कशीबशी केलेली बुकिंग
माझी पहिली नोकरी होती मुंबईला "ओरॅकल फिनान्शियल सर्विसेस" येथे. तिथे माझ्यासोबत कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या आणखी काहीजणांनी एकाच दिवशी कंपनीत आणि करियरमध्ये प्रवेश केला. पुढचे २-३ महिने आमचं सोबत प्रशिक्षण झालं. अगदी पद्धतशीर वर्गात बसुन, कॉलेजसारखंच (वातावरणाच्या बाबतीत) पण दर्जा खूप चांगला. त्यानंतर १-२ वर्ष आमचे प्रोजेक्टसुद्धा सारखेच होते. आम्ही एकाच मोठ्या टीममध्ये होतो. त्यामुळे आमची सर्वांची एकमेकांशी मस्त गट्टी जमली.
या ग्रुपचं नाव पडलं "डस्सुझ". थोडक्यात कारण यातले सगळे आपापल्या पद्धतीने दुसऱ्यांना डसत राहतात. :D म्हणजेच चिडवणे, जोक किंवा टोमणे मारणे, अतिशय पांचट जोक करत राहणे, मनाला वाटेल तसे वागणे.
यातल्या सगळ्यांनाच फिरायची, चित्रपटांची, संगीताची, मस्ती करायची, पार्टी करायची आवड आहे. आम्ही सगळे सोबत बरेच चित्रपट पाहतो. संगीताच्या कार्यक्रमांना जातो. खरेदी करायला जातो. किल्ल्यांवर ट्रेक करायला जातो. रात्र जागवायला जातो. आसपास फिरायला जातो.
यात आमचे इतर मित्रसुद्धा कधी सोबत येतात, आणि सगळेच या ग्रुपमध्ये पटकन मिसळून जातात.
आमची एक पारंपारिक वार्षिक सहलसुद्धा असते. अलिबागला. वर्षातला एक मोठा विकेंड ठरलेला. तेव्हा सगळेजण अलिबागला जाऊन मासे खाणे, समुद्रात खेळणे, रात्री खातपीत खिदळत टाईम पास करणे, एवढाच उद्योग दर वर्षी करतो. जागेत काही बदल नाही. खाण्यात (कोकणात असल्यामुळे) विशेष बदल नाही. तरी इथे जाऊन निवांत वेळ घालवणे सगळ्यांना आवडते. सगळ्यांची बॅटरी रिचार्ज होते. (याबद्दल सविस्तर इथे वाचा.)
नंतर बऱ्याच जणांनी कंपनी/शहर बदलले तरी आमच्या ह्या गोष्टी चालूच राहिल्या. गेल्या काही वर्षात आम्ही जवळपास आणि छोट्या मोठ्या बऱ्याच ट्रीप केल्या असल्या, आणि काही ट्रेक केले असले तरी सुट्टी, वेळ अशा कारणांमुळे २-३ दिवसांपेक्षा जास्त, आणि सिल्वासापेक्षा दूरची ट्रीप झाली नव्हती.
अरूपचे रुममेट (अमेय आणि काही मित्र) वॅली ऑफ फ्लॉवर्सला जाण्याचा बेत आखत होते. उत्तराखंडमध्ये गोविंदघाटजवळ वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. तिथे दर वर्षी नैसर्गिकरित्या मोठ्या परिसरात कित्येक जातीची रंगबिरंगी फुले येतात. हे अक्खे खोरे फुलांनी आणि रंगांनी बहरून उठते. नैसर्गिकरित्या हे विशेष. हि जागा जागतिक वारसा म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे येथे वाहने नेता येत नाहीत. पायीच जावे लागते.
तर या वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये कैक किलोमीटर्सचा ट्रेक, सोबत जवळच असलेले आणि सर्वात उंच ठिकाणी असलेले हेमकुंड साहिब गुरुद्वारा, जाता येता हरिद्वार, बद्रीनाथ वगैरे असा हा बेत होता. यात ट्रेक म्हणजेच चालणे आणि चढणे पुष्कळ होते. हा जगातला एक प्रसिद्ध ट्रेक आहे.
त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. एका कंपनीकडून (ब्लु पॉपीज) त्यांनी सविस्तर प्लानसुद्धा मिळवला. अरूपने तो आम्हाला पाठवला.
आमच्या ह्या वर्षीच्या अलिबागच्या ट्रीपमध्ये रात्री एक वाजता ह्यावर अगदी जोरदार आणि जोशिली चर्चा झाली. आणि सगळ्यांनी जाण्याची तयारी दाखवली. इतका प्रतिसाद जरा अनपेक्षित होता. अवघड ट्रेक, आणि आठवडाभर सुट्या, ह्यामुळे कमी लोक तयार होतील असं वाटत होतं.
या प्लानसाठी जितके जास्त लोक असतील तितके सवलत मिळवायला म्हणुन, आणि सोबत मजा करायला म्हणून चांगले. त्यामुळे अरूपने तो आम्हाला, बाकी मित्रांना, आणि आम्ही आमच्या मित्रांना असा सगळीकडे पसरवला.
पण बाकी ठिकाणाहुन म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला सगळ्यांनी हो हो केलं. आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. त्यावर सगळी प्लानिंग सुरु केली. हळूहळू काही लोक मागे हटले. नंतर ज्यांनी हा प्लान सुरु केला, तेच टंगळमंगळ करायला लागले. शेवटी फक्त आम्ही म्हणजे डस्सुझ तेवढे उरलो.
आम्ही बाकी कंपनी आणि ट्रेक कंपन्या यांच्याशी बोलून पण तुलना करत होतो. अजून स्वस्त आणि चांगली डील मिळते का बघत होतो. पण काही जणांना खूप आधीपासून सुट्या घ्याव्या लागतात त्यामुळे, आणि वॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये जास्तीत जास्त फुले पाहण्यासाठी जुलैचाच महिना चांगला असे कळले असल्यामुळे आम्ही तारखा आधीपासुन जुलैच्याच ठेवल्या होत्या.
आम्ही केलेल्या तुलनेत आम्हाला आमच्यासाठी ब्लु पॉपीज हाच पर्याय योग्य वाटला, आणि आम्ही तो ठरवून टाकला. आता राहिली प्रवासाची तिकिटे.
ह्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनुजा (सर्वात जास्त) आणि मी लवकर तिकिटे बुक करा म्हणून आग्रही होतो. हवेत सगळेच गप्पा मारतात पण तिकिटे बुक करणे म्हणजे एक कमीटमेंट आहे. ते केलं कि त्यात एक खात्री येते. म्हणून आमचा हा आग्रह होता. पण काही न काही कारणामुळे ते पुढे पुढे ढकलल्या जात होतं.
विमानाच्या काही स्वस्तातल्या ऑफर्स डोळ्यासमोर येउन चालल्या होत्या. बुकिंग होत नव्हती म्हणून आमची थोडी चिडचिड चालू होती. आम्ही मग काही दिवस नाद सोडून दिला.
मग आहेत ते लोक बुकिंग करून घेऊ असे म्हणत म्हणतसुद्धा काही दिवस गेले.
असे करता करता मला काही अडचणी आल्या. त्याच महिन्यात माझा अमेरिकेसाठी विसा इंटरव्ह्यू, आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे माझे जाणे डळमळीत झाले. अनुजाने निर्वाणीची धमकी दिली, कि आता बुकिंग केले नाही तर मी येणार नाही.
मग आधी मुंबईहून जाणाऱ्यांनी बुकिंग केली. काही दिवसातच मग अनुजा आणि अरूप यांनी पुण्याहुन जाण्याची तिकिटे बुक केली.
सगळ्यांची तिकिटे काढून झाली आणि माझे काही ठरेना. पण शेवटी माझा विसा इंटरव्ह्यू ट्रीपच्या आधीच ठरला, आणि अमेरिकेला जाणे काही दिवस पुढे ढकलले गेले. माझा ट्रीपला जाण्याचा मार्ग आपोआप मोकळा झाला. मी हा दैवी आदेश मानुन माझी तिकिटे बुक केली.
पण मला उशीर झाला होता, विमानाची तिकिटे प्रचंड महाग झाली होती. मी नाईलाजाने पुणे-दिल्ली-हरिद्वार-दिल्ली- पुणे अशी ट्रेनचीच तिकिटे बुक केली. जाताना पुणे-दिल्लीला जाताना एसी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. पण परत येताना मात्र स्लीपर कन्फर्म, आणि एसी तोपर्यंत पुढे सरकेल अशा वेटिंगमध्ये होते, म्हणून दोन्ही काढून ठेवली.
पण दुर्दैव म्हणजे एक आठवडा आधीच मला दिल्लीला जाणारी ट्रेन रद्द झाल्याचा मेसेज आला. का रद्द झाली, कशामुळे काही कळले नाही. त्या दिवशी काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन रद्द होणे वेगळे, पण हे आधीच रद्द म्हणून सांगणे काय प्रकार होता काही कळला नाही.
आता अगदीच ट्रेन रद्द झाली म्हणुन रडावे कि, अगदी शेवटच्या क्षणाला फजिती होण्यापेक्षा एक आठवडा वेळ मिळाला म्हणून हसावे काही कळेना. आता दुसरी कुठली ट्रेन मिळणे शक्य नव्हते, आणि विमानाने जाणे भाग होते. विमान मी ट्रेन तिकीट बुक केले तेव्हापेक्षाही महाग वाटत होते. पुणे दिल्लीचे विमान तर वारंवारता कमी असल्यामुळे मुंबई दिल्लीपेक्षा एरवीदेखील महाग असते, ते आता एकच आठवडा शिल्लक असताना विचारायलाच नको. मुंबई दिल्ली त्यामानाने बरेच स्वस्त वाटले म्हणुन तेच बुक केले.
ट्रीपसाठीचा तयारीतला सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे तिकिटे काढणे, हॉटेल बुकिंग करणे अशा प्रकारे कसाबसा पार पडला.
(क्रमशः)
बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे माझी पुणे दिल्ली ट्रेन रद्द झाली आणि मला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट काढणे भाग पडले. त्यामुळे माझ्या प्रवासाची सुरुवात पुणे ते मुंबई ट्रेनने झाली. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होते. ट्रेन जेव्हा लोणावळ्या खंडाळ्याजवळुन जात होती, तेव्हा खूपच छान दृश्य दिसत होते.
हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे.
मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो.
आधीच अंधार पडलेला होता. इथपर्यंतचा प्रवास आम्ही आमचा केला होता. इथून पुढे ट्रीपचे पॅकेज सुरु होणार होते. हरिद्वारपासून पुढे सगळी हॉटेल्सची बुकिंग, हरिद्वार ते गोविंद घाट आणि परत अशी खाजगी गाडी, हे सगळे त्यात होते.
हरिद्वार पुढे एटीएम सहजासहजी मिळणार नाही त्यामुळे लागेल तितकी रक्कम आधीच काढून घ्या अशी सूचना त्यांनी दिलेलीच होती. त्यामुळे स्टेशन बाहेर पडलो कि आवारातच आम्ही सगळ्यांनी रांगा लावुन पैसे काढले.
ऑपरेटरला आम्ही फक्त आगाऊ रक्कम दिलेली होती, बाकी सगळी आम्ही गोविंदघाटला पोचल्यावरच देणार होतो. ती रक्कम अधिक आम्हाला खर्चासाठी लागणारी अशी प्रत्येकाची वैयक्तिक रक्कम बरीच होती. त्यामुळे दहाजण दोन एटीएमवर तुटून पडले तेव्हा आमच्या मागे रांगेत असणारे पोचेपर्यंत तर जाऊच दे, आमच्यातच जे शेवटी होते त्यांचा नंबर लागेपर्यंत काही रक्कम शिल्लक राहते का अशी गमतीशीर भीती वाटत होती.
सगळ्यांचे पैसे काढून झाल्यावर दोन रिक्षा ठरवून आम्ही हॉटेलला गेलो. अंधार पडलेला होता, आधी सगळ्यांची हरिद्वारमध्ये फिरण्याची इच्छा होती, पण आता थकव्यामुळे, उशीर झाल्यामुळे, भूक लागल्यामुळे आम्ही ते रद्द केले. रिक्षातून जाताना दिसेल तशी गंगा, घाट, मंदिरे, दिवे सगळे पाहत जात होतो.
हॉटेलला पोचून जेवण केले, आणि काही वेळात झोपलो. उद्या सकाळी लवकर उठून जायचे होते.
हरिद्वार ते गोविंद घाट हा जवळपास ८-१० तासांचा (३०० किमी) प्रवास आहे. वाटेत ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग अशी ठिकाणे आहेत. तिथे थांबत थांबत जायचे, त्यात चहा, जेवण असे आवश्यक थांबे आलेच. आणि दरड कोसळली तर प्रवास आणखी लांबतो. हे सर्व पकडून जितके लवकर निघाल तितके चांगले.
पहिल्या दिवशीपासूनच रोज सकाळी सर्वांना उठवण्याची जबाबदारी स्नेहाने घेतली होती. ती स्वतः उठून सगळ्यांच्या रूमचे दरवाजे वाजवून जागे करायची. आणि असे करूनसुद्धा आवरायला तिलाच वेळ लागायचा. ती आणि हरप्रीत हे आमच्याकडचे तयार व्हायला सर्वात जास्त वेळ घेणारे सदस्य.
आम्ही तयार झालो, तरी ड्रायवरने येउन शांतपणे सामान लावत, गाडी साफसुफ करत निघायला बराच वेळ घेतला. १० जण असल्यामुळे आम्हाला टेम्पो मिळाली होती. ड्रायवरचं नाव मनोज. अगदी लहानसर चणीचा. एवढा छोटा दिसणारा माणुस एवढी मोठी गाडी चालवताना पाहुन आश्चर्य वाटेल. पण तो इतकी वेगाने आणि भन्नाट गाडी चालवत होता कि बस.
तिकडचे रस्ते आपल्यापेक्षा बरेच वेगळे आहेत. उंच डोंगरातले घाट, निमुळते रस्ते, तीव्र उतार आणि चढण, तितकेच तीव्र वळण. जिथे आपण एक गाडी चालवायला पुढे मागे पाहू, तिथे हे लोक बिनधास्त दोन्ही बाजूने गाड्या पळवतात. शैलीदार कट मारतात. ते कशी गाडी चालवत आहेत ह्याकडे लक्ष दिले कि आपलेच ठोके वाढतात. मधून मधून "भैय्या आरामसे" म्हणत आपल्यालाच आरामसे घेत दुर्लक्ष करावे लागते.
हरिद्वारहून निघालो आणि ऋषिकेश जवळ कुठेतरी एका कार्यालयासमोर गाडी थांबली आणि ड्रायवर उतरून काही वेळ गायब झाला. मग आम्ही उतरून बघत होतो कि का थांबवली.
एकमेकांना विचारत होतो कि "क्यू रोका है यार?"
एक म्हातारे दाढी वाढवलेले साधु लुक असलेले बुवा आले, आणि कार्यालयाकडे बोट दाखवून म्हणाले "वहा आपका 'पंजीकरण(?)' किया जाता है".
आम्ही बघायला गेलो कसलं पंजीकरण. उत्तराखंड पोलिस आणि सरकार, तिथे तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या सर्व प्रवाशांची माहिती गोळा करते. नाव, पत्ते, फोन नंबर, घरचे नंबर आणि कुठल्या ठिकाणी प्रवासाला जाणार अशी सगळी महत्वाची माहिती. उत्तराखंडमध्ये दरड कोसळणे, हवामान खराब होणे, पूर येणे असे प्रकार होत राहतात. त्यामुळे कुठल्या ठिकाणी साधारण किती प्रवासी आहेत याचा अंदाज येतो.
प्रत्येक प्रवाशाला एक कार्ड मिळतं. काही अनुचित प्रकार घडला, तर ओळख पटवायला याचा उपयोग होऊ शकतो.
तिथेच बाहेर एका फलकावर तिथल्या प्रमुख तीर्थस्थळांच्या वातावरणाची माहिती लावली होती.
आम्हाला याचं कौतुक वाटलं. आणि आणखी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आम्ही तिकडे असेपर्यंत आम्हाला उत्तराखंड पोलिसकडून कुठल्या रस्त्यांवर दरड कोसळली आहे, कुठे काम चालू आहे, कुठे रस्ता बंद आहे याचे मेसेज येत होते. परत येताना त्याचा फायदा झाला.
ते करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. एका ठिकाणी थांबून नाश्ता झाला. तिथे निखिलने (आमच्या बहुभाषिक बहुप्रांतीय मंडळातला तेलगु प्रतिनिधी) मेन्युकार्ड न बघता वडा सांबर घेणार म्हणुन सांगितलं. आम्ही इथे कसे मिळेल म्हणुन हसत होतो. तो एकदम विश्वासाने म्हणाला कि आता सगळीकडे मिळतं. पण मेन्युकार्ड आल्यावर त्याचा पोपट झाला. या गोष्टीवरून त्याची पूर्ण ट्रीपमध्ये आम्ही उडवली. "अरे इसको वडा सांबर दो", जो त्याला परतीच्या मार्गावर लागेपर्यंत कुठेही मिळाला नाही.
जाताना देवप्रयागचा संगम लागला. पाहायला अगदी छान. दोन नद्यांचा वेगळ्या रंगाचा प्रवाह एक होताना दिसतो. तिथे काही वेळ थांबून फोटो काढले आणि निघालो.
तिथून निघालो आणि मग पुढे घाटात आम्ही अडकलो. बरंच पुढे कुठे तरी दरड कोसळली होती, ती काढण्याचं काम चालु होतं आणि गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली होती. आम्हाला पुढे फक्त गाड्या दिसत होत्या. काम काही दिसत नव्हतं आणि किती दूर आहे, किती वेळ लागेल काही अंदाज येत नव्हता.
सगळ्या ड्रायवर लोकांनी गाड्या बाजूला लावल्या. बहुतेक सगळे एकमेकांना ओळखत होतेच आणि अशा ठिकाणी नव्या ओळखीपण होतात. त्यांनी आपला गप्पांचा अड्डा जमवला. आम्ही एका हॉटेलच्या अंगणात फतकल मारली, आणि आमचा अड्डा जमवला.
काही तास तरी लागतील असा नूर दिसत होता. तिथेच दुपारचं जेवण करावं का असा विचार केला. पण नुकताच नाश्ता झाला असल्यामुळे कोणालाही भूक नव्हती. तसाच टाईमपास चालु होता. वेळ लागायला लागला तसा आम्ही गमतीने या हॉटेलमधेच रूम घ्यावी कि काय असाही विचार करायला लागलो.
आमच्याच कंपनीकडे बुकिंग केलेल्या आणखी दोन तीन गाड्या म्हणजेच आणखी ग्रुप होते. त्यातले एक मराठीच होते. त्यांनी खरोखर रूम घेऊन टाकली आणि आत जाऊन बसले. आम्ही नुसता विचारच करत होतो.
हरप्रीत आणि अंगद तिथे बसण्याचा कंटाळा आला म्हणून "बघू तरी पुढे काय झालंय नेमकं" म्हणत चालत पुढे निघाले. आणि चालत चालत ते जवळपास ६-७ किमी पुढे गेले होते. असं ते म्हणत होते. आम्हाला खरं वाटत नव्हतं. कारण हरप्रीत आदल्या दिवशी पोटदुखीमुळे एकदम परेशान होता. पण शक्यता नाकारतासुद्धा येत नव्हती. दोघं पंजाबी, अति उत्साही.
त्यांचा काही वेळात फोन आला, कि इथलं काम झालंय, गाड्या निघतायत. ड्रायवरला सांगून पटकन निघा. आम्ही ताबडतोब उठून ड्रायवरला शोधलं, माहिती सांगितली, आणि निघायला सांगितलं. पण तो तयार होत नव्हता. तो म्हणाला दोन्हीकडून गाड्या येऊ जाऊ देत. अशी रांगेबाहेर गाडी काढणं बरोबर नाही. पोलिस पकडतात, आणि ड्रायवरच फसतो.
हळूहळू गाड्या सरकायला लागल्या. तिकडून हरप्रीत अंगदचे फोन वर फोन येत होते, आणि इकडे हा निघायला तयार नव्हता. तो म्हणाला कि लाईन सोडायला नाही पाहिजे, अजून प्रॉब्लेम होतो. "ये पहाडी इलाका है साबजी. यहा का तरीका अलग होता है."
काही वेळाने आमच्या समोरच्या गाड्या हलल्या तेव्हा कुठे आम्ही निघालो. रांग अगदी काही फुट पुढेपुढे सरकत होती. काही छोट्या गाड्या, जीप वगैरे रांगेबाहेर जाउन पुढे जात होते. काही वेळाने आम्ही थोडं पुढे पोचलो, तेव्हा अशा गाड्यांमुळे खरच अडथळे झाले होते, मग त्या गाड्या पुन्हा मागे येउन रांगेत घुसत होत्या.
सगळे लोक त्यांच्यावर चिडले होते, तुमच्यामुळे अर्धा एक घंटा अजून वाढला म्हणून लाखोली वाहत होते. आम्हीसुद्धा त्यांच्या नावाने शंख करत होतो. ड्रायवर म्हणाला ते खरंच होतं. सगळे शांतपणे रांगेत राहिले तर परिस्थिती लवकर हाताळता येते. उतावळेपणामुळे समस्या वाढते. ड्रायवरने आम्हाला सुनावलंच मग, "देखा साबजी, आपकी सुनके गाडी आगे ले लेता तो यु हि बीच मी फस कर सबकी गाली खा रहा होता."
आम्ही खाली उतरून फोटोबिटो काढले, असाच टाईमपास केला. एक एक करत बाकी लोकांनापण गाडीत बसून राहायचा कंटाळा आला आणि पायीपायी पुढे निघाले.
वेळ चालला होता, आणि आम्ही आज गोविंदघाटला पोचतो कि नाही अशी शंका येत होती. कारण तिकडे रात्री रस्ते बंद करतात. आम्ही रस्ते बंद होण्याआधी त्या मार्गावर लागणे आवश्यक होतं.
जिथे काम चालू होते ती जागा आली आणि एकदाचे आम्ही त्या जाममधून बाहेर निघालो. तो भागच तसा होता. तिथे नेहमी अशा घटना होत राहतात. चालत निघालेले सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर भेटले. सर्वात शेवटी हरप्रीत आणि अंगद. सगळ्यांना गाडीत घेऊन निघलो.
काही अंतरावरच एका हॉटेलमध्ये थांबलो. पण तिथे सगळ्या आत्ता जाममधून सुटलेल्या गाड्या थांबल्या होत्या. लवकर काही खायला मिळण्याची चिन्हे नव्हती. आम्ही तिथे जेवण्याचा विचार सोडला आणि पुढे काहीतरी खाऊ असा विचार केला.
बराच उशीर झालेला असल्यामुळे रुद्रप्रयागचा संगमसुद्धा न पाहता सोडला. एका ठिकाणी फक्त थोडी फळे वगैरे सामान गाडीतच खायला म्हणून घेतली. कुठे थांबून जेवायला वेळ नव्हता.
गोविंदघाटच्या थोडं अलीकडे असलेल्या जोशीमठला पोचलो तेव्हा अंधार पडून गेला होता. तिथे आमच्या टूर कंपनीचे ३ गाईड आमच्या गाडीत चढले. आता पुढे जाता येईल कि नाही यावर त्यांची चर्चा चालू होती. शेवटी प्रयत्न करायचे ठरले.
रस्त्यात पोलिसांनी अडवून दटावलेच, कि अंधार पडलाय, आता रस्ता बंद. पण थोडी विनंती केली, आमची गोविंदघाटमध्ये बुकिंग आहे, यावेळी जोशीमठला राहायची गैरसोय होईल, दरड कोसळली वगैरे सगळ्या गोष्टी सांगून जाऊ देण्याची विनंती केली. त्यांनी शेवटी आमचं ऐकलं.
इथून पुढे जाता जाता सगळ्यांचे मोबाईल कवरेज गेले. हेही अपेक्षित होते. तिकडे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालतात असे आम्हाला सांगितलेच होते. त्यामुळे दोघातिघांनी ते सीम आणले होते.
थोड्यावेळात गोविंदघाटला हॉटेलवर जाउन पोहोचलो. आमचे टूर मॅनेजर देवकांत संगवान यांनी आमच्या ड्रायवरची पाठ थोपटली. "लडके तू विनर है. फर्स्ट आया है आज. हरिद्वारसे निकले हुए सब अभी तक जोशीमठभी नही पहुचे. अब उनको तो वही रुकना पडेगा. बस तू यहा तक आ गया आज."
आम्हीपण आमच्याकडून थोडी बक्षिसी त्याला दिली. वर जाऊन फ्रेश झालो. देवकांतशी दुसऱ्या दिवशीच्या प्लानवर चर्चा केली. पैसे देऊन आमचे (मानसिक) ओझे हलके केले. आणि गरमागरम जेवणावर ताव मारून झोपलो. दुसऱ्या दिवशीपासून ट्रेक चालु.
ट्रेकची सुरुवात, घांगरीयापर्यंत
गोविंदघाटातून पदयात्रा सुरु करण्याचा दिवस उगवला. स्नेहाने सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी पार पडली.
रात्री तिथे पोचल्यापासून आम्हाला पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता. तिथे नदी होती हे तर माहीतच होतं. पण ती नदी आमच्या अगदी समोर होती हा साक्षात्कार आम्हाला पहाटे जरा उजाडल्यावर झाला. कारण आम्ही आलो तेव्हा मिट्ट काळोख होता.
आमचं हॉटेल छोट्या घाटाच्या कडेला होतं. आणि त्याच्यामागे खाली नदी वाहत होती. त्यामुळे तिथल्या रूमची दारे नदीच्याच बाजूने केली होती. नदीचा सुंदर व्ह्यू होता.
आम्ही आवरून भरपेट नाष्टा केला. आमच्याच कंपनीतर्फे अजून दोन ग्रुप चालले होते ते आम्हाला भेटले. एक ग्रुप म्हणजे फक्त एक आजी आजोबांची जोडी. दोघं हि उत्साही आणि काटक. त्यांच्या वयात ते अशा प्रकारच्या ट्रीपला आलेले पाहून आम्हाला कौतुक वाटलं. दुसरा ग्रुप म्हणजे एक खूप मोठं कुटुंब होतं.
ते आजी आजोबा आणि या ग्रुपमधले आजी आजोबा दोघं मस्त मुडमध्ये होते. ब्रेकफास्ट टेबलवर आमच्या आणि त्यांच्या थोड्या गप्पासुद्धा झाल्या.
घांगरीया हे वॅली आणि हेमकुंड या दोन ठिकाणांच्या पायथ्याशी असलेले गाव. गोविंदघाट त्याहुन खाली. आम्हाला वॅली आणि हेमकुंड अशा दोन्ही ठिकाणी जाऊन यायचं होतं. त्यासाठी मुक्काम घांगरीयालाच करावा लागतो. त्यामुळे तिथल्या ३ दिवसासाठीचं (४ रात्री) सामान वेगळं काढा अशी व्यवस्थापकांची सूचना होती. ते सामान खेचरावर लादून वर नेता येईल, आणि अनावश्यक सामान गोविंदघाटमधेच राहील अशी व्यवस्था होती.
ते वेगळं करून सगळ्यांचं सामान एकत्र करण्यात, सगळ्यांनी आवरून खाली येण्यात, आणि नाश्ता करण्यात असा प्रत्येकात थोडा थोडा वेळ गेला. आणि आम्हाला ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला. आमचे व्यवस्थापक म्हणाले "कल आप फर्स्ट थे आज आप लास्ट हो".
आमचं हॉटेल गोविंदघाटच्या एका टोकाला आणि घांगरीयाचा रस्ता दुसऱ्या टोकाला होता. जिथपर्यंत गाड्या जातात अशा २-३ किमी अंतरापर्यंत आमचं सर्व सामान आणि आम्हाला न्यायला त्यांनी गाड्या दिल्या. त्या ठिकाणापासूनच सामान लादण्यासाठी खेचर/घोडे घेऊन माणसं उभे असतात. आम्ही २ खेचर ठरवले. एका खेचराचे ८०० रु. होतात.
तिथे सगळ्यांसाठी काठ्या विकत घेतात. एरवी चालण्यासाठी फक्त वयोवृद्ध लोक काठ्या वापरतात. पण ट्रेकला जाताना मात्र बरेच लोक काठ्या वापरतात. कारण त्याचा खूप फायदा होतो. चढताना किंवा उतरताना आपला थोडा भार त्यावर टाकून, किंवा फक्त आधाराला म्हणून, आणि कधी फोटो काढताना पोज द्यायला म्हणून.
भारीतली घ्यायची म्हटली तर थोडी लोखंडी, वेगळी मुठ, खाली टोकदार अशासुद्धा स्टिक्स मिळतात. एरवी आपल्या जवळपासच्या किल्ल्यावाल्या ट्रेकला आम्ही जातो तेव्हा ज्याला काठी घेऊन फिरायला आवडतं ते तिथल्या तिथे एखादी वाळकी काठी उचलतो. ती मग वर जाऊन येईपर्यंत सगळ्यांच्या हातात फिरते, तिच्यावर बलप्रयोग होतात. ती खाली येईपर्यंत राहेल कि नाही सांगता येत नाही.
आता ४ दिवस वापरायला हव्या म्हणून आम्ही साध्या पण चांगल्या लाकडी काठ्या प्रत्येकी ३० रु. दराने आणल्या.
इथुन आमचा ट्रेक सुरु झाला. जाता जाता एका आजीकडून हिरवी सफरचंदे घेतली. त्या फ्लेवरचे मी याआधी फक्त एक पेय (सुज्ञांनी ओळखावे :-) ) प्यालो होतो. प्रत्यक्ष ते फळ मी पहिल्यांदाच खाल्ले आणि आवडले.
मधून मधून खायला ज्यातून उर्जा मिळेल, असा सुका मेवा, बिस्किटे, डीहायड्रेशन झाल्यास म्हणून ग्लुकोन डी आणि तत्सम पावडर, चोकलेट अशा गोष्टी सोबत राहू द्या असे आम्हाला सांगितलेले होतेच. ते आम्ही प्रत्येकाने एवढे गांभीर्याने घेतले कि प्रत्येकाच्या सामानात रोज अशा गोष्टी असायच्या. पण त्याचा तितका उपयोग झाला नाही.
वेगळ्या वातावरणात भूक लागत असेल कदाचित, पण आम्ही बहुतांश ढगाळ वातावरणात फिरत होतो. त्यामुळे आम्हाला विशेष भूक लागत नव्हती. रोज आमचे हे पदार्थ बळजबरी खाउनसुद्धा उरत होते. हिमालयात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहते पाणी मिळते आणि पाण्याचा तुटवडा होत नाही.
आमचा शांतपणे, रमतगमत टीपी करत प्रवास चालु होता. हा पूर्ण प्रवास पुष्पावती नदीच्या काठाने आहे. आधी नदीच्या अलीकडच्या बाजूने आणि मग ती नदी पार करून पलीकडच्या बाजूने. बऱ्याच ठिकाणी झाडी असल्यामुळे सावली आहे. रस्त्यात एका ठिकाणी एक २५० मि. उंच आणि मोठा धबधबा लागतो.
सुरुवातीचे २-३ किमी वगळले तर साधारण ११ किमीचा उरलेला प्रवास पायी किंवा हेलीकॉप्टरनेच करावा लागतो. गाडी जात नाही. वर सर्व सामान खेचराकरविच वाहून नेतात. काही जनावरांचे इतके हाल होतात, कि दोनतीनदा आम्हाला थोडी जखम झालेले, रक्त पडत चाललेले जनावर दिसले. पण नाईलाज. त्या लोकांची रोजीरोटी त्यावरच आहे. असेहि वाटते आणि वाईटसुद्धा वाटते.
आम्ही एका ठिकाणी नदीकिनारी बराच टाईमपास केला. मला त्या पाण्यात उतरायची आणि बसायची खूप इच्छा होती. मला एरवीच खूप घाम येतो. तेच थोडा वेळ तीव्र उन लागल्यामुळे भरपूर आलेला होता, त्यामुळे थंडगार पाण्यात उतरून फ्रेश वाटेल असं वाटत होतं.
पण तो प्रवाह इतका जोरदार होता कि भीती पण वाटत होती. मग एक मोठा दगड शोधला ज्यावर पाय पसरून बसता येईल, एका मित्राला बोलवून मला पायाजवळ पकडायला सांगितलं आणि मी आडवा होऊन डोकं आणि होईल तेवढं अंग पाण्यात बुडवलं. मजा आली पण त्या थंडगार पाण्यानी हुडहुडी भरली. :D आमचा गाईड "कहा कहा से आ जाते है" अशा प्रकारचे लुक्स देत होता.
पण मी एकदम ताजातवाना झालो. आणि जोमात पुढे चालायला लागलो. आम्ही १० जण असल्यामुळे प्रत्येकाची स्पीड वेगळी. सहनशक्ती वेगळी. तर आम्ही जवळ जवळ असलो तरी अगदी सोबत फिरत नव्हतो. एक-दोन, दोन-तीन सोबत असे फिरत होतो.
मी आणि निखिल आमच्या ग्रुपमध्ये थोडे मागे मागे राहायचो. बाकीचे पुढे जाऊन थांबायचे आणि आम्ही पोचलो कि पुढे निघायचे. त्यात उन आणि गर्मी हे माझे शत्रू. उन आलं कि प्रचंड घाम येतो आणि शरीरातली शक्ती एकदम गळुन जातो. तर मी पुढे कि मागे हे त्या दिवशीच्या उन्हावर अवलंबुन असायचं.
फोटो काढायला म्हणुन कॅमेरा-लेन्स वगैरे सगळं सोबत घेऊन हिंडत होतो, पण उन आलं कि फोटोग्राफी करायला इच्छा असूनसुद्धा त्राण राहायचं नाही. मग प्राधान्य फक्त अंतर कापत जाण्याला.
तर इथे नदीत डुंबेपर्यंत मी थोडा मागे मागे होतो. पण त्यानंतर मग उत्साहात आणि सुदैवाने थोडी सावली पण लागल्यामुळे बरंच अंतर एकटाच पुढे गेलो. बराच वेळ तर मी माझा ग्रुप सोडून एक पंजाबी ग्रुप जो हेमकुंडच्या तीर्थयात्रेला चालला होता, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत चाललो होतो.
त्यांना हिंदी नीट येत नव्हती. येत असेल पण ते सारखे हिंदीतून पंजाबीमधेच घसरत होते. त्यातले दोघे तिघे भरभर चालत पुढे गेले. आणि एकजण मागे राहिला जो त्यांच्या ग्रुपमधला माझ्यासारखा होता. :D
तो मला आणि माझ्या मार्गे स्वतःला धीर देत होता. "कोई नई यार, वाहेगुरू दा नाम लेके चलते रहो बस. कभी न कभी पोहोच जाएंगे. क्या जलदी है?" हे तो पुन्हा पुन्हा म्हणायला लागला. आणि त्यानंतर थोडं तत्वज्ञान पण झाडायला लागला. थोडा वेळ ऐकलं आणि मी थांबलो. त्याला म्हटलं ग्रुपसाठी थांबलो आणि पुढे पाठवून दिलं. आणि मी एकटा सापडलो तर परत चिटकेल म्हणून खरंच कोणीतरी येईपर्यंत थांबलो.
मग अमित भेटला तोपण असाच एकटा पुढे आला होता. आम्ही दोघं काही अंतर जाऊन पुन्हा थांबलो. त्याने बेंचवर एक डुलकी मारून घेतली. आम्ही बरेच पुढे आलो असु किंवा मागचे थांबत थांबत, फोटो ब्रेक्स घेत येत होते. बराच वेळ लागला.
असं म्हणतात कि अशा वेळेस चालत राहणे उत्तम. खूप थांबले कि वेळसुद्धा जातो आणि लय तुटते. तेव्हा काहीसं तसंच झालं. तिथे थांबून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पुन्हा उन आलं आणि माझी पण गती मंदावली. आणि पुढचा प्रवास खूप रेंगाळला.
बाकीजण पुढे गेले. मी,निखिल, अरूप, अनुजा आणि अंशुल थोडे मागे मागे चाललो. जाताना फोटो काढणे, निरीक्षण करणे चालूच होते. एका झाडावर असा फुलांचा गुच्छ दुसला जो दुरून पक्ष्यांचा थवा दिसतो, पण मुळात फुल आहे.
अशाच गोष्टी पाहत पाहत आम्ही ३ च्या दरम्यान पोचलो. आता सगळे थकले होते आणि भूकसुद्धा लागली होती. इथे आमची व्यवस्था येत्या ४ रात्रींसाठी हॉटेल प्रिया मध्ये केलेली होती. त्या दिवशीच्या डिनरपासून ते घांगरीयामधून निघेपर्यंत खाण्याची व्यवस्थासुद्धा कंपनीकडेच होती. आम्ही अशा विचित्र वेळेस जेवण मागवताना पाहून व्यवस्थापक काळजीत पडले. ते म्हणाले आत्ता काही तरी हलकं फुलकं खा, संध्याकाळी जेवण जाणार नाही. आपके पैसे भी जाएंगे मेरे पैसे भी जाएंगे. कोणी त्यांचं ऐकलं नाही आणि दोन्ही वेळेस दाबून खाल्लं.
थोडा वेळ आराम करून आम्ही वॅलीच्या रस्त्यावर एक ग्लेशिअर आहे ते पाहायला गेलो. मोठ्ठा धबधबा, वाहतं पाणी आणि भरपूर बर्फ. बराच वेळ बर्फात खेळण्यात गेला.
तिथे आजूबाजूला असलेली सुंदर फुल झाडे सुद्धा पाहिली.
घांगरीया गावात पोचताना घामेघूम अवस्था, मग थंडी, मग स्वेटर घालून बाहेर पडून चालत गेलो कि पुन्हा गर्मी, आणि बर्फाजवळ गेलो कि पुन्हा थंडी असे वातावरणात अचानक विरुद्ध बदल होत गेल्यामुळे मला स्वतःला थोडा त्रास झाला. बाकी अंगदुखी, डोकेदुखी अशा किरकोळ तक्रारी जवळपास सगळ्यांना होत्या.
रूममध्ये परत आलो आणि गप्पा गोष्टी करून झोपलो. ज्यासाठी इतक्या दूर आलो त्या वॅलीचं दर्शन दुसऱ्या दिवशी होणार होतं.
वॅलीमधला पहिला दिवस
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे इंग्रजांनी दिलेले नाव आहे. भारतात अजिंठा, लोणार, हि व्हॅली अशा गोष्टींची महती लोकांना कळायला इंग्रज लोकच का लागतात काय कि? विसाव्या शतकात 1931 मध्ये काही इंग्रज गिर्यारोहक चुकून इथे आले आणि त्यांना या सुंदर जागेचा शोध लागला. त्यापैकी एकाने “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” याच नावाने पुस्तक लिहिले आणि या नावाने हि जागा प्रसिद्ध झाली.
इंद्राची बाग असाही कुठे तरी उल्लेख वाचला मी. दर वर्षी इथे हिवाळ्यात पूर्ण बर्फ साचतो. हि व्हॅली, घांगरिया, हेमकुंड सर्व बर्फाच्छादित असतं. उन्हाळ्यात तो वितळतो, आणि मगच या ठिकाणी जाता येतं.
हि जागा संरक्षित आहे आणि जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तेथे फक्त दिवसा फिरता येते आणि मुक्काम करता येत नाही. मुक्कामाला त्यामुळेच घांगरियालाच यावे लागते.
दुपारनंतर पार्क बंद होतो म्हणून जास्त वेळ तिथे घालवायचा असेल तर जितक्या लवकर जाता येईल तितकं चांगलं.
आमचा तो प्रयत्न असला तरी सगळ्यांचं आवरून खाऊन निघेपर्यंत कालसारखा पुन्हा उशीर झाला.
घांगरियापासून व्हॅली 6 किमी अंतरावर आहे. सुरुवातीला प्रशस्त असणारी पायवाट तिथे पोचेपर्यंत चिंचोळी होत जाते. पार्कच्या सुरुवातीला एक परमिट काढावे लागते. ते तीन दिवस वैध असते.
रस्त्यात बरिच चढण आहे आणि दोन तीन धबधबे आणि छोटे प्रवाह पार करून जावं लागत. घांगरिया गाव, तो रस्ता, हिमालयाची शिखरे, सर्व काही अति सुंदर आहे.
ती व्हॅली आणि तिथे जाण्याचा प्रवास सर्वच अप्रतिम अविस्मरणीय. मांझीच्या भाषेत शानदार झबरदस्त झिंदाबाद.
कालसारखा थांबुन गतीभंग होऊ नये म्हणुन मी फार न थांबता पुढे चाललो होतो. त्यामुळे मी एकटाच पुन्हा पुढे होतो. बाकीजण थांबत फोटो काढत येत होते. बाकी ग्रुपमध्ये अंगदकडे प्रोफेशनल कामेरा होता, हरप्रीतकडेसुद्धा सुपरझुम होता. बाकी सर्व जणांकडे आयफोनसारखे भारी फोन होतेच. सर्व आपला फोटोग्राफीचा शौक पुरा करत होते.
एस.एल.आर कॅमेरा गळ्यातच अडकवून चढाईवर जाणे म्हणजे कसरत आहे. माझ्यात थोडं उन असल्यामुळे तेवढा उत्साह नव्हता. काही वेळ मी फोटो न काढताच चाललो होतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तिथलं प्रत्येक पाउल, प्रत्येक व्ह्यु इतका सुंदर वाटतो कि किती म्हणुन फोटो काढणार?
तरी आता डिजिटल क्रांतीमुळे मोबाईल, डिजिटल कॅमेरा वापरून फोटो काढणे, आठवणी जतन करणे इतके सोपे झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे स्वस्त झाले आहे. प्रत्येक जण खचाखच क्लिकक्लिकाट करून ढीगभर फोटो काढू शकतो. रोलच्या जमान्यात प्रत्येक फोटो किती विचारपूर्वक काढावा लागायचा.
वॅलीच्या जवळ पोचल्याची चिन्हे दिसत होती. मग मी मोबाईल काढला आणि हिमालयाच्या पार्श्वभूमीवर माझा सेल्फी काढून फोटो काढणे पुन्हा सुरु झाले. तो सेल्फी पुढे बरेच दिवस माझा डीपी होता. तिथून पुढे मग मी जरा निवांत मोबाईलवरच फोटो काढत फिरलो.
उन सुद्धा कमी झालं, थोडा दिलासा मिळाला. पण लगेच आभाळ अगदी गडद झालं आणि मग जरा भीती वाटली. पाऊस पडेल असंही वाटत होतं आणि धुकंसुद्धा दाटून येत होतं. त्या भागात धुकं दाटून सगळं काही दिसेनासं व्हायला वेळ लागत नाही. आणि पुन्हा उन पडून सगळं स्वच्छ व्हायलासुद्धा वेळ लागत नाही. पण या दोन्हीमध्ये किती वेळ जाईल ते सांगता येत नाही. दुपारपर्यंत हे टिकलं असतं तर आजचा दिवस बराच अंशी वायाच. कारण दुपारनंतर तिकडून परतीला निघावेच लागते.
वॅली अगदी जवळ आली आणि तिथे छान पक्षी दिसु लागले. माझा कॅमेरा आता वर काढणे भागच होते. त्यांचे फोटो घेण्याचे निष्फळ प्रयत्न करून झाले. फारच चपळ आणि चंचल पक्षी होते.
मग एक जलप्रवाह पार करायला कामचलाऊ लाकडं आणि पत्रा टाकला होता. तो पार करून आम्ही अधिकृतरित्या वॅलीमध्ये दाखल झालो. आणि समोरचा नजारा पाहून एकदम उल्हसित (पागल) झालो. हिमालयाच्या रांगा, भरपूर हिरवळ, आणि भरपूर फुलं.
दिसेल त्या प्रत्येक फुलाचा फोटो काढणं सुरु झालं. आमचे मॅनेजर जे होते देवकांत संगवान. ते स्वतः आधी काही वर्षांपूर्वी फिरत फिरत इथे आले आणि या जागेच्या प्रेमात पडले. मग पुन्हा पुन्हा आले, आणि हा व्यवसायच सुरु केला. (हेवा वाटतो अशा लोकांचा) ते वॅली आणि हेमकुंड प्रवाशांसाठी खुले असतानाचे वर्षातले ४ महिने गोविंदघाटला येउन राहतात. आणि एक एक आठवडा भरपूर ग्रुप्सला घेऊन फिरतात.
इतकी वर्षे आल्यामुळे त्यांच्याकडे इथल्या जवळपास सगळ्याच फुल पक्षी प्राण्यांच्या फोटो आणि व्हिडीओचा संग्रह आहे. एका भेटीमध्ये सर्वकाही दिसणे शक्य नाही. त्यांनी एक फोटोबुक छापले आहे या फोटोंचे. आम्हाला सगळ्यांना एक एक प्रत दिली होती. आम्ही ती काढुन समोर दिसणाऱ्या फुलाचे नाव शोधत होतो.
पण हा उत्साह खूप टिकत नाही. आपल्याला वैज्ञानिक नाव आणि माहिती जाणून तरी काय करायचं असतं? तेव्हा काही पाठ झालेली नावं आता इथे आल्यावर पुन्हा विस्मरणात गेली. त्या रात्री आम्ही घांगरीया गावात एका छोटेखानी दालनात प्रोजेक्टरवर एक माहितीपट पाहिला. त्यात फुल आणि वनस्पतींची शास्त्रीय माहिती जरा जास्तच होती. तो पाहता पाहता अंधारात सगळेच झोपले होते. आणि आपण सोडून बाकी लोक सुद्धा झोपले होते हे आम्हाला बाहेर आल्यावर कळलं. शेवटी आपल्याला (म्हणजे आम आदमीला) भावतं आणि लक्षात राहतं ते सौंदर्य.
थोड्या अंतराने तीच तीच फुले असली तरीसुद्धा न थांबता फोटो सुरु होते. कारण प्रत्येक ठिकाणी फुलांचं कॉम्बिनेशन वेगळं होतं. आणि मग ज्याची भीती होती तेच झाले. पाउस सुरु झाला. खूप जोरात नसला तरी कॅमेरा आत ठेवणे भाग होते. मग पुन्हा मोबाईल (पिशवीत गुंडाळुन) फोटो काढणे सुरु.
बरीच गर्दी वाटली त्या दिवशी. आम्ही बरेच पुढे गेलो. पाऊस न थांबता चालू होता. काही जण येताना भेटले. ते म्हणाले आम्ही खूप लवकर आलो इथे, त्यांना पूर्ण उन्हात, बिना पावसात फिरता आलं. आम्हाला उशीर झाला म्हणून मनात जर चरफड झाली.
हिमालयन ऑर्किड
पुढे एका ओढ्याच्या अलीकडे सगळे थांबले होते. तिथे देवकांत एक दुर्मिळ असलेले फुल "हिमालयन ऑर्किड" सगळ्यांना दाखवत होते. पायाखाली काही चिरडू नका म्हणून सगळ्यांना डाफरत होते. ते पाहून झाल्यावर आम्ही परत फिरलो. पुढे पावसामुळे पाणी वाढले होते. आणि पहिल्या दिवशी लोक इथपर्यंतच जातात म्हणून सांगितले.
देवकांत यांनी आम्हाला सांगितले होते कि बाकी सगळे ऑपरेटर एकच दिवस वॅलीमध्ये नेतात. आणि इथपर्यंतच नेतात. मी दुसऱ्या दिवशीसुद्धा नेतो. आणि यापेक्षा बरंच पुढे. तिकडे कोणी नेत नाही. आणि खरंच जेव्हा आम्ही नंतर त्यापुढे बरंच अंतर गेलो, तेव्हा कोणीही तिकडे नव्हतं. फक्त आमचा ग्रुप.
मग परत आलो. पाउस आणि वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. वॅलीच्या सुरुवातीला एक मोठ्ठी शिळा आहे. तिथे बसायला खडकावर बरीच जागा आहे. तिथेच सगळे जेवत होते. आम्हीपण तिथे जेवायला बसलो. थंडीमुळे पुरीभाजी आणलेली होती, ती एकदम कडक झाली होती. ती खायला जरा कठीण झाली होती. कसंबसं ते संपवलं. आणि परत निघालो. परतीचा प्रवास नेहमीच निवांत आणि मजेत होतो. लवकर लवकर चढुन जाण्याची घाई नसते.
येताना सुदैवाने मला पक्ष्यांचे थोडे फोटो मोठ्या मुश्किलीने घेत आले. एक लाल रंगाचा चिमणी सारखा पक्षी, तितकाच चपळ, सतत इकडून तिकडे उडत होता. लेन्स बदलून फोटो काढायचा प्रयत्न करत होतो, पण बरेच फोटो काढूनही स्थिर आले नाहीत. शेवटी एका जागी बसला, ती लेन्स च्या आवाक्या बाहेरची होती, तरी फोटो काढला. झूम केलेली प्रत इथे टाकली आहे.
आणि एक स्थानिक जातीचे कबुतर. हि जोडी रस्त्या पासून बरीच बाजूला एका झाडावर शांत बसली होती. पण दोघांचा चांगला व्ह्यू मिळत नव्हता. होईल तितके जवळ जाऊन फोटो काढण्याच्या नादात माझे पाय (बूट) शेणात बरबटले. ते साफ करण्याचा एक वेगळा उद्योग करावा लागला.
घांगरीयाला रूमवर आम्लेट, भजे मागवुन त्याच्या सोबतीने गप्पा झाल्या. तिथे असेपर्यंत रोज संध्याकाळी ट्रेक संपल्यावर आम्ही हेच करायचो.
घांगरीया गावात फोनची खूप समस्या आहे. खाली गोविंदघाटला आम्ही नेलेल्या बी.एस.एन.एल कार्डवर फक्त फोन येऊ शकत होते. जात नव्हते. मेसेज जात होते. पण इथे वर आल्यावर मात्र आमचे सगळे फोन बंद पडले. इथे फक्त बी.एस.एन.एल आणि आयडिया चालतं म्हणतात. पण तेही बहुधा उत्तराखंडचेच. आमचे फोन काही चालले नाहीत.
त्यामुळे इथे बाकी गोष्टींचे भाव ठीकठाक असले तरी फोन करणे मात्र एकदम महाग. आयडियाचे वायरलेस लॅंडलाइन फोन वापरून इथे पीसीओ उघडले होते. १० रुपये एका मिनिटाला असा किती तरी पट भाव होता. आणि ते प्रीपेड फोन असल्यामुळे किती पैसे कटले ते दिसायचे आणि राग यायचा. कि आपण काही पैशांच्या कॉलला २०-३० रुपये मोजतोय. पण हे ४ महिने हाच त्या लोकांचा धंद्याचा टाईम. आणि रोज बोलून जरा ओळख झाल्यावर ते लोक थोडी सवलतसुद्धा देत होते.
जेवण झालं. देवकांत विचारत होते कि आता तुमच्यापैकी कोण कोण उद्या पुन्हा वॅली मध्ये येणार? त्यांचं असं विचारण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्लानमध्ये दोन दिवस वॅलीमध्ये ठेवले होते. एक दिवस असा पाउसपाण्यामुळे जादा असावा हा एक हेतू. आणि जास्त फिरण्यासाठी सुद्धा. पण बऱ्याच लोकांना पहिल्या दिवशी जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी त्राण राहायचं नाही. आम्ही जाणारच म्हणुन सांगितलं.
रूमवर आलो, पुन्हा गप्पागोष्टी करून, भरपूर टीपी करून, आणि उद्या लवकर जायचंच अशी एकमेकांना तंबी देऊन आम्ही झोपलो.
हेमकुंड साहिब
आदल्या दिवशी वॅलीमध्ये पोहचायला आम्हाला उशीर झाला. मग उशिरामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप कमी वेळ वॅलीचा आनंद लुटता आला. आज वॅलीसाठी ठेवलेला दुसरा (जादा) आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे आम्ही आज काहीही करून लवकर पोहचुन जास्तीत जास्त वेळ वॅलीमध्ये काढण्याचं ठरवलं होतं. पण निसर्गाच्या मनात तसं काही नव्हतं.
मी आणि अरूप आधी तयार झालो. बाकीच्यांना अजून वेळ लागेल आणि पुन्हा उशीर होईल असं वाटत होतं. आम्ही खाऊन झालं कि पुढे निघतोय असं सांगुन निघालो. बाकीच्यांना अजून वेळ होता. त्यांच्यावर लवकर आवरायला दबावसुद्धा टाकायचा होता, आणि कोणी उशीर केलाच तर आज थांबुन वेळसुद्धा घालवायचा नव्हता.
आम्ही नाश्त्याला जाऊन बसलो. एक एक जण येऊ लागले. भरपूर धुकं आणि ढग होते. थेंब थेंब पाऊस सुरु झाला होता. आमचं खाणं चालू असताना जोरात पाऊस सुरु झाला. आम्ही डोक्यावर हात मारून बसलो. घ्या आता लवकर निघुन काय फायदा? सगळे येउन बसले, खाऊन झालं तरी पाउस थांबला नाही.
आम्ही बराच वेळ थांबलो. मग आमचे मॅनेजर देवकांत यांनी एक पर्याय सुचवला. कि तुम्ही आज हेमकुंडला जाऊन या. तिकडे जायला पावसामुळे काही बिघडत नाही, आणि उलट उन्हाऐवजी ढग आणि पाउस असेल तर चांगलंच. आम्हाला ते पटलं.
काही जणांनी दुपारच्या जेवण्यासाठी अंडी असलेले कॉम्बो बांधून घेतले होते. ते बदलून पूर्ण शाकाहारी गोष्टी घेतल्या. तसे हेमकुंडला जाताना लंच सोबत न्यायची गरज नसते, तिकडे गुरुद्वारेच्या लंगरमधेच जेवणे होतात. पण आज हेमकुंडचा दिवस नसल्यामुळे लंच तयार होता. आमची इच्छा होती कि अनावश्यक ओझं वाढू नये. पण देवकांत नि त्यांची टिपिकल लाइन मारलीच. "ले लो यार, मेरे पैसे तो लग गये है इसमे. गिन के बनाते है ये लोग. आप नही लोगे तो ये होटलवाला तो फेक देगा इसको. इससे अच्छा आप ले जाओ. रस्ते मे काही खा लेना."
आम्ही पुन्हा रूमवर गेलो. लवकर आवरायचं म्हणून आम्ही अंघोळीवर पाणी सोडलं होतं. आता हेमकुंड गुरुद्वाऱ्यात जायचं म्हणजे तसं कसं चालेल? पुन्हा आवरून निघण्यात वेळ गेला. मी आज कॅमेरा घेतलाच नाही. हेमकुंडला जाताना खूप उंची आणि विरळ ऑक्सिजनमुळे खूप जणांना त्रास होतो असं विकीपेडिया, आणि नेटवर वाचलं होतं आणि ऐकलंही होतं. त्यामुळे फोटोपायी त्रास वाढवुन घेण्याऐवजी मी त्या दिवसापुरतं फोन आणि बाकी लोकांच्या फोटोग्राफीवर विसंबून राहायचं ठरवलं.
आवरून निघेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला आणि थेंब थेंब सुरु होता. घांगरीयातून वॅली आणि हेमकुंडकडे जाण्याचा रस्ता एकच आहे, पुढे एका धबधब्यापाशी ते रस्ते वेगळे होतात. तिथे पोहचेपर्यंत पाउस पूर्ण थांबला. आता इकडे जावे कि तिकडे जावे असा प्रश्न होता. पण आम्ही हेमकुंडला जाणार म्हणून सगळे गाईड पुढे गेले होते. उशीर तर झालेलाच होता. कालपेक्षा कमी वेळ मिळाला असता. आणि वॅलीमध्ये दुसऱ्या दिवशी तर आम्हाला अजून लांब जायचं होत. आम्ही आता हेमकुंडलाच जाण्याचं ठरवलं.
वर जाईपर्यंत पूर्ण आभाळ मोकळं झालं आणि कडक उन पडलं. वॅलीचे डोंगर दिसत होते, तिकडे काही वेळ ढग दिसत होते. आम्ही आमची समजूत काढत होतो, कि ठीके तिकडे ढग आहेत अजून. नसतं दिसलं काही. पण तिकडे पण आभाळ साफ झालं आणि आमची फजिती झाली यावर शिक्कामोर्तब झालं.
घांगरीया ते हेमकुंड हे अंतर ६ किमी आहे. हेमकुंडची पायवाट जवळपास पूर्ण रस्त्यावर मोठी आणि प्रशस्त आहे. चालत जायचं बस. चिंचोळ्या रस्त्यावरची चढाई नाही. पण जी चढण आहे ती खूप तीव्र नसली तरी सतावत राहते. रस्ता मोठा आहे. सपाटीवरचं अंतर आणि चढाईवरचं यात हाच फरक आहे. चढताना तेच अंतर दुप्पट वाटतं.
दोन अगदी तरुण पंजाबी पोरं आमच्या पुढेमागे वर निघाली होती. त्यातल्या एकाकडे सामान होतं आणि एकाकडे गॉगल. गॉगलवाला भरपूर स्टाईल मारत होता. सामान घेऊन मागे येणाऱ्यावर लवकर चल म्हणुन दमदाटी करत होता. थोड्याच वेळात त्यांचा दम निघाला, आणि त्यांनी वाटेत भेटलेली पोनी ठरवली आणि त्यावर बसून गेले.
जसं जसं आम्ही वर गेलो तसं तसं उन भरपुर वाढलं. आणि त्यामुळे खुप त्रास होऊ लागला. भरपुर घाम येउन डीहायड्रेशन झालं. आणि शरीरातलं त्राण कमी होऊ लागलं. थांबत थांबत जाऊ लागलो. सुरुवातीला सगळे एकमेकांसाठी थांबत थांबत जात होते. पण असं खुपदा केलं कि सगळ्यांनाच थकवा येतो. आमचा बाकीचा ग्रुप आणि मी आणि निखिल यातलं अंतर वाढत गेलं. आणि नंतर तर ते दिसेनासेच झाले. त्यालासुद्धा तसाच त्रास होत होता.
आम्ही दोघं एकमेकांपासून काही पावलांच्या अंतरावर सावकाश चाललो होतो. निखिल ला खूपच त्रास होत होता. काही पावलं चालुन काठीच्या आधाराने उभ्याउभ्याच किंवा जागा मिळाली तर कुठेतरी बसुन विश्रांती घेत होता. मी आता मुद्दाम ठरवून बिलकुल बसत नव्हतो. तसं केलं कि जास्त थकवा येतो असं वाटत होतं.
आता दुपार झाली होती आणि तिकडून लोक परत येत होते आणि आम्ही पोहोचलोसुद्धा नव्हतो. आमच्या चेहऱ्यावरूनसुद्धा आमची हालत दिसत असावी. वरून परत जाणारे शीख भक्त लोक आम्हाला धीर देत होते. "कोई नई जी, पोहोच गये बस. वो उधर रहा उपर. १० मिनट मे पोहोच जाओगे." ते १० मिनिट काही संपता संपत नव्हते.
चल थोडंच राहिलं आता असं एकमेकांना म्हणत आम्ही वर पोहोचलो शेवटी. पूर्ण शरीराची वाट लागली होती. बाकी जणांचं दर्शन झालं होतं. गुरुद्वारेचा दरवाजा पण बंद झाला होता. आम्हाला वाटलं इतकं रखडत वर येउन काही फायदा नाही, पण हरप्रीत आला. त्याने तिथल्या लोकांना पंजाबीमध्ये काहीतरी बोलून विनंती केली. त्यांनी आम्हाला जाऊ दिलं.
आम्ही आत गेलो आणि एकदम शांत वाटलं. वेगळंच समाधान.
गुरु गोविंदसिंग पूर्वीच्या जन्मात इथे तप करत होते असा शिखांच्या धर्मग्रंथात उल्लेख आहे. तसंच लक्ष्मणानेसुद्धा इथे तप केले असल्याचे वाचले. त्यामुळे त्यांचा पूर्व जन्मीचा किंवा काही तरी संबंध आहे अशी मान्यता आहे. नेमका मला कळाला नाही. तिकडे काही चित्रांमध्ये गुरु गोविंद सिंग आणि लक्ष्मण असे दोन्ही दाखवले आहेत.
त्यामुळे हि जागा हिंदू आणि शीख दोन्हींसाठी पवित्र आहे. इथे लक्ष्मणाचे मंदिरसुद्धा आहे. काही वर्षांपूर्वी इथे गुरुद्वारा बांधला गेला. त्याची रचना पाहून मला सिडनी ओपेरा हाउसची आठवण आली.
खुप वर्षांपूर्वी नांदेडच्या गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो होतो त्यानंतर आजच. माझ्या शहरात, औरंगाबादलासुद्धा एक छान गुरुद्वारा आहे. सगळीकडेच जी स्वच्छता असते, तिथल्या सेवकांचा नम्रपणा, शांतपणे होणारं प्रसाद वाटप, लंगर मधली शिस्त, ते पाहुन आल्याचं समाधान वाटतं. नांदेड, औरंगाबाद, हेमकुंड तिन्ही ठिकाणी माझा अनुभव असाच होता.
स्वच्छ आणि शांत धार्मिक स्थळे पहिली कि मला थोडं छान वाटतं, थोडा हेवा वाटतो, आणि थोडा आपल्या मंदिरांचा, विशेषतः महाराष्ट्रातल्या, राग येतो. अंगावर येणारे दुकानदार, उद्धट पुजारी, ढकलाढकली करणारे रक्षक, रांगेत मधूनच घुसणारे लोक इ. इ. गर्दीची जागृत देवस्थाने टाळून, जवळपासची शांत, कमी लोकप्रिय मंदिरात जाण्याचा हल्ली माझा कल असतो. असो. मंदिरांचा विषय निघाला कि नेहमीच असं भरकटायला होतं.
बाहेर आलो आणि तिथल्या कुंडाकडे गेलो. ह्या कुंडामुळेच ह्या जागेचं नाव हेमकुंड आहे. हेम (संस्कृत) म्हणजे बर्फ. ७ बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे कुंड. हिवाळ्यात पूर्ण गोठलेलं. आम्ही गेलो तेव्हा वितळुन पाणी तर होतं पण अतिथंड. त्या कुंडात डुबक्या मारायचं आम्ही ठरवलं होतं.
आमचे मॅनेजर देवकांत यांना आम्ही जेव्हा सांगितलं कि आम्ही डुबकी मारणार आहोत. तेव्हा ते म्हणाले "बेस्ट लक. मै इतनी बार गया हु वहा लेकिन बस २००८ मे एक हि बार मैने डुबकी लगायी. एक बंदे को केमरा पकडा दि फोटो निकालने. अंदर गया और तुरंत वापस. फोटो तो आयी हि नही. मैने कहा भाडमे जाये फोटो, एक बार का पुण्य बस हो गया."
आम्ही हिम्मत करून डुबकी मारली. भयानक थंड होतं पाणी. सगळे मोठमोठ्याने ओरडत होते. त्या थंड वातावरणातसुद्धा पाण्याबाहेर आलो कि लगेच गरम वाटलं इतकं ते पाणी थंड होतं. मग फोटोसाठी पुन्हा. मग मी विषम आकडा करावा म्हणुन अजून एकदा उतरलो. असं प्रत्येकाने १, २, ३ अशा वेगवेगळ्या वेळा डुबक्या मारल्या. मस्त हुडहुडी भरली मग.
अंग घासून कोरडं केलं, कपडे बदलले. आणि लक्ष्मणाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. मग थोडे फोटो काढले.
इथलं पाणी खूप पवित्र समजतात म्हणून सगळ्यांसाठी कॅन आणल्या. त्यात पाणी भरून घेतलं.
आता उन पूर्ण गेलं आणि धुकं गडद होऊ लागलं. थंड वारे वाहू लागले. पाहता पाहता समोर स्पष्ट दिसत असलेलं कुंड धुक्यात हरवू लागलं.
लंगरमध्ये पटकन जेवून खाली निघणं भाग होतं. येण्यात खूप उशीर झाला होता त्यामुळे आता फक्त आमचा ग्रुप वर उरला होता. बाकी सगळे खाली निघाले होते.
जेवण झालं कि पुन्हा मी आणि निखिल मागे राहायला नको म्हणून आम्ही तडक पुढे निघालो. त्या घाईत आमचा हलवा खाण्याचा राहिला. त्या थंडीमध्ये गरम गरम हलवा खाउन मजा आली असती, पण ते राहूनच गेलं.
येताना उन पूर्ण जाऊन त्याजागी गडद धुकं आलं होतं. उन नसल्यामुळे खाली जाताना काही त्रास झाला नाही. आरामात थांबत थांबत आलो. हळू हळू बाकी लोक पण पुढे आले.
आणि जगातलं सर्वात उंच ठिकाणी असलेलं गुरुद्वारा पाहून, हेमकुंडात स्नान करण्याच (काही असलंच तर ते) पुण्य पदरात घालुन आम्ही घांगरीयाला रूममध्ये परतलो. आणि दाबून जेवण करून बिछान्यावर कलंडलो.
वॅलीमधला दुसरा दिवस
वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे.
वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता. पण त्यादिवशी सुद्धा सकाळी पाउस पडल्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून हेमकुंडला गेलो आणि नंतर कडक उन पडून आमची फजिती झाली.
आता आज खरोखरीच शेवटचा दिवस होता. आज पाऊस पडो कि न पडो, धुकं असो वा नसो आम्हाला वॅलीमधेच जाणे भाग होते. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घांगरीयामधून पुन्हा गोविंदघाटकडे निघायचे होते.
आमचे मॅनेजर देवकांत यांनी सांगितलेच होते, कि एकदा वॅलीमध्ये जाऊन आल्यावर सहसा लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्यात आळशीपणा करतात, आणि हेमकुंडला जाऊन येउन आराम करतात, किंवा हेमकुंडला जाण्याआधी एक दिवस घांगरीयामधेच जवळपास वेळ घालवतात.
सकाळी आमच्या ग्रुपमधूनसुद्धा थोडी गळती होईल अशी चिन्हे दिसत होती. आदल्या दिवशी हेमकुंडला जाऊन आल्यामुळे सगळ्यांना थोडा थकवा तर आलाच होता. पण शेवटी एकमेकांच्या उत्साहाचा सगळ्यांवर परिणाम झाला आणि सगळेच जण निघाले.
असे म्हणतात कि जे होते ते चांगल्यासाठीच ते खरे वाटावे असा त्या दिवशीचा अनुभव होता. सकाळपासुन थोडं ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे वॅलीमध्ये पोहचेपर्यंत तिथे फिरून येईपर्यंत धाकधुक चालू होती. पण पाऊस पडला नाही.
मध्ये चढताना काही वेळ उन पडून गेले, थोडासा त्रासही झाला. पण पुन्हा गेले आणि वातावरण जरा सुखद झाले. माझी आणि निखिलची पुन्हा वेगळी गम्मत झाली. आम्ही चढताना थोडे मागेच होतो. काही वेळ मी सगळ्यात मागे होतो. आणि माझ्या थोडं पुढे निखिल. उन्हामुळे त्राण कमी होऊन माझा वेग खूपच मंदावला होता. पण मी आज ठरवलं होतं कि कितीही वेग कमी असला तरी चालत राहायचं. उभ्या उभ्या थांबून लगेच निघायचं. निखिल काल सारखाच पुन्हा पुन्हा थांबत होता. पण मी त्याच्या जवळ पोचलो कि तडक पुढे जात होता. रस्ता चिंचोळा होता म्हणून ओव्हरटेक करता येत नव्हतं. आणि मलाही खूप वेगात पुढे जायचं नव्हतं म्हणुन मी त्याच्या मागेच चालत होतो. पण मला मजा वाटत होती.
थोड्यावेळाने आम्ही एका झऱ्यापाशी पाणी प्यायला थांबलो. बाकी काहीजण पण होते. तिथुन रस्तापण जरा मोठा होता. आणि वॅलीपण जवळ आली होती. मी पाणी पिउन ताजातवाना झालो आणि मग जवळपास न थांबताच पुढे गेलो.
आज ग्रुपमधल्या लोकांमध्ये तसं खूप जास्त अंतर नव्हतं. निखिल जेव्हा पोचला तेव्हा त्याने सांगितलं कि काल जसे आम्ही दोघंच मागे राहिलो होतो, तसं होईल असं त्याला वाटत होतं. पण माझी परिस्थिती कालपेक्षा बरी होती म्हणून मी पुढे गेलो तर तो एकटाच राहिला असता आणि त्याला मग पुढे यायचा उत्साह कमी झाला असता, म्हणून तो मला येऊ देत नव्हता. :D. पण आज उन तुलनेने कमी असल्यामुळे, आणि बाकीचे खूप पुढे नसल्यामुळे काल इतकी वाईट परिस्थिती नाही झाली.
घांगरीया हे छोटेसे गाव आहे. तिकडे फक्त पावसाळ्यात लोक जाऊन दुकाने हॉटेल्स चालवतात. त्यामुळे तिथली क्षमता मर्यादित आहे. म्हणून टूर कंपन्या गट करून साधारण एकाच वेळापत्रकानुसार लोकांना तेथे आणत असाव्यात.
स्वतःच्या योजनेनुसार, किंवा तंबूमध्ये सामानसुमान घेऊन येणाऱ्या गटांबद्दल मी बोलत नाही. किंवा हेमकुंडच्या दिशेने जाणाऱ्या शीख यात्रेकरू यांच्याबद्दलसुद्धा नाही. त्यांना गोविंदघाट, आणि घांगरीया या दोन्ही ठिकाणी अजून गुरुद्वारा आहेत, तिथे आसरा, मदत मिळते.
पण जसा आमचा मुळात आदला दिवस वॅलीसाठी होता तसाच बाकी अनेक जणांचा सुद्धा होता. आम्हाला वॅली पावसाशिवाय पाहण्याची अति हौस असल्यामुळे फक्त आम्ही तो दिवस टाळून हेमकुंडला गेलो. पण बाकी सगळे जण थांबले किंवा वॅलीमध्येच गेले.
त्यामुळे आज फक्त आम्ही वॅलीमध्ये गेलो. बाकी एखाद दुसरे एकटे फिरणारे परदेशी लोक सोडता वॅलीमध्ये कोणीही नव्हते. वॅली आमच्यासाठी राखून ठेवल्यासारखी वाटत होती.
भरपूर भटकलो आम्ही. खूप दूरपर्यंत जाऊन आलो. पहिल्या दिवशी आम्ही घांगरीयापासून साधारण ६ किमीपर्यंत आलो होतो. आज १० किमी आलो. म्हणजे आजची पूर्ण पदयात्रा २० किमीची होती.
पाउस नसल्यामुळे दूरपर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं. आधी एवढा स्पष्ट व्ह्यू मिळालाच नव्हता.
भरपूर प्रकारची फुलं असली तरी वॅली नेटवर पाहिलेल्या फोटो सारखी फुलांनी गच्च भरलेली नव्हती. हिमालय मूलतःच इतका सुंदर आहे, त्यामुळे आमच्या समोरची दृश्ये छानच होती.
पण फुलांमुळे थोडा अपेक्षाभंग झाला. गाईडकडून याचं कारण समजलं ते असं. ह्या भागात दर वर्षी पूर्ण बर्फ जमतो आणि तो उन्हाळ्यात वितळल्यावर फुले यायला सुरुवात होते. आणि मग तापमान, पाउस, यावर प्रत्येक फुलाच्या जातीचा एक हंगाम असतो. साधारणपणे जुलै महिन्यात सर्वात जास्त फुलं असतात. त्यामुळे आमची वेळ निश्चितच बरोबर होती. पण या वर्षी बर्फच जरा उशिरा वितळला होता. म्हणुन अजून म्हणावी तितकी फुले नव्हती.
आम्ही थोड्या मनातल्या मनात अन थोड्या उघडपणे शिव्या दिल्या. कि हे आधी सांगता येत नव्हतं का? १-२ आठवडे सुट्टी काढुन, दूरचा प्रवास करून आपण इतक्या वर येउन पोहोचल्यावर, जेव्हा थोडा अपेक्षाभंग होतो, तेव्हा त्याचं शास्त्रीय कारण ऐकून काही समाधान होत नाही. त्याच वर्षी १० जणांच्या सुट्या पुढे मागे ढकलणं अवघड आहे. पण आम्ही पुढच्या वर्षी आलो असतो.
मुद्दा असा कि, पुन्हा येणं अशक्य जरी नसलं तरी असे मोठे बेत सहजासहजी होत नाहीत. एवढ्या दूरची जागा एकदा पाहिली असेल तर आपण बेत आखताना दुसऱ्या जागांना साहजिकच जास्त प्राधान्य देतो.
पण ते शेवटी व्यावसायिक लोक. म्हणावी तितकी फुलं आली नाहीत म्हणून घेतलेली आगाऊ रक्कम परत करून आरक्षण त्यांनी स्वतःहून रद्द करणे तर अशक्यच. त्यापेक्षा आम्ही ठरवलेल्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो, गाईड देतो, फिरवून आणतो, फुलं कमी कि जास्त ते आमच्या हातात नाही म्हणून हात वर करणे हेच सोपं आहे.
पण मी म्हटल्याप्रमाणे "थोडा"च अपेक्षाभंग. कारण आम्हाला अनुभवायला मिळालं ते सौंदर्यसुद्धा अप्रतिम. आणि ह्या ट्रीपमध्ये बेत आखताना, जाताना, येताना, फिरताना, सगळ्याच गोष्टीत आम्ही भरपूर आनंद लुटला होता.
काही ठिकाणी आनंद तिथल्या वैशिष्ट्यांमुळे येतो, काही ठिकाणी आपल्या सोबत असलेल्या लोकांमुळे. आणि कधी त्या दोन्हींमुळे.
प्रेमकथांमध्ये त्या जोडप्याला कुठे तरी दूर दूर जाण्याची इच्छा असते असं दाखवतात. आणि संन्यासी लोकसुद्धा जगापासून वेगळे होण्यासाठी शांत जागी जातात. हि जागा तशीच होती. बाकी जगाचा काहीच संबंध नाही. एकदम शांत. सोबतचे लोक पुढे मागे झाले, किंवा फोटो काढण्यासाठी कुठे रेंगाळलो तर पूर्ण शांतता. आणि आजूबाजूला फक्त सुंदर दृश्य. वेड लावेल इतका सुंदर आहे हिमालय.
जर चाललं असतं तर तिथेच पडून राहून एक रात्र काढायची इच्छा होती. तिथे मावळणारा आणि उगवणारा सूर्य पहायची इच्छा होती. पण काय करणार?
फिरत फिरत, फोटोज काढत, भरपूर पाण्याचे ओढे पार करून आम्ही गाईडच्या मते शेवटच्या टोकाला पोचलो.
गाईडच्या मते यासाठी म्हटलं कि, त्या पुढेसुद्धा वॅली पसरलेलीच आहे. पण तिकडे कोणी जात नाही. तिकडून परत यायला इतका वेळ लागतो कि, आणि तिथे मुक्काम किंवा संध्याकाळपर्यंत फिरलेलं चालत नाही. आणि पुढे जास्त नवीन फुलेही नाहीत, आतापर्यंत पाहिलेलीच फुले इस्ततः विखुरलेली आणि कमी संख्येने दिसतात.
मग आम्ही जर निवांत एका नदीकिनारी बसलो. सोबत आणलेले डबे काढुन जेवलो. चिक्कार सोलो आणि ग्रुप फोटो काढले.
गाईड इथून लवकर परत जायला घाई करत होता. उन कमी होऊन आता पुन्हा ढग यायला लागले होते. जाताना पाऊस पडला तर रस्त्यात लागलेल्या कुठल्याही ओढ्यांचा प्रवाह वाढू शकतो असं त्याला वाटत होतं. आमच्यापैकी काही जण अजून किती पुढे जाता येईल ते बघत होते. त्याला आग्रह करून आम्ही काही जण अजून पुढे एका हिमखंडापर्यंत जाऊन आलो.
थोडासा पाउस पडला तरीही सुदैवाने गाईडला भीती होती तसं काही झालं नाही. आम्ही सावकाश, टाइमपास करत, ती इंद्राची बाग (वॅली) शेवटची डोळ्यात भरून घेत तिथून बाहेर पडलो.
---
ता. क. आज शेवटचा दिवस म्हणून प्राणी पक्षी यापैकी कसले तरी फोटो काढायचेच म्हणून परतीच्या वाटेवर जवळपास अर्धा तास खर्च करून काढलेले फोटो. खूप इकडे तिकडे पळुन हाती लागले फक्त लाल चिमणी
आणि बिन शेपटीचा पहाडी चुहा. (म्हणतात ना, खोडा पहाड, निकला चुहा. :D)
क्रमशः
महाभारताच्या खुणा
दोन दिवस वॅलीमध्ये आणि एक दिवस हेमकुंड साहिब, असे आमच्या योजनेनुसार पार पडल्यावर घांगरीयामधला मुक्काम संपला. सकाळी आम्ही आवरून परत गोविंदघाटकडे निघालो. आता फक्त उतरणे असल्यामुळे सगळेच न थांबता आपल्या आपल्या वेगाने फटाफट उतरले. चढताना ६-७ तास लागले होते. तेच आता उतरताना २-४ तासात झालं.
आजचा दिवस गोविंदघाटला पोहोचणे आणि वेळ असल्यास बद्रीनाथ, माना पाहून येणे आणि आसपास फिरणे यासाठी होता. आम्हाला साहजिकच सगळंच करायचं होतं. देवकांत यांना आम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला हि ठिकाणे पहायची म्हणजे पहायचीच आहेत असे बजावले होते. कारण ह्याचा विषय निघाला कि ते "देखते है, आप कब पोहचोगे, रास्ते खुले है कि नही, बहोत सारी चीझोंपे डिपेंड करता है. सब कुछ सही होगा तो मै तो करा हि दुंगा." अशी वाक्ये वापरत होते.
त्यामुळे आम्ही उतरताना बिलकुल टंगळमंगळ न करता झपाट्याने खाली आलो. पण तरी आम्हाला थांबावं लागलं.
झालं असं कि आम्ही वर जाताना सामानासाठी दोन पोनी केल्या होत्या. तश्याच त्या येताना सुद्धा ठरवल्या. पण त्या पोनीवाल्यांनी एक घोळ घातला. ते सगळे सोबत काम करतात, त्यामुळे एकमेकांना मदत करत सोबत खाली वर जातात. एका माणसाने त्याची बायको आणि छोटी मुलगी यांच्यासाठी एक पोनी केली, आणि त्यांच्या सामानासाठी दुसरी. तो स्वतः पायीपायी खाली आला. त्यांचं सामान कमी होतं. त्यामुळे त्यांच्या पोनीवर भार हलका होता. पोनी अर्धी रिकामीच जात आहे म्हणून या पोनीवाल्यांनी आमच्या सामानापैकी काही सामान त्यावर टाकलं.
आणि ह्या पोनी पुढेमागे झाल्या. आमचं सामान एकत्र आलं नाही. म्हणून आम्हाला थांबावं लागलं. आणि मग जेव्हा त्या माणसाची पोनी आली आणि त्याने त्याच्या सामानासोबत दुसरं सामान पाहिलं तेव्हा त्याने पूर्ण पैसे द्यायला नकार दिला. त्याने वर एका पूर्ण पोनीचे पैसे द्यायला तयारी दाखवली होती. पण त्याच्या पोनीवर सामान टाकलं म्हणून त्याने आता नाही म्हटलं.
यावरून बराच वेळ वाद झाला. आमचं सामान जाताना पण दोन पोनीवर गेलं होतं, आणि येताना पण आलं असतं. त्यांना भार हलका करता येईल असं वाटलं म्हणुन त्यांनी कोणाला न विचारता परस्पर करून टाकलं. आमचे गाईड मध्ये पडले आणि आम्ही तिथून निघालो.
पण रस्त्यात दगडधोंडे रस्त्यात पडले होते. ते हटवायचं काम सुरु झालं होतं. तिथे थांबुन पुन्हा अर्धा एक तास गेला.
हॉटेलवर पोहचून होईल तितकं लवकर आवरून आम्ही जेवलो. आणि बद्रीनाथला निघालो. देवकांत स्वतः आमच्या ग्रुपबरोबर निघाले. तिथे रस्ते परिस्थितीनुसार कधीही बंद करतात म्हणून ते टेन्शनमध्ये होते.
आधी आम्ही बद्रीनाथला गेलो, पण तिथे आरती का काहीतरी चालू होती. त्यामुळे दर्शन बंद होतं. मग आम्ही तोपर्यंत पुढे मानाला जाऊन आलो.
माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव आहे. त्यानंतर तिबेट/चीनची हद्द सुरु होते. गावाच्या हद्दीवर काही दुकाने आहेत. त्यांनी हिंदुस्तानकि अंतिम दुकान, हिंदुस्तानकि अंतिम चाय, हिंदुस्तानका अंतिम पकोडा, असल्या मजेशीर पाट्या लावल्या होत्या.
पुढे काही अंतरावर प्रसिद्ध वसुधारा धबधबा आहे. लोक इथे पण ट्रेक करतात.
डोंगराच्या खोबणीत एक बाबा धुनी पेटवून बसला होता. पूर्ण चेहऱ्याला भस्म लावलं होतं. बाजूला "बाबा बर्फानी नागा बाबा. बाबा कोणाला काही मागत नाहीत, लोकांना स्वतःला काही द्यावे वाटल्यास देऊ शकतात." अशा आशयाची पाटी लावली होती.
बरेच लोक त्याचा फोटो काढत होते. बाबाला सवय असावी फोटोंची, मला त्याचा लक्ष नसताना फोटो काढायचा होता, पण त्याचं लक्ष गेलं आणि हात उंचावून पोज दिली.
माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव एवढंच ऐकलं होतं. पण तिथे गेल्यावर महाभारताचं एक पर्वच सुरु झालं. त्या गावात महाभारताच्या भरपूर खुणा दिसतात.
त्या अंतिम दुकानाजवळ एक मोठ्ठा धबधबा/सरस्वती नदीचा उगम आहे. अत्यंत जोराने मोठ्या आवाजात तिथून पाणी कोसळत असतं. (खालील व्हिडीओ पहा) तिथल्या सांगण्यानुसार हि सरस्वती नदी. ती उगमापासून एवढ्या जोराने वाहते, आणि पुढे काही अंतरावर अलकनंदा नदीमध्ये मिसळून जाते. पण अलकनंदा नदीचा प्रवाह शांतच राहतो, आणि ह्या जोराचा अथवा वेगाचा परिणाम दिसत नाही, म्हणून सरस्वती नदी लुप्त होते असं इथलं स्पष्टीकरण आहे.
सरस्वती नदीच्या असण्या-नसण्याविषयी, लुप्त होण्याविषयी, आणि जागेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यापैकी हा एक.
त्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला जोडणारी एक मोठ्ठी शिळा आहे. तिला "भीम पूल" म्हणतात. त्याची कथा अशी कि, ती मोठी शिळा तिथे भीमानेच उचलून टाकली आणि पुढे जायला रस्ता केला. ह्याच रस्त्याने पांडव पुढे स्वर्गात गेले.
त्याच गावात व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. तिथेच राहून त्यांनी महाभारताचे लेखन केले अशी आख्यायिका आहे. जायची प्रचंड इच्छा असूनही देवकांतनी आम्हाला तिथून धावत पळत बद्रीनाथला नेलं.
बद्रीनाथचं अगदी सहज दर्शन झालं. पण तिथल्या बुवांचा वाईट अनुभव आला. पण त्याबद्दल पुढच्या पोस्ट मध्ये लिहितो. आज फक्त महाभारताविषयी.
मग परतीच्या रस्त्यावर लागलो, आणि धोकादायक भाग पार झाल्यावर शेवटी देवकांतचा जीव भांड्यात पडला.
परतीच्या वाटेत एक जागा आहे हनुमान चट्टी. याच जागी भीमाचा रस्ता अडवून हनुमानाने त्याचे गर्वहरण केले अशी पौराणिक कथा आहे.
हॉटेलवर पोहोचलो तेव्हा नुकतीच संध्याकाळ झाली होती. आम्ही पुन्हा आसपास फिरायला गेलो. देवकांत नि एक गाईड सोबत दिला.
आम्ही पांडव मंदिरांकडे निघालो. रस्त्यात जाताना आधी एक इंद्रधनुष्य दिसले.
नंतर बोनस म्हणून आणखी एक पुसटसे.
पांडू राजाला नपुंसकतेचा शाप होता. त्याची पौराणिक कथा अशी कि एका ऋषीने पांडू राजाला तो आपल्या राणीजवळ कामेच्छेने जाताक्षणी मरण पावेल असा शाप दिला होता. वास्तववादी दृष्टीकोनातून महाभारत लिहिणारे लेखक हा भाग वेगळ्या पद्धतीने लिहितात. अपत्यहीन असलेला निराश राजा आपल्या दोन राण्यांना घेऊन हिमालयात आला. तो याच ठिकाणी राहत होता आणि तप करत होता.
दोन्ही राण्यांना नियोग पद्धतीने देवांकडून (काहींच्या मते त्या काळी हिमालयात राहत असलेल्या योद्धा जमाती) संतती झाली. ते काही वर्षे तिथेच राहत होते. पण पांडू राजा माद्रीजवळ मोहाने गेला आणि मरून गेला. माद्री सती गेली. आणि एकटी पडलेली कुंती पाचहि मुलांना घेऊन पुन्हा हस्तिनापुरला गेली.
पुढे पांडव जेव्हा वनवासात फिरत असताना या ठिकाणी आले, तेव्हा भीमाने या ठिकाणी पांडू राजाच्या तपाच्या जागेवर मंदिर बांधले. तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारे हि कथा सांगितली.
ह्या मंदिराचे आणखी महत्व म्हणजे बद्रीनाथ जेव्हा बंद केले जाते तेव्हा बद्रीनाथची पूजा याच देवळात केली जाते.
मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकांमध्ये या घटना आहेतच. पण त्या ह्या जागी घडल्या असे म्हटल्यावर सगळे महाभारत डोळ्यासमोरून सरकते.
काहीजण रामायण महाभारत फक्त कल्पनाविलास मानतात. काहीजण इतिहास मानतात. तर काहीजण अतिरंजित वृत्तांत मानतात. मला तसेच वाटते.
ह्या दोन्ही महाकाव्यांचा भारतीय समाजावर प्रचंड पगडा आहे. भारतभर अशा अनेक खुणा आहेत. आणि प्राचीन आहेत. शेकडो वर्षांपासून आहेत. द्वारका आहे, मथुरा आहे. मृत्युंजय आणि युगंधरच्या शेवटी बऱ्याच ठिकाणांचे फोटो आहेत. पाचगणीला पांडवांची पावले दाखवतात. दक्षिणेत कुठेतरी दुर्योधनाचेहि मंदिर आहे.
जर ह्याला फक्त साहित्य मानले, तर देशभरात वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी लोक प्रभावित झाले आणि त्यांनी ह्या खुणा स्वतःच बनवल्या असे समजायचे?
इंग्लंडला शेरलॉक होम्सचे असे घर आणि संग्रहालय आहे. लोक त्या पात्राच्या एवढे प्रेमात पडले कि २२१ बेकर स्ट्रीटवर त्याचे घरच बांधले, त्याच्या प्रसिद्ध वस्तू आणुन ठेवल्या. आपल्याकडे हा उद्योग फार आधीपासुन चालू आहे म्हणायचा मग.
आता देऊळ सिनेमात दाखवलं आहे तसं गावाचं महत्व वाढण्यासाठी एक देऊळ त्याची महती कृत्रिम पद्धतीने वाढवून गावातली आवक जावक वाढवता येते. पण तसं इथे झालंय असं वाटत नाही. पण ह्या गोष्टी भारतात पर्यटन हा उद्योग नसल्यापासून केवळ श्रद्धेवर आधारलेल्या आहेत.
त्यामुळेच मला अतिशयोक्तीचा भाग किती हे सांगता येत नाही, पण ती पुटे बाजूला केली तर काही तरी सत्यांश ह्या कथांमध्ये दडला असावा असं वाटतं.
आजसुद्धा हे भाग एवढे दुर्गम आहेत. बरेच दिवस रस्तेच बंद असतात. आणि चालू असले तरी कधी खराब होतील, बंद होतील सांगता येत नाही. अशा ठिकाणी येउन हि मंदिरे कोणी बांधली असतील? त्याची माहिती कशी पसरली असेल? कुठल्या ओढीने ह्या ठिकाणी वर्षानुवर्षे भक्त येत असतील?
हिमालयाचं सौंदर्य फारच गूढ आहे. आसक्ती आणि विरक्ती असे दोन्ही परिणाम साधणारे हे अनोखे सौंदर्य. ह्याच्या प्रेमात पडून लोक वारंवारसुद्धा येतात. काही लोक विरक्तीमुळे इथेच येउन राहतात. उगाच नाही तप म्हटले कि हिमालय डोळ्यासमोर उभा राहत.
त्या बर्फानी बाबा सारखे जगाची फिकीर नसणारे आत्म मग्न लोक असेच हिमालयाच्या कडेकपारीत बसत असतील. ऋषी तपासाठी येत असतील. महाभारतातच पांडव विशेषतः अर्जुन तर कितीतरी वेळा हिमालयात येउन गेले. काहीतरी खास जादू आहे ह्या हिमालयात.
महाभारत, हिमालय, आसक्ती, विरक्ती असे अनेक विचार त्या वेळी मनात तरळून गेले, आणि त्या खुणा मनावरही कोरून गेले.
क्रमशः
बद्रीनाथ आणि हरिद्वार
मागच्या पोस्टमध्ये मी बद्रीनाथ आणि जवळचे भारतीय सीमेवरचे अंतिम गाव माना येथे जाऊन आल्याचे वर्णन केले आहे. पण बद्रीनाथला थोडा संतापजनक अनुभव आला, त्याबद्दल सविस्तर सांगायचं होतं. मागची पोस्ट हि प्रामुख्याने महाभारताच्या खुणांवर होती.
बद्रीनाथला आम्ही गेलो आणि अनपेक्षित रित्या अगदी सहज पटकन दर्शन झाले. प्रवेशद्वारावर मोठी घंटा आहे ती वाजवून आम्ही आत गेलो. गर्दी नसल्यासारखीच होती. एक साधूबाबा आम्ही न बोलावताच समोर आले. "इधर से जाओ, यहा से अंदर जाना है" अशा सूचना द्यायला लागले.
आत गेलो, आतमध्ये अगदी बारीक चार पाच मुर्त्या होत्या. त्यांच्याभोवती दागिने, फुले, हार यांची इतकी रेलचेल होती कि त्यातली कोणती मूर्ती कोणाची हेच कळत नव्हते. त्यामुळेच एक गुरुजी माइक घेऊन बसले होते. त्यांची कमेंटरी चालू होती. "आपके दाये बाजू ये है, बीच मे ये है. वगैरे."
मला मंदिरात दान दिलेले आवडत नाही. (त्याबद्दल सविस्तर येथे वाचा.) त्यामुळे बद्रीनाथाला काहीही न चढवता मी बाहेर आलो.
बाहेर ते मघाशीचे बाबा पुन्हा भेटले. मंदिरात चारी बाजूला आणखी लहानसहान मंदिरे आहेत. आम्ही प्रदक्षिणा मारत तिथे फिरतच होतो. हे आमच्या मागेमागे, "अब यहा, अब वहा" करत फिरत होते.
समोर आमचे काही मित्र एक दुसरे बाबा आसनावर बसले होते त्यांच्याभवती उभे होते. ते काहीतरी लक्ष देऊन ऐकत आहेत असं वाटलं. मला वाटलं चेहरा पाहून भविष्य वगैरे सांगत असतील म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी तिथे गेलो. ते फक्त तोंडाला येईल तो आशीर्वाद देत होते, आणि टिळा लावत होते. आणि हि सेवा अर्थातच मोफत नव्हती. आम्ही पामर तो साधूचा आशीर्वाद समजून पुढे निघालो तेव्हा त्यांनी थाळी वाजवून दक्षिणा वसूल केली.
मंदिरात फिरून झाले आणि बाहेर निघालो कि हे मागे फिरणारे बाबा दक्षिणा मागायला लागले. जे कोणीही सांगायची आवश्यकता नाही, असली माहिती स्वतःहून भाविकांच्या मागे फिरून देऊन त्याची दक्षिणा त्यांना अपेक्षित होती. त्या आशीर्वादवाल्या बाबांकडे तरी मी स्वतःहून गेलो होतो, ह्या अनाहूत माणसाला काही देणे शक्यच नव्हते. मी त्यांना नकार दिला.
तेव्हा त्यांनी हात उंचावून शिव्याशाप द्यायला सुरु केले. "वाह रे भक्त. वापस मत आना यहा." मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर गेलो.
देवकांत यांनी मानाहून येताना नीलकंठ शिखर दाखवले होते. आणि ते म्हणाले कि हे दिसायला पुण्य लागते. ते शिखर खूप कमी वेळा दिसते. बऱ्याचदा ढगांमध्ये गुडूप होते. ते आता पुन्हा दिसत होते. आम्ही त्याचे फोटो काढत होतो.
तोच अजून एक बाबा माझ्याजवळ आले. म्हणाले, "बेटा यात्रापर निकला हु, एक छाता या ऐसी कोई काम कि चीज दिलवा दो." येउन त्यांनी सरळ ऑर्डरच दिली. ५-१० रुपयात खुश होणारे भिक्षुक नव्हते ते.
मी त्यांना नकार दिला आणि किंचित दूर गेलो. बाकी जणांना पुन्हा मलाच असा बाबा येउन भेटला म्हणून जरा हसु आलं. तोपर्यंत या बाबांनीसुद्धा रागारागात बडबडायला सुरु केलं.
"कलयुग है बेटा, कलयुग!!! नारायण कि सेवा नाही करोगे, तो यहा आनेका क्या फायदा? दरिद्र नारायण जानते हो? यु हि तो बाड आती है. तुम जैसे लोग ले डूबोगे दुनिया को."
त्यांच्याकडेसुद्धा दुर्लक्ष करून आम्ही गावात, बाजारात थोडा फेरफटका मारला. फिरत फिरत गाडी लावली होती तिकडे गेलो.
तिथे एक सगळी चाके काढलेला टेम्पो उभा होता. देवकांत यांनी आम्हाला त्याबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगितली. खरी कि खोटी माहित नाही. त्या गाडीच्या मालकाने खोटा विमा अर्ज दाखल केला होता. गाडी व्यवस्थित असूनसुद्धा ती पुरात वाहून गेली असा अर्ज केला. विमा कंपनीने तो दावा खोटा असल्याचे सिद्ध केले आणि तो मालक तुरुंगात गेला. तेव्हापासून टेम्पो तिथेच पडून होता. मालक दूर तुरुंगात असल्यामुळे बाकी भामट्यांनी बिनधास्त तिची चाके लंपास करून टाकली.
बद्रीनाथहून आम्ही परत गोविंदघाटला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिद्वारला निघालो. आजचा दिवस फक्त या प्रवासासाठी होता. येताना आम्ही या भागात पोचलो तेव्हा अंधार झाला होता. त्यामुळे आम्हाला काहीच दिसले नव्हते. तेच सौंदर्य आता जाताना पाहत होतो. हिमालय सोडून तिथून निघण्याची इच्छा होत नव्हती.
गोविंदघाटवरून थोडं खाली जोशीमठच्या पुढेमागे आमचे मोबाईल पुन्हा सुरु झाले. आणि उत्तराखंड पोलिसकडून मेसेज यायला सुरुवात झाली. जाताना आम्हाला येताना लागली होती त्याहून मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे भरपूर आधीपासून मार्ग वळवला होता. थोडाथोडा वेळ काही ठिकाणी वाहतूक खोळंबून राहत होती, पण तासंतास एका ठिकाणी थांबावं लागलं नाही.
गाडीत आमचा अंताक्षरीचा गेम रंगला होता. वाटेत थांबून लक्ष्मण झुला पाहिला.
संध्याकाळी हरिद्वारला पोचलो. तेव्हा रात्रीच्या ट्रेनला काही तासांचा वेळ शिल्लक होता. आम्ही फ्रेश होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी दोन रूम घेतल्या. हॉटेलवाल्यांनी आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, होईल तितकी घासाघीस करून आम्ही रूम ताब्यात घेतल्या.
आमच्यापैकी काही जणांना घाटावरची आरती पाहण्याची खूप इच्छा होती. पण बाथरूम दोनच असल्यामुळे आवरायला वेळ लागला. इथे पोचल्यावर सगळे थकले होते. कोण नक्की येणार, थांबणार काही समजत नव्हते. फक्त काही मिनिटे शिल्लक होती. आणि वेळ पुढे सरकत होता. अरूप आणि अमित जास्त थांबण्यात अर्थ नाही असा विचार करून मी तोंड धुवेपर्यंत पुढे पळाले.
मी तसाच ओल्या तोंडाने हॉटेलच्या बाहेर पळत आलो. घाटापर्यंत मी पळत तर पोचू शकणार नव्हतो. म्हणून मी तडक समोर आली ती सायकल रिक्षा केली. तोच निखिलसुद्धा मागे पळत आला, आणि माझ्या सोबत बसला. ह्या पळापळी मुळे काहीजण थोडे नाराज झाले. त्यांना पण यायचे होते. :D.
आमची सायकलरिक्षा सवारी मजेदार झाली. हिंदी पिक्चरमध्ये उत्तर भारतातली शहरे, गल्ल्या, बोळी, बाजार, गर्दीतून फिरणारा कॅमेरा असं चित्रण असतं तसंच अगदी वातावरण होतं. दोन्ही बाजूला दुकाने, त्यांच्यासमोर रस्त्यावर आलेले वेगवेगळ्या गोष्टींचे ठेले, अमर्याद गर्दी, ती सगळी मुख्य रस्त्यावर फुटपाथ असल्यासारखी फिरत होती. त्यांच्यामधून वाहने नो एन्ट्रीमध्ये घुसल्या सारखी अंग चोरून वाट काढत दोन्ही बाजूने चालली होती. आमचा सायकल रिक्षावाला फुल ताकद लावून आम्हाला पुढे ओढून घेऊन जात होता. कोणाशीही आपली टक्कर होईल अशी भीती वाटतच होती तोच एका दुचाकीच्या खेटून जाण्यामुळे सायकल रिक्षा कलंडला, आणि मी खाली सांडलो.
"गिरे तो भी सर उप्पर" असे म्हणतात तसे आमचे "गिरे तो भी कॅमेरा उप्पर" असे आहे. मला त्याचीच काळजी होती. बारीक से खरचटले, पण बाकी काही नाही. पुन्हा रिक्षात बसलो आणि पुढे निघालो. घाटावर पोचलो तेव्हा आरती जस्ट म्हणजे अगदी जस्ट संपली होती. हुकलीच शेवटी.
अरूप आणि अमितसोबत अनुजासुद्धा पळत गेली होती हे तिथे गेल्यावरच समजले. ते तिघे खूप पळाले होते आणि घामाघूम झाले होते. त्यांनासुद्धा अगदी शेवटचे काही क्षण बघायला मिळाले होते, पण अगदी परिपूर्ण दृश्य दिसले नव्हते. गंगा नदीच्या घाटावर हजारो लोक आरती करताना खूप छान दृश्य असते, हे फक्त टीव्हीवर पाहिले होते, पण प्रत्यक्षात संधी हुकली होती.
मग थोडावेळ घाटावर फिरलो. हजारो लोक नदीत अंघोळी करत होते. पाण्यापेक्षा सोडलेले दिवे, साबणाचे फेस, निर्माल्य, माणसे यांचाच भरणा नदीत जास्त दिसत होता. काही लोक आरतीचे ताट घेऊन फिरत होते आणि दक्षिणा गोळा करत होते. ते मंदिराचे पुजारी आहेत का, त्यांनी कोणती पूजा केली, आरती खरोखर केली का, कि फक्त कापूर जाळून दक्षिणा गोळा करत होते काय माहित. एक ताट, दिवा, तेल आणि कापूर एवढ्या भांडवलावर आपणसुद्धा हेच करू शकतो.
झाडेझुडपे उगवल्यासारखी गंगा, भगीरथ, शंकर यांची मंदिरेसुद्धा भरपूर होती. एकेक मंदिराच्या चहुबाजूला ओटे करून आणखी मिनी मंदिरे बनवली होती. म्हणजे प्रदक्षिणा घालताना सुद्धा अजून ४ देव दिसणार, आणि त्यात लोकांना दक्षिणा घालावी वाटणार.
आणि जवळपास सर्व मंदिरांवर "असली और प्राचीन" असा बोर्ड लावला होता. प्राचीन ठीक आहे एक वेळ, पण असली मंदिर म्हणजे? देवांची पण पायरसी होते कि काय इथे? कुठल्या दुकानावर शोभतील असले बोर्ड होते ते. बरोबरच आहे म्हणा. इतक्या हजारो लाखो भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धेला सेवा पुरवणारी मोठी व्यावसायिक चेनच ती, त्याच्या सगळ्या शाखा. त्यात स्पर्धा, म्हणून आम्हीच असली आणि प्राचीन अशी जाहिरात.
नदीतले पाणी पाहता त्यात जायची इच्छा होत नव्हती. तरी आपली पण सुप्त श्रद्धा, आणि "हरिद्वार आए और गंगा नही नहाए" असं नको व्हायला म्हणुन दूर एका गर्दी नसलेल्या कोपऱ्यात थोडा पाण्याला स्पर्श करून आलो.
थोडी भूक लागली होती, येताना चाटची मोठी दुकाने पाहिली होती. चाट, पूजा साहित्य, कपडे, प्रवाशांना लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची बरीच दुकाने होती. आणि त्यातल्या काही दुकानांवरसुद्धा "प्राचीन और प्रसिद्ध" असे बोर्ड होते.
एका दुकानात खूप गर्दी होती म्हणून तिथली कचोरी खाल्ली. नाव मोठं लक्षण खोटं. बस एवढंच वर्णन पुरे. ती गर्दी लौकिकामुळे नसावीच, फक्त आलेले लोकच इतके होते कि प्रत्येक ठिकाणी गर्दीच होती.
अजून काही खाण्याची इच्छा राहिली नाही. तसेच परत गेलो. जेवायला एका हॉटेलवर गेलो. जेवण होता होता जोरदार पाउस सुरु झाला. आमची थोडी फजिती झाली. अगदी समोर पलीकडे असलेल्या स्टेशनवर आम्हाला सामान सुखरूप पोचवायला रिक्षा कराव्या लागल्या.
आम्ही स्टेशनवर पोचल्यावर अगदी थोडाच वेळ तो पाउस टिकला. फक्त आमची फजिती उडवायलाच आला होता.
रात्री उशिराची संथ गतीने जाणारी ट्रेन होती. माझी जागा जरा दुसरीकडे होती. जागेवर पोचून थोड्यावेळात मी झोपून गेलो. सकाळी दिल्लीला पोचलो.
स्टेशनबाहेर आम्ही एक सोबत ट्रीपमधला शेवटचा सेल्फी/ग्रूपी काढला आणि आम्ही पांगलो. प्रत्येकाचे वेगळ्या वेळी वेगळ्या ठिकाणी विमान होते.
मध्ये वेळ असल्यामुळे आम्ही ४ जण ममताच्या घरी जाऊन आलो. काकूंनी अगदी चविष्ट पुरी भाजी करून आम्हाला तृप्त केलं. विमानतळावर जाऊन परतीचं विमान पकडलं आणि एक जबरदस्त सहल संपली.
क्रमशः (पुढील पोस्टमध्ये फक्त माहिती)
माहिती आणि समाप्त
वॅली ऑफ फ्लॉवर्सची आमची ट्रिप खूपच छान आणि संस्मरणीय झाली. त्याबद्दल तुम्ही या मालिकेत वाचलंच आहे. आता त्या संदर्भात तिकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल अशी माहिती देत आहे.
मार्ग/टप्पे :
-१. दिल्ली पर्यंत : आम्ही पुणे आणि मुंबईचे लोक मिळून गेलो होतो. तिथून दिल्लीला विमानाने पोचलो आणि एकत्र आलो.
०. दिल्ली ते हरिद्वार हा प्रवास ट्रेनने केला. दिल्ली ते देहरादून मार्गावर हरिद्वार येते आणि यासाठी कमी अधिक वेगाच्या अनेक ट्रेन आहेत. आम्ही देहरादून जनशताब्दी एक्स्प्रेसने गेलो. ४-५ तासात आम्ही हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वारपासून आमचे वॅली ऑफ फ्लॉवर्सचे टूर कंपनीचे पॅकेज सुरु झाले.
मुक्काम : हरिद्वार
१. ट्रीपमधला पहिला दिवस हरिद्वार ते गोविंदघाट या प्रवासासाठी होता. साधारण ३०० किमीच्या या डोंगराळ प्रवासाला १०-१२ तास लागतात. आणि दरड कोसळली तर कितीही वेळ खोळंबा होऊ शकतो.
मुक्काम : गोविंदघाट
२. दुसरा दिवस : गोविंदघाट ते घांगरीया पायी जाण्यासाठी. १४ किमीचे अंतर आहे. ८-१० तास लागतात. आपल्या क्षमता आणि वेगानुसार वेळ कमीजास्त होऊ शकतो. इथुन पुढे चार दिवस घांगरीयामधेच राहिलो. वॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि हेमकुंड या दोन्हीच्या पायथ्याशी हे गाव आहे, आणि दोन्ही ठिकाणी राहण्याची सोय नसल्यामुळे याच गावी राहावे लागते.
मुक्काम : घांगरीया
३. तिसरा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये पहिली वारी. घांगरीयापासून ६ किमीपर्यंत फिरून आलो. जाऊन येउन १२ किमी.
मुक्काम : घांगरीया
४. चौथा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये दुसरी वारी. घांगरीयापासून १० किमीपर्यंत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फिरून आलो. जाऊन येउन २० किमी. हा दिवस राखीव दिवस आहे. हि ट्रीप मुख्यतः वॅली ऑफ फ्लॉवर्ससाठी आहे, तिचा मनमुराद आनंद घेता यावा आणि पहिल्या दिवशी काही समस्या आली, किंवा गोविंदघाटला पोहचायलाच उशीर झाला तर हा दिवस कामी येतो. काही लोक एकदाच फिरून या दिवशी आराम करणेसुद्धा पसंत करतात.
मुक्काम : घांगरीया
५. पाचवा दिवस : हेमकुंड साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठी. घांगरीयापासून ६ किमी अंतर असले तरी सलग चढण चढत जायला बराच वेळ लागतो. आणि विकीपेडियावरील माहितीनुसार तेथे जाताना बऱ्याच जणांना उंचीचा त्रासहि होतो. मलासुद्धा त्या दिवशी उन लागल्यामुळे खूप त्रास झाला होता. वर लंगरमध्ये प्रसादाचे जेवण मिळते.
मुक्काम : घांगरीया
६. सहावा दिवस : घांगरीया ते गोविंदघाट पायी परत. उतार असल्यामुळे येतानापेक्षा निम्म्या वेळात प्रवास होतो. याच दिवशी वेळ उरल्यास बद्रीनाथ आणि मानाला भेट देता येते.
मुक्काम : गोविंदघाट
७. सातवा दिवस : गोविंदघाट ते हरिद्वार परतीचा प्रवास. पुन्हा तेवढाच वेळ. आम्ही मध्ये थांबून लक्ष्मण झुला पाहून घेतला. हरिद्वारला जाऊन रात्री दिल्लीसाठी मसुरी एक्स्प्रेस पकडली. हि जनशताब्दीपेक्षा संथ जाते. आम्ही मुद्दाम हि निवडली कारण त्यामुळे आमची रात्रभर झोप झाली आणि आम्ही सकाळी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीहून विमानाने मुंबई/पुणे परत.
टूर कंपनी :
- आम्ही ब्लू पॉपीज हॉलिडेज या कंपनीकडून गेलो होतो.
- त्याचे व्यवस्थापक देवकांत संगवान स्वतः आमच्या सोबत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आले होते.
- त्यांचे पॅकेज हरिद्वार ते हरिद्वार आहे. त्यातल्या गोष्टी याप्रमाणे
- हरिद्वारला पहिल्या दिवशीचा मुक्काम
- हरिद्वार ते गोविंदघाटला जाण्यासाठी सदस्यांच्या संख्येप्रमाणे गाडी.
- हीच गाडी तुम्हाला हरिद्वारला परत सोडते.
- गोविंदघाटचा मुक्काम (त्यांनी स्वतः चालवायला घेतलेले चांगले हॉटेल आहे )
- घांगरीयामध्ये ४ रात्रींचा मुक्काम
- घांगरीयामध्ये असेपर्यंत सर्व जेवणे (न्याहारी, दुपारच्या जेवणाचे पार्सल सोबत घेऊन जाण्यासाठी, रात्रीचे जेवण)
- वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाताना सोबत गाईड
- शुल्क : १५-१८ हजार. मुद्दाम अंदाज देत आहे. ग्रुपमधली सदस्यांची संख्या, जातानाची वेळ, किती आधी आरक्षण केले आहे, आणि किती घासाघीस केली आहे यानुसार शुल्क कमीजास्त होईल.
- त्यात पुन्हा या वर्षी त्यांनी वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस वगळण्याचा, आणि सोबत औली पाहून येणाचा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे शुल्क वेगळे असेल.
- मला त्यांची सेवा चांगली वाटली. ते ठिकाण दुर्गम आहे. राहण्याखाण्याची चांगली सोय झाल्यामुळे आपल्याला जास्त काही बघावे लागत नाही.
- आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस आणि जास्त खोलात जाऊन फिरणे हे फक्त तेच करून आणतात. तुम्ही प्लान करताना याची खात्री करून मग जाऊ शकता.
- त्यांची वेब साईट : http://www.valleyofflowers.info/
- यावर खूप सविस्तर आणि चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे.
- देवकांत संगवान यांनी स्वतः काढलेल्या फुलांच्या आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांचे संकलन करून एक फोटो बुक दिले आहे. यात सुंदर फोटोज आणि उपयुक्त माहिती आहे.
- काही कंपन्या तंबूमध्येसुद्धा व्यवस्था करून देतात, त्याचा खर्च बराच कमी असू शकतो. पण तंबू लावलेल्या जागेपर्यंत जाण्यायेण्यामुळे अंतर वाढू शकते.
इतर खर्च :
- वर दिल्याप्रमाणे घांगरीयामध्ये आपला मुख्य मुक्काम असतो, तिथली जेवणे मुख्य शुल्कात असल्यामुळे आपल्याला फक्त घरून तिथे पोहचेपर्यंत, आणि तिथून घरी जाईपर्यंतचा खाण्याचा खर्च करावा लागतो.
- हरिद्वारला जाणे आणि येणे हा खर्च आपला असतो.
- याखेरीज आपण काही खरेदी केली तर.
- खरेदी करण्यासारखे काही विशेष नाही. पण गरम कपडे, टोप्या, ट्रेकिंगचे साहित्य अशा गोष्टी सोबत आणल्या नसतील तर इथे घेऊ शकता.
कधी जावे :
यात काही फार पर्याय उपलब्ध नाहीत. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ जमतो, तो उन्हाळ्यात वितळायला सुरुवात होते. इथे फक्त पावसाळ्यात जाता येते. प्रत्येक फुलाचा स्वतःचा हंगाम असतो. हे बर्फ लवकर किंवा उशिरा वितळण्यावर अवलंबून आहे. जुलैच्या दुसऱ्या भागात आणि ऑगस्टच्या पहिल्या भागात हा सर्वाधिक फुले असण्याचा काळ. जुलै हाच जास्त चांगला म्हणतात. पण आम्ही जुलैमध्ये गेलो, तरी यावर्षी बर्फ उशिरा वितळल्यामुळे फुले उशिरा आली. म्हणून मी ऑगस्टचा पहिला भागसुद्धा म्हणतोय.
घांगरीयामधल्या सोयीसुविधा :
- घांगरीया या गावात फक्त पावसाळ्यात हंगामी वस्ती असते. त्यामुळे येथे मर्यादित हॉटेल्स आहेत.
- ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतात. पण किंचित जास्त भावाने.
- सर्वाधिक महाग टेलिफोन आहे. एका मिनिटाचे १० रुपये घेतात.
- इथे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालते असे आम्हाला सांगितले होते. पण आमच्यापैकी ज्यांनी मुद्दाम हे फोन नंबर आणले होते त्यांचेसुद्धा इथे काही चालले नाहीत.
- बहुधा फक्त उत्तराखंड सर्कलचे चालत असावेत.
- गोविंदघाटला पोचल्यानंतर फोन बंद पडतात. त्या आधी मात्र सर्वांचे चालू होते.
- त्यामुळे येथे येताना रोमिंग सुविधेची खात्री करून या.
- बाकी आम्ही थांबलेले प्रिया हॉटेल राहण्यासाठी ठीक ठाक होते, येथली सर्व हॉटेल्स तशीच आहेत.
- सेवा मात्र तत्पर होती.
- जेवण सर्व ठिकाणी उत्तम होते.
काय बदलू शकता?
- वेळ असल्यास पुणे/मुंबई ते दिल्लीपर्यंतचा (आणि परतीचा) हाच प्रवास ट्रेनने सुद्धा होऊ शकतो. त्यात एका वेळेस एक दिवस अख्खा जातो. पण भाडे कमी लागते. काही महिने आधीपासून बेत आखल्यास विमानाचे तिकीटसुद्धा स्वस्तात मिळू शकते.
- बद्रीनाथ आणि माना आमच्या प्लानमध्ये घांगरीयाहून गोविंदघाटला लवकर पोचता आले तरच शक्य आहे. आणि दुपारी ३-४ नंतर कधीही रस्ते बंद होतात. तिकडे जाण्याची जोरदार इच्छा असेल तर मुक्काम वाढवून त्यासाठी एक दिवस राखीव ठेवू शकता.
- हरिद्वार आणि आसपासची तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी जास्त वेळ देऊ शकता.
तयारी
- ट्रीपसाठी वर दिलेल्या साईटवर सविस्तर माहिती आहे.
- त्याखेरीज मला जाणवलेल्या गोष्टी
- तुमच्याकडे अगोदरच असल्यास ट्रेकिंग स्टिक सोबत बाळगा
- किंवा गोविंद घाट हून जाताना ३०-४० रुपयात लाकडी स्टिक मिळेल ती घ्या.
- हिचा चढताना फार उपयोग होतो.
- चालण्याचा रोजचा सराव नसेल तर काही आठवडे आधी नक्की सराव करा आणि आपली क्षमता वाढवा.
- सवय नसेल तर इथे अचानक एवढे किमी चालून त्रास होऊ शकतो, आणि तुम्ही आनंदास मुकु शकता.
अजुन काही माहिती हवी असल्यास मला विचारा. हिमालय आयुष्यात किमान एकदा तरी पहावाच. आमची ट्रीप एकदम जोरदार झाली. आयुष्यभर लक्षात राहील. तुम्ही गेलात तर तुमचीसुद्धा तशीच होवो अशी आशा करतो.
No comments:
Post a Comment