Thursday, May 12, 2022

ये कश्मीर है

दिवस पहिला - ९ मे

काश्मीर हे भारतातले सगळ्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे यात काही वाद नाही. फिरायला जायच्या ठिकाणांची भारतात कमतरता नाही, पण काश्मीर या नावाभोवती जे कोंदण आहे ते इतर कुठल्याच पर्यटनस्थळाला नाही. निसर्गसौंदर्य पहायला आवडणा-या प्रत्येक भटक्यासाठी भारतात काश्मीर आणि परदेशात स्वित्झर्लंड ही दोन्ही स्वप्न-गंतव्ये असतात हे नक्की. २०१५ वर्षीच्या मे महिन्यात आम्ही काश्मीरचा प्रवास केला. हे प्रवासवर्णन हे म्हणजे त्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. (तो गोड मानून घ्यावा असे लिहिणार होतो, पण वाटले 'छोटासा प्रयत्न' लिहिले की 'गोड मानून घ्यावा' हे त्याला जोडून नेहेमीच का यायला हवे? त्यांना आज वेगळे करुयातच.)

पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते चंदीगडमार्गे श्रीनगर असा आमचा आजचा विमान प्रवास होता. विमानप्रवासाची तिकिटे 'स्पाईसजेट' या कंपनीची असल्याने आणि गेले काही दिवस ही कंपनी आर्थिक स्थिती ढासळणे, विमाने रद्द होणे अशा नको त्या कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात असल्याने आमचा विमानप्रवास नि पर्यायाने आमची सहलच रद्द होते की काय अशी भीती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला वाटत होती, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. थोडे उशिरा का होईना आमचे विमान उडाले नि दिल्लीला पोचले. दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर वातावरणात जाणवणारा फरक लक्षणीय होता. पुण्यात उन्हाळा चालू असला तरी हवा तशी थंडच होती, मात्र घड्याळ्यात फक्त साडेनऊ झाले असतानाही दिल्लीची हवा एखाद्या भट्टीतून येणा-या हवेसारखी उष्ण आणि कोरडी होती. दिल्लीला सकाळी ९:२५ ला पोचल्यावर पुढचे विमान २:१५ ला होते, त्यामुळे विमानतळावर अळंटळं करणे नि इकडेतिकडे फिरणे एवढेच काम आमच्याजवळ होते. दिल्लीच्या टी ३ या टर्मिनल विषयी मी बरेच काही वाचले होते, पण दिल्लीचा देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ मात्र मला पुण्याच्या विमानतळाइतकाच रुक्ष नि रखरखीत वाटला. (विमानतळाच्या आत किंचीत 'हिरवळ' होती हा त्यातल्या त्यात दिलासा!)

असो, एकदाचे आमचे विमान उडाले आणि चंदीगडमधे प्यासिंजरांची अदलाबदल करून आम्ही शेवटी श्रीनगरला पोचलो. मधे अचानक पिंजून काढल्यासारखे दिसणारे ढग दिसल्यावर त्यांचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.

आम्हाला फिरण्यासाठीच्या गाडीची व्यवस्था पुण्यातून आधीच केली असल्याने ती आम्हाला न्यायला विमानतळावर आलेली होती. [ही गाडी आम्हाला कशी मिळाली याचीही एक कथा आहे. GoIbibo या नविन सुरु झालेल्या संकेतस्थळावरून मी विमानाची तिकीटे नि तिथल्या सगळ्या हॉटेलांची आरक्षणे केली होती. या बक-याकडून आपला आणखी फायदा कसा होऊ शकतो याविषयी बरेच डोके खाजवल्यावर GoIbibo च्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी अमुकअमुक तारखेला काश्मीरला येत आहे नि इतकेइतके दिवस तिथे आहे ही माहिती त्यांनी एका ट्रॅव्हल एजंटला विकली. सहलीला काही दिवस राहिलेले असताना त्या माणसाचे मला फोन येऊ लागले. अर्थात तो देत असलेली इनोव्हा गाडी मला इतकी स्वस्त मिळत होती की त्याला नाही म्हणणे मला अगदी अशक्य होते. तेव्हा मी तीच गाडी ठरवून टाकली.]

विमानातळाबाहेर माझ्या नावाची पाटी घेऊन आमचा सारथी उभा होता. चित्रपटात दाखवतात तसे एकदम झोकात आपण विमानतळामधून बाहेर यावे, कुणीतरी आपल्या नावाची पाटी घेऊन तिथे उभे असावे आणि मग त्या माणसाला पाहताच विमानतळाबाहेर पडणा-या इतर लोकांकडे आपण हुडूत नजरेने पहावे असे माझे लहानपणीचे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले.

बाहेर आल्यावर पहिले काही जाणवले असेल तर ते म्हणजे हवेतला बदल. श्रीनगर मधली हवा भलतीच आल्हाददायक आणि थंड होती. आणि थंड म्हणजे बोचेल इतकी नव्हे, तर हवीहवीशी वाटेल अशी थंड. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन बंद पडलेले – त्यांना नेटवर्कच नव्हते. हा काय प्रकार होता?

आमचे ड्रायव्हरसाहेब एक पस्तिशीचे पोक्त गृहस्थ होते. त्यांनी त्यांचे नाव सांगितले (जे मी विसरलो), आमचे सामान गाडीत टाकले आणि आम्ही नगीन सरोवराकडे कूच केले. त्यांना मोबाईल फोन्सविषयी विचारल्यावर कळले की काश्मीरमधे बीएसएनएल वगळता कुठलीही प्रिपेड कनेक्शन्स चालत नाहीत. अर्थात पुढचे 8 दिवस आमच्या सगळ्यांचे मोबाईल फोन्स बंद राहणार होते!

पहिल्या दर्शनात तर श्रीनगर शहर अगदीच ठीकठाक वाटले. म्हणजे आपल्या इकडचे एखादे गाव आणि शहर यात अडकलेले नगर दिसते तसे. (उदाहरणच द्यायचे झाले तर राजगुरुनगर सारखे.)सहा वाजत होते, आमची चहाची वेळ झाली होती (चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहाच पाहिजे!) एका छोट्याश्या हॉटेलात चहा मारून आम्ही पुढे निघालो. काही किलोमीटर पार केले आणि दल सरोवर पार करून नगीन सरोवराजवळ पोचलो. [श्रीनगरमधे दल नि नगिन अशी दोन सरोवरे आहेत. यापैकी दल अधिक प्रसिद्ध, प्रर्यटकांमधे अधिक लोकप्रिय, अनेक हाऊसबोटी असलेले, पर्यटक नि शिकारे यांचा सतत राबता असलेले असे आहे, तर नगिन (की निगीन?) थोडे दूर, पण शांत, फारशी गजबज नसलेले असे आहे. काश्मीरी लोकांचं तरंगतं जगणं आपल्याला जवळून अनुभवायचे आहे की थोडी शांतता, एकांत हवा आहे यानुसार आपण यापैकी एका सरोवराची राहण्यासाठी निवड करू शकतो.]काश्मीर सहलीतले आमचे पहिले दोन दिवस आम्ही काश्मीर ज्यांसाठी प्रसिद्ध आहे अशा एका हाऊसबोटीवर घालवणार होतो.

हाउसबोटीचे मालक (गुलाम नबी) स्वत: आम्हाला न्यायला रस्त्यापर्यंत आले. ७५ वर्षांचा हा माणूस भलताच चपळ होता. (तो रसिक, अगत्यशील आणि भलताच गप्पिष्टही होता हे आम्हाला नंतर कळले.) हाऊसबोटीकडे जात असताना आम्हाला असे दिसले की ही हाऊसबोट एका सुंदर बागेला लागून नांगरण्यात आलेली होती. आम्ही हाऊसबोटीत शिरलो, शयनकक्षांमधे आपले सामान टाकले आणि सज्जात येऊन बसलो. समोरच्या नगीन सरोवरावरून सूर्य आपली किरणे हळूहळू काढून घेत होता आणि त्यामुळे सरोवराला एक सुंदर सोनेरी झळाळी आलेली होती. पाण्यावरचे तरंग आपल्या लयीत चालले होते. मधेच एखादा काश्मीरी युवक आपला शिकारा घेऊन कुठेतरी लगबगीने जात होता. फारच देखणे, मन प्रफुल्लित करणारे दृश्य होते ते.

थोडा वेळ हे रमणीय दृश्य पाहिल्यावर आम्ही उठलो आणि हाऊसबोटीत एक फेरी मारली. सुरवातीला सज्जा, नंतर बैठकीची खोली, नंतर जेवणकक्ष आणि त्यानंतर दोन शयनकक्ष असे ह्या हाऊसबोटीचे स्वरूप होते. हाऊसबोट भलतीच प्रशस्त आणि विश्वास बसणार नाही इतकी सुंदर होती. भिंतींवर आणि छतावर लाकडाचे कोरीव काम, देखणे पडदे, मोठमोठी झुंबरे अशी तिची अंतर्गत सजावट पाहून आपण एखाद्या राजवाड्यात तर रहायला आलेलो नाही ना असे एखाद्याला वाटले नाही तरच नवल!

खरेतर आज हाऊसबोटीवर जायचे आणि लगेच दल सरोवर पाहण्यासाठी बाहेर पडायचे असे आमचे नियोजन होते. पण ईंग्रजीत म्हटल्याप्रमाणे 'In theory, there is no difference between theory and practice. But, in practice, there is.' नियोजनाप्रमाणे सगळे थोडेच होत असते? सकाळी लवकर उठल्यामुळे आणि प्रवासातल्या रखडपट्टीमुळे आम्ही सगळे भलतेच थकलो होतो. तेव्हा आम्ही गुलाम नबी साहेबांनी वाढलेले साधे पण चविष्ट जेवण घेतले, बाहेर पडायचा बेत बासनात गुंडाळला, स्वत:ला रजयांमधे गुंडाळले आणि सरळ झोपेच्या अधीन झालो.

उद्या आम्ही श्रीनगर शहर पाहणार होतो, खासकरून त्या मुघल बागा पाहण्यासाठी तर मी फारच उत्सुक होतो.

 दिवस दुसरा - १० मे

 

आज आमच्या काश्मीर सहलीचा पहिला दिवस. आम्ही हाउसबोटीबाहेर पडलो आणि शेजारच्या बागेत गाडीची वाट पहात बसलो. ही बाग महानगरपालिकेने बनवलेली एक छोटीशी पण देखणी बाग होती. बागेत माझे लक्ष वेधून घेतले ते दोन गोष्टींनी. पहिली गोष्ट म्हणजे बागेत उभा असलेला चिनारचा प्रचंड वृक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागोजागी फुललेले गुलाब. या गुलाबांमधे लाल, पांढरा, गुलाबी असे अनेक रंग होते. एकेका झाडाला अक्षरश: शेकड्यांनी फुले लगडलेली होती आणि सगळी एकजात टपोरी. कुंपणांवर सोडलेले ते गुलाब पाहून मला आपल्या इकडच्या गुलबकावलीची आठवण आली. पण गुलबकावली ती गुलबकावली आणि गुलाब तो गुलाब. त्याचा तोराच वेगळा आहे, फुलांचा राजा उगीच नाही म्हणत त्याला!

येतो येतो म्हणता म्हणता आमच्या चालकसाहेबांनी पाऊण तास घेतला. आणि आम्ही पाहतो तर आजची गाडी नि चालक दोघेही वेगळे. “नमस्ते, मी सज्जाद. आजपासून मीच तुमच्याबरोबर असणार आहे.” आमच्या चालकाने ओळख करून दिली. गाडीत बसून आम्ही निघालो. एका छोट्याशा हॉटेलात नाश्ता केला आणि आजच्या आमच्या पहिला थांब्याकडे अर्थात शंकराचार्य मंदीराकडे कूच केले.

शंकराचार्य मंदीर श्रीनगरमधे शंकराचार्य अर्थात् सुलेमान टेकडीवर बांधलेले आहे. वळणावळणाच्या रस्त्याने गाडीने वरपर्यंत आलो की आपण मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोचतो. पण तरीही मंदिरात पोचण्यासाठी जवळजवळ २०० पाय-यांची चढण आहेच. वर काहीही नेण्यास परवानगी नसल्याने जवळच्या सगळ्या वस्तू (कॅमे-यासकट) गाडीत ठेवून आणि स्वत:ची तपासणी करून घेऊन आम्ही निघालो. मंदीर लहानसे आहे. मध्य किंवा दक्षिण भारतातल्या मंदिरांमधे दिसते तशी भव्यता किंवा कलाकुसर या मंदीराला नाही. पण त्याच्या साधेपणातही एक मन मोहून टाकणारे सौंदर्य आहे. (अर्थात भव्य मंदीर उभारण्याइतकी जागाही या टेकडीवर नाही.) आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या आवारात थोडे विसावलो. वरून दिसणारे दृश्य सगळा थकवा विसरायला लावणारे आहे. दल सरोवर, नगीन सरोवर, या सरोवरांमधे पहुडलेल्या हाऊसबोटी, पाण्यातून इकडेतिकडे जाणारे शिकारे, आटोपशीर श्रीनगर शहर असे नयनमनोहर दृश्य वरून दिसते. मंदिराच्या आवारात चिनारचा एक भलामोठा वृक्ष आहे; त्याने मंदिराचे सौंदर्य द्विगुणित केले आहे. मंदिराचे वातावरण तिथून निघूच नये असे वाटावे असे आहे, पण आम्हाला अजून अख्खे श्रीनगर शहर पहायचे होते, तेव्हा नाईलाजाने तिथून निघालो.

आमचा आजचा दुसरा थांबा होता “परी महल”. परी महल ही एक सात मजली बाग आहे. इतर मुघल बागांहून ही बाग थोडीशी वेगळी आहे. खरंतर ही एक मुघल बाग नाहीच. (मुघल बागा तीनच - चष्मेशाही, निशात नि शालीमार.) पहिली गोष्ट म्हणजे ही बाग इतर बागांपेक्षा बरीच उंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर बागांमधे दिसणारे खेळते पाणी या बागेत नाही. इथे आम्ही थोडाच वेळ थांबलो. आपल्या मित्रांना विसरून मागे राहिलेल्या एका चुकार ट्युलीपची काही छायाचित्रे काढली आणि चष्मेशाही बागेकडे निघालो.

झबरवान डोंगररांग पार्श्वभूमीला ठेवून दल सरोवारासमोर तीनही मुघल बागा बनविण्यात आल्या आहेत. चष्मेशाही सगळ्यात लहान, नंतर निशात नि सगळ्यात मोठी शालीमार. आम्ही सुरुवात केली ती 'चष्मेशाही 'बागेपासून. 'चष्मेशाही ' म्हणजे 'राजेशाही झरा'. एका गोड पाण्याच्या झ-याला मध्यवर्ती ठेवून ही बाग वसवण्यात आलेली आहे. बागेच्या एका टोकाशी बांधलेल्या एका झोपडीतून हा झरा बागेत प्रवेश करतो. (इथेच तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता.) बाग देखणी आहे यात काही शंकाच नाही, पण तिचे सौंदर्य दहा पटीने वाढले आहे ते ह्या झ-याने. झुळझुळ वाहणारे हे पाणी पाहिले की चित्त निवते आणि जिवाला स्वस्थता मिळते.

परी महालापेक्षा इथे गर्दी भरपूर होती. ('परी महल' फारसा प्रसिद्ध नसावा.) आम्ही तिथे होतो तेव्हा बरोबर बारा वाजले होते तरी अस्वस्थ वाटत नव्हते. हा काश्मीरच्या वातावरणाचा परिणाम होता की ह्या सुंदर बागेचा? बागेत विविध प्रकारची फुले होती, त्याबरोबरच झाडांची कापणी विशिष्ट प्रकारे करून त्यांना आकर्षक आकार दिले होते. एकूणच बागेची निगा उत्तम राखलेली दिसत होती. आम्ही झ-याचे पाणी प्यायलो (प्रामाणिकपणे सांगायचे तर पाणी फारसे चवदार नव्हते), जरा इकडेतिकडे रेंगाळलो आणि मग निघालो. आम्हाला अजून बरेच काही पहायचे होते.

यानंतरची बाग होती 'निशात बाग'. 'निशात' म्हणजे 'आनंद'. निशात बागेचे मराठीत भाषांतर करायचेच झाले तर 'आमोदबाग' असे करता येईल. 'चष्मेशाही' बाग सुंदर आहे, पण निशात बागेत आल्यावर ख-या अर्थाने एका काश्मीरमधल्या बागेत आल्यासारखे वाटते. आकाराने ही दुस-या क्रमांकाची मुघल बाग आहे. बारा टप्प्यात विभागलेली ही बाग जवळजवळ ५५० मी लांब आणि ३५० मी रुंद आहे. तिकीट काढून आम्ही आत शिरलो, गर्दी होती, पण बागेचा विस्तार मोठा असल्याने तिचा त्रास होत नव्हता. आम्ही पटापटा चालत निघालो आणि बागेच्या दुस-या टोकाशी जाऊन पोचलो. इथे चिनारचे काही विशाल वृक्ष उभे होते. एकमेकांशेजारी दाटीवाटीने बसलेली रसरशीत हिरवी पाने हे चिनारच्या झाडाचे वैशिष्ट्य. आम्ही या झाडांखाली बसलो. पाणी वहात होते, कारंजी उडत होती. (विजेचा वापर होत नसतानाही ही कारंजी कशी उडत होती हे मला अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.) वाहते पाणी बागेच्या दुस-या टप्प्यात असलेल्या एका टाकीत पडत होते. बरीच लहान मुले तिथे खेळत होती. समोर दल सरोवर पसरले होते. आणि फुले? इंद्रधनुष्यातला एकही रंग नव्हता ज्याला फुलांनी आपलेसे केले नव्हते. आम्ही थोडे विसावलो. तीन बागा पाहून थकलो होतो, तेव्हा जरा सैलावलो. निशात बागेतला आनंद आपल्या मनात साठवू लागलो.

पण थोड्याच वेळात भूक लागल्याची जाणीव झाली आणि आम्ही उठलो. आज दिवसभर इथेच रहावे असे वाटत असूनही निशात बागेला अलविदा केला आणि निघालो.

जेवण करून आम्ही शालीमार बागेत शिरलो तेव्हा दुपार टळू लागली होती. शालीमार म्हणजे सर्व मुघल बागांचा मुकुटमणी. सम्राट जहांगीरनं आपली पत्नी 'नूर जहाँ' हिला खूश करण्यासाठी ही बाग १६१९ साली उभारली; तेव्हापासून ती श्रीनगरच्या मुकुटातील हिरा म्हणून मिरवते आहे. इतर बागांपासून हिचं वेगळेपण म्हणजे हिच्यात असलेलं दगडी बांधकाम. उंचच उंच गेलेली चिनारची झाडं, नानाविध प्रकारची फुले, आकर्षक आकार दिलेले वृक्ष हे सगळं इथे अर्थातच आहे, पण ही बाग लक्षात राहते ती तिच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या दगडी महालामुळं, त्याच्याभोवती असलेल्या मोठ्या तळ्यामुळं, आणि त्या तळ्यात असलेल्या अनेक कारंज्यांमुळं. महाल म्हटलो तरी हा बंदिस्त महाल नाही; हा चारही बाजुंनी मोकळा आहे. त्यामुळे कुठेही बसलो तरी ही कारंजी दिसतातच. महालात सुखद गारवा आहे. तिथे बसले की दर उन्हाळ्यात सम्राट जहांगीर आपला सगळा लवाजमा घेऊन काश्मिरात का येत असला पाहिजे या प्रश्नाचे उत्तर कळते!


done

आज ह्या बागांमधे काश्मीरी लोकांची एवढी गर्दी का हा प्रश्न मला सकाळी पडला होता, त्याचं उत्तर अचानक मिळालं. आज रविवार होता. आपण सारसबागेत जातो तशी ही सगळी मंडळी दुपारी मजा करायला शालीमार बागेत आली होती.

ह्या महालातून पाणी एका पाटाने पुढे जाते. ह्या पाटाच्या कडांवर बसता येते. मी तिथे पाण्यात पाय सोडून बसलो. तिथं तसं बसल्यावर मला अमीर खुस्रोच्या त्या प्रसिद्ध ओळी आठवल्या. काश्मीरबाबत तो म्हटला होता, "ह्या दुनियेत स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!" आणि मला त्याचं ते म्हणणं पटलं. असं वाटलं की कायमचे नाही, तरी उन्हाळ्यातले दोन महिने श्रीनगरमध्ये स्थायिक व्हावं. रोज ह्या शालीमार बागेत यावं. पाण्याचं हे थुईथुई नाचणं पहावं, त्याचं संगीत ऐकावं. चिनारच्या पानांची सळसळ पहावी आणि पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घ्यावा. काश्मीरमधल्या लोकांचं जीणं सोपं नाही, पण मला त्या दिवशी मात्र त्यांचा हेवा वाटला हे खरं!

आम्ही दोन तास शालीमार बागेत होतो. आता पाच वाजत आले होते. आम्हाला श्रीनगरमधली अजून दोन ठिकाणं पहायची होती. आत्ता निघालो नसतो तर अंधार पडल्यामुळं ती ठिकाणं पाहता आली नसती. तेव्हा स्वत:ला अक्षरश: ढकलत आम्ही तिथून बाहेर पडलो. (निघताना मी दहादा तरी बागेकडं वळून पाहिलं असेल.) थोडी पेटपूजा केली आणि गाडी 'शाह - ए - हमदान खानकाह्' या पुढील आकर्षणाकडे वळवली.

(इथे माझ्या कॅमे-याची बॅटरी ढपल्यामुळे पुढची सगळी छायाचित्रे मोबाईल फोनच्या कॅमे-याने काढावी लागली. :()

खानकाह् म्हणजे प्रार्थनास्थळ. मुस्लीम धर्मियांची एकत्र येण्याची, प्रार्थना करण्याची जागा. ही जागा श्रीनगरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांमधे गणली जात नसली तरी ती सुंदर आहे अशी माहिती मी काढली होती आणि त्यामुळेच आमच्या 'काहीही पहायचे सोडायचे नाही' या धोरणानुसार (याला मी खरडून खरडून पाहणे म्हणतो) आम्ही ती पाहायला निघालो होतो. हा खानकाह् 'शाह सिकंदर' यांनी 'मीर सईद अली हमदानी' यांच्या काश्मीर भेटीप्रित्यर्थ १३७२ साली बांधला. मूळ वास्तू अनेक वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली ; आज दिसत असलेली वास्तू साधारण अठराव्या शतकात बांधली गेली असावी असा अंदाज आहे. हा खानकाह् पूर्णपणे लाकडात बांधला गेला असून त्याचे मुख्य आकर्षण आहे या लाकडावरचे नक्षीकाम. हे नक्षीकाम स्थानिक कलाकारांकडून करून घेतले गेले असून ते काश्मीरच्या लाकुडकलेचे उत्तम प्रदर्शन मानले जाते आणि खरेच ते तसे आहे. सगळेच नक्षीकाम सुंदर असले तरी लाकडात केलेल्या जाळीचे काम आवर्जून पाहण्यासारखे आहे.

अमुस्लिम लोकांना मुख्य प्रार्थना गृहात जाण्याची परवानगी नसली तरी आत डोकावून पाहण्याची (नि चक्क फोटो काढण्याची ) परवानगी आहे. आम्ही अर्थातच या परवानगीचा गैरफायदा घेतला नि भरपूर फोटो काढले. आतले दृष्य आपल्या नेहमीच्या मशिदीसारखे होते. काचेची अनेक विशाल झुंबरे छताला लटकवलेली होती. छताला नि खांबांवर धातूचे नक्षीकाम होते. काही लोक नमाज पडत होते.

खानकाह् च्या बाहेर दगडी चौथरा आहे. यावर कबुतरांसाठी दाणे टाकले जातात. दगडी चौथरा, त्यावर दाणे टिपणारी कबुतरे आणि त्यांच्या समोर लाकडात बनवलेला देखणा खानकाह्. सगळे दृष्य कसे अगदी एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे जमून आलेले होते!

नंतर आम्ही 'जामी मस्जिदी'त गेलो. या मशिदीने मात्र माझी निराशा केली. ही मशीद भव्य आहे खरी, पण ती विटांमधे बनवलेली आहे. अर्थात, तिच्यावर नक्षीकाम वगेरे काही नाही. मशिदीचे प्रांगण मात्र अगदी प्रशस्त आहे. सुंदर आकार दिलेली झाडे आणि अनेक कारंजीही तिथे आहेत.

मशिदीनंतर आमची गाडी वळली ती एका वस्तु भांडार 'कम' कार्पेट कारखान्याकडे. इथे शाल, स्कार्फ अशा काही फुटकळ वस्तुंची खरेदी झाली. काश्मीरमधला तो सुप्रसिद्ध “काहवा” चहाही आम्हाला इथे प्यायला मिळाला. नंतर कार्पेटस् कशी बनतात हे आम्हाला दाखविण्यात आले. हाताने विणले जाणारे एक कार्पेट बनवण्यास काही महिने लागतात आणि त्याची किंमत काही लाखांत असू शकते ही माहिती आम्हाला नवीन होती. 'काश्मीरमध्ये कार्पेटस् बनवण्याची कला आता नामशेष होते आहे. एवढा वेळ देण्याची नि हे कष्टाचे काम करण्याची मानसिकता आज काश्मीरी मुलांची नाही' हे ऐकल्यावर वाईट वाटले. नंतर आम्ही काही कार्पेटस् पाहिली. मात्र पुण्यातील सदनिकांप्रमाणे त्यांचा 'कार्पेट एरिया' आणि त्यांची किंमत यांचे गणित जुळत नसल्याने ती खरेदी करण्याचा विचार आम्हाला सोडून द्यावा लागला.

ह्या सहलीला येताना २०१४ सालच्या पुरानंतर श्रीनगर कितपत सावरले आहे हा एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच मनात होता. पुरानंतर परिस्थिती मूळपदावर आली असली तरी पुराच्या काही खुणा अजून शिल्लक असल्याचं आम्ही शहर फिरताना पाहिलं होतंच. एखादं पडकं घर दिसत होतं, एखाद्या घरावर पाणी जिथपर्यंत चढलं होतं ती रेषा दिसत होती. हाऊसबोटीकडे परत जाताना आम्ही सज्जादला पुराविषयी विचारलं. “वहॉं उस चौकमें बोटस् खडी हुऑं करती थी. पानी यहॉं तक चढा था.” सज्जाद माहिती देत होता. एवढी मोठी आपत्ती येऊनही सरकारनं काहीच केलं नाही ही तक्रारही त्याने बोलून दाखवली. “सरकारने पूर आला असताना काहीच केलं नाही. पुरात खूप घरं पडली आणि कित्येकांचं नुकसान झालं. पूर ओसरल्यावर सरकारनं प्रत्येकाला ५०००० रुपये दिले. एवढ्या पैशात घर कसं बांधणार?” त्याचा हा प्रश्न रास्त होता आणि आमच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं.

हाऊसबोटीत पोचल्यावर आम्ही जरा ताजेतवाने झालो आणि पुन्हा बाहेर पडलो. बाहेर एका हॉटेलात जेवून आणि बागेत शतपावली करून आम्ही हाउसबोटीत पोचलो तेव्हा रात्र बरीच झाली होती. किंचीत थंडी, खोलीतल्या झुंबरांचा मंद पिवळा प्रकाश, आरामदायी पलंग आणि उबदार रजया -- मेहफिल कशी मस्त जमून आली होती. काही क्षणांतच निद्रादेवींचे आगमन झाले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या राज्यात ओढून नेले.

उद्या? सोनेरी सोनमर्ग!

 दिवस तिसरा - ११ मे

 आज आम्ही उठलो ते नेमके सूर्योदयाच्या वेळी. आणि तो पहायला बोटीच्या छतापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती? तेव्हा आम्ही तडक बोटीच्या छतावर गेलो. सूर्यदेव आपल्या कामावर रुजू होत होते. नगीन सरोवराच्या दुस-या टोकाला नांगरलेल्या हाउसबोटी दिसत होत्या. शिका-यांची लगबग अजून सुरु झाली नव्हती. पक्षी मात्र इकडून तिकडे उडत होते. दूरवर 'हरी पर्वत' आणि त्यावरचा राजवाडा दिसत होता.(हा राजवाडा काल आम्हाला श्रीनगर शहर पाहतानाही दिसला होता, मात्र पर्यटकांना तो पाहण्याची परवानगी नाही अशी माहिती सज्जादने दिली.) आम्ही सूर्योदयाचे काही फोटो काढले आणि नगीन तलावात चालू असलेल्या घडामोडी पाहत थोडा वेळ घालवला. नंतर खाली येउन आंघोळी केल्या. (हाउसबोटीत सगळ्या सोयी असतात - गरम पाण्याची सोय, विजेची सोय, अगदी स्वयांपाकाचीही.) या हाऊसबोटीत आमचे वास्तव्य दोन रात्रींचेच होते; तेव्हा आमचे प्रेमळ यजमान गुलाम नबी यांचा निरोप घेतला. आज सज्जादने आम्हाला फार वाट पाहायला लावली नाही. आम्ही गाडीत बसलो आणि आमची गाडी सोनमर्गच्या दिशेन धावू लागली.

सोनमर्ग हे श्रीनगरपासून ८१ किमी दूर असलेलं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. श्रीनगर पासून या शहराचे अंतर फार नसल्याने अनेक पर्यटक एका दिवसात सोनमर्गला जाउन परत येतात, आम्हीही तसेच करणार होतो. वाटेत एके ठिकाणी नाश्त्याला थांबून आम्ही जवळपास दोन तासात सोनमर्गला पोचलो.

सोनमर्ग पाहण्यासाठी इथल्या स्थानिक गाडीचा वापर करावा लागतो. बाहेरून आलेली गाडी स्थानिक स्थलदर्शनासाठी वापरण्याची परवानगी नाही. (अर्थातच हा स्थानिक गाडीमालकांनी बनवलेला नियम आहे, सरकारचा नव्हे.) आम्ही गाडीतळावर पोचताच एक माणूस आमच्या गाडीजवळ आला. पण त्याने सांगितलेले दर ऐकून आम्ही अक्षरश: गर्भगळीत झालो . त्याचे ते दर ऐकून पुण्यातल्या रिक्षावाल्यांनीही लाजेने आपल्या माना खाली घातल्या असत्या. सोनमर्गच्या सगळ्या जागा दाखवण्यासाठी हा माणूस चक्क १० हजार रुपये मागत होता. (सोनमर्गच्या नावात सोनं आहे हे मान्य, पण म्हणून एवढे दर? काहीही हं श्री!) आम्ही अर्थातच एवढे पैसे देणार नव्हतो. तेव्हा स्थानिक स्थलदर्शन करूच नये असे आम्ही चर्चेअंती ठरवले आणि गाडीत बसून राहिलो. पण तो माणूस आमचा पिच्छा सोडणार नव्हता. तो परत आमच्या मागे आला आणि 'थाजिवास पार्क' आणि 'थाजिवास ग्लेशियर' दाखवण्याचे त्याने ३ हजार रुपये सांगितले. हेही जास्तच आहेत असे मला वाटत होते, पण इथे आल्यावर काहीही न पाहता परत कसे जायचे असे आमच्या मातु:श्रींचे मत पडले आणि मी नाईलाजाने ते पैसे देण्यासाठी तयार झालो. असो, गाडीमालकाने गाडी मागवली, चालकाला सूचना दिल्या आणि गाडीत बसून आम्ही निघालो. थोडे पुढे जाताच आमच्या चालकाने आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. “इथली सगळी स्थळे मी तुम्हाला दाखवतो, फक्त एक हजार रुपये जास्त द्या, पण हे गाडीमालकाला कळू देऊ नका” असा तो प्रस्ताव होता. हा प्रस्ताव ऐकून आम्ही बुचकळ्यात पडलो. त्याचे म्हणणे मान्य केले असते तर तो अप्रामाणिकपणा झाला असता, पण चार तासांच्या सहलीसाठी १० हजार रुपये मागणा-याशी अप्रामाणिकपणा करणे यातही काही गैर नव्हते. (जाओ पेहले उस आदमी का साईन लेके आओ जिसने हमे सिर्फ २/३ जागा दाखवनेके १० हजार रुपये मांगे.) आम्ही हा प्रस्ताव मान्य केला.

आमचा पहिला थांबा होता थाजिवास पार्क. इथे बाग वगेरे काही नाही, आहे तो फक्त बर्फाचा एक भला मोठा डोंगर. आम्ही उतरताच स्लेड (लाकडी ढकलगाडी) घेऊन काही तरूण आमच्या मागे लागले. त्यांना कसेबसे चुकवत आम्ही वर चढलो. बर्फ सोडून पाहण्यासारखे तिथे काही नव्हते. आम्ही काही छायाचित्रे काढली आणि परत फिरलो.

नंतरचा थांबा होता थाजिवास ग्लेशियर. थाजिवास ग्लेशियर असे म्हटले जात असले तरी इथे ग्लेशियर म्हणावे असे काहीच आम्हाला दिसले नाही, दिसला तो फक्त एक भला मोठा बर्फाच्छादित डोंगर. आमच्या चालकाने दूर वाहनतळाजवळ आपली गाडी थांबवली आणि आम्हाला डोंगराच्या दिशेने जायला सांगितले. इथे आमच्यावर स्लेड (लाकडी ढकलगाडी) चालवणा-यांचा परत एकदा हल्ला झाला. दोन तीन तरूण “स्लेडफेरी घ्या” असे म्हणत आमच्या मागे आले ते वाहनतळापासून थेट डोंगराच्या पायथ्यापर्यंत. आम्ही अनेकदा नाही म्हणूनही ते काही ऐकेनात. शेवटी आम्ही हार मानली आणि ढकलगाडी घेतलीच. (मी व माझ्या भावाने घेतली नसली तरी आई नि बाबांनी तरी.)

आईबाबा ढकलगाडीवर आणि मी व भाऊ पायी असे आम्ही हा डोंगर चढू लागलो. ढकलगाडी चढवणारे थोड्याच वेळात थकले असले तरी मी व भाऊ खूप वरपर्यंत चढलो. थाजिवास ग्लेशियर म्हणून ओळखला जाणारा हा बर्फाचा डोंगर सुंदर आहे हे मात्र खरे. (माझा बर्फाचा हा पहिलाच अनुभव होता म्हणून तर मला तसे वाटले नसेल?) हा सोनमर्गचा लोकप्रिय स्पॉट असावा. इथे भरपूर गर्दी होती. लोक वर म्हणजे अगदी बरेच वर गेले होते. कुणी चालत होते, कुणी पळत होते, कुणी ढकलगाड्यांवरून घसरत होते. दूर डोंगराच्या टोकाशी पांढरेशुभ्र बर्फ दिसत होते. असेच चालतचालत तिथे जावे, तिथले ते पांढरेशुभ्र बर्फ एक बचकभर खावे आणि तिथेच बसून वरून दिसत असणारे सुंदर दृश्य पहात रहावे असा एक धाडसी विचार माझ्या मनात येऊन गेला; पण आता ’अच्छे दिन येण्यास काहीच दिवस बाकी आहेत, ते आधी पहा नि मग नंतर असली काहीतरी विचित्र साहसं कर' असे स्वत:ला समजवत मी तो आवरला.

असो. साधारण एक तास या डोंगरावर घालवून आणि ढकलगाडी चालवणा-यांना आणि चढावरती ’ज्यादा इंजिन’ म्हणून त्यांना त्या ढकलायला मदत करणा-या त्यांच्या सहका-यांना भरपूर पैसे देऊन आम्ही खाली आलो. पायथ्याशी खाण्यापिण्याचे स्टॉल लावून स्थानिकांनी थाजिवासचा पार लोणावळा करून टाकला होता. या स्टॉलशेजारी प्लास्टिकचे कप, बशा असा कचरा पडला होता; हे दृश्य निश्चितच खटकणारे होते. आम्ही काही वेळातच गाडीजवळ पोचलो आणि निघालो. पुढचे आकर्षण? झीरो पॉईंट.

झीरो पॉइंटकडे जाताना एके ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली, इथे २/३ हेलिपॅड्स होती. "हेलिकॉप्टर्स उतरू शकतात ती ही शेवटची जागा. इथे हेलिकॉप्टर्स थांबवून मग पुढे लष्कर सगळा माल ट्रकमार्गे नेतं" ड्रायव्हरने माहिती दिली. पुढे अमरनाथ यात्रा जिथून सुरू होते ती जागाही त्याने दाखवली.

काही वेळातच आम्ही झीरो पॉइंटला पोचलो. तिथे पोचल्यावर आम्हाला काय दिसले असावे? बरोबर ओळंखलंत तुम्ही! अजून एक बर्फाचा डोंगर. स्लेडवाले, बूट भाड्याने देणारे, खाद्यपदार्थांच्या टप-या असा सगळा मालमसाला इथेही होताच. पण इथे फारशी गर्दी नव्हती. आम्ही वर चढलो. अर्ध्या उंचीवर गेल्यावर बाकीचे मागे थांबले, मी मात्र आणखी पुढे गेलो. इथे एक ढकलगाडीवाला माझ्या मागे लागला. मी त्याला दहादा नाही म्हटले असेल, तरी तो ऐकेना. मी वर जवळपास २०-२५ मिनिटे होतो आणि हा पठ्ठ्या तो संपूर्ण वेळ माझ्या मागे होता. शेवटी मी त्याला म्हटले, 'मित्रा, मला ढकलगाडीत बसायचे नाही. हे ५० रुपये तुला मदत म्हणून घे, पण माझा पिच्छा सोड.' तरी गडी ऐकेना. शेवटी मी त्याच्या ढकलगाडीत बसूनच खाली आलो.

आम्ही परत जायला निघालोच होतो तेवढ्यात मधुचंद्रासाठी तिथे आलेल्या एका जोडप्याशी बोलताना आमच्या चालकाची चलाखी आम्हाला कळली. झिरो पॉइंट म्हणून आम्हाला दाखवले जात असलेले हे ठिकाण झिरो पॉइंट नव्हतेच मुळी. तो आणखी पुढे होता. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या जोडप्याकडून ह्या सहलीसाठी चक्क १० हजार रुपये घेण्यात आले होते. (हे ऐकून आपण फारच कमी फसलो असा विचार झर्रकन माझ्या मनात येवून गेला.) झिरो पॉइंटविषयी आमच्या चालकाला छेडल्यावर त्याचे उत्तर तयारच होते. 'झिरो पॉइंटला जाणारा रस्ता बर्फामुळे बंद झाला आहे. झिरो पॉइंट म्हणजे आपण रस्त्याने जिथपर्यंत जाऊ शकतो ते शेवटचे टोक. त्यामुळे सध्या हाच झिरो पॉइंट आहे.'

आम्ही गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. पण खरे रामायण घडणे अजून बाकी होते. आम्ही गाडीतळाजवळ यायच्या साधारण अर्धा किमी आधी चालकाने त्याचे एक हजार रुपये आम्हाला मागितले. “आपण तिकडे पोचल्यावर तुम्हाला माझे पैसे देता येणार नाहीत, तेव्हा माझे पैसे आत्ताच देऊन टाका,” असे तो म्हटल्यावर आम्ही ते पैसे त्याला दिले. थोड्याच वेळात आम्ही गाडीतळावर पोचलो. तिथे पोचताच गाडीमालकाने आमच्याशी मोठमोठ्याने भांडायला सुरुवात केली. “कुठे गेला होतात तुम्ही? दोन ठिकाणे बघायला एवढा वेळ लागतो का? मला फसवताय तुम्ही. ते काही नाही, मला आता दुप्पट पैसे द्या.” आम्हाला हे सगळे अनपेक्षित होते. पण काही क्षणातंच हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. गाडीचा चालक आणि हा मालक मिळालेले होते आणि आम्हाला फसवू पहात होते. मी सज्जादकडे पाहिले, पण त्याचीही स्थिती अवघड झालेली होती. आमच्या बाजूने बोलावे तर सोनमर्गच्या त्या स्थानिक काश्मीरींची नाराजी ओढून घ्यावी लागणार आणि त्यांच्या बाजूने बोलावे तर आमची.

गाडीमालकाचे गुरगुरणे सुरूच होते. आम्ही घाबरून जाऊ आणि गुपचूप पैसे देऊ असा त्या सगळ्या लोकांचा होरा होता, पण आम्ही असे सहजासहजी घाबरणारे नव्हतो. (शेवटी पुण्याचे आम्ही!) “मी तुम्हाला फक्त आणि फक्त ३००० रुपये देणार आहे. हे घ्यायचे तर घ्या नाहीतर आपण पोलिसांकडे जाऊ. मी तिथे यायला तयार आहे.” मी त्या गाडीमालकाला निर्विकारपणे सांगितले. आम्ही पोलिसांचे नाव काढताच गाडीमालकाने आता चालकाला शिव्या द्यायला सुरुवात केली. (चालक कुठेतरी लांब गाडीमालकाची नजर चुकवत उभा होता.) मी घरच्यांना आमच्या गाडीत बसायला सांगितले. मी स्वत:ही गाडीत बसलो. गाडीमालकाची बडबड चालूच होती. शेवटी आमच्याकडून जास्तीचे पैसे उकळणे अशक्य आहे हे त्याला कळले असावे. त्याने मुकाट्याने ३००० घेतले आणि आम्ही निघालो.

या कटू अनुभवामुळे आम्हाला धक्का बसला असला तरी अजून दिवस संपला नव्हता; आम्हाला अजून एक झटका मिळणे बाकी होते!

सोनमर्गला स्थलदर्शन करत असताना आम्ही जेवायचं पार विसरूनच गेलो होतो. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा पाच वाजत आले होते. पोटात कावळ्यांनी समूहनृत्य सुरू केलं होतं; तेव्हा काही किमी पार केल्यावर आम्ही एका छोट्या हॉटेलात थांबलो. जेवण आत्ता करायचे नव्हतेच,तेव्हा भज्यांची ऑर्डर दिली. भजी होतेही मस्त. पण बिल देताना बारकाईनं पाहिलं तर असं दिसलं की त्यांनी बटाटा भज्यांऐवजी मिक्स भज्यांचे पैसे लावलेत. (दहा एक रुपये जास्त लावले असावेत, पण प्रश्न तत्वाचा होता.) मी थोड्या घुश्श्यातच तसं बोलून दाखवल्यावर गल्ल्यावरचा माणसानं लगेच सॉरी म्हणून १० रूपये बिलातून कमी केले. आम्ही तिथून निघालो. का कोण जाणे पण श्रीनगरला जाणा-या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम होतं. पाऊण तासात आम्ही फक्त २० किमी आलो असू. मी पुढे बसलो होतो. बसल्याबसल्या सगळ्या बॅगा आहेत की नाही हे तपासत राहणं हा माझी प्रवासातली नेहमीची सवय. त्यानुसार मी कॅमे-याची सॅक कुठेय असं विचारलं. कहर म्हणजे ती सॅक नेहेमी माझ्याकडेच असायची. सगळ्यांनी इकडेतिकडे शोधलं पण आत्ता ती गाडीच कुठेत दिसत नव्हती. “अरे आपली कॅमे-याची सॅक कुठेय?” मी जवळजवळ ओरडलोच. क्षणार्धात ती सॅक मगासच्या हॉटेलातच राहिल्याचं माझ्या लक्षात आलं. मी अक्षरश: हादरलोच. कॅमेरा आणि २/३ लेन्स मिळून त्या सॅकमधे जवळपास दीड लाखाचा माल होता. माझा आरडाओरडा ऐकून मी सांगायच्या आत सज्जादनं गाडी वळवलीही होती. त्यानं जोरात गाडी मारायला सुरुवात केली. तेव्हा ज्या वेगानं गाडी मारली तेवढ्या वेगात अख्ख्या प्रवासात कधीच मारली नव्हती त्यानं. आम्हाला त्या हॉटेलात जायला २५ मिनिट लागले असावेत, पण मला ते २५० मिनिटांसारखे वाटले. आम्ही त्या हॉटेलात पोचलो. पण पाहिलं तर आम्ही जिथे बसलो होतो तिथे आमची सॅक कुठेच दिसत नव्हती. मी आता रडायच्याच बेतात होतो. तरीही एकदा विचारावं म्हणून आम्ही हॉटेलमालकाला सॅकविषयी विचारलं. “अरे वो सॅक आपकी थी क्या? हमने २/३ लोगोंसे पुछा, लेकिन वो नही बोले तो वो हमने संभालकर रखदी|” असे म्हणून त्याने त्याच्या कपाटात व्यवस्थित ठेवलेली ती सॅक काढून दिली. आयुष्यात मी एवढा मोठा सुस्कारा कधीच सोडला नसेल!

आम्ही श्रीनगरला पोचलो तेव्हा नऊ वाजून गेले होते. पण अजूनही दिवस संपायला तीन तास होते: अर्थात अजून थोडी गंमत बाकी होती. आमची आजची हाउसबोट नगीन तलावातच पण अगदी आत होती; अर्थात् तिच्यात चालत जाणे शक्य नव्हते. तेव्हा आम्हाला नेण्यासाठी शिकारा पाठवायला आणि जेवण बनवायला सांगण्यासाठी मी (अर्थातच सज्जादच्या मोबाईल फोनवरून) बराच वेळ हाऊसबोटमालकाचा नंबर फिरवत होतो. पण हा नंबर लागतच नव्हता. आता आम्ही पुरते हवालदिल झालो होतो. एका दिवसात त्रास व्हावा व्हावा म्हणजे किती? पण सज्जाद तरीही शांत होता. “घाबरू नका. हाऊसबोटीत जाता आले नाही तर मी तुमची काहीतरी सोय करीन.” त्याने आम्हाला धीर दिला. शेवटी फोन लागला नाहीच. पण सज्जाद ह्या हाऊसबोट मालकाला ओळखत होता आणि त्या माणसाला चांगलं ओळखणा-या एका व्यक्तीचा नंबर सज्जादकडे होता. त्याने त्या माणसाला फोन करून हाऊसबोटमालकाचा नंबर मिळवला आणि त्याला फोन केला. अखेर “शिकारा येतोच आहे.” हे वाक्य त्याच्या तोंडून ऐकल्यावर मी त्याला आनंदाने मिठीच मारायचा बाकी होतो.

शेवटी आम्ही मालकांनी पाठवलेल्या शिका-यात बसलो आणि हाऊसबोटीकडे निघालो. त्या मिट्ट काळोखात शिका-यात बसून नगीन सरोवर पार करणे हा एक गूढ अनुभव होता. (तो कुणालाही घ्यावा लागू नये अशी माझी देवाकडे मनापासून प्रार्थना आहे!) नशिबाने पुढे आणखी काही विचित्र घडले नाही. आम्ही हाऊसबोटीत सुखरूप पोचलो आणि आम्ही सांगितले नसले तरी हाऊसबोट मालकाने तयार ठेवलेले जेवण करून पटकन बिछान्यात घुसलो.

सोनमर्ग आम्हाला आवडले असले तरी सहलीशेवटी आलेल्या या अनुभवांमुळे मन नाही म्हटले तरी थोडे खट्टू झालेच. पण आज असे झाले असले तरी हा अनुभव एकमेव होता, उद्या किंवा नंतरही असे काही होणार नाही याची आम्हाला खात्री होती.

उद्या? गुलाबी गुलमर्ग!

 दिवस चौथा - १२ मे

 मी उठलो आणि नेहमीच्या सवयीने खिडकीबाहेर एक नजर टाकली.बाहेरचे दृश्य फारसे उत्साहवर्धक नव्हते. आकाशात ढग दाटून आले होते आणि हवा पावसाळी होती. मी खोलीबाहेर पडलो आणि हाऊसबोटीत एक फेरी मारली. आजची आमची ही हाउसबोट अनाकर्षक नसली तरी पहिल्या हाऊसबोटीच्या मानाने तशी साधीच होती.

हाऊसबोटीच्या दिवाणखान्यात एक विक्रेता बाजार मांडून बसला होता. आम्ही सोडून आणखी एक कुटुंब ह्या हाऊसबोटीत रहायला होते. त्या कुटुंबातल्या काकू उत्सुकतेने त्याचा माल पाहत होत्या.

पहिल्या हाऊसबोटीचे मालक गुलामनबींशी गप्पा मारताना या हाऊसबोटींविषयी काही माहिती मिळाली. आकार, एकूण खोल्या, आतली सजावट, फर्निचर या गोष्टींनुसार प्रत्येक हाऊसबोटीची किंमत बदलते आणि ती काही कोटींपर्यंत असू शकते. बोट तुमच्या मालकीची असली तरी तुम्ही ती सरोवरात तशीच उभी करू शकत नाही; सरोवरात तुम्ही बोट उभी करता त्या जागेचे भाडे तुम्हाला दरवर्षी सरकारकडे जमा करावे लागते. हाऊसबोटींच्या मैलापाण्य़ाचे निस्सारण करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही; तेव्हा ते नगीन किंवा दल सरोवरातच सोडले जाते. या कारणामुळेच या दोन्ही सरोवरांमधे नविन हाऊसबोटीची भर टाकण्यास आता सरकारची परवानगी नाही. ’बाहेरची कितीतरी घाण या दोन्ही सरोवरांमधे येते ती सरकारला चालते, मग मैलापाण्याबाबतच सरकार एवढे जागरूक का?’ गुलामनबींचा हा प्रश्न रास्त होता खरा, पण ह्या दोन्ही सरोवरांचे प्रदूषण होत राहिले तर श्रीनगरचा संपूर्ण पर्यटन व्यवसायच धोक्यात येईल हेही तितकेच खरे होते.

हाऊसबोटीच्या सज्ज्यातून पाहिले तर बाहेर नगीन सरोवरही गारठलेले दिसत होते. जवळच काही शिकारे उभे होते. हवामान असेच राहिले तर आज त्यांच्यात कुणी बसेल ही शक्यता कमीच होती.

हाऊसबोटीभोवती एक फळकुटांचा रस्ता होता. त्यावर चालायला मजा आली असती, पण उगाच धरपडलो तर? (आत्ता फोटो पहाताना वाटते की पाणी ३ फुटांपेक्षा खोल नसावे.)

थोड्याच वेळात सगळेच उठले. ओले, कुंद नगीन सरोवर पहात आम्ही वाफाळता चहा प्यालो. आज आम्हाला कसलीच घाई नव्हती. गुलमर्गचे अंतर फार नव्हते आणि तिथे जाऊन आम्हाला काही करायचेही नव्हते. तेव्हा आम्ही आरामात सगळे आवरले आणि हाऊसबोटीचा हिशोब चुकता करून शिका-याची वाट पाहू लागलो. शिकारा काही वेळातच आला. किना-यावर सज्जाद आमची वाटच पहात होते. आम्ही निघालो आणि गाडी गुलमर्गकडे मार्गक्रमण करू लागली.

श्रीनगरमधे आम्हाला भेटायला आलेला पाऊस गुलमर्गपर्यंत आमच्या सोबतीला होता. वाटेत आम्ही 'जेकेटीडीसी'च्या एका हॉटेलात जेवण केले आणि पुन्हा गुलमर्गकडे मार्गस्थ झालो. गुलमर्गला जाताना एका घाटातून जावे लागते. इथे दिसलेले एक दृश्य माझ्या ह्दयपटलावर कायमचे कोरले गेले आहे, ते मी आयुष्यात विसरणे शक्य नाही. भर पावसात आपले सैनिक ह्या घाटात पायी गस्त घालत होते. ५/६ च्या जथ्याने चाललेले हे सैनिक आमची गाडी जवळ आली की क्षणभर थांबत आणि आमच्याकडे पहात. ते थांबले की त्यांच्या पिवळ्या रेनकोटावरून थेंबथेंब निथळणारे पाणी आम्हाला दिसे. मी उबदार गाडीत आरामदायी आसनांवर बसून गुलमर्गला चाललो होतो आणि दोन दिवसांत तिथून निघणार होतो. हे सैनिक तो घाट पायी चढत होते आणि काही महिने तरी तिथेच थांबणार होते. ते माझ्या देशाचे सैनिक आहेत म्हणून त्यांचा अभिमान, त्यांना या परिस्थितीत काम करावे लागते याबद्दल दु:ख आणि त्यांना या परिस्थितीत काम करण्यासाठी कारणीभूत ठरलेला पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्याविरुद्ध राग अशा अनेक भावना माझ्या मनात दाटून आल्या. मी मनोमन त्या सैनिकांना सलाम ठोकला आणि आम्ही पुढे निघालो. मला वाटते आपले सैनिक ज्या परिस्थितीत काम करतात त्या दाखवणा-या चित्रफिती आपल्या सरकारने बनवाव्यात आणि नागरिकांनी त्या रोज न चुकता पहाव्यात. आपली ९०% कुरकूर आपोआप बंद होईल!

घाट पार केल्यावर काही वेळातच आम्ही गुलमर्गला पोचलो. श्रीनगरपासून फक्त ५० किमी दूर असलेले गुलमर्ग काश्मीरमधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ’गुलमर्ग’ म्हणजे ’फुलांचे कुरण’. गुलमर्गला निसर्गसौंदर्याची देणगी आहेच, पण आताशा ते प्रसिद्ध झाले आहे तिथल्या गोंडोल्यासाठी. (गोंडोला म्हणजे रज्जूमार्ग, अर्थात रोपवे.) शहरात प्रवेश करताच दिसते ते गुलमर्गचे प्रसिद्ध गोल्फ कोर्स. २६५० मीटर्स अर्थात ८६९० फूट उंचीवर असलेले हे गोल्फ कोर्स जगातले सर्वात उंचीवर असलेले गोल्फ कोर्स आहे.

गुलमर्गलादेखील इतर शहरांमधून आलेल्या गाड्या आत नेण्याची परवानगी नाही. गाडी वाहनतळावर लावून आणि घोडा करून किंवा पायी फिरून तुम्हाला गुलमर्ग पहावे लागते. पण आम्ही गुलमर्गला राहणार होतो आणि तसे इंटरनेटवरून केलेले आरक्षणही आमच्याकडे होते; तेव्हा आम्हाला गाडी आत नेण्याची परवानगी मिळाली. आम्ही आत शिरलो आणि जेकेटीडीसीच्या ज्या बंगल्यात आमची सोय होती तिथे गेलो. आम्ही तिथे पोचताच तिथला केअरटेकर धावतपळत आला आणि त्याने आमचा ताबा घेतला. “सामान तुम्ही माझ्या लोकांकडे द्या. ते आणतील.” असे म्हणत तो आम्हाला आमच्या बंगल्याकडे घेऊन गेला. जेकेटीडीसीचे हे बंगले मोठे आणि एकदम प्रशस्त आहेत. दिवाणखाना, दोन शयनकक्ष आणि स्वयंपाकघर अशी आम्ही रहात असलेल्या बंगल्याची रचना होती. बंगले मोठे असले तरी अंतर्गत सजावट/फर्निचर नाममात्रच आहे. तेव्हा एवढे मोठे हे बंगले बांधण्याऐवजी सरकारने दोनच खोल्या बांधल्या असत्या पण आतली सजावट थोडी चांगली केली असती तर बरे झाले असते असे (माझ्या पुणेरी मनाला) वाटून गेले.

इथे एक मजेशीर घटना घडली. बंगल्यात आम्ही स्थिरस्थावर होतोच आहोत तेवढ्यात आमचे सामान ज्यांनी आमच्या खोलीत ठेवले ते लोक आले आणि बक्षीसी मागू लागले. आता ४ बॅगा १०० मीटर अंतर न्यायला किती बक्षीसी द्यायला हवी? मी त्यांना ५० रुपये दिले, पण ते त्या रकमेला हातही लावायला तयार नव्हते. ते तीन जण होते आणि मी प्रत्येकी शंभर रुपये असे ३०० रुपये त्यांना द्यावेत अशी त्यांची अपेक्षा होती. ३००? कसंही, कुठल्याही बाजूने पाहिलं तरी ३०० हा आकडा मला जरा जास्तच वाटत होता. शेवटी बराच वेळ थांबून ते १५० रुपये घेऊन गेले!

आम्ही गेलो तेव्हा गुलमर्गला एवढी थंडी नसली तरी इतर वेळी तापमान बरेच खाली जात असल्याने इथे गाद्यांवर गरम होणा-या ब्लॅंकेटसची सोय होती. बटन दाबले की ही ब्लॅंकेटस पटकन गरम होत; थंड, पावसाळी वातावरणात या उबदार ब्लॅंकेटसवर झोपण्याची मजा काही औरच होती.

गुलमर्ग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, पण पावसाळी हवेने आमच्या उत्साहावर संपूर्ण बोळा फिरवला. हवामान संध्याकाळी तरी सुधारेल अशी आमची आशा होती, पण तीही फोल ठरली. पावसाची भुरभुर चालू असताना, रस्त्यांवर चिखल झाला असताना गुलमर्ग भटकायला आमच्यापैकी कुणालाच उत्साह नव्हता. आम्ही काही वेळ टीव्ही पाहिला, नंतर बाहेर पडून आजूबाजूला थोडा फेरफटका मारला. बंगल्याच्या मागेच जंगल होते; तिथे दिसलेल्या एका पक्षामागे आम्हीही जंगलात शिरलो आणि त्याची काही छायाचित्रे काढली.

एवढे सगळे होईपर्यंत रात्र होत आली होती. जेकेटीडीसीचे जेवण करायचे हॉटेल बरेच लांब होते, त्यात आमचे चालक सज्जाद साहेब काहीतरी काम उगवल्याने गाडी इथेच ठेवून श्रीनगरला परत गेले होते. ह्या पावसात आणि चिकचिकीमधे एवढे अंतर चालून कोण जाणार? पण फिकर नॉट. आमच्या केअरटेकर साहेबांनी लगेच एका हॉटेलला फोन लावून दिला आणि आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळात जेवण आलेही. आम्ही ते लगेच फस्त केले आणि गरम होणा-या त्या मजेशीर ब्लॅंकेटस्वर मस्त ताणून दिली.

गुलमर्गने आज आमची किंचीत निराशा केली असली तरी उद्या हे गाव ती कसर दामदुपटीने भरून काढणार यावर माझा १००% विश्वास होता.

उद्या? गुलमर्गचा तो प्रसिद्ध गोंडोला!

 दिवस पाचवा - १३ मे

 'रात गई बात गई' हे वाक्य गुलमर्गने ऐकले नसावे, कारण आज आम्ही उठलो तर हवा अगदी कालसारखीच होती. 'नऊ वाजता गुलमर्ग गोंडोलाची तिकीटखिडकी उघडते, वेळेआधी अर्धा तास तिथे पोहोचायला हवे, नाहीतर रांग मारुतीच्या शेपटीसारखी वाढत जाईल आणि मग रखडपट्टी! गोंडोला उरकून आपल्याला आज पेहेलगामला पोहोचायचे आहे' हे गणित पुरते लक्षात असल्याने मी आळस झटकला आणि आवरायला सुरुवात केली. बाथरूमात गरम पाण्याची वेगळीच गंमत होती. पाणी जेव्हा गरम येत होते तेव्हा ते पुरेसे येत नव्हते आणि जेव्हा पुरेसे येत होते तेव्हा गरम येत नव्हते. तशाही परिस्थितीत आम्ही आंघोळी उरकल्या. गुलमर्ग मध्ये आमचा मुक्काम एकच दिवस असल्याने आम्हाला हा बंगला आज रिकामा करायचा होता; तेव्हा आवराआवरी बरीच होती. तिकीटखिडकी हॉटेलजवळच असल्याने बाकीच्यांनी राहिलेले आवरावे आणि मी तिकिटांच्या रांगेत उभे रहावे असे ठरले. तेव्हा मी निघालो आणि रांगेत जाऊन थांबलो. सुदैवाने रांग अजूनही बाल्यावस्थेतच होती.

गुलमर्ग रज्जूमार्ग हा आशिया खंडातला सगळ्यात लांब आणि उंच असा रज्जूमार्ग आहे. 'गुलमर्ग ते कुंगडूर' आणि 'कुंगडूर ते अपरवथ' अशा दोन टप्प्यांत हा रज्जूमार्ग बांधला गेला आहे. गोंडोल्याचा दुसरा टप्पा पार करतो तेव्हा आपण ४२०० मी अर्थात १३७८० फूट एवढी मोठी उंची गाठलेली असते. इतकी प्रचंड उंची गाठत असल्यामुळे ह्या रज्जूमार्गाचा पहिला टप्पा पार करण्यास ९ तर दुसरा टप्पा पार करण्यास तब्बल १२ मिनिटे लागतात. मागे लिहिल्याप्रमाणे गुलमर्गला निसर्गसौंदर्याची देणगी आहेच, पण आताशा ते प्रसिद्ध झाले आहे या गोंडोल्यासाठी.

मी रांगेत थांबलो असताना इतर प्रवाशांशी थोड्या गप्पा मारल्या. रांगेत अमरावतीवरून आलेले एक मराठी गृहस्थ होते. ते काश्मीर चक्क बसने फिरत होते. माता वैष्णोदेवी करून ते आता श्रीनगरमार्गे गुलमर्गला आले होते. जम्मू ते श्रीनगर हे अंतर पार करायला लागलेला वेळ त्यांनी सांगताच मी हबकलोच. हे अंतर पार करायला त्यांना एकूण १६ तास लागले होते. (आम्ही अडीच तासांच्या विमानप्रवसातही वैतागलो होतो!)

तेवढ्यात अचानक ’गोंडोल्याचा दुसरा टप्पा आज बंद आहे’ अशी बातमी कानावर पडली नि मला काळजी वाटू लागली. एवढ्या लांब येऊन फक्त पहिला टप्पा करूनच परत जावे लागणार की काय? थोड्या वेळातच तिकीटघर उघडले आणि तिकीटांची विक्री सुरू होताच एक सुवार्ता कळली; गोंडोल्याचा दुसरा टप्पा चालू होता. मी पटकन तिकिटे काढली. घरातले बाकीचे लोकही तोपर्यंत तिथे पोहोचलेच होते, तेव्हा आम्ही सगळे तत्परतेने गोंडोल्याच्या दिशेने धावू लागलो. गोंडोला जिथून सुटतो त्या लाकडी इमारतीचे काम चालू होते. (आत्ता गेल्यास ती इमारत बनून तयार झालेली दिसावी.) आम्ही धावतपळत त्या इमारतीत शिरलो. एवढी धावपळ करून आलो असलो तरी ह्या इमारतीत आमच्या आधी बरेच लोक हजर होते. (मगाशी तिकीट घेताना तर नव्हते, हे एवढे लोक अचानक कुठून उगवले असावेत?) त्यांच्याशी किंचीत धक्काबुक्की करत आम्ही रांगेत उभे राहिलो. मात्र रांग वेगाने पुढे सरकली आणि सुमारे १० मिनिटे वाट पाहिल्यानंतर आम्ही गोंडोल्यात प्रवेश करते झालो.

अखेर जगप्रसिद्ध गुलमर्ग गोंडोल्याचा आमचा प्रवास सुरु झाला! घुर्र घुर्र असा आवाज करत गोंडोला वरवर जाऊ लागला. आम्ही जिथे गोंडोल्यात शिरलो ती लाकडी इमारत हळूहळू लहान होताना दिसू लागली. पाइनची उंचच उंच झाडे, लांबवर दिसणारे गुलमर्ग शहर, इथे तिथे मागे राहिलेली बर्फाची ठिगळे हे सारे आम्ही पहातच होतो तोवर गोंडोल्याचा पहिला टप्पा आलाही.

आई व बाबा दुस-या टप्प्यावर येणार नसल्याने (हा एक चुकीचा निर्णय होता हे आम्हाला नंतर कळले) आम्ही परत आल्यावर त्यांना कुठे शोधायचे ते ठरवून घेतले आणि दीड-दोन तासांत भेटू असे म्हणून त्यांचा निरोप घेतला. गोंडोल्याच्या दुस-या टप्प्यावर जाण्यासाठीही फारशी गर्दी नव्हती, तेव्हा आम्ही लगेचच आत शिरलो आणि अफरवात पर्वताकडे आमचा प्रवास सुरू झाला.

प्रामाणिकपणे सांगायचे तर गुलमर्ग गोंडोल्याची सगळी मजा या दुस-या टप्प्यातच आहे. आम्ही वर जाऊ लागलो तसतशी झाडे हळूहळू कमी होऊ लागली आणि सगळीकडे बर्फच बर्फ दिसू लागले. ज्या डोंगरावर गोंडोला बांधला आहे त्याची चढणही आता तीव्र होऊ लागली. बर्फाचे ते सरळसोट कडे पाहून नाही म्हटले तरी थोडीशी भिती वाटलीच. आणि अचानक गोंडोला थांबला! बाहेर पाहिले तर थर्माकोल घासल्यावर त्याचे जसे लहान गोळे उडतात तसे लहानसे पांढरे गोळे उडताना दिसत होते, बर्फवृष्टी सुरू झाली होती! मघाशी ’वर हवामान चांगले नाही’ असे कुणीतरी म्हटले होते त्याची आठवण झाली. नेमके काय झाले असेल वर? गोंडोला बंद तर पडला नाही? आणि तो परत सुरूच झाला नाही तर? मग आपले काय? आपण असेच लटकत राहणार की काय? एवढे सगळे विचार झर्रकन येऊन जाताहेत तेवढ्यात गोंडोला परत सुरू झालाही.

काही वेळातच गोंडोला वर पोचला आणि आम्ही गोंडोल्याच्या बाहेर आलो. तिथले ते दृश्य पाहून मी क्षणभर थबकलो. गोंडोल्याने आम्हाला बर्फाने पूर्णपणे झाकून टाकलेल्या एका पर्वतशिखरावर आणून सोडले होते. इथे सगळीकडे फक्त बर्फ होता. इकडे तिकडे, वर खाली - बर्फ, बर्फ आणि फक्त बर्फ. बर्फ मी आयुष्यात आधी पाहिला असला तरी ’फुलोंकी घाटी’ मधला बर्फ ग्लेशियरचा बर्फ होता आणि कालचा सोनमर्गचा काळपट रंगाचा, खराब झालेला बर्फ. या बर्फाची मात्र रीतच न्यारी होती. हा बर्फ होता आकाशात दिसणा-या ढगांच्या रंगाचा, एकही डाग नसलेला. `पांढराशुभ्र` हा शब्द या बर्फाला पाहूनच बनला असावा असे वाटायला लावणारा.

आम्ही त्या बर्फात शिरलो. बर्फ ताजा, भुसभुशीत असल्याने पाय त्यात रूतत होते आणि चालायला त्रास होत होता. आम्ही तसेच चालत राहिलो. दूरवर काही खडक होते, आम्ही त्या दिशेने निघालो. तिथे पोचल्यावर मी चारही दिशांना नजर टाकली. आजूबाजूला दिसणा-या सगळ्या पर्वतांमधे आमचा हा अफरवात पर्वत सगळ्यांत उंच होता. (हे शिखर मी काही चढून आलो नव्हतो, तरी मनाला उगीचच थोडे बरे वाटले.) तेवढ्यात ढग दूर झाले आणि वरूणराजांनी दर्शन दिले. वरूणराजांचे आगमन होताच सगळे हिम अगदी चकाकू लागले. त्या तकाकीने डोळ्यांना त्रास होऊ लागला. बर्फ असल्याने आम्ही इथे गरम कपडे घालून आलो होतो तेव्हा थोडे उकडूही लागले. पण अचानक ढगांनी पुन्हा एकदा वरूणराजांवर कडी केली आणि वातावरण पुन्हा ढगाळ झाले.

मी आजूबाजूला पाहिले. स्लेड गाड्यांचा राक्षस इथेही होताच, शिवाय बर्फ भरपूर असल्याने इथे स्कीईंगचीही सोय होती. लोक बर्फात खेळत होते, बर्फाचे गोळे एकमेकांना मारत होते. आम्ही वर एका बाजूला आलो होतो, ते पाहून काही लोक आमच्या दिशेने येऊ लागले. त्यात एक पोक्त माणूसही होता. तो माझ्याजवळ आला, `सिगारेट घेणार का?` सिगारेटचे खोके दाखवत त्याने विचारले. मी धूम्रपान करत नाही, तेव्हा मी त्याला नाही म्हटलो. धूम्रपान मला पसंत नाही, पण खरे सांगायचे तर मला त्या क्षणी त्याचा हेवा वाटला. या बर्फाच्छादित शिखरावर, या अतीशीत वातावरणात सिगारेटचे गरम गरम झुरके घेण्याची मजा काही औरच होती!

आणि तेवढ्यात, ही सगळी मजा कमी होती म्हणून की काय, हिमवृष्टी सुरू झाली. बर्फाचे ते इवलेसे गोळे आमच्या डोक्यावर, दगडांवर हळूहळू आदळू लागले आणि जिथे पडतील तो पृष्ठभाग धवल रंगात रंगवू लागले. वा-याने धूर वाहून न्यावा तसे ते चिमुकले गोळे वरून आमच्याकडे उडत येऊ लागले. दूरवर कुठेतरी जन्मलेले व्हायोलिनचे स्वर हवेबरोबर तरंगत येतात तसे. मी एका दगडावर बसलो आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या हिववर्षावाची मजा लुटू लागलो.

आम्ही जवळजवळ एक तास त्या शिखरावर होतो. माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम तास जर मी कधी काढले तर त्यांमधे या तासाचा नंबर बराच वरचा असेल. पण एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अंत कधीतरी होतोच. अफरवात पर्वतशिखरावरची आमची वेळ आता संपत आली होती. पहिल्या टप्प्यावर आईबाबा आमची वाट पहात होते - पाहण्यासारखे किंवा करण्यासारखे तिथे काहीच नसल्याने ते कंटाळले असणार होते. त्यांना बरोबर न आणून आम्ही मोठी चूक केली होती. इथली चढाई अवघड असेल, इथली थंडी आपल्याला मानवणार नाही अशी एक भिती त्यांना वाटत होती. इथे आल्यावर आम्हाला जाणवले की ती निराधार होती. त्यांच्या वयाचे काय, त्यांच्यापेक्षा वृद्ध असे अनेक नागरिक इथे आम्हाला मजा करताना दिसत होते. ’आईबाबांना वर आणायला हवे होते’ असे एकमेकांना सांगत आम्ही खाली निघालो. गोंडोल्यांच्या इमारतीकडे जाताना उजवीकडे भारतीय सैन्याचा तळ दिसला. मी मनोमन त्यांना सलाम केला आणि निघालो.

पहिल्या टप्प्यावर आईबाबांना भेटलो तर आमच्या अंदाजानुसार ते कंटाळले होते. (तिथे पडत असेलेल्या पावसाचा या कंटाळ्यात मोठा वाटा होता.) आम्ही सगळे निघालो. खाली जाणारा गोंडोला पकडून काही मिनिटांतच गुलमर्गला पोचलो. सज्जादसाहेबांना शोधून आम्ही पेहेलगामकडे निघालो तेव्हा २ वाजून गेले होते.

बर्फाच्छादित शिखरांवरून विमानातून उडत असताना “या शिखरांवर जर कुणी आपल्याला अलगद उतरवलं तर!” असा एक विचार नेहमी माझ्या मनात येत असे. आज गुलमर्ग गोंडोल्याने मला तो अनुभव मिळवून दिला होता. आमची गाडी पेहेलगामच्या दिशेने धावत असली तरी मी मनाने अजून अफरवात पर्वतावरच होतो!

गुलमर्गमधून निघाल्यावर आम्ही वाटेत एका लहानशा हॉटेलात जेवण केले. पावसाची भुरभुर चालू होतीच. थोडे पुढे आल्यावर मात्र तो थांबला.

गुलमर्गहून पेहेलगामला जाण्यासाठी पुन्हा श्रीनगरमधेच यावे लागते. सज्जादशी गप्पा मारताना कधीतरी आम्ही त्यांना त्यांच्या घराविषयी विचारलं असावं. श्रीनगरमधून जाताना एका चौकात आल्यावर “आपको मेरा घर देखना था ना? अभी चलते हैं? यहीं पास हैं.” असं त्यांनी म्हटल्यावर आम्ही लगेच तयार झालो. एका सामान्य काश्मिरी माणसाचे घर कसे असते हे पहायची उत्सुकता आम्हालाही होतीच. आम्ही त्याच्या मुलांसाठी थोडी चॉकलेटस्, बिस्कीटे घेतली आणि निघालो. एका दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर सज्जाद रहात होता. तो, त्याची दोन मुले, आई नि त्याची बहीणही त्यांच्यासोबत रहात होती. घर फारसे मोठे नव्हते. 3 खोल्या असाव्यात. हॉलमधे खालीच गाद्या टाकल्या होत्या, त्यावर आम्ही बसलो. सज्जादने बोलवल्यावर त्यांची आई नि बहीण आमच्याशी गप्पा मारायला आल्या. सज्जादची बहीण तर बरीच बोलघेवडी होती. माझे वडील सिव्हिल इंजिनियर आहेत हे कळल्यावर ती म्हटली, “भाईसाहेब, मेरा एक काम है आपके पास. मुझे एक नया मकान बनवाना है. आप मुझे उसकी ड्रॉइंग्ज बनाके देंगे?” गेल्या वर्षीच्या पुरात तिच्या घराचं बरंच नुकसान झाल्यामुळे तिला आता ते परत बनवायचे होते. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते, आर्किटेक्ट नव्हते. आणि पुण्यातून तिला हे प्लॅन वगेरे पाठवणार कसे? “अरे नक्की नक्की.” काहीतरी म्हणून आम्ही वेळ मारून नेली. थोड्या वेळात सज्जादची पत्नी चहा घेऊन आली. बरोबर चविष्ट रोट होते. तिथे आणखी थोडा वेळ थांबून आम्ही निघालो.

श्रीनगरहून पेहेलगामला जाताना `पांपोर` नि `अवंतिपूर` गावे लागतात. आधी लागले पांपोर. सा-या जगभर हे गाव प्रसिद्ध आहे तिथल्या केशरासाठी. इथल्या सगळ्यात प्रसिद्ध दुकानासमोर सज्जादने आमची गाडी उभी केली. मालक केशराची चक्क एक मोठी बरणी घेऊन समोर बसले होते. गंमत म्हणजे हीच बरणी समोर ठेवलेला त्यांचा फोटो दुकानाच्या दर्शनी भागात झळकत होता. (200 रुपये प्रति ग्रॅम या दराने त्या बरणीची किंमत दोनेक लाख सहज होत असावी. ती पळवता आली तर काय बहार येईल असा एक व्रात्य विचार चटकन माझ्या मनात येऊन गेला.) केशरासोबतच खुर्बानी, जर्दाळू, सुके अंजीर असा स्थानिक नि आयात केलेला इतर सुकामेवाही होता. हो आणि काश्मीरचा तो प्रसिद्ध चहा `काहवा` अर्थातच होता. स्वत:साठी व इतरांना भेट देण्यासाठी सुकामेव्याची भरपूर खरेदी झाली. `खाऊन तर पहा` असे म्हणत मालक वेगवेगळ्या सुक्यामेव्याने भरलेली वाटी प्रत्येक गि-हाईकासमोर ठेवत होते, तेव्हा (फुकटची) खादाडीही बरीच झाली. असो, खिसा हलका करून नि बॅगा जड करून आम्ही निघालो.

नंतर आले अवंतिपूर. हे आम्ही परत येताना पाहणार होतो; तेव्हा ते मागे टाकून आम्ही पुढे निघालो. पेहेलगामला पोहोचलो तेव्हा बराच उशीर झाला होता. आम्ही हॉटेलात शिरलो आणि ताजेतवाने झालो. आज काहीही स्थलदर्शन नव्हते तेव्हा जेवणानंतर झोप हाच कार्यक्रम होता. आम्ही गरमागरम बिछान्यात शिरलो ते बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारीची स्वप्ने पाहतच!

 दिवस सहावा - १४ मे

 काहीही पहायचे नाही, फक्त निरूद्देश भटकायचे, आपण थांबलो आहोत ते शहर अनुभवायचे असा एक तरी दिवस सहलीत असायलाच हवा असं माझं आपलं एक प्रामाणिक मत आहे.(अर्थात हाताशी असलेला वेळ नि पहायच्या ठिकाणांची यादी पाहता हे गणित प्रत्येक सहलीत जमणे अवघडच.) आज दिवसभरात आपल्याला काहीही करायचे नाही ही भावना सुखद असते, सहलीच्या वेळी तर ती आणखीनच सुखद बनते.

हे किंवा ते पहायचे आहे असा आमचा आजचा काहीही कार्यक्रम नव्हता. काही चांगले पाहण्यासारखे असले तर पहावे किंवा खुशाल खोलीत लोळत पडावे अशी आजची योजना होती. पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. मात्र असे असले तरी स्थानिक व्यावसायिकांनी त्यांच्या सुपीक डोक्यातून पहायची अनेक ठिकाणे 'निर्माण' केली आहेत. आणि ही ठिकाणे आडबाजूला, डोंगरात असल्याने तिथे गाडीने जाण्याचा पर्याय उपलब्ध नाही - तिथे घोड्यांनीच जावे लागते. (किंवा मग पायी.) पायी फिरायला आम्ही अर्थातच राजी नव्हतो. घोड्यांनी फिरायला माणशी 1200 रुपये असा जबरदस्त दर होता. अपरिचित, अप्रसिद्ध आणि ज्यांबाबत काहीही खात्री देता येत नाही अशा ह्या ठिकाणांसाठी एवढे पैसे देण्यास आम्ही अजिबात तयार नव्हतो. तेव्हा आम्ही दिवस हॉटेलमधेच घालवण्याचा निर्णय घेतला. काल आम्ही ज्या हॉटेलमधे उतरलो होतो त्याचे आरक्षण एकाच दिवसाचे होते तेव्हा आम्ही सगळे सामान आवरले आणि नव्या हॉटेलात पोचलो. नवी खोली पाहिली आणि दिल खुश झाले. आजची आमची खोली पाहता तिच्यात वेळ घालवणे हाही एक आनंददायी अनुभव ठरणार होता. आतून पूर्णपणे लाकडाने सजवलेली ही खोली हॉटेलच्या तिस-या मजल्यावर होती. खोलीच्या मागे एक ओढा खळखळत वाहत होता. खोलीतून दिसणारे दृश्य अप्रतिम होते. बर्फाछादित डोंगर, त्यांवरचे मोठमोठे पाईनचे वृक्ष आणि तळाशी असलेली हिरवळ. तासनतास पाहत रहावे असे.

दुपारी जरा गाव पाहून यावे ह्या हेतूने आम्ही गाडी काढली आणि पेहेलगाम बाजारपेठेत गेलो. तिथेच एका चांगल्याशा हॉटेलात जेवण केले आणि मग खोलीवर येऊन मस्त ताणून दिली.

संध्याकाळी आजूबाजूला कुठेतरी फिरून यावे आणि तिथेच चहा मारावा असे ठरले. आम्ही रमतगमत गावाच्या दिशेने चालू लागलो. पडावे की पडू नये हा निर्णय करणे पर्जन्यदेवींना अवघड जात असावे, त्यामुळे त्या सारख्या येजा करत होत्या. सगळीकडे अगदी चिकचिक होती. आम्ही एका लहानशा टपरीत शिरलो आणि चहा मागवला. चहा चांगला होता, पण आपल्यासारखी मजा आली नाही. सर्वोत्कृष्ट चहा प्यावा तो महाराष्ट्रातच या कुणीतरी मोठ्या माणसाने (म्हणजे मीच) म्हटलेल्या विधानावर शिक्कामोर्तब झाले.

परत जाताना एक मनुष्य कांगडी पोटाशी घेऊन जाताना दिसला. त्याला कांगडीविषयी विचारल्यावर त्याने उत्साहाने तिची माहिती दिली. कांगडी म्हणजे चालतीफिरती शेकोटी. वेताने बनवलेल्या, फुलदाणीसारख्या आकाराच्या ह्या कांगडीत एक मातीचे भांडे असते ज्यात विस्तव ठेवला जातो. थंडी आली की कांगडीत विस्तव किंवा जळत्या गोव-या टाकायच्या, ती पोटाशी धरायची आणि आपला पायघोळ अंगरखा तिच्याभोवती लपेटून घेऊन चालू पडायचे, मग – थंडीची काय बिशाद? [कांगडीविषयी अधिक माहिती या दुव्यावर उपलब्ध.]

रात्री जेऊन आल्यावर आम्ही उबदार बिछान्यात शिरलो आणि बराच वेळ पत्ते खेळत बसलो. नंतर पाण्याचा आवाज ऐकता ऐकता झोप कधी लागली ते कळलेच नाही.

उद्या? जिवाचे पेहेलगाम!

 दिवस सातवा - १५ मे

 मी आधी म्हटल्याप्रमाणे पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. आणि ही ठिकाणे पाहण्यासाठी स्थानिक गाडीच करावी लागते. तेव्हा आम्ही आमच्या गाडीने पेहेलगाम टॅक्सी स्टॅंडवर आलो. स्थानिक स्थलदर्शनासाठी मारूती इकोपासून सुमो, स्कॉर्पिओ ते इनोव्हा अशा अनेक गाड्या उपलब्ध होत्या. आम्ही मारूती इको गाडी ठरवली. एक पोरगेलासा तरूण आमचा चालक होता. “प्रत्येक ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास मिळेल” आम्ही गाडीत बसताच त्याने तुटकपणे सांगितले. आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण का कोण जाणे, तो त्या गोष्टीसाठी फारसा उत्सुक दिसला नाही. मला तरी तो काश्मीरमधल्या चिडलेल्या, संतप्त तरूणांचा प्रतिनिधी वाटला.

पेहेलगामचे रस्ते अरूंद आणि वळणावळणाचे आहेत, पण हे साहेब ज्या वेगाने गाडी चालवत होते ते पाहता चंदनवारी आधी स्वर्गवारी होईल अशी भीती आम्हाला वाटली. (ह्याचे लायसन पुण्याचे असावे काय?)

आमचा पहिला थांबा होता चंदनवारी. प्रामाणिकपणे सांगायचं तर चंदनवारीला सोनमर्गची लहान बहीण म्हणता येईल. बर्फाचा उंचचउंच कडा, आजूबाजूला दिसणारे बर्फाने झाकलेले डोंगर, त्यावरची पाईनची झाडे, बर्फातले स्लेडगाडी वगेरे खेळ हा सगळा मामला इथे होताच, पण इथले एक वेगळेपण म्हणजे पर्वताच्या पोटातून वाहणारा एक ओढा आणि हा ओढा पर्वताखालून वहात असल्याने बनलेला बर्फाचा एक 'पूल'. अर्थात या 'पुला'वर जायला परवानगी नव्हती.

मी चंदनवारीला सोनमर्गसारखे म्हटले असले तरी मला ते आवडले. एक तर आम्ही गेलो तेव्हा इथे लख्ख सूर्यप्रकाश होता. (सोनमर्गमधे आम्ही गेलो तेव्हा वातावरण ढगाळ होते.) आणि दुसरे म्हणजे सोनमर्गच्या तुलनेत इथे स्लेडगाडीवाल्यांचा त्रास बराच कमी होता. आम्ही इथे बराच वेळ रेंगाळलो आणि पुष्कळ फोटो काढले.

पुढच्या आकर्षणाकडे जाण्यासाठी आम्ही गाडीजवळ आलो आणि मगाशी आपण बरोबर नेलेली शाल आता आपल्याजवळ नाही हे माझ्या आईच्या लक्षात आले. तिला पुन्हा वर येणे शक्य नव्हते, तेव्हा तिला खालीच थांबायला सांगून मी पळतपळत वर आलो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे पोचलो, पण शाल काही दिसेना. शाल खूप महाग नव्हती, पण अगदीच टाकाऊपण नव्हती. “अरे अशी कुठे गायब झाली शाल?” असा विचार करत असतानाच तिथला एक स्थानिक फोटोग्राफर त्याच्या गळ्याभोवती एक शाल गुंडाळून फिरताना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने शाल चटकन मला काढून दिली आणि आपण शाल सापडल्यावर तिच्याविषयी खूप जणांना विचारल्याचेही आवर्जून सांगितले. काश्मीरी लोकांच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आम्ही आधी घेतला होता, त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि निघालो बेताब व्हॅलीकडे.

एखाद्या ठिकाणी कुठल्यातरी सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे म्हणून त्या जागेला त्या सिनेमाचे नाव द्यायचे असा घाणेरडा प्रकार फक्त भारतातच घडू शकतो; “बेताब” व्हॅलीचे असेच आहे. सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या बेताब या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे म्हणून या जागेला बेताब व्हॅली म्हटले जाते. अर्थात नावामागची कथा अनाकर्षक असली तरी खुद्द ही जागा मात्र कमालीची आकर्षक आहे. किंबहुना काश्मीर सहलीत चुकवू नयेत अशा अनुभवांपैकी बेताब व्हॅलीला भेट हा एक अनुभव होता असे मी म्हणेन. बेताब व्हॅली म्हणजे एक बाग आहे. इथे हिरवळ आहे, खळाळती नदी आहे, तिच्यावरचे पूल आहेत, फुलांची झाडे आहेत आणि ही देखणी बाग फिरायला आडव्यातिडव्या वाटा आहेत.

वेळेचे बंधन असल्याने आम्ही न रेंगाळता पुढे गेलो आणि बागेच्या दुस-या टोकाजवळ जाऊन थांबलो. कुठल्यातरी बर्फाच्छादित पर्वताहून वाहत येणारी लिड्डर नदी या बागेत काही काळ विसावते नि परत पुढे निघते. त्यात आम्ही गेलो त्या वेळी तिथे लख्ख ऊन होते. बर्फाने वेढलेली शिखरे चमकत होती, नदी झुळूझुळू वहात होती आणि सोबत होती काश्मीरमधली ती वेड लावणारी हवा. खरं तर एक अख्खा दिवस काढावा अशी ही जागा, पण पाऊण तास थांबून आम्ही तिथून निघालो.

पुढचे आकर्षण होते अडू व्हॅली. “आपको चंदनवारी और बेताब व्हॅली पसंद आई ना... आप यहॉंपे दस मिनटभी नही रुकोगे...” गाडीतून उतरताना आमचा चालक आम्हाला म्हणाला. “असे का म्हणाला असेल हा?” विचार करतच आम्ही गाडीतून उतरलो आणि अडू व्हॅलीच्या दिशेने चालू लागलो. अडू म्हणजे पर्वतांनी वेढलेले एक छोटेसे पठार आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे या पर्वतांपैकी एकही पर्वत बर्फाछादित नाही, ते सगळे आहेत गर्द हिरवे, झाडांनी आच्छादलेले.

आम्ही चालत बरेच आत गेलो. आत जेकेटीडीसीचे एक हॉटेल आहे. आम्ही हॉटेलवाल्यांनी बाहेर टाकलेल्या बाकड्यांवर बसलो आणि चहा मागवला.

आजूबाजूला नजर जाईले तिथे हिरवळ होती. हिरवळीवर बारीक पिवळी फुले फुलली होती. हॉटेलची जागा अगदी झकास होती. “सुंदर व्ह्यू असलेल्या काही खास मोजक्या खोल्या” अशी काही हॉटेले जाहिरात करतात, पण या हॉटेलच्या कुठल्याही कोप-यामधून दिसणारा व्ह्यू सुंदर नव्हे तर केवळ अप्रतिम होता. या हॉटेलमधे रहायला फारज मजा आली असती. “असो, नंतर कधीतरी. पुन्हा पहायला काहीतरी राहिले पाहिजे ना!”, मी मनाची समजूत घातली. (आयुष्यात एकदा तरी पुन्हा काश्मीरला जायचेच असे मी मनाशी ठरवून टाकले आहे. ४ दिवस श्रीनगरला हाऊसबोटीत आणि ४ दिवस ह्या हॉटेलात. अजुन ५/६ वर्षांत जम्मू - काश्मीर रेल्वेचे कामही पूर्ण होते आहे, तसे झाले तर काश्मीरला जाणे अधिक सोपे नि अधिक स्वस्त होणार आहे.)

दूरवर काही लोक पॅरासेलिंग करत होते.

त्यांचा हेवा करत आम्ही परतीची वाट धरली. टॅक्सी स्टॅंडवर आल्यावर आम्ही आमच्या मूळ गाडीत शिरलो आणि जेवण करून हॉटेलात परतलो.

संध्याकाळी जरा फिरून आणि सोबत जेवण उरकूनच परत यावे असा विचार करून आम्ही बाहेर पडलो. “चला तुम्हाला एक जुने मंदिर दाखवतो” सज्जादने असे म्हटल्यावर माझी उत्सुकता चाळवली गेली. हे मंदिर होते पेहेलगामचे मामलेश्वर मंदिर. मंदिर पेहेलगामपासून दोनेक किलोमीटर दूर असावे. शंकराचे हे मंदिर आकाराने अगदी चिमुकले आहे. मंदिरात एक (खेळत्या?) पाण्याचा झरा आहे. “काश्मीरात हिंदू मंदिरे नाहीत आणि जुनी तर नाहीतच नाहीत” अशी माझी एक समजूत होती, त्या समजुतीला हे मंदिर पाहून धक्का बसला.

दूरवर सूर्य पेहेलगामचा निरोप असताना प्रकाशाचे काही खेळ करून दाखवत होता.

मंदिर पाहून येताना आम्ही वाटेतल्या एका बागेत थबकलो. तिथे थोडा वेळ घालवून जेवून आम्ही खोलीवर गेलो तेव्हा रात्र बरीच झाली होती.

 दिवस आठवा - १६ मे

 आजचा आमचा दिवस खरं म्हटलं तर एक राखीव दिवस होता. काश्मीर खो-यात परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते हे माहित असल्याने मी मुद्दामच आमच्या वेळापत्रकात हा एक जास्तीचा दिवस ठेवला होता. खास असे काहीच आज आम्हाला करायचे नव्हते. येथून ९० किमी दूर असलेले श्रीनगर गाठणे आणि तिथे जाताना लागणारे अवंतिपूरचे मंदिर पाहणे एवढेच आजचे आमचे किरकोळ लक्ष्य होते.

तेव्हा आम्ही उशीरापर्यंत लोळत पडण्याचा आनंद अनुभवला आणि सगळे आवरून हॉटेलात नाश्ता करून आरामात निघालो. पेहेलगामवरून श्रीनगरकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत. सध्या मे महिना असल्याने या बागांमधे अर्थातच सफरचंदे नव्हती;तेव्हा आम्ही नुसती झाडे पाहूनच स्वत:चे समाधान करून घेतले. (नकळत काश्मीरमधे परत येण्यासाठीच्या कारणांत “सफरचंदांनी लगडलेली झाडे पाहणे” या अजून एका कारणाची भर पडली.)

साधारण दीड तासांत आम्ही अवंतिपूरला पोचलो. अवंति वर्मन (ज्याच्या नावावरून या गावाचे नाव पडले आहे) याने बांधलेले हे अवंतिस्वामी मंदीर आज भग्नावस्थेत आहे. हे मंदीर जरी भग्नावस्थेत असले तरी त्याचे अवशेष पाहून त्याच्या गतवैभवाची कल्पना येते. मंदीर नवव्या शतकात बांधले गेले असावे. मंदीराचा चौथरा मी पाहिलेल्या सगळ्य़ात मोठ्या मंदीर-चौथ-यांपैकी एक आहे हे नक्की. काळाचे घाव बसून आज मंदीराचा चौथरा नि काही खांबच उरले असले तरी ह्या मंदिराची भव्यता मनात ठसते. आज जर हे मंदीर उभे असते तर जगातल्या काही निवडक भव्यदिव्य मंदिरांमधे त्याची गणना करावी लागली असती यात अजिबात शंका नाही.

मंदिरातून निघताना एक विनोदी दृश्य दिसले. फक्त पाचच मिनिटांपुर्वी मंदिराच्या आवारात आलेल्या एका मोठ्या पर्यटकांच्या घोळक्याला त्यांचा टूर लीडर अक्षरश: हकलत होता. “चला, चला, चला. पाच मिनिटे झालीयेत. आपल्याला अजून पेहेलगामला जायचंय.” अर्थात त्याला काय म्हणणार म्हणा? सात दिवसात जर जम्मू, काश्मीर नि वैष्णोदेवी बसवायचे असेल तर त्याला अशी घाई करायलाच लागणार!

मंदिराच्या आवारात साधारण अर्धा तास घालवून आम्ही निघालो. श्रीनगरमधे पोचलो तेव्हा दीड वाजले असावेत. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथले स्थानिक खाद्यपदार्थ चाखण्याचा आम्ही आवर्जून प्रयत्न करतो. काश्मीरचे पारंपारिक “वाझवां” जेवण सुप्रसिद्ध आहे आणि हे मिळण्याचे सर्वोत्तम ठिकाण समजले जाते श्रीनगरमधले “मुघल दरबार” रेस्त्रॉं. पण इथेही एक गंमत आहे. श्रीनगर मधल्या रेसिडेन्सी रस्त्यावर या एकाच नावाची दोन रेस्त्रॉं आहेत आणि तीही एकाच इमारतीत. एक रेस्त्रॉं आहे तळमजल्यावर आणि दुसरे पहिल्या मजल्यावर. अर्थात दोघेही आपणच “अस्सल आणि प्रसिद्ध” मुघल दरबार असल्याचा दावा करत असतात. बहुतांश लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही पहिल्या मजल्यावरच्या मुघल दरबारात गेलो. एकटाच मांसाहारी असल्याने वेगवेगळ्या डिशेस घेणे शक्य नव्हते तेव्हा वेटरच्या सल्ल्याने मी तिथले सगळे काही असलेले खास ताट मागवले. घरच्यांनी दम आलू काश्मीरी, काश्मीरी नान नि काश्मीरी पुलाव असे शाकाहारी खाणे मागवले. हॉटेल मांसाहारी असल्याने शाकाहारी जेवण कितपत चांगले मिळेल याबाबतीत मी साशंक होतो, पण माझी शंका चुकीची ठरली. मांसाहारी जेवण उत्तम होतेच, पण त्यांचे शाकाहारी जेवणही चांगले होते. ज्यांना काश्मीरमधे खास काश्मीरी जेवण जेवायचे आहे त्या खवय्यांनी श्रीनगरला गेल्यावर या रेस्त्रॉंला आवर्जून भेट द्यायला हवी.

या सुंदर जेवणानंतर जर सुंदर झोप मिळाली असती तर तिने या जेवणाला “चार चॉंद” लावले असते पण नियतीला ते मंजूर नव्हते (आयला, भारी झालेय ना हे वाक्य?) आमच्या मातु:श्री आमच्या बरोबर होत्या. एक स्त्री, सहलीतला शेवटची रिकामी संध्याकाळ आणि खासकरून कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ या गोष्टींचे पर्यावसन ज्यात होते तेच आमच्या बाबतीतही झाले आणि आम्ही सज्जादने नेलेल्या एका मोठ्या दुकानात शिरलो. शेवटी तिथे एक तास उलटून गेल्यावर आणि विकत घ्यायच्या वस्तुंच्या बिलाने पाच आकडे पार केल्यावर माझा संयम सुटला आणि मी आईला थांबवले. आम्ही तिथून निघालो तेव्हा चार वाजून गेले असावेत.

हाऊसबोटीवर गेल्यावर काहीही विशेष घडले नाही. काही तासांपुरतेच आमच्या वाट्याला उरलेले काश्मीर आम्ही डोळ्यात आणि कॅमे-यात साठवायचा प्रयत्न केला एवढेच.

  १७ मे (अंतिम भाग)

 आज आमचा काश्मीरमधला शेवटचा दिवस. आमचे परतीचे विमान ११:५५ ला होते, तेव्हा लवकर उठायची काही गरज नव्हती. आम्ही आरामात उठलो. हाउसबोटीतला आमचा शेवटचा चहा घेतला आणि सज्ज्यात बसून सरोवरात येजा करणारे शिकारे न्याहाळत बसलो. श्रीनगरमधले आमचे सगळे मुक्काम हाऊसबोटींमधेच होते. आतमधे असलेल्या सजावटीमधे अधिक-उणे असले तरी आम्ही राहिलेली प्रत्येक हाऊसबोट सुंदरच होती. आमची आजची हाऊसबोट देखील साधी असली तरी कमालीची आकर्षक होती.

दिवाणना आणि त्याला लागून असलेला भोजनकक्ष

शयनकक्ष १

शयनकक्ष २

प्रवासात शेवटच्या दिवशी का कोण जाणे पण मन उदास होते. ही सगळी मजा, हा आनंद आज संपणार हा विचार निश्चितच सुखावह नसतो. भारताचे हे नंदनवन सोडणे आमच्याही जिवावर आले होते, पण काय करणार, जाणे भाग होते. आम्ही आस्तेकदम सकाळची आन्हिके उरकली, बॅगा भरल्या आणि पुन्हा पुन्हा एकमेकांच्या खोलीत जाऊन काहीही घ्यायचे राहिले नाही याची खात्री करून घेतली. हाऊसबोट मालकाचा हिशोब चुकता केला आणि सज्ज्यात येऊन आम्हाला किना-यावर पोचवणा-या शिका-याची वाट पाहू लागलो. ते नगिन सरोवर, त्या हाऊसबोटी, ते शिकारे, ते टपोरे गुलाब मी एकवार शेवटचे पाहून घेतले. अखेर शिकारा आला, सामान त्यात चढले आणि आम्ही निघालो.

श्रीनगर विमानतळावर दहशतवाद्यांचा मोठा धोका असल्याने सुरक्षेचे `पुख्ता इंतजाम` असतात. तुमच्या सामानाची तपासणी तुम्हाला जवळजवळ ३०० मी आधीच करावी लागते. आम्ही ती करून घेतली. विमानतळावर फक्त आम्हालाच प्रवेश होता, अर्थात आमचा काश्मीरी दोस्त सज्जादचा निरोप घेण्याची वेळ आलेली होती. नेहमी हसत राहणारा, आमच्या प्रत्येक प्रश्नाला न कंटाळता उत्तर देणारा, आम्ही जे म्हणू ते ऐकणारा आणि किंमती वस्तू असलेली माझी बॅग मागे राहिली हे कळताच तत्काळ गाडी वळवून ती सुसाट दामटणारा सज्जाद आता चालक राहिला नव्हता तर आमचा मित्रच झाला होता; त्याचा निरोप घेताना सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. आम्ही त्याचे राहिलेले पैसे नि त्याची बक्षिसी दिली आणि `पुन्हा भेटू` म्हणत त्याचा निरोप घेतला. नंतर स्वत:ची तपासणी करवून घेतली आणि विमानतळावर प्रवेश करते झालो.

बारा वाजले, बाराचे एक झाले, पण आमचे दिल्लीकडे जाणारे विमान निघायची काही चिन्हे दिसेनात. दिल्लीहून पुण्याला जाणारे आमचे विमान साडेपाचचे होते, तेव्हा या विमानाला खूपच उशीर झाला तर पुढे परिस्थिती अवघड होऊ शकली असती. (पुढचे विमान ह्याच कंपनीचे होते, ही एक जमेची बाब होती.) चौकशी केल्यावर असे कळाले की दिल्लीवरून येणारे विमानच पुन्हा आम्हाला घेऊन दिल्लीला जाणार होते. जर येणारे विमानच अजून यायचे होते तर जाणारे विमान जाणार कसे?

शेवटी सव्वा वाजता ते विमान आले. लोळावळ्याला जाणारी लोकल आज पाऊण तास उशीराने धावत आहे हे ऐकणा-या प्रवाशाला पुणे स्टेशनकडे जाणारी ती लोकल जेव्हा शिवाजीनगर स्थानकात दिसते तेव्हा त्याला जो आनंद होतो तोच आम्हालाही झाला. `चला विमान आले तर खरे, आता निघेलही लवकर` आम्ही स्वत:शी म्हणालो. आणि पंधरा मिनिटात `प्रवाशांनी विमानात बसून घ्यावे` अशी उद्घोषणा झालीही. पावणेदोन वाजत विमान निघाले. जम्मूत थांबून आम्ही शेवटी दिल्लीला पोचलो तेव्हा चार वाजून गेले होते. विमानतळाशेजारच्या एका हॉटेलात आम्ही चार घास पोटात ढकलले आणि `सुरक्षा जांच` करून गेटवर पोहोचलो तर विमान कर्मचारी आमचीच वाट पहात असलेले आम्हाला दिसले. विमानाकडे जाणा-या बसची शेवटची फेरी चालू होती आणि तिच्यात फक्त आम्हीच होतो. `आयला, आपल्यासाठी विमान थांबवून ठेवलेय की काय?` असा विचार येऊन आम्हाला उगाचच अवघडल्यासारखे झाले. अर्थात थोड्याच वेळात एका मराठी कुटुंबाने बसमधे प्रवेश करून हा बहुमान आपल्याकडे घेतला.

असो. शेवटी एकदाचे विमान उडाले आणि आम्ही दिल्लीचा निरोप घेतला. ऋशिकेष का कुठेतरी एका कॅंपसाठी गेलेल्या मुलामुलींची एक टोळी विमानात होती. त्यांनी विमानात अक्षरश: उच्छाद मांडला होता. समोरच्या मुलाला टपली मार, इकडेतिकडे टोप्यांची फेकाफेक कर, हवाई सुंदरीला बोलवण्याचे बटन पुन्हापुन्हा दाब, असे हे त्यांचे प्रकार पाहून माणूस मर्कटापासून जन्मला आहे या विधानाची सत्यता पटत होती. अखेरीस दोन तासांनी आम्ही पुण्यात पोचलो तेव्हा घड्याळात आठ वाजत होते. विमानातून बाहेर पडताच उष्म्याने आणि विमानतळातून बाहेर पडताच वाहनांच्या गर्दीने आमचे स्वागत केले. विमानप्रवासाचे हे असे असते. रेल्वेप्रवासात, आपण जाऊन आलो त्या ठिकाणची नशा हळूहळू उतरते; त्यामुळे तिचा त्रास होत नाही. विमानप्रवासात ही नशा खाडकन उतरते आणि मोठा झटका बसतो. असो. ब-याच वेळाने आम्ही एकदाचे घरी पोचलो तेव्हा साडेनऊ तरी झाले असावेत.

दुस-या दिवशी मी आयटी हमाल या पदावर कसा रुजू झालो आणि सॉफ्टवेयरची ओझी पुन्हा आपल्या खांद्यावर कशी वाहू लागलो हे वाचण्यात ना तुम्हाला स्वारस्य आहे ना लिहिण्यात मला! तेव्हा, इति लेखनसीमा!

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...