महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील दख्खन पठारावरील व गोदावरी नदीखोऱ्यातील एक जिल्हा. क्षेत्रफल १२,४८९ चौ. किमी. विस्तार १८° ५८’ उ. ते २०° २’ उ. व ७६° ४’ पू. ते ७७° ४२’ पू. याच्या उत्तरेला बुलढाणा व अकोला, ईशान्येला यवतमाळ, पूर्वेला नांदेड, दक्षिणेला उस्मानाबाद, नैर्ऋत्येला बीड व पश्चिमेला औरंगाबाद हे जिल्हे असून, ईशान्य सीमेवर पैनगंगा (सु. १६०·९३ किमी.) व नैर्ऋत्य सीमेवर गोदावरी (सु. ६४·३७ किमी.) या नद्या वाहतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १२८·७२ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १०४·५८ किमी. आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या ४·१% आणि लोकसंख्या ३% असून, राज्यात याचा क्षेत्रफळाप्रमाणे अकरावा आणि लोकसंख्येप्रमाणे एकोणिसावा क्रमांक लागतो.
शासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे सेलू (सै़लू) व हिंगोली असे दोन विभाग केले आहेत. सेलूमध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी आणि परतुर हे तालुके व हिंगोलीमध्ये हिंगोली, वसमत (बसमथ), कळमनुरी व जिंतूर हे तालुके येतात. परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. परभणी जिल्हयाच्या पुर्वेला अजिंठा पर्वतरांगा (जिंतुर तालुक्यातुन जातात) आणि दक्षिणेकडे बालाघाटच्या पर्वतरांगा दिसुन येतात.
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ती पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्याच्या वायव्येकडील मध्य भागातून पूर्णा नदी व तिच्या उपनद्या करपरा, दुधना वाहत जातात. सेलू व जिंतूर तालुक्याचा काही भाग दुधना नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
परभणी हा जुन्या हैद्राबाद संस्थानच्या मराठवाडा विभागातील पाच जिल्हयांपैकी एक जिल्हा होता. या जिल्ह्याचा उल्लेख 'प्रभावती' ह्या नावानेही केल्याचे आढळून येते. मराठवाड्याच्या इतिहासात परभणीची परंपरा फार जुनी असून ती अश्म युगापर्यंत पोहोचते. प्राचीन भारताच्या इतिहासात अश्मयुगात गोदावरीच्या खो-यातील प्रदेशाची फार भरभराट झाली असावी, असा संशोधकांचा तर्क आहे. अशोकाच्या दक्षिणेतील स्वारीने परभणीच्या विकासाला साह्य केले. हा भाग काही वर्षे देवगिरी येथील यादवांच्या अधिपत्याखाली होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर परभणीचा परिसर त्याच्या ताब्यात गेला. महंमद तघलकाच्या मृत्यूनंतर हैद्राबादचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येईपर्यंत परभणी हे मोगल साम्राज्याचे अंग होते.
इसवी सनापूर्वी सातवाहनांच्या काळात गोदातीरी महाराष्ट्र सारस्वत आणि संस्कृती यांचा जो उद्गम झाला, त्याचा वारसा परभणी जिल्हयाला लाभला होता. महर्षी अगस्तीच्या दक्षिण दिग्विजयाने या जिल्ह्यात विविध तीर्थे निर्माण केली आहेत. पौगंड, पोलस्व यासारखे तपोधन, गोरख, गैबी आणि गहिनीनाथ यासारख्या श्रेष्ठ नाथपंथियांनी जिल्हयात वास्तव्य व साधना केल्याचे उल्लेख धर्मग्रंथात आहेत. परभणी जिल्हा संत-महंताची भूमी आहे. जिल्ह्यात बरीच धार्मिक स्थळे आहेत. जिल्ह्याला प्रदीर्घ परंपरा असल्याने अनेक ऐतिहासिक स्थळेही आहेत.
PARBHANI DIVISION bus stand depot contact number
Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id
Office
20 Divisional Controller Parbhani, (02452) 223127/ 234148 dcstparbhani@gmail.com
1 Divisional.Traffic Officer Parbhani Division, (02452) 220422
2 Divisional. Accounts Officer Parbhani Division (02452) 220482
3 Divisional. Personnel Officer Parbhani Division (02452) 220460
4 Labour Officer Parbhani Division (02452) 220460
1 Depot Manager Parbhani bus stand depot contact number (02452) 223337
2 Depot Manager Jintur bus stand depot contact number (02457) 220036
3 Depot Manager Kalmanuri bus stand depot contact number (02455) 220049
4 Depot Manager Hingoli bus stand depot contact number (02456) 221784
5 Depot Manager Gangakhed bus stand depot contact number (02453) 222322
6 Depot Manager Pathari bus stand depot contact number (02451) 255346
7 Depot Manager Basmat bus stand depot contact number (02454) 220159
परभणी जिल्हा पर्यटन:-
प्रभावती नगरी अर्थात परभणी जिल्हा म्हणजे संत परंपरा, पौराणिक देऊळे आणि गोदावारीच्या तिरावरचा निसर्गरम्य परिसर या अनोख्या भ्रमंतीची परवणीच! शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे. तर संत नामदेव महाराज (नर्सी) आणि संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील! येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ आहे. शेतीविषयी निरनिराळी संशोधने व प्रयोग येथे केले जातात. १८ मे १९७२ रोजी या कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. येथे आकाशवाणी केंद्र आहे. दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र आहे. दूध डेअरी, सूतगिरणी, तेल गिरणी आहे. सय्यद शहा तुराबुल हक्क हा दर्गा असून त्याचा उरूसही येथे मोठ्या उत्साहात भरतो. त्याचबरोबर खंडोबाची यात्राही येथे भरते. येथील पारदेश्वर मंदिर भव्य व प्रेक्षणीय आहे. शुभ्र अशा पाऱ्यापासून निर्मीत शिवलिंग दर्शनासाठी भाविक पारदेश्वराला मोठ्या भक्तिभावाने भेट देतात! महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजनासाठी अगदी प्रातःकालापासूनच भक्त मोठ्या संखेने उपस्थित असतात.
परभणी शहराची खाद्यभ्रमंती:-
परभणी-
औंढा रोडवर नॅशनल ढाबा आहे तिथे चांगले जेवण मिळेल. औंढ्याच्या जवळ जवळ
आहे. परभणीत सकाळी लौकर पोचलात तर वसमत रोडवर शिवशक्ति बिल्डिंगच्या समोर
तुलसी म्हणून रेस्टॉरंट आहे तिथला डोसा अजिबात चुकवू नका.अर्ध्या ऑफिसर
लोंकांचा नाश्ता इथूनच होतो. त्याची गोष्ट सुद्धा आहे , आधी आचारी होता एका
हॉटेलात नि आता स्वतःचे हॉटेल . वा !!!! वेळ - सकाळी ७ ते १ दुपारी. परभणी
शहरात संध्याकाळच्या वेळी असाल तर स्टेडियम जवळची बॉम्बे भेळ खाऊ
शकता.त्याचबरोबर स्टेडियम नाही पण राजगोपालाचारी बागेजवळ चाट खाल्ला.
परभणीत शाकाहारी चांगले जेवण हवे असेल तर बस स्थानकाजवळ ऐश्वर्या
रेस्टॉरंट चांगले आहे. वसमत रोडवर थोडं शहराबाहेर वाटीका. हॉटेलचे बाह्यरंग
नि टेबल खुर्च्या पाहून हॉटेलच्या चवीचा अंदाज बाळगू नका .मामूची कॉफी मिस
करू नका नि गंगाखेडचे कलम सुद्धा . नि अजून १ मराठी शब्द कळला " डिकासन
चहा ".तसेच इथे बऱ्याच बेकऱ्या आहेत चविष्ट पफ खायला.
जिल्ह्यातील पाथरी हे शिर्डीचे साईबाबा यांचे जन्मस्थान आहे. पाथरीचे ऐतिहासिक श्रेष्ठत्व सिध्द करणारा ताम्रपटही प्रसिध्द आहे. राक्षसभुवनच्या समरप्रसंगी गोदावरीच्या किनारी निजामाचा पराभव केल्यानंतर त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी थोरले माधवराव पेशवे हे त्याच्या मागे लागले होते. त्यावेळी त्यांनी पाथरीस तळ दिला होता.
पाथरीपासून 24 कि.मी. अंतरावर गोदावरीच्या काठी मुदगल हे तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री मुदगलेश्वरांचे मंदिर व स्वामी ऋषिकेशानंद महाराज यांची समाधी आहे.
संत जनाबाई ह्या संत नामदेवाच्या परमभक्त होत्या. संत जनाबाईंचे जन्मगाव गंगाखेड असून येथील राजेंद्र पेठेत त्यांचा जन्म झाला. गंगाखेड येथे संत जनाबाईंचे स्मारक बांधण्यात आले आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आंनदराज स्वामी महाराज यांनी गोदावरी नदीच्या दक्षिण किना-यास येथे बालाजी मंदिर बांधले आहे. गंगाखेड पासून 18 कि.मी. अंतरावर राणीसावरगाव येथे रेणुकादेवीचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून मूळ पीठाची स्थापना भगवान परशुराम यांनी केली असावी, अशी आख्यायिका आहे. मुख्य गाभा-यात रेणुकादेवीची सुमारे 4 फूट उंचीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या बाजूस परशुरामाचे स्थान आहे. राणीसावरगाव येथे रेणुकादेवीच्या मुख्य मंदिरात नवरात्रात 10 दिवस व चैत्र पौर्णिमेनंतर 10 दिवस मोठे उत्सव साजरे केले जातात.
परभणीपासून 12 कि.मी. अंतरावर पूर्वेस श्रीक्षेत्र त्रिधारा वसलेले आहे. 3 नद्यांच्या संगमामुळे या क्षेत्रास त्रिधारा क्षेत्र असे म्हणतात. नद्यांच्या संगमावर ओंकारेश्वर, दत्तात्रेय, दुर्गाभागवती देवी आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. देवीजवळ एक सुंदर गोमुख बांधण्यात आलेले आहे. जवळच नदीकाठी उंबराच्या झाडाखाली दत्तात्रेयाची मूर्ती स्थापन केली आहे. गावात मारुतीचे दक्षिणाभिमुख एक देऊळ आहे.
परभणीपासून दक्षिणेस 19 कि.मी. अंतरावर पोखर्णी येथे नृसिंहाचे मंदिर आहे. या मंदिरात डाव्या बाजूस तीन फूट ऊंचीची नृसिंहाची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचे आवरण घातलेले आहे तसेच चांदीचे नक्षीकाम केलेली प्रभावळ आहे. मंदिराच्या मूळ गाभा-याचा जीर्णोद्वार करण्यात आला आहे. वैशाख शुध्द पौर्णिमेला नृसिंहाची यात्रा भरते.
जिंतूरपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले चारठाणा अथवा चारुक्षेत्र हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. चारठाणा या संपूर्ण दगडी बांधणीच्या यादवकालीन शिल्पकलेने नटलेल्या गावास हेमाडपंथी स्थापत्यकलेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील झुलता स्तंभ पर्यटकांना आकर्षित करतो. हा स्तंभ गावाचे वैभव आहे.
जिंतूर या नावाने ओळखले जाणारे गाव हे पूर्वीचे जैनपूर होय. हे गाव एक प्रकारे जैनांच्या गत इतिहासाची साक्षच होय. येथील कोरीव गुंफा अतिशय अप्रतिम व प्रेक्षणीय आहेत. जिंतूरजवळ डोंगरावर नेमगिरी क्षेत्र आहे. येथील डोंगरावर सात गुंफा असून मध्यभागी दिगंबर जैन सांप्रदायाचे 22 वे तीर्थंकर श्री भगवान नेमिनाथ यांची अति प्राचीन व भव्य मूर्ती जैन मंदिरात पद्मासनात आहे. त्यांच्या दोन्ही बाजूस भगवान शांतीनाथ आणि भगवान पार्श्वनाथ यांच्या सहाफूट उंचीच्या प्रतिमा आहेत. बाकी इतर गुंफामधून भगवान आदिनाथ, बाहुबली व नंदीश्वरांच्या प्रतिमा विराजमान आहेत. दरवर्षी येथे यात्रा भरते व रथोत्सव साजरा केला जातो.
पालम तालुक्यात गोदावरीच्या पात्रात जांभूळ बेट आहे. तेथे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. बेटावर जांभळाची मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने त्यास जांभूळबेट असे नाव पडले.
जिंतूरपासून उत्तरेस 15 कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर येलदरी हे गाव असून तेथे मातीचे मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर – Shri Mrityunjay Pardeshwar Mahadev Temple
परभणी येथे भारतातील सर्वात मोठे श्रीमृत्युंजय पारदेश्वर महादेव शिवलिंग मंदीर आहे. हे पारदेश्वर मंदिर परमपूज्य सद्गुरु महामंडलेश्वर श्री सच्चिदानंद सरस्वती महाराज यांनी उभे केले आहे. हे शिवलिंग 250 किलो पा-याचे आहे.परभणी शहरात पारदेश्वर या 80 फुट उंचीच्या भव्य मंदिराचे आपण दर्शन घेउ शकतो.
श्री मृत्युंजय पारदेश्वर मंदीर परभणी
भारतातील मोठया शिवलिंगांपैकी हे एक शिवलिंग असुन हजारो भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता येतात. या शिवलिंगाला ’तेजोलिंग’ देखील म्हणतात आणि याला 12 ज्योर्तिलिंगा इतकेच महत्वाचे मानले जाते.
मुद्गलेश्वर महादेव मंदिर – Mudgaleshwar Temple
परभणी
जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ म्हणजे भगवान मुदगलेश्वराचे प्रसिद्ध
मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक मंदिर आहे. गोदावरी नदीच्या
पात्रात मधोमध महादेवाचे मंदिर उभारले आहे. अहिल्यादेवी होळकरांनी 250
वर्षांपुर्वी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या मंदिराविषयी
माहिती घेत असतांना हे मंदिर सुमारे 900 वर्षापुर्वीचे असल्याचे या ठिकाणी
असलेल्या शिलालेखावरून लक्षात येते. या परिसरात तीन मुख्य मंदिर आहेत. तीन मंदिरांपैकी
भगवान नरसिंहाचे मंदीर नदीच्या किनार्यावर आहे. गोदावरी नदीच्या मध्यभागी
असलेल्या दोन मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे भगवान नरसिंह (मुदगलेश्वर) आणि
इतर एक म्हणजे भगवान गणेशाचे (मुदगल गणेश) आहे. लोक गोदावरी नदीत स्नान
करतात. मुगळेश्वर दर्शनसाठी प्रत्येक महाशिवरात्रीला बरेच भक्त येतात.
मंदिरात साजरा केला जाणारा आरती भोवतालच्या आणि सभोवतालच्या परिसरात
आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारी आहे
पावसाळयात तर हे मंदिर काही महिने पाण्याखालीच असते, या ठिकाणी नारायण नागबळी आणि सुखशांती करता पुजाअर्चा देखील केल्या जातात.
मुद्गल पुराणात या ठिकाणचा उल्लेख सापडतो याला देवभुमी देखील म्हंटल्या गेले आहे. या ठिकाणी दर्शनाकरता येण्याचा योग्य कालावधी एप्रील ते जुन हा आहे. भगवान शंकरा व्यतिरीक्त नृसिंहाचे आणि श्री गणेशाचे देखील मंदिर या ठिकाणी आहे.
सय्यद शाह तुराबुल हक दर्गा :-
उरुस किंवा जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर चित्रं उभं राहतं आकर्षक रोषणाई, गगनचुंबी आकाशपाळणे, मौत का कुवाँ या सारख्या मनोरंजक घटकांचं! हजरत सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) यांचा अनेक वर्षांची परंपरा असणारा उरुस 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होतो. असंख्य भाविक आत्मिक शांती आणि मनोबल प्राप्तीसाठी सय्यद शाह तुराबुल हक यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांना श्रध्देनं तुरतपीर बाबा म्हणूनही ओळखतात. तुरतपीर म्हणजे भक्तांचं दु:ख तात्काळ, तुरंत दूर करणारे पीर! सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) हे सुफी पंथाचे मुस्लीम साधू समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होते. समर्थांच्या जांब या जन्मगावी जात असतांना त्यांचं इथं देहावसान झालं. सय्यद शाह तुराबुल हक यांनी समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथाचं उर्दूत भाषांतर केलं आहे. मनाच्या श्लोकांना उर्दूत ‘मनसमझावन’ असं नांव देण्यात आलं आहे. राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही सय्यद शाह तुराबुल हक यांच्या दर्शनासाठी नियमितपणं येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उरसाच्या आयोजनात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तिंचा सहभाग असतो. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संदलची थाळी डोक्यावर घेऊन उरसाचं प्रतीकात्मक उद्घाटन करतात. जिल्हा प्रशासनाच्यावतीनं दरवर्षी उरसानिमित्त 2 फेब्रुवारीस स्थानिक सुट्टीही जाहीर केली जाते.या दग्र्याची लोकप्रीयता एवढी आहे की याला महाराष्ट्रातील अजमेर शरीफ देखील म्हंटल्या जातं.
राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि सर्वधर्म समभाव जपणा-या या उरसात सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचंही आयोजन मोठ्या उत्साहात होतं. उरसानिमित्त सर्कस, गगनचुंबी आकाशपाळणे, चक्रीपाळणे, टोराटोरा, नावाट्वीस्टर, ड्रॅगन रेल्वे, जादूचे प्रयोग, भूतबंगला, मौत का कुव्वा या मनोरंजक बाबींसह विविध वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आलेले असतात. महिलांसाठी उभारण्यात आलेल्या मीनाबाजारमध्ये संसारोपयोगी साहित्य, खेळणी आणि सौदर्य प्रसाधनांची रेलचेल असते.
श्रीक्षेत्र त्रिधारा
परभणीहून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेले त्रिधारा हे एक निसर्गरम्य क्षेत्र असून येथील गोदावरी, नर्मदा आणि पूर्णा या तीन नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणास त्रिधारा हे नाव पडले आहे.
खडकांमधून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, रंगीबेरंगी वैविध्यपूर्ण पक्षांचा किलबिलाट आणि हिरव्या गर्द झाडीतून दिनकराचा उदयास्त परभणीची सहल अधिक विहंगम करते!
नवागड
त्रिधारेपासून उखळदकडे जातानाचे जैन अतिशयक्षेत्र नवागड तेथील निसर्गरम्य परिसर आणि भव्य, शांत आणि निरामय मंदिरासाठी ओळखले जाते.
श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदीर नवागढ हे भगवान नेमिनाथच्या प्राचीन आणि कलात्मक मूर्तीने प्रसिद्ध आहे.पुर्वी हे ठिकाण उखळद गावात वसलेले होते, जे पूर्णा नदीच्या काठावरुन सुमारे 2 किमी अंतरावर आहे. १९३१ साली नवागढ येथे भव्य मंदिर उभारण्यात आले आणि या मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली. या मंदिरासाठी 10 एकर जमीन निजाम सरकारने ताबडतोब दिली.
नवागढचे मंदिर अतिशय कलात्मक, विशाल आणि अतिशय उच्च शिखराचे आहे. या मंदिरातील भगवान देवगिरीची मुख्य देवता पद्मासनात असुन, अत्यंत सुंदर 3.5 फूट उंच काळ्या रंगाची आणि चमत्कारी मुर्ती आहे.मंदिराचा आतील भागा आरश्याने झाकलेला आहे आणि ते अतिशय सुंदर आहे.
नवागढ येथील मंदीर
येथील विद्यार्थ्यांकरिता गुरुकुल शिक्षण व्यवस्था लाभलेली आचार्य आर्यनंदी शिक्षण संस्था सुसंस्कारित शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
गंगाखेड
दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या कालखंडातील आहे. गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव हे ठिकाण श्रीरेणुका मातेचे जागृत देवस्थान मानले जाते. पाथ्री तालुक्यात गोदावरीच्या तीरावर गुंज या ठिकाणी श्री योगानंद महाराज यांनी स्थापन केलेले देवस्थान आहे. येथे भव्य मंदिर असून श्री योगानंद महाराजांनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली.
गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवाची परमभक्त ही गंगाखेडची समाजातील दमा व करुंड या विठ्ठल भक्त दाम्प्त्याचे नवसाचे अपत्य. तिने नामदेवाविषयीचा आदरभाव, दयावान विठ्ठलाला आहावन, ज्ञानदेवाची पुजा, चोखामेळाविषयी भाव अभंगातून व्यक्त केला आहे.
वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना हे सारे काही संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येते. गंगाखेड येथे संत जनाबाई यांची समाधी आहे.
सेलू
वाल्मिकी ऋषींच्या पदास्पर्शाने पावन झालेल्या वालूर अर्थात सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. त्यामुळे या ठिकाणास विशेष महत्त्व लाभले आहे.
पूर्णा
पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा ह्या नगरामधील रेल्वेस्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो. पूर्णा जंक्शनला गाडी थांबली की दाळ वडा आणि सोबत खमंग कढीचा घमघमाट तोंडाला पाणी सोडतो.
पोखर्णी
नृसिंह मंदिर पोखर्णी – Narasimha Mandir
परभणी पासुन जवळजवळ 18 कि.मी. अंतरावर असलेले पोखर्णी हे गांव श्री नृसिंह संस्थानामुळे पंचक्रोशीत आणि जिल्हयात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्रा व्यतिरीक्त आंध्र प्रदेशातुनही भाविक दर्शनाकरता येतात.
श्री नृसिंह भगवान याठिकाणी देवी लक्ष्मी सोबत विराजमान असुन हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे.मंदिरासमोर आल्यावर लगेच प्रशस्त असे मुख्य पूर्व प्रवेशद्वार मन मोहून घेते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप भक्तांच्या नजरेत भरतो. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पूर्वमुखी असलेल्या आणखी एका प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. मंदिर परिसर अतिशय विस्तीर्ण असुन गाभारा मात्र लहान आहे आणि या गाभा.यात प्रवेश करण्याचे व्दार अडीच ते 3 फुट असल्याने भाविकाला दर्शनाकरता वाकुन जावे लागते.या द्वारामधून एकावेळी एकाच व्यक्तीला खाली बसून प्रवेश करावा लागतो. आतील गाभारा हेमाडपंथी शिलेवर बांधकाम केलेला आहे. या गाभाऱ्यात एका वेळेस केवळ १०-१२ व्यक्तीचे दर्शन घेऊ शकतात.
हे मंदिर अतिशय प्राचीन असुन जवळ जवळ 1000 वर्षांपुर्वी बनले असल्याचे सांगण्यात येते, वास्तुकला हेमाडपंथी असुन एका राजाने हे मंदिर बांधले आहे.
राजाच्या अंध मुलीला नृसिंह भगवानाच्या कृपेने दिसायला लागल्याने राजाची येथे अपार श्रध्दा बसली आणि त्याने नवीन मंदिर बनवुन मुर्तीला तेथे हलवण्याचा विचार व्यक्त केला पण गावक.यांनी त्याला विरोध केल्याने येथेच राजाने हे मंदिर बांधले.
श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिर गाभाऱ्यात श्रीची रोद्ररूप धारण केलेली वालुकाष्म पाषाणाची असून सुमारे ४ फुट इंचीची मूर्ती आहे. मुर्ती चतुर्भूज असून एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असून उर्वरित दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाचे आहे. ही मुर्ती स्वर्णालंकृत व रत्नजडीत असून वस्त्र परिधान केलेली आहे. श्रीच्या गाभाऱ्यासमोर श्रीचे शयनकक्ष आहे. शयनकक्षात पुरातन लाकडी दिवाण असून त्यावर रेशमी वस्त्राची बिछायत आहे. त्यावर श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा आहे तसेच मोरपीसांनी सुशोभित केलेले आहे. मुर्ती क्रोधीत मुखवटयाची असुन सुवर्ण अलंकारांनी तिला सुशोभीत करण्यात येते. शेजारीच परमेश्वराकरता विश्रामासाठी मोराच्या पिसांनी गादी तयार केली आहे.
मंदिर परिसरात शिवलिंगाव्यतिरीक्त भगवान गणेशाचे देखील मंदिर आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अगदी समोर श्री महादेवतेचे मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारी महादेवाची शिवपींड आहे. तसेच तीन फुट उंचीची संगमरवर श्री गणेशाची मुर्ती आहे.मंदिराच्या सभामंडपात असलेला घंटा वाजवण्याचा मोह भक्तांना आवरणे कठीणच जाते. हा घंटा मांगल्याचे प्रतिक असून घंटानाद दूरवर पसरतो. पहाटे मंदिर उघडल्यावर अभिषेकापूर्वी व रात्रीच्या आरतीपूर्वी घंटानाद केला जातो. मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारा जवळ श्री गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. त्यात गणेश वालुकाष्म मुर्ती आहे तसेच पाषाणाच्या गजलक्ष्मी, बालाजी व इतर देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर पवित्र असे तीर्थकुंड आहे.याला पुष्करणी तिर्थ म्हणुन खोल विहीर असुन त्या विहीरीला चारी बाजुने सलग अखंड पाय.या आहेत. हे पुष्करणी तिर्थ 1200 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते. या तीर्थाच्या पाण्याने श्री चा अभिषेक केला जातो. या तीर्थामध्ये काही पायऱ्या उतरल्यावर मध्ये मोठ्या देवळीच्या रुपात दोन्ही बाजूला दोन मंदिरे आहेत,ज्यांना देवकोष्ट म्हणतात.
नृसिंहाच्या नवरात्रात आणि नृसिंह जयंतीला भगवंताचा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होतो इतरवेळीही दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी असते.
नृसिंहाच्या मुर्तीची दस.याला मिरवणुक निघते, ही मिरवणुक देवीची भेट घेतल्यानंतर परत माघारी येते. ही प्रथा देखील पुर्वापार चालत आल्याचे येथील भाविक सांगतात.
श्री नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र हे अल्प अवधित प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासन मार्फत ‘तीर्थक्षेत्र ब’ दर्जा तसेच धार्मिक पर्यटक ‘ब’ दर्जा मिळालेला आहे.
पाथरी-
पाच पांडवांपैकी पार्थ अर्थात अर्जुनाने वसविलेले पार्थपूर म्हणजेच सद्यस्थित पाथरी. जगविख्यात शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरीच्या तिरावर वसलेले मुद्गलेश्वर हे ऐतिहासिक मंदिर फार रमणीय आहे. पुरातन काळी हे मंदिर 'देवभूमी' म्हणून ओळखले जायचे. मंदिर परिसरात एकूण तीन देऊळ आहेत ज्यापैकी नदीतिरावरील एक मंदिर शिवाचे आहे. नदीपात्रात भगवान नरसिंह (मुद्गलेश्वर) आणि मुद्गल गणेशाचे मंदिर आहे. राज्याची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदा नदीच्या पाण्यात भाविक पवित्र स्नान करून मंदिरांचे दर्शन घेतात. दरवर्षी महाशिवरात्रीला भक्त येथे मोठ्या संख्येने येतात. टाळ आणि मृदुंगाच्या संगीतमय आरतीने परिसर अधिक मनोरम होतो.
श्री साईबाबा मंदिर पाथरी – Sri Sai Janmasthan Temple, Pathri
श्री साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्हयातील पाथरी असुन या ठिकाणी साई बाबांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येथे साई बाबांची सिंहासनाधिष्ठीत मोठी मुर्ती असुन त्यांचे जन्मस्थान, त्यांचे मुळ घर, त्यांच्या घरातील भांडी, चमत्कारीक उदी, या सर्व गोष्टी या जागी अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवल्या आहेत.
श्री साई स्मारक समितीने मंदिराकरता जागा घेउन तेथे भव्य असे मंदिर बांधले आहे, साधारण 1994 ला मंदिराची निर्मीती सुरू झाली आणि 1999 ला मंदिर भाविकांकरता खुले करण्यात आले.
श्री स्वामी साई शरणानंदाची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली असुन त्यांना प्रत्यक्ष साई बाबांचा सहवास लाभला असल्याने त्यांनीच साईबाबांचा जन्म पाथरी या गावातला असल्याचे सांगितले त्यामुळेच ऐवढे पवित्र ठिकाण समजु शकल्याने त्यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयी विस्तृत माहिती या ठिकाणी लिहीली आहे.
त्यांच्या शेजारीच श्री बल्बबाबा यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयीची माहिती येथे लिहीली असुन त्यांनीच पाथरीला साईबाबांचे भव्य मंदिर तयार होईल अशी भविष्यवाणी केली होती.
जिंतुर
प्राचिन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर. जैनपूर नावाप्रमाणेच जवळच गुहांमध्ये कोरलेल्या जैनशिल्पांमुळे जिंतुर विशेष प्रसिद्धीस आले आहे. नेमगिरी म्हणून ओळखले जाणाऱ्या या क्षेत्री शहरालगतच्या डोंगरात एकूण सहा लेण्या आहेत. त्या प्रामुख्याने अदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शकुट व बाहुबली अशा आहेत. घुमटाची बांधणी चार स्तंभांच्या सहाय्याने केली आहे. हे मंदिर विशेत्वाने ख्यातनाम आहे ते तेथील भगवान पार्श्वनाथांच्या अधांतरी मूर्तिमुळे! जैनांच्या या पवित्र स्थळी भाविक मनोमन विसावतो. जिंतुरापासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे.
नेमगिरी
श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान, जिंतुर
हे क्षेत्र जिंतूरपासून 3 किमी अंतरावर परभणी जिल्ह्यातील मराठवाड्यातील नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या सह्याद्री पर्वतांच्या उप-टेकड्यांत वसलेले आहे. नेमागिरि नामक दोन टेकड्या आहेत आणि चंद्रगिरी ही प्राचीन ज्योतिर्लिंग आणि चमत्कारिक जैन गुहा मंदिर व चैत्यलय्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत.
प्राचीन काळी हे क्षेत्र जैनपुर या नावाने प्रसिद्ध होते, हा राष्ट्रकूट कुटुंबातील सम्राट अमोघ वर्षाच्या काळात विकसित झाला. नंतर भारतीय इतिहासाच्या मधल्या काळात, हे आक्रमणकर्ते करून नष्ट केले गेले आणि त्याचे नाव बदलले ते जिंतूर, सध्याचे नाव. त्या वेळी 300 जैन कुटुंबे आणि 14 जैन मंदिर येथे होते. आज त्यातील केवळ दोन मंदिरे पहायला मिळतात.
हे तीर्थक्षेत्र पर्यटकांमध्येही फार लोकप्रिय आहे. राज्यातीलच नाहीतर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून पर्यटक तर येतातच शिवाय परदेशातल्या पर्यटकांची देखील नेहमीच रेलचेल असते. पंचक्रोशीतल्या शाळांच्या सहली तर इथं नित्यनेमानं येतच असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या पर्यटनस्थळाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.
नेमगिरीचे वैशिष्ट्य
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णत: जमिनीमध्ये दबलेले होते.
सुमारे ९००० किलो वजनाची श्री १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्यच आहे.
इतिहास
सैदुल कादरी हा अफगाणिस्तानातून दिल्लीला आला. तो दिल्लीहून अजमेरला ख्वाजा साहबच्या दरबारात पोहचला. दरबारात त्याला असा आदेश देण्यात आला की, जैनपूर (जिंतूर) ला जाऊन तिथं असणाऱ्या मजबूत किल्ल्यामधल्या जैन धर्मियांची संस्कृती नष्ट करुन त्यांच्या मंदिराची नासधूस करून आपला झेंडा फडकावयाचा. आदेशानुसार कादरी अजमेरहून खुलताबाद, दौलताबादमार्गे जैनपूरला आला. तेव्हा जैनपूरमध्ये यमराज आणि नेमीराज नावाचे भाऊ राज्य करत असत. कादरीने गुलबर्ग्याच्या राजा आलमगीरच्या फौजेच्या सहाय्याने हा प्रदेश कब्ज्यात घेतला आणि मंदिर आणि मुर्त्यांचे तोडफोड केली. ही घटना हिजरी सन ६३१ ची आहे.
नंतर १६ व्या शतकामध्ये नांदगांव येथून श्री. वीर संघवी त्यांची पत्नी “घालावी”, मुले नेमा संघवी, सांतु संघवी, अंतु संघवी आणि ३ सुनांसह जिंतूर येथे आले. त्यावेळी नेमगिरी पूर्णपणे झाडा-झुडपांनी वेढलेली होती पण मंदिराचे शिखर दिसत होते. तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार करायचा संकल्प केला. त्यांनी १६१० साली नेमगिरी आणि चंद्रगिरी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोध्दार केला. याची आठवण म्हणूनच गुफा क्रमांक ४ मध्ये असलेल्या मूलनायक श्री नेमीनाथजी यांच्या प्रतिमेच्या खाली या कुटूंबियांचे शिल्प रेखाटलेले आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
गेली २० वर्षे विश्वस्त मंडळामध्ये उपाध्यक्ष असलेले श्री. बबनराव तात्याराव बेंडसुरे यांनी मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, हे मंदिर पुर्वी पूर्णपणे डोंगराखाली दबलेले होते. या मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती देताना ते म्हणाले की, गुफा नं.१- पहिल्या गुफामध्ये महावीर स्वामींची साडे तीन फुट उंचीची अत्यंत प्राचीन मुर्ती आहे. या गुफेमध्ये आचार्य भद्रबाहू, आचार्य शांतिसागरजी यांचे पद कमळ हे या गुफेचे वैशिष्ट्य आहे.
गुफा नं .२- दुसऱ्या गुफामध्ये श्री १००८ आदिनाथ स्वामींची महान प्रतिमा आहे. ध्यान करण्यात मग्न असणारी ही प्रतिमा पाहताक्षणी मनाला मोहिणी घालते. गुफा नं.३- तिसऱ्या गुफामध्ये दर्शन होते ते सकलविघ्नोपशाकमक, परमशांतिदायक, देवाधिदेव श्री. १००८ शांतिनाथ स्वामी यांच्या पद्मासनामध्ये विराजमान मुर्तीचे. सहा फुट उंच या मुर्तीचे दर्शन घेताच भक्तांना दु:खाचा पूर्णपणे विसर पडतो आणि तो ध्यानात मग्न होतो. गुफा नं.४- चौथ्या गुफामध्ये मूलनायक श्री १००८ नेमीनाथ स्वामींची भव्य मूर्ती विराजमान आहे. पाहताक्षणी मन मोहून टकाणारी काळ्या पाषाणातली मूर्ती विराजमान आहे.गुफा नं.५- पाचव्या गुफामध्ये सर्वांचंच आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी श्री १००८ अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामींची पद्मासनातली मूर्ती आहे.
सुमारे ९००० किलो वजनाची श्री. १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्य आहे. या मूर्तिच्या मागे सर्प आहे,त्या सर्पात ओम तयार होते. या मुर्तीचं दर्शन घेताच भक्तांचे दु:ख कमी होतात.
गुफा नं.६- सहाव्या गुफामध्ये साडेचार फुट उंचीची आणि एखाद्या स्तंभासारखी दिसणारी नंदिश्वराची मूर्ती आहे. गुफा नं.७- सातव्या गुफामध्ये भगवान बाहुबलींची विशाल मूर्ती आहे. तपश्चर्येत मग्न अशी ही मूर्ती आहे. मानेपर्यंत आलेली वेल, खांद्यावर नागांचे वास्तव्य आणि मांडीमध्ये भुंग्याने केलेले छीद्र यावरून या मूर्तीची तपश्चर्येतील मग्नता दिसून येते.
नेमगिरीपासून थोड्या अंतरावर चंद्रगिरी नावाचे धार्मिक स्थळ आहे. या चंद्रगिरीचे दर्शन केल्याशिवाय नेमगिरीची यात्रा पूर्ण होत नसल्याची अख्यायिका आहे. चंद्रगिरीकडे जाताना रस्त्यातच युगल चारणऋध्दीधारी मुनिंची पादुका आहेत.
नेमगिरी तीर्थक्षेत्रांचे अन्य उपक्रम
गोशाळा
आचार्य विद्यासागरजी यांचे शिष्य जैनमुनीश्री समाधीसागरजी यांनी गोशाळा असावी अशी सूचना केली आणि सन २००० पासून इथं गोशाळा चालविण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी १५० गायी आहेत.
सोयी-सुविधा
इथं राहण्यासाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसादालयाची आणि भोजनाची देखील उत्तम व्यवस्था आहे.
पोहचण्यासाठी
जवळचे रेल्वेस्टेशन- परभणी अंतर- ४५ कि.मी.
जवळचे बस स्थानक - जिंतूर अंतर - ४ किमी.जिंतूर हे ठिकाण जालना (४० कि.मी.) आणि परभणी (४० कि.मी.) या शहरांशी रोडद्वारे जोडलेले आहे. राज्य रस्ता नागपूर ते औरंगाबाद तसेच राज्य रस्ता नांदेड ते मुंबई (औरंगाबाद मार्गे) या रस्त्यावर जिंतूर आहे.
जवळचे विमानतळ - औरंगाबाद अंतर - १६५ कि.मी.विमानाने
जिंतूर पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासून जिंतूर ११० कि.मी अंतरावर आहे.
संपर्क- श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान,
जिंतूर- ४३१ ५०९, जि. परभणी
फोन- ०२४५७- २१९२०८
Email- nemgiri@gmail.com
website- www.nemgiri.org
लेखक - जयश्री श्रीवास्तव
चारठाणा
तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधे से खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भाग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.( ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर- जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६ वे ते ९ वे शतक) राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात .
बसची सोय म्हणाल तर नांदेडला जाणारी प्रत्येक लाल एस टी तिथे फाट्याजवळ थांबते. आत मात्र बस जात नाही. गावात जीप सुमो वगैरे आहेत ते ही सोय करतात.आपण आपली गाडी घेऊन जाणे सगळ्यात उत्तम रस्ते बरे आहेत पण राहण्याची मात्र काही सोय नाही. उत्तम उपाय म्हणजे मंठा किंवा जिंतूरला मुक्काम करून तिथून ये जा करणे बरे. खाण्याचे म्हणाल तर टपरी वजा हॉटेल्स आहेत गावात. बाटली बंद पाणी ही मिळते पण जास्त करून सगळे लोकल ब्रान्ड असतात.ईथे शक्यतो हिवाळ्यात जाणे चांगले. उन्हाळ्यात फार त्रास होतो.
गावात दीप माळ बघायची आहे , उकंडेश्वर मंदीर बघायचे आहे , पुष्करणी बघायची आहे म्हटले तर कुणीही रस्ता दाखवते.माहिती ही देते.गावातले लोक सौजन्यशीलच आहेत.फारसा गजबजाट नसल्याने शांतपणे मंदीर बघणे फोटो काढणे. करता येते.पायपीट खूप करावी लागते. जुने नवे अशी दोन गावे आहेत. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे.
गावात( आणि इतिहास प्रेमींमध्ये ) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.हा जवळ पास ४५ फुट उंच आहे. गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी हा दीपमाळ वाटत नाही शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा उभा मातीखाली गाडला गेलेला होता. मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.
हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले.पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात फरक जाणवतो. असे एकूटवाण्या स्तंभांची (ओबेलिस्क) परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इजिप्तच्या प्राचीन मंदिरांतही ते दिसतात. असेच स्तंभ महाराष्ट्रात सज्जनगड, पैठण, मस्तानीचे पाबळ ह्या ठिकाणी आहेत.
ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.
स्त्म्भाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी अत्यंत अप्रतीम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून ती नुसती लटकवलेली दिसते. मागची दगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.
स्तम्भावरचे अप्रतिम कोरीव काम
तिथेच बाजूला पडलेला कोरीव काम केलेला दगड...
ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे
मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या म्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे नाही दिसला.
रस्त्याच्या बाजूला अशी भग्न शिल्प पडलेली दिसतात
उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर, हिला खुराची देवी असेही म्हणतात. का? ते पुढे कळेल
हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवीची मूर्ती
स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा. सध्याची देवीची मुर्ती कदाचित माहुरच्या रेणुकेपासून स्फुर्ती घेउन तयार केली असावी.
गाईच्या खुरांसाराखा आकार बघितलात म्हणून ही खुराची देवी. ह्यात जी खुर उभारून आलेली दिसताहेत ती प्रत्यक्षात खुराच्या आकाराचे खड्डे आहेत. पूर्ण छताचा फोटो टाकला तर दृष्टीभ्रम कसा होतो ते कळेल. हे असे मला इतर कुठे ही आढळले नाही
मला वाटते या प्रकारच्या छताला गंडस्थळ रचना असे म्हणतात. हत्तीच्या गंडस्थळासारखे दिसतात म्हणून.
ह्या मंदिराला अगदी जोडून असलेले जोड महादेव मंदीर ( म्हणून बहुधा जोड महादेव)
सर्वसाधारण पणे पिंडीची साळून्खा मंदिरातील प्रवेशाच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे. शाळुंखा सर्वसाधारणपणे उजवीकडेच असते. पण काही ठिकाणी त्या शाळुंखा डावीकडेही असतात. पाटेश्वर येथील बहुतेक शाळुंखा ह्या अशाच डाव्या बाजूस आहेत. त्या बहुधा शाक्त पंथीयांच्या असाव्यात.
जोड महादेव मंदिरातले छत – जीर्ण अवस्था
गावाबाहेर असलेल्या गोकुळेश्वर मंदिराकडे जाताना ही वस्तू लागते. हे मंदीर नाही पण बहुधा जुन्या मंदिराच्या तटाचा भाग असावा.दाराला कडी कुलूप आहे पण पलीकडे काहीच नाही
एखाद्या बुरुजासारखा हा अवशेष वाटतो आहे. इतके मंदिर वैभव असणार्या गावाभोवती काहीतरी संरक्षक तटबंदी असावी असे वाटते ( जशी गोंदेश्वर व एश्वर्येश्वर हि मंदिरे असणार्या सिन्नर शहराभोवती होती). किंवा त्यात देखील एखादे शिल्प दडवलेले असू शकते
ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात
गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.
गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर
पुष्कारणीतले कोरीव काम
ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण यंदा पाउस तुफान झाला. नेट वरून मिळालेला जुना कमी पाण्यातला फोटो टाकत आहे. पाणी खूप असल्याने आत जाता नाही आले.
नदीकाठचे महांकाळेश्वर (शनी) मंदीर
शनी मंदीर म्हणून बाहेर हनुमान असावा पण हा हनुमानही नाही. ही मर्कट शिल्प आहेत. अशीच हम्पीला पहिली होती.
शनी महाराज! ( मूर्ती नक्कीच नवीन आहे ) ही बाहेर ठेवली आहे आत पिंड आहे.
विष्णू मंदिरात यज्ञ वराह असतो.त्याच्या झुलीवर लहान लहान विष्णूमुर्ती कोरल्या आहेत. चाकण, लोणी भापकर ह्याव्यतिरिक्त रांजणगवाजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरातही एक भग्न यज्ञवराह आहे.असेच यज्ञवराह चाकणच्या किल्ल्याजवळ आहे.
भाऊ काकांच्या शेतात सापडलेले शिव मंदीर. हे त्यानी झाकून लपवून ठेवले आहे (म्हणजे होते.)
हे विटांचे बांधकाम त्यांनीच केले दिवाबत्ती ही करतात.
मंदिराचे जोते
वापरात असलेल्या बर्याप शिल्पाना शेंदूर आहे.शेंदाराने ओबड धोबड मुर्त्या सुंदर दिसतात पण ज्या मुर्त्या सुबक सुंदर आहेत त्यांचा सुबकपणा मात्र कमी दिसतो.कदाचित शेंदराने मूर्त्यांच्या नाजूक नक्षी चे काहीप्रमाणात संरक्षणही होत असावे .
भारतीय पुरातत्व खात्याने असे जागोजाग फलक लावणे आणि काही ठिकाणी मान्दिराला आणि देवाला ओबड धोबड दिसणारे लोखंडी दरवाजे लावून कुलूप घालण्यापलीकडे जास्त काही केलेलं नाही.
गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे आणि अगदी आजूबाजूला हो कुठे मोठा डोंगर चढून जायचे नाही कि गुहा धुंडाळायच्या नाहीत. अगदी just around the corner असे ही वैभव पडून आहे . एक दोन दिवसाच्या भेटीत पाहून होणे शक्यच नाही. कमीतकमी आठवडा तरी नक्की लागेल.
पुण्याहून जाण्याचा रस्ता( साधारण ३८०-४०० किमी)
गावात रहायची काहीही सोय नाही.
पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-जालना- मंठा- चारठाणा ( हमरस्त्यावर चारठाणाकडे जाणारा फाटा फुटतो. तिथे कमान आहे.)
लेखनः- आदित्य कोरडे
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी :-
सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात. हे पुस्तक येत्या २/३ महिन्यात पूर्ण होउन वाचकांना उपलब्ध होइल. डॉ. गो.बं. देगलूरकर सरांचा पहिल्यांदा हे पुस्तक इंग्लिश मधुन व नंतर मराठी मधुन प्रकाशित करण्याचा विचार आहे.
या पुस्तकासाठी मी अलिकडेच पश्चिम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व विदर्भातील काही मंदिरांची प्रकाशचित्रे घेण्यासाठी भटकंती केली. या भटकंतीत मला गावोगावात अनेक प्राचीन मंदिरे दिसली. यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची प्रकाशचित्रे आपल्या समोर मांडावी या हेतुने मी हा प्रयत्न करत आहे. मी मंदिरांची त्रोटक माहिती व जास्त प्रकाशचित्रे जास्त देणार आहे कारण मंदिरांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती आपल्याला डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या पुस्तकातून मिळणार आहे. मात्र वाचकांना विनंती की पुढील मंदिरांची माहिती या मंदिराला मिळणा-या प्रतिसादावर अवलंबुन आहे.
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराच्या समोर प्रचंड पुष्करणी आहे. सध्या ही पुष्करणी दुष्काळामुळे पूर्ण कोरडी आहे. मंदिर त्रिदल (तीन गर्भग्रुह असलेले) असुन मंदिरातील मुख्य देवता शिव आहे तर दुस-या एका गर्भग्रुहात आज एका गणपतीची मूर्ती आहे तर तिस-या गर्भग्रुहाची खोली सध्या सामान ठेवण्याची खोली म्हणुन वापरली जाते. संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात.
अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो. या मंदिरासोबतच परभणी परिसरातील जांब, बोरी, चारठाणा, जिंतुर अशा अनेक प्राचीन मंदिरे व अवशेष असलेल्या ठिकाणांनाही भेट देता येइल.
.मंदिराचा दर्शनी भाग
.मंदिर व समोरील पुष्करणी
.मंदिर व समोरील पुष्करणी
.मंदिर व समोरील पुष्करणी
.पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती
.नरसिंहाची भग्न मूर्ती
.मंदिराची उत्तरेकडील बाजू
.मंदिराची दक्षिणेकडील बाजू
मंदिराचा सभामंडप व खांब.
.मंदिराच्या मुख्य गर्भगृहाची फारच वाइट पध्दतीने रंगवलेली द्वारशाखा
.मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब
लेखन- पराग पुरंदरे
धारासुरचे गुप्तेश्वर मंदिर
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात परभणीशहरापासून अंदाजे ३५/४० कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर हे धारासुर हे छोटेसे गांव आहे. याच गावात गुप्तेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर नदीच्या काठावर असल्याने जवळपास ८ फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मुखमंडप, मंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा मंदिराचा प्लॅन आहे. मंदिराला पिठावरून प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या असुन मंदिराचे शिखर महाराष्ट्रात नेहमी आढळणा-या भूमिज या शैलीचे आहे. (गोंदेश्वर (सिन्नर), अम्रुतेश्वर, खिरेश्वर, झोडगे ही महाराष्ट्रातील अजुन काही भूमिज मंदिरे) या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिखर पक्क्या म्हणजेच भाजलेल्या विटांचा वापर करुन बांधलेले आहे. मंदिराच्या शिखराचा काही भाग सध्या ढासळलेला आहे. पुरातत्त्वखात्याने मंदिराच्या डागडुजीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
.
.मंदिराची दक्षिणेकडील बाजू
.मंदिराची उत्तरेकडील बाजू
.मंदिराचे पक्क्या विटांनी बांधलेले शिखर
.मंदिराचा दर्शनी भाग, मुखमंडप, दक्षिणेकडील अर्धमंडप व कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत
.मंदिराच्या कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत
आज जरी मंदिरातील मुख्य देवता शिव म्हणजेच शिवलिंग असले तरी एकेकाळी हे मंदिर नक्कीच विष्णू या देवतेचे असावे. याचे कारण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवरील बहुतेक सर्व शिल्पे विष्णूची आहेत. या मताला पुष्टी देणारा अजुन एक पुरावा म्हणजे मंदिराच्या परिसरात अलीकडेच सापडलेली एक अप्रतीम विष्णू मूर्ती. ही विष्णु मूर्ती सध्या मंदिराजवळच्या दुस-या एका मंदिरात ठेवलेली आहे.
.मंदिराच्या बाह्यभिंतीवरील देवकोष्ठतील बैठ्या विष्णूची प्रतिमा
.मंदिराजवळ सापडलेली अप्रतिम विष्णुची प्रतिमा
मंदिराच्या बाह्य भिंतीवर तीन देवकोष्ठे आहेत व या देवकोष्ठांतही विष्णुचीच तीन रुपे आहेत. या शिवाय मंदिराच्या बाह्यभिंतीवर अनेक सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. त्यात प्रमुख्याने पत्रलेखिका, पुत्रवल्लभा, दर्पणा, कर्पुरमंजिरी, तिलोत्तमा, मर्दला अश्या विविध सुरसुंदरी आहेत. यांच्या बरोबरच मंदिराच्या बाह्य भिंतीवर मदन, चामुंडा, गणपती अशा काही देवताही आहेत.
.मंदिराच्या बाह्यभिंतीवरील मदनाची प्रतिमा
.मंदिराच्या बाह्यभिंतीवरील पत्रलेखिकेची प्रतिमा
.मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजुन एक विष्णु प्रतिमा
मंदिरात पुर्व, उत्तर व दक्षिण असा तीनही दिशांकडून प्रवेश करता येतो. मंदिराच्या मुखमंडप व अर्धमंडपात कक्षासने आहेत. या कक्षासनाच्या भिंतींवर बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम आहे.
मंदिराची द्वारशाखेवरही अप्रतिम कोरीवकाम असुन द्वारशाखेच्या दोन्ही बाजूंवर वैष्णव द्वारपाल व चामरधरिणी आहेत. ललाटबिंबावर बसलेल्या गणपतीचे शिल्प आहे मात्र त्याला शेंदूर फासल्याने त्याच्या हातातील आयुधे नक्की समजत नाहीत.
.मंदिराची द्वारशाखा
.मंदिरातला चालुक्य शैलीचा खांब
.मंदिराजवळच्या दुस-या मंदिरात असलेली महिषासुरमर्दिनीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती
.मंदिराच्या जवळुन दिसणारे गोदावरी नदीचे विशाल पात्र
हे मंदिर १२/१३ व्या शतकात म्हणजे उत्तर चालुक्य यांच्या काळात बांधले गेले असावे.
रहस्यमय वालूर बारव परभणी
डाक टपाल तिकीट