Monday, December 7, 2020

एकटीच ... @ North-East India

 5th February 2019

प्रिय डायरी,

उद्या मी एकटीच प्रवासाला निघणार.

या प्रवासाच्या निमित्ताने माणसे नि मुखवटे यांच्या गोंगाटाहून दूर सटकायचे. इथे आपुलकीच्या आशेच्या कासेने जगत असतो तिथे आपले कुणी नाही, मग कसली आस नि कसली आसक्ती? अशाच वेळी स्वतः ला शोधता येते असा समज करून घेतला आहे. गैरसमज असला तरी माझ्या या प्रवासामागची प्रेरणा आहे ती.

डायरी, तुझ्या कोऱ्या पानावर शब्दामध्ये खरे काय ते खरडायची गरज खरंच आहे का? तुला सारे माहीत आहे. उद्याचे काय हा विचार जरी मनात आला तरी पोटात गोळा येतोय. असू दे. साहस म्हटले की तशी चलबिचल होतेच. त्याला भिति असे नाव दिले की मग मात्र त्याचीच भिती वाटू लागेल, असे मी मला बजावले आहे.

असा प्रवास पुन्हा होणे नाही हा विचार पुन्हा पुन्हा मनात रेंगाळतोय. तेच कारण असेल की अंगात ताप भरलाय तशातही खूप शक्ती संचारली आहे असं जे वाटतंय. एक शेवटचा जोर लावायची वेळ आली की कुठुनसं असंच बळ संचारतं. हेच बळ कुटुंबाच्या नाराजीलगत रेखलेल्या प्रवासाच्या वाटेवरचे इंजिन आहे.

अशा प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जणू काही तो आयुष्याचा शेवटचा दिवस जगत आहे अशा थाटात एक एक क्षण टिपून घ्यायचाय ... शब्दात, कॅमेरात आणि हृदयात.

पाठीवरची सॅक भरून झाली. तुला नाही भरली. कारण यंदा प्रथमच वास्तविक हितगूज थेट जगाशी करायचंय.

गुडबाय सुप्रिया

IMG_20190205_215446.jpg

51400241_10156849898272778_7204750704953524224_n.jpg

6th फेब्रुवारी 2019

प्रिय प्रतिमा,

घरातून निघायच्या आधी संध्याकाळी सात वाजता सपाटून भूक लागली होती. पण ठरवलं की ट्रेनमध्ये एकदा स्थिरस्थावर झालं की मगच डब्बा उघडून गरमागरम खाऊन घ्यायचं. एक नाही दोन नाही तर तीन जेवणांची सोय बरोबर घेतली. घरचे डब्बे…. सारे माझे आवडते खाद्यपदार्थ .. तांदळाच्या भाकऱ्या, खोबऱ्याची झणझणीत चटणी, दोन राईस्प्लेटस्, कोंबडी रस्सा आणि तू दिलेलं खमंग कुळथाचे पिठलं! स्वतः आजारी असताना केवढ्या मायेने माझ्या प्रवासासाठी शिदोरी बांधुन दिलीस. निघताना तू माझ्या हातात कुळथाच्या पिठल्याचा डब्बा दिलास तसे तोंडाला पाणी सुटले.

व्हेजबिर्यानी…अंडाबिर्यानी असं काहीबाही ओरडत रेल्वे कर्मचाऱ्याने चार फेऱ्या मारल्या पण ज्याला घरच्या शिदोरीची भूक , त्याला ते विकतचे घेऊन खायची इच्छा कशी होईल? त्यामुळे आज उपाशी रहायची वेळ येणार हे मला कळून चुकले.

म्हणजे झाले असे की माझी शिदोरी भरून घेतली ती पिशवी गर्दीतून ट्रेन मध्ये चढतानाच्या ओढाओढीत तुटून पडली. मी जोरजोरात ओरडत होते पण गर्दीने कसेतरी ट्रेनमध्ये लोटले तेव्हा माझ्या हातात फक्त हँडल राहिलं होतं. मी पुन्हा बाहेर पडू पहात होते पण पाठी गर्दीत माझी दुसरीही बॅग अडकली. गाडी फक्त दोन मिनिटं थांबून सुरू झाली. तसे माझा खाऊ मला आता मिळणार नाही हे मला कळून चुकले. ट्रेनमध्ये इतकी चेंगराचेंगरी चालू होती की किंचित सरकायलाही जागा नव्हती. अशा अवस्थेत 36 तासांचा प्रवास करायचा कसा, या विचाराने खिळून मी उभीच राहिले.
अगदी सर्वसामान्य माणसासारखा प्रवास करायचा म्हणून स्लीपर क्लासचं तिकीट काढलं. ते शेवटपर्यंत confirm झाले नाही. कोणी सांगितलं TC भेटेल तेव्हा तो काहीतरी सोय करेलच त्या भरवशावरच निघाले होते.

जवळजवळ शंभरएक लोक एकाच परिस्थितीला तोंड देत होते म्हणजे परिस्थिती सामान्य असायला हवी! पण ती माझ्या अपेक्षांशी जुळत नाही निव्वळ या कारणाने मला त्रास होत असावा. अशा प्रवासाकडून कुठलीही अपेक्षा ठेवायची नसते, तेव्हाच तो आनंददायक होतो.. मागच्या solo ट्रिप मध्ये शिकलेला धडा पुन्हा एकवार गिरवला. बाहेरच्या गर्दीत आणि मनातल्या विचारात गटांगळ्या खात असताना कोणीतरी माझ्यासाठी ओरडू लागले की, "अरे ..लेडीज है वो तो देखो।" तशी मी भानावर आले. अबला समजून कोणी माझ्यासाठी जी सहनुभूती दाखवली त्यानेच मला माझ्या स्त्रीशक्तीचीही पुन्हा एकदा प्रबळ जाणीव झाली.

या प्रवासाला निघायची माझी तयारी खऱ्या अर्थाने तेव्हाच पूर्ण झाली जेव्हा हे वरचे दोन धडे मी डोक्यात फिट केले. सारेजण डाव्या हाताला स्लिपर कोच मध्ये जाण्यासाठी धडपडत असताना मी गर्दीतून उलटी वाट काढत उजव्या हाताला 3-tire AC कोच मध्ये घुसले. तिथले चित्र अगदी वेगळे होते. सारे हाय क्लास (?) प्रवासी गुण्या गोविंदाने आपापल्या सीट वर नांदत होते. मोकळ्या जागेत पाठीवरचे ओझे जमिनीवर ठेऊन उभ्याउभ्याच माझे मन क्षणभर विसावले.

ट्रिप ची सुरवात ही अशी झाली.

थोडा वेळ सरला असेल, नाही म्हटलं तरी मन थोडं मलूल झालंच होतं, डोळ्यात एक दोन अश्रू दाटू पहात होते.. अचानक पाठून कोणी ओळखीची हाक दिली, "ताई"... डोळ्यातला अश्रू टपकन खाली पडला, मी दचकून पाठी पाहिले. एक अनोळखी तरुण होता, त्याने मला सीटवर बसायची विनंती केली. मी त्याची विनंती नाकारली. "माझे तिकीट स्लीपर कोच चे आहे आणि कोचमध्ये शिरायची गर्दी कमी पर्यंत फक्त मी इथे उभी आहे" हे स्पष्ट केले. पण तो ऐकेनाच तसे त्याच्या विनंतीला मान देऊन मी घटकाभर सीटवर बसून घेतले.

थोडा वेळ सरला असेल, मी माझे समान उचलून स्लीपर क्लास मध्ये जाऊ लागले पण तो तरुण मला बिलकूल तिथे सोडेना. दोन घास बरोबर खाऊन मगच पुढचे काय ते बोलूया अशी त्याने गळ धरली. मी नको नको म्हणत असताना जेवणाच्या ताटातील पहिला घास तोडला व माझ्या हातात बळेबळे सोपवित मला सांगितले की, "माझी ताई हा घास खात नाही तोवर मी अन्नाला शिवणार नाही", मग काय ते विकतचे जेवण ही घरच्या शिदोरीइतके रुचकर वाटू लागले. खरच का, कोणी प्रेमाने खाऊ घातलेल्या घासाला मिठापेक्षा मायेची चव येत असावी? माझ्याजवळ मी काही फळे घेऊन निघाले होते, अंजीर, द्राक्ष, डाळिंब, मी सारी फळे काढून टेबलावर ठेवली आणि आजूबाजूच्या चार प्रवाशांना फलाहार करायची विनंती केली. सर्वांनी एकत्र सहभोजन आटपले.
51577556_10156849898372778_1260391645166174208_n.jpg

मला तो तरुण नको नको सांगत असताना अट्टाहासाने मी माझे समान घेऊन स्लीपर कोचमध्ये गेले. तिथचे चित्र भयंकर होते. जिथे जागा मिळेल तिथे प्रवाशांनी बस्तान मांडले होते. अशी परिस्थिती हाताळायची माझी पहिलीच वेळ! एरव्ही मला रिझर्वड कोच मध्ये शिरून प्रवास करणारे महाभाग खूप त्रासदायक वाटतात. TC च्या पाठी पाठी फिरतात आणि त्याने दाद दिली नाही तर सरळ लेकाचे आपल्या पायाशीच बसतात. रात्रभर आपल्याला मात्र पाय दुमडून झोपावे लागते. पण आज मात्र मिडल नि लोअर बर्थच्या मधल्या जागेत रात्रभर पाठीची मानेची कमान करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व्यथा मला कळत होती.

मला त्यांची व्यथा कळली तशी माझी व्यथा तिथेच जमिनीवर बसून घेतलेल्या एका बाईला कळल्यागत ती म्हणाली, "अशी किती वेळ उभी राहशील? बसतेस तर बसून घे.", क्षणभर आईने हाक दिल्यागत वाटलं आणि काहीच विचार न करता आपसुख मी तिच्या अंथरलेल्या गोधडीवर बसून घेतले. विचार न करता असेच म्हणायचे कारण की, एरव्ही बोगीच्या टोकाचा बर्थ मिळाला तरी नाक मुरडणारा आपला क्लास (?) आहे, तिथे ही म्हातारी तिथेच टॉयलेट च्या बाहेर जिथे दाराशी बसली होती, मला तिथे बसायची लाज नाही वाटली नि घाण नाही वाटली. पाठच्या दाराच्या कुठल्याशा फटीतून थंड वाऱ्याचा मारा होत होता. मला खोकल्याची ढास लागली तशी तिने तिची शाल माझ्याभोवती गुंडाळून धरली. खोकतच तिच्याकडे पहाताना तिला माझ्या डोळ्यात कृतज्ञता दिसली असावी. तिने माझ्या चेहऱ्यावरून तिचा सुरकुतलेला हात फिरवत म्हटले, "रंगाचा काय तो फरक आहे, नाहीतर तू माझ्या लेकीसारखीच आहेस" ...तो जो काही फरक तिला तिच्यामाझ्यात जाणवला ती वर्णभेदाची जाणीव माझे काळीज चिरत गेली. मी ठरवलं आता आजची रात्र तरी या माईच्या काढायची.

तासभर उलटला असेल माझा शोध घेत तो AC class चा तरुण त्याच्या ताईला शोधत समोर टपकला. तो माझ्यासाठी रेल्वे ने त्याला दिलेली चादर शर्टात लपवून घेऊन आला, बरोबर स्टेशनवरून एक चिक्कीही विकत घेतली. त्याचे उपद्व्याप बघून मी डोक्याला हात लावला. मी अशा अवस्थेत प्रवास करत असेन याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. आता त्याने माझ्यापाठी नवीनच लकडे लावले की तू माझ्या बर्थ वर आराम कर.
मी निक्षून नकार दिला तसा माझ्या काळजीने तो तिथेच जमिनीवर बसला. मी त्याला सांगत होते, "मला ताई म्हणतोस तर माझं ऐक". माझे शब्द ऐकल्या न ऐकल्या सारखे करीत तो माई ला सांगत होता, "कसा प्रवास करावा लागेल ह्याची काही कल्पना नसताना एवढ्या लांबच्या प्रवासाला निघाली मग काळजी वाटणार नाही तर काय?"
51765988_10156849898547778_3894421356099403776_n.jpg

मी मधेच म्हटलं, "खरंच, एवढ प्रेम नको देऊ, मी तुमची कोणी नाही", त्यावर तो काहीच बोलला नाही माईला मात्र सार कळल्यासाररखं वाटलं, "तिच्या गावाला दुष्काळ पडला आहे, घरची परिस्थिती कठीण आहे, मग कडीलिंबाचा पाला विकायला विदर्भातून रात्रभर प्रवास करून आठवड्यातून दोनदा ती मुंबईला येते, घरी मुले, सुना सारे आहेत पण आपण भुईला भार होऊ नये एवढी काळजी घ्यायची. इथपासून सुरवात करून मग नातीगोती, आयुष्य, माणुसकी याबद्दल ती बरंच बोलत राहिली.

नासिक आले तसा मी त्या तरुणाने स्वतः च्या बर्थ वर परत जावे म्हणून हट्ट धरला, माईने ही त्याला समजावले तसा तो परत गेला. त्याचें नाव शिवाजी होते असे मला true caller ने सांगितले. रात्रभरात त्याने तीनदा फोन केला. पहाटे पहाटे मलकापूर ला उतरून माई तिच्या घरी गेली, सकाळी बडनेरा ला उतरून शिवाजी अमरावती ला त्याच्या घरच्या वाटेवर निघाला तसा ट्रेन मधला माझा एकटीने प्रवास सुरु झाला.

इथेच स्लीपर क्लासमधील लोकांच्या पायवाटेमधेच बसून तुला पत्र लिहून पूर्ण केले. आजकाल पोस्टाची झंझट नाही म्हणून इंटरनेट वरून पत्र लग्गेच पोहोचेल असा उगीच आपला भ्रम असतो. पुन्हा पुन्हा check करते आहे, अजून तुला हे पत्र पोहोचलेले दिसत नाही. हे पत्र तुला मिळेल तस इतर वाचकांना ही मिळेल. तुझं पत्र सर्वच वाचतील तसच पुढे कोणाकोणाला लिहिलेली सारी पत्रे तू वाचत रहा. घरचे मात्र पत्र वाचतील न वाचतील, त्यांना खुशाली नक्की कळव, जमल्यास पत्राचे उत्तर लिही.

तुझी मैत्रीण
सुप्रिया.

 

51467565_10156852228407778_3182175109653725184_n.jpg

7th फेब्रुवारी 2019

प्रिय पूर्वा,
कितीतरी तास बसून काढले पण जेव्हा झोप अगदी अनावर झाली तशी शिवाजीने आणून दिलेली रेल्वेची पातळ चादर अंथरून जमिनीवरच निजून घेतलं. गारेगार जमीन अंगाला बोचत होती. रात्री टॉयलेट च्या फेऱ्या घालणारे चादर तुडवत चालायचे. एक अवलिया तर मला मध्ये ठेऊन दोन बाजुनी पावले टाकत इकडून तिकडे गेला. संकटकाळी काही न सुचून आपण थिजून जातो तशी निपचित पडून राहिले होते. खरतर निपचित वगैरे नाहीच. रात्रभर खोकल्याची ढास लागत होती त्यामुळे डोळे बंद असले तरी चाळवाचाळव चालूच होती. एकदा डोळे उघडले तर बाजुच्या स्लीपरवरच्या प्रवाशाने चपलाचा जोड झोपायच्या चादरी वर माझ्या डोळ्यासमोरच उतरवला होता. Askoril चा डबल डोस घेऊन मेल्यासारखं झोपावं अस कितीही वाटलं तरी ते शक्य नव्हतं कारण माझं सामान शिवाजी ने AC मध्ये ठेऊन घेतलं होतं.

माई तीन च्या सुमारास ट्रेनमधून उतरली. पहाटेचा पहिला चहा घेऊन आला त्याच्या चहाच्या पिंपाचा नळ गळत होता. जसे मला ओलांडून तो पुढे गेला तसे माझ्या अंगावर उकळत्या गरमागरम चहाचे थेंब थेंब पडले. सकाळी टॉयलेटची वर्दळ वाढली तशी रात्रभर मुकाट सहन केलेल्या साऱ्या प्रकाराची किळस असह्य होऊन मी उठून बसले. रेल्वेच्या चादरीची तर अशी गत अशी झाली होती की रेल्वे कर्मचाऱ्यालाही आपली चादर ओळखता येणार नाही आणि समजा ओळखायला आलीच तरी तो मलाच ती धुऊन द्यायला सांगेल. लागा चुनरीपे दाग छुपाऊ कैसे|.या गाण्याचा माझ्या परिस्थितीशी फक्त ओढून ताणूनच संबंध जोडता येईल तरी सारखे सारखे तेच गाणे डोक्यात वाजत होते. या चादरीचे काय करावे काही सुचेनासे झाले तसे मी त्या चादरीचा बोळा केला आणि एका सीटखाली सरकवला.

दिवस उजाडला पण या दिवसाची सुरुवात कशी करावी, ते ठरत नव्हते. प्रवासाचे अजून 24 तास बाकी होते. निदान हक्काची एक सीट तरी हवी. त्या TC ला काही कामधंदा नाही का? एवढ्या तासात फिरकला सुद्धा नाही, की काल कशी ती नेमकी त्याची माझी चुकमुक झाली? आता सर्वात आधी एकेक कोच धुंडाळून त्याला शोधुन काढायचेच असे ठरवले. सहा स्लीपर कोच,एक पँट्री, सारे AC कोच दोनदा फिरून झाले शेवटी पठ्ठा सापडला फर्स्ट क्लास मध्ये. E केबिनमध्ये बसून खादडत होता. म्हणतो कसा, "नागपूरला मी उतरेन नि दुसरा चढेल, तोच तुला सीट देईल."

अंग मोडून गेलंय, डोकं भणभणतयं, घसा धरलाय, दर तासाला तंतुवाद्याची सूर बिलकुल उतरलेली गंजकी तार छेडावी तशा आवाजात खोकल्याची उबळ येतेय. तरी आई सांगत होती तुझा खोकला दिवसेन दिवस वाढतोय. फोनवरून औषध विचारण्यापेक्षा एकदा पूर्वा ला प्रत्यक्ष दाखवून ये. पण आजपर्यंत आपली तपासणी आणि उपचार सारे फोनवरून झाले आहे ना? कधी सहजी तुला contact झाला नाहीच तरी तू त्या त्या परिस्थितीत काय करायला सांगशील हे मी फक्त आठवते नि माझेमला उपचार सुचतात. माझा तुझ्यावर आंधळा विश्वास आहे हेच खरं! आताही फोनची रेंज नाही पण तुझी आठवण झाली म्हणून तुला पत्रच लिहायला घेतले. पण मला वाटते की तू म्हणशील, "प्रदूषणाहून दूर मोकळ्या हवेत गेल्यावर आपोआप जाईल खोकला, तोपर्यंत जमल्यास गरम पाण्याच्या गुळण्या कर."

नागपूर आलं तशी नवीन TC ला शोधायची माझी मोहीम सुरू झाली. तो दोन तासांनी दुसऱ्याच एका बोगीत तिकीट चेक करताना सापडला. त्याचे मन दयेने भरून यावे म्हणून माझी दुखभरी कहाणी सांगताना माझे वेटिंगचे तिकीट मोबाईल वर जसे काही दाखवले, लागलीच त्याचा आवेशच बदलला. इतका वेळ जो माझ्या बडबडीकडे चक्क कानाडोळा करत होता तो माझा मोबाईल घेऊन निवांत सीटवर बसला. त्याने मला सांगितले की unconfirmed e-ticket हल्ली आपोआप कँन्सल होते आणि म्हणून मी कालपासून अवैध तिकीटावर प्रवास करत आहे. झाले? म्हणजे आ बैल मुझे मार! माझी चूक होती तर याने मला हुडकून शोधून काढायचे ते सोडून कालपासून मी याला शोध शोध शोधते आहे आणि आता एकदाचा तावडीत सापडला तर उलटी याने मला रिसीट फाडून दिली. पण असू दे. तेवढ्याने मला एक फायदा तर झाला. त्या TC ने बोलता बोलता म्हटले "ये सीट पर बिलासपूर तक कोई नही आएगा" …. आणि पुढच्या 5-6 तासांसाठी पाठ टेकायची माझी एकदाची सोय झाली.

ट्रेन मध्ये शिरल्यापासून अठरा तासानंतर मी धड पाठ टेकली त्याक्षणी अंग असह्य ठणकत होतं. पुढच्या पाचच मिनिटात कस ते नेटवर्कही मिळाल नि नेमका राजचा, रोशनचा खुशाली विचारायला फोन आला. त्यांचे आवाज ऐकून मला भरून आले. हाताची कमान डोळ्यावर ठेऊन मी डोळे झाकून घेतले आणि डोळ्यातून हवे तेवढे दुः:ख वाहू दिले.

आपल्या बरोबर आपले कोणी नसते तेव्हा मन आपोआप जास्त सतर्क आणि संवेदनशील होत असावे. अशा वेळी नकळत आपण फक्त वर्तमान काळात राहू लागतो. एक एक क्षण परिपूर्ण जगू लागतो, तो तसाच आपल्या मनावर कोरला ही जातो. नंतर त्याच आयुष्यातल्या सर्वात सुंदर शिकवणी नि आठवणी बनून रहातात. हाच सोलो प्रवासाचा सर्वात मोठा इनसेंटिव्ह आहे.

थोडा वेळ काय गेला तेवढ्यात इथल्या सहप्रवाशांबरोबर माझा मस्त मेळ जमला. पाच राज्यातले प्रवासी होते. महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, प.बंगाल नि ओरिसा! दोघे दोघे एकेका स्लीपर झोपायला लागले पण कुणालाच त्यात काही गैरसोय वाटली नाही. आम्ही आमच्या जवळचे लिमिटेड रिसोर्सेस आणि अनलिमिटेड गप्पा एकमेकांबरोबर शेअर करत खूप मस्त प्रवास केला.
51654904_10156852228892778_6229632170567139328_n.jpg

ट्रेन साडेतीन तास लेट होती त्या हिशेबाने जवळ जवळ चाळीस तासांचा स्लिपर क्लास चा प्रवास आटोपुन, 8 फेब्रुवारीला अंदाजे सकाळी 10 वाजता मी कलकत्ता स्टेशन वर उतरले. थोडे फोटो जोडून पत्र पोस्ट करते. पत्र वाचलस की उत्तर नक्की दे.

तुझी लाडकी
सुप्रिया.

वाचकांसाठी नोट्स
पूर्वा - ती डॉक्टर आहे आणि नात्याने माझी वाहिनी लागते
आई - माझी सासू
राज - माझा नवरा
रोशन - माझा मानलेला भाऊ

एवढा कठीण प्रवास मी स्लीपर क्लास ने का करावा? आणि असे अनेक प्रश्न वाचकांना पडतील म्हणून ...

नवरा आणि मुले यांच्याबरोबर प्रवास करायचा तर ट्रीप ची रुपरेषा, सुखसोई, ऐशोआराम सारे विचारात घेउनच होत असत. पण त्यापेक्षा वेगळा प्रवास करणाऱ्यांचा एक प्रकार आहे. सर्वसाधारणपणे लोकांना जरी ते माहित नसतील तरी जगभर अशी भटकंती करणारे अनेक लोक आहेत. हे backpackers आजवर आपल्या ट्रीप मध्ये आपल्याला दिसले नसतील कदाचित पण स्थानिक लोकांना मात्र यांची चांगली ओळख असते. एक sack भर सामान पाठीवर घेउन ते हिंडतात. कौटूम्बिक ट्रीप च्या तुलनेत ह्यांची ट्रीप लांबीने मोठी असते. हे एकटे - दुकटे किंवा ग्रुप मध्ये जरी असतील तरीही सामान्य मार्गानेच प्रवास करतात त्यात stunts करावेत हा हेतू नसतो पण त्यामागे वेगळ्या स्तरांवरचे अनुभव गोळा करायची प्रेरणा असते. फार पूर्वीपासून अनेक परदेशी backpackers आपल्या देशात हिमालयन प्रदेशात फिरायला येत आहेत. पण आता चित्र वेगळे आहे. आपल्याच देशातले लोक अगदी तरुण मुली सुद्धा आताशा आपल्या देशात आणि परदेशातही खुशाल backpacking करतात.

ही माझ्या backpacking चीच गोष्ट आहे त्यामूळे अनेकदा ती अनेकांच्या प्रवासाच्या कल्पनेच्या चौकटीत बसणार नाही. शिवाय माझे प्रवासाचे बेत फक्त चारेक दिवस आधी झाले तेव्हा राखीव बोगीत तिकीट मिळत नव्हते. मी लेखात म्हटले आहे की कोणीतरी मला सल्ला दिला की स्लीपर क्लास चे तिकीट काढणे हा एकच उपाय आहे आणि मी तसे करून पाहिले.

51795596_10156852229602778_2516907370110517248_n.jpg

 

8th फेब्रुवारी 2019

प्रिय राहुल,

कलकत्त्याला उतरल्यावर जिकडे तिकडे गर्दीचगर्दी पाहून थोडसं हरवून गेल्यासारखं झालं. इंटरनेट मिळाल्या मिळाल्या थोडी शोधाशोध करून चार च्या दरम्यान एअरपोर्ट वरून बागडोगरा साठी जे फ्लाईट असत ते पकडायचं असं ठरवलं. तोपर्यंत क्लोक रुम मध्ये समान सोडून कलकत्ता फिरून यावे का? पण अनोळखी शहर आहे. वेळेचा अंदाज चुकला तर विमानही चुकायचे. कलकत्ता एअरपोर्ट तर अवाढव्य आहे. तिथेही सहज टाईमपास होईल. पण थोडा विचार करून मगच काय तो निर्णय घ्यावा असे मी ठरवले आणि रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये जाऊन बसले. तिथे दोन interesting पाट्या दिसल्या. त्या वाचल्यावर मी बाकीचे सारे बेत रद्द करून तिथेच चिकटून रहायचे असे ठरवले.

51944589_10156852953737778_1111045019420065792_n.jpg

पहिली पाटी फ्री WiFi बद्दलची होती. ज्यामुळे माझं पत्र पोस्ट होऊ शकत होते आणि दुसरी पाटी पुरुषांना 5 रुपयांत अंघोळ करता येईल अशी होती. पुरुष काय नि स्त्री काय, स्वच्छ भारत अभियान तर सर्व नागरिकांना लागू आहे. चौकशी करून 'पाच रुपयात स्त्रियांसाठी' शोधून काढले. तिथची बया मोठी तिखट होती. तिने वरच्या कमाईचे माझ्याकडे 10 रुपये मागितले, मग मी ही एकेक पैसा वसूल करायचा असेच ठरवले. त्याच हट्टापायी प्रातर्विधी, अंघोळ हे तर आटपलेच पण अंघोळ कशी तर डोक्यावरून केली, शिवाय ट्रेन च्या प्रवासात पार मळून गेलेले कपडेही धुऊन काढले आणि कलकत्त्याच्या कडक उन्हात वाळत घातले.

मी थंडगार पाण्याने स्वच्छ झाले. जवळचे लोशन लिपस्टिक वगैरे चोपडून सुंदरही झाले. केस विंचरायचा कंगवा मात्र सापडेना. आता तुला तर माझ्या केसांबद्दल वेगळ्याने सांगायला नकोच. म्हणजे हे रूप फक्त थोडाच वेळ रहाणार एकदा का केस सुकले, नि फुलले की माझी सुंदरता ओसरून पुन्हा मी जंगली प्राण्यासारखी दिसणार पण असो. तरी मला तात्पुरते एकदम माणसात आल्यासारखे वाटू लागले. मग मी तुला पत्र लिहायला घेतले.

पत्रास कारण की, तू जे लिहिलंस ना की तुझ्याबरोबर ट्रिप जगायचा प्रयत्न करतोय, ते वाचल्यावर मलाही असचं वाटलं की आपण एकटे नाहीच आहोत. पत्र वाचून तुम्ही सारे जे उत्तर लिहिताय ते माझ्या सोबतीला आहात! ते फिलिंग भारी वाटलं.

दोन वाजत आले तरी भानच नाही, भूक सुद्धा कशी लागली नाही?

एअरपोर्ट ला जायची बस गाठायला रेल्वेस्टेशन पासून दहा एक मिनिटे चालावे लागते. ट्राफिक असेल नसेल तरी बस एक-दीड तास घेईल. तीन पंचवीस चा बोर्डिंग टाइम! ह्या भानावर आले तसे फटफट सुकलेले कपडे अंगावर परत चढवलें नि बॅग पाठीवर टाकून अक्षरशः पळत सुटले. माझ्या लागलेल्या धक्यांमुळे दिनांक 8 फेब्रुवारीला कलकत्त्यातील कित्येक पुरुषांनी फेसबुकवर स्वतः ला #me_too tag केले असेल. त्यात रेल्वे कामगार, प्रवासी, फळभाजी विकणारे, रस्त्यावरचे जनरल पब्लिक सारे आले. मी एकेकाला सॉरी म्हणायचे फक्त मी पळत पुढे गेल्याने त्यांना ते ऐकू यायचे नाही.

एअरपोर्ट ची बस एअरपोर्टपासून दहा मिनिटांवर सोडते. मग तिथून पुन्हा धावत निघाले. ट्रॉली चालवताना ही एअरपोर्ट च्या प्रॉपर्टी वर कितीदा बँग केले असेल? शेवटचा धक्का दिला तेव्हा ट्रॉली ने सेक्युरिटी गार्ड लाच ठोकले होते. तो मला बाहेर निघ अशा अर्थाचे हातवारे करित ओरडू लागला, काही सेकंदाने कळले तो म्हणत होता ट्रॉली बाहेर ठेव. मी सुसाट ट्रॉली चालवत थेट सेक्युरिटी चेक च्या लायनीत जाऊन धडकले होते.

मी विमानात शिरणारा शेवटचा पसेंजर होते. सारे विमान भरले होते, माझी सीट शोधत मी 17B कडे पोहोचले तर माझ्या या नि त्या बाजूला कोणीच नाही! मला B सीट मिळाली तेव्हा किती नाराज झाले होते पण आज मात्र जोक आठवून आठवून हसू येत होते, why does B is cool? ...Because it is in AC! अगदीच PJ आहे रे, पण भावना पोहोचल्या ना?

BeFunky-collage.jpg

तो क्षण खूप खास होता. विमान जणू काही माझ्यासाठी थांबले होते. मी बसले नि ते चालू लागले. उड्डाण झाल्यापासून लँडिंग होईपर्यंत एकही दृश्य दिसले नाही, नुसतेच ढगढगढग होते. मग मी माझ्याजवळचे कुरमुरे खात टाईमपास केला. टाईमपास कसला, ते माझे दुपारचे जेवण होते!

बागडोगरा येता येता काचांवर थेंब थेंब दिसू लागले. आम्ही उतरलो तेव्हा पहिल्या श्वासातूनच मृदगंध हृदयात (फुफ्फुसात ते मला माहीत आहे पण अलंकारिक लिहायलं) भरून घेतला. जरी पुढे कुठे जायचे याबद्दल इतकुसा विचार ही केला नव्हता तरी हा सगळा ताण बुध्दीला येण्याऐवजी माझं मन लहान लहान बाळासारखं 'त्या' क्षणाची मज्जा घेत होतं. माझ्या चेहेऱ्यावर मोठ्ठ हसू पसरलं, इतकं ...की गेटवरचा सेक्युरीटी संशयाने माझ्याकडे जास्त निरखून पाहू लागला.

मला exit मधून बाहेर जायचं मन होई ना. कारण पुढे कुठे जायचं हे पक्क माहीत नव्हतं. मी तिथेच रेंगाळून आजूबाजूचा अंदाज घेऊ लागले, इतर प्रवासी टॅक्सी बुक करून दार्जिलिंग किंवा गंगटोक ला चालले होते. प्रायव्हेट टेकसी शिवाय पर्याय नव्हता. दिवस सरला होता. अंधार पडत होता. पाऊस पडत होता. पण बॅकपॅकर्स ही जमात खूप स्मार्ट असते. त्यांना माहीत जे पर्याय सहज डोळ्याला दिसतात त्याहून कमीतकमी अजून एक पर्याय अस्तित्वात असतो. तो कसा शोधून काढायचा याची मात्र एकेकाची आपली आपली स्टाईल असते.
मी Exit मध्ये Entry केली तोवर Next Destination गंगटोक ... एवढे ठरवले होते.

या एअरपोर्ट बाहेर पडले की प्रायव्हेट टॅक्सी वाले आपल्याला घेरून टाकतात पण आजचे चित्र वेगळेच होते. खूप कमी गाड्या उभ्या होत्या, त्यातल्या एकाने विचारले, किधर जाना है?
"गंगटोक"
"ढाई हजार लगेगा"
"मैं बस से जाउँगी"
"मॅडम दो बजे के बाद इधरसे कोई बस नाही निकलती"
"फिर शेअर जीप में जाऊंगी
"अभी इतनी रात को किधर मिलेंगे पॅसेंजर"
"देखती हू क्या हो सकता है "
मी चालत थोडी पुढे आले तर तिथून एक बंदा मोटरबाईक वरून पास होत होता त्याला हात करून थांबवले व लिफ्ट देईल का असे विचारले. त्याच्याच जायच्या रस्त्यावर एक बस स्टँड लागत होता. तिथपर्यंत सोडेना म्हणाला. मी माझी सॅक घेऊन बसले.
52495942_10156852954987778_3027684564785954816_n.jpg

तो एअरफोर्स मध्ये काम करत होता. नुकतीच या शहरात त्याची बदली झाली होती. स्टँड वर त्याने इकडे तिकडे विचारले तेव्हा कळले की सिलिगुडी स्टँड जवळून एखादी शेअर जीप मिळू शकेलं. पावसामुळे शक्यता कमीच असली तरी मला स्वतः जाऊन खात्री करायची होती.

सिलिगुडीला जाणाऱ्या लोकल बस मध्ये चढले. 18 रुपयात 30 मिनिटात सिलिगुडी बस स्टँड वर पोहोचले तर कळले शेवटची शेअर जीप नुकतीच निघाली. सारे सल्ला देत होते की आता एखाद्या गेस्ट हाउस मध्ये जाऊन झोप नि सकाळी परत ये. पण मन मानत नव्हतं. अर्धा तास रिकाम्या स्टँडवर भुतासारखी एकटीच बसले असेन, तर समोरून एकजण धावत आला, "मॅडम एक सुमो निकल रही है बस एक सीट कम है।"

मग काय निघाले. अजिबात पुढचा पाठचा विचार न करता निघाले. गंगटोक ला पोहोचेपर्यंत दहा वाजणार होते. ज्या शहराबद्दल काहीही माहिती नाही त्याची थोडी माहिती वाचूया म्हटले तर इंटरनेट मिळेना. पुढे पोहोचल्यावर तर अशी परिस्थिती आली की 'हे भगवान'!

ती मनोरंजक कहाणी गंगटोक स्पेशल पत्रात उद्या लिहीन. दोन रात्रीचा 50 तास प्रवास करून गंगटोक ला पोहोचले आहे. झोप अनावर झाली आहे. तर पत्र संपवते. गुड नाईट. टेक केअर.

तुझी मैत्रीण
सुप्रिया

 

9th फेब्रुवारी 2019

प्रिय लविना,

अगं तुझा फोन आला तेव्हा त्या दोन पोलिसवाल्यांबरोबर चालत होते. रात्रीचे अकरा वाजून गेले असतील ना? पण माझी रात्रीच्या मुक्कामाची सोय झालीच नव्हती. तुला उगीच टेन्शन येईल म्हणून म्हटलं की नंतर बोलूया.

झालं असं की, टेक्सीने गँगटोकला स्टँड वर तर उतरले. 24X7 रिसेप्शन चालू ठेवतात तसले हॉटेल मला परवडणार नव्हते, मग एवढ्या रात्री हॉटेल कुठे शोधायचे? तरी चालू कॅटेगरी चे हॉटेल शोधत मी चालू लागले! MG रोड च्या बस स्टँड जवळ कुठेतरी सोय होईल असे जीप मधल्या प्रवाशांनी सांगितले होते. तिथे पोहोचले नि एका हॉटेलचा दरवाजा ठोठावला. पण पलीकडून काहीच आवाज नाही. जशी 3/4 मिनिटे उलटली तसा माझा patience संपून. मी जोरजोरात शटर आपटायला सुरवात केली. रात्रीच्या शांततेत दोनच आवाज घुमत होते, एक समोरच्या नाईटक्लब मधले लाऊड म्युसिक आणि जे इथे मी थाडथाड शटर वाजवत होते ! तो माझा गोंगाट ऐकून बाजूच्या दुसऱ्याच एका बजेट हॉटेलचे शटर कोणीतरी आतुन अर्धे उघडले तशी मी पटकन तिथे पळाले.पण मी काही बोलेन याआधीच त्या आतल्या माणसाने वाकून मला पाहिले आणि शटर झटकन बंद केले. त्याला मी शेजारच्या क्लब मधून बाहेर पडलेली बेवडी वाटले का काय?

मग मी माझी इस्टाईल बदलली, शटर ठोठावायच्या ऐवजी शटरसमोर जाऊन शक्य तितक्या सौम्य आवाजात पलीकडच्या माणसाशी संवाद साधू लागले. "मैं अभी अभी गँगटोक पहूँची हूँ। कोई सेफ हॉटेल ढुंड रही हूँ।" तसा पलीकडून त्याने एकदाचा आवाज दिला, "अभी नही, कल सुबह आ जाओ", अरे मी काय ग्लुकोज बिस्कीट विकत घ्यायला आले आहे का? सकाळ पर्यंतची सोय झाली तर याच्याकडे कशाला आले असते?

मग शिरले नाईट क्लब मध्ये, नाचायला नाही ग, माहिती काढायला म्हणून सुद्धा दुसरे काही दिसत नव्हतेच ना! तिथे मला आत शिरायला कोणीही अडवले नाही. मी विचारले, "लेडी टुरिस्ट के लिये इस वक्त गँगटोक में रहनेका क्या बंदोबस्त हो सकता है?" "ये टाइम को तो मुश्किल है..", Whatever... तसेही त्याचा उदासीन अवतार बघून त्याचे उत्तर पुरे होण्याआधीच मी बाहेर पडले. माझी डाळ इथे शिजणार नाही हे मला कळून चुकले होते.

मग मात्र बॅग उचलून मी तरातरा निघाले. एवढ्या तोऱ्यात कुठे चालले होते कोणास ठाऊक? MG Marg वरून चालतच होते की डाव्या हाताला पोलीस चौकी दिसली. मी आत शिरले आणि त्या पोलिसांना सारी कहाणी ऐकवली. त्यांना माझी हिम्मत बघून आलेला अटॅक थोडाफार ओसरला तसे मग माझ्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. त्यांनी त्यांच्या परीने खटपट सुरू केली. तेवढ्यात मला एक मोठ्ठा शोध लागला की तिथे मोबाईल ला नेटवर्क मिळत होते. यु-रे-का ... पुढच्या पाच मिनिटांत मी बॅगपॅकर्स साठी परफेक्ट असलेले Go Hills Guest House शोधले, दोन पोलीस एसकोर्टस् बनून मला गेस्ट हाउस पर्यंत घेऊन गेले आणि ओनरबरोबर व्यवहार पक्का झाला सुद्धा!

51912012_10156855311027778_2691221169029251072_n.jpg

पोलीस ड्युटीवर गेले तसे तुला फोन केला म्हणजे तू ही निशंकपणे झोपशील. गोडू, किती काळजी करतेस माझी, नि त्यापेक्षा जास्त प्रेम देतेस. कोणाला लहान बहीण मिळावी तर तुझ्यासारखी! व्हिडीओ कॉल वर सगळे पाहिल्यावर तरी काळजी मिटली ना? की वाढली? काळजी करण्यासारखे काहीच नाही. इथे अनेक देशातले लोक रहायला आहेत. आणि सर्वाना त्याची सवय आहे आपल्या डोर्म मध्ये एक female येऊन झोपली आहे त्याची कोणाला काही पडली नाही. कोणी कोणाच्या वाटेला जात नाही. एकमेकांची एकमेकांना सोबत वाटते, threat नाही.
पावसामुळे हीSS कडाक्याची थंडी पडली. मी दोन गाद्या ओढून झोपले. खोकला कलकत्यातच मला सोडून गेला. 50 तासांनंतर मला रात्रभर झोप मिळाली. सकाळी खूप उशीरा जाग आली. डोंगराळ बॉर्डर एरियाला पोहोचण्यासाठी जे परमिट लागते ते सक्काळी 7.30 ला मिळते. मी फटाफट आवरून बाहेर पडले तर काय, ढग पृथ्वीवर रहायला आले होते, पाऊस पडत होता, नि लोक जॅकेट आणि शूज न घालता रस्त्यावरून तुरुतुरु पळणारं ध्यान बघून मला हसत होते.

'रस्ते बर्फाने ब्लॉक झाले आहेत. आता वातावरण क्लिअर होईपर्यंत परमिट इशू करणार नाहीत', एवढीच माहिती मिळाली. मग मी वाट दिसेल तिथे पायी पायी गँगटोकच्या रस्यांवरून खूप भटकले. वाटलं की दुकानात शिरायचं, सिक्कीम ..गँगटोकच्या गोष्टी ऐकायच्या. सिक्कीमची सर्वात मोठी रुमटेक मॉनेस्ट्री पहाण्यासारखी आहे असं कळलं तशी मझ्या भटकांतीला आजच्या पुरती दिशा मिळाली.
a83565b1-dd26-441f-ba29-500b75a77c54.jpg

शहरापासून तासाभराच्या अंतरावर डोंगरांनी चारही बाजूंनी या मॉनेस्ट्री ला कुशीत उचललं आहे. पण या अवेळी पाडलेल्या पावसात डोंगरांना वाटलं असावं हिला थंडी लागली तर? मग आज त्यांनी तिला ढगांची दुलई पांघरली. त्या दुलईत शिरून मी तिला जवळून भेटले. तीन तास तिथेच रमले होते. देवळाच्या बाहेर चारही दिशांनी रक्षण करणाऱ्या रक्षकांची चित्रे, गौतम बुद्धाच्या 1000 मूर्ती, मूळ scripture च्या शेकडो प्रति! जेवणाची वेळ झाली तरी मी तिथेच भटकते आहे ते पाहून एक माँक मला खायला घेउन गेला. त्याने एकेक गोष्ट नीट समजावून सांगितली. त्यातून मनाला पडलेल्या एकेक प्रश्नाचे उत्तर जणू आपसुख मिळत होते. संभाषणाच्या शेवटी तर मन इतके शांत झाले होते की वाटले, साप कात टाकतो तशी वेळ आली. झाले-गेले सारे जणू गळून पडते आहे. नव्या आशेने, नव्या अर्थाने, पुन्हा एकदा आयुष्य जगायला सुरवात होते आहे ... मला नीट नाही सांगता आली पण मनाची स्थिती बरीचशी अशीच काहीतरी होती.

51818554_10156855312787778_6890933658136346624_n.jpg

या इथे गौतम बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करण्यासाठी लहान लहान मुले येऊन रहातात. ते लाल वेशात केवढे गोड दिसतात गं. त्यांची सध्या सुट्टी चालू असल्यामुळे खूप मस्ती चालू होती. मला आपल्या शेल्टरच्या मुलांची आठवण आली. माझ्या दोन बाळांची तर खूप जास्त आठवण आली. पुरातन काळात ज्ञानी संतांनी लिहिलेले जे आजच्या आधुनिक समस्यांचेही समाधान करते, ते आयुष्याचे बेसिकस् शिकल्याशिवायच आपली मुले नुसतीच पुस्तके वाचतायत, आणि ते सर्वोत्तम शिक्षण घेतायत याबद्दल आपण निःशंक आहोत, असं काही काही मनात घोळत राहिलं.
परत गंगटोक ला यायला गाडी मिळणं मुश्किल झालं. पाऊस चालूच होता. आस्थेने विचारपूस करणाऱ्या लोकांना मी तोंडाने कितीही all is well सांगितले तरी माझ्या उघड्या हातावरचा काटा जो हेरायचा त्याला काय कळायचे ते कळत होते. थंडीने गारठून गेले होते मी, पण तक्रार कोणाची, कोणाकडे करणार? या तक्रारीची एक गम्मत असते, ज्याची करायची तो दुसरा असावा लागतो, आणि ज्याच्याजवळ करायची तो आपलाही असावा लागतो, नाहीतर तक्रारीची नोंद करायला मन मानत नाही.

रात्रीचे जेवण उरकले. गेस्ट हाऊस मध्ये परतले आणि पत्र लिहायला बसले. हे पत्रलेखन म्हणजे जणू एक दिनक्रम होऊन बसला आहे. पण छान आहे विरंगुळा! दिवसभर दमल्यावर जेव्हा कोणी कालचे पत्र वाचले, फोटो पाहिले, एखादे वाक्य माझ्यासाठी लिहिले... तेच डोक्यात घोळवत मी निजून जायचे, असा नाद लागला आहे.

मम्मी डॅडी ला माझी खुशाली कळव. त्यांची आठवण काढली असं सांगितलं की केवढे खुश होतील बघ. काळजी घे स्वतःची आणि कधी बोलावसं वाटलं तर लगेच फोन जोड.

तुझीच ताई.

 

10th फेब्रुवारी 2019

Dear Brother Joyston,

तुला मी मराठीत काय लिहिलयं त्याचं एक अक्षरही कळणार नाही, मग उत्तर लिहायची तर वार्ताच नको, तरीही तुलाच पत्र लिहावसं वाटलं.

काल रुमटेक मॉनेस्ट्री मध्ये एक मोंक भेटला, त्याला पाहून कोणालाही तुझीच आठवण व्हावी. तुला प्रभू येशू कडून नि त्याला गौतम बुद्धांकडून प्रेरणा मिळाली. पण ज्या वयात आयुष्याचे सर्वात घसरडे वळण पार करावे लागते, तेव्हाच तुम्ही दोघांनी उभ्या आयुष्यासाठी कठीण व्रत अवलंबले. माझ्यासाठी चेहरा मायने राखत नव्हताच तसे तुझ्या सफेद नि त्याच्या तांबड्या झग्याआड दडलेल्या तुमच्या मनात उमटणारे, उमलणारे आणि उफळणारे दोघांचे विचार किती एकसारखेच आहेत, हे जाणवले. मला त्यालाही ब्रदर म्हणावेसे वाटले. तशी हाक ऐकून त्याला आनंद झाला. Morality (नैतिकता), prayers (साधना) आणि wisdom (प्रज्ञा) यावर तो खूप काही बोलला. इतके कठीण व्रत पार पडतानाही त्याचा उत्साह आणि आनंद ओसंडत होता. या वयात हा काय काय भारी बोलतो ते मी भारावून ऎकत राहिले. मनन चिंतन (reflect) करत राहिले.

माझ्या पेक्षा तुम्ही आयुष्याबद्दल जास्त वाचले आहे. पण मी आयुष्य जास्त अनुभवले आहे. त्याला जे सांगावेसे वाटले तेच तुला लिहायला घेतले. तुमच्यासारखे आयुष्यभर निष्ठेने धार्मिक वाटेवरून चालायचे हे सोपे नाही. कधीतरी ज्या निश्चयाने चालायला सुरुवात केली तोच डळमळल्या सारखा वाटू शकतो मग पुढच्या वाटचालीसाठी पावलांना दिशा कशी मिळणार? पण धुक्याने भरून गेलेल्या वाटेवरचे पुढचे वळण डोळ्याला दिसत नाही अशा परिस्थितीतही पुढचे एक पाउल टाकावेच. चालत रहावे. प्रवास कुठलाही असेना, तो कधी संपेल याची जो वाट पाहतो त्याची वाटेवरचा आनंद लुटायची क्षमता संपलेली असते.

कोणी तुझ्यासारखा धर्माची कास धरून एकमार्गाने चालतो, कोणी माझ्यासारखा आयुष्यभर नवनवीन वाटा शोधतो पण आपापली वाट मात्र प्रत्येकाला एकट्यानेच चालायची असते. आणि आपली वाट आपण कितीही विचारपूर्वक निवडली आहे असे वाटले तरी दुसऱ्याच क्षणी आपल्या वाट्याला काय येणार याचा काही भरवसा नसतो. आयुष्य असे आहे.

आपली वाटचाल सुखकर असावी असे कोणाला वाटणार नाही? पण दुरुन डोळ्याला सुंदर दिसणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वाटेची स्वप्न पहात राहिलो तर आयुष्याची कुठचीच वाट सुखकर वाटणार नाही. पूवी मला स्वप्नांचा नाद होता आता सत्याची ओढ वाटते. उगीच पुढे पाठी बघत चालू नये, पायाखाली बघून चालावे, वळणावळणा वर थांबावे, घेता येईल ते घ्यावे, देत येईल ते द्यावे. काटे सगळ्याच वाटांवर आहेत, पायच इतके कठोर करावे की ते घुसले तरी बोचणार नाहीत, बोचले तरी अनुभव म्हणावा, काटा काढून द्यावा, पुढचे पाऊल टाकावे.

हसत रहावे, पण रडायची लाज वाटू देऊ नये. मन नदीसारखे आहे, त्यातले अनुभव, भाव भावना पकडून अडकवून ठेवल्या तर कुजून जातील. प्रवाहात राहील्या तर गाळ किनारी लागेल नि मन नेहेमी नितळ राहील. वाहत्या नदीच्या सानिध्यात येणारे खडबडीत दगडही गुळगुळीत गोटे बनतात.

काहीबाही असले तरी हे सारे तुला सांगावेसे वाटले. रात्रीच पत्र लिहिणार होते पण होस्टेलमध्ये बांगलादेशचा एक तरुण आला आहे. काल रात्री पोहोचला तेव्हा गेस्ट हाऊस चे दार सताड उघडे नि मालक गायब होता. मग त्याला गाईड करता करता उशीर झाला. इकडे असं आहे की, जो couch आवडला तो occupied नसेल तर सरळ पाठीवरची सॅक उतरवायची नि खुशाल बस्तान ठोकायचे. रजिस्ट्रेशन वगैरे काही प्रकारचं नाही.
डेल्टाने माझ्या बाजूचाच couch घेतलायं. त्यानेही मला बहीण बनवल. मी मराठी आहे हे कळल्यापासून कधी थट्टेने 'मराठी मुलगी' अशी मला हाक मारतो. एरव्ही ताई नाहीतर आक्का म्हणतो.

रात्रीच्या शांत झोपेनंतर सकाळी जाग आल्याआल्या मी पळत खिडकीजवळ गेले. आजही सूर्याने दर्शन दिले नसले तर आजही नथुलापासचं परमिट मिळणार नाही. पण बाहेर कोवळे पिवळे ऊन पडले होते. ते बघून दिल खुश हो गया। पुढच्या फक्त पाच मिनिटांत तयार होऊन मी निघाले.
पण परमिट ऑफिसने सांगितले 'no permit today', बॉर्डर वरची परिस्थिती वाईट आहे. चांगु लेक तर फ्रोझन आहेच पण रस्तेही बर्फाने ब्लॉक केलेत. वर वर सारी धडपड नथुला पास ला जायची असली तरी माझे कान हेच शब्द ऐकायला आतुरले असणार. नाहीतर ते ऐकून मला हायसे वाटले नसते. त्या वेळी माझ्या मनात जो विचार आला की अशा सोनेरी दिवशी त्रिवेणी कसलं सुंदर असेल, त्या एका अस्फुट विचारानेही माझ्या त्या दिवसाच्या वाटचालीला दिशा मिळाली.

सिक्कीम वरून खाली वहाणारी रंगीत Rangeet आणि पलिकडून दार्जिलिंगहून आलेली तिस्ता Teesta या दोघी जिथे भेटतात त्याला त्रिवेणी म्हणून ओळखतात. कांचनगंगेच्या पायाशी जन्म घेतलेली रंगीत झुळूझुळू वहात येते नि प्रबळ तिस्ता च्या प्रवहात मिसळून जाते. दमून भागून आलेलं बाळ दुडूदुडू धावत येउन आईच्या कुशीत उडी मारत नि तिथेच झोपी जात. तसं ते दृश्य दिसतं.
72633571_1020878854912761_7261901891756996688_n.jpg

संगमाच्या काठाशी एकापेक्षा एक सुंदर पॅटर्नचे दगड गोटे नक्षी करून वसले आहेत. तिथेच रेतीचे एक मैदान (delta formation) तयार झाले आहे. दोनच वर्षांपूर्वी याच मैदानावर टेंट टाकून मी, राज, मालविका राहिलो होतो. मनु MIT ला जायच्या आधी आमच्या बरोबर घालवलेली ती शेवटची रात्र. नदीकाठी आम्ही दोघीनी आपापली सिक्रेटस शेअर केली होती. ती रात्र कशी विसरणार? पण त्रिवेणीचा आम नजाराही निव्वळ अविस्मरणीय आहे.

आज दिवस मिळाला तशी खटपट करून तिथे नदीकाठी कोणी टेंट देईल का याची चौकशी सुरू केली. थोडी फोनाफोनी केल्यावर एक बंदा सापडला. 'हे कसं माझ्यासाठी सारंच जुळून येतं?' असं कोणी कधी मला विचारतं, ते मला नाही सांगता येणार. पण आजचा हा टेंट वाला बंदा इथेच गँगटोकच्या जवळ कामासाठी आला होता. मला त्याने थेट त्रिवेणी पर्यंत लिफ्ट ऑफर केली.

त्रिवेणी ला पोहोचले. तिस्ता नदीच्या काठावर माझा टेंट तयार होता आणि एक टेबल-खुर्ची टाकली होती. मी इथे बसल्या बसल्या तुला पत्र लिहायला घेतले. सूर्य मावळला तसा त्याने माझ्या टेबलावर एक कंदील आणून ठेवलाय. चांदणं पसरलं तशी शेकोटी पेटली. माझं पत्रलिखाण चालूच आहे. लवकरच पत्र संपवीन व पोस्ट करेन. इथे इंटरनेट नाही, त्यामुळे अडकून बसेल नि पोहोचेल तेव्हा पोहोचेल.
tent.jpg

तो इकडचा केटर टेकर सुद्धा निघून गेला. जाता जाता शेकोटी भडकवत ठेवण्यासाठी तेल दिले तेव्हा विचारले, "आप को अंधेरे में डर तो नहीं लगेगा?"
मी म्हटलं, "मैं बच्चा थोडे ही हू के अंधेरेसे डरू?"
"हा लेकिन आप अकेले होगे"
"डर तब लगना चाहीये जब कोई आसपास हो। जब कोई है ही नहीं तो डर किसका?"
नाही म्हणायला माझी राखण करीत माझ्या टेंट बाहेर रात्रभर एक कुत्रा बसून राहिला.
शांत वातावरणात नदीच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येत होता, मधेच वाऱ्यामुळे टेंट फडफडायचा नाहीतर बाहेर माझी राखण करीत बसलेला कुत्रा भुंकयचा तेव्हा वाटायचं कुणाच्या पपावलांची आहट तर लागत नाही ना? मग निपचित पडून मी संकटाची चाहूल कानांना टिपता येतेय का ते चाचपडून पहायची. मोठ्या मोठ्या बाता केल्या तरी मन ताब्यात ठेवणे इतके सोपे नाहीये ना?

ब्रदर, मनातली एक गोष्ट सांगू? का कोण जाणे पण मॉनेस्ट्री मला परत एकदा बोलावते आहे. प्रवासाच्या आणि एकंदरीत आयुष्याच्या गणिताची आकडेमोड चुकवायची नाही तर तो हातचा धरून मगच उत्तर काढायचे आहे हे एवढे कळते आहे. म्हणजे उद्या ही नथुला पास ला टांग देउन मॉनेस्ट्री ला जायचे? बघूया काय जमते ते. पण पुढच्या वेळेस मॉनेस्ट्री मध्ये जाईन तुझ्या, माझ्या, सर्वांच्या मनाच्या शक्ती साठी, शांती साठी निवांत प्रार्थना करेन. तुला जरी या पत्रातले काहीही कळले नाही तरी माझी प्रार्थना तरी तुझ्यापर्यंत पोहचेलच ना?

तुझी
(ताई वगैरे तू आयुष्यात कधी म्हटलं नाहीस, आणि मॅडम चिडवलंस ना तर तुझी एकेक सिक्रेटस इकडेच पोस्ट करेन.)
सुप्रिया

वाचकासाठी नोट्स

ब्रदर - मी शेल्टर डॉन बोस्को साठी काम केले तिथे priest होण्यासाठी आलेल्या तरुण मुलांना ब्रदर म्हणातात.
मालविका , MIT - मालविका आमची मोठी लेक जी MIT Boston ला पुढच्या शिक्षणासाठी जाण्याआधी आम्ही इथेच त्रिवेणी ला तिच्याबरोबर एकत्र वेळ घालवला होता.

teeta.jpg

 

11 फेब्रुवारी 2017

प्रिय शारदा,

काल आपल्या अनघाचा साखरपुडा झाला. मी येऊ शकले नाही. तू माझ्यावर रागावणार नाहीस, उलट तुला माझ्या प्रवासाबद्दल माहीत असतं तर तू स्वतःहून मला घरचा समारंभ सोडून इथे पाठवलं असतसं, असं मला वाटतं. माझे जे जे उद्योग चालू असतात त्याच्याबद्दल तुला कुतूहल नि कौतुक असते हे मला माहित आहे, आणि हे ही चांगलेच माहित आहे की तुझ्या दुःखाच्या, आनंदाच्या प्रसंगात मी जवळ असले की तुला आधार वाटतो. म्हणूनच या पत्राद्वारे तुझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करते आहे.

प्रवास मस्तच चाललाय. एकटेपण हे कधीकधी वरदान असतं, जवळ कोणीच जिवाभावाचं नाही मग फक्त तेव्हाच आपल्या स्वतः च्या गरजा आपल्याला नीट कळतात. त्या भागवण्यासाठी काय पाऊल उचलावे हा विचार करायचा अवधी मिळतो. रोजच्या जीवनात संसाराच्या एकेक जबाबदाऱ्या पार पाडतापडता स्वतः शी अशी मैत्री साधता येईल का? म्हणून वरदान म्हटलं.

आज पहाटे पहाटे जाग आली. तंबूमधून बाहेर डोकावून पाहिल तो नजारा सुंदर दिसत होता.
WhatsApp Image 2020-01-07 at 10.39.46 AM.jpeg

नदीच्या लगत जी दाट हिरवी झाडी आहे ती पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळत होती. जशी माझी चाहूल लागली तसे माझा राखणदार कुत्रा शेपूट हलवत माझ्याजवळ आला. वेळ माहित नाही पण निरव वातावरण होते. नदीकिनारी आम्ही दोघांनी वरच्या टोकाच्या त्रिवेणीपर्यंत फेरफटका मारला. संगमाच्या कुशीतच दगड लहानसे बेट तयार झाले आहे तिथली दगडगोट्यांचे एकापेक्षा एक नमुने बघून तर मला हिरेमाणके सापडल्या सारखा आनंद झाला. खरेच, राधाला तर असे दगड रत्न माणकांपेक्षा मौल्यवान वाटतात. मला तिच्यासाठी किती दगड वेचू नि किती नाही असे झाले.

फेरफटका मारताना मधे मी टॉयलेटला गेले तर तो कुत्रा माझे आटपेपर्यंत तिथेच थांबून राहिला. अनोळखी जागी अनोळखी कुत्रे वाटाड्या बनून अशी सोबत करतात हे अनेकांनी अनुभवले आहे. या कुत्र्याला मी कुठच्या जमातीतली वाटले, कुत्राच जाणे कारण फिरून परत आले तशी त्याने मला अंगभर चाटून त्यांच्या टाईपची अंघोळ घातली.

एक couchsurfing नावाची community आहे. त्याचे मेम्बर्स आपापल्या रहात्या ठिकाणी भेट देणाऱ्या माझ्यासारख्या प्रवाशांना मदत करतात. समुदायातील अनोळखी लोकाबद्दल परस्पर मैत्री आणि विश्वास हे रहिवासी आणि प्रवासी दोघेही जोपासतात. याच समुदायातील एक अनोळखी प्रवासी मुंबईवरून गाडी घेऊन North East ची रोडट्रीप करायला येणार आहे हे मी तेथील फोरम वर वाचले. आज त्याला भेटून त्याच्याच गाडीतून गंगटोक ला जायचे असा प्लान केला होता, त्यानुसार तो मला इथे भेटला. निसर्गरम्य त्रिवेणीच्या काठावर कोणीही तासनतास निवांत बसावे. पण थोड्याच वेळात तिथे लोकांची ये जा सुरु झाली. आपल्याकडे कशी गणेशविसर्जनाची धुमधाम असते, तशीच सरस्वती विसर्जनासाठी त्रिवेणी संगमावर गर्दी होऊ लागली. अर्थात नदीच्या गुणधर्मा नुसार ती कुठचेही प्रदूषण पोटात ठेऊन घेणार नाहीच. पण नदीचे एवढे नितांत सुंदर रूप पाहिल्यावर त्याच प्रवाहात इकडून तिकडे वाहणाऱ्या मुर्त्याचे दृश्य बघायला जीवावर आले. मग आम्ही इथून काढता पाय घेतला.
saraswati.jpg

छान गप्पा मारत गँगटोक ला पोहोचतच होतो की आमचा रस्ता चुकला आणि दूरचा पल्ला पार करावा लागला. गंगटोकलगतच्या डोंगराला वळसा घालून पूर्ण प्रदक्षिणा घालून पार दुसऱ्या टोकाने आता शहरात एन्ट्री मारावी लागणार होती. चुकूनच चुकलेल्या ह्या वाटेवर गंगटोक टेकडी चा वेगळाच देखावा पहाता आला तो विलोभनीय होता.
51849522_10156862330487778_381792343159734272_n.jpg

ही वाट गर्द जंगलातून जाते ती पार करताना प्राकृत निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळाले. रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीने त्याच्या एका कवितेचा सुरेख शेवट केलाय ,"Two roads diverged in a wood, and I took the one less traveled by, and that has made all the difference."
या चुकलेल्या वाटेच्या निमित्ताने त्या ओळींची आठवण झाली खरी, पण तुला काय नि मला काय नि कोणाला काय ... आपल्या नेहेमीच्या परिघाबाहेर पाऊल टाकून काहीतरी वेगळे करायच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी या ओळी मोठी प्रेरणा देतील.

हॉस्टेल वर पोहोचताच बांगलादेशी हॉस्टेल मेटने (त्याला मी डेल्टा म्हणायचे पण त्याचे खरे नाव रुबेल) माझा ताबा घेतला. "ताई मी तुला एक दिवस केवढे मिस केले." एक दिवसाच्या ओळखीवर दुसऱ्याच दिवशी सहवास तुटला तरी अशी आठवण येते? मग आयुष्यभराचा सहवास सोडून कोणी जिवलग दूर गेले असेल तर कसे करमायचे? मला तुझे दुःख कळते आणि इथे दूर असले तरी कालच्या दिवशी तुझी आठवण सतत मनात होती. दोघेजण एकमेकांहून किती अंतर दूर आहेत यावर कोणी कोणाच्या हृदयाच्या जवळ आहे नाही हे ठरत नसतं. हे फक्त तुझ्यामाझ्या साठी नाही, दुसऱ्या जगात निघून गेलेल्या तुझ्या जीवलगासाठीही लिहिले आहे. रुबेल ची बडबड थांबणार नव्हती मग सरळ पंघरुणाच्या आत शिरून पत्र लिहायला घेतले. आज पत्र लवकर संपवून लवकर झोपायचा बेत आहे .
अनघाला खूप खूप शुभेच्छा! उद्या एक सुंदर प्रार्थना स्थळाला भेट देणार आहे, तेव्हा सर्वांसाठी प्रार्थना करेन.

तुझी
(तुमच्याकडच्या तीन पिढ्या मला ताई म्हणूनच हाक मारतात, गम्मत आहे ना D)
सुप्रियाताई .

 

12 फेब्रुवारी 2017

प्रिय फादर,

सिक्कीमचा एक वेगळाच चार्म आहे. टुरिस्टस् साठी इथे प्रेक्षणीय स्थळे आहेतच. पण माझ्यासारखा स्वतः चा शोध घेत जो वाटसरू इथे पोहोचतो त्याला इथे प्रेरणा नि दिशा मिळेल याची मोठी शक्यता आहे. एकूणच इथल्या वातावरणातच नीती, भक्ती, शांती याचा हृदयाला जाणवेल इतपत मेळ जुळला आहे, असे मलातरी वाटले. सिक्किमी लोकांना ज्याने जवळून पाहिले त्यांना मी काय लिहिले ते जाणवेल. सिक्कीम मधील मॉनेस्ट्री मधे मनन चिंतन करायला ज्याचे मन रमले त्यांना मी काय लिहिले ते कळेल.

आजचा दिवस शक्य तेवढे मौन पाळायचे असे ठरवले. माझ्याच प्लान ला घेऊन सकाळपासून इतकी जोशात होते, की एरव्ही पहाटे परमिट ऑफिस ला फेरी घालून त्यांच्याशी हुज्जत घातल्याशिवाय गंगटोक चा माझा दिवस सुरू होत नाही पण आज परमिट ऑफिस कडे ढुंकूनही पाहिले नाही.

ते काय मला सांगणार 'नो परमिट', आता मलाच परमिट नको आहे. एकदा का रस्ते उघडले की प्रवासी लोकांचे लोंढेच्या लोंढे तिथे जायला निघतील. मला अशा गर्दीत मुळीच जायचे नाही. इतक्या दिवसात गंगटोक चा आनंद कसा घ्यायचा, हे मला चांगलेच कळले आहे. म्हणून मी आज रबॉंगला जायचे ठरवले.

51979927_10156863162197778_174794839550853120_n.jpg

रबॉंग हा सिक्कीमचा केंद्र मानला जातो तिथे 7000 ft उंचीवर, बर्फाच्छादित Mt. Narsing च्या पार्श्वभूमीवर, Tathagata Taal हे नितांतसुंदर भक्तीस्थान आहे. मी भर थंडीत थंड पाण्याने अंघोळ करून 7 वाजता शेअर जीप च्या तिकीट काउंटर वर पोहोचले. कागदावर ठिकाणचे नाव लिहून घेऊनच गेले होते. म्हणजे विसरायला नको हे एक झाले आणि शिवाय माझ मौन चालू होते ना?

60 टन तांबे वापरून बनवलेली 98 फुटांची गौतम बुद्धांची मूर्ती आहे. कमळाच्या आसनावर ध्यानस्थ मूर्तीचा चेहरा शुद्ध सोन्याच्या धातूने घडवला आहे. हे सारे प्रवाशांना आकर्षित करते. पण मला गाभाऱ्याच्या आतले वातावरण भावले. मी तिथेच बसून एकेकाला आठवून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर जीवन-मरण-आयुष्य याबद्दलचे गहन विचार करत मिटल्या डोळ्यांनीच नुसतीच शांत बसून राहिले. मन शांतच होते असे काही नाही, पण वाईट विचार सरून हळू हळू चांगले विचार डोक्यात येऊ लागले. मला कुणीही उठवायला आले नाही. डोळे उघडले तर प्रसन्न वाटत होते. काही काही वास्तूमधले वातावरणच प्रभावी असते. त्यानंतर मी परिक्रमा केली आणि समोरच्या हिरव्या गवताच्या मैदानावर शांत झोपून गेले.
संध्याकाळी निघाले तसे कळले की गंगटोक ला जाणारी शेवटची गाडी निघूनही गेली. मग काय Hitchhiking झिंदाबाद!

प्रवाशांनी फुल भरलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलरला हातवारे करून थांबवले व ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून गंगटोक ला निघाले. हे जे करावे लागले ते आजच्या दिवसातले पहिले संभाषण. आदल्या रात्री ब्रदर जॉयस्टन ला पत्र लिहिले होते. त्याचा फोन आला. मग मला नाही रहावले. मौन वगैरे सोडून दिले नि त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. अशा ट्रिप मध्ये आपल्या कोणाशी फोनवर बोलायला मिळाले की मला हवे असते.

आमच्यात सूर्यास्तानंतर सोडायची काही काही व्रत असतात, तसेच सूर्यास्त होऊ घातला तसे मौन दिले सोडून आणि त्या ड्रायव्हर बरोबरही धतींग मज्जा केली. हॉस्टेल ला पोहोचले तर अजून दोन नवीन बॅग पॅकर्स आले होते. गप्पा रंगात आल्या होत्या पण मी थकले होते. यांच्याशी हायहेलो फक्त केले, बाकी दोस्तीदुनियादारी सारे उद्या पाहूया. तूर्तास ब्लॅंकेट मध्ये घुसून एकीकडे हे पत्र लिहून पूर्ण केले नि डोळा लागेपर्यंत पडून त्यांच्या गप्पा नुसतीच ऐकत राहिले.

Father, I know it is unusual that suddenly I write a letter to you. I have high regards for you as the most righteous Priest I have met. When I want to know the correct way of doing something, I completely believe in your way of handling the situation.

Someday I wish to share the learnings and reflections I earned in the trip to seek your opinion. But today as I experienced powerful influences to my thoughts and emotions, I strongly remembered you and then could not think of anyone else whom I could address the letter to.
Respect & Prayers
सुप्रिया.

 

13 फेब्रुवारी 2017

ए कोको,

तुझी बायको किती मठ्ठ आहे रे! मी सिक्कीम न पाहताच तुमच्या ट्रिप साठी केवढी सारी माहिती काढून दिली होती. त्यावर तुमची सिक्कीमची अक्खी ट्रिप झाली. आता मला इथची थोडीशी माहिती हवी म्हणून तिला फोन केला तर अर्धे तिला माहीत नाहीये आणि उरलेलं अर्धे तिला आठवत नाहीये. पण एका अर्थी बरंच झालं की मी कुठून माहिती उचलली नाही. इंटरनेट आणि इतर प्रवाशांकडून जे काही मिळाले असते त्यानुसार दोन दिवसात गंगटोक आटपले असते. इथला आज माझा सहावा दिवस! तरी अजून गँगटोकची हौस भागली नाही. पण आता ज्या दिशेने प्रवासाची सुरवात झाली ती दिशा बदलायची वेळ आली तसे नॉर्थ ईस्ट मधील्या सिक्कीम च्या बहिणींना भेट द्यायची असे ठरवले. एखाद्या नवीन ठिकाणाचा पल्स समजून घ्यायचा तर त्याची नस शोधेपर्यंत भटकावं लागत. आणि त्या त्या ठिकाणाचा पल्सच खर तर आपल्याला सगळ्यात जास्त भावतो, आठवणीत रहातो, बाकी प्रेक्षणीय स्थळ वगैरे निमित्त असत. उद्या पुढच्या प्रवासाला निघायच्या आधी गंगटोक मधील चढउतारांच्या वळणावळणाच्या रस्यावरून खुशाल फक्त भटकंतीच करायची, असे ठरवले.
dog_0.jpg

MG Marg पासून 8 किलोमीटर वर ताशी व्ह्यू पॉइंट आहे. तिथून पुढे चालायला सुरुवात केली तर 5 किलोमीटर वर गणेशटोक (6500 ft) लागते तिथून पुढे गोलगोल वळणे घेत 3 किलोमीटरचा रस्ता चालले की हनुमान टोक (7200 ft) ला पोहोचता येते. याच रस्त्यावर एक वॉटरफॉलही आहे. ही भटकंती आजच्या तारखेसाठी ठेवली होती.
52258604_10156865124902778_6999441896586084352_n.jpg

हॉस्टेल मधलं पाणी गरम करायचं मशीन चालेना म्हणून ओनर त्याच्या किचन मधून प्यायला गरम पाणी आणून देतच होता की एकेक हॉस्टेल मेट्सही उठले. इस्रायल चा अवि (त्याचं नाव अवनेर पण मला अवि म्हणा असे त्याने संगीतल म्हणून सारे त्याला तशीच हाक मारतात) होस्टेल मध्ये खूप दिवस रहात आहे. पण कालच रात्री दोन नवीन पाहुणे आले आहेत. बंगलोरवरून पूजा आणि नेदरलँड चा वॊलेस! यांना काल रात्री मी हायहेलो सुद्धा केले नाही. तसे आशा हॉस्टेल मध्ये कोणी असेच वागावे याबद्दल काही नियम नसतात. नाही म्हणायला हॉस्टेल ने प्रिंट करून भिंतीवर लटकवलेले फुटकळ do's & don'ts असतात. पण बाकी एकूण वातावरण मात्र मोकळे तरीही एकोप्याचे असते.

51974134_10156865124822778_7163492677877497856_n.jpg
पूजा ला जसे माझ्या आजच्या भटकंती बद्दल कळले तसे ती एका पायावर यायला तयार झाली. वोलेस सुद्धा येतो म्हणाला. आधी चौघांनी बाहेर पडून MG Marg वर मस्त आलू पराठ्याचा (जरी आलू पराठा कसा खायचा? असा बेसिक प्रश्न वोलेस ला पडला होता ) ब्रेकफास्ट केला. मग निघालो. आज कांचनगंगेचा सुंदर नजारा बघायला मिळाला. वाटेतल्या एका धबधब्यावर आम्ही थोडा वेळ रमलो. गप्पा गोष्टींच्या नादात रमत गमत अख्खा फेरफटका पूर्ण केला. परतीचा प्रवास करताना आम्ही दमून गेलो होतो पण एका टेम्पोवाल्याने आम्हाला तिघांना लिफ्ट दिली, नवीन मित्र मैत्रीनिबरोबर मस्ती करायला खूप मज्जा आली. गंगटोकला परत यायला दुपार झाली होती.

मुंबईवरून रोडट्रीप साठी निघालेल्या मयूर ने मला तिस्ता पासून गंगटोक पर्यंत लिफ्ट दिली होती. मला त्याचा मेसेज आला की त्याला हाय फिव्हर चढला आणि ताबडतोब इथच्या लोकल हॉस्पिटल मध्ये तपासणी साठी जावे लागले. मी सोडून या शहरात त्याच्या ओळखीचे कोणीच नाही. एका दिवसाची आमची मैत्री किंवा ओळख म्हणूया पण त्याच नात्याने त्याला काही मदत हवी का हे पहायला त्याच्या हॉटेलवर गेले. त्याची माझी भेट झालीच नाही पण एक निरोप कळला की उद्याच्या दिवशी गंगटोकवरून निघून त्याच्या कोणा cousin कडे विश्रांतीला जायचे असे त्याने जायचे ठरवले आहे. मग उद्या त्यांच्याबरोबरच निघावे असे ठरवून टाकले.

इथचा सर्वात जास्त वर्दळ असलेला MG Marg कोणालाही प्रेमात पाडेल. तिथल्याच दुकानात तासभर फिरत राहिले, तेवढ्यात तीन तीन आईस्क्रीम्सस खाल्ली. थंडीत आईस्क्रीम खायचे म्हणजे डबल मज्जा! पोट भरले होते तरी उद्या हे सारे सोडून जायचे म्हणून वर इकडचा माझा फेवरेट चिकनरोलही खाउन घेतला. आता हॉस्टेल वर जाऊन अराम फक्त करायचा. निघायच्या आदली रात्र स्पेशल का असते? रात्री उशिरपर्यंत सारी कामे बाजुला टाकून सारेजण बसतात, गप्पा रंगतात, हसण्याखिदळण्याला उत येतो, फोननंबर्सची देवाणघेवाण होते, पुन्हा भेटण्याचे वायदे होतात... दोन दिवसांची सोबत तरल मैत्री मध्ये बदलते.
52344271_10156865136992778_6830649054788059136_n.jpg

झोपायच्या आधी पूजा ने माझ्यादठी लिहिलेले पत्र माझ्या हातात ठेवले. रात्री 12 नंतर पॅकिंग आटपले. त्यानंतर पत्र वाचल, उत्तर काय लिहावे ते मात्र सुचेना. उद्या 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे! या वर्षी हा स्पेशल दिवस प्रवासातच जाणार हे कळले. गंगटोक वरून निघायचे ते आधी सिलिगुडी आणि तिथून पुढे गोहाटी असा लांब पल्ला गाठायचा! पूजा सुद्धा आमच्या बरोबर येते म्हणाली, पहाटेच आंम्ही निघालो, मयूर ने मला आणि पूजाला त्याची आणि आमची वाट जिथे वेगळी होत होती त्या जंक्शन ला सोडले. तिथचे नाव मोंपोंग असे होते.

इकडे तिकडे चौकशी केली पण ह्या ठिकाणी आम्हाला शेअर सीट वगरे मिळायची मुळीच शक्यता दिसेना. थोडा वेळात खूप प्रयत्न करून जसा संपला तसे दुसरे ऑप्शन मार्क केले ... .बोले तो hitchhiking झिंदाबाद! एक सोडून दोघी जणी होतो, काय बिशाद की कोणी लिफ्ट साठी नाही म्हणेल? अगदी पहिलीच गाडी थांबली. आम्हाला मज्जा वाटली, आम्ही आपापल्या बॅगसकट गाडीत घुसलो नि सिलिगुडी पर्यंत बिनपैशाचा सुखरूप प्रवास झाला.
52432293_10156865137302778_8575199443970686976_n.jpg
पूजाला आज कलकत्त्याला जायचे, मग आम्ही NJP स्टेशन ला गेलो. तिकीट विकत घेतले. तिची गाडी रात्री आठ ची, माझी लगेच दुपारी दोन ला होती. मला समान चढवायला, शेवटचे गुडबाय करायला ती ही प्लॅटफॉर्म वर आली. ब्रम्हपुत्रा एक्स्प्रेस मध्ये बसून एकदाची मी गोहाटी ला निघाले. म्हणजे आता सिक्कीमला गुडबाय केले असे म्हणायला हरकत नाही.

तुझी साली आधी घरवाली
मीच ती.

मायबोली वाचकांसाठी,
तुम्ही प्रोत्साहन दिले आहेच पण वेळ आणि इच्छा कमी पडते म्हणून लेखनात खंड पडला. पुन्हा एकदा लेखन सुरु करायचे म्हणजे मोठा पुश लागतो तो मला मेसेज पाठवून रात्रीचे चांदणे ने दिला म्हणून हा लेख संदीप या मेम्बर ला समर्पित करत आहे.

15 फेब्रुवारी 2017

प्रिय Poo,

(तुला मराठी कळत नाही म्हणून काय अर्थ बदलत नाही. माझ्या सुप्रिया अशा नावाचे जसे तू सु केलेस तसेच मी ही Pooja या तुझ्या नावाचे Poo केले)

निघायच्या आदल्या रात्री पोस्टकार्ड वर लिहून केवढं गोड पत्र दिलंस आणि त्यात ही गळ घातलीस की, पत्राचं उत्तर लिही. एकदा घरी परतल्यावर पत्र लिहिण्यासाठी कारण आणि वेळ नाही सापडणार म्हणून या श्रुंखलेतले पुढचे पत्र तुलाच लिहायचे ठरवले.

तू फेसबुक वर नाहीस म्हणजे तुला टॅग करता येणार नाही आणि म्हणजे तुला पत्र मिळणार सुद्धा नाही. पण तुला सांगावेसे वाटेल ते लिहून झालं की वाचून रेकॉर्ड करेन नि wa वर पाठवेन. तरीही तुला कळायचे वांदेच आहेत. तो आपला रिक्षावाला हिंदीतून तीस रुपये सांगत होता तर तुला ते इंग्लीशमधले forty वाटले, ही तुझी अवस्था आहे.
आपण सिलिगुडी पासून NJP रेल्वे स्टेशन साठी धुळकट्ट गर्दीतून दबूड घुबुड आवाज काढत चालणाऱ्या त्या रिक्षाने निघालो. माझी दुपारी दिडची राजधानी चुकली त्यात काहीच नवल नाही.

एरव्ही उशिरा पोहोचल्यामुळे ट्रेन वगैरे चुकली तर माझे मानसिक संतुलनच बिघडून जाते, पण या ट्रिप मध्ये सारे चालते. कारण ट्रीपमधला एकेक अनुभव हा आनंद किंवा दु:ख यापैकी काहीच देत नाही, निव्वळ अनुभव मात्र देतोय, त्यामुळे त्याच्याबद्दल आसक्ती किंवा द्वेष दोन्ही वाटत नाही. अशी ट्रीप करताना शरीराबरोबर मन सुद्धा प्रवास करते आहे, chaos मधून clarity कडे, अपेक्षेमधून निरपेक्षते कडे, एकटेपणा कडून पूर्णतेकडे! पण NJP हून गोहातीला जायचे म्हणजे नुसतीच फिलोसोफी झाडून होणार नाही.आपण तिकीट विंडो वर जाऊन जनरल बोगी चे तिकीट काढले आणि दोन वाजता कुठलीशी पसेंजर ट्रेन आली. तुला गुडबाय ची मिठी मारली आणि ट्रेन मध्ये चढले. ज्या ट्रेन चे धड नाव सुद्ध माहीत नाही त्या ट्रेन मध्ये बसून गोहाटी कडे माझा प्रवास सुरु झाला.

जनरल बोगी कुठे असते ते माहीत नव्हते पण ती कशी असेल याची मी कल्पना करू शकत होते. मग मी स्लीपर कोच मध्येच एका रिकाम्या सीट वर बसले. सीट कसली अख्खा स्लीपर रिकामा होता. नंतर टीसी आला, तशी त्याने या सीट वर अनऑफीशिअली बसायची ऑफिशियल परवानगी दिली. जरी सहप्रवासी यथातथाच होते तरी ऐसपैस बसायला मिळाले म्हणून मी सुखावले.

52100100_10156869937282778_57132024338579456_n.jpg

निसर्गाचा नजरा साफ साफ बदलला होता. सिक्कीमला एकेका वळणावर आपण भारावून बघत रहायचो ते डोंगर नद्यांचे नजारे आठवणीत होते नि वास्तवात गाडी शेतमैदानामधल्या ट्रॅकवरून सरळसोट पळत होती.
ट्रेनचा गोहाटी ला पोहोचायचा निर्धारित टाईम माहीत नाही, पण दहा तास प्रवास केल्यावर जेव्हा गोहाटी ला उतरून पुढे काय करायचे याचा अंदाज घेत मी पलातफोर्म वर फिरत होते तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. मला ट्रेन मध्ये सीटची व्यवस्था करून दिली होती तोच टीसी भेटला. आता टीसी चे चेहरे कोण कशाला लक्षात ठेवेल? शिवाय हा तर कोट उतरवल्यावर स्वतः च आम प्रवासी दिसत होता. मी त्याला ओळखलेच नाही यात नवल नाही, पण नवल म्हणजे स्टेशन वरच्या एवढ्या गर्दीतून त्याने मात्र मला बरोबर हुडकले. इथे गोहाटी स्टेशन वर सुद्धा त्याची खूप मदत झाली. त्यानेच मला वेटिंगरूम दाखवली. अनोळखी शहरात, अपरात्री काही मदत लागल्यास स्वतः चा नंबर दिला.

52312475_10156869937337778_2368722949629804544_n.jpg

'गुडबाय सिक्कीम' चा फक्त तीनएक मिनिटांचा व्हिडिओ बनवायला मला किती वेळ लागला असेल?...एक अख्खी रात्र! पण अमेरिकेचा 14 फेब्रुवारी संपायच्या आत मालविकाला लिहिलेल्या पत्राला जोडून पाठवायचा म्हणून मी झोपलेच नाही. सकाळी बेवड्यागत परिस्थिती झाली. डोळे बंद होत होतयत. डावा खांदा अवघडल्यामुळे जोरात दुखतोय, अनोळखी शहरात कुठे रहायचे त्याचा पत्ता नाही ... नाही म्हणायला दिवस उजाडत होता हे नशीब समजायचे.

तुला माझी काळजी वाटत असेल हे मला कळते. म्हणूनच तू सकाळी सकाळी मेसेज करून मी कुठे नि कशी आहे हे विचारत होतीस तेव्हा मी उत्तर द्यायचे टाळले. तोवर माझी काहीही धड सोय झाली नव्हती आणि मला तुझी काळजी वाढवायची नव्हती. व्हॅलेंटाईन्स डे च्या कारणाने असेल कदाचित, पण जिथे जिथे चौकशी केली तिथे कुठेच जागा रिकामी नव्हती. दुखऱ्या खांद्याची वेदना सहन करतच समान पाठीवर लटकवले नि पलटन बाजार ला फेरफटका मारून आले. तिथेही कुठे सुरक्षित रहायची सोय होऊ शकेल असे नाही वाटले.

कुणाला वाटेल, दूरस्थ LOC वर एकटी फिरलेली मी गोहाटी सारख्या शहरात मात्र सुरक्षिततेच्या गोष्टी का करते? खर सांगू, मोठी मोठी शहरंच आहेत जिथली माणसे मुखवटे लावून फिरत असतात. दूरस्थ गावात त्या मानाने निर्मळ मनाची माणसे भेटतात. निदान माझा तरी असा अनुभव आहे.

कितीतरी तास प्रयत्न करून झाले. दरम्यान कौच सर्फिंग च्या फ्रेंड्स ना ही विचारून संपले. जवळपास आठ च्या आसपास कायलीपाडा एरिया मध्ये एक होम स्टे सापडला. सामान उचलून निघाले तर नॉर्थ इंडियन रेल्वे स्टेशन वर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट चा स्टौल दिसला. मला मज्जाच वाटली. तिथेच इडलीवडाचा ब्रेकफास्ट करून घेतला.
52361823_10156869937412778_4428467352144707584_n.jpg

"स्टेफिज् नेस्ट" ला पोहोचेपर्यंत खूप गळून गेले होते. अंघोळ अटपायला म्हणून गेले तेव्हा कळले माझे पिरिएड्स सुरू झाले होते. सारे कपडे धुवावे लागले. आता आणखी कुठवर ताणून धरायचे? मग मी ताणून दिले. रात्रीचा दिवस केला होता, दिवसाची रात्र करूया. पुढचे पुढे पाहून घेऊ. पण काहीच मिनिटे डोळा लागला असेल की मून (माझी होस्ट) ने मला चहा प्यायला बोलावले. मी खरतर चहा पीत नाही, त्या अवस्थेत काय तिने दिले ते मी तोंडाला लावले. आयुष्यात पहिल्यांदा साय आलेला चहा घटाघटा घशात ठोसला आणि एक्स्क्यूज मी म्हणून पुन्हा बेडरूम मध्ये पळाले. पण तेवढ्यानेही झोप रुसली. मग मी ही म्हटलं "तेल लावत जा" सरळ उठून बसले. मोबाईलवर टपाटप पत्र लिहून पूर्ण केलेच शिवाय पुढच्या प्रवासाचा ढोबळ प्लॅन करावा म्हणून wifi मध्ये जी घुसले ती दुपार होईस्तोवर तिथेच हरवले. पोतडी भरून संत्री जवळ आहेत तर दुपारी जेवायची काही चिंताच नाही.
52269913_10156869937512778_7422187233949515776_n.jpg

आता संध्याकाळ होऊ घातली आहे. गोहाटी जर फिरून यावे. फिरायचे म्हणजे प्रेक्षणीय स्थळांना भेट नाही द्यायची पण जिथे इथच्या लोकांची वर्दळ असेल तिथे जायचे. प्रवाशाला कुठच्याही अनोळखी जागेबरोबर ओळख वाढवायची तर सुरवात तिथूनच करावी लागते. गोहाटी?...पलटण बाजार ...और क्या?
तुझी गँगटोक ची हॉस्टेल मेट
सु

16 फेब्रुवारी 2017

प्रिय नानी,

तुला पत्र लिहिलं नाही असं कसं होईल? माझे एकेक पत्र तू वाचतेस, पत्रांना उत्तर लिहितेस, हे आहेच. पण माझं माझं आयुष्य मीच मज्जा करत कसं जगायचं ह्याची जाण मला ज्यांच्याकडे बघून झाली, तू त्यातली एक आहेस. ती 'मिली'मधली मिली होती ना, तशीच आमच्या लहानपणी तू आमची नानी होतीस. भुवईच्या कमानीलगत सतरंगी थेंब थेंब ठिपके लावून तू आम्हाला भारी हिरोईन बनवायची, हातावर मेंदीही काढायचीस आणि आमचे नाच गाणी नक्कल असे काही काही कार्यक्रम घ्यायचीस. तू कुठूनशी शोधून काढलेली कोड भाषा तर अज्जून उपयोगाला येते. पण इथे आत्ता तुझी विशेष आठवण आली त्याचे कारण विशेष आहे. ते येईल पुढे. मागचं पत्र जिथे सोडलं तिथून आता सुरवात करते.

मी गोहाटी ला पलटण बाजार ला फेरफटका मारायला म्हणून बस गाडीत बसले. ह्या गाड्या खूप आरामदायी आहेत. आज सकाळी पहिल्यांदा गोहाटीच्या पब्लिक बसमध्ये मी चढले तेव्हा तिचा अवतार बघून उलटी खाली उतरले होते. मला वाटलं चुकून मी long distance सेमी लक्झरी मध्ये चढले. पण माझी बस आणि अंदाज चुकले ते मागाहून कळल. बाकी या बसेसच्या सीटस् वगैरे एकदम फर्स्ट क्लास! 10 रुपयात ही बस कुठे कुठे फिरवते. मला या ISBT बसेस जाम आवडल्या. पण आत्ता तो कंडक्टर पलटण बाजार ओरडला तरी मी तंद्रीतच होते. मला घेऊन बस पुढे गेली तो मात्र वैताग झाला. स्वतः वर चरफडत पुन्हा उलट्या दिशेने पलटण बाजारचे तिकीट काढावे लागले.

गोहाटीचे रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इथेच पलटण बाजार ला आहे. कालचा अनुभव गाठीशी होता तर पुढच्या प्रवासात अपरात्री पोहोचणे सहसा टाळायचे, ही गाठ मनाशी बांधली होती. त्यानुसार प्लानिंग करायला म्हणून निघाले. गोहाटी वरून दुसऱ्या राज्यांत जाणाऱ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट ची माहिती, फोन नंबर्स गोळा केले.
52606136_10156874449482778_7379033580107726848_n.jpg

खूप दिवसांपासून गोड मिठाई खायची इच्छा होत होती. इथे एक चांगलासा दिसणारा मिठाईवाला (म्हणजे ज्याची मिठाई चांगली दिसत होती) सापडला. मग माझी चैन झाली. मी मिठाईच मिठाई खाल्ली. व्होडाफोन च्या गॅलरीत गेले नि नेटवर्क का मिळत नाहीये त्याची माहिती काढली. दोनच तास पायपीट केली असेल, पण तेवढ्याने ही मी दमले. दमले म्हणण्यापेक्षा झोप नाही मिळाली नि पिरिएड्स चा त्रास म्हणून हालत खराब झाली.

इथे सात वाजताच रात्र होऊ घातली. मिठाई नि सामोसे खाऊन पोटही गच्च भरले. मग मी मलाच सांगितले की 'हे तुझे डिनर होते'. आता फक्त झोपायचे काम उरले आहे. तेच डोक्यात घोळत होते का काय, मला बसमध्येच झोप लागली. गणेशगुडीच्या चार स्टॉप पुढे बस पोहोचली तेव्हा खडबडून जाग आली. या बस च्या पायी अजून एकदा वैताग आला पण उपाय काय? त्या बसमधून उतरून, उलट्या दिशेच्या या बसमध्ये बसले. गणेशगुडी पासून कायली पाडाला पोहोचायला पंधरा मिनिट पायी चालावे लागते. लेफ्ट राईट करत घरी पोहोचले तोवर पुन्हा झोप पुन्हा रुसल्यागत झाली. थोडी तिची मननधारणी केल्यावर मात्र अशी येऊन अशी बिलगली की इतक्या दिवसातल्या सर्वात गाढ झोपेनंतर पहाटे एकदम ताजीतवानी होऊन उठले.

इथल्या नीलाचल पर्वतावरच्या कामाक्षी मंदिर हे शक्तीपीठ आहे. कुठलासा कालावधी असतो की सलग तीन दिवस इथे देवी सतीच्या गर्भगृहात जल प्रवाहाच्या जागी रक्त वाहते (अशी मान्यता आहे). या कलियुगातील हे एक आश्चर्य मानले जाते आणि इथे देवीच्या योनीची पूजा केली जाते. पण मला अशा रोचक पण बुद्धीला न झेपणाऱ्या गोष्टीत विशेष रस वाटला नाही. कलाक्षेत्र म्युझिअम मात्र पहावे असे वाटले, तशी तिथे निघाले.

पण त्याआधी परमिट ऑफिस ला जाऊन नागालँड, अरुणाचल, मिझोराम या तीन स्टेट्स चे ILP इनर लाईन परमिट घ्यायचे हे ट्रिपल काम पार पाडायचे होते. इथे प्रत्येक स्टेटचे परमिट घ्यावे लागते आणि त्यांची ऑफिसेसही वेगळी वेगळी असतात. या परमिट प्रकाराने तर पार गंगटोक पासूनच माझी सटकली होती तरी नेटाने तीन मिलीमीटर चालून Nagaland Resident Deputy Commissioner च्या ऑफिस ला पोहोचले तर आज शनिवार, ऑफिसला सुट्टी! आता सोमवारीच या म्हणे, जणू दोन दोन दिवस एकाच शहरात बस्तान मांडायला बॅगपॅकर्स कडे वेळच वेळ असतो. रस्त्यावर ताजा उसाचा रस दिसला तसे ग्लास भरून थंड रस पिउन घेतला तेव्हा कुठे डोके जरा थंड झाले.

52585301_10156874449802778_1030685622966157312_n.jpg

गोहाटीचे आसाम स्टेट म्युझिअम वेगळे नि हे कलाक्षेत्र म्युझिअम वेगळे ! दहा रुपयाच्या माझ्या आवडत्या बसने मी म्युझिअम ला गेले, तर काय सांगू? इथे शिरल्या शिरल्या सुंदर फुलांचे ताटवे बघून दिल खुश हो गया | अशा रम्य ठिकाणी मला पायातल्या चपलांचे ओझे वाटते.

52146404_10156874450417778_8337486958485831680_n.jpg

मग मी माझी चप्पल एका झुडूपात लपवून ठेवली आणि अनवाणी निघाले. हे म्युझिअम एक नंबर आहे. असामी कल्चर ची भरपेट मेजवानी. सण, पुराण, पोशाख, हस्तकला, शस्त्रे, घरांची रचना, कला, नृत्य...सारे मांडले आहे. म्युझिअमचे रसग्रहण करतात तो टाइप माझा नाही... पण तीन मजल्यांचं हे म्युझिअम कुणालाही आवडेल असं आहे.

52117918_10156874451532778_3832495237725421568_n_0.jpg

मी बाहेर पडले तेव्हा दुपार टळू लागली होती. बगिच्यात फुले पहात फिरत होते तर मला काय दिसले असेल? ती आपली चार पाकळ्यांची लाल फुले, ज्याच्याशी तू माझी लहानपणापणी ओळख करून दिलीस पण त्यांचे खरे नाव मला अजून माहित नाही. तू त्यांना जंगली फुले असे म्हणतेस. एका कानाची रिंग दोन दिवसांपासून हरवलीच आहे मग एक फुल कानात दागिन्यांसारखे घातले, तू लहानपणी आमच्या कानात घालायचीस अगदी तसेच! तू जसे शिकवलेस अगदी तसेच, एकेक फुल घेऊन त्यातला मध चाखला. अशा वेळी तुझी आठवण झाली नाही असे कसे होईल? म्हणून आताच इथेच बसून तुला पत्र लिहायला घेतले आहे.

आज मयूर इथे गोहाटी ला पोहोचणार. तो त्याची नवीन Audi घेऊन मुंबईवरून आला आहे. त्याच्या बरोबर उद्यापासून चार पाच दिवस माझी जिप्सी स्टाईल सोडून रोड ट्रिप करायची असे ठरले आहे. बोले तो लक्झरी बोलते है ना आपुनभी वोहीच करेंगा।
पत्र कधी पोस्ट करता येईल ते मात्र नाही. माझ्या मोबाईलला बरेच दा नेटवर्क नसते. पण जेव्हा मिळेल तेव्हा उत्तर नक्की नक्की लिही. I love you.

तुझी
सुप्री.

 

17th फेब्रुवारी 2019

ए आई,

आई, अग प्रवासाचं बाळकडू मला तूच दिलं आहेस. तू गोष्ट सांगायचीस की मी तान्ह बाळ असताना एका प्रवासात तू मला उसाचा रस पाजला होतास. दिवाळी नि उन्हाळी अशा दोन दोन सुट्याना धरून आपण केवढे फिरायचो! जवळ जवळ अख्खा भारत तुम्ही आम्हाला दाखवला आहे. हे North East मात्र फार रिमोट आहे म्हणून का काय पण राहून गेल. पपा अनेकदा तसं बोलूनही दाखवायचे. आता हा विषय निघाला तर तुमची आठवण येउ लागली.

ज्यांना मराठीत लिहिलेलं पत्र वाचताच येणार नाही, जे कोणी फेसबुक वर नाही, अशांना पत्र लिहिलं पण तुला पत्र लिहिताना कशी ती रुखरुख लागली आहे. याआधी तुला पत्र लिहायची वेळ कधी आलीच नाही. आपल्या ट्रीप मध्ये मी मुंबईतल्या माझ्या मैत्रिणीना पत्र लिहायची ती माझी पत्र वाचायला तुला आवडायची. माझे एकेक पत्र पोस्ट करण्याआधी तू सर्वांना वाचून दाखवायचीस. माझ्या पत्राचे माझ्या आईला कौतुक वाटते ह्यात मला सुख वाटायचे. आज पहिल्यांदा तुला पत्र लिहित आहे. मी जरी मोठ्ठ पत्र लिहीन, तुला ते कळल की तू कौतुकाने हसूनही दाखवशील. पण तुझ्याच मुलीने तुला पत्र लिहिलं आहे हे तुला कळलं असतं तर खूप बरं झालं असतं.

आज सकाळी मयूर बरोबर रोड ट्रिप साठी निघायचे होतं. सकाळी लवकरच निघता यावं म्हणून NH 27 हायवे वरच्या त्याच्या राहत्या हॉटेल मध्ये त्याने माझीही रात्रीपुरती रहायची सोय केली. असलं पॉश हॉटेल माझ्या बजेट बॅग पॅकिंग ट्रिप साठी जडच गेलं असतं. पण सारा खर्च मयूरने केला. "तू काळजी करू नकोस, तू मला बहिणीसारखी आहेस" हे वाक्य खूप धीर देणारं आहे. बऱ्याच शंका कुशंका पाठी टाकून कोणावर विश्वास टाकायची प्रेरणा देणारं आहे. एरव्ही कुणी पुरुष बरोबर प्रवास करणार ही माझ्या सुरक्षिततेची व्यवस्था असू शकते, नाहीतर तेच धोक्याचे कारणही ठरू शकते.

माझ्यासाठी विश्वास हा फक्त binary असतो, तो असतो किंवा तो नसतो. माझे नशिबच असे आहे की विश्वासाचे बांधलेले धागे घाताने आजवर तुटले गेले नाहीत. म्हणूनच आजही एकेका धाडसाची सुरवात मला संपूर्ण विश्वास ठेऊन करता येते.
या प्रवासाची एक गंमत सांगते. अंघोळ झाल्यावर अंग पुसायला मी माझ्या सामानात टॉवेल भरलाच नव्हता. उचलायला समान जड नसावे, म्हणून किडे सुचले तसे केले! एक चौरस आकाराचा हातरुमाल भरला होता. अगदी बर्फाचा पाउस पडत होता त्या सिक्कीम मध्ये सुद्धा, न्हायल्यावर माझ्या रुमालाला एका दमात झेपतील तेवढे थेंब थेंब तो टिपून घ्यायचा मग गारठलेल्या हाताने पुन्हा पुन्हा पिळत पिळत मी त्याला टोवेल चे पार पाडायला वापरायचे. पण आज ह्या पॉश हॉटेलचा थाट बघून मी थोडी चेकाळले. इतकी मोठी अंघोळ केली की काळवंडलेला माझा चेहेरा आज चमकायला लागला. शाळेतल्या एका मित्राने माझा फोटो पाहून विचारले सुद्धा की, ये सुंदरता का राज क्या है?

दुसऱ्या दिवशी भटपेट फुकट ब्रेकफास्ट करून मी रोड ट्रिप साठी निघाले. NH 27 चा हा stretch खूप सुंदर आहे. गाडी चालवणाऱ्याला सिमेंटच्या रोड वर ड्राइव्ह करायला आवडेलच, पण बाजूच्या सीट वरच्या प्रवाशासाला आसामची घरं, शेती, जनजीवन याची झकास झलक अनुभवता येते. वाकड्या तिकड्या रेषांनी रेखलेली अक्षरे तेवढी वाचता येत नाहीत. अनेकदा त्यांचे भाषांतरही नसते. दुपारी आम्ही आसामी लोकल जेवण जेवलो. त्या थाळीत भात, अनेक प्रकारच्या चटण्या, पापड आणि 13 वाट्या होत्या. साऱ्या भाज्या तिथेच पिकवलेल्या आणि कुठचेही मसाले न घालता बनवलेल्या होत्या. एक थाळी दोघांना पुरून उरली. 100 रुपयांत दोघांचे पोटभर जेवण झाले.
52935394_10156881844482778_7833036405256224768_n.jpg

गोहाटी पासून 345 किलोमीटर पण ब्राम्हपुत्रेच्याच काठी जोरहट जवळ निमची घाटावरून फेरी सुटते. ही माजोली या जगातील सर्वात मोठ्या रिव्हर आयलंड वर घेऊन जाते. भारतभूमी वरची एकच नदी masculine आहे...ती ब्रम्हपुत्रा नदी! विश्वास तरी बसेल? ... की या नदीच्या पोटात जवळपास 900 स्क्वेअर किलोमीटर भूप्रदेश असेल? पण ज्या नदीने जोपासायचे त्याच नदीने बुडवले तर वाचवणार कोण? ब्रम्हपुत्रेच्या पूराने माजोलीचे जनजीवनाला तडाखे बसलेच पण या आयलँडचे मोठ्या प्रमाणात इरोजनही होत आहे. अजून काहीच वर्षात एवढे मोठे आयलंड गडप होण्याची दाट शक्यता आहे.

नदीच्या पोटात माजोली ला घेऊन जाणारी फेरी प्रवाशांबरोबर गाड्या ही घेऊन जाते. या गाड्या वर गाड्या कशा चढवतात तो जुगाड बघण्यासारखा आहेच पण एवढे दिव्य पार पाडल्यावर त्या तराफ्यावर गाड्या कशा उभ्या करतात ते तर निव्वळ कल्पनेपलिकडचे! मयुरची 4 wheel Audi चाकांपुढे दगड-विटा अडकवून एका लाकडी तराफ्यावर उभी केली होती ज्याला कुठच्याच बाजूने कठडाच नव्हता. तराफ्याची साईझ आणि गाडीची साईझ यात फार फरक नसावा. गाडीच्या पुढे 2 इंच नि पाठी 2 इंच एवढेच काय ते मार्जीन! मयूरच्या चेहेरयावर गाडीची काळजी साफ दिसत होती नि त्यात एक जण म्हणाला 'आप आराम से गाडी के अंदर बैठ जाइये।' ... हे भगवान!

53020149_10156881846792778_9046989532578185216_n.jpg

फेरी वरून जाताना सुंदर सूर्यास्त पहाता आला. सहा वाजता माजोली ला उतरलो तोवर अंधार पडला. मयूर ला कॅश काढायची म्हणून तो ATM पहाताच उतरला तर तिथे लिहिले 'closes at 5 pm' Lol

अंधाराने संध्याकाळच्या वेळीच माजोलीचा कब्जा घेतला होता. लहान लहान रस्त्यावरून रात्रीसाठी निवारा शोधत गाडी वात काढत चालली होती. धुवाधार पाउस चालू होता. गारठवून टाकणारी थंडी पडली होती. इथे एकीकडे जिथे सर्वसाधारण रहायची सोय झाली तिथेच आम्ही रहायचे ठरवले. रात्री बॉन फायर जवळ इतर प्रवासी जमले तशा छान गप्पा रंगल्या.
52480965_10156881847522778_308095587738189824_n.jpg

पोटभर गरमागरम जेवण जसे पोटात गेले झोप अनावर होऊ लागली तशी गुडनाईट करून मी उठले. बांबूच्या झोपडीत दोन दोन जाड ब्लॅंकेट्स मध्ये घुसले, तशीच शांत गाढ झोप लागून गेली. आजच्या दिवसाच्या ट्रिप च्या आठवणी लिहून पाठवत आहे खरी. तुझ्याच मुलीने पत्र लिहिले हे लक्षात आले नाही तरी सुप्रियाने तुला पत्र लिहिले आहे असे कळल्यावर तुला हसू येईल तुला, कसे ते माझ्या डोळ्यासमोर येते आहे.

तुझीच
सुप्रिया.

52778848_10156887897222778_3757245967590490112_n.jpg

18th फेब्रुवारी 2019
ए झिम्मा,

आता तुला पत्र लिहायचं तेवढंच बाकी राहिलं होतं. मांजरीला पत्र लिहायचं म्हणजे फारच झालं हे खरय पण ज्याला पत्र लिहित्ये त्याच्याशिवाय इतरही वाचतातच की. म्हणून तुझ्यासारख्या अडाणी मांजरीला पत्र लिहिले तरी चालेल अस वाटल. शिवाय काल रात्री बॉन फायर भोवती गप्पा चालू होत्या, तेव्हा सारेच ट्रॅव्हलर्स सांगत होते की फॅमिली मेम्बर्स पेक्षा त्यांना आपापल्या घरच्या पेट्स ची जास्त आठवण येते. खरंच आहे ते. मला पण तुझी खूप आठवण येतेय.

52956301_10156887898212778_7267805807020867584_n.jpg

आज सकाळी उठले तेव्हाही पाऊस पडतच होता. त्या थंडीतही मी अंघोळ आटपली. आदल्या पत्रात माझ्या अंग पुसायच्या हातरुमालाबद्दल लिहिले आहे. जीव केवढा त्यापेक्षा जास्त काम केल्यामुळे तो पांढरा शुभ्र रुमाल मळकट राखाडी झाला होता आणि त्याला दमट कुबट वासही येत होता. मला भीती वाटली मयूर च्या पॉश Audi मध्ये माझ्या रुमलाचा वास भरून राहील. मग तो हातरुमाल (माझा so called टोवेल) मी तिथेच पाठी सोडला.

फेरी निघायला थोडा वेळ होता, म्हणून मी तिथल्या जाडजूड गब्रू डुकरांच्या पाठी पाठी त्यांचा फोटो काढायला गेले. एकतर एवढ्या घाणीत हे लोळतात ह्यांचा फोटो काढायला कोणीतरी मागेल काय? मी ही दुरूनच सेल्फी काढला असता पण ह्यांना सेल्फिचा अनुभवच नाही तर काय करायचे. डोकं फिरल्यासारखी तीन तीन डुकरं माझ्याकडे बघत माझ्या जवळ जवळ जशी येऊ लागली तशी माझी घाबरगुंडी उडाली. मी पळत पळत मी एका टपरीच्या आत येउन लपले.

52588611_10156887906047778_8223170820445306880_n.jpg

त्याच टपरीवर ब्रेकफास्ट करताना सब्यसाचीशी ओळख झाली. तो त्याच्या बहिणीला घेऊन माजुली फिरायला आला होता. अलीकडच्या किनाऱ्यावर झालेली ओळख पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत मैत्रीसारखी झाली. पुन्हा एकदा सारे एकत्र चहा ब्रेकफास्ट ला बसलो या पलीकडच्या किनाऱ्यावरच्या टपरीत बसलो. या टपरीत कोण सापडली तर एक मांजर! ती माझ्याकडे अंग घासायला आली तेव्हा तर तुझी खूप खूप आठवण आली. तुझ्या कलर ची गॅरेंटी नसती आणि तुला पाण्यात बुचकळून धुऊन काढले असते तर तू वाळल्यावर कशी दिसली असतीस? अगदी तस्साच तिचा रंग होता. तुझ्यापेक्षा खूप स्मार्ट होती. रागावू नकोस ग, तू जशी आहेस तशीच मला आवडतेस.
53300017_10156887904962778_8835319821810794496_n.jpg

सब्यसाची बरोबरच्या गप्पात सुख दुःख नातीगोती आयुष्य हे विषय निघाले होते. अशा विषयांच्या गप्पा एका भेटीत पुऱ्या होतील का? सर्वांनी लवकरच पुन्हा भेटायचे असे ठरवून, नवीन मित्रमंडळींना आपापल्या घरी यायचे आग्रहाचे निमंत्रण देऊन नंतर आम्ही आपापल्या वाटेने निघालो.
52590209_10156887906632778_5631236685275594752_n.jpg

आज आम्ही काझीरंगा ला जायचे ठरवले.

आपण फॅमिली हॉलिडे ला जातो तशा ट्रिप पेक्षा बॅकपॅकिंग टाईपचा प्रवास अनेक पातळींवर वेगळा आहे. ज्यांना लोकांशी बोलायला जमत नाही , आवडत नाही, ही वाट त्यांच्यासाठी नाही. कारण गुगलबाबा त्या त्या जागेची फक्त जुजबी माहिती देतो, अस्सल लोकल माहिती सहसा लोकल लोकांकडूनच मिळते. आज कुठे जायचे ते ठरवले की एकदाचे तिथे जाऊन पोहोचायचे, अशा प्रवासाचा हा एवढाच हेतू नसतो. बरेचदा तिथे तिथे पोहोचल्या वर रहायची सोय शोधण्यापासून सुरुवात असते. फारशा अपेक्षा नसतात, घाई नसते. रात्रीपूरती रहायची सोय झाली की आजची गरज भागली. उद्याचे काय ते आज माहीत नसते. उद्याची चिंताही नसते. बहुतेक निव्वळ अनुभव हाच अशा प्रवासाचा ध्यास असावा. त्यानुसार बरेवाईट अनुभव स्वागतार्हच असतात. निवडक अनुभव वेचण्यासाठीच्या Itinerary नुसार जी वाट आखली असते, ती अनेक अनुभवांना बायपास करून पुढे जाते. ते सारे अनुभव हा अशा प्रवासाचा अनिवार्य भाग आहे. पण ते गाठोडे प्रवास संपल्यावरही स्वेच्छेने आयुष्यभर बरोबर घेऊन चालावे, मला ती कमाई एवढी मोलाची वाटते. बॅग पॅकिंग आणि रोडट्रीप करणाऱ्या प्रवाशांची मानसिकता एकच असली तरी दोघातला मुख्य फरक म्हणजे रॉड ट्रिप मध्ये वहान हाताशी असल्याने त्यानुसार इतर फायदे मिळतात, वेळही वाचतो. खर तर, कमी वेळ आणि भरपूर वेळ गुंतवावा लागतो, बॅग पॅकिंग ची हीच नेमकी खासियत आहे.

दुपारचे जेवण आम्ही कालच्याच आसामी स्पेशल थाळीचे केले. रिटर्न कस्टमर हीच तिथच्या रुचकर जेवणाची सर्वात मोठी पावती नाही का? म्हणून आम्हाला पहाताच क्षणी त्या आसामी ओनर च्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

काझीरंगाचे अभयारण्य ... भूगोलाच्या अभ्यासासाठी जी माहिती वाचायला जीवावर यायचे तीच माहिती आता किती interesting वाटते.
ब्राम्हपुत्रे च्या काठचा हा गवताळ प्रदेश जवळजवळ अडीज हजार एकशिंगी गेंड्यांचे घर आहे. गेंड्याचे जेवणच मुळात गवत हेच आहे. आणि एव्हढ्याल्या अंगाला पोसायला त्याला दिवसाला म्हणे 40 किलो अन्न खावे लागते. दिवसभर हा प्राणी चरतच रहातो. याशिवाय अभयारण्यात हत्ती, हरणे, रानरेडे हे शाकाहारी प्राणी सुद्धा मुबलक आहेत. मांसाहारी जनावर एकच ... वाघ! हरण किंवा अवजड प्राण्यांची पिल्ले खात त्यांचा खुशाल गुजारा होतो. सध्या इथे 200 पेक्षा जास्त वाघांचा रहिवास आहे.

दुपार टळत असताना काझीरंगा च्या वेस्टर्न गेट जवळ पोहोचलो. सफारी आटपून कोणी बाहेर येत होते त्यांचे चेहेरे हर्षोल्हासित वगैरे असे दिसतच नव्हते. आज म्हणे पावसामुळे दिवसभर सफारीत जनावरं दिसलीच नाहीत. अशा दिवशी नकोच ती सफारी! मग आम्ही उलट वळलो. काझीरंगा अरण्याच्या समोरच्याच टेकडीवर 'ला व्ह्यू' हे सुंदर हॉटेल आहे, मयूर चा डोळयांत ते हॉटेल भरले होते, पण माझे डोळे मात्र जवळपास बजेट गेस्ट हाउस शोधायला भिरभिरत होते.

मयूर ने माझा तो प्रश्न झटक्यात सोडवून मला दुसराच प्रश्न घातला. ट्विंन बेड च्या रूम मध्ये gender मध्ये येणार नसेल तर झोपायला माझी हरकत आहे का? माझ्या बायनरी विश्वासाची व्हॅल्यू '1' धरून जरी पुढचे गणित मांडते तरी प्रत्येक पाऊल उचलताना समाज माझ्यावर किती विश्वास ठेवेल ह्या मांडणीने वेगळे उत्तर मिळते. पण तरीही माझे गणित माझ्याच रीतीने सोडवून पहायचे मी असे ठरवले. जरी माझे मला उत्तर मिळाले होते तरी त्याची पडताळणीच फक्त उत्तराची अचूकता सिद्ध करू शकत होती आणि त्यासाठी आजचा दिवस सारून उद्याचा दिवस उजाडणार होता.

झिम्मे तुला यातल काय कळलं? काही सुद्धा नाही. दगड आहेस. आता मी घरी परतल्यावर मात्र माझ्याकडे क्षणभर करवंदासारखे दिसणारे डोळे रोखून बघशील आणि बराच वेळ अनवाणीच वाटा तुडवलेल्या त्या माझ्या तळपायांचा वास घेत राहशील. .माझ्या प्रवासाच्या एकेका पायवाटेचा थांगपत्ता शोधत! Miss u. Love u.

तुझीच
मम्मा
52729387_10156881844557778_1806565641012903936_n.jpg


19 फेब्रुवारी 2019
मयूर,

जरी गेले दोन दिवस पावसाने भिजवून टाकलेला निसर्ग बघून मी आनंदाने खिदळत होते तरी काझीरंगाला फिरायचे तेव्हा सूर्याने तोंड दाखवले तरच गेंड्याचे तोंड पहायला मिळेल असा एक समज झाल्यामुळे उद्याही पाउस पडेल का काय या विचाराने झोपी गेले आणि बाहेर पाऊस पडतोय की काय या प्रश्नाने अगदी पहाटे पहाटेच जाग आली. जाग आल्या आल्या खिडकीतून बाहेर पाहिले तो काय, सोनेरी ऊन बघून मेरी तो नींद भी खुल गयी और होशभी उड गये | पावसाने खरच आपल्यावर कृपाच केली.

सकाळी अनोळखी रस्ते धुंडाळताना कुतूहल म्हणून आपण इस्टर्न गेट जवळच्या हेरिटेज पार्क मध्ये शिरलो. आत शिरल्या शिरल्या रंगबिरंगी नजारा पाहून दिल खुश झाले. पारंपरिक पोशाखातल्या आसामी तरुणीही सारी माहिती हसऱ्या चेहऱ्याने द्यायला तत्पर असतात त्यामुळे बाग असो किंवा म्युझींअंम, नुसताच फेरफटका मारला जात नाही तर त्याचे रसग्रहण करता येते.
53145788_10156888632422778_4899233928570732544_n.jpg

म्युझींअम मध्ये सिल्कच्या धाग्यांना कोणत्या रंगाने रंगवायला काय काय वापरतात ते मला सर्वात आवडले.
53006192_10156888632882778_2907729907779895296_n.jpg53028710_10156888633012778_4098594901531295744_n.jpg

तू म्युझिअम मध्ये जास्त रमल्यासारखा वाटलास पण मी बागेच्या मोहात पडले. इथली झाडा पानांची विविधता आणि फुलांचे ताटवे पहात, त्यामाधून काढलेल्या छोट्या छोट्या ट्रेल्स मधून पक्षांची किलबिल ऐकत चालत रहायचे...
52582522_10156888633217778_4895822878429151232_n.jpg

तिथेच रेंगाळले होते तोवर आसामी फोक डान्स सुरू झाला. अरे? मी आजच सकाळी अशी लोकनृत्य मला पहायला आवडतात तेवढे मात्र राहिले असे म्हटले काय नि अचानक हे असं जुळून आलं, ते कस काय? आसाम सोडायच्या आधी आसामी कल्चर ची झलक पहायला मिळाली, आसाम पोटभर फिरून झाले, असे वाटले.

53071355_10156888633497778_1238006340043931648_n.jpg

काझीरंगाच्या चार गेट्स पैकी कुठून सफारी घ्यावी त्याबद्दल अनेकांची अनेक मत होती पण दोघांचे एकमत झाले तेवढे बरे! वेस्टन गेट वरून सफारी घ्यायची असे आपण ठरवले.
52602745_10156888633957778_7673140815845130240_n.jpg

इथे गेंडे तर पोटभर दिसले पण आपल्या पिल्लाच्या सुरक्षेसाठी तो गेंडा आपल्यावर हल्ला करायला धावून आला तो अनुभव एक नंबर! गेंड्याची नजर कमजोर असते पण माझ्या कपड्याचा लाल रंग त्याला दिसला, असं ड्रायव्हर म्हणतो. तो सांगत होता की अशा वेळेलाच खास व्हिडीओ घेता येतो, ते सारे खरे आहे आणि मी कॅमेरा सुरू केलाही होता पण त्या चवताळलेल्या गेंड्याचे रूप दिसले ते एवढे भयावह होते की स्वतः ला वाचवायला सावरून बसताना मोबाईल हातातून सटकला. तेवढ्यात ड्रायव्हरने आपल्या सुरक्षेसाठी जीप ही पुढे हलवली होती. कसला व्हिडीओ नि कसलं काय जीव मुठीत घेउन पळालो ते बरे! तेव्हाचा भीतीदायक अनुभव आता आठवला की मात्र हसू येत्ते. अभयारण्यात खूप सुंदर पक्षी बघता आले, कित्येक प्रकारची हरणं दिसली. काझीरंगा अभयारण्याला भेट द्यायचे माझे जूने स्वप्न, आज पुरे झाले.
आज तू गोहाटीला जायचं ठरवलस आणि मला शिलॉंग ला जायचं, म्हणजे जोरबाट कडून आपले रस्ते बदलणार. माझी गाडीची लक्झरी संपणार. पब्लिक ट्रान्स्पोर्टने डूगुडूगु वाटचाल होते. इथे तर साडे पाच नंतर अंधार पडायला सुरुवात होते तर एवढा लहानसा दिवस मी पुरवायचा कसा? बर तिथे संध्याकाळीच जोरबाट ला बस्तान मारायचे तर ते हि मन मानेना.

शिलॉंगसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळेल की नाही अशी चलबिचल चालू असताना इकडून Audi तून उतरता तिकडून बस आली. काहीच न सुचून अंधार पडता पडता शिलॉंग ला जायला निघाले खरी पण अशी घाई गडबड झाली की तुझा नीट निरोपही घेतला नाही. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले. तुझ्याबरोबर तीन दिवस प्रवास केला. आयुष्यातल्या कटू अनुभवांनी मन कधी इतके हिरमुसल्यासारखे होते की चांगुलपणावर भरवसा ठेवायला मागत नाही.

पण तुझ्यातले माणूसपण जसे पाहिले तसे स्वत:चे माणूसपण जोपासण्याची उम्मीद वाटू लागली. माझ्या हृदयातील प्रेम, करुणा, सहायता याचे रोपटे सुकून मारता मारता त्याला खत पाणी मिळाले असे म्हटले तरी ते समर्पक आहे. पुन्हा एकदा ते रोपटे फुलवायची प्रेरणा मिळाली. तुझ्या गाडीतून फिरायची ऐश झाली हे आहेच पण त्यापेक्षा या विचारांचा कायापालट झाला त्याबद्दल Thanks. दिल से!

शिलॉंग चा रस्ता निसर्गरम्य आहे म्हणतात, पण निघाले तेव्हाच अंधार पडला होता. मग बसमध्ये आजच्या दिवसाचे फोटो, व्हिडीओ पहाण्यात रमून गेले. शिलॉंगला पोहोचायला आठ वाजणार होते, पुढच्या एका दूरस्थ गावाला ज्याचे नाव उच्चारता सुध्दा येत नाही (Mawlynnong) तिथे जायचे असे ठरवले होते. त्या साठी लागलीच निघायची माझी तयारी होती पण मेघालय काळे का गोरे इतपतही माहिती नव्हती तसात एवढ्या रात्री संपूर्ण अनोळखी रस्त्यांनी प्रवास तरी कसा करायचा? पण एक गंमत झाली ...तुला आठवतय? आपण काझीरंगावरून निघालो तेव्हा मला कामाचा एक फोन आला होता? शेल्टर डॉन बोस्को चे फादर ग्रेगरी ज्यांच्याबरोबर मी काम केले आहे, तो त्यांचा फोन होता. बोलता बोलता मी शिलॉंग ला चालले आहे हे कळल्यावर त्यांनी स्वतः होऊन मला तिथच्या फादर चा नंबर दिला. त्यांच्याकडूनच पुढच्या प्रवासाची माहिती घ्यावी म्हणून त्यांना फोन काय जोडला तर मी न विचारता आणि मला न विचारताच, त्या रात्री मी शिलॉंगलाच रहायचे हा निर्णय त्यांनी घेउनही टाकला आणि तशी सारी सोयही केली.

बसमधून चर्चजवळ उतरले तेव्हाच मिट्ट अंधार पडला होता. दहा मिनिटे चालत St Anthony College कडे पोहोचले. त्या फादर ने मग मला सिस्टर्सच्या ताब्यात सोपवले. हॉस्टेलमध्ये स्नेहा च्या रूम मध्ये माझी व्यवस्था केली होती. रात्रीचे जेवण, आंघोळीसाठी गरम गरम पाणी, wifi ची चंगळ, मेघालयातील खासी कम्युनिटी बद्दल माहिती ... पुढची सारी मदत तिनेच केली.

52836994_10156888634177778_8057671050332209152_n.jpg52898327_10156888634272778_2628073862603997184_n.jpg52608981_10156888634327778_5096096408872681472_n.jpg

लवकर निघायचे म्हणून सकाळी सातला उठून गडबडीने निघाले तर रोजच्या सवयीप्रमाणे स्नेहा बाहेरून कडी लावून प्रार्थनेला गेली होती. मी आत अडकून पडले. दरवाजा खूप ठोकला मग काही उपाय नाही कळले तसे गपचूप पत्रलेखानाला सुरवात केली.
आज 20 फेब्रुवारी माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे! आजच्या तारखेचे पत्र त्याला लिहीणार.

52993347_10156888634457778_5026439954956288000_n.jpg

तुला मात्र भाऊ म्हणू की मित्र म्हणू हा एक प्रश्नच आहे. पहिल्या दिवशीच मला तू बहीण मानलंस, खर तर प्रश्न तेव्हाच सुटायला हवा होता. पण कधीकधी गैरसमज टाळण्यासाठी मैत्री सुद्धा बहिणभावाच्या नात्याच्या धाग्याने गुंफली जाते. तसेही दोन्ही नात्यांमध्ये अंतर फारसे नाहीच. नावे वेगळी दिली आहेत, भावना त्याच असतात.

नाते जोडणे आणि नाते निभावणे या मध्ये खूप फरक आहे. मला स्वतःच्या बहिणीचा दर्जा दिलास पण तो राखलास हे महत्वाचे! तुझ्यासारखा भाऊ, मित्र सर्वांना मिळू दे.
तुझी बहीण, तुझी मैत्रीण
सुप्रिया

 

52852264_10156893190557778_6237142191467134976_n.jpg

21st फेब्रुवारी 2019

प्रिय वाचकांनो,
एकेकाची नावं डोक्यात येतायत, पण सारी लिहू कशी?

एका पत्रावर कोणीतरी प्रतिक्रिया लिहिली होती की पत्र वाचताना माझ्याबरोबर स्वत:चीही ट्रीप चालू आहे की काय अस वाटतं. खर तर मलाही मी एकटीच ट्रीप करते असं अजिबात वाटत नाही. दिवसभर कठीण प्रसंगांना तोंड देऊन थकून जरी गेले तरी रात्री माझ पत्र कोणी कोणी वाचलं हे मी जरूर बघते. तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला दुसऱ्या दिवशीची आव्हानं पेलायला पुन्हा उत्साह येतो. म्हणून तर सर्वात कठीण प्रसंगाला तोंड देत होते तेव्हा जे जे पत्र वाचतात त्यांचीच आठवण झाली. त्या कठीण प्रसंगात तुमचे पाठीवर शाबासकी देणारे शब्द वाचण्यासाठी जीव तळमळत होता.
गोष्ट सविस्तर संगण्याआधी पत्र कोणाला नि का लिहिते आहे तेवढे लिहिले.

20 फेब्रुवारी ला सकाळी फादर ब्रेकफास्ट बद्दल विचारत होते पण मला त्यांच्या उपकाराचे ओझे वाटले म्हणून मी ब्रेकफास्ट न करता निघाले. चर्च मध्ये फक्त मी एकटीच होते म्हणून प्रार्थनेत मन ही एकाग्र झाले. तासभर सरला असेल. काल जिथे पोहोचायचे ठरवले होते तिथे फुल्ली मारून आज मी आणखी लांबचा पल्ला गाठायचा बेत केला. Yes, नोग्रीआट (Nongriat)! पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास करायचा म्हणजे शिलॉंग चा बस स्टँड गाठायला हवा तो शोधत निघाले! अंजली स्टँड ...पोलीस बाजार ...बोरा बाजार ... Ground Floor...First Floor... शिलॉंग मधले हे इतके सारे स्टँड टुरिस्टच्या डोक्याचे खोबरे करून टाकतात. एकीकडे गेले की लोकं सांगतात त्या दुसऱ्या स्टँड वर जा. वर जा ...खाली जा. बॅगेला खांद्यावर उचलून जवळ जवळ पाच सहा किलोमीटर चालावे लागले, तेव्हा एकदाची बरोबर स्टँड वर (अजूनही मला त्या नावांचे कोडे सुटले नाही) पोहोचले. प्रवास सुरु व्हायच्या आधीच शरीर थकून गेल्यासारखं झालं.

इथे मला जेमतेम चेरापुंजी पर्यंत शेअर सुमो मिळाली. चोपन्न किलोमीटर पार झाले, आता पुढे दहा - बाराच किलोमीटर तैरना (Tyrna) आहे, तिथे पोहोचायला माझ्या बजेट चे वहान मिळायला हवे. एक गाडी स्वतः होऊन समोर थांबली. ड्रायव्हर ने सांगितले की मी तिथून कोणी सवारी च्या pick up ला चाललो आहे तर हवं तर तुलाही सोडतो. नेकी और पुछ पुछ :D. मी ऐटीत तैरना ला निघाले! गप्पाच्या ओघात मी एकटीच प्रवास करत आहे हे कळले, तसे त्या तरुण ड्रायव्हरने तिथल्या तिथे घाटात गाडी चक्क उभी केली आणि मला मार्शल आर्टचे धडे द्यायला सुरुवात केली. वर हे ही सांगितले की आजवर त्याने फक्त त्याच्या बहिणींना स्वतः च्या सुरक्षेसाठी हे सारे शिकवले होते.

52759718_10156891017397778_7491942029732085760_n.jpg

तैरना ला पोहोचेस्तोवर दुपार टळू लागली होती. पोट तर रिकामे होते पण पोटाचे पहात बसले तर दुसरेच संकट ऊद्भवेल कारण अंधार पडायला फक्त तीन चार तास शिल्लक होते. त्या आधी 3700 पायऱ्या, 2/3 झुलते ब्रिज पार करून मला Nongriat ला पोहोचायचे. तिथे रहायची सोय काय होऊ शकते याचा काही अंदाज नाही. गाईड हजार रुपये सांगत होता. आधी माझे समान मीच उचलून चालत होते, पाच मिनिटांच्या आत दम निघाला. मग मला हजार रुपये सुद्धा परवडले. 20 वर्षाचा तरुण मुलगा माझे ओझे उचलीत सरसर चालत होता, मी पाठून धापा टाकत चालत राहिले.

53053579_10156893188757778_8047721750001090560_n.jpg

‘धापा’ हा खूप उथळ शब्द झाला. लवकरच भुकेपोटी मला चक्कर येऊ लागली, वाटेत छोटे छोटे स्टोल लागले तिथे काहीबाही खाल्ले पण शरीराला उर्जा मिळेना. पाय लटपटत होते, वाकडे पडत होते, चक्कर सारख - कुठच्याही क्षणी तोल जाऊन मी पडेन असं होऊ लागलं. त्या वेळी तुम्हा सर्वांची खूप आठवण आली. जरा कुठे थोडीशी रेंज मिळाली तसे तुम्हाला तेच लिहूनही पाठवले. त्यावर सर्वांनी फटाफट शुभेच्छा पाठवल्या त्या ही नशिबाने वाचता आल्या. तेवढीच थोडी ताकद वाटली. माझी हालत खराब व्हायचे आणखी एक कारण आहे. मला उंचीची भीती वाटते. Nongriat हा trail ज्यांनी केला त्यांनाच ते माझ्यासाठी काय साहस असेल, ते समजेल.

52654484_10156893190402778_6028588599732076544_n.jpg

सत्तर एक डिग्री च्या कोनात रचलेल्या खोल खोल पायऱ्या उतरताना डोक 360 डिग्रीत फिरत होतं. झुलता ब्रिज पार करताना खाली नदीत पहायचे हे शक्यच नाही पण नुसत्या कल्पनेनेच पाय लटपट कापतात. हळू हळू एकेक पाऊल टाकत ब्रिज पार करायला जेवढा जेवढा जास्त वेळ जातो, घाबरगुंडीच्या फोडणीपाई कढी आणखी पातळ होते. पण मी हे आव्हान पेलायचेच असे ठरवले होते. (न ठरवून सांगणार कुणाला?) हा रस्ता असा आहे की मधेच दाट जंगलात दमछाक झाली तरी दुसरा काही उपाय नाही. अंधार व्हायच्या आत जंगल पार करून राहत्या ठिकाणी पोहोचावेच लागते. मनाच्या शक्तीच्या भरवशावर हले डुले का होईना पण चालत राहिले. पण माझेच मला एक विशेष वाटले. अंधार आता पडेल की काय अशा घडीलाही जिथे मन रमले तिथे क्षणभर थांबून निसर्गाला डोळ्यात, कानात, नाकात साठवून घेण्यात कुठे कमी केले नाही. अतिथंडगार पाण्याचा ओहोळ लागला, मी त्यातही उतरून मनसोक्त अंघोळ केली.

52629668_10156891017927778_7630813994747428864_n.jpg

आधीची अवस्था वर लिहिली आहेच त्यात थंड वाऱ्याला झेलत ओल्या अंगाने चालायचे म्हणजे माझे जे झाले होते त्याला काय शब्द द्यायचा तो माहीत नाही. एकेक पाऊल जशी टाकत होते की पुंगीवर नाग डोलतो नि सरपटतो याच्या जवळपासचे काहीतरी चालले होते.
Nongriat ला पोहोचले तेव्हा वातावरण निर्मनुष्य निरव होते. डबल डेकर ब्रिज नितांत सुंदर दिसत होता. अंधार पडत होता, थंडी वाढली होती. आधीच्या ओहोळात मनसोक्त आंघोळ झाल्यावर ओले कपडे अंगावरच सुकवले. ते नुकतेच सुकत आले होते. अशात इथचा पूल सुद्धा जरी बोलावत होता तरी तिथे कानाडोळा करून मी बाजूच्या एका होम स्टे मध्ये जाऊन, रात्रीपुरती रहायची बोली केली आणि गादीवर अंग झोकून दिले.

रात्रीचे जेवण तयार व्हायला बराच वेळ होता. शेजारच्या खोलीत एक साहसी तरुण रहात होता त्याच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकल्या. आम्ही एकत्रच जेवण केले. इथे माणसांचा पत्ता नाही आणि कशी ती एक मांजर रात्री माझ्या खोलीत घुसली. राणीसारखी गादीवर लोळत होती तोवर सुंदर दिसली, मग आवाज करायला लागली तशी हाकलून दिली तर कार्टी रात्रभर दार ठोठावत बसली होती. अशा निर्मनुष्य ठिकाणी अपरात्री दार वाजू लागले की बाईमाणसाला केवढी भीती वाटते त्या मांजरीला काय कळणार?
52875383_10156891018422778_5511633219155394560_n.jpg

या पत्रात आत्ताशी कुठे वीस फेब्रुवारी संपला. पत्राची तारीख तर एकवीस आहे. म्हणजे अजून अख्ख्या दिवसाचा प्रवास लिहायचा बाकी आहे.

सकाळी उठले तर कोवळे ऊन पडले होते ते एवढे सुखावह वाटले. डबल डेकर ब्रिज सोनेरी उन्हात जसा काही दिसत होता ते चित्र आयुष्यभर मनात कोरून राहील.

53373545_10156893168622778_4949546674419662848_n.jpg

सकाळी मी गावाच्या आत आत खासी कुटुंबांचे रुटीन आयुष्य पहात भटकत राहिले. इथे एकेका जोडप्याला दहा बारा पंधरा मुले सहज असतात. लहान मोठी मुले मिळून ज्या शाळेत शिकतात त्या शाळेला दोनच वर्ग आहेत. मुलेच शाळेचे कुलूप उघडतात. शाळा सुरु व्हायच्या आधी शाळा साफ करतात. शाळेची घंटाही मुलेच वाजवतात. घंटेचा नाद डोंगरात घुमतो. काहीच मिनिटात डोंगराच्या चहू दिशांनी पळत पळत पोरे शाळेच्या अंगणात जमतात. तोवर टीचरचे आगमन झालेले नसतेच. मग शाळेच्या आवारात मुलांचे खेळ सुरू होतात. वेळ सरतो तसे एकेकजण वर्गात जाऊन बसतात. शाळेचे दोन वर्ग बाजूबाजूलाच भरतात पण शाळेत टीचर एकच! ते कधीतरी येतात. आता ते कधी आले नि त्यांनी मुलांना काय शिकवले ते पहायला मी थांबले नाही.

52783835_10156893206177778_8265447794152570880_n.jpg

मी निघाले. नुकतीच सकाळ झाली म्हणजे खरतर माझ्याकडे अख्ख जंगल भटकेंन एवढा वेळ आहे. पण बरोबर गाईड नाही, त्यामुळे माझे सामान उचलायचे आणि वाट न चुकता तैरना ला पोहीचायचे या दोन जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या. नदीच्या थंड पाण्यात मी अंग चोळत चोळत अंघोळ आटपत असताना, पोलंड वरून आलेल्या एका प्रवाशाने मला हुडकून काढले. तो सांगत होता की, "तू मला जंगल क्वीन सारखी दिसत आहेस."
52964832_10156893194567778_818131647151996928_n.jpg

ओल्या कपड्यानिशी इथे तिथे फिरत फिरत मी एक गुहा शोधून काढली. पण परतीची वाट मात्र कशी ती चुकले. आणि जंगलात हरवले. काही केल्या दिशा कळेना तशी भीती वाटू लागली. काहीच सुचेना तशी फतकल मारून मी तिथेच बसले. थोडा वेळ जाऊ दिला. सारे बळ एकवटले नि परत उठून अंदाजाने चालत राहिले. दिशा कळतच नाही अशा परिस्थितीत विसेक मिनिटे चालले असेन. तेव्हा मला पायऱ्या दिसल्या. पण काल उतरले त्या या पायऱ्या निश्चितच नाहीत. असो पायऱ्या आहेत म्हणजे रस्ता आहे हे ही नसे थोडके! या पायऱ्या मला कुठेतरी नेतीलच. पंधरा एक मिनिटे तशी गेली. दुरून माणसांची कुजबूज ऐकू आली. मला इतकी इच्छा होत होती बैगेतली शिट्टी काढून वाजवावी. संकटकाळी उपयोग व्हावा म्हणूनच तर तिला जवळ बाळगली आहे. पण ते फारच ड्रॅमॅटीक होईल असे वाटले. मी पायऱ्या चढतच राहिले. आणि एक क्षण जेव्हा असा आला की दोन ट्रेल्स एकमेकांना जुळतात ते दुरूनच दिसले तसा माझ्या आनंदाला पारावर रहात नाही. अंगात नवीन बळ संचारले आणि झपाझप मी तेवढे अंतर काटून त्या पायऱ्यांच्या जंक्शनला जाऊन पोहोचले.

आता फक्त एकच आव्हान राहिले. आताशी म्हणे 1500 पायऱ्या संपल्या. अजून 2200 पायऱ्या चढायच्या. मी दमून गळून गेले आहे. पाच पायऱ्या चढल्या की धाप लागते या वेगाने साधारण 450 वेळा विश्रांती घ्यावी लागणार ... छे छे ... काहीतरी अवास्तव वेग आहे. थोडी मनाची शक्ती वाढवून मी खटपट करीत 10 पायऱ्या चढते .. म्हणजे 220 वेळा विश्रांती घ्यायची ... कसचे काय दमछाक अशी होते की घटकाभर थांबले तरी पुन्हा चार पायऱ्या ही चढवत नाहीत.
माझ्या परीने मी शब्दात सांगायचा प्रयत्न केला की तेव्हा परिस्थिती काय होती! पण आयुष्यात इथे एकदातरी यायलाच हवे. मी हा ट्रेक पूर्ण केला म्हणजे कोणीही करू शकेल एवढे नक्की!
रबर च्या झाडाची मुळे (roots) हव्या त्या दिशेने वळवून मग त्यांना रुजवून 15-20 वर्षानी असा ब्रिज तयार होतो. वर्ष सरतात तशी त्याची ताकद वाढत जाते. एक ब्रिज जवळजवळ 50 लोकांना एका वेळेस उचलून धरेल. इंजिनिअर्स ने बांधलेले ब्रिजेस् कमी येत नव्हते म्हणून नदी पार करण्यासाठी मेघालयातील लोकांनी या प्रकारचे ब्रिज तयार करायला सुरुवात केली त्याला आता 180 वर्षे उलटून गेली.
52859394_10156893174302778_722030899205505024_n.jpg

पुढे कुठे जायचे याबद्दल माझा काही प्लान नव्हता. शेअर टँकसी मिळेपर्यंत बराच वेळ गेला. शेवटी चेरापुंजी पर्यंत एक गाडी मिळाली. मी त्यात घुसले. म्हणजे आज मुक्काम चेरापुंजी!

पत्र साऱ्यांना लिहिलंय. जमल्यास उत्तर नक्की लिहा. आणि हा प्रवास करताना माझ्याबरोबर तुम्ही सारे आहात त्याबद्दल Thanks and Love
सुप्रिया

 

53264630_10156897055572778_2975813965579288576_n.jpg

22nd फेब्रुवारी 2019

प्रिय विद्या,

चाळीस वर्षांची आपली मैत्री, आयुष्यातल्या एकेक सर्वात आनंदाच्या किंवा दुःखाच्या वेळी तुझ्याजवळ मी, माझ्याजवळ तू होतो. पेनाने लिहिलेले पत्र पोस्टाच्या लाल पेटीत टाकायच्या जमान्यापासून आपण एकमेकांना पत्र लिहित आहोत. तू मुंबई सोडून गेल्यावर थोडा पत्र लिहायला उशीर काय झाला की नालायक बेशरम मूर्ख गाढव ... अशी सुरवात केलेले तुझे पत्र पोस्टमन आणून द्यायचा. आता या पत्रांच्या मालिकेत तुला वगळले तर शिव्या हासडत मला ठोकून काढशील. शिव्यांचं काही नाही गं, तुझ्या तोंडी त्या ही गोड वाटतात, पण दोन वर्षांपूर्वी वजन पाहिले होते ते 105 किलो होते, आठवतंय ना? तू ठोकून काढलस तर माझ्या जीवाला नाही झेपणार Wink म्हणून आजचं पत्र तुला!
52868323_10156897055732778_9222965990646611968_n.jpg

चेरापुंजी चे माझे घर इतके टुमदार सुंदर होते काही विचारू नकोस. रात्री जेवायला उठायचीही ताकद नव्हती पण कालच्या प्रवासाच्या अनुभवानंतर, आधी पोटाचे आणि नंतरच प्रवासाचे पहायचे हा धडा शिकले. मग बाजूच्याच एका टपरीवर जाऊन तीस रुपयांचा चिकन भात खाऊन घेतला नि गादीत जाऊन लुडकले.

सकाळी उठले तर अंग ठणकत होते. एरव्ही उठल्या उठल्या बॅग उचलून पुढच्या प्रवासाला निघाले असते, पण आज अंग गादीतून बाहेर निघायही मागत नव्हते. पण मग मला आठवले की पिऊन तरर होणारी समस्त मंडळी दुसऱ्या दिवशी एखादा साथीदार डोके धरून बसला की उतारा घ्यायचा सल्ला देतात. म्हणजे आज नाही उठले तर अंग आणखी धरेल म्हणून उठले नि चेरापुंजी फिरायला निघाले.

कुठे जायचे ठरवले नव्हते पण एक रस्ता पकडला नि चालायला सुरुवात केली. एका दुकानात चॉकलेटस घेतली तेव्हा हा रस्ता कुठे जातो ते विचारले तर कळले अर्धा किलोमीटर वर मोस्माई गुहा (mawsmai cave) आहे. तेव्हा कुठे मला कळलं की मी कुठे चालले होते. अर्धा किलोमीटर एवढा व्यायाम उतारा म्हणून पुरेसा होता पण दोन एक किलोमीटर चालले तरी अर्धा किलोमीटर संपेना.

रस्ता चालत नव्हतेच मी, काहीतरी वेगळंच चालू होतं. खूप लाज वाटत होती आणि हसू येत होत. पाऊले वाकडी पडतात तो चालण्यातला डीफेक्ट म्हणून खपून जाईल गं. पण चालता चालता दोन दोन मिनिटांनी नकळत पाय ढोपरातून टूम करून दुमडतात. माझा त्यावर काहीही control नाही पण समोर बघणाऱ्याला कसे कळावे की माझे हे नेमके काय चालू आहे? सर्कशीतला बुटका विदुषक झोपळ्यावरून पडला की सारे हसतात, माझे तसे झाले होते, मी कशीबशी दुमडुक दुमडुक चालते ती त्याक्षणी मला हेरणाऱ्यांसाठी करमणुक होती.

तीन किलोमीटर चालल्यावर एकदाचा Mawsmai चा milestone दिसला. कुठच्या angle ने caves अर्धा किलोमीटर वर होत्या कोणास ठाऊक? या तर Milestone वर लिहिले होते 4 किलोमीटर! त्याच्या बरोबर सेल्फी काढायला गेले तर बसताच येईना. फार प्रयत्नाने एकदा बसले तर उठत येईना. आजच caves बघायला चालले आहे हे एका अर्थी बरे कारण काहीच वेळात एकूणच माझी सरपटायलाच सुरवात होणार असे दिसत होते. Lol

52690321_10156897055882778_5847226377228517376_n.jpg

Mawsmai च्या आत sand stone चे वेगवेगळ्या आकाराचे rock forms तयार झाले आहेत. ज्याला त्यातले कळते त्याने तर पावलापावलावर stalactites आणि stalagmites निरखत रमावे.
53336745_10156897056317778_1081422638569488384_n.jpg

गुहेने जबडा मोठ्ठा उघडून आ वासला आहे तरी तिचे पोट मात्र निमुळते आहे. पोटात भरपूर bats आहेत. आत शिरल्यावर एक वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते... इथे पावसाळ्यात पाणी असते नशीब आता नव्हते, त्यामुळे मला सरडा होऊन फिरता आले. आता उतारा नशेपेक्षा कडक झाला असे म्हणायची पाळी आली तसे परत जाताना बजेट ला बाजूला ठेउन गपचूप टॅक्सी करून गेस्ट हाउस वर गेले. माझ्या खोलीतच एक छोटीशी लायब्ररी होती. त्यात टूरिस्ट ला आवडतील अशी अनेक पुस्के होती. एका पुस्तकात मला Mawphlag या जागेचा उल्लेख सापडला.

हातात हात घालून वसलेल्या टेकड्यांच्या कुशीत बसलेल्या Mawphlang ला Scotland of the East म्हणून ओळखातात. या गावाने डोक्यात sacred forest चा तुरा माळला आहे. आपल्या देशातील अनेक मोठमोठ्या हस्ती खास हे sacred forest बघायला या जागेला भेट देऊन आल्या आहेत. ही sacred forest काय ची भानगड काय आहे जाऊन पाहायलाच हव. मग निघाले ...Mawphlang!
कुठून कुठे पोहोचले ते एका वाक्यात लिहून संपले. पण बॅग पॅकींग करणारा 46 किलोमीटर अंतर तीनदा वाहने बदलून तीन तासांनी इथे पोहोचतो. पोहोचायला दुपारचा एक वाजला, पण प्रथमच दिवसा उजेडी इच्छित स्थळी पोहोचले म्हणून मी जाम खूष होते. आज रात्री जिथे रहायचे तिथेच बॅग टाकून उरलेला दिवस हुंडारायला निघायचे.

नव्या गावात उतरल्यावर कुठल्या वाटेने चालायचे हे ही विचारावे लागते. खासी भाषा मला कळत नाही आणि हिंदी त्यांना बोलत येत नाही. म्हणून मी 'होम स्टे' हा एकच परवलीचा शब्द वापरायचा असे ठरवले. एवढा शब्द साऱ्यांना कळायचा. त्यानुसार जी दिशा दाखवली त्या रस्त्यावर 15 मिनिटे चालून मी जिथे पोहोचले तिथे होम स्टे चे 2000 रुपये मागू लागले. माझ्या एक दिवसाच्या सरासरी खर्चाच्या दुपटीपेक्षाही ते जास्त होते. अशा वेळी कोणी काय करेल ते मला माहित नाही. मी मात्र तिथेच मांडी ठोकून ठाण मांडून बसले.

53419754_10156897058842778_2479069056125108224_n.jpg

मला याच गावात रहायचे आणि एवढा खर्चही परवडणार नाही, या कारणाने ते आंदोलन होते. हळूहळू गावात इकडे तिकडे चर्चा सुरू झाली. कोणीतरी हिंदी भाषा बोलू शकणाऱ्या आयसिलियाला संवाद साधण्यासाठी बोलावले, तिने sacred group office मध्ये जाण्याविषयी सुचवले. तिथेच मला काहीतरी मदत मिळेल असा तिचा सल्ला होता. बैग उचलून निर्जन रस्त्यावरून दोनेक किलोमीटर चे अंतर चालत मी इथे पोहोचले तरी पुन्हा तेच! ईथे तर टुरिस्ट गाईड्सची युनिअन होती. म्हणजे बार्गेनिंग ला काही स्कोपच नाही. साऱ्यांनी मला परोपरीने सांगितले की या गावात माझ्या बजेटमध्ये रहायची सोय होऊच शकणार नाही. नाही म्हणजे नाही. पण मी ही काही कमी चिक्कट नाही म्हणजे नाहीच. पाच वाजले, थोड्याच वेळात अंधार पडेल तरी मी बेशक त्या युनिअनच्या अड्ड्यावर माझे पत्रलेखन करीत शांत बसून राहिले.

52938323_10156897059067778_3693181677057605632_n.jpg

ऑफिस बंद करायची वेळ झाली तसे एका गाईडने विचारले, "अब क्या करोगे?"
"पता नही, आप के God की जो मर्जी होगी।

एकदा आपण चिंता सोडली की तिला जो उचलेल त्यालाच ती चिकटते. सरतेशेवटी तो गाईडच म्हणाला, "एक रूम है पर अंदर सिर्फ एक बेड है और कुछ नही, उधर रहोगे?"
मी त्याच्याबरोबर जाऊन पाहिले तर एका सुंदर होम स्टे मध्ये प्रवाशांच्या ड्राययव्हरची झोपायची सोय केली जाते, ती खोली होती. दिवसभराच्या थकव्या नंतर झोपायला आणखी काय लागते? पत्र लेखन पूर्ण करून, शेजारणी ने दिलेला सुकाच भात खाऊन (इथले लोकल्स हेच खातात) साडे सातला मी गाढ झोपुनही गेले.

53405335_10156899709357778_1205817849377980416_n.jpg

तुझ्या जवळ रहायला म्हणून येणार काय होते नि अचानक इथे ट्रिपलाच निघून आले. मी दूर आहे पण मला तू बिनातक्रार आयुष्याशी कसा सामना करत आहेस त्याची जाणीव आहे. आयुष्याचे, नात्यागोत्यांचे, भावभावनांचे मर्म जसे तुला कळले तसे सर्वांना कळू दे. माझे तर भाग्य असे की तुझ्यासारखी मैत्रिण मला मिळाली.

विद्या, आयुश ची परीक्षा सुरू होईल त्याला मावशीने all the best केले आहे ते सांग. खूप वर्षांनंतर तुला पत्र लिहिलं, मज्जा आली. जमलं तर तू पण उत्तर लिही ना गं.

तुझीच
सुप्रिया

23rd फेब्रुवारी 2019

प्रिय मयूर,

शेल्टर डॉन बोस्को ची सगळी मुलं मला एकसारखी आहेत. माझी लाडकी आहेत. आज एकेकाची आठवण येतेय, त्याला कारण ही तसेच आहे. पण पत्र एकालाच लिहायचे ना, मग तुला लिहायचे असे ठरवले. तू माझ्यावर खूप विश्वास टाकला आहेस, हे मला माहीत आहे. जरी तू मला ताई म्हटलसं तरी मी तुझ्या आईसारखी आहे. त्याच नात्याने सांगते. चांगले गुण शिक, मोठा हो, आनंदी रहा. तुझे आयुष्य खडतर आहे, पण स्वतःवर विश्वास आणि कुठेतरी अढळ श्रद्धा असली की सहसा कुठंचेही कठीण आव्हान पेलतना डगमगायला होत नाही.

या Mawphlang ला रहाणाऱ्या लोकांची तर एका जंगलावर गाढ श्रद्धा आहे. त्याचे नावच sacred forest असे पडले. आजूबाजुला पसरलेल्या पठारी टेकड्यांच्या मधे हे sacred forest दिमाखात उभे आहे. माणसासाठी अनेक उपयोगी वनस्पती ह्या जंगलात सापडतात. पण जिथे श्रद्धा जोडली तिथून काही उचलायचे नाही म्हणून झाडावरून गळून पायाखाली पडलेले पान, फुल सुद्धा स्वत:साठी घ्यायची परवानगी नाही. पूर्वजांनी स्वतः चे आयुष्य पणाला लावून ज्या जंगलाला वाचवले, त्यातील एका फांदीलाही हात लावायची कोणाची हिम्मत नाही. पूर्वी जनावरांना बळी देऊन जंगलाचा मान राखला जायचा, प्रत्येक sacrifice च्या नावाने एक शिळा जंगलात रोवली जायची. एक दिवस बैलाचा बळी देण्याआधीच दाव तोडून तो पळाला तेव्हापासून ती प्रथा बंद पडली.
53343473_10156899707527778_710865431639883776_n.jpg53065687_10156899649287778_1849887077752111104_n_0.jpg

ह्या जंगलात जो गाईड मला घेऊन गेला त्याने फेरफटका मारताना तिथल्या कित्येक चमत्कारिक कथा नि प्रथा मला सांगितल्या. फेरफटका अटपला तरी अख्खा दिवस हातात होता. तशी मी चालत चालत रोड वर आले नि एक ऑटो पकडली...म्हटलं नोंग्थम लेक ला जाऊन येऊया, ऑटो ने मार्केट मध्ये सोडलं. पुढचा एक टप्पा शेअर टॅक्सी ने पार केला. तिथच्या वळणावर पुढच्या वाहनासाठी बराच वेळ रखडून उभे रहावे लागले. तासभर उलटला तरी पुढे जायची काही सोय होईल असे दिसेना तशी मी तर 15 किलोमीटर ची वाट चालायला सुरुवातही केली पण एकदा तिथे पोहोचले नि दिवस मावळायच्या वेळेस नेमकी परतायची सोय झाली नाही मग वांदे होतील! हे सुचले तशी उलटी वळले. मग म्हटलं शिलॉंग ला जाऊन त्या रस्यांवरून फेटफटका मारावा. तिथे पोहोचले तर कळले की परत Mawphlang जिथे मी रहात होते तिथे परत जायची सोय सुद्धा फार उशिर केला तर होणार नाही.

एरव्ही मी अशा परिस्थितीत फारशी चिंता केली नसती, पण आज धडपड करून त्यातून मार्ग काढायची ताकद एकूणच संपल्यासारखीच वाटत होती. मग सरळ शेअर जीप मध्ये बसले नि माघारीच निघाले. Mawphlang ला पाऊस पडत होता, मी भिजून गारठून गेले. आज काहीच मनासारखे होत नाहीये असे वाटून मन हिरमुसल्यासारखे झाले. निव्वळ वेळ मारायला मी गावात चालू लागले, मन कशातच रमत नव्हते, अनोळखी रस्यावरून पावले फक्त चालत होती. रस्त्याच्या एका जंक्शनवर Boy's Home ची दिशा दाखवणारी पाटी वाचली. तेव्हाच आपल्या शेल्टर होम ची आठवण आली. किलोमिटरभर रस्ता झपझप पार केला. लहान लहान मुलांना भेटता येणार या विचाराने आत शिरायच्या आधीच चेहेऱ्यावर हसू पसरलं होतं आणि तिथे अंगणात बागडणारी मुले बघून तर मीच लहान होऊन गेले. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळले, त्यांचे होम फिरून पाहिले. माझ्यासाठी जणू मी तुम्हा सर्वांनाच भेटत होते. एकमेकांची भाषा कळत नसली तरी एकमेकांचा सहवास आवडत होता. मुलांचा निरोप घेऊन निघाले तरी मला न कळणाऱ्या खासी भाषेत त्यांचे काहीबाही प्रश्न चालूच होते, दूर वळणावर दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत राहिले. सारा शीण उतरला, तुमची आठवण मात्र आणखी तीव्रतेने येऊ लागली

51762302_10156899708997778_4195152294695665664_n.jpg

मला माझा शेल्टर डॉन बोस्को मधला शेवटचा दिवस आठवला. मुले अशीच गेटच्या आतून खूप प्रश्न विचारत होती. मग शेवटी जेव्हा मी निघालेच तशी शेवटचा लंबा टाटाबायबाय करत राहिली. तेव्हा तू मात्र दूर उभा राहून सारे पहात होतास. एक शब्दही व्यक्त केला नाहीस. गपचूप राहिलास. पण तुझे डोळे बोलत होते.
मी काय किंवा कोणी काय, आयुष्यभर तुझा हात धरून चालणार नाही रे. हेच आयुष्य आहे. उद्या काय होईल हे आज सांगु शकत नाही. आपली वाट आपण निवडायची आहे, ती आपल्याला एकट्यालाच चालायची आहे. ज्या वाटेवरून चालताना लाज वाटणार नाही अशी वाट निवडशील एवढे बघ.

परतीच्या वाटेवर मला एक ब्युटी पार्लर दिसले, त्यातच घुसले. स्वतः चे थोडे लाड करून घ्यावे असा मूड आला. मी डोक्याला मसाज करायला म्हणून गेले होते, तिने माझ्या केसांना मेंदी लावली. थंडगार पाण्याने डोके धुतले तेव्हा तर मी किंचाळत होते. त्या पोरीचं नाव बोलायला कठीण आहे पण पोरगी केवढी गोड होती, तिने तिचे भावविश्व माझ्याकडे उघडे केले, दोन तास मी तिथे होते, मी जाताना तिचे डोळे भरून आले. एवढ्याशा सहवासाने सुद्धा कोणाची केवढी ओढ वाटते.
52902829_10156899709122778_727382840773181440_n.jpg

मग मी निघाले मार्केट मध्ये. इथे जेवताना कोरडा भात खातात, मला तो घशात अडकतो तरीही बिनतक्रार गोड मानून मी खातेच. पण आजचा दिवस खाण्यापिण्याचे पण लाड करायचे असे ठरवले. एका कॅफे मध्ये जाऊन पोटभर खाल्ले, मग भरपूर फळे खरेदी करून घरी निघाले. तेव्हा साडे सहा वाजले होते. म्हणजे अंधार झाला होता हे वेगळ्याने सांगायला नको.

माझे घर मुख्य रस्ता सोडून आत आत होते, येताना रस्ता नीट लक्षात ठेवला होता तो अंधारात सापडेनाच. मिट्ट काळोख्, जवळपास वस्तीही दिसत नाही, अशात अंदाजाने वीस मिनिटे चालले असेन तर जिकडून चालायला सुरवात केली तिथेच पुन्हा पोहोचले. मग पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली. पण जिथे जिथे दोन रस्ते दिसायचे तिथे उजवीकडे की डावीकडे हे ठरवतानाच एकेक वळणावर मी जशी चुकत होते तशी आणखीनच भरकटत होते. शेवटी मी माझ्या गाईडला फोन केला, पण त्याला मी नेमकी कुठे आहे त्याचा अंदाज नाही तर तो तरी काय मदत करेल? त्याला माझी चिंता वाटू लागली, मग उलटा मीच त्याला धीर दिला. परत एकटीच चालत राहिले, मला फक्त एक घर किंवा एका माणसाला शोधायचे होते. पुढची मदत तिथेच मिळाली असती. पाच-दहा मिनिटानी मी एका झोपडीशी पोहोचले. आत अंगणात कोणीतरी वावरताना चाहूल लागली तशी मी त्याला गाठून गाईडचा फोन जोडून दिला. खासी भाषेत काय ती बातचीत झाल्यावर तो सद्गृहस्थ स्वतः मला माझ्या खोलीवर सोडायला निघाला. अंधारात वाट दाखवत तो मला घेऊन गेला ते अंतर फक्त दोन -तीन मिनिटांचे होते. म्हणजे शेवटचे वळण बरोबर घेतले असते तर कदाचित ...
असो. फक्त एखादेच वळण चुकले तरी कधी कधी आपल्या लक्ष्यापासून दूर इतस्तत: भटकत रहायची पाळी येते.

दहा मिनिटांच्या वाटेवर तासभर तंगडतोड करून मी एकदाची घरी पोहोचले. आज मी खरच खूप घाबरून गेले होते. अंगात थंडी भरली होती. भरपेट खाल्ले ते सारे जिरून गेले होते. पोटात खड्डा पडला होता होता ...भीतीने, थंडीने की भुकेने ते सांगता नाही येणार. मग मी सारी फळे खाऊन फस्त केली नि ड्रायव्हरच्या रूम मधली खरखरीत कांबळी अंगावर ओढून घेतली. माझी खुशाली विचारायला गाईड ने फोन केला तेव्हा दुसऱ्या दिवशी च्या Sunday mass ला चर्च मध्ये यायचे निमंत्रण दिले. सगळेच दिवस सारखे नसतात. आजचा दिवस यथातथाच होता. पण वेळच्या वेळी तो ही सरलाच ना? उद्या पुन्हा नवीन दिवस! चर्च मधल्या प्रार्थनेसाठी मला सकाळी सात वाजता पोहोचायचे तर उद्या वेळेवर उठायला हवे तर आज वेळेवर झोपायला हवे.

तुझी
सुप्रियाताई

24th फेब्रुवारी 2019

ए मावशी,

मला direction चा कसा मुळीच sense नाही त्या विषयी माझ्या गोष्टी चारचौघांना सांगून हसायला, हसवायला तुला मजा येते. आज तुला अजून एक किस्सा देते. कालच संध्याकाळी direction ची एवढी गोची झाल्यावर निदान आज सकाळी थोडी तरी समज यायला हवी ना? तर सकाळी घराबाहेर निघताच पहिलेच जे वळण लागते ते उजवीकडे की डावीकडे, पुन्हा तेच विसरले. बरोबर वळण घेतले तर रस्ता सरळ चर्चकडे नेणार चुकीचे घेतले तर काल ज्या रस्त्यावर भरकटत होते तिथे पोहोचणार. डोक्याला ताण देऊन नीट आठवले आणि जेव्हा खात्री पटली तेव्हाच एका दिशेने वळले. तर काय सांगू? आजही बरोब्बर उलट्याच दिशेने चालत गेले. माझ्या ते लगेच लक्षात आलं कारण त्या रस्याच्या दोन्ही बाजूंनी थडगी होती. म्हणजे काल रात्री अंधारात जे भुतासारखी गोल गोल फिरत राहिले होते ते ग्रेव्हयार्ड मध्ये? नशीब मोबाईल च्या उजेडात मला फक्त पायाखालची वाट जेमतेम दिसत होती. नाहीतर हे दृश्य दिसलं असतं तर भीतीने इथेच अर्धमेली झाले असते.
53685719_10156906439852778_550028106224631808_n.jpg

आज खासी हिल्स सोडून पुढच्या प्रवासाला निघायचे. पण कुठे निघावे? खासी हिल्स मध्य मेघालायत आहेत, पूर्वेला Jaintia Hills आणि पश्चिमेला Garo Hills! नाहीतरी इथे तिथे जाऊन शेवटी निसर्गसौंदर्यातच डुंबायचे, म्हणून मी पूर्वपश्चिम दोन्ही दिशा रद्द करून मध्य मेघालायातच नोहवेत म्हणून कायशा गावी जायचे ठरवले. तसे या गावाची मला विशेष ओढ लागली होती असं नाही पण इथे हाली रहातो. गोहाटीला सब्यसाचीशी ओळख झाली तेव्हा त्याने हालीच्या घरी जरूर रहा, असे सुचवले होते. या गावात राहिले तर भारत-बांगलादेश बोर्डरलाही भेट देता येईल अशीही माहिती मिळाली होती. अतिसाधारण भूप्रदेशाला असाधारण महत्व दिले गेले असेल तर त्यात समस्त देशांच्या इंटरनेशनल बोर्डरस मोडतात. त्यातूनही एखाद्या सीमेचे सिमोलंघन हा फारच वादाचा मुद्दा करून ठेवला असतो तेव्हा सर्वात आधी माणसातली माणूसकी सीमित झालेली दिसत असते. सीमेची समीकरणे सोडवत एकटीच जेव्हा भारत-पाकिस्तान बोर्डर वर महिनाभर फिरलेय तेव्हाच विचार न करता साठी:साठी आखून घेतलेल्या मर्यादेची मर्यादा चांगलीच कळली आहे. कदाचित त्यानंतरच मला बॉर्डर्सलाचे विशेष आकर्षण वाटू लागले.

53050719_10156906439962778_3403722308899045376_n.jpg

प्रार्थना संपली की तसेच पुढे निघावे असे ठरवले म्हणून पाठीवर बॅग टाकूनच चर्चमध्ये प्रार्थनेला निघाले. इथले चर्च गावातील मुख्य रस्त्यालगत आहे. खासी भाषेतील प्रार्थना आणि उपदेश जसे आटोपले तसे मी बाहेर येउन मार्केट ला जायला वहान शोधू लागले. गावापासून मार्केट पर्यंतच्या पहिल्या टप्प्यावर इथे सीटच्या भाड्यावर लोकल ऑटो चालते. कुठच्याही गावाला का कायचे असेना आधी मार्केट पासून शेअर टॅक्सी करून शिलॉंग ला जायचे. नॉर्थ इस्ट च्या seven sisters ला भेट द्यायचे म्हणजे जसे गोहाटी अटळ आहे तसे मेघालयात इकडून तिकडे फिरायचे म्हणजे शिलॉंग ला भोज्जा करावा लागतो. मग शिलॉंगच्या वेगवेगळ्या स्टँड पैकी कुठून नि कशी पुढे जायची सोय होईल हे बरेचदा शिलॉंगच्या लोकल्स ना ही सांगता येत नाही. निदान माझा तरी हाच अनुभव आहे.

इथे सरसकट सारे सांगतच होते की मेघालय मध्ये रविवारी वाहतूक बंद असते. प्रवासाची काहीही सोय होणे कठीण आहे. पण तुझी भाची तुझ्यासारखीच! स्वतः प्रयत्न करून बघितले नाहीत तर मन मानत नाही. रविवारी ऑटो च्या वर्दळीशिवाय रस्ते ओस पडतात तशी गावातील पोरे त्याचा क्रीडांगणासारखा वापर करतात. रविवारचे हे समीकरण लक्षात आले तसे मी मार्केट कडे चारेक किलोमीटर चा रस्ता पायी चालायला सुरुवात केली. मी अगदी पाच मिनिटं चालले असेन, पाठून गाडीचा आवाज आला तसे झटकन मी त्या टुरिस्ट टॅक्सीला हात केला. गाडी थांबली ती संधी साधून मी टुपकन गाडीत चढुनही बसले. ड्रायव्हर त्याच्या friend (प्रेयसीला) भेटायला शिलॉंग ला चालला होता. दिवसाची सुरुवात अशी गुडलक ने झाली की मला खूप मज्जा येते.

map.jpg

शिलॉंग ला पोहोचले, थोडी तसदी घ्यावी लागली, थोडा वेळ गेला पण आज रविवारी सुद्धा पनुरस्ला ला जायला एक शेअर जीप निघत होती, हे नशीब म्हणायचे. एवढे सारे सुरळीत होउन या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र माझी वाट लागली. माझ्याकडे इंटरनेट नसल्यामुळे पनुरस्लाहून पुढे कुठचा रस्ता घ्यायचा हे नीटसे कळत नव्हते. रविवारची हक्काची विश्रांती सोडून सवारी घ्यायला एकही टॅक्सी तयार होत नव्हती. रस्त्याच्या कडेला उभे राहून बिचाऱ्या चेहऱ्याने, अनेक प्रकाराने खाणाखुणा केल्या तरी इथचे गाडीवान मुळीच दखल घेत नाहीत (किंवा माझा अवतार बघून माझी दखल घेतली नसेल.) पण एरव्ही भारतात इतर ठिकाणी अडचणीत hitchhiking जसे कामाला येते तसे काही मेघालयात होत नाही, असा माझा अनुभव आहे. पहिल्या दोनेक दिवसातच ते लक्षात आले होते तेव्हापासून hitchhiking चा नाद मी मेघालयपुरता सोडून द्यायचा असे ठरवले होते. खूप हात हलवूनही एकही गाडी थांबतच नसेल की आजूबाजूचे बघे आपल्याकडे बघून हसतायत असे उगीच वाटते. मला त्याची खूप लाज वाटते. पण आज मात्र ती लाज बाळगून चालणार नव्हते. ट्रक पासून बाईक पर्यंत साऱ्यांना थांबवायचा प्रयत्न केला असेल. जवळजवळ तासभर उलटला तरी यश येईना. शेवटी एकदाची एक गाडी थांबली. त्या गाडीत एक बांगलादेशी टूरीस्त जोडपे त्यांची भारतातील ट्रीप संपवून परत चालले होते. माझे नोह्वेत चे वळण त्यांच्या परतीच्या वाटेवरच लागत होते. मनात हुश्श म्हटले, गाडीतील जोडप्याला थँक्स म्हटले आणि पुढच्या सीटवर सरसावून बसले. पुढे जे झाले ते अनपेक्षित होते.

बराच रस्ता सरल्यावर एका वळणावर ड्रायव्हरने मला उतरायला सुचवले, तशी मी उतरले. तो स्पॉट बांग्लादेश बॉर्डर च्या जवळ होता. ते वळण नुसतेच अनोळखी नाही पण निर्जनही वाटत होते. नाही म्हणायला बेवड्यांचा एक अड्डा तिथे जमला होता त्यापैकी माझ्याच वयाच्या बाप्याने मम्मी हाक मारली ते ऐकून मला all is well असे वाटले. त्यांना माझी काळजी वाटत होती याचे कारण की Nohwet ला जायचे ते वळण मुळी नव्हतेच. ड्रायव्हर ने गप्पांच्या ओघात चुकून मला पुढे आणून सोडले होते. या जंक्शन वरून पुन्हा एखादी गाडी उलटी जायला मिळेल याची शक्यता फार कमी आहे, असे सर्वांचे म्हणणे पडले. त्यांनी मला बिअर प्यायची का असे विचारले. अर्थातच मी नाही म्हटले. (नाहीतर काय तिथे त्यांच्या सोबत मी पीत बसणार होते? तसे त्यांना वाटले तरी कसे?)

तिथे एक टॅक्सी वाला आला जो मला अक्षरशः विनवत होता की मला सहाशे रुपये दे मी तुला Nohwet ला घेऊन जातो. शेवटी तो फुकट मला नोह्वेटला सोडायला तयार झाला. पण त्या प्रसंगात एकूणच कोणावर विश्वास टाकायचा की नाही याबद्दल माझ्या संवेदना जास्त तीक्ष्ण झाल्या होत्या. त्याला माझ्या सुरक्षेची काळजी लागली होती हे जे तो म्हणत होता ते खरेही असेल कदाचित, पण वेळ चालला होता या कारणाने panic होऊन मला आगीतून फोफाट्यात शिरायचे नव्हते. म्हणून मी तिथेच थांबून राहिले. बराच वेळ सरला असेल. एकेकजण आपापल्या वाटेने निघून गेला. मग या गोष्टीचा खरा हिरो आला. इतका वेळ समोर बसून तो सारे पहात होता. त्याने माझ्याशी बंगाली भाषेत बोलायला सुरुवात केली. मला तो कायकाय बोलतो त्यातील दोनच वाक्ये कळत होती. एकतर तो मला सांगत होता की "तू बांगलादेशी"! तो जितके वेळेला हे बोलला तितक्या वेळेस मी त्याला सांगितले की, "मै मुंबई से आयी हू”. ते मात्र त्याच्या डोचक्यात शिरत नव्हते. दुसरे तो मला सांगत होता की, "चल माझ्या घरी चल". आधी दूर बसला होता, हळूहळू जवळ जवळ सरकू लागला नि घाई घाई करू लागला, "चलो चलो...' मी त्याचा व्हिडिओ घेऊन ठेवला.

53514149_10156906440282778_6419958092896665600_n.jpg

कुणाची मदत मागायला माझ्या फोन ला रेंज नव्हती हे जरी खरे असेल तरी माझ्या रेंज मध्ये तो आला असता तर त्याला मदतीला चार माणसे लागतील अशी लाथ झाडायची तयारी ठेवली होती. दरम्यान एक टँकसी वाला जंक्शन वरून चालला होता त्याला मी थांबवले आणि सारे सांगून पोलीसचा पत्ता विचारला. माझा प्लॅन तिथून तडक पोलीस स्टेशन ला नेऊन तक्रार करायची हाच होता पण त्या टँकसीवाल्याने स्वत: खटपट करून, तिथून थेट Nowhet ला जाणारी एक गाडी मला मिळवून दिली.

मला Nohwet ला Hali च्या घरी जायचे एवढेच माहीत होते. त्या माहितीवर गाडी थेट हालीच्या घरासमोर जाऊन उभी राहिली. योगायोगाने ते कुटुंब त्याच गावाचे रहिवासी होते. या देखण्या गावात शिरल्या शिरल्या माझा शीण निघून गेला होता पण जिथे मुक्काम करायचा ते हालीचे घर बघून तर मला काय करू नि काय नको असे झाले. बर गंमत अशी की जरी हाली त्या वेळेला कामानिमित्त बाहेर गेला होता तरी घराचा दरवाजा सताड उघडा होता आणि घराच्या पायऱ्यावर बसल्या बसल्या इन्टरनेटची थोडीशी रेंज पकडली तसा हालीचा मेसेज टपकला, “मी थोड्या वेळाने येईन. काही खायला सापडले तर खाऊन घे आणि आराम कर.”

53399771_10156906440382778_5122506033926766592_n.jpg

आत्तापर्यंत आयुष्यभरातील सर्व प्रवासात मिळून राहिलेल्या paid home stays पैकी हे घर मला सर्वात आवडले. त्याचे कारण फक्त टुमदार घर एवढे नाही पण त्या घराचे घरपण हे आहे.
हालीच्या बद्दल काय सांगू की त्याने माझी केवढी काळजी घेतली? तो चहा, नाश्ता, जेवण, फळे असे जे काही स्वतः खात असे ते ते सारे ते माझ्याबरोबर वाटूनच खात असे. मी त्याला म्हटले दोन हजारची सुटी रक्कम माझ्याजवळ नाही तर त्याला गैरसमज झाला की दोनहजारशिवाय जास्त रक्कम माझ्याकडे नाही. त्यामुळे तो पैसे घ्यायला ही का कू करायला लागला.

ही पत्र वाचून अनेक जण अशी ट्रिप करायची स्वप्न पहातात पण ते स्वप्न जगायची ओढ नि हिम्मत सर्वांच्यात नसते. पण सोलो ट्रीप चे स्वप्न जो सत्यात उतरवतो तो खूप मोलाचे अनुभव गाठीशी घेउन परत येतो. मला वाटत, माझी पत्र वाचून नुसताच प्रवास नाही पण त्याचे सार ज्यांना जाणता आले त्यांना अशा प्रवासाचे वेध नक्की लागतील.
सांग ना मावशे, तुला तुझ्या पुढच्या ट्रीपला अशी solo भटकंती करायची?

तुझ्यासारखीच तुझी भाची
सुपी.

26th फेब्रुवारी 2019

प्रिय सब्यसाची,

प्रवासात जोडल्या गेलेल्या मित्रांमध्ये एक नाव तुझे येते. मला मराठीतून तुझं नाव कसं लिहायचं ते येत नाही. आणि इंग्लिश मधल्या you चे मराठीत मी 'तू ' असे आपणहूनच भाषांतर केले.
माजुली हून परतताना आपण चहा नाश्ता आणि एकमेकांचा निरोप घेऊन निघालो. नंतर गाडीत मयूर ने मला तुझ्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याने तुझ्याबद्दलची आस्था, आदर, प्रेम आणखी वाढले. असं वाटलं मनात अनेक प्रश्नही आले ज्याची उत्तर आता सहजी मिळणार नाहीत. तुझ्या अनुभवातून आयुष्याबद्दल नक्कीच खूप सारे शिकण्यासारखे आहे. उगीच मी त्या गोलमटोल डुकरांच्या पाठी फोटो काढीत फिरत राहिले, जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या सर्वात नाजूक विषयावर बोलत होतात.

तुला पत्र लिहायचे दुसरे कारण की निव्वळ तू सांगितलंस म्हणून नोहवेत ला जाऊन रहायचं असं ठरवलं. आणि एकदा तिथे गेले काय तर तिथून पायच निघेना. दावकीला कॅम्पिंग करून परतताना नोहवेत च्या वाटेवरच्या शेवटच्या टप्प्यावर आज ही hitch hiking करतच आले. मेघालयात अशी संधी मिळाली म्हणजे विशेष वाटते!

इथे नेमके काय फिरायसारखे आहे याची फारशी कल्पना नाही तरी इथेतिथे वार्ता करत आज पायीपायीच गाव हिंडत फिरायचे असे ठरवले. पूर्वी जेव्हा स्त्रिया अंगात चोळी घालत असत तेव्हा एका खांद्यावर गाठ मारलेले हे जैनसेन हे पारंपरिक वस्त्र छातीपासून ढोपरापर्यंत शरीर झाकत असे. आताशा बायका मॉडर्न पोशाख घालून शास्त्र केल्यागत वरून हे जैनसेन गुंडाळतात.

इथली हालीच्या समोर रहाणारी शेजारीणसुद्धा माझा चांगला पाहुणचार करते. आज तिने तिचे ठेवणीतले जैनसेन मला लावून दिले. ते माझ्या कपड्याला मॅचिंग झाले तसे ते अजून खुलून दिसते असे ज्याला त्याला वाटू लागले. माझे सेल्फीबेल्फी चालले होते तेव्हाच हाली ने हाक दिली. त्याचा कोणीतरी मित्र गाडी घेऊन फिरायला निघत होता त्याबरोबर त्याने माझीही फिरायची सोय केली. आम्ही कुठे कुठे जाणार हे विचारून मी इंटरनेट वर त्याबद्दल काही माहिती मिळते का ते शोधू लागले.

53646154_10156915680912778_5849912965171511296_n.jpg53547748_10156915681037778_5680839503095267328_n.jpg

नोह्वेत मध्ये १८० वर्षांपूर्वी उभारलेली एक पारंपरिक खासी झोपडी आहे, एका साध्या खिळ्याचाही वापर न करता ती कशी बांधली ती कारागिरी लाजवाब! शंभर एक वर्षांपूर्वी उभारलेल्या या झोपडीत मला खासी परंपरेचे दुर्मिळ नमुने बघता आले.
आम्ही गाडीतून झोपडीत शिरेपर्यंत आणि झोपडीतून गाडीत शिरेपर्यंत सुद्धा मला हेरून गावकरी कुजबूज करू लागले होते. जरी मला खासी भाषा कळत नसेल तरी त्यांच्या नजरेतील कौतुक दिसत होते. माझ्या मचिंग जैनसेंग मुळे पुढचा सारा दिवस मी इथल्या स्थानिक लोकांच्या कौतुकाला पात्र झाले.

52917958_10156915727057778_2012430424306876416_n.jpg

2017 मध्ये मावलिंनोंग (mawlynnong) ह्या गावाला एशियामधील सर्वात स्वच्छ गाव हा किताब मिळाला, ते गाव, खरतर गावासारखे वाटतच नाही. टुरिस्टचे आकर्षण ठरावे म्हणून एखाद्या एजन्सीने आखीव रेखीव रस्त्यांच्या दुतर्फा मुद्दाम बगीचा तयार केला असावा असे वाटते. पण ते खरे नाही. एका दशकापेक्षा जास्त काळ इथल्या जेमतेम 90 कुटुंबतील लहानमोठा प्रत्येक सदस्य महिन्यातून तक कधी कधी दोन दिवस गावासाठी श्रमदान करतो. इथे कोपऱ्या कोपऱ्यावर बांबूच्या टोपल्या कचरा टाकण्यासाठी बनवल्या आहेत. टुरिस्टने त्यात टाकलेले चिप्स इत्यादींचे प्लास्टिक जाळतात खरे पण गावासाठी तीच एक मोठी समस्या झाली आहे. नाहीतर सांडपाण्याचा निचरा, विजेची बचत, कचरा नियोजन ...अशा कितीतरी सिस्टमस गावात वर्षवर्षं अस्तित्वात आहेत. जे तिथे उगवते, तेच वापरले जाते, तेच सांभाळले जाते नि शक्यतो रिसायकल केले जाते.
एका छोटुशा दगडाने उचलून धरलेली भलीमोठी शिळा, जी कुठच्याच वारा-वादळात किंचितही हलत नाही (balancing rock) ती गम्मत इथे पहायला मिळते. इथे अनेक घरांच्या अंगणात ट्री हाउसेस बांधली आहेत तिथून बांगलादेश बॉर्डर बघता येते म्हणे!
53745020_10156915727137778_583803711860506624_n.jpg

हालीच्या मित्राला पुढे दुसऱ्या गावी जायचे म्हणून परतीची सोय माझी मला करायची होती. गावाबाहेर पडून पायी चालत चालत मी इथला छोटू रूट ब्रिजचा रस्ता घेतला. ज्यांना नॉग्रीहाट झेपणार नाही त्यांच्यासाठी हा ब्रिज ठीक आहे!

53361243_10156915726997778_8537735741327802368_n.jpg
परत येताना पाचेक किलोमीटर चालून मी नोव्हेत ला घरी आले तेव्हा घराघराच्या अंगणात कुटुंबातील सदस्य एकत्र बसून गोष्टी गप्पा करत होते नि मुले रस्त्यांवर खेळत-हुंदडत होती. माझ्या गल्लीत तर समोर शेजारणी ने गाणी लावली होती त्या तालावर हाली रस्यावर नाचत होता. मी माझ्या खोलीच्या खिडकीत बसून पत्र लिहायला घेतले तसा समोरच्या शेजारणीचा मला चहा आला. तिच्या अंगणात अजून चार लोक चहा प्यायला जमले ते केंरम खेळत तिथेच बसले. खिडकीतच पत्र लिहित बसले आहे. समोर काय हास्यविनोद चाललाय माहित नाही पण माहोल मज्जा मस्तीचा दिसतो आहे. इथली लोकं एक संध्याकाळ सुद्धा कशी साजरी करतात बघून मी भारावून गेलेय. खर सांगू जगप्रसिद्ध टूरिस्ट डेस्टीनेशन मावलीनोंग पेक्षा मला हे रांगडे नोहवेत गावच जास्त भावले.

53311857_10156915748097778_1984292362678960128_n.jpg

सकाळी उठले आणि कपडे बदलायची वेळ आली तेव्हा मला आठवले माझे कपडे तर समोरच्या शेजारणीच्या गच्चीवर आहेत. काल हालीने ते तिथे वाळवायला सांगितले. पण आज ते आता गायब झालेले होते. गेले कुठे? वाऱ्याने उडून गेले की काय? माझ्याजवळ कपड्यांचे तीनच जोड होते. असा एक जोड वाऱ्यावर सोडून मला परवडले नसते. उशीरही परवडणार नव्हता. आज नुसते नोव्हेत नाही तर मेघालय सोडून पुढे नागालँड ला जायचय.
गच्चीच्या पायऱ्या उतरताना लक्षात आले की समोरच्या शेजारणीच्या घराचे दार उघडेच होते. मी दबक्या पावलांनी तिच्या घरात शिरले. पलीकडच्या कोलीत सोफ्यावर वाळलेल्या कपड्याचा ढीग पडला होता. मी त्यातले माझे कपडे उचलले नि घराबाहेर पडले. एवढी घरात इकडे तिकडे वावरून मी वस्तू उचलून बाहेर पडले. घरात कोणाला त्याचा थांगपत्ता नाही. मी मागच्या पत्रात लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वी मी नोहवेत ला पोहोचले तेव्हाही हाली गायब होता पण घराचे दार सताड उघडेच होते.
असे हे गाव, गावातली अशी माणसं! आज हे सारे सोडायचे खूप जीवावर आले पण त्याचेच नाव प्रवास आहे. कुठे नाही पटले म्हणून तडकाफडकी तेवढेच वगळता येत नाही आणि कुठे जीव लागला म्हणून तिथेच अडकून पडता येत नाही. घटकाभर विश्रांती सोडली तर एक एक वळण चालत फक्त रहायचे.
सुख दुःखाच्या वाटांनी व्यापलेला आयुष्याचा प्रवास तरी याहून वेगळा कुठे आहे? पण आयुष्याबद्दल तुला मी काय सांगू? उलट तुझ्याशिच आयुष्याच्या विषयावरच्या अर्ध्या राहिलेल्या गप्पा मारायला कधी भेट होईल वाट पहात आहे.

तुझी मैत्रीण
सुप्रिया

53226295_10156917982027778_7499365575760543744_n.jpg

27th फेब्रुवारी 2019

माझे सिकंदर भाई,

आज मात्र कहर झाला. पुढच्या प्रवासासाठी पहाटे निघायच्या माझ्या सवयीनुसार माझी बॅग घेऊन गावाच्या नाक्यावर जाऊन बसले. पण आज मेघालयात निवडणुका असल्यामुळे रस्ते ओस पडले होते. नाही म्हणायला इलेक्शन ड्युटी वरची वहाने फक्त इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. मुळीच समजत नसलेले राजकारणही उगीच पब्लिकच्या नसानसात वहात असते शिवाय ऐन निवडणूकीच्या मुहूर्तावर मिळालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या बातमीमुळे तर जनसमजाचा – गैरसमजाचा विस्फोट झाला. माझी नागालँड पर्यंत पोहोचायची सोय आणि सुरक्षितता या दोघांची गोची आहे हे माझ्या लक्षात आले.

नऊ वाजत आले म्हणजे साडेतीन तास उलटून गेले. हाली ने तर गृहीतच धरले होते की पहाटे पहाटे तोऱ्यात निघालेली ही बया दिवस चढला की फिरून घरी येणार. आज माझ्यावर तीच वेळ येणार असे मलाही वाटू लागले. एव्हाना माझ्या परिस्थितीची खबर त्या छोट्याशा गावातल्या अनेक घरात पोहोचली होती. कोण्या एका घरातल्या कोण्या एका सदगृहस्थाला स्वत:च्या कामासाठी पनुर्सलाला जायचे होते, पण त्याने गाडी आणून नाक्यावर उभी केली. म्हातारा दरवाजा उघडून म्हणाला, "बैठो"! क्षणाचाही विलंब न करता मी गाडीत बसले. त्या सद्गृहस्थाने 100 रुपयांत मला पनुर्सलास्टँड वर सोडले.

दुसरा टप्पा पनुर्सला ते शिलॉंग हा झाला! तो ही प्रवास कसाबसा पार पडला. पण शेवटच्या टप्प्यावर मात्र माझ्या जिद्दीचा पुरता कस लागला.

मागच्या पत्रांत लिहिल्या प्रमाणे शिलॉंग ला इकडून तिकडच्या स्टँड वर फेऱ्या अटळ असतात इतके सारे स्टँड तिथे आहेत. ते सारे स्टँड पालथे घालून झाले. पण प्रवासाची सोय काही होईना. पोलो ग्राउंड च्या बाजुला एक बसस्टँड आहे तिथून म्हणे रोज दुपारी चार वाजता दिमापूरसाठी एक बस सुटते. घ्या. आधीच शिलॉंगच्या अनेक स्टँडसच्या भूलभूलैयात मी हरवून गेले होते आणि इथे वार्ता अजून एका नवीन स्टँडची चालली होती. पण तो ही चान्स घ्यायचा असे मी ठरवले.

मी स्टँड वर पोहोचले तेव्हा स्टँड ओस पडला होता. इथून आज कुठंचीही बस निघणार नव्हती. समान पाठीवर वहात वणवण फिरून मी मात्र थकून गेले होते. त्यात पाऊस पडू लागला. मी आणि माझे समान भिजून गेलो. थंडी वाजू लागली. खांदयात कळ येऊ लागली. डोक्याचे तर खोबरे झाले होते. काहीच उपाय दिसेना तसे भुकेल्या पोटाला गरमागरम कुठे काही खायला घालता येईल ती शोधाशोध सुरू केली. एक महागडे हॉटेल दिसले, एरव्ही स्वतः चे हे असले लाड मी पुरवलेच नसते पण आज माझीच मला दया आली. आज मी अख्या प्रवासातील सर्वात महागडे जेवण जेवले.
53340080_10156917987677778_7758954142160125952_n.jpg

स्टँडवर परतले तर एका बसमध्ये ड्रायव्हर का क्लीनर ची हालचाल दिसली.
"ये बस किधर जाएगी?"
"ईटानगर"
"मुझे रस्ते में किधर भी छोड देंगे क्या?"
"आप को किधर जाना है?"
"वैसे तो दिमापूर जाना था, लेकिन रास्तेमें किधर भी छोड दिजीए| मेघालय से बाहर निकलुंगी तो कुछ ना कुछ इंतजाम तो हो ही जाएगा।"

600 रुपये देऊन तिकीट घेतले, बस सुटायला 3 तास होते मग बसमध्येच माझ्या 27 नंबर च्या चाकाच्या ठीक वरच्या सीट वर आरामात बसून तुम्हाला पत्र लिहायला घेतले.
53365804_10156917987807778_7481737711422799872_n.jpg
बस वेळेवर सुटली, शिलॉंग वरून ईटानगर ला जाणाऱ्या रस्त्यावर दिमापूर कसे लागले, याचा मी आजवर शोध घेतच आहे. की माझी ऐकण्यात चूक झाली? ती बस खर तर ईम्फाळ ला चालली होती? हे मला काही माहित नाही. पण मेघालय सोडून आसाम मधील NH 27 वरून बस धावते आहे इतपत GPS ने दाखवले. पुढे आसाम सोडून नागालँड सुरू झाले हे कळायला GPS ही लागत नाही. रस्त्यातले खड्डे (की खड्यातला रस्ता) पार करताना 27 नंबरच्या सीट वर बसून प्रवास करणाऱ्याला तर ते सर्वात आधी समजते.
त्यावेळी माझ्या मोबाईल नो नेटवर्क, नो इंटरनेट आणि लो बॅटरी अशा तीन तीन अडचणींचा सामना करीत होता, मी त्याच्याकडून मदतीची काय अपेक्षा ठेऊ?
नाही म्हणायला शिलॉंग स्टँड वरूनच इंटरनेट ची थोडी कृपा असतानाच दिमापूरजवळच्या एक गावात रहाणाऱ्या कौच सर्फिंग वरील एका मेम्बरला मी मला रात्रीपूरते राहू देईल का असा मेसेज लिहिला होता आणि त्याच्या गावाचे नाव लिहून ठेवले होते. मधेच वाऱ्याचा झोत येतो तशी इंटरनेट ची रेंज येउन जाता जाता त्याचे yes असे उत्तर मला वाचता आले. त्यावर मी लिहीले की मी दहा वाजता पोहोचेन. आणि मग माझा मोबाईल निकामी झाला. बॅटरीचा एक पाय फक्त दिसत असताना तिला हवे तेव्हा चालवता याये म्हणून मी फोन बंद करून ठेउन दिला.
53656007_10156918009397778_3941385689609797632_o.jpg

Mhonthung Tsopoe हे ज्याचे नाव मला धड बोलायला येत नव्हते त्याच्या गावी जायचे. इंडोनेशीआ, सिंगापूर पासून पाकिस्तान, इराण ला जोडणाऱ्या Asian Highway 2 (AS2) वरच्या मला उच्चारायलाही जमत नव्हते अशा Kukidolong गावात मी उतरवायला सांगितले तेव्हा बसचा ड्रायव्हरही थोडा घाबरला होता असे मला वाटले. रात्रीचा दीड वाजला होता. त्यात पावसाने कायतरीच कहर केला होता. बसमध्ये कशीतरी जेमतेम जी वाळली होते ती पुन्हा एकदा मला पाठीवरच्या बॅगे सकट भिजवून टाकले. आधार घ्यायला कुठे आडोसाच नव्हता. तो कोण मोहन थुंग टोसोपोय त्याला फोन जोडला. पण समोरून काहीच उत्तर नाही. असे तीन फोन करून झाले तसे माझी आशा संपली. आजूबाजूला नजर फिरवली तर एक चिटपाखरूही दिसेना. आजची रात्र हायवे च्या बाजूला कडाक्याच्या थंडीत भिजत काढायची या साठी मी मनाची ताकद गोळा करू लागले. अशा निर्जन ठिकाणाला सुरक्षित समजावे की धोकादायक म्हणावे हे डोक्यात आले तसे मात्र छातीत चर्र झाले.

तेवढ्यात माझा मरायला टेकलेला फोन वाजला, समोरून तोच तो बोलला, "रोड क्रॉस करना, मैं आप के सामने खडा हू।" ज्याचे नाव माहीत नाही, चेहरा पाहिलेला नाही, तो देवदूत आहे की सैतान आहे हे तरी कसे ठाऊक असेल? पण माणुसकी वरचा माझा विश्वास कसा तो कडकच आहे. माझा नाईलाज आहे. अनुभवच एकेक असे आले आहेत की कुठे बोट ठेवायला संधी मिळालीच नाही.
अंधारात हायवे क्रॉस करता करता मला तो दिसला, हायवे च्या पलीकडेच रस्त्यालगत उतरलं की त्याची रहाती झोपडी होती. बसने एवढ्या अचूक ठिकाणी मला कसे काय उतरवले याचे मी आश्चर्य करू लागले. आम्ही आत शिरलो तसे त्याचे कुत्रे भुंकू लागले. एका पलंगावर चार पाच ब्लॅंकेट्स च्या घड्या ठेवल्या होत्या. त्याने म्हटले, "अभी आप क्या करना चाहोगे, सोओगे की?..." त्याला “की...” च्या पुढे खायचा प्यायचा पाहुणचार विचारायचा असेल असा मीच माझा समज करून घेतला आणि झोपाण्याची इच्छा व्यक्त केली.
तसेही ती खायची प्यायची वेळ नव्हती आणि तसाही मी थोडा फलाहार केला होता.

मग तो आतल्या खोलीत झोपायला निघून गेला. थकल्या अंगाने, मिटल्या डोळ्यानी पडल्या पडल्या मी उशाशी असलेला दिवा मालवला आणि थरथरणाऱ्या ओल्या अंगावरून, डोक्यावरून दोन तीन चार ब्लॅंकेट्स ओढून घेतली, हुडहुडी तरीही कमी होई ना. अंगाची चुळबूळ चालू होती आणि मधेच पांघरुण डोक्यावरून सटकले तर डोळ्याला काय दिसले असेल? एका सुंदर चंद्रमौळी घरात मी निजले होते. चटईने विणेने उभारलेल्या भिंतीतून घुसून चंद्रकिरणांनी मातीच्या जमिनीवर शंकरपाळीची रुपेरी नक्षी काढली होती. मी हलेन तशी माझ्याही अंगावर ती नक्षी भिरभिरायची. दिवसभराचा सारा शीण त्या रुपेरी छायेत विसरायला झाला. गरजू स्त्री ला आपल्या फाटक्या झोपडीत आसरा देऊन तो सदगृहस्थ स्वस्थ झोपुनही गेला, मी मात्र माझाच विलास हरखून पहात, त्याच्या ऋणात उशिरा पर्यंत जागीच राहिले.
53732603_10156918017862778_5535066672391520256_o.jpg

सिकंदर भाई, सर्वात कठीण परिस्थितीतून पार पडतानाच माणसातला असा देव भेटतो, जो आजपासून ठीक तीन वर्षांपूर्वी मला हिंदुस्थान पाकिस्तान च्या बॉर्डरही तुमच्या रुपात भेटला होता.
LOC वरच्या सदपोरे फॉरवर्ड पोस्ट ला जाण्यासाठी दिवसभर वणवण फिरून सारी कारवाई पार पडली. मला वाटले नशिबाची साथ मला आहे. शेवटची गाडी निघतच होती. कागदपत्रांवर ऑफिसरची शेवटची सही तेवढी राहिली होती आणि मुद्दा निघाला की टांगधरच्या रहिवशाची माझ्या हमीपत्रावर सही असणे गरजेची आहे. टांगधर मध्ये मी कोणाला नि मला कोण ओळखणार? अशा घडीला, माझ्या हमीपत्राची फोटोकॉपी काढायला म्हणून तुमच्या दुकानात आले आणि तुमच्याकडे न मागताच तुमची सही घेऊनच दुकानातून बाहेर पडले, तुमच्या ऋणातून मात्र आजवर बाहेर पडले नाही. सही देताना तुम्ही जे बोललात ते आजही कानी तसेच ऐकू येते, "बेहेन, तू कोई ऐसा वैसा काम नही करना। तेरा भाई मुसीबत में पड जाएगा।"
तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. मी कसा विश्वास ठेवू त्यांच्यावर जे सांगतात की कोणावर विश्वास ठेऊ नकोस.

जे दाखवले जाते, ऐकवले जाते, मनात ठसवले जाते त्याला लोक सत्य मानून चालतात;
माझ्या डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, मी अनुभव घेतला नाही तर माझे मन मात्र मानत नाही.

मी पेपर वाचत नाही, घडामोडी जाणत नाही, म्हणून माझे प्रश्न बाळबोध असतील. पण त्यांची उत्तरं मला सोशल मीडिया वर वाचायची नाहीयेत आणि तसेही कितीही विद्वान असले तरी ज्यांच्या विद्वत्तेला माणूस, मुसलमान, पाकिस्तानी, जिहादी आणि राजकारणी या पाच वर्गांचे वर्गीकरण जमले नाही त्यांच्या मांडणीने माझ्या मनातले प्रश्नही नाही सोडवायचे.

आज जगाच्या समोर सर्वात ज्वलन्त प्रश्न नेमके कोणते आहेत? युद्धाने युद्ध थांबवता येईल? खरंच? सैनिकांच्या बलिदानाचा पायंडा तर पडत नाहीये? सैनिकांऐवजी शांतिदूत सीमापार जाऊन काम फत्ते करून येऊ शकतील का? देशभक्तीहूनही मोठी उदात्त भावना कुठची असू शकते का? मातृभूमी हून धरती माता मोठी नाही का? तिच्या जमिनीवर कोण नेमके कुठच्या हक्काने कोण मालकी सांगतय?

थोडा चार्ज झालेला फोन सहज उघडून पाहिला तर लक्षात आलं की एका दिवसात सोशल मिडियाने आगीत फार तेल ओतलं आहे. ज्या गर्दी पासून मी दूर आलेय त्या गर्दीचं रक्त उसळून निघालय. त्यांच्या किंवा माझ्या अशा कुठच्याच ज्वलंत प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही. पण तरीही मी भाग्यवान आहे कारण माझ्यातला प्रवासी तूर्त या घडामोडीच्या पलीकडच्या जगात विसावला आहे. खूप शांत, निर्धास्त वाटतंय. अंग सुकत आलंय आणि डोळेही मिटतायत.

तुमची,
सिस (sis ...अशीच हाक मारता ना मला?)

 

28 फेब्रुवारी 2019

माझ्या बाळा,

तू आता मोठी झाली असं तुला वाटत असेल कारण बालपणी सारखं अंगाई गीत म्हणून मी तुला झोपवत नाही. तुझी वेणी फणी करायला, तुझं जेवणखाण पहायला, तुझ्या अभ्यासात मदत करायला, तुला माझी गरज लागत नाही. पण माझ्यासाठी तू अजूनही माझं बाळच आहेस.

जशी माझ्या सावलीत पुरेनाशी झालीस तशी, माझ्याशी जोडलेली नाळ कायमची कापून
एक एक पाऊल पुढे टाकताना, तुला दुरूनच बघते मी आणि बघतो तुझा बाबा!
तू कशी भुलते आहेस, झुलते आहेस, कशी तू तुझी स्वप्न बांधते आहेस,

जगाबद्दल, आयुष्याबद्दल मनात अनेक प्रश्न येतात ना? आणि एकही उत्तर मात्र सापडत नाही.
कळत आम्हाला, की खडतर वाटेवर तुझी वाटचाल चालू आहे आणि सोबत कोणाचीच नाही.
कधी पडते आहेस, सावरते आहेस, असे तू तुझे आयुष्य सांधते आहेस.

अंधारात गोलगोल फिरून वाट सहजी गावणार नाही, पण आईवडिलांनी दिशा दाखवली तर ते ही आता भावणार नाही.
चुकायला होईल, “होऊ दे”. फसायला होईल, “होऊ दे”
“मला माझ आयुष्य जगू दे”.

घराचा आधार हवाय, पण बंधन नको. आईवडीलांच प्रेम हवय, पण लुडबूड नको.
तुझ्याकडे इकडच जग तिकडे करायची हिम्मत आणि बळ आहे; आणि तुझ्या या वाटचालीसाठी आईबाबांचा पूर्ण विश्वास, पाठींबा, आशीर्वाद आहे.

नवीन नवीन स्वातंत्र्य मिळालेल असलं की ते चुकीच्या गोष्टींवर खर्च होत; ते होऊ देत. आपल्याच निर्णयासाठी आपल्याला धक्के खावे लागले की स्वातंत्र्याची खरी किंमत कळते. मग आयुष्याच्या सर्वात मोठ्या गरजा सांधण्यासाठी आपण आपले स्वातंत्र्य तोलामोलाने वापरायला शिकतो.

एक जमाना झाला, मी ही कधी या साऱ्यातून गेले होते, ते आठवले; तसेच लिहिले.
याआधी तुला पत्र लिहायला कधी सुचले नाही. आज पत्र लिहायला बसले तर हेच सारे सुचले.
पण मुद्दाम तुलाच पत्र लिहायचे कारण की,

डोंगर, जंगल, नद्या, धबधबे ह्यांच्या कुशीत दडलेले हे मेघालय, जिथे सरळ रस्ते नाहीतच, वरखाली, नागमोडी वळणातच चालायचे पण या वाटांवर चालणारी मनाने साधी सरळ आहेत. तुझी या मेघालयाशी खास गट्टी जमेल. डोंगर जिला हाक देउन बोलावतात, जिला निसर्गाच्या कुशीतली भटकंती आवडते, उन वारा पाउस बघत नाही, चालायला थकत नाही. निर्मळ मनाच्या माणसांचे नाते, निर्मळ मनाच्या लोकांशी पटकन जमते, म्हणून जी पहाडी लोकात सहज सामावून जाते. तू माझं असं बाळ आहेस. म्हणून क्षणोक्षणी मला तुझी आठवण येते आहे. एरव्ही तुझ्या डोंगरातल्या ट्रिप्स ना जाऊन आल्यावर पुढचे कित्येक दिवस भारावून त्त्या गोष्टी मला सांगत रहातेस. आज ही 'गुडबाय मेघालय'ची ची गोष्ट, मी तुला सांगायची ठरवली.

स्वत:ची काळजी घे. आनंदी रहा. गुणी बाळ आहेस. तशीच रहा.
तुझी मम्मा

गुडबाय मेघालय १ - https://youtu.be/pzeFQUn7y24
गुडबाय मेघालय २ - https://youtu.be/sWMWH4xg4O8
गुडबाय मेघालय ३ - https://youtu.be/YiqGAlIk9Q8

1st मार्च 2019

प्रिय कक्का,

मला हे ही माहीत नव्हतं की जो अनोळखी मनुष्य मला त्याच्या घरी घेऊन चाललाय त्याच्या घरी त्याची फॅमिली तरी आहे की नाही? सकाळी मार्को ‘अप्पू अप्पू’ असे जसे हाका देऊ लागला तशी मला जाग आली. पिवळ्या सोनप्रकाशाने झोपडीत कधीच प्रवेश केला होता म्हणजे उठायला थोडा उशीरच झाला.

उठून बाहेर आले तेव्हा तुमची भेट झाली. तेव्हाच मला समजलं की आदल्या रात्री फोन सायलेंट वर ठेउन तुझा नवरा झोपूनही गेला होता. हे भगवान ... मी रात्रभर फोन करत बसले असते तरी त्याला पत्ता लागला नसता. पण कोणी पाहुणी आपल्या घरी येणार म्हणाली नि आली नाही, तशी तुला शांत झोप लागेना. रात्री एक दिड च्या दरम्यान कसा तो बस चा आवाज नेमका तुझ्या कानी पडला आणि तू नवऱ्याला उठवून मला शोधून आणायला पाठवलेस...त्याला योजना म्हणावी की योगायोग?

अजूनही कित्येक प्रश्नांची उत्तर सापडलीच नाहीयेत मला... फक्त कुकीडोलोंग ला उतरायचं एवढचं माहित होत तरी नेमकी मी तुमच्या घराच्या समोरच कशी उतरले? निर्जन हाय वे वर भर पावसात एकटीला मला भीतीच कशी वाटली नाही? कुठच्या विश्वासापोटी मला रात्रभर निर्धास्त झोप लागली? कोणकुठची अनोळखी स्त्री अचानक घरी यायचं म्हणते तरी कुठच्या प्रेमापोटी तू मला आसरा द्यायला तयार झालीस? ... मागच्या पत्रात फाटकी झोपडी असं तुझ्या घराचं वर्णन मी केलं पण आजवरच्या प्रवासातली सर्वात गाढ झोप मला त्याच घरात लागली. भिंतीच्या आत दारे खिडक्या पडदे बंद करून झोपायची सवय जडली. चटई च्या भिंतीतून चंद्रकिरण आत येतात ते सुख काय असते ते फक्त कवितेत वाचले होते. पण आज मी ती कविता जगले.
जाता तया महाला मज्जाव शब्द आला |
भीती न यावयाला या झोपडीत माझ्या |

मला कसं कळणार होत की सकाळी सकाळी तुम्ही सारे ज्या शेकोटी भोवती बसला आहात त्या शेकोटीवर माझ्यासाठी आंघोळीचे पाणी तापत आहे? मी तर माझी आंघोळ आटपूनही घेतली. एकदा मनात आले होते की ज्या दाराला कडीच नाही त्याच्या पलीकडे आंघोळ कशी करायची?
पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या l
दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या l

जिथे घराच्या दाराला कडी नाही तिथे बाथरुमच्या दाराला कडी लावून काय वाचवायचे आहे? ही अशी बिनकडीची दारे अप्रत्यक्षपणे सुरक्षिततेचा हवाला देत असतात. म्हणून बिनदिक्कत आंघोळ करायची ठरवली. पण एकीकडे आंघोळ करताना लक्ष मात्र लाकडी फळ्यांच्या बाहेरचीच चाहुल घेत होते. शिवाय पाणी सुद्धा गारठवून टाकेल इतपत थंड होते म्हणून आंघोळ कशी, झटपट आटपली.

मला खरच फक्त रात्रीपुरता आसरा हवा होता. कुठेतरी हाय वे च्या साईडला मांडलेल्या एखाद्या घराकडून माझी आणखी काय अपेक्षा असू शकते ? सकाळ होता होताच इथून निघून उलटे दिमापुरला जायचे आणि परमिट घ्यायचे. पण तू तुझ्या नवऱ्याला चांगलीच ओळखतेस ना? तो मला सोडे ना. आधी चहा बिस्कीट दिले. मग ब्रेकफास्ट झाला. ते ठीक आहे, मग म्हणाला, मीच तुला दिमापूरला घेऊन जातो. मग आपण सारेच निघालो. मी माझे सामान घेउन निघत होते तर त्याने मला ते घेउ दिले नाही. तरीही माझा असेच वाटत होते की परमिट मिळताच इथे परत येउन समान घेउन निघता येईल.

आपल्या देशाच्या नागरिकांना नागालँडमध्ये दिमापुरपलीकडे कुठच्याही डीस्ट्रीक्ट मध्ये प्रवास करायला इनर लाईन परमिट घ्यावे लागते. गोहाटीला तेच तर मिळवायला मी गेले होते, तेव्हा नेमकी शनिवार रविवारची सुटी आड आली. त्यामुळे इथे दिमापुरला हे काम करायला यावे लागले. एरव्ही दिमापुर अगदीच रटाळ आणि धुळकट शहर आहे आणि प्रवाशाला रस वाटेल असे इथे काही एक नाही. फार म्हटलं तर दिमापुर मार्केटला गेले की इथल्या नवलाईची चांगलीच झलक अनुभवायला मिळते. नागालँड स्पेशल भले मोठे चाकू सुरे विकायला ठेवलेले पहाता असतात, इथच्या जंगलात सापडणारे ज्यांची नावे ही ऐकली नाहीत असे एकेक मसाले विकत घेता येतात आणि बघायचे असले-नसले तरी कबुतरे, ससे, बेडूक, किडे, कुत्रे वगैरे नजरेस पडतात. हे सारे पाळीव प्राणी म्हणून नाही तर जेवणात मांस खाण्यासाठी विकायला ठेवले असते हे सुज्ञास सांगणे न लगे! असो.

54729148_10156947360762778_2034839729706369024_n.jpg

माझा माझ्या परमिट च्या कामाशीच फक्त मतलब होता. पण मोन्थंग कडून मात्र मला VIP ट्रीटमेंट मिळाली. गाडीने मला थेट DC office मध्ये घेऊन गेला, सारी कारवाई होईपर्यंत स्वत: माझ्याबरोबर फिरत होता. आपला फोटो आणि ओळखपत्राच्या कॉपी सहित एक फोर्म आणि काय ती फी भरली की पुढचे सारे त्या गव्हरर्मेंट कर्मचाऱ्याची मर्जी आणि मनस्थिती यावर अवलंबून असते. फॉर्म वर पंधरा वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांचे नाव लिहायचे होते आणि हेच माझे वडील होते हे सिद्धही करायचे होते. आधार कार्डवर तर वडिलांच्या नावाची तरतूद नाही, त्यामुळे या परिस्थितीत त्याचा ही काही आधार नव्हता. मग राज ने मुंबईहून पासपोर्ट वगैरे अशी डिजिटल कागदपत्र पाठवली त्यात आणखी थोडा वेळ गेला. तरीही तुम्ही सारे बिनतक्रार गाडीमध्ये बसून माझी वाट पहात राहिलात. मी गाडीत बसताच गाडी निघाली. तोपर्यंत आपण परत घरी चाललो नव्हतो हे मला माहीतच नव्हते.

आधी आपण तुझ्या माहेरी गेलो! तिथे त्यांच्याकडे कोणी पाहुणी आहे असे वातावरण दिसेना. घर माझेच आहे आणि मला काय सुचेल, वाटेल, पटेल ते मी खुशाल करावे अशी सोय होती. पण असा घरगुती पाहुणचार माझ्या ध्यानी मनी नव्हता तसा माझ्या आजच्या प्लान मधेही बसत नव्हता. परमिट मिळेपर्यंत दुपार झाली होती. आणि आत्ताच्या आत्ता कुक्डीलोंग ला प्रायव्हेट गाडीभाडे ठरवून लगबगीने सामान घेऊन परत यायचे तरी दोन अडीज तास सहज जातील. मला सामान पाठी ठेवले त्याचा पश्चाताप झाला. तरीही कश्शीबश्शी ओढाताण करत साडेचारच्या गाडीने मी मोन च्या प्रवासासाठी बस पकडू शकत होतेच, कोहिमा ला जायला तर अगदी पाच पर्यंत वहान मिळाले असते. पण तेव्हाही तुझा नवरा मला सोडायला तयारच नाही.

“तू आजच कुठेच निघालीस? आता घरी दोन-चार दिवस रहा मगच पुढच्या प्रवासाला निघ. जास्तीचे सामान इथेच ठेव नि नागालँड फिरून पुन्हा एखादा दिवस घरी ये. गरज पडली तर विमानाच्या परतीच्या तिकीटाची तारीख बदलून घेऊया म्हणे.” याच्या साऱ्या आयडिया त्याच्या घरचे वास्तव्य इथवरच आटपायचे नाहीये, हेच सूचित करत होत्या. पाऊसही असा काय पडत होता की एकेका रस्त्यावरची रहदारी ठप्प झाली होती. दिमापूरहून २२ किलोमीटर दूर तुझ्या घरी जाऊन सामान घेऊन पुन्हा साडेचार ची बस पकडायला वापस येणे अशक्य आहे हे फायनल झाले. तुझे बाबा मला सांगत होते की काउच सर्फिंग मधून तुमच्याकडे येणारी मंडळी इथेही येउन जातात असा रिवाज आहे. कोणी मंडळी तर इथे येऊन किचन चा सुद्धा ताबा घेतात. जापनीज, चायनीज अशा त्याच्या डिशेस बनवून मग सारे एकत्र मेजवानी करतात. मी पहिलीच पाहुणी असेन की जिला त्यांच्या किचन मध्ये जाउन काही बनवायची हौस वाटली नाही. जेव्हा आपण तिथून निघालो मोन्थोंग दिमापूरच्या त्याच्या सर्वात आवडत्या रेस्तोरंत मध्ये मला घेउन गेला. तिथली त्याची सर्वात आवडती डिश त्याने माझ्यासाठी ऑर्डर केली. मी पोट फुटेलसे वाटेपर्यंत जेवले. आपल्या पाहुणीला आपण सर्वात खास पाहुणचार देत आहोत या भावनेने मोन्थंग खूप खूप खूप खुश होता.
54521325_10156947357427778_5905602138196672512_o.jpg

आपण सारे घरी परतत होतो तेव्हा माझ्या अंगात हुडहुडी भरली. एकीकडे तुमच्याशी काहीबाही बोलताना दुसरीकडे मी अक्षरश: पेंगू लागले. एकदा घरी जाऊन तुझ्या झोपडीतल्या चंद्रप्रकाशाच्या कुशीत चार चार ब्लंकेट अंगावर ओढून निजून जावे, एवढेच तेव्हा सुचत होते. पण घरी गेलो, मोन्थोंग ने शेकोटी पेटवली नि पुढचे दोन तास गप्पा रंगल्या.

मोन्थोंग म्हणतो की, “मी स्वत: प्रवासाला जाऊ शकत नाही पण तुझ्यासारखे कोणी प्रवासी माझ्याकडे येतात त्यांच्या कडून जे ऐकायला मिळते त्या निमित्तानेच मला ही प्रवास केल्यागत वाटते.” तुला वाटते की, “घरी स्वत:चीच रहायची धड सोय नाही आणि अशात कुठे कोणा पाहुण्याला घरी घेऊन येऊन त्यांना गैरसोय करायची?” मला हे सांगायचे आहे की, “मला तुमच्या झोपडीत माझे घर सापडले, तुमच्या रुपात माझे कुटुंब मला भेटले.”
54463144_10156947357662778_7145791300879515648_o.jpg

पाहूनि सौख्य माझे देवेंद्र तो ही लाजे l
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या l

या प्रवासात मला जी सर्वात श्रीमंत माणसं भेटली त्यापैकी तुम्ही एक आहात. तुमची फॅमिली बघून तर माझा परकेपणा पार पळून गेला. तुमची दोन्ही बाळ सुपर क्युट आहेत. जॉर्डनशी कोणाची गट्टी जमायला वेळ लागत नाही. पण मार्को बराच वेळ जवळ यायला बघतच नव्हता. रागारागाने स्वत:च्या भाषेत मला दम द्यायचा. पण वेळ गेला तसा त्याने त्याच्या भाषेत, मी माझ्या भाषेत अशा आमच्या ज्या गप्पा रंगल्या, तो प्रकार मजेदार होता. गाडीत संध्याकाळी त्याला कुशीत घेऊन बसले होते नि तो गाढ झोपूनही गेला, तेव्हा केवढे सुख वाटत होते.
55512201_10156947357597778_5936505626187268096_o.jpg

दुसऱ्या दिवशी पहाटे उठले, कुठे जायचे काही ठरवले नव्हते पण एवढे कळत होते की सकाळी सकाळी नाही निघाले तर मोन्थोंग मला आज ही सोडायचा नाही. पण त्याने माझ्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट बनवायची जय्यत तयारी केली होती. स्वत:ची परिस्थिती कठीण असतानाही, मार्केट मधून माझ्यासाठी पोर्क आणि कलेजी विकत घेउन आला. ते सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडत होता. स्वत:च्या हाताने माझ्यासाठी काय काय बनवले. मला खाऊ घातले. आणि मला बजावून गेला की मी थोडा कामानिमित्त जाउन परत येतो तोपर्यंत कुठेच हलू नकोस.
55450502_10156946602977778_2974209735164690432_o.jpg

तो जसा बाहेर पडला तशी मी सटकले. नाहीतर करू काय? दोन मार्च चा दिवस उजाडला होता. राजला आठ मार्च चे परतीचे तिकीट काढायला सांगितले होते. एकेक दिवस रेशनिंग करून वापरायचा अशी परिस्थिती माझ्यावर ओढवली होती. तसे करायला खूप जड जाणार आहे याची मला पुरेपूर कल्पना होती. हेच बघ ना, तुझ्या घरात माझे मन असे काय अडकले होते की तिथुन पाय निघता निघत नव्हता. अगदी निघायच्या क्षणापर्यंत आपल्या दोघींच्या काहीबाही गप्पा सुरूच राहिल्या. हसण्या खिदळण्याला ऊत आला होता. निघता निघता बांबू शूटचे एक पुडके तू माझ्या हातात दिलेस. ते वापरून काही बनवले तरी त्याला तुझ्या घरच्या स्वयंपाकाचा स्वाद येईल का?

आदल्याच रात्री शेकोटी भोवती गप्पा चालू होत्या तेव्हा तू मला म्हणाली होतीस की ‘मी तिथे येताना तुमच्यासाठी ब्लेसिंग घेऊन आले आहे.” त्याचे कारण की मी गावात शिरल्या शिरल्या पावसाला सुरवात झाली होती. तुला भोळा विश्वासच माझ्यासाठी दिलासा होता. एरव्ही तुम्हाला परत काही द्यावे म्हणून जीलागलीकिती तगमग लागली, तरी मी काय देणार होते? ज्याचा हिशोब कागदावर मांडता येईल अशा शुल्लक आहेत माझ्या जवळच्या गोष्ठी आणि तुमच्याजवळ जे आहे ते वाटून संपणार नाही, एवढे मुबलक, शाश्वत आहे. त्यातलेच थोडे माझ्या झोळीत लुटून घेउन, मनोमन आशीर्वाद शुभेछ्या तेवढ्या देउन मी निघाले.

येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा |
कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या |

दोन दिवस सतत पडत असलेला पाउस मी दिमापूरला निघाले तेव्हा अचानक ओसरला. पुढे कुठे जायचे हे तोवर ठरले नव्हते. उजवीकडे कोहिमा ला जायचे की आधी डावीकडे दिमापुर बस स्टँडला जायचे? वहान कसे शोधायचे?
दिमापूरला जाण्यासाठी कुक्डीलोंग – चुमुकेडीमा – दिमापुर असा टप्याटप्या नेच प्रवास करावा लागतो, होय ना? पण मी हाताचा इशारा न करताच माझ्यासमोर एक शेअरटॅकसी येउन उभी राहिली, ती थेट दिमापुरला चालली होती. पुन्हा एकवार मला कळून चुकले, की कुठची वाट चालायची, ती कुठवर घेउन जाणार, हे सारे विधिलिखित आहे. या क्षणी मी काय करायचे? फक्त एवढी जाणीव असली तरी संपूर्ण प्रवास निभावून न्यायला ती पुरेशी आहे. मी सामान सावरत टॅकसीत बसले आणि आपले घर मागे टाकून पुढे निघाले.
अगदी निघता निघता मला बहिण मानलेस. तेव्हा तुला सांगायचे राहूनच गेले की आमच्या भाषेत मोठ्या बहिणीला ताई म्हणतात!

तुझी ताई
सुप्रिया
53703424_10156946603062778_4464432231460372480_o.jpg

2nd मार्च 2019

प्रिय वैदेही,

जंगल, डोंगर, दऱ्या ह्यातली मज्जा मेघालयात भरभरून लुटता येते. त्यापलीकडे ज्याला नवीन प्रदेशाचे जनजीवन जवळून पहायला आवडेल त्याने नागालँडला नक्की भेट द्यावी. कोहिमा ही नागालँडची राजधानी! दिमापुर हे नागालँडचे कमर्शिअल केपिटल! जनजीवन म्हटले त्यात इतिहास, रहाणीमान, परंपरा, उत्सव सारेच आले. इतिहासाच्या सर्वात जुन्या संदर्भापासून सुरवात करायची तर महाभारतातील हिडीम्बेच्या नावावरून दिमापुर हे नाव पडले. ब्रिटीशांनी बर्मा ला जायला सोयीस्कर म्हणून जेव्हा या आदिवासी प्रदेशात अतिक्रमण केले तेव्हा स्थानिक जमातींनी हल्ला बोलला. World War II मध्ये कोहिमा मधील जपानच्या ऐतिहासिक पराभवाने महायुद्धाला वेगळे वळण दिले. रानटी नागा संस्कृतीचा प्रत्यक्ष जन्म झाला त्यावर प्रदीर्घ कालखंड लोटला तेव्हा कुठे १९६३ मध्ये आसामच्या पोटातून नागालँड राज्य जन्माला आले. या विलक्षण संकृतीचे जतन आणि पतन करण्यासाठी साठी राजकीय, सामाजिक स्तरावर ऐतिहासिक घटना घडल्या. या राज्यात सोळा जमाती अस्तित्वात आहेत पण आधुनिक नैतिक रचनेनुसार त्यांची संस्कृती बोथट होत चालली आहे. एक ना एक दिवस ती लुप्त (extinct) होणारच. त्याआधी तिचे शक्य होतील ते पैलू जवळून पहायचे तर शहर सोडून जितके दूर जाता येईल तिथे जायचे, एवढेच सुचत होते.

अंगामी, कोन्याक, लोथा, सांगताम, चाम ही अशा एलिअन नावांच्या यादीतून मी नेमक्या कुठच्या जमातीची निवड करावी, हे एक कोडेच होते. पण दिमापुर ला बस स्टँन्डवर कुठची बस कुठे कुठच्या वेळेस निघते त्याची चौकशी केली तर चार वाजता मोन साठी एक बस निघत होती. कोन्याक जमातीचे head hunters of Nagaland अशी ज्यांची ओळख सांगितली ते याच मोन डीस्ट्रीक् मधल्या लोन्ग्वा या गावाला रहातात. हे नागालँडच्या नॉर्थवेस्ट बॉर्डर वरचे एक खास गाव आहे. खास अशासाठी की, अरुणाचल प्रदेशची स्टेट बॉर्डर आणि म्यानमार ची इंटर नेशनल बोर्डर याच गावालगत आहे. मी लोन्ग्वाला जायचे ठरवले.

हातात भरपूर वेळ होता. तोवर निवांत फिरता यावे म्हणून 10 रुपये भरून माझी बॅग क्लोक रूम मध्ये ठेवली. आज माझ्या फोन चा चार्जर हरवला म्हणून माझा मोबाईल गव्हर्मेंट टूरीस्टलॉजच्या रिसेप्शनमध्ये चार्ज करायला दिला आणि खुशाल हात हलवत मी मार्केट फिरायला निघाले. दिमापुर रेल्वे स्टेशन च्या बाहेरच दिमापुर बस स्टँड आहे. बस स्टँडला लागूनच टूरिझम डीपार्टमेंट चे इन्फरमेशन सेंटर, लॉज, रेस्टोरंट आहे. एक बॅकपॅकर म्हणून मी इथल्या टूरिझम डीपार्टमेंटच्या सर्वच सर्व्हिसेसची जरूर शिफारस करेन.

संध्याकाळी चार वाजता दिमापुरहून बस निघाली. मोन ला जाण्याचा मार्ग आसाम मधल्या जोरहाट मधून जातो. नागालँड बद्दल बोलायचे झाले तर इथे रस्त्यांत खड्डे असा काही प्रकारच नाही, खड्यातच कुठे रस्ता सापडतो का तेवढे पहायचे. डोळे मिटून कोणी प्रवास करत असेल तरीही जोरहाट, आसाम मधून जसे काय आपण मोकोकचुंग डीस्ट्रीक्ट मध्ये शिरतो तसे नागालँड राज्याच्या हद्दीत आपले आगमन झाले आहे हे अचूक लक्षात येते. एरव्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास करणे मला फारसे त्रासदायक नाही उलट सोयीस्कर वाटते. पण या रस्त्यांवर प्रवास करताना जास्त शीण येतो. माझ्या फोनच्या बॅटरीने फक्त 26 टक्क्यापर्यंतच मजल मारली होती. त्यातल्या त्यात दहाबारा तासाच्या प्रवासानंतर मी पहाटे पहाटे मोन ला पोहोचणार आहे ही एवढी तरी माहिती मी इन्टरनेट वर शोधून काढली.

दिनांक २ मार्च पहाटे, अवेळी तीन वाजता, मोन मधल्या एका सुनसान रस्त्यावर मला एकटीला उतरवून बस पुढे निघून गेली. तिथे बसस्टँन्ड असल्याच्या काहीही खाणाखुणा दिसत नव्हत्या. अशा परिस्थितीत प्रवाशाने पुढे काय करायचे, ही प्राईम माहिती मात्र इंटरनेट ने दिलीच नव्हती. च्यामारी त्याच्या नानाची ...

मोन पासून लोन्ग्वा गावाला जाणारी सुमो सकाळी साडेसात वाजता निघते. कुठून निघते? कोणास ठाऊक! कोणा बाईमाणसाला विचारायचे तरी त्यांचा दिवस सुरु होईस्तोवर वाट पहावी लागेल. त्या कडाक्याच्या थंडीत, अंगाची गुंडाळी करून, त्यातच स्वत:ला गुरफटून, मी रस्त्याच्या कडेला गपचूप बसून राहिले. थंडी इतकी वाजत होती की वाऱ्याने पाने हलतात तसे अंग कापत होते. झोप इतकी येत होती की मधेमधे अक्षरश: तोल जात होता. एकेक मिनिट पार पाडायला एवढे कठीण होते तर त्या अवस्थेत काही तास कसे काढले असतील.

53968614_10156949313127778_6259618116104355840_o.jpg

साडेचार च्या दरम्यान, सारे गाव धुक्याच्या चादरीत निजले असतानाच, सोनेरीपिवळ्या छटांनी आकाशात रंगरंगोटी करायला सूर्यकिरण निघाले. ते दृश्य मला इतके आकर्षक वाटले की माझे सामान त्या निर्जन रस्त्यावरती पाठी सोडून मी निघाले. आकाशातल्या नितांत सुंदर सूर्योदयाला जवळून अनुभवता येईल अशी जागा शोधत भटकू लागले. फिरत फिरत मी एका उंच जागेवर पोहीचले. माझ्या समोरच्याच टेकडी पाठून सूर्य वर येत होता. आसमंताचे अद्भूत सौंदर्य टिपून घ्यायला माझ्या मोबाईलच्या मरायला टेकलेल्या बॅटरीने साथ दिली नाही, तसे ते दृश्य डोळ्यात साठवत, २ मार्च २०१९ या दिवसाच्या जन्म सोहळ्यात मी रमून गेले.

55576730_10156949262032778_1775173613377290240_n.jpg

मी परतले तोवर रस्त्यावरची एक दोन दुकाने उघडली होती. दोनचार प्रवासी जमले होते. चार आठ गाड्या, आठ दहा लोक रस्त्यावर फिरताना दिसत होते. माझे सामान जिथे सोडून गेले ते मात्र तिथेच तसेच पडून होते. मी सर्वात आधी एका टपरीत घुसले. जरी मला चहाची तल्लफ नव्हती तरी तिथे चूल पेटवलेली असणार एवढे मला कळत होते. थोडे गोड गोड बोलून मी त्यांच्या किचन मध्ये शिरून त्या चुलीशेजारी बस्तान टाकून बसले. तेव्हा कुठे जीवात जीव आला.
53891020_10156949262282778_8700972381503488000_n.jpg

मग मी तिथेच सामोसे खाऊन घेतले आणि सुमोची वाट पहात बसले. एवढ्याशा वेळात एका गॅरेज वाल्याशी दोस्ती जमली, त्यानेच मला माझा मोबाईलही चार्ज करून दिला. गॅरजचे थोडे काम शिकवले पण प्रात्यक्षिक करू दिले नाही. मला जास्त पैशांची गरज लागली तर मात्र नोकरीवर ठेऊन घेईन हे प्रौमिस केले. मग मी निघाले.

54727379_10156949226832778_147175373749092352_n.jpg

मोन पासून लोन्ग्वा हा ४५ किलोमीटर चा रस्ता खूपच सुंदर आहे. आत्ता पावसाळा सुरु व्हायच्या नुकते आधी पतझड झालेली असते त्यातच मोठीच काटछाटही केली जाते. मुंडन केलेल्या टेकड्या काय सुंदर दिसतात! डोंगरावर छोट्या छोट्या वस्त्या असतात. त्यांची लहानशीच शेते असतात. त्या नजाऱ्यावरून आपली नजर हटत नाही.

मी लोन्ग्वाला पोहोचल्यावर आर्मी ओफ़िशिअल ने माझ्या जीपमधील सहप्रवाशांना जीपमधून खाली उतरायला सांगितले, मला वाटले की काहीतरी रुटीन चेकअप असेल. पण बातचीत वगैरे न होता जेव्हा ड्रगज किंवा आर्म्स याच्या स्मगलिंगच्या संदर्भात काहीतरी राडा सुरु झाला, तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण बोर्डरवरच्या अतिशय संवेदनाशील गावात पोहोचलो आहोत. आमच्या जीपमधून परमिट शिवाय प्रवास करणाऱ्या दोन रेफ्युजी तरुणांचे पुढे काय झाले ते माहित नाही पण सारे इतके अचानक झाले की मनातून मी थोडी कावरीबावरी झाले होते हे खरे!

लोन्ग्वा गावाच्या मध्यभागी एक चर्च आहे, जीपने मला तिथे उतरवले. बाजूला एअरटेल चा मोठ्ठा टॉवर बघून वेड्या आशेने माझ्या वोडाफोनलाही कुठे त्याचे-त्याचे नेटवर्क सापडते का हा अंदाज घेत, वाट दिसेल तिथे चालू लागले. इथचे थोडे फोननंबर जवळ काढून ठेवले होते, पण फोन जोडायचा कसा? मला काहीच सुचेना. मदत मागण्यासाठी मी एका अनोळखी घरात घुसले तर सर्वात प्रथम दृष्टीस पडेले ते मेलेल्या (नव्हे मारलेल्या) जनावरांच्या मुंडक्यांचे प्रदर्शन! भिंतीवरची ती रानटी सजावट पाहून मी थोडी दबकले. एकतर घरात इतका काळोख होता की उन्हातून आत शिरताना क्षणभर सारे अंधारल्यागत झाले. जेव्हा डोळे मोठे मोठे करून इकडे तिकडे पाहिले तर तिथे एक तरूण बंदुकीची सफाई करत बसला होता तो नजरेस पडला. माझ्या पोटात खरच धस्स झालं. या हेडहंटर्सच्या संस्कृतीचे प्रथमदर्शन कोणासाठीही इतकेच धक्कादायक असेल. पलीकडे आणखी एक देखणा तरुण शेकोटीची ऊब घेत बसला होता. त्याने मला अनेक प्रश्न विचारले. पुढे मला कळले की तो तिथला वरिष्ठ पोलीस अधिकारी होता.

मी इन्टरनेट वरून काढलेला होम स्टे चा एक नंबर त्यांना दिला. त्यांनी लगेच तो कोणाचा नंबर आहे त्या माणसाला शोधून बोलावून घेतले. माझे सामान उचलून तो पुढे चालत निघाला होता मला त्याच्या पाठून पाठून पळावे लागत होते. मी जिथे रहायचे ठरवले होते ते घर एका हेड हंटर चे होते. आदल्याच दिवशी जुने घर मोडून संपूर्ण गावाने फक्त २४ तासात नवीन घर उभारले होते. नवीन घरातली पहिली पाहुणी बनून मी त्या घरात प्रवेश केला.

इथे प्रत्येक घराच्या भिंतीवर रानटी आर्ट सजलेली असते आणि बैठकीच्या खोलीत चोवीस तास आग पेटत असते. कुटूंबातील पुरुष आणि चकाट्या पिटणारी इतर मंडळी दिवसातला बराचसा वेळ इथेच गांजा ओढत घालवतात. बायकांची एक वेगळी चूल स्वयंपाकघरात पेटत असते. तिथपर्यंत मी पोहोचलेच नाही. पुरुषांच्या शेकोटी शेजारीच विसावले. चहा, नाश्ता, गप्पा झाल्या. नंतर मी आंघोळ करायला म्हणून गेले. अंगणाच्या एका कोपऱ्यात दोरीवर कपडा टांगला होता. त्याच्या पलीकडे जाऊन आपले काय ते उरकायचे. कालची आंघोळ दाराला कडी नसलेल्या बाथरूम मध्ये आटपली होती आज बाथरूम ला भिंतीच नव्हत्या. मी पडद्याच्या पाठी गेले तर काय. तिथून तर पलीकडची वस्तीही दिसत होती. या परिस्थितीत कपडे कसे उतरवावे हे मला सुचेना. मग मी एक युक्ती वापरली.

पाय दुमडून बसलं तर टेकडीवरच्या झाडाचा आडोसा मिळत होता. मी उकिडवी बसले आणि पाण्याचे शिंतोडे अंगावर उडवायला सुरवात केली. थंड हवेच्या ठिकाणी थंडगार पाणी अंगावर शिंपडत आंघोळ करायची म्हणजे काय दिव्य असते ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही. ते काम मन लावून करतच होते तर कुठूनसा खिदळण्याचा आवाज ऐकू आला. माझ्या तर हृदयाचा ठोकाच चुकला. मनातल्या शंकेच्या पालीला हाकलवत एकीकडे मी पडद्याखाली वाकून पाहिले तर काय, आमच्याच घराच्या अंगणातून एक लहानगा मुलगा (लहानगा म्हटल की मनाला थोडं बर वाटत) मलाच बघून फिदीफिदी हसत होता आणि त्याच्या भाषेत काहीबाही ओरडतही होता. इतक्यात त्याचे आणखी दोन सवंगडीही धावत आले. तो जे ओरडत होता ते बहुदा बाकीच्या मित्रांना बोलावण्यासाठी असावे. तिघेजण माझ्याच पडद्याच्या अलीकडे माझ्याच सारखे उकिडवे बसून माझ्याकडे बघून खिदळत होते. हसावे की रडावे त्याहीपेक्षा उभे रहावे की बसूनच रहावे, तेच मला कळेना. लाजेने मी अक्षरश: थिजून गेले. अशा परिस्थितीत आंघोळ कशी उरकली असेल?

आंघोळ आटपली तसा प्रवासाचा सारा शीण निघून गेला. आता माझ्या हातात निवांत वेळ होता. तुला पत्र लिहायचे होते पण इथे इलेक्ट्रीसिटी नाही म्हणजे मोबाईल सांभाळून वापरला नाही तर पुढच्या प्रवासात पंचाईत होईल, म्हणून मोबाईल बंदच करून ठेवला. बाहेर घराच्या कौलाचे काम चालले होते, एका कुत्रीने आठदहा पिल्लांना जन्म दिला होता, आसपासची लहान मुले अंगणात बागडत होती तिथे तिथे मी माझा जीव रमवत राहिले. तास दोन तास सरले असतील, मग मी गाव उंडारायला निघाले.
55875513_10156949226957778_926709489841733632_n.jpg

इथचे लोक आपल्या राजाला आंग असे संबोधतात. राजाला राजा होण्याचा मान वारसाहक्काने मिळतो. कोन्याक जमातीचा राजा, Tonyei Phawang, याच लोन्ग्वा गावात रहातो. पण त्याचा अर्धा राजवाडा भारतात आहे, तर अर्धा म्यानमार मध्ये! आंगचे अधिपत्य असलेल्या जवळपास सत्तर गावातील लोकांकडे भारत आणि म्यानमार अशी ड्युअल सिटीझनशिप असते. मी राजाचे घर पहायला, त्याच्याबरोबर सेल्फी काढायला म्हणून गेले.

55517461_10156949262222778_6712971026801623040_n.jpg

इथे राजा पासून ते रंकापर्यंत प्रत्येकाच्या घराच्या भिंतींवर शिकारीची हत्यारे, जनावरांची शिंगे, मुंडकी, रानटी टोप्या हेच सारे सजवले असते. राजा जेवण करत होता म्हणून आमच्या भेटीची स्वप्ने रंगवत मी बाहेरच्या खोलीतील शेकोटीभोवती बसले. माझ्या आयुष्यात प्रथमच मी राजाला भेटणार होते. त्याने राजेशाही झगा वगैरे घातला असेल का? डोक्यावर मुकुट चढवला असेल का? त्याचा रुबाब कसा असेल? ... जेवण आटोपल्यावर आंग मला भेटायला आला तेव्हा एक सर्वसाधारण माणूस बघून खरतर माझा अपेक्षाभंग झाला.
54525486_10156949225927778_2930086591240077312_n.jpg

एकमेकांशी गप्पागोष्टी करत आम्ही दोघे फेरफटका मारत होतो तेव्हा मधेच तो सहज वाकला आणि वाटेवर पडलेला चोकलेटचा एक रॅपर त्याने उचलला. तेव्हा मात्र मला त्याच्या लीडरशिप बद्दल मुळीच शंका वाटली नाही. राजा सर्वसामान्य प्रजेसारखाच वागतो म्हंणून त्याची वैभव, प्रतिष्ठा, थाट कुठेच कमी होत नसतो हा धडा माझ्या हृदयात मी गिरवला. मी कुठेतरी वाचले होते की आंगला साठ बायका आहेत. पण कुटुंबाची गोष्ट सांगताना आंगने फक्त दोन राण्यांचा उल्लेख केला. मी काही त्याला याविषयी खोदून खोदून काही विचारले नाही. आंगच्या शेतात दोन देशांचे देशवासी काम करतात. लहानग्या प्रिन्सला घेउन पट्टराणीही त्यावेळेस शेतावर काम करायलाच गेली होती.

तिथून बाहेर पडले तशी मी अरुणाचल प्रदेश बोर्डर च्या दिशेने चालत निघाले. एक तरूण त्याची बंदूक खांद्यावर टाकून चालला होता. मी त्याच्याशी गप्पा सुरु केल्या तर कळले की तो शिकारीला चालला होता. मग मी त्याच्याबरोबर चालत राहिले. तो शिकारीच्या गोष्टी सांगत होता त्या मला खूप सुरस वाटत होत्या. अर्धाएक तास चालल्यावर थोड्या दाट झाडीमध्ये आम्ही शिकारीची चाहूल घेत थांबून राहिलो. मी त्याला काहीच विचारू शकत नव्हते पण डोळ्याने निरीक्षण मात्र चालू होते. त्याने अंदाज घेऊन एका पक्षाला गोळी मारली तसे तो पक्षी मरून खाली पडला. मला कसेसे झाले पण मी काहीच बोलले नाही. मेलेल्या पक्षाला घेऊन तो परत निघाला तेव्हा शिकारीच्या अर्ध्या राहिलेल्या गोष्टी तो मला सांगत राहिला पण डोळ्याने प्रत्यक्ष शिकार पाहिल्यावर शिकारीच्या गोष्टी ऐकणेही त्रासदायक वाटू लागले.

घरी पोहोचेस्तोवर काळोख पडला होता. नेहेमी सारखी न चुकता रस्ता चुकलेच. ज्याचे नाव माहित नाही त्याच्या घराचा पत्ता कसा विचारू? पण मला एक स्मार्ट आयडिया सुचली. चर्चकडे कोणी भेटले त्याला मी सांगितले की “कल सबने मिलकर कौनसा घर बनाया था? मुझे उसी घर को जाना है|” मग त्याने बरोबर रस्ता दाखवला. घरी पोहोचताच मला सांगितले गेले की आता तू इथे पुरुषांबरोबर नाही तर स्वयंपाकघरात बायकांबरोबर जाऊन बसायचे. ते ऐकून मला माझा अपमान झाल्यासारखा वाटला. आत गेले तर कोणाला माझी नि मला कोणाची भाषा कळेना. आधीच शिकारीच्या प्रसंगाने मन थोडे उद्विग्न झाले होते त्यात हे सारे असे होत होते. पत्र लिहायचे म्हटले तर मोबाईल डेड झाला होता. मग मी माझी डायरी घेउन आले. शेकोटीच्या उजेडात आजच्या पत्रलेखनाला सुरवात केली. आज प्रथमच मोबाईल वर नाही तर कागदावर पत्र लिहित आहे.

वैदेही, माझी पत्र तू आवर्जून वाचतेस त्याचे कारण तुला फिरायची आवड आहे फक्त एवढेच नाही. मी जे जे काही करते त्यात नेहेमीच तुला रस असतो. माझ्या सटरफटर गप्पा तू लक्ष देऊन ऐकतेस. माझ्या जोक्सवर कधीकधी तुझ्याशिवाय दुसरे कोणीच हसत नाही. तू माझी एकुलती एक लाडकी नणंद आहेस. त्यायोगे, प्रवासात पत्र लिहायचा पायंडा पडल्यावरच मी ठरवून टाकले होते की एक ना एक दिवस तुलाही पत्र लिहायचे. तो दिवस आज उगवला. म्हणजे तूर्त दिवस मावळला आहे आणि कडाक्याची थंडीही पडली आहे. पण अगदी घरच्या कुत्र्या मांजासकट सारेच इथे शेकोटीभोवतीच वावर करतात त्यामुळे थंडी सुसह्य होते. एकीकडे बायकांची जेवायची तयारी चालू आहे पण आज जेवायला मांसाहार करायला माझे मन मात्र होणार नाही. म्हणजे बहुतेक कोरडा भात खायची वेळ येणार असे दिसते. उद्याच्या पत्रात काय जेवले ते लिहीनच. इतिहास तुझा आवडता विषय! या पत्रात इतिहासाचे खूप संदर्भ आले आहेत. म्हणून हे पत्र तुला आवडेल असे वाटते.

तुझी
सुप्रियावहिनी

3rd मार्च 2019

प्रिय रश्मी,

रात्री काही आसमिझ बायकर्स नागालँड ला आले. ज्या घरी मी रहात होते त्याच घरातल्या बैठकीच्या खोलीत मैफिल जमवून त्यांचे दारू-पाणी सुरु झाले. तासाभरापूर्वी तिथून मला का हाकलवले गेले होते, हे माझ्या लक्षात आले. पण नवीन पाहुण्यांच्या प्रवासाच्या गप्पा कानी पडत होत्या तसे मलाही रहावेना. एका क्षणी उठून मी सरळ बाहेर गेले आणि माझ्याही प्रवासातले अनुभव त्यांना सांगू लागले. त्या गोष्टी ते कौतुकाने ऐकत राहिले तसा हळूहळू माझा वाईट मूड चांगल्या मूडमध्ये बदलला. मी घरचे सारे नियम तोडून तिथेच गप्पा झोडत बसले.

आतून जेवणाचे बोलावणे आले. माझ्यासाठी बायकांनी व्हेजीटेरीअन डाळ, भाजी, भात असे अन्न शिजवले होते. ते पाहून इथेही मला काय हवं नको ते समजून घेणारं कोणीतरी आहे, असं वाटलं. या प्रदेशात खूपशा कोरड्या भातावर फक्त थोडेसेच तोंडीलावणे ओतून जेवायची पद्धत आहे. मी तशा प्रकारे माझे जेवण उरकत होते. त्या थोडक्या वेळात स्वयंपाक खोलीतील समस्त स्त्री वर्गाशी माझी मैत्री झाली. त्यांना हिंदी आणि मला नाग्मीज मुळीच कळत नसल्यामुळे संभाषणात खूप अडचण येत होती.

मधेच मला वाटले की गाणे गाऊन माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. मग मी “मोरनि बागामां बोले आधी रात मां” हे गाणे त्यांना म्हणून दाखवले. त्यातला एक शब्द कळत नव्हता तरी एकेकजण लक्ष देऊन ऐकत होती. मग एकजण तिच्या मनातील गाणे गुणगुणायला लागली. कोणी त्या गीताचे शब्द बोलायला लागली. एकीने टाळ्यांनी ताल धरला. मला जमेल तसे त्यांच्या जोडीने मी ही नाग्मिझ लोकगीत गाऊ लागले. शेकोटी भोवती उत्सवाचे वातावरण तयार झाले. कोणीतरी जाऊन मारी बिस्कीटचे खूप सारे पुडे विकत घेऊन आले. बिस्किटे खात, रांगडी लोकगीते गात आमची बायका-बायकांची मैफिल तासभर तरी रंगली होती. मी माझ्या खोलीत परतले आणि टोर्च बंद केला तसा मिट॒ट काळोख झाला. खोलीत एवढा अंधार असेल अशी मला कल्पनाही नव्हती. डोक्यावर ब्लँकेट ओढून मी स्वत:ला त्या अंधारापासून लपवून घेतले.

सकाळी उठल्या माझ्यासमोर दोन मोठी मजेदार आव्हाने आ वासून उभी होती. माझ्याजवळचे सारे कपडे वापरून चोळामोळा झाले होते. म्हणजे एक तर इथल्या थंडगार पाण्यात आज धोबीघाट थाटायला हवा आणि दुसरे संकट असे की पुन्हा त्या तोकड्या पडद्याआड जाऊन आंघोळ करायची. या दोन्ही गोष्टी करायला जीवावर आले होते तरी मनाची शक्ती एकवटून मी निघालेच.
घरापासून थोडं दूर तिथे गावात कपडे धुण्यासाठी सोय आहे. त्या वाटेवर बादलीभर कपडे घेऊन ठुमकत ठुमकत गेले. गावातल्या नळावर कपडे धुवायचे प्रकरण मला खूप फिल्मी वाटत होते. पण तिथे पोहीचून पाहिले तो काय? फिल्म मध्ये दाखवतात तशा बायका तिथे नव्हत्याच. घराघरातली लहान लहान मुले मात्र कपडे धुण्याचे काम सफाईने करत होती. थंडीने गारठायला होत असताना, हाताने विसेक कपडे घासून, पिळून माझा खर तर दम निघाला होता, पण चेहेऱ्यावरचे हसू काही मी हटू दिले नाही. त्या पोराबाळांसमोर मला माझी चांगली छाप पडून हवी होती.

आता आंघोळच काय ती राहिली. आधी अंगणात फिरून मी ती टारगट मुलं कुठे दिसतायत का ते पाहिलं. ती कुठेच दिसली नाहीत तसी मी पटकन पडद्यापलीकडे सटकले. तरीही कपडे उतरवायला काही माझा धीर होईना. शेवटी अंगावर कपडे ठेऊनच कसेबसे अंग धुवून घेतले आणि तुफान वेगाने ओले कपडे उतरवून सुके कपडे अंगावर चढवले.

इथे सकाळचा चहा नाश्ता हा प्रकार नसतो. दुपारचे जेवण सकाळीच उरकून घ्यायचे असते आणि चहा दिवसभरात कधीही कितीही पिता येतो. आज रविवार होता. मी भरपेट भात जेऊन घेतला आणि घरातल्या बायकांबरोबर चर्च मध्ये प्रार्थनेला गेले. पण तिथे काय चालले होते त्यातले एक अवाक्षर मला कळेना. तासाभराने बसल्या बसल्या मला डुलक्या येऊ लागल्या. मी गुपचूप उठून बाहेर पडले. काल ज्याच्याबरोबर शिकारीला गेले होते तो तरूण मला चर्चच्या आजही दिसला. तो बंदूक खांद्यावर टाकूनच निघाला होता. रविवारी इथे शिकार करत नाहीत, पण मित्राकडे टाईमपास करायला जात आहे, असे त्याने मला सांगितले. एखाद्या मित्राकडे टाईमपाससाठी जात असतानाही बंदूक बरोबर घेऊन जातात, हे मी प्रथमच पाहिले.

57203968_10156992894157778_809534922216701952_n.jpg

मी चालत चालत इंडो-म्यानमार बोर्डरवर निघाले. गावातल्या मुख्य रस्त्याला सोडून वाट डोंगरातून वर जाऊ लागली तशा लोकांच्या नजरा मला न्याहाळत आहेत हे मला कळू लागले. इथल्या जमातीला अजूनही पर्यटकांची तितकीशी सवय झालेली नाही. हेच ते कोन्याक वॉरीअर्स ज्यांचा गाढ विश्वास होता की आपली आंग संस्कृती आणि परंपरा जपायची तर संपर्कात येऊ पहाणाऱ्या प्रत्येक परकीय जमातीला जीवानिशी मारून समूळ नष्ट केले पाहिजे.

१९६० मध्ये कायदा होईपर्यंत (नि त्यानंतरही) या जमातीत हेडहंटिंग हा रिवाज चालूच राहिला. आपल्या संकृतीचे रक्षण या पलीकडे पुरुषत्व, शौर्य अशा गुणांचेही ते प्रतिक होते. शिकारीतील साहसाचे प्रतिक म्हणून सर्वात पहिला टाटू कपाळावर गोंदला जातो. शौर्यगाथा जशी वाढत जाते तसे गालावर, मग मानेवर, मग छातीवर! पराक्रमाची गाथा जशी वाढेल तसे शरीराचे एकेक अवयव टाटूच्या नक्षीने कोरत जायचे. जेणेकरून हेडहंटिंग करून कमावलेला गौरव शरीरावर आजन्म मिरवता येईल.

आजच्या पिढीने ख्रिस्चनीटी स्वीकारली तशी ती प्रथा मागे पडली. पण मला अस वाटत की आक्रमकता इथल्या रक्तात भिनली असावी. नाहीतर अगदी पाच, सात, दहा वर्षाची रस्त्यावरची मुलं मला पहाता क्षणी दगड घेऊन मला मारायला माझ्या पाठी लागली नसती. जेव्हा ती दुरूनच छोटे छोटे दगड मला फेकून मारत होती तेव्हा मला तो पोरखेळ वाटला. पण आरडाओरड आणि दगडफेक करत ती गँग माझ्या पाठी धावू लागली, तेव्हा तिथे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मला वाटलं. तो क्षण टिपून घेण्यासाठी माझा कॅमेरा सुरु करून मी वळले, त्याक्षणी ती गँग बिथरली. मी तेव्हा जे काही पाहिलं ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होत. एक थोडा मोठा मुलगा जोर लावून मोठाच धोंडा उचलू पहात होता. त्याच्या नादाने, माझ्यावरच्या रागाने इतर मुलेही मोठमोठे दगड शोधू लागली. एकीकडे मला त्यांचा धडधड, संताप कळत होता आणि दुसरीकडे हसू येत होते. मी जशी त्यांच्यावर कॅमेरा रोखून दोनचार पावले त्यांच्या दिशेने चालले तसे मात्र ते जास्त घाबरले. त्यांच्या भाषेत काहीतरी ओरडत पळू लागले. त्या संधीचा फायदा घेणे हे सर्वात जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर होते. या छोट्या वोरीअर्स बरोबर मैत्री करण्याची अनावर इच्छा असूनही मला त्यांच्याकडे पाठ करून पुढे निघावे लागले.

वाटेवर मला एक मुलगा दिसला. त्याचे घर कुठे होते ते मला माहित नाही पण कालही मी याला रस्त्यावर भटकताना पाहिले होते. त्याने कित्येक दिवसात आंघोळ केलेली दिसत नव्हती. लोकं वेडसर ठरवतील अशा हालचाली तो करायचा. मी डोंगरातून एकटीच वाट काढत चालले होते त्या वाटेवर माझा वाटाड्या बनून तो माझ्या पुढे पुढे चालू लागला.

इंडिया-म्यानमार बोर्डर पोस्ट वरून निसर्गरम्य डोंगरात वसलेल्या लहान लहान वस्तींचे फार सुंदर दृश्य दिसते. सूर्य जरी डोक्यावर आला होता तरी मस्त वारा सुटला होती. तो आणि मी हवा खात इथेच खूप वेळ बसून राहिलो. तो त्याचीच भाषाही धड बोलू शकत नव्हता पण आम्ही एकमेकांशी संवाद साधयला उत्सुक होतो. आमची एकमेकांशी मैत्री जमली.
56848152_10156992894317778_3568696001352957952_n.jpg

थोड्याच वेळात कालचे बायकर्स इथे येऊन पोहोचले. या मुलाची सोबत घेऊन मी इथवर चालत आले याचे त्यांना कोण आश्चर्य वाटले. आम्हाला दोघांनाही त्यांनी बाईकवरून परत गावात जायला लिफ्ट ऑफर केली. अचानक बाईक राईड मिळाली त्याची आम्हाला खूप गंमत वाटत होती. आपापल्या बाईकवरून एक दुसऱ्याला हाका देत आम्ही खिदळत होतो.

दुपारी मला भूक लागली असेल असे वाटून बायकांनी मॅगी, बिस्किटे आणून दिले. ते खाऊन एक झोप काढण्यासाठी निघतच होते तेवढ्यात एक वयस्कर हेडहंटर पारंपारिक टोपी चढवून घराच्याच दिशेने येताना दिसला. इथल्या पारंपारिक पोशाखाबद्दल बोलायचे झाले तर उत्सवाच्या दिवशी कपडे, टोपी, दागिने अशी भरभक्कम सजावट अंगावर चढवायची प्रथा असली तरी इतर दिवशी शक्यतो कोन्याक पुरुष आणि बायका, दोघेही नग्न वावरायचे. पण तो काळही सरला. लोन्ग्वा ला भेट देणाऱ्या प्रवाशांकडचे काय आवडते आणि प्रवाशांना काय आवडते, त्यानुसार लज्जा, फेशन आणि उदरनिर्वाह यांच्या पायी मूळ परंपरा मात्र लयाला गेली. आमच्या घरी येणाऱ्या अंगात कोट, खाली अर्धी चड्डी आणि गळ्यात पारंपारिक माळ घातली होती. वयानुसार थकून गेलेला आमचा पाहुणा हातातला भाला उंच करीत “हल्ला बोल” च्या आविर्भावात आरडा ओरडा करीत झपझप चालत येत होता. लोन्ग्वाच्या हेडहंटरचे ते हायब्रीड रूप खोलवर विचार करता अस्वस्थ करणारे आहे. पण त्या क्षणी त्याला पाहून मला खूप गंमत वाटली. मग घरच्या बायकांना विनवणी करून मी ही नाग्मिझ स्त्री सारखा पोशाख चढवला. माझा अवतार बघून सारी मुले सुद्धा माझ्याबरोबर मस्ती मजा धुमाकूळ करत होती. आम्ही खूप फोटो काढले.

56877101_10156992894747778_6356758220366675968_n.jpg57045408_10156992894912778_5860885781979070464_n.jpg

त्या खुशीत बोलीवूडची गाणी लावून मी नाचू लागले तेव्हा पोरे हसायला लागली. पण आंघोळ करताना पाहून खिदळत होती त्यापुढे मला याची काहीच लाज वाटली नाही. मग चिमणी पोरे माझ्याबरोबर नाचूही लागली. दुपारभर आम्ही धांगडधिंगा केला. रुटीन दिवसाचा उत्सव झाला.

कुटूंबाचे धुतलेले कपडे वाळत घालायला एक दोरी घराबाहेर दोरी टांगली होती. आधीचे कपडे उतरवले गेले तसे धुतलेले कपडे वाळत घालायला माझा नंबर लागला तोवर दुपार टळत आली होती. संध्याकाळी पाच वाजता इथे सूर्य मावळायला सुरवात होते. तो नजारा या घरातून सुंदर दिसतो. मी एका खुर्चीवर शांत बसून ते न्याहाळत होते की ढग भरून आले नि पावसाला सुरवात झाली. धुतलेल्या कपड्यांचे जे प्रदर्शन नुकतेच दोरीवर मांडून ठेवले होते ते आटपे आटपे पर्यंत सारे कपडे आणि मी सुद्धा पार भिजून गेले. माझी पुरती वाट लागली. अगदी शेकोटी जवळ बसूनही अंगातली हुडहुडी कमी होईना.

माझ्या होस्ट ने मला सुचवले की थोडी चिलीम ओढ म्हणजे अंगातील थंडी कमी होईल. तरी ती स्वयंपाकघरातली मुळीच हिंदी न कळणारी घरची मुख्य स्त्री मला सांगत होती, “मन माय ... मन माय”. त्याचा आर्थ “हे चांगले नाहीये” पण मी थोडे झुरके घेतलेच. तर जादू झाल्यागत माझी थंडी पळून गेली. त्या उबेची मला नितांत गरज वाटली म्हणून तिचा सल्ला फार मनावर घ्यावा असे वाटले नाही. जंगली माणसांच्यात रहायचे तर एखादा दिवस त्यांच्याच सारखे राहिले तर बिघडले कुठे? स्वत:चे असे समाधान करून पुढचे तासन तास बैठकीच्या खोलीत शेकोटी भोवती बसून त्यांच्यातलीच एक असल्यासारखी आफीम ओढत राहिले. पुढे पुढे मी किती अति करतेय मलाच धड कळत नव्हते. पण हे खरे की जरी बाहेर गारठून टाकणारी थंडी पडली होती तरी मला मात्र मुळीच थंडी वाजत नव्हती.

56623229_10156992896167778_2172491060721221632_n.jpg

रश्मी, एक ना एक पत्र तुला लिहायचे हे ठरवलेच होते. आपली ओळख झांल्यापासून मी जो काहीही उपक्रम हाती घेतला त्यात तुझी बिनशर्त संपूर्ण मदत असते. आणि वेळोवेळी माझ्या कामाचे कौतुक करून मला उत्तेजन देण्यासाठीही तूच पुढे असतेस. नुकताच एक रेडीओप्रोग्राम बनवताना तू मला सांगितलेस की, “तू ज्याला हात लावशील त्याचे सोने केले नाहीस असे कधी तरी झाले आहे का?” आणि बिलकूल आत्मविश्वास वाटत नव्हता अशा परिस्थितीही आपण तो कार्यक्रमही यशस्वी केला. फार जवळची नसलीस तरी तू माझी फार मोलाची मैत्रीण आहेस.

आज रात्री उशिरापर्यंत जी काय नशा केली की त्याचा दिंडोरा पिटण्यासारखे असे काही नाही. गौरवाच्या क्षणी कोणालाही पत्र लिहिता येते. परिस्थिती नेमकी उलट असते, स्वत:चे मन स्वत:ला खात असते, तेव्हा फक्त मोजक्या लोकांची आठवण होते, त्यापैकी तू एक आहेस. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले.

तुझी मैत्रीण
सुप्रिया

4th मार्च 2019

प्रिय कोमल,

माझ्या प्रवासातील आजची अविस्मरणीय गोष्ट तुझ्या नावावर मांडायची आहे. कारण एक तू आहेस की मी वेड्या वेड्या सारखे वागले तरी तुला माझी चूक-भूल दिसणारच नाही. कारण तू ही थोडी तशीच जगाने वेडी ठरवलेल्या कॅटेगरीमध्ये मोडतेस. शिवाय माझ्यावर खूप प्रेम करणारी माझी सर्वात जवळची माणसं दोन हातांच्या दहा बोटांवर मोजायची ठरवली तर एका बोटावर तुझे नाव असेल. मी तुला पत्र लिहीलंय हे कळल्यावर तुला केवढा आनंद होईल ते मला डोळ्यासमोर दिसतंय!

मला शब्दात सांगता करता येणार नाही पण काल रात्री जशी झोप लागली ती जरा वेगळीच होती. सकाळी जाग यायला थोडा उशीर झाला. आज जंगलात मोठ्या शिकारीला जायचा बेत ठरला होता. कालच सामानाची जमवाजमव करून ठेवली होती. नदीत मासे पकडायचे आणि तिथेच जेवण शिजवून खायचे असा फक्कड बेत ठरला होता. पण खोलीबाहेर आले तर आभाळ भरून आले होते. म्हणजे अख्खी रात्र सरली तरी पाउस सरला नव्हताच. अशा ओल्या वातावरणात शिकारीसाठी दूर जंगलात जायच्या नुसत्या कल्पनेने मला गरजेपेक्षा जास्त कापरे भरू लागले. तसेही त्या वातावरणात भर सकाळीही लोन्ग्वा गाव खिन्न वाटत होते. मला तिथे अजून रहायची इच्छा होईना. मी पाठीवर बॅग चढवली आणि घरच्या मंडळीना गुडबाय करून निघाले. जरी कुठे जायचे ते ठाऊक नव्हते तरी मोन पर्यंतचा पहिला टप्पा अटळ होताच. मोन ला जायची पहिली आणि शेवटची सुमो साडे आठला सुटणार होती, त्यामुळे विचार करत बसायला वेळ नव्हता.

सुमो स्टँडवर पोहोचले तर सुमो जवळजवळ पॅक होऊन निघायच्या तयारीत उभी होती. सर्वात पाठच्या सीटचे तिकीट मिळाले. ते गोड मानून, लोन्ग्वाला गुडबाय करून निघाले.
56753112_10156997741397778_3181358739449970688_o.jpg
आधी आधी मी पावसात स्वच्छ आंघोळ केलेल्या सृष्टीला कमेंरात टिपून घेण्यासाठी आतुर होते पण काहीच वेळात माझ्या डोक्यात, पोटात भिरभिरु लागले. उपाशी पोटी निघाले होते. पाठची सीट होती. रस्ता वळणावळणाचा होता. यापलीकडे जाऊन ते सिरिअसली घ्यावे, हे माझ्या डोक्याला तेव्हा सुचले नाही.

मोन ला पोहोचल्यावर पुढचे तिकीट काढायला गेले तेव्हा सोनारीसाठी सुमो निघत होती. मला आदल्या प्रवासात झाला तसा त्रास परत होऊ नये याची मला नीट खबरदारी घ्यायची होती. मी एक नंबर ची सीट देण्याच्या अटीवरच फक्त तिकीट विकत घेतले. (भरल्या सुमोतही ती सीट मला मिळाली याचे थोडे आश्चर्य वाटले खरे!) खूप सारा सुका खाऊ विकत घेऊन मी ऐटीत पुढच्या सीट वर खिडकीत बसायला गेले, तेव्हा मला कळले की एक नंबरची सीट ही ड्रायव्हर आणि खिडकीतील प्रवासी यांच्या मधली सीट असते.

या सीटवरच्या प्रवाशाला एक पाय गिअर च्या पलीकडे नि एक पाय गिअरच्या आलिकडे ठेऊन बसावे लागते, दोन पायामधला कोन ही ड्रायव्हरची गिअर बदलायची स्पेस असते. आता हा कोन किती अंशाचा ठेवायचा हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे. हे भगवान! आयुष्यात असा प्रवास करायची वेळ येईल (ते ही एक नंबर च्या ओन डिमांड तिकिटावर) असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जोडीला नागालँडच्या रस्त्याची महतीही मी मागच्या पत्रात लिहिली आहेच, तर ह्या टप्प्यावरचा प्रवास कसा झाला असेल याची हे वेगळे लिहायला नको. (जोक्स अपार्ट, एरव्ही रोजच इथल्या गाडीत एक नंबर च्या तिकीटावर कोणी न कोणी प्रवासी बसतोच की! अनेकदा ती स्त्री सुद्धा असते हे मी स्वत: पाहिलेले आहे.)

57154217_10156997745732778_4457204196638195712_o.jpg

तीझीट (Tizit) ला नागलँडची हद्द संपून आसामचे राज्य सुरु होते. हुश्श! निदान पुढचा विसेक किलोमीटरचा प्रवास सरळ आणि सपाट रस्त्यावरून करायचा. तथा गिअर बदलायची वेळ फारशी येणार नाही! पण स्टेट बोर्डर क्रोस केल्या केल्याच नुसतेच रस्ते नाही तर संपूर्ण नजारा बदलून गेला. पावसाळी वातावरणात नागालँड मधील मोन डीस्ट्रीक्ट अक्षरश: पेंगत असल्यागत वाटत होते. त्याच वातावरणात आसामचे नामतोला (Namtola) मात्र वाऱ्यात नाचणाऱ्या हिरव्या कुरणाला डोक्यावर घेऊन नांदत होते असे कोणालाही वाटेल. ते पाहून खरतर मन प्रसन्न व्हायला हवे. पण तसे आले नाही. कारण त्या सुमारास मी एका वेगळ्याच अनुभवातून जात होते.

माझे डोके थोडे बधीर झाले होते. आजूबाजूच्या परिस्थितीचे भान हळू हळू अस्पष्ट होत होते. काही वेळात सारेच फिक्कट होत होत शेवटी सारे अदृश्य झाले. माझ्या आयुष्यातले पुढचे काही तास जे चक्क गायब झाले, ते मला अजून सापडले नाहीत.

56944938_10156997749312778_1088357022182670336_o.jpg

अंदाज बांधला तर तेव्हा साधारण अकरा वाजलेले असावेत. दीड वाजता मी भोजो रेल्वे स्टेशन वर का आणि कशी पोहोचले याची मला मुळीच आठवण नाही. तिकीटच्या खिडकी पलीकडून तो महाशय मला कुठे जायचे हे विचारत होता त्यावेळी मला त्याचा राग येत होता, एवढे मला आठवते. मी त्याला ओरडून सांगत होते, “मै कही भी जाऊ, आपको उससे क्या मतलब? आपका काम सिर्फ तिकीट देने का है|”

फारशी बाचाबाची झाली नसावी पण काहीतरी बिनसले, एवढे खरे! तशी मी धुसमूसत तडक खिडकी सोडून निघाले आणि रेल्वे प्लॅटफोर्म वर येऊन रुसून बसले. काही वेळाने एक ट्रेन आली, त्यात चढले. जवळजवळ अख्खी ट्रेन रिकामी होती. ते मला आवडले. मी खिडकीची सीट पकडून बसले. वारा अंगावर येऊ लागला. डोकेही ताळ्यावर येऊ लागले. मी कुठे चालले आहे? मला हे माहितच नाही, ह्याची जाणीव झाली. ती जाणीव खूप भीतीदायक होती. आदल्या दिवशी अफिम ची नशा केली त्याचा हा परिणाम असेल का? ह्या प्रश्नाचे उत्तर मला आजपर्यंत सापडले नाही. पण जो अनुभव आठवणीतच नाही तो अनुभव निव्वळ अविस्मरणीय आहे.

मोबाईलचे चार्जिंग संपले होते त्यामुळे त्याक्षणी मला काहीच करता येईना. काही मिनिटांनी मी इन्टरनेटवरून ट्रेन चे नाव आणि रूट शोधून काढला. सोनारी पासून तीन किलोमीटर दूर असलेल्या भोजो स्टेशनवरून दीड च्या सुमारास मी अवध-आसाम एक्स्प्रेस पकडली होती.
ही गाडी दुपारी 2.35 ला गाडी न्यू तिनसुकिया स्टेशनला पोहोचते. माझ्याकडे तिथून पुढच्या प्रवासाची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य होते.

सुपर आयडिया! अरुणाचल प्रदेश मधल्या डोंग या गावाला जाता येईल. न्यू तिनसुकिया पासून 330 किलोमीटरचा रस्ता आहे. आज जमेल तितका रस्ता पार करायचा आणि उद्या 5 मार्चच्या रात्री डोंगला जाऊनच मुक्काम करायचा. हा जो दोन वाक्यात दोन दिवसाचा प्लान केला तो किती ढोबळ आणि कुचकामी होता हे पुढे कळेलच. पण डोंग ला का जायचे ठरवले ते आधी सांगते.

सहसा शेपटीवाल्या प्राण्यांची शेपूट जशी मूळ शरीराच्या बाहेर जोडली असते तसे नॉर्थ इस्ट इंडिया हे उर्वरित देशाच्या पूर्वेला जोडलेले आहे. या प्रदेशातले सर्वात पूर्वेकडचे कुठचे गाव असेल तर ते डोंग! सूर्योदयाच्या किरणांचा सर्वात पहिला स्पर्श डोंग ला होतो. हे गाव फार दुर्गम असल्यामुळे सहसा प्रवाशांच्या आयटनरी वर नसते. पण माझ्या हातात चार दिवस होते. प्रवास संपायच्या आधी अशा विलक्षण जागेला भेट द्यायची संधी जणू चालत आली होती.

डोंगच्या जायच्या रस्त्यावरचे मुख्य टप्पे असे आहेत. न्यू तिनसुकिया 80 km (2 तास) नाम्साई 55 km (1.30 तास)  तेजू 200 km (8-10 तास) वालोंग (पायी 2.5 तास) डोंग. रात्रीच्या तिसऱ्या प्रहराला शेवटच्या टप्प्यावरची डोंगरातील पाउलवाट तुडवून सूर्योदयाच्या आधी डोंग ला पोहोचतात. मी तर सुर्योदयाच्या प्रतीक्षेत अख्खी रात्रही डोंगच्या पठारावर काढायला तयार होते.

न्यू तिनसुकिया ला उतरले तेव्हा गेट वर तिकीट चेकर उभा होता. आता माझी लाज आणि पैसे दोन्ही जाणार या भीतीने माझी पूरती गाळण उडाली. मी त्याला चुकवत प्लॅटफोर्मवर येऱ्याझाऱ्या घालत राहिले आणि मधेच धीर एकवटून चपळाईने बाहेर सटकले.

मग माझी स्टाईल चेंज करून ताठ मानेने मी पुन्हा उलटी वळले. चौकशी काउंटर वरून पुढच्या प्रवासाची माहिती मिळाली त्याप्रमाणे चालत चालत बस स्टँड वर गेले. आजची शेवटची बस काहीच वेळात निघणार होती, आणि ती फक्त नाम्साई (Namsai) पर्यंतच नेऊन सोडणार होती. पण 'पुढचे पुढे बघू'! कमीतकमी एवढा नरम एटीट्युड तर बॅकपॅकरला ठेवावाच लागतो. ह्या टप्यावरचा प्रवास पूर्ण करून मी नाम्साईला उतरले तेव्हा फक्त पाच वाजून गेले होते. या वेळेस एकही वहान तेजू ला पोहोचायला मिळणार नाही यावर मी मुंबईकरने तरी कसा विश्वास ठेवायचा? म्हणूनच जेव्हा बस मला मेन रोड वर उतरवून निघून गेली तेव्हाही मी निश्चिंत होते. पण तिथला एक अनोळखी इसम मात्र अक्षरश: परोपरीने मला विनवू लागला की, “या वेळेस तू कुठच्या गाडीत बसशील तर तेजू ला पोहोचशीलच याची मुळीच गरेंटी नाही. इथली परिस्थिती एवढी खराब आहे की अर्ध्या रस्त्यात तुला लुटून नेतील. रात्र इथेच काढून उद्या पहाटे पुढचा प्रवास कर.” प्रथम त्या अनोळखी इसमाच्या फुकटच्या सल्याकडे मी दुर्लक्ष केले. पण तरीही तो माझ्या काळजीपोटी माझ्या सोबतीला थांबूनच राहिला. मी कितीतरी वेळ गाड्यांना लिफ्ट साठी इशारे करत होते आणि मला मुळीच दाद न देता वहाने डोळ्यासमोरून पुढे निघून जात होती. पण एखादी गाडी थांबलीच तर मी त्यात खरच बसेन की काय अशी काळजी त्या माणसाला वाटत होती. स्वत:च्या शब्दाला किंमत नसतानाही शिवाय फुकटचा वेळ दवडून, निव्वळ कुणाच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी हटून रहाणारे असे लोक फक्त अशाच प्रवासात सापडतात.

एकच फक्त गाडी दुरून दिसली तिच्यामध्ये बसायला त्याची हरकत नव्हती असे तो म्हणाला. कारण ती गाडी पोलीसची होती. माझा इशारा गाडी थांबली, पोलीसने पुढची काच खाली केली.
मी विचारले “गाडी तेजूतक जाएगी?”
“हा.”
“प्लीज मुझे भी लेकर चलिये|.”
“मुमकिन नही है| पीछे कैदी बैठे है|”
“ तो क्या मै आगे बैठ सकती हू? आप है तो फिर डरने जैसा क्या है?” ...

दोन तास भर माझी चिकाटी आणि हिम्मत पूर्ण पणाला लावूनही मी एकही वहान थांबवू शकले नाही. त्यात पाऊस सुरु झाला आणि दोन मिनिटात मी भिजूनही गेले. सकाळी जे सटरफटर खाल्ले होते त्यावर पोटात अन्नाचा कण नव्हता. एका क्षणी मी आशा सोडून दिली आणि मेनरोड वरून सरळ नाम्साई मार्केटच्या दिशेने चालू लागले तसे माझ्या रक्षणकरत्याच्या जीवात जीव आला.

चालताना एका लोकल बाईक ला थांबवून मी विचारले की एखादे सुरक्षित हॉटेल इथून किती दूर आहे? त्यावर त्याने मला मार्केट पर्यंत लिफ्ट द्यायची तयारी दाखवली. मी सामान मांडीवर धरून त्याच्या पाठी बसले. माझी थोडी विचारपूस केल्यावर जसे त्याला कळले की मला तेजू (Tezu) ला जायचे आहे तर तो ही एका क्षणात एका चाकावर ( ) तेजू ला जायला तयार झाला. दिवस सरून गेल्यावर, पावसात भिजत, पुचाट स्कुटरवरुन, जंगलाच्या रस्त्यातून तो मला नुसताच घेऊन जायला तयार नव्हता तर त्यासाठी मला खूप जास्त भरीसही पाडत होता. त्याला मी एकतर मूर्ख दिसत होते किंवा मी एकटीच स्त्री आहे यापुढे काहीच दिसत नव्हते.

मी त्याला खोटे सांगितले की मी on government duty आहे तसे त्याने माझ्याकडे सेन्ट्रल की स्टेट, कुठचे डीपार्टमेंट वगैरे वगैरे चौकशी करायला सुरवात केली. मी मुंबईहून आले आहे, अशा तुटक जुजबी माहिती पलीकडे मी काहीही सांगू शकणार नाही, असे मी त्याला भासवले. माझ्या बोलण्यातील खरेखोटेपणा पडताळून पहाण्यासाठी असेल कदाचित पण त्याने एका हॉटेलवर नेउन गाडी उभी केली. कोणी सर्वसाधारण प्रवासी असता तर तिथेच रहायची सोय शोधली असती. पण मी तर गव्हरर्न्मेंट सर्वंट होते ना? रिसेप्शनवर मी सर्किट हाउस बद्दल विचारणा केली. त्यावर तो मनुष्य मला पटवू लागला की ते मार्केटहून पुढे खूप दूर आहे. शिवाय सर्किट हाउससाठी फक्त आगामी (advance) बुकिंग होते. पण गप्पांच्या ओघात जसे मला कळले, की समोरच Deputy Commissioner चे ऑफिस आहे, मी ही खात्रीपूर्वक सांगितले की माझे आयकार्ड बघून त्यांना माझी रहायची सोय करावीच लागेल. त्या वात्रट माणसाच्या तावडीतून सुटण्यासाठी मला हेच सुचले.

तरी तो मला DC ऑफिस मध्येही सोडायला आला. एकतर त्याला खूप शंका येत होती की मी थापा मारत आहे शिवाय ऑफिस अवर्स तर उलटून गेले होते. त्यामुळे माझे काम तिथे होणारच नाही या खात्रीने तो तिथेच थांबून राहिला. मी त्या इमारती मधला जिना चढू लागले. वरच्या मजल्यावरच्या एकाच खोलीत लाईट चालू होता, मी तिथे गेले आणि जो कोण तिथे होता त्याला सारी कहाणी सांगून विनंती केली की "मला इथे ऑफिसमध्ये रात्रभर बसायला मिळाले तरी मी उद्या सकाळी गपचूप निघून जाईन". तो सद्गृहस्थ मला Additional DC कडे घेऊन गेला. हे दोघेजण इलेक्शन च्या कामामुळे उशिरापर्यंत ऑफिस मध्ये राहिले होते, तेच माझ्या पथ्यावर पडले. Additional DC सज्जन आणि दयाळू माणूस होता. त्याने लगेच दोन फोन जोडले. पुढच्या काहीच मिनिटात माझ्यासाठी एक जीप तयार होती जी मला घेऊन सर्किट हाउस मध्ये गेली. जिथे माझ्या जेवण्या-खाण्याची रहाण्याची VIP व्यवस्था केलेली होती.
56902424_10156997767847778_8188231759708553216_n.jpg

माझ्या आयुष्यातून हरवलेल्या तासानंतर जेव्हा मी भानावर आले तेव्हा "रात्री नऊ वाजता मला फोन करून माझी खुशाली विचार" फक्त एवढाच निरोप मी राज, रोशन आणि अभिषेक असा तिघांना पाठवला होता. जे सकाळी घडलं ते पुन्हा होणार नाही कशावरून? आणि तशी वेळ माझ्यावर रात्री अवेळी आली तर? हीच रिस्क ओळखून मी तशी तरतूद केली होती. पण ते संकट ओढवले नाही.

56883668_10156997777522778_2152579987473956864_n.jpg

दुसऱ्याच एका अकल्पित संकटातूनही सुखरूप बाहेर पडून मी सर्किट हाउस मध्ये आले. गरम गरम पाण्याने न्हावून घेतले. मी रात्रीच्या जेवणात सहा चपात्या जेवले. पलंगावर विसावले तसे बरोबर दिलेल्या वेळेला एका पाठोपाठ एक तिघांचाही फोन येऊन गेला. माझीच आजची गोष्ट मी फोनवर तीन-तीन वेळा जरी सांगीतली, तरी माझ्यासाठी ती अनाकलनीयच राहिली.

माझ्याबरोबर प्रवास करायची मोठी हौस आहे ना तुला? तर प्रवासाची ही झलक वाचून तुझा विचार बदलतोय का ते बघ.

तुझीच.
(मोठी नणंद आहे मी, स्वत:ची पायरी ओळखून वाग.)

5th मार्च 2019

प्रिय nameless जावई,

माझे असे एकही पत्र नाही जे प्रवासापेक्षा प्रवाशाच्या आठवणीने भरलेले आहे. ह्या पत्रातून मात्र तुझीच गोष्ट, तुलाच सांगायची. पण एवढ्या मायेने मी तुला पत्र लिहिते आहे, ते तुला कळेल तरी कसे? तू तर आत्ताच कायमचा संपर्क कक्षेच्या बाहेर जाऊन पोहोचला आहेस. तुला सोशल मिडियावर शोधले असते तर ते ही आता शक्य नाही. कारण की मला तुझे नावच माहित नाही. मला कळते, कि मी तुला लक्षात ठेउन पत्र लिहिले याच्या आनंदापेक्षापेक्षा, मी तुझे नावही विसरून गेले याचे तुला दु:ख जास्त होईल. कारण एकाच दिवसात अनेकदा तुझे नाव सांगून ते मला डोक्यात फिट करून ठेवायला तू बजावले होतेस. जरी तुझे नाव नेहेमीच्या ओळखीच्या नावांपेक्षा वेगळे होते तरी पत्र लिहायला घेईघेई पर्यंत सुद्धा मी ते विसरून जाईन असे मलाही मुळीच वाटले नव्हते. विचित्र आहे पण खरे आहे.

काल एकापाठोपाठ एक तीन फोन आले तेव्हा पत्रलेखन आटोपतं घेतलं जवळपास तिथूनच आजच्या पत्राच्या गोष्टीची सुरवात करते.

मला हे सारे फोन अपेक्षित होते तेव्हा फोनची बॅटरी डेड होती आणि सर्किट हाउस मध्ये लाईटही नव्हते. मी जर फोनवरही बोलू शकले नसते तर माझ्या सुरक्षिततेबद्दल त्यांचा गैरसमज झाला असता. म्हणून त्या अंधारातही शेजारच्या VIP रूममध्ये अपरिचित व्यक्ती रहात होता त्याचे दार ठोठावायची मी हिम्मत केली. माझे नशीब चांगले होते की तिथून मला डबल मदत मिळाली. त्या महोदयाने त्याचा युएसबी चार्जर तर दिलाच पण दुसरऱ्या दिवशी पहाटे बस स्टॅन्ड पर्यंत गाडीतून सोडायची मदतही ऑफर केली.

सर्किट हाउस पासून नाम्साई बस स्टेन्ड फार तर दीड किलोमीटर दूर असेल. पण न जाणो बहुदा उद्या दिवसाची सुरवात पावसात भिजून करावी लागली तर पुढचा बारा तासाचा प्रवास ओल्या अंगाने करावा लागेल हा विचार करूनच वैताग येत होता. म्हणून तीही मी मदत स्वीकारली. अशा प्रकारे आज भल्या पहाटे साडेचार वाजता रिपरिप पावसात मला आरामात बस स्टॅन्ड पर्यंत पोहोचता आले. नाम्साईचा दिवस उजाडायला थोडा अवधी होता तेव्हाच माझा आजचा दिवस सुरुही झाला. अर्थात, बस स्टॅन्ड वर त्या वेळी काहीही हालचाल दिसत नव्हती आणि पुढचा एक-दीड तास माझ्यावर इकडे तिकडे फक्त घुटमळत रहायण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. सव्वासहा वाजता आमची बस निघून धड पंधराही मिनिटे झाली नसतील तोच सकाळचा ब्रेकफास्ट करण्यासाठी बस ने ब्रेक घेतला. मला कालपासून तेजू ला पोहोचायची केवढी घाई होती! पण माझ्याशिवाय सारेच प्रवासी सवडीने तेजू ला जायला निघालेत ह्या विचाराने मी थोडी अस्वस्थ झाले. पण आता वाटते की ती सोय माझ्या भल्यासाठी झाली असावी. कारण आजचा कठीण प्रवास झेपवण्यासाठी पोट भरून उरेल एवढी उर्जा जवळ असणे खरच किती गरजेचे होते. अरुणाचली बायका चालवत असलेलेल्या त्या रोडसाईड कॅंटीनमध्ये आयुष्यात प्रथमच मी पंधरा रुपयात गरमागरम चविष्ट भरपेट नाश्ता खाल्ला.

IMG_20190305_070926.jpg
तेजू हे गाव लोहित डीस्ट्रीक्टचे हेड क्वार्टर! एवढ्या सर्वसाधारण गावाला पोहोचायला एवढी करामत करून, अपेक्षित वेळेच्या बारा तास उशिरा, म्हणजे सकाळी सातच्या सुमारास, मी तेजू ला पोहोचले. हा वेळेचा अचूक अंदाज नाही कारण मी माझा फोन विचारपूर्वक बंद करून ठेवला होता, न जाणो इथून पुढे चार्ज करायला मिळेल न मिळेल. पण त्या तेजू ला असे काही नाटक झाले की मला फोन सुरु करून कॅमेरामध्ये ते नाट्य टिपून घेण्याचा मोह मुळीच आवरला नाही.

रोड साईडला दुकान मांडून बसलेला एकुलता एक ट्रॅव्हल एजंटच्या आजच्या दोन्ही गाड्यांचे बुकिंग म्हणे आदल्याच दिवशी संध्याकाळी फुल झाले होते. माझा भरवसा माझ्या वेळेने मोडला, त्यात माझी काय चूक? ? नुसते फोनवरून बुकिंग केले त्यांचा तरी काय भरवसा? मी तर तिकिटाचे पैसेही त्याला काढून दिले, पण त्याने त्याला हातही लावला नाही. तो मला परोपरीने सांगत होता, की मला आज डोंग ला जाणे शक्य नाही म्हणजे नाही. माझ्या परीने मी ही त्याला सांगायचा प्रयत्न केला की एकेका आव्हानाला सामोरे जात आता इथवर पोहोचल्यावर हार मानून उलटे परत जायची माझी मुळीच तयारी नाही म्हणजे नाही. डोंग हे माझे स्वप्न होते आणि स्वप्नपूर्तीसाठी माझ्याकडे फक्त दोन दिवसाची मुदत होती, हे वास्तव होते. आठ तारखेचे विमान पकडायला निदान आठ तारखेला तरी मी गोहाटी मध्ये असायलाच हवे!

मी त्याला खूप हैराण केलं असेल हे मला माहित आहे तरी तो हसूनच वार्ता करत होता. एकदा मस्करीत म्हणाला की, “काळ्या गाडीतून ट्रान्सपोर्टचे सामान जाणार आहे त्या सामानाबरोबर बांधून तुला पाठवून देऊया”. मी त्या सेटिंग ला सुद्धा तयार झाले तसा मात्र त्याने डोक्याला हात लावला. एव्हाना मला कळून चुकले की मलाच काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. मग मी एकाच वाक्यात सारा विषयच संपवला, “जैसेही गाडी आएगी मै गाडी मे घुसके बैठूंगी| फिर मुझे कोई उतार नही सकता|”

IMG_20190305_085412.jpg

काळी गाडी पहाताच क्षणी मी गाडीकडे धावले. तर गाडीत आधीच तुमची चांडाळ चौकटी बसली होती. गाडीच्या पाठीवरही कोबून कोंबून सामान चढवले होते. माझी कुठे सोय होईल अशी जागा मला दिसेना. एवढा वेळ ज्याच्याकडे वशिला लावला होता तो सुद्धा गायब झाला. आजूबाजूला लोक कुजबूज करत होते की त्याचे डोके भणभण करायला लागले म्हणून एक पेग मारायला तो सटकला आहे. मी गाडीचे दार उघडायचा प्रयत्न केला पण तुम्ही दार आतून लॉक केले होते. तुमच्या तर्फे मला आत प्रवेश निषिद्ध आहे हे मला स्पष्ट कळले आणि तेवढ्यात तो परत आला. आता त्याच्या आवाजात रुबाब आला होता. आधी त्याने मला पाठी सरकायला सांगितले. मग तुम्हाला थोडे सरकून गाडीत लेडीजला ऐडजेस्ट करून घ्यायला सुचवले. ते ऐकताच तुमची सटकली. प्रवास कठीण होता. फुलसीटचे पैसे भरून तिकीट घेतले होते. तडजोड करायचा सवालच नव्हता. काहीच क्षणात विषयाला वेगळेच स्वरूप आले. पाठच्या सीटवर जो तुझा लंबू मित्र तुझ्या बाजूला बसला होता त्याने शिव्या द्यायला सुरवात केली तसे त्या एजंट ने तुमचे तिकिटाचे पैसेच चक्क परत केले आणि गाडीतून मुकाटयाने उतरायला सांगितले. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी हा एजंटही असा राडा करायला तयार झाला. आता बोला. माझे हृदय कृतज्ञतेपोटी आणि तुमचे हृदय तिरस्काराने भरून गेले. तुम्ही गाडीचे दार उघडले खरे, पण एक जणही तसूभरही हलला नाही. तुझ्या खिडकीतल्या मित्राने मला आत जाण्याविषयी सुचवले. आता काय मी लंबूच्या मांडीवर जाऊन बसणार होते? मी गोडीगुलाबीने मला खिडकीत जागा द्यायचा आग्रह धरला आणि लाजे पोटी का होईना तुम्हाला थोडे थोडे सरकायचे नाटक करावे लागले.

मी गाडीत बसले असे म्हटले तर तुझा वाचताना गैरसमज होईल. गाडीत टेकायला तुम्ही जागाच कुठे दिली होती? तसेच हवेत अडकलेल्या अवस्थेत मी गाडीचा दारवाजा बंद केला. तुम्हाला वाटत होते की असा प्रवास करायची मी हिम्मत करणार नाही तेव्हाच असाच प्रवास करायचा आहे हे माझ्या मनाला समजावायला सुरवातही केली होती. गाडी सुरु होऊन दहा एक मिनिटे झाली असतील का रे? तुझ्या खिडकीतल्या मित्राला पोटात मळमळू लागले. तो दुसऱ्या सीट वरून खिडकीतल्या सीट वर जागा बदलताना मी चपळाईने स्वत:ला सीट मध्ये कोंबून घेतले. दरम्यान गाडीने NH 52 वर भरधाव पळायला सुरवात केली. वेळ सरला तसा लंबूचा शिवीगाळ ओसरला. मी मात्र तरीही दोन अनोळखी पुरुषांच्या मधल्या अपुऱ्या जागेत अंग चोरून अवघडल्यासारखी बसले होते.

लंबूने मला माझा अतापता विचारला तशी मी त्याला माझी ओळख करून दिली. मी ओळख करून दिली तसा माझ्या बद्दलचा तिरस्कार थोडा ओसरून, थोडे कुतूहल वाटू लागले. लंबूला एवढी जाणीव नक्की होती की माझ्या रोजच्या लेखनातून तुमची वार्ता चार लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याला तर ही भीती वाटत होती की माझी भटकंती प्रवासापूर्ती मर्यादित नाही तर मला कुठच्या ओफ़िशिअल मिशनवर नेमलेले आहे आणि मी त्या गुप्त मिशन मधील माझी कामगिरी पार पाडत आहे. मला ते ऐकून स्वप्नगत वाटले. काल परिस्थिती बरोबर उलट होती. मला on duty असल्याचे सोंग रचावे लागले होते. पण कालचे खोटे काय किंवा आजचे सत्य काय, कोणाला पटवून द्यावे याचा माझ्याजवळ काहीही पुरावा नव्हता. तुम्हाला माझी खरीखुरी ओळख दाखवली तरी तो माझ्या मिशनच्या पूर्वनियोजनाचा भाग वाटत होता. आता तुमच्या बद्दल मी माझ्या रिपोर्ट मध्ये काय लिहिणार हीच चिंता लागून राहिली होती. म्हणून थोडा वेळ तुम्ही गुड बोइज सारखे वागत होतात. पण जशी काय मी तुमचीच सवंगडी आहे याची खात्री पटू लागली तसे तुम्हाला माझे भय वाटेना झाले.
IMG_20190305_154242.jpg
पुढे गप्पागोष्टी अशा रंगल्या की जणू चार नाही पाच मित्र प्रवास करत होते. आणि मित्रता असते तिथे कोणाची कोणाला अडचण कशी होईल? खिडकीतल्या मित्राला ओकारी करून करून ग्लानी येउ लागली तसे त्याचे डोके मी माझ्या मांडीवर घेउन त्याला निजू दिले. एकीकडे आपल्या सुखदुखाच्या गोष्टी चालू होत्या. लंबूने बिस्किटे काढली ती आपण वाटून खाल्ली. मग पुढच्या सीट वरच्या मित्राने मोबाईल वर एकसे एक गाणी वाजवायला सुरवात केली. त्या छम्मक गाण्यांवर आपण टाळ्या पिटून ताल धरायला सुरवात केली. तुझ्या मोबाईल मध्ये तू आपले फोटोव्हिडीओ काढलेस. मी सुचवलं की गाडी थांबवून आपण सारे रस्त्यावर नाच करूया. लाजत लाजतच तुम्ही तयार झालात पण आपला तो कार्यक्रम आटपला तोवर अशा मस्तीच्या नादाने तुम्ही अवाक होऊन गेला होतात.

आज सर्वतोपरी तुमच्या मौजमज्जेचा दिवस होता. म्हणूनच तासां- दीड तासागणिक गाडी थांबवून लंबू स्वत:ची एकेक नोट खर्च करून तुमच्यासाठी बिअर विकत घेऊन यायचा. मी ही तुम्हाला थांबवलं नाही कारण, आजचा प्रवास आटपला की पुढची सुट्टी मिळेपर्यंत पुढचे काही महिने घरापासून, फॅमिलीपासून पार दूर, जगाच्या संपर्क कक्षेच्या बाहेर, भारतीय सीमेवर तुम्हाला ड्युटी करायची. या ड्युटीचा वर विषय येऊन थांबला की तुम्ही एकेक जण खूप खूप उदास व्हायचात. मग परत एक ब्रेक व्हायचा आणि परत बिअर!

Untitled-1.jpg

चायनीज आक्रमणापासून भारतीय सीमेचे रक्षण करण्याऱ्या इंडिअन आर्मीचे तुम्ही कूक! तुमच्या बरोबर प्रवास करायला मिळाला म्हणून बर्फाच्छादित Line of Actual Control वरच्या अनेक रोचक गोष्टीही मला ऐकता आल्या. बोर्डर वरच्या ड्युटी वर सैनिकांबरोबर त्यांच्या कुक्सचे आयुष्य सुद्धा किती कठीण असते ते तुमचे मनोगत ऐकता आले. तुम्ही जे सांगितले की आर्मीच्या अंगातील ताकद टिकवण्यासाठी तुमचाही वाटा आहे यात काही शंकाच नाही.

दर अर्ध्या तासाने लंबू खिशातले पैसे काढून मोजायचा. सुरवातीला मला त्याच्याकडे थोड्याफार नोटा दिसत होत्या. पण बिअरच्या तीन चार राउंडस झाल्यावर दोन चार नोटाच राहिल्या तेव्हा मात्र मी त्याला सांगून पाहिले की आता हे प्यायचे प्रकरण पुरे झाले. पण त्याने ऐकले नाही. आजचा प्रवासच तसा आगळा वेगळा होता. दर वेळेस सुट्टी संपवून ड्युटीवर परतायचा प्रवास संपता संपत नाही. असे वाटते की, नोकरी सोडून आत्ता घरी पळून जावे. पण आजचा प्रवास तुम्हाला त्रासदायक वाटला नाही. सुरवातीला तर गाडीच्या बाहेर सामनासकट फेकून द्यावे एवढा माझा तिरस्कार वाटत होता आणि नंतर पुन्हा पुन्हा मला धन्यवाद देऊनही तुमचे समाधान होत नव्हते.

जेव्हा तू मला सांगितलेस की तुला मला सासू मा मानायची इच्छा होतेय. मी तुझ्या तोंडून हे प्रथम ऐकले तेव्हा मला वाटले की माझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली. याच कशाला पण एकूणच आयुष्याच्या प्रवासात अनेक जण भेटतात कोणी मला ताई म्हटते कोणी आंटी म्हणते. मेघालय मध्ये तर कोणी कोणी मम्मी म्हणत होते. पण आयुष्यात प्रथमच कोणी मला सासू मां मानले. आता ह्या नात्यात एक दुसराच ट्वीस्ट आहे. मला दोन मुली आहेत त्यामुळे ते शब्द मला विशेष खटकले. पण तू माझ्या बिन बुडाच्या शंकेचे निरसन स्वत:हून केलेस.

“मेरा सासू मा की लडकी लोग से कोई वास्ता नही| फिर भी तू मेरी सासू मा है| क्यो की जब मै शादी करुंगा तो मै मेरी वाईफ को बोलून्गा| ये मेरी सासू मा है तो इस नातेसे ये तेरी मा हो गयी|”
म्हणूनच माझ्याशी जोडलेल्या सर्व नात्यात तुझे माझे नाते सर्वात अनोखे आहे.

आपला प्रवास संपायला फक्त एकच तास राहिला असेल. काळोख पडला होता. थंडगार वारा वहात होता. बिअरच्या नादापायी लंबू जवळच्या सर्व नोटा संपल्या होत्या. एक शेवटची बिअर घेण्यासाठी त्याने तुझ्याकडे लकडे लावले. वालोंगला तुम्ही सारे दुकानात गेलात तेव्हा पोटात अन्नाचा कण गेला नाही तो तुमचा खिडकीतल्या मित्र ग्लानी येउन माझ्या मांडीवर निजून राहिला होता. इतक्यात तू मला दुकानात बोलवायचा इशारा करू लागलास. मी तुला समजावायचा प्रयत्न केला की मला हलणे कठीण आहे. पण तू काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हतास. मी उतरून दुकानात गेले तेव्हा आधी तू माझ्या हातात दोन गुड डे बिस्कीट चे पुडे सोपवलेस. त्याशिवाय दुकानाच्या टेबलवर माझ्यासाठी गरमागरम मॅगीही माझीच वाट बघत होते. इथून पुढे डोंगरात खायची काही सोय होणार नव्हती. मी आज रात्री उपाशी राहेन या काळजीपोटी जवळची शेवटची नोट तू बिअर वर नाही तर माझ्या जेवणासाठी खर्च केलीस. एवढ्या मोठ्या मेजवानीला मी नाही कस म्हणू? आपण दोघांनी एकमेकांना गरमागरम नुडल्स भरवत सासू आणि जावयानी एकमेकांना निरोप घ्यायच्या आधीचा थोडा वेळ एकत्र घालवला.
maagi.jpg

वालोंग ला माझी काहीही रहायची सोय होणार नाही ही एकच चिंता तुला लागून राहिली आणि तू ती परत परत बलून दाखवली होतीस. मी I.B. ला उतरून घ्यावे हा तुझा सल्ला शेवटी मी ऐकला नाही. मी गोरोम पाणी ला उतरले आणि तुला शेकहांड केला तसे तुला गलबलून आले. तू मला मिठी मारलीस आणि पुटपुटलास, “बस क्या? सिर्फ शेकहेंड करके बायबाय बोलोगे?”

तुम्हाला पुढे किबिटूकडे निघायचे होते. ड्रायव्हर घाई घाई करत होता. पण तुझा पाय तिथून निघेना. त्या उजाड रस्त्यावर एकच घर होते. त्या घरात जी बाई रहाते तीच डोंगला सूर्योदय पहायला जायच्या डोंगरातल्या वाटेवर प्रवाशांचा वाटाड्या बनून जाते. तिच्या घरी तिथे माझी रहायची सोय होईल का ते बघायला तू स्वत: माझ्याबरोबर आलास. आपण दार ठोठावले ते तिनेच उघडले. पण माझी अडचण सांगितली तरी रात्रीपुरता आसरा द्यायलाही ती मूळीच तयार नव्हती. तुमची जीप तर पुढे जायची होती. पुन्हा उलटी मी वालोंग ला जाऊ तरी कशी? आता प्रश्न एवढ्या सहजी सुटणार नव्हता तशी मी तुला तिथून निघायची गळ घातली. माझ्या काळजीपोटी तुझा जीव वरखाली होत असतानाही शेवटी तुला निघावेच लागले. तू निघालास, तसे माझी खुशाली तुला कळवायचे सारे मार्गही बंद झाले.

आजचा दिवस सरत आला होता तशी तुझ्या फेवरेट डायलॉगची पुनरावृत्ती आणि तीव्रता वाढत चालली होती. “मै तुमको जिंदगीभर भूल नही सकता, लेकीन तुम मुझे भूलही जाओगे|” असा फिल्मी डायलॉग रिअल लाईफ मध्ये मारताना मी तर दहा वेळा विचार करेन. जरी त्यातला रांगडेपणा मला कळतो, भावतो तरी असं उलगडून बोलायची मला सवय नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस तू तुझ्या भावना व्यक्त केल्यास त्या त्या वेळेस मी ते हसण्यावारी नेले. पण हे पत्र संपवायच्या आधी मला त्या बद्दल माफी मागायची आहे. आणि माझ्या मनातली एक भीती तुला बोलून दाखवायची आहे, “मै तुमको जिंदगीभर भूल नही सकती, लेकीन कही तुम मुझे भूल तो नही जाओगे?”

तुझी
सासू मां

६ मार्च | दिवस २९

प्रिय आई,

कालच्या पत्रातला माझा जावई पुन्हा पुन्हा त्याच्या आईची आठवण काढत होता. त्याच्या आईची जागा दुसरे कोणी घेऊ शकत नाही ह्याची त्याला जाणीव होती. म्हणूनच त्याने मला सासूचा दर्जा दिला. पण माझ्या लग्नाने जिला माझ्या सासूचा दर्जा दिला तिच्या रूपाने मला मात्र दुसरी आई मिळाली.

आजचा दिवस संपला आहे आणि काल रात्रीपासूनची गोष्ट लिहायची बाकी आहे. गेल्या चोवीस तासात केवढ्या घडामोडी झाल्या. त्या वाटाड्या बाईने तिच्या घराचे दार लावून घेतले. मी मात्र तिच्या घराबाहेरच्या ओसरीवर आडोसा घेउन ताटकळत थांबूनच राहिले. माझ्याकडे दुसरा काहीही मार्ग नव्हता. गोरोम पाणी ला मला सोडून जीप पुढे निघून गेली होती. माझे परतीचे सारे मार्ग बंद झाले होते.
थोडा वेळ गेला असेल, त्या बाईने दरवाजा उघडून पाहिले तर मी तिथेच, थंडीत कुडकुडत उभी होते.

“फिर से गुस्सा मत होना, प्लीज| मै सोच ही रही हू के आगे क्या कर सकती हू|”
“तुम को एक बार बोला वो समझता नही है? टूरीस्ट को घर के अंदर लेने की मुझे परमिशन नही है| किसी को पता चल गया तो मेरी नौकरी चली जाएगी|”
“हा ... मै आपका प्रोब्लेम समझ सकती हू| आप बस इतनाही प्रोमीस करो के डोंग के लिये आप मेरे साथ चलोगी|”
“मै प्रोमीस नही कर सकती| अगर बारीश रुकती है तो चालूंगी| लेकीन अब तुम IB को कैसे जाओगे? तुमने तो गाडी को भी भेज दिया|”
“लेकीन मुझे IB को जाना ही नही है| एक बार उधर गयी, तो फस जाउंगी| फिर रात को दो बजे कौन मुझे इधर लेकर आएगा?”
“अरे तुम समझते नही हो| बारीश में वो रास्ते पे नही जा सकते|”
“क्यो? बारीश होगी तो थोडा जल्दी निकलेंगे और धीरे धीरे जाएंगे ... वैसे बारीश तो रुक भी जाएगी. आप उसकी बिलकूल चिंता नही करना. खाना खाओ और सो जाओ| दो बजे उठना है|”
“मुझे तो सोना है लेकीन तुमने परेशानी खडी कर दी|”
“कोई परेशानी नही. मै चुपचाप इधर घर के बाहर बैठती हू| छे घंटेही तो बाकी है| वैसे तीन बजे तक हमको डोंग के लिये निकलना होगा ना?”
“मैने बोला ना, के मै कुछ भी प्रोमीस नाही करूंगी|”
“मत करना ... लेकीन आप बार बार गुस्सा क्यो होते हो?”
“घुस्सा आएगा ना?तुम इधर कैसे रह सकते हो? अभी रात को कुछ हो गया तो मेरी जिम्मेदारी है|”

१९६२ मध्ये झालेल्या इंडो –चायना वॉर नंतर 4000 किलोमीटर लांबच लांब पसरलेल्या The Line of Actual Control च्या दोन्ही बाजूला दोन देशांचे सैनिक बारा महिने चोवीस तास पहारा देउ लागले. या LAC चा पश्चिमेकडे अक्साई चीनचा खुला वाळवंटी प्रदेश आहे. मागे राज आणि मी लडाख ला बाईक ने गेलो होतो तेव्हा आम्ही तिथे जाउन आलो. हा प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला बंकर मध्ये लपलेले सैनिक आपल्या वर नजर आणि निशाणी लावून बसले असतात याची आपल्याला मुळीही कल्पनाही नसते.

LAC चा पूर्वेकडचा भाग अरुणाचल प्रदेश मधील हा डोंगराळ परिसर आहे. गोरम पाणी पासून जेमतेम तीस किलोमीटर वर इंडो-चायना सीमा आहे. फार दुर्गम प्रदेश आहे. किबिटू पासून पुढे चालत चालतच बोर्डरवर पोहोचता येते. इथे रस्ता बांधू शकत नाही कारण हा ही दोन्ही देशांमधील वादग्रस्त बोर्डर आहे. दाट जंगलातल्या या दुर्गम बोर्डरवर रात्रीच्या अंधारातही नाईट व्हिजन टेलिस्कोप मधून डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचा, हे काम वाटते तेवढे सोपे नाही. त्यामुळे पर्यटकांच्या बाबतीत सुद्धा इथे सतर्क रहावे लागत असावे. इंडिया-म्यानमार-चीन या तीन देशांमधली ट्रायजंक्शन बोर्डरही याच प्रदेशात आहे.

वालोंग मध्ये पूर्वी एक BSNL टोवर होता. तो ही बंद झाला. इथल्या लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी साधा फोनचा पर्याय सुद्धा उपलब्ध नाही. अशा दुर्गम ठिकाणी कोण्या परक्याची जबाबदारी घ्यायला कोणी दहा वेळा विचार करणारच.

एव्हाना आमचे नाटक पहायला आजूबाजूचे दोन चार लोक जमा झाले. माझी कितीही दया आली तरी सारेच हतबल होते. एक तास भर आमचा विचारविनिमय चालला असेल. शेवटी तिथल्या बांधकामाचा जमादार त्याच्या बाईक वरून मला IB (Inspection Bungalow) ला सोडायला तयार झाला. पाउस थांबायचे चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे माझा डोंग ला जायचा बेत जवळ जवळ संपुष्टात आल्यागतच झाला होता. म्हणूनच नाईलाजाने मी बाईकवर बसायला तयार झाले. माझे सामान सांभाळून मी भिजतच बाईकवर बसले. माझ्या प्रवासाची मोहीम आटोपती घेउन सर्वार्थाने माझा उलटा परतीचा प्रवास सुरु झाला.

चार किलोमीटर चे अंतर कापताना नको जीव झाला. अंग कुडकुडत होते, थंडीने दात कडकड वाजत होते, ओल्या मोजाच्या आत पावले बधीर झाली होती. IB ला पोहोचेपर्यंत कडाक्याच्या थंडीपावसात साध्या कपड्यानिशी बाईकवर बसून माझे अंग थिजून कसे गेले नाही, हे मला माहित नाही. पण माझी अवस्था बघून IB च्या केअर टेकर ने मला सर्वात आधी चुलीपाशी नेउन बसवले.

IMG_20190305_212117_0.jpg
काहीच वेळात तिथे रहाणारे इतर पाहुणे सुद्धा माझे ध्यान पहाण्यासाठी किचन मध्ये जमा झाले. एकीकडे शेकोटीच्या शेजारी ओल्या अंगाला सुकवत, दुसरीकडे आमच्या गप्पागोष्टी तासभर तरी रंगल्या होत्या. गप्पांचा रोख असा की, हातात फक्त दीड दिवस असताना डोंग ला पोहोचण्यासाठी मी काय काय दिव्य केले? माझ्या गोष्टीच्या असा शेवट ऐकून तिथे जमलेल्या प्रत्येकालाच थोडीशी हुरहूर वाटत होती.

गोष्ट फक्त माझी नव्हती. आयुष्याच्या प्रवासात आपण सारेच एखाद्या उद्दिष्टापायी जवळचे सारे पणाला लावून प्रयत्न करतो. हातातला वेळ निसटून गेला आणि घट्ट धरून ठेवलेल्या मुठीतून साध्यही सुटून गेले अशी वेळ येते तेव्हा पुढच्या वाटचालीत तोंडी लावायला रिकाम्याच मुठीतले अनुभव तेवढे जवळ राहिले असतात.

नशिबाने IB मध्ये एक शेवटची रूम रिकामी होती. गप्पा आटपून तिथून जी उठले ती मऊ मऊ गादीत आणि गरम गरम पांघरुणात अंगाची घुटमळी करून घुसले. ज्या स्वप्नासाठी आटापिटा करत इथवर आले ते मात्र बाहेरच्या पावसात भिजत राहिले.

लोहित आणि बर्ह्म्पुत्रेची उपनदी या दोन नद्यांच्या संगमावर वसले असूनही डोंग पाण्याची तहान भागू शकले नाही, तसे लोकांच्या वस्तीने डोंग च्या पठाराकडे पाठ फिरवली. बेवारशी वाढलेले गवत आणि खुरटी झुडपं यांना डोक्यावर नाचवत प्रतिदिना प्रमाणे आजही डोंग भारत देशातील सूर्याच्या स्वागताला तयार होतेच. पण वातावरण असे चिंब ओले होते की त्या स्वागताचा स्वीकार सूर्याला करताच आला नाही. अगदी निश्चित गृहीत धरलेली घडी अचानक फिरून जाते आणि घटनेला वेगळीच कलाटणी मिळते, त्याच रहस्याची उकल म्हणजे प्रारब्ध की काय?

IMG_20190306_075140.jpg
रात्री मेल्यासारखी झोप लागली. सकाळी उठले, खिडकीचा पडदा सरकवला तर बाहेर इतकं सुंदर दृश्य दिसत होत. मी थोडीशी खिडकी उघडली काय तर एक मांजर टूपकन उडी मारून खोलीत शिरली आणि उबेला माझ्या पांघरुणात घुसू लागली. तिला माझ्या जवळची सारी बिस्कीटे मी खायला घातली तरी काल माझ्या जावयाने मला दिलेल्या दोन गुड डे च्या पुड्यांवर तिची बारीक नजर होती.
IMG_20190306_074310.jpg

तिला कसं सांगू की माझी स्वत:ची भूक भागवायला सुद्धा तो पुडा उघडून त्यातली बिस्किटे खाऊन टाकायला मी तयार झाले नसते. माझ्या खूप तरल अशा ट्रीपच्या शेवटच्या टप्यावरची ती एकच निशाणी माझ्याजवळ होती. ट्रीप संपत आली आहे हि जाणीव झाल्यावर मला अजून एखाद दुसरा दिवस इथेच थांबावे अशी तीव्र ओढ वाटू लागली. एक डोंगचा नाद सोडला तरी इथे पहाण्यासारखे खूप काही आहे.

१९६२ च्या लढाईत सिख, कुमओनी, गुरखा आणि डोंगरा रेजिमेंट ने प्राणाची शर्थ करून सलग बावीस दिवस जिथे लढा दिला त्या नामती हिल्सच्या भूमीवरचे वॉर मेमोरिअल पहायचे. कालपासून हैराण केलय त्या थंडीपावसाच्या नाकावर टिच्चून तिलामला जाऊन हॉट स्प्रिंगज मध्ये डुंबायचे. नाहीतर नितांत सुंदर लोहित नदीच्या काठी एकांतात एखाद्या दगडावर बसून नुसतेच मनन चिंतन करायचे.

पण पत्रात आधी म्हटलय ना, तसा काल रात्रीच माझा परतीचा प्रवास सुरुही झाला होता. जवळपास सात वाजता सामान खांद्यावर टाकून मी निघतच होते की IB च्या केअर टेकर ने हाक देउन मला किचन मध्ये बोलावले आणि आग्रहाने मला पोटभर गरम गरम न्याहारी खाऊ घातली.
IB पासून पायऱ्या उतरत उतरत मी जिथे पोहचले, जीप तिथूनच निघणार होती. परतीसाठी सीट मिळायला मुळीच प्रोब्लेम आला नाही. साडे आठ झाले तरी जीपच्या सीट्स भरेनात आणि जीप निघेना तसा माझा जीव वर खाली होऊ लागला. त्याचे कारण असे की आज मला तेजू मध्ये मुक्काम करून चालणार नव्हते, तर पुढे न्यू तिनसुकिया ला पोहोचून, पुढे गोहातीला जायची काय व्यवस्था करता येईल ते ही शोधायचे होते. आणि मी तेजू ला पाचच्या आधी पोहोचले नाही तर पुन्हा एकदा त्या टप्यावर तशीच अडकून पडणार जशी इथे येताना अडकले होते.

पण प्रवास नेहमीच आपल्या तंत्राने होत नाही. आठ नाही, साडे आठ नाही, नऊ च्या दरम्यान जीप एकदाची निघाली आणि माझ्या लक्षात आले की त्या मांजरी पासून लपवायला मी गुड डे चे पुडे जे गादीखाली लपवून ठेवले होते ते तिथेच राहिले. नाईलाजाने मी जीप उलटी वळवायला सांगितली. वालोंग चे IB एका टेकडीच्या वरती आहे, मी पळत पळतच पायऱ्या चढल्या. पाच मिनिटात खोलीतून अनमोल ठेवा घेउन धापा टाकत मी परत आले.
IMG_20190306_074806.jpg
आता आणखी काही अडचण उद्भवू नये एवढा विचार करतच होते तर ड्रायव्हरच्या लक्षात आले की जीप च्या डोक्यावर बांधून ठेवलेले प्रवाशांचे सारे सामान भिजत आहे. कारण त्यावर टाकलेले प्लास्टिक कधी उडून गेले कळलेच नाही. आमची जीप पुन्हा एकदा उलटी वळली. या प्रकारात सकाळचे दहा वाजून गेले तरी आम्ही वालोंग पासून धड दहा किलोमीटर सुद्धा आलो नव्हतो.

पुढे पन्नास किलोमीटर सरले असतील, वातोंग नुकतेच पार केले होते आणि ड्रायव्हर ने पुन्हा एकदा ब्रेक लावून गाडी उभी केली. तिथे नुकतीच भयंकर दरड कोसळली असावी, कारण रस्त्यावर सर्वत्र मोठमोठ्या आकाराच्या शिळा पडल्या होत्या. गाडीत चार पुरुष आणि तीन बायका आणि दोन मुले होती. सारे गाडीतून उतरलो. पुरुषांनी शक्ती लावून झाली, बायकांनी अक्कल लढवून झाली. पण तो अडथळा हलवणे किंवा पार करणे दोन्ही अशक्य होते. फोनला नेटवर्क सुद्धा नव्हते. तो रस्ता असाही होता की मदतीला बोलवावे तरी कोणाला? अशा धुवाधार पावसात कोण कशाला रस्त्यावर उतरेल? आज तेजू हून निघालेली जीप एवढे एकच वहान इथे संध्याकाळ होईस्तोवर नक्की पोहोचेल, या पलीकडे कुणाचाच भरवसा नव्हता. हे लक्षात आले तसे आजच्या माझ्या पुढच्या प्रवासाबद्दलच्या साऱ्या अपेक्षातून मी मुक्त झाले. तसे करण्यावाचून दुसरे काहीच माझ्या हातात नव्हते.

VID_20190306_122053.jpg
भल्यामोठ्या शिळा जशा सरकवता येईनात तसे एकेकाने त्यांना तोडायचे काम हाती घेतले. पुरुषांची शक्ती पणाला लागली. समोरून एक बाईक आली. आणखी चार हात कामाला लागले. कितीतरी वेळ अशी दगडफोड चालली होती. सहा जणांच्या टीम ने प्रचंड मेहेनत करून अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले. रस्ता मोकळा झाला. आम्ही पुढच्या वाटेला लागलो. डोंग ला येतानाच्या प्रवासात इतका दंगा चालू होता की खिडकी बाहेरचे सौंदर्य बघायला विशेष संधीच मिळाली नव्हती. आता मात्र दंगा फक्त मनात चालू होता. खिडकीला नाक लावून उलटे धावणारे दृश्य मी गपचूप पहात राहिले.

200 किलोमीटर पैकी १७५ किलोमीटर चा प्रवास तर डोंगराच्या पोटातूनच करायचा. बर्फाच्छादित डोंगर मागे टाकून आपण हिरव्या डोंगरराईत शिरतो. पण प्रवासाच्या प्रत्येक टप्यावर लोहित नदी रत्याच्या बाजूबाजूने किंवा रस्त्यावरील ब्रिजच्या खालून वहात आपल्याला एकसारखी सोबत करते. रस्ता मात्र मुळीच एकसारखा नाही. कुठे काळाशार गुळगुळीत रस्ता, दरडी कोसळली तिथे तिथे दगड मातीने खडबडीत केलेला रस्ता, अधेमधे तर चिखलात दबून गेलेला कच्चा रस्ता ... माझा परतीचा रस्ता वळणावळणावर तऱ्हा बदलत होता. घरी परतायच्या विषयावरच्या तऱ्हेतऱ्हेच्या विचारांमुळे माझ्या मनात कोलाहल चालू होता. परवा रात्री नऊचे व्हिमान पकडायला गोहाटी स्टेशन वरून डायरेक्ट गोहाटी एअरपोर्ट कडे निघावे लागणार की काय? पण जिथे बस आणि ट्रेन च्या वेळा किंवा रुट्स माहीतच नाहीत तिथे धड त्याचेही उत्तर मिळेना.

दुपारचे दोन वाजून गेले होता. अंगमेहेनत झाल्यामुळे पुरुषांना खूप भूक लागली असणार. शिवाय जीप मध्ये दोन लहान मुले ही होती. आता जेवायला कमीजास्त कितीही वेळ थांबलो तरी मला फरक पडणार नव्हता कारण माझ्या प्रवासाचे भवितव्य आता जवळ जवळ स्पष्ट झाल्यासारखे होते. माझ्या शेजारी बसून प्रवास करणारया बाईने मला ते बोलूनही दाखवले, “आज शाम छे बजे की लास्ट बस भी आप को नही मिल सकती|”

प्रत्येक अनिश्चीत प्रवास हा अकल्पिताच्या भीतीपोटी करण्या पेक्षा त्याच्यावरच्या विश्वासापोटी करावा. एकदा बळेच का होईना पण आपल्या मनाला तसे वळण लावता आले की वारंवार एका अजब अनुभवाची प्रचीती येते. कुठून काय सूत्र हलतात ते माहित नाही पण ध्यानी मनीही नसताना आपल्या समस्येचे उत्तर अचानक असे काही आपल्या समोर येउन उभे रहाते, की मन थक्क होते. ह्यातली अद्भूतता ज्याने अनुभवली आहे त्याला ‘मी माझा प्रवास आखला’ या शब्दातला फोलपणा सर्वात अचूक माहित असेल. अशा सोलो साहसी प्रवासासाठी नाही तर प्रत्यक्ष आयुष्याच्या वाटचाली साठी सुद्धा ही जाणीव कमावली, तरी तेच या प्रवासातची माझी सर्वात मोठी कमाई आहे, असे मला वाटते.

आमच्या ड्रायव्हरने गाडी कुठेच थांबवली नाही. ज्या रस्त्यावर डोंग ला येताना आम्हाला दहा तास लागले होते तोच रस्ता सहा तासात पार करून सहा वाजायच्या आत त्याने मला तेजू च्या बस स्टॅन्डवर नेउन सोडले. साडे सहा वाजता न्यू तिनसुकिया साठी बस निघणार होती. बसमध्ये बसल्यावर जसे माझ्या फोनला नेटवर्क सापडले तसा लग्गेच मी घरी फोन जोडला.

Many happy returns of the day! May your days are brightened with smiles and your life is lit up with love. आजचा हा खास दिवस उजाडताना डोंगच्या पठारावर सुर्याच्या थेट समोर उभे राहून मला हेच आवाहन करायचे होते, म्हणून सारी धडपड चालली होती. पण वेळ अशी आली की एक फोन जोडून त्या शुभेच्छा व्यक्त करायलाही सारा दिवस वाट पहावी लागली.

NH13 वरून NH15 कडे जाताना बसने लोहित नदीला पार केले तेव्हा मी जागी होते. मी तिला शेवटचे गुडबायही केले. गेला माहिनाभर घरापासून दूर दूर नेणारी वळणावळणांची मी चालते आहे. ती वाट आता मागे पडली. डोळ्यासमोर हमरस्ता आहे. मला माझ्या घराला घेउन चालला आहे. पण हा मार्ग मी निवडलेलाच नाही, तो माझ्या नशिबाचा अनिवार्य भाग फक्त आहे, असे का वाटते आहे? ... कळत नकळत उलट सुलट तुटक जड जड विचार डोक्यात येतच राहिले आणि मधेच थकून कधी झोप लागली मला कळलेच नाही. रात्री नऊ वाजता न्यू तिनसुखिया ला स्टेशन ला पोहीचले. रात्री बारा नंतर इथून ब्रम्हपुत्रा मेल निघणार, ती पकडली की उद्या दुपारी बारा वाजता गोहाटीला पोहोचता येईल.

आता हातात दोन तास आहेत आणि एक नंबर करायची सोय शोधायची एवढे एकच अर्जंट काम आहे. विचार करायची ताकद संपली असावी कारण टोईलेट शोधता शोधता जशी माझी नजर स्टेशनवरच्या एका बायो टोयलेट च्या डिस्प्लेकडे गेली तशी मी त्याचा पाठी जाऊन दरवाजा कुठे दिसतोय का ते शोधून आले. इथे भर स्टेशनवर कसे काय कोणी काचेचे टोयलेट उभे करून ठेवेल, हे इतके सुद्धा मला न कळावे?

IMG_20190306_220332.jpg

मला वाटलं, माझे डोके विचारांच्या वजनाने काम करायचे थांबले असेल. म्हणून आधी तेवढी एक अर्जंट सोय साधल्यावर शांत बसून डोक्यातला एकेक विचार पत्रात उतरवायला सुरवात केली.
आजचा दिवस खूप स्पेशल आहे, तसे आजचे पत्र स्पेशल आहे. कालचे पत्र एका सासू ने लिहिले होते आजचे पत्र एका सासूला लिहिले आहे!

सुप्रिया.

७ मार्च | दिवस ३०
प्रिय राज,

सारी वळणं संपून गेली. आसाम च्या खुल्या मैदानातून ताशी 50 किलोमीटरच्या भरधाव वेगाने मी आपल्या घराच्या दिशेने प्रवास करत आहे. हिरव्या शेतांमध्ये चमकणारे चंदेरी जलाशय डोळ्याला सुंदर दिसतायत पण तिथे आता नजर जात नाही. उद्या संध्याकाळी या वेळेस मी एअरपोर्ट ला जायला निघाले असेन. मग तर काय, या धावणाऱ्या ट्रेन च्या दहा पटीच्या वेगाने उडत मी आपल्या घरी येईन. त्याहून जास्त वेगाने मनात विचारांची खळबळ चालू आहे.

या प्रवासात मला कोणी कधीच रोखलं नाही; टोकलं नाही. मी सुद्धा नाही. क्षण क्षण - कधी सुखावह – कधी भयावह होता. पण जे क्षणभंगुर होते, त्याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवणार? म्हणून तसेच चालवून घेतले. मनाने असा पवित्र घेतला असेल तर केवढे समाधान अनुभवता येते; ते अनुभवले. आपल्या सर्वात जवळच्या माणसांच्या सानिध्यातच आशा-अपेक्षा-आकांक्षा यांचे नाजूक धागे मनाभोवती वीण घालायला सुरवात करतात. आणि सुखदु:खाची झालर असलेले आयुष्याचे जाळे कधी तयार होते हे कळतच नाही. नकळतच आपण त्यात पूर्णपणे अडकून गेलेलो असतो. त्याचेच नाव संसार ठेवले असावे.

काल आईला फोन केला तेव्हा आईने सांगितले की, मी संसारात पडले; म्हणून मला परत घरी येणे भाग आहे. संसार हा जन्माबरोबर लागू होत नसतो. तो जाणतेपणी घेतलेला निर्णय असतो. जबाबदारी असते. ज्या आडनावाशी आजन्म बांधली गेले त्याच आपल्या संसाराचा धागा मला परत घरी ओढून नेत आहे.

पण या बंधना पलीकडेही तुझे अस्तित्व आहे. किंवा आपल्या नात्याचा धागा रेशमाचा असावा. नाहीतर प्रत्येक वळणावर तुझी इतकी तरल आठवण आली नसती. मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तीव्र झाली नसती. गंगटोक, गोहाटी, माजोली, काझीरंगा, माफ्लोंग, नोव्हेत, शिलॉंग पडेंग, लोन्ग्वा, डोंग... मला विचारशील तर गेला महिनाभर मी ह्या गावांचे निव्वळ स्वप्न पहात भटकले. यापैकी एकेका गावाला तुझ्याबरोबर येउन पुन्हा भेटायचं, ही स्वप्नपूर्ती आहे. “मै अगले साल राज के साथ वापस आउंगी|” असं मी इथे एकेकाला प्रोमीस करून आले आहे. कशी गमंत आहे, स्वप्न जरी मला पडलं असलं तरी त्याला साकार करायचं म्हणजे तुझी साथ लागतेच.

तरीही तुला आजवर एकही पत्र लिहिले नाही. कदाचित मोबाईलच्या अल्फान्युमरिक की-पॅड वर एक बोट फिरवत हृदयाची भाषा व्यक्त करता येणार नाही. किंवा तुझ्याशी जे हितगुज करायचे ते दुसऱ्या कोणी वाचून चालणार नाही हे कारण असेल. पण आजचे पत्र तुला लिहावे असे वाटले. दिवस नुकता उजाडतोय तेव्हढयात हे काय, लिहायलाही घेतले आहे. मग झोप येत नाहीये तर इथे ट्रेन मध्ये दुसरे करू तरी काय? आणि नाहीतरी आजचा दिवस संपेपर्यंत थांबून पत्रासाठी काही खास तपशील सापडतील असे वाटत नाही. मन उंडारत असलं तरच आजूबाजूचे तपशील गोळा करायचा नाद लागतो. नॉर्थ इस्ट च्या प्रवासातून माझं मनही आता निवृत्त झालचं, मला अस वाटलं तो माझा भ्रम होता. कारण आताच एक घटना अशी घडली की ...

पहाटेचे साडे पाच होउन गेले असतील. ट्रेन ने कुठचे स्टेशन सोडले म्हणून वाकून पाहिले तर धक्काच बसला. न्यू तिनसुकिया हून गोहाटी ला जाता जाता वाकडी वाट करून माझी ट्रेन दिमापुरला काय म्हणून आली? इथे इन्ट्रास्टेट ट्रॅव्हल करताना मधेच आसाम ला भोजा करून जावे लागायचे तेव्हाही मला असेच आश्चर्य वाटायचे. दिमापुर स्टेशन वर ट्रेन थांबली तसे पाय मोकळे करायला माझे मन खाली उतरले. ट्रेन निघाली तरी दिसले नाही म्हणजे बहुदा त्याची गाडी चुकली असावी. आता या मनाला शोधून परत आणायचे हे मोठ्या जिकरीचे काम आहे. त्याच्या कलाकलाने घेत, दिमापुर पासून पुढच्या ट्रीपमधल्या एकेक आठवणी गोळा करत करत त्याला वाटेवर आणावे लागेल. त्याच आठवणीचा गुडबाय सिरीज मधला शेवटचा व्हिडीओ या पत्राबरोबर जोडायचा.

तुला गुडबाय करून घरातून निघत होते खालच्या रस्त्यापर्यंत मला निरोप द्यायला प्रशांतने तुला बळेबळेच ओढून आणलं. माझा जो प्रवास तुला मान्य नाही त्याच्या वाटेवर मला तेवढीही सोबत द्यायला तुझ्या किती जीवावर आलं होतं. आज या प्रवासाचा शेवटचा निरोप घेउन, तुझ्याकडे परत येताना, खरतर माझ्याही जीवावरच आलं आहे. पण मला कोणीही बळेबळे ओढून ह्या वाटेवर परत आणलं नाही. सारे घडत गेले. मी मार्गी लागत गेले. कसे ते या पत्रमालिकेत लिहिले आहेच, जे वगळले आहे त्याचे ओझेही मला बाळगायचे नाही.

आजचा सूर्य उगवला. आता एक दिवस राहला आणि एक पत्र राहिले. माझ्या स्वप्नातून आपल्या सत्यात परत यायच्या आधी उद्याच्या पत्रात उरले सुरले सारे उपडी करून, रित्या मनाने घरी येईन.

फक्त तुझीच.

अरुणाचल प्रदेश आणि फायनल गुडबाय > https://youtu.be/bLa1Q_2Hujw

८ मार्च | दिवस ३०

पपा,

काल दुपारी जेवण आटपून गोहाटीचे फ्रॅन्सी मार्केट फिरून आले. खाण्यापिण्याची चंगळ केली. भरपूर खरेदी केली. रात्री दमून गादीवर अंग टाकले आणि राज चा फोन आला. मोबाईलची बॅटरी थोडीशी चार्ज झाली होता म्हणून वाजला. तेवढे माझे नशीब चांगले होते असे म्हणायला हवे. कारण की, “संध्याकाळी विमान पकडायला वेळेवर यायला हवे म्हणून पहाटे लवकर पिकॉक आयलंड फिरायला निघणार”, हा माझा बेत राजला फोनवर सांगितला तसा त्याने मला धक्काच दिला. माझे विमान 8.35 pm ला नाही तर 8.35 am ला होते आणि त्याची मला मुळीच कल्पना नव्हती.

माझ्या प्रवासातले बारा तास जसे एका क्षणात गळून पडले तसे मला खूप जास्त अस्वस्थ व्हायला झाले. आता इथे मुंबई एअरपोर्ट वर बसून शेवटचे पत्र लिहित आहे. एकदा घरी परतले की पत्र लिहायला अवधी मिळणार नाही हे आहेच पण जणू अजून एखादा तास ट्रीप ओढून ताणून धरायचा प्रयत्न करते आहे कारण असा प्रवासही पुन्हा होणे नाही, याची जाणीव आहे. अगदी हेच वाक्य सर्वात पहिल्या पत्रात लिहिले होते. पण जिने ते लिहिले होते तिच्यात इतका बदल झालाय की, वाक्याचा संदर्भही पहिल्यासारखा राहिला नाही. तेव्हा तसे लिहिले होते कारण माझ्या आयुष्याचा शेवट करायचा या निश्चयाने निघाले होते आणि आता त्या मार्गाकडे पुन्हा नजरही जाणार नाही याबद्दल शंकाच नाही.

52312475_10156869937337778_2368722949629804544_n_0.jpg

ज्या आयुष्याने हैराण केले होते त्यातून सुटका करायची तर ते संपवणे हा एकच मार्ग आहे, इतपतच अक्कल होती. शिवाय माझे मरण माझ्याच हातात आहे असा भ्रम होता. म्हणूनच जगणे असह्य झाले, असे झाले तेव्हा मरणाच्या दिशेने प्रवास करून पाहिला. लोक आपली निंदा करतील असे वाटले की आपसुख आपण त्याचे कारण लपवायचे मार्ग शोधायला लागतो. तेच साधावे म्हणून केवढा खटाटोप केला, किती दक्षता घेतली. सरतेशेवटी त्या मरणाच्याच वाटेवर आयुष्य जगायचे धडे शिकून परत आले. जे शिकले ते मुळात माहितच नव्हते असं नाही, अनुभवले नव्हते असंही नाही, पण माझ्या विचारांच्या मातीचा कसच असा की कुठचेही बी रुजले तरी उफाडयाने वाढते. तशीच एक वेल चढत गेली जिने आयुष्याच्या बहरदार फांद्यानाही जखडून टाकले होते.

या प्रवासात सर्वात आधी काय लक्षात आले असेल तर माझा जन्म आणि माझे मरण हे दोन्ही माझ्या हातात नाहीच, कसे जगावे आणि कसे मरावे ही कला शिकणे हे मात्र आहे.

52011227_10156863161062778_5543180076067061760_n.jpg

आपल्याला वाटत दु:ख हाच फक्त जाच आहे. पण सुखाचा आनंद घेणे म्हणजे श्वापदाला रक्ताची चव लागण्यासारखे आहे. तेच मिळवण्यासाठी मनाची जी घालमेल होते तो काही कमी जाच नाही. या प्रवासात बऱ्यावाईट अनुभवाकडे तिर्हाेईतासारखे बघायला शिकले त्याने साऱ्याच जाचातून आपसुख सुटका होते हे चांगलेच लक्षात आले. किनाऱ्यावर स्वस्थ बसून एकेक भरती आणि ओहटी ला फक्त पहात रहायचे, समजायला कठीण वाटते पण परिपूर्ण आयुष्य जगायची ट्रिक इतकी साधी आहे. हाच या प्रवासात घेतलेला हा सर्वात मोठा धडा आहे.

51863798_10156849898472778_6798416570772094976_n.jpg

आणि तिसरे आणि शेवटचे उत्तर ह्या प्रश्नाचे शोधले की, जे माझे माझे वाटत होते ते माझे झालेच कसे? मी धडपड करून मिळवले? नशिबाने लाभले का? की कोणी परोपकार करून माझ्या पदरात घातले. पण आता ते कुठेच दिसत नाही ते, गेले कुठे? ज्याचा उगम माहित नाही असे कुठूनसे येउन एक झलक दाखवून गायब झाले. माझे माझे करत ज्या प्रवाहात डुंबत राहिले होते तो निव्वळ क्षणभंगुर कणांनी व्यापुन टाकला होता. दोन्ही हात कधीचे रिकामेच आहेत. माझा 'मी पणा' गळून गेला असे म्हणणार नाही, नाहीतर राजबरोबर भांडायला लागले की मला अचूक पकडाल. पण त्याच्या क्षीणतेची प्रखर जाणीव झाली. हे ही नसावे थोडके!

52703761_10156881847422778_5563955807835389952_n.jpg

या ना त्या प्रकारे, आयुष्याची थोडीफार समीकरणे मी आधीच सोडवली होती. या प्रवासात त्यांची उजळणीही झाली.
आज जेमतेम चार किलो चे सामान पाठीवर घेउन मी महिनाभर हिंडते आहे. माझे कुठे काय अडले? त्या मानाने चार भिंतींच्या ओनरशिपच्या घरात आयुष्यातली आव्हाने कमीत कमी असायला हवीत. तरीही चारचार पैशांच्या वस्तूंनी आपण त्याचा कोपरा न कोपरा भरून टाकतो. मला कसली गरज आहे, यापेक्षा माझ्याकडे काय आहे याकडे जास्त लक्ष द्यायची आपल्याला सवय असते. मी तर हनिमून ला सुद्धा दोन मोठ्या सुटकेसेस घेउन गेले होते. पण ती सवय नंतर कधी जळून खाक झाली. आता प्रवासात कुठचे आणि किती ओझे बाळगावे याचे मर्म मला चांगलेच कळले आहे.

53018072_10156906440007778_5105141764616880128_n.jpg

जेव्हा कोणी दुसऱ्याला ताप देतच असेल त्याचे फक्त एकच कारण की तो स्वत: जळत असतो, ह्याची जाणीव तर माझ्या स्वत:च्या उदाहरणावरून झाली होती. या प्रवासातील बऱ्यावाईट प्रसंगात ती पडताळता आली आणि दृढ झाली.

56706191_10156992897517778_1773867994858913792_n_1.jpg

कधीकधी जवळची शक्ती संपून जायची वेळ आली तरी दुसऱ्यासाठी झिजलो त्याचे चीज झालेले दिसत नाही. तेव्हा चांगुलपणावरचा विश्वास उडतो. मन खिन्न होते. हे माझ्याच वाट्याला का आले ह्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. आपापल्या आयुष्याच्या मागण्या पुऱ्या करता करता बेजार झालेले अनेक जीव मला या प्रवासात भेटले. स्वत:च्या कठीण परिस्थितीतही त्यांनी काय म्हणून मला आदर दिला? प्रेम दिले? स्वत:कडे अल्प असल्यातून थोडे काढून माझ्या झोळीत टाकले त्याच्यापुढे काय बिशाद आहे की मी माझ्या चांगुलपणाचा टिमका मिरवेन? अनादि कालापासून चराचराला फुटलेला चांगुलपणाचा पान्हा अखंड वहातोच आहे. त्यातच माझे संपून गेले होते ते भरभरून घेतले तेव्हा मी परत निघाले.

IMG_20190305_180956_0.jpg

माझ्या जन्माच्या वेळेस तुम्ही कोणती प्रार्थना म्हटली असेल? मी मोठी होता होता काय आशीर्वाद दिला असेल? मी जाणती झाल्यावर कुठचा सल्ला दिला असेल? ज्याची तडजोड करायचीच नाही असं कुठचं स्वप्न एखादे वडिल आपल्या मुलीसाठी पहातील? पपा, या प्रवासाआधीचा माझा प्रवास आकाशातून पहात असताना तुम्हाला खूप दु:ख झाले असेल. पण एकदाच मला माफ करा. या प्रवासाच्या निमित्ताने जे सार कळले त्याचा सराव मी आयुष्याच्या प्रवासात चालूच ठेवेन. मी वाट पुन्हा चुकणार नाही ह्यावर तुम्हीही आकाशातून माझ्यावर नजर ठेवालच. पण तुमचे स्वप्न साकार झाले आहे. पपा, मी खरच खूप शहाणी झाले आहे.

चला. आता इथून थेट घरी जायचे. मला कोणीच बळेबळे ओढून ह्या वाटेवर परत आणलं नाही. आपोआप सारे घडत गेले. मी मार्गी लागत गेले. कसे ते या पत्रमालिकेत लिहिले आहेच. जे थोडेसे साऱ्या पत्रातून लपवून ठेवले होते, आज तेही ओझे उतरवून मोकळी झाले. पत्रावर नाव जरी तुमचे असले तरी यंदा प्रथमच वास्तविक हितगूज थेट जगाशी झाली. ती तशी करायची इच्छा मी डायरीला लिहिलेल्या पहिल्या पत्रातच व्यक्त केली होती. पण तेच तर ... ते पत्र जिने लिहिले ती मी नाहीच. प्रवासाला निघालेली आणि प्रवासाहून परतणारी मी यात जमीन अस्मानाचे अंतर आहे अस वाटतंय. फिरून तिथेच परत आले असे वरकरणी दिसत असेलही पण प्रत्यक्षात आयुष्याला एक पूर्ण प्रदक्षिणा घालून मी बाहेरच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चला आता डोळे पुसून तुमच्या लाडक्या मुलीचे अभिनंदन करा आणि ज्यांना ज्यांना त्या कक्षेतून बाहेर पडण्याची गरज असेल त्यांना माझ्यासारखी अशीच एक संधी मिळू दे, अशा शुभेच्छा द्या.

तुमची सुप्रिया.

No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...