Saturday, July 1, 2023

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया

 हो ची मिन् शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मला फार काळापासून बघावे अशी इच्छा असलेल्या कंबोडिया या देशाच्या दिशेने विमानाने भरारी घेतली. हो ची मिन् शहर ते नॉम् पेन् (Phnom Penh) हा जेमतेम २०४ किलोमीटरचा प्रवास चाळीस-पंचेचाळीस मिनिटात संपवून आमचे विमान कंबोडियाच्या राजधानीवर येऊन ठेपले...अग्नेय अशिया भागांतील कंबोडिया आणि व्हिएतनाम हे मलेशिया आणि बालीपेक्षा बरेच स्वस्त आहेत. सियाम रीप पर्यटनाच्या दृष्टीने सुधारलेले आहे. पण अंगकोरचा आवाका इतका मोठा आहे की मार्गदर्शकाशिवाय जाणे योग्य नाही... गडबडीत बरेच काही बघायचे राहून जाईल.
    आंतरजालावर अनेक चांगल्या पॅकेज टूर कंपन्या आहेत. तारांकित पासून साध्या (पण स्वच्छ आणि निटनेटक्या) हॉटेल, सहल आणि मार्गदर्शकासकट ३-५-७ दिवसांचे बुकींग करू शकता. फक्त विमानाचे तिकीट आपण काढून इतर सर्व सहल (मार्गदर्शकासह) पॅकेजमध्ये घेणे जास्त सोईचे होईल.


......
विमान उतरताना दिसलेले नॉम् पेन् चे विहंगम दृश्य

भारतीय संस्कृतीचा प्रबळ ठसा असलेल्या या देशाबद्दल मला खूपच कुतूहल आहे. हा देश केवळ तेथील संस्कृती आणि शिल्प-बांधकाम कलेच्या दर्शनानेही भारावून सोडतो. पण त्यांच्या मागील इतिहासाची पार्श्वभूमी माहीत असेल तर तो आनंद व्दिगुणित होतो. म्हणून या देशाचा इतिहास थोडक्यात तरी पाहून मगच त्याची सफर सुरू करणे योग्य होईल.

कंबोडियाचा संक्षिप्त इतिहास

कंबोडियात मानववस्ती केव्हापासून आहे याचे सबळ शास्त्रीय पुरावे तसे अभावानेच मिळाले आहेत. तेथील गुहांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे वय इ स पूर्व ४,००० वर्षांचे असल्याचे आणि तेथे इ स च्या पहिल्या शतकापूर्वीपासून भातशेती होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. मानववस्ती बहुदा याच्याही फार पूर्वीपासून असावी. इ स च्या पहिल्या शतकापासून चिनी व्यापाऱ्यांच्या अहवालांत त्या भागातल्या राज्यांबद्दल आलेल्या उल्लेखांवरून आणि प्राचीन स्थानिक पुराव्यांवरून तेथील संस्कृती, भाषा, लिपी, कला, वास्तू-शिल्पकला, धर्म आणि वर्णव्यवस्था असलेली सामाजिक प्रणाली मोठ्या प्रमाणात भारतीय प्रभावाखाली होती.

कंबोडियाच्या इतिहासातील पर्वे साधारणपणे खालीलप्रमाणे आहेत

१. फुनानच्या ख्मेर राज्याचा कालखंड :

इ स च्या पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत त्या वेळेच्या कंबोडियामध्ये (आताच्या दक्षिण व्हिएतनामच्या मेकाँग खोऱ्यामध्ये असलेल्या) चेनला / फुनान आणि (आताच्या दक्षिण-मध्य व्हिएतनाममध्ये असलेल्या) चंपा राज्यांची माहिती व्हिएतनामच्या सफरीत आली आहेच. या किनारपट्टीवरच्या राज्यांबरोबर अंतर्गत भूमीवरही इतर काही विस्कळीत राज्येही होती. ह्या सर्व भागांतील लोकांना ख्मेर (Khmer) असे संबोधले जाते. त्यांच्या भाषेत अजूनही संस्कृतचा प्रभाव जाणवण्याएवढा आहे. तेथे असलेल्या बंदरांतून होत असलेल्या भारत व चीनमधला व्यापारामुळे हे देश भरभराटीला आले होते. आतापर्यंत सापडलेला ख्मेर भाषेतला सर्वात जुना शिलालेख आणि दगड-वीटेने बांधलेले पहिले हिंदू मंदिर चेनला राज्यांच्या कारकीर्दीतल्या ६ / ७ व्या शतकातले आहे. चेनला राज्य मोडकळीला आल्यानंतर लहान राजे अथवा सरदारांच्या आधिपत्याखाली असलेल्या भागांमध्ये सतत चालू असलेल्या लढाया-चढाओढींमध्ये दोनएक शतके गेली. या अंदाधुंदीच्या काळात जावा-सुमात्रा (आताचे इंडोनेशिया) मधल्या राजांनी कंबोडियाच्या बर्‍याच भूभागांवर आधिपत्य स्थापन केले होते.

या काळातल्या काही राजांची कौडिण्य, श्रीइंद्रवर्मन, जयवर्मन (पहिला), नोरोदोम (नरोत्तम), रुद्रवर्मन, सार्वभौम, भाववर्मन, महेंद्रवर्मन अशी संस्कृतप्रचुर नावे होती. एक खास गोष्ट म्हणजे इ स ६८१ ते ७१३ या कालखंडात चेनला राज्यावर जयवेदी नावाच्या राणीने राज्य केले.

२. अंगकोर कालखंड :

जावा-सुमात्रा राज्यांत बंदिवासात असणारा एक ख्मेर राजपुत्र नवव्या शतकाच्या सुरुवातीला कंबोडियात परतला आणि त्याने ख्मेर प्रदेश एकत्रित करून त्यावर आपले आधिपत्य स्थापन करायला सुरुवात केली. इ स ८०२ मध्ये त्याने राज्याभिषेक करवून घेऊन राजा दुसरा जयवर्मन या नावाने स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट असे जाहीर केले. त्याच्या राजधानीचे नाव अंगकोर असे होते. त्या जागेला आता "सियाम रीप" असे नाव आहे... या नावाचा अर्थ "सियाम (थायलंडचे जुने नाव) चा पाडाव" असा आहे. दुसरा जयवर्मन आणि पुढच्या २६ सम्राटांनी १५ व्या शतकापर्यंत "आताचा थायलंड, कंबोडिया, लाओस, ब्रह्मदेशाचा काही भाग, मलेशियाचा काही भाग आणि व्हिएतनामचा दक्षिण भाग" एवढ्या विस्तृत प्रदेशावर राज्य केले आणि सर्व दक्षिणपूर्व आशियावर आपला प्रभाव पाडला...


......
ख्मेर साम्राज्य (तांबड्या रंगात) .................................................... सम्राट दुसरा जयवर्मन
(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

हा कालखंड कंबोडियाचे सुवर्णयुग होते. दुसर्‍या जयवर्मनने शैव परंपरा सुरू करून ख्मेर राजे शिवाचा अंश असल्याचे जाहीर केले आणि देवराजा ही पदवी धारण केली. कंबोडियात या शैव परंपरेचा प्रभाव दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ चालू होता. नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा पगडा वाढत गेला. याच काळात कंबोडियात एक हजारापेक्षा जास्त हिंदू आणि बौद्ध मंदिरे बांधली गेली. यातील बायोन मंदिर (Bayon Temple), अंगकोर थोम (Angkor Thom) आणि अंगकोर वट (Angkor Wat) सारखी अनेक जगप्रसिद्ध आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असलेली मंदिरे आपण पाहणार आहोतच. ह्या मंदिरांना धार्मिक महत्त्व होतेच पण ती सामाजिक सेवा पुरवणारी केंद्रे आणि राजकीय वर्चस्वाची द्योतकही होती. यातले अंगकोर वट हे मंदिर तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर मानाचे स्थान मिळवून आहे. कंबोडिया संबद्धिच्या महत्त्वाच्या लिखाणात त्याचे चित्र हमखास दिसते. या सर्व मंदिरांसंबद्धी अधिक माहिती आपण त्यांना भेट देऊ तेव्हा येईलच.


अंगकोर वट (जालावरून साभार)

.

कंबोडियाचा राष्ट्रध्वज (जालावरून साभार)

शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी या सम्राटांनी अनेक मानवनिर्मित तलाव व कालव्यांचे जाळे बांधले होते. याच शेतीमुळे आलेली समृद्धी सम्राटांना मोठमोठी मंदिरे बांधण्यासाठी आणि युद्धे करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जमवायला उपयोगी पडली. वाहतूक व व्यापारासाठी या सर्व साम्राज्यभर रस्त्यांचे जाळे होते. जरी असे असले तरी शिलालेखांतील उल्लेखांतून या साम्राज्याला अनेक बाह्य आक्रमणे आणि अंतर्गत बंडाळ्यांना तोंड द्यावे लागले असेही दिसते.

या साम्राज्याचा अंत का आणि कसा झाला याबाबत अजूनही नीट माहिती झालेली नाही. मांडलिक असलेली थाई राज्ये प्रबळ झाल्याने आणि त्यांच्याबरोबर वारंवार होणार्‍या युद्धांमध्ये खूप मनुष्यबळ खर्ची पडल्याने हे साम्राज्य मोडकळीला आले असावे. १३-१४ व्या शतकात थेरवद बौद्ध धर्माचा प्रभावही या भागात सुरू झाला होता. त्याच्या प्रत्येकाला माणसाला उत्तम आचार आणि घ्यानधारणेने प्रबोधन (enlightenment) शक्य असते या शिकवणुकीमुळे तेथील सामाजिक उतरंड कोलमडली आणि राजघराणे व सरदार यांचे महत्त्व कमी झाले. सद्या कंबोडियामधले ९६% लोक बौद्ध धर्मीय आहेत.

इ स १४३१ मधले थाई आक्रमण हा या साम्राज्यावर शेवटचा प्रहार ठरला आणि उरलेल्या सर्व उच्चभ्रू घराण्यांनी अंगकोरच्या दक्षिणपूर्वेस आजची राजधानी नॉम् पेन् जवळील लोवेक येथे स्थलांतर केले आणि तेथूनच ख्मेर साम्राज्याच्या उरल्यासुरल्या अवषेशावर राज्य चालू ठेवले.

३. कंबोडियाचे अंधारयुग :

ख्मेर साम्राज्याची शकले होऊन निर्माण झालेल्या अनेक छोट्या राज्यांत सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सतत लढाया होत राहिल्या. आधुनिक थायलंडच्या अयोध्या (Ayutthaya) राजघराण्याने ख्मेर साम्राज्याचा बराच मोठा भाग काबीज करून आपल्या राज्याला जोडला, व्हिएतनामचे साम्राज्य दक्षिणेस पसरून त्याने चंपा राज्ये आणि मेकाँगचे सुपीक खोरे व्यापले, तर पूर्वेला ब्रह्मदेशात स्वतंत्र सत्ता उदयाला आली.

पराजित आणि लुटले गेलेली राजधानी, अंगकोर, चार शतके अंधारात बुडून गेली. मात्र या काळातही उरलेला दक्षिणेकडील (सद्याचा कंबोडिया) प्रदेश त्याच्या व्यापारी महत्त्वामुळे बर्‍यापैकी सधन राहिला. याच काळात तेथे रामायणावर आधारीत रीमकर (Reamker) नावाचा कंबोडियाचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ लिहिला गेला.

४. फ्रेंच वसाहतीचा कालखंड :

थाई व व्हिएतनामी आक्रमकांपासून बचाव व फ्रेंच वसाहतवादाचा रेटा यामुळे १८६३ मध्ये कंबोडियाच्या राजाने फ्रेंच राजसत्तेचे संरक्षित राज्य (protectorate) होणे मान्य केले. कंबोडियाला जरी वसाहत म्हणून जाहीर केले नसले तरी पुढची ९० वर्षे तेथे सर्व बाबतीत फ्रेंचांचा शब्द शेवटचा होता. या काळात फ्रेंचांनी कंबोडियन जनतेच्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मात्र रबर आणि भाताच्या शेतीत केलेल्या सुधारणांमुळे कंबोडिया ती उत्पादने निर्यात करणारा देश बनला.

फ्रेंचांनी केलेले एक उत्तम काम म्हणजे अंगकोर येथील मंदिरांचे पुनरुत्थान सुरू केले आणि तेथील शिलालेखांचे अर्थ उलगडले. त्यामुळे कंबोडियन जनतेला स्वइतिहासाचे ज्ञान होऊन त्यांचा देशाभिमान जागा झाला आणि जगाला एका प्रगल्भ प्राचीन संस्कृतीची ओळख झाली. राजघराणे, बौद्ध धर्म आणि सामाजिक बाबतीत ढवळाढवळ टाळल्याने सर्वसामान्य जनतेत फ्रेंचांविरुद्धचे लोकमत तितकेसे तीव्र नव्हते. १९५३ मध्ये राजा नोरोदोम सिंहनूक (King Norodom Sihanouk) यांनी राजनैतिक कौशल्य वापरून शांततेने देश स्वतंत्र केला आणि तो कम्युनिस्ट प्रभावापासून दूर ठेवला.

५. आधुनिक कालखंड :

इ स १९५५ मध्ये राजा नोरोदोम सिंहनूक यांनी आपले वडील नोरोदोम सुरमरीत (Norodom Suramarit) यांना राजसिंहासनावर बसवून पूर्णकाळ राजकारणात उडी घेतली. १९५५ मध्ये झालेल्या निवडणूकीत सिंहनूक यांच्या पक्षाने लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या. सिंहनूक हे त्यांच्या वडिलांचा इ स १९६० मध्ये मृत्यू होईपर्यंत कंबोडियाचे पंतप्रधान होते, त्यानंतर ते परत सिंहासनावर विराजमान झाले.

इ स १९५० पासून अमेरिकेचे साथीदार असलेल्या सिंहनूक यांनी १९६५ मध्ये अमेरिकेशी संबंध तोडून व्हिएतनाम युद्धात मदत म्हणून उत्तर व्हिएतनामला कंबोडियाच्या भूमीवर लष्करी तळ उभारू दिले. पुढे दक्षिणपूर्व आशियातील युद्धांच्या परिणामाने खिळखिळे झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे अस्थिरता वाढली, सिंहनूक-विरोध वाढीस लागला आणि त्या देशातील भूमीगत कम्युनिस्ट चळवळीने परत डोके वर काढले. आर्थिक आणि सैनिकी मदतीच्या बदल्यात सिंहनूक यांनी अमेरिकेशी परत राजकीय संबद्ध स्थापित केले. त्यांचा उपयोग अमेरिकेने १९६९ मध्ये कंबोडियातील व्हिएतनामी सैनिकी तळांवर बाँबवर्षाव करण्यास केला.

६. ख्मेर गणराज्याचा कालखंड :

इ स १९७० मध्ये राजा सिंहनूक देशाबाहेर असताना कंबोडियाच्या लोकसभेतील व्हिएतनाम-विरोधी पाश्चिमात्य-धार्जिण्या गटाने त्यांना पायउतार केले आणि जनरल लोन नोल यांना ख्मेर गणराज्याचे पंतप्रधान नियुक्त केले. चीनमध्ये शरणागती घेतलेल्या सिंहनूकना त्यांच्या अनुपस्थितीत देहदंड सुनावला गेला. लोन नोल सरकारला अपेक्षित असलेली मदत करण्याऐवजी उलट पुढची तीन वर्षे अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाम सैन्यासह कंबोडियात खोलवर घुसून तेथील उत्तर व्हिएतनामी तळांवर हल्ले केले. याचा बदला म्हणून उत्तर व्हिएतनामने आक्रमण करून लोन नोलच्या सैन्याची उरली सुरली आक्रमणक्षमताही नष्ट केली.

याच काळात चीन व उत्तर व्हिएतनामने सिंहनूक यांना "देशापार शासन" (government in exile) स्थापण्यास प्रवृत्त केले. या शासनात नंतर ख्मेर रूज (रक्त ख्मेर) या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या Communist Party of Kampuchea उर्फ CPK चे प्राबल्य होते.

अमेरिकेची मदत असूनही १९७५ मध्ये सततचे यादवी युद्ध आणि त्यावर कंबोडियाच्या भूमीवरील अमेरिकन बाँबवर्षाव यामुळे ख्मेर गणराज्य खिळखिळे झाले आणि ख्मेर रूजने नॉम् पेन् काबीज केले. त्याच्या तीन आठवड्यांतच उत्तर व्हिएतनामने दक्षिण व्हिएतनामचा पराभव केला. या वेळेपर्यंत काही दशके चाललेल्या युद्धाने कंबोडियाचे नागरी व ग्रामीण भाग बेचिराख झाले होते, हजारो लोकांनी जीव गमावला होता आणि लाखोंच्या संख्येच्या विस्थापितांच्या लोंढ्यांनी उरलेसुरले शहरी भाग भरून गेले होत.

७. कंबोडियन (तथाकथित) लोकशाहीचा कालखंड :

१९७५ ला स्थापन झालेली ख्मेर रूजची (तथाकथित) लोकशाही कारकीर्द १९७९ पर्यंत चालू होती. या गनिमी सेनेचा नेता सालोथ सार (Saloth Sar) हा त्याच्या मूळ नावापेक्षा पोल पॉट (Pol Pot) या टोपण नावानेच जास्त कुप्रसिद्ध आहे. ख्मेर रूजने शहरी, शिक्षित लोकांना आपले मुख्य शत्रू समजून त्यांना ग्रामीण भागात हलवून शेतीच्या कामाला लावले. केवळ युद्धात मदत केली म्हणून अनेक अशिक्षित आणि अननुभवी लोकांना शासनात महत्त्वाच्या जागा दिल्या. विचारस्वातंत्र्य, संघटना आणि धार्मिक व्यवहारांवर कडक बंधने लादली. खास करून विचारवंत, व्यापारी, जुने शासकीय अधिकारी, धार्मिक नेते आणि विरोधाचा संशय असणार्‍या लोकांची कत्तल केली. इतर अनेक लोकांना खास छावण्यांत हलवून त्यांचे अनन्वित हाल केले, उपासमार केली आणि त्यांच्याकडून सक्तमजुरी करवून घेतली. ख्मेर रूजने बाजूच्या देशांच्या भूमीवर आपला जुना हक्क परत घोषित करून त्यांच्यावर हल्ले करणे सुरू केले. चिनी आणि व्हिएतनामी वंशांच्या आणि इतर अल्पसंख्य कंबोडियन नागरिकांवर हल्ले करून त्यांना पळवून लावले अथवा त्यांची हत्या केली. या कांडात पोल पॉट राजवटीने १७ लाख लोकांचा म्हणजे कंबोडियाच्या एक पंचमांश लोकसंख्येचा बळी घेतला. एकीकडे परराष्ट्रांपासून संपूर्ण स्वतंत्र म्हणवणार्‍या या शासनाने चीन आणि उत्तर कोरिया या मुख्य दोस्त राष्ट्रांकडून भरघोस मदत स्वीकारली.

८. व्हिएतनामी ताबा आणि लोकशाहीकडे पुनर्संक्रमण :

ख्मेर रूजच्या सीमाभागात होणार्‍या सतत हल्ल्यांना कंटाळून १९७८ मध्ये व्हिएतनामने कंबोडियावर हल्ला केला आणि ख्मेर रूजचा पराभव करून तिच्या विरोधी असलेल्या कंबोडियन गटांचे संयुक्त सरकार सत्तेत आणले. मात्र या सरकारवर व्हिएतनामचे पूर्ण नियंत्रण होते. या सरकारला राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या सिंहनूक यांच्या देशापार शासनाचा विरोध होता. या युद्धानंतर कंबोडियातून ताबडतोप सेना मागे घेण्यास नकार दिल्यामुळे व्हिएतनामवर अमेरिका व तिच्या दोस्त राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध लादले. त्यांना न जुमानता तेथे स्थिर सरकार सत्तेवर येईपर्यंत पुढची दोन वर्षे व्हिएतनामने आपली सेना कंबोडियातून हलवली नाही. १९८१ मध्ये अनेक एकमेकविरोधी गटांचे सरकार सत्तेवर आले. पुढचा बराच काळ अस्थिर आणि यादवीयुद्धसदृश्य परिस्थिती कायम राहिली.

९. सद्यस्थिती :

१९८९ मध्ये पॅरिसमध्ये सुरू झालेल्या शांतता प्रयत्नांना यश येऊन राष्ट्रसंघाच्या मध्यस्तीने सर्व गटांमध्ये शस्त्रसंधी होऊन सर्वसमावेशक शांतता करार झाला. त्या कराराप्रमाणे United Nations Transitional Authority in Cambodia (UNTAC) आणि नोरोदम सिंहनूक यांच्या अध्यक्षतेखालील कंबोडियन गटांचे Supreme National Council (SNC) यांच्यात सत्ताविभाजन केले गेले. १९९३ मध्ये झालेल्या निवडणूकीत लोकांनी लष्करी गटांना झुगारले. सिंहनूक यांच्या राजावादी पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या परंतू त्यांना बहुमताचा कौल मिळाला नाही. तीन गटांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन सिंहनूक याचा मुलगा राजपुत्र नोरोदम रणरिद्ध पहिला पंतप्रधान आणि हून सेन दुसरा पंतप्रधान झाले. १९९३ मध्येच कंबोडियात राजेशाहीची पुनर्स्थापना होऊन नोरोदम सिंहनूक यांना दुसर्‍यांदा राजा म्हणून घोषित केले गेले.

नोरोदम रणरिद्ध आणि हून सेन यांची व्दिपंतप्रधान राजवट तीन वर्षे टिकली. १९९७ मध्ये नोरोदम रणरिद्ध परदेशात असताना हून सेनने राज्यक्रांतीने पूर्ण सत्ता हस्तगत करून जगाला धक्का दिला. मात्र १९९८ मध्ये पूर्वी ठरल्याप्रमाणे परदेशी निरीक्षकांच्या देखरेखीखाली मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या. नोरोदम रणरिद्ध आणि इतर विरोधकांनी परदेशात राहून त्या निवडणूकीला विरोध केला. शेवटी हून सेन पंतप्रधान, नोरोदम रणरिद्ध विधानसभेचे अध्यक्ष आणि महत्त्वाची खाती दोन पक्षात विभागून अशा तोडग्यावर संयुक्त सरकार स्थापन झाले. यामुळे लवकरच कंबोडियाला ASEAN चे सदस्यत्व मिळायला मदत झाली.

पोल पॉट्चा १९९८ मध्ये मृत्यू झाला. ख्मेर रूजच्या अनेक अधिकार्‍यांना जातीसंहाराच्या आणि इतर गुन्ह्याखाली शिक्षा झाल्या.

एके काळी दक्षिणपूर्व आशियाई महासत्ता असलेला आणि आता त्या काळाच्या केवळ एक चतुर्थांशापेक्षा कमी भूमी ताब्यात असलेला कंबोडिया दरवर्षी कमी होत जाणार्‍या परदेशी मदतीवर अवलंबून आहे. त्याच्या प्राचीन कालच्या स्थापत्य वैभवाचा जीर्णोद्धार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आनंदाची गोष्ट अशी की या कामाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा (ASI) हातभार लागतो आहे.

असो. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या ६०० वर्षे प्रदीर्घ सत्तेत असलेल्या साम्राज्याची भूमी आणि कोणत्याही धर्मातल्या जगातल्या सर्वात मोठ्या मंदिर संकुलाचा देश म्हणून कंबोडियाबद्दल मला खूप कुतूहल होते आणि आहे. ताकदवान आणि संपन्न देशाची बदलत्या कालगतीबरोबर कशी फरपट आणि दुर्दशा होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणूनही कंबोडियाच्या इतिहासात मला रस वाटला. हे सर्व आपल्या सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटले म्हणूनच जरा विस्ताराने त्याबद्दल लिहिले आहे. या पार्श्वभूमीचा कंबोडियाच्या भटकंतीत आपल्याला तो देश अधिक चांगला समजून घेण्यास मदत होईल.

पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

 जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले. पण सलग 3 वर्षे परीक्षेत नापास झाल्याने त्याला 1953 च्या जानेवारी मध्ये पुन्हा कंबोडियामध्ये परतावे लागले. पण त्यापूर्वीच 1951 मध्ये तो मार्क्सवादी चळवळीत दाखल झाला होता.

1963 साली पॉल पॉट कंबोडियन कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख बनला. त्याने अशिक्षित मुले व तरुणांची फौज बनवली ज्याला Khmer Rouge असे नाव पडले. कंबोडियाचा तत्कालिक शासक नोरोडोम सिहनौक ह्याने पॉल पॉटच्या ह्या Khmer Rouge चा निर्दयपणे पाडाव करायला सुरवात केली पण 17 एप्रिल 1975 साली Khmer Rouge ने नोरोडोम सिहनौक ची सत्ता उलटवून लावत देश आपल्या ताब्यात घेतला. 5 जानेवारी 1976 रोजी कंबोडियाने नवे संविधान स्वीकारले व देशाचे नाव बदलून "Democratic Kampuchea" केले. 13 एप्रिलला तो देशाचा पंतप्रधान झाला. मग त्याने देशाच्या नागरिकांचे 3 भाग केले.
1) सर्व अधिकार असणारा.
2) कॅन्डिडेट्स
3) डिपॉसिटीस - हे काहीही अधिकार नसलेले लोक होते. ह्या लोकांना ठार करायचे असे त्याचे ध्येय होते.

देशाची पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर आधारित असली पाहिजे व भरपूर प्रमाणात शेती उत्पन्न मिळवून देश स्वयंपूर्ण करायचा हे त्याचे ध्येय होते. त्याने पैसा चलनातून बाद केला. सर्व शाळा, धार्मिक स्थळे, दुकाने ह्यांचे रूपांतर तुरुंगात केले. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद केली. काळे कपडे हा पोशाख सक्तीचा केला.
शेती करून देश स्वयंपूर्ण करण्यासाठी फक्त 10-20 लाख लोक पुरेसे आहेत. बाकीच्या लोकांचा जगून देखील काही उपयोग नाही असे त्याने रेडिओ वर जाहीर केले.

सत्तेवर येताच Khmer Rouge ह्या त्याच्या लष्कराने 25 लाख लोकसंख्येचे नाम पेन्ह शहर पूर्ण रिकामे केले. इतर लहान मोठी जिंकलेली शहरे देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आली. अमेरिकेचा हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे असे खोटे सांगून त्याने सर्वाना देशाच्या ग्रामीण भागात नेले. तिथे सर्वाना बंदी बनवले गेले. सर्व बंदीवानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे शेतीकाम करावे लागे. आणी त्या बद्दल अन्न मिळत असे ते म्हणजे 2 वाट्या भात. त्यामुळे बरीच लोक उपासमारीने आणी अति श्रमाने मारून जात असत. जो कुणी कामाबद्दल तक्रार करेल किंवा कोणताही नियम मोडेल त्याला देण्यात येणारे अन्नधान्य (2 वाट्या भात) बंद करण्यात येऊन त्याला छळ छावणीत नेण्यात येत असे आणी अगोदरच उपासमारीने अर्धमेल्या झालेल्या त्या व्यक्तीला हाल हाल करून ठार मारण्यात येत असे.

बऱ्याच डिपॉसिटीसना साखळ्यानी बांधून खड्डे खणण्यासाठी नेले गेले आणि मग त्यांना त्याच खड्ड्यात जिवंत पुरून टाकले. अशी हजारो किलिन्ग फिल्ड्स आजही कंबोडिया मध्ये सापडतात.

शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ आहेत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई.

बंदुकीची गोळी ही किमती वस्तू असल्याने लोकांना मारण्यासाठी तो हातोडी, दांडे, फावडी, कुदळ अशी हत्यारे वापरत असे किंवा जिवंत पुरून टाकत असे. तर काही लोकांना बेडला साखळ्यांनी बांधून ठेवले जाई (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत).

शेती आधारित अर्थव्यवस्थेत इतर जगाशी काहीही संबंध ठेवायची गरज नाही असे मत असल्याने त्याने चीन सोडून इतर सर्व देशांशी संबंध तोडून टाकले. देशातील विमान तळ बंद केले, सीमा सील केल्या जेणेकरून कोणीही देश सोडून पळून जाऊ शकणार नाही.

1975 ते 1979 ह्या त्याच्या 4 वर्षाच्या जुलमी कारकिर्दीत कंबोडियाच्या 70 लाख नागरिकांपैकी जवळपास 25 ते 30 लाख लोकांना ठार मारण्यात आले. एक छळ छावणी S - 21 इतकी भयानक होती की तिथे कैद केलेल्या 20000 लोकांपैकी फक्त 7 जण जिवंत राहू शकले. ह्या सर्व मृतांना भाताच्या शेतात पुरले जाई.
आज पर्यंत कंबोडिया मध्ये तब्बल 300 ठिकाणी अशी 'किलिन्ग फिल्ड्स ' सापडली आहेत आणी अजूनही सापडत आहेत.

मे 1975 साली त्याच्या सैन्याने Phú Quốc हे व्हिएतनामचे बेट जिंकल्याने त्याचे व्हिएतनामशी संबंध बिघडले. तह करण्याचे सर्व पर्याय संपल्यावर व्हिएतनामने कंबोडियाशी युद्ध पुकारले. चीनच्या मदतीनं पॉल पॉट ने व्हिएतनामशी लढायचा खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा पराभव झाला. ज्यानंतर तो थायलंडला पळून गेला. थायलंडने पॉल पॉटचा आणी त्याच्या सैन्याचा बफर म्हणून उपयोग केला आणी त्याला चीन कडून हत्यारे मिळवून देण्यास मदत केली.

1985 साली त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये 'मी पूर्णपणे निर्दोष असून माझ्या हाताखालच्या लोकांनी मला न सांगता ह्या हत्या केल्या असे आरोप केला.' त्याच साली व्हिएतनाम ने Khmer Rouge चा पूर्णपणे पाडाव केला. 1989 साली व्हिएतनामचे सैन्य कंबोडिया मधून निघून गेल्यावर पॉल पॉट थायलंड मधून परत देशात आला आणी त्याने नवीन सरकारशी लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 19 मे 1997 ला त्याला लष्कराने ताब्यात घेतले. पण आपल्याला अमेरिकेच्या हवाली करतील म्हणून त्याने 15 एप्रिल 1998 रोजी औषधांचा डोस जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्या केली.

आजच्या कंबोडियातल्या जवळपास प्रत्येक घरातले कुणीतरी पॉल पॉट च्या अत्याचारांचे शिकार झालेले आहे. आणी त्यामुळे आजही खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशातली जनता मानसिक रोगग्रस्त आहे.

 कंबोडियाचा इतिहास आणि संस्कृती जागतीक पुरातत्व संशोधनात एक महत्वाचा अध्याय समजला जातो. अंगकोर (आजचे सियाम रीप) च्या १०० किलोमीटर व्यासाच्या वर्तुळाकार परिसरात सुमारे हजार मंदिरे आहेत. त्यातली सुमारे ८० आकारमान, स्थापत्यकला, कलाकुसर इ साठी पुरातत्व संशोधनदृष्ट्या महत्वाची आहेत आणि त्यांच्यातल्या युनेस्को वर्ड हेरिटेज म्हणून मान्यता मिळालेल्यां स्थानांची यादी वाचताना धाप लागेल. आजही तेथील उत्खनन संपलेले नाही आणि पुरातत्व संशोधनाच्या दृष्टीने महत्वाची नवीन स्थाने अजूनही सापडत आहेत. (सर्वसाधारणपणे कोणत्याही दोन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थानांमध्ये शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतर फारच अभावाने दिसते.) 

 थाई राज्यांबरोबर युद्धे, थेरवादाचा उदय यांजबरोबर प्रचंड मंदिरे बांधत गेल्याने होणारा प्रचंड खर्च हे पण एक कारण असावे. इतक्या मोठ्या खर्चामुळे साहजिकच ही राजवट आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेली असणार.

त्या काळात मंदिरे ही पैसा जमवण्याचे साधन नव्हते. किंबहुना बहुतेक मंदिरे युद्धात मिळालेला विजय अथवा राज्यारोहण याप्रसंगांची आठवण व राजाच्या मोठेपणाची जनमनावर आणि शत्रूंवर छाप पाडण्यासाठी बांधलेली आहेत. ती बांधताना पराजीत राजाकडच्या खंडणीबरोबरच स्वतः राजाचा खजीनाही रिकामा केला जात असे.

देवळे बांधून देवाच्या नावाने संपत्ती जमवायच्या रोगाची लागण त्या काळी नव्हती असे दिसते... हा रोग अलिकडच्या काळाचा आहे ;)

 
या सर्वांबरोबर महापूर / दुष्काळ या नैसर्गीक आपत्तीने नष्ट झालेले मुख्य उत्पन्न (भाताचे पीक) आणि प्लेग ही कारणेही दिली जातात. मात्र त्यापैकी नेमके कोणते एक अथवा अनेक कारणे अंगकोरची सर्व लोकसंख्या स्थलांतरीत होण्यास कारण ठरली आणि ते शहर पुढची चार शतके लोकांच्या स्मृतीतून कसे निघून गेले हे नक्की नाही. फ्रेंचांनी ही मंदिरे परत शोधून काढेपर्यंत कंबोडियातील लोक अंगकोरचे आणि तेथील शिलालेखांवरील लिपीसुद्धा विसरून गेले होते.  
इतकं काय काय होत होतं कंबोडीया मधे.. आणि तिथल्या महत्वाच्या राजकारणात भारताचा साधा उल्लेख नाहि :( साला आपले पब्लीक तेच ते तामिलनाडु, महाराष्ट्र, गुजराथ, युपी आणि काश्मीरच्या पलिकडे जातच नाहि.
केवळ ख्मेर साम्राज्यच नव्हे तर, १२९३ ते १५०० या काळात जावाच्या महापहीत हिंदू-बौद्ध साम्राज्याने "आताचा मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, पूर्व टिमोर, ब्रुनेई, दक्षिण थायलंड आणि दक्षिण फिलिपाईन्स" इतका प्रदेश व्यापलेला होता.

या साम्राज्यात बांधल्या गेलेल्या जगप्रसिद्ध बोरोबुदूर स्तुपाचे नाव आपण इतिहासाच्या पुस्तकातून वाचले असेलच. त्या ११८ मीटर X ११८ मीटर आकाराच्या स्थापत्यशास्त्रातल्या आश्चर्याबद्दल अघिक माहिती इथे सापडेल.

(जालावरून साभार)

वरचा फोटो पाहुन क्रिस्टलच्या श्री यंत्राची तुलना करावीशी वाटली.{म्हणजे मंडलाकॄती रचना पाहुन}
एकंदर तंत्र आणि यंत्र या प्रकारात मंडलाकॄती रचनेला विशेष महत्व आहे हे समजुन येत आहे.

हा योगायोग नाही !

बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना हेतूपुर्स्सर "तांत्रीक मंडल यंत्रा"वरच बेतलेली आहे !

.

(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

  पहिले  फोटो यावरुन मंडल रचनेतील Square Grid लक्षात आली आहे,खरं तर पाण्याच्या चौकोनाच्या बाजुला भुपुराचे काही संदर्भ दिसत आहेत का ते मला या वरील सर्व फोटोतुन पहायचे आणि समजुन घ्यायचे होते, कारण एकंदर रचना ही एखाद्या यंत्राप्रमाणेच भासत / दिसत आहे,एकंदर यंत्रांमधे मध्य बिंदुला फार महत्व असते.परंतु याच्या फक्त दोनच बाजुला बाहेरच्या बाजुस जाणारे मार्ग दिसतात {म्हणजे पाण्यातुन बाहेरच्या बाजुला जाणारे, परंतु मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र जे चित्र आहे ते बरेचसे भूपुराच्या जवळपास जाणारे प्रथमदर्शनी वाटते. ४ दिशांना ४ दारे असे भूपुराचे डिझाइन असते. 

असो... या संदर्भात एक दुवा देतो :- Maṇḍalas and Yantras यात navapadmamanḍ ̣चे डिझाइन पहा मग भाग ३ मधली सॅटेलाइट इमेज पहा पाण्यात {जास्त करुन उजवीकडेच} काही रेषा दिसतात,परंतु त्या कमळाकॄती नसुन वेगळ्याच दिसत आहेत. { हा माझा एकंदर अंदाजच आहे, जो या डिझाइच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो.}  

अंगकोर वट हे राजधानीचे ठिकाण असल्याने पाण्याच्या संरक्षक खंदकावर दोनापेक्षा जास्त बंधारे नसणे ही संरक्षणाच्या दृष्टीने केलेली व्यवस्था असावी असे वाटते.

विमानतळावर आलेल्या मार्गदर्शिकेने हॉटेलवर जाऊन चेकईन करण्यात वेळ घालविण्याऐवजी शहराची सफर तडक सुरू करण्याचा सल्ला दिला. विमानतळातून बाहेर पडेपर्यंत दुपारचा दीड वाजला होता त्यामुळे तिचे म्हणणे मानण्यातच शहाणपण होते. गाडीत सामान टाकून आमची मेकाँग, बसाक् आणि तोन्ले साप या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या कंबोडियाची राजधानी नॉम् पेन् ची सफर सुरू झाली.

नॉम् पेन् ह्या या शहराच्या नावामागे एक दंतकथा आहे ती अशी. चौदाव्या शतकाच्या शेवटी ख्मेर साम्राज्याच्या अखेरच्या काळात चाक्तोमुक नावाच्या (Chaktomuk) खेड्यात राहणार्‍या दुआन पेन् (Duan Penh) नावाच्या एका वृद्ध स्त्रीला सरपण गोळा करत असता नदीतून एक ओंडका वाहत जाताना दिसला. तो ओंडका पकडून काठावर आणल्यावर तिला त्याच्या पोकळीत बुद्धाच्या चार आणि विष्णूची एक अशा पाच मूर्ती सापडल्या. ही घटना त्यावेळेपर्यंत अंगकोरला असलेली कंबोडियाची राजधानी त्या जागी स्थलांतरित होण्याचा दैवी संकेत समजला गेला. दुआन पेन् ने मूर्ती सापडलेल्या जागेजवळच्या एका टेकडीवर मंदिर बांधून मूर्तींची स्थापना केली. या घटनेवरून चाक्तोमुक गावाचे नाव बदलून नॉम् पेन् (पेन् ची टेकडी) असे झाले आणि त्या मंदिराला वट नॉम् (टेकडीवरचे देऊळ) असे नाव पडले (Phnom = टेकडी; Wat = देऊळ, मोनॅस्टरी). पुढे त्या भविष्यवाणीप्रमाणे राजधानी खरोखरच नॉम् पेन् ला स्थलांतरित झाली.

राजवाडा

राजधानीत आल्यावर आमचा पहिला थांबा होता राजवाड्याचा. गेल्या शतकभरापेक्षा जास्त कालखंडात मूळ लाकडी बांतिय केव (Banteay Kev) नावाच्या जुन्या राजवाड्याच्या मूळ इमारतींचे वेळोवेळी नूतनीकरण केले जाऊन थाइ-कंबोडियन-पाश्चिमात्य अश्या शैलींच्या संगमाच्या नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तोन्ले साप नदीच्या किनार्‍यापासून जवळच असलेल्या या राजवाड्याच्या विस्तीर्ण प्रांगणात मुख्य राजभवन आणि राजाच्या नेहमीच्या वापराच्या इमारती सोडता इतर ठिकाणी फिरता येते.

सर्वप्रथम राजसिंहासनाची इमारत आपले लक्ष वेधून घेते...

राजसिंहासनाचा प्रासाद (जालावरून साभार)

नावाप्रमाणेच ही इमारत राज्याभिषेक, राजाला भेटायला येणार्‍या महत्त्वाच्या परदेशी राजकीय व्यक्तींचे स्वागत आणि पारंपरिक राजसमारंभांना वापरली जाते. या इमारतीच्या आत फोटो काढता येत नाही. कंबूज कोरीवकामाचा उत्तम नमुना असलेले सिंहासन अनेक स्तरांचे आहे. त्यातले खालच्या दोन स्तरांत दोन गरूडांनी मुख्य चौथरा उचलून धरलेला आहे. त्यावरचे तीन स्तर नरक, पृथ्वी आणि स्वर्ग यांचे प्रतिनिधित्व करतात. मुख्य आसनाभोवती सोन्याच्या प्रत्येकी नऊ स्तरांच्या चार सुवर्णछत्र्या आहेत आणि त्याचे छत एका नऊ स्तरांच्या पांढर्‍या छत्रीच्या रूपात आहे. (नऊ हा आकडा सर्व दक्षिणपूर्व व अतिपूर्वेत सर्वात मोठा एकक म्हणूनच सामर्थ्याचे प्रतीक म्हणून राजचिन्हांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत येत असतो. ) सिंहासनाशेजारी एक सोन्याचा चहापानाचा संच आणि त्याबरोबर विड्याची पाने आणि सुपारी असलेला तांबूल-संच राजसिंहासनाच्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून ठेवलेले असतात. राजाच्या मुख्य आसनामागे पण जरा अधिक उंचीवर राणीने बसायचे आसन आहे. राज्याभिषेकानंतर राजा आणि राणीची एका खास पालखीतून राजधानीतून मिरवणूक काढली जाते...

मिरवणुकीची पालखी

चंद्रप्रकाश प्रासाद (Preah Thineang Chan Chhaya)

ही इमारत राजाच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्याप्रती आदर दर्शविण्यासाठी केल्या जाणार्‍या नृत्यांसाठी वापरली जाते. ही इमारत राजवाड्याजवळून जाणार्‍या एका मोठ्या रस्त्याला (Sothearos Boulevard) लागून असलेल्या भिंतीजवळ आहे. त्या बाजूला असलेल्या सज्जाचा उपयोग राजा त्या रस्त्यावरून जाणार्‍या संचलनांचे व मिरवणुकीचे निरीक्षण करण्यासाठी करतो.

चंद्रप्रकाश प्रासाद

रौप्यमंदिर (Silver Pagoda)

राजवाड्याच्या आवारात असलेल्या या बुद्धमंदिराच्या जमिनीवर लावलेल्या चांदीच्या ५,००० फारशांमुळे याचे हे नाव पडले आहे. या मंदिरात उंचावर ठेवलेली बुद्धाची १७व्या शतकातील मुख्य पाचूची मूर्ती आहे. तिच्यासमोर असलेल्या ७५ किलोग्रॅम वजनाच्या पुर्णाकृती मैत्रेय बुद्धमूर्तीच्या अंगावर ९,५८४ हिरेमाणकांनी जडवलेला राजपोशाख आहे. त्यातला सर्वात मोठा हिरा २५ कॅरट वजनाचा आहे. या मंदिराच्या भिंतीच्या बाहेरील भागांवर ख्मेर रामायणातील (रीमकर) प्रसंगांची चित्रे रंगवली आहेत. या मंदिरात चित्रे काढण्यास मनाई आहे. त्यामुळे त्याचे हे फक्त बाह्यदर्शन...

रौप्यमंदिर

आणि हे बाह्य भिंतींवरील एक चित्र...

रौप्यमंदिराच्या भिंतीवरचे चित्र

खेमारीन मोहा प्रसात (Khemarin Moha Prasat)

खेमारीन मोहा प्रसात {Khemarin = Khmer + Indra; Moha = महा; Prasat = प्रासाद / मंदिर} म्हणजे ख्मेरेंद्राचा राजप्रासाद / मंदिर. राजप्रासादाच्या प्रांगणात प्रवेश मिळत नाही कारण ते राजाचे अधिकृत वास्तव्याचे ठिकाण असून तेथे बर्‍याचदा राजाचे वास्तव्य असते. तेथे राजाचे वास्तव्य असले की महालासमोरच्या ध्वजस्तंभावर ध्वज फडकत असतो, अन्यथा तो ध्वजविरहित असतो. राजप्रासादाचे दुरून घेतलेले हे एक चित्र...

खेमारीन मोहा प्रसात

राजवाड्याच्या आवारातल्या छोट्याश्या संग्रहालयातील दोन गोष्टींनी लक्ष वेधून घेतले...


राणीचा सुवर्णजडीत पोशाख (? साडी)

.


राजवाड्यातील सेविकांचे पोषाख... आठवड्याच्या सात वारांना सात वेगळे रंग!

अजून काही चित्रे...

राजवाड्याच्या प्रांगणाचे एक दृश्य

.

तोन्ले साप नदीच्या बाजूने दिसणारे राजवाड्याचे समग्र-दृश्य (पॅनोरॅमिक व्ह्यू) (जालावरून साभार)

राष्ट्रीय संग्रहालय

राजवाड्यातून बाहेर पडून आम्ही जवळच असलेले कंबोडियाचे राष्ट्रीय संग्रहालय पहायला गेलो...


कंबोडियाचे राष्ट्रीय संग्रहालय

तेथे दरवाज्यात भव्य विष्णूवाहन गरूडराजाने आमचे स्वागत केले...


गरूडराज आणि आम्ही

या संग्रहालयात कंबोडियाच्या प्राचीन इतिहासाचा आणि त्यावरच्या भारतीय संस्कृतीच्या प्रभावांचा खजिना होता. मात्र संग्रहालयात फोटो काढण्यास मनाई असल्याने (प्रत्येक गटाला स्वतंत्र मार्गदर्शक असतो आणि तो/ती कोणीही फोटो काढणार नाही याची खबरदारी घेतो/घेते. ) माझ्याकडे संग्रहालयातले फोटो नाहीत :(

जालावर काही चित्रे सापडली ती खाली देत आहे...


पहुडलेल्या विष्णूचा ब्राँझचा पुतळा

.


उभा विष्णू

.


मिशीवाला विष्णू

आतापर्यंत विष्णूच्या इतक्या मूर्ती / प्रतिमा पाहिल्या होत्या, पण मिशीवाला विष्णू येथेच प्रथम पाहिला !

.


भीम आणि दुर्योधनाचे युद्ध

.


शिवलिंगे

.


नंदी

.


गणेश

संग्रहालयाचे प्रांगण इतके सुंदर होते की तेथे मात्र कॅमेरा गप्प बसू शकला नाही...


कंबोडिया राष्ट्रीय संग्रहालयाचे आवार

वट नॉम् बुद्धमंदिर

या बुद्धमंदिराच्या स्थापनेसंबद्धीची गोष्ट अगोदरच आली आहेच. १३७३ मध्ये स्थापन केलेल्या या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केला गेला आहे. १४३८ मध्ये राजघराणे नॉम् पेन् मध्ये स्थलांतरित होऊन पोन्हिया यत नावाच्या राजाने तेथे नवा राजवाडा बांधल्यावर त्याने या मंदिराच्या टेकडीची उंचीही वाढवून घेतली. मंदिराच्या बाजूला असलेल्या स्तूपात त्या राजाच्या आणि राजघराण्यातील इतर लोकांची रक्षा ठेवलेली आहे...


वट नॉम् कडे नेणार्‍या पाहिर्‍या आणि त्यांच्या बाजूचा राजघराण्यातील व्यक्तींची रक्षा असलेला स्तूप

मंदिरात एक मोठी बुद्धमूर्तीच्या आजूबाजूला अनेक छोट्या बुद्धमूर्ती, फुले आणि इतर अर्पण केलेल्या वस्तूंची गर्दी होती...


वट नॉम् चे गर्भगृह

मंदिराच्या एका भिंतीवर हे कोरीवकाम होते. मार्गदर्शिका ते रामायणातले असावे असे म्हणाली. एवढे रथ आणि घोडे असल्याने मला तर ते महाभारतातले दृश्य वाटले...


वट नॉम् च्या भिंतीवरचे दृश्य

मुख्य मंदिराच्या एका बाजूला दुआन पेन् बाईंचे मंदिर होते...


दुआन पेन् ची मूर्ती

मंदिराच्या टेकडीभोवती एक सार्वजनिक बाग आहे. तिच्यात संध्याकाळी फिरायला आलेल्या नॉम् पेन् करांची गर्दी होऊ लागली होती...


वट नॉम् भोवतीच्या बागेतील घड्याळ

आजचा शेवटचा थांबा बघून झाल्याची मार्गदर्शिकेने घोषणा केली आणि दिवसभराचा शीण उसळून आला. कधी एकदा हॉटेलवर परततो आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले.

सहलिचा पुढचा दिवस मोठ्या म्हणजे अगदी फार मोठ्या उत्सुकतेने उजाडला. कारण त्या दिवशी सहललितल्या सर्वोत्तम आकर्षणाकडे जायचे होते. ही सगळी सहल ज्याला मध्यवर्ती ठेऊन आखली होती असे ते ठिकाण होते... ख्मेर साम्राज्याची राजधानी "अंगकोर".

अंगकोरचे अवशेष आताचे कंबूज शहर सिएम रीपच्या जवळ आहेत. अंगकोरच्या जागतीक प्रसिद्धीमुळे सिएम रीप नावारुपाला येऊन एक आघुनिक शहर बनले आहे. तेथे प्रवाश्यांच्या सोईकरता अनेक सुविधा, अनेक प्रकारची तारांकित हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

विमानाने आकाशात भरारी घेतली आणि नॉम् पेन् चा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो... आणि थोड्याच वेळात कंबोडियाचा भातशेतीचा भाग दिसू लागला..


......

पण ते दृश्य फार काळ टिकले नाही. कारण आमच्या सहली अगोदर दोन महिने कंबोडियात पावसाने हाहा:कार माजवून जलप्रलय केला होता. त्याच्या अजूनही न मिटलेल्या खाणाखूणा आणि शेतजमिनीची झालेली दुर्दशा दिसू लागली. दोन महिने झाल्यानंतही शेतातले पाणी कायमच होते आणि शेते पाण्याच्या ओघाबरोबर वाहून आलेल्या दगड-मातीने भरलेली होती...


.....
कंबोडियातील महापूराने केलेली शेतीची अवस्था

अंगकोरची, त्याच्या आजूबाजूच्या शेतीची आणि पर्यायाने ख्मेर साम्राज्याची वाताहात होण्यास तेथील बदललेले हवामान आणि त्यामुळे आलेले ओल्या-सुक्या दुष्काळांचे दुष्टचक्र कारणीभूत झाले असा एक सिद्धांत आहे. त्याची एक झलक पहायला मिळाली.

अंगकोरमधील प्राचीन देवळांत पाणी भरण्याचा अंदाज वर्तवला गेला होता आणि त्यामुळे जगभरच्या पुरातत्वसंशोधकांत खळबळ माजल्याचे बातम्यांत वाचले होते. सुदैवाने अंगकोरला त्या वादळी हवामानाचा व महापुराचा फटका अपेक्षेपेक्षा बराच कमी बसला होता आणि तो अंदाज खरा झाला नाही. हे एक दु:खात सुख होते.

२५० किलोमीटरचे अंतर ४५ मिनीटात कापून विमान सिएम रीपवर पोहोचले आणि सुस्थितीतल्या मानवी वस्तीच्या खाणाखूणा दिसू लागल्या. सिएम रीपच्या छोटेखानी विमानतळाची इमारत साध्या पारंपारीक शैलीत बांधलेली आहे...


सिएम रीप आंतरराष्ट्रिय विमानतळ

जरी इमारत लहान होती तरी अनेक देशांची विमाने तिथे उडता-उतरताना दिसत होती आणि प्रवाश्यांची संख्याही लक्षणीय होती.

येथेही मार्गदर्शकाने गाडीत बसल्या बसल्या हॉटेलवर जाण्याऐवजी तडक सहल सुरू करायचा सल्ला दिला. विमानाचा प्रवास फक्त ४५ मिनीटांचा होता, त्याअगोदर सज्जड न्याहरी झालेली होती आणि मुख्य म्हणजे अंगकोर भेटीची आस लागलेली होती त्यामुळे त्या सूचनेला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता ! सामान गाडीत टाकले आणि तसेच निघालो. अर्ध्या तासातच गाडी जगप्रसिद्ध अंगकोर वट जवळून जाऊ लागली...


अंगकोर वट सभोवती असलेल्या मोटेचे आणि तटबंदीचे प्रथम दर्शन

गाईडने त्याच्याकडे निर्देश करून आपण तेथे नंतर जाणार आहोत, त्याअगोदर इतर महत्वाची ठिकाणे पाहणे जास्त सोईस्कर होईल असे सांगीतले. तेव्हा जरा रागानेच इटिनेररी परत चाललि आणि घ्यानात आले की अंगकोर वट जरी सर्वात जास्त जगप्रसिद्धी मिळालेले आकर्षण असले तरी अंगकोरमध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जाची अजून अनेक आकर्षणे आहेत. हे जरी अगोदर वाचलेले असले तरी इतर देवळांची इतकी कमी प्रसिद्धी झाली आहे की त्यांना भेट दिल्यावर आणि वारंवार थक्क झाल्यावरच त्या गोष्टीवर विश्वास बसतो... आणि आपण संपूर्ण अंगकोरच्या चक्क प्रेमात पडतो !

अंगकोर

अंगकोर हे काही एक मंदिर किंवा प्राचीन अवशेषांचे एक आवार नाही. ही आहे सतत ६०० वर्षे दक्षिणपूर्व आशियावर सत्ता असलेल्या आणि दक्षिणपूर्व आशियामार्गे होणार्‍या भारत-युरोप-चीन यांच्यातील व्यापारावर नियंत्रण असलेल्या साम्राज्याची राजधानी. अंगकोर हा शब्द संस्कृत शब्द नगर यावरून ख्मेर भाषेत येता येता "नगर --> नोगोर --> नोकोर --> अंगकोर" असा झाला आहे. इ स ८०२ मध्ये कौडिण्य नावाच्या राजपुत्राने दुसरा जयवर्मन या नावाने राज्याभिषेक करवून स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट घोषित केले आणि राजा हा शिवाचा अंश म्हणून त्याला "देवराजा" असे संबोधण्याची प्रथा सुरू केली हे आपण अगोदरच्या भागांत पाहिले आहेच. नवव्या शतकापासून थायलंडच्या (त्याकाळचा सयाम) आयुथ्थाया (आयोध्या) राज्याने पाडाव करेपर्यंत अंगकोर ही ख्मेर साम्राज्याची राजधानी होती.

या काळात येथे एक हजारापेक्षा जास्त देवळे बांधली गेली... त्यांची आताची अवस्था "शेती आणि माळरानांवर पसरलेले असंख्य विस्कळीत दगड" ते "आकारमानामुळे, स्थापत्यशैलीमुळे आणि कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध झालेल्या अंगकोर वट सारखे अजून बर्‍याच सुस्थितीत असलेले मंदिर" अशी आहे. त्यातली काही देवळे ते पाषाण मूळ स्थानी बसवून पुनर्स्थापित केली गेली आहेत तर अजून बर्‍याच मंदिरांच्या पुनर्स्थापनेचे काम चालू आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने आधुनिक पद्धतीने उपग्रहचित्रणाव्दारे इ स २००७ मध्ये केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की अंगकोर औद्योगिक क्रांती होण्याअगोदरच्या काळातील सर्वात मोठे शहर होते. सुमारे १,००० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या या शहरात पाणी, सांडपाणी, रस्ते, इ सर्व मूलभूत गरजांची उत्तम संरचना (elaborate infrastructure system) होती. (या बाबतीत दोन क्रमांकावरचे शहर माया संस्कृतीतले आताच्या ग्वाटेमाला देशातले "तिकाल" हे आहे. त्याचे क्षेत्रफळ १०० ते १५० चौ किमी होते. आजच्या पुणे शहराचे क्षेत्रफळ ७०० चौ किमी आणि नवी मुंबईचे ३४४ चौ किमी आहे. यावरून अंगकोरच्या भव्यतेची कल्पना यावी.) एवढ्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर देवळासभोवताच्या खंदकांत, मोठमोठ्या तलावांत आणि काही घरांच्या जवळच्या मध्यम ते लहान आकाराच्या तळ्यांत पाणी साठवून ते सर्व पाण्याचे साठे कालव्यांनी एकमेकाला जोडलेले होते. मेकाँग आणि तोन्ले साप नद्यांतील पाणी खास बांधलेल्या कालव्यांतून त्या साठ्यांत सोडले जात असे. याशिवाय या नद्यांच्या तोडीचीच पावसाचे पाणी अडवून कालव्यांत सोडण्याची तिसरी मानवनिर्मित जलप्रणाली त्याकाळच्या ख्मेर अभियंत्यांनी बांधली होती.

अंगकोर शहराच्या चार दिशांना असलेल्या मुख्य चार तलावांपैकी (Baray) सगळ्यात मोठ्या पश्चिमेकडच्या तलावाचा आकार ८ किमी X २ किमी होता. ११ व्या शतकाच्या मध्यात बांधलेला पश्चिम दिशेचा तलाव आजही आस्तित्वात आहे आणि त्यात अजूनही मासेमारीही केली जाते. पूर्ण भरल्यावर या तलावात सद्या ५३० लक्ष घनमीटर पाणी साठते. अंगकोरच्या एकूण लोकवस्तीबद्दल संशोघकात पूर्णपणे एकमत नाही. पण, शहरातील मूलभूत व्यवस्था आणि नैसर्गीक-मानवनिर्मित तळी व कालवे बांधून रचलेल्या शेतीच्या प्रणालींवरून तेथे १०,००,००० (दहा लाख) लोक राहू शकत असावे असा अंदाज आहे ! (२०११ च्या जनगणने प्रमाणे नवी मुंबईची लोकसंख्या साधारण ११ लाख होती.)

देवळांच्या भोवतीचे खंदक हे दुग्धसागराचे प्रतिक, मधले विशाल आणि उंच मंदीर म्हणजे देवनिवास मेरू पर्वत आणि त्याच्या टोकावर असलेल्या गर्भागृहात देवराजाचे शिवलिंगाच्या स्वरूपातले आस्तित्व अशी बर्‍याच देवळांची मांडणी आहे. येथिल अंगकोर वट मंदिर हे जगातील आतापर्यंतचे सर्वकाळचे सर्वात मोठे धार्मिक बांधकाम आहे. दरवर्षी अंगकोरला वीस लाखापेक्षा जास्त प्रवासी भेट देतात आणि त्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे.

नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर एक सेरीज कंबोडीयावर होती, त्यात सांगितलं होत की अंगकोर वटच्या महामंदिराची जमीन काहीही वास्तूनिर्माणासाठी अयोग्य समजली जायची कारण पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराने जमीन फुगायची आणि उन्हाळा आला की जमिनीची सखलता नष्ट होऊन भेगा पडायच्या आणि ती उंचसखल व्हायची. त्यावर उपाय म्हणून वास्तुविशारदांनी प्रस्तावित मंदिराच्या जागेभोवती चारी दिशेने मानवनिर्मित कालवे/खंदक तयार केले. आणि त्यातून पाणी फिरवले. त्यामुळे जमीन उंच सखल होण्याची समस्या पूर्णतः नाहीशी झाली.

   अंगकोरची जमीन वालुकामिश्रित आहे त्यामुळे जर त्या जमिनीची आर्द्रता कमी झाली तर तिच्यावरच्या वजनदार मंदिरांचा तोल केवळ स्वतःच्या वजनाने ढळेल.सद्याही सतत वाढणार्‍या पर्यटकांच्या लोंढ्याना सुविधा देण्यासाठी होणार्‍या विकास कामांसाठी होणार्‍या जमिनीतल्या पाण्याच्या उपश्याने (यात तलावांतल्या पाण्याची चोरीही आली) कमी होत जाणार्‍या जमिनीतल्या पाण्याची पातळी हा मोठा काळजीचा विषय झालेला आहे.

   जमिनीतिल आर्द्रता राखून ठेवण्याइतकाच या मंदिरांच्या सभोवतीच्या तलावांइतक्या मोठ्या खंदकांतिल पाण्याचा उपयोग नेहमीच्या वापराला आणि शेतीच्या वापराला होत होता. याच शेतीच्या बळावर ख्मेर सम्राट त्याकाळातल्या जगातिल सर्वात मोठी फौज बाळगून होते. या पाण्याकरिता त्यांनी उभारलेले दोन नदीजोडांचे प्रकल्प आणि नदीइतकाच मोठा एक मानवनिर्मीत प्रकल्प ही आजही स्थापत्यशास्त्रिय आश्चर्ये मानली जातात.

बांधकामाचा वारसा अनेक राजांनाही मिळाला होता. इ स ८८९ मध्ये सत्तेवर आलेला सम्राट यशोवर्मन हा स्वतः नावाजलेला अभियंता होता आणि त्याने यशोधरापुरा नावाची ख्मेर साम्राज्याची जुनी राजधानी वसवली.

अंगकोरच्या मध्यभागाच्या २४ किमी X ८ किमी इतक्या क्षेत्रफळात ७२ मोठी मंदिरे आणि इतर प्राचीन महत्वाच्या इमारती आहेत. याखेरीज याच भागात असलेल्या इतर प्राचीन अवशेषांची संख्या अनेक शेकड्यांत जाते. अंगकोरच्या मध्यवर्ती भागाच्या नकाशावर नजर टाकली तर त्याच्या आवाक्याची थोडीबहूत कल्पना येईल...


अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)

हा नकाशा पाहून, सात दिवसांचा प्रवासी पास घेऊन अंगकोर बघायला जाणारे प्रवासीही "अंगकोर काय नीटसं पाहिलं नाही बुवा. परत एकदा यायलाच पाहिजे." असं मनात घोळवीत का परत जातात, हे कळायला सोपं जाईल !

चारशे वर्षांच्या खरोखरच्या वनवासानंतर (तेथे इतके जंगल वाढले होते की अंगकोर जनमानसातून विस्मरणात गेले होते !) १९०१ साली या परिसराचा अभ्यास करण्यासाठी French School of the Far East ने अनुदान देऊन संशोधकांची तुकडी पाठवली... आणि जगाला एका प्राचीन आकारमान, स्थापत्यशास्त्र आणि शिल्पसमृद्धी या सर्व दृष्टीने आश्चर्यकारक असा नजराणा मिळाला!

केवळ "अंगकोर वट" या एका मदिराच्या प्रसिद्धीने आणि वाचनाने खेचून नेलेल्या मलाही तेथे प्रत्यक्ष पोहोचल्यानंतर दुसर्‍या दिवशीच हा सर्व प्राचीन खजीना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि जास्त आश्चर्यकारक आहे हे उमजायला लागले होते. त्यामुळे अंगकोर पूर्ण पाहून होण्याअगोदरच "जर कुठली मोठी सफर परत करणे शक्य झाले तर अंगकोरचा क्रमांक पहिला असणार" असे मी जाहीर केले !

चला, आता निघूया हा सगळा खजीना पहायला. अर्थातच सर्व जागा पाहणे तेथे बराच काळ ठिय्या मारून बसल्याशिवाय बघणे शक्यच नाही. तसेच तेथे खरंच काय आहे याची पूर्ण कल्पना स्वतः भेट देऊन डोळ्यानी पाहिल्याशिवाय येणे शक्य नाही. मात्र आमच्या चार दिवसांच्या धावत्या भेटीत बघितलेल्या मुख्य ठिकाणांना एक एक करत माझ्या तुटपुंजा शब्दसंपत्तीतून आणि कॅमेर्‍याच्या डोळ्यातून जेवढे जमेल तेवढे पहायला पुढच्या भागापासून सुरूवात करूया.

(क्रमशः )

अंगकोर वट वरून पुढे जाता जराशी नाराजी वाटलीच. पण जास्तित जास्त आकर्षणे कमीत कमी वेळात बघण्यासाठी योग्य तोच आराखडा केला आहे ह्या मार्गदर्शकाच्या आश्वासनाने जरा बरे वाटले.

अंगकोर थोम

सर्वात प्रथम आम्ही अंगकोर थोमला भेट दिली. ख्मेर भाषेत अंगकोर थोम म्हणजे महानगर (Great City). बाराव्या शतकाच्या शेवटाला सातव्या जयवर्मनने वसवलेले हे शहर खेर साम्राज्याचे शेवटचे आणि सर्वात जास्त काळ राजधानीचे ठिकाण होते. ह्याचे अवशेष एकूण नऊ चौ किमी क्षेत्रफळावर आहेत. अंगकोर थोम, तिच्या पूर्वीची राजधानी यशोधरापूर आणि तिच्या नंतरच्या राजधान्यां यांची क्षेत्रे एकमेकात मिसळलेली आहेत. त्यामुळे, अंगकोर थोममध्ये सातव्या जयवर्मनने बांधलेल्या इमारतींबरोबर त्याच्या पूर्वजांनी आणि वंशजांनी बांधलेल्या अनेक इमारतीही आहेत. यातील बायोन (Bayon) राजमंदिर सर्वात महत्वाचे मानले गेले असले तरी बाफून (Baphuon) राजमंदिर, फिमिनाकास (Phimeanakas) राजमंदिरासारखी स्थळेही आपले वेगळेपण आणि महत्व राखून आहेत.


अंगकोर थोमच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)

या चौरस आकाराच्या शहरासभोवती ३ किमी X ३ किमी लांबीरूंदीची ८ मीटर ऊंच तटबंदी आहे. तटबंदीभोवती पाण्याने भरलेली मोट आहे. मोट ओलांडून शहरात जाण्यासाठी मोटेवर बांधलेल्या पूलांच्या कठड्यांवर डाव्या बाजूला देव आणि उजव्या बाजूला दानव वासूकीची दोरी ओढून समुद्रमंथन करत आहेत असे दर्शवणारे शिल्प आहे. आम्ही सर्वात जास्त वापरात असलेल्या दक्षिण व्दाराने आम्ही शहरात प्रवेश केला...

...
अंगकोरच्या दक्षिण व्दारासमोरील समुद्रमंथन शिल्प

२३ मीटर उंच व्दाराच्या शिखराच्या चार बाजूस बायोन शैलीतली चार विशाल मुखे आहेत...


अंगकोर थोमचे दक्षिण व्दार

ही चार मुखे कोणाची आहेत याबाबत एकमत नाही. ती मुखे राजाचे चहुकडे लक्ष असल्याचे प्रतिक, बोधिसत्व अखिलेश्वराचे प्रतिक, साम्राज्याचे रक्षण करणार्‍या देवतांचे प्रतिक, इ असल्याची वेगवेगळी मते आहेत. पण या शहरात ही मुखे अजून भव्य आकारात आणि संख्येत दिसणार आहेत.

बायोन राजमंदिर

बायोन हे सम्राट सातव्या जयवर्मनने (इ स १२६५ - १३१५) नागफण्याखाली बसलेल्या जयबुद्धमहानाथ या बुद्धाच्या नावे बांधलेले महायान बौद्धमंदिर आहे. हे अंगकोर साम्राज्यातले शेवटचे आणि महायान बौद्ध संप्रदायाचे एकुलते एक राजमंदिर आहे. मंदिराच्या खोल्यांत व भिंतींवर ख्मेर साम्राज्यातील विविध भागातल्या स्थानीक देवदेवतांच्या मूर्ती आणि कोरिवकामे आहेत. त्याबरोबरच मंदिराच्या भिंतींवर पौराणिक, ऐतिहासिक आणि सर्वसामान्य जीवनातल्या प्रसंगांची कोरीवकामे आहेत. मात्र बायोन मंदिर त्याच्या विशाल चतुर्मुखी शिखरांमुळे जगप्रसिद्ध आहे...


बायोन राजमंदिर ०१

.


बायोन राजमंदिर ०२

.


बायोन राजमंदिर ०३

.


बायोन राजमंदिर ०४

.


बायोन राजमंदिर ०५

.


बायोन राजमंदिर ०६

.


बायोन राजमंदिर ०७ : नृत्यांगना

मंदिरातील इतर कोरीवकाम...


ख्मेर भूदल
.

चंपा आणि ख्मेर नौदलाचे युद्ध
.

अंगकोरचा बाजार
(वरची तीन चित्रे जालावरून साभार)

या मंदिराच्या शिखरांवर एकूण २१६ मुखे आहेत. इतक्या संख्येने असलेली आणि दूरवरून दिसू शकणारी भव्य मुखे एक प्रकारचा गुढ मानसिक परिणाम करतात. तेराव्या-चौदाव्या शतकांत त्यांचा जनमानसावर आणि ख्मेर साम्राज्याच्या शत्रूंवर मानसिक प्रभाव नक्कीच पडला असणार.

हे मंदिर बरोक प्रकारच्या ख्मेर स्थापत्यशैलीचा नमुना म्हणून ओळखले जाते. ही शैली पारंपारिक ख्मेर शैलीपेक्षा वेगळी आहे. जपानी सरकारच्या मदतिने या मंदिराचे पुनस्थापन चालू आहे.

या मंदिरावरचे चेहरे अनेक चित्रपटांत आलेले आहेत. त्यातले काही...
१. Lara Croft: Tomb Raider
२. Patlabor the Movie 2
३. Civilization IV: Beyond the Sword
४. Eternal Darkness: Sanity's Requiem, इ.
तसेच ते काही कादंबर्‍यांतही आलेले आहेत. त्यातल्या काही...
१. The Judas Strain (James Rollins)
२. The Golden Pagans (Peter Bourne c.1956), इ.

सुरुवात तर छान झाली होती. अंगकोर वटचे चित्र डोळ्यासमोर होतेच. पण आता तेथे जाण्याअगोदर अजून काय काय अनपेक्षित बघायला मिळते आहे याचीही उत्सुकता वाटू लागली होती !

बाफून राजमंदिर

बायोन पासून चालत थोड्याच अंतरावर असलेल्या बाफून राजमंदिराकडे गेलो. हे मंदिर सम्राट उदयादित्यवर्मनने (इ स १०५० - १०६६) अकराव्या शतकाच्या मध्यात बांधले. हे तीन स्तरांच्या पर्वताकारात (पिरॅमिडसारखे) बांधलेले शिवमंदिर आहे. मंदिराला लागूनच राजप्रासाद आहे. ही १२० मीटर X १०० मीटर आकाराची इमारत पारंपारिक बाफून ख्मेर शैलीत बांधलेली आहे. तिची सद्याची उंची ३४ मीटर आहे आणि तिच्या (आता नष्ट झालेल्या) शिखरासकट अंदाजे ५० मीटर ऊंच असावी. ख्मेर दरबारातल्या चीन सम्राटाच्या वकिलाने त्या आता नष्ट झालेल्या कासे (ब्राँझ) वापरून बनवलेल्या चित्ताकर्षक शिखराचे वर्णन लिहून ठेवले आहे. शिखराच्या बुंध्यात दहा खोल्या होत्या, इतका तो मोठा होता. पंधराव्या शतकाच्या शेवटी हे मंदिर बुद्धमंदिरात रुपांतरीत करण्यात आले, पहुडलेल्या बुद्धाची मुर्ती बसविण्याकरिता ते शिखर तोडले असावा असा अंदाज आहे.


बाफून राजमंदिराच्या आवारात ०१


बाफून राजमंदिराच्या आवारात ०२


बाफून मंदिराच्या अर्ध्या उंचीवरून दिसणारे मदिराचे आवार आणि पूर्वे दिशेचे गोपूर

हे मंदिर रेतीने भरलेल्या जमीनीवर बांधलेले होते. त्यामुळे आणि त्या प्रचंड इमारतीच्या वजनाने तिची वारंवार बरीच पडझड झाली. शिवाय ख्मेर रूजच्या कालावधित झालेल्या लूटालूटीने १९९५ पर्यंत तिची अवस्था १० हेक्टर जमिनीवर विखुरलेले कोरीवकामाने भरलेले ३ लाख दगड अशी झाली होती. पण पुरातत्व शास्त्रज्ञांनी ते आव्हान स्विकारले आणि अपरिमित श्रम, ख्मेर स्थापत्यशैलीचा आधार आणि बर्‍या अवस्थेत असलेला इमारतीचा एक कोपरा यांच्या मदतिने हे प्राचीन मंदिर परत उभे करण्याचा चमत्कार करून दाखविला !


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०१


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०२


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०३

एप्रिल २०११ पर्यंत पुनस्थापनेचे काम पुरे झाले आणि राजे नोरोदोम सिंहनूक यांनी फ्रेंच पंतप्रधान फ्रांस्वा फिलाँ यांच्याबरोबर ३ जुलै २०११ ला मंदिराचे उद्घाटन करून त्याची सफर केली.

मंदिराबाहेर पडलो आणि आजूबाजूला असलेल्या शेकडो वर्षे वयाच्या अनेक वृक्षराजांपैकी काहींच्या बरोबर फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही...

...
वृक्षराजांबरोबर फोटोसंधी

सुमारे हजार वर्षांपूर्वी बांधलेला प्राचीन स्थापत्यचमत्कार व त्याच्या विखुररेल्या ३ लाख दगडांतून तो परत उभा करण्याचा अर्वाचीन चमत्कार म्हणजे एकावर एक फुकट असे दोन चमत्कार पाहून आणि त्यांचे साक्षीदार असलेल्या दोन वयोवृद्ध वृक्षराजांशी संवाद करून आम्ही पुढच्या आकर्षणाकडे चालू लागलो.

n

 अंगकोर मधे एक डायनोसोर चे शिल्प आहे, 

त्या काळी सामान्य मंदिरांच्या, राहण्याचा आणि व्यावसायिक उपयोगाच्या इमारती लाकडी असत. विशाल आकाराच्या आणि त्यातही सुंदर कोरीवकामाने सजलेल्या दगडी इमारती उभारणे हे अमाप संपत्ती आणि सत्ता असणार्‍या सम्राटांनाच परवडण्यासारखे होते. अंगकोर थोमच्या केवळ मध्य आवारातच एका आकर्षणाकडून दुसर्‍याकडे जाताना इतक्या मोठ्या दगडी इमारती दिसतात की हे त्यावेळचे फारच मोठे आणि फारच वैभवशाली शहर होते याची खात्री पटते. असेच हे दाट झाडीत लपलेले मंदिराचे गोपुर...


दाट वृक्षराजीमध्ये दडलेले मंदिराचे गोपुर

हस्तीवेदिका

नंतर आम्ही अंगकोर थोमच्या राजमंदिरवेदिका पहायला निघालो. या वेदिका मुख्यतः फौजेची मानवंदना स्विकारताना आणि जनतेला खुल्या असणार्‍या राजसमारंभांच्या वेळेस सम्राटांच्या आणि राजदरबारातील महत्वाच्या लोकांच्या बैठकीचे स्थान म्हणून वापरल्या जात असत...


नकाश्यात वर्तुळातील 4 या इंग्लिश आकड्याच्या डाविकडे असलेली उभी लांब हिरवी रेषा हस्तिवेदिका दर्शवित आहे

आता त्याकाळचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे त्याच्या दरबाराची वेदिका तशीच असायला पाहिजे ना. सातव्या जयवर्मनने बंधलेली सगळ्यात प्रसिद्ध हस्तिवेदिकेची लांबी आहे तब्बल ३५० मीटर! तिची उंची सर्वसाधारणपणे ३ मीटर आणि रुंदी साधारण ८ -१० मीटर तर काही ठिकाणी १५-२० मीटर आहे. आता या वेदिकेचा केवळ दगडी चौथरा बाकी आहे. छप्पर आणि त्याचा भार उचलणारे खांब लाकडाचे असल्याने काळाबरोबर नष्ट झाले आहेत आणि इतर मौल्यवान साजशृंगार अर्थातच लुटला गेला आहे. वेदिकेच्या विरुद्ध बाजूला संपूर्ण मैदानाच्या कडेला अनेक उंच बुरूज आहेत...


हस्तिवेदिका ०१

.


हस्तिवेदिका ०२

या वेदिकेवरून मैदानात प्रवेश करण्यासाठी पाहिर्‍या असलेले एकूण पाच चौथरे आहेत. वेदिकेला आणि पाहिर्‍यांकडे नेणार्‍या चौथर्‍यांना सिंह, गरूड आणि नाग यांच्या मूर्तींनी सुशोभित केलेले आहे..


हस्तिवेदिका ०३

सम्राटाच्या खास प्रशस्त मध्यचौथर्‍याच्या कडांवर विशाल नागराजांबरोबर सिंहाच्या विशाल पूर्णाकृती मूर्तीही आहेत..


हस्तिवेदिका ०४ : सम्राटाच्या पाहिर्‍यांकडे जाणारा चौथरा

विजयी सैन्य अंगकोर थोमच्या पूर्वेकडील दरवाज्याने प्रवेश करून विजयमार्गावरून या वेदिकेसमोरच्या मैदानात प्रवेश करत असे. प्रशस्त वेदिकेवरुन चालताना तिचे आकारमान आणि समोरचे संचलनाचे भव्य मैदान पाहूनच मन भारावून जाते. मग तिला पूर्णपणे सजवलेले असताना आणि तेथे विजय प्राप्त करून आलेल्या सैन्याच्या भव्य संचलनाचा जल्लोश चालू असताना वातावरण कसे भारून जात असेल याची काहिशी कल्पना येते... आणि हे सर्व हजारभर वर्षांपूर्वी खरेच घडले आहे हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा केवळ थक्क व्हायला होते...

या वेदिकेच्या मध्यभागी हत्तींची शिल्पे आहेत. या हत्तिंच्या शिल्पांवरूनच या वेदिकेचे नाव हस्तिवेदिका (Terrace of the Elephants) असे पडले आहे. हत्तींच्या सोंडेतून पाणी वाहताना दाखवले आहे. ही शिल्पे जलदेवता इंद्राला वंदना म्हणून स्थापित केली गेली आहेत. त्यांच्या बाजूला असलेल्या पाहिर्‍या तीन-साडेतीन मीटर उंचीवर असलेल्या कमलासनाकडे जातात...

 वेदीका :'-

वेदिका म्हणजे कोणत्यातरी समारंभासाठी तयार केलेला उंच चौथरा. मलाही हा शब्द नविनच होता. शब्दकोषातून शोधावा लागला. म्हणून लेखाच्या शिर्षकांत त्याचे इंग्लिश भाषांतर (terrace) दिले आहे.

वेदिकांबद्दल अजून थोडे...

स्थापत्यशास्त्रातले उंच चौथरे ही भारतिय द्रविड संस्कृतीने दिलेली आणि ख्मेर संस्कृतीने पूर्णपणे अंगभूत केलेली ठेव आहे. केवळ समारंभासाठी अथवा देवळासाठीच नाही तर संपूर्ण शहरे मानवनिर्मीत उंच चौथर्‍यांवर वसवणे ही प्रथा सिंधू नदीच्या खोर्‍यातल्या (हराप्पा-मोहेंजोदरो) संस्कृतीपासूनच सुरू झाली. या रचनेचे अनेक उपयोग होत असत त्यापैकी महत्वाचे खालीलप्रमाणे आहेत :

१. या प्रदेशांतल्या सतत येणार्‍या पुरांपासून संरक्षण

२. उच्चासनावर असलेल्या राजा, देवूळ, शहर यांचा आपल्या नागरिकांवर आदर/अभिमान वाढवणारा मानसिक प्रभाव आणि शत्रूंवर भितीदायक प्रभाव.


हस्तिवेदिका ०५

मूळ हस्तिशिल्पांबरोबर भिंतींवर हत्तींची अनेक कोरीवकामे (उठावचित्रे) आहेत...


हस्तिवेदिका ०६

भिंतीवर एका ठिकाणी नागाला पायात पकडलेला गरूड आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिंह यांनी वरचा भाग तोलून धरला आहे असे उठावचित्र आहे...


हस्तिवेदिका ०७

कुष्ठरोगी राजाची वेदिका (Terrace of Leper King)

हस्तीवेदिकेच्या उत्तरेकडे कुष्ठरोगी राजाची २५ मीटर लांबीची इंग्लिश 'U' अक्षराच्या आकाराची वेदिका आहे. या वेदिकेवर बसलेल्या अवस्थेतल्या मनुष्याकृती पुतळ्यावरून या वेदिकेचे नाव पडले आहे. ही मूर्ती कुष्ठरोगी राजाची असल्याची कल्पना तिच्यावर अनेक शतके साचलेल्या नेचे आणि दगडफुलांच्या थरांमुळे केलेली असावी. त्याचबरोबर पाश्चिमात्य अज्ञान आणि वंशव्देष त्यामागे असावेत.

उघड्यावर असलेली मूळ मूर्ती ऊनपावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेली आहे. येथील आताची मूर्ती मूळ मूर्तीची हुबेहूब प्रतिमा आहे. ..


कुष्ठरोगी राजाची वेदिकेवरील मूर्ती

नग्नावस्थेत असलेली ह्या मूर्तीवर जावा शैलीचा प्रभाव आहे. काही पुरातत्त्व संशोधकांच्या मते ही वेदिका राजदहनस्थान असून ती मूर्ती यमाची आहे. या वेदिकेच्या चौथर्‍याच्या भिंतींवर असलेल्या पाताळवासी व्यक्ती आणि प्राण्यांची उठावचित्रे याच सिद्धान्ताचे समर्थन करतात...


कुष्ठरोगी राजाच्या वेदिकेवरील पाताळवासी व्यक्ती आणि प्राण्यांची चित्रे ०१

.


कुष्ठरोगी राजाच्या वेदिकेवरील तरवारधारी पाताळवासी ०२

मनातल्या मनात ख्मेर सम्राट बनून विजयी सैन्याची राजवंदना स्विकारून भारावलेल्या अवस्थेत असताना मार्गदर्शकाने... "चला, आता अंगकोर वट बघायला जाउया" असं म्हणून भानावर आणले. उत्सुकतेची परिसीमा कशीबशी सांभाळत आम्ही जगातले सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या जगप्रसिद्ध राजमंदिराकडे निघालो.

अंगकोर वट आकारमान, शिल्पकला आणि कोरीवकामाच्या दृष्टीने खरोखरच महामंदिर आहे. हे मंदिर कंबोज स्थापत्यशैलीचा अत्युच्च नमुना समजला जातो. त्याच्या या शैलीला कंबोडियन अंगकोर वट शैली हे नाव दिले गेले आहे. हे मंदिर आधुनिक कंबोडियाची ओळख बनलेले आहे. त्यामुळेच केवळ कंबोडियाच्या पर्यटनातच नव्हे तर त्याच्या राष्ट्रध्वजावर आणि चलनाच्या नोटांवरही या मंदिराच्या चित्राने मानाचे स्थान पटकावले आहे. १९९२ पासून ते युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थान झालेले आहे.

या राजमंदिराची उभारणी सम्राट दुसरा सूर्यवर्मन (इ स १११३ - ११५०) याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात केली. हे विष्णूमंदिर "वराह विष्णुलोक" या नावाने बांधले गेले. सोळाव्या शतकात बदलत्या राजधर्माबरोबर तेथे बुद्ध उपासना सुरू झाली. जगातील सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या या बांधकामावर अंदाजे ५०,००० लोकांनी ३० वर्षे काम केले. याच्या सर्वात बाहेर १५०० मी X १३०० मी आकाराची चौकोनी संरक्षक भिंत आहे. त्या भिंतीबाहेर सर्व बाजूंनी २०० मीटर रुंदीचा खंदक आहे. परिघाकडून केंद्राकडे जाताना उंच होत जाणार्‍या तीन समकेंद्रीत चौकोनी सज्जा (galleries) आहेत. त्या सज्जांना जोडणार्‍या पूर्वपश्चिम आणि उत्तरदक्षिण अश्या अक्षाकृती सज्जा आहेत. जेथे सज्जे एकमेकाला छेदतात त्या दर ठिकाणी गोपुरे आहेत. द्रविड शैलीचा प्रभाव असलेल्या उंच मध्यावर चार टोकांना चार आणि मध्यभागी एक अशी पाच शिखरे आहेत. मधले शिखर ६५ मीटर (साधारण २२ मजली इमारतीइतके) उंच आहे. शिखरे कमळाच्या कळ्यांच्या आकाराची आहेत. सर्वात मध्यभागी ख्मेरमध्ये बाकान (Bakan) या नावाचा चौरस आकाराचा मंदिराचा केंद्रीय भाग आहे. तेथे जाण्यासाठी उभ्या चढाच्या पाहिर्‍या आहेत.

संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे.

या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ ८२०,००० चौ मीटर (२०३ एकर) आहे. अंगकोर पद्धतीप्रमाणे देऊळ सोडून इतर इमारती लाकडाच्या असत त्यामुळे अर्थातच त्या आतापर्यंत नष्ट झाल्या आहेत. तसेच मंदिरातील सुवर्ण, रौप्य, हिरे-माणके इ मध्यकाळात झालेल्या लुटालुटीत नाहीसे झालेले आहे. केवळ उरलेल्या दगडी इमारतीच्या स्थापत्याने आणि त्यातील कोरीवकामाने अंगकोर वटचे इतके नाव झाले आहे तर मग सर्व वैभवासह असलेले हे मंदिर कसे असेल त्याची कल्पना करणेही कठीण आहे.


अंगकोर वट : विहंगम दृश्य (जालावरून साभार)

.


अंगकोर वट : मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र (जालावरून साभार)

.


अंगकोर वट : मंदिरमध्याची प्रतिकृती (जालावरून साभार)

या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातली काही महत्वाची खालील प्रमाणे:

१. या अगोदरच्या शैव राजमंदिरांच्या ख्मेर परंपरेला छेद देऊन बांधलेले हे पाहिले वैष्णव राजमंदिर आहे.

२. त्याच्या खंदकाचे, भिंतींचे आणि सज्जांचे मोठे आकारमान.

३. पूर्वाभिमुख मंदिरांच्या ख्मेर परंपरेला सोडून हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. याचे कारण बहुदा याच्या पश्चिम गोपुराचा सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष खगोलशास्त्रिय उच्चतम आणि नीचतम अवस्थेशी असलेला संबंध आहे (western gopura brackets the rising sun's position between the summer and winter solstices).

४. सज्जांच्या भिंतींवर असलेली उठावचित्रांची (bas-reliefs) रचना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पहावी अश्या रितीने केलेली आहे. याचे कारण खगोलशास्त्रिय आहे असे एलेनॉर मनिक्का (Eleanor Mannikka) या शास्त्रज्ञाचे मत आहे. या सिद्धान्ताप्रमाणे:
अ) वसंत ऋतूतील समदिवसरात्रकाल (spring equinox) होणार्‍या पूर्व दिशेला समुद्रमंथनाची चित्रे म्हणजे सर्व जगाची सुरुवात;
आ) त्यानंतर सूर्य उच्चतम अवस्थेत (summer solistice) जातो त्या उत्तर दिशेला मेरुपर्वत आणि देवदानवांची युद्धे;
इ) त्यानंतर शरद ऋतूतील समदिवसरात्रकाल (autumn equinox) होणार्‍या पश्चिम दिशेला कुरुक्षेत्रावरचे महाभारत युद्ध आणि त्याने सुरू केलेला युग-बद्दल;
ई) आणि शेवटी सूर्य नीचतम अवस्थेत (winter solistice) जातो त्या दक्षिण दिशेला यमलोक आणि नरक, वगैरे;
हा सिद्धांत सर्व पुरातत्व संशोधकांना मान्य नसला तरी अंगकोर वटच्या रचनेत अनेक खगोलशास्त्रिय रहस्ये दडलेली आहेत याबाबत सर्वांचे एकमत आहे.

सज्जांवरच्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय आणि रोजच्या जीवनाची दृश्ये असलेल्या उठावचित्रांमध्ये एकही पुनरावृत्ती नाही. येथे खास कंबोडियन असलेल्या अप्सरांची २,००० पेक्षा जास्त चित्रे आहेत, त्यांच्या आकारमान अथवा भावदर्शनामध्येही अजिबात पुनरावृत्ती नाही ! बहुतेक सगळी उठावचित्रे सुर्यवर्मनच्या कारकीर्दीत बनविली गेली. मात्र त्यात नंतर, मुख्यतः सोळाव्या शतकात राजा आंग चानच्या कारकीर्दीत थोडी भर घातली गेली.


अंगकोर वट : सज्जांवरील उठावचित्रांच्या मालिकांचे स्थान दाखवणारा नकाशा
(http://www.art-and-archaeology.com/ वरून साभार)

चला तर या मंदिरात आपण अर्थातच पश्चिमेकडून प्रवेश करू या. यासाठी आपल्याला मंदिरासभोवतालचा खंदक पार करण्यासाठी असलेल्या २०० मीटर लांबीच्या आणि पाच-सहा लेनचा रस्ता होईल इतक्या रुंद बंधार्‍यावरून चालत जावे लागते...


अंगकोर वट : खंदक ओलांडून पश्चिम गोपुराकडे नेणारा बंधारा

बाहेरच्या भिंतीच्या गोपुराच्या मनोर्‍यांची पडझड झालेली आहे. पण तरीही त्यांच्या अवशेषांची भव्यता मन मोहून घेते...


अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०१

.


अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०२

गोपुरापर्यंत पोचेपर्यंत मुख्य मंदिर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. पण गोपुरापासून दोन्ही बाजूंच्या गोपुराला जोडणारे सज्जे पावलांना थबकवतात. न संपणार्‍या लहान लहान होत जाण्यार्‍या दरवाज्यांच्या मालिकेसारख्या दिसणार्‍या सज्जातून पूर्ण परिक्रमा करणे पुरेश्या वेळेच्या अभावामुळे शक्य नव्हते. तरीसुद्धा दोन्ही बाजूला काही पावले गेल्याशिवाय राहवत नाही...


अंगकोर वट : पश्चिम गोपुराला इतर गोपुराशी जोडणार्‍या सज्जाचा एक भाग

गोपुर ओलांडून आत गेल्यावर ध्यानात येते की "दिल्ली अजून बरीच दूर आहे." कारण पुढे गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा ३५० मीटर लांबीचा, काही मीटर उंचीचा बंधारा (causeway) समोर येतो...


अंगकोर वट : पश्चिम गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा बंधारा

सगळ्यात बाहेरची संरक्षक भिंत आणि मुख्य मंदिराच्या इमारतीच्या मधल्या भागात प्राचीन काळी लाकडी घरांची वस्ती होती. आता तेथे थोडी मोकळी जागा आणि इतर ठिकाणी जंगल वाढलेले आहे. बंधार्‍यावरून काही अंतर चालल्यावर परत मागे वळून गोपुराकडे पाहण्याचा मोह होतोच...


अंगकोर वट : मदिराच्या बाजूने पश्चिम गोपुर

बंधार्‍याच्या प्रत्येक बाजूला एक अश्या दोन विशाल प्राचीन वाचनालयाच्या इमारती आहेत. त्या इमारतींचा आकार आणि बांधणी पाहून ख्मेर साम्राज्यात ज्ञानाची किती आदर केला जात असावा याचा अंदाज येतो...


अंगकोर वट : डावीकडचे वाचनालय


अंगकोर वट : उजवीकडचे वाचनालय

जसजसे आपण अंगकोर वटचे प्रतीक म्हणून वापरलेल्या देखाव्याच्या जवळ येऊ लागलो तसे इमारतीच्या खर्‍या भव्यतेची कल्पना येऊ लागते आणि ध्यानात येते की प्रतिकचिन्ह संपूर्ण मंदिराला पुरेसा न्याय देउ शकलेले नाही. मूळ इमारत अधिक भव्य, अधिक आकर्षक वाटते...


अंगकोर वट : प्रतिकचिन्ह दर्शन ०१

आम्ही भेट दिली तेव्हा दुसर्‍या पश्चिम गोपूराच्या मुख्य व्दाराच्या पुनस्थापनेचे काम चालू होते. त्यामुळे आम्हाला त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उपदरवाज्यांपैकी एकाने आत जावे लागले. मध्यमार्गापेक्षा लहान असलेल्या पुर्णाकृती सिंहमूर्तींनी सजवलेल्या या उपमार्गालाही लहान म्हणणे कठीण आहे...


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०२


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०३


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०४

मध्यमार्गाच्या पाहिर्‍या चढून आल्यावर एक प्रशस्त स्वागतक आहे. तो स्वागतकक्ष मंदिराच्या सज्जात उघडतो तर उपमार्गांच्या पाहिर्‍या आपल्याला तडक सज्जात नेवून सोडतात...

त्या सिंहाच्या मधून जाणार्‍या पायर्‍या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात? काही ठिकाणी तुटलेल्या दगडी पायर्‍यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आणि / किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाकडी पायर्‍या बसवल्या आहेत. चित्रातल्या पायर्‍या अशा प्रकारे डागडूजी केलेल्या आहेत.


अंगकोर वट : दुसर्‍या पश्चिम गोपुराच्या डाव्या उपव्दारातून झालेले मुख्यव्दाराचे दर्शन


अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर आणि इतर गोपूरांना जोडणारा सज्जा

हे गोपुर ओलांडून आत गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य इमारतीत प्रवेश करतो. दुसर्‍या आणि तिसर्‍या सज्जाला जोडणार्‍या मार्गाच्या प्रत्येक बाजूला दोन अशी दगडी बांधकाम असलेली एकूण चार चौरस आकाराची कुंडे आहेत. आता कोरडी असली तरी देऊळ वापरात असताना ती सतत पाण्याने भरलेली असत...


अंगकोर वट : पाण्याचे कुंड

कुंडांच्या आजूबाजूचे आणि इतर सर्व सज्जे कोरीवकामाने सजलेले आहेत. आतापर्यंत सज्जांची भव्यता, सज्जातील कोरीव उठावचित्रे, एकूण इमारतीची लांबी-रुंदी-भव्यता व सज्जांचे जाळे यांच्यात काय बघू आणि काय नको होउन प्रचंड गडबड होत होती. सर्वच भिंती आणि खांबांचे पृष्ठभाग उठावचित्रांनी सजवलेले आहेत. काहीच मनासारखे बघितले जात नाही असे वारंवार वाटत होते...


अंगकोर वट : अप्सरा

अंगकोर वट : उठावचित्रे

पण उठावचित्रे शांतपणे बघण्याअगोदर प्रथम बाकान म्हणजे मंदिराचा सर्वोच्च मध्यभाग बघून घेऊ असे मार्गदर्शक म्हणाला म्हणून आम्ही पुढे निघालो. बाकानला मध्यभाग म्हणत असले तरी केवळ हा भाग म्हणजे मानवनिर्मित दगडी टेकडीवरचे एक पूर्ण मंदिरच आहे...

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०१

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०२

...

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०३ व ०४

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरील अप्सरा

अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरचे कोरीवकाम


अंगकोर वट : बाकानचे प्रवेशव्दार

अंगकोर वट : बाकानच्या प्रवेशव्दारावरील नक्षी

मंदिराच्या इमारतींच्या खिडक्या आणि छपरे दगडी आहेत. खिडक्यांना कोरीव दगडाच्या सळया आहेत. छपरांची रचना आणि कोरीवकाम जणू ते छप्पर झाडांच्या फांद्यांनी शाकारलेले दिसावे असे आहे...

अंगकोर वट : सज्जाचे बाहेरच्या बाजूने घेतलेले चित्र

अंगकोर वट : छप्पर

सर्व भिंती कोरीवकामाने भरलेल्या आहेत...

अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०१

...

अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०२ व ०३

मंदिरातून फिरताना एका सज्जातून दुसर्‍या सज्जात फिरताना चारी बाजूला असलेल्या भीती, खांब आणि खिडक्यांमुळे बरेच चाललो आहे हे कळत असले तरीसुद्धा बाकानच्या उंचीवरून मंदिराच्या मध्य आवाराच्या चारी बाजूंचे दर्शन घेतल्यावरच त्याच्या भव्यतेची खरी ओळख पटते...


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०१


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०२


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०३


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०४


अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०५


अंगकोर वट : बाकानचा मध्यभाग


अंगकोर वट : बाकानच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे बाकानचे मध्यशिखर

तेथून खाली उतरून आम्ही परत सज्जांच्या जाळ्यात गुरफटून घ्यायला सुरुवात केली आणि आता जरा भानावर येउन त्यांच्या भव्यतेची नीट कल्पना येऊ लागली...


अंगकोर वट : सज्जा ०१

.आता ते बुद्धमंदिर झालेले असल्याने विष्णू किंवा इतर हिंदू देवतांच्या पूजेसाठी ठेवलेल्या मूर्ती नाहीत. काही सज्जांमध्ये साध्या बुद्धमूर्ती आहेत. मंदिरमध्यात ही मूर्ती होती पण ती प्राचीन नसावी असे समजते...

...
अंगकोर वट : सज्जा ०२ व ०३

.

...
अंगकोर वट : सज्जा ०४ व ०५

.

अंगकोर वट : सज्जा ०६

बाहेर येत येत सरतेशेवटी आम्ही खास उठावचित्रांकरता जगप्रसिद्ध असलेल्या सज्जात आलो. तेथे आल्यावर ध्यानात आले की ह्या १८७ मी X २१५ मी आकाराच्या सज्जाच्या एकूण ८०४ मीटर परिघातली सगळी उठावचित्रे नीट पहायची तर दोन पूर्ण दिवसही कमी पडतील, धावत धावत बघायला सहा तास तरी सहज लागतील...

अंगकोर वट : उठावचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या सज्जाच्या एका दिशेच्या अर्ध्या भागाची झलक

या वरच्या चित्रात दिसणार्‍या संपूर्ण भागात साधारण ९० मी X ३ मी आकाराचे महाभारत युद्धाचे एकच उठावचित्र आहे ! या सज्जात तशीच प्रचंड आकाराची इतर अनेक उठावचित्रे आहेत. त्या चित्रांच्या जागा दाखवणारा नकाशा सुरुवातीसच दिला आहेच.

उठावचित्रे पाहण्यात गुंतलेले डोळे पायांना त्या सज्जाबाहेर जाउ देण्यास तयार नव्हते. पण "सूर्यास्ताकरता प्रसिद्ध असलेल्या एका मंदिरावर जायचे आहे" असे सांगून आमचा मार्गदर्शक घाई करत होता. नाईलाजाने जेवढी मिळतील तेवढी उठावचित्रे धावत धावत बघितली आणि जमतील तेवढी चित्रे काढून घेतली...

.

.

.

.

. गजारूढ इन्द्र ओळखू आला. रावणकैलासउत्थापन मूर्तीची शैली थोडी वेगळी आहे. आपल्याकडील शैलीत नेहमीच रावणाच्या पाठीचा भाग दर्शकाच्या समोर असतो. तर इकडे मात्र रावण दर्शकाच्या समोरच तोंड करून म्हणजे उलट्या दिशेने कैलास उचलण्याच्या प्रयत्न करतोय.

.

.

अंगकोर वट : सहस्त्रबाहू रावण

.

.

शेवटी मार्गदर्शकाने "सुरक्षेसाठी पुरातत्वखात्याने केलेल्या नियमाप्रमाणे सुर्यास्त सोहळा बघण्याच्या मंदिरावर एका वेळेस ३०० माणसे जमा झाली की प्रवेश बंद होतो" असा निर्वाणीचा दिला तेव्हा चडफडत का होईना पण तेथून निघणे भाग पडले.

अंगकोर वटसाठी केवळ अर्धा दिवस राखून ठेवणार्‍या आमच्या टूर कंपनीचा किती राग आला असेल ते सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर, सहल कंपनीने दिलेल्या अपुर्‍या माहितीमुळे या ठिकाणाची हेलिकॉप्टरची सहल करता आली नाही ही रुखरुख मनात राहिली ते वेगळेच. बाकानच्या उंचीवरून ह्या मंदिराचा परिसर इतका आश्चर्यकारक वाटला तर अधिक उंचीवरून तो एका नजरेच्या टप्प्यात आल्यावर कसा दिसला असता याची केवळ कल्पना करावी लागली. परत केव्हातरी तेथे जायला पाहिजेच अशी प्रबळ इच्छा मनात घेउनच पुढे निघालो.

अंगकोरमधली बरीच चित्रे या दुव्यावर पहायला मिळतिल.

आमच्या सहल कंपनीच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे म्हणा पण ह्या मंदिरातील सगळी चित्रं बघता आली नाही ही रुखरूख आहेच. हिंदू संस्कृतीचा प्रबळ प्रभाव असला तरी ख्मेर साम्राज्याचा मोठा आवाका आणि राजकिय व आर्थिक ताकद बघता त्यांच्या चालिरिती, स्थापत्य आणि कलाकृतींमध्ये स्थानिक प्रभाव असणे सहाजिकच होते. मात्र मूळ पौराणीक कथांना फारसा धक्का लागलेला दिसत नाही. शिवाय १३ व्या शतकापासून बौद्ध धर्माचा प्रभाव सुरू होऊन आणि १५व्या शतकापासून जवळ जवळ १००% बौद्ध जनता असूनही सर्वसामान्य लोकांची हिंदू धर्माबद्दल आस्थाच दिसली. मुख्य म्हणजे हिंदू (विशेषतः महाभारत आणि रामायण) आणि बौद्ध प्रथा एकमेकात नैसर्गिकपणे मिसळून गेल्या आहेत, त्यांत सर्वसामान्य कंबोडियन माणसाला काही विशेष वाटत नाही.

 ती आडवी झोपलेली बुद्ध मूर्ती टिपिकल अनंतशयनी विष्णूच्या शैलीत कोरलेली दिसतेय.

जालावर खालच्या चित्रातली विष्णूची मूर्ती अंगकोर वट मधिल असल्याचे वाचले. पण सद्या ती कोठे आहे ते माहित नाही...

. बुद्धमूर्ती कायम उभ्या अथवा ध्यानमग्न अवस्थेत बसलेल्या आढळतात. अपवाद म्हणजे अजिंठा आणि नाशिकलेणीतील महायानकालीन महापरिनिर्वाण मूर्तीचा पण हे महापरिनिर्वाण असल्याने शैली अत्यंत भिन्न आहे याउलट अनंतशयनी मूर्ती अगदी निवांतपणे डोके उंचावून झोपलेल्या अवस्थेत दिसते. ह्या अजिंठ्याच्या महायानमूर्तीच्या आधीच्या गुप्त काळातील कित्येक मूर्ती अनंतशयनी विष्णूच्या आहेत.

पहुडलेला बुद्ध (reclining Buddha) ही कल्पना पहुडलेल्या विष्णूवरून आली असावी.

पहुडलेल्या बुद्धाचे डोळे बंद असले तर त्याच्या पायांच्या अवस्थेप्रमाणे दोन अर्थ होऊ शकतात:

(अ) पाय पुढेमागे असल्यास ती निद्रावस्थेतील मूर्ती...

(आ) पाय एकमेकाला समांतर असले तर ती निर्वाणावस्थेतील मूर्ती...

 या बुद्धमूर्ती ब्रम्हदेशातल्या आहेत... 

अंगकोर वट मधून मोठ्या नाराजीने बाहेर पडून आम्ही तेथून १.५ किमी दूर असलेले नॉम् बाखेंग (Phnom Bakheng) मंदिर पहायला निघालो. नवव्या शतकाच्या शेवटीसम्राट सूर्यवर्मन (इ स ८८९ - ९१०) याने हे शिवमंदिर एका टेकडीच्या माथ्यावर बांधले. अंगकोर वटच्या दोन शतके अगोदर बांधलेले हे मंदिर त्या काळची ख्मेर राजधानी यशोधरापूर मधले मुख्य मंदिर होते. आतापर्यंत टेकडी म्हणजे मेरुपर्वत आणि तिच्या भोवती खंदक म्हणजे दुग्धसागर हे ओळखण्याइतके ख्मेर स्थापत्यतज्ञ तुम्ही झाले असालच ! देवळाची मूळ रचना पिरॅमिडसारख्या उंच होत जाणार्‍या सहा स्तरांची होती आणि त्यांत एकूण १०८ मनोरे होते. सर्वात उंच टोकावर सभोवती चार आणि मध्यभागी सर्वोच्च मनोरा अशी रचना होती. मनोर्‍यांची रचना अशी आहे की सर्वोच्च शिखरावरून कोणत्याही दिशेस बघितले तर एका वेळेस फक्त ३३ मनोरे दिसत असत. ही संख्या ख्मेर परंपरेप्रमाणे मेरू पर्वतावर वस्ती असणार्‍या ३३ देवांचे रूपक आहे; सर्वोच्च मनोर्‍याभोवतीचे १०८ मनोरे प्रत्येकी २७ दिवसांचे चार चंद्रकलासंच दाखवतात; पिरॅमिडचे सहा स्तर आणि टेकडीचा तळ म्हणजे सात स्वर्गांचे रूपक आहे; स्तरांवरचे १२ मनोरे गुरुची १२ वर्षांचे भ्रमण दाखवतात; इ अनेक सिद्धांत पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. University of Chicago च्या Paul Wheatley या शात्रज्ञाने नोम् बाखेंग मंदिराचे वर्णन "दगडाने बांधलेली खगोलशास्त्रिय (किंवा प्रचंड) दिनदर्शिका" ("an astronomical calendar in stone") असे केले आहे.

ह्या धर्म, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांच्या दृष्टीने कठीण असलेल्या कोड्याचा अर्थ समजून त्याचे महत्त्व ध्यानात येण्यास बराच वेळ लागला. त्यातच या मंदिराचे बहुतेक मनोरे आता कमी अधिक प्रमाणात ढासळलेले आहेत. आता आधुनिक थायलंडमध्ये असलेल्या Sdok Kak Thom मंदिरात सापडलेल्या संस्कृत शिलालेखामध्ये नोम् बाखेंगचा "When Sri Yasovardhana became king under the name of Yasovarman, the able Vamasiva continued as his guru. By the king's order, he set up a linga on Sri Yasodharagiri, a mountain equal in beauty to the king of mountains." या अर्थाचा उल्लेख आहे.

या मंदिराची बरीच पडझड झाली आहे आणि २००४ पासून World Monuments Fund चे कंबोडियाच्या APSARA या पुरातत्वशास्त्र संस्थेच्या सहकार्याने तेथे पुनस्थापनाचे प्रयत्न चालू आहेत. सद्या हे मंदिर अंगकोरच्या परिसराचे उंचीवरून दर्शन घेण्यासाठी आणि सूर्योदय-सूर्यास्त पाहण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या मंदिराला धोका पोहोचू नये यासाठी टेकडीवर एका वेळेस ३०० पेक्षा जास्त पर्यटक जाऊ देत नाही.

असो. चला तर आता या विशेष मंदिराचे उरलेले अवशेष आणि त्यावरून दिसणारा सूर्यास्त बघायला...

अंगकोर वटमधून बाहेर पडताना

दहा पंधरा मिनिटातच गाडीतून पायउतार होऊन आम्ही टेकडी चढू लागलो आणि नोम् बाखेंग मंदिराचे प्रथमदर्शन झाले...

नोम् बाखेंग मंदिर : प्रथमदर्शन

टेकडीवर नेणार्‍या पाहिर्‍यांचे बरेच नुकसान झालेले आहे त्यामुळे अश्या आधुनिक पाहिर्‍यांची मदत घ्यावी लागली. पण त्यांच्या बाजूचे मंदिराची राखण करणारे जंगलचे राजे प्राचीनच आहेत...

नोम् बाखेंग मंदिर : प्रथमदर्शन

बरीच पडझड झालेली असली तरी इमारतींचे जे काही भाग शिल्लक आहेत त्यावरून देवळाच्या भव्यतेची बर्‍यापैकी कल्पना येते...

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या तळाकडील चौथर्‍याचा एक भाग

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील मंदिरमध्याकडे नेणारा रस्ता

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील मंदिरमध्याकडे नेणारी इमारत

नोम् बाखेंग मंदिर : टेकडीच्या माथ्यावरील चौथर्‍याचा एक भाग


नोम् बाखेंग मंदिर : एक मनोरा


नोम् बाखेंग मंदिर : एका मनोर्‍याचे अवशेष

जे काही कोरीवकाम उरलेले आहे त्यावरून मंदिराच्या उत्तम कलाकुसरीचीही कल्पना येते...

नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०१


नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०२

नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०३

नोम् बाखेंग मंदिर : कलाकुसर ०४

मंदिरमध्याच्या चौथर्‍यावरून फिरून चारी बाजूचे मनोरे आणि इतर परिसराचे दर्शन घेता येते...

नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०१

नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०२

नोम् बाखेंग मंदिर : मंदिरावरून दिसणारा परिसर ०३

त्यातच दूरवर दिसणारे अंगकोर वट सर्वत्र पसरलेल्या जंगलातूनही आपले अस्तित्व दिमाखाने दाखवताना दिसत होते...

नोम् बाखेंग टेकडीवरून दिसणारे अंगकोर वट

पर्यटक वर सोडणारी व्दारे केव्हाचीच बंद झाली होती आणि आतापर्यंत मंदिरमध्याच्या चौथर्‍यावर बरच मोठा जनसमुदाय जमा झालेला होता...

नोम् बाखेंग टेकडीवर सूर्यास्त बघायला जमलेले पर्यटक

पलीकडे काही पर्यटक गरम हवेचा फुगा (hot air balloon) वापरून सर्व परिसर बघत सूर्यास्ताची मजा बघायला आलेले होते...

गरम हवेचा फुगा (hot air balloon) वापरून सूर्यास्तदर्शन

दाटून आलेल्या ढगांतून सूर्यास्त दिसेल की नाही हीच चिंता सर्वांच्या मनात होती...

नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०१

नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०२

टेकडीवर प्रवेश मर्यादित असल्याने आपला नंबर लागावा म्हणून सूर्यास्ताच्या बरेच अगोदर तिथे आम्ही पोचलो होतो. त्यामुळे मंदिराच्या आवारात सावकाशपणे फिरूनही नंतर इतर करामती करायला वेळ मिळाला...

नोम् बाखेंग टेकडीवरचा सूर्यास्त ०३

इथल्या पुरातत्त्व विभागाचा दुसरा नियम म्हणजे साडेसहाला टेकडी रिकामी करणे जरूरीचे असते. त्या दिवशी सूर्य ढगांनी झाकलेला असतानाच खाली उतरण्याचा भोंगा वाजला आणि आम्हाला खाली उतरणे सुरू करणे भाग पडले...

नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०१ : शिडीच्या दोन्ही बाजूला बऱ्याचश्या चांगल्या अवस्थेतले मनोरे दिसत आहेत

नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०२

टेकडी उतरताना मार्गदर्शकाने खालच्या चित्रात दिसणार्‍या मंदिराच्या भागाकडे लक्ष वेधले. तुम्हाला तेथे काही विशेष दिसत आहे का ?...

नोम् बाखेंग मंदिर : उतारावरून मागे वळून ०२ : पहुडलेल्या बुद्धाच्या भव्य मूर्तीचे अवशेष

ती पहुडलेल्या बुद्धाची प्रचंड मूर्ती (डावीकडचा चेहर्‍याचा भाग दिसला ना?) या मंदिराच्या स्थापत्यात बुद्धकाळात टाकलेली भर होती. ती मूर्ती पूर्ण होण्याअगोदरच तिचे काम थांबले असावे असे मार्गदर्शक म्हणाला.

शेवटी अर्धी टेकडी उतरून आल्यावर सुर्यराजाने क्षितिजापलीकडे जाण्यापूर्वी ढग थोडेसे दूर सारून डोकावत रंगांची उधळण करत दर्शन दिले...

नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०१

नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०२

आणि लगेच परत ढगाआड गेला...

नोम् बाखेंग मंदिर : सूर्यास्त ०३

पूर्ण सूर्यास्त दिसला नाही तरी टेकडीवरचे देवळावरचे अवशेष त्या भेटीत समाधान देण्याला पुरेसे ठरले होते. अंगकोर वट आणि नोम् बाखेंग या मंदिरांची मनावर ठसलेली चित्रे घोळवित भारावलेल्या मन:स्थितीत आम्ही हॉटेलकडे निघालो.

पहिल्या दिवसाच्या अनुभवाने अंगकोरमध्ये अंगकोर वट सोडूनही बरेच काही बघण्यासारखे आहे ह्याची खात्री झाली होती. त्यामुळे केवळ मार्केटिंगसाठी इतर अनेक मंदिरांची नावे इटिनेररीत टाकली असावी ह्या समजाला मोठा धक्का बसला होता. सकाळी लवकर उठून न्याहरी करून इटिनेररीतल्या इतर मंदिरांच्या नावांची उजळणी केली. सागरने आंतरजालावरून त्यांची काढलेली माहिती वाचून उत्सुकता अजूनच ताणली जात होती. आता त्या भल्यामोठ्या यादीतील एकही मंदिर नजरचुकीने (अथवा मार्गदर्शकाच्या चलाखीने) बघायचे राहून जाऊ नये असेच वाटत होते.

बाहेर पडलो आणि हे खास ख्मेर आणि आधुनिक शैलींच्या मिश्रणाने बांधलेले घर समोर आले...


ख्मेर शैली आणि आधुनिक शैलींच्या संगमाने बांधलेले एक घर

आज सकाळी रुलो गटातली (Rolous Group) देवळे बघायची होती. रुलो या आधुनिक गावाजवळ असलेल्या हरिहरालय किंवा इंद्रपूर या प्राचीन राजधानीत ही देवळे असल्याने त्या देवळांच्या गटाला हे नाव पडले आहे. ही ख्मेर सम्राटांची नवव्या शतकात बांधलेली ख्मेर संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातली मोठी बांधकामे आहेत. या बांधकामात दगडांबरोबर विटांचाही भरपूर उपयोग केलेला आहे. या गटात बाकोंग, लोलेई आणि प्रीह् कोर ही तीन मुख्य मंदिरे येतात.

बाकोंग मंदिर

पहिला थांबा होता बाकोंग मंदिर. या मंदिराभोवतालचा खंदक अजूनही सुस्थितीत आहे आणि त्याचे सौंदर्य आपले स्वागत करते...


बाकोंग मंदिराचा खंदक

कंबोडियाच्या पर्यटन व्यवस्थेत इतर काही देशांसारखा आर्थिक समृद्धीचा भपका नसला तरी सौदर्यदृष्टी, स्वच्छता आणि नीटनेटकेपण मात्र नक्कीच होता...


बाकोंग मंदिराचे आवार

आवारातले स्वागतगृहसुद्धा त्या गोष्टीची साक्ष देत होते...


बाकोंग मंदिराचे स्वागतगृह

तेथून थोडे पुढे गेले की बाकोंगचे पूर्ण रूप पुढे येते आणि त्याची भव्यता पाहून हे नवव्या शतकातले (म्हणजे ११०० वर्षांपेक्षा जास्त जुने) बांधकाम आहे यावर विश्वास बसणे कठीण जाते. पंधरा मीटर (साधारण पाच मजली इमारतीइतके) उंच असलेले हे मंदिर ६५० मी X ८५० मी इतक्या क्षेत्रफळांवर बांधलेले आहे. हे मंदिर ख्मेर संस्कृतीतील देवपर्वत रुपी मंदिर या कल्पनेचा पहिला आविष्कार समजला जातो. हे मंदिर पहिल्या इंद्रवर्मनने (इ स ८७७ - ८८९) बांधले असले तरी यात बाराव्या शतकापर्यंत अनेक सम्राटांनी भर घातली आहे. या मंदिरपर्वताला नाग, गरूड, राक्षस, यक्ष आणि सगळ्यात वरचा राजाचा असे एकूण पाच स्तर आहेत. मंदिरासभोवती आठ उपमनोरे आहेत.


बाकोंग मंदिर

मंदिरासमोरचा भग्न नंदी हे शिवमंदिर असल्याची साक्ष देतो. आपण या मंदिरपर्वतावर वर वर जाऊ लागतो तसा जरासा दम लागतो पण मंदिराचे कोरीवकाम दम विसरायला लावते.

तर चला करूया या मंदिराची एक चित्रमय सफर...

... 
बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०१ व ०२


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०३

दक्षिणेकडील दरवाज्याच्या तोरणावर दक्षिणाधिपती यम आहे...


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०४ : यम असलेले दक्षिण दरवाज्यावरील तोरण

पश्चिमेकडील दरवाज्याच्या तोरणावर पश्चिमाधिपती वरूण आहे आणि त्याच्या खाली नाग आहेत...


बाकोंग मंदिरातले कोरीवकाम ०५ : वरूण असलेले पश्चिम दरवाज्यावरील तोरण


मंदिराचे सर्वोच्च मध्यशिखर


मंदिरातून दिसणारे मागचे आवार

.


मंदिरातून दिसणारे पुढचे आवार

बाकोंगमधून बाहेर पडलो आणि इतिहासातील काळ्या कालखंडाचा कंबोडियाच्या वर्तमानावर अजूनही कायम असलेला ठसा असा समोर आला...


भूसुरूंगाने पाय गमावलेले कंबोज नागरिक

भूसुरूंगाने सर्वात जास्त जीवितहानी आणि अपंगत्व झालेल्या देशांत कंबोडियाचा जगात पहिला क्रमांक आहे. तिसहून अधिक वर्षांच्या अंतर्गत यादवीच्या काळात ख्मेर रूज, हेंग सामारिन आणि हून सेन यांच्या कारकीर्दीत कंबोडियामध्ये पेरल्या गेलेल्या भूसुरुंगांपैकी ४० ते ६०,००,००० (चाळीस ते साठ लाख) भूसुरूंग अजूनही भूमीतच आहेत. मुख्य म्हणजे ते इतक्या विस्कळीतपणे पेरले गेले की त्यांची स्थाने कोणालाच नक्की माहीत नाहीत. त्यांच्या स्फोटांमुळे अपंगत्व आलेल्यांची सर्वसामान्य नागरिकांची संख्या ४०,००० पेक्षा जास्त मोठी झाली आहे. ती संख्या इ स २००५ पर्यंत दरवर्षी ८५० ने वाढत होती. हे भूसुरुंग निकामी करण्यासाठी दर वर्षाला तीन कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च करूनही अजूनही जखमींची वार्षिक संख्या दोनशेच्या आसपास आहे. त्यातच अधिक दु:खदायक गोष्ट अशी की यातली एक त्रितियांश संख्या लहान मुलांची आहे. भूसुरुंगांमुळे दळणवळणावर व शेतकामावर आलेल्या बंधनांमुळे आणि मोठ्या मृत / जखमी लोकसंखेमुळे पडणार्‍या ताणामुळे कंबोडियाच्या आधीच नाजूक असणार्‍या अर्थव्यवस्थेवर बराच ताण पडत आहे.

कंबोडियाच्या आणि इतर देशांच्या अनुभवांवरून बोध घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने १९९९ मध्ये Ottawa Treaty उर्फ Mine Ban Treaty पास केली आहे. त्यानुसार भूसुरूंग आणि विशेषतः मानवविरोधी भूसुरूंग (Anti-Personnel Mines) तयार करणे, साठवणे, वाहून नेणे आणि दुसर्‍या देशाला देणे यावर कडक निर्बंध लावलेले आहेत.

लोलेई मंदिर

तिथून पुढे निघून आम्ही लोलेई मंदिराकडे निघालो. इंद्रवर्मनचा मुलगा यशोवर्मनने (इ स ८८९ - ९१५) हे मंदिर एका मानवनिर्मित तळ्यात (baray) सहा मनोर्‍यांच्या स्वरूपात बांधायला सुरुवात केली गेली पण काही कारणाने फक्त चारच मनोरेच बांधले गेले...


चार मनोर्‍यांचे लोलेई मंदिर

आता तळे मातीने भरल्याने तेथे पाणी नाही. मंदिर जरी ख्मेर परंपरेप्रमाणे भव्य नसले तरी त्यावरील कोरीव काम बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये असेच आहे...


लोलेई मंदिर : कोरीवकाम ०१ : हत्तीवर आरूढ इंद्र असलेले तोरण

.

...... 
लोलेई मंदिर : कोरीवकाम ०२ (स्त्रीरक्षक) आणि ०३ (आभासी दरवाजा)

वरचा आभासी दरवाजा म्हणजे खरा दरवाजा नसून मनोर्‍याच्या एका बाजूच्या भिंतीवर एकाच शिलेवर केलेले दरवाज्याचा आभास निर्माण करणारे कोरीवकाम आहे.

या मंदिराच्या भिंतीवर एक संस्कृत व पाली भाषेतला शिलालेख आहे. त्याची लिपी ख्मेर आहे. आम्ही भारतीय आहोत म्हणजे संस्कृत आणि पाली फाड फाड वाचणार अशी आमच्या मार्गदर्शकाची (गैर)समजूत होती. आमच्या ती दूर करण्याच्या प्रयत्नाचे त्याला बरेच आश्चर्य वाटले!...


लोलेई मंदिर : संस्कृत आणि पाली भाषेतला ख्मेर लिपीत लिहीलेला शिलालेख

प्रीह् कोर मंदिर

इ स ८८० मध्ये बांधलेले हे मंदिर इंद्रवर्मनने बांधलेले पहिले मंदिर आहे. हे मंदिर राजाने त्याच्या देवस्वरूप पूर्वजांच्या स्मरणार्थ बांधले आहे. त्यातला मंदिरमध्य ख्मेर साम्राज्याचा संस्थापक दुसरा जयवर्मन याच्या शिव-परमेश्वर या नावे उभारला आहे. मागचे तीन मनोरे मुख्य तीन राण्यांच्या नावे आहेत.

या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. त्याच्या काही शिल्पांची चित्रे....


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०१ : मंदिराचे रक्षण करणारे सिंह


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०२ : व्दारपाल

.


प्रीह् कोर मंदिर : कोरीवकाम ०३ : तोरण

या तोरणावर वरच्या भागात घोडेस्वार आहेत. तर खालच्या भागात नागांवर आरूढ सैनिक आहेत. दोन्ही बाजूस मगरीवरच्या स्वाराला हत्तीचे डोके आणि सिंहाचे शरीर व आयाळ आहेत.

इतकी भटकंती होईपर्यंत पोटात कावळे ओरडू लागले होते. त्वरित रेस्तराँच्या दिशेने कूच केले. अजून मंदिरांची बरीच मोठी यादी बाकी होती. त्यासाठी पळापळ करायला बर्‍याच ऊर्जेची सोय करणेही भाग होते.

पोटोबा केल्यावर आम्ही बांतीय श्री मंदिराकडे निघालो. वाटेत ताडगोळे विकणारी बाई दिसली आणि थांबून कंबोडियन ताडगोळ्यांचा स्वाद घेण्याचा मोह आवरला नाही...


ताडगोळे विकणारी कंबोडियन महिला

रस्त्याच्या बाजूला मधूनच कंबोडियाच्या ग्रामीण भागात असणारी खांबांवरची घरे दिसत होती. ह्या प्रकारची घरे तेथे दर पावसाळ्यात येणार्‍या पुरांपासून रक्षण करण्यासाठी प्राचीन काळापासून बांधली जात आहेत...


लाकडी खांबांवरचे कंबोडियन ग्रामीण घर

बांतीय श्री मंदिर

हे शिवमंदिर दहाव्या शतकाच्या शेवटाला नोम् देई नावाच्या टेकडीवर बांधलेले आहे. याच्या बांधकामात मुख्यतः कोरीवकामासाठी उपयुक्त असणार्‍या तांबड्या वालुकाश्माचा उपयोग केलेला आहे. इतर अंगकोरीयन स्थापत्याच्या तुलनेत लहान असलेले हे मंदिर त्याच्या आजही उत्तम अवस्थेत असलेल्या अत्युच्च प्रतीच्या कोरीवकामामुळे पर्यटकांचे लाडके आहे. हे मंदिर ख्मेर शिल्पकलेचा शिरोमणी समजले जाते. राजधानीच्या ईश्वरपूर नावाच्या भागात असलेल्या या मंदिराचा आकार विशाल नसण्याचे एक कारण म्हणजे ते सम्राटाने बांधलेले नाही तर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन (इ स ९४४ -९६८) याच्या यज्ञवराह नावाच्या सल्लागाराने बांधलेले आहे. तेथे असलेल्या शिलालेखात "सम्राट पहिला हर्षवर्मन याचा नातू यज्ञवराह हा एक लोकहितबुद्धी असणारा विद्याव्यासंगी होता आणि त्याने रुग्ण, अन्यायाने पिडीत आणि गरीब लोकांना मदत केली." असा उल्लेख आहे. दुसरा राजेंद्रवर्मननंतर सम्राट झालेला पाचवा जयवर्मन (इ स ९६८ - १०००) यज्ञवराहाचा शिष्य होता.

विखुरलेल्या प्राचीन अवशेषांपासून वास्तू परत पूर्वीसारखी उभी करण्याच्या पुनस्थापन (anastylosis) तंत्राचा अंगकोरमधला पहिला उपयोग या मंदिरामध्ये केला गेला. उच्च प्रतीच्या कलाकृतींमुळे हे मंदिर अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चोर्‍यांना बळी पडले आहे. काही महत्त्वाच्या कलाकृतींना चोरण्याचे प्रयत्न तर त्यांना नॉम् पेन् येथील राष्ट्रीय संग्रहालयात हालवल्यानंतरही झालेले आहेत (मंदिरात आता काही खास कलाकृतींच्या जागी त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत).

या शिवमंदिराचे मूळ नाव "त्रिभुवनमहेश्वर मंदिर" असे होते. असे असले तरी, या मंदिराच्या दक्षिणभागात शिवासंबंधी आणि उत्तरभागात विष्णूसंबंधी कोरीवकाम आहे. मंदिरमध्यात शिवलिंग आहे. या मंदिराचा प्रत्येक चौरस सेंटिमीटर कोरलेला आहे. सर्व भिंती, दारांच्या चौकटी, आभासी व्दारे, दारांवरील रुंद तुळया, तुळयांवरील त्रिकोण, इ सर्व एकमेकाला पूरक अश्या कोरीवकामाने भरलेले आहेत. येथील कोरीवकाम पाहून एका पुरातत्वशास्त्रज्ञाने "हे कोरीवकाम दगडावरच्या कलाकृतींपेक्षा सोन्याच्या किंवा लाकडावरच्या कुशल कोरीवकामाला जास्त जवळ आहे." असे म्हटले आहे. या मंदिराचे सद्याचे बांतीय श्री (citadel of the women`किंवा citadel of beauty) हे नाव बहुतेक त्या मंदिरातील देवतांच्या खूप बारकाव्यांसह कोरलेल्या अनेक सुंदर छोट्या मूर्तींमुळे पडले असावे असे समजले जाते.

तर चला पाहूया हा प्राचीन शिल्पकलेचा चमत्कार...

सर्वात बाहेरची संरक्षक भिंत ओलांडून आत आल्यावर खंदकाच्या आत असलेल्या दुसर्‍या भिंतीमध्ये असलेले गोपुर समोर येते...


बांतीय श्री चे पहिले दर्शन ०१


बांतीय श्री चे पहिले दर्शन ०२

...

गोपुर ०१ व ०२


गोपुर ०३

गोपुर ०४


गोपुरापासून मंडपाकडे नेणारा रस्ता


मंडप ०१


मंडप ०२


मंडप ०३

...

खांब ०१ व ०२

...

खांब ०३ व ०४


देवता

तोरण ०१ : ऐरावतावरचा इंद्र

तोरण -तोरणांवरील दिक्पाल अप्रतिम आहेत. 

तोरण ०३

तुळईवरचा त्रिकोण ०१ : हिरण्यकश्यपूचा वध करताना नृसिंह

तुळईवरचा त्रिकोण ०२ : खाली तोरण आणि त्यावर लक्ष्मी

तुळईवरचा त्रिकोण ०३ : तांडवनृत्य करणारा शिव

तुळईवरचा त्रिकोण ०४ : वाली-सुग्रीव युद्ध

तुळईवरचा त्रिकोण ०५ : कैलास पर्वत हलवणार्‍या रावणाचे गर्वहरण

तुळईवरचा त्रिकोण ०६ : ऐरावतावर बसून पर्जन्यवृष्टी करणारा इंद्र

तुळईवरचा त्रिकोण ०६ : नंदीवर आरूढ शिवपार्वती

अजून काही... तसेच शब्दापलीकडचे...

.


आभासी दरवाजा असलेली भिंत आणि तिच्यावरचे शिखर

.

.

.

.


.

.

.

कोरीवकामाचे वर्णन करायचा प्रयत्न मुद्दामच केला नाही... दगडांनी लिहिलेले हे काव्य शब्दात पकडणे केवळ अशक्य आहे. नि:शब्द होऊन ते डोळ्यांनी मनात साठवणेच शहाणपणाचे आहे.

 
  हे एक उठावचित्र . छायाचित्रांनुसार तरी जोड असल्याचे दिसत नाही. त्यापरिस्थितीत ही मंदिरे टिकून राहिली हे आश्चर्यच.

.इकडील शिल्पांप्रमाणे एकाच दगडात आख्खे शिल्प न कोरता दगडांचे ठोकळे बनवून त्यांवर शिल्पांचे विविध भाग कोरवून तद्नंतर ती एकांवर एक रचून शिल्पे एकसंध केली असल्याचे दिसते.

    एका मंदिरातील शिल्पपटामध्ये मंदिरे बनवायची कृती दाखवली आहे. त्याप्रमाणे प्रथम केवळ तासलेले दगड एकमेकावर रचून मंदिर बनवले जात असे आणि नंतर कोरीवकाम केले जायचे असे दिसते. मोठे दगड खूप उंचीवर कसे चढवायचे, त्यांचे जोड असणारे पृष्ठभाग एकमेकावर घासून कसे गुळगुळीत करायचे, इ सर्व कृती या शिल्पपटात आहेत. याचा एक मुख्य फायदा असा झाला की (Anastylosis तंत्राने) हे दगड परत जुळवून मंदिरे जवळ जवळ मूळ स्वरूपात उभी करणे शक्य झाले.

दगड रचण्याच्या मुख्यतः दोन पद्धती वापरल्या होत्या:

१. वजनदार दगडांचे पृष्ठभाग अगदी गुळगुळीत करून ते एकमेकावर रचून गुरुत्वकर्षणाचा फायदा घेणे.

२. खालच्या चित्रात दाखलेले Mortise and tenon प्रकारचे सांधे...


.

(सर्व चित्रे जालावरून साभार)

 

यानंतर आम्ही काही मंदिरांना धावती भेट दिली. त्याचा हा धावता आलेख...

बांतीय साम्रे मंदिर

हे सम्राट दुसरा सूर्यवर्मनने (इ स १११३ - ११५०) वाराव्या शतकाच्या मध्यात बांधलेले विष्णूमंदिर आहे. पुनस्थापनेचे अनास्टायलोसिस तंत्र वापरून त्याला जवळ जवळ पूर्णावस्थेत उभे केलेले आहे. ख्मेर मंदिरे बांधण्यासाठी लागणारे दगड मिळणार्‍या कुलेन पर्वतराजीतील खाणींच्या परिसरात राहणार्‍या साम्रे जमातिच्या नावावरून या मंदिराचे नाव पडले आहे.

चला तर चक्कर मारू या मंदिरामध्ये...


बांतीय साम्रे परिसरातले स्वागतालय


बांतीय साम्रे : ०१ : गोपुर


बांतीय साम्रे : ०२


बांतीय साम्रे : ०३


बांतीय साम्रे : ०४

......
बांतीय साम्रे : ०५ व ०६


बांतीय साम्रे : ०७


बांतीय साम्रे : ०८


बांतीय साम्रे : ०९


बांतीय साम्रे : १० : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र

प्रे रूप मंदिर

हे शिवमंदिर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन याने दहाव्या शतकाच्या दुसर्‍या भागात बांधले. याच्या बांधकामाच्या खास शैलीला त्याचेच म्हणजे प्रे रूप शैली असे नाव दिले गेले आहे.


प्रे रूप : ०१


प्रे रूप : ०२


प्रे रूप : ०३ : ह्या मंदिराच्या मध्यभागातिल पायर्‍यांचा चढ इतका तीव्र आहे की केवळ पर्यटकांनाच नाही तर येथे नेहमी येणार्‍या कंबोडियन लोकांनाही तिरके राहूनच चढ-उतर करावे लागते !


प्रे रूप : ०४


प्रे रूप : ०५


प्रे रूप : ०६ : मंदिराच्या मध्यशिखराच्या आतून शिवपिंडीच्या वरच्या भागाचा फोटो. वरचा मोकळा भाग बहुतेक सोन्याचे शिखर चोरीला गेल्यामुळे उघडा झालेला आहे

प्रसात क्रावन मंदिर

सम्राट हर्षवर्धनच्या कालात (इ स ९१५ -९२३) बांधले गेलेले हे शिवमंदिर सम्राटाने बांधलेले नसून बहुतेक त्याच्या दरबार्‍यांपैकी कोणीतरी बांधले असे समजले जाते. याच्या बांधणीचा विशेष म्हणजे या मंदिराची रचना नेहमीच्या ख्मेर परंपरेप्रमाणे चार मनोर्‍यात मध्यभागी मुख्य मनोरा अशी नसून एका रांगेत पाच मनोरे अशी आहे.


प्रसात क्रावन : ०१


प्रसात क्रावन : ०२ : शिलालेख


प्रसात क्रावन : ०३ : मध्य मनोर्‍यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील तांडवनृत्य करणार्‍या शिवाचे उठावचित्र


प्रसात क्रावन : ०४ : मध्य मनोर्‍यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील गरूडावर आरूढ झालेल्या विष्णूचे उठावचित्र


प्रसात क्रावन : ०५ : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र

थकलेल्या शरीराने आता तक्रार करायला सुरुवात केली होती. संध्याकाळ होऊ लागली होती. शिवाय आज रात्री कंबोज संगीत-नृत्य कार्यक्रम बघायला जायचे होते. त्यामुळे तेथे पूर्ण ताकदीनिशी पोहोचण्यासाठी हॉटेलवर परतून गरम गरम शॉवर घेणे भाग होते. नाईलाजाने परत फिरलो.

कंबोज नृत्य-संगीत-रजनी

पारंपरिक कंबोज नृत्याला "अप्सरा नृत्य" असे म्हटले जाते. अनेक देवळांच्या उठावचित्रांत या अप्सरांना मानाचे स्थान आहे. अंगकोर वट मध्ये तर अप्सरांची वेगवेगळी जवळ जवळ २,००० उठावचित्रे आहेत हे आपण पूर्वीच पाहिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बरीच उत्सुकता होती.

तर बघूया त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे...


अप्सरा नृत्य : ०१


अप्सरा नृत्य : ०२


अप्सरा नृत्य : ०३


अप्सरा नृत्य : ०४ : राम आणि सीता


अप्सरा नृत्य : ०५


अप्सरा नृत्य : ०६


अप्सरा नृत्य : ०७.

अप्सरा नृत्यांबरोबर मधून मधून लोकसंगीतनृत्याचाही कार्यक्रम होता...


कंबोज लोककला : ०१


कंबोज लोककला : ०२


कंबोज लोककला : ०३

कंबोज कला आणि कंबोज-आंतरराष्ट्रीय जेवणाचा आनंद घेत संध्याकाळ कशी संपली ते कललेच नाही. उद्याच्या दिवसात अजून काय सुखद आश्चर्याचे धक्के बसणार आहेत असा विचार करत बिछान्याला पाठ टेकवली.

ता प्रोम

ता प्रोम हे आधुनिक नाव असलेल्या या महायान बौद्धमंदिर आणि विश्वविद्यालयाचे मूळ नाव "राजविहार" असे आहे. ह्याची बांधणी बाराव्या शतकच्या शेवटात आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला सम्राट सातवा जयवर्मनने त्याच्या आईच्या स्मरणार्थ केली.

इथल्या भग्नावशेषांना शेकडो वर्षे वयाच्या प्रचंड आकाराच्या वृक्षराजांनी विळख्यात बंदिस्त केलेले आहे. त्यांची तोड अथवा सफाई न करता ती निसर्गाची करणी तशीच कायम ठेवल्यामुळे या जागेचे दर्शन अधिकच विस्मयचकित करून जाते. याच कारणामुळे हे स्थान जास्त प्रसिद्ध झाले आहे ! या जगावेगळ्या भग्नावशेषांना भेट दिल्याशिवाय अंगकोरची भेट पूर्ण होऊच शकत नाही.

अँजेलिना जोलीने काम केलेल्या लोकप्रिय Lara Croft: Tomb Raider ह्या चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी केले गेले. त्या चित्रपटाने आणि त्याच नावाच्या व्हिडिओ गेमने या मंदिराची प्रसिद्धी जगात घरोघरी पसरवली. १९९२ पासून ही जागा युनेस्को मान्य जागतिक वारसा स्थान आहे.

या जागेचे संरक्षण आणि पुनस्थापन करण्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) अप्सराला (APSARA, Authority for the Protection and Management of Angkor) मदत करत आहे, हे पाहून आनंद झाला...


ता प्रोम च्या पुनस्थापनात भारताचा सहभाग

तर चला या जगावेगळ्या आकर्षणाचा फेरफटका मारूया...


ता प्रोम : गोपुर


ता प्रोमच्या आवारात या वृक्षसम्राटाने स्वागत केले


ता प्रोमच्या मुख्य इमारतीकडे नेणार्‍या वाटेवरचा प्रचंड नागराज


ता प्रोम : एका गोपुरावरचे युद्ध करणारे सैनिक

......

ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०१


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट०२

......

ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट०३ आणि ०४


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०५


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०६


ता प्रोम : इमारतीवर विराजमान वृक्षसम्राट ०७

 वृक्षराजींनी कवेत घेतलेलं मंदिर अतिशय आवडलं. निसर्गाची किमया अद्भूत आहे. जरी हे मंदिर वृक्षविळख्यांमुळे अतिशय अद्भूत दिसत असलं तरी तरी यापासून मंदिराला हानी निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना केली जाते. हे वृक्ष आता इतक्या प्रचंड आकाराचे झालेले आहेत की तेच जास्त प्रवासी खेचतात... सुंदर मंदिरे काय अंगकोर मध्ये पेशाला पासरी आहेत. त्यामुळे ता प्रोममध्ये पुरातत्व खाते प्रथम झाडांची काळजी घेते आणि मग त्याअनुषंगाने मंदिर कसे जास्तित जास्त सुरक्षीत राहील असे बघते !

......

ता प्रोम : कोरीवकाम ०१ व ०२

......

ता प्रोम : कोरीवकाम ०३ व ०४


ता प्रोम : कोरीवकाम ०५


ता प्रोम : कोरीवकाम ०६


ता प्रोम : कोरीवकाम ०७


ता प्रोम : आपल्या मूळ जागेवर पुनस्थापना होण्याची वाट पाहणार्‍या शिला

बाहेर पडलो आणि कंबोडियाच्या भूतकाळाच्या वर्तमानातील परिणामांनी परत दर्शन दिले...

ता प्रोम जवळचा भूसुरूंगांच्या स्फोटांनी अपंग बनलेल्या वादकांचा संघ

पण तो भूतकाळ मागे टाकून आपला वर्तमानकाळ बनवण्याच्या धडपडीत असलेल्या कंबोज नागरिकांना पाहून जरा बरे वाटले...

जरा पुढे गेलो आणि नयनरम्य कंबोज निसर्गाने मन मोहायला सुरुवात केली...

आजचा कंबोडियातला शेवटचा दिवस. पण मंदिरांची मालिका काही संपत नव्हती. शिवाय परत तेच बघायला लागले म्हणून एखादे ठिकाण चुकवले असते असेही नव्हते. दर ठिकाण आपल्या विशेषाने उठून दिसत होते. अंगकोरमध्ये अजून काही दिवस रहा असा आग्रहाचा तर सोडाच पण साधा सल्ला न देणार्‍या आमच्या तथाकथित नामवंत सहल कंपनीबद्दलचा राग मनामध्ये खदखदत होता. त्याला कसेबसे आवरून लवकरच आटपून बाहेर पडलो.

आतापर्यंत देवळांची इतकी अपरिचित नावे जमा झाली होती की पुढची नावे लक्षात ठेवण्याचे निष्फळ प्रयत्न सोडून देऊन केवळ नेत्रसुखावर भर देणे पसंत केले. त्यामुळे आता पुढच्या चित्र सफरीत काही चित्रांच्या तळाला मंदिराच्या नावाचा उल्लेख नाही...


प्रीह् खान ०१ : प्रवेशमार्गाच्या दुतर्फा असलेल्या पुतळ्यांच्या लांबच लांब रांगा


प्रीह् खान ०२ : राम-रावण युद्ध


प्रीह् खान ०३ : तपस्या करणारे ऋषी आणि इतर कोरीवकाम


प्रीह् खान ०४


पूर्व मेबॉन ०१


पूर्व मेबॉन ०२ : स्वतःच्या सोंडेवर विराजमान गणेश

.


पूर्व मेबॉन ०३ : लक्ष्मी


पूर्व मेबॉन ०४ : तोरण


बांतीय कदेई ०१


बांतीय कदेई ०२


बांतीय कदेई ०३


.

.

.

.

.

.

.

.


रेस्तराँ

.अपेक्षेपेक्षा बरेच काही पदरात पडले होते त्याचा आनंद मानायचा की हे सगळे नीट बघायला अजून काही दिवस राहता येणार नव्हते याचे दुःख करायचे याचा निर्णय होत नव्हता. पण, एकाद्या ठिकाणची सफर परत करणे शक्य झाल्यास पहिला क्रमांक कुठल्या ठिकाणाचा असेल या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. संध्याछाया पसरू लागल्या आणि जड पावलांनी हॉटेलकडे परतावे लागले. दुसर्‍या दिवशी सहलीच्या पुढच्या स्थानाकडे जाणारे विमान पकडायचे होते.

(समाप्त)

सांबोर प्री कुकचे वैभव

>> डॉ. मंजिरी भालेराव

 कंबोडिया या देशात यांच्या वंशजांनी पुढे बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. त्याचा परिणाम म्हणून बयोन, ता फ्रोम, बांते श्राय आणि अतिशय  भव्य असे जगातले सर्वात मोठे मंदिर अंकोरवाट निर्माण झाले. बुद्ध, विष्णू, शिव, दुर्गा, लक्ष्मी, गणपती, नाग, इंद्र  आणि अजून अनेक हिंदुस्थानी देवदेवतांची उपासना कंबोडियात लोकप्रिय होती असे आजच्या अवशेषांवरून सहज समजते. हिंदुस्थानी कला, स्थापत्य, सामाजिक रूढी, परंपरा यांचा खूप मोठा प्रभाव या देशात पाहायला मिळतो.

हिंदुस्थानातील व्यापारी, प्रवासी हे हिंदुस्थानच्या सीमा ओलांडून आशियातील विविध देशांत खूप प्राचीन काळीच पोचले होते हे आपण पूर्वी पहिले होते. अनेक देशांतील स्थानिक संस्कृतीवर हिंदुस्थानी धर्माची आणि संस्कृतीची छाप पडलेली स्पष्ट दिसते. यात आशिया खंडातील विविध देशांचा समावेश होतो. हिंदुस्थानी धर्म, पुराकथा, कला, स्थापत्य, भाषा,  लिपी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.  आग्नेय आशियातील कंबोडिया हा देशसुद्धा याला अपवाद नाही. खरे म्हटले तर या देशात हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रभाव असलेले स्थापत्य, कला आणि इतर पुरातत्त्वीय अवशेष यांचा खच आहे.

खरे तर फुनान म्हणजे इंडोचीनच्या भागात हिंदुस्थानी संस्कृतीचा पहिला आविष्कार झाला असे आपल्याला चिनी इतिहासकार सांगतात. आजच्या कंबोडिया या देशातील हा भाग आहे. ‘बीऊ-नाम्’चा आजचा चिनी उच्चार फुनान असा होतो. हे एक हिंदू राज्य होते आणि ते मेकोंग या नदीच्या खोऱयात वसले होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौन्डिण्य  नावाच्या ब्राह्मणाने हे राज्य स्थापन केले, असे चिनी नोंदीवरून समजते. कंबोडिया या देशात यांच्या वंशजांनी पुढे बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. त्याचा परिणाम म्हणून बयोन, ता फ्रोम, बांते श्राय आणि अतिशय  भव्य असे जगातले सर्वात मोठे मंदिर अंकोरवाट निर्माण झाले. बुद्ध, विष्णू, शिव, दुर्गा, लक्ष्मी, गणपती, नाग, इंद्र  आणि अजून अनेक हिंदुस्थानी देवदेवतांची उपासना कंबोडियात लोकप्रिय होती असे आजच्या अवशेषांवरून सहज समजते. हिंदुस्थानी कला, स्थापत्य, सामाजिक रूढी, परंपरा यांचा खूप मोठा प्रभाव या देशात पाहायला मिळतो.

इथे असलेल्या अनेक स्थळांपैकी जागतिक वारशाचा दर्जा असलेल्या सांबोर प्री कुक या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळून येतात. हे स्थळ काम्पॉन्ग थॉम या प्रांतात आहे. नॉम पेन्हच्या उत्तरेला 206 कि.मी. अंतरावर हे स्थळ आहे. इथे असलेल्या स्थापत्याची निर्मिती इ.स.च्या 6व्या ते 9व्या शतकात चेनला राजवटीत केली गेली. कंबोडियात पुढे जे ख्मेर साम्राज्य निर्माण झाले, त्याच्या आधीच्या काळातले हे स्थापत्य आहे. येथे चेनला राज्याच्या राजधानीची आणि येथील मंदिरांची निर्मिती राजा ईशानवर्मन (1) या राजाच्या काळात झाली. त्याने या परिसराला ईशानपूर असे नाव दिले होते. इथे असलेले मोठे मंदिर त्याने स्वतःच बांधून घेतले होते. इथे झालेले बहुतेक सर्व बांधकाम विटांचे केलेले होते, तर काही वेळेस वालुकाश्म दगडाचा वापर करूनही हे बांधकाम केलेले होते.

कंबोडियामध्ये असलेल्या स्थापत्याच्या नावांमध्ये ‘प्रसात’ किंवा ‘प्रासात’ (प्रासाद) हा शब्द खूप वेळा दिसतो. हिंदुस्थानमध्येही  मंदिर स्थापत्याच्या नावांमध्ये हा शब्द आढळून येतो. हिंदुस्थानातील सुरुवातीची मंदिरे ही फक्त देवाचे घर या स्वरूपातील असल्यामुळे त्यामध्ये देवाच्या मूर्तीसाठी केलेली खोली मोठी आणि भक्तासाठी छोटा व्हरांडा असे त्यांचे स्वरूप होते. पुढे काळाच्या ओघात पूजाविधीत भर पडली आणि त्यांची संख्या वाढली तसेच पूजा करणाऱयांचेही महत्त्व वाढले. देवाच्या घरापेक्षा देवाचा ‘प्रासाद’ म्हणजे राजवाडा ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून मंदिर बांधणीला सुरुवात झाली. त्यातून ओघानेच देवाच्या प्रासादाचे स्वरूप हे बहुमजली असावे अशी कल्पना पुढे आली. अनेक मजले सूचित करणाऱया उंच उंच  शिखरांचेही रूप हळूहळू साकार होऊ लागले. अगदी हीच संकल्पना हिंदुस्थानबाहेरही पोचली आणि त्यामुळे त्या देशांमध्येही ‘प्रासाद’ हा शब्द मंदिरासाठी देवाचे घर (खरे तर राजवाडाच) आणि राजाच्या महालासाठी वापरलेला आढळतो.

सांबोर प्री कुक येथील मंदिराचे नावही ‘प्रासात सांबोर प्री कुक’ असे आहे. संस्कृत आणि ख्मेर भाषेतील शब्दांनी हे नाव बनले आहे. या परिसरात असलेल्या स्मारकांची आज बरीच वाईट स्थिती आहे. कारण मूळ विटांची असलेली ही भव्य मंदिरे आता हळूहळू खराब होत आहेत. हिंदुस्थानातील मंदिर स्थापत्याच्या नागर शैलीसारखी यांची शैली आहे. गुप्त काळातील देवगढ, भितरगाव येथील मंदिरांची आठवण व्हावी अशी या सांबोर प्री कुक येथील मंदिरांची रचना आहे. या परिसरातील स्थापत्याचे अवशेष पाहता इथे साधारणपणे 186 मंदिरे होती असे म्हणता येईल. बरीचशी या परिसरातील अरण्यात लपली आहेत, तर काहींवर प्रचंड मोठय़ा वेली आणि वृक्ष यांनी कब्जा केला आहे. झाडाची मुळे मंदिरांच्या भिंतीत शिरली आहेत. तरीही या परिसरातील अवशेषांची विभागणी तीन भागांत केली आहे. प्रसात सांबोर, प्रसात ये पून आणि प्रसात बोरम असे ते भाग आहेत. प्रसात सांबोर हे यामधील मुख्य मंदिर मानले जाते. ते इ.स.च्या 7व्या शतकात बांधले होते. ते शिवाचे गंभीरेश्वर नावाचे मंदिर आहे. प्रसात ये पूनमध्ये शिवाच्या 22 मंदिरांचे अवशेष आहेत. ती सर्व मंदिरे राजा ईशानवर्मन (1) या राजाच्या काळात इ.स.च्या 7व्या शतकात बांधली गेली. प्रसात बोरम येथे असलेली मंदिरे थोडी उशिराची म्हणजे इ.स.च्या 9 व्या शतकातील आहेत. प्रसात सांबोर येथील मंदिर राजा ईशानवर्मन (1) याच्या काळात बांधले असल्याचा संस्कृत आणि जुन्या ख्मेरमधला एक शिलालेख तिथे सापडला आहे. त्यात 13 सप्टेंबर 627 या दिवसाचा उल्लेख आहे. या मंदिरामध्ये शिल्पकाम काही प्रमाणात शिल्लक आहे. जरी विटांनी बांधलेली मंदिरे असली तरी त्यावर चुन्यात आणि काही वेळेस दगडातील शिल्पं लावलेली दिसतात. त्यामध्ये अतिशय सुंदर अशा मकर तोरणाचाही समावेश होतो.

ईशानवर्मन (1) या राजाने चीनमध्ये आपले राजदूतसुद्धा पाठवले होते. चीनच्या अधिपत्याखाली असलेला वायव्य कंबोडियाचा भागही या राजाने जिंकून घेतला. इ.स.च्या 9व्या शतकात या नगराचा ऱहास सुरू झाला. जयवर्मन (1) हा इथला शेवटचा महत्त्वाचा राजा म्हणता येईल. त्याच्या मृत्यूनंतर कंबोडियातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. अनेक लहान लहान प्रांत वेगळे झाले. सांबोर प्री कुकचे वैभव हळूहळू कमी व्हायला लागले. पुढे 1975 ते 1979 या काळातील कंबोडियातील साम्यवादी सत्तेला शह देण्यासाठी अमेरिकेने या परिसरात बॉम्ब टाकले होते. त्यामुळे या मंदिरांचे काही प्रमाणात नुकसान झाले. नंतर युनेस्कोने 8 जुलै 2017 मध्ये या संकुलाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. आजही या परिसरात गेल्यावर त्याच्या प्राचीन काळातील वैभवाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात.


No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...