस्थानचे पूर्ण दायित्व माझ्याकडे आले. त्या वेळी मी वैद्यकीय व्यवसाय
न्यून केला होता. मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने मला जिज्ञासा अधिक
होती. मी ठरवले, ‘दत्ताचे जे आद्यपीठ आहे, ते केवळ वाडवडील म्हणतात; म्हणून
नव्हे, तर ‘आद्यपीठ म्हणजे काय ?’, हे आपण शोधून काढू.’ त्यासाठी मी वाचन,
लेखन आणि अभ्यास चालू केला.
९ इ. ‘महान विभूतींमुळे एखाद्या स्थानाला महत्त्व प्राप्त होते’, हे
लक्षात येणे : मी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि नेपाळपासून
कन्याकुमारीपर्यंत सर्व दत्तस्थानांना भेट दिली. मी कारंजा, गाणगापूर,
पिठापूर, नरसोबाची वाडी आणि माहूर या ठिकाणी गेलो. मी जमेल तेवढी साधना
केली. अक्कलकोटला स्वामी समर्थ, शेगावला गजानन महाराज, नरसोबाच्या वाडीला
नृसिंह सरस्वती आणि कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यामुळे महत्त्व
प्राप्त झाले.
अर्वाचीन काळात प. प. टेंब्येस्वामी यांनी कारंजा, कुरवपूर आणि पिठापूर
या स्थानांचा शोध लावला आणि प्रचार, प्रसार केला. त्यापूर्वी ‘पिठापूर हे
श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे’, हे कुणालाही ठाऊक नव्हते. प. प.
टेंब्येस्वामींनी त्याचा प्रचार केला; म्हणून आज ते ‘दत्तस्थान’ म्हणून
उदयास आले.
१०. दत्तास्वामी यांनी राक्षसभुवन क्षेत्रातील दत्तस्थानाचा शोध लावणे,
तेथे साधना करून दत्तजन्माचा उत्सव चालू करणे आणि तो आजही अव्याहत चालू
असणे
त्याही पूर्वी शके १६०० मध्ये नरसिंह सरस्वतींच्या ३०० वर्ष आधी आमचे
मूळपुरुष दत्तास्वामी यांनी राक्षसभुवन क्षेत्रातील दत्तस्थानाचा शोध लावला
आणि त्या ठिकाणी येऊन स्वतः साधना केली. त्यांनी दत्तजन्माचा उत्सव चालू
केला आणि तो आजही अव्याहत चालू आहे. हे सर्व दत्तप्रभूंची इच्छा असल्याने
होत आहे.
श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील श्री पांचाळेश्वर मंदिराचा इतिहास आणि माहात्म्य
‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र
राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे. श्री
नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे
श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या
क्षेत्राचे माहात्म्य आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामींनी काही काळ तपश्चर्या
केल्याने हे महानुभव पंथाचे पूजनीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
सगुण रूपातील श्री अन्नपूर्णामाता
मंदिरातील एकमुखी श्री दत्तमूर्ती
श्री दत्त पादुका
निर्गुण दत्ततत्त्व आकृष्ट करणारे दुर्मिळ दत्तयंत्र
तुम्हासहित औदुंबर । आमुच्या पादुका मनोहर । पूजा करिती जे तत्पर । मनकामना पुरती जाणा ॥
प्रसन्नता देणार्या आनंदस्वरूप अशा दत्तगुरूंचे दर्शन घ्या !
१. पांचाळेश्वर हे दत्तात्रेयांच्या भोजनाचे स्थान
मी येथील विश्वस्त आहे. मी लहानपणापासून येथे सेवा करत आहे. हे
दत्तात्रेयाचे भोजनस्थान आहे. दत्तात्रेय काशीला स्नान करतात, कोल्हापूरला
भिक्षा मागतात आणि पांचाळेश्वराला भोजन करतात.
२. पांचाळ राजाच्या नावावरून या गावाला ‘श्रीक्षेत्र पांचाळेश्वर’ असे नाव पडणे
पांचाळराजा आणि आत्मऋषी यांच्या विनंतीवरून येथे दत्तात्रेय प्रतिदिन
दुपारी १२ वाजता भोजनाला येतात. दत्तात्रेयांनी पांचाळराजा आणि आत्मऋषी
यांना वरदान दिले आहे, ‘जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत या ठिकाणी
येऊन मी भोजन करीन.’ पांचाळ राजाच्या नावावरून या गावाला श्रीक्षेत्र
पांचाळेश्वर असे नाव पडले. आत्मऋषींच्या नावाने या स्थानाला ‘आत्मतीर्थ’
असे संबोधले जाते.
३. दत्तात्रेय, गोविंदप्रभु आणि चक्रधरस्वामी यांनी या ठिकाणी क्रीडा करणे
गोविंदप्रभु महाराज पंचलिंगीहून संन्यास घेऊन या ठिकाणी आले.
त्याचप्रमाणे चक्रधरस्वामींनी याच ठिकाणी दत्तात्रेयांची भेट घेतली.
दत्तात्रेय, गोविंदप्रभु आणि चक्रधरस्वामी यांनी या ठिकाणी क्रीडा केली.
४. आध्यात्मिक महत्त्व
दत्तात्रेयांच्या कृपेने भूतबाधा, करणी आणि मानसिक व्याधी यांनी त्रस्त
असलेल्या व्यक्तीने या ठिकाणी येऊन एकनिष्ठेने सेवा केल्यास ती व्यक्ती १
मासात (महिन्यात) ठीक होते. येथे लांबून येऊन लोक सेवा करतात आणि तृप्त
होतात.
५. साजरे होत असलेले उत्सव
चैत्र कृष्ण पक्ष सप्तमीला येथे यात्रा भरते, तसेच छबीना आणि पालखी
निघते. येथे धार्मिक कार्यक्रम होतात. येथे दत्तजयंती, श्रीकृष्ण जयंती आणि
सर्वज्ञ चक्रधरप्रभु जयंती असे उत्सव साजरे केले जातात.
दत्तजयंतीला ७ दिवस आधी सप्ताह असतो. चतुर्दशीला दत्तात्रेयांचा जन्म
होतो. पौर्णिमेला यात्रा उत्सव होतो आणि सप्ताहाची समाप्ती होते. ‘दत्त
महाराजांच्या कृपेने अनेक मानसिक रुग्ण बरे होतात’, असा माझा स्वतःचा अनुभव
आहे.
६. दत्तगुरूंचे वामकुक्षी घेण्याचे ठिकाण
श्री पांचाळेश्वर मंदिराच्या उजवीकडे, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला
श्री दत्तगुरूंचे वामकुक्षी घेण्याचे, म्हणजे दुपारच्या भोजनानंतर डाव्या
अंगावर पहुडून विश्रांती घेण्याचे स्थळ आहे. येथे सुंदर मंदिर बांधलेले
आहे. मंदिराच्या अवतीभोवती डौलदार वृक्ष आहेत. सभोवताली भक्कम तटबंदी आहे.
मंदिराच्या समोर भव्य प्रवेशद्वार आहे. त्यावर नगारखाना बांधलेला आहे.
महाराष्ट्रात, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील
राक्षसभुवन हे शनीदेवांचे भारतातील साडेतीन पीठापैकी एक पुर्ण पीठ आहे.
त्या जवळच पांचाळेश्वर हे दत्त स्थान आहे. औरंगाबाद-बीड-सोलापूर या
राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ वर औरंगाबाद पासून१०० कि. मी.अंतरावर
राक्षसभुवन फाट्यापासून काही अंतरावर हे क्षेत्र आहे.
येथे दत्तजयंती उत्सव ६ दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
भगवानगड
संत भगवान बाबा हे विसाव्या शतकात बीड जिल्हयात होऊन गेलेले एक मोठे संत
आहेत. आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या
विरोधात लढा दिला आणि समाजाला जागं करून विकासाच्या प्रवाहात आणलं पण तरीही
बाबांच्या व्यक्तिमत्वाला आज अनेक चमत्कार चिटकून बसले आहेत. परिणामी
भगवान बाबा हे एक गूढ व्यक्तिमत्त्व बनले आहे.
आळंदीत स्वीकारला संन्यास.
संत
भगवान बाबा यांच्या जन्म 19 जुलै 1896 रोजी बीड जिल्ह्यातल्या पाटोदा
तालुक्यातील सावरगाव घाट या गावी झाला. जन्मानंतर बाबांचं नाव आबाजी हे
ठेवण्यात आलं तर सानप हे त्यांचं आडनाव होतं. बाबा जातीने वंजारी असले तरी
घर मात्र कुनबाऊ शेतकऱ्यांचं होतं.
बाबा लहानपणापासून शाळेबरोबर गुरं
राखण्याचं काम करत होते. घरी वारीची परंपरा होती. त्यामुळे ते वयाच्या
सहाव्या वर्षांपासून वरील जात आणि तिथूनच त्यांना अध्यात्माची गोडी लागली.
पुढे वय वाढत गेलं तसं त्यांची पंढरपूरची वारी नियमित होत गेली.
बीड
जिल्ह्यात तेंव्हा नारायण गड हे मोठं अध्यात्मिक केंद्र होतं. या गडाचे
महंत माणिकबाब यांच्याशी भगवान बाबांची ओळख झाली आणि पुढे भगवान बाबांनी
माणिकबाबांकडून दीक्षा घेतली. माणिकबाबांनी भगवान बाबाला शिकवण्यासाठी पुढे
आळंदीला पाठवलं. आळंदीतच भगवान बाबांनी अध्यात्म आणि धर्माचं शिक्षण घेऊन
बाबांनी संन्यास स्वीकारला.
बाबांनी नारायण गड सोडला !
आळंदीतलं
आपलं शिक्षण संपवून भगवान बाबा परत आले आणि कीर्तनाच्या माध्यमातून
गावोगाव फिरून बाबा समाजजागृती करत असताना 1937 त्यांचे गुरू माणिकबाबांनी
देह ठेवला. त्यावेळी माणिकबाबांनी भगवान बाबाला उत्तराधिकारी नेमलं.
गडावर
असताना भगवान बाबांनी अनेक लोकउपयोगी कामे सुरू केली. पण गडावरील इतर
भक्तांना भगवान बाबांची ही प्रसिद्धी खपली नाही. आणि त्यांनी भगवान बाबावर
लोभी असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. आरोपांमुळे विषण्ण झालेल्या
बाबांनी मोठ्या तडफेने भगवान गड सोडला आणि समाजात निघून आले. पुढे बीड
जिल्ह्यातील बाजीराव पाटील यांनी बाबांना पाटोदा तालुक्यातील धोम्या
डोंगरावर आणले. त्यावेळी धोम्या डोंगर अत्यंत अस्ताव्यस्त, कठीण आणि जंगली
होता. पण बाबांनी याच धोम्याडोंगराला आपली कर्मभूमी करायचं ठरवलं.
बाबांनी
भक्तांना आवाहन केलं की गड बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि श्रमदान करावं
बाबांची ख्यातीच इतकी होती की शेकडो लोक एक रुपयाचीही मजुरी न घेता गडावर
श्रमदानाला आले. आणि विशेष म्हणजे हे सगळे लोक आपल्या घरून भाकरी बांधून
आणत आणि श्रमदान करत, गडासाठी आर्थिक मदतही खूप जमली. यात अनेक महिलांनी
आपले दागिनेसुद्धा दान दिले होते. बीड जिल्ह्यातल्या एका गरीब बंजारा
महिलेने आपले दहा तोळ्याचे दागिने सुद्धा गडासाठी देऊन टाकले होते हे
विशेष.
यशवंतरावांच्या उत्स्फूर्त घोषणेतून मिळालं भगवानगड हे नाव !
गढ
बांधून तयार झाला पण गडाचं नामकरण झालेलं नव्हतं, गडावर विठ्ठलाचे विशाल
मंदिर बांधण्यात आले होते. मंदिरात विठ्ठलमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी
त्यावेळचे दिगग्ज लोक आले होते. ज्यात त्यावेळेचे मुंबई प्रांताचे
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा होते. यावेळी कुणाच्या ध्यानीमनी
नसतानाही यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या उस्फुर्त भाषणात घोषणा करून टाकली
की,
“आजपासून या डोंगराला धोम्या डोंगर म्हणायचं नाही,
तर भगवान बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या डोंगराला यापुढे
‘भगवानगड’ म्हणायचं…”
बस्स यशवंतराव चव्हाण बोलून गेले आणि तिथुन पुढे या धोम्या डोंगराचा भगवानगड झाला.
भगवान बाबांचं कार्य
भगवान
गडाची निर्मिती झाल्यानंतर भगवान बाबांनी धार्मिक कार्याला जोमाने सुरुवात
केली. बाबांनी गावोगावी हरिनाम सप्ताह सुरू केले. देवाच्या नावाखाली
गावागावात होणारी पशुहत्या थांबवली, जाती धर्मात होणारे तंटेबखेडे थांबवले.
आणि सर्वात महत्वाचे भगवान बाबांनी लोकांना व्यसनापासून दूर नेलं. बाबांनी
केलेलं व्यसनमुक्तीचं काम हे क्रांतिकारी म्हणून गणलं जाईल इतकं महत्वाचं
होतं. त्यांची शैक्षणिक कार्येही महत्वाची होती.
जातीय सलोखा टिकून
रहावा यासाठी भगवान बाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या हायतीतली एक
चांगली गोष्टही प्रचलित आहे. एका गावात एक मुस्लिम मिस्त्रीने संपूर्ण
मंदिर बांधून पूर्ण केले पण देव हा पवित्र असल्यामुळे आणि मिस्त्री मुस्लिम
असल्यामुळे देवाचा गाभारा मात्र गावातले लोक त्या मिस्त्रीला बांधू देत
नव्हते. त्यावेळी भगवान बाबांनी गावातल्या सगळ्याच लोकांची समजूत घातली आणि
त्या मुस्लिम मिस्त्रीच्याच हस्ते गाभारा बांधून घेतला. आणि त्या मंदिरात
मूर्तीची स्थापना स्वतः बाबांनी केली हे विशेष.
या आणि आशा असंख्य
कामांमुळे आयुष्यात एकही चमत्कार न करता भगवान बाबा या असामान्य
व्यक्तिरेखेला दैवत्व प्राप्त झालं. आशा या थोर साधू पुरुषाचं वयाच्या 69
व्या वर्षी पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात निधन झालं.
असा हा बीड जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध व
पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. संत-महात्म्यांच्या परंपरेचा वारसा
सांगणाऱ्या, धार्मिक, ऐतिहासिक व मनोहारी पर्यटनस्थळांना हौशी पर्यटकांनीच
नव्हे तर प्रत्येकाने भेट देऊन या परंपरेचा अनुभव घ्यायलाच हवा.
No comments:
Post a Comment