Wednesday, November 16, 2022

ओडीशा राज्य माहिती ( भाग ३)


साईबाबा मंदीर, भुवनेश्वर :-
    या मंदिराची उभारणी होउन याचे उदघाटन १५ फेब्रुवारी १९९५ ला झाले.इथे साईभक्तांची मोठी गर्दी असते. साईबाबांच्या भक्तांच्या मागणीवरुनच या मंदीराची उभारणी झाली.सध्या मंदीराच्या प्रशासन समितीतर्फे याची देखभाल केली जाते. इथे साईबाबांच्या संबधित वेगवेगळ्या उत्सवाचे आयोजन केले जाते.
इंफो सिटी :-
    प्रचंड मोठ्या परिसरात आणी देखण्या आवारात अत्याधुनिक शहर उभारले आहे, ते म्हणजे इंफो सिटी.इथे मोठ्या प्रमाणात व्यापारी उलाढाली होतात. बहुतेक सर्व नामवंत ब्रँडच्या वस्तु एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सहाजिकच इथे खरेदी करायला आल्यावर वेगवेगळ्या दुकानात जाण्याची गरज रहात नाही. या वास्तुची रचनाही आधुनिक आहे.इथे बहुतेक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तु उपलब्ध आहेत. भुवनेश्वरच्या भेटीत इथे येउन खरेदीचा आनंद घेता येइल.
आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेली फॉर्च्युन टॉवर एक भव्य इमारत आहे. इथे आय.टी.पार्क उभारणीच्या दृष्टिने या इमारतीची उभारणी झाली. हि सात मजली इमारत ३.६१  एकरात वसलेली आहे. भुवनेश्वरमधील ओबेरॉय टॉवरजवळ हि इमारत आहे. या इमारतीत आय.टी,पार्क, कॅप्सुल आणी सर्विस लिफ्ट तसेच कार्पोरेट हबसहीत सर्व आधुनिक सोयी आहेत. हि पुर्ण इमारत वातानुकुलीत आहे तसेच इथे जिमखाना, कॅफेटेरीया, कॉन्फरन्स हॉल, बिझनेस सेंटर आणि पार्किंगची सोय आहे. तसेच इथून थेट आंतरराष्ट्रीय नेटवर्क उपलब्ध केले आहे, या इमारतीत रिलायन्स इंडस्ट्री, मित्तल स्टील, एस.टी.पी.आय., पॉस्को तसेच ओ.पि.जी.सी.चे ऑफिस आहे. 
 
भुवनेश्वर शहरातील आधुनिक पर्यटनस्थळे बघीतल्यावर आता जाउया जुन्या भुवनेश्वर शहारात.सिटी ऑफ टेम्पल म्हणून ओळखल्या जाणार्‍या भुवनेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत.आता आपण याच मंदीराची माहिती घेणार आहोत.पण त्यापुर्वी हि मंदिरे ज्या शैलीत उभारली आहेत, त्या कलिंग मंदिर शैलीची माहिती घेउया.
कलिंग मंदिरस्थापत्यशैली :-
  ओडिशातील मंदिरं कलिंग स्थापत्यशैलीचा अनुपम आविष्कार

      ओडिशा राज्यात एकाहून एक सुंदर अशी पाचशेहून अधिक प्राचीन मंदिरं आहेत. ओडिशामधल्या मंदिरस्थापत्यशैलीबद्दल आणि ओडिशाच्या इतिहासाबद्दल थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे.
         भारतीय मंदिरस्थापत्यशैलीचे साधारणतः तीन प्रकार मानले जातात. दक्षिण भारतात प्रचलित असलेलं द्रविड स्थापत्य, उत्तर भारतात प्रचलित असलेलं नागर स्थापत्य आणि या दोहोंचं मिश्रण असलेली वेसर मंदिरशैली. नागर मंदिरशैलीचे काही उपप्रकार उत्तर भारताच्या निरनिराळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यांपैकी कलिंग देशातील, म्हणजे आजच्या ओडिशा राज्यातील, मंदिरस्थापत्यशैली अत्यंत प्रेक्षणीय मानण्यात येते. या उपशैलीस ‘कलिंगशैली’ असं म्हणतात. जगन्नाथपुरी व कोणार्क इथली मंदिरं कलिंग स्थापत्यशैलीचा प्रगत आविष्कार आहेत. खुद्द ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये कलिंगशैलीची अनेक मंदिरं असून त्यांपैकी शंभर तरी उत्तम स्थितीत आहेत.
   पण ही कलिंग स्थापत्यशैली नेमकी आहे तरी कशी? तर वर सांगितल्याप्रमाणे कलिंग मंदिरस्थापत्य हा उत्तर भारतीय नागर मंदिरशैलीचाच एक उपप्रकार आहे. नागरमंदिरस्थापत्यशैलीची सर्व वैशिष्ट्यं, म्हणजे चौकोनी गर्भगृह, त्यापुढचं आयताकृती अंतराळ, त्याला जोडून भव्य चौकोनी किंवा आयताकृती सभामंडप आणि गर्भगृहावरील उंच, निमुळतं शिखर हे सगळं कलिंग मंदिरस्थापत्यशैलीतही आपल्याला बघायला मिळतं. कलिंगमंदिरांचं शिखर एकाच रेषेत वर झेपावत निमुळतं होत जाणारं, बघणाऱ्या भाविकांचं लक्ष जमिनीपासून ते थेट शिखरावरच्या कलशापर्यंत नेणारं व वर गोल आमलक असलेलं असतं. मंदिराच्या निमुळता होत गेलेला भाग थरांनी बनलेला असतो. प्रत्येक थर त्याच्या खालच्या थरापेक्षा लहान होत जातो. त्याची कडा जरी दंतुर असली तरी ती रेषेप्रमाणे म्हणजे रेखेप्रमाणे सलग दिसते म्हणून रेखा देऊळ. 
रामेश्वर मंदीर

मंदिराचा ढोबळ आराखडा
उडिशा देवळाची संपूर्ण रचना ( कल्याण,नाट्य,भोगमंडप आणि देऊळ असे चार भाग असतात) पाहायला मिळते.मंदीर रचना

याचे एक उदाहरण म्हणजे जालावरून उतरवलेली हि एक आकृती ज्यामध्ये जास्त तपशिल बघायला मिळतील.
   ही मंदिरं सहसा ओडिशा राज्यात सहज आढळणाऱ्या लाल-गुलाबी वालुकाश्म दगडात घडवलेली असतात. मंदिराबाहेर असलेल्या देवकोष्ठांमधल्या मूर्ती उंचीला छोट्या असल्या तरी त्यांचं शरीरसौष्ठव व सुबकपणा डोळ्यात भरण्यासारखं असतं.
     कलिंग स्थापत्यशैलीच्या हिंदुमंदिरांच्या बांधणीला ओडिशामध्ये साधारण सातव्या शतकात सुरुवात झाली. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ओडिशामध्ये महाभावगुप्त जनमेजय या राजानं नवं राज्य स्थापन करून कटकपर्यंत सीमाविस्तार केला. त्याच्या नातवानं म्हणजे महाशिवगुप्त ययाती नावाच्या राजानं स्वतःचं केसरी नावाचं राजघराणं सुरू केलं. भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराजमंदिर हे याच सुमारास बांधलं गेलं. पुढं अकराव्या शतकात या केसरी राजवंशाचा पराभव करून गंग वंशाचा राजा तिसरा वज्रहस्त यानं त्रिकलिंगाधिपती ही पदवी धारण केली. त्याचा नातू अनंतवर्मन् चोडगंग यानं अकराव्या शतकाअखेर पुरीचं जगन्नाथमंदिर बांधून पूर्ण केलं असं मानलं जातं. याच गंगवंशाचा राजा ''राजा नरसिंहदेव पहिला'' यानं कोणार्कचं प्रसिद्ध सूर्यमंदिर बांधून घ्यायला प्रारंभ केला.
     केसरी आणि गंग या दोन्ही राजवंशातील राजांनी साहित्य, संगीत व स्थापत्य या कलांना उदारहस्ते आश्रय दिला. आज आपल्याला दिसणारं कलिंग मंदिरस्थापत्य हे प्रामुख्यानं या दोन राजवटींची देणगी.खजूराहो आणि भूवनेशवर ,कोणार्कच्या शिल्पांची तुलना केली .इकडच्या मूर्ती अधिक भावपूर्ण जाणवतात तर खजूराहोच्या मूर्तींचे चेहरे यांत्रिक आणि कोरिव एकसारखे वाटतात .
       ओडिशामधल्या मंदिरांची विभागणी साधारणतः तीन खंडांत करता येईल, साधारणतः सातवं ते नववं शतक, यामधील कलिंगस्थापत्याच्या बाल्यावस्थेचा काळ. नवव्या ते बाराव्या शतकादरम्यान ऊर्जितावस्थेचा काळ आणि शेवटचा एका शतकाचा उत्तरकाल.साधारणतः तेराव्या शतकानंतर ओडिशावर इस्लामी राजवटींची वक्रदृष्टी वळली आणि भव्य नवी मंदिरं बांधणं तर जवळजवळ बंद झालंच; पण असलेल्या मंदिरांवरही अनेक हल्ले होऊन बरीच तोडफोड झाली. पुढं सोळाव्या शतकात बंगालचा सुलतान सुलेमानखान याचा सेनापती काला पहाड यानं केलेल्या स्वारीत ओडिशाचा शेवटचा राजा मुकुंददेव पडला आणि राज्य बंगालच्या मुसलमानांच्या हातात गेलं. याच स्वारीत जगन्नाथपुरीचं मंदिर भग्न केलं गेलं व मंदिरामधल्या मूर्ती चिल्का सरोवरातल्या एका बेटावर हलवण्यात आल्या हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत असेल.
     सुरुवातीला कलिंगमंदिरांचं स्थापत्य हे नागर शैलीच्या इतर मंदिरांसारखंच होतं; पण पुढं गरजेनुसार त्यात बदल होत गेले. कलिंगमंदिरांचे स्थापत्यशैलीच्या दृष्टीनं तीन उपप्रकार निर्माण झाले, ते म्हणजे ''रेखा देऊळ'', ''पीढा देऊळ'' व ''खाखरा देऊळ''. रेखा देऊळ म्हणजे चौकोनी गाभाऱ्यावर निमुळतं होत जाणाऱ्या शिखराचं देऊळ. या प्रकारात बघणाऱ्या भाविकांची नजर शिखरावरून सरकत सरळ आमलकापर्यंत जाते. पीढा देवळाचं शिखर पसरट, पिरॅमिडसारखे अनेक टप्प्यांचं मिळून होतं, तर खाखरा देऊळ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असलेली आयताकार वास्तू.आपण मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या  (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.
       कलिंग मंदिरस्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, ‘जगमोहन’ या नावानं ओळखला जाणारा गर्भगृहापुढचा प्रशस्त चौरस सभामंडप. त्यावर सामान्यतः पीढा पद्धतीचं पसरट छप्पर असतं. त्यापुढील गर्भगृहावरचं छप्पर मात्र रेखा पद्धतीचं असतं. पुढं मंदिरातील धार्मिक उपचार व आन्हिकं वाढत गेली, तसं जगमोहन या मुख्य मंडपाला आणखी मंडप जोडण्यात येऊ लागले. हे सगळे बहुधा जगमोहनला जोडून व त्याच ओळीत असत. अशा मंडपांना भोगमंडप व नृत्यमंडप अशी नावं मिळाली. कलिंग स्थापत्यशास्त्र जसजसं प्रगत होत गेले तसतशी शिखरांची उंची वाढू लागली. जगमोहनाचा विस्तार वाढला आणि वरच्या पीठांच्या थरांच्या संख्येतही वाढ झाली. कोणार्कच्या मंदिरात हे सर्व बघायला मिळते. 


जालावरून विषयातील तज्ञांचे जालावरून उचललेले आहे. मी त्या क्षेत्रातला तज्ञ नसल्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. आपण कौतुकाने वाचताहात हेच माझ्यासाठी खूप आहे. आतून बाहेरून जवळजवळ इंचन इंच व्यापणारी आहे असे वाटणारी एवढी भरगच्च कलाकुसर आपल्याकडच्या काळ्या दगडात केलेली आहे? मी तुम्हाला आव्हान देत नाही तर आश्चर्याने विचारत आहे. तसे असेल तर वस्तुस्थिती त्या विधानाला छेद देणारी आहे असे म्हणावे लागेल. अजिंठ्यात तरी मला एवढी भरगच्च कोरीव कलाकुसर आढळली नाही.

एवढी बारीक कलाकुसर वालुकाश्म, संगमरवर अशा मृदु दगडातच होऊ शकते असे वाचल्याचे मला आठवते आहे.

वेरूळ मंदिर वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. एकाच दगडातून कोरलेले आणि आधी कळस मग पाया या रीतीने बनल्यामुळे.आणि दुसरे म्हणजे काळ्या दगडातली कलाकुसर एवढी बारीक आणि भरगच्च आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळते? भुवनेश्वरमध्येच पाचशेपेक्षा जास्त मंदिरे आहेत. ओदिशात इतर ठिकाणी देखील बरीच मंदिरे आहेत. कृपया हे आव्हान समजू नये. मी वस्तुस्थिती जाणून घेतोय आणि ते विधान पडताळून पाहातोय.

पुढील दोन प्रकाशचित्रे पाहा. नृसिंहमंदिरातली आहेत. अर्धवट सोडलेली वाटतात. अगोदरची आहेत, समकालीन आहेत की नंतरची आहेत हे ठाऊक नाही. पण फरक स्पष्ट आहे.

नृसिंहमंदिरातले काळ्या दगडातलेशिल्प

नृसिंहमंदिरातले काळ्या दगडतले शिल्प

कंकणावर कलाकुसर नाही. नागाच्या शरीरावर खवले काढलेले नाहीत. अर्थात शिल्प अपुरे आहेच. पण हे तपशील अपुरे आहेत की कोरता येत नाहीत?

मंदिरे पाहण्याचा क्रम -
मुख्य मंदिरे
१) अनंत वसुदेव - उडिया मंदिराची छोटी प्रतिकृती. फारनर आत जाऊ शकतात. फोटो काढता येतात. हे अगदी बिंदुसागर तलावासमोरच आहे.
२)लिंगराज - मोठे पुजा होणारे देऊळ. फोटोग्राफी बंदी.
३) कोटितिर्थेश्वर छोटा तलाव/कुंड.
४) स्वर्णजलेश्वर - शिल्पे आहेत शिखरावर.
५)परशुरामेश्वर - छान शिल्पे.,६)सिद्धेश्वर आणि ७) मुक्तेश्वर - सुंदर एकाच आवारात आहेत.
८) राजारानी. हे थोडे दूर आहे. मुक्तेश्वरपासून पंधरा मि चालत.
९)भास्करेश्वर आणि १०) ब्रह्मेश्वर ही दोन राजारानीपासून थोडी पुढे आहेत.
११) यामेश्वर आणि वेताळ देऊळ ही बिंदुसागर तलावापलिकडे.
बरेच पर्यटक फक्त लिंगराज मंदिर पाहातात.

शिव-विष्णूचं एकात्म प्रतीक : लिंगराजमंदिर
आज आपण भेट देणार आहोत ते मंदिर आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंदिर...श्रीलिंगराजमंदिर. इथं भगवान शिवांची उपासना श्रीत्रिभुवनेश्वर या नावानं केली जाते; किंबहुना भुवनेश्वर शहराचं नावच या प्राचीन मंदिरावरून पडलं आहे.








    जुन्या भुवनेश्वरच्या केंद्रस्थानी असलेलं हे मंदिर इतकं भव्य आहे, की अगदी दुरूनसुद्धा आपल्याला या मंदिराचं शिखर दिसू शकतं. आज अस्तित्वात असलेली मंदिराची वास्तू साधारणतः अकराव्या शतकाच्या शेवटी बांधली गेलेली आहे असं पुरातत्त्वीय पुरावे सांगतात; पण लिंगराजमंदिराचे काही भाग मात्र चौदाशे वर्षांपेक्षाही जुने आहेत. इसवीसनाच्या सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ओडिया साहित्यातही या मंदिराचा उल्लेख येऊन गेलेला आहे. मदल-पंजी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पुरीच्या जगन्नाथमंदिराच्या बाराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या इतिहासानुसार, भुवनेश्वरचं हे लिंगराजमंदिर प्रथम सहाव्या-सातव्या शतकात सोमवंशी राजा ललितेंदुकेसरी यानं बांधलं होतं. पुढं अकराव्या शतकात गंग राजवंशानं या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. आज अस्तित्वात आहे तो बराचसा मंदिरसमूह अकराव्या शतकात बांधलेला आहे.
    प्रख्यात ओडिया इतिहासकार के. सी. पाणिग्रही यांच्या मते, आज अस्तित्वात असलेलं मंदिर सोमवंशी राजा उद्योत्‌केसरी यानं अकराव्या शतकात बांधून घेऊन पूर्ण केलं. या जागेचं वर्णन ब्रह्मपुराणात ‘एकाम्रक्षेत्र’ असं करण्यात आलं आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, हे मंदिर शशांकानं म्हणजेच चंद्रानं बांधलं.
चंद्र म्हणजेच सोम, अर्थात्‌ सर्व सोमवंशी राजे चंद्राला आपला मूळ पुरुष मानत असत, हेच कदाचित या आख्यायिकेमागचं ऐतिहासिक सत्य असावं.
   लिंगराजमंदिराचं प्रांगण जवळजवळ दीडशे चौरस मीटर आहे आणि कलशाची उंची पंचावन्न मीटर आहे. शेजारीच बिंदुसागर तलाव आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, कृत्ती आणि वास या दोन राक्षसांशी युद्ध करून दमलेल्या आणि तहानलेल्या देवी पार्वतीसाठी साक्षात्‌ भगवान शिवांनी हा तलाव निर्माण केला आणि भारतातील प्रत्येक झऱ्याचं, तलावाचं आणि नदीचं बिंदुस्वरूप पाणी या सरोवरात साठवलं. हा परिसर भगवान शिवांना इतका आवडला की, त्यांनी लिंगस्वरूपात इथंच राहायचं ठरवलं. मंदिराच्या गर्भगृहात एक मोठं शिवलिंग आहे. ते स्वयंभू असल्याचं मानलं जातं. जवळजवळ आठ फूट व्यासाच्या या शिवलिंगात शिव आणि विष्णू हे दोघंही वास करतात अशी भाविकांची धारणा आहे. म्हणूनच या मंदिराला ‘हरिहरक्षेत्र’ असंही नाव आहे.

 

     मुख्य मंदिर चार भागांत आहे. गर्भगृह म्हणजे रेखादेऊळ, जगमोहन म्हणजे पिढादेऊळ. हे दोन्ही भाग मूळचे आणि त्यांना पुढं जोडलेले भोगमंडप आणि नटमंडप. गर्भगृह पंचरथ पद्धतीचं आहे, म्हणजे प्रत्येक बाजूच्या भिंतीचे किंवा बडाचे उभे पाच भाग केलेले आहेत. मधला रह-पग, त्याच्या दोन्ही बाजूंना एकेक अनुरथ-पग आणि दोन्ही कोपऱ्यांत एकेक कनिका-पग असे पाच रथ किंवा उभे भाग, तसंच गाभाऱ्याच्या भिंतीचे जंघा नावाचे दोन आडवे भाग केलेले आहेत आणि त्यांना जोडणारी मध्यमा आहे.
     खालच्या जंघाभागात चैत्यतोरणाकृती छपरांची देवकोष्ठे आहेत, तर वरच्या भागात सपाट छपरांची देवकोष्ठे आहेत. दोन्हींमध्ये वेगवेगळ्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिल्पपट्टात देव-देवता आणि सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. कलिंगस्थापत्यशास्त्रात सुरसुंदरींना आलसकन्या असं नाव आहे. या मंदिरातील आलसकन्या आकारानं लहान असल्या तरी अत्यंत कमनीय आहेत. तीन दिशांवरील भिंतींच्या मधल्या पट्‌ट्यातल्या मुख्य कोनाड्यात गणेश, कार्तिकेय आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. गंडी म्हणजे शिखर, लहान आकारांच्या शिखरांच्या प्रतिकृतींचं मिळून ते झालं आहे. मुख्य शिखराची उंची ५५ मीटर आहे, तर पुढच्या जगमोहनाच्या शिखराची उंची २५ मीटर आहे. मंदिराच्या शिखराच्या बांधणीत विविध थर अशा उठावानं कोरून काढले आहेत, की त्यामुळे मंदिरावरचा छाया-प्रकाशाचा खेळ उठावदार होतो. शिखराच्या खालीच असलेल्या बरंडा या भागातही देवकोष्ठे आहेत आणि त्यात शिवांच्याच अवस्थिती म्हणजे दक्षिणेला अंधकान्तक, पूर्वेला लकुलीश आणि पश्चिमेला नटराज यांच्या मूर्ती आहेत. उत्तरेकडच्या कोनाड्यात चामुंडा आहे. शुकनासीवरती मोठा गजसिंह आहे. कलशावरच्या आयुधात श्रीविष्णूचं सुदर्शन आणि शिवांचा त्रिशूल, दोन्ही आहेत.
लिंगराज मंदिराचा कळस

लिंगराज मंदीर तिठ्यावर आहे. भ्रमणध्वनी, कॅमेरे वगैरे आत नेण्यास मनाई आहे. 
लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार

लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार
     मंदिरावरच्या सर्व शिल्पाकृतींच्या बाह्य रेषा लालित्यपूर्ण आणि सुबक आहेत. कलिंगशैलीच्या मंदिरांचं लिंगराजमंदिर हे एक भूषण आहे. वास्तुकला व मूर्तिकला या दोन्ही दृष्टींनी भुवनेश्वर इथलं लिंगराजमंदिर पर्यटकांचं-भाविकांचं मन मोहवून घेतं. मुख्य मंदिराच्या आवारात सूर्याचं, गोपालिनीदेवी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पार्वतीचं, श्रीगणेशाचं, अनंताचं अशी इतरही अनेक लहान-मोठी मंदिरं आहेत. सर्व मंदिरपरिसर बघण्यात दोन तास सहज निघून जातात. पर्यटक आणि स्थानिक भाविक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी गजबजलेलं हे मंदिर चुकवू नये असंच आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी मंदिराचा काळपट सोनेरी वालुकाष्म दगड उन्हात प्रदीप्त होऊन झळाळत असताना हे मंदिर बघणं हा एक अत्यंत सुरेख अनुभव आहे.

बिंदुसागर तलाव :-

    लिंगराज मंदिराच्या उत्तरेला हा तलाव आहे.भुवनेश्वरमधील हे एक महत्वाचे स्थळ आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या ठिकाणाला पिकनिक स्पॉट म्हणून ही ओळख आहे. बिंदुसागर तलावाचा आकार १३०० फुट लांबी आणि ७०० फुट रुंद असा आहे.हिंदु भाविकांच्या दृष्टीने या सरोवराला खुप महत्व आहे. दरवर्षी लिंगराज मंदीरातील मुर्ती इथे आणल्या जातात आणि या तलावात त्यांना स्नान घातले जाते. सहाजिकच भाविकांच्या मते लिंगराजाच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या या मंदीरात जो कोणी स्नान करेल त्याची सर्व पापे धुवून निघतात. सहाजिक हे सरोवर खुप प्रसिध्द आहे.

बिंदुसागर सरोवर

बिंदुसागर सरोवर

लिंगराज मंदिराच्या तिठ्यावरून उजवीकडे जरा पुढे गेले की डाव्या हाताला बिंदुसागर सरोवर आहे.

बिंदुसागर सरोवरातील मंदीर

बिंदुसागर सरोवरातील मंदीर

 

अनंत वासुदेव मंदीर:-
अनंत वासुदेव मंदीर

अनंत वसुदेव मंदिराचा कळस/शिखर.


सरोवराचा किनारा म्हणजे एक उकिरडाच आहे. बिंदुसागर सरोवराशेजारच्या उकिरड्यासमोरच आहे अनंत वासुदेव मंदीर. बिंदुसागर तलावाभोवती पसरलेली सर्व शंकराचीच मंदिरे आहेत, त्यासमोरच असलेले अनंत वसुदेव मंदिर हे एकमेव विष्णू मंदिर आहे. मूर्ती पुरीच्या जगन्नाथासारख्या आहेत. गर्भगृहसोडून फोटो काढू देतात. गर्दी अजिबात नसते. अवश्य पाहा. लिंगराज मंदीर हे भुबनेश्वरातले महत्त्वाचे आहे पण मंदिरात फारनरना प्रवेश नाही. आवारात इतर छोटी मंदिरे आहेत.अनंत वसुदेव मंदिराच्या भोगमंडपात असे हारे नेतात त्यात भात,डालमा,भाज्यांची मडकी असतात. भोग ठेवतात तेव्हा अर्धा तास मंदिर बंद असते.

तंत्रोपासनेचं गूढ वैतालमंदिर

आपण पाहिलं की कलिंग मंदिरस्थापत्य हे उत्तर भारतात प्रचलित असलेल्या नागर मंदिरस्थापत्यशैलीचीच एक उपशैली आहे. कलिंग मंदिरशिखरांचे स्थापत्यशैलीच्या दृष्टीनं तीन उपप्रकार मानले जातात, ते म्हणजे रेखा देऊळ, पिढा देऊळ व खाखरा देऊळ. रेखा देऊळ म्हणजे चौकोनी गाभाऱ्यावर निमुळतं होत जाणाऱ्या उंच शिखराचं देऊळ. या प्रकारात, बघणाऱ्या भाविकांची नजर शिखरावरून सरकत सरळ आमलकापर्यंत जाते. पिढा देऊळ म्हणजे शिखर पसरट, पिरॅमिडसारखं अनेक टप्प्यांचं मिळून होतं, तर खाखरा देऊळ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असलेली आयताकार वास्तू.
    आज आपण ओळख करून घेणार आहोत ती वैताल देवळाची. नाव जरी ‘वेताळ देऊळ’ असं असलं तरी हे मंदिर समर्पित आहे चामुंडेश्वरीला. शहराच्या जुन्या भागात, लिंगराजमंदिराच्या जवळच हे मंदिर आहे; पण भुवनेश्वरला येणारे फार कमी पर्यटक या मंदिराला भेट देतात. खरं तर हे मंदिर बांधलं गेलं आठव्या शतकात. म्हणजे, आज जवळजवळ बाराशे वर्षं उलटली तरी हे मंदिर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.भुवनेश्वर. मंदीरस्थापत्य शैलीच्या दृष्टीने हे मंदीर वेगळे आहे. मंदीराचा पाया चौरसाऐवजी आयताकृती आहे. त्यामुळे रुंदीपेक्षा लांबी जास्त आहे. घुमटावर एकाऐवजी तीन शिखरे आहेत. उजव्या हाताला जे पडके शिखर दिसते ते एका भग्न मंदिराचे आहे. कालापहाड नावाच्या एका धर्मवेड्या सुलतानाने ती फोडली. कोणार्कचे मंदीरही त्यानेच पाडले अशी आख्यायिका आहे.
    या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याचं खाखरा पद्धतीचं शिखर. दक्षिणेकडील मंदिरांबाहेर उत्तुंग गोपुरं असतात, त्यांची शिखरं गजपृष्ठाकार असतात व वर कलशांची रांग असते. साधारण त्याच पद्धतीचं हे शिखर आहे. शिखरावर रांगेनं तीन कलश आहेत म्हणून या मंदिराला ‘तीन मुंडिया देउळा’ असंही म्हणतात; किंबहुना स्थानिक रिक्षाचालकांमध्ये हे मंदिर याच नावानं ओळखलं जातं. हे तीन कलश म्हणजे देवीच्या तीन रूपांचं प्रतीक मानलं जातं...महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.
वैतल मंदीर

वैतल मंदीर
वैतल मंदीर
   
 साधारणपणे भगवान शिव, श्रीविष्णू आणि सूर्यदेव आदी पुरुषदेवतांची देवालयं बांधताना रेखा व पिढा शैलीच्या शिखरांचा उपयोग केला जातो आणि देवीची मंदिरं, त्यातही तंत्रोपासना जिथं व्हायची अशी मंदिरं, खाखरा देऊळशैलीत बांधली जात असत. मंदिराबाहेर छोटेखानी मंडप म्हणजे जगमोहन आहे; पण त्यावर नेहमीचं पिढापद्धतीचं शिखर नाही. छप्पर सपाट आहे. मुख्य मंदिराच्या बाजूलाच रेखापद्धतीच्या शिखराचं शंकराचं मंदिर आहे. शीर्षेश्वर या नावानं ओळखलं जाणारं हे मंदिर चामुंडामंदिराच्या मानानं अगदीच दुर्लक्षित आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भैरव, श्रीगणेश, लकुलिश आणि सप्तमातृका यांची सुरेख शिल्पं आहेत. इथल्या आलसकन्याही अतिशय सुरेख आहेत. मूर्ती आकारानं लहान असल्या तरी अत्यंत सौष्ठवपूर्ण आणि नाजूकपणे कोरलेल्या आहेत.
    या मंदिराच्या बाह्य भिंतीचं वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्याच्या भिंतीच्या देवकोष्ठांमध्ये असलेल्या दोन भव्य प्रतिमा! एक आहे अर्धनारीश्वराची. अर्धा शिव आणि अर्धी शक्ती अशा स्वरूपात असलेली ही मूर्ती म्हणजे कलिंग शिल्पकारांनी साकारलेली एक श्रेष्ठ कलाकृती आहे. शिवांच्या बाजूची शरीराची ठेवण आणि पार्वतीच्या बाजूची कमनीयता, पार्वतीच्या अंगावरचे दागिने, तिच्या चेहऱ्यावरचे कोमल भाव आणि शिवांच्या देहबोलीतला, चेहऱ्यावरचा पुरुषी कणखरपणा दाखवण्यात तो अनाम शिल्पकार कमालीचा यशस्वी झालेला आहे. दुर्दैवानं शिवांच्या बाजूचा एक हात नंतर झालेल्या इस्लामी आक्रमणात तुटलेला आहे.
   इथली महिषासुरमर्दिनीची मूर्ती तर अत्यंत सुरेख आणि लयबद्ध आहे. अष्टभुजा देवी एक पाय महिषासुराच्या खांद्यावर रोवून उभी आहे. तिचा त्रिशूल त्याच्या गळ्यात रुतलाय. दुसऱ्या हातानं तिनं महिषाचं डोकं एका बाजूला वळवलेलं आहे. देवीच्या त्वेषापुढं, शक्तीपुढं महिषासुर असहाय्य आहे. त्याची असमर्थता त्याच्या देहबोलीतून दिसते आहे. देवीचा चेहरा, तिचा केशकलाप, तिच्या हातातली विविध शस्त्रं आणि ती उगारण्याचा तिचा आवेश, तिच्या अंगावरचे अगदी मोजकेच दागिने या सर्व गोष्टींमुळे हे शिल्प अत्यंत सजीव वाटतं. कितीही वेळा या शिल्पाकडे पाहिलं तरी मनाचं समाधान होत नाही.
   या मंदिराच्या प्राकारात आणखी चार लहान मंदिरं आहेत. या मंदिराचं नाव वेताळ असलं तरी गर्भगृहात चांमुडादेवी आहे. गर्भगृहात नेहमी गूढ अंधार असतो आणि त्यात देवी चामुंडेश्वरीची डोळे खोल गेलेली, फासळ्या दाखवणारी, उग्र चेहऱ्याची मूर्ती! इथं प्राचीन काळी शाक्त पंथाचा प्रभाव होता आणि त्यांची तांत्रिक उपासना या मंदिरात चालायची असं पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे मंदिर ओडिशा राज्यात सहज सापडणाऱ्या लाल-गुलाबी वालुकाश्म दगडात घडवलेलं आहे. पहाटेचे पहिले सूर्यकिरण या दगडावर पडले की हे मंदिर सोन्यात घडवल्यासारखं झळाळून उठतं. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी हे मंदिर बघणं हा एक अनोखा सौंदर्यानुभव आहे. एकेकाळी हे मंदिर रस्त्याच्या पातळीला होतं; पण इतक्या वर्षांत वारंवार डागडुजी करून रस्त्याची उंची वाढलेली आहे, त्यामुळे मंदिर खाली गेलेलं आहे.
   मंदिराबाहेर असलेल्या देवकोष्ठांमधल्या मूर्ती उंचीला छोट्या असल्या तरी त्यांचं शरीरसौष्ठव व सुबकपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. भुवनेश्वरच्या इतर प्रसिद्ध मंदिरांपेक्षा वेगळं असं हे वैतालमंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे असं आहे. 

मुक्तेश्वर मंदीर :-

 आपल्याला आता भुवनेश्वरचे सगळ्यात सुरेख मुक्तेश्वर मंदिर बघायचे आहे.भुवनेश्वर. ओदिशातील वालुकाश्मापासून बनवलेला मंदीरस्थापत्यातला एक सुंदर हिरा म्हणजे मुक्तेश्वर मंदीर असे एम एम गांगुली म्हणतात. मंदीर पाहिल्यावर यात अजिबात अतिशयोक्ती नाही हे लक्षात येते. खरे तर देखण्या मंदीरवास्तूंचा हा एक समूहच.


 
मुक्तेश्वर मंदिर आणि परिसर

    उत्तर भारतातील नागर मंदिर-शैलीचा ओडिशा राज्यातील आविष्कार म्हणजे कलिंग स्थापत्यशैली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर हे साधारण नवव्या शतकात बांधले गेले. म्हणजेच कलिंग स्थापत्यशैलीच्या प्राथमिक व प्रगत या अवस्थांच्या सीमारेषेवरचे हे मंदिर आहे. ह्या शैलीची चरमसीमा पुढे कोणार्क आणि पुरीच्या मंदिरात गाठली गेली. हे मंदिर आजही उत्तम रीतीने सांभाळून राखलेले आहे. १०.५१ मीटर उंच असलेल्या या मदिरावरील प्रत्येक इंच अप्रतिम कलाकारीने नटलेला आहे. 
   कलिंग स्थापत्यशैलीत मंदिर शिखरांचे तीन उपप्रकार निर्माण झाले, रेखा, पीढा व खाखरा. ‘रेखा देऊळ’ या प्रकारात शिखराची बाह्याकृती उंच आणि निमुळती होत सलग आमलकापर्यंत जाते. ‘पीढा’ या प्रकारात छप्पर पायरीसदृश्य अनेक टप्प्यांचे किंवा मजल्यांचे मिळून होते तर ‘खाखरा’ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असणाऱ्या शाला या आयताकार वास्तूचे कलिंग स्थापत्यशास्त्रातले रूप आहे. मुक्तेश्वर मंदिराचे शिखर रेखा पद्धतीचे तर बाहेरचा मंडप म्हणजे जगमोहन पीढा पद्धतीचा आहे.

मुक्तेश्वर मंदीर

मुक्तेश्वर मंदिराचा देखणा परिसर

    भुवनेश्वरच्या जुन्या भागात लिंगराज मंदिराच्या जवळच असलेले हे मुक्तेश्वर मंदिर आकाराने खरेतर अगदीच छोटे आहे. लिंगराज किंवा जगन्नाथाच्या मंदिराची भव्यता येथे नाही. पण अप्रतिम कोरीव कामाने नटलेले हे मंदिर नाजूक कलाकुसर केलेल्या एखाद्या दागिन्यातल्या हिऱ्यासारखे भुवनेश्वरच्या मंदिरांच्या प्रभावळीत उठून दिसते. खरेतर हा एक मंदिर समूह आहे.
   एकेकाळी ह्या जागेला सिद्धारण्य असे नाव होते. एका बाजूला मुक्तेश्वर मंदिर आणि दुसऱ्या बाजूला छोटी छोटी अनेक मंदिरे आहेत. अतिशय शांत आणि रमणीय असा हा परिसर आहे. जवळपासचे अनेक रहिवासी संध्याकाळी ह्या मुक्तेश्वर मंदिराच्या परिसरात फिरायला आलेले दिसतात.
ओरिसा मंदिर स्थापत्य आणि मुर्तीशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आणि तेवढेच सुंदर असे हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना एका मोठ्या तोरणातून प्रवेश करावा लागतो जे अखंड कोरीव काम केलेल्या दोन खांबांवर स्थिरावलेले आहे. या मंदिराच्या भोवती कोरीवकाम केलेला सरंक्षण कठडा बांधला आहे.
   मुक्तेश्वर मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या जगमोहानात खांब नाहीत आणि आतून व बाहेरून या भिंती कोरीव कामाने सजवलेल्या आहेत.वरच्या दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं आहे.
   या मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश, शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.
   मुक्तेश्वर मंदिराचे मंडपाचे म्हणजेच जगमोहनाचे छप्पर पिढा पद्धतीचे पायऱ्या पायऱ्यांनी बांधलेले आणि गर्भगृह म्हणजेच रेखा देऊळ पाच उभ्या भागात विभागलेले, म्हणजेच पंचरथ पद्धतीचे आहे. ह्या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुक्तेश्वर मंदिरासमोरचे तोरणद्वार. असे तोरणद्वार भुवनेश्वर मध्ये दुसऱ्या कुठल्याही मंदिरात नाही.( परंतु वैतल मंदिरातही असे तोरण दिसते.स्वतंत्र भारतात हल्ली बांधलेल्या अनेक मंदिरात किंवा अन्यत्र असे तोरण बांधलेले दिसते. उदा. शेगाव येथील आनंदसागर. ) मंदिरासमोर कोरीव कामाने विनटलेले दोन भक्कम खांब व त्यांवर धनुष्याकृती तुळई असे हे तोरण आहे. तोरणावर यक्ष-यक्षी, देवदेवता, गंधर्व ह्यांच्या शिल्पांची रेलचेल आहे. तोरणाच्या दोन्ही कमानीवर दोन अत्यंत सुंदर आणि कमनीय अश्या यक्षी पहुडलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला अगदी जिवंतच वाटणारी दोन माकडे कोरलेली आहेत. अशी कोरीव तोरणे या काळातील मंदिरांमध्ये देशाच्या इतरही भागात बांधली जात. गुजरात मधील मोढेराच्या शिवमंदिरात असेच एक तोरण आहे.यावरील आसनस्थ स्त्रीआकृत्या आणि माकडांच्या तसेच मोरांच्या आकृत्या आपली दृष्टी खिळवून ठेवतात.मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर मंदिरातले कोरीव काम:
मुक्तेश्वरची प्रवेशकमान
    मंदिराच्या इतर भागांवर अप्सरा, नाग-नागी, गजव्याल यांच्या मूर्तीचेही दर्शन होते. द्वारशाखेवर नवग्रह आहेत. देवळाच्या जंघा व इतर भागांवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत त्यात उंदीर व मोर ही वाहने असणारे गणपती व कार्तिकेय, लकुलीश, नाग-नागी, सूर्य आणि श्रीविष्णू ही शिल्पे उल्लेखनीय आहेत. मुक्तेश्वर मंदिराचे दुसरे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जगमोहनाच्या छतावर कोरलेले अप्रतिम वितानशिल्प. हे वितानशिल्प म्हणजे अप्रतिम कोरीवकाम केलेले आठ पाकळ्यांचे दगडी कमळ आहे. ह्या कमळाच्या सर्वात बाहेरच्या भागात प्रत्येक पाकळीवर एक अशा सप्तमातृका कोरलेल्या आहेत, आणि आठवा वीरभद्र. प्रत्येक मातृका तिच्या बाळासमवेत आहे.
  जगमोहनाच्या कोरलेल्या जाळीदार खिडक्या म्हणजेच जालवातायने अत्यंत सुंदर आहेत. ह्याच कमळाच्या आतील भागात कार्तिकेय आणि श्री गणेश ह्यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. हे वितानशिल्प खरोखर केवळ अद्भुत आहे.
    एकूणच मुक्तेश्वर मंदिराचा प्रत्येक कोपरानकोपरा अप्रतिम अशा नाजूक, रेखीव कोरीव कलाकुसरीने नटलेला आहे. हे शिवमंदिर असूनही मंदिरात नंदी नाही. गर्भगृहात शिवलिंग आहे ज्याची रोज पूजा होते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. कलिंगाच्या स्थानिक इतिहासाप्रमाणे हे मंदिर सोमवंशी राजा ययाती केसरी ह्याने नवव्या शतकात बांधवून घेतले. कलिंग स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक वॉल्टर स्मिथ ह्यांच्या मते स्मिथ हा राजा म्हणजे सोमवंशी सम्राट ययाती महाशिवगुप्त असावा.
   ह्या मंदिराचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी अगदी भरभरून कौतुक केले आहे. जेम्स फर्गुसनने ह्या मंदिराला ‘ओडिशाच्या मंदिरांमधला एक सुंदर हिरा’ असे म्हटलेले आहे. मुक्तेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय आपली कलिंग स्थापत्यशैलीची सफर पूर्णच होऊ शकत नाही.दहा शतकाहून जास्त काळ मुक्तेश्वराने पर्यटकांना सतत आकर्षित करून बराच काळ खिळवून ठेवण्याचे कार्य केले आहे.

या मंदिराची स्थापत्यशैली ओदिशात पुढे अनुसरली गेली आणि विकसित देखील झाली. कळस जास्त रेखीव, उठावदार बनले आणि उभ्या आधारस्तंभांवरील शिल्पांचा साजशृंगार वाढला. जगमोहनच्या छतावर देखील आणखी सजावट वाढली, त्यांना त्रिकोणी आकार मिळाला तसेच मुख्य मंदीर आणि जगमोहन यांचा जोड विकसित होऊन जास्त सौंदर्यपूर्ण झाला.मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.

लोककला, संस्कृती, नृत्य, कापडावराची कलाकुसर यांनी ओळखला जाणारा, भारताच्या पूर्वेला आणि बंगाल उपसागराच्या किनारी वसलेला सुंदर प्रदेश म्हणजे ओरिसा! पण या प्रदेशाची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नक्कीच नाही. अगदी २२००-२३०० वर्षांपूर्वीचे कला, स्थापत्य आणि मूर्तींचे पुरावे आपल्याला या भागात सापडतात. मौर्य सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धात रक्तबंबाळ झालेला हा प्रदेश, इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून जैन आणि बौद्ध गुहांनी नटलेला हा प्रदेश आणि सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अत्यंत सुंदर आणि प्रचंड मोठी मंदिरे बांधली गेलेला हा प्रदेश.

ढोबळमानाने उत्तरेकडे असलेल्या मंदिरांना नागर प्रकारची मंदिरे म्हणतात. ओडीसा मधली मंदिरे नागर शैलीची म्हणता येतील, पण सुरवातीपासूनच तिथे एक प्रादेशिक शैलीचा विकास होत होता, आणि हि उपशैली “कलिंग शैली” म्हणून ओळखली जाऊ लागली. जसं जसं आपण एकेका मंदिराबद्दल जाणून घेऊ तेंव्हा या शैलीचा नीट विचार करू.
इसवीसनाच्या सातव्या शतकात बांधलं गेलेलं ओरिसा मधलं पहिलं  मंदिर – परशुरामेश्वर !

आपण मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या  (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.

या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी त्याच्याभोती आयताकृती भिंत बांधली आहे आणि अशी रचना ओरिसा मधल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते.

या मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली आहेत. जगमोहनात (मंडपात)  प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.

जैन, बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प आहे.
जगमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.

अष्टमातृका : अष्टमातृका किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही (ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.

परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.


 काही अभ्यासकांच्या मताप्रमाणे सोमवंशी घराण्यातील पहिल्या काही राजांपैकी एक म्हणजे ययाती (पहिला) त्याने हे मंदिर बांधले. ओरिसा मंदिर स्थापत्य आणि मुर्तीशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आणि तेवढेच सुंदर असे हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना एका मोठ्या तोरणातून प्रवेश करावा लागतो जे अखंड कोरीव काम केलेल्या दोन खांबांवर स्थिरावलेले आहे. या मंदिराच्या भोवती कोरीवकाम केलेला सरंक्षण कठडा बांधला आहे.
मुक्तेश्वर मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या जगमोहानात खांब नाहीत आणि आतून व बाहेरून या भिंती कोरीव कामाने सजवलेल्या आहेत.

वरच्या दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं आहे.
या मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश, शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.
मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.


भुवनेश्वरची चित्रकारिणी
      ओडिशा राज्याची राजधानी, भुवनेश्वर ही मंदिरांची नगरी आहे. त्रिभुवनेश्वर म्हणजे शिवांची नगरी असलेल्या ह्या पवित्र जागेला शैव पुराणांमधून ’एकाम्रक्षेत्र’ किंवा हरक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सूर्यक्षेत्र कोणार्क, हरीक्षेत्र जगन्नाथपुरी आणि शिवक्षेत्र भुवनेश्वर ही तिन्ही ठिकाणे मिळून ओडिशा राज्याचा सोनेरी त्रिकोण होतो.
मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हा परिसर महामेघवहन राजवटीच्या आधिपत्याखाली आला. खारवेल हा या राजकुलातला सगळ्यात महान राजा. त्याने भारतदिग्विजय केला होता. भुवनेश्वरजवळील उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांमध्ये त्याने खोदलेला शिलालेख आहे जो हाथीगुंफा शिलालेख ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
पुढे सातव्या शतकात केसरी नावाच्या सोमवंशी राजघराण्याने कलिंगमध्ये आपले राज्य स्थापन केले. भुवनेश्वरमधले सर्वांत प्रसिद्ध असे लिंगराज मंदिर याच राजवंशाने बांधले. त्यांच्यानंतर गंग राजवंशाने चौदाव्या शतकापर्यंत कलिंग देशावर राज्य केले. त्यांची राजधानी कलिंगनगरा सध्याच्या भुवनेश्वर शहराच्या ठिकाणी होती. भुवनेश्वर मधली बहुतेक सर्व जुनी मंदिरे ह्या दोन राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान बांधली गेली.
अगदी आजही भुवनेश्वर आणि आसपासच्या परिसरात शेकडो लहानमोठी पुरातन मंदिरे आपल्याला दिसतील. आज आपण बघणार आहोत हे मंदिर आहे चित्रकारिणी देवीचे, म्हणजे सरस्वतीचे. जुन्या भुवनेश्वरमध्ये प्रसिद्ध लिंगराज मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर आहे. पण लिंगराज मंदिरामध्ये कायम पर्यटकांची, भाविकांची गर्दी असते. चित्रकारिणी मंदिर मात्र त्या मानाने अगदीच शांत आहे.
 सरस्वती ही विद्येची देवता, कलेची अधिष्ठात्री. साहजिकच तिचे मंदिर विद्यार्थीप्रियच असणार. अगदी आजही ह्या मंदिराच्या आवारात आसपासच्या वस्तीतले विद्यार्थी येऊन अभ्यास करताना दिसतात.  मंदिर समूह पंचायतन पद्धतीचा आहे. मधोमध मुख्य रेखा मंदिर आणि त्याचा पिढा पद्धतीचा जगमोहन आणि चारी बाजूंना परिसर देवतांची चार रेखा मंदिरे, त्यांच्यापुढे जगमोहन नाही. मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे, आणि आकाराने फार भव्य नसले तरी अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहे.
   साधारण तेराव्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधले गेले असे मानले जाते. गंग राजा नरसिंह देव प्रथम या महापराक्रमी राजाने बंगालच्या मुसलमान सुलतानाला हरवून यवनवाणीबल्लव आणि अमीरमानमर्दन अशा दोन उपाधी धारण केल्या. थेट शत्रूच्या प्रदेशात सैन्यासह मुसंडी मारून कटासीनच्या किल्ल्यात झालेल्या युद्धात राजा नरसिंह देवाने इस्लामी मामलुक सल्तनतीवर निर्णायक विजय मिळविला. कोणार्कचे भव्य सूर्यमंदिर हे त्याच्या शौर्याचे प्रतीक आहे तर भुवनेश्वरचे चित्रकारिणी मंदिर त्याच्या कलाप्रियतेचे, रसिकतेचे.
   कलिंग मंदिराचे साधारण दोन आडवे भाग करता येतात, जमिनीपासून जिथे शिखर सुरू होते, तिथपर्यंतचा भाग म्हणजे बडा किंवा भिंत आणि नंतर वरवर चढत जाणारं शिखर म्हणजे, गंडी. बडा म्हणजे भिंतीचेही खालून वर असे चार आडवे थर पाडता येतात, सगळ्यात खालचा थर म्हणजे पिष्टी किंवा पीठ, ज्यावर सर्व वास्तूचा डोलारा उभा असतो. त्यावर पभाग म्हणजे प्रभाग, हा वेगवेगळ्या थरांनी मिळून बनलेला असतो. त्यानंतर येतो तो भिंतीचा मोठा भाग ज्यात देवकोष्ठे बसवलेली असतात. त्याला नाव आहे जंघा. त्यावरचा शिखराला जोडणारा भाग म्हणजे बरंडा.
   तसेच बडाचे म्हणजे गर्भगृहाच्या भिंतीचे उभे स्तरही असतात. गर्भगृहाच्या प्रत्येक भिंतीला दोन दिशांना दोन कोन असतात त्याना लागून असलेले स्तर म्हणजे कणिका पग आणि मधला एक स्तर म्हणजे रह-पग असे तीनच स्तर प्रत्येक भिंतीला असले तर त्या मंदिराला त्रिरथ मंदिर असे नाव आहे. पुढे मंदिरांचे आकार वाढले, भिंती उंचीला आणि रूंदीलाही भरपूर वाढल्या त्यामुळे अजून उभे स्तर रह-पग आणि कणिका-पगाच्या मध्ये निर्माण झाले. त्यांना अनुरथ पग आणि प्रतिरथ पग अशी नावे मिळाली आणि त्रिरथ मंदिर मोठे होऊन पंचरथ, सप्तरथ आणि अगदी क्वचित नवरथही झाले.
  चित्रकारिणी मंदिराचे रेखा देऊळ सप्तरथ प्रकारचे आहे तर जगमोहन पंचरथ पद्धतीचे आहे. जगमोहनाच्या भिंतीवरची जंघा दोन भागात विभागलेली आहे, खालच्या भागात पाच स्तंभांवर मिथुन शिल्पे कोरलेली आहेत तर उत्तरेकडच्या भिंतीवर वरच्या भागात वेणूगोपाळाचे सुंदर शिल्प आहे. दक्षिणेकडच्या भिंतीवर खालची स्तंभनक्षी तीच आहे पण वरचे शिल्प शिव-पार्वतीविवाहाचे आहे.
    बरीच शिल्पे दुर्दैवाने पुढे सोळाव्या शतकात मुस्लीम सुलतान काळा पहाडाच्या स्वारीत उध्वस्त केलेली आहेत. मंदिराच्या आवारात बरेच भग्नावशेष असेच पडलेले आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आता शांत सरस्वती नाही तर रौद्र चामुंडा आहे. त्यामुळे एक गूढ वातावरण अनुभवायला मिळते. छोटेसेच असले तरी चित्रकारिणी देवीचे हे मंदिर मुद्दाम जाऊन बघावे असेच आहे.
राजाराणी मंदीर

भुवनेश्वर. हे मंदीर ११व्या शतकातील आहे. या एका मंदिरातच भरपूर वैविध्य आढळते. पिवळसर वालुकाश्मामधील हे मंदीर १७.९८ मीटर उंच आहे. मंदीरस्थापत्याचा झालेला विकास इथे नाट्यपूर्ण रीतीने दिसून येतो. अमालकाभोवती आकाशाकडे जात असलेली चार टोके असलेल्या या मंदिराचे नाते खजुराहोच्या कंदारीय महादेव मंदिराशी जुळलेले दिसते. रेखा देऊळवरच्या नाजुक कंबरेच्या मानवी आकाराच्या बसलेल्या स्थितीतील आकृत्यातून कलावंताचे स्त्रीत्वाच्या सौंदर्याबद्दल असलेले वास्तव कौतुक दिसून येते तर आपल्या कलासक्त नजरेला एक संपन्न मेजवानीच मिळते. चार्लस फॅब्री म्हणतो इथे अनेक आश्चर्ये दडलेली आहेत.

राजा राणी मंदीर

राजा राणी मंदीर

राजा राणी मंदीर

राजा राणी मंदिराचे देखणे आवार.








प्रवेशद्वाराच्या दोन दगडी खांबांना कोरीव नागांनी विळखा घातला आहे. तस्सेच आणखी दोन खांब याच सभामंडपाच्या समोरून पाहातांना डाव्या बाजूला दिसताहेत. रेखा देऊळच्या वरील जे चपट्या भोपळ्यासारखे आडवे चक्र आहे त्याला अमालक म्हणतात. त्याच्या भोवती जी वर आलेली टोके आहेत ते या मंदिराचे वैशिष्ट्य. चारपैकी दोन टोके पहिल्या प्रकाशचित्रात दिसताहेत, दोन पलीकडच्या बाजूला आहेत.राजाराणी मंदीर पाठीमागून

राजाराणी मंदीर पाठीमागून

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

खालील चित्रात डाव्या बाजूला तिरप्या उताराच्या मध्यभागी बाहेर डोकावणारे टोक आहे ते भो चिन्ह असावे. जावा सुमात्रा इथून आलेले. अंगकोरला पण आहे म्हणतात. मंदिराच्या शिखराच्या चार बाजूंना चार असतात.

खालील चित्रात पण एक भो चिन्ह दिसते आहे.
मुक्तेश्वर

त्या 'भो' चिन्हाला बहुधा डेन्टिल्स म्हणतात. रोमनांकडून आलेला हा प्रकार.

हा बघा टोका -प्रवरासंगम इथल्या मंदिराचा हा फोटो

a

जसे सभामंडपाला तिथे जगमोहन म्हणतात. त्यावर एकावर एक सपाट मजले ठेवल्यासारखे छप्पर असेल तर ते पीढ जगमोहन तसे तिथे अर्धचंद्राकृतीला चंद्रशाला म्हणतात. मगरींनी केलेल्या कमानीला आपल्यासारखेच मकरतोरण म्हणतात.वरील उल्लेखित मंदिरांबरोबरच राजाराणी मंदिराच्याच रस्त्यावर आणखी पुढे पूर्वेकडे शिल्पकलेचा अधिक खजिना : भास्करेश्वर व मेघेश्वर मंदिरे. व थोडे दक्षिणेस ब्रह्मेश्वर मंदिर. एकेकाचे बांधकाम तासनतास कौतुक करत पाहाव असं आहे. ओडिशा च्या मंदिरांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नागशिल्पे व कामशिल्पपट.

केदारेश्वर मंदीर :-
केदारेश्वर शिव आणि गौरी यांचे हे मंदीर मुक्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. या मंदिराला हर्षविमोचन मंदीर असेही म्हणतात. केदार आणि गौरी यांच्या शोककारक प्रेमकथेवर आधारित असे हे मंदीर राजा ललतेंदू केसरी याने हे मंदीर त्यांच्या स्मरणार्थ बांधले अशी दंतकथा आहे.

केदार आणि गौरी या प्रेमी युगुलाच्या प्रेमाला गांवकर्‍यांचा विरोध होता. म्हणून ते युगुल गांव सोडून निघाले. जंगलातून जातांना वाटेत गौरीला भूक लागली म्हणून केदार खायला काहीतरी आणायला म्हणून गेला. पण त्याला वाघाने मारून टाकले अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे. लुईस रोडने पूर्वेकडून किंवा हारामंदीर छाकातून पश्चिमेक्डून इथे जाता येते. मदिराची स्थापत्याची वैशिष्ट्ये तसेच शिल्पशैली यावरून ते इसवी सनाच्या ११व्या शतकातील सोमवंशी राजांच्या शासनकाळातले आहे हे समजते. याचा आराखडा पंचरथी आहे. यात ‘रेखा देऊळ’ आणि ‘पीढ जगमोहन’ आहे. मंदीर दक्षिणमुखी आहे आणि गाभार्‍याची उंची १३.७ मीटर आहे.

परशुरामेश्वर मंदीर

इसवीसनाच्या सातव्या शतकात बांधलं गेलेलं ओरिसा मधलं पहिलं  मंदिर – परशुरामेश्वर ! परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर ही दोन मंदिरं जवळजवळच आहेत. उंच, दगडी, कलिंग पद्धतीचे बांधकाम. दोन्ही मंदिरांवर सुंदर कोरीव काम आहे. अतिशय शांत, स्वच्छ, रमणीय असा परिसर आहे. एकूणच तिथे सगळ्याच मंदिरांच्या परिसरात चांगली स्वच्छता आढळते.या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी त्याच्याभोती आयताकृती भिंत बांधली आहे आणि अशी रचना ओरिसा मधल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते.
या मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली आहेत. जगमोहनात (मंडपात)  प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.
  जैन, बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प आहे.

गमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.
अष्टमातृका : अष्टमातृका किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही (ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.
परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.मंदीरस्थापत्य बाल्यावस्थेत. मुख्य मंदीर आणि जगमोहन कसेतरी जोडले आहेत. नंतरच्या मुक्तेश्वर मंदिरात हा जोड इतका कलात्मक आहे की जोड कळतही नाही.

परशुरामेश्वर मंदीर

lingaraaj.jpg

परशुरामेश्वर मंदिर
kartikeya.jpg

परशुरामेश्वर मंदिरावरचे कार्तिकेयाचे शिल्प

lingaraaj2.jpg

परशुरामेश्वर मंदिरावरचे कोरीव काम

mukteshwar.jpg

mukeshwar2.jpg

परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिरावरून आपल्याला कलिंग मंदीरस्थापत्याच्या विकासाचे टप्पे जाणवतात. इसवी सन ८०० साली बांधलेल्या वैतल मंदिरातून अगदी भिन्न शैली आढळते. कलिंग शैलीतील खाखरा पद्धत यातून दिसते. तांत्रिक पंथाच्या मंदिरातून ही पद्धत दिसते. मंदिराचा कळस पाहिल्यावरच चट्कन फरक ध्यानात येतो. कळस आयताकृती आहे. जगमोहनशी काटकोन करणारा. तत्कालीन घरांच्या शाकारून बनवलेल्या किंवा लाकडी छपरासारखा याच्या छपराचा आकार आहे. चैत्य कमानीचा नालाकार एक मोहक प्रतीक आहे. आता पंचाईत आली. मुक्तेश्वराच्या तोरणासारखेच तर हे दिसते आहे. फक्त शेंदूर किंवा शेंदरी रंग फासलेला. मग या प्रतीकात व त्या तोरणात काय फरक आहे बरे? हा प्रश्न ते पाहाण्याअगोदर पडला होता. तिथे जाऊनच पाहिले तरी कळले नाही. मंदीरात पूजापाठ वगैरे काही चालत नाही. बकाल परिसरातले मंदीर पूर्णपणे निर्जन होते. त्यामुळे कोणाला काही विचारायचा प्रश्नच आला नाही.

हे प्रतीक फक्त बांधकामात नव्हे तर सजावटीच्या शिल्पातही सर्वत्र आढळते. इथे छपराचा आतील भाग साधासरळ आहे तर इतर मंदिरात त्यावर शिल्पकलेची भरपूर कलाकुसर आढळते. मंदिराच्या आकारात फारसा फरक नाही परंतु इथल्या जगमोहनच्या चार कोपर्‍यालगत मंदिराच्या छोट्या प्रतिकृती व्यवस्थित ठेवलेल्या आढळतात. एका धावत्या दृष्टिक्षेपात विकसित झालेली शिल्पसजावटीची शैली आढळून येते. बारीक निरीक्षण केल्यावर मात्र शिल्पसजावटीतली काळी बाजू आणि मंदिराचे व्यक्तिमत्व ध्यानात येते. हिंदू आणि बौद्ध धर्मातील काही तांत्रिक तत्त्वे एकत्र करून इथे शक्तीची उपासना केली जात असे. या उपासनेत तपशीलवार मंत्रविधी, गुप्तविधी आणि पवित्र बळीची प्रथा विकसित केली होती. वैतल मंदिराच्या गर्भगृहाचा अंतर्भाग जवळजवळ पूर्ण अंधारलेला आहे. मोजक्या तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीतच इथले विधि उरकले जात होते असे मानतात. आदिशक्ती दुर्गेचेच एक तांत्रिक रूप चामुंडा ही इथली प्रमुख देवता आहे. अतिशय अंधुक प्रकाशात गळ्यात रुंडमाळा (मानवी मुंडक्यांची माळ) घातलेली, प्रेतावर बसलेली, एका बाजूला घुबड आणि दुसर्‍या बाजूला कोल्हा असलेली चामुंडेची प्रतिमा रंगवलेली दिसते. तिची अतिशय कृश अशी शरीरयष्टी, खोल गेलेले डोळे आणि खपाटीला गेलेले पोट डोळ्याना खुपते. नेहमी चाकोरीबद्ध वागणारे आदरणीय असे पुरातत्वखाते त्यांच्या भुवनेश्वरच्या मार्गदर्शिकेत म्हणते की सहन होणार नाही एवढे भयंकर असे तिचे रूप आहे पण त्याला आपण काही करू शकत नाही. माझ्या मते युद्धात असे भयंकर दृश्य, बली देतांना बलीने केलेला आक्रोश वगैरे भयंकर दृश्ये लहानपणापासून सतत पाहिल्यामुळे लढवय्या जातींचे मन कठोर, निबर व्हावे आणि मग युद्धात होणार्‍या अमर्याद हिंसेमुळे मानसिक धक्का किंवा दहशत बसू नये असा हेतू या शक्तीपूजेत असावा. आज जे सोशल इंजिनीयरिंग किंवा समाजाचे मनोरेखन करतात तसाच हा प्रकार असावा.

आंतील भिंती १५ वळचणींनी सजलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक प्रतिमा विचित्र आहे. गर्भगृहाच्या दरवाजातच आतील बाजूस चतुर्मुखी लिंग आहे. त्यावरही चित्रविचित्र प्रतिमा आहेत. त्यापुढे एक वधस्तंभ आहे. विशेषज्ञांच्या शब्दात येथील वातावरण ‘मनःशांती घालवणारे’, भंग करणारे आहे. पुरातत्व खात्याच्या थेट शब्दात सांगायचे झाले तर ‘विचित्र’ आहे. पूर्वेकडील बाहेरच्या बाजूला (सुदैवाने जिथे उजेड असतो त्या मागच्या बाजूला) सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे. संवेदनाक्षम आणि सुंदर चेहरा असलेली. त्याच्या दोन्ही बाजूला उषा आणि प्रत्युषा आहेत. पहाटेच्या जुळ्या भगिनी. अरूण त्याचा रथ चालवतो आहे. हे प्रतीक मनावर ठसते. कोणार्कच्या मंदिरात हेच प्रतीक विकसित केले आहे. ओदिशी कलेतील पहिली कामुक शिल्पे इथे आढळतात. मुख्य इमारतीवरील आत घुसलेल्या पटावर. असे सांगतात की या विशिष्ट मंदिरात चालणार्‍या खर्‍या तांत्रिक विधींचा हा तक्ता आहे. इथे सादर झाल्यानंतर त्यांना अधिकृत दर्जाची ताकद मिळाली. नंतरच्या शतकांत या शिल्पांना मंदिरावरील सजावटीचे शिल्पप्रकार म्हणून स्वीकारले गेले.हरीशंकर

हुमा शिवमंदिरातील एक शिल्प ( हरीशंकरमधील एका उपमंदिरातील खास ओदिशी शैलीतली त्रिमूर्ती )
हुमा शिवमंदिराच्या आवारात

 समलेश्वरी मंदिर
समलेश्वरी मंदिरातील आवारात

चौसष्ठ योगिनी मंदीर :-

हिरापूर गावाजवळ भुवनेश्वरच्या पूर्वेला फक्त 20 किमी अंतरावर असलेल्या महामाया पुस्करिणी तलावाशेजारी भातशेतीच्या मधोमध असलेले, सुंदर आणि रहस्यमय चौसठी योगिनी मंदिर हे ओडिशा राज्यात येणार्या पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे मंदिर 1953 पर्यंत सापडले नव्हते, जेव्हा ओडिशा राज्य संग्रहालयाचे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार केदारनाथ महापात्रा यांना एका उध्वस्त झालेल्या मंदिराच्या वालुकाश्माच्या चिर्यांचा ढीग सापडला. हे सर्व चिरे एकत्र जोडले गेले तेव्हा एक गोलाकार छतविरहित (हायपेथ्रल) रचना निर्माण झाली ज्यामध्ये ६४ स्त्री देवतांच्या म्हणजे योगिनींच्या प्रतिमा होत्या. या मंदीराचे वैशीष्ट्य म्हणजे
भुवनेश्वरजवळ दिसणार्‍या इतर कोणत्याही कलिंग शैलीतील मंदिरापेक्षा हे वेगळे आहे आणि विशेष म्हणजे ते वरून गोलाकार योनीसारखे दिसते.
         ६४ योगिनी अष्ट मातृकांवर आधारित आहेत  किंवा देवी, मातृदेवतेच्या आठ प्रमुख रूपांवर आधारित आहेत. या ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमरी, वाराही, चामुंडा आणि नरसिंही आहेत. या प्रत्येक योगिनीमध्ये आठ परिचारक असतात आणि जेव्हा त्या सर्व एकत्र होतात तेव्हा त्या ६४ योगिनी होतात.
     हिरापूर येथील योगिनी मंदिराच्या उभारणीची आख्यायिका इथले पुजारी सांगतात. त्याप्रमाणे, देवी दुर्गाने राक्षसाचा पराभव करण्यासाठी ६४ योगिनींचे रूप धारण केले होते. विजयानंतर, योगिनीनी दुर्गा मातेकडे प्रार्थना करुन त्यांना वाहिलेल्या मंदिराच्या रूपात त्यांची स्मृती राखली जावी अशी विनंती केली.मंदिराचे कार्बन डेटिंग करुन या मंदीराचा अंदाजे काळ ठरवला गेला आहे. काही विद्वानांचा असा अंदाज आहे की भौमा राजघराण्यातील राणी हिरादेई हिने ८ व्या - ९ व्या शतकादरम्यान हे उभारले असावे कारण हिरापूर (मूळचे हिरडेपूर) हे गाव तिच्या नावावरून पडले होते. मंदिरात असलेल्या काही स्थापत्य घटकांच्या आधारे, काही विद्वानांनी हाच काळ ११ व्या शतकाच्या नंतरचा असावा असा अंदाज बांधलेला आहे.
    मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन रक्षक आहेत. दक्षिणेकडील शिल्पात  (डावीकडे) कानातले दागिने आणि पीठावर कमळ लता असलेली पुरुष आकृती दर्शवते. उत्तरेकडील शिल्प (उजवीकडे) अगदी वेगळे आहे, विखुरलेले केस, बाहेर आलेले पोट आणि डाव्या हातात कवटी धरलेली एक संतप्त पुरुष आकृती दाखवली आहे.
    प्रवेशद्वार तुलनेने छोटे आहे, प्रवेश करणासाठी आपल्याला नतमस्तक व्हावे लागेल अशी व्यवस्था आहे.
दोन मीटर उंच गोलाकार मंदिराच्या भिंतीचा बाहेरील भाग तुलनेने साधा आहे, त्यात कात्यायनी प्रतिमा असलेले कोनाडे आहेत. प्रत्येक कातयानी प्रतिमेच्या पायथ्याशी एक शिर दाखवले आहे, हे बहुतेक डोकी प्राण्यांची आहेत त्यात ही बहुतेक कुत्र्यांची डोकी आहेत. सामान्यत: मृतदेहांच्या जवळ आढळणारे प्राणी कोरले आहेत असे दिसते. सर्व कात्यायनीने काही ना काही शस्त्र धारण केले आहे,  त्यांच्या डोक्यावर एक छत्र दाखवले आहे.
     वरुन खुल्या असणार्‍या मंदिराच्या आत, मंदिराच्या भिंतीच्या आतील बाजूस जमिनीच्या पातळीच्या अगदी वर 60 समान अंतरावर कोनाडे आहेत, प्रत्येकामध्ये एक उभे असलेले विलक्षण सुंदर स्त्री शिल्प (योगिनी) आहे. या शिल्पांचे अतिशय बारकाईने कोरीवकाम केलेले दिसते. बहुतेक सर्व योगिनींच्या मुखावर स्मित विलसत आहे. या सर्व योगिनी त्यांच्या वाहनावर उभ्या दाखवल्या आहेत. हि वाहन म्हणजे बहुतेकदा प्राणी, मानवी डोके किंवा राक्षस आहेत.   प्रत्येक मुर्तीची केशरचना, शस्त्र आणि इतर परिधान केलेल्या वस्तु वेगवेगळ्या आहेत.इथल्या कोणत्याही दोन मुर्तीत कोणतेच साम्य नाही. मुख्य म्हणजे तंत्रशास्त्राशी संबंधित इतर मंदिरांप्रमाणे, येथे कामुक कोरीवकाम आढळत नाही.



पिपली :-
   हे भुवनेश्वरजवळील छोटे खेडेगाव आहे. इथे मोठ्या प्रमाणात हस्तकलेच्या वस्तु बनवल्या जातात. त्यामध्ये हँडबॅग, छत्र्या, पादत्राणे,कपडे, वॉल हॅगिंग, उशीचे अभ्रे, बेडशीट, अश्या अनेक वस्तु उत्तम दर्जाच्या मिळतात. पिपली गावात पोहचल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात दुकाने दिसतात. हस्तकला हा इथला पारंपारिक व्यवसाय आहे. हा अगदी ओडीशावर राजघराणी राज्य करत होती, तेव्हापासून सुरु आहे.बहुतेक राजांनी या व्यवसायाला प्रोत्साहन दिले. इथले कारागिर फुल, पक्षी, जनावर, वृक्ष, सुर्य यांचा पॅटर्न म्हणून वापर करतात. नंतर त्यावर आरसे चिकटवून आणखी सजवले जाते. जर आपल्याला ओडीशातील पारंपारीक वस्तु खरेदी करायच्या असतील तर पिपली गावाला नक्कीच भेट दिली पाहिजे.


कापडी चित्रे
भुवनेश्वरपासून १५- २० किमी. वर आहे. वाटेत धौलीची कलिंग युद्धाची रणभूमी लागली. वाटाड्याने इंग्रजी आणि हिंदीतून व्यवस्थित माहिती दिली. पिपली हे अगदी छोटेसे गाव. रस्त्याच्या दुतर्फा दुकानेच दुकाने. ओदिशी कलावस्तूंची. इथली आठवण म्हणून बहुतेकांनी ओदिशी वस्तूंची खरेदी केली. हे गरीब राज्य असल्यामुळे तशी स्वस्ताई होती. त्यामुळे खरेदीनंतर बसमधला समस्त महिलावर्ग खूष होता. श्रीकृष्ण-बलराम-सुभद्रा या तिघांची एकत्र चित्रे, मूर्त्या बहुतेक वस्तूत. शैली वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैली. उभ्या लंबगोलाकार चेहर्‍यावर वटारलेले टप्पोरे डोळे. एक खास वस्तू म्हणजे अख्ख्या नारळाच्या गुळगुळीत केलेल्या छतात टांगायच्या गोट्यावरील या त्रिमूर्तीची चित्रे. नारलाला प्रथम तैलरंगाचा एक थर देऊन त्यावर तैलरंगातच आकर्षक छटांमध्ये रंगविलेली. तीनधारी नारळाच्या १२० अंशाच्या तीन पृष्ठभागावर प्रत्येकी एक चित्र अशी एकूण तीन चित्रे. नारळ भोवर्‍यासारखा गोल फिरून थांबला तरी एक चित्र आपल्याकडे पाहतेच. नारळ आणि कापडी चित्रे घेतली. काही घरात लावायला तर काही भेट म्हणून द्यायला. ज्यांना ज्यांना दिली त्यांना आवडली. कापडाच्या पॅचवर्कची उभी चित्रे साडॆचार फूट उंच आणि सहा इंच रुंद पण दोन घेतली. पण वेगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण शैलीतली.

पिपली मारुती मांदीर

पिपली मारुती मंदीर

पिपली मारुती मंदीर

पिपली मारुती मंदीर

 पिपलीचे सुंदरसे मारूती मंदीर 

अतरी येथील गरम पाण्याची कुंड :-    
   भुवनेश्वरपासून ३६ कि.मी दुर खोरदा -नयागड या राज्य महामार्गावर हिरव्यागार वनराईत वसलेले अतरी हे गाव गरम पाण्याच्या झर्यासाठी तसेच भगमरीजवळील हटलेश्वर या शिवमंदीरासाठी प्रसिद्द आहे. या गरम पाण्याच्या झर्यामुळे हे गाव प्रसिध्द झाले आहे.  अतरी हे गाव खुर्दापासून १३ कि.मी. आणि बागमरीपासून २ कि.मी.आहे. गावच्या परिसरात पाणथळ जमीन असून जमीनीतून गरम पाण्याच्या झर्याचा उगम झाला आहे.गंधकाच्या उग्र वासामुळे परिसरात फार वस्ती नाही. या पाण्याचे तापमान ५५ डिग्री सेंटीग्रेड असून वर्षभर हे तापमान सारखेच राहते. आजुबाजुच्या जमिनीत अल्युमिनिअमचे खनिज सापडते. 

झर्‍यातून बाहेर येणारे पाणी १० फुट व्यासाच्या आणि १५ फुट खोलीच्या कुंडात साठवले आहे. पाणी अत्यंत स्वच्छ असून तळाशी असलेले दगड्गोटे स्पष्ट दिसतात. या पाण्यात दैवी शक्ती असल्याचे स्थानिकांचे मानने आहे.इथे एखाद्या निपुत्रिक स्त्रीने या पाण्यातील एखादे फळ किंवा खाण्यायोग्य वस्तुचे भक्षण केले तर तीला पुत्रप्राप्ती होते असा समज आहे.या परिसराला भेट देणारे भाविक या कुंडात फोडलेले नारळ, फळे, भुइमुगाच्या शेंगा टाकतात.भल्या पहाटे तीन वाजल्यानंतर निपुत्रिक स्त्रीया इथे येउन पाण्यातील हि फ़ळ शोधून खातात.त्यामुळे मुल होइल अशी या लोकांची समजुत आहे. याशिवाय या पाण्यात इतर औषधी गुण असल्याचे स्थानिकांचे मानने आहे. यासाठी जवळच आंघोळीची व्यवस्था केली आहे.  

 

या गरम पाण्याच्या कुंडाजवळच हटकेश्वराचे मंदिर आहे.भगवान शंकराच्या कृपेमूळेच इथे गरम पाण्याचे झरे आहेत अशी स्थानिकांची समजुत आहे. शिवरात्री आणि मकरसंक्रातीला इथे मोठी जत्रा भरते आणि त्यात पारंपारिक पध्दतीने तयार केलेल्या वस्तु विक्रीसाठी असतात. संक्रातीला इथे जवळपास वीस हजार भाविक भेट देतात. या उत्सवांचे आयोजन स्थानिक उत्सव समिती करते, भाविकांना गरम पाण्याचे स्नान घडावे यासाठी पर्यटन खात्याने इथे कक्ष उभारले आहेत. 

जावे कसे ? :-
     अतरी हे गाव बागमरीपासून २ कि.मी. आहे. खुर्दा-नयागड रस्त्यावर हे गाव आहे. बागमरी ते खुर्दा हे अंतर १३ कि.मी. तर भुवनेश्वर हे अंतर ३६ कि.मी. आहे. भुवनेश्वरवरुन बागमरीला जाण्यासाठी सरकारी आणि खाजगी बस वहातुक आहे. साधारण दर तासाला नयागडला जाण्यासाठी बस उपलब्ध असतात. या बसने बागमरीला उतरल्यावर खाजगी रिक्षाने आपण या गरम पाण्याच्या झर्यांना भेट देउ शकतो.अर्थात स्वतःच्या भाड्याच्या वहानाने जाणेही सोयीचे पडते.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...