लेखन :- हर्पेन पेंडसे
खाली मान घालून पायाखालची वाट नजरेआड न करता एका मागोमाग एक असे आम्ही १९-२० जण नागमोडी वळणे घेत घेत चालत होतो आणि अचानक एका वळणा नंतर आमचा लीडर अचानक चित्कारता झाला. नक्की काय बोलतोय हे लगेच काही कळले नाही पण तो दाखवत होता त्या दिशेला पाहता ताज्या बर्फावर उमटलेले ते पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते आणि ते ज्या डोंगरदिशेला गेले होते तिकडे वरती आकाशात बरेच पक्षी घिरट्या घालत होते. लीडरच्या अंदाजानुसार ते ठसे बिबट्याचे होते आणि नुकत्याच केलेल्या शिकारीची चाहूल लागल्यामुळे ते पक्षी तिकडे जमा झाले असावेत. हे ऐकून कळून वळून मेंदूत शिरायला लागणारा वेळ नेहेमी पेक्षा जरा जास्तच होता पण परिस्थितीच तशी होती. "खालून बर्फ, वर बर्फ़ बर्फ बाजूंनी" अशा परिस्थितीत चालताना सगळ्या अंगावर कपड्यांचे थरच्या थर तर होतेच पण कान टोप्या देखील दोन दोन होत्या, एव्हढे करूनही हातापायाच्या बोटांनाच नव्हे तर आख्ख्या आपल्यालाही एक बधिरपण येतं. पण आपण जिथून चालतोय त्या भागात आपल्या अगदी जवळपास हिमबिबट्या वावरतोय ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे नाही आणि आपण तर त्याच्या पाऊलखुणा प्रत्यक्ष पाहतोय, त्यांच्या शेजारून चालतोय. ते ही इतक्या अनपेक्षितरित्या.
पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अजिबात अंदाज बांधता ना येणे ही तर हिमालयातल्या वास्तव्यात येणारी नित्य अनुभूती पण हे असे 'अपेक्षित असलेले अनपेक्षित' अक्षरशः प्रत्येक पावला गणिक अनुभवायचे असेल तर त्याकरता चादर ट्रेक करायलाच हवा.
मला स्वतःला तोचतोचपणाचा बऱ्यापैकी कंटाळा येतो, आयुष्यात नित्यनूतन, अनपेक्षित, ज्या परिघात आपण आश्वस्त असतो त्याबाहेरचे काहीतरी घडायला हवे असे मला फार वाटते. नाहीच तर ते आपण घडवायला हवे अशी माझी धारणा आहे. त्यात जगण्याची खरी मजा आहे आणि त्यामुळेच मी चादर ट्रेकला जाण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला म्हणून सांगतो पुरी हौस फिटली माझी.
चादर ट्रेक म्हणजे आहे तरी काय
चादर म्हणजे बर्फ़ाचा थर, चादर शब्दावर जाऊ नका, हिवाळ्यानुसार घोंगडीच काय गादीपेक्षाही चांगला जाडजूड होत असतो हा थर. वाहत्या नदीचे पाणी हिवाळ्यातल्या उणे तपमानामुळे गोठून हा थर तयार होतो. उत्तर भारतातल्या लडाख भागात सिंधू नदीची उपनदी असलेल्या झंस्कार नदी चे पात्र जेव्हा हिवाळ्यात गोठते, तेव्हा त्याचा वापर स्थानिक माणसे ये जा करण्याकरता करतात. झंस्कार हे नदीप्रमाणेच गावाचे आणि प्रदेशाचेही नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसात होणाऱ्या प्रचंड हिमवर्षावामुळे या प्रदेशात राहणाऱ्या माणसांचा आजूबाजूच्या गावांशी असलेला संपर्क पूर्णतः तुटतो. अशावेळी नेहमीच्या रस्त्याने जा ये करणे अशक्य होत असल्याने या गोठलेल्या नदीपात्राचा वापर व्यापार करणे सामानाची ने-आण करणे अशा कामांकरता वर्षानुवर्षे करत आलेले आहेत. कधीतरी कोणत्यातरी साहसवेड्या टुरिस्टाला हे कळल्यानंतर काही वर्षातच येथे रीतसर ट्रेक चालू करण्यात आला. हा ट्रेक म्हणजे सिंधू आणि झंस्कार नदीच्या संगमापासून पुढे काही अंतरावर असलेल्या चिलिंग पासून ते 'नेरक'पर्यंत चालत जाणे. ह्या ट्रेकमध्ये इतर ट्रेक प्रमाणे कोणतेही शिखर सर केले जात नसून त्याचे अंतिम गंतव्य स्थान नेरक हे आहे. नेरकच का तर इथे आपल्याला गोठलेल्या अवस्थेतला एक अख्खाच्या आखा धबधबा बघायला मिळतो. गोठलेल्या अवस्थेत ला प्रचंड मोठ्या आकाराचा तो जलप्रपात बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हा धबधबा इतक्या उंचावरून कोसळत असताना कसकसा गोठत गेला असेल ह्याचा विचार करणेही कल्पनातीत. ह्याचा टाईमलॅप्स व्हिडिओ बनवायला मला खूप आवडेल.
सध्या झंस्कारच्या काठाकाठाने चिलिंग पासून ते पार नेरकच्याही पुढे असलेल्या हा गावांपर्यंत एक रस्ता तयार करण्याचे काम चालू आहे. हा रस्ता एकदा तयार झाला की स्थानिकांना नदीपात्रातून बर्फ़ावरून चालत यायची गरज भासणार नाही. ह्या रस्त्यावर काही अंतर गाडीनेच पार पाडल्यावर आमचा पाच दिवसीय ट्रेक चालू झाला. आम्ही गेलो ते अंतर जाऊन येऊन अंदाजे ७० किमी इतके होते.
बर्फावरून चालण्याची एक गंमत असते, बर्फाचा थर निळसर रंगाचा असेल तर जाडजूड असतो पण त्याच्यावरून घसरण्याची शक्यता असते. बर्फाचा थर पातळ असेल तर तो तुटण्याची शक्यता असते. बर्फ ताजाच पडलेला असेल तर खालच्या सगळ्या बर्फाचा रंग आणि त्यामुळे तो थर किती जाड किंवा किती पातळ आहे हे न दिसल्यामुळे त्याच्यावरून कशाप्रकारे चालत जायला हवे ह्याचे आडाखे बांधण्याची शक्यता गमावून बसतो आपण. पण ताज्या बर्फाचा फायदा एवढाच की त्यावरून आपण घसरत नाही. अर्थात ताजा बर्फ सहा ते नऊ इंच इतपतच असेल तर त्याहूनही जास्त तर सापडला अर्थातच पाय रुतून बसतो आणि परत आपलाच पाय जोर लावून काढायला लागतो पुढचं पाऊल टाकण्यासाठी. अर्थातच ह्या सगळ्या संभाव्यता आहेत हे सगळेच्या सगळे आपण जात असताना आपल्याबरोबर आपल्याला अनुभवायला मिळेलच असे नाही. हा एक मात्र आहे की सगळा ट्रेक नदीपात्रातून असल्यामुळे खूप चढ चढून जावे नाही लागत.
पण नुसते हे वाचून हा ट्रेक काय तसा सोपाच दिसतोय असे मात्र समजू नका. मुख्य मुद्दा अजून सांगायचाय. हिवाळ्यातले लडाखमधले तपमान उणे असते अर्थात म्हणूनच तर चादर ट्रेक सारखा ट्रेक करता येतो. इथे दिवसाढवळ्या ऊन पडलेले असतानाचे तापमान उणे ५ असते आणि ते रात्री खाली जाऊन उणे ३० डीग्री सेल्सियस इतके होऊ शकते. त्याच्या जोडीला वाहत असलेले बोचरे वारे आपले जीणे अधिकच बिकट करतात.
अर्थातच लडाख म्हटले की अति उंचावर असल्यामुळे असणारी विरळ हवा, कमी प्रमाणात असलेला ऑक्सीजन आणि त्यामुळे श्वास घ्यायला होणारा त्रास हे गृहीतच धरलेले आहे.
हिवाळ्यातले लडाख थोडक्यात सांगायचे म्हणजे
दिवस असो वा रात्र खोलीत किंवा तंबूत आल्याआल्या वाटणारी ऊब
ती तात्पुरतीच होती हे कळायला लागलेला जरासा वेळ
खोल्या असो की तंबू, त्यातल्या अतिगार पडलेल्या किंवा गोठलेल्या सगळ्या वस्तू
हातापायांच्या बोटांच्या हरवलेल्या संवेदना
हातावर हात / पायांवर पाय घासत अंगात कशीबशी आणलेली ऊब
मग झोपायच्या पिशव्यांमध्ये पायाकडून आत जाताना सर्वांगाला लागणारा थंडगार चटका
हे सर्व करून होतंय ना होतंय तोवर आलेली निसर्गाची हाक त्यामुळे बाहेर जायला लागणे
मग परत पार पाडलेल्या वरच्या सगळ्या पायऱ्या
आधीच कश्याबश्या लागलेल्या झोपेतून ऐन रात्रीत झोपायच्या पिशवीची चेन उघडल्यामुळे थंडी वाजून आलेली जाग
भल्या पहाटे ऐकू आलेला खरंच आला की भास होता वाटणारा पक्ष्यांचा आवाज
हिमवर्षावातही तग धरून असणारे पक्षी
आणि
सर्वदूर पसरलेला जीवघेणा पांढरा शुभ्र रंग
क्रमशः
भाग २ चालू
पूर्वपीठिका
लेहला पोहोचल्यावर रिपोर्टींग करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे ब्रिफींग करण्याकरता सगळ्यांना बाहेरच उणे बारा तपमानात एकत्र जमायला सांगितले होते. इतक्या थंडीत बाहेर एकाच जागी उभे रहायचे म्हणजे जरा त्रासच होता. वारा तर जाऊच दे पण नुसती झुळूक जरी आली तरी अजूनच गारठायला व्हायचं. आम्ही सगळे मिळून जवळपास तीस जण असू त्यामुळे इतके सगळे नीट मावतील अशी जागा तिथे नव्हती आणि आता असं 'बाहेर' राहण्याची सवय करणे गरजेचे होते.
तिथे पोचल्यावर ट्रेक लीडर ने स्वतःची ओळख करून दिली आणि आम्हाला आपापले नाव आणि 'चादर ट्रेक' च का निवडला ते सांगा अशी पृच्छा केली. हा प्रश्न विचारता क्षणीच मन लेहच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीतून चिपळूणमधल्या ऐन वसंतातल्या त्या सुखद रात्रीत जाऊन पोचले.
'ऐन वसंतात मध्यरात्री' उशिरापर्यंत मी, अभिनव, अरुण, राजा असे काही मित्र चिपळूणला गप्पा मारत, रात्र जागवत बसलो होतो तेव्हाची गोष्ट. म्हणजे आजपासून मागे जवळपास वर्षापूर्वीची. जुनी हिंदी सिनेमातली गाणी ऐकत ऐकत नाना विषयांवर गप्पा मारत बसलो असता विषय भरकटत भरकटत गाडी हिमालयावर आली होती. मी एकदा का हिमालयाचे गुणगान करायाला लागलो की थकता थकत नाही. हिमालयानी माझ्यावर केलेले गारुड सगळ्यांना जाणवतेच. अर्थात एकदा हिमालयात जाऊन आल्यावर बहुतेक सगळ्यांनाच लागते तसे त्याचे व्यसन मलाही लागलेले आहेच. काशीस जावे नित्य वदावे च्या चालीवर मी हिमालयात जायचय असे नित्य वदत असतो. त्यामुळे आता पुढच्या खेपेस कुठे जाणार काही ठरवलंय का अशी विचारणा झाली. हिमालयात परत जायचे असल्यास कुठे जायचंय, खरेतर कुठेकुठे जायचेय त्याची यादीच माझ्याकडे तयार होती त्याची उजळणी चालू झाली. त्यात विषय निघाला लडाखचा मग परत एकदा तिथे जायचंय, स्टोक कांगरी ट्रेकच्या वेळी भेटलेल्या विवेकने हिवाळ्यातल्या लडाखचे केलेले वर्णन असं कायकाय ऐकवत होतो. विवेकने चादर ट्रेक केला होता त्यावेळी त्याला लेह किती वेगळे दिसले होते त्याबद्दल ऐकल्यावर एकदा थंडीत लेहला जायचे असे मनात होते ते सांगताना कोणत्या तरी एका चुकार क्षणी मी बोलून गेलो की चादर ट्रेक (म्हणजे तो करताना सामना करावे लागणारे बोचरे वारे आणि उणे तपमान हे) काही आपल्याला झेपणारे नाहीये, तरीपण मरायच्या आधी एकदा करायला हवं यार! झालं तेच वाक्य पकडून अरुणने मग आपण सगळेच करूया आम्ही पण येतो असे म्हटले भावनेच्या भरात मी ही म्हटले होहो जाऊ या.
झाले पुण्यात परत आल्यावरही अरण्याने माझा पिच्छा पुरवला. आपण ठरवलंय (एक तर ते ठरवलेले वगैरे काही नव्हते नुसते मोघम म्हटलेले होते करूया म्हणून) ते करायलाच हवं म्हणजे जसं काही माझं नाव हर्षद नसून हरिश्चंद्र आहे. पण अखेर आपण असे ठरवले होते आणि आपण हा ट्रेक करणार आहोत हे मला मान्य करावेच लागले. आमच्या रनिंग ग्रुपमधला शॅनन ने देखील हा ट्रेक केलेला आहे त्यानेही मी ही हा ट्रेक करावा अशी जोरदार शिफारस केली. अगदी भरीसच पाडले म्हणा ना. त्याने त्याच्याकडचे सामान ही देऊ केले.
तर अशा प्रकारे हा ट्रेक करायचा असे ठरले तर खरे पण हा ट्रेक होतो फक्त हिवाळ्यात. त्यातही जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोनच महिन्यात; आणि आमची मुंबई मॅरेथॉन असते जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी. त्यामुळे जाऊ दे रे पुढच्या वर्षी बघू वगैरे म्हणून मी हा ट्रेक रद्द करायचा माझा प्रयत्न अरुणने आपण मुंबई मॅरेथॉन नंतर फेब्रुवारीत हा ट्रेक करू असे सांगून हाणून पाडला. पुढचे पुढे बघू असे म्हणून मी ही मग काही महिने ह्या कडे लक्ष दिले नाही. बघता बघता नोव्हेंबर उजाडला, कोल्हापूर ट्रायथलॉन देखील करून झाली. मग मात्र म्हटले हा ट्रेक करायचा असेल तर आता नीट ठरवाठरवी करावी लागेल, मग मधेच एकदा कधीतरी नेटवर तपास केला असता दिसले की फेब्रुवारीत दोन किंवा तीनच बॅच असतात. मग चक्क एक मिटिंग घेतली कोणकोणत्या आयोजकांच्या कोणकोणत्या तारखा आहेत, तुला कोणती जमत्ये मला कोणती जमत्ये, किती पैसे भरावे लागतील , एकूण खर्च किती येईल ह्याचा आढावा घेण्यात आला. खर्चाचा आकडा ऐकून कोणी म्हणतील आता नको नंतर जाऊ अशी आशा होती ती देखील सरली. सर्वांच्या सोयीनुसार, महिना अखेर असणाऱ्या कार्यालयीन जबाबदाऱ्या, होणारा पगार ई. अनेक गोष्टींचा विचार आणि अगदी शेवटच्या बॅचला गेलो तर बर्फ वितळलेला तर नसेल ना अशा सर्व शक्याशक्यतांचा विचार करून शेवटी फेब्रुवारीतली पहिली बॅच निवडण्यात आली. पैसे आणि हवी असलेली तारीख ह्या मुळे Adventure Nation ह्या दिल्ली स्थित संस्थेतर्फे ३ तारखेला सुरु होणाऱ्या बॅचमधून जायचे हे ही नक्की झाले.
हा ट्रेक एकत्र करायचा असे जेव्हा चिपळूणला ठरवले (?) होते त्यावेळी हजर असलेल्यांपैकी अभिनव फेब्रुवारी मध्ये ट्रायथलॉन करता श्रीलंकेला जाणार असल्यामुळे गळला पण त्याच्या जागी दुसरा एक गडी संदीप तयार झाला. ह्यात गंमत अशी की आमच्या चौघांपैकी मी सोडता बाकी तिघेही अरुण राजा आणि संदीप हे हिमालयात पहिल्यांदाच येणार होते आणि ते ही माझ्या भरवश्यावर आणि मी स्वत: हिवाळ्यात पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळे मग सुरु झाली आयोजकांच्या मेल नुसार ट्रेक करता आवश्यक गोष्टींची खरेदी आणि पूर्व तयारी. त्यात देखील बराच वेळ आणि पैसा गेला.
दरम्यान माझ्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे मी मुंबई मॅरेथॉन साठी जी तयारी करता होतो त्या वेळी सर्वात मोठी लॉंग रन केवळ २७ किमी ची होऊ शकलेली. त्या दुखापतीमुळे मुंबईत आरामात धावायचं दुखापत वाढू द्यायची नाही पुढच्या दहा दिवसात चादर ट्रेक करायचाय हे लक्षात ठेवून, मग यावेळी (तरी) मुंबईत सब फोर का विचारणाऱ्या सगळ्यांना अजिबात नाही, मुंबई सहाव्या वेळी धावतोय; (सबफोरच्या) आधी लगीन चादरचेच असे जाहीर करून टाकले आणि त्याप्रमाणे मुंबई सावकाश सव्वापाच तास लावून धावलो. मुंबई माझी लाडकी पण हिमालयाला यथायोग्य मान दिलाच पाहिजे.
आयोजकांनी पाठवलेल्या मेल नुसार आमच्या प्रवासयोजनेची सर्वसाधारण रूपरेषा अशी होती.
दिवस पहिला - लेहला पोचणे आणि आल्याची वर्दी देणे
दिवस दुसरा - लेह मध्ये फेरफटका
दिवस तिसरा - वैद्यकीय तपासणी आणि विमा
दिवस चौथा - सकाळी लेहहून निघून ट्रेक जिथून चालू होतो त्या 'तिलाड डो' पाशी बसने पोहोचणे आणि नंतर लगेच अंदाजे ५ किमी चालत शिंगरा कोमा येथे पोहोचणे (प्रत्यक्ष ट्रेक चालू)
दिवस पाचवा - शिंगरा कोमा ते तिब्बच्या गुहेपाशी मुक्काम
दिवस सहावा - तिब्बच्या गुहेपासून ते नेरक गोठलेला धबधबा
दिवस सातवा नेरक ते परत तिब्ब गुहा
दिवस आठवा - तिब्ब गुहा ते शिंगरा कोमा
दिवस नववा शिंगरा कोमा ते तिलाड डो पर्यंत चालत गेल्यावर पुढचा प्रवास बसने लेह पर्यंत
दिवस दहावा - लेहहून प्रस्थान पुण्यास परत
अखेर लेहला जायचा दिवस उजाडलाच खरेतर रात्रच. (रात्रीत केलेल्या प्रवासामुळे रजेचा एक दिवस वाचतो)
आमचे पुण्याहून प्रस्थान होते शनिवारी रात्री. दिवसभर ऑफिसमध्ये, काम उरकून घरी जाऊन कधी एकदा निघतो असं झालेलं. पुणे ते दिल्ली विमान रात्री दिडच्या सुमारास होते आणि दिल्ली ते लेह सकाळी साडेसात वाजता जे लेहला नऊ च्या सुमारास पोहोचते. रिपोर्टींग पहिल्या दिवशी संध्याकाळ पर्यंत केले तरी चालते पण पुण्यामुंबईहून विमानाने जायचे असल्यास आपण सकाळी जास्तीत जास्त उशीरा म्हणजे दहा वाजेतोपर्यंत पोहोचतोच. विमानाच्या ये जा करण्याच्या दृष्टीने लेहचे हवामान केवळ सकाळच्या वेळातच सुऱक्षित मानले जाते. त्यामुळे कुठूनही येणारी सगळी विमाने साधारण दहा पर्यंत पोहोचतात आणि लगेच तासादोन तासात परतीच्या प्रवासाला निघतात.
विमानातून घेतलेला फोटो
हा ट्रेक सहसा सगळ्याच आयोजकांतर्फे एकूण ९ दिवसात आयोजित केला जातो. त्यातले पहिले तीन दिवस तर लेह मधेच घालवायचे असतात. लेहला कधीही विमानाने गेल्यास, अतिउंचावरील विरळ हवेची सवय व्हावी म्हणून पहिले दोन दिवस काहीच न करता घालवायचे असतात. पहिल्या दिवशी तर राहत्या जागेबाहेर पडूच नका आराम करा असा सल्ला दिला जातो. जे गरजेचे आहे. अचानक उठून समुद्र सपाटीपासून अंदाजे ३५००मी उंचीवरील ठिकाणी आपण गेलो असता तिथल्या वातावरणाची सवय होईपर्यंत ही काळजी घ्यायलाच हवी.
विमानातून घेतलेला फोटो - अजून एक
फेब्रुवारीतल्या ३ तारखेच्या रविवारी सकाळी आम्ही लेहच्या विमानतळावर उतरलो तेव्हा आमचे विमान काही काळ धावपट्टीवरच थांबवले होते. आमच्या पुढच्या विमानातून लडाख मधल्या पहिल्या विद्यापीठाचे उद्घाटन करण्याकरता म्हणून आपले पंतप्रधान मोदी आले होते. असे समजले की जम्मू आणि काश्मीर राज्यातले पण काश्मीर खोऱ्याबाहेरचे हे पहिलेच विद्यापीठ असणार आहे. जम्मू आणि काश्मीर ह्या राज्यातली सगळी (म्हणजे तीनही) विद्यापीठे काश्मीर खोऱ्यात आहेत.
तर अशा रीतीने आम्ही लेह येथे अवतरलो. चादर ट्रेकला आमच्या बरोबर येणारे अर्पित आणि रवनीत नावाचे दोघेजण आमच्याच विमानात असणार असे कळले होते त्यांची बाहेर पडतानाच गाठ पडली. आम्ही एकत्रच आमच्या राह्ण्याच्या ठिकाणाकडे रवाना झालो.
मुक्काम पोस्ट लेह
How is the josh , high Sir!
आमची राहण्याची सोय करण्यात आलेल्या ठिकाणाचे नाव होते हॉटेल गलवन पॅलेस जे शांती स्तूपाच्या पायथ्याजवळ होते. पहिल्या दिवशी फक्त आल्याची वर्दी द्यायची असल्या कारणाने आणि खोली १२ शिवाय मिळणार नसल्याने आम्ही सकाळीच पोचलेले सगळे जण जेवणाच्या खोलीतच जमा होतो. इतकी गर्दी होती की शंका आली हिमालयात आपण ज्या शांततेच्या शोधात येतो ती ह्या ट्रेक करतेवेळी मिळणार की नाही. अर्थात खोलीत गर्दी असण्याचे मुख्य कारण बाहेर असलेली थंडी आणि वारे आणि लवकरच अजून उलगडा झाला की त्यातले काही जण ट्रेक करून आले होते आणि परत चालले होते. सहज चौकशी करता असे आढळले की तिथे जमलेल्या सगळ्याच जणांनी आम्ही केलेल्या Adventure Nation कडून बुकिंग केले नव्हते तर इतरही कोणकोणत्या कंपनीतर्फे बुकिंग केलेली माणसेही तिथे आलेली होती. तसेच आम्हाला प्रत्यक्ष ट्रेकला नेणाऱ्या संस्थेचे नाव इंटरनॅशनल युथ क्लब होते.
हॉटेल गलवन पॅलेस
आमच्या Adventure Nation तर्फे केलेल्या बुकिंग नुसार लेह मधील मुक्कामात कराव्या लागणाऱ्या खाण्यापिण्याचा खर्च धरलेला नव्हता. अर्थात त्याची सोय ही आपली आपण बघणे अपेक्षित होते. रहायच्या जागेपासून खाण्याचे ठिकाणे किती दूर असेल हे माहीत नसल्यामुळे गेल्या दिवशी सकाळी खाण्यासाठी म्हणून आम्ही घरून पराठे बनवून आणले होते. पण हॉटेल गलवन पॅलेस मध्ये नाश्ता १५० रुपये आणि जेवलं २५० रुपये अशा किमतीला उपलब्ध होते. जेवण खूप भारी होते अशातला भाग नव्हता पण निदान जवळच्या जवळ अशी सोय होती हे महत्वाचे. तिथला मुलगा पहिले पैसे घेऊन मगच किचन मध्ये ऑर्डर देत होता. हिमालयात असे पहिल्यांदाच अनुभवायला मिळल्याने त्याची मजा वाटलेली.
खोली मिळेतोपर्यंत (आधीच ठरल्याप्रमाणे) सगळ्यांनी आपापल्या भरलेल्या फॉर्मसोबत विमा हप्ता, वैद्यकीय तपासणी फी, पर्यावरण फी आणि प्रवेश फी ह्या सगळ्यांचे मिळून प्रत्येकी रुपये ५१४०/- मात्र, आयोजकांकडे सुपूर्त केले. फॉर्मवर पेनाने लिहिताना हातमोजे काढायला लागत होते आणि तो एकपानी फॉर्म भरेतोवर हात पार गारठून जात होते. विशेषतः हाताच्या बोटांची टोके. तिथेच प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हलही तपासण्यात आली. ह्याची मजा सांगायची झाली तर हात थंड पडलेले असतील तर ऑक्सिजन कमी दाखवते आणि लगेचच हातावर हात चोळून गरम केले असता जास्त दाखवते.
आम्हाला मिळालेली राहायची खोली पहिल्या मजल्यावर होती आपापल्या पाठपिशव्या उचलून घेऊन तो एक मजला चढून जाताना देखील धाप लागली. विरळ हवेचा परिणाम. थोडी विश्रांती घेऊन मग फिरायला म्हणून लेहच्या बाजारात जायचे ठरले. चालतच गेलो. चालताना देखील थोडा दम लागत होता. बाजारात गेलो तर कसलासा उत्सव असल्यामुळे ही गर्दी म्हणजे अगदी तुफान गर्दी. विवेकने स्टोक च्या वेळेस हिवाळ्यातले लेहचे जे काही वर्णन केले होते ते अनुभवायला मिळालेच नाही.
बाजारात जाताना लागलेला अर्धा गोठलेला झरा
लेह बाजारातील गर्दी
बाजारात फेरफटका मारत असताना एका ठिकाणी सूप प्यायला थांबलो असता एक मुंबईकर जोडपे भेटले जे नुकतेच चादर ट्रेक वरून परतले होते. त्यांना खराब हवामानाचा फटका बसल्याने नेरक अर्थात गोठलेल्या धबधब्यापर्यंत जाता आले नव्हते. त्यांनी सांगितले की जितके नेता येतील तितके मोज्याचे जोड न्या. रात्री आणि दिवसाही दोन जोड एकावर एका चढवल्यामुळे थंडी कमी वाजते मात्र घामामुळे जोड बदलावे लागतात. मग लेह मधल्या लष्करी गणवेश मिळणाऱ्या दुकानातून मोजे जोड खरेदी केले. प्रचंड गर्दीमुळे जास्त न फिरता हॉटेल गलवन मध्ये परत आलो.
गर्दीच गर्दी
लेहचा राजवाडा
रिपोर्टींगच्या दिवसअखेरीस वेगवेगळ्या संस्थांतर्फे बुकिंग केलेले आम्ही जवळपास ३० जण तिथे जमा झालो होतो. नाही म्हटले तरी जरा इतके सगळे एकत्र कसे जाणार एक लीडर आम्हाला कसा पुरा पडणार / सांभाळणार याची चिंता वाटू लागली. पण जे होईल ते होईल असे म्हणून रात्री ९ च्या सुमारास जेवून खोलीत आलो. वातावरणाच्या सरावाचा एक भाग विरळ हवेचा सराव हा पण दुसरा महत्वाचा भाग म्हणजे थंडीचाही सराव व्हायला हवा म्हणून खोलीत हीटर वापरू नका असे सुचवण्यात आले होते. खोलीतल्या नळाला पाणी नव्हते म्हणजे गोठल्यामुळे येऊच शकत नव्हते. त्यामुळे हॉटेल तर्फे प्रत्येकी एक बादलीभर पाणी पुरवले जात होते ते खालून वर त्यांचीच माणसे आणून देत होती. आम्ही चौघेही एकाच खोलीत होतो मी अरुण राजा आम्ही तिघे क्वीन साईझचे दोन बेड जोडले होते त्यावर आणि संदीप एका वेगळ्या सिंगल बेडवर. त्या रात्री आधीच थंडीमुळे नीट झोप लागत नव्हती त्यात अरण्याने इतके पाणी प्यायले होते की रात्रीत कधीही न उठणारा तो तीन वेळा उठला मग काय झोपेचे खोबरे. पण तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तरतरीत वाटत होते.
दिवस दुसरा
झोपेचे खोबरे झाले तरी सकाळी उठल्यावर तरतरीत वाटत होते.
दुसऱ्या दिवशी आम्हाला ओळखपरेड आणि ब्रिफींग करता एकत्र जमवले गेले तेव्हा एक लीडर आम्हाला कसा पुरा पडणार याची जी चिंता वाटत होती तिचे निराकरण झाले. आमची विभागणी दोन बॅचेस मध्ये होणार होती. समनव्यक एकच असणार होता पण स्थानिक गाईड प्रत्येक बॅच सोबत दोन जण असणार होते. आम्ही बरेचजण कोणीना कोणी सोबत घेऊन आलेलो होतो. पण एक - दोन जण अगदी एकटे आले होते. जम्मू आणि काश्मीर ते केरळ, गुजराथ ते बंगाल, अगदी मध्यप्रदेशातलेही दोन जण असे भारतभरातून लोकं आली होती. एकजण तर ढाक्याहून आलेला बांगलादेशी होता. भारतीयच असले तरी कामानिमित्त दुबईला वास्तव्य करुवून असलेले तीन जण खास ह्या ट्रेक साठी म्हणून दुबईहून रजा काढून आले होते. तर अजून एक जण अमेरिकेतून अडीच वर्षांनंतर महिनाभराच्या रजेवर घरी आलेला असताना ह्या आठवडाभराच्या ट्रेक करता आपल्या बहिणीसोबत आला होता. रेस्टॉरंटचा मालक, डॉक्टर, सैन्यदलातील अधिकारी, वायुदलातील अधिकारी फिल्म लायनीतल्या प्रोड्युसर कुटुंबातला एक जण, पेट्रोल पंपाचा मालक, आरजे, आयटी इंजिनीयर अशी विविध क्षेत्रातील माणसे एकच स्वप्न उरी बाळगून तिकडे जमलो होतो. मला हिमालयातले ट्रेक ह्या ही करता खूप आवडतात. हुद्दे, आर्थिक स्थिती, धर्म, भाषा, देश, पंथ, जात, वय, लिंग ह्या सगळ्यामध्ये विभिन्नता असली तरी हिमालय सर्वाना सारखीच वागणूक देतो. आणि तिथे येणारी माणसेही हे सर्व काही बाजूला ठेवून एकमेकांसोबत एका अदृश्य अशा धाग्याने जोडली जातात. एकमेकांच्या कुटुंबाचा एक भाग बनतात. अगदी खूप काळ संपर्कात नसले तरी मनाच्या कोपऱ्यातली जागा अडवलेली असते आणि लक्षात राहतात. तर असो.
आमचे ओळख सत्र पार पडले आणि मग आम्हाला आमच्या समन्यवयका बद्दलही अधिक माहिती मिळाली. त्याचे नाव ईश्वर. त्याच्या नावावरून मग हमे डरने की जरुरत नहीं, ईश्वर हमारे साथ है वगैरे वाक्ये फेकली गेलीच. हा माणूस माणूस कसला मुलगाच खरेतर, हिमालयातल्या भटकंतीच्या प्रेमापोटी शिक्षण अर्धवट सोडून पूर्ण वेळ ट्रेक लीडरचे च काम करतो. मूळचा आंध्र प्रदेश चा पण आता मनालीत स्थायिक होऊ घातलेला. ह्याने स्वतः निदान सहा सात वेळा चादर ट्रेक केलेला होता. त्याला ह्या ट्रेकचा शेवटपर्यंत व्यवस्थित जाण्याचा, पाण्यात पडण्याचा, पाण्यात पडलेल्याला बाहेर काढण्याचा, शेवटपर्यंत न जाऊ शकण्याचा असा सर्व प्रकारचा अनुभव होता. ह्या माणसामुळे आमचा ट्रेक विना कटू अनुभवाचा आणि आनंददायी झाला. ओळखसत्रानंतर त्याने चादर ट्रेक करताना करावयाच्या आणि टाळायच्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिल्यांदा त्याने विचारले पाण्यात डुबकी मारायचा व्हिडिओ कोणीकोणी पाहिला आहे आणि कोणाकोणाला तसे करायची इच्छा आहे. काही हात एकदम तर काही का कू करत वर आले. मी आणि अरुण, अभिनवने फेसबुकवर आम्हाला टॅग केलेले पाण्यात डुबकी मारायचे विडिओ पाहून जरा प्रेरित झालो होतो आणि जमल तर बघू मोड मध्ये होतो. ईश्वरने आम्हाला तशी डुबकी मारल्यानंतर काय काय होऊ शकते अशा डुबकी मारण्याचा परिणाम किती उशिरा जाणवू शकतो त्याबद्दल असे काही सांगितले की मनोमन मी तरी आपण डुबकी मारायची नाही ह्या निष्कर्षाप्रत आलो. तसेही हे व्हिडियो पुण्यात बसून बघितले तेव्हा इथल्या उणे तपमानाची काडीचीही कल्पना आलेली नव्हती. त्यामुळे आणि एकंदरीत स्वत:चा आवाका माहीत असल्यामुळे डुबकी नाही निर्णयाचे पालन करायचे ठरवूनच टाकले. ईश्वरने पुढे कपड्यांची तयारी कशी हवी ते सांगितले, ट्रेक करताना समोर येणारे संभाव्य धोके सूचित केले आणि त्याच बरोबर हे ही सांगितले की आपण नीट काळजी घेतले असता हा ट्रेक व्यवस्थित पूर्ण होउ शकतो अर्थात निसर्गाच्या लहरीपणापुढे कोणाचेही चालत नाही आणि एकदा ट्रेक चालू केल्यानंतर त्याने घेतलेला निर्णय सर्वांवर बंधनकारक राहील.
गंभीर मुद्द्यांवर बोलून झाल्यावर त्याने एकदम चला आता शांती स्तूप बघून येऊया असे सुचवले. आमचे हॉटेल शांती स्तूपाच्या पायथ्याशीच असल्याने वर जाणारा रस्ता लागूनच होता.
शांती स्तुपाच्या पायथ्या पाशी असलेले आमचे हॉटेल - आवारातून घेतलेला फोटो
हॉटेलच्या छतावरून घेतलेला फोटो
वर जाताना आमचे आपापसात बोलणे आणि अधिक ओळख करून घेणे चालू झाले. आमच्या बरोबर खांडवा मध्यप्रदेशातून आलेले दोघे अर्पित आणि रवनीत आणि पुण्याहून आलेला पण मूळचा सोलापुरी चिंतामणी ह्या आधी बाईकवर लडाख मध्ये येऊन गेले होते. इतरही कोणी फिरायला म्हणून लडाखला येऊन गेले होते. ते असे काय काय सांगत असताना अरण्याला आम्ही इथे याआधी मॅरेथॉन पळायला येऊन गेलो होतो असे सांगून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला फार मजा येत होती. अरुण आणि संदीप या आधी लडाख मॅरेथॉन करता लेह ला येऊन गेले होते त्यावर्षी काही घरगुती कारणाने मला श्रीनगर होऊन परत जावे लागलेले. त्यावेळी मॅरेथॉन ची सुरुवात आणि शेवट शांती स्तूपाच्या पायथ्याशी झाली होती त्यामुळे त्याच्या त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या होत्या. त्यावेळी चढ चढून चालत जाताना देखील दम लागत होता त्यामुळे जिथे चालताना पण दम लागतोय तिथे तुम्ही मॅरेथॉन पळाले आहात? काय सांगता? कसले भारी आहात असे लोकांनी म्हणून झाले की मग पापा तो यहा ७२ किमी भाग चुके है हे सांगायचे आणि त्यांचे विस्फारलेले डोळे आणि वासलेला आ याची मजा घ्यायची त्याच्या ट्रेकमधल्या सगळ्या लोकांसोबत अशी मजा घेण्याची सुरुवात त्या दिवसापासूनच झाली. पापा म्हणजे मीच मला ढक्कन ऍथलिट मधे पापा म्हणतात. अरण्या हा तसा बहिर्मुख किंवा जास्त बोलघेवडा नाहीये पण त्याला असं हळूच पुड्या सोडून लोकांची मजा घ्यायला खूप आवडतं. अरुणला अरण्या अशी हाक मारली की चिंतामणीला फार मजा वाटायची तो म्हणायचा एकदम महाराष्ट्री असल्यागत वाटतंय.
हे सर्व असले तरी आमच्या ग्रुपमधले बरेच जण हिमालयातला पूर्वानुभव असलेले होते आणि आमचे भिडू नव्हते, मी स्वत: हिवाळ्यातील ट्रेक पहिल्यांदाच करत होतो. आणि तसंही हिमालयात बिलकुल विनम्रता के साथ जाना पडता है, तुमची आधीची कामगिरी / अनुभव पूढच्या खेपेस कामी येत नाही. प्रत्येकवेळी नव्याने कोऱ्या पाटीनिशी हिमालयाच्या पोटात शिरायला लागतं. त्यामुळे माझं म्हणणं मी यावं केलाय नी त्याव केलाय कशाला सांगायचे सहज बोलण्यात निघाले तर ठीके नाहीतर ट्रेक संपल्यावर सांगूया. पण मला कानकोंडे वाटतंय म्हटल्यावर त्याला अजून उल्हास वाटायचा. माझा खरा जिगरी दोस्त. अर्थात मी ही त्याला कमी त्रास नाही दिला. असो.
शांती स्तुपा च्या टेकडीवर (जो पहिल्या दिवशी डोंगरच भासतो) जाताना आम्ही गाडीरस्त्याने वर गेलो आणि पायऱ्यानी उतरलो. शांती स्तूपाभोवताली जी जागा आहे तिथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. एका बाजूला सिंधू नदी, स्टोक गाव एका बाजूला, जरा बाजूला स्टोक कांगरी पर्वत रांग, आणि हो खारदूंग ला कडे जाणारा रस्ता असे सर्व काही इथून दिसते ते नवख्यालाही कळावे म्हणून त्या त्या दिशेला पाट्या लावल्या आहेत. खारदूंग ला च्या पाटीपाशी गेल्यावर परत एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो वळणावळणाचा रस्ता चढत चढत बराच लांबवर जाताना दिसतो. मग त्या पाटीसमोर उभे राहून फोटो काढून घेतला.
शांती स्तुप
प्रत्यक्ष स्तूप जिथे आहे तिथे जाण्याकरता पायातले जोडे काढायला लागणार असल्यामुळे आमच्यापैकी फक्त एक दोन जणच तिथे गेले. नव्या नव्या उत्साहात दोन चार फोटो सेशन पार पाडली आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. मग परत एकदा लेह मार्केट मध्ये गेलो मुख्य म्हणजे गमबूट आणि ईश्वरच्या सांगण्यानुसार हवी वाटलेली अजून काही बाही खरेदी केली. वाजवान मध्ये जेवलो. आणि परत आलो.
रात्रीच्या जेवणा अगोदर डायनिंग हॉल मधे जमलेल्या लोकांसोबत गप्पा मारल्या. म्हणजे खरेतर मी तिकडे पोचलो तेव्हा त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या त्यामुळे मी जास्त करून ऐकण्याचेच काम केले.त्यावेळी कळले की मुंबईहून आलेल्या तीन जणांनी लेहमधली थंडी पाहूनच परत जायचा निर्णय घेतला आहे. त्यातल्या एका मुलीला अगदी अजिबात परत जायचे नव्हते पण तिच्यासोबत आलेल्या लोकांपुढे काही न चालल्याने तिला परत जायला लागणार होते आणि अर्थातच तिला त्याचे फार वाईट वाटत होते. अशी वेळ कुणावरही ना येवो. उर्वरित वेळ फारशा काही घडामोडी न घडता पार पडला आणि मग आम्ही झोपायला गेलो.
दिवस तिसरा
How is the josh , मुझे घर जाना है|
आज आम्हाला वैद्यकीय तपासणी करता जायचे असल्याने उठल्यावर सगळ्यांनीच लवकर आवरून घेतले. आणि खाली येऊन नाश्ता करून तयार झालो.
चादर ट्रेक ला जाणाऱ्या लोकनाची वैद्यकीय तपासणी आणि विमा हा प्रकार ह्याच वर्षीपासून सुरु झालेला आहे. वाढीव पैसे गेले तरी मला तरी हा उपक्रम खूपच स्तुत्य वाटला. असे वाढीव पैसे द्यायला लागणार याची पूर्वकल्पना सगळ्यांच्या आपापल्या आयोजकांनी दिले होतीच तरीही काही मंडळी हे कसले अजून पैसे द्यायचे आपल्याला काय फायदा असे कुरकुरत होतेच. गोठलेल्या झंस्कार नदी सारख्या अत्यंत दुर्गम अशा भागात गेल्यावर काही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थती उद्भवली तर जी काही धावपळ करावी लागू शकते त्या संदर्भात मुंबई स्थित घुमते रहो संस्थेच्या मुलाने लिहिलेली एक पोस्ट कायप्पा मार्फ़त वाचनात आली होतीच. ती पोस्ट आम्ही पुण्याहून निघायच्या सुमारासच अगदी व्हायरल झाली होती. अनेक हितचिंतकांनी आवर्जून वैयक्तिकरित्याही मला ती पोस्ट पाठवली होती आणि जपून जा, सांभाळून रहा सुखरूप परत या असे बजावले होते. (ती पोस्ट माझ्या आईच्या वाचनात येऊ नये अशी मी केलेली प्रार्थना अर्धीच ऐकली गेली. मी लेह ला निघून आल्यावर ती पोस्ट आईच्या वाचनात आल्यामुळे आई जरा काळजीत पडली होती.) त्या पोस्ट मध्ये मुख्यतः ऑक्सिजन कमी झाल्यामुळे उद्भवलेल्या आणिबाणीबाबत लिहिले होते परंतु ह्या ट्रेक मध्ये घसरून पडून हाडे मोडण्याचे प्रमाणही लक्षणीय असते. त्यामुळे असे प्रकार घडलेच तर चादर ट्रेक मार्गावर फिरते वैद्यकीय पथक उपलब्ध असणे हा खूप मोठा दिलासा होता. नाही म्हटले तरी माझ्या बरोबर आलेल्या सर्वानी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे त्यांची जबाबदारी माझ्यावरच होती म्हणजे नैतिक दृष्ट्या मी मानत होतो. ते सर्वच जण पहिल्यांदा हिमालयात चालले होते संदीप ने सुरुवातीला एकदा दुसरा ट्रेक करूया का असे विचारलेही होते. पण काही होत नाही चल असे बोलून आम्ही सगळेच इकडे निघून आलो होतो. त्यामुळे आता मनामधे जरा कातर भावना निर्माण झाली. थंडीचा कहर तर चालूच होता.
आमची वैद्यकीय तपासणी जिथे होणार होती ते ठिकाणही लेह मार्केट मधेच होते.
बराच काळ रांगेत उभे असताना आमची करमणूक करणारे पोस्टर
तिथे बराच काळ रांगेतराहिल्यावर आमच्या सगळ्यांची तपासणी पूर्ण झाली. ही तपासणी म्हणजे रक्तदाब, रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण, हार्ट रेट अशा तीन चार गोष्टी होत्या. इथेही काही जणांचे ऑक्सिजन चे प्रमाण कमी आढळले असता हातावर हात चोळून परत मोजता वाढलेले आढळले. इथे आम्हाला पहिल्या नावानुसार चार गटात विभागण्यात आले होते . माझ्या गटाची तपासणी सगळ्यात उशीरा झाली त्यामुळे अरुण राजा संदीप यांना माझ्याकरता थांबावे लागले. जरा कंटाळवाणे झाले पण आम्ही सगळेच पास झालो.
तरी आम्ही चौघे मॅराथॉन रनर असल्यामुळे आमच्या शारिरिक क्षमतेच्या बाबतीत मी बराच निश्चित होतो. पण एकंदरीत सर्वच लोकांची वैद्यकीय तपासणी करून जे फिट असतील त्यांनाच पुढे पाठवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक सरकारने, २-३ बिन सरकारी संघटनां च्या बरोबर एकत्रितपणे घेतला हे मला खूप भारी वाटले. सहसा खासगी संस्था त्यांचा धंदा कमी होऊ शकतो ह्या भीतीने अशा प्रकारच्या कठोर उपायांना विरोध करताना दिसतात त्यासमोर हे उदाहरण अनुकरणीय आहे. ह्याच ठिकाणी आमचे तपासणीकरता वाट पाहणे चालू असतानाच आम्हाला विमा कंपनीच्या प्रवक्त्याकडून ह्या विम्याअंतर्गत काय कव्हर केले आहे, कोणत्या परिस्थितीत अशी मदत मिळू शकेल आणि कधी नाही ह्याबाबत साद्यन्त माहिती देण्यात आली. तर अशा रीतीने आम्ही सर्वच जण पास झाल्यानंतर वाजवान मधे जेवायला गेलो.
जेवून झाल्यावर एका टपरी सदृष्य दुकानासमोर गरमागरम कॉफी पित समोरचे हिमाच्छादित पर्वत रांगांचे नजारे बघत बसलो असताना आम्हाला चिंतामणी आणि प्रथमेश हे सोलापुरी पुणेकर भेटले. त्यांना कॉफी प्यायला या असे म्हटल्यावर त्यांनी ते पुढे बरिस्ता मध्ये मित्रांना भेटायला चालले असल्याचे सांगेतले तसेच त्यानंतर ते दोघे लेह मधील वॉर मेमोरियल पहायला जाणार आहेत असेही सांगितले. त्यांनी आम्हालाही त्यांच्यासोबत येण्याचे सुचवले. एकीकडे सुस्ती अंगावर आली होती पण अशी संधी परत कधी मिळेल न मिळेल (मला तर असे काही म्युझियम आहे हेच माहीत नव्हते आणि मागच्या लेह भेटीतही मी हे बघितले नव्हते ) असे म्हणून आम्हीही जायचे ठरवले. आमची कॉफी संपवून चिंतामणीला बरिस्तामधे गाठले. तिथे त्याचे दोन मित्र भेटले आंगसुक आणि ताशी. चिंतामणी आणि अंगशुकची ओळख चिंतामणी जेव्हा बाईकवर लडाखमधे आला होता त्यावेळी झालेली आणि ताशी त्याचा मित्र. मी तर त्या दोघांनाही पहिल्यांदाच भेटत होतो. पण पहिल्याच भेटीत अशा काही गप्पा रंगल्या की बास रे बास. त्या दोघांनी आम्हाला कुठे टॅक्सी करून जाता असे म्हणून स्वतःच्या गाडीतून (आम्ही चौघे, चिंतामण आणि प्रथमेश सागर आणि ईश्वर) अशा सगळ्यांना वॉर मेमोरियल म्युझिअम पहायला नेले आणि परत आणले. अत्यंत दिलखुलास दिलदार आणि उमद्या व्यक्तिमत्वाची माणसे.
वॉर मेमोरियल म्युझियम बघताना डोळ्यात पाणी उभे राहतेच राहते. आपल्या सैनिकांना किती बिकट परिस्थितीत काम करावे लागते आणि अपेष्टाना काही सुमार नसतो हे आपल्याला इथे बसून नाहीच कळणार नाहीच कळत. असो.
परत हॉटेलवर आल्यानंतर मात्र आमची सामान विभागणी आणि पॅकिंग ची गडबड उडाली कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच चादर ट्रेक करता निघायचे होते. आणलेल्या सगळ्याच्या सगळ्या सामानाचे ओझे ट्रेकमध्ये अंगावर वागवत नेण्याची गरज नव्हती. जास्तीत जास्त १० ते १२ किलो वजनाचे सामान वागवत नेण्याच्या हिशोबाने योग्य मानले जाते. शिवाय अंगावरच चार चार थर असतातच. त्यामुळे जास्तीचे सर्व सामान, लेहमध्ये वापरलेले कपडे, असे सगळे एका छोट्या सॅक मध्ये टाकून लेह मधेच ठेवायची सॅक वेगळी आणि सोबत न्यायची वेगळी सॅक असे तयार करून झाले. हे लिहिताना दोन ओळीत आटोपलंय पण करताना बराच काथ्याकूट आणि कुटाणे केल्याशिवाय हे होत नाही असा दर ट्रेकवेळचा अनुभव आहे.
जाण्याअगोदर आम्हाला आमचा गट जरा मोठा म्हणजे १८ जणांचा आणि दुसरा गट १२ जणांचा असेल असे सांगण्यात आले. ईश्वर ने लोकल गाईड लोकांच्या अनुभवानुसार जास्त अनुभवी लोकांकडे जास्त माणसे आणि तुलनेने कामे अनुभवी लोकांबरोबर कमी माणसे अशी विभागणी केली. आता आमच्या गटात मी अरुण राजा आणि संदीप, चिंतामणी आणि प्रथमेश, रवनीत आणि अर्पित, अक्षय आणि अपराजिता, माशा आणि मोहनीश, आशिष मेघना आणि राकेश, राहुल हिमांशू आणि दिनेश आणि एकटा आलेला सागर असे सगळे असणार होते.
कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं वाटत असताना हुरहूर उत्कंठा अशा संमिश्र भावनेत झोपी गेलो.
भाग ३ चालू
दिवस चौथा
जिसका मुझे था इंतजार, वो घडी आ गयी (अशी ओळ वगैरे लिहिणं म्हणजे किती गरीब ना कल्पना दारिद्र्यच एकदम )
सकाळची आन्हिके आटोपली. आज ट्रेक सुरु होण्यापूर्वीचा हॉटेलातील शेवटचा दिवस त्यामुळे उद्यापासून कुठले टॉयलेट आणि कुठले वॉश बेसिन असा विचार मनात आलाच. काही जणांना वाटत होते ह्या खोल्या आता आपल्याच आहेत आणि आपण ट्रेक करून परत येईपर्यंत आपापले सामान खोल्यांमधे तसेच राहू द्यावे. पण निघायच्या आधी खोल्या रिकाम्या करणे गरजेचे होते कारण आम्ही ट्रेक करत असताना त्या दुसऱ्यांना वापरायला देणे शक्य व्हावे. शिवाय परतल्यावर ह्याच खोल्या तर जाऊ देत पण ह्याच हॉटेलात रहायचे की कसे हे ही नक्की नव्हते. त्यामुळे लेह मध्ये ठेवायचे सामान आयोजकांकडे सुपूर्त केले. ते आमच्या म्हणजे वरच्याच मजल्यावर ठेवायचे असल्याने, बरीच मंडळी आपापले बोजे वर घेऊन येताना कुरुकुरुती झाली. त्यांना लगेच बघा आम्ही तर रोजच असं वर खाली करतोय वगैरे म्हणून भाव खाऊन झालं. रोज म्हणजे काय तर आल्यापासून रोज म्हणजेच फक्त दोन-तीन दिवस :p . वरच्या मजल्यावर राहण्याचा आणिक एक फायदा हा झाला की काही खालच्या मजल्यावरच्या लोकांना पाणी गोठल्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबण्याचा आणि खोल्यामध्ये ओल जाणवण्याचा अनुभव आला तो आम्हाला कधीच आला नाही. वरचा मजला आणि दोन बाजूंना खिडक्या असल्याने जेव्हा केव्हा ऊन पडत असे तेव्हा खोल्या उबदार होत असत, ओलावा नाहीसा होत असे म्हणजे आम्हाला तो जाणवलाच नाही. (अर्थात हे सगळे बाकीच्यांशी बोलल्यानंतर कळले.) तर प्रचंड खटाटोप केल्यानंतर, लेह मधे ठेवायचे सामान वर आणि बरोबर न्यायाचे सामान खाली अशी विभागणी करून झाल्यावर खाली डायनिंग हॉल मध्ये नाश्ता करायला जमलो. मला फारशी भूक नव्हती आणि पोह्याकरता दीडशे रुपये द्यायचे जीवावर आले होते त्यामुळे मी फक्त बरोबर आणलेल्यातले काही पदार्थ बिस्किटे वगैरे खाल्ले. न्याहारी आटोपून डायनिंग हॉल मधून बाहेर येतोय न येतोय तोवर आम्हाला न्यायला गाड्या येऊन थांबलेल्या दिसल्या. एकूण तीन गाड्या होत्या, त्यातल्या दोन आम्हा ट्रेकर्स करता आणि एक गाडी आमचे सगळ्यांचे तंबू, स्लीपिंग बॅग्स, जेवण खाण्याबनवण्याचे सामान, काही पोर्टर्स इत्यादी वाहून नेण्याकरता अशी योजना होती. मग सामान चढवले सगळी माणसे बस मधे बसली आहेत ना हे तपासले गेले आणि मग गणपती बाप्पा मोरया चा गजर करून निघालो आमच्या बस मध्ये चिंतामणी, प्रथमेश आणि काही मुंबईकर मंडळी असल्याने मोरया चा आवाज जोरदार होता. आज आम्हाला अंदाजे ७० किमी अंतर बसने पार करायचं होतं आणि मग तिलाद डो ह्या ठिकाणापासून आमचा ट्रेक चालू होणार होता.
निघाल्यानंतर थोडेच अंतर पार केल्यावर एका ठिकाणी काही मुले बर्फ़ावरती हॉकी खेळताना दिसली. आम्हाला दोन दिवसांमागे भेटलेल्या ताशी आणि अंगशुक यांनी सांगितले होते त्याची आठवण झाली. सध्या बरीच मुले हा खेळ खेळायला पुढे येत आहेत आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांना ह्या खर्चिक खेळाकरता साधन सामग्री पुरवण्यात येत आहे शिवाय काही पुरस्कर्ते देखील पुढे येताना दिसत आहेत. लवकरच आपला देश ह्या खेळात हिवाळी ऑलिम्पिकमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे. परत एकदा चरचरून जाणवले की आपल्या देशात गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही पण सुयोग्य संधी आणि व्यापक दृष्टिकोन हवा.
मी, ताशी आणि अंगशुक सोबत
लडाख मध्ये फिरायला येणाऱ्या लोकांमधे आवडत्या असलेल्या पत्थर साहिब नावाचे गुरुद्वार, मॅग्नेटिक हिल, सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम अशा अनेक स्थळांचा समावेश आमच्या ट्रेक करता जायच्या मार्गावर असणार होता तरीपण वेळेअभावी आम्ही कुठंही थांबलो नाही. गुरुद्वारात प्रवेश करताना पाय धुवावे लागतात त्यामुळे ईश्वरने बाकी कुठे नाही थांबता येणार गुरुद्वाऱयापाशी थांबायचे असे तर थांबू असे मुद्दाम सुचवले जे अर्थातच सर्वांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. केवळ एका ठिकाणी आमच्या सगळ्यांना दिलेले आयकार्ड तपासणी करता आणि बरोबरच्या सर्व पोर्टर लोकांची नोंदणी करण्याकरता थांबलो होतो. गाडीत एका जागी बसून परत जास्त थंडी वाजायला लागली होती. मग खाली उतरून फोटो सेशन उरकले. फोटो काढायला लागताच जे न उतरणारे होते ते ही बस मधून उतरते झाले. एका बाजूला बाहेर दिसणारे नयनरम्य नजारे तर दुसरीकडे अशक्य बोचरी थंड हवा. त्यावेळी नाही म्हटले तरी परत एकदा इकडे यायचा निर्णय घेतला ते चूक तर नाही ना ठरणार असा विचार मनात येऊ घातला होता मग परत एकदा कोण ते ज्याच्यामुळे इकडे यायचा निर्णय घेतला असा विषय निघाला आणि परत एकदा माझ्यावर बिल फाटले. पण अर्थात त्यावेळी एकामेकांना आपण इथे कोणामुळे आलो हे सांगताना आपल्या इतकेच टेन्शन समोरच्यालाही आले आहे हे जाणवून आम्हा सगळ्याच जणांना जे काही हसू आले त्यामुळे अंगात जरा ऊब आली. बघता बघता पहिल्यांदा गुरुद्वारा गेले मॅग्नेटिक हिल तर गेल्यावर पत्ता लागला मग रस्ता बऱ्याच वळणावळणाचा असल्याने सिंधू आणि झंस्कार संगम मात्र बराच काळ दिसत राहिला. त्याच सुमारास कधीतरी थोड्याच वेळात आम्ही लेह श्रीनगर हमरस्ता सोडला आणि जरा अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमणा चालू झाली. आता रस्ताही नदीच्या काठाकाठाने जाणारा होता. पण रस्ता फारच वर तर नदी पार खाली दरीतून वाहत होती. रस्ता अरुंद होता आणि अचानक एका ठिकाणी भूस्खलन झालेले आढळले अर्थात पुढे जायचा रस्ता बंद झालेला होता. हे किती वेळापूर्वी झाले ते कळायला मार्ग नव्हता पण तिथला राडारोडा हटवायला जे सि बी हजर होता. आम्ही बस मधून उतरून एखादा फोटो काढतोय ना काढतोय तोवर रस्ता मोकळा झाला देखील. ह्या भागातले सगळे रस्ते, महामार्ग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ने तयार केलेले आहेत आणि त्यांची डागडुजी देखील त्यांच्यातर्फेच होते. पडलेला बर्फ जास्त झाला असता तो बाजूला करणे, हिमस्खलन, भूस्खलन होता राडारोडा बाजूला करणे ई. सर्व कामे ह्या कडक भर हिवाळ्यात ही चालू असतात. रारंगढांग पुस्तकाची आठवण झाली. सिव्हील इंजिनियर होताना कधीकाळी मी देखील अशा ठिकाणी काम करायला मिळेल अशी स्वप्ने पाहिली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर BRO मधे नोकरीकरता अर्ज केला होता त्याची आठवण झाली. निसर्ग जितका सुंदर तितका खडतर हे सूत्र इथेही लागू होतच होते. इतकं खडतर जीवन आपल्याला झेपलं असतं का असा विचार मनात आलाच.
दरड कोसळली होती तिथुन दिसणारे नजारे १
दरड कोसळली होती तिथुन दिसणारे नजारे २
पुढचा प्रवास चालू झाला. गोठलेलं नदीपात्र दिसायला सुरु झाले होते, राखाडी डोंगर, गोठल्या नदीचा पांढरा शुभ्र मधेच वाहत्या पाण्याचा पट्टा वेगळ्या रंगामुळे उठून दिसत होता आणि आता आपली चालण्याची वेळ अगदी जवळ येत आहे असं जाणवायला लागले. अखेर एका ठिकाणी आमच्या गाड्या थांबल्याच. तिलाड दो म्हणजे काही गाव / वस्ती असेल असे वाटलेले पण तशी काही खूण जवळपास दिसली नाही. आम्ही बहुदा त्या गावाच्या हद्दीत पण गावाबाहेर थांबलो असणार. आम्ही जिथे उतरलो त्या काठाच्या बाजूचा खूप मोठा पट्टा गोठलेला होता. राखी करड्या दगडमाती च्या मधेच असलेला पांढरा शुभ्र पट्टा उठून दिसत होता. तिथून गोठलेल्या नदीपात्रात जाण्याकरता दोन-अडीच मजल्याइतकं अंतर उतरून जायचे होते. आणि मग अखेरीस आम्ही सगळे त्या गोठलेल्या नदीपात्रात उतरलो. सगळ्यांचे चेहरे उजळले होते घर सोडून तब्बल ३-४ दिवस लेह घालवल्यावर, लेहमधील वैद्यकीय तपासणी / चाळणी मधून सही सलामत पास झाल्यावर आज कुठे प्रत्यक्ष ट्रेक चालू होणार होता. उतरता उतरताच सगळे जण खोंडासारखे उधळले. आधीच लडाख भागातले सृष्टी सौंदर्य अलौकिक त्यात मी आता गोठलेल्या नदीपात्रात होतो. दोन्ही बाजूला उंच असे डोंगर, मधे गोठलेले नदीपात्र त्यात आणि परत वाहत्या पाण्याचा रंग रस्त्यावरून दिसत होता त्यापेक्षा अजूनच वेगळ्या छटेचा भासत होता. अगदी अद्भुत रम्य वातावरण होते आणि काळावेळाचे भान हरपून जायला झाले, मन दूर कुठे तरी जाऊन पोचले, तंद्री लागली. किती वेळ गेला माहीत नाही भान आले ते मित्रांच्या आरड्याओरड्याने अक्षयने मून वॉक चालू केला होता आणि सगळे त्याला चीअर करत होते. अक्षय मूनवॉक काय भारी करत होता आणि तेही अगदी विनासायास. मग थोडी भीड चेपली जाऊन आम्ही इतर मंडळींनी देखील थोडा प्रयत्न करून बघितला तर जमल्यासारखे वाटले. पण लगेच मनात विचार आला जास्त नको करायला उगाच पहिल्याच दिवशी पडायला व्हायचं त्यामुळे मग आवरते घेतले. थोडा वेळ गेल्यावर आम्हाला एकत्र जमा व्ह्यायला सांगण्यात आले आणि आम्हाला आमच्या ट्रेकगाईडस ची ओळख करून देण्यात आली. आमच्या दोन्ही गटासोबत प्रत्येकी दोन गाईड असणार होते एक जण सुरुवातीला राहून लीड करणार तर दुसरा सगळ्यात शेवटच्या माणसासोबत राहून सगळ्यांना घेऊन येणार. आमच्या बरोबर येणार असणारे गाईड डोडूल आणि अमीन नावाचे होते. त्यांनी आमची बर्फावर कसे चालायचे ह्याची शिकवणी घेतली. लांब ढांगा टाकायच्या नाहीत, पाय जवळजवळ टाकायचे, जास्त उचलायचे नाहीत आणि जमिनीला समांतर म्हणजे खरंतर बर्फ़ावर पाय घासतच चालायचे वगैरे वगैरे. ही शिकवणी झाल्यावर आम्ही सगळे फुरफुरत निघालोच होतो की आम्हाला सांगण्यातले की आधी जेवून मग निघायचे आहे. आज फार कमी अंतर चालायचे असल्याने आणि पहिलाच दिवस असल्याने हे अंतर सावकाश काटायचे आहे हे ही सांगण्यात आले. मग स्वयंपाक बनत असल्या कारणाने आम्ही नुसतेच इकडे तिकडे टिवल्या बावल्या करत फिरत असताना अर्पितने पडायची बोहोनी केलीच.
स्वयंपाक तयार झाला त्यावेळी आम्ही बहुतेक सर्व जण सुरुवातीचा उत्साह ओसरून काठावरच्या दगडांवर येऊन बसलो होतो. एका ठिकाणी थांबल्यावर लागणारे वारे टाळण्याकरता राजाने एका मोठ्या दगडाचा आडोसा शोधून काढला होता तिथं बसून राहिलेलो असताना जेवण वाढण्यात आले म्हणजे प्रत्येकाला एका खोलगट ताटलीत वाढून जाग्यावर आणून देत होते. एकच ताटली होती त्यामुळे हा नाश्ता आहे की काय असे काही जणांना वाटले तर उलगडा झाला की हे वन डिश मिल होते. त्यामुळे आम्हे सर्वानी हेच भरपेट खाणे अपेक्षित होते. त्यादिवसापासून एक वाक्य ट्रेक संपेपर्यंत कानी पडत राहिले ते म्हणजे दबादबाके खाओ आणि दबादबाके चलो. आमचे स्वैपाकी हेच एरवी पोर्टर म्हणूनही काम करत असत. त्यामुळे आमच्या मागून निघून पुढच्या मुक्कामी आमच्या आधी पोहोचताना वाटेत आम्हाला ओलांडून जात असताना ते म्हणत दबादबाके चलो आणि जेवण वाढताना घरचे घेणार नाहीत इतकी काळजी घेऊन आग्रह करकरून म्हणत दबादबाके खाओ. हे इतकं प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले की ह्या आरोळ्या नंतर पुरा ट्रेकभर आमच्यातल्या कोणाच्याही तोंडून वेळीअवेळी ऐकू यायला लागल्या.
तर सरते शेवटी जेवणखाण झाल्यावर सगळे चंबूगबाळे आवरून आम्ही मार्गस्थ झालो. निघण्यापूर्वी सूचनांची उजळणी झाली. सुरुवातीस असलेल्या गाईडला ओलांडून पुढे कुणी जायचे नाही, एकमेकांमध्ये योग्य तितके (म्हणजे आपल्या समोरचा घसरून पडलाच तर त्यामुळे आपण पडणार नाही इतके) अंतर तर ठेवायचे पण जास्त गॅप पडू द्यायची नाही वगैरे वगैरे. ईश्वर ने बरोबर काही शिट्ट्या आणल्या होत्या त्यापैकी एक माझ्या वाट्याला आली. मला वाटले अशी शिट्टी सगळ्यांनाच देताहेत की काय पण तसे नव्हते. पुढच्या आणि मागच्या गाईडकडे एकेक, ईश्वरकडे एक आणि मधल्या दोघांकडे एकेक. आम्हाला शिट्टी वाजवण्याचे रीतसर ट्रेनिंग देण्यात आले. निघा सांगायला, थांबा सांगायला, मदत हवी आहे सांगायला अशा खूणा ठरवण्यात आल्या. वाटेत काही झाले तरी पुढच्या आणि मागच्या भिडूमधे जास्त अंतर पडता कामा नये. जर का अंतर वाढायला लागले तर शिट्टी वाजवायची अशा कायकाय सूचना देऊन झाल्यावर अखेर एकदाचे आम्ही चालू पडलो.
वाटेत दिसलेले बर्फाचे नानाविध नमुने
नमुना १
नमुना २
नमुना ३
नमुना ४
मला शिट्टी दिल्यामुळे मध्यातच राहून मार्गक्रमणा करायची सूचना होती. उत्साहाच्या भरात पुढचा गाईड आणि त्याच्या बरोबरचे अक्षय, अपराजिता, सागर वगैरे मंडळी जोरजोरात चालत होती. मग काय बऱ्याच जणांची दमछाक होवू लागली. शिवाय मागची मंडळी येईपर्यंत पुढच्या मंडळींना एका जागी थांबावे लागत होते त्यावेळी चालणे थांबवल्यामुळे हवेतला गारवा अचानक जास्त जाणवत असे. पण असे करता करता आमची मुक्कामाची जागा म्हणजे एकदम येऊनच ठेपली. त्या जागेचे नाव शिंगरा कोमा. लक्षात राहे पर्यंत मी त्याला शिरकुरमा म्हणत होतो. आज तसेही चालायचे अंतर फार जास्त नव्हते त्यामुळे तशी दमछाक झाली नाही / थकवा जाणवला नाही. तिथे कॅम्प वर पोचल्यावर प्रत्येकाला तंबू वाटून देण्यात आले. एकेका तंबूत २ किंवा ३ जण राहतील अशा प्रकारे योजना केलेली होती. आम्ही एकूण चार जण सोबत आलो असलो आणि लेह मध्ये एकाच खोलीत राहत असलो तरी इथे तसे होणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही दोन तंबूत प्रत्येकी दोघे असे राहायचे ठरवले. त्याप्रमाणे मी आणि अरुण एका तंबूत राहायचे ठरले. दुसऱ्या एका तंबूत राजा आणि संदीप राहणार होते. आपापला तंबू ताब्यात घेतला. निळ्या रंगाचा एकमेव तंबू आम्हाला मिळाला होता. हा तंबू इतर दोनजणांकरता असलेल्या तंबूच्या मानाने जरा मोठा होता त्यामुळे उघड्यावर गारठ्यात भेटायच्या ऐवजी गप्पा मारायला म्हणून राजा आणि संदीप देखील आमच्या तंबूत आले आणि मग बरोबर आणलेले खायचे सामान रोज खाऊन संपवले नाही तर तसेच राहते त्यामुळे ते खायला सुरु केले.
तंबुतली खादाडी
चितळ्यांच्या गूळपोळीचे रेशनिंग करायला सुरुवात पहिल्याच दिवसापासून झाली. खाणे उरकल्या नंतर तंबूतून बाहेर पडलो असता इकडे तिकडे करत असताना कळले की आज ही एक वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि ते ठिकाण अजून थोडे पुढे आहे निदान अर्धा किमी तरी असेल. तिथे जायला म्हणून निघालो असता, लगेचच तिकडून परत आलेली मंडळी भेटली त्यांनी सांगितले की आता थोडा वेळ तपासणी बंद केली असून परत काही वेळानंतर तपासण्याचे काम चालू होईल मग काय आम्ही आपले परत पावली आलो आणि डायनिंग तंबूत थोडा टाईमपास केला.
एक मजा सांगायचीच राहिली. मुक्कामाची जागा अगदी जवळ आली असतानाच सोबत येऊन ठेपलेल्या अर्पितची विचारपूस करत होतो की तो अगदी सुरुवातीलाच पडला होता तर त्याला जास्त काही लागलं नाहीये ना वगैरे तर त्याने काय सांगावे; तो त्यानंतर एकूण पाच वेळा पडला पण सुदैवाने त्याला फार काही लागले नाही. मी विचार करताच होतो बर झालं आपला निदान पहिला दिवस तरी बिन पडता गेला असा विचार करून झाला नाही झाला तोच मी ही घसरलो आणि डावे कोपर बर्फावर आपटले. ईश्वर जवळच होता त्याने मला, बखोटं धरतात तशी माझी सॅक धरून उठवले. उठवत असताना एक प्रात्यक्षिकच दिले कोणी पडले असता त्याला उठवायला जाताना स्वतःला ना घसरवता समोरच्याला कसे उठवावे. पण त्यामुळे आम्हा चौघात सगळ्यात पहिल्यांदा पडण्याचा मान मला मिळाला
जेव्हा वैद्यकीय तपासणी करता म्हणून गेलो तेव्हा आम्हाला लेहला वैद्यकीय तपासणीच्या वेळी भेटलेली काही मंडळी परत एकदा भेटली. तो एक कबिलाच होता एक कुटुंबकबिला. तो पूर्णच्यापूर्ण गट म्हणजे बहुतेक सर्व एकाच कुटुंबातले आणि उरलेले काही त्यांचे मित्र होत. जे बरेचदा असे ट्रेक करतात. त्याशिवाय जे विमा योजना राबवताहेत त्या कंपनीचे एकजण तिथे भेटले. तिकडे आत जायच्या आधी जनरल गप्पा चालू असताना आम्हाला विचारण्यात आले की महाराष्ट्रातून कोण कोण आलंय आम्ही आपले खूष होऊन हात वर करणारच होतो (कारण सहा जण तर पुण्याहून गेलो होतो तीन चार मुंबईचे होते ) तर त्यांनी सांगितले ह्या वर्षीच्या हंगामात हाड मोडलेली सर्वात जास्त माणसे महाराष्ट्राची होती आणि तेही मुंबईची त्यामुळे त्यांनी काळजी घा. तेव्हा ईश्वर किंवा अर्पित सोबत नव्हते त्यामुळे मग मी ही आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागलो. वैद्यकीय तपासणी देखील एका तंबूतच होत होती. आत जातो तर जे डॉक्टर तिथे होते ते मराठी निघाले नागपूरचे डॉ. वाईकर म्हणून. नागपूर चे म्हटल्यावर त्यांना उर्दू भाषेचे सुप्रसिद्ध अभ्यासक आणि आस्वादक डॉ. विनय वाईकरांबद्दल विचारले तर हे त्यांचे पुतणे निघाले. बाकीच्या लोकांना तपासायचे असल्याने फार काही बोलता आले नाही पण मला डॉ विनय वाईकर माहीत आहेत हे पाहून ह्यांना बरे वाटल्याचे जाणवले. सुदैवाने वैद्यकीय तपासणीत माझ्यात आणि बाकी कोणाच्यातही कसलीही कमतरता आढळली नाही आणि मग परत कॅम्प वर आलो.
आमच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून घेतलेला फोटो दूर उजव्या कोपर्यात ठिपके दिसत आहेत तिथे बाकीचे कँप्स आणि वैद्यकीय तपासणीचे ठिकाण आहे.
कॅम्पची जागा बाकीच्या लोकांनी कॅम्प ठोकले होते त्यापासून जरा दूर होती पण त्यामुळे आमच्या समोर दिसणारा नजारा अप्रतिम होता. तो स्पॉट निवडायचे अजून एक कारण ईश्वरकडून कळले की तिकडे तंबू टोकले असता रात्री जोरात वाहणारे वारे मागच्या टेकाडामुळे अडले जातात. पण म्हणून ते ठिकाण निवडलं होतं तिथे जरा मागे बघितले तर भीती वाटावी अशी परिस्थिती होती. खालच्या बाजूचा एखादा दगड निखळला तर वरचे सगळे दगड किंबहुना आख्खा ढीगच्या ढीग ढासळेल अशी परिस्थिती होती. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सगळे जमले होते तिकडे डायनिंग टेंट मध्ये जमलो.
राजा त्याच्या तंबुच्या तोंडाशी, मागे डायनिंग टेंट.
पाणी आणताना आमचे मदतनीस
जेवण बनवून होईपर्यंत जरा अंताक्षरी खेळलो. मग दबादबाके जेवलो आणि आपापल्या तंबूत येऊन झोपलो. परत एकदा हे दोन ओळीत आटोपले पण भरपूर मोठं काम आहे हे तंबूत येऊन झोपायचे म्हणजे. कितीही जिवाभावाचे मित्र असाल तरी ते काम कोणी करायचे यावरून भांडण होऊ शकते इतकं अवघड काम. सुदैवाने मला टेंटमेट म्हणून अरण्या लाभला असल्यामुळे सगळे सुरळीत पार पडले.
तंबूत आत शिरताना एक चेन बाहेरच्या झापडाची आणि दोन चेन आतल्या झापडाच्या उघडायला लागायच्या अर्थातच आत गेल्यावर बंदही करायला लागायच्या त्याआधी पायातले बूट काढणे हे ही मोठे काम. गमबूट एकमेकात खुपसून त्यात पाणी प्राणी असं काहीही जाणार नाही याची तजवीज करायची. झोपायकरता दोन स्लीपिंग बॅग दिलेल्या होत्या त्या एकात एक अशा ठेवलेल्या असतील तर फारच छान नाहीतर त्या तशा एकात एक घालायच्या मग त्यात स्वतःला अर्धे घुसवायचे आपली मर्मेड झाली की मग उरलेला भाग अंगाभोवती लपेटून घेऊन आडवे व्हायचे आणि त्या दोन्हीं स्लीपिंग बॅगच्या एकावेळी एक अशा प्रकारे चेन्स वर ओढून घ्यायच्या अर्थात मग एक ओढताना दुसरी चेन उघडली जाणे वगैरे प्रकार घडतातच. तर असं खूप काम करून मग दमायला होतं तेव्हा कुठे जाऊन झोपायला मिळतं पण तेही कसं तर शवपेटीत पडून राहावे तसे. कुशीवर वळता येत नाही. हात पाय हलवता येत नाही चेहऱ्याच्या कुठल्याही भागाला खाज सुटली तर येणारी मजा अजूनच वेगळी. इतकं सगळं करून झाले की जाणवते आपल्याला काहीतरी टोचतंय; अंगाखाली कुठेतरी बारीकसा उंचवटा गेलाबाजार छोटासा खडा वगैरे आहे, पण ह्यातच खरी मजा आहे. थंडीमुळे झोप फार गाढ अशी लागत नाही पण एक मात्र खरे उठल्यावर मरगळ वगैरे कधीच वाटत नाही त्यामुळे झोप लागत नाही म्हणून काळजीत पडलेल्या माझ्या मित्रांना मी माझी थियरी सांगितली ती म्हणजे आपल्याला त्या वातावरणात कमी विश्रांती पुरते. तर अशा रीतीने गोठलेल्या नदीवरचा तंबूतला हा माझाही पहिला मुक्काम.
क्रमशः
भाग ३ चालू
दिवस चौथा
जिसका मुझे था इंतजार, वो घडी आ गयी (अशी ओळ वगैरे लिहिणं म्हणजे किती गरीब ना कल्पना दारिद्र्यच एकदम )
सकाळची आन्हिके आटोपली. आज ट्रेक सुरु होण्यापूर्वीचा हॉटेलातील शेवटचा दिवस त्यामुळे उद्यापासून कुठले टॉयलेट आणि कुठले वॉश बेसिन असा विचार मनात आलाच. काही जणांना वाटत होते ह्या खोल्या आता आपल्याच आहेत आणि आपण ट्रेक करून परत येईपर्यंत आपापले सामान खोल्यांमधे तसेच राहू द्यावे. पण निघायच्या आधी खोल्या रिकाम्या करणे गरजेचे होते कारण आम्ही ट्रेक करत असताना त्या दुसऱ्यांना वापरायला देणे शक्य व्हावे. शिवाय परतल्यावर ह्याच खोल्या तर जाऊ देत पण ह्याच हॉटेलात रहायचे की कसे हे ही नक्की नव्हते. त्यामुळे लेह मध्ये ठेवायचे सामान आयोजकांकडे सुपूर्त केले. ते आमच्या म्हणजे वरच्याच मजल्यावर ठेवायचे असल्याने, बरीच मंडळी आपापले बोजे वर घेऊन येताना कुरुकुरुती झाली. त्यांना लगेच बघा आम्ही तर रोजच असं वर खाली करतोय वगैरे म्हणून भाव खाऊन झालं. रोज म्हणजे काय तर आल्यापासून रोज म्हणजेच फक्त दोन-तीन दिवस :p . वरच्या मजल्यावर राहण्याचा आणिक एक फायदा हा झाला की काही खालच्या मजल्यावरच्या लोकांना पाणी गोठल्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबण्याचा आणि खोल्यामध्ये ओल जाणवण्याचा अनुभव आला तो आम्हाला कधीच आला नाही. वरचा मजला आणि दोन बाजूंना खिडक्या असल्याने जेव्हा केव्हा ऊन पडत असे तेव्हा खोल्या उबदार होत असत, ओलावा नाहीसा होत असे म्हणजे आम्हाला तो जाणवलाच नाही. (अर्थात हे सगळे बाकीच्यांशी बोलल्यानंतर कळले.) तर प्रचंड खटाटोप केल्यानंतर, लेह मधे ठेवायचे सामान वर आणि बरोबर न्यायाचे सामान खाली अशी विभागणी करून झाल्यावर खाली डायनिंग हॉल मध्ये नाश्ता करायला जमलो. मला फारशी भूक नव्हती आणि पोह्याकरता दीडशे रुपये द्यायचे जीवावर आले होते त्यामुळे मी फक्त बरोबर आणलेल्यातले काही पदार्थ बिस्किटे वगैरे खाल्ले. न्याहारी आटोपून डायनिंग हॉल मधून बाहेर येतोय न येतोय तोवर आम्हाला न्यायला गाड्या येऊन थांबलेल्या दिसल्या. एकूण तीन गाड्या होत्या, त्यातल्या दोन आम्हा ट्रेकर्स करता आणि एक गाडी आमचे सगळ्यांचे तंबू, स्लीपिंग बॅग्स, जेवण खाण्याबनवण्याचे सामान, काही पोर्टर्स इत्यादी वाहून नेण्याकरता अशी योजना होती. मग सामान चढवले सगळी माणसे बस मधे बसली आहेत ना हे तपासले गेले आणि मग गणपती बाप्पा मोरया चा गजर करून निघालो आमच्या बस मध्ये चिंतामणी, प्रथमेश आणि काही मुंबईकर मंडळी असल्याने मोरया चा आवाज जोरदार होता. आज आम्हाला अंदाजे ७० किमी अंतर बसने पार करायचं होतं आणि मग तिलाद डो ह्या ठिकाणापासून आमचा ट्रेक चालू होणार होता.
निघाल्यानंतर थोडेच अंतर पार केल्यावर एका ठिकाणी काही मुले बर्फ़ावरती हॉकी खेळताना दिसली. आम्हाला दोन दिवसांमागे भेटलेल्या ताशी आणि अंगशुक यांनी सांगितले होते त्याची आठवण झाली. सध्या बरीच मुले हा खेळ खेळायला पुढे येत आहेत आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांना ह्या खर्चिक खेळाकरता साधन सामग्री पुरवण्यात येत आहे शिवाय काही पुरस्कर्ते देखील पुढे येताना दिसत आहेत. लवकरच आपला देश ह्या खेळात हिवाळी ऑलिम्पिकमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे. परत एकदा चरचरून जाणवले की आपल्या देशात गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही पण सुयोग्य संधी आणि व्यापक दृष्टिकोन हवा.
मी, ताशी आणि अंगशुक सोबत
लडाख मध्ये फिरायला येणाऱ्या लोकांमधे आवडत्या असलेल्या पत्थर साहिब नावाचे गुरुद्वार, मॅग्नेटिक हिल, सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम अशा अनेक स्थळांचा समावेश आमच्या ट्रेक करता जायच्या मार्गावर असणार होता तरीपण वेळेअभावी आम्ही कुठंही थांबलो नाही. गुरुद्वारात प्रवेश करताना पाय धुवावे लागतात त्यामुळे ईश्वरने बाकी कुठे नाही थांबता येणार गुरुद्वाऱयापाशी थांबायचे असे तर थांबू असे मुद्दाम सुचवले जे अर्थातच सर्वांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. केवळ एका ठिकाणी आमच्या सगळ्यांना दिलेले आयकार्ड तपासणी करता आणि बरोबरच्या सर्व पोर्टर लोकांची नोंदणी करण्याकरता थांबलो होतो. गाडीत एका जागी बसून परत जास्त थंडी वाजायला लागली होती. मग खाली उतरून फोटो सेशन उरकले. फोटो काढायला लागताच जे न उतरणारे होते ते ही बस मधून उतरते झाले. एका बाजूला बाहेर दिसणारे नयनरम्य नजारे तर दुसरीकडे अशक्य बोचरी थंड हवा. त्यावेळी नाही म्हटले तरी परत एकदा इकडे यायचा निर्णय घेतला ते चूक तर नाही ना ठरणार असा विचार मनात येऊ घातला होता मग परत एकदा कोण ते ज्याच्यामुळे इकडे यायचा निर्णय घेतला असा विषय निघाला आणि परत एकदा माझ्यावर बिल फाटले. पण अर्थात त्यावेळी एकामेकांना आपण इथे कोणामुळे आलो हे सांगताना आपल्या इतकेच टेन्शन समोरच्यालाही आले आहे हे जाणवून आम्हा सगळ्याच जणांना जे काही हसू आले त्यामुळे अंगात जरा ऊब आली. बघता बघता पहिल्यांदा गुरुद्वारा गेले मॅग्नेटिक हिल तर गेल्यावर पत्ता लागला मग रस्ता बऱ्याच वळणावळणाचा असल्याने सिंधू आणि झंस्कार संगम मात्र बराच काळ दिसत राहिला. त्याच सुमारास कधीतरी थोड्याच वेळात आम्ही लेह श्रीनगर हमरस्ता सोडला आणि जरा अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमणा चालू झाली. आता रस्ताही नदीच्या काठाकाठाने जाणारा होता. पण रस्ता फारच वर तर नदी पार खाली दरीतून वाहत होती. रस्ता अरुंद होता आणि अचानक एका ठिकाणी भूस्खलन झालेले आढळले अर्थात पुढे जायचा रस्ता बंद झालेला होता. हे किती वेळापूर्वी झाले ते कळायला मार्ग नव्हता पण तिथला राडारोडा हटवायला जे सि बी हजर होता. आम्ही बस मधून उतरून एखादा फोटो काढतोय ना काढतोय तोवर रस्ता मोकळा झाला देखील. ह्या भागातले सगळे रस्ते, महामार्ग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ने तयार केलेले आहेत आणि त्यांची डागडुजी देखील त्यांच्यातर्फेच होते. पडलेला बर्फ जास्त झाला असता तो बाजूला करणे, हिमस्खलन, भूस्खलन होता राडारोडा बाजूला करणे ई. सर्व कामे ह्या कडक भर हिवाळ्यात ही चालू असतात. रारंगढांग पुस्तकाची आठवण झाली. सिव्हील इंजिनियर होताना कधीकाळी मी देखील अशा ठिकाणी काम करायला मिळेल अशी स्वप्ने पाहिली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर BRO मधे नोकरीकरता अर्ज केला होता त्याची आठवण झाली. निसर्ग जितका सुंदर तितका खडतर हे सूत्र इथेही लागू होतच होते. इतकं खडतर जीवन आपल्याला झेपलं असतं का असा विचार मनात आलाच.
दरड कोसळली होती तिथुन दिसणारे नजारे १
दरड कोसळली होती तिथुन दिसणारे नजारे २
पुढचा प्रवास चालू झाला. गोठलेलं नदीपात्र दिसायला सुरु झाले होते, राखाडी डोंगर, गोठल्या नदीचा पांढरा शुभ्र मधेच वाहत्या पाण्याचा पट्टा वेगळ्या रंगामुळे उठून दिसत होता आणि आता आपली चालण्याची वेळ अगदी जवळ येत आहे असं जाणवायला लागले. अखेर एका ठिकाणी आमच्या गाड्या थांबल्याच. तिलाड दो म्हणजे काही गाव / वस्ती असेल असे वाटलेले पण तशी काही खूण जवळपास दिसली नाही. आम्ही बहुदा त्या गावाच्या हद्दीत पण गावाबाहेर थांबलो असणार. आम्ही जिथे उतरलो त्या काठाच्या बाजूचा खूप मोठा पट्टा गोठलेला होता. राखी करड्या दगडमाती च्या मधेच असलेला पांढरा शुभ्र पट्टा उठून दिसत होता. तिथून गोठलेल्या नदीपात्रात जाण्याकरता दोन-अडीच मजल्याइतकं अंतर उतरून जायचे होते. आणि मग अखेरीस आम्ही सगळे त्या गोठलेल्या नदीपात्रात उतरलो. सगळ्यांचे चेहरे उजळले होते घर सोडून तब्बल ३-४ दिवस लेह घालवल्यावर, लेहमधील वैद्यकीय तपासणी / चाळणी मधून सही सलामत पास झाल्यावर आज कुठे प्रत्यक्ष ट्रेक चालू होणार होता. उतरता उतरताच सगळे जण खोंडासारखे उधळले. आधीच लडाख भागातले सृष्टी सौंदर्य अलौकिक त्यात मी आता गोठलेल्या नदीपात्रात होतो. दोन्ही बाजूला उंच असे डोंगर, मधे गोठलेले नदीपात्र त्यात आणि परत वाहत्या पाण्याचा रंग रस्त्यावरून दिसत होता त्यापेक्षा अजूनच वेगळ्या छटेचा भासत होता. अगदी अद्भुत रम्य वातावरण होते आणि काळावेळाचे भान हरपून जायला झाले, मन दूर कुठे तरी जाऊन पोचले, तंद्री लागली. किती वेळ गेला माहीत नाही भान आले ते मित्रांच्या आरड्याओरड्याने अक्षयने मून वॉक चालू केला होता आणि सगळे त्याला चीअर करत होते. अक्षय मूनवॉक काय भारी करत होता आणि तेही अगदी विनासायास. मग थोडी भीड चेपली जाऊन आम्ही इतर मंडळींनी देखील थोडा प्रयत्न करून बघितला तर जमल्यासारखे वाटले. पण लगेच मनात विचार आला जास्त नको करायला उगाच पहिल्याच दिवशी पडायला व्हायचं त्यामुळे मग आवरते घेतले. थोडा वेळ गेल्यावर आम्हाला एकत्र जमा व्ह्यायला सांगण्यात आले आणि आम्हाला आमच्या ट्रेकगाईडस ची ओळख करून देण्यात आली. आमच्या दोन्ही गटासोबत प्रत्येकी दोन गाईड असणार होते एक जण सुरुवातीला राहून लीड करणार तर दुसरा सगळ्यात शेवटच्या माणसासोबत राहून सगळ्यांना घेऊन येणार. आमच्या बरोबर येणार असणारे गाईड डोडूल आणि अमीन नावाचे होते. त्यांनी आमची बर्फावर कसे चालायचे ह्याची शिकवणी घेतली. लांब ढांगा टाकायच्या नाहीत, पाय जवळजवळ टाकायचे, जास्त उचलायचे नाहीत आणि जमिनीला समांतर म्हणजे खरंतर बर्फ़ावर पाय घासतच चालायचे वगैरे वगैरे. ही शिकवणी झाल्यावर आम्ही सगळे फुरफुरत निघालोच होतो की आम्हाला सांगण्यातले की आधी जेवून मग निघायचे आहे. आज फार कमी अंतर चालायचे असल्याने आणि पहिलाच दिवस असल्याने हे अंतर सावकाश काटायचे आहे हे ही सांगण्यात आले. मग स्वयंपाक बनत असल्या कारणाने आम्ही नुसतेच इकडे तिकडे टिवल्या बावल्या करत फिरत असताना अर्पितने पडायची बोहोनी केलीच.
स्वयंपाक तयार झाला त्यावेळी आम्ही बहुतेक सर्व जण सुरुवातीचा उत्साह ओसरून काठावरच्या दगडांवर येऊन बसलो होतो. एका ठिकाणी थांबल्यावर लागणारे वारे टाळण्याकरता राजाने एका मोठ्या दगडाचा आडोसा शोधून काढला होता तिथं बसून राहिलेलो असताना जेवण वाढण्यात आले म्हणजे प्रत्येकाला एका खोलगट ताटलीत वाढून जाग्यावर आणून देत होते. एकच ताटली होती त्यामुळे हा नाश्ता आहे की काय असे काही जणांना वाटले तर उलगडा झाला की हे वन डिश मिल होते. त्यामुळे आम्हे सर्वानी हेच भरपेट खाणे अपेक्षित होते. त्यादिवसापासून एक वाक्य ट्रेक संपेपर्यंत कानी पडत राहिले ते म्हणजे दबादबाके खाओ आणि दबादबाके चलो. आमचे स्वैपाकी हेच एरवी पोर्टर म्हणूनही काम करत असत. त्यामुळे आमच्या मागून निघून पुढच्या मुक्कामी आमच्या आधी पोहोचताना वाटेत आम्हाला ओलांडून जात असताना ते म्हणत दबादबाके चलो आणि जेवण वाढताना घरचे घेणार नाहीत इतकी काळजी घेऊन आग्रह करकरून म्हणत दबादबाके खाओ. हे इतकं प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले की ह्या आरोळ्या नंतर पुरा ट्रेकभर आमच्यातल्या कोणाच्याही तोंडून वेळीअवेळी ऐकू यायला लागल्या.
तर सरते शेवटी जेवणखाण झाल्यावर सगळे चंबूगबाळे आवरून आम्ही मार्गस्थ झालो. निघण्यापूर्वी सूचनांची उजळणी झाली. सुरुवातीस असलेल्या गाईडला ओलांडून पुढे कुणी जायचे नाही, एकमेकांमध्ये योग्य तितके (म्हणजे आपल्या समोरचा घसरून पडलाच तर त्यामुळे आपण पडणार नाही इतके) अंतर तर ठेवायचे पण जास्त गॅप पडू द्यायची नाही वगैरे वगैरे. ईश्वर ने बरोबर काही शिट्ट्या आणल्या होत्या त्यापैकी एक माझ्या वाट्याला आली. मला वाटले अशी शिट्टी सगळ्यांनाच देताहेत की काय पण तसे नव्हते. पुढच्या आणि मागच्या गाईडकडे एकेक, ईश्वरकडे एक आणि मधल्या दोघांकडे एकेक. आम्हाला शिट्टी वाजवण्याचे रीतसर ट्रेनिंग देण्यात आले. निघा सांगायला, थांबा सांगायला, मदत हवी आहे सांगायला अशा खूणा ठरवण्यात आल्या. वाटेत काही झाले तरी पुढच्या आणि मागच्या भिडूमधे जास्त अंतर पडता कामा नये. जर का अंतर वाढायला लागले तर शिट्टी वाजवायची अशा कायकाय सूचना देऊन झाल्यावर अखेर एकदाचे आम्ही चालू पडलो.
वाटेत दिसलेले बर्फाचे नानाविध नमुने
नमुना १
नमुना २
नमुना ३
नमुना ४
मला शिट्टी दिल्यामुळे मध्यातच राहून मार्गक्रमणा करायची सूचना होती. उत्साहाच्या भरात पुढचा गाईड आणि त्याच्या बरोबरचे अक्षय, अपराजिता, सागर वगैरे मंडळी जोरजोरात चालत होती. मग काय बऱ्याच जणांची दमछाक होवू लागली. शिवाय मागची मंडळी येईपर्यंत पुढच्या मंडळींना एका जागी थांबावे लागत होते त्यावेळी चालणे थांबवल्यामुळे हवेतला गारवा अचानक जास्त जाणवत असे. पण असे करता करता आमची मुक्कामाची जागा म्हणजे एकदम येऊनच ठेपली. त्या जागेचे नाव शिंगरा कोमा. लक्षात राहे पर्यंत मी त्याला शिरकुरमा म्हणत होतो. आज तसेही चालायचे अंतर फार जास्त नव्हते त्यामुळे तशी दमछाक झाली नाही / थकवा जाणवला नाही. तिथे कॅम्प वर पोचल्यावर प्रत्येकाला तंबू वाटून देण्यात आले. एकेका तंबूत २ किंवा ३ जण राहतील अशा प्रकारे योजना केलेली होती. आम्ही एकूण चार जण सोबत आलो असलो आणि लेह मध्ये एकाच खोलीत राहत असलो तरी इथे तसे होणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही दोन तंबूत प्रत्येकी दोघे असे राहायचे ठरवले. त्याप्रमाणे मी आणि अरुण एका तंबूत राहायचे ठरले. दुसऱ्या एका तंबूत राजा आणि संदीप राहणार होते. आपापला तंबू ताब्यात घेतला. निळ्या रंगाचा एकमेव तंबू आम्हाला मिळाला होता. हा तंबू इतर दोनजणांकरता असलेल्या तंबूच्या मानाने जरा मोठा होता त्यामुळे उघड्यावर गारठ्यात भेटायच्या ऐवजी गप्पा मारायला म्हणून राजा आणि संदीप देखील आमच्या तंबूत आले आणि मग बरोबर आणलेले खायचे सामान रोज खाऊन संपवले नाही तर तसेच राहते त्यामुळे ते खायला सुरु केले.
तंबुतली खादाडी
चितळ्यांच्या गूळपोळीचे रेशनिंग करायला सुरुवात पहिल्याच दिवसापासून झाली. खाणे उरकल्या नंतर तंबूतून बाहेर पडलो असता इकडे तिकडे करत असताना कळले की आज ही एक वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि ते ठिकाण अजून थोडे पुढे आहे निदान अर्धा किमी तरी असेल. तिथे जायला म्हणून निघालो असता, लगेचच तिकडून परत आलेली मंडळी भेटली त्यांनी सांगितले की आता थोडा वेळ तपासणी बंद केली असून परत काही वेळानंतर तपासण्याचे काम चालू होईल मग काय आम्ही आपले परत पावली आलो आणि डायनिंग तंबूत थोडा टाईमपास केला.
एक मजा सांगायचीच राहिली. मुक्कामाची जागा अगदी जवळ आली असतानाच सोबत येऊन ठेपलेल्या अर्पितची विचारपूस करत होतो की तो अगदी सुरुवातीलाच पडला होता तर त्याला जास्त काही लागलं नाहीये ना वगैरे तर त्याने काय सांगावे; तो त्यानंतर एकूण पाच वेळा पडला पण सुदैवाने त्याला फार काही लागले नाही. मी विचार करताच होतो बर झालं आपला निदान पहिला दिवस तरी बिन पडता गेला असा विचार करून झाला नाही झाला तोच मी ही घसरलो आणि डावे कोपर बर्फावर आपटले. ईश्वर जवळच होता त्याने मला, बखोटं धरतात तशी माझी सॅक धरून उठवले. उठवत असताना एक प्रात्यक्षिकच दिले कोणी पडले असता त्याला उठवायला जाताना स्वतःला ना घसरवता समोरच्याला कसे उठवावे. पण त्यामुळे आम्हा चौघात सगळ्यात पहिल्यांदा पडण्याचा मान मला मिळाला
जेव्हा वैद्यकीय तपासणी करता म्हणून गेलो तेव्हा आम्हाला लेहला वैद्यकीय तपासणीच्या वेळी भेटलेली काही मंडळी परत एकदा भेटली. तो एक कबिलाच होता एक कुटुंबकबिला. तो पूर्णच्यापूर्ण गट म्हणजे बहुतेक सर्व एकाच कुटुंबातले आणि उरलेले काही त्यांचे मित्र होत. जे बरेचदा असे ट्रेक करतात. त्याशिवाय जे विमा योजना राबवताहेत त्या कंपनीचे एकजण तिथे भेटले. तिकडे आत जायच्या आधी जनरल गप्पा चालू असताना आम्हाला विचारण्यात आले की महाराष्ट्रातून कोण कोण आलंय आम्ही आपले खूष होऊन हात वर करणारच होतो (कारण सहा जण तर पुण्याहून गेलो होतो तीन चार मुंबईचे होते ) तर त्यांनी सांगितले ह्या वर्षीच्या हंगामात हाड मोडलेली सर्वात जास्त माणसे महाराष्ट्राची होती आणि तेही मुंबईची त्यामुळे त्यांनी काळजी घा. तेव्हा ईश्वर किंवा अर्पित सोबत नव्हते त्यामुळे मग मी ही आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागलो. वैद्यकीय तपासणी देखील एका तंबूतच होत होती. आत जातो तर जे डॉक्टर तिथे होते ते मराठी निघाले नागपूरचे डॉ. वाईकर म्हणून. नागपूर चे म्हटल्यावर त्यांना उर्दू भाषेचे सुप्रसिद्ध अभ्यासक आणि आस्वादक डॉ. विनय वाईकरांबद्दल विचारले तर हे त्यांचे पुतणे निघाले. बाकीच्या लोकांना तपासायचे असल्याने फार काही बोलता आले नाही पण मला डॉ विनय वाईकर माहीत आहेत हे पाहून ह्यांना बरे वाटल्याचे जाणवले. सुदैवाने वैद्यकीय तपासणीत माझ्यात आणि बाकी कोणाच्यातही कसलीही कमतरता आढळली नाही आणि मग परत कॅम्प वर आलो.
आमच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून घेतलेला फोटो दूर उजव्या कोपर्यात ठिपके दिसत आहेत तिथे बाकीचे कँप्स आणि वैद्यकीय तपासणीचे ठिकाण आहे.
कॅम्पची जागा बाकीच्या लोकांनी कॅम्प ठोकले होते त्यापासून जरा दूर होती पण त्यामुळे आमच्या समोर दिसणारा नजारा अप्रतिम होता. तो स्पॉट निवडायचे अजून एक कारण ईश्वरकडून कळले की तिकडे तंबू टोकले असता रात्री जोरात वाहणारे वारे मागच्या टेकाडामुळे अडले जातात. पण म्हणून ते ठिकाण निवडलं होतं तिथे जरा मागे बघितले तर भीती वाटावी अशी परिस्थिती होती. खालच्या बाजूचा एखादा दगड निखळला तर वरचे सगळे दगड किंबहुना आख्खा ढीगच्या ढीग ढासळेल अशी परिस्थिती होती. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सगळे जमले होते तिकडे डायनिंग टेंट मध्ये जमलो.
राजा त्याच्या तंबुच्या तोंडाशी, मागे डायनिंग टेंट.
पाणी आणताना आमचे मदतनीस
जेवण बनवून होईपर्यंत जरा अंताक्षरी खेळलो. मग दबादबाके जेवलो आणि आपापल्या तंबूत येऊन झोपलो. परत एकदा हे दोन ओळीत आटोपले पण भरपूर मोठं काम आहे हे तंबूत येऊन झोपायचे म्हणजे. कितीही जिवाभावाचे मित्र असाल तरी ते काम कोणी करायचे यावरून भांडण होऊ शकते इतकं अवघड काम. सुदैवाने मला टेंटमेट म्हणून अरण्या लाभला असल्यामुळे सगळे सुरळीत पार पडले.
तंबूत आत शिरताना एक चेन बाहेरच्या झापडाची आणि दोन चेन आतल्या झापडाच्या उघडायला लागायच्या अर्थातच आत गेल्यावर बंदही करायला लागायच्या त्याआधी पायातले बूट काढणे हे ही मोठे काम. गमबूट एकमेकात खुपसून त्यात पाणी प्राणी असं काहीही जाणार नाही याची तजवीज करायची. झोपायकरता दोन स्लीपिंग बॅग दिलेल्या होत्या त्या एकात एक अशा ठेवलेल्या असतील तर फारच छान नाहीतर त्या तशा एकात एक घालायच्या मग त्यात स्वतःला अर्धे घुसवायचे आपली मर्मेड झाली की मग उरलेला भाग अंगाभोवती लपेटून घेऊन आडवे व्हायचे आणि त्या दोन्हीं स्लीपिंग बॅगच्या एकावेळी एक अशा प्रकारे चेन्स वर ओढून घ्यायच्या अर्थात मग एक ओढताना दुसरी चेन उघडली जाणे वगैरे प्रकार घडतातच. तर असं खूप काम करून मग दमायला होतं तेव्हा कुठे जाऊन झोपायला मिळतं पण तेही कसं तर शवपेटीत पडून राहावे तसे. कुशीवर वळता येत नाही. हात पाय हलवता येत नाही चेहऱ्याच्या कुठल्याही भागाला खाज सुटली तर येणारी मजा अजूनच वेगळी. इतकं सगळं करून झाले की जाणवते आपल्याला काहीतरी टोचतंय; अंगाखाली कुठेतरी बारीकसा उंचवटा गेलाबाजार छोटासा खडा वगैरे आहे, पण ह्यातच खरी मजा आहे. थंडीमुळे झोप फार गाढ अशी लागत नाही पण एक मात्र खरे उठल्यावर मरगळ वगैरे कधीच वाटत नाही त्यामुळे झोप लागत नाही म्हणून काळजीत पडलेल्या माझ्या मित्रांना मी माझी थियरी सांगितली ती म्हणजे आपल्याला त्या वातावरणात कमी विश्रांती पुरते. तर अशा रीतीने गोठलेल्या नदीवरचा तंबूतला हा माझाही पहिला मुक्काम.
क्रमशः
भाग ४ चालू....
दिवस पाचवा -
आदल्या रात्री लवकर जेवण झाले होते म्हणून की काय पण मला पहाटे चार वाजताच जाग आली. निसर्गाची मोठी हाक. सुदैवाने रात्रभर छोटी हाक न आल्याने अर्ध्या रात्री अर्ध्या झोपेतून उठावे लागले नव्हते. थंडीमुळे उठायचे जीवावर आले होते पण मोठ्या हाके पुढे काय चालणार मग उठलो आपला. मोठ्या हाकेला ओ देताना लडाख मध्ये राहत आहोत तर लडाखी खड्डा पद्धतीचा अवलंब करावाच लागणार अशी मानसिक तयारी करून (स्वत:ची) आणि करवून (मित्रांची) झाली होतीच. तंबूच्या आतल्या दोन झडपा उघडल्या, पाय कसे बसे गमबुटात खुपसले आणि बाहेरची झडप उघडली. उघडली मात्र माझ्या डोळ्यावरची होती नव्हती ती झोप खाडकन उडाली. केवळ थंडीने नाही तर समोर जे दृश्य पहायला मिळाले त्यामुळे. हिमवर्षावामुळे यत्र तत्र सर्वत्र पांढरा शुभ्र रंग. सगळीकडे सफेद रंगाचा आणि अर्थातच हिमाचा मुलामा. आधीच पहाटेचे चार वाजताची अर्धवट अंधार उजेडाची वेळ, अजून जाग पूर्ण आलेली नाहीये, प्रचंड थंडीमुळे संवेदना बधीर झाल्यात, त्यातून हे अत्यंत अनपेक्षितपणे अजिबात आवाज न करता पडत असलेले बर्फ, काल रात्री झोपेपर्यंत आजूबाजूला असलेल्या तपकिरी मातकट रंगावर चढलेले शुभ्रतेचे आवरण, गुंग होऊन बघत राहाण्याशिवाय दुसरे काही करूच शकत नाही आपण. भान आले तेव्हा पहिल्या प्रथम अरण्याला उठवले अरे बघ काय अप्रतिम नजारा आहे. खालून बर्फ वर बर्फ बर्फ बाजूने... एक इंचभर जागा देखील वाचली नव्हती हिमवर्षावापासून अजून नाट्यमय रीतीने सांगायचे झाले तर ज्यावर हिम वर्षाव झाला नाही अशी सुईच्या अग्रावर मावेल इतकी भुई देखील उरली नव्हती. तो ही अर्धवट झोपेत होता वा छान वगैरे म्हणून झाल्यावर पापा आप जलदी जाके आओ म्हणून परत स्लिपींग बॅगेत गुडूप झाला.
मला आता वेगळीच काळजी वाटू लागली. अंधारात बाहेर जावे लागले तर म्हणून काल दिवसाउजेडी मारे पाहून ठेवली होती संडासाकडे जाणारी वाट कुठून कशी जाते ते पण आता ताजे बर्फ पडल्यामुळे सगळ्या पायवाटा दगड धोंडे झुडुपं गवत सगळे काही पांढऱ्या थराखाली झाकून गेलेलं. त्यात संडासापर्यंत पोचण्याकरता एक छोटा का होईना पण चढ चढून जायचे होते. हिंमत बांधली आणि गेलो. वेट अँड ड्राय टिश्यू पेपर, सॅनिटाइजर, हेडटॉर्च असं सगळं काही घेऊन गमबूट आणि अंगावरच्या वर खाली घातलेल्या कपड्यांच्या थरांनिशी निसर्गाच्या मोठ्या हाकेला ओ द्यायची हे माझ्यामते जगातले सगळ्यात अवघड काम आहे. काही विचारू नका कार्यभाग कसा उरकला. कार्यभाग उरकल्यानंतर मात्र उतारावरून स्वतःला सांभाळत खाली आलो. तंबूजवळ आल्यावर मात्र एकीकडे अजिबात आवाज न करत भुरुभुरु पडणाऱ्या बर्फ़ाकडे बघायला बाहेरच थांबावे असे वाटत होते आणि एकीकडे अत्यंत गारठ्यामुळे कधी एकदा तंबूत शिरतोय असे झालेले. थोडा वेळ त्या स्वर्गीय वातावरणाचा आनंद घेतल्यावर मात्र परत तंबूत येऊन झोपलो. पुन्हा एकदा तेच सगळे टप्पे. तंबूची, स्लीपिंग बॅगची चेन उघडा बंद करा वगैरे वगैरे नंतर साधारण तास दीड तास तंबूत पडून राहिलो थोडी झोप लागत्ये न लागत्ये तोवर सकाळ झालीच मग बाहेर आलो. बर्फ पडतच होता उजाडल्यामुळे अजूनच सुंदर दृष्य होतं ते. दात घासून झाले तरी बर्फ पडायचा थांबला नाही आता त्या दृश्याची सवय झाली होती आणि लोकांची कुजबूज सुरु झाली होती की बर्फ़ातच चालू पडायचे आहे की बर्फ पडणे थांबल्यावर. शिवाय असेही बोलणे चालले होते की बर्फ़ पडला की तपमान जरा वाढते ज्यामुळे नदीवरील बर्फ़ाचे आवरण वितळू शकते. त्यामुळे जरा मनाची चलबिचल होऊ लागली. पण वाटले थांबेल हिमवर्षाव पण मग तर नाश्ताही करून झाला तरीही बर्फ पडतच होता. शेवटी मग ईश्वरने जाहीर केले की आपल्याला बर्फ पडत असतानाच निघायाचे आहे त्यामुळे सर्व मंडळींनी आपापल्या अंगावर वॉटर प्रूफ जॅकेट अंगावर चढवा आणि निघायला सज्ज व्हा. माझ्याबरोबर आलेल्या तिघाही जणांकडे वॉटर प्रूफ जॅकेट नव्हते. आता आली का पंचाईत. माझ्याकडे शॅनॉन ने दिलेले असे एक वॉटरप्रूफ जॅकेट आणि वॉटरप्रूफ पँट होती. पण आम्हाला adventure nation कडून आलेल्या ईमेल मध्ये ह्याचा उल्लेख नसल्याने राजा, अरुण आणि संदीप कडे हे नव्हते. मी सुद्धा शॅनॉनने दिलेच आहे तर न्यावे म्हणून आणले होते. आम्ही आपले धरून चाललो थंडीत उणे तपमानात पाऊस पडणार नाही त्यामुळे वॉटरप्रूफ जॅकेट काही लागणार नाही. शिवाय अशीही एक गैर समजूत (का कोणास ठाऊक) होती की डाऊन जॅकेट मधून बर्फ / बर्फ़ाचे पाणी आत जात नाही. अर्थात आमची ही समजूत अत्यंत चुकीची होती हे आम्हाला कळले आणि आम्ही किती अडाणी आहोत हे बाकीच्या सगळ्यांना.
आता या ठिकाणी थोडे आम्ही घालत असलेल्या कपड्याच्या थराविषयी लिहिले तर अस्थानी ठरणार नाही. ह्यावर आम्ही निघायच्या आधीपासून ह्या विषयावर इतकी चर्चा केली होती की ज्याचे नाव ते. एकाच तपमानाला प्रत्येकाला वाजणारी थंडी वेगवेगळी असूच शकते म्हणजे असतेच. त्यामुळे दोन तीन आयोजकांच्या वेबसाईट वरून माहिती काढून मी चक्क एक कंपॅरिटिव्ह बनवले होते. आम्हा चौघांची खरेदी त्यानुसार केलेली होती काही गोष्टी प्रत्येकाकडे आधीच होत्या त्या घरातल्याच घ्यायच्या असे ठरले होते. त्या नुसार आम्ही अंगात चढवत असू ते कपडे सर्वसाधारणपणे असे होते. वर घालायचे थर आणि खाली घालायचे थर. खाली घालायचे दोन थर पुरतात. ह्याचे एक कारण वरती घातलेले कपडे आपल्या मांड्यापर्यंत येतील इतपत मोठे असतातच. वरच्या कपड्यात सर्वात आत थर्मल वेअर त्यात दोन प्रकार एक ऍक्टिव्ह थर्मल वेअर जे डिकॅथलॉन नावाच्या दुकानात मिळते ह्या थर्मल चे वैशिष्ट्य असे की त्यात आलेला घाम सुकण्याकरता तशी व्यवस्था त्यात असते म्हणजे काखेत जरा वेगळे जाळीदार कापड वगैरे शिवाय ह्याचे कापड ड्रायफिट सदृश्य असते. हे दिवसा चालताना वापरायचे. रात्री झोपताना घाम येण्याची शक्यता नसल्याने त्यावेळी जनरल कुठल्याही दुकानात मिळणारे थर्मल वेअर चालून जाते. त्यावर दुसरा थर टीशर्ट हा ही खास सूचनेनुसार सिंथेटिक कापडाचा वापरण्यास सांगितला होता. त्यावर फ्लीस चे जाकीट आणि मग त्यावर डाऊन जॅकेट. सुरुवातीस हे सगळे घालून नुसते वावरताना देखील अवघडलेपण येत असे. पण मग नंतर हे इतके कपडे मग त्यावर सॅक हातात काठी रात्री आवर्जून हेड टॉर्च असं फिरायची सवय होऊन जाते.
त्यातल्या त्यात बरं वाटेल अशी एक गोष्ट म्हणजे वॉटरप्रूफ जॅकेट नसणारे अजूनही दोन जण निघाले पण अर्थात त्यामुळे ईश्वरची काळजी अजून वाढली. मग जाहीर आवाहन करण्यात आले की ज्या कोणाकडे जास्तीचे जाकीट असेल त्यांनी ते नाहीये गटाला द्यावे अशा आवाहनानंतर दोघं तिघांची सोय झाली पण अपराजिता आणि अरुण ह्यांची सोय लागायची राहिलीच होती त्यामुळे मग ईश्वर त्यांच्याकरता काळ्या पॉलीथीन पिशव्या असतात त्यांच्यापासून तात्पुरती व्यवस्था करण्याच्या मागे लागला. तितक्यात अपराजिता ला देखील कोणाकडून तरी जॅकेट मिळाले राहता राहिला अरुण मग शेवटी त्याच्या करता तात्पुरती व्यवस्था करून झाली आणि आम्ही मार्गस्थ जाहलो. तितक्यात आमच्या इंटरनॅशनल युथ क्लब चा परत जाणारा गट आम्हाला भेटला त्यांच्याकडून एक रेन पोंचो मिळाला आणि मी हुश्श केले माझीही हिवाळ्यातल्या ट्रेक ची पहिलीच वेळ असली तरी माझ्या मित्रांची एकंदरीतच हिमालयातल्या पहिली वेळ होती आणि ते माझ्या भरोशावर तिकडे आलं होते मला त्या दिवशी फार कानकोंडे वाटत होते. म्हणजे इतके सगळे महागातले कपडे खरेदी केली तर हे तुलनेने स्वस्त आणि वजनाला हलके असे जॅकेट कसं काय राहून गेले.
तात्पुरत्या व्यवस्थेतल्या अवस्थेत अरुण
ह्या सगळ्या गडबडीत अजून एक प्रकरण झाले ते म्हणजे दुबईहून एकत्र आलेल्या हिमांशू दिनेश आणि राहुल ह्या तिघांपैकी राहुलला परत पाठवण्याचे ठरले. कालच्या त्याच्या तपासणीत त्याच्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी आढळले होते. त्याला एक रात्र जाऊ दे त्याही नंतर म्हणजे सकाळीही ते वाढले नाही तर परत जावे लागेल असे सांगितले होतेच. त्यानेही अवास्तव हट्ट न करता त्यास मान्यता दिली होती. आज सकाळीच तो ही तपासणी करून आला होता आणि आजही त्याचे रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण वाढले नव्हते. ज्या गटाकडून अरुण करता पोंचो घेतला त्या गटासोबत राहुलला परत पाठवले. फार वाईट वाटले पण काही इलाज नव्हता. त्याच्या शुभेच्छा स्वीकारून आम्ही मार्गस्थ झालो.
बर्फ पडत असताना चालण्याची मजाच काही और
आज आम्हाला तिब्ब स्थित गुहांपर्यंत चालत जायचे होते. एकूण अंतर अंदाजे १५ किमी होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर खरा ट्रेक आज चालू होणार होता. त्यात हा पडणारा बर्फ. म्हणजे जरा टेन्शन आले होते की आता कसं काय होईल वगैरे. पण चालत असतानाच एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ताज्या पडलेल्या बर्फ़ावर चालताना अजिबात घसरायला होत नाहीये. शिवाय साधारण तास दोन तासात बर्फ पडायचा देखील थांबला त्यामुळे सुरुवातीस चाचपडत चालणारी कालची ती काही मंडळी परत एकदा जोरात चालू लागलेली. दोन माणसांच्या अंतर पडले की काही वेळा पुढचा नक्की कुठून गेला, तिकडे निसरडे होतं का काही कळायला मार्ग नसे. पुढचे खूप पुढे गेले की त्यांना शिट्ट्या वाजवून थांबायला सांगितले जाई मग असे (मागचे येईपर्यंत) थांबले की त्या वेळी गार वाऱ्यामुळं जीव नको नको व्हायचं. मग ईश्वरने रीतसर त्या विशिष्ठ प्रकारची शिट्टी वगैरे वाजवून सर्वाना एकत्रित केले आणि ज्या कोणाला जोरात चालायला जमत नव्हते त्यांना सगळ्यात पुढे राहायला सांगितले. त्याच बरोबर पुढच्या गाईडला मागे आणि मागच्या गाईडला पुढे चालायला सांगितले.
पाऊले चालती बर्फातली वाट
त्याने घेतलेला हा निर्णय अत्यंत सुयोग्य ठरला. आपोआपच सगळ्यांचे चालणे सावकाश पण न थांबता एका लयीत होवू लागले. चालताना सगळे जवळपास राहू लागले त्यामुळे एकमेकांना म्हणजे आपापल्या मागच्यांना रस्त्याबद्दल सावध करणे जमू लागले. वाटेत काही ठिकाणी घोट्याएवढे तर काही ठिकाणी त्याहून थोडे जास्त पाणी होते खरेतर पाणी असे नाही पण चुरलेला बर्फ ज्यातून चालताना पाय रुतत होते आणि ते ही घोट्यापर्यंत. पण त्यातूनही आम्ही सगळ्यांनीच व्यवस्थित मार्ग काढला. अशा ठिकाणे पडलं तर लागले नाही तरी ओले होण्याची भीती जास्त. त्या हवेत ओले होणे हे जास्त खतरनाक. अशा वेळी ओले कपडे बदलून लवकरात लवकर सुके कपडे अंगावर चढवले नाहीत तर हायपोथर्मिया होण्याची भीती असते. त्यामुळे पुढचे मागचे गाईड आमच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून होते. मात्र आजही पडण्याची परंपरा सर्वानीच चालू ठेवली होती. काही काही वेळा घसरण्याची नुसती हूल मिळायची म्हणजे पाय थोडासा सरकायचा पण त्यावेळेही हृदयाची धडधड आपली आपल्याला ऐकू येईल इतकी वाढत असे. नंतर नंतर तर मला वाटायला लागले होते की ह्या पेक्षा पडलेले बरे पण असं झालं की मोठा श्वास घ्यायचा आणि पुढे चालत राहायचे. अर्थात असे प्रसंग वारंवार निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाटेत दिसणारी अप्रतिम दृष्ये. काही ठिकाणी छोट्या गुहा कपारी दिसत होत्या त्याशिवाय अनेक छोटे छोटे गोठलेले धबधबे पाहून मन हरखून जात होते आणि नेरकचा, शेवटच्या ठिकाणचा धबधबा कसा असेल ह्याचे उत्कंठा वाढली जाई.
गोठलेले छोटे धबधबे १
गोठलेले छोटे धबधबे २
गोठलेले छोटे धबधबे ३
गोठलेले छोटे धबधबे ४
अखेरीस सुरु केल्यानंतर पाचेक तासांनी आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचलो अर्थात हा लागलेला वेळ, वाटेत ठिकठिकाणी थांबत दुपारचे जेवणखाण करून मजल दरमजल प्रकारे वाटचाल केल्यामुळे लागला होता. पोचल्यावर कुठे आहेत तिब्ब च्या गुहा म्हणून विचारणा केली असता आपण त्या ओलांडून साधारण अर्धा किमी पुढे आलो आहोत असे कळले. आज आम्ही पोचलो तर सगळे तंबू ठोकून झाले नव्हते मग परत जाताना तिब्ब च्या गुहा नक्की दाखवा असे बजावून आम्ही आमचा निळा तंबू ठोकायला आणि सामानातून स्लीपिंग बॅग्स आणायला जरा मदत केली. सामान आत लावले. आपापल्या तंबूत शिरलो. अंघोळ केली. घाबरू नका पाण्याने नव्हे अँटीफंगल पावडरीने अंग माखून घेणे हीच अंघोळ. कपडे बदलले. जरा वेळाने एकत्र जमून गुळपोळी खायचा कार्यक्रम आजही पार पाडला. त्या हवेत गुळपोळी इतकी हिट्ट ठरली की एरवी फार गोड न खाणाऱ्या अरण्याने देखील आपल्या वाटची गुळपोळी इतर कोणाला द्यायला नकार देण्यास सुरुवात केली. माझ्याकरता ही फारच आश्चर्यजनक बाब होती. परत थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर बाहेर पडून जेवायच्या तंबूत एकत्र जमलो. गप्पा टप्पा वाढीव ओळखी करून घेणे असं सगळं चालू होते. गारठ्यामुळे बाहेरून कोणी आले की लगेच तंबुची झडप बंद करायला सांगितले जाई. काही ना करता एका जागी थांबल्यावर थंडी जास्तच वाजते. मग त्यावर उतारा म्हणून माशा किचन टेंट मध्ये पोळ्या शेकायला गेली. किचन टेंट कायमच उबदार असे. इतक्या सगळ्यांचा नाश्ता, स्वयंपाक, गरम पाणी ह्यामुळे एक स्टोव्ह सतत चालू असेच.
जेवायला बसायच्या आधीच परत एकदा हिमवर्षाव चालू झाला. वातावरण नाही म्हटले तरी एकदम गंभीर. कोण काय म्हणे तर कोण काय. ह्या हिमवर्षावाचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता, अजून दोन दिवस बर्फ पडणार आहे. असाच बर्फ पडत राहिला तर काही खरं नाही. हिमस्खलन होऊ शकते जास्त बर्फ पडल्यामुळे चादरीवरचे वजन वाढून ती तुटण्याची शक्यता असते. कुठे तुटल्ये हे ही ताज्या बर्फामुळे नीट दिसत नाही अशा काय काय संभाव्य गोष्टी लक्षात घेता उद्या परतही फिरावे लागेल ह्याची मानसिक तयारी करून ठेवा म्हणून सांगितले गेले. अर्थात ईश्वरने होता होईल तो नेरक पर्यंत जाण्याचे संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील आणि आमच्या स्थानिक वाटाड्यापाशी सल्ला मसलत करून काय ते ठरवण्यात येईल हे ही सांगितले. इतक्या दूरवर आल्यावर हातातोंडाशी आलेला घास न खाताच परत फिरावे लागते की काय ह्या शंकेने मन पोखरू लागले. लेहमध्ये भेटलेले मुंबईचे जोडपे ज्यांनाही शेवट पर्यंत जाता आले नव्हते ते आठवले. असं सगळं वातावरण उदास झालं असताना झोपायकरता तंबूत शिरलो आणि म्हटले जे होईल ते सकाळी पाहू.
भाग ५ चालू.....
दिवस सहावा
सध्या दररोज सकाळी म्हणजे पहाटे चार वाजताच जाग येते आहे. त्यावेळी इतर कोणीही उठलेले नसते त्यामुळे आपल्याला आपला कार्यभाग नीटपणे पार पाडता येतो; उरकायला लागत नाही हा एक मोठाच फायदा. कार्यभाग उरकल्यावर, बाकीच्या कोणाचाही वावर नसलेल्या मोकळ्या वावरात हिमवर्षाव चालू असताना किमान पाच मिनिटे घालवणे हा माझा आवडता कार्यक्रम बनला आहे. त्या गूढरम्य वातावरणाची आपल्यावर पडणारी हिमभूल एखाद्या नशेपेक्षा कमी नाही. मला थंडी सोसवत नाही त्यामुळे वारं सुटलं की हुडहुडी भरून तंबूत परतायला लागायचं पण तरीही हट्टाने बाहेर राहावे असे वाटायला लावणारे अद्भुत वातावरण प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवे. आजही हिमवर्षाव चालू होता. पण ढगांचा थर जरा पातळ असावा. सुंदर असा प्रकाशही पसरला होता म्हणजे प्रकाश नाही तर दीप्ती किंवा ज्याला बहुतेक आभा म्हणतात तसा प्रकाश. निसर्गाचे इनडायरेक्ट लायटिंग. हिमभूल इतकी परिणामकारक होती की तंबूत परत जाईपर्यंत; हिमवर्षाव त्रासदायक ठरेल का, आज पुढे जायला मिळणार का नाही असे कुठलेही प्रश्न त्यावेळी डोकयात आलेच नाहीत.
आत गेल्यावर मात्र; आमच्यापैकी कोणालातरी भेटलेल्या कोण्या फिरंग्याने त्याला कमरेभर पाण्यातून जावे लागले असे सांगितल्याचे आठवले आणि मग एकीकडे पुढे जाऊन काय पहायचे गोठलेला धबधबाच ना, वाटेत पाहिलेच की, सुखरूप परत जावे हे चांगले असे वाटत होते तर दुसरीकडे इथवर आलोय तर ट्रेक अपूर्ण करून का परत जायचे फाईट तर मारून बघायला हवी, प्रयत्न न करताच मागे फिरवले नाही तर चांगले. शेवटी ईश्वराला काळजी असे म्हणून परत थोडी विश्रांती घेतोय तोवर ईश्वराने सहा वाजताच आम्हाला उठवले, सगळी मंडळी उठून आटपून नाश्ता करायला डायनिंग टेंट मधे एकत्र जमा झालो तरीही बर्फ पडणे चालूच होते तोवर ईश्वर देखील पुढे जायचे ना ह्या प्रश्नावर हो नाही काहीच बोलत नव्हता. शेवटी आमची अस्वस्थता आणि काळजी बघून स्थानिक वाटाड्यांसोबत गुप्त खलबतं मसलती करून जाहीर केले की आपण पुढे जातोय.... आम्ही सर्वांनी एकाच जल्लोष केला पण तितक्यात अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तो म्हणे एक अट आहे. आम्ही सगळे शांत. काय, कसली? विचारून झाले असता त्याने सांगितले की त्यालाही आम्हाला नेरक पर्यंत घेऊन जाण्यात इंटरेस्ट आहे पण सध्याचे वातावरण पाहता त्यात संभाव्य धोके आहेत बर्फ असाच पडत राहिला तर सगळीकडे पडलेल्या ताज्या बर्फ़ामुळे योग्य वाट काढणे अधिक आव्हानात्मक होणार; बर्फ़ाची चादर वीक होण्याचे चान्सेस वाढतात; जास्तीचा बर्फ डोंगर उतारावरून आपण चालत असलेल्या नदीपात्रात घसरून येऊ शकतो; ह्या सगळ्याची तयारी ठेवावी लागेल. मग काय परत एकदा वातावरण टाइट. पण आमचे गंभीर चेहरे पाहून की काय त्याने अजून एक गोष्ट सुचवली की दोन दिवसातले आमचे चालणे पाहून त्याच्या डोक्यात एक कल्पना येत्ये ती म्हणजे पुढचा मुक्काम 'नेरक'ला करण्याऐवजी थोडा उशीर झाला तरी आज राहात आहोत तिथेच परत यायचे म्हणजेच दुप्पट चालायचे. एकाच दिवसात जवळपास ३० किमी. बोला आहात तयार? आमचा बर्फावर चालण्याचा सराव छान झाला होता आणि ताज्या बर्फामुळे चालणे थोडे सुकर ठरत आहे हे ताजे प्राप्त झालेले ज्ञानही होते त्यामुळे आम्ही सर्वानीच एकमताने होकार भरला. मग त्याने पुढे सांगितले की एकाच दिवसात जाऊन परत यायचे याचाच अर्थ आपल्याला आपले सर्व सामान बरोबर वागवायची गरज नाही. याचाच अर्थ आपले वजन रिमार्केबली कमी होणार. याचाच अर्थ आपण कालच्या पेक्षा जास्त भरभर चालू शकतो. त्यामुळे आपण सर्व जण मिळून नक्कीच हे करू शकतो. झाले आमच्यात उत्साहाची जोरदार लहर पसरली. मग त्याने सर्वसाधारणपणे बरोबर काय घ्यायला हवे हे सांगितले आणि काही झाले तरी परतायला रात्र झालीच तर म्हणून टॉर्च नक्की बाळगा असे सांगून आमची हवा परत जरा टाईट केली च वर परत लवकरात लवकर तयार होऊन या लगेच निघायचंय म्हणूनही सांगितले. झाले तंबूत आल्यापावली बरोबर काय न्यायलाच हवे ह्यावर मिनी चर्वितचर्वण झाले आणि मग मी आणि अरुण दोघात मिळून एकच सॅक घायची असे ठरले. दोघांचे काढून ठेवलेले जास्तीचे सामान एकाच्या सॅक मध्ये घालून तिकडेच ठेवले. नंतर पूर्ण रस्ताभर अरण्याने मला ती सॅक घेऊन दिली नाही त्यामुळे माझे त्या दिवसाचे चालणे अजूनच सुखद आणि सुकर झाले. मात्र पाठीवर सॅक नसल्याने थोडी वाढीव थंडी तेवढी वाजली. पण चालतंय की.
आजही चालायला सुरुवात केल्यावर जरा हळू चालणाऱ्या माशाला सगळ्यात पूढे ठेवण्यात आले. खरेतर तीही फार काही हळू चालत नव्हती पण मागे पडल्यावर तिचा उत्साह कमी होवून ती अधिकच मागे पडत जात असे ते टाळले गेले त्यामुळे आजही सगळ्यांनी एकत्र आणि एका लयीत चालायला खूपच मदत झाली. आजही तासाभरानंतर बर्फ पडायचे थांबले. आज जास्त अंतर कापायचे असल्याने नेहेमी वाटेत ह्याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ करणारे देखील आज कमी फोटो काढत होते तरी मधल्या एका भागात चक्क नदीपात्रात ऊन पडल्यामुळे काही फोटो काढले गेलेच. नंतर मात्र जास्त वेळ न घालवता खाली मान घालून मार्गक्रमणा चालू असतानाच अचानक एका वळणानंतर आम्हाला ताज्या बर्फावर एका प्राण्याचे ताजे पायाचे ठसे बघायला मिळाले. ते ठसे बराच वेळ दिसत राहिल्याने शेवटी मी एका स्पष्ट ठसे दिसणाऱ्या ठिकाणी थांबून, मनाचा हिया करून, हातमोजे काढून त्यांचे फोटो काढलेच.
थोडे पुढे गेल्यावर आकाशात एकाच जागी अनेक म्हणजे शंभरएक पक्षी घिरट्या घालताना दिसत होते.
हिम-बिबट्याचा. याचे दर्शन तसे दुर्मीळच. याला माऊंटन घोस्ट या नावानेही काही जण ओळखतात.
(फोटो अर्थात आंतरजालावरुन)
ईश्वराच्या सांगण्यानुसार हिम-बिबट्याने केलेल्या शिकारीत भागीदारी करायला ते सर्व पक्षीगण असे तत्परतेने जमा होतात.
ह्या अतिरेकी थंडीत एरवी ते काय खात असतील त्यांचा कसा निभाव लागत असेल असे विचार मनात आलेच. जिथे वरती पक्षी घिरट्या घालताना दिसत होते तिथेच खाली आम्ही पाणी प्यायला वगैरे थोडे थांबलो होतो तोवर ईश्वर, अक्षय आणि सागर त्या टेकाडावर चढून काही दिसतंय का ते पाहून आले. अर्थात वाटले होते त्यापेक्षा ती जागा अजूनच उंचावर असल्याने आणि वेळ कमी असल्याने ते वर पर्यंत गेले नाहीत. पण ईश्वरने हे ठसे, घिरट्या घालणारे पक्षी ई. दिसणे हे देखील मोठ्या नशिबानेच पाहायला मिळते असे सांगितले. आजवर त्याने केलेल्या इतक्या खेपांमध्ये त्यालाही पहिल्यांदाच असे दृष्य पहावयास मिळाले होते. तिथला ब्रेक जरा अंमळ मोठाच झाल्याने परत एकदा स्वतःला आवरून पुढे चालू पडलो.
वाटेत एक ठिकाणी त्या फिरंग्याने सांगितलेले कमरेएव्हढे पाणी लागले. त्याठिकाणी नदीपात्राच्या कडेला पकडायकरता दोरखंडही बांधलेले होते. पण सुदैवाने तिथेच डोंगरावर चढून पुढे परत नदीपात्रात उतरायला रस्ता होता. त्यामुळे कमरेभर पाण्यातून चालण्याचा अनुभव हुकला.
आता अजून किती दूर जायचंय असं वाटत असतानाच एका वळणानंतर दूरवर गोठलेला धबधबा दिसला, त्या प्रथम दर्शनाचे फोटो काही जणांनी काढले आणि उत्साहात पुढे सरसावलो अर्थात तरीही तिथे पोचायला दहा पंधरा मिनिटे लागलीच.
जवळ पोहोचल्यावर जे समोर होते ते एकीकडे अत्यंत अविश्वसनीय तर दुसरीकडे अत्यंत विलोभनीय दृष्य होतं. किमान पाच सहा मजली इमारतीइतक्या उंचीचा आणि चांगला रुंद असा पाण्याचा प्रपात कोसळत असतानाच जागी थिजलेला आमच्या समोर होता. कित्येकदा असे होते की आपण एखाद्या स्थळाचे तिथे जायच्या आधी पाहिलेले उत्तमोत्तम कलाकारांनी काढलेले निवडक फोटो पाहून आपल्या मनात जी प्रतिमा निर्माण झालेली असते त्याच्या पुढे प्रत्यक्षात जे समोर येतं ते फिके वाटण्याची शक्यता असते. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणतो तसे पण सांगायला अत्यंत छान वाटते आहे की इथे तसे अजिबात झाले नाही. त्याच्या भव्यते मुळे असेल की काय पण प्रतिमेपेक्षाही प्रत्यक्ष जास्त उत्कट होतं.
.
.
जेवण तिथेच करायचे असल्याने हाताशी वेळही होताच त्याचा फायदा उठवून आम्ही सगळ्यांनीच तिथे भरपूर वेळ घेऊन वेगवेगळ्या हरकती करत फोटो काढले. बहुतेक सर्वानी एकेकट्याचा, आपापल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत आणि सर्वात शेवटी आमच्या समुच्च गटाचा असे फोटो काढले. काही जण तिथेच असलेल्या पुलावर जाऊन धबधब्याचा वरतून फोटो काढून आले. आश्चर्यकारक रित्या आम्ही तिथे हे सर्व करेपर्यंत दुसरा कुठलाच ग्रुप तिथे आला नाही शिवाय भरपूर सूर्यप्रकाशही होता त्यामुळे ती जागा आमच्या फोटोसेशन करता राखीव आणि जणू मुद्दाम विशेष प्रकाशयोजना केली असल्याप्रमाणे मिळाली आणि निवांत आणि सुंदर फोटो काढता आले.
फोटो सेशन १
फोटो सेशन २
फोटो सेशन ३
फोटो सेशन ४
फोटो सेशन ५
असा बराच वेळ इकडे तिकडे करण्यात घालवल्यानंतर जेवायला एकत्र जमलो दबादबाके खाल्लं आणि थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर मनात अजिबात इच्छा नसताना तिकडून परत प्रवासाला निघालो.
आता जितके अंतर चालून आलो तितकेच परत चालायचे होते पण त्याच दिवशी आलो होतो त्यामुळे आत्मविश्वास होता की रस्ता पायाखालचा आहे. पण असं समजणे ही मोठीच चूक होती. सकाळच्या तासाभरानंतर पडायचा थांबलेला बर्फ नंतरच्या उन्हामुळे वितळायला लागला होता. डोंगरावरून वितळलेल्या पाण्याचे थेंबाथेंबाने पडणे जसजसे पुढे जाऊ तसतसे काही ठिकाणी ओघळामधे आणि ओहोळामधे रूपांतरित होताना दिसले. मधेच त्यापाण्यासोबत न वितळलेले बर्फ आणि दगड सोबत घेऊन येतानाही आढळले. एक दगड का बर्फाचा गोळा अगदी आमच्या समोरच येऊन पडला आकाराने क्रिकेट च्या चेंडूइतकाच असेल पण जरा का हा डोक्यात पडला किंवा चालताना हिमदरड कोसळली तर काय होऊ शकते ह्याचे जाणीव अंगावर शहारा आणणारी होती आणि हा शहारा थंडीचा नसून भीतीचा होता. त्यावेळी पहिल्यांदाच थंडीचं बरी ऊन नको असे वाटून गेले. पण आता जे ऊन पडलेले होते त्याला काही अनडू करता येणार नव्हते. आमचा संपूर्ण रस्ता डोंगरातल्या नदीपात्रातून असल्यामुळे सिच्युएशन अशी होती की इंग्रजी व्ही आकाराच्या खालच्या मध्यातून आम्ही चालत जात असू. एका बाजूला वाहणारे पाणी दुसऱ्या बाजूला डोंगर. अशावेळी हिमस्खलन झाले तर संपलेच सगळे. अजून पुढे गेलो असता सकाळी जिथून आलो तिथूनच परत जाताना पायाखालच्या वाटेवरच्या पाण्याची पातळी वाढलेली जाणवत होती. नंतर तर एका ठिकाणी आम्हाला चक्क एका जागी थांबायला सांगितले गेले आणि आमचा गाईड थोडं पुढे जाऊन पुढचा रस्ता चालत जाण्याजोगा आहे की नाही ते पाहून आला. त्या पाच दहा मिनिटाच्या अवधीतही पायाखालच्या पाण्याला अधिक वेग आणि खोली प्राप्त होते आहे असे भासले. बरेचदा अशा प्रसंगी बाजूच्या डोंगरावर चढून काही मार्ग वरतून कापायचा असतो आम्हे ज्या ठिकाणी होतो तिथे अशी जागाही दिसेना. आमचा स्थानिक गाईडही लवकर येईना. (म्हणजे असे त्यावेळी तरी वाटले) हीच ती वेळ आपापल्या देवाचा धावा सुरु करायची अशी परिस्थिती निर्माण झाली.
पण आमचा वाटाड्या आला तोच ऑल वेल ची खूण करत पण अर्थातच पाणी खूप खोल नसले तरी गमबुटाच्या पाऊण इतके म्हणजे पोटऱ्यांपर्यंत पोचत होते त्यामधून जाताना पाय फार न उचलता, पाण्यात तरंग न उठतील जेणेकरून पाने बुटात शिरणार नाही याची काळजी घेत घेत आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला घसरू न देता चालायचे म्हणजे जरा ताणदायकच. जवळजवळ अर्धा तास भर अशा रीतीने पाण्यातून चालत जायला लागल्यावर अखेरीस जरा बर्फ़ाळ जागा मिळाली आणि आम्ही सगळ्यांनीच हुश्श केलं. त्यावेळी जरी कोणी काही बोलले नाही तरी नंतर कबूल केल्याप्रमाणे सगळ्यांनी मनातल्या मनात देवाचा धावा केला होता. सगळ्यात जास्त फेमस महामृत्युंजय मंत्र होता. मी आपला बनली तितकी हॅप्पनिंग लाईफ पुरे आता पुढची वाटचाल नीटपणे पार पडू दे रे देवा महाराजा असे म्हटलं. मग देवानेही माझे ऐकलं. आणि मग पुढे फार काही घडामोडी ना होता आम्ही परत तिब्बच्या गुहांजवळच्या आमच्या मुक्कामाच्या जागी पोचलो. इतके अंतर एकाच दिवसात पार पाडल्यामुळे आलेल्या थकव्यापेक्षा नेरक येथील गोठलेला धबधबा बघायला मिळाल्याचे समाधान कित्येक पटीने जास्त होते. आमच्यातले माशा आणि हिमांशू यांना मध्ये थोडा दम लागल्यासारखे झाले होते पण एकंदरीत फार जास्त त्रास न होता आम्ही सगळेच्या सगळे ईश्वराने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरलो होतो. तो ही खूष होता आम्हीही खूष होतो. खुशीत दबादबाके जेवून खुशीतच झोपलो. झोपताना देखील हा इतका मोठा जलप्रपात कसा गोठला असेल हाच विचार सृष्टीचे कौतुक माझ्या मनी होता.
दिवस सातवा
आजचा दिवस कालच्या मानाने फार कमी अंतर चालायचे असल्याने अंमळ उशिराच उजाडला. आज जाताना आम्ही पाठीवर सामान असतानाही अधिकच हलके फुलके बनलो होतो. वाटेत येताना बघायच्या राहिलेल्या तिब्ब च्या गुहा बघून पुढे निघालो. कालपासून चालू झालेला हिंदी गाणी गातागात मार्गक्रमणा करण्याचा मोनीशनी चालू केलेला प्रकार आजही सुरु ठेवला. नव्हे त्यात भर घालून वाटेत आम्ही काही जणांनी भर बर्फात चक्क गरबा खेळला. फेर धरून गोलातल्या हालचाली असलेला स्थानिक लडाखी नृत्य प्रकारही स्थानिक वाटाडयांना आमच्या बरोबर सामील करून घेत आत्मसात करायचा प्रयत्न केला. एकंदरीत धमाल केली.
शिगारा कोमा येथे दुपारीच पोचलो तेव्हा भरपूर ऊन होते त्याचा पुरेपूर आनंद घेतला. सगळेच्या सगळे उन्हे खात बसलो. उन्हामुळे वारा सुसह्य भासत होता. समोर खूप सुंदर डोंगर होता अगदी नयनरम्य दृश्य. पण लवकरच सूर्य अगदी चित्रातल्या सारखा डोंगराआड मावळला.
चिंतामणीने काढलेले छायाचित्र
त्यानंतर लगेचच हवेतला गारवा जाणवेल इतका वाढला. मग डायनिंग टेंट मध्ये जमून गप्पा मारल्या, अंताक्षरी खेळलो. काही जणांना वाटत होतं आजच पुढच्या मुक्कामावर पोचू शकलो असतो आणि लवकर लेह ला पोचून अंघोळ केली असती. पण लेह ला नेणारी बस आज येऊ शकणार नव्हती. चिंतामणीने रात्री अंधार पडल्यावर सगळ्या तंबूतले दिवे लावून एक वाईड अँगल फोटो काढला. त्या करता त्याला बराच खटाटोप करायला लागला पण फोटो मस्त आला. झोपी जाताना मात्र चरचरून जाणीव झाली की हिमालयातल्या मुक्कामाचे हे दिवस आता संपत आले. पुरवून पुरवून वापरण्याकरता हिमालयाला स्वतःमधे मुरवून घ्यायला हवं.
दिवस आठवा -
आज शिंगरा कोमा ते तिलाड डो जिथे आम्हाला न्यायला बस येणार होती तिथवर जायचे अंतर केवळ पाचेक किमी असेल त्यामुळे खूपच आरामात निघालो आरामात चाललो. खूप आरामात चालूनही साडेअकरा वाजताच पोचलो. जरा वेळाने आम्हाला प्रेमाने खाऊपिऊ घालणाऱ्या, सुखरूपपणे परत आणून सोडणाऱ्या समस्त स्थानिक पोर्टर्स आणि वाटाड्यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम पार पाडला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्याकरता काही रक्कम जमा केली होती ती त्यांना दिली. ग्रुप मधला सर्वात लहान राजा म्हणून त्याच्या हस्ते ती रक्कम दिली गेली. सर्वांच्या वतीने मी एक मनोगत व्यक्त करावे असेही ठरले तर मी एक छोटेखानी भाषणच ठोकले. आमचे चादरीवरचे आई बाप भाऊ मित्र असे सगळे असलेल्या आमच्या पोर्टर मंडळींमध्ये काही विद्यार्थी ही होते त्यांना शुभेच्छा दिल्या गृहस्थांना मुला-बाळांकरता घराकरता काही वस्तू खाण्याच्या गोष्टी घ्या म्हणून सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वस्तू घ्या म्हणून सांगितले. अजुनही काही जणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पोर्टर वाटाड्यांपैकी काही जण आमच्या सोबत लेह ला येणार होते तर काही जणांचा सहवास तिथेच संपणार होता. मग गळाभेटी झाल्या नीट रहा असं एकमेकांना सांगण्यात आलं. नाही म्हणता म्हणता डोळ्यात पाणी तरळलेच.
आमचे पोर्टर्स आणि गाईड
त्यांच्या सोबत आम्ही सगळे
मग तिकडे बराच वेळ टाईमपास केला. बर्फावर आडवे पडून वाहत्या नदीचे पाणी तोंडाने प्यायचा प्रकार काही जणांनी केला होता जो मी नको उगाच म्हणून टाळलेला होता पण आता शेवटच्या दिवशी तसे करायला काहीच हरकत नव्हती त्यामुळे अरण्या , संदीप, राजा आणि मी अशा आम्ही चौघांनीही तो प्रकार केला.
त्यावेळी एक गंमत झाली. असे आडवे पडून पाणी पिताना अरुण ची ओली झालेली दाढी जरा वेळाने त्या पाण्याचा बर्फ झाला. आता त्या उणे तपमानाची सवय झाली असली तरी पाहता पाहता असं ओल्यादाढीचे बर्फाळ दाढी होणे विस्मयकारकच होते . त्याशिवाय अरुण आणि राजा यांनी सामान वाहून नेण्याच्या घसरगाडीवर एकाने बसायचे आणि दुसऱ्याने ओढायचे हा ही प्रकार केला.
खूप काय काय केलं तरी बस येईना मग आम्ही चक्क रस्त्यावरून चालायला सुरुवात केली आणि बसला वाटेत गाठलं.
संध्याकाळी सहाच्या सुमारास लेह गाठलं. आम्ही जायच्या आधी राहात होतो तीच खोली आम्हाला मिळाली. आम्हाला ते हॉटेल, आमची खोली एकदम पंचतारांकित वाटली त्या दिवशी. तरीही काही मंडळी दुसऱ्या हिटर असलेल्या, गरम वाहत्या पाण्याची सोय असलेल्या हॉटेलात जाती झाली. मग बाजारात जायचे शॉपिंग करायचे रात्रीचे जेवण बाहेरच घेऊन परत यायचे असे ठरले. ईश्वरने आपण सगळे पार्टी करायला भेटू म्हणून सांगितले होते, ठिकाण कुठले हे तो नंतर सांगणार होता पण माझ्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे आमच्यापर्यंत तो निरोप पोचलाच नाही आणि आमच्या चौघांची ती पार्टी हुकली. बरेच फिरूनही आम्हाला ते तिबेटी पताका / झेंडे मिळत नव्हत्या जाऊ दे आता नाही मिळत तर असे म्हणून निराश झालो असतानाच एका दुकानात आम्हा सगळ्यांना न्यायला लागतील तितक्या झेंडा पताका मिळाल्या. घरी आलो. उद्या सकाळी लवकर निघणाऱ्या लोकांच्या बरोबर गप्पा टप्पा आमंत्रणं आश्वासने ह्यात बराच वेळ गेला. त्यानंतर आणलेले आणि घेतलेले असे सर्व सामान पॅक करणे हा एक मोठाच कार्यक्रम पार पाडला आणि झोपलो.
दिवस नववा -
आज सकाळी उठून पहातो तर लेह मधेही हिमवर्षाव होत होता. काही त्यांच्या विमानाच्या वेळेनुसार लवकर निघून गेले होते तर काही तयारीत होते. ईश्वर आणि इतरही काही जणांकडून काल रात्रीची पार्टी हुकवल्याबद्दल ऐकून घ्यावे लागले. ईश्वर आम्हाला एअरपोर्टवर सोडायला येणार होता. एकीकडे हिमालयापासून आणि एकमेकांपासून दूर जाऊच नये असा वाटवणारा माहौल. तर दुसरीकडे हिमवर्षावामुळे खरंच राहायला लागतंय की काय असं वाटवणारा हिमवर्षाव. सुदैवाने सकाळी नऊच्या सुमारास बर्फ पडायचा थांबला. आमचे विमान अकरा वाजताच होते त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास नाही झाला पण सकाळपासून एकही विमान उतरू न शकल्याने, त्या दिवशी परत न जाणारे एक दोन सोडले तर बाकी सगळे जण एअरपोर्ट वर परत भेटले. लडाखमधल्या लहरी हवामानाचा फटका बसल्याने त्यांना अडकून पडायला झाले होते. अपराजिता आणि अक्षय ह्या द्वयीला जम्मू ला जायचे होते. ते आमच्या पैकी सर्वात लवकर पोहोचणारे ठरणार होते त्यामुळे ट्रेकच्या शेवटी अपराजिताने आम्हाला आम्ही आपापल्या घरी पोचायच्या आत त्यांना सगळ्यात पहिल्यांदा गरम पाण्याने अंघोळ करायला मिळणार म्हणून खूप चिडवून झाले होते. तिला तिथे भेटून बऱ्याच जणांना आनंद झाला. त्यात उशीरा आलेल्या विमानांना उशीरा पाठवत होते त्यामुळे आमच्यातले काही जण तिच्या आधी निघाले. आमचे साडे अकरा वाजताचे विमान वेळेवर आले आणि वेळेवर सुटले. दिल्लीत एक मोठा थांबा घेऊन पुण्याला पोचलो तोवर रात्र झाली होती राम आणि राजश्री दोघेही आम्हाला घ्यायला आले होते रूढी परंपरेनुसार केकही होताच.
अशा रीतीने एक रौद्र सुंदर स्वप्न साकार करून आम्ही परतलो. अजूनही डोळे मिटले असता शुभ्र काही जीवघेणे समोर दिसतेच.
समाप्त
No comments:
Post a Comment