
ओडीशा राज्य इतिहास :

दिधनिकाय, जातककथासारख्या बौद्ध साहित्यात कलिंग देशाचे अनेक निर्देश आहेत. खि. पू. चौथ्या शतकात कलिंगातील जैनधर्मीय राजांचा मगधाच्या नंदांनी पराभव केला, पण नंदांचा नि:पात करून चंद्रगुप्त मौर्य राज्यावर आला, तेव्हा कलिंग स्वतंत्र झाला.चंद्रगुप्तचा नातू अशोक याने मोठे युद्ध करून कलिंग देश जिंकला, तेव्हाच्या संहारानेच त्याला उपरती होऊन तो अहिंसावादी बौद्ध धर्माचा उपासक बनला.

सम्राट अशोकाने धुळी येथे कोरलेला खडक स्तंभ बसवला आणि तो फक्त ५ किमी अंतरावर आहे. सध्याच्या राजधानी भुवनेश्वरजवळ हा स्तंभ जवळजवळ २३ शतकांपासून उभा आहे आणि तेथे कोरलेले शिलालेख बौद्ध तत्त्वांचा संदेश देतात.

अशोकांनंतर कलिंग देश पुन्हा स्वतंत्र झाला. ख्रि. पू. दुसऱ्या शतकात चेदी वंशाचा तिसरा राजा खारवेल हा या प्रदेशाचा विख्यात नृपती होऊन गेला. त्याने कन्याकुमारी पासून गंगेपर्यंत आणि पश्चिमेस महाराष्ट्रापर्यंत दिग्विजय केला. नंदांनी पूर्वी नेलेली कलिंगजिनाची मूर्ती मगध जिंकून परत आणली आणि भुवनेश्वरजवळचे उदयगिरी-खंडगिरी क्षेत्र जैन धर्माचे श्रद्धाकेंद्र बनवले. तेथील हाथीगुंफेत खारवेलाच्या कारकीर्दीचा वृत्तांत कोरलेला आहे. तथापि याची तेजस्वी राजवट अल्पकाळच टिकली व त्यामागून चेदी वंशाला पडता काळ आला. त्यानंतर कित्येक शतकांपर्यंतचा कलिंगाचा इतिहास अस्पष्ट आहे. तथापि उपलब्ध साधनांवरून दिसून येते की, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत उत्कल प्रदेशाच्या किनाऱ्याला भरभराटीत असलेली कित्येक बंदरे होती व त्यांतून यवद्वीप, सुमात्रा, बाली व आग्नेय आशियातील अन्य स्थळांकडे योद्धे, व्यापारी, धर्मप्रसारक व इतर लोक यांची रीघ लागली होती. त्या लोकांनी स्थापन केलेल्या वसाहतींची कालांतराने प्रबळ राज्ये झाली. प्रत्यक्ष कलिंग देश सागरी व्यापारावर संपन्न पण अनेक छोट्या राज्यांत विभाजित झाला होता. बौद्ध धर्माची पुन्हा चलती होती.

चौथ्या शतकात दक्षिण दिग्विजयास निघालेल्या सम्राट समुद्रगुप्ताच्या मार्गात आलेल्या उत्कल प्रदेशातील पाच राजांचा प्रतिकार त्याने मोडून काढल्याचा इतिहासात उल्लेख आहे.सातव्या शतकात कलिंग हर्षवर्धनाच्या राज्यात आला व तेथे महायान बौद्धमताच्या प्रचाराचा प्रयत्न झाला. त्याच्या कारकीर्दीत ६३८मध्ये ह्युएनत्संग हा चिनी यात्रेकरू कलिंगात आला होता. त्याने नमूद केले आहे की, येथील लोकांची भाषा व चालीरीती मध्य भारतातील लोकांहून वेगळ्या असून, हे लोक उंच व सावळ्या वर्णाचे आहेत. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ओरिसात सोमवंशीय महाभावगुप्त जनमेजयाने (६८०—७१२) नवे प्रबळ राज्य स्थापन करून कटकपर्यंत सीमाविस्तार केला. त्याच्या मागून महाशिवगुप्त, ययाती नावाचे दोन राजे पाठोपाठ गादीवर आले. त्यांतील दुसऱ्याने उत्कल देशाच्या इतिहासातील विख्यात केसरी कुलाची राजवट सुरू केली (७९५). कलिंग, कंगोड, कोसल व उत्कल ही राज्ये एकत्रित करून खारवेलाची साम्राज्यपरंपरा त्याने पुनरुज्जीवित केली. वैदिक धर्माचा उत्साहाने पुरस्कार करून त्याने कान्यकुब्जाहून दहा हजार विद्वान ब्राह्मण ओरिसात वसवले असे सांगण्यात येते. पुरीला पहिले जगन्नाथमंदिर त्यानेच बांधले असे मानतात. त्याचा मुलगा उद्योतकेसरी दुसरा महाभावगुप्त हाही खंबीर राज्यकर्ता व धर्माभिमानी होता. त्याचा कल शैव मताकडे असून भुवनेश्वर येथील बरीच मंदिरे त्याच्या कारकीर्दीत उभी राहिली. अकराव्या शतकात पूर्वेच्या गंग वंशाचा राजा तिसरा वज्रहस्त याने त्रिकलिंगाधिपती ही पदवी धारण करून तीस वर्षे कलिंगाचे वैभवसंपन्न राज्य भोगले. त्याचा नातू अनंतवर्मन् चोडगंग याने अकराव्या शतकाअखेरच्या काळात पुरीच्या जगन्नाथमंदिराचे शिखर व सभामंडप बांधल्याचा समज आहे. गंग राजे वैष्णव मताचे अभिमानी होते. त्यांच्यापैकी पहिला अनंगभीम, दुसरा राजराज, दुसरा अनंगभीम व कोणार्कचे प्रसिद्ध सूर्यमंदिर बांधणारा पहिला नरसिंहदेव यांनी विशेष कीर्ती मिळविली. तेराव्या शतकाअखेरीपासून ओरिसाला मुस्लिमांचा उपद्रव जाणवू लागला. बंगालच्या सुलतानांची धाड १३५२ मध्ये येऊन गेली. तीनच वर्षांनी दक्षिणेच्या प्रबळ विजयानगरच्या सेनापतीने गंगाराज भानुदेवीचा पराभव करून ओरिसा राज्य खिळखिळे केले. १३६१ मध्ये फिरोजशाह तुघलकाने स्वारी करून लूट केली अनेक देवळे नष्ट केली व कटक येथे भानुदेवास शरणागती पतकरण्यास भाग पाडले. १४३१ मध्ये दुबळ्या गंग वंशाला बाजूला सारून सूर्यवंशी कपिलेंद्रदेवाने सत्ता बळकावली व गजपती राजवट सुरु केली. त्याने प्रथम ओरिसातील अंतर्गत बंडे मोडून काढली नंतर बंगालच्या सुलतानाचा समाचार घेतला बहामनी सैन्याचा पराभव केला आणि विजयानगरचाही बराच प्रदेश जिंकून घेतला. १४६४ मध्ये त्याच्या राज्याची सागरसीमा गंगेच्या मुखापासून कावेरीच्या मुखापर्यंंत होती. तथापि कपिलेंद्रदेवामागून गजपती वंशाची सत्ता क्षीण होत गेली. उत्तरेकडल्या आक्रमकांबरोबर व गोवळकोंड्याच्या सुलतानाशी झगडे चालूच राहिले. तशात घरच्या कलहांनी आणि विश्वासघातांनी राज्य पोखरले आणि अखेर १५६८ मध्ये बंगालचा सुलतान सुलेमानखान याचा सेनापती काला पहाड याच्याशी झालेल्या लढाईत ओरिसाचा शेवटचा राजा मुकुंददेव पडला. तेव्हापासून बंगालच्या अफगाण सुलतानाकडे असलेला हा प्रांत १५९२ मध्ये अकबराचा सेनापती मानसिंग याने जिंकून मोगल साम्राज्याला जोडला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्य बादशाहला न जुमानता स्वतंत्र असल्यासारखे वागणारे बंगालचे नबाब ओरिसाचे सत्ताधारी होते. १७५१ मध्ये हा सुभा अलीवर्दीखानाने नागपूरच्या भोसल्यांना दिला. मग ओरिसावरचा पन्नास वर्षांवरील मराठ्यांचा अंमल संपुष्टात आणून १८०३ मध्ये ब्रिटिशांनी हा मुलूख घेतला. सुरुवातीस तो कटक जिल्हा म्हणून एका मुलकी अंमलदाराकडे होता व अनेक छोट्या छोट्या संस्थानांशी ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतंत्र तहनामे झाले होते. ओरिसा त्यांच्यासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा नसल्याने त्यांनी तेथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार कमी प्रयत्न केले.१८२८ मध्ये कटक, बलसोर व पुरी हे जिल्हे व खंडणी देणारी संस्थाने मिळून एक उपप्रांत म्हणून ओरिसा बिहारला जोडण्यात आला.१९०५ मध्ये त्यात संबळपूर जिल्ह्याची भर पडली. १९३६ मध्ये ओरिसा वेगळा प्रांत झाला. बिहारपासून विभक्त व सर्व ओडिया भाषिकांच्या एकत्रित अशा प्रांतासाठी १९०३ पासूनच देशभक्त मधुसूदन दास यांच्या नेतृत्वाने उत्कल युनियन कॉन्फरन्सची चळवळ सुरू झाली होती. नंतर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक असहकाराच्या आंदोलनात ओरिसा काँग्रेस हिरिरीने सहभागी झाली. १९३०च्या मीठ सत्याग्रहात गोपबंधू दास, मेहताब, रमादेवी, मालतीदेवी, सरलादेवी इत्यादींनी यशस्वी नेतृत्व केले. १९३७ मध्ये श्री. विश्वनाथ दास यांचे पहिले काँग्रेस सरकार अधिकारारूढ झाले पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेसपक्षाने सत्तात्याग केला. कदाचित तुम्हाला माहित नसेल की दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरने ओडिशा काबीज करण्याची योजना आखली होती कारण हिटलरचा असा विश्वास होता की ओडिशामध्ये भरपूर नैसर्गिक पदार्थ आहेत ज्याच्या सहाय्याने तो कोणतेही युद्ध जिंकू शकतो, परंतु हिटलरचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले.१९४२च्या स्वातंत्र्य आंदोलनात ओरिसात हजारो देशभक्तांनी चौफेर उठाव केला लक्ष्मण नायको यास फाशी देण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ओरिसा, मध्य प्रदेश व बिहारमधील एकूण २६ संस्थाने विलीन झाली. १९४९ पासून संपूर्णपणे ओडियाभाषी ओरिसाने संघराज्यात आपले योग्य स्थान मिळविले.
ओडिशा राज्याची स्थापना
आधुनिक ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी कटक येथील कनिका पॅलेस येथे झाली .राज्याची स्थापना राज्य म्हणून झाली आणि या नवीन राज्यातील बहुतेक नागरिक ओडिया भाषिक होते. राज्यात १ एप्रिल हा उत्कल दिवस (ओडिशा दिवस) म्हणून साजरा केला जातो.
उन्हाळ्यात पूर्वेकडील टेकड्या व उत्तरेकडचे पठार यांच्या उंचीवरची ठिकाणे वगळता सर्वत्र सामान्य तपमान ३८° से. असते व किनाऱ्याकडून अंतर्भागाकडे ते वाढत जाते. थंडीच्या दिवसात सरासरी तपमान २२·८० ते १५० से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात सरासरी वार्षिक १४८ सेंमी. पाऊस पडतो.

अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हींवरचे मान्सून प्रवाह या राज्यात एकत्र येतात. नैर्ऋत्य मान्सूनचे काळात बंगालच्या उपसागरावरून किनाऱ्यावर पुष्कळदा तुफाने येतात. याच सुमारास ईशान्य मान्सूनचे काही झोत पूर्वेकडच्या टेकड्यांवर येतात. राज्यात झालेल्या १९७१च्या तुफानाने फार नुकसान झाले.
भूवर्णन
(अ) उत्तरेचे पठार : यात मयूरभंज, केओंझार व सुंदरगढ हे जिल्हे आणि धेनकानाल जिल्ह्याचा पाल्लहरा तालुका हा उंचसखल प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरत येतो. हा बिहारच्या छोटा नागपूर पठाराचाच दक्षिण भाग असून त्याच्या टेकड्यांवर पडणारा पाऊस असंख्य प्रवाहांनी नद्यांना जाऊन मिळतो. या पठाराचा सरासरी ९३० मी. उंचीचा मध्यभाग, वैतरणी व ब्राह्मणी नद्यांमधील सर्वांत महत्त्वाचा जलविभाजक आहे. त्याच्या उत्तर व पूर्व भागांत अनेक टेकड्यांच्या रांगा असून त्यांत मलयगिरी, मानकर्णाच, मेघसानी अशी १,१०० ते १,२०० मी. उंचीची शिखरे आहेत.
(आ) मध्यवर्ती नदीखोऱ्यांचा विभाग : हा उत्तरेचे पठार व पूर्वेच्या टेकड्या यांच्या दरम्यान येतो. यात राज्यातल्या मुख्य नद्यांची जलवाहन क्षेत्रे असून त्यांत बोलानगीर, संबळपूर व धेनकानाल जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात जमिनी सुपीक आहेत. सपाट मैदानांतून मधूनमधून उभ्या टेकड्या आढळतात. राज्याच्या वायव्य भागातले महानदीतले खोरे बरेच विस्तृत आहे. मध्य विभागातली महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या नद्यांची खोरी समांतर, कृषिसंपन्न व दाट वस्तीची आहेत.
(इ) पूर्वेकडच्या टेकड्यांचा भाग : हा भाग म्हणजे भारतीय पूर्वघाटाच्या शेवटच्या रांगा आहेत. मध्यभागातील नदीखोऱ्यांच्या दक्षिणेस व नैर्ऋत्येस सु. २५० किमी., ईशान्य नैर्ऋत्य रोखाने या पसरल्या असून त्या कोरापुट, कालाहंडी, बौध खोंडमाल्स व गंजाम जिल्ह्यांतून जातात. त्यांच्यामधील प्रशस्त खुल्या पठारांभोवती वनप्रदेश व राज्यातली सर्वोच्च शिखरे– देवमाली १,६७० मी., तुरिआ कोंडा १,५९८ मी. व महेंद्रगिरी १,५०० मी. आहेत. या गिरिप्रदेशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून ९३० मी. असून तो बहुमोल वृक्षांच्या दाट रायांनी व्यापलेला आहे. यावर पडणारा पाऊस दोन बाजूंना वाहून ऋषिकूल्या, नागावली व वंशधारा नद्यांतून थेट बंगालच्या उपसागरात आणि उपनद्यांतून गोदावरी व महानदी या नद्यांकडे जातो.
(ई) किनारी सपाटीचा प्रदेश : यात बलसोर, कटक व पुरी जिल्हे आणि गंजाम जिल्ह्याचा काही भाग येतो. पश्चिमेकडील डोंगराळ भाग आणि पूर्वेकडील खारपट्ट्या यांच्या दरम्यान हा नदीगाळाचा विस्तृत पट्टा आहे. बंगालच्या उपसागराला अगदी लागून असलेल्या भूप्रदेशात अनेक मंदवाही आणि समुद्राच्या भरती-ओहोटीनुसार कमीजास्त मचूळ होणारे प्रवाह आहेत. बलसोर व पुरी जिल्ह्यांतला यांचा भाग रेताड आणि कटक जिल्ह्यात दलदलीचा आहे. या किनारपट्टीमागची प्रशस्त गाळजमीन मात्र अनेक नद्यानाल्यांनी भिजून भरपुर भातपीक देते.
वने व प्राणी
खनिज संपत्ती :
राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. ६० प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले २० प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते. केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात.
प्रमुख नद्या :
महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यातल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात ८५३ किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून १,३२,६०० चौ. किमी. क्षेत्रातले पाणी वाहून नेते आणि महापुराचे वेळी ४४,८०० घमी./से. किंवा जवळजवळ गंगेइतके पाणी बंगालच्या उपसागरात सोडते. अशा वेळी तिचे पात्र दीड किमी. पेक्षाही जास्त रुंदावते. ती अनेक मुखांनी सागराला मिळते. या व दुसऱ्या दोन नद्यांच्या मुखप्रवाहांचे एक जाळेच त्यांच्या त्रिभुजप्रदेशात बनले आहे. ओरिसातले मोठे जलाशय म्हणजे हिराकूद धरणाने झालेला तलाव आणि भरतीच्या वेळी खाऱ्या व ओहोटीच्यावेळी गोड्या पाण्याचे किनाऱ्याच्या आतले चिल्का सरोवर हे होत. राज्याचा ४८२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा रेताड व नद्यांच्या गाळाने उथळ बनलेला आहे.
महानदी, ओडिशा
शेती व मुख्य पिके :
दळणवळण मार्ग :
राज्यात 1971 साली 1713 किमी. लांबीचे लोहमार्ग आग्नेय रेल्वेच्या कक्षेत पूर्व किनाऱ्याला, उत्तर सीमेवर आणि पश्चिमेकडे वळणारे असे होते. त्यात आणखी 211 किमी.ची भर खाणी व कारखान्यांच्या वाढत्या विकासासाठी दुसऱ्या व तिसऱ्या योजनांत मिळून पडली आणि संकल्पित बैलादिला-कोट्टलवलसा हा 502 किमी. मार्ग पुरा झाल्यावर राज्याच्या दूरच्या भागांपर्यंत रेलवाहतूक सुलभ होणार आहे.
भुवनेश्वरच्या मुख्य विमानतळा खेरीज राज्यात इतर तीन तळ व कित्येक धावपट्ट्या आहेत. शासकीय राज्यवाहतुकीच्या 450 वर बसगाड्या दिवसाला पाऊण लाख उतारूंची वाहतूक करतात. राज्याचे पारादीप बंदर भारताच्या आठ प्रथमश्रेणीच्या बंदरांपैकी एक आहे व कच्च्या खनिजांच्या निर्यातीसाठी याचा उपयोग होऊ लागला आहे. चांदबाली व गोपालपूर ही ओरिसातली दुय्यम बंदरे आहेत त्यांचा उपयोग मुख्यत: मच्छीमारी नौकांना होतो.
ओडिशा राज्याची भाषा
ओडियाला ओडिशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. मूळ रहिवासी आर्य कुटुंबातील होते आणि येथील भाषा बंगाली, आसामी आणि मैथिली सारखी आहे. वर्षानुवर्षे उडिया भाषेमध्ये बालेश्वरी, भात्री, लारिया, संबलपुरी, गंजमी, छत्तीसगढ़ी आणि मेदिनीपुरी यासारख्या भाषेत इतर अनेक भिन्नता निर्माण झाल्या आहेत. ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे आणि शेजारच्या राज्यांमध्ये देखील बोलली जाते. इतर राज्यांतून आलेल्या लोकांकडून येथे इतर भाषा बोलल्या जातात.
ओरिसाची ओडिया ही भाषा मागधी प्राकृत गटातील आहे. ओडिया लिपीचा विकास ब्राह्मी लिपीतून झाला आहे. या भाषेत अकराव्या शतकापासून ग्रंथरचना होऊ लागली. सोळाव्या शतकापर्यंतच्या आदियुगात बौद्धगान ओ दोहासारख्या धर्मपर व मादलापांजीसारख्या इतिहासस्वरूप रचना झाल्या. ओरिसाचा आद्यकवी ‘शूद्रमुनी ’ सारळा दास याची विलंका रामायण, महाभारत व चंडीपुराण ही काव्ये याच काळात झाली. मध्ययुगाच्या पूर्वार्धात किंवा भक्तियुगात पुरीच्या जगन्नाथभक्तांनी व चैतन्यशिष्यांनी अनेक भक्तिपर ग्रंथ लिहिले सालवेग नावाच्या मुसलमान भक्तानेही कवने रचली. त्याखेरीज विविध कवींच्या कपटकेली, शशिसेणासारख्या ललितकृती झाल्या. उत्तरार्धाच्या रीतियुगात शास्त्र, कला, संगीत अशा विषयांवरच्या अनेक काव्यलक्षणयुक्त रचना पंडितांनी व कवींनी केल्या.उपेंद्र भंज हा या काळातला सर्वश्रेष्ठ कवी मानण्यात येतो. त्याची पौराणिक काव्ये प्रगल्भ शैलीची आहेत. मध्ययुगांनंतरच्या काळात भक्तिप्रधान व रीतिप्रधान पद्धतींचा समन्वय झाला. हळूहळू फार्सी व हिंदी भाषांचा थोडा प्रभाव ओडियावर पडला. ब्रिटिशांच्या राजवटीबरोबर आधुनिक युग आले व राधानाथ राय, फकीरमोहन, मधुसूदन राय, रामशंकर राय, गोपबंधू दास, मायाधर मानसिंह, कालिंदीचरण पाणिग्राही, सच्चिदानंद राऊन, गोपीनाथ महांती व नित्यानंद महापात्र अशा लेखकांनी काव्य, नाटक, कादंबरी अशा अनेक प्रकारांत साहित्यनिर्मिती करून ओडिया वाङ्यम आधुनिक युगात आणून ठेवले.
लोक व समाज :
लोकसंख्येपैकी 8.27 प्रतिशत लोक शहरात राहणारे होते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रोजगारीसाठी आंध्र प्रदेश व इतर शेजारच्या राज्यांतून ओरिसात येणाऱ्या लोकांपेक्षा सु. एक लाख अधिक लोकांनी या राज्यातून मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व आसाममध्ये स्थलांतर केल्याचे आढळून आले आहे.
ओडिशातील महिलांची वेशभूषा

ओडिशातील महिलांचा मुख्य पोशाख साडी आहे. जो भारतीय संस्कृतीचाही एक भाग आहे. त्यामुळे ओडिशातील महिलांच्या सौंदर्यातही भर पडते. ओडिशा कटकी साड्या आणि संबलपुरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या साड्यांच्या डिझाईन्स अतिशय वेगवेगळ्या आणि सुंदर आहेत आणि येथील महिला विवाहसोहळा, लग्नसमारंभ आणि दैनंदिन जीवनात याचा मोठ्या अभिमानाने वापर करतात. हे वस्त्र अतिशय आरामदायक आहे. सलवार कमीज हा ओडिशातील मुलींचा पोशाख आहे, इथल्या स्त्रिया साड्यांसोबत मौल्यवान दागिने वगैरे वापरतात.
ओडिशातील पुरुषांची वेशभूषा
ओडिशातील बहुतेक लोक कष्टकरी आहेत. ग्रामीण भागात अजून बरेच आहेत. ओडिशात पुरुषांना स्वतःचा पारंपरिक पोशाख घालण्यात जास्त रस असतो. सामान्यतः, धोती कुर्ता हा ओडिशातील पुरुषांचा सामान्य पारंपारिक पोशाख आहे. ते सण, लग्न समारंभ इत्यादींमध्येही घालतात. धोती कुर्ता व्यतिरिक्त तो खांद्यावर गमछा घालतो. येथील लोक त्यांचे पारंपारिक धार्मिक पोशाख परिधान करण्याचे काटेकोरपणे पालन करतात. मात्र, इंटरनेटचे आगमन, जलद दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांमुळे त्यांच्या परंपरा आणि संस्कृती बदलत आहेत. त्यामुळे ड्रेस डिझाईनमध्ये बदल होत असून विविध प्रकारच्या पोशाख तरुण वापरताना दिसतात.
राज्यव्यवस्था :
राज्याच्या विधानसभेत १४० लोकनियुक्त सदस्य असून त्यांपैकी २२ अनुसूचित जाती व ३४ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या साहाय्याने राज्यकारभार सांभाळतो. राज्यात विविध पक्ष असून मार्च १९७१च्या निवडणुकीत नवकाँग्रेस ५१, जुनी काँग्रेस १, उत्कल काँग्रेस ३२, जनकाँग्रेस १, स्वतंत्र ३६, समाजवादी ४, झारखंड ४, कम्युनिस्ट ६ व अपक्ष ४ निवडून आले. उत्कल काँग्रेस, स्वतंत्र व झारखंड पक्ष यांचे संमिश्र मंत्रिमंडळ विश्वनाथ दास यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आले. मार्च १९७३ मध्ये राष्ट्रपती राजवट सुरू झाली. फेब्रुवारी १९७४च्या निवडणुकांत नवकाँग्रेस पक्षाचे बहुमत होऊन श्रीमती नंदिनी सत्पथी यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. कारभाराच्या सोईसाठी राज्याचे घटक पुरी, ढेकांनाल, फुलबानी, बलसोर, संबळपूर, गंजाम, कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ, बोलानगीर, कोक्राझार व कालाहंडी या १३ जिल्ह्यांची ५२ महसुली उपविभाग व त्यांची तहसिलात विभागणी केली आहे. राज्यात १९ नगरपालिका, १३ जिल्हा परिषदा, ४४ अधिसूचित क्षेत्रसमित्या, ३१४ पंचायत समित्या व ३,८३१ ग्रामपंचायती १९६१ पासून क्रमश: विकेंद्रित शासनाच्या प्रयोगात अधिकाऱ्यांच्या मदतीने सहभागी होत आहेत. वरिष्ठ न्यायालयात प्रमुख न्यायमूर्ती व चार साहाय्यक न्यायमूर्ती आहेत. जिल्हावार न्यायव्यवस्थेत सत्रन्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी व त्यांचे कनिष्ठ अधिकारी अंतर्भूत आहेत. भारताच्या लोकसभेत २० व राज्यसभेत १० सदस्य ओरिसातून निवडून जातात.
ओडिशा उच्च न्यायालय, कटक
ओडिशाला समृद्ध कलात्मक वारसा आहे आणि त्याने भारतीय कला आणि वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे निर्माण केली आहेत. भित्तिचित्रे, दगड आणि लाकडावरील कोरीवकाम, देव चित्रे (पट्टा पेंटिंग म्हणून ओळखले जाते) आणि ताडाच्या पानांवरील चित्रांद्वारे आजही कलात्मक परंपरा जपल्या जातात. आजुबाजूच्या उपलब्ध साहित्याचा उपयोग करून कारागीर अनेक शोभिवंत वस्तू तयार करतात. पुरीचे आणि परिसरातले शिल्पकार साध्या दगडांतून ओरिसातल्या भव्य वास्तूंच्या प्रतिकृती कोरून काढतात. कोणार्क आणि भुवनेश्वराच्या देवळांतील देवता आणि इतर आकृतीचे सुंदर छोटे नमुने मऊ दगडांतून हुबेहुब तयार करतात. इकडची लाकडी खेळणी आणि जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती वास्तवदर्शी नसून प्रतीकात्मक असतात आणि विविध चमकदार रंगांनी त्या मोठ्या वेधक दिसतात. तशीच साध्यासोप्या पद्धतीने, ओबडधोबड कागदावर रंगवलेली ओरिसाची परंपरागत ‘पट’ चित्रे ढोबळ शैलीची, अवास्तव व भडक असूनही त्यांच्या संरचना व लयरचना लक्षणीय असतात. नाजुक नक्षीदार चांदीचे जाळीकाम ही कटकची एक विशेष कला आहे. अशा पद्धतीने बनविलेले दागिने व शोभेच्या वस्तू देशभर विख्यात आहेत. संबळपूरच्या हातमाग साड्या व मयूरभंज, सोनेपूर व बेहरामपूरचे रेशमी व टसर कापड प्रसिद्ध आहे. पर्लाकिमिडी व कटक येथे हस्तिदंत व शिंगावरीस उत्तम कोरीवकाम होते. ओरिसातले प्रमुख उत्सव मे-जूनमधील पुरीची चंदनयात्रा, जून-जुलैमधील त्रिखंडकीर्तीची जगन्नाथ रथयात्रा, फेब्रुवारीतील कोणार्कचा एक दिवसाचा मेळा व नोव्हेंबरमधील कटकची बलीयात्रा हे होत. या उत्सवांना राज्यातून व बाहेरून लाखोंनी लोक जमतात.
नृत्य :-
ओडिसी हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये मुद्रा, भाव आणि गीतात्मक गुणांना महत्व दिले जाते ओडिसी नृत्य दर्शकांना शब्दांपलीकडे जाणारा अनुभव देते. हे नृत्य मंदिराच्या नाट्यविधी अर्पण म्हणून सादर केले गेले होते
- नृत्य
1952 मध्ये, कला विकास केंद्राची स्थापना कटक येथे झाली, ज्यामध्ये नृत्य आणि संगीताच्या प्रचारासाठी सहा वर्षांचा अध्यापन अभ्यासक्रम आहे. यासाठी राष्ट्रीय संगीत संघटना (राष्ट्रीय संगीत समिती) देखील तेथे आहे .
सण, उत्सव :
भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक मोठा भाग म्हणजे सण- उत्सव आहे. इथल्या उत्सवांमध्येही भारताची विविधता दिसून येते. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. जे त्या राज्याच्या समृद्ध संस्कृतीबद्दल बोलतात. असेच काहीसे ओडिशामध्येही पाहायला मिळते. सामान्यत: जेव्हा ओडिसाच्या उत्सवांचा विचार केला जातो; तेव्हा ते केवळ रथयात्रेशी जोडले गेलेले दिसतात. तर राज्यात यापेक्षा बरेच काही साजरे होत असते. याबाबत अनेकांना माहिती नाही. दुर्गापूजा आणि रथयात्रेव्यतिरिक्त असे अनेक सणही येथे आहेत जसे कलिंग महोत्सव, चंदन यात्रा, कोणार्क नृत्य महोत्सव, महा बिशवु संक्रांती , राजा परब, रथयात्रा, मघासप्तमी, मकर मेळा, छाऊ उत्सव, पुरी बीच महोत्स्व, नौखाई इ. मेळा आणि सण साजरे करण्याची ओरिसाची स्वतःची पद्धत आहे. कालिजल बेटावरील मकर मेळा, चिल्का तलाव, भुवनेश्वरचा आदिवासी मेळा, दुर्गा पूजा, भुवनेश्वरच्या भगवान लिंगराजाचा कार उत्सव आणि पुरीतील रथयात्रा हे ओरिसाचे काही प्रसिद्ध मेळे आणि उत्सव आहेत. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवतांना रथ मिरवणुकीत त्यांच्या उन्हाळी मंदिरात आठवडाभर नेले जाते.ओडिशामध्ये अशाच साजरा होणाऱ्या काही रंगीबेरंगी उत्सवांबद्दल माहिती जाणून घ्या.
बंगालीं लोकांसाठी दुर्गा पूजा तितकीच महत्वाची आहे जितकी ओडिशाच्या लोकांसाठी आहे. अश्विन किंवा कार्तिक महिन्यात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान सत्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी. महिषासुर विरूद्धच्या विजयाबद्दल हा महोत्सव दुर्गा माँची शक्ती साजरा करतो.चमचमणारे दिवे रस्त्यावर सर्वत्र उजळताना दिसतात. रस्त्यांवर उभारलेल्या मंडपामध्ये लक्ष्मीसमवेत देवी सरस्वती आणि देवी दुर्गा यांच्यासह देवी आणि गणेश कार्तिक यांच्या प्रचंड मूर्तीची प्रतिष्ठापणा केली असते. हा उत्सव ओडिशामधील लोकांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे.
रथ महोत्सव
दुर्गापूजनाशिवाय ओडिशातील रथयात्रा किंवा रथोत्सव हा आणखी एक महत्त्वाचा सण आहे. हा सण इतका लोकप्रिय आहे की ओडिशामध्ये देशभरातून आणि जगभरातील लोक उत्सव साजरा करण्यासाठी येतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री आयोजित केले जाते. हा उत्सव भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि सुभद्रा देवी प्रित्यर्थ साजरा केला जातो. ओडिशाच्या पुरी येथे त्या सणाच्या वेळी त्यांच्या मूर्ती आंघोळीसाठी बाहेर काढल्या जातात. या उत्सवाचा काळ १४ दिवसांचा असतो. सणांच्या वेळी अनेक प्रथा आणि धार्मिक प्रथा परंपरेनुसार केल्या जातात.
कलिंग उत्सव
ओडिशातील लोकांद्वारे साजरा केला जाणारा लोकप्रिय उत्सव म्हणजे कलिंग महोत्सव. हा उत्सव साजरा करण्यामागे एक वेगळी कथा आहे, ज्याबद्दल फार माहिती नसेल. ओडिशाचा एक मोठा भाग, कलिंग म्हणून ओळखला जातो. अशोकाच्या कारकिर्दीत अनेक वीर युध्द्दात ठार झाले. कलिंग महोत्सव युद्धावरील शांततेचा विजय साजरा करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या महोत्सवात मौर्य घराण्याच्या वीरांच्या अनेक युद्धकलांचे प्रदर्शन केले जाते. भुवनेश्वरमधील धौली शांती स्तूपात ही कला सादर केली जाते.
छाऊ उत्सव
ओडिशातील आणखी एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय उत्सव म्हणजे छाउ महोत्सव. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो आणि ओडिशामधील भुयान आदिवासी हा साजरा करतात. या उत्सवात ओडिशातील लोक छाऊ नृत्य सादर करतात.छाउ नृत्य हा नृत्यचा पारंपारिक प्रकार आहे ज्यामध्ये मार्शल आर्ट्स आणि लोकनृत्य यांचा संयोग समाविष्ट आहे. छाऊ नृत्य दरम्यान मुखवटे आणि पारंपारिक पोशाख घातले जातात त्यामुळे नृत्याचा रोमांच आणखी वाढतो.
सीतल शास्ती कार्निवल
या उत्सवाचे नाव एकदम वेगळे आहे. सीतल षष्ठी हा एक लोकप्रिय उत्सव आहे जो वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. पार्वतीबरोबर भगवान शिव यांचा विवाह उत्सव स्वरुपात साजरा केला जातो. हा एक सर्वात लोकप्रिय सण आहे आणि ओडिशामधील सर्व शिव मंदिरांमध्ये साजरा केला जातो. हा सण जेष्ठ महिन्यात शुक्ल पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो. उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या मध्ये हा सण साजरा केला जाते. हा मुख्यतः ओडिशाच्या पश्चिम भागात साजरा केला जातो.
ओडिशातील ‘बाली जात्रा’
बाली जात्रा हा ओडिशातील मोठा उत्सव आहे. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला कटक शहरातील महानदीच्या तीरावर साजरा केला जातो. कटक येथे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला, ‘बोईता बंदना’ (म्हणजे ‘नाव-वंदन’) असते. ‘बोईता’ म्हणजे नाव. एक छोटी नाव तयार करून तीत फुलं आणि दिवा ठेवून ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत किंवा तलावात सोडली जाते.
पारंपरिकरीत्या केळीच्या झाडाच्या खोडापासून ही छोटी नाव तयार केली जात असे. आता कागद, कार्डबोर्ड वापरूनही या नावा तयार केल्या जातात आणि शंखांच्या, घंटांच्या निनादात त्या नदीत सोडल्या जातात. ‘आमचे कुटुंबीय समुद्रयात्रा करून सुखरूप घरी परत यावेत यासाठी आम्ही समुद्राला पान आणि सुपारी वाहत आहोत...’ अशी प्रार्थना या नावांच्या प्रतिकृती नदीत सोडताना केली जाते. ही ‘बोईता-बंदना’ आता केवळ एक परंपरा म्हणून केली जात असली तरी तीतून ओडिशातील प्राचीन काळात केल्या जाणाऱ्या समुद्री यात्रांची स्मृती जपली गेली आहे.
ओडिशाची राजधानी कटक येथून भुवनेश्वर येथे आल्यावर भुवनेश्वरमध्येदेखील बाली जात्रा साजरी केली जाऊ लागली. हा उत्सव साजरा केल्या जाणाऱ्या रस्त्यांवर किंवा नदीकाठच्या भागात उभारलेल्या कमानींवर नावेची प्रतिकृती केलेली असते. या उत्सवासाठी अनेक खाद्यपदार्थ, विविध वस्तू यांचे स्टॉल लागलेले असतात. या उत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. कटक आणि भुवनेश्वर येथील या उत्सवाला आपल्याकडील गणेशोत्सवासारखी किंवा नवरात्रासारखी गर्दी होते.
बाली बेटावरील हिंदू संस्कृतीच्या खुणा आजही कशा दिसून येतात हे जाणवते. याशिवाय, इंडोनेशियात काही ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खननात प्राचीन काळातील भारतीय बनावटीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. यावरूनही भारत आणि इंडोनेशियातील व्यापारीसंपर्क लक्षात येतो. अर्थात्, परंपरेनं ओडिशातील हा उत्सव केवळ बाली बेटाचं नाव टिकवून असला तरी भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून इंडोनेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, चीन इत्यादी देशांमध्येही व्यापारानिमित्त भारतीय प्रवास करत होते.
पूर्व किनाऱ्यावरील बंदरं
ओडिशात प्राचीन काळी कलिंग नावाचं राज्य होतं. या राज्याच्या किनारी प्रदेशात तामलुक, बारूआ बंदर, कलिंगपटण इत्यादी महत्त्वाची बंदरं होती. ओडिशातील प्रसिद्ध चिल्का सरोवराच्या परिसरातदेखील नैसर्गिक बंदरं होती. काही मध्ययुगीन ग्रंथांतून उल्लेख केल्यानुसार, चिल्का सरोवराच्या परिसरातील बंदरांत इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, चीन इत्यादी देशांत जाणारी जहाजं उभी असत. चिल्का सरोवराच्या परिसरात केलेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात काही प्राचीन बंदरांचे अवशेष आढळून आले आहेत. या सरोवराच्या जवळ असलेल्या माणिकपटण या ठिकाणी एक महत्त्वाचं बंदर होतं.
ओडिशातील मध्ययुगात वापरल्या गेलेल्या काही बंदरांच्या ठिकाणी पुरातत्त्वीय सर्वेक्षण केल्यावर चिनी बनावटीच्या भांड्यांचे तुकडेदेखील सापडले आहेत. यावरून मध्ययुगातील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या व्यापाराची कल्पना येते. ओडिशातील विविध पुरातत्त्वीय स्थळांतून आणि प्राचीन, मध्ययुगीन बंदरांच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांवरून ओडिशातील किनाऱ्यावरून आशियातील विविध देशांशी व्यापार सुरू होता हे समजतं.
समुद्राची पातळी बदलणं, बंदरात गाळ भरणं, किनारपट्टीची झीज इत्यादी भौगोलिक बदलांमुळे ओडिशातील अनेक बंदरं लयाला गेली. ओडिशातील प्रसिद्ध अशा कोणार्क या ठिकाणीही बंदर होतं. समुद्रपातळी बदलल्यानं कोणार्क हे ठिकाण आता समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर दूर आहे. चिल्का सरोवराच्या परिसरातील बंदरं गाळ भरल्यानं कालांतरानं वापरयोग्य राहिली नाहीत.
जलप्रवासाशी संबंधित काही जहाजांची शिल्पं भुवनेश्वरमधील मंदिरांच्या परिसरात आढळली होती. ती आता भुवनेश्वर येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय ओडिशातील रत्नगिरी येथे असलेल्या बौद्ध विहाराच्या परिसरात एक महत्त्वाचा पुरावा आढळतो. बौद्ध धर्मातील अवलोकितेश्वर आणि तारा या देवता व्यापाऱ्यांसाठी रक्षणकर्त्या देवता म्हणून महत्त्वाच्या होत्या. सिंह, हत्ती, चोर इत्यादींच्या हल्ल्यात किंवा इतर संकटांत व्यापारी सापडले तर या दोन देवता त्यांना संकटातून सोडवतील अशी व्यापाऱ्यांची धारणा होती. ओडिशातील रत्नगिरी येथे असलेल्या बौद्ध विहारातील परिसरात अशा आठ भयांपासून रक्षण करणाऱ्या तारा या बौद्ध स्त्रीदेवतेचं शिल्प आढळून आलं आहे.
या शिल्पात मध्यभागी हातात कमळ घेऊन उभी असलेली तारा ही देवता दाखवण्यात आली आहे. तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला छोटी शिल्पं आहेत. या शिल्पांतून ही तारा देवता कोणत्या प्रसंगी भक्तांचं रक्षण करते हे दाखवलेलं आहे. या शिल्पात देवतेच्या उजव्या बाजूला सगळ्यात खालच्या चौकोनात एक शिडाचं जहाजदेखील आहे. या जहाजाच्या शिल्पाचा अर्थ बुडणाऱ्या जहाजाला आणि त्यावरील प्रवाशांना तारा ही देवता वाचवते असा होतो.
विविध पुरातत्त्वीय आणि कलास्थापत्यातील पुरावे यांवरून भारत आणि आग्नेय आशियातील देशांतील संपर्क आणि सांस्कृतिक संबंध आपल्याला दिसून येतातच; मात्र, प्राचीन काळी बाली बेटाकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समुद्रयात्रेची स्मृती ‘बाली जात्रा’ या उत्सवाच्या रूपानं ओडिशामध्ये अजूनही जपली गेली आहे हे विशेष.
सॅण्ड आर्ट फेस्टिवल :-
भारताच्या पूर्व किनार्यावर बंगालच्या उपसागरामध्ये शांतपणे पाय सोडून बसलेला प्रदेश म्हणजे ओडिशा. निसर्गाने आपल्या दोन्ही हातांनी या प्रदेशाला भरभरून दान दिलेले आहे. जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर इथली भव्यदिव्य मंदिरे, पिपली आर्ट, पट्टचित्र सारख्या विविध कला, संस्कृती, यांची रेलचेल या प्रदेशात पाहायला मिळते. भुवनेश्वर हे राजधानीचे शहर म्हणजे मंदिरांची नगरी म्हणूनच ओळखले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ म्हणजे पर्यटकांसाठी सुगीचे दिवस. या दिवसात अनेक पर्यटक ओडिशामध्ये येत असतात. हेच निमित्त साधून ओडिशा सरकार विविध उत्सवांचे आयोजन करते. त्यातले अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत होणारे कोणार्क ‘डान्स फेस्टिवल’ आणि कोणार्कच्याच चंद्रभागा किनाऱ्यावर वर होत असलेला ‘सॅण्ड आर्ट फेस्टिवल’ हे दोन महोत्सव. या दोन्ही उत्सवांसाठी भारतातून तसेच परदेशातूनही विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.
सॅण्ड आर्ट म्हणजेच वाळूची शिल्पे. ओडिशामधील सुदर्शन पटनायक या कलाकारामुळे हा प्रकार सगळ्या जगभर ओळखला जाऊ लागला. सुदर्शन पटनायक यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवलेले आहे. जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनार्यावर वेगवेगळ्या विषयांवर वाळूची शिल्पे करणे यात सुदर्शन पटनायक यांचा हातखंडा आहे. सामाजिक, राजकीय, किंवा जागतिक पातळीवर एखादी महत्त्वाची घटना घडली की त्या घटनेवर आधारित अत्यंत देखणे असे वाळूशिल्प सुदर्शन पटनाईक तयार करतात. या कलाप्रकाराला उत्तेजना मिळावी म्हणून ओडिशा सरकारतर्फे आता सॅण्ड आर्ट फेस्टिवल दरवर्षी साजरा केला जातो. हा फेस्टिवल म्हणजे वाळूशिल्पे करणाऱ्या कलाकारांसाठी एक पर्वणीच असते. भारताच्या विविध प्रांतातून इथे कलाकार आपली कला सादर करतात. समुद्रकिनाऱ्यावर एकाशेजारी एक सलग अशी वेगवेगळ्या कलाकारांची वाळूशिल्पे आपल्याला बघायला मिळतात.
पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक संकल्पना घेऊन वाळूचे शिल्प करायचे असते. जेव्हा भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले गेले. त्यामुळे तिथे वारसा, महिला सक्षमीकरण, प्लास्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी ही सुद्धा संकल्पना ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या संकल्पनेनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्याच्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळूशिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून मधून मधून त्याच्यावरती पाणी शिंपडले जाते. याकामी अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांना सुद्धा वाळूशिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक तिथे पाहता येते.
कोणार्क इथला नृत्य महोत्सवसुद्धा याच पाच दिवसात भरवला जातो. नृत्य महोत्सव आणि त्याच्याच बरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा याकाळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य महोत्सव बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिवलसुद्धा बघता येतो. दुपारपासून वाळूशिल्पे करण्याचे काम सुरु होते आणि ते जवळजवळ सूर्यास्तापर्यंत पूर्ण होते. या कलाकारांची कला मनसोक्त अनुभवून आपण तिथेच २ कि. मी. वर असलेल्या डान्स फेस्टिवलला जाऊ शकतो, नव्हे जायचेच असते. हे दोन्ही उत्सव हाच तर ओडीशाच्या कलेचा मोठा खजिना आहे. नृत्य महोत्सव हा संध्याकाळी ६ वाजता सुरु होतो. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव केला जातो. मोठ्या हिरवळीवर रंगमंच उभारलेला असतो आणि त्याच्यासमोर स्टेडीयम सारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. देशभरातून कलाकार या उत्सवात आपली नृत्यकला सदर करण्यासाठी येत असतात. शिवाय खास ओडिसी नृत्याचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच. या कार्यक्रमासाठी तिकीट आहे. ही तिकिटे अनेक हॉटेल्समध्येही मिळतात नाहीतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतातच. संपूर्ण अंधार आणि दिव्यांच्या रचनेमुळे उजळत जाणारे सूर्यमंदिर आणि त्याच्यासमोर होत असलेला हा नृत्य महोत्सव पाहून डोळ्याचे पारणे फिटते. ड्रोनद्वारे त्याचे होणारे चित्रीकरण आणि बाजूलाच असलेल्या दोन मोठ्या पडद्यावर दिसणारे त्याचे चित्रण फारच देखणे असते.
सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू भारताच्या विविध प्रांतात आता प्रसिद्ध होऊ लागली आहे. दरवर्षी इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग असतो. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशातील कलाकार सुद्धा इथे हजेरी लावतात आणि आपली वाळूशिल्प कला सादर करतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील काही कलाकार सुद्धा इथे आपली वाळूशिल्प कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. आपल्याकडे कोकण पर्यटनात वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्र किनाऱ्यावरसुद्धा वाळूशिल्पे साकारली जाऊ शकतात. मात्र आपल्याकडे सर्वथरात असलेली कमालीची उदासीनता याच्या मुळावर आलेली दिसते. ओडिशा सारखे छोटेसे राज्य आपल्याकडे असलेल्या वारशाचे इतके सुंदर मार्केटिंग करत असताना आपले राज्य मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते.
समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचा खेळ असतो. केव्हा ना केव्हा आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही. पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओडिशा इथे या सँड आर्ट फेस्टिवल मध्ये बघायला मिळते. वाळूशिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओडिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. इतका सुंदर महोत्सव आपल्या महाराष्ट्रातही व्हायला हवा जेणेकरून आपल्या कलाकारांना आणि पर्यटकांनासुद्धा ह्या सुंदर पर्वणीचा लाभ घेता येईल.
कोणार्कच्या चंद्रभागा बीचवर एका सलग रांगेत उभी असलेली ही वाळूशिल्पे पाहताना तिथून पाय हलत नाहीत. प्रत्येक वाळूशिल्पावर रंगीत छत्रीचे आच्छादन असते. समोर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, त्यावर डोलणाऱ्या नौका आणि त्या पार्श्वभूमीवर इथे वाळूत साकारलेली हे अत्यंत देखणी वाळूशिल्पे. सगळा परिसर कलेच्या या अलौकिक आविष्काराने भारावलेला असतो. निसर्गाने आधीच नटलेल्या ओडिशाचे सौन्दर्य, या उत्सवांमुळे आणि तो पाहायला आलेल्या पर्यटकांमुळे अजूनच खुलून दिसते.
आशुतोष बापट
ओडीशाची स्वयंपाक पध्दती –
तांदूळ हे ओडिशाचे मुख्य पीक आहे सहाजिकच भात हे मुख्य अन्न आहे . भात, भाज्या, खिचडी, आलू पालक साग असे काही शाकाहारी पदार्थ आहेत. ओडिशाच्या ठराविक पदार्थांमध्ये ‘सागा’, ‘भाजी’, ‘भात’, ‘डाळ’, ‘बेसरा’ किंवा ‘महुरा’ (मसालेदार करी), मासे आणि चटणी किंवा ‘आंबट’ यांचा समावेश होतो.ओडिशातील लोक नारळ, मनुका, सुका मेवा आणि मसाल्यांनी शिजवलेल्या चणा डाळीचा आस्वाद घेतात. ‘दलमा’, ‘पखल’, ‘मिठा भात’ आणि ‘पुलाओ’ हे तांदळाचे काही विशेष पदार्थ आहेत.
ओरिसाचे पारंपारिक जेवण मसालेदार आहे आणि त्यात तांदूळ, भाज्या, डाळी, चटण्या आणि लोणचे यांचा समावेश आहे. महाप्रसाद, देवांचे अन्न, फक्त मंदिरांमध्ये शिजवले जाते आणि हा प्रसाद चुलीच्या आगीवर मातीच्या भांड्यात शिजवले जाते. वाफवलेल्या अन्नात तांदूळ, डाळ, भाज्या, करी आणि गोड पदार्थांचा समावेश आहे.
ओरिसा हे प्रामुख्याने दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांसाठी ओळखली जाते .रसगुल्ला, रस्मालाई ,चेनापोडा ,खीरामोहन, राजाभोग,रबडी, रसबली आणि पीठा हे काही ठराविक गोड पदार्थ आहेत.
गहू, इतर धान्ये आणि भाज्यांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जरी तांदूळ जवळजवळ सर्व शाकाहारी पदार्थांमध्ये वापरला जात असला तरी, वेगवेगळ्या मसाल्यांच्या वापरामुळे जीरा पाकळा, भेंडी भाजा, आलू पाक साग आणि कडली या पदार्थांना वेगवेगळी चव येते.ओडिशातील लोकांमध्ये आणखी एक प्रसिद्ध अन्न म्हणजे ‘बेसारा’ जो मिश्र भाज्यांनी शिजवला जातो. ‘चेनकेडा’, ‘चिंगरी मलाई’, ‘दही बैंगण’, ‘दही माचा’, ‘घुगनी’ हे इतर स्वादिष्ट पदार्थ आहेत.
पारंपारिक ‘दालमा’, बटाटे, वांगी आणि पालक यांसारख्या भाज्यांसह शिजवलेली मसूर, स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. सांतुला (ओडिया शैलीतील मिश्र भाज्या), मूग डाळमा, शेग भाजा (तळलेला पालक), दही वांगी (दह्यासह शिजवलेले वांगी), चिंगुडी तरकारी, (कोळंबीची करी) हे इतर पारंपारिक पदार्थ आहेत. मोठा चुरा खजूर, गोड आणि आंबट टोमॅटो सॉससोबत खजूर खातो.
ओडीशाच्या विस्तीर्ण किनारपट्टीमुळे, मोठ्या संख्येने लोक मासे आणि समुद्री खाद्यपदार्थांचे सेवन करतात. सर्वात लोकप्रिय आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ म्हणजे कोळंबी, मासे, खेकडे. याशिवाय विशेष डिशमध्ये माखी करी, प्रॉन मलाई करी, केबडा कालिया आणि चिली फिश यांचा समावेश आहे. ‘चणेवेडा’ हा आणखी एक स्वादिष्ट पदार्थ आहे.
ओडिशाचे पाच खास गोड पदार्थ -
ओडिशाची अन्नसंस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. इथले पदार्थ कमी तेलकट आणि पचायला सोपे असतात. पुरीमध्ये जगन्नाथ देवाला नैवेद्य म्हणून दाखवल्या जाणाऱ्या ५६ पदार्थांतून ओडिशाच्या खाद्यपदार्थांतील वैविध्य दिसून येते. त्यात मुख्य पदार्थांशिवाय असलेल्या पाच प्रसिद्ध गोड पदार्थांची माहिती पुढे दिली आहे.
रसगुल्ला
हा पारंपरिक गोड पदार्थ असून रथयात्रेदरम्यान लक्ष्मी देवीला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट रसगुल्ला चाखायचा असेल, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचवर भुवनेश्वर आणि कटकदरम्यान असलेल्या पहाळा या गावाला भेट द्या. या पदार्थाच्या लोकप्रियतेमुळे ३० जुलै हा दिवस रसगुल्ला दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
छेन पोडा
चेन पोडा हा पदार्थ चीज, साखर, काजू, वेलची, बेदाणे साल नावाच्या झाडाच्या पानात ठेवून कोळशाच्या शेगडीत भाजून तयार केला जातो. २० व्या शतकाच्या सुरुवातीला ओडिशातील नयनगढ जिल्ह्यात हा पदार्थ पहिल्यांदा बनवला गेला असं सांगतात. दुर्गा पुजेदरम्यान या पदार्थाला जास्त मागणी असते.
छेन गज
ओडिशातील अतिशय प्रसिद्ध असा हा पदार्थ चीज, साखर आणि शेवयांपासून बनवला जातो. त्यासाठी सर्व घटक व्यवस्थित मिसळून आयताकृती भांड्यात मोल्ड केले जातात व साखरेच्या पाकाचे आवरण त्याला दिले जाते. गजचे दोन प्रकार आहेत, कोरडा व उकळलेला गज आणि तळलेला, पाकातला गज.
छेना झिली
हा खास गोड पदार्थ तळलेले चीज, वेलची पूड, तूप आणि साखरेच्या पाकापासून बनवला जातो. छेना झिली हा तळलेले पनीर साखरेच्या पाकात बुडवून तयार केला जाणारा पदार्थ आहे. पुरी जिल्ह्यातील निम्पाडा गाव छएन झिलीसाठी प्रसिद्ध आहे. पुरी ते भुवनेश्वर मार्गावर निम्पाडामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी दुकानांमध्ये छेना झिली विकली जाते.
रसबली
रसबली हा मूळचा केंद्रपाडाचा पदार्थ आहे. हा पदार्थ तळलेला, सपाट, लालसर रंगाची पॅटी यात घट्ट, गोड दुधात बुडवून तयार केलेला असतो. हा पदार्थ इतका मुलायम असतो, की तोंडात घातल्याक्षणी विरघलतो. केंद्रापाडा येथील बैसनभिपांडा दुकानात सर्वोत्कृष्ट रसबळी खायला मिळते.
ओडिशातील गोड पदार्थांची सर्वोत्तम दुकाने
- पहाळा स्वीट स्टॉल (भुवनेश्वरमधील बिजू पटनाईक विमानतळापासून १४ किलोमीटर)
- निम्पाडा स्वीट स्टॉल (भुवनेश्वरपासून ४० किलोमीटर अंतरावर)
- बिकालानंदाकारा शॉप (सहीद नगर, भुवनेश्वर)
- दमामहाराज शॉप (नयापाली, भुवनेश्वर आणि लिंक रोड, कटक)
- भगन साहू शॉप (कनिका चौक, कटक)
No comments:
Post a Comment